Friday, October 30, 2020

श्रीकृष्ण - पेंद्या

 श्रीकृष्ण - पेंद्या


(हा लेख संपूर्णपणे काल्पनिक आहे)

श्रीकृष्ण : पद्माकर, किती रे उशीर केलास? मी कधीचा थांबलो आहे. बलराम दादा तर तुझी वाट बघायला न थांबता निघूनसुद्धा गेला. योशोदा माँ मला त्याच्याबरोबर जायचा आग्रह करत होती; पण मी तुझ्यासाठी हट्टाने थांबलो.

पद्माकर : तुझं बरं आहे रे किसना, तुला शिदोरी बांधून द्यायला तुझी यशोदा माँ आहे. मला मात्र माझ्या म्हाताऱ्या आजीचं जेवण करून स्वतःची शिदोरी बांधून घेऊन निघावं लागतं या पहाटवेळी.

श्रीकृष्ण : पद्माकर, तुला किती वेळा सांगितलं की मी तुझी शिदोरी माँ कडून मागून घेईन. तू आपला वेळेत येत जा.

पद्माकर : नाही किसना. कधीतरी प्रेमाखातर तू माझ्यासाठी शिदोरी आणणं आणि रोजची शदोरी तुझ्या घरून येणं यात फरक आहे. आपल्याला नंद बाबांनी स्वाभिमानाने जगायचा धडा लहानपणापासून दिला आहे; विसरलास का? तसंही मी खाऊन-पिऊन सुखी आहे; भले तुझ्याप्रमाणे मला माझ्या घरी रोज पक्वान्न नसतील मिळत. अर्थात तू त्याची देखील सोय केलीच आहेस... आपण सर्वांनी शोदोरी सोडली की तू जो काला करतोस न तो खायला मजा येते. प्रत्येकाची शिदोरी वेगळी असते; मग सर्वच एकत्र करून आपण सगळे जेवतो. त्यामुळे माझ्यासारख्याने काही कमी आणलं असलं तरी पोटभर मिळतं खायला; तुझ्याप्रमाणे पक्वान्न घेऊन येणाऱ्या गोपाळांच्या शिदोरीतील खास पदार्थ देखील मिळतात. किसना, तुझ्या सोबत असणारा प्रत्येक गोपाळ समाधानी आहे बघ. मग माझ्यासाठी तू वेगळं काही करायची गरज नाही वाटत मला. आणि तसही मला आजीसाठी घरचा स्वयंपाक करावाच लागतो न; मग त्यात माझ्यासाठी म्हणून थोडं अजून जास्त करायला काय त्रास असणार? कन्ह्या, तुझं माझ्याविषयीचं प्रेम मी समजू शकतो; तशा तू देखील माझ्या भावना समजून घे.

श्रीकृष्ण : पद्माकरा.... कसं सांगू मी तुला माझ्या मनात तुझ्याबद्दल काय भावना आहेत? बरं, तूच सांग मला की मी असं काय करू की तुला आनंद होईल?

पद्माकर : किसना, तू काय देऊ शकशील बरं मला? बरं एक मागतो.... तुला असं नाही वाटतं; माझं हे भलं मोठं नाव माझ्या या कृश शरीरयष्टीसाठी फारच भारदस्त आहे? गाई चरायला नेणाऱ्या गवळ्याच्या कृश अशा या पोरक्या पोराला पद्माकर हे भारदस्त नाव शोभलं तर पाहिजे. कन्ह्या, मला असं नाव दे जे मला शोभेल आणि तुझ्याच काय पण समस्त गोकुळवासियांच्या तोंडात सहज राहील.

श्रीकृष्ण : (मनापासून हसत) पद्माकरा... मला वाटलं होतं 'तुझ्यासाठी काय करू?' अस मी विचारल्यावर तू बरंच काहीतरी मागशील.

पद्माकर : असं मागून का सुख मिळतं कन्ह्या? कसं सांगू केवळ तुझ्या जवळ असणं यात सर्वस्व मिळतं रे!

श्रीकृष्ण : नकोच सांगूस काही. मी समजलो की तू तुझ्या भावव्याकुळ मनाप्रमाणे मागणी केलीस. पद्माकरा, शरीरयष्टीवरून का कोणाचं नाव आणि कर्तृत्व ठरतं? पण तरीही तुझं मागणं एकदम मान्य. तुला आजपासून मी पेंद्या म्हणणार. मात्र मला खात्री आहे; एक दिवस असा येणार आहे की तुझं खरं नाव पद्माकर तुला शोभेल.

श्रीकृष्णाने पेंद्याला आलिंगन दिले आणि दोघेही हसत-खिदळत इतर गोपाळांना जाऊन मिळाले आणि गावाबाहेर खिल्लारांना चरायला घेऊन गेले.

असेच दिवस जात होते आणि तो दिवस आला ज्यादिवशी बलराम दादा सोबत श्रीकृष्णाने गोकुळ सोडले. इतर सर्व गोकुळवासियांप्रमाणे पेंद्याने देखील श्रीचरणांना मिठी घातली.

पेंद्या : किसना, असा कसा तू मला सोडून जाऊ शकतोस? अजून तुझी मोहमयी मुरली मी कानात साठवलेली नाही. तू पेंद्या म्हणून मारलेली अजून कानांना तृप्त नाही करून गेली. अरे, असे कितीतरी खेळ आहेत की जे आपण अर्धेच सोडले आहेत. तू तुझा डाव पूर्ण न करता नाही हं जायचंस. कन्ह्या, तू मला मागे विचारलं होतंस नं मला काय हवंय? आता मला समजलं मला नक्की काय हवं आहे तुझ्याकडून. मला न तुझा सहवास हवा आहे मोहना. तुला माझी गरज आहे की नाही मला माहीत नाही... पण तू माझ्या आयुष्यात असणं ही माझी खुप मोठी गरज आहे. असा अचानक नको रे जाऊस सोडून मला आणि या गोकुळाला. पहाटवेळी तुझी मोहमयी मुरली ऐकल्यावाचून गुरांना चैन पडत नाही. गवळणी पाणी भरायला घरातून बाहेर पडत नाहीत. मी तर तुझ्या सुरांनीच झोपेतून जागे होतो. अरे किसना, मी... फक्त मीच का... समस्त गोकुळातील ही खिल्लारं आणि हे वेडे गोकुळवासी तुझ्या केवळ अस्तित्वाच्या भावनेवर जगतात. गाई जास्त दूध देतात; वासरं सुदृढ राहातात. तुझं असणं म्हणजे आमचं सर्वस्व आहे रे कन्ह्या.

श्रीकृष्णाने प्रेमभराने पेंद्याचे दोन्ही खांदे धरले आणि त्याला उठवून उराशी कवटाळले.

श्रीकृष्ण : पेंद्या, मित्रा, एवढा भावविवश नको होऊस. एक समजून घे आज माझं जाणं अटळ आहे. मात्र राधेप्रमाणे मी तुझ्या प्रेमबंधनात देखील पूर्णपणे अडकलो आहे. गेल्या आठ वर्षांत जे केलं नाही आणि पुढील संपूर्ण जन्मात जे करणार नाही ते आज तुझ्यासाठी नक्की करीन. माझ्या प्रिय पेंद्या... आज दुसऱ्यांदा विचारतो.... गोकुळ सोडून जाताना मी असं काय करू की ज्यामुळे तुला आनंद होईल?

पुन्हा एकदा आपल्या प्रिय मुरलीधराच्या पायांवर पेंद्या कोसळला.

पेंद्या : मनोहरा.... समस्त विश्वात मीच असा भाग्यवान आहे की ज्याच्यावर तुझी कृपादृष्टी दुसऱ्यांदा पडली आहे. पण तेवढाच करंटा देखील आहे... मला याही क्षणी कळतच नाही आहे की 'तू इथून जाऊ नकोस'; याव्यतिरिक्त मी तुझ्याकडे काय मागू? तूच समजून घे मला आणि योग्य असेल ते दान टाक माझ्या झोळीमध्ये.

श्रीकृष्णाचे चरण पेंद्याच्या अश्रूंनी भिजून गेले होते. श्रीकृष्णाने खाली बसून त्याच्या पाठीवर हात ठेवला.

श्रीकृष्ण : पेंद्या, तुझ्या प्रेमाने मला देखील अबोल करून टाकलं आहे रे. या निष्कपट आणि स्वछ मैत्रीपुढे मी तुला काहीही दिलं तरी ते थिटं पडेल. त्यामुळे आज मीच तुझ्याकडे काहीतरी मागतो आहे. तू माझी मागणी पूर्ण कर. मागे तू तुझ्या शरीरयष्टीला शोभेल असं नाव मागितलं होतंस न? आता तू अशी शरीरयष्टी कमव की तुझं पद्माकर हे नाव तुला शोभेल. बाकी सर्व नियतीवर सोड प्रिय मित्रा...

पेंद्याने अश्रूपूर्ण नजरेने श्रीकृष्णाकडे बघितलं आणि त्याच्या नेत्रांमधील भाव समजून तो बाजूला झाला. त्यानंतर गोकुळवासियांना निरोप देऊन श्रीकृष्णाने राधेला.... पेंद्याला.... त्याच्या प्रिय गोकुळाला कायमचे सोडलं.

दिवस सरले; वर्षे उलटली... पांडवांना न्याय देण्यासाठी कृष्णनीती वापरून श्रीकृष्णाने युद्धपरिस्थिती निर्माण केली. मात्र एक सत्य अधोरेखित होते की दुर्योधन बलाढ्य हस्तिनापूर नगरीचा राजकुमार होता. त्याच्या समवेत युद्धकुशल, अनुभवी असे महान रथी-महारथी होते. याउलट पांडवांकडे स्वतःच्या युद्ध निपुणतेव्यतिरिक्त काही नव्हते. त्यामुळे भारतवर्षातील राजांकडे ज्यावेळी दुर्योधनाचा दूत आणि पांडवांचा दूत एकाचवेळी मदतीसाठी जात होते; त्यावेळी हे राजे तुलनात्मक दृष्टिकोनातून दुर्योधनाच्या विजयाचा कयास बांधून त्याच्या सोबत जाण्याचा निर्णय घेत होते. त्यामुळे दुर्योधनाच्या तुलनेत पांडवांसोबतचे सैन्यबळ कमी होते; आणि ही चिंतेची बाब होती. श्रीकृष्ण अहोरात्र केवळ हाच एक विचार करत होता की असे कोणते राजे असतील की जे बळ आणि सत्य या दोन बाजूंचा विचार करून योग्य निर्णय घेतील आणि पांडवांचे सैन्यबळ वाढेल. एक एक दिवस पुढे सरकत होता आणि युद्ध सुरू होण्याच्या आदल्या संध्याकाळी श्रीकृष्ण कुरुक्षेत्रावर युद्धभूमीची पाहाणी करत फिरत असताना अचानक त्याच्या समोर एक अत्यंत सुदृढ, बलवान योद्धा उभा राहिला. आपल्याच विचारात मग्न श्रीकृष्णाने एक स्मित करत त्या योध्याला ओलांडले आणि पुढे निघाला.

योद्धा : किसना......

आणि त्या एका हाकेने त्या विश्वेश्वराच्या शरीरावर रोमांच उभे राहिले.... तो गर्रकन मागे वळला आणि काहीही विचार न करता त्याने त्या योध्याला आलिंगन दिले.

श्रीकृष्ण : पेंद्या.... माझ्या प्रिय पेंद्या.... (अत्यंत गहिवरलेल्या आवाजात मुरलीधराने आपल्या प्रिय मित्राला साद घातली. मात्र आलिंगनामधून दूर होताच त्याच्या सुदृढ आणि बलवान शरीराकडे बघत श्रीकृष्ण हसला आणि म्हणाला...) अहं... पद्माकरा.....

पेंद्या : कन्ह्या तुझ्या तोंडून पेंद्याच बरं वाटतं रे. तू गोकुळ सोडलंस आणि जणू आम्हाला विसरूनच गेलास. परत कधीच आला नाहीस. तू गेलास आणि माझा जीव कशातच रमेनासा झाला. मनाचा अस्वस्थपणा दूर करण्यासाठी मी रोज कालिंदीच्या प्रवाहात उलट्या दिशेने पोहण्यास सुरवात केली. त्या जोरकस प्रवाहाला भिडण्याच्या नादात हळूहळू मन शांत होऊ लागलं. तुझ्या विषयीचे विचार मनातून जात नसत परंतु किमान त्याची धार नदीच्या धारेत थोडी बोथट होत असे. मित्रा, असेच पोहता पोहता काही मास उलटून गेले आणि एकदिवस मी आपल्या लाडक्या डोहाजवळ उभा असताना पाण्यातील स्वतःच्या प्रतिबिंबाकडे माझी नजर गेली. काय सांगू किसना; मी स्वतःला ओळखलंच नाही. समोर पेंद्या नव्हता तर तू माझ्याकडे मागीतलेला पद्माकर होता. माझ्याही नकळत मी शरीर कमावायला सुरवात केली होती. मग मात्र एकच ध्यास लागला. तू निघताना माझ्याकडे केलेली मागणी पूर्ण करायची. बाकी नियतीवर सोडून द्यायचं. माझ्या शरीराने आकार घेण्यास सुरवात केली आणि आपले सर्वच सवंगडी माझ्याकडे आले. त्यांनी देखील माझ्याकडे त्यांचं मन मोकळं केलं. तुझ्या जाण्याने सर्वच अस्वस्थ होते. मग खिल्लारांसोबत डोंगरावर गेल्यानंतर धावण्याच्या शर्यती लावणं, पैजा लावून जोर बैठका काढणं, कोयती-कुऱ्हाडीने वाळलेले वृक्ष तोडणं आणि कालिंदीच्या पात्रात पोहणं यातून सर्वांनीच शरीर कमावायला सुरवात केली. वयं वाढली आणि आम्ही सर्वच आपापल्या पुढील आयुष्यात गुंतत गेलो. मात्र आमच्या मुलांमध्ये देखील सुदृढ शरीराविषयीचं महत्व आम्ही निर्माण केलं आणि आमची पुढची पिढी देखील आपलं पारंपारिक गवळ्याचं काम करताना स्वतःकडे लक्ष देऊ लागली.

श्रीकृष्ण : अरे वा पद्माकरा, तू तर गोकुळातल्या गवळ्यांच्या शरीराबरोबरच मनाचं परिवर्तन देखील करून टाकलंस की. परंतु मित्रवरा, आत्ता मी तुझ्यासोबत फार वेळ बोलू शकणार नाही आहे. आजचा दिवस वेगळा आहे पद्माकरा. तुझ्याशी गप्पा मारायची इच्छा असूनही मी तुला वेळ देऊ शकणार नाही आहे. उद्यापासून धर्म आणि अधर्म यामध्ये युद्ध सुरू होणार आहे. मी निःशस्त्र राहून पांडवांच्या बाजूने या युद्धामध्ये पार्थाच्या रथाचे सारथ्य करणार आहे. त्यासाठीच या युद्धभूमीची पाहाणी करण्यासाठी मी आत्ता इथे आलो आहे. त्यामुळे पटकन सांग बघू की आज असा अचानक तू इथे का आला आहेस?

पद्माकर : मनमोहना, मी काय किंवा आमची पुढील पिढी काय; केवळ तुझ्या दर्शनाची आस नियतीवर सोडून तू शब्दात न सांगता दाखवून दिलेल्या मार्गावरून चालत राहिलो. आणि पहा... आज जेव्हा धर्माच्या विजयासाठी तू उभा राहिला आहेस त्यावेळी आम्ही देखील आमची चिमूटभर शक्ती घेऊन तुझ्या सोबत उभे राहाण्यासाठी आलो आहोत. यापुढील सर्व निर्णय तुझेच श्रीकृष्णा!

असं म्हणून पद्माकर पुन्हा एकदा श्रीकृष्णाच्या चरणांवर लीन झाला.

महाभारताचे अनीती विरुद्ध नितीचे, अन्यायाविरुद्ध न्यायचे, अधर्मा विरुद्ध धर्माचे घनघोर युद्ध झाले. नीतिमान, न्यायी आणि धर्मपालन करणाऱ्या पांडवांचा विजय झाला; आणि मग युद्धामध्ये जख्मि झालेल्या योध्यांची प्रेमळ विचारपूस करण्यासाठी स्वतः श्रीकृष्ण निघाला. एका-एका योध्याला भेटून त्याच्या पराक्रमाची प्रशंसा करत श्रीकृष्ण पुढे जात होता; आणि अचानक त्याच्या समोर गोकुळातील त्याचा परममित्र पेंद्या आला. संपूर्ण शरीर जखमांनी घायाळ झाले होते; मात्र चेहेऱ्यावरील समाधानी भाव श्रीकृष्णाला सर्वकाही सांगून गेले. पेंद्या त्याच्या लाडक्या मोहनाच्या चरणस्पर्श करण्यासाठी वाकला. त्याला मध्येच थांबवत आणि हृदयाशी कवटाळत केवळ पेंद्यालाचं ऐकू जाईल अशा आवाजात श्रीकृष्ण म्हणाला;

श्रीकृष्ण : माझ्या मागील श्रीराम अवतारात देखील खारीच्या रूपाने तू सेतू बांधायला मदत केलीस... आणि आज माझ्या मनातील चिंता समजून परत एकदा माझ्या सोबत उभा राहिलास. कोण आहेस ते तरी सांग माझ्या प्रियवरा!

.......आणि पेंद्या देखील तेवढ्याच मंद स्वरात बोलता झाला...

पद्माकर : पद्मनाभा, माझ्या नावामध्ये आणि तुझ्या या नावामध्ये जे साम्य आहे तोच मी! पुरुषोत्तमा, वाम हस्तातील तुझे पद्म तू अवतार जीवनात विसरून जात असशीलही. पण सतत तुझ्या करकमलाच्या स्पर्शाची सवय असणाऱ्या मला तुझ्याशिवाय दुसरा कोणताही विचार करता आलाच नाही. त्यामुळे तुझे चिंतन आणि तुझ्या अस्तित्वाचा कोंब मनात ठेऊन माझ्या जीवाला जमले ते मी केले आहे. माझी मदत खारीच्या वाट्याची.... माझी मदत पेंद्याच्या तुटपुंज्या शक्तीची........ पण जीकाही आहे ती सर्वस्वी श्रीकृष्णार्पणमसुस्तू!!!

Friday, October 23, 2020

 श्रीकृष्ण - बलराम

 श्रीकृष्ण - बलराम


श्रीविष्णु : कमाल झाली बरं का तुझी शेषा! मागील अवतारात आणि या अवतारात देखील मी तुझी मनीषा पूर्ण केली आणि करतो आहे. तरीही तुझी माझ्यावरील नाराजी संपत नाही.

शेषनाग : देवाधिदेवा, मी कोण तुमच्यावर नाराज होणार? आपल्या सेवेसाठी आपण माझी निवड केलीत यातच सर्वस्व आलं. अनादी-अनंतकालासाठी सर्पवंशाला आपण मोठा मान दिला आहात. याहून जास्त माझं काही मागणंच नाही परमेश्वरा.

श्रीविष्णु : उगा विषयाला बगल देऊ नकोस शेषा. आत्ता यावेळी या क्षीरसागरातळी श्रीलक्ष्मी देखील नाही; कारण श्रीकृष्ण अवतार अजून समाप्त झालेला नाही. मात्र तरीही मी इथे आलो आहे तुला घेऊन; ते काही काळ विश्रांती घेण्यासाठी. या कृष्ण जन्मामध्ये मला सतत मन जागरूक ठेवावे लागते आहे. घडणाऱ्या घटनांवरील पकड एक क्षण देखील सैल होऊन चालणार नाही; याचं भान ठेवावे लागते आहे. एखाद्या सूक्ष्म घटनेकडील दुर्लक्ष संपूर्ण मानव जातीवर खूप मोठा परिणाम करेल; केवळ या एका जाणिवेने मन अस्वस्थ असते. म्हणूनच ही घटिकेची विश्रांती मला फार फार आवश्यक वाटली रे.

शेषनाग : केशवा, तुम्ही विश्रांतीसाठी आला आहात. अशावेळी माझ्या शरीराच्या थंडाव्याने मी आपले मन शांत शीतल करावे; हे माझे कर्तव्य आहे. देवन, आपण आराम करावात आणि मौन धारण करून मी आपली सेवा करावी; हेच सद्य स्थितीत योग्य ठरेल.

श्रीविष्णु : मनातील विषयापासून दूर नको जाऊस शेषा. मीच तुला तुझे मन मोकळे करायला सांगितले आहे; त्यामुळे तू तुझे मन मोकळे करण्यास काहीच हरकत नाही. कोणताही संकोच न ठेवता बोल.

शेषनाग : पुरुषोत्तमा, शब्द खेळीमध्ये आपणावर कोणी विजय मिळवू शकले आहे का? आपण अभय दिलंच आहात तर मी बोलायचे धारिष्ट्य करतो. ऋषीकेशा, आजवर आपण मत्स्य, कस्य, वराह, नृसिंव्ह, वामन, परशुराम आणि श्रीरामावतार घेतलेत. आपल्या मत्स्य, कस्य, वराह, नृसिंव्ह, वामन आणि परशुराम या आवतारांच्या वेळी माझी आपणास काहीच मदत झाली नाही.

श्रीविष्णु : शेषा, तुला माहीतच आहे की पाहिले पाचही अवतार ही त्या-त्या क्षणाची गरज होती.

शेषनाग : अगदी मान्य सर्वेश्वरा... परंतु परशुराम अवताराच्या वेळी देखील आपण माझा विचार केला नाहीत.

श्रीविष्णु : परशुराम अवतार ही देखील पृथ्वी मातेची गरज होती शेषा. पाप आणि अधर्मचा भार इतका वाढला होता की केवळ त्याच्या परिपत्यासाठी मला परशुराम अवतार हा माझा पहिला मानवीय अवतार घ्यावा लागला. मातेच्या गर्भातून जन्म घेण्याची माझी पहिली वेळ होती ती. पृथ्वी मातेच्या मनावरील ओझे उतरवण्यासाठी संपूर्ण मनुष्य जन्म जगणे ही आवश्यकता होती. परंतु माझ्यासाठी देखील तो अनुभव नवखा होता. माझे ध्येय आणि कर्तव्य मला ठाऊक होते. मात्र एक मनुष्य प्राणी त्याच्या संपूर्ण जीवनात केवळ कर्तव्यासाठी जगू शकत नाही याची मला कल्पना होती. अनेक भावभावनांच्या फेऱ्यांमधून मनुष्याला प्रवास करावा लागतो. ते समजून घेताना मला माझी वयक्तिक बंधने नको होती. म्हणूनच लक्ष्मी देवीची देखील इच्छा असूनही या अवतारात मी तिचा सहभाग नाकारला होता. संन्यस्त जीवन जगत मी मनुष्य जन्माचा अनुभव घेतला. म्हणूनच तर श्रीराम अवतार घेण्याची वेळ आली त्यावेळी लक्ष्मी देवीचा हट्ट आणि तुझी विनंती लक्षात घेऊन मी तुम्हाला देखील माझ्या सोबत भूतलावर घेऊन गेलोच की. माझा धाकटा बंधू लक्ष्मण म्हणून तू जन्म घेतलास आणि राम जीवनात प्रत्येक वळणावर माझ्या बरोबरीने उभा राहिलास.

शेषनाग : आपला धाकटा बंधू होऊन आपली साथ मी प्रत्येक क्षणी दिली. देवा, आपण कदाचित रुष्ट व्हाल, परंतु केवळ आपली साथ असे नाही तर काहीवेळा मी आपल्यावर येणारे संकट स्वतःवर ओढावून देखील घेतले होते.

श्रीविष्णु : परंतु मी हे कधी अमान्य केले शेषा? हे तर सत्यच आहे. मग मी रुष्ट का होईन?

शेषनाग : अच्युता, तुम्ही ते कधीच अमान्य केले नाही. मात्र अवतार समाप्तीनंतर ज्या-ज्या वेळी मी भूतलावर प्रवास केला त्या प्रत्येक वेळी मनुष्यप्राणी केवळ तुम्हाला आळवताना मला आढळला. माझा उल्लेख इतरांधील एक असाच तर झाला.

श्रीविष्णु : अरे तू या अनुभवामुळे बेचैन होऊन माझ्याकडे आलास त्यावेळी भूतलावर परत एकदा अत्याचार आणि अधर्माचे अराजक माजायला सुरवात झाली होती. मी पुढील अवतार धारणेचा विचारच करत होतो. त्यावेळची तुझी बेचैनी समजून घेऊन आणि तुझ्या इच्छेला मान देऊन मी सद्य कृष्ण अवतारामध्ये तुला माझ्या मोठ्या भावाचा मान दिलाच आहे ना....

शेषनाग : नारायणा, तुम्ही मला तुमचा मोठा भाऊ केलेत यात शंकाच नाही. परंतु....

श्रीविष्णु : शेषा, तुझे पण आणि परंतु राहू देत. आपण परत आपल्या अवतार कायेमध्ये जाणे आवश्यक आहे. चल पाहू....

असे म्हणत श्रीविष्णु पुन्हा एकदा कृष्ण भूमिकेमध्ये आले. त्यांच्या सोबत शेषनांगाने देखील जेष्ठ बंधू म्हणून काया प्रवेश केला. जीवन वाहात होते आणि विविध वळणे घेत महाभारतीय युद्ध समाप्ती नंतर एका निवांत क्षणी जेष्ठ बंधू बलराम आणि कृष्ण गप्पा मारत बसले होते.

बलराम : कृष्णा, खरे सांग. जरासंधाचा मृत्यू हा तुझाच कट होता ना?

श्रीकृष्ण : दादा, मी कट का बरे करेन. भीमाने जे योग्य होते ते केले.

बलराम : जरासंधाचे शरीर उभे चिरले तरी तो परत एकसंध होऊन उभा राहातो याविषयी भीमाला माहीत होते; असे तुला म्हणायचे आहे काय? कुस्ती होत असता भीमाच्या डावांचे कौतुक करण्याच्या कारणाने अचानक तू मोठमोठ्याने ओरडू लागलास आणि भीमाचे लक्ष तू तुझ्याकडे खेचून घेतलेस. त्याचवेळी नेमकी तुला एक शुष्क गवत पात मिळाली आणि भिमाचे लक्ष असताना अगदी सहज म्हणून ती गवत पात मध्यभागी तोडून तू विरुद्ध दिशांना दूर भिरकावून दिलीस; असे तर तुला म्हणायचे नाही धाकट्या?

श्रीकृष्ण (गालात हसत) : आपण अगदी योग्य समजून घेतले आहात दादा. तुमच्या इतके चांगले मला कोण समजून घेईल सांगा बरे.

बलराम : शब्दच्छल करू नकोस कृष्णा. तुझ्या कृतीचे निरीक्षण करणाऱ्या भीमाने पुढील डावामध्ये जरासंधाचे शरीर मधोमध फाडून विरुद्ध दिशांना फेकले आणि अपराजित जरासंध मृत्यू पावला. तुला कधीच जरासंधाला हरवणे शक्य नव्हते. किंबहुना द्वारका वसवणे हे जरासंधाला घाबरून मथुरेहून पळून जाण्याचे कारण होते. कृष्णा, मला काही तुझी ही कुटनिती पटत नाही. अरे तू किमान एकदा तरी माझ्याकडे येऊन माझी मदत मागायला हवी होतीस. जरासंधाला यमसदनाला पाठवण्यासाठी माझा एकच कुस्ती डाव पुरेसा ठरला असता.


श्रीकृष्ण : दादा, पण समोर काय घडते आहे हे दिसत असूनही आपण देखील तटस्थतेची भूमिका घेतलीतच न?

बलराम : उगाच माझ्यावर आरोप करू नकोस हं कृष्णा.

श्रीकृष्ण : बरं, मग माझ्या केवळ एकाच प्रश्नाचे उत्तर द्या दादा. धर्म आणि अधर्म समोरासमोर उभे असताना आपण कोणासोबत राहण्याचा निर्णय घेतलात?

बलराम : कृष्णा, शब्दच्छल करण्यात आणि समोरच्या व्यक्तीला उमज पडणार नाही अशा शब्दात प्रश्न विचारण्यात तुझा हात कोणी धरणार नाही. परंतु हे विसरू नकोस की मी तुझा जेष्ठ बंधू आहे. त्यामुळे माझ्याशी बोलताना तुझ्या मनात हे असेल ते स्पष्टपणे सांग.

श्रीकृष्ण : दादा, कौरव-पांडवांच्या युद्धाच्या वेळी आपण ताटस्थतेची भूमिका घेतलीत आणि हिमालयाकडे प्रयाण केलेत. हे योग्य कसे ते मला समजावाल का?

बलराम : हे पहा धाकट्या, गुरूने आपल्या शिष्यांमध्ये कधीही दुजाभाव करू नये हे त्रिकालाबाधित सत्य आहे. हे तर तुला मान्य आहे ना? दुर्योधन आणि भीम हे दोघेही माझे शिष्य. ते दोघे आपापली सेना घेऊन जर एकमेकांसमोर युद्धासाठी उभे राहिले तर कोणा एकाची बाजू घेऊन युद्धात उतरणे एक गुरू म्हणून मला योग्य वाटले नाही.

श्रीकृष्ण : म्हणून मी समजावयास येईन याचा अंदाज येताच आपण हिमालयामध्ये निघून गेलात ना?

बलराम : तुला नाही कळायचे ते कृष्णा. त्यामुळे तुझ्यासाठी तू म्हणतो आहेस तेच सत्य मानून चल.

......... आणि त्यानंतर काही कालावधीमध्ये श्रीकृष्णाने आपले अवतार कार्य संपवले. श्रीकृष्ण प्रयाणापूर्वीच ज्येष्ठ बंधू बलराम यांनी समाधी घेतली होती.

.....श्रीविष्णु पुन्हा एकदा क्षीरसागरामध्ये आपल्या शेषशैयेवर पहुडले होते. शेषनाग पुन्हा एकदा काहीशा नाराज मनाने डोलत होता.

श्रीविष्णु : शेषा... मला तुझे काही कळत नाही. रामावताराच्या वेळी माझा धाकटा बंधू असल्याने तुला योग्य तो मान नाही मिळाला अशी तुझी तक्रार होती. ते समजून मी यावेळी तुला माझ्या मोठ्या बंधूचा मान दिला. तरीही तुझी नाराजी काही संपत नाही.

शेषनाग : प्रभो, उगा का मला टोचून बोलत आहात. मी आपली सेवा करून खुश आहे. माझ्या मनामध्ये कणभरही नाराजी नाही. परंतु वासुदेवा मला राहून राहून एकच प्रश्न सतावतो आहे... आजही भूतलावर श्रीकृष्ण अवताराची चर्चा आहे. मात्र कृष्णाच्या मोठ्या भावाची चर्चा देखील नाही. देवा, बलराम एक उत्तम योद्धा तर होताच. मात्र कोणीही कल्पना केली नसेल असे नांगर या शेत नांगरण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या आयुधाला त्याने शस्त्र बनवले. बलरामा इतका उत्तम कुस्ती योद्धा कोणी नव्हता. सर्व शक्तिमान दुर्योधन आणि अजस्त्र भीम यांचा तो गुरू होता. तो वसुदेव बाबांनंतर द्वारकेचा राजा होता. तो धर्मनिष्ठ होता... तो ज्येष्ठ होता... तो...

श्रीविष्णु : शेषा, तू कृष्णाचा ज्येष्ठ बंधू होतास तरीही भूतलावरील मनुष्य तुला आठवत नाहीत; याचे दुःख तुला आहे... हे मला समजले आहे. असे का? असा तुझ्या मनातील प्रश्न देखील मला समजला आहे... अरे, युगानुयुगे आणि गेले दोन अवतार तुझ्या मनात निर्माण झालेल्या प्रश्नाचे उत्तर फारच सोपे आहे....

तुम्ही जेष्ठ आहात की कनिष्ठ... उत्तम योद्धा... नव कल्पनाविष्कारक... अतुलनीय गुरू आहात... याने काहीही सिद्ध होत नाही. शेवटी तुम्हाला जर जनमानसात तुमचे स्थान निर्माण करायचे असेल तर केवळ आणि केवळ कर्मयोग हा एकच मार्ग आहे.... याहून जास्त मला बोलणे नलगे आणि तुला ऐकणे...

असे म्हणून श्रीविष्णूंनी मंद स्मित करीत आपले नेत्र मिटून घेतले.






Friday, October 16, 2020

श्रीकृष्ण - नंदबाबा

 श्रीकृष्ण - नंदबाबा


तो : बाबा....

नंदबाबा : कान्हा, आज मथुरेचे राजमंत्री अक्रूर आले म्हणून नाही; तर तू गोकुळात आलास त्याक्षणापासून मला माहीत होतं की तू काही इथे फार काळ राहणार नाहीस. जसं तुझं येणं एक दैवी संकेत होता; तुझं गोकुळात असणं एक संकेत होता.....

तो : माझं गोकुळात असणं एक संकेत? बाबा!

नंदबाबा : हो माझ्या प्रिय पुत्रा... तू येण्याअगोदर गोकुळातील सर्व दही-दुभतं मथुरेत जात होतं. आम्ही कधीच इथल्या बालगोपाळांना धष्टपुष्ट करण्याचा विचार केला नव्हता. गुरांना राखणं आणि दुसऱ्यांसाठी दूध-दुभतं तयार करून विकणं इतकाच इथल्या लोकांचा दृष्टिकोन होता. तू आलास आणि प्रत्येक घरातील दही-लोणी चोरून बाळ-गोपाळांना दिलंस. आपल्या मुलांची तब्बेत अचानक चांगली कशी होते आहे याचा विचार करण्यास गोकुळवासीयांना भाग पाडलंस. शरीर संपदा सर्वात मोठी ठेव असल्याचं तुझ्या कृतीतून तू दाखवून दिलंस. आजचा धष्टपुष्ट झालेला गोकुळ कुमार आयुष्यभर तुझा ऋणी राहील आणि उद्या कोणत्याही युद्धात तुझ्या पाठीशी ठामपणे उभा राहील हे नक्की.

तो : पण गोकुळातील कुमार युद्ध का करेल बाबा?

नंदबाबा : (मंद स्मित करीत) गवळी नाही रे युद्ध करणार. पण हा माझ्या समोर उभा असलेला आठ वर्षांचा बालक ज्यावेळी भविष्यात एक कर्मयोगी योद्धा होऊन एक मोठा निर्णय घेईल आणि पुढील अनेक युगांना तत्वनिष्ठित आयुष्याचे धडे सांगण्यासाठी सत्य-असत्याचे युद्ध घडवून आणेल त्यावेळी त्याच्या सोबत त्याची शक्ती म्हणून हेच दही-लोणी चोर गोकुलकुमार उभे राहातील; याची मला खात्री आहे; आणि हाच तुझ्या गोकुळात येण्याचा संकेत आहे.

तो आठ वर्षांचा बालक काहीसं गूढ हसला आणि म्हणाला : बाबा, तुम्ही कधीही इतकं मोकळेपणी बोलला नाहीत. मग आजच का?

नंदबाबा : आज का? कारण तुझं गोकुळात येणं आणि राहाणं जसा एक संकेत होता तद्ववत तुझं उद्या गोकुळ सोडून कायमचं जाणं हे अबाधित सत्य आहे; हे माहीत असूनही तू जाऊ नयेस असं माझं मन मला सांगतं आहे. गोपाला, मला हे सगळं माहीत होतं. कसं ते विचारू नकोस; मात्र ही गोष्ट मी यशोदेला कधीच सांगितली नाही. तुझं आमच्या सोबत असणं किमान तिने तरी मनसोक्त उपभोगावं असं मला कायम वाटलं. पण आत्ता तिची जी अवस्था झाली आहे ती पाहून मात्र माझं चुकलं की काय असं मला वाटायला लागलं आहे. अजूनही तिचं मला हेच सांगणं आहे की मल्लक्रीडेसाठी माझा कान्हा लहान आहे; अजून एक-दोन वर्षांनंतर त्याला आपण पाठवू. तिला वेडीला हे कळलेलंच नाही की तिचा कान्हा... तिचा मोहन.... तिला सोडून कायमचा जातो आहे.... केवळ मल्लक्रीडेसाठी इतक्या लहान वयात बोलावणं आलेलं समजल्यावर तिची झालेली अवस्था; तू कायमचा जाणार हे कळल्यावर काय होईल याची मला कल्पना देखील करवत नाही रे! मोहना तू तुझ्या इथल्या वास्तव्याने आम्हा गोकुळवासियांना युगानुयुगांसाठी पावन करून टाकलं आहेस. तुझा निरागस सहवास जो आम्हाला मिळाला आहे तो कधीच कोणालाही मिळणार नाही. हे भाग्य फक्त आणि फक्त गोकुळवासीयांचं आहे हे मान्य; पण तरीही तुझं जाणं... कन्हैया... नको रे जाऊस.

तो : बाबा, सर्वकाही समजून देखील तुम्हीच जर असं म्हणाल तर यशोदा माता, रोहिणी माता आणि वेड्या गोकुळाला कोण सांभाळणार?

नंदबाबा : माझ्यात ती ताकद नाहीच रे मोहना. या आठ वर्षात तुझं रूप हृदयात साठवण्याव्यतिरिक्त मी काही केलेलं नाही. त्यामुळे यासर्वांची समजून काढून तुझं जाणं.... कायमच जाणं.... त्यांना स्वीकारायला लावण्याची जवाबदारी तुलाच घ्यावी लागणार आहे. केवळ तुझी यशोदा माता आणि रोहिणी माताच नाही तर तुझ्या प्रेमात वेडी झालेली राधा... तिला तुझ्या व्यतिरिक्त कोण सांभाळू शकेल रे.

तो : बाबा.... तुम्ही राधेबद्दल...

नंदबाबा : अरे मीच का.... संपूर्ण गोकुळ जाणून आहे. जिथे तिच्या पतीने; अनयने; तिला जशी आहे तशी स्वीकारली आहे तर मग इतर कोणीही काय बोलावं? मथुरेचे राजमंत्री आल्याची खबर हळूहळू गोकुळामध्ये पसरायला लागली आहे. ते कशासाठी आले आहेत हे समजून घेण्यासाठी या वेड्या गवळ्यांची रांग लागली आहे आपल्या वाड्याच्या दिशेने. तुझ्या तक्रारी सांगण्याच्या निमित्ताने सतत तुला कवटाळण्यासाठी येणाऱ्या गोपीदेखील राजमंत्री अक्रूर आल्यापासून माजघरात गर्दी करून आहेत. मग एकटी राधाच कशी लांब राहील? तिला तुझ्याव्यतिरिक्त कोणीही ही परिस्थिती समजावू शकेल का? मोहना, तुझं शारीरिक वय आठ वर्षे आहे. मात्र तू....

कानांवर हात ठेवत नंदबाबांना थांबवत तो म्हणाला : नको बाबा. किमान तुम्ही तरी असं बोलू नका.

नंदबाबा : (खिन्नपणे हसत) मी न बोलल्याने सत्य तर लपणार नाही ना कृष्णा? तू जगदनियंता आहेस. अनादिकालापासून तुझं अस्तित्व या विश्वाला व्यापून राहिलेलं आहे! तुझ्या लीला अगाध आहेत आणि आमच्यासारख्या सर्वसामान्य लोकांच्या आकलनाच्या पलीकडच्या आहेत. हे सत्य मी स्वीकारलं आहे.

एकवार काहीशा खिन्न नजरेने आपल्या प्रिय वडिलांकडे बघत तो मनमोहन बाहेर जाण्यास वळला. नंदबाबा धावले आणि आपल्या प्रिय पुत्राला मिठीत घट्ट कवटाळून घेत म्हणाले : नको जाऊस कान्हा. तू गेलास की गोकुळाचा प्राणच निघून जाईल. आम्हा सर्वांना जगणं अवघड होईल रे.

काही क्षण कोणीच काहीच बोलले नाही. पण मग मात्र नंदबाबांची ती प्रेमभरली मिठी सोडवून घेत श्रीकृष्ण लांब झाला. आपल्या वडिलांकडे पाठ करून तो बोलू लागला....

बाबा, जगणं अवघड होईल; यातच सर्व आलं! जे अशक्य असतं ते शक्य करण्यासाठी माझा जन्म आहे हे तुम्ही देखील ओळखून आहात. माझ्याशिवाय अवघड झालेलं जगणं तर तुमचे हे वेडे गवळी हळूहळू सोपं करून टाकतील. मात्र अत्याचार, हिंसा, असत्य वर्तन याचं अराजक आज जगात माजायला सुरवात झाली आहे; ते निपटून काढणं जास्त महत्वाचं आहे. माझं या कोवळ्या वयातील गोकुळ सोडण्याचं कारण तेच तर आहे. बाबा, आज तुम्ही क्षणात मला तुमचा आठ वर्षांचा बालक म्हणता आहात आणि क्षणात देवत्व देऊन मोकळे होता आहात. यापुढील आयुष्यात मला कायम हेच ऐकून घेत जगायचं आहे. कदाचित म्हणूनच मी माझ्या आयुष्याचे निरागस आणि मनमोकळे क्षण या गोकुळात घालवले आहेत. बाबा, उद्या मी निघणार. तुम्ही म्हणता आहात त्याप्रमाणे मला निघण्यापूर्वी गोकुळवासीयांची, माता यशोदा, माता रोहिणी यांची समजूत घालायची आहे. राधेला भेटणं तर मलाही शक्य नाही. परंतु ते ती देखील समजून घेईल याची मला खात्री आहे. बाबा, निघतो मी. पण जाता-जाता एकच पण खूप मनापासून सांगतो. खरतर मी कोणी विश्वव्यापक, विश्वविधाता किंवा जगदनियंता नाही. तर ज्यावेळी जो निर्णय घेणे आवश्यक असते तो निर्णय त्याच्या परिणामांची जवाबदारी घेत घेण्याचे साहस मनात कायम ठेवणारा एक मनुष्यप्राणी आहे; इतकंच! जे इतरांना जमणार नाही आहे ते करण्यासाठी मी कटिबद्ध आहे. प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात कोणीतरी आरसा दाखवणे आवश्यक असते. मी तेच काम माझ्या पुढील आयुष्यात करणार आहे. बाबा, आत्ता तुम्ही भावुक झाले आहात; त्यामुळे मला अडवता आहात हे मी समजून आहे. मात्र माझ्याबद्दलचे हे भावुक भाव जसे तुम्ही आजवर स्वतःच्या मनात जपलेत त्याप्रमाणे पुढे देखील ते स्वतःपुरतेच ठेवा; ही एकच विनंती करतो आहे. बाबा, पुढे तुम्हाला माझ्याबद्दल बरंच काही ऐकू येणार आहे... मी भगोडा आहे; मी पाताळयंत्री दूत आहे; मी युद्धपुर्व युद्धाचे परिणाम ठरवणारा निष्ठुर निर्णायक आहे... असं बरंच काही! त्यावेळी तुम्हाला तुमचं मन घट्ट करावं लागणार आहे. कारण माझ्याबद्दलच्या प्रत्येक चर्चच्यावेळी हेच गोकुळवासी कासावीस होऊन तुमच्याकडे येणार आहेत. आज तुम्ही त्यांना सामोरं जाणं टाळता आहात; मात्र आजनंतर तुम्हाला प्रत्येक क्षणी माझा पिता होण्याचं उत्तर द्यावं लागणार आहे. बाबा, सांभाळा स्वतःला. कोणीही कोणाच्याही आयुष्याला कायमचं पुरलं नाही; हे जितकं सत्य आहे; तितकंच मोठं सत्य हे देखील आहे की एकदा एखादं नातं स्वीकारलं की त्या नात्याचं उत्तरदायित्व आपल्यावर कायमचं राहातं. येतो मी नंदबाबा!

Friday, October 9, 2020

श्रीकृष्ण - वसुदेव!

 श्रीकृष्ण - वसुदेव!


श्रीकृष्ण म्हंटलं की आपल्याही नकळत आपल्या चेहेऱ्यावर एक स्मितरेषा तरळते. कारण कृष्णाचं व्यक्तिमत्त्व विश्वविधाता म्हणून जितकं भव्य आहे; तितकंच ते माखन चोर कान्हा किंवा मुरलीधर मनोहर मोहन म्हणूनही आपल्याला प्रिय आहे. तो एकाचवेळी आपले डोळे दिपवून टाकतो आणि आणि कुशीत शिरून लाड करून घेतो; तारुण्याच्या उंबरठ्यावरची हुरहूर लावतो किंवा प्रौढत्वाकडे झुकलेल्या मनाचे तत्वज्ञान सांगतो. त्याच्या आयुष्यात आलेल्या प्रत्येक व्यक्तीला त्याने त्याच्या देवत्वाचा अंश दाखवला आहे; आणि तरीही त्याच्या देवत्वचं दडपण कोणाच्याही मनात असेल असं वाटत नाही. खरं सांगू का..... कृष्ण म्हंटलं नं की मी तुमच्यासारखीच मंत्रमुग्ध होऊन जाते. या मंत्रमुग्धत्यातूनच या मदनमोहनाच्या आयुष्यातील काही महत्वाच्या स्त्रियांचं मनोगत मी मागे लिहिलं आहे. तसंच काहीसं त्याच्या आयुष्यात आलेल्या पुरुषांबद्दल देखील लिहिण्याचा हा थोडा प्रयत्न.

तसं पाहिलं तर विविध स्वभावविशेष असणारे पुरुष महाभारतात उल्लेखले गेले आहेत; आणि त्यांचा कधी ना कधी श्रीकृष्णाशी संबंध आलाच आहे. परंतु ज्यांच्या अस्तित्वामुळे श्रीकृष्ण काही क्षण तरी स्तब्ध झाला; असं मला वाटतं; असे काही पुरुष म्हणजे वासुदेव - श्रीकृष्णाचे जन्मदाते; नंदराज - त्याचे पालन करते; बलराम - त्याचा मोठा भाऊ, पेंद्या - त्याचा बालपणीचा लाडका मित्र, सुदामा - ज्याचे पोहे खाऊन श्रीकृष्ण तृप्त झाला; पार्थ - त्याच्या अत्येचा कुंतीचा पुत्र आणि त्याचा लाडका बंधू, कर्ण - ज्याच्या आयुष्याचं गुपित श्रीकृष्णाला माहीत होतं आणि ज्याच्यावर श्रीकृष्णाने मनातून खरंच खूप प्रेम केलं, हे तर आहेतच परंतु ज्यांच्याबद्दल आपण फारशी माहिती करून घेतलेली नाही परंतु त्यांचं श्रीकृष्णाच्या आयुष्यातलं अस्तित्व खूप महत्वाचं होतं असे दारूक - त्याचा सारथी, सात्यकी - श्रीकृष्णाचा सेनापती आणि परममित्र आणि सर्वात महत्वाचा असा एक पुरुष ज्याचा उल्लेख श्रीकृष्णाच्या सोबत असूनही आपल्याला राग येईलच असा तो पारधी ज्याच्या बाणामुळे श्रीकृष्णाने त्याचा हा अवतार संपवला.. या सर्वांचे मनोगत माझ्या दृष्टिकोनातून.

***

वसुदेव


माझे पिता यदुवंशी शूरसेन हे मथुरेचे महाराज उग्रसेन यांचे परममित्र. माझे पिता शूरसेन आणि माता मारिषा यांच्या आशीर्वादानेच मी महाराज उग्रसेन यांचा मंत्री झालो. महाराज उग्रसेन यांचा पुत्र कंस माझा परममित्र. तो स्वभावाने तसा थोडा आततायी आणि शीघ्रकोपी आहे; मात्र आमची मैत्री खरंच खूप गहिरी आहे. माझ्या शांत स्वभावाविषयी तो नेहेमी माझी चेष्टा करतो आणि मी त्याला कायम सांगतो की 'कोणत्याही संकटामध्ये कोपीष्ट मनाने घेतलेला निर्णय चुकीचा ठरू शकतो. राग येणे स्वाभाविक आहे; मात्र शांत मनाने विचार करून घेतलेला निर्णय हा आयुष्यात चांगली फळेच देतो.' कंसाचे मित्रप्रेम वाखाडण्याजोगे आहे. त्याने त्याच्या पिताजींकडे स्वतः आग्रहपूर्वक माझ्या विवाहाचा विषय काढला. कंसाचे काका; आदरणीय देवक महाराज यांच्या सात कन्यांपैकी देवकी ही कंसाचे लाडकी बहीण. त्यामुळे माझा विवाह तिच्याशी व्हावा ही त्याची मनीषा होती. त्याने माझ्याशी बोलल्यानंतर हा प्रस्ताव उग्रसेन महाराजांकरवी महाराज देवक यांच्यापुढे ठेवला; आणि आश्चर्य म्हणजे महाराज देवक यांनी केवळ देवकीच नाही तर त्यांच्या सातही पुत्रिंशी माझा विवाह आपणहून ठरवला. माझ्या मंत्री होण्यानंतरच्या या घटना इतक्या लवकर झाल्या की माझा माझ्या नशिबावर विश्वासच बसत नव्हता. विवाह इतक्या लवकर ठरला की माझे पिता शूरसेन महाराज, माझी माता मारीषा माझ्या या विवाह सोहळ्याला येऊ शकले नाहीत. मात्र मी त्यांना दूताकरवी निरोप पाठवला होता की मी विवहाहानंतर लगेच माझ्या सप्तपत्नींसोबत त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी येणार आहे. मी विवाहबद्ध झालो याचा आनंद कंसाच्या प्रत्येक कृतीमध्ये दिसत होता. विवाह सोहळ्यानंतर माझ्या सप्त पत्नींसोबत मी स्वगृही जाण्यास निघालो त्यावेळी मथुरेच्या वेशीपर्यंत आमच्या रथाचे सारथ्य कंसाने आग्रहपूर्वक स्वीकारले. मथुरेचे नगरजन त्यांच्या सुपुत्रींच्या पाठवणीसाठी मथुरेच्या रस्त्या-रस्त्यावर पुष्पांची उधळण करत उतरले होते. कंस सारथ्य करत असताना देखील माझ्याशी बोलत होता. पुढील प्रवासासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी त्याने आमच्या सोबत दिल्या होत्या; त्यासंदर्भात माहिती देखील देत होता.... आणि अचानक ती आकाशवाणी झाली.... ती आकाशवाणी ऐकताच कंस बेभान झाला. मी त्याला खूप समजावण्याचा प्रयत्न केला की मृत्यू हे जीवनाचे अंतिम सत्य आहे. शरीर नश्वर असते. त्यामुळे असा कोणताही आततायी निर्णय घेऊ नकोस की ज्यामुळे तुला यापुढील आयुष्य सततच्या भीतीच्या सावटाखाली जगावे लागेल. मात्र शीघ्रकोपी कंसाने कधीच कोणाचेही ऐकले नव्हते. त्या एका आकाशवाणीने माझे आणि माझ्या नववधू देवकीचे आयुष्यच बदलून गेले.

कंसाने आम्हाला दोघांनाही मथुरेतून बाहेर जाण्यास मज्जाव केला आणि आमची रवानगी कारावासात झाली. काही कळायच्या आत आम्ही दोघेही कंसाच्या कैदेत अडकले होतो. महाराज उग्रसेन यांनी आपल्या पुत्राची समजूत काढण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र त्याचा परिणाम असा झाला की महाराज उग्रसेन यांना देखील कंसाने कालकोठडीत टाकले आणि स्वतःचा राज्यभिषेक करून घेतला. कारावास! एक दिवस-रात्र विरहित भावनांच्या गर्तेतील आयुष्य. मला त्या कारावासातील कोठडीमध्ये हे देखील कळण्यास मार्ग नव्हता की माझ्या इतर सहा पत्नीचे काय झाले. दिवसांमागून दिवस जाऊ लागले आणि देवकी गर्भवती झाली. ही बातमी कळताच कंस राजवैद्यांना घेऊन आमच्या कोठडीमध्ये आला. त्यांच्याकरवी देवकीची तपासणी करवून घेऊन त्याने तिच्या तब्बेतीची पूर्ण काळजी घेण्याची आज्ञा राजवैद्यांना दिली. त्याच्या या निर्णयाने मला खूपच आश्चर्य वाटले. मात्र जाताना त्याने वळून माझ्याकडे बघितले आणि म्हणाला;"वसुदेवा; मला तुझ्याविषयी काहीच तक्रार नाही. त्यामुळे देवकीचे गर्भारपण मी नीट सांभाळणार. परंतु तिच्या आठही बाळांना मी मारणार. त्यानंतर मात्र मी तुला आणि माझ्या या प्रिय भगिनीला मुक्त करेन हा माझा शब्द." कंस निघून गेला आणि त्यांच्या वक्तव्याने मी आनंदित व्हावे की दुःखी या संभ्रमात मी पडलो.

दिवस जात होते आणि देवकी आणि माझे पुत्र जन्मतःच कंसाच्या हातून मारले जात होते. देवकी सातव्या वेळी गर्भवती राहिली त्यावेळी राजवैद्य तिची तब्बेत पाहण्यासाठी आले होते. आज राजवैद्यांचा चेहेरा चिंतीत दिसत होता. त्यांच्यावर बारकाईने लक्ष ठेवलेल्या कंसाच्या नजरेतून ही गोष्ट सुटली नाही; आणि त्याने अत्यंत काळजीभरल्या आवाजात राजवैद्यांना प्रश्न केला; "वैद्यराज, काही काळजी करण्याजोगे आहे का?" त्याचा तो काळजीभरला आवाज ऐकून मलाही प्रश्न पडला की याच्या मनात नक्की काय आहे? आजवर याने माझे सहा पुत्र माझ्या नजरेसमोर मारून टाकले आहेत आणि एकाही वेळी त्याचे मन द्रवले नाही आहे किंवा त्याचा हात किंचित देखील कापला नाही आहे. तरीही आज माझ्या पत्नीच्या गर्भारपणाची त्याला काळजी वाटत आहे.

राजवैद्यांनी एकदा माझ्याकडे पाहिले आणि ते कंसाला म्हणाले;"महाराज, यावेळी देवी देवकींचा गर्भ काहीसा कमजोर वाटतो आहे. त्यांना मोकळी हवा आणि सूर्यप्रकाशाची अत्यंत गरज आहे." हे ऐकताच कंसाने कारावासाच्या सुरक्षिततेसाठी पाहाऱ्यावर ठेवलेल्या त्याच्या अत्यंत विश्वासू सेवकाला बोलावले आणि म्हणाला,"शूर्पका, आजपासून तुझ्या पत्नीला संध्यासमयी इथे घेऊन ये आणि माझ्या भगिनीला; देवकीला; कारावासातील प्रांगणात घेऊन जाण्याची आणि परत सुखरूप कारागृहात आणण्याची जवाबदारी दे. एक लक्षात ठेव; देवकीच्या बाबतीत कोणतीही चूक झाली तर त्याची शिक्षा ही केवळ देहांत नसून हालअपेष्टा सहन करत मिळणारा देहांत!" त्याच्या त्या गोंधळून टाकणाऱ्या वागण्या-बोलण्याचा अर्थ लागेपर्यंत कंस राजवैद्यांना घेऊन तेथून निघाला होता.

मी अजूनही त्याच्या वागण्याचा अर्थ शोधत होतो. त्यावेळी देवकी माझ्या जवळ आली आणि भिंतींनाही ऐकू जाणार नाही याची काळजी घेत मला म्हणाली;"स्वामी, मी कारागृहाच्या प्रांगणात रोज जाऊ लागले की राजवैद्य एका सायंकाळी रोहिणीला घेऊन येणार आहेत. त्यांनी मला वचन दिले आहे की या गर्भाला ते रोहिणीच्या गर्भात संकर्षित करणार आहेत; जेणेकरून माझे हे बाळ वाचेल." तिचे ते बोलणे ऐकून मी आश्चर्यचकित झालो. मात्र तिने डोळ्यांनी खूण करताच मौन धारण केले. दिवस जात होते आणि देवकीचा सप्तम गर्भ दिसामासाने तिच्या उदरात वाढत होता. देवकीचा सातवा महिना सुरू झाला. यावेळचे गर्भारपण तिला सोसवत नव्हते की काय कोण जाणे; परंतु ती अत्यंत अशक्त दिसू लागली होती. कारावासाच्या प्रांगणात जाण्याकरता देखील तिला आता किमान दोन दासींची मदत लागत होती. मात्र तरीही ती प्रतिदिनी निग्रहपूर्वक बाहेर पडत होती. कंस रोजच राजवैद्यांसोबत देवकीच्या तब्बेतीची विचारपूस करण्यास येत असे. त्याने हा परिपाठ देवकीच्या प्रथम गर्भारपणापासून ठेवला होता.

त्यादिवशी राजवैद्यांनी देवकीची तब्बेत बघितली आणि म्हणाले,"महाराज, देवी देवकींचा हा गर्भ किती दिवस त्यांच्या उदरात जगेल याबद्दल मला शंका आहे. आपली परवानगी असली तर मी प्रतिदिनी संध्या समयी देखील देवींच्या तब्बेतीची विचारपूस करण्यास येऊन जाईन. त्या ज्यासमयी प्रांगणात येतात त्यासमयी केवळ लांबूनच मी त्यांचे दर्शन घेईन." काही क्षण विचार करून कंसाने राजवैद्यांना परवानगी दिली. या घटनेला केवळ दोन दिवस झाले असतील; त्यादिवशी देवकी उठून बसू शकत नव्हती. मात्र ती हट्टाने संध्यासमयी प्रांगणात गेली. मला आता देवकीची खूपच काळजी वाटू लागली होती. आपल्या सहा पुत्रांचा जन्मतःच झालेला मृत्यू तिने पाहिला होता. हे दुःख कोणत्याही मातेला दुभंगून टाकण्यास पुरेसे होते. तरीही ती शक्तीदेवता सप्तम पुत्राला जन्म देण्यासाठी सज्ज झाली होती. आज प्रांगणाच्या दिशेने जाताना तिने एकदा माझ्याकडे वळून बघितले आणि आपल्या उदरावर हात ठेऊन तिने 'निरोप द्यावा'; अशा पद्धतीचा इशारा मला केला. मी तिच्या त्या इशाऱ्याने कोलमडून गेलो. मात्र देवकी अत्यंत घट्ट मनाने ठाम पावले उचलत बाहेर पडली. संध्या समय टळून बराच वेळ झाला होता; तरी अजूनही देवकी परतली नव्हती. तिच्या काळजीने माझ्या जीवाचे पाणी पाणी होत होते. एक असाहाय्य कैदी यापेक्षा जास्त मी काहीच नव्हतो. स्वतःच्या या असाहाय्य स्थितीवर आज मला प्रचंड क्रोध येत होता... मी ना योग्य पुत्र होऊ शकलो होतो ना योग्य पती! मी माझ्या पुत्रांना देखील वाचवू शकलो नव्हतो. का जन्मलो होतो मी या जगात? काय उद्देश आहे माझ्या आयुष्याचा? या प्रश्नांच्या गर्तेत मी हरवून गेलो होतो... आणि त्याचवेळी मला देवकीचा टाहो ऐकू आला. माझा जीव पिळवटून गेला. मी कारावासाच्या दारापर्यंत धावलो मात्र बांधलेल्या शृंखलांमुळे पडलो. काही वेळानंतर देवकी शूर्पक पत्नीचा आधार घेत कारावासाच्या आत आली. ती पूर्णपणे उन्मळून पडलेली मला दिसत होती. मात्र मी काहीच करू शकत नव्हतो. देवकी आत येते न येते तोच कंस देखील तेथे दाखल झाला. त्याच्या सोबत राजवैद्य देखील होते.

आत येताच राजवैद्यांनी घाईघाईने देवकीच्या तब्बेतीची पाहाणी केली. त्यांचा चेहेरा देवकीला पाहून भयभीत झाला. ते धावले आणि त्यांनी कंसाचे पाय पकडले. "त्राही माम्! महाराज.... मी माझ्याकडून कोणतेही उपचार कमी केले नव्हते. तरीही जे व्हायला नको होते ते झाले आहे." त्याचे बोलणे ऐकून कंस गोंधळून गेला. राजवैद्यांना उठण्याची आज्ञा देत त्याने विचारले;"नक्की काय झाले आहे वैद्यराज?" मान खाली घालून राजवैद्य म्हणाले;"महाराज, देवी देवकी यांचा सप्तम गर्भ त्यांच्या सप्तम महिन्यात आतल्याआत जिरून गेला आहे. सप्तम महिना हा गर्भने संपूर्ण जीव धरण्याचा असतो. याच महिन्यात त्याची शारीरिक वाढ पूर्ण होऊन पुढे मानसिक आणि बौद्धिक वाढ सुरू होते असे शास्त्र म्हणते. त्यामुळे हा सप्तम महिना व्यवस्थित पार पडावा यादृष्टीने मी प्रयत्न करत होतो. मात्र आज देवी देवकी यांचा हा गर्भ आतल्याआत जिरून गेला आहे." ही माहिती देताना राजवैद्य थरथर कापत होते. कारण त्यांना महाराज कंसाच्या क्रोधाची कल्पना होती. मात्र आश्चर्यकारक रीतीने कंस शांत होता. काही क्षण विचार करून कंसाने गडगडाटी हास्य केले आणि गर्वाने छातीवर हात मारत तो म्हणाला;"याचा अर्थ देवकीचे गर्भ माझ्या भीतीने जन्मआगोदरच मृत्यूला प्राप्त होणार तर! म्हणजे एका दृष्टीने माझ्या प्रिय भगिनीच्या शेवटच्या दोन पुत्रांपैकी एकाला मृत्युदंड देण्याची मला गरज उरलेली नाही. वैद्यराज आपण खूपच चांगली बातमी मला दिली आहे." यानंतर माझ्याकडे वळून कंस म्हणाला;"मित्रा वसुदेवा, आता केवळ तुझा अष्टम पुत्र! त्याला मारून मी अमर होईन. एकदा त्याचा निकाल लावला की मग तू आणि माझी प्रिय भगिनी या कारावासातून मोकळे व्हाल." असे म्हणून तो निघून गेला. त्याच्या सोबत निघताना राजवैद्यांनी माझ्याकडे पाहून म्हंटले;"वसुदेव महाराज, देवींची काळजी घ्या." मी राजवैद्यांकडे पाहिले आणि मला जाणवले की राजवैद्यांच्या चेहेऱ्यावर नकळत एक समाधानाची रेषा उमटली आहे. कंस आणि राजवैद्य जाताच मी देवकीकडे धावलो. शारीरिक यातना सहन करणाऱ्या त्या स्त्रीशक्तीने माझा हात हातात घेतला आणि अत्यंत हळुवार आवाजात ती म्हणाली;"रोहिणी माता होणार आहे. तिला मी आजच तुमचे बंधू गोकुळातील नंद महाराज यांच्याकडे जाण्याविषयी सुचविले आहे." एवढे बोलल्याचे कष्ट देखील तिला सहन झाले नाहीत आणि तिला ग्लानी आली.

............ आणि देवकी अष्टम समयी गर्भवती राहिली. सप्तम समयी तिच्यावर असणारी अवकळा पूर्णपणे नाहीशी झाली होती. तिचा आनंदी, हसरा, उजळलेला चेहेरा बघून मी देखील समाधान पावत होतो. यावेळी कंस रोज सकाळ-संध्याकाळ स्वतः राजवैद्यांसोबत कारावासामध्ये येत होता. दिवस भरत आले आणि कंसाने कारावासामधील पाहारा वाढवला. त्याने शूर्पकाला सक्त ताकीद दिली होती की कारावासामध्ये होणाऱ्या प्रत्येक क्षणांची माहिती त्याच्यापर्यंत पोहोचली पाहिजे. स्वतः शूर्पक आता कारावासातच येऊन राहिला होता.

आज भाद्रपदातील अष्टमी. आज आकाश फाडून मेघांनी धारतीकडे धाव घेतली होती. देवकी संध्याकाळपासूनच अस्वस्थ होती. मात्र तिला होणारा त्रास ती प्रगट करत नव्हती. वेळ पुढे सरकत होती आणि रात्री बाराच्या सुमारास देवकीला अंतिम कळा येऊ लागल्या. काही क्षणातच पुत्ररत्न जन्माला आले. माझा आनंद गगनात मावत नव्हता. कारावासाच्या पाहरेकऱ्यांना ही बातमी कळू नये म्हणून मी त्या अर्भकाला उचलून कवटाळले जेणे करून त्याचे रुदन कोणालाही ऐकू जाऊ नये. देवकी म्लान होऊन पडली होती. अजून तिने तिच्या अष्टम पुत्राचे मुखावलोकन देखील केले नव्हते. आश्चर्य म्हणजे दर क्षणाला आत येऊन बघणारे पाहारेकरी अजून आले नव्हते. सर्वत्र एक निर्मम शांतता पसरली होती. त्या अर्भकाला कवटाळून काय करावे याचा विचार मी करत होतो... आणि.... मला माझ्यातूनच एक प्रकाश शलाका निर्माण झाल्याचा भास झाला. मी हातातील अर्भकाकडे पाहिले. ते माझ्याकडे पाहात हसत होते... आणि माझ्या मनाच्या गाभाऱ्यातून एक आवाज गुंजला... "बाबा, मला देखील माझ्या मोठ्या भावाप्रमाणे गोकुळात नेऊन सोडा. चला, उठा... तुम्हाला कोणीही अडवणार नाही."

एक क्षण मी देवकीकडे बघितले. तिने ग्लानीतून जागे होण्याची वाट पाहण्याची इच्छा असूनही मी मन घट्ट करून माझ्या या अष्टम पुत्राला घेऊन निघालो. माझ्या मनाच्या आवाजाने जे सांगितले होते तसेच झाले. मला माहीत होते माझ्या हातातील नवजात अर्भक म्हणजे मानव रूपातील तो विश्वकर्ता आहे. त्यामुळे मला कसलीच काळजी नव्हती. मी दुथडी भरून वाहणाऱ्या नर्मदेला पार करून गोकुळात पोहोचलो; आश्चर्य म्हणजे माझा बंधू नंद माझी वाट पाहात होता. त्याची पत्नी यशोदा नुकतीच बाळंतीण झाली होती. नंदाने माझ्याकडे पाहिले आणि माझ्या हातातून माझ्या पुत्राला घेऊन देवी यशोदेच्या कुशीत नेऊन ठेवले. नंदाची कन्या घेऊन मी कारावासात पोहोचलो आणि अचानक देवकीला जाग आली. ती कण्हत उठली आणि तिच्या आवाजाने पाहारेकरी देखील धावत आत आले. कंसाला निरोप गेला आणि तो धावत कारावासात आला. त्याने त्या नवजात अर्भकाला उचलले आणि........ ती आदिमाया स्वरूपात प्रकटली आणि सत्य वदून अंतर्धान पावली.

प्रचंड संतापलेला कंस माझ्याकडे वळला. "तू हे कसे केलेस ते मला माहीत नाही वसुदेवा. पण यापुढे ना तू माझा मित्र आहेस ना ही माझी भगिनी. आता मी तुला भेटेन ते तुझ्या त्या गोकुळातील पुत्राच्या मृत्यूनंतरच. तोपर्यंत तू माझा कैदी आहेस हे विसरू नकोस." कंस दाणदाण पावले आपटत निघून गेला. त्याक्षणी माझ्या आणि देवकीच्या आयुष्यातील काळरात्रीला सुरवात झाली.

"वासुदेवा, तुझं हे नाव माझ्या नावावरून पडलं आहे याची मला कल्पना आहे. माझ्या आयुष्यातील काळरात्री तू तुझ्या हाताने संपवल्यास. कंस वध करून तू माझी आणि तुझ्या जन्मदात्या आईची सुटका केलीस. मथुराधिपती म्हणून माझा राज्यभिषेक देखील करवलास. आजवरच्या भारतवर्षाच्या इतिहासात पुत्राने पित्याचा राज्यभिषेक करवला असे घडले नसेल. देवकीचे दुःख समजून घेऊन तू तुझे सहाही बंधू परत आणलेस. पुढे द्वारका वसवलीस आणि तेथे देखील माझ्या अधिपत्याखाली बालरामाचा संपूर्ण मान ठेऊन तू राज्यव्यवस्था बघितलीस. माझ्या प्रिय भगिनी कुंती हिच्या पुत्रांसाठी तू महाभारत घडवलेस. तू एक उत्तम पुत्र, एक उत्तम पिता, बंधू तर झालासच पण एक आदर्श जन्म लोकांसमोर मांडलास. पुत्रा, आज मात्र मी तुझ्यासमोर एक पिता म्हणून माझं दुःख मांडणार आहे. प्रत्येक पित्याची एक सुप्त इच्छा असते की आपण आपल्या पुत्राला मार्गदर्शन करून एक उत्तम व्यक्तीमध्ये त्याचे रूपांतर करावे. आपल्या पुत्राने आपण शकवलेल्या मार्गाचे पालन करताना पाहाणे यासारखे सुख नसते पित्याला. मात्र मी या संपूर्ण जगातील आणि सर्व कालखंडातील एकुलता एक पिता असेन की ज्याला जन्मतःच त्याच्या पुत्राने मार्गदर्शन केले; आयुष्याच्या उत्तरार्धात पुत्राने पित्याचा राज्यभिषेक केला अशी घटना देखील फक्त माझ्याच आयुष्यात घडली असेल. कृष्णा युगानुयुगे तुझं नाव वसुदेव म्हणून गाजेल आणि त्यायोगे माझ्या नावाचा देखील उल्लेख होईल; या विचाराने मला कितीतरी समाधान लाभते. मी एका विश्वव्यापी विधात्याचा पिता म्हणून युगानुयुगे ओळखला जाईन आ विचाराने मी कायम समाधान पावतो. परंतु माझ्या मानत खोल कुठेतरी एक भळभळती जखम आहे रे पुत्रा.... नंदाने जे सुख अनुभवले ते माझ्या वाटेला कधीच आले नाही याचे दुःख घेऊनच मी या जगाचा निरोप घेणार. अंततः इतकेच........ श्रीकृष्णार्पणमसुस्तू!!!"

Friday, October 2, 2020

 मला समजलेली 'द दा विंची कोड' कादंबरी

 मला समजलेली 'द दा विंची कोड' कादंबरी


'द दा विंची कोड' अजित ठाकूर यांनी अनुवादित केलेली आणि मूळ लेखक डॅन ब्राऊन यांनी लिहिलेली एका विचित्र आणि तरीही अर्थपूर्ण घटनांची फोड करणारी कादंबरी. संपूर्ण कादंबरीमध्ये एकमेकांममध्ये गुंतलेल्या आणि लागोपाठ घडणाऱ्या घटना सांगितल्या आहेत. या सर्वच घटना हळूहळू एका अतिप्राचीन आणि अबाधित सत्याकडे बोट दाखवतात.

आपल्याला सर्वसाधारणपणे माहीत असणारे जे विविध धर्म आहेत त्यातलाच एक म्हणजे ख्रिश्चन धर्म. सर्वसामान्य लोकांच्या दृष्टितकोणातून बघायचे झाले तर; 'चर्चमध्ये जाऊन येशू ख्रिस्ताची प्रार्थना करतात ते ख्रिश्चन!' मात्र ज्याप्रमाणे आपल्या हिंदू धर्मात अनेक विचार आहेत; आणि आपण सहस्त्र कोटी देवांमधील आपल्याला स्वीकार असणाऱ्या देवाची ज्याप्रमाणे पूजा करतो त्याप्रमाणे ख्रिश्चन धर्मामध्ये देखील 'देवत्व' या संकल्पनेच्या बाबतीत वेगळ्या विचारसरणीचे किंवा प्रार्थना करणारे लोक आहेत.

असेच काही ख्रिश्चन हे 'स्त्री देवते'ला मानणारे देखील आहेत. हे लोक निसर्गाला आणि प्रामुख्याने 'स्त्रियांच्या प्रजननक्षमते'ला पवित्र मानतात आणि त्याची आराधना करतात. अशा लोकांना (#Wicca) विक्का धर्मीय असे देखील म्हंटले जाते. ख्रिश्चन धर्मामध्ये (#whitchcraft) विचक्राफ्ट मानणारे असे हे लोक आहेत असे मानले जाते. (#whitchcraft) विचक्राफ्ट याकडे फारच नकारात्मक दृष्टिकोनातून बघितले जाते. विक्का पंथ येशू ख्रिस्ताच्या जन्मआधी म्हणजेच ख्रिस्त पूर्व हजार एक वर्षांपासून प्रचलित आहे. हे लोक प्रार्थना करताना (#pentacle) पेंटॅकल या चिन्हाचा वापर करतात. (हे चिन्ह चांदणी सारखे दिसते.) दुर्दैवाने या चिन्हाचा वापर 'सैतानाची पूजा' करताना केला जातो ही सर्वसामान्य वंद्यता आहे. मात्र पेंटॅकल म्हणजे (#paganus) पॅगॅनस हा लॅटिनमधला शब्द असून निसर्गपूजेच्या जुन्या पारंपरिक विचारांना मानणाऱ्या लोकांचे हे चिन्ह आहे; असे ही मानतात. साधारणपणे असे निसर्गपूजन करणारे लोक खेडवळ असल्याने आणि अशा अत्यंत आदिवासी किंवा खेडवळ लोकांबद्दल शहरी लोकांच्या मनात एक प्रकारची भीती असल्याने यांना दुष्ट खलनायकी विचाराचे लोक असे समजतात.

ज्यावेळी कोणताही धर्म अस्तित्वात नव्हता त्यावेळी केवळ निसर्गाला देव मानण्यात येत होते. त्यावेळी जगाचे केवळ दोन भाग होते. स्त्री आणि पुरुष; आणि स्त्री आणि पुरुष या दोन्ही शक्ती 'सम शक्ती' म्हणून मान्यता पावलेल्या होत्या. (#pentacle) पेंटॅकल चिन्ह म्हणजे जगातील अर्ध्या भागाचे म्हणजे 'स्त्री शक्ती'चे किंवा 'पवित्र स्त्रीत्वाचे' किंवा 'दैवी शक्ती'चे चिन्ह आहे. 'शुक्राची चांदणी' जी (#pentacle) पेंटॅकल प्रमाणे दिसते तिला 'व्हीनस देवते'चे प्रतीक मानली जाते. दुर्दैवाने आजही अनेक परदेशी भयचित्रपटांमधून या चिन्हाचा वापर सैतानी शक्तीशी केला जातो. कदाचित (#Wicca) विक्का पंथाला मानणारे लोक तुलनात्मक संख्येने कमी असतील किंवा ते आदिवासी/अत्यंत खेडवळ असल्याने आपले विचार नीट मांडू शकत नसतील किंवा दुर्दैवाने (#Wicca) विक्का पंथाचे विचार आजच्या ख्रिश्चन सामाजिक मानसिकतेमध्ये स्वीकारार्हय नसतील किंवा इतर कोणत्याही कारणांमुळे असेल पण हे चिन्ह बदनाम आहे; हे खरे आहे.

(#Wicca) विक्का प्रमाणेच 'ओपस डाय' म्हणजे परमेश्वराच्या कार्याचा संदेश देणारा पंथ देखील आहे. या पंथाला मानणारे लोक परमेश्वराचे कार्य म्हणजे शुद्धतेची शपथ घेणे, स्वतःच्या उत्पन्नाचा दहा टक्के भाग देवाला देणेे आणि स्वतःला चाबकाचे फटके मारून आणि खिळे टोचून दुःख करून घेणे असे मानतात. स्वतःला दुःख दिल्याने पापशुद्धी होते असे ते मानतात. असे म्हंटले जाते की या पंथाच्या लोकांचा स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टिकोन अगदी जुनाट मध्ययुगीन आहे. या पंथातील स्त्री कर्मचाऱ्यांना कुठलाही मोबदला न देता पुरुषांचे मठ साफ करायला लावतात. स्त्रिया लाकडी जमिनीवर झोपतात तर पुरुषांना गाड्या असतात. स्त्रियांना स्वतःला जास्तच शारीरिक यातना करून घ्याव्या लागतात. खरे तर स्त्री आणि पुरुष हे निसर्गतःच समान पातळीवर असूनही 'ओपस डाय' पंथाला मानणारे स्त्रीला दुय्यम किंबहुना अत्यंत खालच्या दर्जाची वागणूक देतात. सध्याच्या ख्रिश्चन धर्मीय लोकांमध्ये 'ओपस डाय पंथाला मानणारे लोक जास्त असावेत आणि ते विविध क्षेत्रांमध्ये मोठ्या हुद्यावर किंवा प्रचंड श्रीमंत असावेत असा कयास आहे. त्यामुळे 'ओपस डाय' पंथ हा आज जास्त प्रमाणात स्वीकारला जातो; असेही म्हणतात.

'द दा विंची कोड' या कादंबरीमध्ये (#Wicca) विक्का आणि 'ओपस डाय' या दोन पंथांमधील विचारसरणी आणि त्यामुळे होणारा संघर्ष सांगितला आहे. (#Wicca) विक्का पंथामधील एका रहस्याचा मागोवा घेणाऱ्या आणि सांकेतिक चिन्हांचा अर्थ शोधणाऱ्या तज्ञाचा रोमांचकारी प्रवास म्हणजे 'द दा विंची कोड'! 'लिओनार्दो दा विंची' या इटालियन महान चित्रकाराने 'लास्ट सप्पर' हे चित्र काढले त्याचा एक वेगळाच अर्थ या कथेमध्ये कल्पित केला आहे. म्हणूनच या कादंबरीचे नाव 'द दा विंची कोड' असे आहे.

प्रामुख्याने (#Wicca) विक्का पंथ हा (#whitchcraft) विचक्राफ्ट म्हणजेच 'सैतानाला मानणारा पंथ' नसून 'स्त्रीत्वाचा आदर' करणारा आणि निसर्गातील समानता राखणाऱ्या 'स्त्री' ला 'देवता' मानणारा ख्रिस्त पूर्व काळातील पंथ आहे; आणि या पंथाला मानणाऱ्या लोकांनी ख्रिस्त पूर्व काळापासून या पंथातील बहिष्कृत देवी 'मेरी मॅगडालीन'च्या अस्थी लपवून ठेवल्या आहेत; असे मानले जाते. येशू ख्रिस्त हा देव नसून 'मर्त्य मानव' होता आणि त्यामुळे त्याच्या आयुष्यात देखील सर्वसामान्य घटना घडल्या होत्या आणि त्या कहाण्या येशू ख्रिस्ताला 'देव' या संज्ञेमध्ये अडकवण्या अगोदर प्रचलित होत्या. त्या कहाण्यांच्या अनुषंगाने काही पुरावे आणि कागदपत्रे देखील होती. देवी 'मेरी मॅगडालीन'च्या अस्थी आणि ख्रिस्त पूर्व काळातील येशूला 'मर्त्य मानव' म्हणणारे पुरावे आणि कागदपत्रे या सर्वांना सांभाळून ठेवलेल्या जागेच्या खुणेचा 'कोड' चा मागोवा घेणारी आणि त्याअनुषंगाने अंगावर रोमांच उभे करणारी कथा या कादंबरीमध्ये चितारली आहे.

प्रास्ताविकाच्या पहिल्या शब्दापासून सुरू होणारी ही कादंबरी शेवटपर्यंत आपल्याला एका जागी खिळवून ठेवते. जसजसे आपण शेवटाकडे येतो तसे आपल्या लक्षात येते की 'स्त्रीत्व' किती आदरणीय आहे आणि 'प्रजनन शक्ती' बाळगणारी आणि 'निसर्गाचा समतोल सांभाळणारी स्त्री' ही खरोखरच किती आदराची आणि सन्मानाने वागवण्याची व्यक्ती आहे. खरोखरच संपूर्ण जगातील समाजाचे हे दुर्दैव म्हणावे का की या दिव्य शक्तिमधील 'दैवत्वाचा' आदर तर सोडाच पण स्त्रीला अत्यंत अपमानास्पद वागणून देऊन तिला दुय्यम स्थान दिले जाते(?)!