Friday, November 27, 2020

श्रीकृष्ण - दारूक

 श्रीकृष्ण - दारूक


मनात अनेक प्रश्न कायम दाटत आले. अनेकदा हे प्रश्न स्वामींकडे उधकृत करावेत आणि त्यांची उत्तरे समजून घ्यावीत असा मोह देखील झाला. मात्र मी केवळ एक सारथी आहे, हे माझ्या जीवनाचे सत्य विसरणे मला शक्य नव्हते. त्यामुळे हे प्रश्न कायम मी माझ्या मनातच ठेवले.

कंस माहाराजांच्या वधानंतर कोवळ्या वयातील त्या सावळ्या मोहमयी अस्तित्वाने मी भारित झालो ते आजवर. स्वामींनी माझ्यासारख्या मुखदुर्बल आणि शरीरयष्टीने अत्यंत किरकोळ सारथी पुत्राला आयुष्याचा सोबती करणे म्हणजे मुंगीने आकाशाला प्राप्त करून घेण्यासारखे आहे. त्यावेळेस माझ्या मनामध्ये पहिला प्रश्न निर्माण झाला होता.... कोवळ्या वयातील या सावळ्याच्या मनात माहाराज कंसाच्या अत्याचाराने विटलेले मथुरावासीयांच्या दुःखाचे पडसाद कधी उमटले असतील? मात्र तो प्रश्न मी माझ्या मनपटलावरून क्षणात पुसून टाकला होता. कारण या प्रश्नाच्या उत्तरापेक्षा देखील त्या सावळ्या मोहक व्यक्तिमत्वाची जादू मोठी होती.


कंस माहाराजांचे श्वसुर जरासंध माहाराज यांनी स्वामींच्या मथुरेवर अठरा वेळा हल्ला केला. शेवटच्या युद्धाच्या वेळी तर त्यांनी स्वतःसोबत दूर देशीचा योद्धा कालिवाहन यास त्यांच्या सोबत मथुरेवर हल्ला करण्यास आमंत्रण दिले. तो देखील त्याची महाप्रचंड सेना घेऊन आला त्यावेळी युद्धनिती निपुण माझ्या स्वामींनी मला त्यांच्या अंतःपुरात बोलावून घेतले आणि सांगितले की त्यांनी खूण केल्याक्षणी मी रथ युद्धभूमीमधून लांब पळवून न्यायचा आहे. त्यावेळी माझे तरुण उसळते रक्त ही आज्ञा मान्य करण्यास तयार नव्हते. मात्र माझ्या मनापेक्षादेखील माझा माझ्या स्वामींवर जास्त विश्वास आहे. त्यांनी निरोप पाठवून आव्हाहन केले की युद्ध करून दोन्हीकडील सैनिकांना मृत्युमुखी पडण्यापेक्षा कालिवाहन आणि मी असे दोघेच द्वंद्वयुद्ध करू. स्वतःच्या शक्तीवर आणि बाहूंवर प्रचंड विश्वास असणाऱ्या कालिवाहनाने हे आव्हाहन स्वीकारले. आम्ही युद्धभूमीवर पोहोचलो. केवळ गरुडध्वज रथ चालवणारा मी आणि रथारुढ माझे स्वामी, श्रीकृष्ण! स्वामींनी रथातून उतरताना माझ्या खांद्याचा आधार घेतला. इतरांसाठी ती एक लक्षातही न येणारी कृती होती. मात्र मला त्यांच्या अंतःपुरातील आमची चर्चा पुन्हा एकदा आठवून देणारी होती. भर युद्धामध्ये एका क्षणी स्वामींनी अचानक कालिवाहनाकडे पाठ केली आणि डोळ्याचे पाते लवण्याअगोदरच ते रथारूढ झाले. कोणालाही काहीही समजण्या अगोदर मेघपुष्प, बलाहक, शैब्य, सुग्रीव या स्वामींच्या प्राणप्रिय अश्वांनी आम्हाला दूर सागरकिनारी नेले होते. हो! सागरकिनारी... जिथे स्वामींनी जरासंध माहाराजांच्या लक्षात येण्याअगोदरच त्यांच्या संपूर्णपणे आवाक्याबाहेर असलेल्या या सागरकिनारी द्वारका नगरी वसवली होती. कालिवाहनाशी ठरवलेले द्वंदाचे कारण मथुरावासीयांना द्वारकेस सुखरूप पोहोचवण्यासाठीचा लागणारा वेळ घेणे हे होते..... आणि तरीही माझ्या मनात प्रश्न निर्माण झालाच; स्वामींना कालवाहनास द्वंदात हरवणे अशक्य नव्हते; मग तरीही युद्ध सोडून पळ का काढला असेल स्वामींनी? अर्थात द्वारकेमध्ये प्रवेश करताच मनातील प्रश्न विरघळून गेला.

देवी सुभद्रा यांचे हरण हा तर माझ्या यादवी मनाची हळुवार जखमच आहे. देवींना द्वारकेच्या बाहेरील शिव मंदिरामध्ये नेण्याची जवाबदारी स्वामींनी माझ्यावर टाकली होती. स्वामींच्या सानिध्यात राहून मी देखील काही प्रमाणात शस्त्र विद्या आत्मसाद केली होती. त्यादिवशी देवींना घेऊन जाण्यासाठी मी रथ त्यांच्या अंतःपुरासमोर आणून उभा केला त्यावेळी स्वामींनी हसत मला म्हंटले;'दारुका, तू देवालयात जातो आहेस; युद्धावर नाही. त्यात आता रथावर माझी प्रिय भगिनी सुभद्रा असणार आहे. मग ही शस्त्र सिद्धी कशासाठी? तिचे नाजूक मन दुखावले जाईल रे बाबा. काढून ठेव बघू ती शस्त्रे. स्वामींची आज्ञा शिरसावंद्य मानून मी माझी शस्त्रे जवळच उभ्या सैनिकाकडे सुपूर्द केली. देवी सुभद्रा रथारूढ झाल्या आणि मी आसुडाचा आवाज करणार एवढ्यात स्वामींची दुसरी सूचना आली... दारुका, मित्रा... रथ अंमळ दूरच ठेव हो देवाल्यापासून.... माझे यादवी मन स्वामींच्या मिश्किलतेतील अर्थ शोधत राहिले... आणि स्वामींच्या प्रिय अर्जुन माहाराजांनी देवी सुभद्रा यांचे हरण केले. डोळ्यासमोर घडणारी घटना असूनही मी स्वस्थ राहीन असे स्वामींना का वाटले असेल? या प्रश्नाने मला आयुष्यभर सतावले आहे.


ज्यावेळी स्वामी पांडवांच्या बाजूने शिष्ठाई करण्यासाठी हस्तिनापुरामध्ये दाखल झाले त्यावेळी मीच त्यांना राजसभेच्या द्वाराशी सोडले होते. हस्तिनापुराकडे आम्ही प्रयाण केले त्याक्षणापासून माझे स्वामी अस्वस्थ होते. हस्तिनापुरास आम्ही पोहोचलो आणि रथाचा वेग मर्यादेत आणत मी मेघपुष्प, बलाहक, शैब्य, सुग्रीव यांना दुडक्या चालीने चालण्याचा आदेश दिला. त्यावेळी माझ्या खांद्याला स्पर्श करीत स्वामी म्हणाले होते;"दारुका, परतीच्या वेळी आपणासोबत रथावर काही वेळासाठी तुझ्या हृदयाजवळ असणारी व्यक्ती असणार आहे. जर बोलणे यशस्वी झाले तर हे युद्ध होणार नाही." स्वामींच्या चिंतीत आवाजामुळे व्यथित होऊन मी म्हणालो होतो;"स्वामी, माहाराज भीष्म पांडवांवर जीवापाड प्रेम करतात. ते पांडवांवर कधीच अन्याय होऊ देणार नाहीत. आपली शिष्ठाई कधीच वाया जाणार नाही." यावर त्यापरिस्थितीत देखील स्मितहास्य करीत स्वामी म्हणाले;"अरे, राजसभेमध्ये होणारा निर्णय मला आताच माहीत आहे. मी कर्ण भेटीसाठी उत्सुक आहे." त्यांच्या या उदगारांनी मी अचंबित होऊन मागे वळून बघितले. मात्र तोवर राजसभेचे द्वार समोर आले होते. त्यामुळे स्वामींच्या चेहेऱ्यावरील भाव मला दिसले नाहीत. राजसभेमध्ये नक्की काय चर्चा झाली ते माझ्यासारख्या सारथ्या कळणे दुरापस्थ होते. मात्र परतीच्या वेळी स्वामींसोबत सुतपुत्र अंगराज कर्णाला येताना बघून मी गोंधळून गेलो होतो. स्वामी जे म्हणाले होते ते खरे होते. आमच्या कुळामध्ये जन्म घेतलेले माहाराज कर्ण आज स्वकर्तुत्वाने अंगराज झाले होते. त्यामुळे ते दुष्ट दुर्योधनाच्या बाजूने असले तरीही ते मला फार प्रिय होते. स्वामी अंगराजांच्या भेटीसाठी उत्सुक होते.... माहाराज कर्ण स्वामींसोबत रथारूढ झाले आणि मी रथ हस्तिनापुराबाहेर काढला. गंगेकिनारी एका वटवृक्षाच्या छायेत मी अश्वांना मोकळे केले आणि त्यांच्या सोबत गंगेच्या दिशेने पाऊल उचलले. रथाजवळ आता स्वामी आणि अंगराज कर्ण तेवढे होते. मी अश्वांना पाणी पाजून परतलो त्यावेळी मात्र रथाजवळ विचारात गढलेले एकटे स्वामी होते. रथ सज्ज होताच रथारूढ होत स्वामी अत्यंत कष्टी आवाजात मला म्हणाले;"दारुका, युद्ध आता नक्कीच अटळ!" अशी काय चर्चा झाली होती अंगराज कर्ण आणि माझे स्वामी यांच्यामध्ये?

खरंच; युद्ध अटळ होते आणि माझ्या स्वामींचे पांडवांची बाजू घेणे देखील. हातात शस्त्र न धरण्याचे वचन दिलेले... आपल्या प्रिय पार्थाच्या रथाचे सारथ्य स्वीकारणारे माझे स्वामी धर्म-अधर्माचे युद्ध घडवत होते. येणाऱ्या पुढील प्रत्येक युगांसाठी आदर्श निर्माण करण्यासाठी स्वतःकडे कमीपणा घेत.... प्रसंगी बदनामी सहन करत माझे स्वामी सर्वांचाच जीवनरथ हाकत होते.... आणि युद्ध घडले. माझी भूमिका बजावणाऱ्या माझ्या स्वामींच्या सोबत या युद्धाच्या वेळी देखील मी होतोच. एक सारथी आपल्या स्वामींना सोडून कुठे जाणार? संपूर्ण युद्धामध्ये प्राणप्रिय जनांच्या मृत्यूला स्वामी धीराने सामोरे जात होते. प्रिय अभिमन्यूच्या मृत्यूनंतर पार्थाला धीर देऊन दुसऱ्या दिवशी युद्धाला उभे करताना त्यांच्या मनाला झालेल्या यातना मी अनुभवल्या देखील. मात्र सतराव्या दिवशी कौरव सेनापती अंगराज कर्ण आणि अर्जुन यांच्या युद्धसमयी माझ्या स्वामींच्या जिव्हेचे खडग अंगराजांना घायाळ करीत होती आणि अर्जुनाला पेटवत होते याचा मी साक्षीदार होतो........ आणि तरीही युद्धसमाप्ती नंतर सुतपुत्र कर्णाच्या मृतदेहाला एका कातळावर अग्नी देताना स्वामींसोबत देखील मीच होतो. का बरे माझ्या स्वामींचे डोळे पाणावले होते एका सुटपुत्राला अग्नी देताना.... ज्याच्या मृत्यूला त्यांचीचं जिव्हा कारणीभूत होती?

.............. आणि स्वामींनी मला प्रभास तीर्थी नेण्यास सांगितले आणि रथातून उतरताना मला परतीचा प्रवास सुरू करण्यास सांगितले............. का? आयुष्यभर ज्याला सतत सोबत ठेवले त्याचा त्याग स्वामींनी शेवटच्या प्रवासाच्या वेळी का केला?


प्रश्न केवळ प्रश्न!!!! उत्तर एकच.......

श्रीकृष्णार्पणमस्तू!!!








Friday, November 20, 2020

श्रीकृष्ण - पार्थ

 श्रीकृष्ण - पार्थ


युधिष्ठिर : अर्जुना, माझं ऐक. शस्त्रागाराकडे जात असताना मध्ये माझा कक्ष लागतो हे सर्वज्ञात आहे. त्यामुळे मी आणि द्रौपदी एकांतात असताना तू मुद्दाम तो एकांत भंग करण्यास आला नाहीस; हे आम्ही जाणतो. ब्राम्हणाच्या गाई चोरीला गेल्या आणि ही तक्रार घेऊन तो तुझ्याकडे आला. त्यामुळे राजकर्तव्य पूर्ण करण्यासाठी तू तुझी शस्त्रे घेऊन त्याच्या मदतीसाठी गेलास. तुझ्याकडे दोष येत नाही प्रिय बंधू. तरीही तुझ्या मनात काही शंका असेल तर खुद्द द्रौपदीला विचार. तिची तक्रार असली तर आपल्यामध्ये ठरलेल्या बंधनानुसार तू एका वर्षासाठी राज्य सोडून जा.

अर्जुन : महाराज, आपण माझी कितीही समजून काढलीत किंवा द्रौपदीने देखील कोणतीही आपत्ती नसल्याचे सांगितले तरीही आपण पाच जणांनी मिळून ठरवलेले बंधन पाळणे माझे कर्तव्य ठरते. त्यामुळे उद्या प्रातःकाळी मी एक वर्षाच्या प्रवासासाठी निघणार आहे.

युधिष्ठिर : तू श्रीकृष्णा व्यतिरिक्त कोणाचे ऐकले आहेस का? जसे तुला योग्य वाटते तसे कर!

असे म्हणून युधिष्ठिराने अर्जुनाला आलिंगन दिले आणि जड अंतकरणाने तो त्याच्या कक्षाच्या दिशेने गेला.

प्रातःकाळी माता कुंतीचा आशीर्वाद घेऊन आणि आपल्या चारही बंधू आणि प्रिय पत्नी द्रौपदी यांचा निरोप घेऊन अर्जुन केलेल्या चुकीच्या प्रायश्चित्तासाठी निघाला. अर्जुनाचा रथ इंद्रप्रस्थातून बाहेर पडला मात्र आपण नक्की कोणत्या दिशेने जावे हा प्रश्न पडल्याने तो काही क्षण थांबला. त्याचवेळी समोरून धूळ उडवत श्रीकृष्णाचा अबलख अश्व असलेला रथ येताना त्याने बघितला आणि अर्जुन अत्यंत समाधानी मुद्रेने आपल्या रथातून पायउतार झाला.

श्रीकृष्ण : अरे? पार्था, तू इथे राजधानी बाहेर काय करतो आहेस?

अर्जुन : (मंद हसत) देवा, आपण हा प्रश्न विचारून मलाच कोड्यात टाकले आहे. तुम्ही माझ्या मानतील प्रत्येक प्रश्नाचे उत्तर आहात. असे असूनही तुम्ही मलाच प्रश्न विचारत आहात हे काहीसे जगावेगळे नाही का वाटत?

श्रीकृष्ण : अरे, मी ईशान्य भारतातील काही राजांना भेटण्याचा मानस मनात ठेऊन द्वारकेहून बाहेर पडलो होतो. परंतु माझ्याच नादात नकळतपणे मी माझा रथ इंद्रप्रस्थाकडे वळवला. बरं, तू काहीच ठरवले नसल्यास माझे एक काम करशील का? ईशान्य भारतातील नागलोक आणि इतर गणराज्य येथील राजे अत्यंत उत्तम राज्यकारभार करत आहेत. त्यांची युद्धनीती देखील काहीशी वेगळी आहे. तू माझ्यासाठी या भागामध्ये जाऊन तेथील राजांना भेटून येशील का? तुझा प्रवास संपतेवेळीस मात्र द्वारकेस नक्की ये.

........ आणि श्रीकृष्ण इच्छा आज्ञेसमान मानणारा अर्जुन कोणताही प्रश्न न विचारता ईशान्य भारतातील राजांना भेटण्यासाठी निघाला. प्रवास संपतेवेळी तो द्वारकेस पोहोचला. मात्र त्याअगोदर ईशान्य भारतातील नागराजाची सुंदर आणि कुशाग्र बुद्धीची कन्या उलुपी आणि माहाराज चित्रवाहन यांची शस्त्रास्त्र निपुण एकुलती एक कन्या चित्रांगदा यांनी अर्जुन पत्नी म्हणून इंद्रप्रस्थाकडे प्रयाण केले होते. शिक्षेचे वर्ष पूर्ण होता होता अर्जुनाने द्वारकेहून सुभद्रेचे हरण करून इंद्रप्रस्थाकडे प्रयाण केले. प्रवासामध्ये अर्जुन श्रीकृष्णाच्या बोलण्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करत होता.

श्रीकृष्ण : पार्था, सुभद्रेचे मनापासून प्रेम आहे तुझ्यावर. त्यामुळे मनामध्ये कोणताही किंतु न आणता तू तिचा स्वीकार कर.

अर्जुन : देवा, आपल्या सांगण्यावरून मी ईशान्य भारतातील राजांची गाठ घेतली आणि त्याचे फलस्वरून राजकुमारी उलुपी आणि राजकुमारी चित्रांगदा या द्रौपदी नंतरच्या माझ्या दोन भार्यांनी इंद्रप्रस्थाकडे प्रस्थान केले आहे. मोहना, माझे मन देखील सुभद्रेसाठी व्याकुळ आहे. परंतु मी परत गेल्यानंतर द्रौपदीला कोणत्या तोंडाने सामोरे जाऊ? तिच्या विशाल नेत्रातील प्रश्नांची उत्तरे देणे मला शक्य होणार नाही.

श्रीकृष्ण : धनंजया, आपल्या जीवनात असे अनेक प्रश्न येतात की आपण निरुत्तर होत असतो. मात्र याचा अर्थ या प्रश्नांचे उत्तरच नसते असे नाही. काळ ही एकच गोष्ट अशी आहे की ती प्रत्येक प्रश्नाचे उत्तर तुम्हाला योग्य वेळी देते. अर्थात तू द्रौपदीला जिंकले असलेस तरी त्या बुद्धिशील स्त्रीला हे कधीच मान्य होणार नाही की तू तिच्या समोर एक नाही दोन नाही तर तीन तीन सवती उभ्या करतो आहेस. त्यात सुभद्रेचे वय आणि तुझे तिच्या प्रेमात आकंठ बुडणे तर तिच्या नजरेतून सुटणार नाही. तरीही...... जे होते आहे तेचं योग्य आहे!

दिवसांमागून दिवस जात होते आणि दुर्योधनाने महाराज युधिष्ठीरांना द्यूत क्रीडेसाठी हस्तिनापुरामध्ये आमंत्रित केले. आपल्या चारही बंधूंना आणि प्रिय पत्नी द्रौपदी हिला घेऊन महाराज युधिष्ठीर हस्तिनापुरात पोहोचले. द्यूतात हरलेल्या युधिष्ठिराने त्यानंतर आपल्या चारही बंधूंना पणाला लावले आणि त्यानंतर पांचाली देखील एका वस्तू समान पणाला लावली गेली. त्यावेळी तिच्या स्त्रीत्वाचा सन्मान केवळ आणि केवळ श्रीकृष्णाने ठेवला होता. त्यानंतर द्रौपदीच्या शापवाणीच्या भीतीने धृतराष्ट्राने परत केलेल्या आपल्या राज्याच्या दिशेने निघालेल्या युधिष्ठिराला ज्यावेळी दुर्योधनाने परत एकदा द्यूत खेळण्याचे आवाहन केले आणि बारा वर्षांचा वनवास आणि एक वर्षाचा अज्ञातवास या अटीवर युधिष्ठिराने ते आमंत्रण स्वीकारले. त्यानंतर बारा वर्षांचा वनवास पांडवांनी द्रौपदीसह घालवला. मात्र अज्ञातवासाच्या वेळी कोणी कोणती भूमिका घ्यावी हे सांगण्यासाठी पांडवांचा सखा श्रीकृष्ण हजर होता.

अर्जुन : श्रीकृष्णा, मी आणि बृहन्नडा? माझे हे आजानुबाहु, अनेक युद्धांमध्ये शास्त्रांचे वार झेललेली बलदंड छाती मी या बृहन्नडा अवतारामध्ये हे माझे पौरुष्य कसा लपवणार आहे?

श्रीकृष्ण : पार्था, तू हे कसे विसरू शकतोस की उर्वशीने दिलेला शाप तुला कधी ना कधी जगायचाच होता. मग हीच ती योग्य वेळ नाही का? तुझ्या एका वर्षाच्या इंद्रप्रस्थ त्यागाच्या वेळी तू केवळ उलुपी, चित्रांगदा आणि सुभद्रा यांना जिंकेल नव्हतेस तर राजा इंद्राच्या सर्वात सुंदर अप्सरेला तुझ्या याच पौरुष्याने वेडे केले होतेस. मात्र ती पुरुरव महाराजांची, तुमच्या कुरुवंशाच्या आद्य पुरुषाची पत्नी असल्याने तू तिचा स्वीकार केला नाहीस. याचा राग येऊन तिने तुला एका वर्षासाठी स्त्रीभावनेचा अनुभव करण्याचा शाप दिला होता.

..... आणि अशाप्रकारे अज्ञातवासाचे ते वर्ष देखील सरले. हस्तिनापूरच्या राजकुमाराने दुर्योधनाने पांडवांचे हक्काचे इंद्रप्रस्थ तर नाहीच, पाच गावेच काय पण सुईच्या अग्रावर राहील इतकी जमीन देखील देण्याचे नाकारले आणि कुरुक्षेत्रावरील युद्धाला सुरवात झाली.

अर्जुन : श्रीकृष्णा, समोर तर पितामह भीष्म आहेत, माझे गुरू द्रोणाचार्य, माझे बंधू.... सर्वच तर माझे आप्तेष्ट आहेत. यांच्यावर मी शास्त्र प्रहार कसा करू?

यानंतर श्रीकृष्णाने युद्धनीती, धर्मनीती आणि त्यापलीकडे जाऊन मानवीय जवाबदरीचा बोध अर्जुनाला केला. अठरा दिवसांचे युद्ध झाले. अर्जुनाला केवळ कर्णच हरवू शकणार होता. मात्र त्याच्या रथाचे चाक धरतीने गिळंकृत केल्यानंतर ज्यावेळी अर्जुन पायउतार आणि निःशस्त्र कर्णावर शस्त्र उगारण्यास कचरू लागला यावेळी कर्ण वध करण्यासाठी श्रीकृष्णानेच अर्जुनाला उद्युक्त केले.

श्रीकृष्ण : कोणासाठी थांबलास पार्था? या सुतपुत्राने तुला आठवण करून दिली आहे की तो याक्षणी निःशस्त्र आहे म्हणून? तो रथातून पायउतार आहे म्हणून? हा कर्ण तुला आज धर्माचे ज्ञान देतो आहे! ज्याचे संपूर्ण जीवन अधर्मी कृती करण्यात गेले; तो आज केवळ मृत्यूच्या भीतीने तुझ्याशी शब्दच्छल करीत आहे. पार्था, आता विचार करू नकोस. ज्याने तुझ्या प्रिय पत्नीचा भर सभेत वेश्या म्हणून अपमान केला, तो तुझ्या प्रिय पुत्र अभिमन्यूच्या मृत्यूसाठी कारणीभूत होता, ज्याने केवळ नाव व्हावे म्हणून आपली कवच-कुंडले दान केली, केवळ दुर्योधनाच्या उपकारांमुळे जो राजा झाला अशा या अधर्मी सुताच्या बोलण्यास तू महत्व देऊ नकोस. तुझ्या गांडीव धनुष्याची प्रत्यंचा ओढ आणि धरतीवरील हा अधर्मी नष्ट कर.

श्रीकृष्णाच्या बोलण्याचा परिणाम पार्थावर न होता तर आश्चर्य! कर्णाच्या अंताने महाभारतीय युद्धाच्या अंताचा शंखनाद करून गेला. युद्ध समाप्त झाले आणि......

श्रीकृष्ण : अर्जुना ऐक..... आजवर मी जे जे सांगितले ते ते तू ऐकत आलास. कधीही प्रश्न नाही केलास. त्याचप्रमाणे आजही मी जे सांगतो आहे ते फक्त ऐक. भारतवर्षातील एकमेव धनुर्धर केवळ तू नाहीस तर तो सुर्यपुत्र कर्ण देखील होता. हो! मी योग्य तेच सांगतो आहे.... तो सूर्यपुत्र होता. मात्र काळाची गरज आणि अधर्माचा नायनाट यासाठी त्याचे बलिदान आवश्यक होते. ज्याप्रमाणे तुझ्या प्रिय पुत्राचे, अभिमन्यूचा मृत्यू देखील त्याच्या जन्माबरोबर विधिलिखित झाला होता. द्रौपदी केवळ तुझी पत्नी होऊ नये ही देखील तुझ्या मातेची नव्हे तर नियतीची इच्छा होती. चार पत्नी असूनही आणि बृहन्नडेच्या वेशात असूनही तुला उत्तरेचा मोह झाला होता; हे माझ्यापासून लपलेले नाही पार्था. मात्र अभिमन्यूच काय तुम्हा पाचही जणांचे सर्वच पुत्र या महाभारतीय युद्धात कामी येणार होते, आणि तरीही हा वंश पुढे चालणे ही काळाची गरज होती. म्हणूनच उत्तरेचा विवाह अभिमन्यूशी झाला. धनंजेया, मला माहीत आहे की युद्धनीती आणि धर्मनीती नंतर आज मी जे काही सांगतो आहे... ते ऐकून तुला संन्यस्त जीवनाकडे वळण्याची इच्छा होईल याची मला कल्पना आहे; आणि तेच योग्य आहे पार्था. तुझ्या चारही बंधूंसोबत आणि पांचाली सोबत तुम्ही महानिर्वाणासाठी हिमालयाच्या दिशेने प्रयाण करावेत हेच योग्य.

अर्जुन : (अश्रू भरल्या नेत्रांनी हात जोडून श्रीकृष्णा समोर उभा होता) वासुदेवा, तू माझ्या हातून जे जे घडवलेस त्याची जवाबदरी कोणी घ्यायची केवळ या एका प्रश्नाचे उत्तर दे; म्हणजे मी माझा हा देह धर्तीवर ठेवण्यास मोकळा होईन.

श्रीकृष्ण : मी घडवले! परंतु ते तू स्वीकारलेस पार्था! मी तुला मार्ग दाखवला! मात्र त्या मार्गावर चालण्याचा निर्णय तुझाच होता धनंजया! मी सांगत गेलो! मात्र माझ्या सांगण्याला प्रश्न न विचारता त्याचा स्वीकार तू केलास अर्जुना! आपल्या कृत्याची जवाबदारी आपलीच असते मध्यमा.... तू कृती केलीस, त्याक्षणी त्याची जवाबदारी तुझ्याकडे आली.

................. आणि अश्रू भरल्या नेत्रांनी त्या कृष्णप्रिय पांडवाने देवेश्वराला पदस्पर्श केला आणि तो मार्गस्थ झाला.

Friday, November 13, 2020

श्रीकृष्ण - कर्ण

 श्रीकृष्ण - कर्ण


श्रीकृष्ण : तू जेष्ठ आहेस हे माहीत असूनही नकार का?

कर्ण : श्रीकृष्णा, तुझ्या व्यतिरिक्त हे कोणालाच कळलेलं नाही. तरीही हा प्रश्न तू का विचारतो आहेस?

श्रीकृष्ण : सुर्यपुत्रा......

कर्ण : अहं! वासुदेवा, मी सुतपुत्र आहे. तुम्ही चुकून माझा उल्लेख काहीतरी वेगळा करता आहात.

श्रीकृष्ण : सुर्यपुत्रा.... जेष्ठ कौंतेया.... दानवीरा.... तुझं अस्तित्व कायमच सुर्यग्रहणाप्रमाणे झाकोळलेलं राहिलं आहे. मात्र आज प्रत्यक्ष तुझी जन्मदात्री माता तुझ्यासमोर उभी राहिली आणि तिने तुला तुझ्या जन्माचं सत्य सांगितलं; ते सत्य नाकारून तू अधर्मी दुर्योधनाच्या बाजूनेच उभं राहण्याचा निर्णय घेतो आहेस... हे योग्य नाही. मला मान्य आहे की ज्यावेळी संपूर्ण हस्तिनापुराने तुला अपमानित केलं होतं त्यावेळी तो एकटा तुझ्यासाठी... तुझ्या बाजूला उभा राहिला होता. त्याने दाखलेल्या मित्रत्वामुळेच तू अंगराज झालास. आयुष्यभर एक सुतपुत्र म्हणून जगला असतास; मात्र आज तू एक राजा म्हणून मान्यता पावला आहेस. मात्र तरीही तू थोडा व्यावहारिक विचार करावास हे सांगण्यासाठी मी मुद्दाम तुला भेटायला आलो आहे. कर्णा, जीवनात योग्य संधीचा योग्य उपयोग करून घेणे हेच अंतिम सत्य आहे. तुला काय वाटतं... त्यावेळी हस्तिनापुरामध्ये झालेल्या स्पर्धेमध्ये एक सुतपुत्र म्हणून झालेला तुझा अपमान कोणताही विचार न करता तुला अंग देशाचा राजा करून दूर करणारा दुर्योधन तुझ्या प्रेमाखातर ते करत होता का? नाही.... अंगराज कर्णा, तुला देखील चांगलंच माहीत आहे की संपूर्ण स्पर्धेमध्ये प्रत्येक कलेमध्ये अव्वल असणाऱ्या तुला कायमच अंकित करून घेण्याचा तो त्याचा डाव होता.

कर्ण : हो मला माहीत आहे की दुर्योधनाने दूरदृष्टी ठेवून त्याक्षणी आपल्या राजपुत्र होण्याचा उपयोग करून घेतला होता आणि मला अंग देशाचा राजा केलं होतं. मोहना, मला हे देखील माहीत आहे की दुर्योधन पत्नी भानुमतीने दुर्योधनाला वरताना अट घातली होती की तिच्या प्रिय मैत्रिणीला सुप्रियेला मी स्वीकारले तरच ती दुर्योधनासोबत विवाह करेल. मुरलीधरा, मला हे देखील माहीत आहे की द्यूत क्रीडेच्यावेळी खेळ चालू असेपर्यंत दुर्योधनाने मुद्दाम मला सभागृहाबाहेर ठेवलं होतं कारण ते फासे जरासंधाच्या हाडांपासून बनवलेले होते. जरासंधाला मी बाहुकंटक डाव टाकून मल्ल युद्धामध्ये पराभूत केलं होतं. त्यामुळे ज्याप्रमाणे प्रत्येक खेळीच्या वेळी केवळ भीमाच्या अस्तित्वामुळे... आणि त्याच्या अस्वस्थ ओरडण्यामुळे ते फासे पांडवांच्या विरोधात पडत होते; तद्ववतच माझ्या अस्तित्वाचा परिणाम त्या फाशांवर झाला असता. गिरीधरा, केवळ दुर्योधनानेच नाही तर पितामहांनी देखील केवळ मी पांडवांना युद्धात हरवू नये म्हणून माझा अपमान करून ते सेनापती असेपर्यंत त्यांच्या ध्वजाखाली युद्धामध्ये उतरू दिलं नव्हतं. द्वारकाधीशा, मला आता हे देखील माहीत झालं आहे की पांडवांच्या राजसूययज्ञाच्या वेळी तू शिशुपालाच्या दिशेने तुझं सुदर्शन चक्र सोडलंस आणि तो ज्यावेळी माझ्या आसनामागे जाऊन लपला त्यावेळी तुझं ते सूर्यकिरणांनी तेजोमय झालेलं चक्र देखील केवळ माझ्या अस्तित्वामुळे त्याला काही करत नव्हतं. म्हणूनच तू मला यज्ञवेदीच्या दिशेने बोलावलंस आणि त्याचवेळी शिशुपालाचा वध झाला. पद्मनाभा, देवांचा राजा इंद्र देखील माझ्यासमोर भिक्षुक म्हणून उभा राहिला त्याचं कारण मी समजून चुकलो आहे. अपराजिता, ही आणि अशी अनेक उदाहरणं आहेत माझ्या जीवनातील की जिथे समोरच्या प्रत्येकाने व्यावहारिक विचारच केला आहे. अच्युता, ही सर्वच उदाहरणं बाजूला ठेवतो आज. कारण आता मी जे सांगणार आहे ते यासर्वांनी केलेल्या व्यावहारिक विचारांचा कळस आहे. तू जो व्यावहारिक विचार घेऊन माझ्याकडे आला आहेस; तो विचार मुळातच माझ्यासाठी नाही. पांडव माता... राजमाता कुंतीदेवी माझ्याकडे मातेच्या ममत्वाने आल्या नव्हत्याच. त्यांना याची पूर्ण जाणीव आहे की त्यांच्या पुत्रांना युद्धामध्ये केवळ मीच हरवू शकतो. त्यामुळे त्या त्यांच्या प्रिय पांडवांच्या जीवनदानासाठी आल्या होत्या. त्यांनी जरी मला त्यांच्या उदरातून जन्म दिला असला तरी त्यांनी मला कधीच ओळखलं नाही. म्हणूनच मी त्यांची मागणी नाकारेन या भीतीमुळे त्यांनी मला पांचालीचा प्रथम पती आणि पांडवांचा जेष्ठ बंधू या नात्याने पुढे जाऊन हस्तिनापुराचा राजा होण्याचं आमिष देखील दिलं. तुला एक सांगू का धनंजया, माझी पालनकर्ती राधाई आणि माझ्यावर निस्सीम प्रेम करणारी वृषाली या दोन स्त्रिया आणि माझा प्रिय बंधू शोण हे सोडले तर या जगातील प्रत्येक व्यक्तीने माझ्या जीवनाचा उपयोग त्यांच्या व्यावहारिक गरजांसाठी केला.

श्रीकृष्ण : म्हणजे तू हे मान्य करतो आहेस की विश्वातील प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या फायद्याचा विचार करते आणि त्याप्रमाणे निर्णय घेते.

कर्ण : हिरण्यगर्भा, हे विश्वातील अबाधित सत्य आहे. ते मी मान्य किंवा अमान्य करण्याचा प्रश्नच कुठे येतो?

श्रीकृष्ण : कर्णा, मग केवळ तूच का या विचारापासून दूर जातो आहेस?

कर्ण श्रीकृष्णाच्या कमल चरणांकडे काहिक्षण पाहात राहिला आणि मग एक गूढ-दुःखी मंद स्मित करत तो म्हणाला....

ऋषीकेशा, मी का व्यावहारिक विचारांपासून दूर राहिलो आहे! जगद्नियंत्या, तू मला हा प्रश्न विचारतो आहेस? ही चराचर जीवसृष्टी ज्याने निर्माण केली.... प्रत्येक प्राणीमात्रामध्ये ज्याने जीव फुंकला.... आचार-विचार करण्याची शक्ती ज्याने दिली तो विश्वनाथ मला विचारतो आहे की मी व्यावहारिक विचार का नाही केला....

असा विचार मी नाही केला देवेश्वरा, कारण... मी जीवनभर केवळ भावनांच्या भोवऱ्यात अडकत गेलो. दुर्योधनाने माझा अपमान होत असताना माझा गौरव केला मी त्याचा अंकित झालो. मात्र, अनिरुद्धा, आज कुरुक्षेत्राच्या या युद्धभूमीवर तुझ्या समक्ष उभं असताना मी मान्य करतो की माझ्या जीवनातील प्रत्येक चुकीचा निर्णय माझ्या अंतर्मनाला कायम टोचत राहिला. त्या टोचणीचा सल कमी व्हावा म्हणूनच मी जीवनभर दान करत राहिलो आणि माझ्या जीवनाच्या अंतापर्यंत मी हे दान देतच राहणार आहे. माझ्या आयुष्यातील अनेक चुकीच्या निर्णयांनी आज मला इथे आणून उभं केलं आहे; याची मला जाणीव आहे. मी हे देखील समजून आहे धर्माध्यक्षा, की ज्या-ज्या वेळी कौरव-पांडवांचा आणि या युद्धाचा विचार केला जाईल त्या-त्या वेळी प्रत्येक व्यक्ती माझ्या चुकीच्या निर्णयांबद्दल बोलेल.... म्हणूनच केवळ म्हणूनच मी माझी ओळख त्यापुढे नेऊन ठेवण्याचा प्रयत्न कायम केला आहे. मात्र देवेशा, कायम दुसऱ्यांना दान देणारा हा कर्ण आज तुझ्याकडे एकच मागणं मागतो आहे..... यापुढे कधीही कुठेही माझा उल्लेख झाला तर तो दानवीर कर्ण म्हणूनच व्हावा.

श्रीकृष्ण : तथास्तु दानवीर कर्णा! 

Friday, November 6, 2020

श्रीकृष्ण - सुदामा

 श्रीकृष्ण - सुदामा 


गुरू सांदीपनी : बलरामा, कृष्णा तुम्ही इथे माझ्या आश्रमामध्ये अध्यायनासाठी आला आहात. या आश्रमात कोणी उच-नीच नाही. येथे अध्ययन करणारा प्रत्येक कुमार हा केवळ विद्यार्थी आहे. तुम्ही देखील येथे असेपर्यंत याचा विसर पडू देऊ नका. विशेषतः तुम्ही कोण आहात हे येथील विद्यार्थ्यांना न कळलेलंच बरं.

बलराम : गुरुवर्य, आपण बिलकुल चिंता करू नये. येथे असेपर्यंत आम्हा दोघांकडून मथुरेचा उल्लेख देखील होणार नाही.

गुरू सांदीपनी : कृष्णा, गोकुळातील तुझ्या लीलांच्या कथा इथवर पोहोचल्या आहेत बरं का! तिथे तू अनेक गोपालांचा म्होरक्या होतास. मात्र इथे तू केवळ एक अध्यायी आहेस; हे विसरू नकोस. राजनिती, न्यायशास्त्र, धर्मशास्त्र, अश्व-गज-अस्त्र-शस्त्र संचालन, मंत्रोपनिषद, वेद - उपनिषद अशा चौसष्ट विद्या इथे या आश्रमात शिकवल्या जातात. ज्या विद्यार्थ्याची जशी गती आणि जी गरज असेल तो त्याप्रमाणे त्या विद्येचे अध्ययन करतो. माझी अशी मनापासून इच्छा आहे की या आश्रमात राहून तू आणि बलरामाने सर्वच चौसष्ट विद्यांचे अध्ययन पूर्ण करावे.

श्रीकृष्ण : गुरुवर्य, आपली इच्छा आम्हा दोघांनाही शिरसावंद्य आहे. कोणत्या अध्ययनापासून सुरवात करावी आम्ही?

गुरू सांदीपनी : कृष्णा, अस्त्र-शस्त्र, अश्वरोहण, गजरोहण यासारख्या विद्या शिकण्यासाठी प्रथम तुला योग्य शरीरयष्टी प्राप्त करणे आवश्यक आहे. बलरामाने मात्र गोकुळामध्ये असताना योग्य मेहेनत घेतल्यामुळे तो या शारीरिक मेहेनतीला तयार आहे. त्याला या विद्यांचे शिक्षण लगेच सुरू करणे शक्य आहे. तरी मी असे ठरवले आहे की प्रथमतः तू मंत्रोपनिषदांचे शिक्षण घ्यावेस आणि बलरामाने अस्त्र-शस्त्र शिक्षणास सुरवात करावी.

बलराम : गुरुवर्य, आपण आमच्यासाठी जो निर्णय घ्याल तो योग्यच असणार याची आम्हाला खात्री आहे. आपली आज्ञा शिरसावंद्य.

असे म्हणून बलराम आणि श्रीकृष्ण गुरू सांदिपनींच्या कुटीमधून बाहेर पडले.

श्रीकृष्ण : दादा, तू अस्त्र-शस्त्र शिकायला सुरवात करणार आणि मला मात्र मंत्रोपनिषद शिकावे लागणार. रोज पहाटे उठून आश्रम सेवा करायची आणि मग हवनाच्या वेळी गुरूंसमवेत मंत्र पठण करायचे यात काही मजा नाही रे. तू गुरू सांदीपनींना का नाही सांगत की मी शारीरिक मेहेनत करून शरीर कमावेन. पण मला देखील तुझ्यासोबत ठेवावे.

बलराम : छोट्या, गोकुळात असताना मी तुला कित्येकदा सांगत असे की केवळ दही-लोणी चोरण्यापलीकडे काहीतरी कर. थोडी तब्बेत सुधार. त्यावेळी तर तू माझं ऐकलं नाहीस. आता गुरूंनी जे ठरवून दिलं आहे, ते त्यांना सांगून बदलून घ्यायला मात्र मला सांगतो आहेस. हे काही बरोबर नाही. गुरू सांदीपनींनी आपल्यासाठी जे ठरवलं आहे ते काहीतरी विचार करूनच न? सर्वात महत्वाचं म्हणजे सतत माझा ओचा धरून माझ्या मागे-मागे करणं आता बंद कर बघू. थोडं स्वतःच्या हिमतीने जगायला शिक की. तुझं हे माझ्या मागे राहाणंच कदाचित गुरूंनी ओळखलं असेल; आणि म्हणूनच तुला स्वतःच्या पायावर उभा करण्यासाठी आपल्या दोघांना दोन वेगळ्या विद्या शिकण्यासाठी सांगितलं असेल. त्यामुळे कोणतीही कुरकुर न करता तू तुझ्या कुटीच्या दिशेने जा बघू.... आणि लक्षात ठेव तुझ्या सोबत तिथे बहुतांशी ब्राम्हण कुमार असतील. त्यामुळे तू मथुरेचे राजे वसुदेव यांचा पुत्र आहेस; हे कोणालाही कळू देऊ नकोस. नाहीतर त्या दडपणापाई तुझ्याशी कोणी मैत्री करायचे नाही.

कृष्ण : दादा, मी मुद्दाम कशाला सांगेन कुठून आलो आहे! बरं... चलतो मी माझ्या कुटिकडे.

अशाप्रकारे बलराम आणि कृष्णाने गुरू सांदीपनींनी दिलेल्या आदेशाप्रमाणे आपापल्या अध्ययनाची सुरवात केली. कृष्णासोबत त्याच्या कुटीमध्ये अजून दोन कुमार राहात होते. एकाचे नाव होते सुदामा आणि दुसरा होता केवल. केवल एका श्रीमंत सावकाराचा कुमार होता. तो येथे व्यवहार निती शिकण्यासाठी आला होता. मात्र त्याला देखील काही विशेष कारणामुळे प्रथम मंत्रोपनिषद शिकण्याचा सल्ला गुरू सांदीपनींनी दिला होता. त्याला तो अजिबात मंजूर नव्हता. त्यामुळे तो कायम अध्ययन टाळत असे. सुदामा मात्र एका भिक्षुकी करणाऱ्या गरीब ब्राम्हणाचा मुलगा होता. तो अत्यंत हुशार आणि एकपाठी असल्याने त्याच्या पित्याने प्रयत्नपूर्वक त्याला गुरू सांदीपनी सारख्या उत्तम गुरूंकडे अध्ययनाला ठेवले होते. सुदामा देखील मनलावून मंत्रोपनिषद शिकत होता. त्याची एक सुप्त इच्छा होती की त्याने ज्ञानदान करावे. अर्थात त्याच्या दृष्टीने ही इच्छा म्हणजे मुंगीने आकाशाला गवसणी घालण्याइतके मोठे स्वप्न होते. त्यामुळे मनातील इच्छा तो कधीच कोठेही बोलून दाखवत नसे. आपल्या वडिलांप्रमाणेच आपण देखील आयुष्यभर भिक्षुकी करणार आहोत; हे सत्य त्याने स्वीकारले होते. कृष्ण आणि सुदामा इतर विद्यार्थ्यांसोबत गुरू सांदीपनींनी आखून दिलेला दिनक्रम तंतोतंत पाळत असत. केवल मात्र कायम पळवाटा शोधत असे. त्यामुळे कृष्ण आणि सुदामा सोबत तो कधीच नसे. कृष्ण आणि सुदामा मात्र दिवस-रात्र सतत सोबत राहू लागल्यामुळे त्यांच्यात घट्ट मैत्री निर्माण झाली होती. एकमेकांची काळजी घेणं; एकमेकांना आवश्यकतेनुसार मदत करणं यातून ही मैत्री चांगलीच गहिरी होऊ लागली होती.

गुरू सांदीपनींची शिस्त खूपच कडक होती. आश्रमातीलं सर्वच विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणाच्या शाखेप्रमाणे आश्रमातील कामांची वाटणी करून देण्यात आली होती. मंत्रोपनिषद शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना सतत गुरूंसोबत राहावे लागत असे; त्यामुळे त्यांच्यावर होमासाठी लागणाऱ्या तयारीची जवाबदारी असे. रोज पाहाटे उठून होमासाठी सुकलेली लाकडे गोळा करणे, फुले गोळा करणे, त्यांचे हार करणे ही कामे तर रोजचीच होती. त्यामुळे रोज प्रथम प्रहरी उठून जंगलात जाणे कृष्ण आणि सुदामाला नवीन राहिले नव्हते. मात्र संध्या समय होता-होता गुरू सांदीपनी नदीच्या दिशेने एकटेच जात असत. त्यामुळे संध्याकाळी मंत्रोपनिषद शिकणारे कुमार काहीसे मोकळे होत असत. आश्रमातील सर्वच विद्यार्थ्यांच्या भोजनाची व्यवस्था गुरू पत्नी पाहात असत. मग हे कुमार गुरू मातेला मदत करण्यासाठी स्वतःहून जात असत. कधी कधी या मदतीचे कौतुक करण्यासाठी गुरुमाता या कुमारांना काही वेगळा खाऊ देत असे. असा खाऊ कृष्ण आणि सुदामा आवडीने वाटून खात.

असेच दिवस झपाट्याने पुढे सरकत होते. कृष्ण आणि सुदामाचे उपनिषदांचे शिक्षण पूर्ण होत आले होते. शिक्षण पूर्ण होत आल्यामुळे सुदामा खुश होता. आपल्या गावाकडे माता-पित्याकडे परतण्यास तो खूपच उत्सुक होता. एका संध्याकाळी कृष्ण सांदीपनी गुरूंच्या सेवेत असताना सुदामा गुरुमातेला मदत करण्यासाठी माजघरात गेला. गुरुमातेने सांगितलेले प्रत्येक काम सुदामाने झटपट करून टाकले. त्यावर मातेने कौतुकाने एक पुरचुंडीभरून मऊसूत पोहे सुदामाला दिले आणि म्हणाली;"बाळा, तू आणि कृष्ण वाटून घ्या बरं का." हसून मानेनेचे रुकार देत मिळालेली कौतुकाची पुरचुंडी घेऊन सुदामा माजघरातून बाहेर पडला.

त्याचवेळी कृष्ण आणि सांदीपनी गुरू होम कुंडाजवळ बसून बोलत होते.

गुरू सांदीपनी : श्रीकृष्णा, उज्जयिनीमधील माझ्या या आश्रमामध्ये अध्यापनाला येऊन तू उज्जयिनीमध्ये दिल्या जाणाऱ्या शिक्षणाचे महत्व पर्वत शिखरावर नेऊन ठेवले आहेस. पुढे येणाऱ्या सर्वच युगांमध्ये उज्जयिनीमधील शिक्षण हे सर्वश्रेष्ठ राहील ते केवळ तुझ्या येथील या वास्तव्यामुळे. वासुदेवा, खरं तर मी कोण तुला शिकवणारा? तू कोण आहेस याची मला जाणीव आहे; आणि म्हणूनच तुझ्या सहवासाचा मोह मी टाळू शकलो नाही. त्यामुळे मंत्रोपनिषदांचे शिक्षण तू प्रथम घ्यावेस असं सांगून तुझ्या मंगलमयी अस्तित्वाची सोबत माझ्या निकट ठेवण्याची मनतील इच्छा मी पूर्ण करून घेतली आहे. मात्र आता हे शिक्षण पूर्ण होत आले आहे आणि तुला अस्त्र-शस्त्र शिक्षणासाठी पुढील शाखेत जाणे क्रमप्राप्त आहे.

यावर मंद स्मित करीत श्रीकृष्ण काही बोलणार एवढ्यात त्याला समोरून सुदामा येताना दिसला. त्याला पाहाताच गुरू सांदीपनी म्हणाले : श्रीकृष्णा, तो पहा तुझा जिवलग मित्र इथेच येतो आहे. तू कोण आहेस हे माहीत नसूनही तुझ्यावर जीवापाड माया करतो तो. खरं तर सुदामा अत्यंत हुशार आणि एकपाठी विद्यार्थी आहे. तो स्वतः देखील मंत्रोपनिषदांचे उत्तम अध्यापन करू शकतो. मात्र दुर्दैवाने भिक्षुकी करणाऱ्या ब्राम्हण घरातील कुमार असल्याने तो आयुष्यभर भिक्षुक राहणार. अर्थात एक उत्तम गुरू समाजाला लाभण्यासाठी कोणीतरी पुढाकार घेणे जरुरीचे असते; हे तुला सांगण्याची गरज नाही. असो! तो याच दिशेने येतो आहे; त्यामुळे याहून जास्त काही बोलणे योग्य नाही.

गुरूंचे बोलणे ऐकून श्रीकृष्ण उठून उभा राहिला आणि गुरूंना नमसकार करून सुदामाच्या दिशेने गेला.

सुदामा : कृष्णा, काय सांगत होते रे गुरुवर्य?

श्रीकृष्ण : तसं काहीच नाही रे. आपलं शिक्षण पूर्ण होत आलं आहे न, तर मी पुढे काय शिकावं ते सांगण्यासाठी त्यांनी मला बोलावून घेतलं होतं.

सुदामा : खोटं नको हं बोलुस कृष्णा. गुरुवर्य नक्की माझ्याबद्दल तुझ्याशी काहीतरी बोलत होते. सांग बघू काय बोलत होते.

श्रीकृष्ण : मी का खोटं बोलेन सुदामा? बरं, ते जाऊ दे. तू माजघराकडून येतो आहेस. काही दिलं आहे का गुरुमातेने? मला नं भूक लागली आहे. मात्र भोजनाची वेळ अजून झालेली नाही. जर गुरुमातेने काही दिलं असेल तर आपण खाऊया का?

सुदामा : अरे आज काहीच दिलं नाही गुरू मातेने. मला देखील थोडी भूक आहे. पण आपल्याला भोजन समय होइपर्यंत थांबावंच लागणार असं दिसतं आहे.

श्रीकृष्ण : हो का? बरं! मग आपण आपल्या कुटिकडे जाऊ चल.

सुदामा : तू हो पुढे. गुरुमातेने मला थोडं काम दिलं आहे ते पूर्ण करून मी आलोच.

असं म्हणून सुदामा श्रीकृष्णाला तिथेच सोडून दुसरीकडे निघून गेला. दूर जाणाऱ्या सुदामाकडे मंद स्मित करत बघून श्रीकृष्ण त्याच्या कुटिकडे गेला.

खरं तर सुदामाला कृष्णाचा काहीसा राग आला होता त्याक्षणी. गुरू सांदीपनी आपल्याकडे बघत कृष्णाला काहीतरी बोलले याची त्याला खात्री होती. मात्र कृष्ण मुद्दाम ते आपणास सांगत नाही आहे असं त्याचं मन त्याला सांगत होतं. म्हणूनच गुरुमातेने दिलेले चविष्ट मऊसूत पोहे कृष्णाला न देता एकट्यानेच खावे असं त्याने रागाच्या भरात ठरवलं होतं आणि कृष्णाला सोडून तो निघून गेला होता. थोडं पुढे जाऊन सुदामाने मागे वळून पाहिलं तर कृष्ण कुटीच्या दिशेने जाताना त्याला दिसला. ते पाहाताच एक झाडाच्या पारावर बसून त्याने ते पोहे संपवून टाकले आणि मग कुटीच्या दिशेने गेला.

काही दिवसातच मंत्रोपनिषद शिक्षण संपल्याचे गुरू संदीपनींनी सर्व कुमारांना सांगितले. जे कुमार पुढील अजून काही शिक्षण घेणार होते त्यांना त्या शाखेकडे जाण्यास गुरूंनी सांगितले आणि जे आश्रम सोडणार होते; त्यांना निरोप दिला. आश्रम सोडताना सुदामाच्या डोळ्यातून पाणी खळत नव्हते. तो क्षणोक्षणी कृष्णाला मिठी मारत होता.

सुदामा : तुला सोडून जाण्यास मन तयारच होत नाही रे कृष्णा. तुझ्या सोबत असताना लक्षात नाही आलं पण तुझ्या अस्तित्वात एक जादू आहे. तू सोबत असताना कोणतीही चिंता मनाला स्पर्श करत नाही. मात्र आता तुला सोडून जाणार या विचाराने देखील मी अस्वस्थ झालो आहे.

श्रीकृष्ण : असं म्हणून कसं चालेल मित्रा? आयुष्य हे एका झऱ्यासारखं वाहत असतं. केवळ पुढे जाणंच आपल्या आहात आहे बरं.

सुदामा : कृष्णा.....

श्रीकृष्ण : बोल प्रियवरा....

सुदामा : अहं! काही नाही. निघतो मी...

असं म्हणून आपलं गाठोडं उचलून सुदामा निघाला. का कोणास ठाऊक पण निघताना त्याच्या मनात काही दिवसांपूर्वीची ती संध्याकाळ घोळत होती. क्षणभराच्या रागापाई आपण आपल्या प्रिय मित्रासाठी आणलेले पोहे एकट्यानेच खाल्ले; हा विचार त्याच्या मनाला डाचत होता. मात्र आता वेळ निघून गेली; असा विचार करून सुदामा चालत राहिला. आपल्याच विचारांच्या तंद्रीमध्ये जाणाऱ्या सुदामाकडे बघून श्रीकृष्णाने काहीशा खेदाने मान हलवली आणि त्याच्याकडे पाठ केली.

दिवस-महिने-वर्ष सरत होती. आता सुदामाचे लग्न झाले होते. त्याला मुले देखील झाली होती. वृद्धापकाळाने त्याच्या माता-पित्याना देवाज्ञा झाली होती. हुशार, एकपाठी सुदामाचे अध्यापनाचे स्वप्न भिक्षुकीच्या पात्रात विलीन झाले होते. अठराविश्व दारिद्र्य त्याच्या कुटीमध्ये वास करत होते. मुलांना रोजचा अन्नाचा घास मिळणे देखील अवघड झाले होते. तरीही सुदामाची सुशील पत्नी कोणतीही तक्रार न करता संसार करत होती. मात्र मुलांच्या होणाऱ्या आबाळीमुळे मनातून कायम दुःखी राहात होती.

एकदिवस त्यांच्या गावी काही प्रवासी आले. ते धर्मशाळेमध्ये उतरले होते. हे प्रवासी श्रीमंत सावकार असल्याचे समजल्यामुळे सुदामा भिक्षुकी मिळण्याच्या आशेने धर्मशाळेमध्ये गेला; आणि धर्मशाळेमध्ये समोर केवल या आपल्या गुरुबंधुला बघून आश्चर्यचकित झाला आणि ओशाळला देखील. सुदामाला पाहून केवल देखील आश्चर्यचकित झाला. केवलची नजर चुकवून परत निघालेल्या सुदामाचा केवलने हात धरला आणि त्याला आपल्या बाजूला प्रेमाने बसवले.

केवल : अरे सुदामा, तू इथे काय करतो आहेस? काय ही तुझी परिस्थिती मित्रा? गुरू सांदिपनींच्या आश्रमातील सर्वात हुशार आणि एकपाठी विद्यार्थी होतास तू. मला तर वाटलं होतं की तू देखील गुरू सांदीपनीं प्रमाणे आश्रम चालवत असशील.

सुदामा : केवल, मित्रा, मी कुठून मोठा होणार? माझे वडील भिक्षुकी करत असत. मी शिक्षण घेत होतो त्यावेळी मनात होतं की घेतलेलं शिक्षण आश्रमातील विद्यार्थ्यांना दान करावं. पण शिक्षण संपलं आणि आयुष्याचं सत्य समोर येऊन उभं राहिलं बघ. केवळ हुशार असून काही होत नाही. त्यासाठी नशीब देखील लागतं.

केवल : असं नको म्हणूस मित्रा. नशीबाहून देखील मोठी गोष्ट तुझ्याकडे आहे. मात्र तुला अजून त्याची जाणीव झालेली दिसत नाही.

सुदामा : नशीबाहून देखील मोठं काही असतं का केवल?

केवल : अरे ज्याचा जिवलग श्रीकृष्णासारखा द्वारकाधिश आहे; अशा तुझा मला हेवा वाटतो. अरे, नुकताच मी द्वारकेहून येतो आहे. श्रीकृष्णाने मथुरेपासून दूर स्वतःची अशी द्वारकानगरी वसवली आहे. सर्व सुखसोयींनी युक्त अशा नगरामध्ये सर्वच नागरिक आनंदाने राहात आहेत.

सुदामा : कोणाबद्दल बोलतो आहेस तू? कृष्णाबद्दल? माझ्या परमप्रिय मित्राबद्दल? तो राजा आहे?

केवल : कमाल करतोस सुदामा. तुला नाही माहीत? मथुरेचे राजे वसुदेव यांचा सुपुत्र श्रीकृष्ण! त्याच्या राजनिती निपुणतेची चर्चा विश्वभरात होते; कृष्णनिती म्हणून जी ओळखली जाते असा हुषारीचा, ज्ञानाचा, सर्जनशीलतेचा महासागर म्हणजेच तुझ्या माझ्यासोबत गुरू सांदीपनी यांच्या आश्रमातील कृष्ण आहे. तुला हे माहीतच नाही?

सुदामा : अरे, संसाराच्या धकाधकीमध्ये आणि दोन वेळच्या अन्न भ्रांतीपुढे इतर काही समजून घेण्यासाठी मला वेळच मिळाला नाही. बरं! तू द्वारकेला जाऊन आला आहेस तर आपल्या मित्राला भेटलाच असशील. तुला ते अवघड देखील नाही. एक मोठा सावकार आहेस तू.

केवल : इथेच तू चुकतो आहेस मित्रा. मी भले मोठा सावकार असेन. पण मी कृष्णसखा नाही. आश्रमामध्ये ज्यावेळी त्याच्याशी मैत्री करणं शक्य होतं त्यावेळी मी त्याला बघून न बघितल्यासारखं केलं. आज केवळ पैशाच्या जोरावर मी त्याला भेटण्याचं मानत आणलं तरी तो ते कधीच मान्य करणार नाही; हे मला माहीत आहे. तो पैशापेक्षा भावनेला तोलतो मित्रा. तू इथे असा भिक्षुकी करण्यापेक्षा त्याला जाऊन भेट. तो नक्की तुला भेटेल.

केवलचे बोलणे ऐकून सुदामा अंतर्मुख झाला आणि आपल्या घराकडे वळला. घरी येऊन त्याने आपल्या पत्नीस सर्व घटना कथन केली. सुदामाचे बोलणे ऐकून त्याची पत्नी हर्षभरीत झाली.

सुदामा पत्नी : काय सांगता? तुमचे मित्र द्वारकाधिश महाराज आहेत? तुम्हाला कसं माहीत नव्हतं ते? अहो, इतका मोठा मित्र असून देखील आपण असे दारिद्र्यात का राहातो आहोत. तुमच्या सावकार मित्राने तुम्हाला योग्य सल्ला दिला आहे. तुम्ही खरोखरच द्वारकाधिशांना जाऊन भेटलं पाहिजे.

सुदामा पत्नीचे बोलणे ऐकून विचारात पडला. बालपणी ज्या कृष्णासोबत आपण प्रतिदिनी प्रत्येक क्षण जगलो तो आता एक मोठ्या नगरीचा राजा आहे. त्यावेळी आपण दोघेही विद्यार्थी होतो. मात्र आता आपण केवळ एक भिक्षुक आहोत. आपल्यामधील दरी खुप मोठी आहे. असे असताना का बरे त्याने आपल्याला भेटावे? मनातील विचार त्याने आपल्या पत्नीला बोलून दाखवला.

सुदामा पत्नी : तुम्ही म्हणता ते खरं असेलही कदाचित. आता ते महाराज आहेत. आपल्यासारख्या गरीब व्यक्तीला ते कदाचित आपणहून भेटणार देखील नाहीत. परंतु आपले मित्रवर्य केवल यांनी काय म्हंटलं ते आपण कसं विसरता? श्रीकृष्ण महाराज भावनांचे भुकेले आहेत. तुम्ही त्यांच्याकडे काही मागण्यासाठी नका जाऊ. केवळ सुखदुःखाच्या चार गोष्टी करण्याच्या उद्देशाने जा. ते महाराज आहेत. त्यामुळे ते योग्य विचार करतीलच. आजवरचे आयुष्य आपण नशिबावर सोडलं आहे न? तद्वतच ही भेट देखील तुम्ही नशिबावर सोडून द्या.

सुदामाला पत्नीचे म्हणणे पटले आणि तो जाण्यास तयार झाला. दुसऱ्या दिवशी पहाटेच्या पहिल्या प्रहरी उठून स्नान-संध्या आटोपून सुदामा श्रीकृष्णाला भेटण्यासाठी निघाला. सुदामा निघत असताना त्याच्या पत्नीने त्याच्या हातात एक लहानशी पुरचुंडी दिली.

सुदामा पत्नी : हे घेऊन जा आपण. गोड, मऊसूत पोहे आहेत यात. आपण रिकाम्या हातांनी जाणे योग्य नाही. ते द्वारकाधिश आहेत. राजे आहेत. त्यांना काय कमी? तिथे तुमचं स्वागत नक्कीच खूप मोठं होईल. पण तरीही आपल्याकडून काहीतरी नेणं हे आपलं कर्तव्य आहे.

सुदामाने काहीएक न बोलता ती पुरचुंडी घेतली आणि तो द्वारकेच्या दिशेने निघाला. मजल दरमजल करीत तो द्वारकेला पोहोचला. संपूर्ण प्रवासामध्ये सोबत असणारी ती पोह्यांची पुरचुंडी सुदामाच्या मनात लहानपणच्या आठवणीचं काहूर उठवत होती. कधीतरी एक वांझोट्या रागापाई आपल्या जीवलगाच्या वाटणीचे पोहे आपण खाल्ले होते; हा विचार त्याला आजही अस्वस्थ करत होता. बालवयातील आपल्या वागण्याचा पश्चात्ताप सुदामाला संपूर्ण प्रवासात होत होता. द्वारकेला पोहोचेपर्यंत त्याची अस्वस्थता इतकी वाढली की तिथे पोहोचताच तो परत निघण्याचा विचार करू लागला. बरेच अंतर चालल्यामुळे सुदामा दमला होता. त्यामुळे आज एकदिवस धर्मशाळेमध्ये विश्रांती घेऊन उद्या परतीचा प्रवास सुरू करावा असा विचार त्याने केला. घरी जाऊन पत्नीस सांगता येईल की द्वारकाधिश भेटलाच नाही. दिवसभर द्वारकानागरीमध्ये फिरून सुदामाने नगरीचे सौंदर्य आणि श्रीमंती बघितली. प्रशस्त रस्ते, मोठे-मोठे प्रासाद, अंतरा-अंतरावरील बगीचे, सर्व वस्तूंनी भरलेली बाजारपेठ आणि सुखी-समाधानी चेहेऱ्याचे नागरिक बघून त्याचे मन भरून आले आणि श्रीकृष्णाला भेटण्याच्या विचाराचे दडपण देखील आले. 'आपल्या आयुष्यातील दुःख काय सांगायचे त्या राजाला?' हा मनातील विचार त्याला पूर्ण पटला.

पुढील दिवशी सुदामा आल्या वाटेने परत निघण्यासाठी धर्मशाळेतून बाहेर आला आणि बघतो तर काय त्याचा लाडका मित्र त्याच्या समोर उभा होता. कृष्णाला सामोरे पाहिल्यावर मात्र सुदामाच्या मनाचा बांध फुटला आणि धावत जाऊन त्याने श्रीकृष्णाला मिठी मारली. सुदामाला बाहुपाशात घेत श्रीकृष्णाने देखील आपल्या डोळ्यातल्या अश्रूंना वाट करून दिली. काही क्षण दोघे जगाला विसरून गेले होते. दोघे भानावर आले आणि मिठीतुन मोकळे होत दोघांनी अत्यंत प्रेमाने एकमेकांकडे बघितले.

श्रीकृष्ण : न भेटताच जाणार होतास प्रियवरा?

सुदामा : खूप मोठा राजा झालास की तू..... तुम्ही! मी एक भिक्षुकी करणारा गरीब ब्राम्हण आहे महाराज. मनात इच्छा असूनही तुमच्यापर्यंत पोहोचणे मला शक्य होते का? म्हणूनच परत निघालो होतो.

श्रीकृष्ण : आता भेटला आहेस न? मग दोन दिवस राहा कसा. माझा पाहुणचार घे आणि मग जा परत.

श्रीकृष्णाची इच्छा सुदामाने लगेच मान्य केली आणि त्याच्यासोबत तो त्याच्या महालाकडे निघाला. ते दोन दिवस कसे सरले त्या दोन जिवलग मित्रांना कळलेच नाही. गुरू सांदीपनींच्या आश्रमातील जुन्या आठवणींमध्ये दोघे रमून गेले होते. दोन दिवस झाले आणि सुदामा श्रीकृष्णासमोर उभा राहिला.

सुदामा : श्रीकृष्णा, इथे येताना मनावर एक दडपण होतं; तुझी ही नगरी बघितल्यानंतर तर ते फारच वाढलं होतं... मात्र तुला भेटलो आणि मनातल्या सगळ्या शंका-कुशंका दूर झाल्या. तुला भेटलो... बालपणीचे दिवस आठवून सुखावलो. पण आता मला परतलेच पाहिजे. घरी माझी पत्नी आणि मुलं वाट बघत असतील.

श्रीकृष्ण : निघतोस मित्रा? ठीक! निघ... मी अडवणार नाही.

असे म्हणून श्रीकृष्णाने सुदामाला आलिंगन दिले. सुदामा आलिंगनामध्ये असताना अत्यंत हळू आवाजात पण अत्यंत मिश्कीलपणे श्रीकृष्ण सुदामाला म्हणाला.... आता तरी माझे हक्काचे पोहे देणार ना मित्रा? आलिंगनातील सुदामाने ते ऐकले आणि मंद स्मित करीत तो म्हणाला.... गुरू सांदीपनी काय म्हणाले होते रे माझ्याकडे बघत?

आलिंगनामधून मोकळे होत दोघेही मनसोक्त हसले. सुदामा भाऊजींना निरोप देण्यासाठी जवळच उभ्या असलेल्या रुक्मिणीला त्या दोघांच्या अचानक हसण्याचे कारण काही कळले नाही. मात्र परतीच्या प्रवासाला निघालेल्या सुदामा भाऊजींनी एक लहानशी पुरचुंडी आपल्या पतीच्या हातात ठेवताना तिने पाहिले.

सुदामा गेला त्या दिशेने बघत ती प्रेमभरली पुरचुंडी सोडून श्रीकृष्णाने चिमूटभर पोहे तोंडात टाकले आणि मनभर तृप्ती त्याच्या चेहेऱ्यावर दिसू लागली.

सुदामा परतीच्या वाटेवर गेल्या दोन दिवसांचा विचार करत मनाने समाधान पावत होता. मात्र जसजसे त्याचे गाव जवळ येऊ लागले तसतसा त्याच्या मनात विचार येऊ लागला की आपण तर श्रीकृष्णाकडून काहीच न घेता आलो परत. काय उत्तर द्यावे बरे पत्नीला आणि आशेने वाट बघणाऱ्या आपल्या लेकरांना? विचार करत करत आपल्या कुटिपर्यंत पोहोचलेला सुदामा समोरील दृश्य पाहून सीमित झाला होता...

सुदामाच्या समोर एक प्रशस्त आश्रम उभा होता. त्याची पत्नी आणि त्याची मुले त्याला सामोरी आली.

सुदामा : हे काय ग? आपली कुटी कुठे गेली? हा आजूबाजूचा परिसर इतका कसा बदलून गेला?

सुदामा पत्नी : आपण द्वारकेहून निघालात आणि आपण इथे पोहोचण्याच्या अगोदरच द्वारकाधिश श्रीकृष्ण महाराजांच्या खास मर्जीमधील स्थापत्य विशारद इथे आले. त्यांनी आपल्या नगरीच्या महाराजांशी बोलून आपल्या पर्णकुटीच्या जागेवर आश्रम उभारण्याचा श्रीकृष्ण महाराजांचा मानस सांगितला आणि परवानगी घेऊन मगच हा आश्रम उभारला आहे. नाथ, तुमच्या मित्राने; महाराज श्रीकृष्णांनी तुमच्यासाठी निरोप पाठवला आहे.... गुरू सांदीपनींनी तुमच्यामधील एक उत्तम गुरू ओळखला होता. त्यामुळे आता पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करून अध्यापनाचे पुण्यकर्म तुम्ही करावे अशी महाराजांची इच्छा आहे.

द्वारका सोडताना आपल्या जिवलग मित्राने आपल्याला आलिंगन देऊन रागावरील ताबा काय मिळवून देऊ शकतो हे कृतीतून दाखवून दिल्याचे लक्षात येऊन गुरू सुदामांनी मनापासून स्मित केले आणि आपल्या आश्रमाच्या दिशेने ते वळले.

(ही संपूर्ण कथा काल्पनिक आहे. आपण पुराण कथांमध्ये कायम हेच वाचले आहे की श्रीकृष्णाने सुदामाच्या झोपदीचा महाल केला होता. तो राहात असणाऱ्या अस्मावतीपुराचे नाव सुदामापुरी झाले होते. मात्र मला या कथेमध्ये कायम विसंगिती वाटत आली आहे. सुदामा एक ब्राम्हण होता. त्यामुळे एका राज्य शासकापेक्षा तो एक उत्तम गुरू झाला असता; असं माझं मन मला कायम सांगत आलं आहे. याच कल्पनेचा विस्तार मी येथे केला आहे.)