Friday, May 27, 2022

अनाहत सत्य (भाग 26)

 अनाहत सत्य

भाग 26

"महाराज, केवळ एक माह आहे आपल्या हातात." सुमंत कल्याण काहीसे अस्वस्थ होऊन म्हणाले.


"कल्याण, मला जे माहीत आहे तेच परत सांगू नकोस. दिवस ठरला आहे; हे नक्की. त्यामुळे आपल्याला आता तयारी करणं आवश्यक आहे." महाराज म्हणाले.

"परंतु महाराज, राजकुमार गोविंद यांच्याकडून काहीच खबरबात नाही." सुमंत अजूनही शशांक होते.

"हो! जाणून आहोत आम्ही. परंतु आमच्या मनात विचार आहे की राजकुमार गोविंद यांना देखील त्याच दिवशी नगर प्रवेश करण्यास भाग पाडायचं." महाराज म्हणाले.

"विचार चांगला आहे महाराज. परंतु राजकुमार त्यासाठी तयार होतील का? त्यांच्या मनात नक्की काय आहे; हे अजून आपल्याला समजलेलं नाही." सुमंत म्हणाले.

"कल्याण, तुम्ही स्वतः एकदा जाऊन राजकुमार गोविंद यांची भेट घ्या आणि त्यांच्याशी सर्वच बोलणी स्पष्ट करा. त्यातून योग्य तो मार्ग निघेल. जर काही अडचण आलीच तर आम्ही स्वतः त्यात लक्ष घालू. त्यादृष्टीने बघितलं तर बराच वेळ आहे आपल्या हातात." महाराज म्हणाले. सुमंत कल्याण यांच्या मनात अनेक प्रश्न उभे राहिले. परंतु ते काहीच बोलले नाहीत. त्यांना माहीत होतं की महाराजांच्या दृष्टीने राष्ट्रकूट घराण्याच्या पराक्रमाच्या सीमा वाढवणं आणि जनतेला एकछत्री सुखी जीवन देणं जास्त महत्वाचं आहे. महाराज त्याच दृष्टीने पुढील तयारी देखील करून घेत होते. म्हणून तर राजकुमारांचा नगर प्रवेश महत्वाचा होता. आपल्या युद्ध प्रयणाची तयारी महाराज करत असताना; आपण त्यांनी दिलेल्या जबाबदारी संदर्भात सतत प्रश्न निर्माण करणे योग्य नाही; याची जाणीव सुमंत कल्याण यांना सतत होत होती.

***

"तुझी खात्री आहे का नाथा? हे बघ... केवळ तू देत असलेल्या माहितीच्या आधारावर राष्ट्रकूट राजघराण्यातील अत्यंत महत्वाचे निर्णय घेतले जाणार आहेत." सुमंत कल्याण अत्यंत काळजी भरल्या आवाजात बोलत होते.

"सुमंत, आपण माझ्यावर विश्वास ठेवा. मी स्वतः साक्ष होतो जे घडत होतं त्याचा. मी दूरवर उभ्या तीक्ष्णाला देखील बघितलं होतं. भीमा आणि अपाला सोबत उभे असलेले तिने देखील बघितले होते." नाथ म्हणाला.

"तुला काय वाटतं नाथा?" सुमंत गोंधळून गेले होते.

"सुमंत, आपण मला कायम सांगत आलात की अपालाने राजकुमार गोविंद यांना भुरळ पाडली आणि वश करून घेतलं. सुमंत, आज सांगतो... मात्र मी त्यावर कधीही विश्वास ठेवला नव्हता. त्याचं कारण देखील माझ्यासाठी खूप स्पष्ट होतं. राजकुमार गोविंद यांच्या सोबत मी सतत इथे राहात होतो. त्यामुळे अपालाचा सहवास देखील मला होता. तिचं त्यांच्या सोबत असतानाचं अस्तित्व इतकं स्वच्छ आणि निर्मळ होतं की तिने करणी करून राजकुमार गोविंद यांना वंश करून घेतलं असेल; यावर माझा विश्वास बसत नव्हता. मूलतः अपाला सारखी हुशार आणि विशेष कार्याची जवाबदारी मिळालेली स्त्री वशीकरण करत असेल हे स्वीकारणे एकूण अवघडच." नाथा अजूनही जे बघितलं त्यावर पूर्ण विश्वास ठेवण्यास तयार नव्हता. "परंतु सुमंत, आता मात्र माझ्या डोळ्यासमोरील अंधश्रद्धेचा पडदा दूर झाला आहे. सुमंत, मी राष्ट्रकूट घराण्याचा एकनिष्ठ सेवक आहे; याविषयी आपण मनात कोणताही किंतु आणू नये. यापुढे मी आपल्या शब्दाबाहेर नाही." नाथा म्हणाला.

"नाथा, तुझ्या एकनिष्ठेबद्दल माझ्या मनात कोणतीही शंका नाही; किंबहुना कधीच नव्हती. मात्र राजकुमार गोविंद यांच्या सोबत राहात असताना मी जे सांगतो आणि तू जे पाहातो आहेस यात मोठी तफावत निर्माण होत होती. अशा वेळी सर्वसाधारण मनुष्यधर्माप्रमाणे तू राजकुमार जे सांगतील त्याबरहुकूम वागशील; हे मला माहीत होतं. त्यामुळे तुझ्या डोळ्यावरील अपालाच्या खोट्या वागण्याची पट्टी सुटणं आवश्यक होतं." सुमंत कल्याण म्हणाले.

"सुमंत, आता मात्र आपण जे आणि जसं सांगाल त्याबरहुकूम मी वागणार आहे. राजकुमार गोविंद यांना इथून सुखरूप बाहेर काढणं हेच माझं जीवित कार्य आहे; याविषयी आपण मनात किंतु आणू नये." नाथा म्हणाला.

सुमंत कल्याण यांच्या चेहेऱ्यावर समाधानाची एक हलकी रेषा उठली... पण ती केवळ क्षणिक होती. सुमंत कल्याण यांचा चेहेरा अत्यंत दगडी झाला आणि कठोर आवाजात ते नाथाला म्हणाले; "नाथा, नीट कान देऊन ऐक आणि पूर्णपणे समजून घे. तीक्ष्णाने अत्यंत योग्य जाळे विणले आहे. सर्वांसमक्ष अपाला आणि तीक्ष्णा एकमेकींच्या विरोधात उभ्या आहेत; असे चित्र निर्माण झाले आहे. तीक्ष्णाने स्वतः महाराजांची भेट घेऊन पुढील पौर्णिमेचा मुहूर्त योग्य असल्याचं सांगितलं आहे. महाराजांच्या मनात त्याच दिवशी राजकुमारांचा नगर प्रवेश करण्याचा विचार आहे; याची कल्पना तीक्ष्णाला नक्कीच असणार. आपण पूर्णपणे या दोन महत्वाच्या घटनांमध्ये अडकले असताना तीक्ष्णा तिच्या लोकांना इथून हलवणार आणि मग अपालाच्या मदतीने शेवटचा हेतू तडीस नेणार; असा माझा कयास आहे."

"परंतु त्यांचे लोक तर उजळ माथ्याने इथून प्रस्थान करूच शकतात. आम्ही कामासाठी आलो होतो; ते काम पूर्ण झालं आहे तरी आम्ही आता येथून निघतो; इतकं म्हणणं जरी त्यांनी महाराजांसोमोर ठेवलं तरी त्यांचं योग्य आदरातिथ्य करून महाराज त्यांची पाठवणी करतील." नाथा म्हणाला.

"अगदी बरोबर. काही कारण असणार नाथा, की तीक्ष्णाला ते मान्य नाही. नाथा, ज्यावेळी या भव्य निर्मितीचं काम सुरू झालं त्यावेळी तुझा जन्म देखील झाला नव्हता. ही तीक्ष्णा अचानक कुठूनशी प्रकट झाली आणि महाराजांना जाऊन भेटली. तिचा केवळ एक शब्द आणि महाराजांनी मला कक्षा बाहेर जाण्यास सांगितलं. त्या दिवशी आणि त्यानंतर तीक्ष्णा ज्या-ज्यावेळी महाराजांना भेटली त्यावेळी तिने कटाक्षाने मला लांब ठेवलं. तिला महाराजांच्या स्वप्नाबद्दल माहीत होतं. तिने काम हाती घेताना तिचे नियम आणि तिचं स्वातंत्र्य अबाधित ठेवलं. नाथा, तुला आज इथे अनेक ठिकाणांहून आलेले कारागीर दिसत आहेत. मात्र सुरवातीच्या काळात केवळ तीक्ष्णाने आणलेले कारागीर आणि कामकरी होते इथे. त्यांचं असं स्वतःचं वसतिस्थान त्यांनी निर्माण केलं होतं. त्याकाळातील कामाचा आवाका आणि गति ही पुढील काळात कमी होत गेली... म्हणजेच आपले कारागीर इथे आल्यानंतर त्यांना जे शिकवलं गेलं आणि त्यांनी जे आत्मसाद करून त्यांच्या क्षमतेनुसार जे निर्माण केलं ते तीक्ष्णाने स्वीकारलं. मात्र मूळ श्रीमंदिर निर्मिती तिने केवळ स्वतःच्या हातात आणि स्वतःच्या कामगार आणि कारागीर यांच्या हातात ठेवली. यामागे नक्की काही कारण असणार. अपाला देखील तीक्ष्णा प्रमाणे काम करू इच्छित असावी असा माझा कयास आहे. कारण सुरवातीच्या काळातील त्यादोघींमधील ताळमेळ दृष्ट काढण्याइतपत सुंदर होता. मात्र राजकुमारांच्या आगमनानंतर; ज्याची इच्छा खुद्द तीक्ष्णाने महाराजांकडे व्यक्त केली होती; सगळं बदलून गेलं. हळूहळू करत तीक्ष्णाने अपालाच्या हाताखालील त्यांचे कारागीर आणि कामगार कमी केले आणि त्याजागी आपले लोक नेमले. तरीही अपाला आपलं वेगळं असं कौशल्य दाखवत होती. यासगळ्या कृत्यामागील कारण समजून घेणं अत्यावश्यक आहे. मात्र आत्ता आपल्याला तेवढा वेळ नाही नाथा. आत्ता आपल्याला केवळ राजकुमार गोविंद यांना इथून सुरक्षित रीतीने बाहेर काढायचं आहे आणि महाराज तीक्ष्णा यांची भेट सहज पार पडली पाहिजे." सुमंत नाथाशी बोलता बोलता स्वमग्न देखील होत होते.

नाथाला त्यांच्या एकूण बोलण्याचा पल्ला लक्षात आला नाही. मात्र त्याच्या मनाची खात्री झाली होती की अपालाने राजकुमार गोविंद यांच्यावर काही जादू केली असल्यानेच बहुतेक ते तिच्या आहारी गेले असावेत. त्यामुळे यापुढे केवळ सुमंत जे सांगतील त्याबरहुकूम आपण काम करायचे याचा निर्णय त्याने घेतला होता.

सुमंत काही काळ विचार करत होते आणि त्यानंतर त्यांनी नाथाला जवळ बोलावलं आणि त्याच्याशी अत्यंत खालच्या आवाजात बोलायला सुरवात केली.

***

"भीमा, मला खात्री आहे तुझं काम योग्य प्रकारे सुरू आहे. तरीदेखील या निर्मितीची प्रमुख म्हणून मला संपूर्ण कार्यासंदर्भात समजून घ्यायला आवडेल." तीक्ष्णाने भीमाला बोलावून घेऊन म्हंटलं.

"भागीनेय तीक्ष्णा, आपण म्हणाल त्यावेळी आपणास संपूर्ण माहिती देईन." भीमा अत्यंत सावधपणे शब्द वापरत होता. अर्थात त्याला कल्पना होती की तो अत्यंत तल्लख आणि नावाप्रमाणे तीक्ष्ण अशा तीक्ष्णाशी बोलतो आहे.

तीक्ष्णा हसली आणि म्हणाली; "भीमा, मी काही महत्वाचे निर्णय घेतले आहेत. अर्थात या निर्णयांची पूर्तता तुझ्या मदतीशिवाय शक्य नाही. त्यामुळे मला वाटतं आपण दोघांनी संपूर्ण परिसर फिरावा आणि त्यावेळी तू मला तुझ्या शक्ती; त्यांचे चयन आणि व्यवस्थापन सांगावंस असं मला वाटतं."

भीमाला मनातून ही अपेक्षा होतीच. तो हसला आणि होकारार्थी मान हलवत म्हणाला; "भागीनेय, आपण म्हणत असाल तर आत्ताच..."

"अंह... आपण संपूर्ण परिसराची पाहणी उद्या करू." तीक्ष्णा म्हणाली.

"मी प्रत: वेळी तयार असेन." भीमा म्हणाला.

"जरूर." इतकंच बोलून तीक्ष्णा शांत झाली.

ती अजून काही बोलेल म्हणून भीमा थांबला आणि ती काहीच बोलत नाही हे लक्षात आल्यावर तिथून निघाला.

***

"प्रत: समयी?" अपालाने परत एकदा विचारलं.

"हो! तुला याविषयी शंका का आहे अपाला?" भीमाने अपालाला प्रश्न केला.

"कारण भागीनेय तीक्ष्णाने आपल्या लोकांना हलवताना कोणालाही विश्वासात घेतलेलं नाही." अपाला म्हणाली.

"मान्य. पण यावेळची परिस्थिती वेगळी आहे. तू तिच्या सोबत नाहीस. त्यामुळे सर्वच निर्णय ती एकटीने घेते आहे आणि त्याबरहुकूम काम करते आहे." भीमा म्हणाला.

"तरीही..." काहीतरी वेगळं होणार आहे असं अपालाचं मन तिला सांगत होतं. मात्र भीमाच्या शाश्वत नजरेमुळे ती शांत होती.

***

"दिवस कलता होत आला आहे भीमा... तू किमान चार वेळा स्वतः तीक्ष्णाला भेटून परिसर दाखवण्याची इच्छा सांगितली आहेस. तरीही ती कोणत्या ना कोणत्या कारणाने ते टाळते आहे." गोविंद भीमाच्या शेजारी बसून बोलत होता.

"खरंय तुझं." काहीही लक्षात येत नसल्याने भीमाने केवळ दोन शब्दात विषय संपवला. त्याचवेळी समोरून अपाला येताना दिसली.

"कुंजर कुठे आहे अपाला?" तिला येताना बघून गोविंदने प्रश्न केला. त्याने अपालाला स्पष्ट कल्पना दिली होती की तीक्ष्णा कुंजरचा वापर करून आपल्या दोघांना वेगळं करेल. त्यामुळे कुंजर सतत आपल्या पैकी कोणाकडे असणं आवश्यक आहे.

"नाथा त्याच्या सोबत आहे." अपाला म्हणाली.

"ठीक." गोविंद हसत म्हणाला.

"भीमा...!?" अपालाने भिमाकडे बघितलं.

"अजून काहीही निरोप नाही अपाला." भीमा म्हणाला.

"ती आपला अंत बघते आहे; असं मला वाटतं. भीमा, तीक्ष्णाने भर पर्जन्यकाळात या हसतांतरणाचा निर्णय घेतला आहे; यात नक्कीच काही खास कारण असावं असं मला वाटतं." अपाला म्हणाली.

"हा निर्णय तिचा नाही अपाला. मी स्वतः भूतप्रमुखांशी बोललो आहे. त्यांनी आग्रहपूर्वक हा दिवस निवडला आहे; हा निर्णय त्यांचा आहे. किंबहुना तीक्ष्णाने काहीसा विरोध केला होता या दिवसासाठी असं मला कळलं आहे." भीमा म्हणाला.

"तिने विरोध केला होता? त्याचं कारण कळलं का?" अपालाने अस्वस्थ होत भीमाला विचारलं.

इतक्यात नाथा समोरून येताना दिसला. तो एकटाच येत होता. अपाला एकदम उभी राहिली आणि तिने त्याला विचारलं; "कुंजर कुठे आहे नाथा? आपलं ठरलं आहे की त्याला एकट्याला सोडायचं नाही."

"तो तुझ्या पिताजींबरोबर आहे. ते स्वतः माझ्याजवळ येऊन म्हणाले की तू मला इथे बोलावलं आहेस आणि कुंजर त्यांच्या सोबत रहावा असं तूच सांगितलं आहेस." नाथा म्हणाला.

"माझे पिताजी?" अपाला झटक्यात उभी राहून पळत निघाली. भीमा, नाथा आणि गोविंद देखील तिच्या मागे पळत निघाले. इतक्यात तीक्ष्णा समोर येऊन उभी राहिली. तक्षणी भीमा थांबला. मात्र गोविंद, नाथा आणि अपाला तिथून निघून गेले. गोविंद किंवा नाथावर तीक्ष्णाचा अधिकार नव्हता आणि अपाला तिचं काहीही ऐकणार नाही याची तीक्ष्णाला कल्पना होती. त्यामुळे ती ते गेले त्या दिशेने बघत राहिली; मात्र बोलली काहीच नाही.

"भागीनेय..." भीमाला काय करावं सुचत नव्हतं.

"अं? हं... भीमा... चल; एकदा तुझी रचना बघू." इतकं बोलून तीक्ष्णा चालू पडली.

ती अपाला, गोविंद आणि नाथा गेले होते त्याच्या विरुद्ध दिशेने जाते आहे हे बघून भीमाला काहीतरी घडणार आहे याचा अंदाज आला. जर याक्षणी आपण काही हालचाल केली नाही तर सगळंच हाताबाहेर जाईल याची त्याला जाणीव झाली. त्याने तीक्ष्णाला हाक मारली आणि म्हणाला; "भागीनेय, आपण दुसऱ्या टोकापासून सुरवात करणं योग्य ठरेल."

तीक्ष्णा क्षणभरासाठी थांबली आणि मग अगदी सहजपणे मागे वळून म्हणाली; "काहीच हरकत नाही भीमा. जसं तुला योग्य वाटेल तसं. मात्र मला संपूर्ण माहिती हवी आहे." भीमाने होकारार्थी मान हलवली आणि हलकेच हसला. तीक्ष्णाने देखील स्मित केलं आणि दोघेही अपाला, गोविंद आणि नाथा गेले होते त्या दिशेने निघाले.

तीक्ष्णा आणि भीमा पुढे आले. त्यांच्या समोरच अपाला, गोविंद आणि नाथा उभे होते. अपालाने कुंजरचा हात धरला होता. ते बघताच भीमा स्वस्थ झाला. त्याने तिच्याकडे आश्वासक नजरेने बघितलं आणि तो तीक्ष्णासोबत पुढे निघाला.

***

"भीमा, तुला पूर्ण कल्पना आहे न?" तीक्ष्णाने भिमाकडे बघत प्रश्न केला.

"हो भागीनेय तीक्ष्णा. या जगामध्ये आपण निर्माण केलेली ही तिसरी निर्मिती आहे जिचं रक्षण ही आपली प्रथम जवाबदारी ठरते. विशेषतः आपण निर्माण केलेल्या श्रीमंदिराचा कळस! त्याचं अनन्य साधारण महत्व आपल्यापैकी प्रत्येकाला माहीत आहे. परकीय तारकासमूहातील साधर्मीय घटकांशी संपर्क निर्माण करण्यासाठीची रचना हाच तर प्रमुख उद्देश आहे या कळसाचा. कालौघात पुढे या कळसाकडे प्रगतनशील मानवाचं दुर्लक्ष होणार आहे... त्यावेळी देखील हा कळस त्याच्या संपूर्ण वैभवासकट टिकला पाहिजे; याची मी पूर्ण काळजी घेतली आहे." भीमा म्हणाला.

बोलत बोलत तीक्ष्णा आणि भीमा श्रीमंदिर मध्य ठेवून निर्माण केलेल्या इतर सौंदर्यपूर्ण लेण्यांच्या उजव्या टोकाला पोहोचले होते.

"भीमा, तुला वाटत असेल की मी अपालाच्या विरोधात आहे..." बराच वेळ शांतपणे चालणारी तीक्ष्णा क्षणभरासाठी थांबली आणि भिमाकडे बघत म्हणाली.

"नाही भागीनेय. मला खात्री आहे की आपण जे निर्णय घेता ते मानव हितासाठी आणि त्याचवेळी आपल्यासोबत असणाऱ्या पूर्व मानवांच्या सुरक्षिततेसाठी योग्य असतात." भीमा म्हणाला.

तीक्ष्णा केवळ हसली आणि म्हणाली; "आपण ठरवलं होतं की आपल्यामध्ये कोणताही शब्दच्छल असणं योग्य नाही. पण दुर्दैवाने आज आपण देखील अशा वळणावर उभे आहोत की एकमेकांवरचा विश्वास डळमळीत झाला आहे." तिच्या त्या शब्दांनी भिमाचं मन द्रवल. पण त्याला काहीही बोलायला वेळ न देता ती पुढे म्हणाली; "असो. तर भीमा, तू तुझ्या कामासंदर्भात माहिती दे."

"भागीनेय, या संपूर्ण परिसराच्या भोवती मी माझ्या सर्वोत्तम शक्तीस्थान असणाऱ्या जीवात्माना कायमस्वरूपी उभं केलं आहे. विशेषतः या पहिल्या काही कक्षांमध्ये, जिथे अपालाने आपल्याला आवश्यक अशा रचना निर्माण केल्या आहेत; त्याठिकाणी सर्वसामान्य मानवाचा वास कमी राहील अशा प्रकारे व्यवस्था केली आहे." भीमा माहिती देत होता. तीक्ष्णा आणि भीमा एक एक कक्ष बघत पुढे सरकत होते.

नवव्या कक्षापाशी ते पोहोचले. ही रचना खूपच खास होती. तीक्ष्णाने महाराजांशी बोलून इथली जागा मागितली त्यावेळी इथे अगोदरच काही गुंफा होत्या. जिथे काही महंत राहात होते. सुरवातीचे कक्ष हे त्या महंतांचे निवासस्थान होते. ज्यामध्ये अपालाने आवश्यक बदल केले होते. मात्र नववी रचना तीक्ष्णाने स्वतः नियोजित करून निर्माण करून घेतली होती. तिच्या सोबत त्यांच्या नगरातून आलेले सर्व प्रमुख कारागीर तिथे राहात होते. त्यांची मुलं अगदी कुंजरच्या वयापासूनच स्वतःच निर्मिती करायला लागली होती. आपले माता-पिता, भावंडं यांच्या प्रतिकृती ती मुलं अत्यंत कुशल हातांनी निर्माण करत होती.

"भागीनेय, ही आपल्या योजनेतील पहिली निर्मिती आहे. अर्थात इथे देखील योग्य ती व्यवस्था केली आहे." भीमा म्हणाला आणि तीक्ष्णाने स्मित केलं. "भीमा, अपालाने केलेल्या कामाचं संरक्षण तू योग्यच करशील याची मला खात्री आहे." ती म्हणाली.

"भागीनेय...." भीमा काहीतरी बोलणार होता. त्याला हाताने थांबवत तीक्ष्णा म्हणाली; "भीमा, मला श्रीमंदिर आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर याची तू काय व्यवस्था केली आहेस ते समजून घेण्यात जास्त रस आहे. कारण मी माझ्या नजरेने जे बघते आहे; त्यात मला हे दिसतं आहे की फार दूर नाही की या निर्मितीमध्ये काही खंडित होणार आहे."

"ही निर्मिती जर खंडित झाली भागीनेय तर मी माझी शक्ती त्यागीन आणि परत एकदा सर्वसाधारण मानव जन्म स्वीकारीन." भीमा म्हणाला आणि त्याचं बोलणं अत्यंत भावनाहीन चेहेऱ्याने तीक्ष्णाने ऐकून घेतलं. दोघे पुढे निघाले.

मात्र..... भिमाचं लक्ष नसताना तीक्ष्णाने फक्त एकदाच मागे वळून बघितलं होत.....

क्रमशः

Friday, May 20, 2022

अनाहत सत्य (भाग 25)

 अनाहत सत्य 

भाग 25

"कोणी तटाच्या बाहेर पडू शकणार नाही; याचा अर्थ...." गोविंद अस्वस्थपणे म्हणाला.

"याचा अर्थ अपाला देखील या तटाच्या बाहेर येऊ शकणार नाही. अर्थात मुळात ज्या दिवशी भागीनेय तीक्ष्णा महाराजांच्या हाती ही निर्मिती सुपूर्द करणार आहे त्या दिवसापर्यंत भूतप्रमुख आपल्याला इथे थांबू देतील का?" अपालाने प्रश्न केला.

"म्हणजे?" गोविंदला तिच्या बोलण्याचा अर्थच कळला नाही.

"राजकुमार, आमचे मागील अनुभव सांगतात की ज्यावेळी त्याकाळातील मानवाच्या हातात आम्ही निर्माण केलेली निर्मिती सोपवण्याची वेळ येते त्यावेळी त्या निर्मितीमध्ये सहभागी असणारे कोणीच तिथे नसते. स्वनिर्मितीमध्ये कोणीही गुंतून पडतो हे सर्वनाशी सत्य आहे. मग ती निर्मिती सजीव असो किंवा निर्जीव. एक केवळ माता.... हे सन्माननिय भावविश्व सोडलं तर इतर कोणतीही निर्मिती करणारे स्वनिर्मिती स्वतः च्या ताब्यात ठेऊ इच्छितात. कदाचित अशी स्वत्वाची भावना घातक ठरू शकते. म्हणूनच आम्ही अगदी मोजके सोडलो तर कोणालाही थांबायची परवानगी नसते. आजवरच्या माझ्या अनुभवामध्ये अपाला शेवटापर्यंत थांबते. परंतु यावेळी कदाचित सगळंच बदलून जाईल. भागीनेय तीक्ष्णा भूतप्रमुखांकडून परवानगी घेऊन अपालाची रवानगी देखील अगोदरच करेल. जेणेकरून तुमची आणि तिची भेट शेवटच्या दिवशी होणार नाही." भीमा म्हणाला.

"मग यावर काहीतरी उपाय असूच शकतो न भीमा?" गोविंद अस्वस्थपणे म्हणाला.

"नाही राजकुमार. यावर कोणताही उपाय नाही. कारण आजवर कोणीही कधीही भूतप्रमुखांनी घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात गेलेलं नाही." भीमा म्हणाला.

"पण म्हणून कोणी कधी जाणार नाही असं देखील नाही भीमा." अपाला म्हणाली. भीमा आणि गोविंद दोघांनी एकाचवेळी अपालाकडे वळून बघितलं. दोघांच्याही डोळ्यात आश्चर्य होतं.

"काय?" दोघेही एकाच वेळी म्हणाले.

"अपाला तुला कळतं आहे का तू काय बोलते आहेस ते?" भीमाने प्रश्न केला.

"असं होऊ शकत अपाला?" गोविंदचा प्रश्न होता.

अपाला त्या दोघांकडे बघून हसली आणि म्हणाली; "भीमा, मी पूर्ण शुद्धीत आहे आणि मला कळतं आहे मी काय म्हणते आहे. गोविंद.... हो! असं होऊ शकतं. परंतु हे करत असताना मोठी संकटं येऊ शकतात. मुळात हे करण्यासाठी भीमा तुझी अतूट साथ आवश्यक आहे."

"अपाला, तुझ्यासाठी मी काहीही करीन.... आणि तुला देखील हे माहीत आहे." भीमा म्हणाला.

"भीमा, मी तुला भूतप्रमुखांच्या विरोधात जाण्यासाठी सांगते आहे; हे तुझ्या लक्षात आलं आहे का?" अपालाने अत्यंत शांत आवाजात म्हंटलं आणि भीमा एकदम अंतर्मुख झाला.

"तुझ्या मनात नक्की काय आहे अपाला?" गोविंदने विचारलं.

"ठीक! मी माझ्या मनात काय आहे ते तुम्हाला सांगते. त्यानंतर आपण असं काही करू शकतो का; याचा विचार तुम्ही दोघे वयक्तिक पातळीवर करा... आणि तुमच्या मनात निर्णय पक्का झाल्यावर आपण परत एकदा बोलू." अपाला म्हणाली.

"अपाला, माझ्या मते आपण आज आत्ताच जो निर्णय असेल तो घेऊया. कारण त्याप्रमाणे पावलं उचलणं आपल्याला सोपं जाईल असं मला वाटतं." गोविंद म्हणाला. भीमाने देखील त्यावर होकारार्थी मान हलवली.

"ठीक. तर माझ्या मनातील विचार तुम्हाला सांगते. भीमा म्हणाला ते मला देखील मान्य आहे. कदाचित भागीनेय तीक्ष्णा मला यावेळी थांबू देणार नाही. त्यासाठी ती भूतप्रमुखांशी बोलणं नक्की करेल. त्यांचा आदेश जर असेल तर मला देखील इतरांसोबत इथून वेळे आधी निघावं लागेल. पण मुळात जर आपण भागीनेय तीक्ष्णाची थोडी दिशाभूल केली तर? या दोन दिवसांमध्ये गोविंद आणि मी आमच्यामध्ये बेबनाव होईल; अशा प्रकारे आम्ही वाद निर्माण करू. त्यानंतर गोविंदने तो नगर प्रवेशास तयार आहे हे नाथाकडून महाराजांना कळवायचं. जेणेकरून राजकुमारांच्या नगर प्रवेशाची तयारी सुरू होईल. या निर्णयामुळे कदाचित महाराज भागीनेय तीक्ष्णाला नवनिर्मिती हस्तांतरण पुढे करण्यास सांगतील. यामुळे आपल्याला थोडा जास्त अवधी मिळू शकतो. पण मी ज्या तीक्ष्णाला ओळखते ती तीक्ष्णा; यागोष्टीला तयार होणार नाही. माझा आजवरचा अनुभव सांगतो की राजकुमारणांच्या नगर प्रवेशाला देखील ती या हस्तांतरणाशी जोडेल. जर असं झालं तर आपल्याला दुसरा मार्ग अवलंबायला लागेल." इतकं बोलून अपाला थांबली.

"अपाला, तुझ्या मनातला दुसरा मार्ग केवळ अवघडच नाही तर अत्यंत धोकादायक देखील आहे." भीमा थेट तिच्या डोळ्यात बघत म्हणाला.

अपाला तिच्या बसलेल्या जागेवरून उठली आणि भीमाच्या समोर जाऊन उभी राहिली. तिने त्याचे प्रचंड मोठे बाहूंना आपल्या दोन्ही हातांनी विळखा घातला आणि त्याच्या जवळ जाऊन त्याच्या डोळ्यात डोळे घालून अत्यंत भावपूर्ण आवाजात म्हणाली; "भीमा, इथेच तर तुझी परीक्षा आहे."

भीमाने अपालाचा नाजूक चेहेरा त्याच्या दोन्ही हातात धरला. क्षणभरासाठी अपालाच्या डोळ्यात पाणी उभं राहिलं. पण तिने ते डोळ्यातून ओघळू दिलं नाही. भीमा आणि अपाला काही क्षण जणूकाही या जगातच नव्हते. भीमा भानावर आला आणि तो अपाला पासून दूर झाला. अपाला देखील भानावर आली आणि तिने वळून गोविंदकडे बघितलं. गोविंद अत्यंत समजूतदारपणे दोघांच्या त्या भावस्पर्शी अबोल बोलण्याकडे बघत होता. अपालाने वळून बघताच तो तिच्याकडे बघून समंजस हसला..... मात्र दूरवर कुंजर सोबत खेळणाऱ्या नाथाला घडणारा एकूण प्रकार अत्यंत चुकीचा वाटला होता.

"मला काही कळू शकेल का अपाला?" गोविंदने हळुवारपणे प्रश्न केला.

"राजकुमार, माझी परीक्षा असेल कारण भागीनेय तीक्ष्णा तुमचा नगर प्रवेश आणि हस्तांतरण दोन्ही जर जोडू शकली तर आपण तिची दिशाभूल करण्यासाठी ठरवलेली योजना यशस्वी तर होणारच नाही; पण परिस्थिती संपूर्णपणे तिच्या हातात जाईल." भीमा म्हणाला.

"म्हणजे नक्की काय होईल भीमा?" गोविंदने विचारलं.

"नगर प्रवेशाच्या निमित्ताने ती तुम्हाला आणि नाथाला इथून दूर करेल. त्यानंतर ती भूतप्रमुखांशी बोलून अपालाचं परतण नक्की करेल आणि त्याबरहुकूम ते होतं की नाही याकडे जातीने लक्ष देईल. मी तयार केलेली तटरक्षक भिंत स्वतः तपासेल आणि मगच महाराजांना आमंत्रित करेल. तुम्ही नसल्याने आम्हाला तुमच्या बाजूने मिळणारी मदत बंद होईल. जर अपालाने इथून जाण्याचा दिवस हस्तांतरणाच्या बराच अगोदर ठरला तर तिला त्या दिवसापर्यंत लपून रहाणे अवघड होईल. यासर्व घटनांमध्ये भागीनेय तीक्ष्णाचा विश्वास संपादन करून मलाच जे करणं शक्य असेल ते करावं लागेल." भीमा म्हणाला.

"म्हणजे एकूण मार्ग आहे ..... पण त्यावर चालणे शक्य नाही; असं तुम्हाला दोघांना म्हणायचं आहे." हताश होत गोविंद म्हणाला.

"तसंच काहीसं. पण तरीही जोखीम तर उचलावीच लागेल. तुम्ही दोघे एकत्र येणं ही आता केवळ तुमची इच्छा नाही; राजकुमार तो माझा देखील आग्रह आहे. एकदा गोठवून घेतल्यानंतर आजवर आमच्यापैकी कोणीच भावनेचा विचार केलेला नाही. आम्ही हृदयशून्य तर होत नाही आहोत न... असा विचार अलीकडे मला सतत सतवायचा. विशेषतः अपालाकडे बघितलं की तर फारच." इतकं बोलून भीमा थांबला आणि त्याने अतीव प्रेमाने अपालाकडे बघितलं. तो पुढे बोलायला लागला; "राजकुमार, तुम्हाला खरी अपाला अजूनही कळलेलीच नाही. पण तिला स्वतःला देखील ती किती ओळखते हा माझ्या मनातला कायमचा प्रश्न आहे. असो! पण आज जेव्हा मी तिला तुमच्या सोबत बघतो; त्यावेळी तिच्या चेहेऱ्यावरचं समाधान आणि पूर्णत्व किती मोलाचं आहे ते मला जाणवतं. तिच्याकडे बघितलं की वाटतं गोठवून घेण्यापेक्षा हे असं भावनिक असणं सुंदर असावं. त्यामूळे तिच्यासाठी मी कोणतीही किंमत मोजायला तयार आहे."

गोविंद उठला आणि भिमाजवळ गेला. "भीमा, मला तुमच्यातले बंध कळणं अशक्य आहे; पण ती भावना मी समजू शकतो. मला त्यातील पवित्रता समजते आहे. त्यामुळे माझ्या मनात कोणतीही शंका नाही. खरंच! इतकं निर्व्याज आणि पूर्णाहुती देऊन एखाद्या व्यक्तीविषयी ममत्व मी आजवर बघितलं नाही. बर, पण आता मी जे बोलतो आहे ते फक्त आपल्या तिघांमध्ये असलेलं बरं... यापुढे आपण तिघे निवांत गप्पा मारतो आहोत असं एकदाही होणं योग्य नाही... असं उठून तुमच्या जवळ येण्याचं हे देखील महत्वाचं कारण आहे." असं म्हणून त्याने भीमाला मिठी मारली. भीमाने देखील गोविंदला आलिंगन दिलं.

दुर्दैवाने त्यावेळी नाथा तिथून निघून गेला होता. त्याच्या डोळ्यासमोर अपाला आणि भीमा हे भावनिक बांधनाने जवळ आले होते आणि राजकुमार ते पाहात होते... हेच सत्य तो समजत होता.

...... आणि तीक्ष्णाची तीक्ष्ण नजर होणाऱ्या प्रकाराचा वेध घेत होती.

***

दुसऱ्या दिवशी कुंजर आणि गोविंद खेळत असताना अपाला त्याच्या दिशेने आली आणि कुंजरचा हात धरून त्याला तिथून घेऊन जाताना म्हणाली; "राजकुमार, कुंजरमध्ये माझ्या रक्ताचे जे गुण आहेत त्याविषयी मला भूतप्रमुखांशी बोलायचं आहे. त्यासाठी कुंजरला घेऊन मी दोन दिवसांसाठी इथून जाते आहे. तरी आपण याविषयी मला फार प्रश्न विचारू नका."

"पण अपाला...." गोविंदने काहीतरी बोलायचा प्रयत्न केला. पण अपाला काहीएक न ऐकता कुंजरला घेऊन तिथून निघून गेली.

दूरवर उभी राहून तीक्ष्णा होणारा प्रकार बघत होती. ती केवळ हसली आणि तिथून निघून गेली.

***

"भीमा, तुझी तयारी कितपत झाली आहे?" तीक्ष्णाने भीमाला बोलावून घेऊन प्रश्न केला.

"भागीनेय, तुम्ही सांगितल्या दिवसापासूनच मी कामाला सुरवात केली आहे. आपण मला जर योग्य दिवस संगीतलात तर त्याप्रमाणे मी माझ्या कामाचा वेग वाढविन." तीक्ष्णाने विचारलेल्या प्रश्नाला बगल देत भीमा म्हणाला.

"ठीक... मग पुढील माहातील पौर्णिमा नक्की. मी आज महाराजांसोबत बोलणं करण्यास जाणार आहे. त्यावेळी मी त्यांना हा दिवस योग्य वाटतो का ते विचारते." तीक्ष्णा म्हणाली.

"योग्य निर्णय भागीनेय तीक्ष्णा." भीमा म्हणाला आणि तिथून निघाला.

***

"महाराज, आपल्या अंत:पुरात येऊन आपणाला त्रास देण्याचा माझा उद्देश नाही.... परंतु...." तीक्ष्णा महाराजांच्या अंत:पुरात महाराजांच्या पुढ्यात उभी होती.

"आपण इथे?" महाराज काहीच बोलू शकले नाहीत.

"होय! माफ करा. मात्र एक महत्वाचा निर्णय झालेला आहे तो आपणापर्यंत आज आणि आत्ताच पोहोचवणे योग्य वाटले म्हणून कोणतीही पूर्व कल्पना न देता मी इथे आपल्या अंत:पुरात येण्याची दृष्टता केली आहे." तीक्ष्णा म्हणाली.

"इतर कोणीही अशी दृष्टता केली असती तर...." महाराज नाराज झाले होते आणि त्यांच्या चेहेऱ्यावर ते अगदी स्पष्ट दिसत होतं.

"मला माफ करा महाराज." तीक्ष्णाचा आवाज कमालीचा अपराधी येत होता. केवळ त्या आवाजातील लीनतेमुळे महाराजांचं मन पांघळलं आणि काहीसं मंद स्मित करत ते म्हणाले; "आपल्या कोणत्याही कृतीबद्दल आमची हरकत नाही. कारण आम्हाला खात्री आहे की राज्यासाठी आणि श्रीशंभो मंदिरासाठी योग्य अशीच आपल्या हातून घडेल.

"नक्कीच महाराज. मी आपणास एक अत्यंत महत्वाचा आणि आनंददायी निर्णय सांगण्यासाठी आले आहे." तीक्ष्णा हसत म्हणाली. "महाराज, पुढील मासातील पौर्णिमेच्या दिवशी संध्यासमयी श्रीशंभो मंदिर आणि परिसरातील संपूर्ण नवनिर्मिती आपल्या शुभ आणि सुयोग्य हाती सुपुर्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे."

तीक्ष्णाच्या त्या शब्दांनी महाराज मंचकावरून एकदम उठून उभे राहिले. त्यांचा आनंद गगनात मावत नव्हता.

"खरंच? ही बातमी आपण देत असताना आपला योग्य तो सन्मान मी करू शकत नाही यासारखी दुःखदायक गोष्ट नाही." महाराज म्हणाले.

"आपण आम्हाला श्रीमंदिर रचनेसाठी परवानगी दिलीत महाराज; याहून मोठा सन्मान असूच शकत नाही आमच्यासाठी. त्यामुळे आपण अजिबात दुःख करू नका. बरं मी येते आता. आपण आराम करावा आणि त्यासुदिनाची तयारी करण्यास प्रारंभ करावात ही विनंती." असं म्हणून तीक्ष्णा मागे वळली. मात्र दोन पावलं पुढे जाऊन परत एकदा महाराजांच्या दिशेने बघत ती म्हणाली; "महाराज, मला खात्री आहे की राजकुमार देखील नगर प्रवेशासाठी तयार होतील... अगदी काही दिवसांमध्ये तुमच्यापर्यंत ही बातमी येईल; याविषयी मला खात्री आहे. त्यामुळे तुम्ही त्या तयारीला देखील लागावंत असा सल्ला मी तुम्हाला देईन. मात्र मी तुम्हाला ही बातमी दिली हे कोणालाही कळू देऊ नका. काही गुपितं ही तुमच्या सोबत केवळ असणं राज्यासाठी योग्य ठरेल असं मला वाटतं." इतकं बोलून तीक्ष्णा झपकन तिथून बाहेर पडली.

तीक्ष्णाच्या दुसऱ्या बातमीने तर महाराजांचा आनंद गगनात मावणं अशक्य झालं. त्यानंतर पहाट होण्याची केवळ वाट बघणं महाराजांच्या हाती होतं.

***

पहाटेच्या पहिल्याच प्रहरी महाराजांच्या अंत:पुरातून आलेल्या निरोपामुळे सुमंत कल्याण गोंधळून गेले होते.

क्रमशः

Friday, May 13, 2022

अनाहत सत्य (भाग 24)

 अनाहत सत्य

भाग 24

"राजकुमार, तुमचा नाथावर किती विश्वास आहे?" चांदण्याने नाहून निघालेल्या त्या टेकडीच्या टोकावर गोविंदच्या मिठीत बसलेल्या अपालाने त्याला प्रश्न केला.

"हा काय प्रश्न आहे अपाला?" अचानक असा प्रश्न अपालाने केल्याने गोविंद गोंधळून गेला.

"राजकुमार, केवळ मीच नाही तर भीमाने देखील अनेकदा त्याला चोरून ऐकताना बघितलं आहे." अपाला म्हणाली.

"अपाला, नाथाचा जीव आहे आपल्यावर. कुंजर तर त्याचा प्राण आहे... पण तो देखील बांधला गेला आहे ग. त्याचे जवळचे सगळेच नगरात राहातात. सुमंत कल्याण यांच्या छत्रछायेखाली. अपाला तुला कदाचित माहीत नाही पण नाथा मूलतः सुमंतांच्या सांगण्यावरून इथे आला आहे. तो त्यांना उत्तरदायी आहे. त्यांनी सांगितलेलं काम जर त्याच्या हातून झालं नाही तर कदाचित त्याचा परिणाम त्याच्या जवळच्या लोकांवर होईल; ही भिती नाथाच्या मनात असणं स्वाभाविक आहे." गोविंद शांतपणे बोलत होता. मात्र त्याने सांगितलेली माहिती ऐकून अपाला एकदम ताठ बसली.

"राजकुमार, नाथ इथे सुमंतांच्या सांगण्यावरून आला आहे? याचा अर्थ त्याच्या मनातले भाव प्रामाणिक नाहीत. तुम्हाला हे सत्य माहीत असूनही तुम्ही त्याला जवळ केलं आहात. असं का?" अपालाने गोविंदला एका मागून एक प्रश्न विचारायला सुरवात केली.

गोविंद हसला आणि म्हणाला; "मी त्याला जवळ केलं कारण तो प्रामाणिक आहे अपाला. तुला काय वाटतं; त्याने न सांगताच मला सगळं कळलं असेल? नाही ग. नाथाने स्वतः मला त्याचा इथे येण्याचा उद्देश सांगितला. त्याने मला अनेकदा विनंती केली आहे की मी तुझ्या शिवाय एकदा नगर प्रवेश करावा. तुमचं काम पूर्ण होईपर्यंत तू नक्की इथे आहेस. त्यामुळे महाराजांच्या आणि सुमंतांच्या मनाप्रमाणे एकदा माझा नगर प्रवेश आणि महाराजांचा उत्तराधिकारी अशी माझी घोषणा झाली की त्यानंतर देखील मी तुला रीतसर मागणी घालून माझी पत्नी म्हणून घेऊन जाऊ शकतो."

"मान्य आहे हे सगळं. पण आता तर तुला माझं सत्य कळलं आहे. मग अजूनही तुझं मत नाथाप्रमाणे आहे का?" अपालाने प्रश्न केला.

"अपाला, सुरवातीला मी इथे आलो ते महाराजांच्या सांगण्यावरून. तुझ्या भागीनेय तीक्ष्णाने स्वतः ही इच्छा व्यक्त केली होती महाराजांकडे. कदाचित असं असू शकतं की माझा उपयोग करून तुमचं एखादं काम पूर्ण करून घ्यायचं असेल. करण मला आठवतं, सुरवातीला तीक्ष्णा माझ्याशी खूपच मोकळेपणी बोलायची. आपली ओळख झाली, ती वाढली आणि आपण जवळ आलो; तरीही तिची कुठेच हरकत नव्हती. तिने ते मला अनेकदा स्पष्टपणे सांगितलं देखील होतं. पण मग हळूहळू सगळं बदलायला लागलं. अपाला, सुरवातीला तुझं माझ्याकडे आकृष्ट होणं हे केवळ वरवरचं होतं. भावनिक गुंतवणूक नव्हती तुझ्या मनात. पण मग आपण मनाने जोडले जायला लागलो. म्हणजे मी तुझ्यामध्ये गुंतलोच होतो; पण तू देखील हळूहळू माझ्या जवळ यायला लागलीस. हे जेव्हा तीक्ष्णाला लक्षात आलं त्यावेळी ती थोडी सजग झाली. पण तिने आपल्याला दूर करण्याचा निर्णय घेऊन त्यावर काही कृती करावी याआगोदरच तू गर्भवती राहिलीस. तू पहिल्या क्षणापासूनच तो गर्भ ठेवण्याच्या निर्णयाबाबत ठाम होतीस. मात्र तुझा हाच निर्णय तीक्ष्णाला अमान्य होता. कुंजरमुळे तू माझ्यामध्ये पूर्णपणे अडकशील; हे लक्षात आलं आणि तीक्ष्णाने आपल्याला दोघांना दूर करण्याचा प्रयत्न केला. तिच्या प्रत्येक प्रयत्नाला तू मोडून काढलंस; आणि हे लक्षात आल्यानंतर मात्र माझं इथे असणं तिला नकोसं व्हायला लागलं. पण तोपर्यंत ती स्वतःच्याच निर्णयांच्या जाळ्यामध्ये अडकली होती. माझं असणं तिला इतकं खटकत होतं तर महाराजांशी बोलून ती मला परत नगरात जायला भाग पाडू शकत होती... पण तरीही ती ते करत नव्हती. सुरवातीला मला तिच्या या वागण्याचं कारण कळत नव्हतं. पण आता तो उलगडा होतो आहे."

"काय उलगडा राजकुमार?" नकळून अपालाने विचारलं.

"अग अपाला, मी इथे यावं हा तीक्ष्णाचा नव्हता. तो नक्कीच तुमच्या प्रमुखांचा होता. त्यामुळेच तुझं माझ्यात गुंतण तिला दिसत असूनही आणि ते पटत नसूनही ती काही करू शकत नव्हती. आता तुझं आणि तुझ्या सोबत असणाऱ्या या सर्वांचं सत्य समजल्या नंतर आपण काय करावं या द्विधा मनःस्थितीमध्ये आहे अपाला." गोविंद हसत म्हणाला.

"हम्म... खरंय राजकुमार." अपाला तिच्या विचारांच्या तंद्रीमध्ये होती. "मी तुमच्यामध्ये गुंतत होते हे जितकं खरं आहे; तितकंच हे देखील खरं आहे की माझं माझ्या कामावर प्रेम आहे. त्याहुनही जास्त मला माझ्या जवाबदरीची जाणीव आहे. मी माझ्या अस्तित्वाचं सत्य क्षणभरासाठी देखील विसरले नाही. त्यामुळे माझं गोठवून घेतलेलं आयुष्य, तुमच्यात गुंतलेलं माझं मन, कुंजरचं आपल्या आयुष्याला जोडणं आणि माझ्यावर असणारी जवाबदारी याचं भान ठेवूनच मी जगते आहे. मात्र दुर्दैवाने भागीनेय तीक्ष्णाला ते दिसत नाहीय. तिला केवळ हेच वाटतं आहे की मी माझं काम पूर्ण करून तुमच्या सोबत नगर प्रवेश करणार आहे. मात्र मी अजूनही असा कोणताही निर्णय घेतलेला नाही." अपाला म्हणाली. ती अजूनही स्वतःच्याच तंद्रीमध्ये होती. त्यामुळे तिच्या शेवटच्या वाक्याचा गोविंदवर झालेला परिणाम तिच्या लक्षात आला नाही.

"अपाला, तू अजूनही निर्णय घेतलेला नाहीस? काय आहे तुझ्या मनात? अग, मी प्रत्येक वेळी विचार करताना तो दोघांच्या दृष्टीने योग्य झाला पाहिजे असं समजतो. मात्र तुझ्या बोलण्यातून तू कोणता निर्णय घेते आहेस किंवा नाही यामध्ये माझा विचार तू करते आहेस की नाही ते मला कळतच नाही. " गोविंद अपाला जवळ सरकत म्हणाला.

अपालाच्या लक्षात आलं की तिने हे बोलून चूक केली आहे. गोविंद अत्यंत हळवा आणि भावनिक आहे; त्यात याक्षणी तर तो तर्कशुद्ध विचार करण्याच्या मनस्थितीत देखील नाही. ती गोविंदच्या दिशेने वळली आणि म्हणाली; "गोविंद, माझ्या मनाची दोलायमानता समजून घे. अरे, एकवेळ मी माझ्यावर असणारी जवाबदारी पूर्ण करून नंतर कायम तुझ्या सोबत राहण्याचा निर्णय घेईनही. पण मी आज आत्ता जशी दिसते आहे न तशीच कायम दिसणार आहे. कारण माझं आयुष्यच गोठून गेलं आहे या वयामध्ये. त्यामुळे अजून काही वर्षांनी तुझं वय होईल, कुंजर मोठा होईल तेव्हाच देखील मी आहे अशीच राहणार आहे. त्यावेळी आपल्याला सगळ्यांनाच अशा परिस्थितीत जगणं मुश्कील होऊन जाईल. तुझ्या चिरतरुण पत्नीबद्दल जर प्रश्न निर्माण झाले तर त्याचं उत्तर तू काय देणार आहेस? गोविंद, अरे आजचा मानव अजून इतका प्रगत नाही झालेला की हे असं रूप तो स्वीकारू शकतो. मग कदाचित माझ्या अस्तित्वावर आरोप होतील. गोविंद, तुझं आयुष्य मग केवळ माझा बचाव आणि सांभाळ करण्यात जाईल. म्हणजेच तू तुझ्या जवाबदरीपासून दूर राहाशील. ते मला मान्य नाही. म्हणूनच तुझ्या आणि माझ्या दोघांच्या हिताचा विचार करूनच आपल्याला निर्णय घ्यायला हवा."

गोविंदने काही क्षण विचार केला आणि म्हणाला; "अपाला, खरंच तुझं सत्य जोपर्यंत मला माहीत नव्हतं, तोपर्यंत तू तुझं काम संपवून माझ्या सोबत नगर प्रवेश करशील असंच मला वाटत होतं. कदाचित तीक्ष्णा याला विरोध करेल; पण तू आणि मी दोघे मिळून तिला समजावू असं मला वाटत होतं. हे सगळंच माझ्यासाठी इतकं सोपं होतं. पण आता तुझं सत्य समजल्यापासून सगळंच बदलून गेलं आहे. अर्थात तरीही तुझ्या शिवाय आणि कुंजरपासून दूर मी जगूच शकणार नाही; हे देखील सुर्यप्रकाशा इतकं स्पष्ट सत्य आहे." गोविंदचं ते बोलणं ऐकून अपाला काहीशी अस्वस्थ झाली.

तिचं अस्वस्थ होणं लक्षात येऊन गोविंद पुढे म्हणाला; "अपाला, मी स्वतःला ओळखून आहे ग. मी राजकुमार आहे; माझ्यावर राज्याची खूप मोठी जवाबदारी आहे. त्यात महाराज माझ्यावर राज्यकारभार सोडून उत्तरेकडील राज्यांच्या सुव्यवस्था करण्यासाठी प्रयाण करण्याचा विचार करत आहेत; हे देखील मला कळलं आहे. पण तरीही एक सांगू का? मला तुझ्यापासून आणि कुंजरपासून दूर राहाणं शक्य नाही. मी तुझ्याशिवाय जगलो तर केवळ एक मर्त्य असेन... तुझ्या सोबत जगलो तरच मी एक जवाबदारीपूर्ण मनुष्य असेन. हेच माझं सत्य आहे."

त्याचं बोलणं ऐकून अपाला निःशब्द झाली. तिने मान खाली घातली आणि ती विचारात गढून गेली.

"अपाला...." थोडा वेळ गेल्यावर अस्वस्थ होत गोविंदने तिला हाक मारली.

"गोविंद, याचा अर्थ एकच होतो; एकतर तू तुझं जग सोडून आमच्या जगामध्ये प्रवेश करावास; किंवा मी आमच्या भूतप्रमुखांकडून परवानगी घेऊन तुझ्या सोबत नगर प्रवेश करावा. कोणत्याही परिस्थितीत आपल्यापैकी एकाला स्वतःच्या अस्तित्वाचा त्याग करावा लागणार आहे." अपालाने मान वर करत म्हंटलं.

तिचं म्हणणं अत्यंत खरं होतं. गोविंदला ते पूर्ण पटलं. तो म्हणाला; "अपाला, जर मी तुझ्या सोबत तुझ्या जगामध्ये येण्यास योग्य असलो तर मी याक्षणी देखील तुझ्या सोबत येण्यास तयार आहे."

त्याचं बोलणं ऐकून अपाला हसली. पण तिच्या हास्य केविलवण वाटलं गोविंदला. त्याने पुढे होत तिचा हात हातात घेतला आणि म्हणाला; "अपाला.... तुझं हास्य मोकळं नाही. काय आहे तुझ्या मनात?"

त्याच्याकडे एकटक बघत अपाला म्हणाली; "गोविंद, तू आमच्या जगामध्ये येण्यास योग्य नाहीस. तू अति भावनिक आहेस. तू तर्कनिष्ठ निर्णय घेऊच शकत नाहीस. दुर्दैवाने अशी व्यक्ती आमच्या जगामध्ये स्वीकारली जाणारच नाही."

"अपाला.... मग तू चल माझ्या सोबत. तुझं चिरतरुण असणं मी सांभाळीन. मी तुझ्या समोर ढाल म्हणून उभा राहीन... आणि माझ्या नंतर कुंजर! तू मुळीच काळजी करू नकोस." गोविंद म्हणाला.

"गोविंद, मला कोणत्याही ढालीची गरज नाही; हे आतापर्यंत तुला कळायला हवं होतं. असो!" असं म्हणून अपाला शांत झाली. ती खूप काहीतरी विचार करत होती; आणि मग गोविंदकडे वळली आणि अत्यंत गंभीर आवाजात म्हणाली; "गोविंद, निर्णय अवघड आहे. पण आवश्यक आहे. मला वाटतं मी तुझ्या सोबत असणं.... तुझ्या जगामध्ये.... हेच जास्त संयुक्तिक वाटतं आहे."

अपाला असं म्हणाली आणि गोविंदने हर्षाने तिला मिठीमध्ये घेतलं.

***

अपाला, भीमा, गोविंद आणि नाथा ओढ्याच्या काठावर बसले होते.

"अपाला, तुला खरंच हे सगळं सोपं वाटतं आहे का?" भीमाने पुन्हा एकदा अपालाकडे बघत प्रश्न केला.

"सोपं तर काहीच नाही भीमा. अगोदर आपण हे ठरवू की योग्य आणि अयोग्य काय आहे. मग सोपं आणि अवघड याचा विचार करूया." अपाला शांत आवाजात म्हणाली.

"अपाला, योग्य हेच आहे की तू राजकुमार गोविंद यांच्या सोबत नगर प्रवेश करावास. सुमंत कल्याण यांचा तुझ्या राजकुमार गोविंद यांच्या सोबत असण्यावर आक्षेप नाही; तू त्यांना इथे अडकवून ठेवलं आहेस असं त्यांना वाटतं; म्हणून ते तुझ्यावर नाराज आहेत. त्यामुळे जर तू राजकुमार गोविंद यांच्या सोबत नगर प्रवेश करण्याचा निर्णय घेतलास तर ते तुझं स्वागतच करतील." अत्यंत आनंदाने नाथा म्हणाला.

त्याच्या खांद्यावर प्रेमाने थोपटत गोविंद म्हणाला; "नाथा, मी तुझ्या भावना समजू शकतो. परंतु तुला माहीत नसलेली अशी काही सत्य आहेत. त्यामुळे केवळ निर्णय घेतला आणि त्याप्रमाणे पावलं उचलली असं आणि इतकं ते सोपं नाही."

"असं काय आहे राजकुमार की त्याविषयी आपण तोडगा काढू शकणार नाही? राजकुमार, आपली राजसत्ता ही सर्वात सबळ आणि अनेक वर्ष राज्यकारभार बघणारी आहे. आपल्याला अशक्य काय आहे?" नाथा म्हणाला.


"नाथा, सगळंच बळाचा वापर करून मिळवता येत नाही." अत्यंत गंभीर आवाजात भीमा म्हणाला.

"भीमा, हे तू बोलतो आहेस या कल्पनेने देखील मला हसू येतं आहे. एकदा स्वतःच्या नावाप्रमाणे असलेल्या शरीरयष्टीकडे बघ आणि परत एकदा तेच वाक्य बोल बघू." नाथा हसत म्हणाला आणि सगळेच मोकळेपणी हसले.

"किती दिवसांनी आपण सगळे मोकळेपणी हसलो आहोत." गोविंद प्रसन्नपणे म्हणाला.

"गोविंद, अपाला कालच माझं आणि भागीनेय तीक्ष्णाचं बोलणं झालं आहे. तिने मला स्पष्ट विचारलं की या नवनिर्मित वास्तूला राक्षकभिंत उभी करण्यासाठी मला किती वेळ लागेल. मी तिला कल्पना दिली आहे की मला किमान पंधरा दिवस लागतील. मी तट संरक्षण भिंत निर्मितीचं काम सुरू करावं याबद्दल स्पष्ट शब्दात सांगितलं आहे." भीमा म्हणाला.

"मान्य आहे की इथल्या संपूर्ण कामाची जवाबदारी तिच्यावर आहे. पण तरीही कोणताही निर्णय घेण्याच्या अगोदर तिने माझ्याशी किमान बोलणं करायला हवं होतं." दुखावलेल्या आवाजात अपाला म्हणाली.

"अपाला, मला वाटतं राजकुमारांसोबत सतत राहिल्याने तू देखील भावनिकतेला जास्त महत्व द्यायला लागली आहेस. हे विसरू नकोस की तुझा कोणताही निर्णय तर्कशुद्ध असला पाहिजे." भीमा म्हणाला.

"भीमा, आपण हृदयशून्य नाही आहोत. अति भावनिकतेमुळे मानवीय आयुष्याचं नुकसान होऊ शकत हे आपल्याला माहीत असल्याने आपण प्रयत्नपूर्वक ठरवून भावनांपासून दूर गेलो आहोत. मात्र याचा अर्थ आपण परत एकदा भावनिकतेचा विचार करायचाच नाही असा होत नाही." अपाला म्हणाली.

"भावनिकतेपासून दूर जाणं म्हणजे नक्की काय अपाला?" नाथाने प्रश्न केला. अपाला हे विसरून गेली होती की नाथाला तिचं आणि भिमाचं सत्य माहीत नाही. मात्र ते लक्षात येताच ती सावध झाली आणि म्हणाली; "नाथा, हा विषय खूप गहिरा आहे. याक्षणी हा विचार करणं जास्त महत्वाचं आहे की मी नगर प्रवेश करण्याचा निर्णय घेतला तर तो भागीनेय तीक्ष्णा कशा प्रकारे स्वीकारेल."

नाथाच्या लक्षात आलं की अपालाने विषयाला बगल दिली आहे. परंतु त्याच्या मनात आलं की शेवटी तो एक सेवक आहे. त्यामुळे कदाचीत काही सत्य ती लपवते आहे. त्यामूळे तो काहीच बोलला नाही. इतक्यात तिथे कुंजर आला आणि त्याने नाथाचा हात धरून त्याला खेळण्यासाठी बोलावलं. ही संधी घेऊन नाथा तिथून उठला आणि कुंजर सोबत जात म्हणाला; "मी कुंजरला घेऊन जातो. म्हणजे तुम्ही नीट बोलू शकाल." जाता जाता त्याने गोविंदकडे बघितलं आणि म्हणाला; "राजकुमार कोणी माझ्यावर विश्वास ठेवो किंवा न ठेवो; मी तुम्हाला मनापासून सांगतो... तुमच्या सगळ्याच निर्णयांमध्ये मी तुमच्या सोबत आहे." इतकं बोलून नाथा कुंजर सोबत तिथून निघाला.

तो गेल्या त्यादिशेने बघत गोविंद म्हणाला; "आपण त्याच्यापासून काहीतरी लपवतो आहोत; कारण तो सेवक आहे.. असा त्याचा समज झालेला दिसतो आहे."

"असं असू शकतं राजकुमार. पण आत्ता अपाला आणि तुम्ही मिळून तुमच्या आयुष्याच्या दृष्टीने कोणता निर्णय घेता आहात हा प्रश्न जास्त गहन आणि मोठा आहे. आपण नाथाचा समज किंवा गैरसमज नंतर देखील दूर करू शकतो. त्यामुळे आपण आत्ताच योग्य तो निर्णय घेण्याच्या दृष्टीने चर्चा करूया." भीमा म्हणाला.

"भीमा, मला वाटतं भागीनेय तीक्ष्णाने इथून आपल्या परतागमनाचा दिवस नक्की केला आहे. त्यामुळेच कदाचित तिने तुला रक्षक भिंत निर्माण करण्यासंदर्भात सांगितलं असावं." अपाला म्हणाली.

"खरं आहे तुझं म्हणणं. अपाला, मी तीक्ष्णाला ओळखतो. ती असाच दिवस निवडेल जो आजच्या जनजीवनात अत्यंत महत्वाचा असेल आणि त्याचवेळी तो आपल्या परतीच्या दृष्टीने देखील योग्य असेल." भीमा म्हणाला.

"मला वाटतं ती पौर्णिमेच्या दिवसाचा विचार करेल. तशी पौर्णिमा नुकतीच होऊन गेली आहे. म्हणजे अजून एक माह आहे पुढील पौर्णिमेला." अपाला म्हणाली.

विचार करत भीमा देखील म्हणाला; "तुझा अंदाज अचूक आहे अपाला. पुढील माह म्हणजे पर्जन्यकाल सुरू झालेला असेल. जर त्यादिवशी पर्जन्य असेल तर आपल्या सर्वांना इथून हलवणे सोपे जाईल. महाराजांच्या हाती ही नवीन निर्मिती सोपवणे देखील सोयीचे होईल; आणि या एका माह काळात मला देखील माझं काम पूर्ण करणं शक्य होईल."

त्यादोघांची चर्चा गोविंद ऐकत होता. त्याने भीमाला विचारलं; "तू तट रक्षक भिंत उभी करणार म्हणजे नक्की काय भीमा?"

अपाला आणि भीमाने एकदा एकमेकांकडे बघितलं. अपालाने त्याला खुण केली की गोविंद पासून काहीही लपवणे योग्य नाही. भीमाला देखील मनातून ते मान्य होतं. तो गोविंदला म्हणाला; "राजकुमार, हे समजून घेणं थोडं अवघड जाणार आहे तुम्हाला. तरी देखील मी प्रयत्न करतो. तुमच्या राज्यावर कोणतेही संकट नाही आहे. तरीही तुमच्या राजधानीच्या तटावर सतत सैनिक तैनात असतात. तसेच मी देखील या निर्मितीच्या संरक्षणासाठी इथे सैनिक तैनात करणार आहे. मात्र तुमचे सैनिक आपल्या मर्त्य डोळ्यांना दिसतात; माझे सैन्य कधीच कोणालाही दिसणार नाही. कारण ते मनुष्य नसून एक अशी शक्ती आहे की जी शक्ती या निर्मितीला हानी पोहोचू देणार नाही.... आज नाही आणि पुढील भविष्यात देखील नाही."

त्याचं बोलणं ऐकून गोविंद विचारात पडला. "भीमा, तुमचं सगळंच वेगळं आहे हे आतापर्यंत मला समजलं आहे. त्यामुळे मी तुझ्या कामा संदर्भातील माहिती जाणून घेण्यापेक्षा माझ्या आणि अपालाच्या एकत्र येण्यासाठी तू काय मदत करू शकशील हे समजून घेऊ इच्छितो." बराच विचार करून गोविंद म्हणाला.

"राजकुमार, माझ्या या तट रक्षक भिंतीमधून जसं कोणी या निर्मितीला हानी पोहोचवू शकत नाही; त्याचप्रमाणे एकदा हा तट तयार झाला की आमच्यापैकी कोणीही या तटाच्या बाहेर पडू शकत नाही." अचानक भीमा म्हणाला आणि भिमाचं बोलणं ऐकून गोविंद एकदम स्थब्द झाला.

क्रमशः

Friday, May 6, 2022

अनाहत सत्य (भाग 23)

 अनाहत सत्य

भाग 23

"सुमंत कल्याण, काहीतरी घडतं आहे तिथे." नाथाच्या आवाजात काळजी होती. त्याचा परिणाम सुमंतांच्या चेहेऱ्यावर स्पष्ट दिसत होता.

"काहीतरी म्हणजे काय नाथ? थोडं स्पष्ट सांगशील का?" सुमंत कल्याण यांनी थोड्या करड्या आवाजात प्रश्न केला.

"मलाही नक्की काय ते माहीत नाही. पण भीमा आणि राजकुमार यांचं बोलणं मी ऐकलं. थोडा दूर होतो त्यामुळे पूर्ण कळलं नाही; पण राजकुमारांच्या मनात अपालाला घेऊनच तिथून निघायचं आहे. बहुतेक तीक्ष्णाचा याला विरोध आहे. भीमा राजकुमारांना मदत करायला तयार आहे. हे सगळं घडणार आहे ते नजीकच्या काळात. कारण श्रीशिव मंदिराचं काम पूर्ण होत आलं आहे." नाथाने माहिती दिली.

सुमंत विचारात पडले. 'जर काम पूर्ण होत आलं आहे तर याची कल्पना महाराजांना नक्की असणार. कदाचित म्हणूनच तीक्ष्णा महाराजांना भेटून गेली असावी. राजकुमारांना जर याची कल्पना असेल तर ते नक्कीच अपालाला सोबत घेऊनच तिथून बाहेर पडतील. अर्थात एकदा काम पूर्ण झाल्यानंतर जर अपालाने राजकुमारांसोबत रहाण्याचा निर्णय घेतला तर तीक्ष्णाची हरकत का असावी? अपाला स्वतःचे निर्णय घेण्याइतकी सक्षम नक्कीच आहे. तीक्ष्णा आणि तिच्या सोबत आलेले सर्वच लोक बरेच वेगळे आहेत आणि कदाचित ते कायमच एकत्र प्रवास करणारे कारागीर असतील देखील; पण तरीही जर त्यांच्यामधील एखाद्या व्यक्तीने स्वतःचा असा काही निर्णय घेतला तर तो इतर कोणी अमान्य का करावा? याचा अर्थ असा तर नव्हे की ते ज्या सामाजिक व्यवस्थेत राहातात तिथले नियम वेगळे आहेत. जर तसं असेल तर मग शोध घेणं आवश्यक आहे.'

सुमंत कल्याण नाथाकडे बघत म्हणाले; "नाथा आता यापुढे तू राजकुमारांची सावली बनून राहा. मी तुझ्या सोबत अजून एकजण जोडतो. म्हणजे तुला नगरापर्यंत येण्याची गरज उरणार नाही. त्याच्या सोबत तू निरोप पाठवत जा."

"सुमंत, मला खरंच सोबतीची गरज नाही. मी सर्व काळजी घेईन आणि आपल्यापर्यंत सर्व माहिती योग्य वेळी पोहोचवत जाईन." नाथा म्हणाला.

सुमंत कल्याण यांनी नाथाकडे अत्यंत धारदार नजरेने बघितलं. ते काही क्षण काहीच बोलले नाहीत. पण मग जेव्हा ते बोलले त्यावेळी त्यांचा आवाज अत्यंत हळू होता पण त्यांच्या आवाजातील धारेने नाथाचं मन चरकलं. ते म्हणाल; "नाथा, मी तुला विचारत नाही आहे; सांगतो आहे. तुझ्या सोबत एक व्यक्ती यापुढे राहणार आहे. मी तुला मागे एकदा देखील सांगितलं आहे. राजकुमारांचा मित्र असल्याची तुला फक्त बतावणी करायची आहे. याचा अर्थ तू खरा मित्र नाही होत त्यांचा. त्यामुळे मी जे आणि जसं सांगेन तसंच ते घडलं पाहिजे." नाथाने मान खाली घालून समजल्याची मान हलवली आणि तो तिथून मागील पावली निघाला.

***

राजकुमार गोविंद अपालाला शोधत होता. बराच वेळ शोधल्यानंतर त्याला अपाला आणि कुंजर एकत्र एका झऱ्याच्या काठावर खेळताना दिसले. त्यांना हसताना बघून गोविंदच्या डोळ्यात पाणी आलं. त्यांच्या जवळ जात तो देखील त्यांच्या सोबत खेळण्यात रमला. खेळता खेळता कुंजरने गोविंदला प्रश्न केला; "तात, आता आपण इथून जाण्याचा काळ जवळ येतो आहे असं मला भागीनेय अपाला म्हणाली. ते जर खरं आहे तर तुम्ही तुमच्या तातांना सोडून येणार का? मग त्यांना तुमची आठवण आली की ते काय करतील? त्यांनी नाही म्हंटलं तर मग? मग इथून गेल्यावर मला तुमची आठवण येईल... तेव्हा मी काय करायचं?" कुंजरचे प्रश्न संपत नव्हते आणि हाताने पाणी उडवणं थांबत नव्हतं. मात्र त्याच्या त्या प्रश्नांनी गोविंदला मोठा धक्का बसला. त्याने अपालाकडे वळून बघितलं. आज मुद्दाम कुंजर सोबत खेळण्यासाठी वेळ काढून अपालाने गप्पांमधून त्याला कल्पना द्यायला सुरवात केली होती की आता आपण इथून निघणार आहोत. आपण हे सर्व गोविंद सोबत देखील बोलून घेतलं पाहिजे याची तिला कल्पना होती. त्यामुळे ती आज त्याच्याकडे देखील विषय काढणार होती. मात्र कुंजरने अचानक प्रश्न विचारून गोविंद आणि अपाला या दोघांनाही धर्मसंकटात टाकलं होतं.

"अपाला...." गोविंद अपाला समोर जाऊन उभा राहिला.

"राजकुमार यावर आपण बोलू.... बोललंच पाहिजे.... पण आत्ता इथे नको. कुठे आणि कधी याबद्दल मी नक्की सांगेन. पण तोपर्यंत याविषयी कोणाशीही बोलू नका. अगदी भिमाशी देखील." अपाला म्हणाली आणि अचानक उठून निघून गेली. गोविंद ती गेली त्या दिशेने बघत राहिला.

***

"भीमा, माझं काम संपत आलं आहे. मुळात माझी संकल्पना जरी तीक्ष्णाला अमान्य असली तरी भूतप्रमुखांना मान्य आहे. विशेषतः धराभूतप्रमुख आणि वायूभूतप्रमुख यांनी तर संपूर्ण कल्पना उचलून धरली आहे. मात्र तरीही..." अपाला पुढे काही सांगणार होती इतक्यात भीमाने तिला अडवलं आणि विचारलं; "तू नक्की कोणत्या संकल्पनेबद्दल बोलते आहेस अपाला? मला माहीत आहे की वायुविजन या एकाच कामासाठी तुझी नेमणूक झाली होती. हे देखील माहीत आहे की मंदिराचे बांधकाम होत असताना तुझ्या हाताखाली देखील काही विशेष कामकरी होते; जे संपूर्णपणे तू सांगशील तेच काम करत होते. परंतु तरीदेखील तुझं काम नक्की काय आहे ते मला अजूनही कळलेलं नाही." भीमा म्हणाला.

"भीमा, तुला कल्पनाच आहे की आपल्या भूगर्भातील नगराच्या वायुवीजनासाठी काहीतरी सोय होणं अत्यंत आवश्यक होतं. त्यासाठी मी अत्यंत सोपी योजना आखली होती. या सर्व गुंफा आणि सभोवतालचा परिसर... इथे बांधल्या जाणाऱ्या मंदिरामुळे हा भूभाग भविष्यकाळात अति चर्चित राहणार आहे. अर्थात तो तसा असावा हीच आपली इच्छा आहे. जितका जास्त मनुष्य वास तितके आपणास नक्षत्रांशी संपर्क करण्यास योग्य वातावरण राहणार आहे. परंतु या अति चर्चित भूभागामुळे आणि मनुष्यवासामुळे माझं काम अवघड होऊन गेलं होतं. सुरवातीस मी काही मनोरे निर्माण केले होते; जेणेकरून सूर्यप्रकाश आणि वायुवहन दोन्ही अत्यंत योग्य प्रकारे आपल्या नगरापर्यंत पोहोचणार होतं. मात्र हळूहळू माझ्या लक्षात आलं की या मनोऱ्यांमुळे आपलं अस्तित्व भविष्य काळात धोक्यात येऊ शकतं. भविष्यातील मानव आकाशाला आणि अवकाशाला गवसणी घालण्याचा प्रयत्न करणार आहे; असा कयास भूतप्रमुखांनी बांधला आहे. याकाळातील मानव जसजसा प्रगत होत जाईल तसतसा तो अनंताचा आणि अज्ञाताचा शोध घ्यायला सुरवात करेल. मूलतः मनुष्य स्वभावच तसा आहे नाही का? मनुष्याला कायमच गूढ, अगम्य आणि अनाहत अशा सर्वस्वाची ओढ असते. त्यातून हे मनोरे जरी या कड्यांमधून निर्माण केलेले असले आणि संपूर्णतः नैसर्गिक निर्मिती वाटावी इतके योग्य काम केले असले तरी पुढे मानव कोणत्या थरापर्यंत शोध घेऊ शकेल याला मर्यादा नाही.

भीमा तुला आठवतं.... काही हजार वर्षांपूर्वी मानवीय संस्कृती तिच्या अत्यंत उच्चतम बिंदूला पोहोचली होती; उत्तम नगरविकास आणि पर्जन्यजल विकास त्यांनी केला होता. त्यामुळे उत्तम जीवन जगत होते ते. मात्र हळूहळू ते हे विसरले की त्यांना निर्माण निसर्गाने केलं आहे. आपण निसर्गाला जपलं पाहिजे आणि वृद्धिंगत केलं पाहिजे; याचा त्यांना विसर पडला आणि त्यांनी निसर्गाला गवसणी घालण्याचा चंग बांधला होता; त्यावेळचा मानव वेगळा होता. त्यावेळी त्यांनी भूगर्भातील अनेक सत्य भूतलावर आणली होती; कारण त्यांना भूगर्भातील गूढाचा शोध घ्यायचा होता. त्यातीलच एका टप्प्यात त्यांनी आपला शोध जवळ-जवळ लावलाच होता. भावनिकतेच्या आहारी जाऊन निर्णय घेणाऱ्या मानवापासून दूर रहाणं या आपल्या उद्देशाला त्यामुळे धक्का लागणार होता. त्यावेळी देखील मी आपल्या नगररचनेच्या कामामध्ये तीक्ष्णासोबत काम करत होते. माझ्या हातून एक चूक झाली होती; आणि त्यामुळे आपल्या अस्तित्वाची दारं या मानवांसाठी उघडली गेली होती. अर्थात त्याचवेळी मोठी नैसर्गिक आपत्ती कोसळल्यामुळे भूतलावरील प्रगत मानवीय अस्तित्व संपूर्णत: भूगर्भात सामावलं गेलं.

पण मला त्यावेळची चूक परत होऊ द्यायची नव्हती. म्हणूनच अगोदर ज्या मनोऱ्यांचा विचार मी केला होता; ते मनोरे उभे करण्याचा निर्णय मी बदलला. परंतु सुरवातीला मनोरे तयार करण्याचा निर्णय भूतप्रमुखांकडून मान्य करून घेणं आणि ते काम सुरू झाल्यानंतर आपल्याच कामातील चुका त्यांच्या समोर ठेऊन ते काम थांबवणं; यातच माझी सुरवातीची अनेक वर्ष निघून गेली. मला कळतं रे भीमा, या माझ्या चुकलेल्या निर्णयामुळे भागीनेय तीक्ष्णा माझ्यावर नाराज झाली. तिच्या त्या नाराजीमुळे पहिल्यांदा मला दुःखाची भावना खोलवर स्पर्शून गेली. कदाचित त्यामानसिकतेमध्ये मी असताना गोविंद इथे आले आणि म्हणून मी केवळ शारीरिक आकर्षणापुढे जाऊन त्यांच्यात गुंतले. अर्थात त्याचा परिणाम मी माझ्या कामावर कधीही केला नाही. तीक्ष्णाला ते चांगलंच माहीत आहे; परंतु तरीही ती माझ्यावर नाराज आहे.

तिच्या मते मी गोविंदमुळे माझ्या अस्तित्वाबद्दलचे निर्णय बदलणार आहे. भीमा; खरं सांगायचं तर मला गोविंद सोबत कायमस्वरूपी राहायला आवडेल. पण तरीही मी माझी जवाबदारी दूर करून हा निर्णय घेणार नाही. अर्थात यासाठी तुम्ही सर्वांनी माझ्यावर विश्वास ठेवणं आवश्यक आहे. दुर्दैवाने मात्र मी कितीही सांगायचा प्रयत्न केला तरी कोणीही माझ्यावर विश्वास ठेवण्यास तयार नाही रे." अपाला बोलायची थांबली आणि कधी नव्हे ते तिच्या डोळ्यात पाणी उभं राहिलं. ते पाहून भीमा देखील मनातून हलला.

तिच्या जवळ जाऊन तिचे डोळे पुसत तो म्हणाला; "अपाला, तुझे माझे बंध खूप वेगळे आहेत. ते काय आहेत ते तू किंवा मी इतर कोणालाही सांगण्याची गरज नाही. अर्थात तू जे म्हणते आहेस ते सत्य आहे. तू कोणता नवीन उपाय केला आहेस ते मला माहीत नाही. पण भूतप्रमुखानी तो स्वीकारला आहे; हे मला कळलं आहे. मंदिराचं काम देखील पूर्ण झालं आहे. आता आपण इथून सर्व आवरून घेऊन परतीचा मार्ग घेण्यास सुरवात करायची आहे. त्यामुळे तुझं हे असं भावनिक होणं तुझ्या निर्णयाच्या आड येईल; हे विसरू नकोस. अपाला; आपलं आयुष्य वेगळं आहे. तुझा कुंजर आजच्या मानवाचा अंश घेऊन जन्मला असला तरी तो तुझ्या वळणावर गेला आहे. तो पुढे जाऊन परत एकदा भूतलावर अवतरणार आहे; आणि त्यावेळी तो संपूर्ण मानवीय समाजाला जागं करणार आहे. अर्थात हे सगळं पुढचं."

भीमा अचानक बोलायचा थांबला हे अपालाच्या लक्षात आलं. तिने नजर उचलून त्याच्याकडे बघितलं आणि त्याच्या डोळ्यातील बदललेले भाव बघून ती स्थिर झाली.

अचानक भीमा अपाला पासून दूर झाला. त्याने आवाजातील गंभीरपणा काढून टाकून आणि तरीही काहीतरी अत्यंत महत्वाचं बोलत असल्याचा भाव आणि आव चेहेऱ्यावर आणला आणि म्हणाला; "अपाला, तुझं कार्य पूर्ण झालं आहे; याची कल्पना तू भागीनेय तीक्ष्णाला देणं अत्यंत आवश्यक आहे. भागीनेय तीक्ष्णा महाराजांना भेटून आली आहे. आपल्या इथल्या कामाचा संकल्प पूर्ण झाल्याची कल्पना तिने महाराजांना दिलीच असेल. याचाच अर्थ आपण आता इथून परतागमन करणार आहोत; हे सत्य आहे. तू देखील तुझ्या भावना आवर आणि योग्य तो निर्णय घे. मी तुला इतकंच सांगेन." असं म्हणून भीमा उठला आणि निघून गेला. मात्र जातानाच त्याने अपालाला डोळ्यांनी खुण केली होती... भीमा गेल्या नंतर अपाला मान खाली घालून बसून राहिली. थोड्या वेळाने तिला डाव्या डोळ्याच्या कोपऱ्यातून हालचाल जाणवली. तिने केवळ त्या हालचाली वरून ओळखलं होतं की लपून नाथ भीमा आणि तिचं बोलणं ऐकत होता. अपालाने याविषयी गोविंदशी बोलण्याचा निर्णय घेतला आणि ती उठली.

क्रमशः