श्रीकृष्ण - वसुदेव!
श्रीकृष्ण म्हंटलं की आपल्याही नकळत आपल्या चेहेऱ्यावर एक स्मितरेषा तरळते. कारण कृष्णाचं व्यक्तिमत्त्व विश्वविधाता म्हणून जितकं भव्य आहे; तितकंच ते माखन चोर कान्हा किंवा मुरलीधर मनोहर मोहन म्हणूनही आपल्याला प्रिय आहे. तो एकाचवेळी आपले डोळे दिपवून टाकतो आणि आणि कुशीत शिरून लाड करून घेतो; तारुण्याच्या उंबरठ्यावरची हुरहूर लावतो किंवा प्रौढत्वाकडे झुकलेल्या मनाचे तत्वज्ञान सांगतो. त्याच्या आयुष्यात आलेल्या प्रत्येक व्यक्तीला त्याने त्याच्या देवत्वाचा अंश दाखवला आहे; आणि तरीही त्याच्या देवत्वचं दडपण कोणाच्याही मनात असेल असं वाटत नाही. खरं सांगू का..... कृष्ण म्हंटलं नं की मी तुमच्यासारखीच मंत्रमुग्ध होऊन जाते. या मंत्रमुग्धत्यातूनच या मदनमोहनाच्या आयुष्यातील काही महत्वाच्या स्त्रियांचं मनोगत मी मागे लिहिलं आहे. तसंच काहीसं त्याच्या आयुष्यात आलेल्या पुरुषांबद्दल देखील लिहिण्याचा हा थोडा प्रयत्न.
तसं पाहिलं तर विविध स्वभावविशेष असणारे पुरुष महाभारतात उल्लेखले गेले आहेत; आणि त्यांचा कधी ना कधी श्रीकृष्णाशी संबंध आलाच आहे. परंतु ज्यांच्या अस्तित्वामुळे श्रीकृष्ण काही क्षण तरी स्तब्ध झाला; असं मला वाटतं; असे काही पुरुष म्हणजे वासुदेव - श्रीकृष्णाचे जन्मदाते; नंदराज - त्याचे पालन करते; बलराम - त्याचा मोठा भाऊ, पेंद्या - त्याचा बालपणीचा लाडका मित्र, सुदामा - ज्याचे पोहे खाऊन श्रीकृष्ण तृप्त झाला; पार्थ - त्याच्या अत्येचा कुंतीचा पुत्र आणि त्याचा लाडका बंधू, कर्ण - ज्याच्या आयुष्याचं गुपित श्रीकृष्णाला माहीत होतं आणि ज्याच्यावर श्रीकृष्णाने मनातून खरंच खूप प्रेम केलं, हे तर आहेतच परंतु ज्यांच्याबद्दल आपण फारशी माहिती करून घेतलेली नाही परंतु त्यांचं श्रीकृष्णाच्या आयुष्यातलं अस्तित्व खूप महत्वाचं होतं असे दारूक - त्याचा सारथी, सात्यकी - श्रीकृष्णाचा सेनापती आणि परममित्र आणि सर्वात महत्वाचा असा एक पुरुष ज्याचा उल्लेख श्रीकृष्णाच्या सोबत असूनही आपल्याला राग येईलच असा तो पारधी ज्याच्या बाणामुळे श्रीकृष्णाने त्याचा हा अवतार संपवला.. या सर्वांचे मनोगत माझ्या दृष्टिकोनातून.
***
वसुदेव
माझे पिता यदुवंशी शूरसेन हे मथुरेचे महाराज उग्रसेन यांचे परममित्र. माझे पिता शूरसेन आणि माता मारिषा यांच्या आशीर्वादानेच मी महाराज उग्रसेन यांचा मंत्री झालो. महाराज उग्रसेन यांचा पुत्र कंस माझा परममित्र. तो स्वभावाने तसा थोडा आततायी आणि शीघ्रकोपी आहे; मात्र आमची मैत्री खरंच खूप गहिरी आहे. माझ्या शांत स्वभावाविषयी तो नेहेमी माझी चेष्टा करतो आणि मी त्याला कायम सांगतो की 'कोणत्याही संकटामध्ये कोपीष्ट मनाने घेतलेला निर्णय चुकीचा ठरू शकतो. राग येणे स्वाभाविक आहे; मात्र शांत मनाने विचार करून घेतलेला निर्णय हा आयुष्यात चांगली फळेच देतो.' कंसाचे मित्रप्रेम वाखाडण्याजोगे आहे. त्याने त्याच्या पिताजींकडे स्वतः आग्रहपूर्वक माझ्या विवाहाचा विषय काढला. कंसाचे काका; आदरणीय देवक महाराज यांच्या सात कन्यांपैकी देवकी ही कंसाचे लाडकी बहीण. त्यामुळे माझा विवाह तिच्याशी व्हावा ही त्याची मनीषा होती. त्याने माझ्याशी बोलल्यानंतर हा प्रस्ताव उग्रसेन महाराजांकरवी महाराज देवक यांच्यापुढे ठेवला; आणि आश्चर्य म्हणजे महाराज देवक यांनी केवळ देवकीच नाही तर त्यांच्या सातही पुत्रिंशी माझा विवाह आपणहून ठरवला. माझ्या मंत्री होण्यानंतरच्या या घटना इतक्या लवकर झाल्या की माझा माझ्या नशिबावर विश्वासच बसत नव्हता. विवाह इतक्या लवकर ठरला की माझे पिता शूरसेन महाराज, माझी माता मारीषा माझ्या या विवाह सोहळ्याला येऊ शकले नाहीत. मात्र मी त्यांना दूताकरवी निरोप पाठवला होता की मी विवहाहानंतर लगेच माझ्या सप्तपत्नींसोबत त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी येणार आहे. मी विवाहबद्ध झालो याचा आनंद कंसाच्या प्रत्येक कृतीमध्ये दिसत होता. विवाह सोहळ्यानंतर माझ्या सप्त पत्नींसोबत मी स्वगृही जाण्यास निघालो त्यावेळी मथुरेच्या वेशीपर्यंत आमच्या रथाचे सारथ्य कंसाने आग्रहपूर्वक स्वीकारले. मथुरेचे नगरजन त्यांच्या सुपुत्रींच्या पाठवणीसाठी मथुरेच्या रस्त्या-रस्त्यावर पुष्पांची उधळण करत उतरले होते. कंस सारथ्य करत असताना देखील माझ्याशी बोलत होता. पुढील प्रवासासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी त्याने आमच्या सोबत दिल्या होत्या; त्यासंदर्भात माहिती देखील देत होता.... आणि अचानक ती आकाशवाणी झाली.... ती आकाशवाणी ऐकताच कंस बेभान झाला. मी त्याला खूप समजावण्याचा प्रयत्न केला की मृत्यू हे जीवनाचे अंतिम सत्य आहे. शरीर नश्वर असते. त्यामुळे असा कोणताही आततायी निर्णय घेऊ नकोस की ज्यामुळे तुला यापुढील आयुष्य सततच्या भीतीच्या सावटाखाली जगावे लागेल. मात्र शीघ्रकोपी कंसाने कधीच कोणाचेही ऐकले नव्हते. त्या एका आकाशवाणीने माझे आणि माझ्या नववधू देवकीचे आयुष्यच बदलून गेले.
कंसाने आम्हाला दोघांनाही मथुरेतून बाहेर जाण्यास मज्जाव केला आणि आमची रवानगी कारावासात झाली. काही कळायच्या आत आम्ही दोघेही कंसाच्या कैदेत अडकले होतो. महाराज उग्रसेन यांनी आपल्या पुत्राची समजूत काढण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र त्याचा परिणाम असा झाला की महाराज उग्रसेन यांना देखील कंसाने कालकोठडीत टाकले आणि स्वतःचा राज्यभिषेक करून घेतला. कारावास! एक दिवस-रात्र विरहित भावनांच्या गर्तेतील आयुष्य. मला त्या कारावासातील कोठडीमध्ये हे देखील कळण्यास मार्ग नव्हता की माझ्या इतर सहा पत्नीचे काय झाले. दिवसांमागून दिवस जाऊ लागले आणि देवकी गर्भवती झाली. ही बातमी कळताच कंस राजवैद्यांना घेऊन आमच्या कोठडीमध्ये आला. त्यांच्याकरवी देवकीची तपासणी करवून घेऊन त्याने तिच्या तब्बेतीची पूर्ण काळजी घेण्याची आज्ञा राजवैद्यांना दिली. त्याच्या या निर्णयाने मला खूपच आश्चर्य वाटले. मात्र जाताना त्याने वळून माझ्याकडे बघितले आणि म्हणाला;"वसुदेवा; मला तुझ्याविषयी काहीच तक्रार नाही. त्यामुळे देवकीचे गर्भारपण मी नीट सांभाळणार. परंतु तिच्या आठही बाळांना मी मारणार. त्यानंतर मात्र मी तुला आणि माझ्या या प्रिय भगिनीला मुक्त करेन हा माझा शब्द." कंस निघून गेला आणि त्यांच्या वक्तव्याने मी आनंदित व्हावे की दुःखी या संभ्रमात मी पडलो.
दिवस जात होते आणि देवकी आणि माझे पुत्र जन्मतःच कंसाच्या हातून मारले जात होते. देवकी सातव्या वेळी गर्भवती राहिली त्यावेळी राजवैद्य तिची तब्बेत पाहण्यासाठी आले होते. आज राजवैद्यांचा चेहेरा चिंतीत दिसत होता. त्यांच्यावर बारकाईने लक्ष ठेवलेल्या कंसाच्या नजरेतून ही गोष्ट सुटली नाही; आणि त्याने अत्यंत काळजीभरल्या आवाजात राजवैद्यांना प्रश्न केला; "वैद्यराज, काही काळजी करण्याजोगे आहे का?" त्याचा तो काळजीभरला आवाज ऐकून मलाही प्रश्न पडला की याच्या मनात नक्की काय आहे? आजवर याने माझे सहा पुत्र माझ्या नजरेसमोर मारून टाकले आहेत आणि एकाही वेळी त्याचे मन द्रवले नाही आहे किंवा त्याचा हात किंचित देखील कापला नाही आहे. तरीही आज माझ्या पत्नीच्या गर्भारपणाची त्याला काळजी वाटत आहे.
राजवैद्यांनी एकदा माझ्याकडे पाहिले आणि ते कंसाला म्हणाले;"महाराज, यावेळी देवी देवकींचा गर्भ काहीसा कमजोर वाटतो आहे. त्यांना मोकळी हवा आणि सूर्यप्रकाशाची अत्यंत गरज आहे." हे ऐकताच कंसाने कारावासाच्या सुरक्षिततेसाठी पाहाऱ्यावर ठेवलेल्या त्याच्या अत्यंत विश्वासू सेवकाला बोलावले आणि म्हणाला,"शूर्पका, आजपासून तुझ्या पत्नीला संध्यासमयी इथे घेऊन ये आणि माझ्या भगिनीला; देवकीला; कारावासातील प्रांगणात घेऊन जाण्याची आणि परत सुखरूप कारागृहात आणण्याची जवाबदारी दे. एक लक्षात ठेव; देवकीच्या बाबतीत कोणतीही चूक झाली तर त्याची शिक्षा ही केवळ देहांत नसून हालअपेष्टा सहन करत मिळणारा देहांत!" त्याच्या त्या गोंधळून टाकणाऱ्या वागण्या-बोलण्याचा अर्थ लागेपर्यंत कंस राजवैद्यांना घेऊन तेथून निघाला होता.
मी अजूनही त्याच्या वागण्याचा अर्थ शोधत होतो. त्यावेळी देवकी माझ्या जवळ आली आणि भिंतींनाही ऐकू जाणार नाही याची काळजी घेत मला म्हणाली;"स्वामी, मी कारागृहाच्या प्रांगणात रोज जाऊ लागले की राजवैद्य एका सायंकाळी रोहिणीला घेऊन येणार आहेत. त्यांनी मला वचन दिले आहे की या गर्भाला ते रोहिणीच्या गर्भात संकर्षित करणार आहेत; जेणेकरून माझे हे बाळ वाचेल." तिचे ते बोलणे ऐकून मी आश्चर्यचकित झालो. मात्र तिने डोळ्यांनी खूण करताच मौन धारण केले. दिवस जात होते आणि देवकीचा सप्तम गर्भ दिसामासाने तिच्या उदरात वाढत होता. देवकीचा सातवा महिना सुरू झाला. यावेळचे गर्भारपण तिला सोसवत नव्हते की काय कोण जाणे; परंतु ती अत्यंत अशक्त दिसू लागली होती. कारावासाच्या प्रांगणात जाण्याकरता देखील तिला आता किमान दोन दासींची मदत लागत होती. मात्र तरीही ती प्रतिदिनी निग्रहपूर्वक बाहेर पडत होती. कंस रोजच राजवैद्यांसोबत देवकीच्या तब्बेतीची विचारपूस करण्यास येत असे. त्याने हा परिपाठ देवकीच्या प्रथम गर्भारपणापासून ठेवला होता.
त्यादिवशी राजवैद्यांनी देवकीची तब्बेत बघितली आणि म्हणाले,"महाराज, देवी देवकींचा हा गर्भ किती दिवस त्यांच्या उदरात जगेल याबद्दल मला शंका आहे. आपली परवानगी असली तर मी प्रतिदिनी संध्या समयी देखील देवींच्या तब्बेतीची विचारपूस करण्यास येऊन जाईन. त्या ज्यासमयी प्रांगणात येतात त्यासमयी केवळ लांबूनच मी त्यांचे दर्शन घेईन." काही क्षण विचार करून कंसाने राजवैद्यांना परवानगी दिली. या घटनेला केवळ दोन दिवस झाले असतील; त्यादिवशी देवकी उठून बसू शकत नव्हती. मात्र ती हट्टाने संध्यासमयी प्रांगणात गेली. मला आता देवकीची खूपच काळजी वाटू लागली होती. आपल्या सहा पुत्रांचा जन्मतःच झालेला मृत्यू तिने पाहिला होता. हे दुःख कोणत्याही मातेला दुभंगून टाकण्यास पुरेसे होते. तरीही ती शक्तीदेवता सप्तम पुत्राला जन्म देण्यासाठी सज्ज झाली होती. आज प्रांगणाच्या दिशेने जाताना तिने एकदा माझ्याकडे वळून बघितले आणि आपल्या उदरावर हात ठेऊन तिने 'निरोप द्यावा'; अशा पद्धतीचा इशारा मला केला. मी तिच्या त्या इशाऱ्याने कोलमडून गेलो. मात्र देवकी अत्यंत घट्ट मनाने ठाम पावले उचलत बाहेर पडली. संध्या समय टळून बराच वेळ झाला होता; तरी अजूनही देवकी परतली नव्हती. तिच्या काळजीने माझ्या जीवाचे पाणी पाणी होत होते. एक असाहाय्य कैदी यापेक्षा जास्त मी काहीच नव्हतो. स्वतःच्या या असाहाय्य स्थितीवर आज मला प्रचंड क्रोध येत होता... मी ना योग्य पुत्र होऊ शकलो होतो ना योग्य पती! मी माझ्या पुत्रांना देखील वाचवू शकलो नव्हतो. का जन्मलो होतो मी या जगात? काय उद्देश आहे माझ्या आयुष्याचा? या प्रश्नांच्या गर्तेत मी हरवून गेलो होतो... आणि त्याचवेळी मला देवकीचा टाहो ऐकू आला. माझा जीव पिळवटून गेला. मी कारावासाच्या दारापर्यंत धावलो मात्र बांधलेल्या शृंखलांमुळे पडलो. काही वेळानंतर देवकी शूर्पक पत्नीचा आधार घेत कारावासाच्या आत आली. ती पूर्णपणे उन्मळून पडलेली मला दिसत होती. मात्र मी काहीच करू शकत नव्हतो. देवकी आत येते न येते तोच कंस देखील तेथे दाखल झाला. त्याच्या सोबत राजवैद्य देखील होते.
आत येताच राजवैद्यांनी घाईघाईने देवकीच्या तब्बेतीची पाहाणी केली. त्यांचा चेहेरा देवकीला पाहून भयभीत झाला. ते धावले आणि त्यांनी कंसाचे पाय पकडले. "त्राही माम्! महाराज.... मी माझ्याकडून कोणतेही उपचार कमी केले नव्हते. तरीही जे व्हायला नको होते ते झाले आहे." त्याचे बोलणे ऐकून कंस गोंधळून गेला. राजवैद्यांना उठण्याची आज्ञा देत त्याने विचारले;"नक्की काय झाले आहे वैद्यराज?" मान खाली घालून राजवैद्य म्हणाले;"महाराज, देवी देवकी यांचा सप्तम गर्भ त्यांच्या सप्तम महिन्यात आतल्याआत जिरून गेला आहे. सप्तम महिना हा गर्भने संपूर्ण जीव धरण्याचा असतो. याच महिन्यात त्याची शारीरिक वाढ पूर्ण होऊन पुढे मानसिक आणि बौद्धिक वाढ सुरू होते असे शास्त्र म्हणते. त्यामुळे हा सप्तम महिना व्यवस्थित पार पडावा यादृष्टीने मी प्रयत्न करत होतो. मात्र आज देवी देवकी यांचा हा गर्भ आतल्याआत जिरून गेला आहे." ही माहिती देताना राजवैद्य थरथर कापत होते. कारण त्यांना महाराज कंसाच्या क्रोधाची कल्पना होती. मात्र आश्चर्यकारक रीतीने कंस शांत होता. काही क्षण विचार करून कंसाने गडगडाटी हास्य केले आणि गर्वाने छातीवर हात मारत तो म्हणाला;"याचा अर्थ देवकीचे गर्भ माझ्या भीतीने जन्मआगोदरच मृत्यूला प्राप्त होणार तर! म्हणजे एका दृष्टीने माझ्या प्रिय भगिनीच्या शेवटच्या दोन पुत्रांपैकी एकाला मृत्युदंड देण्याची मला गरज उरलेली नाही. वैद्यराज आपण खूपच चांगली बातमी मला दिली आहे." यानंतर माझ्याकडे वळून कंस म्हणाला;"मित्रा वसुदेवा, आता केवळ तुझा अष्टम पुत्र! त्याला मारून मी अमर होईन. एकदा त्याचा निकाल लावला की मग तू आणि माझी प्रिय भगिनी या कारावासातून मोकळे व्हाल." असे म्हणून तो निघून गेला. त्याच्या सोबत निघताना राजवैद्यांनी माझ्याकडे पाहून म्हंटले;"वसुदेव महाराज, देवींची काळजी घ्या." मी राजवैद्यांकडे पाहिले आणि मला जाणवले की राजवैद्यांच्या चेहेऱ्यावर नकळत एक समाधानाची रेषा उमटली आहे. कंस आणि राजवैद्य जाताच मी देवकीकडे धावलो. शारीरिक यातना सहन करणाऱ्या त्या स्त्रीशक्तीने माझा हात हातात घेतला आणि अत्यंत हळुवार आवाजात ती म्हणाली;"रोहिणी माता होणार आहे. तिला मी आजच तुमचे बंधू गोकुळातील नंद महाराज यांच्याकडे जाण्याविषयी सुचविले आहे." एवढे बोलल्याचे कष्ट देखील तिला सहन झाले नाहीत आणि तिला ग्लानी आली.
............ आणि देवकी अष्टम समयी गर्भवती राहिली. सप्तम समयी तिच्यावर असणारी अवकळा पूर्णपणे नाहीशी झाली होती. तिचा आनंदी, हसरा, उजळलेला चेहेरा बघून मी देखील समाधान पावत होतो. यावेळी कंस रोज सकाळ-संध्याकाळ स्वतः राजवैद्यांसोबत कारावासामध्ये येत होता. दिवस भरत आले आणि कंसाने कारावासामधील पाहारा वाढवला. त्याने शूर्पकाला सक्त ताकीद दिली होती की कारावासामध्ये होणाऱ्या प्रत्येक क्षणांची माहिती त्याच्यापर्यंत पोहोचली पाहिजे. स्वतः शूर्पक आता कारावासातच येऊन राहिला होता.
आज भाद्रपदातील अष्टमी. आज आकाश फाडून मेघांनी धारतीकडे धाव घेतली होती. देवकी संध्याकाळपासूनच अस्वस्थ होती. मात्र तिला होणारा त्रास ती प्रगट करत नव्हती. वेळ पुढे सरकत होती आणि रात्री बाराच्या सुमारास देवकीला अंतिम कळा येऊ लागल्या. काही क्षणातच पुत्ररत्न जन्माला आले. माझा आनंद गगनात मावत नव्हता. कारावासाच्या पाहरेकऱ्यांना ही बातमी कळू नये म्हणून मी त्या अर्भकाला उचलून कवटाळले जेणे करून त्याचे रुदन कोणालाही ऐकू जाऊ नये. देवकी म्लान होऊन पडली होती. अजून तिने तिच्या अष्टम पुत्राचे मुखावलोकन देखील केले नव्हते. आश्चर्य म्हणजे दर क्षणाला आत येऊन बघणारे पाहारेकरी अजून आले नव्हते. सर्वत्र एक निर्मम शांतता पसरली होती. त्या अर्भकाला कवटाळून काय करावे याचा विचार मी करत होतो... आणि.... मला माझ्यातूनच एक प्रकाश शलाका निर्माण झाल्याचा भास झाला. मी हातातील अर्भकाकडे पाहिले. ते माझ्याकडे पाहात हसत होते... आणि माझ्या मनाच्या गाभाऱ्यातून एक आवाज गुंजला... "बाबा, मला देखील माझ्या मोठ्या भावाप्रमाणे गोकुळात नेऊन सोडा. चला, उठा... तुम्हाला कोणीही अडवणार नाही."
एक क्षण मी देवकीकडे बघितले. तिने ग्लानीतून जागे होण्याची वाट पाहण्याची इच्छा असूनही मी मन घट्ट करून माझ्या या अष्टम पुत्राला घेऊन निघालो. माझ्या मनाच्या आवाजाने जे सांगितले होते तसेच झाले. मला माहीत होते माझ्या हातातील नवजात अर्भक म्हणजे मानव रूपातील तो विश्वकर्ता आहे. त्यामुळे मला कसलीच काळजी नव्हती. मी दुथडी भरून वाहणाऱ्या नर्मदेला पार करून गोकुळात पोहोचलो; आश्चर्य म्हणजे माझा बंधू नंद माझी वाट पाहात होता. त्याची पत्नी यशोदा नुकतीच बाळंतीण झाली होती. नंदाने माझ्याकडे पाहिले आणि माझ्या हातातून माझ्या पुत्राला घेऊन देवी यशोदेच्या कुशीत नेऊन ठेवले. नंदाची कन्या घेऊन मी कारावासात पोहोचलो आणि अचानक देवकीला जाग आली. ती कण्हत उठली आणि तिच्या आवाजाने पाहारेकरी देखील धावत आत आले. कंसाला निरोप गेला आणि तो धावत कारावासात आला. त्याने त्या नवजात अर्भकाला उचलले आणि........ ती आदिमाया स्वरूपात प्रकटली आणि सत्य वदून अंतर्धान पावली.
प्रचंड संतापलेला कंस माझ्याकडे वळला. "तू हे कसे केलेस ते मला माहीत नाही वसुदेवा. पण यापुढे ना तू माझा मित्र आहेस ना ही माझी भगिनी. आता मी तुला भेटेन ते तुझ्या त्या गोकुळातील पुत्राच्या मृत्यूनंतरच. तोपर्यंत तू माझा कैदी आहेस हे विसरू नकोस." कंस दाणदाण पावले आपटत निघून गेला. त्याक्षणी माझ्या आणि देवकीच्या आयुष्यातील काळरात्रीला सुरवात झाली.
"वासुदेवा, तुझं हे नाव माझ्या नावावरून पडलं आहे याची मला कल्पना आहे. माझ्या आयुष्यातील काळरात्री तू तुझ्या हाताने संपवल्यास. कंस वध करून तू माझी आणि तुझ्या जन्मदात्या आईची सुटका केलीस. मथुराधिपती म्हणून माझा राज्यभिषेक देखील करवलास. आजवरच्या भारतवर्षाच्या इतिहासात पुत्राने पित्याचा राज्यभिषेक करवला असे घडले नसेल. देवकीचे दुःख समजून घेऊन तू तुझे सहाही बंधू परत आणलेस. पुढे द्वारका वसवलीस आणि तेथे देखील माझ्या अधिपत्याखाली बालरामाचा संपूर्ण मान ठेऊन तू राज्यव्यवस्था बघितलीस. माझ्या प्रिय भगिनी कुंती हिच्या पुत्रांसाठी तू महाभारत घडवलेस. तू एक उत्तम पुत्र, एक उत्तम पिता, बंधू तर झालासच पण एक आदर्श जन्म लोकांसमोर मांडलास. पुत्रा, आज मात्र मी तुझ्यासमोर एक पिता म्हणून माझं दुःख मांडणार आहे. प्रत्येक पित्याची एक सुप्त इच्छा असते की आपण आपल्या पुत्राला मार्गदर्शन करून एक उत्तम व्यक्तीमध्ये त्याचे रूपांतर करावे. आपल्या पुत्राने आपण शकवलेल्या मार्गाचे पालन करताना पाहाणे यासारखे सुख नसते पित्याला. मात्र मी या संपूर्ण जगातील आणि सर्व कालखंडातील एकुलता एक पिता असेन की ज्याला जन्मतःच त्याच्या पुत्राने मार्गदर्शन केले; आयुष्याच्या उत्तरार्धात पुत्राने पित्याचा राज्यभिषेक केला अशी घटना देखील फक्त माझ्याच आयुष्यात घडली असेल. कृष्णा युगानुयुगे तुझं नाव वसुदेव म्हणून गाजेल आणि त्यायोगे माझ्या नावाचा देखील उल्लेख होईल; या विचाराने मला कितीतरी समाधान लाभते. मी एका विश्वव्यापी विधात्याचा पिता म्हणून युगानुयुगे ओळखला जाईन आ विचाराने मी कायम समाधान पावतो. परंतु माझ्या मानत खोल कुठेतरी एक भळभळती जखम आहे रे पुत्रा.... नंदाने जे सुख अनुभवले ते माझ्या वाटेला कधीच आले नाही याचे दुःख घेऊनच मी या जगाचा निरोप घेणार. अंततः इतकेच........ श्रीकृष्णार्पणमसुस्तू!!!"
छान
ReplyDeleteधन्यवाद
DeleteVery nice.
Deleteneatly elaborated
thank u
Deleteकृवया रोहिणी बद्दल थोडं सांगू शकाल का? म्हणजे म्हणजे ती कोण,कुणाची मुलगी,कुणाची पत्नी ??
ReplyDeleteरोहिणी ही देवकीची सख्खी बहीण. कंसाच्या या एकूण सात चुलत बहिणी होत्या ज्यांचे लग्न वसुदेवांबरोबर झाले होते
ReplyDelete