Friday, April 24, 2020

मंथरा

मंथरा

"काय सांगू मंथरे, चाकाची कुणी निघाली होती. रथ पुढे काढणे अशक्य होते. चारही बाजूंनी दानवांनी घेरले होते आमच्या रथाला. महाराज त्यांच्या अमोघ शरसंधानाने समोरील दानवांना दूर ठेवत होते. परंतु रथ त्या व्यूहातून बाहेर निघणे अत्यंत आवश्यक होते. क्षणभराचा विचारही न करता मी रथाचा लगाम दातांमध्ये धरून कुणीच्या जागी माझी अंगुली लावली आणि एकच असा आसूड ओढला हवेत; क्षणभरासाठी दिशाहीन झालेले माझे प्रिय अबलख मारुत, वारुण, चापल्य आणि माझी लाडकी शलाका! माझ्या अंतर्मनाची भाषा समजून घेत त्यांनी उधळून दिले स्वतःला त्या व्यूहातून. समोरील दानवांच्या लक्षात येण्याआगोदरच आम्ही व्यूहाच्या बाहेर होतो. आमची सुटका झालेली पाहाताच आपल्या अयोध्येचे शूर आणि हुशार सैनिक आणि ज्यांच्यासाठी महावीर महाराज दशरथ धावून गेले असे भयभीत झालेले देव सर्वच दानवांवर असे काही तुटून पडले की त्यांना युद्धभूमीमधून पळून जाण्या व्यतिरिक्त काही उपाय उरला नाही. संध्या समय समीप आला होता. त्यावेळी युद्ध थांबते तर दुष्ट दानवांना जोर धरण्यास अवधी मिळाला असता; हे महाराजांच्या अंतरीचे विचार ओळखून मी रथ तसाच पळणाऱ्या दानवांच्या मागे पळवला. आम्ही दानवांचा पाठलाग करतो आहोत पाहून आपल्या सैनिकांना आणि त्याचबरोबर देवांना देखील जोर आला आणि सूर्यनारायण कलायच्या आत आम्ही दानवांवर विजय मिळवला. रथ थांबला आणि चाकाच्या कुणीमधून हात बाजूला करतानाच मी मूर्च्छित झाले.

ज्यावेळी मी नेत्र उघडले त्यावेळी मी युद्धभूमीवरील उभारलेल्या आमच्या शिबिरामध्ये होते. राजवैद्यांनी आवश्यक ते लेप लावून माझा हात औषधी पर्णामध्ये बांधून ठेवला होता. मी मंचावर पहुडले होते आणि महाराज नेत्रांमध्ये अश्रू आणून माझ्या मुखाचे निरीक्षण करत होते. त्यांना पाहून मी उठणार तोच त्यांनी मला अडवले आणि म्हणाले; 'कैकयी, प्रिये... आज केवळ तुझ्यामुळे हा विजय देवांना प्राप्त करून देऊ शकलो. हा दशरथ देखील केवळ तुझ्या शौर्यामुळे आणि प्रसंगावधानामुळे आज येथे तुझ्या जवळ बसला आहे.' 'आर्य आपण असे बोलून मला लाजवता आहात. मी केवळ माझे कर्तव्य करत होते;' मी म्हणाले."

कैकयीच्या हाताची शुश्रूषा करणारी मंथरा काही क्षणासाठी थांबली आणि आपल्याच तंद्रीमध्ये असणाऱ्या कैकयीला थांबवत म्हणाली;"महाराणी, आपलं कर्तव्य रथ हाकण्यापर्यंत मर्यादित होतं; असं आपलं माझ्या अल्पमतीला वाटतं." त्यावर एकवार मंथरेकडे बघत कैकयी म्हणाली;"मंथरे, युद्धभूमीवर रथ हाकताना जे जे म्हणून करावे लागते ते सगळेच कर्तव्य असते बरे!" यावर मनात असूनही मंथरा काही बोलली नाही. आजवरच्या अनुभवाने ती एक शिकली होती की राणी कैकयीला दशरथ महाराजांचा विरह झाला असला आणि ती त्या दुःखात असली की तेव्हाच ती मंथरेचे बोलणे ऐकत असे. त्यामुळे तिच्या मानत आले; आत्ता याक्षणी गप्प बसणेच योग्य. कैकयी परत एकदा मनानेच युद्धभूमीवर पोहोचली होती. तिने पुढील प्रसंग सांगण्यास सुरवात केली...

"तर... महाराजांनी माझ्याकडे अत्यंत प्रेमभराने पाहिले आणि म्हणाले 'कैकयी, राणी... आज हा दशरथ तुझ्या ऋनांमध्ये बांधला गेला आहे; आणि ते ही एकदा नाही तर दोनदा! तू त्या व्यूहातून माझी सुटका केलीस एवढेच नव्हे तर जीवावर उदार होऊन तू शत्रूचा पाठलाग केलास. तुझ्या या कृत्यामुळे आपले सैनिक आणि भयभीत झाल्याने किंकर्तव्यमूढ झालेले देव देखील इरेस पेटले आणि मला त्या दुष्ट दानवांवर विजय मिळवणे सहज शक्य झाले. आज दशरथाच्या शौर्य कथा जर विश्वात दुमदुमत आहेत तर त्या केवळ तुझ्यामुळे. सांग प्रिये; या ऋणातून मी कसा उतराई होऊ? आज तू जे मागशील ते देण्यास मी बांधील आहे. एक नाही दोन वर मागून घे प्रिय पत्नी. तो तुझा केवळ अधिकार नाही तर तुझ्या शूरतेला अयोध्येने केलेलं नमन आहे.' त्यांचे बोलणे ऐकून मी धन्य झाले होते मंथरे...." राणी आपल्या हाताची पीडा विसरून अजूनही त्या मंतरलेल्या क्षणामध्ये अडकली होती.

मात्र '.... एक नाही दोन वर मागून घे प्रिय पत्नी....' असे महाराज दशरथ म्हणाले, हे राणी कैकयीने म्हंटल्या क्षणापासून मंथरेचे कान तीक्ष्णपणे पति-पत्नीमधील पुढील वार्तालाप समजून घेण्यास उत्सुक झाले होते. त्यामुळे अचानक बोलणे बंद केलेल्या आपल्या राणीकडे बघून मंथरेने विचारले;"महाराणी, मग आपण काय मागून घेतलेत महाराजांकडून?" एक कटाक्ष मंथरेकडे टाकून कैकयी म्हणाली;"मी काहीही मागितले नाही." हे ऐकताच मंथरेचे मन अस्वस्थ झाले. हातातील लेप भरला सोन्याचा वाडगा एका बाजूला ठेवत मंथरा राणी कैकयीच्या कानाजवळ आली आणि म्हणाली;"महाराणी आपण काहीच मागितले नाहीत? मी आजवर आपणास जे सांगत आले आहे त्याचा आपण कधीच विचार का करत नाही?" मंथरेच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून कैकयी म्हणाली;"मी परोपरीने महाराजांना सांगायचा प्रयत्न केला की मला काहीही नको आहे. आपण प्रेमभराने माझे कौतुक केलेत यातच सर्व आले. परंतु महाराज काहीही ऐकायला तयार नव्हते. सरते शेवटी मी म्हणाले,'महाराज, आत्ता याक्षणी काय मागावे हे मला सुचत नाही आहे. तरी आपली परवानगी असली तर आपण दिलेले हे दोन वर मी योग्य वेळी मागून घेईन.' माझे बोलणे ऐकून महाराज मंद हसले आणि होकारार्थी मान हलवत म्हणाले,'प्रिये,जशी तुझी इच्छा! तुला योग्य वाटेल त्यावेळी तू हे दोन वर मागून घे. बर आता तुला विश्रांतीची आवश्यकता आहे. त्यामुळे मी निघतो'. आणि असे म्हणून महाराज त्यांच्या शिबिराच्या दिशेने गेले."

'.....आपण दिलेले हे दोन वर मी योग्य वेळी मागून घेईन.' राणी कैकयीने उच्चारलेले हे शब्द ऐकून मंथरेच्या मनातील विचारांनी परत एकदा उचल ख्खाली. तिचे डोळे आनंदाने चमकले. मात्र त्यावेळी काहीही बोलणे अयोग्य ठरेल हे अनुभवाने ती शिकली होती. त्यामुळे शांतपणे लेपाचा वाडगा उचलून मंचकापासून दूर होत ती म्हणाली;"महाराणींनी आता विश्रांती घ्यावी. आपण योग्य वेळी योग्य विचार करून वर मागाल याची या मंथरेला पूर्ण खात्री आहे. त्या योग्य वेळेची वाट पाहण्यास ही मंथरा तयार आहे." राणी कैकयीला मंथरेच्या त्या बोलण्याचा अर्थ कळला नाही; परंतु त्याक्षणी कैकयीच्या शरीरात आणि मनात एवढे त्राण नव्हते की कोणत्याही विषयावर ती अजून काही चर्चा करेल. त्यामुळे एकदा मंथरेकडे पाहून तिने तिचे नेत्र मिटले.

अशाच काही घटका गेल्या आणि महाराणी कौसल्या आणि राणी सुमित्रा कैकयीच्या अंत:पुरात येत असल्याची वर्दी अंत:पुराबाहेर उभ्या कलिकेने आत येऊन मंथरेला दिली. महाराणी कौसल्या आणि राणी सुमित्रा येत आहेत हे ऐकून मंथरेने नाक मुरडले आणि म्हणाली;"अग कलिके आत्ता कुठे राणी कैकयी यांचा डोळा लागला आहे. जिवावरच्या दुखण्यातून अजून त्या बऱ्या देखील झालेल्या नाहीत. युद्धभूमीवर खूप मोठा पराक्रम आपल्या राणींनी गाजवला हे जितके खरे आहे तेवढेच त्यांचा क्षीण अजून गेलेला नाही हे देखील खरे आहे. मग अशा वेळी त्यांना विश्रांती मिळावी म्हणून ना तुला बाहेर उभे केले होते? तरीही कोणी येत असल्याची वर्दी बरी घेऊन आलीस?" मंथरा अत्यंत कुजबुजत्या आवाजात कलिकेला रागवत असली तरी तिची कुजबुज कैकयीच्या कानापर्यंत पोहोचलीच. कैकयीने मंचकावर उठून बसण्याचा प्रयत्न करीत विचारले;"कोण आहे ग तिथे मंथरे? कोणाशी बोलते आहेस?" त्यावर एक जळजळीत कटाक्ष कलिकेच्या दिशेने टाकून मंथरा मंचकाजवळ गेली आणि म्हणाली;"राणी, आपण विश्रांती घेत असल्याने मी या कलिकेला स्पष्टपणे सांगून ठेवले होते की कोणीही आले तरी वर्दी घेऊन आत येऊ नकोस. तुम्हाला आराम वाटेपर्यंत उगाच भेटायला येणाऱ्यांची दगदग नको; असे आपले मला वाटले... तेही तुमच्यावरील माझ्या श्रद्धेमुळे."

मंथरेकडे मऊ नजरेने पाहात कैकयी म्हणाली;"मंथरे, मी विवाह करून अयोद्धेमध्ये आले ते तुला माझी पाठराखीण म्हणून घेऊनच. त्यामुळे तुझी माझ्यावरचा श्रद्धा आणि माझ्यावरील प्रेम याविषयी मला कदापिही संशय नाही. माझ्या मातेने माझी पाठवणी करताना मला म्हंटले होते की मंथरा तुला तुझी इच्छा असेपर्यंत साथ देईल.... आणि खरं सांगायचं तर इथे आल्यावर सर्वच नवीन असताना आणि दोन थोरल्या सवती असताना तुझं असणं मला कायम हवसं वाटलं. सुरवातीला स्त्रीसुलभ भावनेने मला माझ्या सवती आवडल्या नाहीत. त्यामुळे आपण दोघींनी सुरवातीला त्यांच्याबद्दल खूप काही अयोग्य चर्चा देखील केली. त्याकाळात महाराज केवळ माझे असावेत आणि त्यांनी केवळ माझ्या अंत:पुरात यावं ही माझी इच्छा होती. मात्र मी जसजशी मोठी होत गेले तसे मला महाराणी कौसल्या आणि राणी सुमित्रा यांच्या मोठ्या मनाचा उलगडा होत गेला. त्यांच्याबद्दल मनात असलेली अढी देखील पुसली गेली. त्यांच्याविषयी आदरपूर्ण प्रेमभाव माझ्या मनात निर्माण झाले. आज मला माझ्या सवती या माझ्या थोरल्या भगिनींप्रमाणे आहेत. मात्र तुझ्या मनातील अढी मात्र मी काढू शकले नाही. कितीदा तुला सांगितले की मनात काही एक विचार कायमचा धरून ठेऊ नये. मात्र तुला ते समजत नाही... काय करावे? जाऊ दे! महाराणी कौसल्या आणि राणी सुमित्रा मला भेटण्यासाठी येत असल्या तर तू कलिकेबरोबर बाहेर जाऊन थांब आणि त्या दोघींना आदराने आत घेऊन ये बरं!" कैकयीचे बोलणे ऐकून मंथरेने मान खाली घातली आणि ती अंत:पुराबाहेर जाऊन उभी राहिली. महाराणी कौसल्या आणि राणी सुमित्रा येताच त्यांना आदरपूर्वक तिने राणी कैकयीच्या अंत:पुरात आणले आणि त्या स्थानापन्न होताच ती केशरयुक्त दुधाचे पेले आणण्यास बाहेर पडली.

राणी कैकयीच्या मुदपाक घराकडे जाताना मंथरेच्या डोळ्यासमोरून आजवरचा तिचा जीवनपट पुन्हा एकदा झरझर जाऊ लागला. जेमतेम नऊ वर्षांची होती मंथरा; जेव्हा तिची माता तिला घेऊन अश्वपती महाराजांच्या महालात आली. महाराजांच्या बाजूलाच काहीशी मोठी दिसणारी एक खूपच सुंदर मुलगी राज वस्त्रे आणि कधी न पाहिलेले अलंकार घालून उभी होती.

अश्वपती महाराजांनी मंथरेला जवळ बोलावले आणि विचारले;"बाळ, तुझं नाव काय?"

एकवार आपल्या मातेकडे बघत धीट मंथरा ताठ उभी राहिली आणि म्हणाली;"मी मंथरा... अलका आणि वसू यांची कन्या. महाराज, ही आपणा शेजारी उभी आहे ती कोण?"

मंथरेचा धीटपणा बघून अश्वपती महाराजांना आश्चर्य वाटल्याशिवाय राहिले नाही. प्रेमाने आपल्या लाडक्या कन्येच्या डोक्यावरून हात फिरवत ते म्हणाले;"ही कैकयी. माझी कन्या... या राज्याची राजकुमारी... आणि कैकयी ही तुझी सखी. यापुढे ती कायम तुझ्यासोबत असणार आहे."

हे ऐकताच मंथरेने बावरून जाऊन आपल्या मातेकडे बघितले. तिच्या नजरेतील अस्वस्थता ओळखून महाराज अश्वपती म्हणाले;"मंथरे, तुझी आई कैकयीची दाई आहे. त्याअर्थी तू कैकयीची दुग्ध भगिनी झालीस."

महाराजांच्या मुखातून उच्चारलेले शब्द ऐकताच मंथरेने काहीशा आश्चर्याने परत एकदा कैकयीकडे बघितले आणि महाराजांना विचारती झाली;"मग याचा अर्थ मला देखील असेच उत्तमोत्तम वस्त्र आणि अलंकार मिळणार का?" महाराजांना तिच्या या प्रश्नाचे खूपच आश्चर्य वाटले. कारण हा प्रश्न विचारण्याइतकी ती मोठी नव्हती. पण काहीसे हसत त्यांनी म्हंटले;"कैकयीने उतरवलेली आणि तिला नको असणारी सारी वस्त्रे आजपासून तुझी मंथरे. कैकयी आपणहून तुला तिचे जे अलंकार देईल ते देखील तुझे होतील. अट मात्र एकच... यापुढे संपूर्ण आयुष्यात तू कैकयीची साथ सोडणार नाहीस.... आणि तुझ्या मनात कायम फक्त आणि फक्त कैकयीच्या सुखाचा, आनंदाचा आणि उत्कर्षाचा विचार असेल. बोल काबुल आहे?"

कैकयीच्या अंगावरील त्या तलम वस्त्रांकडे आणि अभूतपूर्व अलंकारांकडे पाहात मंथरेने होकारार्थी मान हलवली. मागे वळूनही न बघता तिने आपल्या मातेला म्हंटले;"जा तू माते. तुला आता यापुढील आयुष्यात माझी चिंता करायची गरज नाही. माझ्या इतर बंधू-भगिनींची काळजी कर तू... यापुढे मंथरा कायम सुखीच असेल." त्यानंतर एक पाऊल पुढे येऊन महाराजांना लावून प्रणाम करून तिने कैकयीकडे बघितले आणि हसून म्हणाली;"राजकुमारी, आपण अत्यंत सुंदर आहात. मी आयुष्यभराची तुमची सखी झाले यात मी माझा गौरव समजते. आपण यापुढे जे म्हणाल ते मला प्रमाण असेल."

महाराज अश्वपतींना क्षणात मंथरेच्या वागण्यात झालेला बदल लक्षात आला आणि त्यांनी मनात ही खूणगाठ बांधली की आपल्या सरळ आणि अत्यंत भावनिक कैकयीसाठी अगदी योग्य सखी मिळाली आहे. यापुढे कैकयीची काळजी करण्याचे कारण उरलेले नाही. कधी काळी जर कैकयीने भावनेच्या आवेगात काही निर्णय घेतला तरी मंथरा कैकयीसाठी योग्य आणि तिच्या सुखाचा विचार करून कैकयीला तिचा निर्णय बदलायला लावेल. कारण मंथरेला 'सुखाची व्याख्या' फारच लहान वयात कळली आहे.

असेच दिवस जात होते. कैकयी आणि मंथरा आता अगदी जवळच्या सख्या झाल्या होत्या. कैकयीला मंथरेशिवाय अजिबात करमत नसे. त्यामुळे अलीकडे तर मंथरा कैकयीच्या सोबत कायम असे. कैकयीने आपल्या तातांकडे हट्ट करून मंथरेसाठी एक खास राखीव असा भाग स्वतःच्या अंत:पुरात करून घेतला होता. त्यामुळे कैकयी झोपली की मग मंथरा तिच्या मंचकाच्या दिशेने जात असे आणि सकाळी दोघीही एकत्रच सूर्य नारायणाचे दर्शन घेऊन दिवसाची सुरवात करीत असत.

कैकयी आता मोठी झाली होती आणि तिचा विवाह अयोध्येचे महापराक्रमी महाराज दशरथ यांच्यासोबत ठरल्याप्रमाणे मोठ्या थाटामाटात पार पडला. कैकयीने अयोध्येला येताना आग्रहपूर्वक मंथरेला सोबत आणले; आणि मंथरा देखील आनंदाने कैकयी सोबत पुन्हा एकदा अखंडित ऐहिक सुख उपभोगण्यासाठी आली.

मात्र कैकयीची जवळीक प्रेमळ आणि सौम्य स्वभावाच्या महाराणी कौसल्या आणि राणी सुमित्राशी होऊ लागताच मंथरा मनातून अस्वस्थ झाली. तिने कितीही प्रयत्न केला तरी मूळच्या भावुक स्वभावाच्या कैकयीचा महाराणी कौसल्या आणि राणी सुमीत्रेच्या दिशेने वाढणारा ओढा ती कमी करू शकत नव्हती. सरते शेवटी मंथरेने विचारपूर्वक पावले उचलण्यास सुरवात केली.... आणि....

महाराज दशरथ अनेक दिवसांनंतर राणी कैकयीच्या अंत:पुरात येणार असल्याचा निरोप द्वारपाल घेऊन आला आणि राणी कैकयी आनंदाने शृंगाराच्या तयारीला लागली. तिने तिच्या सर्वच दासींना बोलावून घेतले. उत्तमोत्तम उटणी करून घेऊन कैकयीने अभ्यंग स्नान केले. मूलतः लांब आणि सुंदर असा केशसंभार सुगंधित धूप घालून वाळवून घेतला आणि कुशल दासिकडून अत्यंत मोहक अशी केशरचना करून घेतली. विचारपूर्वक तलम आणि मोहक वस्त्र आभूषणे चढवली. मंथरा देखील कैकयीच्या पुढे-मागे करत तिला शृंगार करण्यासाठी मदत करत होती. सौंदर्यवती तर राणी कैकयी होतीच; परंतु आजचा तिचा साज-शृंगार शब्दातीत होता. महाराज येण्याची वेळ झाल्याने ती अत्यंत व्याकुळपणे ती महाराजांची वाट पाहू लागली.

महाराजांना काही कारणाने उशीर होऊ लागला आणि अजून वयाने लहान असलेल्या आणि आजवर मनात येईल ती इच्छा लगेच पूर्ण होण्याची सवय असलेल्या राणी कैकयीला होणारा हा उशीर समजून घेणे शक्य होत नव्हते. एक एक घटिका पुढे सरकत होती आणि राणी कैकयी हिरमुसली होऊन आपल्या शृंगारातील एक एक आभूषण उतरवून ठेवत होती. मंथरा देखील राणी कैकयी सोबत तिच्या अंत:पुरात होती. ती राणीला मदत करण्याच्या बाहण्याने तिच्या जवळ गेली आणि केवळ राणीला ऐकायला येईल अशा प्रकारे म्हणाली;"राणी, आपणास एक सांगायचे होते. आपण माझ्याबाबतीत मनात किंतु आणणार नसाल तरच सांगीन म्हणते." राणी कैकयी आपल्याच भावनांच्या आवेगात असल्याने त्यांनी केवळ एक कटाक्ष मंथरेच्या दिशेने टाकला; तीच परवानगी समजून मंथरा म्हणाली;"कालच मी महाराणी सुमित्रा यांच्या महालाजवळून जात होते त्यावेळी त्यांच्या खास दासीला मी भेटले. तिला अवेळी महालाबाहेर उभे पाहून मी सहज विचारले की महाराणींच्या या विश्रांतीच्या वेळी तू इथे बाहेर काय करते आहेस? महाराणींची सेवा करण्यास आत का नाही गेलीस? त्यावर ती सटवी माझ्याकडे बघत ओठ मुडपत म्हणाली, आज खुद्द महाराज महाराणींची सेवा करण्यास आले आहेत; मग माझे काय काम? मला तर तिचा असा राग आला होता.... पण तुम्ही मला कितीही मान दिलात तरी शेवटी मी पडले दासी. काही एक न बोलता तिथून निघाले."

मंथरेचे बोलणे ऐकून राणी कैकयीच्या भृकुटी ताणल्या गेल्या. त्यावर सारवासारव केल्याच्या आवाजात मंथरा म्हणाली;"राणी आपण महाराणी कौसल्यांसाठी मनात किंतु आणू नये. त्यांची विश्रांतीची वेळ असताना महाराज अचानकच गेले त्यांच्या महालात. काल जे झाले ते झाले; पण आज महाराजांनी येतो म्हणून निरोप देऊन देखील न येणे योग्य नाही. अर्थात त्यासाठी आपण त्यांच्यावर राग धरणे जरी योग्य असले तरी आपण असे करू नका. महाराजांना फारच वाईट वाटेल त्याचे." मंथरा अजूनही काही बोलली असती मात्र त्याचवेळी महाराज येत असल्याचा निरोप घेऊन एक दासी धावत आली आणि मंथरा त्वरेने अंत:पुरातून बाहेर पडली. बाहेर पडणाऱ्या मंथरेकडे कोणाचेही लक्ष नव्हते आणि ते एका अर्थी तिच्यासाठी चांगलेच होते. कारण युद्ध जिंकल्याचा भाव मंथरेच्या चेहेऱ्यावर होता.

क्रमशः

Friday, April 17, 2020

धात्री (भाग 2) (शेवटचा)

धात्री (भाग 2) (शेवटचा)

राजकुमारीच्या उत्साहाने भरलेल्या आवाजामुळे मी काही क्षण स्थब्ध झाले. परंतु ऋषी दुर्वास कसे आहेत याची राजकुमारीला कल्पना नसावी असा माझा कयास होता. त्यामुळे मी तिच्या उत्साहाला धक्का लागणार नाही अशा प्रकारे तिला सांगण्याचा प्रयत्न केला."राजकुमारी, ऋषी दुर्वास अत्यंत तापट म्हणून प्रसिद्ध आहेत; याची तुला कल्पना आहे का?" त्यावर हसत कुंती म्हणाली;"धात्री, दाई, मला ते कसे आहेत याची पूर्ण कल्पना आहे. तू कदाचित त्यांच्याबद्दल आज ऐकलं असशील. पण मी पिताजींकडून; महाराज कुंतीभोजांकडून त्यांच्याबद्दल बरंच ऐकलं आहे. ते तापट जरूर आहेत; पण त्यांच्या रागाला कारण असते. केवळ राग आला आणि त्या रागाच्या भरात त्यांनी शाप दिला; असं नाही आहे बरं!" राजकुमारीच्या या बोलण्यावर मी काय बोलणार होते? कितीही म्हंटले तरी शेवटी मी एक दाई होते; याचे मला पूर्ण भान होते. बोलता बोलता राजकुमारी थांबली आणि तिची नजर माझ्याकडे वळली. कदाचित माझा चेहेरा तिला काहीतरी सांगत असावा. कारण मंचावरून उठून ती माझ्याजवळ चालत आली आणि माझ्या खांद्यावर हात ठेवून म्हणाली,"अर्थात, मला तुझी काळजी कळते आहे धात्री. पण तू खरंच चिंता करू नकोस. त्यांना राग येईल असं मी काहीही वागणार नाही." कुंतीचं बोलणं ऐकून देखील माझ्या मनाचे समाधान होत नव्हते.  मात्र तिने तिचा निर्णय घेतला होता. त्यामुळे आता यावर जास्त काही बोलणे योग्य नाही; हे माझ्या ध्यानात आले होते. मी मनातच निश्चय केला की काहीही झाले तरी राजकुमारी कुंतीची पाठ क्षणभरासाठी देखील सोडायची नाही. माझ्या या निश्चयामुळे असेल; पण मनात काहीसं हायसं वाटलं.

दुसऱ्या दिवशी पहाटेच्या प्रथम प्रहरी राजकुमारी कुंती स्नान उरकून तिच्या महालाच्या द्वारात उभी होती. तिला बघून मी देखील आश्चर्यचकित झाले. अत्यंत साधी अशी शुभ्र वस्त्र तिने परिधान केली होती आणि अगदीच मोजके मोत्यांचे दागिने अंगावर घातले होते. कोणत्याही दासीच्या मदतीशिवाय तिला तयार झालेले पाहून माझ्याप्रमाणेच इतर दासींना देखील आश्चर्य वाटले. ती रागावलेली आहे की काय असा विचार करून नीला तिची खास दासी पुढे झाली आणि म्हणाली."राजकुमारी आपण मला हाक का नाही मारलीत? मी इथेच तर महालाच्या द्वाराबाहेर बसले होते. तुम्ही उठलात ते कळलेच नाही. नाहीतर तशीच आत येऊन तुम्हाला तयारीला मदत केली असती."

त्यावर तिच्या खांद्यावर थोपटल्या सारखे करून राजकुमारी कुंती हसली आणि म्हणाली;"अग, अशी काही खास तयारी करायचीच नव्हती; म्हणून नाही हाक मारली तुला. बरं, आता लक्षात ठेव; जोपर्यंत ऋषी दुर्वास आहेत तोपर्यंत मला तयारीला मदतीची गरज नाही आहे. तेव्हा तू उगाच माझ्या महालाबाहेर जागरणं करत बसू नकोस." राजकुमारीच्या या बोलण्यापुढे नीला काहीच बोलली नाही. होकारार्थी मान हलवून ती मागे झाली. माझ्याकडे एकवार हसरा कटाक्ष टाकून राजकुमारी ऋषींच्या कुटीच्या दिशेने निघाली. मी देखील तिच्या सोबत काही अंतर राखून निघाले. मी तिला सोबत करते आहे हे लक्षात आल्यावर राजकुमारी मागे वळली आणि माझ्याकडे पाहात म्हणाली;"धात्री, तू देखील पहाटेच्या या पहिल्या प्रहरी उठायची गरज नाही बर का! ऋषी दुर्वास असे पर्यंत मी एकटीच जाणार आहे त्यांच्या कुटीमध्ये. तिथून परत कधी येईन ते माझे मलाच माहीत नाही. त्यामुळे तू उगाच कष्ट कशाला घेतेस? काहीसा आराम कर; आणि सकाळी येत जा तिथे." राजकुमारीच्या त्या बोलण्यावर हसून मी उत्तर दिले;"राजकुमारी, मी इथे कुंती नगरीमध्ये तुमची दाई म्हणून आले आहे. मी तुमची आई नाही याची मला कल्पना आहे; तरीही मी माझी दाईची कर्तव्य विसरलेले नाही. जिथे तुम्ही... तिथे ही धात्री. आता चलावं राजकुमारी. नाहीतर पहिल्याच दिवशी उशीर झाला एवढे कारण देखील ऋषी दुर्वासांना पुरेसे होईल कोप पावायला." माझ्या नजरेतील निर्धार लक्षात आल्याने माझ्याकडे हसून पाहात राजकुमारी कुंती ऋषी दुर्वासांच्या कुटीच्या दिशेने चालू पडली.

राजकुमारी कुटीमध्ये शिरण्यासाठी वाकली आणि मी देखील तिच्या मागे जाईन याची कल्पना असल्याने तिने मागे न बघताच मला बाहेर थांबण्याची खूण केली. मी देखील काहीएक न बोलता कुटीच्या द्वारापाशीच थांबले. राजकुमारी आत गेली आणि काही क्षणातच बाहेर आली. तिची मुद्रा अजूनही हसरीच होती. तिने ओठांवर बोट ठेवत मला न बोलण्याची खूण केली आणि मला घेऊन ती पुष्पवटीकेच्या दिशेने निघाली. काही अंतर गेल्यानंतर राजकुमारी मला म्हणाली;"धात्री, तू बाहेर आहेस याची ऋषींना कल्पना आलेली आहे असे दिसते. त्यांनी मला पुष्प गोळा करून आणण्यास सांगितले आणि म्हणाले; 'मी असेपर्यंत मी सांगितलेली कामे फक्त तूच करशील अशी माझी अपेक्षा आहे; राजकुमारी.' मला वाटतं मला कोणत्याही कामात कोणीही मदत करू नये असंच त्यांना सुचवायचं आहे." राजकुमारीचं म्हणणं ऐकून मी स्तब्ध झाले. ऋषी दुर्वास हे त्यांच्या तामस स्वभावासाठी जसे ओळखले जायचे तसेच ते आंतरज्ञानी होते हे देखील मला माहीत होते. त्यामुळे राजकुमारी बरोबर सतत राहायचे एवढेच मी त्याक्षणी ठरवले.

रोज पहाटेच्या पहिल्या प्रहरी तयार होऊन ऋषींच्या कुटिकडे जाणे हा राजकुमारीचा दिनक्रमच झाला. ते सांगतील ती सर्व कामे; मग ती कितीही अवघड किंवा कष्टप्रद असली तरी; राजकुमारी विना तक्रार एकटीनेच पूर्ण करत असे. ऋषी जवळ जवळ एक मासापेक्षा देखील जास्त दिवस सतत हवन करत होते. त्यांनी कधी उच्चरवाने तर कधी मंद्र आवाजात उच्चारलेले मंत्र मला कुटीबाहेर ऐकू येत असत. ते कधीही कोणत्याही गोष्टीची मागणी करतील किंवा कोणतीही आज्ञा करतील म्हणून राजकुमारी कुंती त्यांची आज्ञा होईपर्यंत त्यांच्याच कुटीमध्ये थांबत असे. मात्र एक दिवस असा उगवला की संध्यासमयी ऋषींच्या कुटीतून बाहेर येऊन राजकुमारीने मला सांगितले की ऋषींचा यज्ञ पूर्ण झाला आहे; आणि तिने केलेल्या अविरत सेवेवर ऋषी दुर्वास अत्यंत खुश झाले आहेत. हे ऐकून मी त्या विधात्याला मनोमन हात जोडले. आता ऋषींची मनीषा पूर्ण झाली असल्याने दुसऱ्यादिवशी राजकुमारीला लवकर उठण्याचे काहीच प्रयोजन नाही असे माझ्या मनात आले. तिला तिच्या अंत:पुरात सोडताना 'आता काही दिवस पूर्ण आराम कर राजकुमारी'; असे सांगून मी बाहेर पडले. बाहेर नीला माझीच वाट बघत बसली होती. "कशा आहेत आता राजकुमारी? उद्या देखील लवकर जायचे आहे का त्यांना?" मला पाहाताच तिने मला तिचा नेहेमीचा प्रश्न विचारला. राजकुमारी रोज आपणहून तयार होत असली तरी नीला रोज पहाटेच्या प्रथम प्रहरी तिच्या अंत:पुराबाहेर हजर असे; हे मला माहीत होते. त्यामुळे तिच्याकडे हसत बघत मी म्हणाले;"राजकुमारी बरी आहे. फारच दमली आहे. ऋषी दुर्वासांचा मानस पूर्ण झाला आहे. त्यामुळे उद्या पहाटे राजकुमारीला जावे लागणार नाही. तू देखील आज आराम कर. उद्या कोणतीच घाई नाही." माझे बोलणे ऐकून नीलाने हलकेच निश्वास सोडलेला मला जाणवला.

दुसऱ्या दिवशी काहीशी उशिराच मी राजकुमारी कुंतीच्या महालाकडे निघाले. बघते तर नीला तेथे अगोदरच उपस्थित होती. तिला पाहून मला फारच आश्चर्य वाटले. "अग, तू आज सकाळीच हजर कशी?" तिच्या जवळ जात मी विचारले. त्यासरशी आपल्या उरावर हात ठेऊन मोठे डोळे करत ती म्हणाली;"दाई धात्री, राजकुमारींना ऋषी दुर्वासांकडून बोलावणे आले भल्या पहाटे. त्यामुळे नेहेमीप्रमाणे उठून राजकुमारी ऋषींच्या कुटिकडे गेल्या आहेत." हे ऐकताच माझ्या काळजात धडकी भरली. मी लगोलग ऋषी दुर्वासांच्या कुटीच्या दिशेने निघाले. मी तिथे पोहोचले आणि समोरून राजकुमारी कुंती येताना दिसली. तिच्या जवळ जात मी तिचा चेहेरा न्याहाळला. मी तिच्या बाजूला आल्याचे तिच्या लक्षात देखील आले नव्हते. आपल्याच विचारात चालत ती तिच्या महालाकडे निघाली होती. मी तिच्या खांद्याला स्पर्श करून तिला थांबवले. तशी तिने माझ्याकडे वळून बघितले. मला पाहाताच मोकळेपणी हसत ती म्हणाली;"माई, काही मंत्र मनात कायमचे घर करून बसतात नाही?" राजकुमारी अत्यंत भावुक झाली की मला 'माई' म्हणून हाक मारत असे. त्यामुळे तिच्या हसऱ्या डोळ्यांमध्ये बघत मी म्हणाले;"हो पोरी. पण हे असे अचानक का बरे तुझ्या मनात आले?"

त्यावर अनेक दिवसांनंतर आपल्या वयाप्रमाणे खळखळून हसत ती म्हणाली;"असंच ग. आज ऋषी दुर्वासांनी मला आशीर्वाद देण्यासाठी बोलावले होते. माझ्या डोक्यावर हात ठेऊन काही मिनिटं ते डोळे मिटून बसून होते. त्यांनी त्यांचा हात बाजूला केला आणि तेव्हापासून माझ्या मनात एक मंत्र रुंजी घालतो आहे. ते तातांना न भेटताच तसेच निघून गेले. निघताना मला एवढेच म्हणाले की 'मी दिलेला हा मंत्र योग्य वेळी आणि नीट विचार करून वापर. या मंत्राच्या केवळ उच्चाराने तू विश्वातील कोणत्याही शक्तीला तुझ्या कह्यात करू शकशील.' मला त्याविषयी अजून जाणून घ्यायचे होते. काही प्रश्न विचारायचे होते. मात्र ऋषी तडक निघून गेले ग." हे सर्व सांगताना राजकुमारी खूपच मोकळी आणि आनंदी दिसत होती. तिच्या मनावर कोणतेही दडपण नव्हते हे मला जाणवले.

ऋषी दुर्वास गेले आणि ते असताना कोणताही अनर्थ झाला नाही याचा मला खूपच आनंद झाला होता. त्यात हसऱ्या आणि खुशीत असलेल्या राजकुमारीला बघून तर माझ्या मनातील सगळ्या चिंता दूर झाल्या. तिला जवळ घेऊन तिचा चेहेरा कुरवाळत मी म्हणाले;"राजकुमारी, तू एका आदर्श कन्येप्रमाणे तुझ्या पित्याची इभ्रत राखली आहेस. यासाठी तू खूपच मेहेनत घेतली आहेस. रोज पहाटेच्या पहिल्या प्रहरी उठावे आणि दिवसभर ऋषींच्या आज्ञेची वाट पाहात त्यांच्या कुटीत बसावे यामुळे तू पूर्णपणे कोमेजून गेली आहेस. त्यामुळे आता काही दिवस पूर्ण विश्राती घेणे तुला गरजेचे आहे." माझे बोलणे ऐकून राजकुमारी देखील खुदकन हसली आणि म्हणाली;"खरं आहे. मी विचार करते आहे की पिताजींनी माझ्यासाठी गंगेकिनारी जो महाल बांधून दिला आहे तेथेच काही दिवस जाऊन राहावे. तुला काय वाटते धात्री? महाराज मला परवानगी देतील का?" त्यावर हसत मी म्हणाले;"अग, तू त्यांची एकुलती आणि लाडकी लेक. त्यात तू ऋषी दुर्वासांना संतुष्ट केले आहेस. महाराज आनंदाने तुला तेथे राहण्याची परवानगी नक्की देतील." हे ऐकून राजकुमारी खुशीत हसली आणि तिच्या महालाच्या दिशेने निघाली.

महाराज कुंतीभोजांनी राजकुमारी कुंतीला तिच्या गंगेकिनारच्या महालात जाऊन राहण्याची परवानगी लगेच दिली. मोठ्या आनंदाने राजकुमारीने काही दासींना आणि मला घेऊन महालाच्या दिशेने कूच केले. आम्ही गंगेकिनारी पोहोचलो आणि सर्व दास-दासींना कामे नेमून देणे, बल्लवाचार्यरांना स्वयंपाकाविषयी सूचना देणे, राजकुमारीचे अंत:पूर तिला आवडणाऱ्या रंगांच्या पडद्यांनी आणि आकर्षक पुष्परचनांनी सुशोभित करणे यात माझा सगळा दिवस गेला. तो संपूर्ण दिवस राजकुमारी मात्र काही मोजक्या दासींना घेऊन गंगेच्या पाण्यामध्ये पोहत-डुंबत होती. आदित्य नारायणाच्या कलतीच्या किरणांच्या उजेडात मी गंगेकिनारी राजकुमारीजवळ पोहोचले. त्यावेळी सर्व दासी किनाऱ्यावर बसून राजकुमारीची वाट बघत होत्या. राजकुमारी मात्र एकटीच गंगेच्या पाण्यामध्ये आदित्य नारायणाकडे तोंड करून उभी होती. मी पाण्यात शिरून तिच्या जवळ जाऊन उभी राहिले. माझी चाहूल लागताच माझ्याकडे वळून बघत राजकुमारी काहीशा गूढ आवाजात म्हणाली;"धात्री, हा अंतर्धान पावणारा अग्निगोल किती सुंदर, किती देखणा वाटतो नाही का?" त्यावर एकदा त्या पश्चिमेकडे कललेल्या आदित्याकडे पाहून मी हसून हो म्हणाले आणि राजकुमारीला आग्रह पूर्वक नदीतून बाहेर यायला लावून महालाच्या दिशेने प्रयाण करवले.

राजकुमारी रोज गंगेच्या किनारी दिवसभर जाऊन बसत असे. कधी त्या खळाळत्या पाण्यात पोहावे, कधी अंगावर सूर्यकिरणे घेत प्रासादाच्या पायऱ्यांवर पडून रहावे... असा तिचा दिवस जात होता. चौथ्या दिवशी मी राजकुमारीच्या महालाच्या दिशेने निघाले होते त्यावेळी कुंती नगरीमधून कोणी निरोप्या महाराजांचा निरोप घेऊन आल्याची वर्दी नीलाने मला दिली. माहाराजांनी दिलेले निरोपाचे भूजपत्र निरोप्याने माझ्या हातात दिले. ते घेऊन मी राजकुमारीच्या माहालात पोहोचले. राजकुमरीने ते भूजपत्र वाचले आणि म्हणाली;"धात्री, महाराजांना माझी आठवण येत आहे. त्यामुळे त्यांनी परत बोलावले आहे. परंतु मला अजून काही दिवस इथे राहावेसे वाटते आहे. त्यामुळे तू स्वतः जा नगरीमध्ये आणि महाराजांना अजून काही दिवस इथे राहण्याची परवानगी घे. तूच स्वतः गेलीस म्हणजे ते नक्की परवानगी देतील."

आजवर एकही दिवस राजकुमरी कुंती मला सोडून राहिली नव्हती. जरी आज आत्ता या क्षणी मी नगराकडे जायला निघाले असते तरी देखील महाराजांना भेटून आणि राजकुमारीचा मानस सांगून परवानगी मिळवायला मला एक दिवस लागला असता. तरीही तिने मलाच जायला सांगितले हे पाहून मला खूपच आश्चर्य वाटले. मात्र आता राजकुमारी वयात आली होती... तिला कधीतरी तिच्या वयाच्या या दासींमध्ये राहावेसे वाटत असावे असे वाटून मी तिची इच्छा पूर्ण करण्याचे वचन दिले आणि कुंती नगराच्या दिशेने लगेच निघाले.

महाराज कुंतीभोजांना भेटून मी राजकुमारी कुंतीच्या मनीची इच्छा त्यांना सांगताच त्यांनी लगेच परवानगी दिली. त्यांची अनुमती घेऊन मी तशीच तडक राजकुमारी कुंतीकडे गंगा किनारीच्या माहाली पोहोचले. मी राजकुमारीला भेटायला गेले त्यावेळी संध्या समय झाला होता. आदित्य नारायण कधीच क्षितिजाआड गेले होते. त्यामुळे राजकुमारीचा महाल दिपांनी उजळून गेला होता. राजकुमरी एकटीच तिच्या मंचावर पहुडली होती. मी तिच्या जवळ पोहोचले आणि म्हणाले;"राजकुमारी, महाराजांनी तुला इथे जितके दिवस हवे तितके दिवस राहण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे..........." माझे पुढील शब्द माझ्या घशातच अडकले. मंचावर पहुडलेल्या राजकुमारीकडे पाहाताच काहीतरी वेगळे घडून गेल्याची जाणीव मला झाली. मी राजकुमारी कुंतीच्या मंचकाच्या एका बाजूला बसून राजकुमारीच्या चेहेऱ्यावरून हात फिरवला आणि तिला मऊ आवाजात विचारले;"काय झाले आहे राजकुमारी?" माझे मऊ शब्द कानी पडताच राजकुमारीचा बांध फुटला आणि माझ्या मांडीमध्ये डोके खुपसून ती हमसून हमसून रडू लागली. तिला थोपटत मी तशीच तिथे बसून राहिले. मन शांत झाल्यावर राजकुमारी मंचावर उठून बसली आणि बोलू लागली....

"माई, आज मी तुला जे सांगणार आहे ते आयुष्यात केवळ तुझ्यापुरतेच मर्यादित राहील याची मला पूर्ण खात्री आहे... माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे... आणि तरीही मी तुझ्याकडे एक वचन मागते आहे....." राजकुमरीचे शब्द माझे काळीज चिरत गेले. तिला पुढे काहीही बोलू न देता मी म्हणाले;"कुंती.... मी ज्याक्षणी तुझ्या सोबत कुंती नगराकडे मार्गस्थ झाले त्याक्षणी माझे आयुष्य तुझे झाले. आता मला आठवत देखील नाही माझा असा काही भूतकाळ होता.. माझे भविष्य संपूर्णपणे तुझ्याच आयुष्यात गुंतले आहे. त्यामुळे तू निश्चिन्त राहा. तू उच्चारलेला प्रत्येक शब्द माझ्यापर्यंत पोहोचून विरून जाणार आहे." माझे बोलणे ऐकून राजकुमारीचे डोळे परत एकदा भरून आले. तिने बोलायला सुरवात केली....

"माई, तुला आठवते ऋषी दुर्वासांनी जाताना मला आशीर्वाद दिला होता आणि त्या दिवसापासून माझ्या मनात एक मंत्र रुंजी घालतो आहे; असे मी म्हणाले होते? ऋषी दुर्वासांनी मला तो मंत्र आशीर्वाद म्हणून दिला होता आणि म्हणाले होते की या मंत्राच्या केवळ उच्चाराने मी विश्वातील कोणत्याही शक्तीला माझ्या कह्यात करू शकेन. माई, त्यांचे ते शब्द सतत माझा पाठलाग करत होते. आपण इथे आल्यापासून एकीकडे तो मंत्र माझ्या मनात रुंजी घालत होता... ऋषी दुर्वासांचे ते शब्द... आणि आल्यापासून मला भुरळ घातलेला तो तेजोमय शक्तीचा आदित्य नारायण! तू गेल्यानंतर संपूर्ण वेळ मी गंगेकिनारीच होते. सांजसमयी मावळतीची किरणे माझ्या कायेला स्पर्श करून सुखावत होती. तू रोजच्या प्रमाणे मला माहालात घेऊन जाण्यासाठी येणार नाही आहेस हे मला माहीत होते. त्यामुळे मी सोबतच्या दासींना महालाकडे पाठवून त्या मावळतीच्या तेजगोलाकडे पाहात तशीच बसून राहिले...... आणि........ आणि माझ्याही नकळत मी ऋषी दुर्वासांनी दिलेला तो मंत्र उच्चारला. त्याक्षणी माझ्यामनी तो केशर रंगाचा, मोहक, तेजोमय शक्तीचा गोल केवळ होता. अचानक आजूबाजूचे वातावरण तापायला लागले. मला कळेना नक्की काय होते आहे... माई, मी खूप घाबरले. तुला मी मनाच्या गाभ्यातून हाक मारली ग! पण माझी हाक माझ्या मनातून देखील बाहेर पडली नाही. कारण माझ्या भोवती त्या अग्निगोलाची मोहक आणि हवीहवीशी मिठी पडली होती. माई, तो आदित्य नारायण.... तो विश्वाला व्यापुनही उरलेला, सौंदर्याचा धनी मला मिठीत घेऊन उभा होता. आणि माझी भीती गळून पडली. माई, मी त्याच्या त्या तेजोमय शक्तीसौंदर्यात विरघळून गेले.... त्याची झाले!!! किती घटका गेल्या मला माहीत नाही. परंतु मी भानावर आले त्यावेळी मी इथेच याच मंचकावर होते. दासी माझ्या सांजसमयीचे दीपक प्रज्वलित करत होत्या... आणि तू आलीस."

राजकुमारी कुंतीचे बोलणे ऐकून मी धास्तावून गेले. राजकुमारीच्या त्या तेज:पुंज चेहेऱ्यावरील क्लांत आणि तरीही परमोच्य सुखाने नाहून निघालेले भाव मी समजून चुकले होते. मात्र जे घडून गेले होते त्याची राजकुमारीला कल्पना आहे की नाही हे मला समजत नव्हते. त्यामुळे तिला जवळ घेत हलकेच तिच्या डोक्यावरून हात फिरवत मी म्हणाले;"कुंती, पुत्री, काय घडून गेले आहे याची तुला कल्पना आहे का?" त्यावर कालवर खळखळत्या झऱ्याप्रमाणे हसणारी-बोलणारी माझी कुंती एकदम गंभीर होऊन म्हणाली;"धात्री, कालच्या एका रात्रीमध्ये मी मोठी झाले आहे. मी चुकले आहे याची मला कल्पना आहे. केवळ एका मोहाच्या क्षणी आणि लहान वयात मिळालेल्या मंत्ररूपी आशीर्वादाचे महत्व न कळल्यामुळे मी अग्नीलाच माझ्या ओटीमध्ये सामावून घेतले आहे. त्यामुळे काय घडून गेले आहे ते मला कळते आहे... मात्र आता माझ्या भविष्यात काय लिहून ठेवले आहे हा मोठा प्रश्न आहे."

राजकुमारीचे बोलणे ऐकून मी स्थब्द झाले. राजकुमारी कुंतीचे भविष्य हे केवळ तिचे नव्हते; तर त्यासोबत महाराज शूरसेन यांनी दिलेल्या संस्कारांचे आंदण, महाराज कुंतीभोज यांच्या आशांचे कुंभ आणि पुढे जाऊन राजकुमारीच्या आयुष्यात पती म्हणून येणाऱ्या कोणा महाप्रतापी राजाचे देखील होते. मी राजकुमारीला शांत केले आणि म्हणाले;"राजकुमारी कुंती, आता तुम्ही मोठ्या झाला आहात. त्यामुळे मी काय बोलते आहे ते नीट समजून घ्या. तुम्ही म्हणालात ते सत्य आहे. तुमच्या ओटीमध्ये त्या तेजोमय शक्तीच्या आनंदसूर्याने त्याचा अंश घातला आहे. हे तुमच्या इच्छेने घडले नसले तरी तुमच्या मंत्रोच्चारांमुळे घडले आहे. जे घडून गेले आहे ते बदलणे आता शक्य नाही; मात्र आता यापुढे आपण जो निर्णय घेऊ तो तुमच्या भविष्याच्या दृष्टीने खूप महत्वाचा ठरणार आहे."

माझे बोलणे मध्येच थांबवित राजकुमारी कुंती म्हणाल्या;"धात्री, मला मान्य आहे की तो मंत्र मी उच्चारल्यामुळे हे घडले आहे. मी माझ्या भविष्याची जवाबदारी नाकारत नाही. म्हणूनच मी याक्षणी या माहालातून निघून जाण्याचा निर्णय घेतला आहे. सोबत मला फक्त तू हवी आहेस. बाकी मला काही नको. यापुढील आयुष्य मी दूर कोणा अनोळखी नगरीत माझ्या या बाळासोबत एकटीने घालवण्यास तयार आहे."

राजकुमारीचे बोलणे ऐकून मी खिन्नपणे हसले. माझे हसणे पाहून राजकुमारी गोंधळली. "दाई, मी काही चुकीचे बोलले का? या अंकुराची जवाबदारी माझीच आहे न?" तिने माझ्या डोळ्यात पाहात विचारले. तिच्या डोळ्याला डोळा देत मी उत्तर दिले;"नाही राजकुमारी... तुमच्या ओटीमध्ये वाढणाऱ्या अंकुराची जवाबदारी तुमची नाही. तो अंकुर तुमच्या ओटीमध्ये घालणाऱ्या त्या आदित्य नारायणाची आहे ती जवाबदारी. तुमचं अल्लड वय आणि ऋषींनी दिलेल्या मंत्राचे अप्रूप यामुळे तुम्ही त्या तेजशक्तीला बोलावलेत. मात्र तुम्हाला जवळ करणारा तो तर पूर्ण विचारी होता. त्याला देखील तुमचा मोह पडलाच ना. मग या मोहाची जवाबदारी त्याची आहे. राजकुमारी, एक लक्षात घ्या की तुमची पहिली जवाबदारी तुम्ही ज्या कुळात जन्मला आहात आणि आता ज्या कुळाचे नाव लावता आहात... त्या दोन्ही कुळांच्या सन्मानाची आहे. त्यानंतर तुम्ही ज्या कुळाच्या विस्तारासाठी विवाह कराल त्यांच्या सन्मानाची ठरते... आणि मग सरते शेवटी जर तुमचे आयुष्य तुमच्यासाठी म्हणून शिल्लक उरलेच तर तुमच्या या क्षणिक उत्सुकतेपाई केलेल्या मोहाच्या जवाबदरी तुम्ही घेऊ शकता. आता उठा... आपण आत्ताच कुंती नगराकडे प्रस्थान करूया. तुमच्या ओटीतील अंकुराच्या खुणा जोपर्यंत जाणवणार नाहीत तोपर्यंत आपण कुंती नगरीमध्ये राहणार आहोत. तेथे राहात असतानाच तुम्ही तुमच्या तातांना, कुंतीभोज माहाराजांना, पटवून देणार आहात की तुम्हाला गंगेकिनारी राहण्याची इच्छा झाली आहे आणि पुढील काही माह या महालात राहून तुम्ही गंगेची आराधना करणार आहात. कुंतीभोज महाराजांना हे पटले की आपण दोघी येथे येऊन राहणार आहोत. तुमचे दिवस भरले की योग्य वेळी तुम्ही प्रसूत व्हाल.... आणि...."

"आणि? आणि मग काय धात्री???... माझ्या ओटीतून जन्मलेल्या त्या अंकुराचे काय धात्री? बोल न..." राजकुमारी कुंती डोळ्यात अश्रू आणून मला विचारत होत्या.

त्यांच्या त्या अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांकडे शांतपणे पाहात मी म्हणाले;"आणि मग त्यावेळी जे योग्य असेल ते राजकुमारी.... सध्या तरी मी जे सांगते आहे ते आणि तेवढेच करा." एवढे बोलून मी शांतपणे राजकुमारीच्या मंचकावरून उठले आणि तिच्या अंत:पुरातून बाहेर पडले. मला माहीत नव्हते की मी जे सांगितले आहे ते राजकुमाराला कितीसे पटले आहे; मात्र मला एका गोष्टीची खात्री होती की राजकुमारी माझे नक्की ऐकेल. आम्ही परत कुंती नगरीमध्ये आलो. राजकुमारीमध्ये आता अचानक खुपच बदल घडला होता. तिचा अल्लडपणा कुठल्याकुठे पळाला होता. ती अचानक पोक्त झाली होती. स्वतःला सांभाळत तिच्यात होणारे बदल कोणालाही कळणार नाहीत अशा प्रकारे ती आता माहालात वावरायला लागली होती. मी तिच्या सोबत सावलीसारखी राहात होते. पहाता-पहाता चार मास उलटून गेले. अलीकडे राजकुमरीची चाल बदलायला लागलेली काही अनुभवी दासींच्या लक्षात येऊ लागले होते; याची मला जाणीव झाली. मग मात्र मी राजकुमारीकडे घाई केली आणि राजकुमारीने महाराज कुंतीभोजांना पटवून दिले की तिला गंगा आराधना करायची असल्याने काही मास ती गंगेकिनारी असलेल्या महालात जाऊन राहणार आहे. महाराजांनी परवानगी देताच अगदीच मोजक्या तरुण दासींना सोबत घेऊन मी आणि राजकुमारी गंगे किनारी आलो. येथे आल्यानंतर राजकुमारी मनाने काहीशी आश्वस्त झाली. दिसा-मासाने राजकुमारीच्या ओटीमधील अंकुर वाढत होता आणि राजकुमारीचा मूळचा मोहक चेहेरा तेज:पुंज होऊ लागला होता. तिची कांती सुर्याप्रमाणे तळपू लागली होती.

राजकुमारीचे दिवस पूर्ण भरले होते. ती कोणत्याही क्षणी प्रसूत होणार होती. त्यामुळे मी आता माझा मुक्काम तिच्या अंतःपुरात हलवला होता. कोणत्याही दासीला आत येण्याची परवानगी नव्हती. एका रात्री बाहेरचे वातावरण ढवळून निघालेले होते; विजा कडकडत होत्या. गंगेच्या पाण्याला उधाण आले होते. मिट्ट काळोख दाटून आला होता. मी राजकुमारीचा हात हातात घेऊन तिच्या मंचाजवळ बसले होते. राजकुमारी अस्वस्थपणे पहुडली होती. उत्तर रात्री राजकुमारीला कळा येऊ लागल्या. तिचा श्वास कोंडला गेला.... मी सतत तिच्या बाजूला उभी राहून तिला येणाऱ्या कळांचा त्रास कमी व्हावा म्हणून त्या विश्वनियंत्याकडे प्रार्थना करत होते. पहाटेच्या पहिल्या प्रहराची जाणीव झाली आणि त्याचवेळी राजकुमारी कुंती माता झाली. तिने एका तेज:पुंज, अप्रतिम सुंदर अशा बालकाला जन्म दिला होता. त्या नुकत्याच जन्मलेल्या बाळाला मी उचलून घेतले आणि माझे लक्ष त्याच्या कानांकडे गेले. ते तेजोमय अर्भक जन्मतःच सुंदर मांसल आणि रक्तवर्ण तेजाने चमकणारी कुंडले घेऊन जन्मले होते. बालकाची नाळ त्याच्या आईपासून तोडताना मला अतोनात कष्ट झाले आणि माझ्या लक्षात आले की हे असाधारण अर्भक केवळ जन्मजात कुंडलेच नाही तर अंगभूत कांतीमध्येच कवच धारण करून आले आहे. निसर्गाचा हा चमत्कार मी आयुष्यात कधी ऐकला न्हवता आणि पहिल्यांदाच पाहात होते. प्रसूत कळांमधून सुटका होताच क्लांत असूनही राजकुमारी कुंती उठून बसली आणि तिने अतीव प्रेमाने तिच्या त्या पहिल्या पुत्राला पाहण्यासाठी माझ्याकडे मागितले.

क्षणभरासाठी राजकुमारीच्या त्या मातेच्या प्रेमाने भरलेल्या डोळ्यांकडे मी बघितले आणि मग त्या अर्भकासह कुंतीकडे पाठ करत म्हणाले;"राजकुमारी, तुम्ही विसरता आहात की या अर्भकाची जवाबदारी खुद्द त्या आदित्य नारायणाची आहे; तुमची नाही. कदाचित म्हणूनच त्याचा जन्म पहाटेच्या प्रथम प्रहरी झाला आहे. तुमची अशी काही जवाबदारी असलीच तर; त्या अग्निगोलाने दिलेला अंकुर आपल्या उदरी नऊ माह वाढवून आणि त्याला सुखरूपपणे जन्म देऊन तुमची जवाबदारी तुम्ही पूर्ण केली आहे... आता यापुढे या अर्भकाचे काय करायचे ते त्याचा पिताच काय ते पाहून घेईल. त्याला पाहण्याचा आग्रह धरू नका. कारण एकदा तुम्ही त्याला बघितलेत तर मग ममतेच्या मोहाने किमान एकदा तरी त्याला पदराखाली घेण्याचा मोह तुम्हाला होईल; आणि मग मात्र त्याला दूर करणे तुम्हाला शक्य होणार नाही. पुन्हा एकदा तुम्हाला आठवण करून देते की तुमची जवाबदारी तुम्ही ज्या कुळात जन्मला आहात आणि आता ज्या कुळाचे नाव लावता आहात... त्या दोन्ही कुळांच्या सन्मानाची आहे. त्यानंतर तुम्ही ज्या कुळाच्या विस्तारासाठी विवाह कराल त्यांच्या सन्मानाची ठरते... आणि मग सरते शेवटी जर तुमचे आयुष्य तुमच्यासाठी म्हणून शिल्लक उरलेच तर तुमच्या या क्षणिक उत्सुकतेपाई केलेल्या मोहाच्या जवाबदरी तुम्ही घेऊ शकता. मी या अर्भकाला आता याक्षणी हिरे-मोत्यांनी सजवलेल्या पेटीकेमध्ये घालून गंगेमध्ये सोडून देणार आहे. यापुढे या बालकाचे आयुष्य हे त्याच्या ललाटावर लिहिलेल्या भविष्याप्रमाणे घडेल. तुम्ही काळजी करू नका... जन्माबरोबरच शरीरावर कवच-कुंडले घेऊन आलेला हा बालक तुम्हाला तुमच्या पुढील आयुष्यात नक्की भेटेल. कसा... कुठे... कधी... ते मला सांगता येणार नाही... मात्र माझे मन सांगते आहे की तो तुम्हाला नक्की भेटेल. सावरा स्वतःला.... मी जाऊन येते."

असे म्हणून मी चालू पडले. त्याक्षणी कुंतीने मोठ्याने हंबरडा फोडला आणि ती मंचकावरून उठून माझ्या दिशेने येऊ लागली. तिला जवळ येऊ न देताच मी तिला थांबवले आणि अत्यंत कठोर शब्दात म्हणाले;"कुंती, मागे हो! स्त्रीचे आयुष्य हे तिच्या इच्छेनुसार आणि मर्जीनुसार घडत नसते; हे स्वीकार. या एका पुत्राच्या मोहापायी तू किती जणांचे आयुष्य, इभ्रत, आशा-आकांशा, स्वप्न पणाला लावते आहेस याचा विचार कर. त्या सर्वांना निराश करून या बालकासोबत जगणे तुला शक्य होणार आहे का? मला अडवू नकोस कुंती..." माझे शब्द तिचे काळीज चिरत गेले होते याची मला कल्पना होती. परंतु तरीही मागे वळूनही न बघता मी त्या मोहक अर्भकासह गंगेच्या किनारी पोहोचले. अगोदरच तयार करून ठेवलेल्या सुंदर पेटीकेमध्ये मी त्याला ठेवले आणि ती पेटी गंगेच्या प्रवाहात सोडून दिली.

पुढे पुढे जाणाऱ्या त्या पेटीकेकडे टक लावून पाहताना मात्र माझे डोळे भरून आले. हात जोडून मनोमन मी त्या बालकाची, त्या तेज:पुंज शक्तीयुक्त आदित्य नारायणाची आणि माझ्या प्रिय कुंतीची माफी मागून मी परत एकदा आयुष्याच्या पुढील जवाबदरीचे ओझे उचलण्यासाठी राजकुमारीच्या महालाच्या दिशेने पाऊल उचलले.

समाप्त

Friday, April 10, 2020

धात्री


धात्री

माझे पती अधिराज मला लग्न करून शूरसेन महाराजांच्या मथुरा नगरीमध्ये घेऊन आले त्यावेळी मी केवळ बारा-चौदा वर्षांची होते. गावाची वेस ओलांडतानाच मला माझ्या मातेने जवळ घेऊन कानात सांगितले होते;"धात्री, पुत्री, आज मी तुला तुझ्या नावाचा अर्थ सांगते. तुझ्या नावातील 'ध' अक्षराचा अर्थ 'धरून ठेव'; असा आहे आणि 'त्र' अक्षर म्हणते 'धरून ठेवायची व्यक्ती जरी लोकार्थाने त्रयस्थ असली तरी ती तुझ्यासाठी तुझं सर्वस्व असली पाहिजे'. पुत्री, तुझ्या जन्माच्या वेळी माझ्या स्वप्नात एक तेजोमय आत्मा आला होता. त्याने मला तुझे नाव मी धात्री ठेवावे असे सुचवले होते आणि त्याचवेळी त्या नावाचा अर्थ मला सांगितला होता. त्यामुळे यापुढील आयुष्य हे तुला तुझ्या वयाच्या पुढे जाऊन कायम जवाबदरीपूर्ण निर्णय घेऊनच जगायचे आहे." त्यावेळी नववधू असलेल्या माझ्या मनाने ते शब्द केवळ ऐकले होते.... बहुतेक त्याचा अर्थ पुढे जाऊन मला कळणार होता.

माझे पती अधिराज हे शूरसेन महाराजांचे खास सेवक होते. त्यामुळे ते कायमच महाराजांसोबत राजवाड्यातच असायचे. लग्न करून आल्यानंतर काही दिवस मी राजवड्याजवळील सेवक निवासात राहिले. पण मग माझ्या पतींनी शूरसेन महाराजांना विनंती केली आणि माझी वर्णी महाराणी देवमीधा यांच्या सेवेमध्ये लागली. आता महाराणींची सेवा करताना मी माझ्या पतींना किमान आठ-दहा दिवसातून एकदा तरी भेटू शकत होते. या अशा हवेवर चालणाऱ्या संसाराचे मला खूप दुःख होत होते. माझी माझ्या संसाराची स्वप्न; मुला-नातवंडांनी भरलेल्या घरातील आनंद मी कधी अनुभवू शकेन का हा प्रश्न मला कायम सतावत असे. मात्र आपले स्वप्न हे आपल्या पतीच्या सोबत असते याची मला संपूर्ण कल्पना होती. त्यामुळे मी आताच्या आयुष्याचे दुःख करून घेत नव्हते. एक दिवस महाराणींनी महाराज शूरसेन यांना निरोप पाठवून संध्याकाली पुष्प वाटिकेमध्ये बोलावले होते. निरोप घेऊन मीच स्वतः गेले होते. त्यावेळी महाराज विश्रांती घेत असल्याने मी महाराणींचा निरोप महाराजांचे खास सेवक म्हणून अधिराज यांच्याकडे दिला. निरोप दिल्यानंतर देखील माझे पाऊल तेथून निघेना. हे अधिराजांच्या लक्षात आले आणि ते माझ्या जवळ येऊन म्हणाले;"आज बहुतेक महाराज महाराणींच्या महाली येणार आहेत. त्यावेळी आपण नक्की भेटू." त्यांच्या त्या एका वाक्याने देखील मी प्रसन्न झाले आणि महाराणींच्या कक्षाकडे परतले.

त्यादिवशी खरोखरच महाराज शूरसेन आणि महाराणी देवमीधा यांनी पुष्प वटीकेनंतर एकत्र भोजन घेतले आणि महाराज त्या रात्री महाराणींच्या महालात थांबले. अंत:पुराचा पडदा पडला आणि मी हलक्या पावलांनी मागे फिरले. महालाबाहेर येताच समोरच अधिराज उभे असलेले दिसले. मी आवेगाने जाऊन त्यांच्या बाहुपाशात स्वतःला सामावून घेतले. ती रात्र खरोखरच खूपच सुंदर होती. आकाशात पूर्ण चंद्र हसत होता आणि मी अधिराजांच्या बाहूंमध्ये विसावले होते. काही दिवासातच मी सकाळच्या वांत्यांनी बेजार झाले. सकाळी महाराणींच्या अंत:पुरात पोहोचण्यास मला उशीर होऊ लागला; तसे एकदिवस महाराणींनीच मला त्याचे कारण विचारले आणि मी लाजत-लाजत उशीर होण्याचे कारण सांगितले. महाराणी देवमीधा अत्यंत प्रेमळ आणि वात्सल्यपूर्ण होत्या. अजून त्यांची कूस उजवली नव्हती. मात्र माझी गोड बातमी ऐकून त्या अत्यंत खुश झाल्या. त्यांनी निरोप पाठवून अधिराजांना बोलावून घेतले आणि मला त्यांच्या सुपूर्द करून त्यांनी फर्मावले;"हे पहा अधिराज; धात्री माझी सर्वात लाडकी सेविका आहे. तिचा समंजसपणा, काळ-वेळेचं भान ठेऊन वागणं यामुळे ती इतर दासींपेक्षा उजवी आहे हे मी पहिल्या काही दिवासातच ओळखलं होतं. अशी माझी लाडकी धात्री आता माता बनणार आहे आणि तुम्ही पिता! त्यामुळे पुढील काही माह तुम्ही केवळ धात्रीची काळजी घ्यायची आहे. मी स्वतः आताच शूरसेन महाराजांना तसा निरोप पाठवते आहे. धात्रीच्या पोटी तुमच्या कुळाचं नाव मोठं करील असा पुत्र जन्मूदे हीच त्या विधात्याच्या चरणी प्रार्थना आहे."

महाराणी देवमीधा यांच्या या बोलण्याने माझे डोळे भरून आले. अधिराजांनी झुकून माहाराणींना पदस्पर्श केला. ते खाली वाकलेले असतानाच त्यांनी देखील डोळे टिपलेले मी पाहिले. उठून उभे राहात झुकलेल्या नजरेनेच त्यांनी पुन्हा एकदा महाराणींना लवून नमस्कार केला आणि मला घेऊन ते तेथून बाहेर पडले. त्यानंतरचे नऊ महिने म्हणजे माझ्या आयुष्यातील मी भोगलेला सुवर्णकाळच म्हणावा लागेल. मला कोणतेही कडक डोहाळे लागले नाहीत की इतर कोणताही त्रास झाला नाही. मात्र अधिराज सतत माझ्या जवळ राहून माझी काळजी घेत होते. त्यावेळी माझ्या मनात सतत एकच विचार येत असे की हे नऊ महिने कधी संपूच नयेत. मात्र त्या विधात्याच्या मनात काय असते ते आपल्यासारख्या सामान्य मनुष्य प्राण्याला कसे कळणार? योग्य दिवस पूर्ण होताच मी एका सुदृढ आणि गोंडस बालकाला जन्म दिला. त्याचा जन्म पहिल्या प्रहरी झाला होता. अजून आदित्य नारायण पूर्वेची दिशा केशर रंगाने रंगवतच होते आणि मी प्रसूत झाले. अधिराजांनी बालकाला उचलून हातात घेतले आणि म्हणाले;"याचा जन्म आदित्य नारायणासोबत झाला आहे; त्यामुळे याचे नाव आपण आदित्यच ठेऊया. मी थकलेल्या नजरेने एकदा अधिराजांकडे आणि त्यांच्या हातातील आमच्या पुत्रकडे बघितले आणि हसून त्यांच्या म्हणण्याला दुजोरा दिला.

असेच दिवस जात होते. मी परत एकदा महाराणी देवमीधांच्या सेवेत हजर झाले होते. मी पाचव्या महिन्यात असतानाच मला कळले होते की महाराणी देवमीधा देखील गरोदर आहेत. त्यामुळे मी त्यांची पूर्ण काळजी घेत होते. आदित्य दिसामासाने वाढत होता. मला येणाऱ्या पूर्ण पान्ह्यामुळे आदित्यची वाढ कमालीची उत्तम आणि वेगाने होत होती. तो महाराणी देवमीधांचा अत्यंत लाडका झाला होता. त्यांना त्याला बघितल्याशिवाय क्षणभर देखील चैन पडत नव्हते. त्यांच्या त्या अवघडलेल्या स्थितीत देखील त्या त्याला सतत खेळवत होत्या. नऊ माह आणि नऊ दिवस पूर्ण होताच महाराणींनी देखील एका अत्यंत देखण्या आणि सुदृढ कन्येस जन्म दिला. महाराणी देवमीधांनी माझी नियुक्ती त्यांच्या कन्येची दाई म्हणून केली. मला खात्री होती की मला येणाऱ्या विपुल पान्ह्यामुळे आणि आदित्यच्या सुदृढ वाढीकडे बघूनच माहाराणींनी मला ही जवाबदारी दिली आहे. महाराणींनी दिलेल्या या जवाबदरीचा मी अत्यंत आनंदाने स्वीकार केला.

आदित्यच्या जन्मानंतर अधिराज आणि माझी भेट होणे फारच दुरापास्त झाले होते. मात्र पृथेची काळजी घेणे; तिला दूध पाजणे; तिचे योग्य संगोपन करणे यापुढे मला आदित्यला वेळ देणे दुरापास्त झाले होते. त्यामुळे अधिराजांची भेट होत नसली तरी मला त्याची फारशी उणीव जाणवत नव्हती. असेच दिवस जात होते. पृथा आणि आदित्य दिसामासाने वाढत होते. आता पृथा दहा वर्षांची झाली होती. ती अत्यंत तल्लख बुद्धीची होती. तिला तिच्या वायच्यापेक्षा जास्त समज होती. तिला नटण्यापेक्षा स्वच्छंदपणे निसर्गात धावायला आणि रमायला जास्त आवडत असे. त्यामुळे माझा बराच वेळ पुष्प वाटिका आणि आनंदवनातच जात असे. कारण पृथा तेथून महालात येण्यास तयारच नसे.

अनेक दिवसानंतर आज पुन्हा एकदा महाराणी देवमीधांनी मला बोलावून महाराजांना रात्रीच्या भोजनाचे आमंत्रण देण्यास सांगितले. त्यांच्या त्या आज्ञेने मीदेखील खूपच खुश झाले. महाराज शूरसेन येणार म्हणजे मला देखील अधिराजांना भेटण्याचे भाग्य लाभणार याचा मला आनंद झाला होता. मी त्याच आनंदाच्या ढगांवर स्वार होऊन महाराज शूरसेनांच्या महालात पोहोचले आणि महाराणी देवमीधांचे आमंत्रण महाराजांना कळवण्यासाठी अधिराजांच्या कानी घातले. मला पाहून त्यांच्या चेहेऱ्यावर पसरलेले हास्य त्या निरोपामुळे काहीसे काळवंडल्याचा भास मला झाला. पण मी काही बोलण्याच्या आत ते महाराजांच्या अंत:पुरात निघून गेल्याने मी काही विचारू शकले नाही. तशीच उलट पावली परतुन महाराणींच्या आदेशाप्रमाणे स्वयंपाक घरामध्ये काही विशेष पदार्थ करून घेण्यासाठी मी वळले.

महाराणींनी मला स्वयंपाक घरातून लवकर बोलावून घेऊन पृथेला तयार करण्यास सांगितले होते; मी पृथेला तयार करून घेऊन त्यांच्या महाली पोहोचले तर त्या देखील शृंगार करून तयार होत्या. पृथेला तिथेच सोडून मी मागे वळले आणि महाराज शूरसेन आज भोजनासाठी आमंत्रण असूनही संध्याकाल होतानाच माहाराणींच्या माहालात आले याचे मला थोडे आश्चर्य वाटले. महाराजांसोबत अधिराज देखील आले होते. आम्ही एकमेकांपासून दूर उभे राहून महाराज आणि महाराणी पृथेशी खेळत होते ते बघत होतो. मी अनेकदा अधिराजांकडे बघत होते; किमान एकदा तरी त्यांची आणि माझी दृष्टादृष्ट होईल आणि त्यांच्या प्रेमळ नजरेने ते मला पुलकित करतील अशी मला आशा होती. मात्र अधिराज जाणून बुजून माझी नजर चुकवत होते असे मला वाटत होते. काही वेळानंतर महाराणींनी भोजनाची तयारी करण्यास सांगितले आणि मी त्या तयारीसाठी त्यांच्या महालातून बाहेर पडले.

आज महाराज शूरसेन महाराणी देवमीधांच्या महालातच थांबणार होते. महाराज थांबणार म्हणजे पृथेची जवाबदारी माझ्यावर येणार हे ओघानेच आले. त्यामुळे भोजनोत्तर मी पृथेला घेऊन जाण्यासाठी महाराणींच्या अंत: पुरात गेले. परंतु महाराजांनी स्वतःच मला सांगितले की पृथा देखील आज महाराज आणि महाराणींसोबत थांबणार आहे. महाराणी काही दुसरा आदेश देत आहेत का याचा अंदाज घेण्यासाठी मी महाराणींच्या दिशेने बघितले; मात्र माहाराणी गवक्षात उभे राहून अंधारात दूर कुठेतरी पाहात होत्या. काही क्षण थांबून अंत:पुराचे पडदे पाडून मी परत मागे फिरले. मी अधिराज आणि आदित्य जिथे होते तिथे पोहोचले; तर अधिराज आदित्यला मांडीत घेऊन आसवे ढाळत होते असे माझ्या लक्षात आले. माझ्या काळात चर्र झाले. मात्र त्याक्षणी मी अधिराजांना काहीच विचारले नाही. आदित्यला त्यांच्या मांडीमधून घेऊन मी एकीकडे झोपवले. आदित्यला झोपवून मी अधिराजांच्या जवळ जाऊन बसले. त्यांच्या आसवांचे कारण मला जाणून घ्यायचे होते. मात्र त्यांनी काहीएक न बोलता मला जवळ घेतले. पुन्हा एकदा मी त्यांच्या त्या प्रेमळ मिठीमध्ये विरघळून गेले. उश:काल होता होता अधिराजांनी मला जागे केले आणि माझा चेहेरा आपल्या ओंजळीत धरून ते म्हणाले;" धात्री, प्रिये, आता मी तुला काय सांगतो आहे ते नीट ऐक. ज्यावेळी तू गरोदर होतीस; त्यावेळी महाराजांचे चुलत बंधू आणि परम प्रिय सखा कुंतीभोज महाराज इथे मथुरा नगरीमध्ये आले होते. त्याच वेळेस महाराणी देवमीधा देखील नुकत्याच गरोदर असल्याची बातमी कळली. ही बातमी ऐकताच कुंतीभोज महाराजांनी आपल्या शूरसेन महाराजांकडे त्यांच्या पहिल्या अपत्याची मागणी केली. गेली अनेक वर्षे अनेक देवधर्म-होम-हवन करून देखील कुंतीभोज महाराजांकडे पाळणा हललेला नाही. त्यामुळे ते खूपच दुःखी होते. शूरसेन महाराजांना कुंतीभोज महाराजांचे दुःख पाहावले नाही आणि त्यांनी कुंतीभोज महाराजांना शब्द दिला की त्यांचे पहिले अपत्य दहा वर्षांचे होताच त्या अपत्याचे दान कुंतीभोज महाराजांच्या झोळीत घालतील. धात्री, प्रिये, आता आपली पृथा दहा वर्षांची झाली आणि दोनच दिवसांपूर्वी कुंतीभोज महाराजांकडून निरोप आला आहे की ते येत्या काही दिवसांमध्ये पृथेला घेऊन जाण्यासाठी येत आहेत." अधिराजांच्या त्या बोलण्याने आजवरच्या सुखस्वप्नामधून मी खाडकन जागी झाले. "काय सांगता आहात आपण नाथ? म्हणजे माझी पृथा माझ्यापासून कायमची दुरावणार आहे का? अहो, ती जरी जन्माने माझी पुत्री नसली तरी तिला मी माझ्या पान्ह्यावर वाढवले आहे."

माझ्या डोळ्यात पाहात अधिराज म्हणाले;"मला याची कल्पना नाही का? म्हणूनच तर ज्यावेळी शूरसेन महाराजांनी मला बोलावून सांगितले की तुला देखील पृथेबरोबर कुंतीभोज महाराजांकडे पाठवण्याचा त्यांचा विचार आहे; त्यावेळी मी क्षणाचाही विलंब न लावता त्यांचा विचार योग्य असल्याचे सांगितले."

अधिराज जे बोलले ते ऐकूनही मला त्याचा अर्थबोध झाला नाही. पृथा कुंतीभोज महाराजांबरोबर कायमची जाणार होती; आणि शूरसेन महाराजांनी तिच्या सोबत मला पाठवण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय माझ्या पतींनी आदरपूर्वक स्वीकारला होता. एक मूल जन्माला येण्या अगोदरच कायमचं आपल्या मातेला आणि मातृभूमीला मुकलं होतं. तिचा काहीच दोष नसताना लहानगी पृथा वयात येण्याआगोदरच आपल्या मातेपासून दूर जाणार होती.... आणि मी? पृथेची दाई; तिची पालन करती म्हणून तिच्या सोबत कायम जाणार होते!? माझ्या प्रिय पुत्राला आदित्यला सोडून आणि माझ्या प्राणप्रिय पतींना सोडून... या मथुरा नगरीला सोडून मी इथून जाणार होते? माझ्या मनाला हा धक्का सहन होईना. माझे नेत्र अश्रू ढाळण्याचे देखील विसरून गेले होते. काही क्षण तसेच गेले. मी काहीशी भानावर येत नकारार्थी मान हलवून बोलण्यास प्रारंभ करणार इतक्यात मला माझ्या मातेने माझ्या गावाची वेस ओलांडताना कानात जे सांगितले होते ते आठवले आणि मी माझे शब्द आत वळवले. पुढील काही दिवस मी माझ्या आदित्यचे लाड करत होते. त्याला आवडणारे सगळे पदार्थ करून घालत होते. त्याच्या सोबतच्या प्रत्येक क्षणी माझे डोळे पाझरत होते. महाराज शूरसेनांनी अधिराजांना देखील माझ्या सोबत काही काळ व्यतित करता यावा म्हणून त्यांना माझ्याकडे पाठवून दिले होते. आमचा तिघांचा असा हा कौटुंबीक वेळ कापरासारखा उडून जात होता याची मला सतत जाणीव होत होती.

.... आणि कुंतीभोज महाराजांचे आगमन झाले. दोन दिवस शूरसेन महाराजांचे आदरातिथ्य स्वीकारून कुंतीभोज महाराज पृथेला आणि तिच्या सोबत मला घेऊन निघाले. महाराज शूरसेन महाराणी देवमीधा आणि समस्त मथुरावासी आम्हाला कायमचा निरोप देण्यासाठी मथुरेच्या वेशीपर्यंत आले होते. माझा लहानगा आदित्य त्याच्या पित्याचा हात धरून चालत होता. का कोण जाणे काल संध्याकाळपर्यंत सतत वाहणारे माझे नेत्र आता अचानक कोरडे झाले होते. मनातून एक वेगळीच खंबीरतेची भावना दाटून आली होती. वेशीच्या दिशेने चालताना माझी नजर आदित्य किंवा अधिराज यांच्याकडे न वळता पृथेकडे लागून राहिली होती. केवळ दहा वर्षाची माझी पृथा डोळ्यात पाणी न आणता हसऱ्या चेहेऱ्याने समस्त नगरजनांचा निरोप घेत होती. एकीकडे देवमीधा मातेला नजरेनेच 'काळजी करू नकोस'; असे सांगत होती तर दुसरीकडे शूरसेन महाराजांना 'तुम्ही योग्य निर्णय घेऊन मला अत्यंत योग्य पित्याच्या हाती सुपूर्द करता आहात'; हे सांगत होती. वेस जवळ आली आणि आता रथांना गती देण्याची वेळ आली. कुंतीभोज महाराजांनी त्यांच्या कन्येसाठी एका मोठ्या आणि सर्व सुखसोयी युक्त अशा रथाची व्यवस्था केली होती. पृथेने त्या रथामध्ये तिचे स्थान घेतले. पृथा पुढे होताच क्षणभराचा देखील विचार न करता मी देखील तिच्याच रथामध्ये चढले. योग्य अंतर राखत मी पृथेजवळ उभी राहिले. माझी आणि महाराणी देवमीधांची नजरानजर झाली आणि त्यांच्या पाझरणाऱ्या नेत्रांनी 'माझ्या कन्येची काळजी घे'; असे मला सांगितले. मी आत्मविश्वासपूर्ण हास्य करून त्यांना 'महाराणी काळजी नसावी'; असे नेत्रांच्याच भाषेत सांगितले आणि आदित्य किंवा अधिराज यांच्याकडे एकदाही वळून न बघता नजर पुढील रस्त्याकडे स्थिर केली. शेवटच्या क्षणी त्या दोघांच्या चेहेऱ्यावरील दुःखी भाव मला सोबत नेण्याची इच्छा नव्हती. काही क्षणातच कुंतीभोज महाराज आणि पृथाच्या रथांनी वेग घेतला आणि आम्ही प्रस्थान केले.

आम्ही कुंतीभोज महाराजांच्या कुंती नगरीमध्ये पोहोचलो आणि वेशीवरच आमचे खूप मोठे स्वागत झाले. संपूर्ण नगरी आनंदाने प्रफुल्लित झाली होती. कुंती नगरीच्या प्रत्येक पथावर रांगोळ्या काढून आणि अनेकविध दिव्यांची आरास करून आमच्या रथावर फुले उधळत नव्या राजकुमारीचे स्वागत केले जात होते. आमचे रथ राजवड्याजवळ पोहोचले आणि कुंतीभोज महाराज पायउतार झाले. त्याबरोबर पृथा देखील रथातून खाली उतरली. मी देखील तिच्या सोबत उतरले. कुंतीभोज महाराजांनी माझ्याकडे बघत म्हंटले;"दाई धात्री, आज माझ्या लेकीचा तिच्या पित्याच्या घरात गृहप्रवेश आहे; परंतु तिला उत्तम औक्षण करण्यास सांगावे असे माझ्याकडे कोणीच नाही." महाराजांच्या मनातील इच्छा माझ्या लगेच लक्षात आली. मी पुढे होत म्हणले;"काळजी नसावी महाराज. आजपासून पृथेप्रमाणेच हा राजप्रासाद आणि कुंती नगरीचा मानसन्मान याची काळीज मी माझ्या प्राणापलीकडे घेईन." असे म्हणून मी पटकन राज प्रासादाच्या पायऱ्या चढून आत गेले आणि काही क्षणातच औक्षण तबक घेऊन बाहेर आले. महाराज कुंतीभोज आणि पृथा यांना दीर्घायुषी औक्षण करून मी मागे झाले. पृथेच्या पाठीवर ममत्वाने हात फिरवत महाराज म्हणाले;"बेटा आजवर तुझी ओळख शूरसेन महाराजांची कन्या म्हणून पृथा अशी होती. मात्र आता तू या कुंतीभोजाची आणि पर्यायाने या कुंती नगरीची राजकन्या झाली आहेस. त्यामुळे यापुढे तुझी ओळख कुंती हीच असणार आहे." महाराजांकडे शांत आणि हास्यपूर्ण नजरेने बघत पृथने आपल्या पित्याचे चरणस्पर्श केले आणि महाराजांसोबत गृहप्रवेश केला.

नवीन राजवड्याला समजून घेण्याचे आणि कुंती नगरीचे आणि कुंतीभोज महाराजांच्या घरचे रीतिरिवाज समजून घेण्याचे काम माझ्याकडे आले होते. त्यामुळे सतत राजकुमारी कुंती सोबत राहून मी मला जे कळेल आणि उमजेल ते तिला समजावत होते. राजकुमारी कुंती मुळातच हुशार, समंजस आणि प्रेमळ होती. त्यामुळे तिने केवळ राजवाड्यातील सर्वांचे मन जिंकले असे नाही तर कुंती नगरमधील प्रत्येक नगरवासीयांची ती लाडकी कन्या झाली. कुंती नगरीजवळूनच गंगा नदी वाहात असे. कुंतीला गंगेचे खूपच आकर्षण निर्माण झाले होते. त्यामुळे कुंती अनेकदा गंगेचे दर्शन घेण्यासाठी, गंगा आरती करण्यासाठी आणि गंगेमध्ये स्नान करण्यासाठी म्हणून नगरीतील पदपथावरून चालतच गंगेच्या दिशेने जात असे. त्यावेळी ती आपुलकीने नगरजनांची विचारपूस करीत असे. कुंतीचे गंगा प्रेम बघून कुंतीभोज महाराजांनी कुंतीसाठी गंगेजवळ एक सुंदर महाल बांधून दिला. कुंती अनेकदा एक-दोन दिवसांसाठी त्या महालात जाऊन राहात असे. मी तिच्या सावली प्रमाणे सतत तिच्या सोबत असे. आमच्या वयात माता-पुत्री इतके अंतर असूनही आता मी तिची माता किंवा दाईपेक्षाही मैत्रीणच जास्त झाले होते. दिवस असेच आनंदाने आणि सुखाने व्यतित होत होते. मला क्वचितच एकांत मिळत होता. अशा त्या एकांत क्षणी अधिराज आणि आदित्यची आठवण माझं मन पोखरून टाकत असे. मात्र त्यांची आठवण मला माझ्या वागण्यात, बोलण्यात किंवा डोळ्यात देखीलं दिसणार नाही याची काळजी घ्यावी लागत होती. माझ्या उदास किंवा दुःखी चेहेऱ्यामुळे माझी कुंती व्यथित होईल याची मला जाणीव होती. त्यामुळे येणारा प्रत्येक दिवस किती उत्साहपूर्ण आणि आनंदी आहे हेच मी तिला माझ्या प्रत्येक कृतीमधून जाणवून देत होते.

असेच दिवस जात होते आणि एकदिवस कुंतीभोज महाराजांनी राजकुमारी कुंतीस त्यांच्या राजदरबारात बोलावल्याचा निरोप आला. आम्ही कुंती नगरीमध्ये आल्यापासून पहिल्यांदाच महाराजांनी राजकुमारी कुंतीला राजदरबारात बोलावले होते. त्यामुळे आम्हाला दोघींनाही आश्चर्य वाटले. निरोप घेऊन महाराजांचा खास सेवक निवेश आला होता; आणि राजकुमारी कुंतीला सोबतच घेऊन जाणार होता. त्यामुळे मी कुंतीला घाईघाईने तयार केले. कुंती त्याच्यासोबत राजदरबाराच्या दिशेने निघाली तसे मी निवेशला काहीसे मागे ओढून विचारले;"आज अचानक राजकुमारीला राजदरबारात बोलावण्याचे काही खास कारण आहे का?" त्यावेळी घाईने पुढे जाताना त्याने केवळ इतकेच म्हंटले;"ऋर्षी दुर्वास आले आहेत दाई धात्री. आता एकच प्रार्थना करा की कोणत्याही आपत्तीशिवाय राजकुमारी कुंती परत महालात येतील." निवेशचे शेवटचे शब्द तर हवेतूनच माझ्यापर्यंत पोहोचले होते. मात्र त्याचा चेहेरा सर्वकाही सांगून गेला होता.

राजकुमारी परत येईपर्यंत मी ऋषी दुर्वास यांची संपूर्ण माहिती राजपरिवरतील प्रौढ सेवक आणि कुंती नगरीमध्ये आल्यापासून मला पित्यासमान झालेल्या परचेतस यांच्याकडून घेतली. शीघ्रकोपी आणि अत्यंत बुद्धिवान प्रचंड शक्ती प्राप्त असे ऋषी दुर्वास क्वचितच कोणा राजाच्या नगरीत येत असत. त्याचा नेहेमीचा रहिवास हा घोर अरण्यात असे. त्यामुळे ते कुंती नगरीमध्ये असे अचानक का आले असावेत याची कोणालाच कल्पना नव्हती.

मी चातकासारखी राजकुमारी कुंतीच्या परतण्याची वाट बघत होते. मनातून त्या जगद्गनियंत्याकडे एकच मागणे मागत होते की कोणत्याही आपत्तीशिवाय माझी कुंती परत यावी. काही वेळातच कुंती महालाच्या दिशेने येताना दिसली. न राहून मी धावतच तिच्या दिशेने गेले आणि तिला घाईने विचारले;"राजकुमारी काय झाले राज दरबारामध्ये? ऋषी दुर्वास का आले होते?" त्यावर सौम्य हासून राजकुमारी म्हणाली;"धात्री, ते आले होते असे कोणी संगितले तुला? ते आले आहेत ग! त्यांना कुठलासा यज्ञ करायचा आहे. त्यावेळी त्यांना कोणाकडूनही त्रास नको आहे.त्यामुळे त्यांनी माझ्या पित्यांना महाराज कुंतीभोज यांच्याकडे मदतीची मागणी केली आहे; आणि महाराजांनी ही जवाबदारी माझ्यावर टाकली आहे. त्यांमुळे उद्यापासून माझा दिनक्रम बदलला आहे बर का! उद्या लवकर उठून स्नान करून मी ऋषी दुर्वास यांच्या राजवाड्यातील कुठेमध्ये जायचे आहे. त्यावेळी ते माझ्याकडून त्यांची काय अपेक्षा आहे ते मला सांगणार आहेत." राजकुमारीच्या चेहेऱ्यावर तिच्या पित्याने तिच्यावर टाकलेल्या विश्वासाचा आनंद ओसंडून वाहात होता........... का कोण जाणे पण माझे मन मात्र साशंक झाले होते.

क्रमशः

Friday, April 3, 2020

अनय

अनय

"नको जाऊस राधे! माझ्यासाठी नाही म्हणत ग मी... तुझ्यासाठीच सांगतो आहे.... नको जाऊस त्याला निरोप द्यायला."

"निरोप द्यायला जाते आहे; हे कोणी सांगितलं तुला अनय? थांबवायला जाते आहे मी."

"तुला वाटतं तो तुझं ऐकेल?"

"तुला वाटतं नाही ऐकणार न? बघू, कोण बरोबर ठरतं."

असं म्हणून राधा धावत घराबाहेर पडली. तिला लवकरात लवकर वेस गाठायची होती. तिचा शाम गोकुळ सोडून निघाला होता. आताच आलेल्या नंदिनीने तिला तसं सांगितलं होतं. खरतर राधेचा यावर विश्वास नव्हता बसला. पण नंदिनी ही राधेची एकुलती एक मैत्रीण होती जी राधेचं मन समजू शकत होती. त्यामुळे ती काहीतरी खोटं सांगेल असं राधेला वाटत नव्हतं..... धावताना तिच्या मानत सारखं येत होतं... तो खरंच निघाला? मला न सांगता? सांगितलं नाही म्हणजे कदाचित कायमचा नसेल जात तो.... माझ्याकडे येणार तो परत. हृदय एकीकडे आणि शरीर एकीकडे असं नाही जगता येणार त्याला... आणि मलासुद्धा.

वेशीपाशी प्रचंड गर्दी झाली होती. यशोदा माई हतबलतेने चालत होती. तिच्या अंगातले त्राण संपले होते जणू; तिला नंद महाराज धरून कसंबसं चालवत होते. एक क्षण त्यांच्या जवळ वेग कमी करून राधेने माईच्या डोळ्यात पाहिले आणि तिचं हृदय हललं. ती अकृराच्या राजेशाही रथाच्या दिशेने धावली. रथाचं सारथ्य बहुतेक स्वतः अकृर करत होते. वस्त्राभूषणांवरून तरी कोणी सामान्य सारथी नसावा; तिच्या मनात येऊन गेलं. रथाच्या पुढच्या नीडावर बलराम दादा उभे होते; आणि तो? तो......!!! तो गंभीर मुद्रेवर हलकेच हसू खेळवत रडणाऱ्या गोकुलवासीयांना हात करत होता. त्याच्या विनवण्या करत सगळेच रथाच्या बाजूने चालत होते. काहीजण त्या दुष्ट अकृराची निर्भसना करत होते. मात्र अकृर शांत होता... रथ आता वेस पारच करणार होता; त्यामुळे काहीसा वेग आला होता त्याला.

राधा कोणतीही पर्वा न करता रथासमोर जाऊन उभी राहिली; आणि अकृराने घाईघाईने घोड्यांचा लगाम खेचला. रथ जोरात धक्का लागून थांबला. त्याची तीच ती शामल-मोहक नेत्रकमलं तिच्याकडे वळली. मात्र आज तिने स्वतःला त्या जादूमध्ये विरघळू दिले नाही. जर आज त्याच्या प्रेमशब्दांच्या जादूमध्ये अडकले तर कायमची त्याला मुकेन; तिने स्वतःला समजावलं. तिचे डोळे त्याच्या नजरेला नजर देत स्थिर झाले. तोपर्यंत रथाच्या जवळ पोहोचलेल्या यशोदा माईच्या मनात परत एकदा आशेचा किरण उगवला. जनाची लाज सोडून त्या अविवाहित तरुण राधेला मिठीत मारीत तिने हंबरडा फोडला आणि म्हणाली;"राधे थांबव माझ्या किसनाला. काल हा दुष्ट अकृर आल्यापासून मी त्याची मनधरणी करते आहे; त्याने जाऊ नये म्हणून. पण जणूकाही त्याला माझे शब्द ऐकूच येत नाही आहेत. आता ऐकलं तर फक्त तुझंच ऐकेल तो. तू त्याची......." त्यापुढे काय म्हणावं ते न सुचून माई एकदम गोंधळली. इतकं बोलून देखील तिला धाप लागली होती. कालपासून सतत डोळ्याला लागलेली धार आणि अन्नाचा एक कण पोटात नाही; त्यामुळे तिची अवस्था फारच वाईट झाली होती.

राधेने एकवार यशोदा माईकडे बघितले. 'मी त्याची....?' अहं! 'मी त्याची! बास... इतकंच. त्यापुढे प्रश्नचिन्ह असूच शकत नाही. पण हे का कोणाला सांगू? तिच्या मनात एका क्षणात हा विचार येऊन गेला आणि परत एकदा तिने नजर उचलून त्याच्याकडे बघितलं. आता त्याची गंभीर नजर बोलत होती....

"अडवते आहेस?"

"कायमचा?"

"हो!"

"मला न सांगता?"

"सांगितलं असतं तर?"

"जाऊ दिलं नसतं...."

आणि त्याचे डोळे हसले. तिची नजर झुकली. पण परत एकदा खंबीरपणे तिने नजर उचलून स्वतःला त्याच्या डोळ्यात गुंतवले. तिच्या डोळ्यातली आतुरता त्याच्यापर्यंत तिला पोहोचवायची होती. पण तो बधला नाही; तेव्हा मात्र ती आपणहून रथा समोरून बाजूला झाली. तिची नजर आता शांत झाली होती. "जातोस? जा! तुला अडवणार नाही. तुझ्या शिवायचं माझं हे अर्थहीन... प्राणहीन.... जीवन तुझ्या आठवणींवर कंठेन आणि कधीतरी तुझ्याही नकळत तुझ्यातच विलीन होईन. तुला मात्र  मी आठवेनच... आणि त्यावेळी मात्र......" तिचे मन त्याला सांगत होते. तिचे पाणीदार डोळे एका तेजाने चमकत होते... पण आता त्यात अश्रू नव्हते. तिने त्याच्याकडे पाठ केली आणि ती चालू पडली. वेशी जवळून वाहणाऱ्या यमुनेच्या काळ्या मऊशार वाळूतून तिची सुकुमार पावलं आपली ओळख उमटवत राहिली......

राधा बाजूला झाली आणि यशोदा माईची शेवटची आस लोप पावली. तिची शुद्ध हरपली. नंद महाराज तिला सांभाळत रथापासून दूर झाले. त्यांच्याकडे एकवार सौहाद्र नजरेने बघून श्रीकृष्णाने अकृराला चलण्याची खुण केली. काही क्षणांसाठी स्थब्द झालेले गोकुळवासी परत एकदा हंबरडा फोडून रडू लागले. "सांभाळा स्वतःला! मी इथून गेलो तरी माझं हृदय तुमच्याकडेच राहील. तुम्हाला दिसलेला कृष्ण जगाला कधीच दिसणार नाही." तो म्हणाला आणि एकदाही मागे वळून न बघता दूर दूर जात राहिला. रथ दिसेनासा झाला आणि जड अंतःकरणाने सगळे मागे फिरले. मात्र कोणाच्याही लक्षात आले नाही की दूरवर एक काळा ठिपका वेशीच्या दुसऱ्या दरवाजाने वेगाने बाहेर पडून रथाचा पाठलाग करायला लागला होता.

अकृराच्या खांद्याला स्पर्श करून श्रीकृष्णाने रथ थांबवण्याचा संकेत दिला. बलराम दादाने आणि अकृराने एकत्रच प्रश्नार्थक नजरेने मागे वळून बघितले. कृष्णाच्या हसऱ्या शांत नजरेत गंभीर भाव होता. तो काळा ठिपका रथाच्या जवळ येत होता. कृष्ण रथाखाली उतरला आणि त्याच्या येण्याची वाट बघू लागला. तो जवळ येताच बलराम दादाने त्याला ओळखले. तो अनय होता!

कृष्ण दोन पावलं चालून त्याच्या जवळ गेला आणि त्याच्या दोन्ही खांद्यांना धरून त्याच्याकडे पाहू लागला. अनयची नजर यमुनेच्या वाळूमध्ये एखाद्या खडकाप्रमाणे ऋतून बसली होती.

"तिला सांभाळ."

"ती माझीच आहे." अजूनही नजर खालीच होती.

कृष्ण मनापासून हसला. गेल्या दोन दिवसात त्याने पांघरलेला गंभीरतेचा मुखवटा एकदम नाहीसा झाला.

"अनय, जोपर्यंत ती नक्की कोणाची आहे हे तुला कळेल तोपर्यंत तरी तिला संभाळशील?"

"असं एकसारखं सांभाळ! संभाळशील? असं म्हणून तिच्याबद्दलची काळजी माझ्याकडे दाखवण्यापेक्षा तिला घेऊन का नाही जात तू किसना? ती इथे राहिली तर आमचं लग्न नक्की होणार बघ. गोकळवासीयांना तिचं मन कधी कळणार नाही रे. आणि एकदा लग्न झालं की मग ती फक्त माझीच असेल." अनय काहीसा अडखळत म्हणाला.

आता कृष्णच्या चेहेऱ्यावर त्याच नेहेमीच मंद गूढ हसू खेळायला लागलं होतं. "अनय, मी समजू शकतो तुझं मन. ठीक आहे! तू सुखानं संसार कर. मला खात्री आहे इतर कोणाला जरी कळलं नाही तरी तुला तिचं मन कायम कळेल. चल! उशीर होतो आहे मला; जातो मी!"

"किसना, जातो म्हणू नये रे.... येतो म्हणावं. किसना, आपण एकत्र खेळलो आहोत लहानपणी.... आपली मैत्री आहे रे! पण एक सांगू? तुझ्या जाण्याने मला आनंदच होतो आहे. मला कळतंय तुझ्या जाण्याने तिच्या मनाला जखम झाली आहे; पण जाणाऱ्या काळाबरोबर जख्मा बऱ्या होतात. कधीतरी तुला आमची आठवण येईल आणि तू इथे येशील तेव्हा तुला तिच्या चेहेऱ्यावर सुखी जीवनाचा कवडसा नक्की दिसेल." सुरवातीला अडखळणारा अनय भविष्याच्या सुख स्वप्नांमध्ये हरवून स्पष्ट बोलायला लागला होता.

त्याच्या चेहेऱ्यावरचा आत्मविश्वास आणि भविष्यातील सुखाच्या कल्पनेने सुखावलेलं त्याचं मन बघून कृष्णाला क्षणभर का होईना त्याचा हेवा वाटला; आणि मग अनयला तिथे तसाच सोडून देवकीचा आठवा पुत्र श्रीकृष्ण कर्तव्यकठोर आयुष्य जगण्यासाठी राथारुढ होऊन निघाला.

अनय त्याच्या सुखस्वप्नातून जागा झाला तोपर्यंत बराच अंधार झाला होता. तो एकटाच असल्याचं त्याच्या लक्षात आलं आणि एकदा दूर क्षितिजाकडे नजर उचलून बघून तो परत वळला. त्याच्या घराकडे... त्याच्या राधेकडे.

काही दिवासातच अनयची आई राधेच्या घरी विडा-सुपारी घेऊन राधेचा हात मागायला गेली. किसन-राधेबद्दल गोकुळातली चर्चा कानावर असणाऱ्या राधेच्या आई-वडीलांना दही-दुभत्याने भरलेल्या घरचं स्थळ आलेलं बघून प्रचंड आनंद झाला. त्यांनी लगेच विडा-सुपारी स्वीकारून राधेच लग्न अनयशी नक्की केलं. कृष्ण गेल्यापासून कुठेतरी हरवून गेलेली राधा यासर्वापासून दूरचं होती. रोज सकाळी उठून यामुनेवर जायचं; मनसोक्त अंघोळ करायची, कपडे धुवायचे आणि येताना आणलेले हंडे भरून दुपार कलताना घराकडे परतायचं असा तिचा दिनक्रम झाला होता. पूर्वी सतत सर्वांशी बोलणारी, हसरी राधा आता हरवून गेली होती.

एकदिवस अशीच ती आपल्यातच मग्न घराकडे परतत असताना तिला अनय आडवा आला. त्याने तिची वाट रोखून धरल्यामुळे नाईलाजाने तिने नजर उचलून वर बघितले.

"तू बरोबर ठरलास. मान्य करते मी. जाऊ दे बघू मला आता." त्याच्याकडे बघून राधा दुखावलेल्या स्वरात म्हणाली.

"राधे, मी बरोबर ठरलो हे सांगायला मी आलो असं वाटलं का तुला? तेच जर सांगायचं असतं तर इतके दिवस वाट नसती बघितली मी. राधे, तुला तुझ्या तातांनी सांगितलं का आपलं लग्न ठरलं आहे ते?"

अनयच बोलणं ऐकून राधाला मोठा धक्का बसला. तिच्या डोक्यावरचा घडा तिच्या हातून सुटून जमिनीवर कोसळला.

"आपलं लग्न? पण मी.... मला.... माझं लग्न......"

"अहं! काही बोलू नकोस राधे. मला कळतंय तू काय म्हणणार आहेस ते. नको बोलुस असं काही. एक सांगू तुला? राधे तू मला नाही म्हणालीस तरी तुझे आई-तात तुझं लग्न दुसऱ्या कोणाशी तरी नक्कीच ठरवतील. तो कसा असेल कोण जाणे? पण तो तुला समजू शकणार नाही हे नक्की. राधे, तू आणि किसन यांच्याबद्दलची गोकुळात झालेली चर्चा मला माहीत आहे.."

त्याला मध्येच अडवत आनंदाने चमचमणाऱ्या डोळ्यांनी राधेने त्याला विचारले;"अनय, खरंच का रे आमच्याबद्दल चर्चा होती गोकुळात? खरं तर मी तशी थोडी मोठीच की रे त्याच्याहून. पण तरीही.... तो आणि मी... असं होऊ शकतं याबद्दल गोकुळात चर्चा होती..... हे ऐकून देखील मन हलकं झालं रे."

आपण हिला काय सांगायला आलो आणि ही कुठल्या विषयात हरवली आहे..... अनयच्या मनात विचार आला. त्याने स्वप्नात हरवलेल्या राधेकडे बघितले आणि तसाच मागे वळून निघून गेला. दोन दिवसांनी राधेचे तात अनयच्या घरी आले. त्यांचा चेहेरा उतरला होता.... हातातील विडा-सुपारीचे ताट जमिनीवर ठेवून भरल्या डोळ्यांनी त्यांनी अनयचा हात हातात घेतला; मात्र त्यांना काही बोलायला न देता अनयच म्हणाला;"तात, माझा आणि राधेचा विवाह नक्की होणार. तुम्ही सगळे विचार बाजूला ठेऊन तयारीला लागा." अनयचे बोलणे ऐकून राधेचे तात अजूनच अवघडले. मात्र एकवार अनयकडे बघून ते परत गेले. अनयने त्याच संध्याकाळी परत एकदा राधेची वाट अडवली.

"अनय, असं का करतो आहेस तू? किती कष्टाने मी तातांना पटवले होते की मला लग्नच करायचे नाही. मात्र तू त्यांना सांगितलेस की आपला विवाह नक्की होणार. ते हरखून गेले आहेत आता. का माझं आयुष्य अजून अवघड करतो आहेस?" कधीही आवाजाची मध्य लय न सोडणारी राधा काहीशा रागाने बोलली. एक पाऊल पुढे होऊन अनयने तिच्या डोळ्यात बघितले आणि म्हणाला;"राधे, नको करुस माझ्याशी लग्न. पण किती दिवस हा विषय टाळशील तू? एकदिवस तुझं न ऐकता तुझे तात तुझं लग्न कोणाशीतरी नक्की लावून देतील. कुणा अनोळखी व्यक्तीपेक्षा मग माझ्याशी कर न लग्न."

आता मात्र राधेचा आवाज कातर झाला. तिने देखील त्याच्या नजरेला नजर भिडवली आणि म्हणाली;"अनय मी त्याला कधीच विसरू शकणार नाही. तो फक्त माझ्या तना-मनात नाही तर माझ्या संपूर्ण अवकाशात व्यापून राहिला आहे. लग्नानंतर देखील जेव्हा तुला त्याचेच प्रतिबिंब माझ्या डोळ्यात दिसेल तेव्हा तू खूप दुखावला जाशील."

तिच्याकडे हसत बघत अनय म्हणाला,"मी दुखावला जाईन याचं तुला वाईट वाटतंय राधे यातच माझं सुख दडलं आहे अस मी म्हंटल तर?"

त्याच्याकडे एकदा बघून राधेने नजर वळवली आणि निघण्यासाठी पाऊल उचललं. मात्र परत त्याच्याकडे वळून ती म्हणाली;"अनय, तू म्हणशील त्या मुहूर्तावर तुझ्याशी विवाह करायला मी तयार आहे." तिच्या त्या एका वाक्याने तो हरखून गेला.

.... आणि राधा अनयचा विवाह झाला. नंद महाराज आणि यशोदा माई देखील त्यांच्या लग्नाला आले होते. लग्न लागले आणि यशोदा माई इडा-पीडा घेण्यासाठी नववधू जवळ आली. तिने राधेचा झुकलेला चेहेरा हनुवटीला धरून वर उचलला. राधेच्या डोळ्यात बघत ती हलकेच म्हणाली;"अजूनही माझा मोहन आहे ग तुझ्या डोळ्यात..." पण मग स्वतःला सावरत तिने राधेची इडा-पीडा घेतली आणि म्हणाली;"उत्तम संसार कर राधे. सर्वांना सुखी कर."

अनय राधेचा संसार सुरू झाला. राधा एक उत्तम गृहिणी होती. घर काम उरकून यमुनेवर जावं; स्नान उरकून कपडे धुवून पाणी भरून आणावं... खिल्लारांची काळजी घ्यावी. दुधाची धार काढून त्याचं दही, ताक, लोणी, तूप करून अनयकडे सुपूर्द करावं.... ती कुठेही कमी पडत नव्हती. अनयचा विवाह राधेशी ठरवल्यामुळे अनयच्या माईला गोकुलवासीयांनी अगोदर खूप दोष दिले होते; तेच आज राधेचे कौतुक करताना थकत नव्हते.

हाताला प्रचंड उरका असणारी राधा संध्याकाळ होताच मात्र मलूल होऊन जायची. माडीवर जाताना तिची पाऊलं जड होऊन जायची. रोज वर येणाऱ्या राधेची आतुरतेने वाट बघणारा अनय तिच्या जड पायातील पैंजणांच्या आवाजावरून काय ते समजून जायचा आणि भिंतीकडे तोंड करून झोप लागल्याची बतावणी करायचा. राधा देखील काहीएक न बोलता दुसऱ्या बाजूला तोंड करून झोपून जायची. अशीच वर्ष सरली.... अनयची माई नातवंड खेळवायची इच्छा मनात ठेऊन जगाचा निरोप घेऊन गेली.

माई गेल्यानंतर राधेने माडीवर जाणे सोडून दिले होते. अनयने देखील आता वाट बघणे सोडून दिले होते. अलीकडे राधेच्या केसांमधली रुपेरी छटा अनयला जाणवायला लागली होती. तिच्या कामातली चपळता कमी झाली होती. एकदिवस गाई चरून आणून अनय घराच्या ओसरीशी बसला आणि त्याने राधेला हाक मारली. एरवी लगेच उत्तर देणाऱ्या राधेची कोणतीही हालचाल त्याला जाणवली नाही. तो तसाच घरात धावला. राधा जमिनीवर पडली होती. अनयने संपूर्ण आयुष्यात पाहिल्यादाच राधेला उचलून हृदयाशी कवटाळले. पण तिला जवळ घेताक्षणी त्याच्या छातीला काहीतरी टोचले. त्याने तिच्या हृदयाजवळ धरलेल्या हाताची मूठ सोडवली.... त्यात शामवर्णी किसनाची मूर्ती होती. अनय राधेच्या कलेवराला बिलगून मूकपणे रडत होता आणि मनातच त्या मृदू मनाच्या किसनाला म्हणत होता....

"किसना, तिच्या अवकाशात फक्त तूच राहिलास रे आयुष्यभर. पण एक सांगू? मी कधीच ते अवकाश मिळवायचा प्रयत्न केला नाही. त्यामुळे आता यापुढील आयुष्य किमान एका विचारावर जगू शकेन की कदाचित प्रयत्न केला असता तर ती खरंच कायमची माझी झाली असती आणि तू आला असतास तर तुला तिच्या चेहेऱ्यावर आमच्या सुखी जीवनाचा कवडसा नक्की दिसला असता.... पण...... तू आला नाहीस... आणि हेच खूप मोठे उपकार आहेत तुझे माझ्यावर!"