Friday, May 28, 2021

एक red wine नातं!

 

एक red wine नातं!!!

ती त्याच्याहून साधारण आठ वर्षांनी मोठी. तिच लग्न झाल होतं. एक मुलगा आणि प्रेमळ नवरा असा सुखी संसार. पण तरीही त्याची आणि तिची झक्कास मैत्री होती. दोस्ती झाली तेव्हा नुकतंच इंटरनेट सुरु झालं होतं. भेटण कमी व्हायचं दोघांचं. पण याहू मेसेंजरवर खूप गप्पा मारायचे दोघे. ती त्याला सतत चिडवायची... कोणत्या ना कोणत्या मुलीवरून. तो ते एकदम खेळीमेळीने घ्यायचा. अशीच दोघांची दोस्ती वाढत होती. त्याच्या घरी गणपतीला नवऱ्याला आणि लेकाला घेऊन ती गेली होती. तिच्या मनात होतं कदाचित् त्याचे पालक आणि तिचा नवरा असे सगळे मिळून एक कौटुंबिक मैत्री होईल. पण तसं काही झालं नाही. अर्थात त्याचा तिला विषाद वाटला नाही; की त्याला दु:ख झालं नाही. 'त्यांचं नाही जमल;ं पण आपण दोस्त आहोत न? बास आहे की!' दोघांच्याही मानत होतं... एकमेकांना एकदाही असं काहीही न सांगता. दोघही एन्जॉय करत होते हे दोस्तीचं नातं. मग कधीतरी त्याचं लग्न ठरलं. ठरलं म्हणजे त्यानेच ठरवलं. प्रेम विवाह! त्याच्या लग्नाला ती हौसेने आली. मग त्याच्या बायकोच्या मंगळागौरीला देखील. पण त्याच्या बायकोची आणि तिची मैत्री नाही झाली. 'नाही तर नाही. आपण दोस्त आहोत न? बास आहे की!' परत एकदा दोघांच्या मनात होतं.....


आणि मग तो परदेशात निघाला. थोडं अजून शिकायला... थोडं अजून चांगलं आयुष्य मिळवायला. ती धावली त्याला विमानतळावर भेटायला. पण तिला तसा थोडा उशीरच झाला. ती पोहोचली तोवर तो गेला होता आत. त्याच्या आई-वडिलांशी थोडफार बोलून ती जड मनाने परतली. घरी खिडकीत बसून दोघांच्या मेसेंजरवरच्या गप्पा, कधीतरी अधून मधून भेटले होते तेव्हाचे किस्से आठवत होती; आणि अचानक तिचा मोबईल वाजला. त्याचा फोन होता. विमानतळावरून! तिच्या डोळ्यात पाणी उभं राहीलं.


'जातोस?'

'हो ग! जायला हवं न?'

'हम्! विसरशील?'

'वेडी! आणि तू?'

'वेडा आहेस?'

'मेल्स करत जा....' दोघांनी एकमेकांना बजावलं आणि तो गेला.


दिवस जात होते... महिने... वर्ष.... संपर्क थोडा कमी झाला होता. ती संसारात अडकत जात होती. तो त्याच्या शिक्षणात आणि नवीन संसारात बुडला होता. त्याच्या अडचणी खूप वेगळ्या होत्या आणि तिचे प्रश्न तिचेच होते. पण मेल्स मात्र चालू होत्या.


आणि मग; त्याला तिथेच छानशी नोकरी लागली. थोडा स्थिरस्थावर झाला तो; आणि मग दोन वर्षांनी आला इथे. त्याने दुसऱ्याच दिवशी तिला फोन केला.

'भेटशील?'

'हा काय प्रश्न आहे? उद्या एका कामासाठी चर्चगेटला जाते आहे. तू येतोस तिथे?'

'ओके!'

तिचं काम पटकन उरकून ती स्टेशनवर येऊन बसली होती. त्याची वाट बघत. आणि तो तिला दिसला. धावली ती. त्याला मिठी मारून मनापासून हसली. क्षणभर तो गोंधळाला. पण मग स्टेशन गुलाबी झालं. मग खूप गप्पा! त्याला आलेल्या अडचणी... त्यावर त्याने केलेली मात.... आता छानशी नोकरी.... सगळं कसं छान चालू आहे ते तो उत्साहाने सांगत होता आणि ती समाधानाने मनापासून ऐकत होती. तिच्या आयुष्यात घडलेले आणि घडणारे बदल ती देखील मनापासून त्याला सांगत होती... तिच्या डोळ्यात खोलवर बघत तो ते ऐकत होता.

'असं काय बघतोस?' ती.

'काही नाही.' तो.

'ए तुझ्या डोळ्यांच्या पापण्या मला फार आवडतात; आणि तुझे ब्राऊन डोळे तर खूपच गहिरे आहेत रे.' ती.

'फक्त माझे नाही... तुझे पण त्याच रंगाचे आहेत. आणि त्याला ब्राऊन नाही.. गावठी मधाचा रंग म्हणतात.' तो.

'कोण म्हणतात?' ती चेष्टेच्या मूड मध्ये.

'आम्ही.... म्हणजे मी ग. तुझ्या डोळ्यातला गावठी मध मला गुंतवून ठेवतो.' त्याचा ओलावलेला हळुवार आवाज.

त्याच्या बोलण्यावर ती फक्त हसली.... मधाळसं!

तो होता तोवर जस जमेल तसं पण दोघे भेटत होते.... आणि मग हे जणूकाही ठरुनच गेलं. दर वर्षी तो यायचा आणि दर वर्षी ते दोघे भेटायचे. मग कधी एखादा बस स्टॉप गुलाबी व्हायचा तर कधी एखादा मॉल.

दोस्ती पुढे सरकली होती खरी; पण ते 'so called' प्रेम नव्हतं. ते दोघे प्रियकर प्रेयसी नव्हते. एक ओढ लागलेलं नातं होतं... पण त्याला नाव नव्हतं. सगळंच कसं शब्दातीत होतं... पण होतं!!! तिच्या आयुष्यात घडणारी लहानात लहान गोष्ट त्याला माहित असायची. इतकंच काय पण तिच्या email चा पासवर्ड देखील त्याला माहित होता. त्याच्या बँकेच्या खात्याची तिला माहिती होती. तो तिला भेटला की दोन गिफ्ट्स नक्की असायची. एक पाडव्याचं आणि एक तिच्या वाढदिवसाचं. पाडवा? हो!! पाडवा!!! कधी सुरु झालं ते दोघानाही आठवत नव्हतं... पण हे असं काहीसं होतं खरं दोघात.

तो तिला हाक मारताना कधी 'राणी' म्हणायचा तर कधी 'डार्लिंग'. ती मात्र त्याला नेहेमी नावानेच हाक मारायची. का? कारण अस काही नाही.... पण ती थोडी तशीच होती; म्हणून असेल कदाचित्.

तो तिच्याशी बोलतो अधून मधून इतकंच त्याच्या घरी माहित होतं... आणि तो तिचा एकदम खास मित्र आहे हे तिच्या घरी. याहून जास्त माहिती करून घ्यावी असं कोणाला वाटलं नाही आणि त्यांनीही काही सांगितलं नाही. वर्षं जात होती.

असाच एकदा तो आला होता... यावेळचा त्याचा नूर वेगळा होता. एरवी ती खूप बोलायची आणि तो फक्त तिच्याकडे बघत तिचं ऐकाचयचा. पण यावेळी तो खूप बोलत होता. ती मनापासून ऐकत होती. इतक्या वर्षात दोघांनाही काही गोष्टी न सांगता देखील कळायला लागल्या होत्या. त्यांच्यात काहीतरी बदलंत होतं.... ते प्रेम(?) एक वेगळं वळण घेत होतं...

आणि मग तिला त्याचा एक मेल आला.... फक्त तिच्याचसाठी लिहिलेला....

दिवस, महिने... वर्षे सरली,
तशीच ओढ तरी का मज तुझ्या भेटीची?
नेहेमीच होते मन अधीर भेटण्यास तुला;
जाते चुकवून हळूच काळजाचा ठोका.
दिसताच तू वाटे धडधड अनामिक,
बोलायाचे असे बरेच,पण शब्दच हरवतात,
असे परंतु काही जादू तुझ्या स्पर्शांत,
मज जाणवले ते प्रत्येक क्षणात.
घेताच मी हात तुझा माझ्या हाती,
होते शांत काहूर उठले जे मनात.....

तिने मेल वाचली आणि ती हसली... डोळ्यात अश्रू तरळले होते का दोन? फक्त त्याच्यासाठी? कुणास ठाऊक!

तिने त्याला फक्त 'मस्त' इतकाच रिप्लाय केला. अन् पुरेसा होता तो त्याला. एक मंद स्मित होतं त्याच्या चेहेऱ्यावर तिचा तो एक शब्दाचा मेल वाचताना.

त्यानंतरच्या एका भारत भेटीत ते दोघे भेटले होते तेव्हा त्याने तिच्या डोळ्यात खोल बघत तिला विचारलं................

'एक सांगू?'

'अजूनही अस विचारवं लागतं का आपल्यात?'

'तरीही.....'

'बरं... बोल.....'

'तुला प्रपोज करणार आहे.....'

'एका अटीवर....'

'कोणत्या ग राणी?'

'नरीमन पॉईंटला.... कोसळत्या पावसात.... एका गुढग्यावर बसून करणार असलास न तरच!!!' ती हसत म्हणाली.

त्यावर तिचा हात हातात घेत तो म्हणाला........... 'तुला कसा कळला माझा प्लान?'

मग दोघेही एकमेकांच्या डोळ्यात बघून खळखळून हसले.

मैत्री फुलत होती......... नातं मुरत होतं........ आणि जगाचं राहाटगाडगं देखील फिरत होतं......

आणि एकदिवस अचानक त्याचा मेल आला...

मी घोळ घालून ठेवला आहे. माझ्या बायकोने तुझे माझे whatsaap वरचे chats बघितले. तसं मी नेहेमी डिलीट करतो ग. पण काल राहिलं आणि तिने माझा फोन हाताळताना तुझ नाव वाचून आपलं chat उघडलं आणि बघितलं. आपल्या साध्याच गप्पा होत्या नेहेमी प्रमाणे. पण मी तुझा उल्लेख 'राणी', 'सोन्या', 'डार्लिंग' असा केलेला तिने बघितला आणि मग घरात तिसरं महायुद्ध झालं. तिने लगेच आई-बाबांना फोन करून सांगितलं. त्यांना हे माहित आहे की आपण अधून मधून बोलतो; पण तरीही त्यांना देखील या असल्या गप्पा पटल्या नाहीत. त्याचं देखील बरोबर आहे न; आपली जी आणि जशी मैत्री आहे ती सहसा कोणाला पटणार नाही. म्हणून त्यांच्या समाधानासाठी तुला एक whatsaap मेसेज करोतो आहे.

आणि त्याचा whatsaap वरचा मेसेज होता.....

आपल्यामध्ये जी काही मैत्री or जे काही होतं ते सगळं मी थांबवतो आहे. ह्या पुढे मी तुला कुठलाही मेसेज, chat or इतर काहीही contact करणार नाही. good bye

तिला धक्का बसला.... पण क्षणभरात तिने स्वतःला सावरलं आणि त्याच्या मेसेजला उत्तर लिहीलं.....

जे काही होतं? अरे आपली एक चांगली healthy मैत्री आहे. किंवा होती म्हणू. हे अचानक काय आलं? पण ठीके! नाही बोलायचं तर नको. तू माझ्याशी किंवा मी तुझ्याशी न बोलल्यामुळे आपलं आयुष्य थांबणार नाही आहे. किंवा बोलल्यामुळे आयुष्य वेगळं देखील होणार नाही आहे. मुळात आपण असं किती बोलतो रे; की बोलणं थांबवायचा मेसेज तू करोत आहेस? एक लक्षात घे मी एक सुखी सांसारिक स्त्री आहे. तुझे आई-वडील आणि माझा नवरा एकमेकांशी का comfortable होऊ शकले नाहीत ते मला माहित नाही. त्यामुळे माझं देखील तुझ्या आई-वडिलांशी बोलण थांबलं... पण असं का झालं ते मी त्यांना देखील कधी विचारलं नाही. बरं; थट्टा, मस्करी, गप्पा याव्यातीरिक्त आपण नक्की काय बोलतो रे की तू म्हणावस की जे काही होतं? अरे माझा मुलगा आणि नवरा देखील माझा मोबाईल हाताळतात आणि माझी त्याबद्दल काही हरकत देखील नाही. ते दोघे फोन घेतात म्हणून मी कधी तुझे मेसेज डिलीट नाही करत. तुझा हा मेसेज बघून त्यांचा काही गैरसमज होऊ शकतो ना. किमान १० वेळा विचार करायचास की रे मेसेज करताना. बरं; फक्त तुझ्या माहितीसाठी सांगते आहे... मी हे मेसेज पण डिलीट नाही करणार. जर त्यांनी बघितले आणि काही विचारलं तर मी स्पष्ट सांगीन की आम्ही बोलायचो.. आणि त्याने असा अचानक हा मेसेज का पाठवला त्याचं त्याला माहित. तुला माझी बाजू सांगणं मला गरजेचं वाटलं म्हणून हा मेसेज करते आहे. good bye

तिने whatsaap बंद केला आणि तशीच स्वस्थ बसून राहिली. तिला फार वाट बघायची गरजच नव्हती. मेल आल्याचं तिच्या मोबाईलने लगेच ओरडून सांगितलं तिला. तिने हसतच inbox उघडलं.

अग हा काय मेसेज केलास? मी फक्त त्यांच्या समाधानासाठी मेसेज करतो आहे असा मेल केला होता तो बघितला नाहीस का? रागावली आहेस का राणी? खरंच बोलायचं नाही का आपण आता? अर्थात तू अस ठरवलं असलंस तर तुझं देखील बरोबर आहे म्हणा. हे असं खोटं बोलून नाव नसलेलं नात जर तुला पटत नसेल तर मी तुला काहीच प्रश्न नाही विचारणार.

ती हसली. मात्र त्याचा उतरलेला चेहेरा तिच्या डोळ्यासमोर आला आणि तिने घाईघाईने रिप्लाय केला.

वेडा आहेस तू अगदी. माझ्या मेसेजने तू जर गडबडला आहेस तर नक्कीच त्याचा योग्य तो परिणाम इतरांवर झाला असेल न? मला कळतं रे; की नाही पटणार तुझ्या घरच्यांना हे असं आपलं बोलणं. ही मैत्री स्वीकारणं अवघड आहे सगळ्यांना. तो मेसेज करताना देखील मला मनातून वाटत होतं की खरं तर हे असं काहीतरी एक बोलायचं आणि वेगळंच वागायचं मला पटत नाही. तसा माझा काय आणि तुझा काय स्वभाव नाही. पण कोणालाही काहीतरी सिद्ध करून दाखवण्यापेक्षा.... आणि काय पटतं आहे किंवा नाही याहीपेक्षा तुझं माझ्या आयुष्यात असणं मला जास्त महत्वाचं वाटतं. तुझं मन देखील हेच सांगतं आहे तुला याची मला खात्री आहे. त्यामुळे आता फार विचार करू नकोस. झालं गेलं संपलं ते सगळं. बस! आता मात्र काळजी घे.

तिचा मेल वाचून तो विसावला आणि मग त्याचं उत्तर आलं तिच्या मेलला....

आठवतं का ग असंच एकदा आपण गप्पा मारत होतो; तेव्हा कधीतरी मी तुला विचरलं होतं 'काय नाव द्यावं आपल्या या नात्याला?' आणि तू म्हणाली होतीस 'या नात्याला नाव नको देऊया.' पण आत्ता माझ्या मूर्खपणामुळे ज्या काही घटना घडल्या आणि तू मला सावरून घेतलंस.... आणि त्याहूनही जास्त महत्वाचं म्हणजे... तू का सावरून घेतलंस याचं कारण सांगितलंस आणि मनात आलं खरंच काही नाव का नसावं ह्या नात्याला? किंवा काय नाव देता येईल ह्या नात्याला? तसं आपल्या सामाजिक परिस्थितीत आपलं हे नातं कुठेच बसत नाही. म्हणजे 'खूप चांगली मैत्री'च्या बरंच पुढे 'girlfriend - boyfriend' च्या देखील पुढे गेलंय हे नातं. तरीही अस्तित्वात असलेल्या कोणत्याही नात्यापर्यंत पोहोचू न शकणारं असं हे विलक्षण साधंसं आणि तरीही गुंतागुंतीचं........ भावनिक आणि तरीही सुंदर........... नातं आहे हे. मग मनात विचार आला ह्या विलक्षण नात्याला नाव देखील तेवढंच विलक्षण हवं. नाव असावंच असं नाही, पण काय आहे न आपलं दोघांचं हे नातं खरंच खूप सुंदर आहे. इतकी वर्ष होऊनही तेवढंच जिवंत आणि तरुण आहे. ना कधी भांडण ना वाद... हा; एखादा विषय पटला नाही तर चर्चा होतेच की आपल्यात.... तू तुझा मुद्दा सोडत नाहीस आणि मी माझा... पण ते तेवढ्या पुरतंच असतं; आणि दोघांनाही त्याची पूर्ण जाणीव असते. एक वेगळीच समज आहे या नात्याला. मग अशा या नात्याला नाव पण तसंच हवं न.

विचार करताना मनात आलं एक नाव.... red wine नातं! रुढार्थाने कोणत्याही नात्याच्या अटींमध्ये न बसणारं आणि एकमेव असं हे नातं आहे. आता जर हे नाव मी देतो आहे तर त्याचं कारण देखील तुला सांगितलं पाहिजे न.... हेच नाव का ते सांगू?


एकतर; red wine आपल्याला दोघांना आवडते. बर wine घ्यायला काळ वेळ लागत नाही. तरीही जेव्हा wine घेतली जाते ती वेळ खास असते. आपलं पण असंच आहे न... केव्हाही आणि कुठेही भेटलो तरी ती जागा आणि ती वेळ खास होते. red wine मध्ये एकूणच elegance आहे, नाजुकपणा आहे. wine घेताना ती कधीच संपू नये असं सारखं वाटत असतं. तसंच आपल्या नात्यात आहे. एक elegance आहे... एक नाजुकपणा आहे आपल्या नात्यात..... आणि भेटलो की ती भेट संपूच नये असं वाटतं. बियर म्हंटलं की विजय मल्ल्याची किंगफिशर आणि त्याची जाहिरात करणाऱ्या अल्पवस्त्रांकित ललना डोळ्यासमोर येतात. त्यामुळे तू आणि बीअर असा विचार कधी मनाला नाही शिवला. red wineचं तसं नाही. red wine म्हंटलं की एक शांत संध्याकाळ.... मावळतीचा सूर्य किंवा एखादी पौर्णिमेची रात्र आठवते. समोर अथांग समुद्र... जो आपल्याला दोघांना आवडतो.... आणि माझ्या शेजारी संपूर्ण पांढऱ्या शुभ्र ड्रेस मध्ये केस मोकळे सोडून बसलेली तूच आठवतेस. अजून एक कारण हेच नाव देण्याचं. red wine चा लाल रंग; तू असलीस की सगळं कसं गुलाबी होतं न... हा गुलाबी रंग पण त्या लाल रंगात मुरला आहे. एक अजून, red wine ची चव बराच वेळ रेंगाळते.... तुझ्या आठवणी सारखी. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे wine ला expairy date नसते.... उलट ती जितकी जुनी तेवढीच तिची चव मुरते.... तिचा elegance वाढतो आणि रंग गहिरा होत जातो.


राणी; आज या नात्याला नाव देताना मनातून समाधान वाटतं आहे.... खूप काहीतरी शांत झालं आहे मनात. माझं माझ्या आयुष्यावर.... आई-बाबांवर आणि बायकोवर जितकं प्रेम आहे न तितकंच ते तुझ्यावर देखील आहे.... हे 'red wine' नातं खूप खूप खास आहे माझ्यासाठी............. अहं................. आपल्यासाठी!!!



***


Friday, May 21, 2021

 श्य.... सांभाळून बोला! (भाग 2) (शेवटचा)

 श्य.... सांभाळून बोला! (भाग 2) (शेवटचा)


भाग 2

तिला असं अचानक काय झालं बघायला अभी धावला. अवनी देखील त्याच्या बरोबर दारापर्यंत धावली.

रामुकाकांनी दिलेलं तांब्या भांडं घेऊन अवनीच्या हातात दिलं. तांब्या-भांडं अभिच्या हातात देऊन रामुकाकांनी एकदा अवनीकडे रोखून बघितलं निघून गेले. त्यांच्या त्या बघण्याने अवनी खूपच अस्वस्थ झाली; पण तिला तिच्या मनातले विचार बाजूला ठेवायला लागले; कारण मैथिलीकडे बघणं जास्त आवश्यक होतं. अभिने खाली पडलेल्या मैथिलीला उचललं. मैथिली बेशुद्ध पडली होती. तिला त्याने पलंगावर ठेवलं. रामुकाका गेलेले अवनीने बघितले होते; त्यामुळे तिने दरवाजा लावून घेतला. मात्र दार लावून घेताना अवनीचा चेहेरा अगदी शांत झाला होता.

सगळेच मैथिलीच्या भोवती जमले.

अभिने मैथिलीच्या चेहऱ्यावर पाणि शिंपडलं. मैथिली पाण्याच्या स्पर्शने जागी झाली. क्षणभर तिला लक्षात नाही आलं ती कुठे आहे; पण पूर्ण जागी झाली आणि तिचा चेहेरा भितीने गोठुन गेला. ती दचकुन पलंगावरून उठली.

"चला, आधीच्या आधी आपण या वाड्यातून बाहेर पडू या." सामान उचलत ती म्हणाली.

"मैथिली काय झालं? तू अशी एकदम का ओरडलिस? हे असं तडकाफडकी का निघायचं आपण? अग, आता साधारण तीन वाजले आहेत. दोन तासात पहाट होईल. मग हवं तर आपण निघु. अगदी लगेच बाहेर पडायचा प्रयत्न करू. पण हे अस अपरात्रि निघुन कस चालेल?" राजन तिला समजावत म्हणाला. अवनी वैतागत राजनकडे बघून म्हणाली,"राजन... बाहेर पडायचा प्रयत्न करू? असं का म्हणालास?"

राजनने एकदा अवनीकडे बघितलं आणि डोळ्यांनीच तिला शांत राहायची खूण केली. तो परत मैथिलीकडे वळला आणि त्याने मैथिलीकडे प्रश्नार्थक नजरेने बघितले. त्याला तिच्याकडून उत्तर अपेक्षित होते. त्याच्या नजरेतला प्रश्न समजून देखील त्याला उत्तर द्यायच्या भानगडीत न पडता मैथिली म्हणाली,"नाही... मला कोणालाही काहीही सांगायचं नाही किंवा कोणाच्याही कोणत्याही प्रश्नाला उत्तर देखील द्यायचं नाही. मला आत्ता या क्षणी इथून निघायचं आहे. बस्! चला उठा सगळे." ती हट्टाला पेटली होती.

"बर निघुया. पण बाहेर रस्त्यावर दिवे नाहीत. आपण रस्ता चुकू शकतो. मी रामुकाकांना बोलावून मेन रोडचा रस्ता विचारतो. मग आपण निघु." राजन ती एकत नाही हे पाहुन म्हणाला.

रामुकाकांचा उल्लेख ऐकून मैथिली एकदम बिथरली. "नाही... नको ... नको... रामुकाका नको." ती थरथर कापत म्हणाली. तिचा स्वतःवरचा ताबा सुटला. मटकन् खाली बसत ती एकदम रडायलाच लागली. तिला रडताना बघुन मंजूदेखिल घाबरली. तीसुद्धा रडायला लागली.

ते बघुन अभी वैतागला. "गप बसा बघू तुम्ही दोघी. मैथिली, अग असं काय करतेस? काय झाल सांग बघू. भूत बीत बघितलंस का तू?" अभिने तिच्याजवळ बसत तिला विचारलं.

मैथिली काहीच बोलत नव्हती. फ़क्त रडत होती. आता अवनी पुढे झाली. तिने अभी, वर्धा आणि राजनला बाजूला केलं आणि मैथिलीला जवळ घेतलं. "तुला खरंच तसं दिसलं का मैथिली?" तिने शांतपणे मैथिलीला विचारलं.

मैथिलीने चमकून अवनिकडे बघितले आणि म्हणाली "काय?"

अवनीचा प्रश्न एकून इतर सगळे गोंधळले. अभि अवनीच्या प्रश्नाने खूपच वैतागला. एकतर मैथिली काहीही सांगत नव्हती. त्यात अवनी आल्यापासूनच जरा विचित्र वागत होती. त्यात बिथरलेल्या मैथिलीला शांत करायचं सोडून अवनी तिला असे काही प्रश्न विचारत होती की ज्यामुळे अजूनच गोंधळ आणि संशय निर्माण होणारं वातावरण तयार झालं होतं. "तिने काय बघितलं अवनी? तिने जे काही बघितलं ते तुला काय माहीती? काय म्हणते आहेस तू नक्की?" अभीने आवाज चढवत अवनीला विचारलं.

"ते मी सांगतेच. पण अगोदर तू मला सांग अभी की तू रामुकाकांच्या हातातून पाण्याचा तांब्या घेतलास ना? तेव्हा तुला काही विचित्र दिसलं किंवा वाटलं का?" अवनीने अभिलाच उलट प्रश्न केला.

"नाही. मला कळलंच नाही मैथिलीने असं काय बघितलं की ती अशी किंचाळून बेशुद्ध पडली. काकांनी मला तांब्या दिला तेव्हा मी त्यांनाच विचारणार होतो. पण मग मैथिलीकडे लक्ष देणं जास्त महत्वाचं होतं आणि ते रामुकाका पण 'होय जी'; नाही जी; जसं म्हणाल तसं जी' यापेक्षा जास्त काही बोलत देखील नाहीत न. म्हणून मग मी त्यांच्याशी बोलत नाही बसलो. नक्की काय चालू आहे अवनी? आणि मला असं का वाटतं आहे की जे काही चालू आहे ते तुला माहित आहे." अभी म्हणाला.

"जे चालू आहे ते? मला माहित नाही अभि काय चालू आहे; पण थोडी कल्पना आहे असं माझं मत आहे." अवनी  म्हणाली. 

"म्हणजे?" सगळ्यांनी एकाचवेळी तिच्याकडे बघत विचारले.

"तुमच्या एक लक्षात आलं आहे का; आपण जे जे बोलतो आहोत ते ते तसचं घडतं आहे."अवनी शांतपणे म्हणाली.


"अवनी तुला नक्की काय म्हणायचं आहे?" राजनने तिला विचारलं.

"सगळेजण शांतपणे माझं म्हणणं समजून घ्या. हे बघा... आपण इथे आलो तेव्हा इथे कोणीच नव्हतं. पण अभिने रामूकाका म्हणून हाक मारली आणि त्याने वर्णन केल्यासारखे दिसणारे आणि त्याच नावाचे रामुकाका अवतरले. पण त्यांना या बंगल्याच्या रचनेबद्दल काहीच माहित नव्हतं. कारण अभिने त्यांचं दिसणं आपल्याला सांगितलं होतं. बाकी त्यांच्या व्यक्तित्वाबद्दल तो काहीच बोलला नव्हता. मग राजनने या घरात पूर्वी रहाणाऱ्या कोणीतरी आपल्याला घराची माहिती द्यावी म्हंटलं आणि एक गृहस्थ वरच्या मजल्यावरून अवतीर्ण झाले; केवळ माहिती देण्यापुरते. नंतर आपण खाली आलो तर ते नव्हते; किंवा अजूनही आपल्याला माहीत नाही ते कुठे गेले. आपण पिठलं भाकरी म्हंटलं तर रामुकाकांनी फक्त तेवढंच दिलं. मात्र आपण जेवायला बसलो तेव्हा कांदा हवा हे राजन म्हणाला त्यावेळी रामुकाका नव्हते. तरीही ते बाहेर आले तेव्हा त्यांच्या हातात कांदा होता.  बरं, अभिला पूर्ण रात्र गूढ घटनांनी भरलेली हवी होती; बघा एक एक प्रसंग आठवून... तो असं म्हणल्याक्षणी आपल्याला काहीतरी पडल्याचा आवाज आला होता; पण कळलं नाही काय ते. हा विचार करा की खोलीची दारं हरवणं, मुलगे झोपायला दुसऱ्या खोलीत गेले पण त्यांना खोलीच मिळाली नाही, मैथिली-मंजू, आपल्याला फक्त तिघी असताना खूप थंडी वाजत होती आणि मुलं आत आल्या आल्या वातावरण परत पहिल्यासारखं झालं.... हे सगळंच विचित्र आणि सतत गूढ घटनांनी भरलेलं घडतं आहे; असं नाही का वाटत तुम्हाला? काही लिंक लागते आहे का एकाला तरी?" अवनी म्हणाली.


"अवनी, अग, काहीही काय वलग्ना करते आहेस? अग, एकतर आपण या घरात पहिल्यांदा आलो आहोत. त्यात रात्र आहे. खोली कुठे आहे कशी आहे या बाबतीत आपण गोंधळू शकतो न? घर जुनं आहे; छत पडूच शकतं न. ते सोफ्यावरचे गृहस्थ झोपायला गेले असतील; आपल्याला काय माहीत त्यांनी सांगितलं त्याव्यतिरिक्त किती खोल्या आहेत या घराला आणि कुठे! बरं, कांद्याचं काय घेऊन बसलीस? पिठलं भाकरीबरोबर हे गावातले लोक कांदा खातातच. त्यामुळे रामुकाकांनी आपणहून आणला असेल कांदा. का उगाच नको त्या कल्पना इतरांच्या डोक्यात भरवते आहेस?" वर्धाने मंजू अजून घाबरेल म्हणून अवनीचा मुद्दा खोडून काढायचा प्रयत्न केला.

"ठीक वर्धा. तुला पटत नाही ना मी काय म्हणते आहे ते... पण मी जे म्हणते आहे ते जर सिद्ध केलं तर? मग तू... तूच काय तुम्ही सगळेच विश्वास ठेवाल न?" असं म्हणून अवनी मैथिलीकडे वळली. "मैथिली, खरं सांग तू का घाबरलीस आणि बेशुद्ध कशामुळे पडलीस?" अवनीने मैथिलीला विचारले.

आतापर्यंत सतत अवनीची थट्टा करणारी किंवा तिला गप्प करणारी मैथिली अवनीचं बोलणं ऐकून विचारात पडली होती. मैथिलीला अवनीचं म्हणणं हळूहळू पटायला लागलं होतं. तिने एकदा सगळ्यांकडे बघितलंआणि ती म्हणाली,"अवनी म्हणते आहे त्यात तथ्य आहे."

मैथिलीच्या त्या एका वाक्याने सगळेच हादरले. मंजू तर श्वास अडकल्यासारखी धपापायला लागली. तिची अवस्था बघून वर्धा मैथिलीवर वैतागला आणि म्हणाला;"कशावरून तुला असं वाटतं मैथिली? अवनी काहीतरी सांगते आहे आणि तू सगळ्यांना घाबरवण्यासाठी केवळ तिला पाठिंबा देते आहेस. हे योग्य आहे का? निदान आत्ता अशा वेळी... जेव्हा एकूणच परिस्थिती आपल्या आताबाहेर जाते आहे की काय असं वाटतंय." वर्धाच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत मैथिलीने तिचा मोर्चा अभिकडे वळवला.

"अभी, रामुकाकांनी पाण्याचा तांब्या दिला तो तूच घेतलास ना त्यांच्या हातातून?" मैथिलीने अभिला विचारले.

"हो! का?" त्याने तिला उलट प्रश्न केला.


"तुला काही विचित्र वाटलं का?" त्याच्या प्रश्नाला उतर न देता परत मैथिलीने त्याला विचारले.


"नाही मैथिली. तुला नक्की काय म्हणायचे आहे?" अभिने तिला उत्तर देत परत विचारले.

"म्हणजे आपण जेवण्यासाठी खाली गेलो त्यावेळी आपल्याला रामुकाका जसे दिसले तसेच दिसले ना तुला?" मैथिलीने परत एकदा विचारले.

तिच्या त्या प्रश्नांनी अभि गोंधळला आणि क्षणभर विचार करून म्हणाला;"हो! अगदी तसेच दिसले ग. म्हातारे... धोतर-बनियन आणि खांद्यावर फडकं. मैथिली तुला ते वेगळे दिसले का? उगाच सस्पेन्स तयार करण्यापेक्षा तू हे असले प्रश्न का विचारते आहेस ते सांगशील का?"

"अभी... अवनी... वर्धा... मंजू ... राजन.... तुम्हाला आठवतं मी रामुकाकांवर चिडले होते तेव्हा काय म्हणाले होते? मी म्हणाले होते की तुमचं तोंड मला दाखवू नका. आठवतं? आणि काही क्षणातच मी परत त्यांना हाक मारली आणि पाणी आणायला सांगितलं. ते पाणी घेऊन आले म्हणून दार उघडलं.... दोस्तांनो; माझ्यावर विश्वास ठेवा.... मी आता जे सांगणार आहे ते खरं आहे.... तुम्ही म्हणाल त्या व्यक्तीची शप्पथ घेऊन मी ते सांगेन." असं म्हणून मैथिली श्वास घेण्यासाठी थांबली. तिने एकदा अवनीकडे बघितलं. अवनीने तिला डोळ्यांनीच धीर दिला. एकदा सगळ्यांवर नजर फिरवून मैथिली परत बोलायला लागली. "दोस्तांनो; भयंकर होतं ते.... दारात उभ्या असलेल्या रामुकाकांना.... देवा शप्पथ सांगते.... दारात उभ्या असलेल्या रामुकाकांना चेहेरा नव्हता! तिथे एक व्यक्ती होती.... धोतर, बनियन... खांद्यावर फडकं... हातात तांब्या-भांडं... पण खांद्यावरच्या डोक्याला चेहेराच नव्हता. माझ्यासाठी तो एक मोठा धक्का होता.... विचार करा रे; मी चिडून बडबड करत दारापर्यंत गेले; त्यावेळी परत एकदा त्या रामुकाकांना झापण्याचा माझा इरादा होता. त्यामुळे मी त्याच आवेशात त्यांच्याकडे बघितलं. पण........ मी जे काही बघितलं ते बघूनच मी किंचाळून बेशुद्ध पडले. मी त्यांना काही क्षण अगोदरच म्हणाले होते चेहेरा दाखवू नका. पण लगेच हाक मारली आणि पाणी आणायला सांगितलं. त्यामुळे त्या रामुकाकांनी पाणी तर आणलं पण मला चेहेरा नाही दाखवला. मात्र तुम्ही कोणीही असं काहीही म्हंटलं नव्हतं. त्यामुळे अभिला आणि त्याच्या मागून गेलेल्या अवनीला रामुकाका चेहेऱ्यासकट दिसले. फक्त मीच त्यांना म्हंटलं होतं की चेहेरा दाखवू नका." मैथिली बोलायची थांबली आणि तिने सगळ्यांकडे परत एकदा नजर फिरवली. सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसल्याचं तिच्या लक्षात आलं. पण त्यावर अजून काही बोलणं तिला शक्यच नव्हतं. तिच्या डोळ्यासमोरून तो प्रसंग परत एकदा गेला आणि तिच्या जीवाचा थरकाप उडाला. ती एकदम अवनीला बिलगली आणि म्हणाली; "अवनी मला पटतं आहे तू म्हणते आहेस ते." मैथिलीचा कापत असलेला आवाज आणि तिची एकूण परिस्थिती बघून ती खोटं बोलत नाही आहे हे सगळ्यांच्याच लक्षात आलं.

आता मात्र सगळ्यांची पाचावर धारण बसली. सगळेच आपापल्या परीने घडलेल्या प्रत्येक प्रसंगाचा विचार करायला लागले. हळूहळू त्यांना अवनीचं म्हणणं पटायला लागलं. पण हा सगळा प्रकार लक्षात आल्यावर मंजू तर पुरती घाबरून गेली. तिचं रडणं क्षणभर देखीलं थांबत नव्हतं. ती आता एक क्षणही या घरात थांबायला तयार नव्हती. इतरांकडे दुर्लक्ष करत ती वर्धाकडे वळली.

"वर्धा ... आपण आत्ताच्या आत्ता इथून बाहेर पडतो आहोत. चल उठ. इतरांना......"मंजू पुढे काहीतरी भलतंच बोलणार होती पण अवनीने तिच्या तोंडावर हात ठेवत तिला गप्प केलं. "मंजू इतक सांगूनही काहीतरी चुकीचं बोलायचं आहे का तुला? गप बस् बघू तू." मंजुला गप्प करून अवनी सगळ्यांकडे वळली आणि म्हणाली;"आपण सगळेच आत्ता इथून निघतो आहोत. बस! उठा सामान उचला आणि चला. कोणीही काहीही बोलायची गरज नाही आहे. ठीक?" अवनी म्हणाली.

मंजूला ती काय चूक करणार होती ते लक्षात आलं आणि ती गप्प बसली. सगळेच उठले आणि आपापलं सामान घेऊन निघाले. अवनी म्हाणाली,"आपण शांतपणे खोलीच्या बाहेर पडणार आहोत आणि जिना उतरून खाली जाणार आहोत. ठीक?" त्यावर सगळ्यांनी मान हलवली. अवनीने खोलीचं दार उघडलं. पण खोलीबाहेर पाय ठेवायची हिम्मत कोणतंच नव्हती. सगळेच एकमेकांकडे बघत उभे होते. अवनीने हिम्मत करून पाऊल उचललं आणि सगळेचजण एकमेकांचा हात धरून खोलीबाहेर आले. समोर डावीकडे जिना होता. सगळेच हळूहळू पुढे सरकत जिन्याजवळ आले. अवनी सर्वात पुढे होती. तिची नजर जिन्याकडे गेली; जिना तर होता पण पायऱ्याच दिसत नव्हत्या. 

"पायऱ्या नाही आहेत." अवनी खर्जात म्हणाली. 

अवनीच्या मागेच अभि होता. तिचं बोलणं फक्त त्यालाच ऐकायला गेलं. "असं कसं होईल? आपण दोनदा हा जिना चढलो आणि उतरलो आहोत. थांब मी बघतो." असं म्हणत तो पटकन पुढे आला. पण त्यालाही पायऱ्या दिसल्या नाही. तोदेखील गडबडून गेला. धडपडत मागे सरकत त्याने अवनीकडे बघितलं आणि विचारलं "आता?"

त्याच्या धडपडण्यामुळे सगळेच मागे गेले आणि एकमेकांवर आपटत पडले. परत एकदा एकमेकांना सावरत उभं राहात सगळेच जिन्याजवळ आले आणि पायऱ्या गायब झालेल्या बघून हबकले.

मंजूला तर वेड लागायची पाळी आली. तिने तोंड उघडलं आणि रडवेल्या आवाजात म्हणाली;"म्हणजे आपण या वरच्या मजल्यावर....?" आता मात्र अवनीचा स्वतःवरचा ताबा संपला होता. एकदम भडकून तिने मंजुच्या तोंडावर हात ठेवला आणि चिडलेल्या आवाजात ती म्हणाली,"मंजू तू गप बसशील का? कृपा कर सगळ्यांवर. कितीही इच्छा झाली तरी आता बोलण्यासाठी तू तोंड उघडू नकोस. समजलं?" पण मग ती शांत होत म्हाणाली,"हे बघा.... इथे काहीही झालं तरी आपण या जिन्यावरून खाली उतरणार आहोत. पायऱ्या नसल्या तरी बाजूला धरायला आहे न. एकमेकांचा हात धारा... मी सुरवात करते आणि सगळे माझ्या मागून या. आपण हा जिना हळू हळू उतरणार आहोत." असं म्हणून अवनीने मनाचा हिय्या करून पाउल पुढे टाकलं. आश्चर्य म्हणजे पायऱ्या दिसत नसल्या तरी तिला पायांना त्या जाणवत होत्या. त्यामुळे तिने जिना उतरायला सुरवात केली. सगळेच जण एकमेकांचा हात धरून एकमेकांना आधार देत खाली दिवाणखान्यात आले. 

खाली येऊन सगळे सोफ्याजवळ उभे राहिले. सोफ्याच्या बाजूलाच वरून जे छत पडलं होतं त्याचा ढीग होता आणि त्याच्या बाजूला रामुकाका स्वस्थ उभे होते. रामुकाकांना बघून सगळ्यांच्याच तोंडचं पाणी पळालं. आता नक्की काय करावं ते अवनीला देखील सुचत नव्हतं. रामुकाका तिच्याकडे एकटक बघत होते.... त्यांच्या नजरेने ती खूपच अस्वस्थ झाली. "असं का बघता आहात तुम्ही माझ्याकडे?" तिने न राहून रामुकाकांना विचारलं. "जी? जी.... तुम्ही म्हणाल तसं जी." रामुकाका म्हणाले. "हे सतत का म्हणता आहात तुम्ही? आम्ही काहीतरी चुकीचं बोलावं आणि या घरात अडकावं म्हणून?" मंजुच्या तोंडून शब्द बाहेर पडलेच..... तिचे शब्द ऐकून अचानक रामुकाका गडगडून हसले. आता ते त्यासर्वांकडे बघत होते परंतु त्यांनी अजिबात हालचाल केली नाही.

मात्र मंजुच्या बोलण्याने सगळेच हवालदिल झाले. अवनीच्या ते लक्षात आले. तिने मंजूकडे एक जळजळीत कटाक्ष टाकला. मात्र ती काहीच बोलली नाही. तिने सगळ्यांकडे नजर फिरवत गप राहण्याची खूण केली आणि सभोवार नजर फिरवली. जिन्याच्या समोरच सोफा होता आणि त्याच्यापलीकडे घराबाहेर पडण्याचं दार तिला दिसत होतं. मात्र इतरांना आजूबाजूला सगळंच धूसर दिसत होतं.

"अवनी, सगळं....." अभिने तोंड उघडलं आणि अवनी मोठ्याने ओरडली.... "अभि गप बस्. काहीही दिसत असलं तरी कृपा करून गप बस्."

आपण काय चूक करणार होतो ते लक्षात येऊन अभि शांत झाला आणि म्हणाला;"अवनी तू म्हणते आहेस ते बरोबर आहे. सगळ्यांनी गप बसलं पाहिजे. आपल्याही नकळत आपण सतत बोलत असतो नाही?" त्याच्या त्या वाक्याने देखील अवनी अस्वस्थ झाली. पण तिने ते चेहेऱ्यावर दाखवले नाही. कारण मंजू तिच्या बाजूलाच उभी राहून तिच्या चेहेऱ्याचं निरीक्षण करत होती. अवनीच्या लक्षात आलं की तिने तिच्या चेहेऱ्यावरची नस जरी हलवली तरी मंजू कोसळून जाणार आहे. त्यामुळे तिला धीर देत अवनी त्या परिस्थितीत देखील हसली. अवनीच्या चेहऱ्यावरचं हास्य बघून सगळ्यांच्या चेहेऱ्यावर सुटकेचं समाधान उमटलं. एकमेकांचा हात धरून ते अवनीच्या मागून दाराच्या दिशेने निघाले. सगळे दाराजवळ आले.... आणि धुसरपणे दिसणारं दार उघडण्यासाठी राजनने कडीला हात घातला. पण त्याला हाताला कडी लागलीच नाही. तो गोंधळाला. दिवाणखान्यात मिणमिणता दिवा होता. त्याने अभिला अजून एखादा दिवा असला तर लावायला सांगितले. अभिने भिंतीवर चाचपडत दिव्याचं बटण शोधलं आणि दिवा लावलासुद्धा. त्या काहीशा वाढलेल्या उजेडात सगळ्यांना दिसले की समोर दार होते पण त्याला कडीच नव्हती. समोर एकसंघ असे सागवानी लाकडाचे मजबूत दार होते. जे आतून उघडणे यांच्यापैकी कोणालाही शक्यच नव्हते. आता मात्र सगळ्यांचाच धीर सुटला. थिजल्यासारखे सगळे एकमेकांकडे बघत उभे राहिले. अचानक घराच्या आतल्या बाजूने खोल कुठूनतरी घड्याळाची टिकटिक कानावर पडायला लागली. शांततेमध्ये झालेला तो टिकटिक आवाज अजूनच भयाण वाटायला लागला. सगळ्यांचे चेहेरे ताणले गेले.

मात्र आतापर्यंत कोणालाही काहीही बोलायची किंवा विचार करायची हिम्मत राहिली नव्हती. त्यातल्या त्यात अवनी थोडी शांतपणे विचार करण्याच्या मनस्थिती होती. तिने स्वतःच्या ओठांवर बोट ठेवत सगळ्यांना न बोलता तिथेच थांबायची  खुण केली आणि दाराच्या एका टोकाला असलेल्या खिडकीकडे ती चालत गेली. तिने खिडकीला हात लावला आणि काय आश्चर्य. त्या खिडकीचा दरवाजा आपोआप उघडला गेला. अवनी आनंदाने सगळ्यांना तिच्या दिशेने येण्याची खुण केली. अवनीच्या दृष्टीने तिला सगळंच स्पष्ट दिसत होतं. इतरांसाठी सगळं वातावरण धूसर झालं आहे याची तिला कल्पना देखील नव्हती. त्यात तिने जवळ बोलावल्याची खूण केलेली अभिच्या लक्षात आल्याने त्याने राजनचा हात धरला आणि तो अवनीच्या दिशेने चालायला लागला. राजनचा हात धरून मंजू आणि मग वर्धा देखील आपोआप खिडकीच्या दिशेने चालायला लागले. ते सगळेच एकमेकांचा हात धरून आपल्या दिशेने येत आहेत हे बघून अवनी पुढे झाली आणि तिने खिडकी उघून एक पाय बाहेरदेखील टाकला. अभि, राजन, मंजू आणि वर्धाच्या धूसर डोळ्यांना अवनीचा खिडकी बाहेर पडणारा पाय दिसला आणि सगळेच पुढे धावले.

"मी बाहेर पडते आहे अभि... मी पूर्ण बाहेर गेले की तिथे उभी राहून तुम्हाला हात देते. एक एक जण या. ठीक?" अवनी बोलत होती पण तोपर्यंत ती खिडकी बाहेर पडली देखील होती. ती काहीतरी बोलते आहे हे सगळ्यांच्याच लक्षात आले होते पण तिचा आवाज मात्र सगळ्यांपर्यंत पोहोचत नव्हता. मात्र तिला बाहेर जाताना बघून सगळ्यांच्या चेहेऱ्यावर सुटकेचा आनंद उमटला.

त्याचवेळी आतून कुठूनतरी कुठल्याश्या घड्याळाचे टोल अचानक पडायला लागले. अवनी दुसरा पाय बाहेर घेताना सहज एक एक टोल मोजत होती......"एक..... दोन..... तिन.... चार................................ पाच..............................." अवनी पूर्णपणे वाड्याच्या बाहेर उभी होती. तिने खिडकीतून आत हात घातला. "मंजू तू ये बघू बाहेर अगोदर...." अवनी म्हणाली. 


................. पण............... पण.............. तिला आतून सगळ्यांचे फक्त आवाज एकू येत होते. "अवनी गेली बाहेर. पण मग खिडकीचं दार का नाही उघडतं? अरे........ अवनी.......... अवनी??? "हॅलो... हॅलो..... वाचवा.... वाचवा! मला.... आम्हाला बाहेरचा रस्ता मिळत नाहीये हो...... हॅलो..... एकता आहात का तुम्ही? हॅलो........" अवनीला मैथिलीचा आवाज ऐकू येत होता. तिला तिचे मित्र-मैत्रिणी दिसत होते. पण त्यांना मात्र बाहेर उभी असलेली अवनी दिसत नव्हती. 

पाच वाजले होते आणि वाड्याच्या बाहेर उभी असलेली अवनी असाहाय्यपणे खिडकीच्या आत दिसणाऱ्या आपल्या मित्रांकडे बघत होती.

समाप्त


Friday, May 14, 2021

श्य.... सांभाळून बोला!

 श्य.... सांभाळून बोला!


भाग 1

"हॅलो... हॅलो..... वाचवा.... वाचवा! मला.... आम्हाला बाहेरचा रस्ता मिळत नाहीये हो...... हॅलो..... ऐकता आहात का तुम्ही? हॅsssलो........" 

फोन कट करून मैथिली खो-खो हसत सुटली. वर्धा, अभी, राजन, मंजू सगळे तिच्या हसण्यात सामील झाले. एकटी अवनी शांत होती. 


"काय झाल तुला अवनी?" हसण थांबवत मैथिलीने अवनीला विचारले.


"मैथिली मला असले pranks आवडत नाहीत. काय हा आचरटपणा लावला आहेत तुम्ही? कुठला रस्ता मिळत नाहीये तुला? उगाच काहीतरी बडबड का करते आहेस? एक समजून घे; मला या वाड्यात फक्त ही एकच रात्र रहायचं आहे हं. पहाटेच निघायचं आहे साधारण पाच पर्यंत. आणि dont worry...  मला रस्ता मिळेल बाहेर पडायचा. तुमचं तुम्ही बघा. एकतर आपल्यापैकी कोणालाही या बंगल्याची माहिती नाही.... आणि आल्या आल्या हा असला फोन काय करतेस तू?" अवनी एकूण प्रकार न आवडून रागाने म्हणाली.


"chill अवनी. प्रत्येकवेळी तुझी लेक्चर्स नको आहेत आम्हाला. आमची ताई बनू नकोस सारखी. समजलं? अग, आत आल्या आल्या हा जुन्या पद्धतीचा फोन बघितला गोल डायलवाला आणि वापरावासा वाटला.... म्हणून केला फोन." मैथिली आवाज चढवून म्हणाली.

वातावरण तापतं आहे हे बघून वर्धा मध्ये पडला. "पण तू नक्की कोणाला लावला होतास  फोन मैथिली?" हसू थांबवत त्याने तिला विचारलं.

"अरे कोणाला असा नाही रे. बस काही नंबर फिरवले. समोरून फोन उचलल्याचं समजलं आणि मी घाबरलेल्या आवाजात बोलून फोन कट केला." मैथिली त्याच्याकडे बघून डोळा मारत आणि हसत म्हणाली.

"कोण होत ग फोनवर?" मंजूने विचारलं.

"मला काय माहित? एक घोगरा आवाज होता. हॅलो..... बोला.... असं म्हणाला. बस. जाउदे ते. यार इतका प्रवास करून आलो आहोत. चला जरा घर बघून घेऊया. बाबा म्हणाले होते की ते इथे फोन करून जो कोणी care taker आहे त्याला कळवतील की आपण येणार आहोत. पण तुम्हाला माहित आहे माझे बाबा किती बिझी असतात. त्यामुळे कदाचित ते फोन करायला विसरले देखील असतील. चला, आपणच त्या care taker ला शोधून काढू या." असं म्हणत मैथिलीने पायाशी ठेवलेली आपली bag उचलली. तिचं अनुकरण करत सगळ्यांनीच आपापल्या bags उचलल्या. 

"रामू काका....... ओ रामू काका....." अभी हाका मारायला लागला.

"ए गप. कोण रामुकाका रे?" राजनने अभिच्या टपलीत मारत विचारले.

"अरे साधारणपणे अशा जुन्या वाड्यांचा सांभाळ करणारे कोणी असतात ना ते म्हातारे असतात. आणि त्यांच नाव रामू काका असतं. कायम धोतर.... मळकट बनियन आणि खांद्यावर एक फडक असा त्यांचा अवातार असतो." अभी राजनला डोळा मारत म्हणाला आणि आतल्या दिशेने वळला. मात्र नजर वर करताच तो दचकून धडपडला. आतल्या एका दारात कोणीतरी उभं होतं. एकदम आवाज वाढवून अभिने विचारल,"कोण? कोण आहे तिथे?"

त्याच्या या प्रश्नाने सगळेच त्या दाराकडे बघायला लागले. मंजूने घाबरून वर्धाचा हात धरला. तिच्या हातातली bag खाली पडली. मैथिली पण  गोंधळली. कारण तिच्या बाबांनी तिला सांगितले होते की 'बेटा, बंगला बंद असतो. कोणीतरी आहे तिथे सांभाळायला पण त्यांना कळवावं लागतं. कारण तो गृहस्थ सतत बंगल्यात नसतो. तुम्ही दोन दिवसच जाणार आहात तर मी कळवतो. पण जर कोणी नसलं तर आपलं आपण सांभाळून घ्या.' त्यावर मैथिलीने सांगितलं होतं की फक्त एक रात्र मुक्कामाला ते सगळे त्या बंगल्यावर जाणार होते आणि सकाळी सगळं आवरून लगेच निघणार होते. त्यामुळे कोणी नसलं तरी चालणार होतं. म्हणून तर तिने बंगल्याच्या किल्ल्या आठवणीने मागून घेतल्या होत्या निघताना.

मैथिलीने धीर परत करून विचारलं,"कोण?"

"मी रामुकाका हाय जी. आवाज दिलात म्हणून आलं जी." त्या कृश आकृतीने उत्तर दिलं.

"अहो मग तिथे उभे राहून काय बघता आहात. आत या की. पाहुणे आम्ही आहोत; तुम्ही नाही." मंजू वैतागून म्हणाली.

"हा जी. आलो." असं म्हणून रामुकाका आत आले. कृश तब्बेतीचे म्हातारे, मळकट धोतर आणि बनियन आणि खांद्यावर एक फडकं असा त्यांचा अवतार होता. ते बघताच अभी राजनकडे बघत डोळा मारून परत हसला.

"काय हो इतका वेळ कुठे होतात? बरं... ते जाऊ दे. किती खोल्या आहेत इथे?" वर्धाने विचारले.

"किती म्हंजी?  मला काय माहित जी." रामुकाका म्हणाले.

"तुम्हाला नाही माहित? मग काय आम्हाला माहिती आहे का या बंगल्याची? काय ग मैथिली... मी तुला म्हंटलं होतं न की आपण एखादी खानावळ किंवा लॉजिंग-बोर्डिंग शोधुया. तिथे कायम कोणी ना कोणी उतरत असतं. त्यामुळे बरी सोय असते. तर तुलाच या आडबाजूच्या वाड्यात यायची हौस. इथे इतक्या आत कोणी कशाला येत असेल? त्यात या रामुकाकांना जर काही माहित नाही, तर मग आता कोण या वाड्यात रहाणारी पूर्वीची पितरं येणार आहेत का आपल्याला माहिती द्यायला?" राजन म्हणाला.

तेवढ्यात वाड्याच्या वरच्या मजल्याकडे जाणाऱ्या जिन्याच्या बाजूने खाकारल्याचा आवाज आला. 

आता मात्र मैथिली, मंजू, अवनी, वर्धा, राजन आणि अभी सगळेच दचकले.

"मैथिली या वाड्यात कोणी राहातं का?" हळूच मैथीलीच्या कानाला लागून राजनने विचारले.

तेवढ्याच हळू आवाजात मैथिली म्हणाली,"माहित नाही रे. बाबा म्हणाले होते........." तिचं वाक्य पूर्ण होण्याच्या आत वरच्या जिन्यावरून एक मध्यम वयाचे गृहस्थ खाली यायला लागले.

"कोण रे तुम्ही पोरं? इथे कसे आलात?" त्यांनी एक करडा कटाक्ष सगळ्यांवर टाकला आणि विचारले.

मैथिली पुढे होत म्हणाली,"आम्ही मुंबईहून आलो आहोत. कर्जतच्या पुढेच एक ट्रेकिंग पोइंट आहे. तिथे ट्रेकिंगला गेलो होतो. आता फक्त रात्रीचा मुकाम होता. माझ्या बाबांच्या ओळखीच्या लोकांचा हा बंगला आहे. बाबा म्हणाले की रात्री आम्ही इथे थांबू शकतो म्हणून फक्त रात्रीपुरते इथे आलो आहोत."

"बरं बरं....." त्या व्यक्तीने सोफ्यावर बसत म्हंटले. "मी तुम्हाला वाड्याची माहिती देतो. हा दिवाणखाना. समोरच्या जिन्याने वर गेलं की डावीकडे एक, उजवीकडे एक, आणि समोर एक अशा तीन झोपायच्या खोल्या आहेत. जिन्याच्या मागून माजघर आणि त्याच्या शेजारी  जिन्याच्या डावीकडे देवघर आहे. पण आता ते बंदच असतं." 

त्यांनी एकूण बंगल्याची जुजबी माहिती दिली आणि त्या सगळ्यांकडे बघत स्वस्थ बसून राहिले. ते काहीच बोलत नाहीत हे बघून मैथिली पुढे झाली. "आम्ही वरची खोली वापरली तर चालेल का?" तिने विचारले.

"तुमची मर्जी. माझी काहीच हरकत नाही." त्यांनी सगळ्यांकडे एक कटाक्ष टाकत म्हंटले.

"धन्यवाद." अस म्हणत मैथिलीने रामुकाकांकडे बघितले आणि म्हणाली,"काका थोडं काही खायला करता? काहीही चालेल. पिठलं भाकरीसुद्धा. आम्ही वर खोलीत आहोत. तयार झाल की बोलवा. आम्ही येतो खाली."

"बरं... जस तुम्ही म्हणाल तसं जी." अस म्हणत रामुकाका माजघराच्या दिशेने गेले.

एकदा रामुकाका ज्या दिशेने गेले तिकडे बघून आणि समोर सोफ्यावर बसलेल्या गृहस्थांकडे बघून मैथिली म्हणाली,"चला, आपण वर जाऊ या." तिने तिचे सामान उचलले आणि जिना चढायला लागली. ते गृहस्थ शांतपणे त्यांच्याकडे बघत सोफ्यावर बसले होते. इतरांनी मग फार विचार न करता मैथिलीचं अनुकरण केलं. जिन्याने वर गेल्यावर मैथिली क्षणभर थांबली आणि मग उजवीकडच्या खोलीकडे वळली. सगळेच तिच्या पाठोपाठ त्या खोलीत गेले.

"यार अजब घर आहे हे. तू म्हणाली होतीस कोणीच नसेल. आणि आता एक एक जण अचानक उगवतो आहे इथे. अख्खी रात्र अशीच गूढ घटनांनी भरलेली असली तर मजा येईल." खोलीत आल्या आल्या सामान जमिनीवर टाकत अभी हसत मोठ्याने म्हणाला. तितक्यात काहीतरी जोरात पडल्याचा आवाज आला आणि सगळेच धावत खोलीच्या बाहेर अगदी जिन्याच्या टोकापर्यंत आले. 

"रामुकाका... ओ.. रामुकाका..... काय झालं? काय पडलं?" वर्धाने जोरात हाक मारत रामुकाकांना विचारले.

"काही नाही जी. तुम्ही म्हणाल तस जी." खालून उत्तर आले. त्यांचं उत्तर विचित्र वाटल्याने एकमेकांकडे बघत परत सगळेजण खोलीकडे वळले. पण जिन्याच्या उजव्या बाजूकडे खोलीचं दारच नव्हतं. समोर एक खोली होती आणि डावीकडे दोन खोल्या होत्या.ते बघून सगळेच गोंधळले.

"अरे आपण उजवीकडच्या खोलीकडे गेलो होतो न?" मंजूने विचारले.

अभी डावीकडे वळला आणि एका खोलीच्या दारात उभं राहात म्हणाला,"अरे आपलं सामान इथे आहे. उजवी डावी सोडा... या जेवण तयार होईपर्यंत जरा फ्रेश होऊया."


सगळे अभिच्या मागे डावीकडच्या खोलीकडे वळले. अवनीला मात्र हे थोडं विचित्र वाटलं. तिला खात्री होती की ते सगळे उजव्या बाजूच्या खोलीकडे वळले होते. पण वाड्यात आल्या आल्या तिचा आणि मैथिलीचा वाद झाल्यानंतर तिने ठरवलं होतं की फार बोलायचं नाही. हे सगळेच चेकाळल्यासारखं वागत आहेत, त्यामुळे आपण शांत बसलेलं बरं. सगळ्यांच्या मागून डावीकडच्या खोलीकडे जाताना तिने मागे वळून बघितलं तर तिला जिन्याच्या उजवीकडे खोलीचं दार दिसलं. अवनी चांगलीच दचकली. पण काही न बोलता ती सर्वांच्या मागून डावीकडच्या खोलीत शिरली.

खोलीत जाऊन सगळे एक एक करून फ्रेश होऊन आले. जरा कपडे बदलून बसले. खोली मोठी होती. खोलीच्या मध्यभागी एक बेड तीन जणांना झोपता येईल इतका मोठा होता. त्यामुळे मुलींनी या खोलीतल्या बेडवर झोपायचं आणि मुलांनी शेजारच्या खोलीत झोपायचं अशी एकूण त्यांच्यात चर्चा चालू होती. दुसऱ्या खोलीत झोपायची परवानगी त्या खाली सोफ्यावर बसलेल्या गृहस्थांकडून घ्यायची असं त्यांच्यात ठरलं. त्याचवेळी खालून रामुकाकांची हाक आली. "पिठलं भाकरी तयार हाय जी. या जेवायला."

सगळ्यांनाच भूक लागली होती. त्यामुळे सगळे खाली माजघरात आले. माजघराकडे जाताना सगळ्यांच लक्ष सोफ्याकडे गेलं. पण तिथे कोणीच नव्हतं. रामुकाकांनी सहा ताटल्यांमध्ये दोन-दोन भाकरी आणि पिठलं वाढूनच ठेवालं होतं.

"काका पाणी देता का जरा?" अवनीने अजीजीने काकांना म्हंटलं.

"तुम्ही म्हणता तर देतो जी."असं म्हणत रामू काका पाणी आणायला आत गेले. सगळेच शांतपणे जेवायला बसले. 

"कांदा असता तर मजा आली असती." राजन म्हणाला आणि आतून पाणी घेऊन येणाऱ्या रामुकाकांच्या हातात त्याला कांदा दिसला.

"अरे वा काका... मी म्हंटलं कांदा हवा आणि तुम्ही लगेच आणलात? मस्त!" राजन काकांकडे बघत हसत म्हणाला.

"तुम्ही म्हणता तसं होईल जी." रामू काका एकदम खर्जात अगदी पुटपुटल्यासारखं म्हणाले. सगळेच जेवाणात गर्क होते. पण अवनीने काकांचं पुतपुटण ऐकलं. तिचं आपल्याकडे लक्ष आहे हे रामुकाकांच्या लक्षात आलं आणि ते तिच्याकडे रोखून बघायला लागले. अवनीला रामुकाकांच्या नजरेची भीती वाटली. ती गपचूप आपल्या ताटलीत बघून जेवत राहिली.

सगळ्यांचं जेवण आटपलं आणि हात धुवून सगळे बाहेर आले. 

"रामुकाका... ते इथे सोफ्यावर बसले होते ते कुठे आहेत? आम्हाला दोन खोल्या वापरायच्या होत्या त्यांना विचारून." मैथिलीने रामुकाकांना विचारले.

"त्यांच काम झालं; ते गेले जी. तुमच काय. तुम्ही बोलाल तसं होईल जी." अवनिकडे बघत रामुकाकांनी उत्तर दिले.

"बरं. मग आम्ही मुली एका खोलीत झोपतो आणि दुसऱ्या खोलीत मुलगे झोपतील."मैथिलीने रामुकाकांना सांगितले आणि त्यांच्या उत्तराची वाट न बघता सगळेचजण जिन्याने वर गेले.

"खोली डावीकडे होती...... परत उजवीकडे कशी आली?" जिन्याच्या शेवटच्या पायरीवर उभं राहात मैथिली आश्चर्याने मोठ्या  म्हणाली. तिच्या अचानक असं मोठ्याने बोलण्याने सगळेच दचकले आणि धडपडले.

"हा काय प्रकार आहे नक्की?" राजन वैतागत म्हणाला.

"वर्धा, हे काय चालू आहे रे? मला भिती वाटते आहे." मंजू वर्धाला चिकटत म्हणाली. तिला जवळ घेत म्हणाला,"काळजी नको ग करुस मंजू आणि घाबरू देखील नकोस. चला रे. आपण सगळे अगोदर एकाच खोलीत जाऊ या." वर्धाने मंजुचा हात धरला आणि तिला धीर देत तो सगळ्यांना उद्देशून म्हणाला.

क्षणभर विचार करून सगळे उजव्या खोलीत गेले. जेवण्यासाठी बाहेर पडताना त्यांचं सामान जसं होत तसचं पडलं होतं. त्यामुळे कोणालाही काही वेगळं घडतं आहे असं वाटलं नाही. मंजू अजूनही वर्धाचा हात धरूनच होती. "आपण इथून आत्ताच निघूया का? मला खरंच खूप भिती वाटायला लागली आहे." ती अचानक म्हणाली.

"मंजू अग आता खूप रात्र झाली आहे. आपण सगळेच दमलो आहोत; आणि आपल्याला इतक्या रात्री कुठे अजून जागा कशी मिळेल? परत मुंबईपर्यंत गाडी चालवण्याचे त्राण कोणाच्याही अंगात नाही. त्यामुळे घाबरणं बंद कर आणि झोपायला चल." मैथिली मंजुला म्हणाली. तरीही मंजू वर्धाचा हात सोडायला तयार नव्हती. मैथिलीने मग मंजूची चेष्टा सुरु केली. "अग, जरा आवाज झाला तर वर्धाचा हात धरते आहेस; जर छत कोसळलं तर काय त्याच्या................." मात्र मैथिलीचं वाक्य पूर्ण होण्याच्या आतच खूप मोठ्ठा आवाज झाला. सगळेच दचकले आणि धावत बाहेर आले. 

दिवाणखान्याचे छत कोसळले होते. आता मात्र सहाही जण गांगरून गेले. गोंधळून गेले. कोसळलेल्या छताच्या ढिगाजवळ उभं राहून रामुकाका या मुलांकडेच बघत होते. त्यांच्या डोळ्यातले भाव विचित्र होते.

सगळेच मागे सरकले आणि रामुकाकांना काहीही न बोलता परत खोलीत गेले. सगळे आत येताच अभिने दार लावून घेतले आणि म्हणाला, "हे नक्की काय चालू आहे? आपण दमलो म्हणून थेट मुंबईला जाण्यापेक्षा रात्री आराम करावा या उद्देशाने आलो आणि इथे आल्यापासून गेल्या दोन तासात किती घटना घडल्या."

"माझं ऐकणार आहात का तुम्ही सगळे?" अवनिने सगळ्याना शांत करत म्हंटले.

"गप ग ताई." मैथिलीने अवनीला परत एकदा गप केले. मंजू मात्र खूपच घाबरली होती. ती आता वर्धाला घट्ट चिकटली होती. "आपण निघूया का वर्धा?" तिने त्याच्याकडे बघत परत एकदा त्याला विचारले. "सगळे या एकाच खोलीत झोपूया का?" अवनीने मैथिलीकडे दुर्लक्ष करत आणि सगळ्यांकडे बघत विचारले.

"का? हिला वर्धाला सोडवत नाही म्हणून का?" मैथिलीचा परत चेष्टेचा मूड डोकं वर काढायला लागला. राजनने तिला शांत केले आणि म्हणाला,"नको अवनी. एकाच खोलीत नको. पण आता उशीर झाला आहे त्यामुळे झोपूया सगळे. मंजू आम्ही शेजारच्याच खोलीत आहोत. तुला भिती वाटली तर आम्हाला हाक मार. ठीक? चला अभी... वर्धा.... झोपूया सगळेच. सकाळी बघू काय ते."

"सगळंच विचित्र. आता राजन म्हणतो तशी ती खोली शेजारी असली तर बरं नाहीतर परत खोली शोध मोहीम हाती घ्यावी लागेल." असं म्हणत अभी त्यांच्याबरोबर खोलीबाहेर पडला. 

मुलगे बाहेर जाताच मुली थोड्या मोकळ्या झाल्या. मात्र मंजू खरंच खूप घाबरली होती. ती अवनीजवळ येऊन हळूच म्हणाली,"मी मध्ये झोपू का ग? मला खरच खूप भिती वाटते आहे. मैथिलीला सांगितलं तर ती परत चेष्टा करेल."

"घाबरू नकोस मजू. तू झोप मध्ये. आणि महत्वाचं म्हणजे आता काही बोलू नकोस. ऐक माझं." अवनी म्हणाली. मैथिली अगोदरच पलंगावर आडवी झाली होती. मंजू आणि अवनीदेखील पलंगावर येऊन पडल्या. सगळं कसं शांत झालं. तिघींनाही दमल्यामुळे लगेच झोप लागली. पम थोड्या वेळाने मंजुला थंडी वाजायला लागली जाग आली. तिने डोळे उघडले आणि अंदाज घेतला. पलंगाच्या एका बाजूला असलेल्या खिडकीतून थंडगार वारा आत येत होता. अगदी थंड! जणूकाही बाहेर बर्फ पडला होता आणि तोच गारवा आत येत होता. खोली खूपच थंड पडली होती. मैथिली आणि अवनिसुद्धा कुडकुडत होत्या. मंजूने अवनीला हलवलं. अवनी बहुतेक जागीशीच होती. तिने लगेच डोळे उघडले.

"खूप थंडी आहे न ग?" मंजू म्हणाली. "आपण झोपलो तेव्हा नव्हतं वाटत असं. कमाल आहे न! हे असं का होतं आहे काहीतरी? अवनी, मला न खरंच खूप भीती वाटते आहे ग." असं म्हणत तिने अवनीचा हात घट्ट धरला.

घड्याळाकडे बघत अवनी म्हणाली,"अग, जेमतेम अर्धा तास झालाय आपण झोपून. मुलांना हाक मारू या का?" तेवढ्यात खोलीचं दार जोरजोरात वाजायला लागलं. मैथिलीसुद्धा दचकून जागी झाली. तिघी घाबरून एकमेकींना घट्ट धरून बसल्या. मात्र पलंगावरून खाली उतरायची हिम्मत कोणालाही झाली नाही. दार अजूनच जोरात हलवलं जायला लागलं आणि त्याच्याबरोबर बाहेरून वर्धा, राजन आणि अभिच्या हाका एकू येऊ लागल्या.

"मैथिली.... मंजू.... अवनी... दार उघडा... उठा.... अरे उठा.... अवनी...." त्यांनी तिघींच्या नावाचा धोशाच लावला होता. 

तिघींनी एकमेकींकडे बघितलं; पण अजूनही काय करावं ते तिघींनाही सुचत नव्हतं. शेवटी हिम्मत करून अवनी दार उघडायला पुढे सरकली. मंजूने तिचा हात धरला... ती काहीतरी बोलणार होती. पण अवनीने तिच्या तोंडावर हात ठेवला,"मंजू, कृपा करून एक अक्षर बोलू नकोस!" असं म्हणून अवनीने दार उघडलं.


अभी, वर्धा आणि राजन धाडकन खोलीत आले आणि राजनने आत येताच दार लावून घेतलं. ते आत येताच मात्र खोलीच तापमान परत पुर्वीसारखं झालं.

"काय झाल तुम्हाला?" मैथिलीने विचारलं.

"यार, आपण या खोलीत येताना शेजारीच एक खोली होती ना? आम्ही त्याच खोलीत जाणार होतो. पण गेला अर्धा तास आम्ही खोलीचं दार शोधतो आहोत. शेजारी खोलीच नाही आहे; हे लक्षात येताच आम्ही या खोलीत यायचं ठरवलं. पण या खोलीच दार देखील आम्हाला मिळत नव्हतं. पण अचानक अवनीच्या आवाजाची कुजबुज एकू आली आणि दार दिसलं. आम्ही धावलो आणि परत दार हरवायच्या आत दारावर धडका दिल्या. नशीब तुमच्याच खोलीचं दार होतं आणि तुम्ही उघडलंत. नाहीतर आमचं काही खरं नव्हतं." अभी बोलत होता आणि त्याचं उर धपापत होतं. वर्धा आणि राजान तर खोलीत येताच मट्कन खाली बसले होते; ते तसेच होते.

मंजू वर्धाजवळ गेली आणि त्याचा हात हातात घेत म्हणाली,"काळजी नको करुस वर्धा. आपण सगळे याच खोलीत एकत्र थांबूया. मला देखील सगळंच विचित्र वाटतं आहे. अरे, ही खोली ना आत्ता खूप थंड पडली होती. खरं तर मला थंडीनेच जाग आली. बघितलं तर अवनी देखील कुडकुडत होती. म्हणून मी तिला उठवलं. ती बोलत होती तेच तुम्हाला बाहेर ऐकू आलं बहुतेक. नशीब आमचं की तुम्हाला तिचा आवाज ऐकू आला आणि तुम्ही आत आलात." त्यानंतर सगळ्यांकडे वळत मंजू म्हणाली;"हे सगळंच एकूण विचित्रच चाललं आहे; असं नाही का तुम्हाला सगळ्यांना वाटत?"

तिच्या प्रश्नाने सगळेच विचारात पडले आणि शांत बसून राहिले. कोणालाही काहीच सुचत नव्हतं; किंवा हा एकूण काय प्रकार आहे ते ही समजत नव्हतं. एक विचार मात्र सगळ्यांच्या मनात सारखाच होता.... आता या बंगल्यात रहायची इच्छा कोणालाच उरली नव्हती. पण असं सगळ्यांसमोर म्हणायची हिम्मत देखील नव्हती कोणाची. आपण घाबरलो म्हणून आपली चेष्टा होईल म्हणुन  सगळेचजण गप्प बसून होते.

"थांबा... त्या रामुकाकालाच बोलावून जाब विचारते."अचानक उठत मैथिली म्हणाली आणि तरातरा चालत जाऊन तिने खोलीचं दार उघडून रामुकाकांना हाक मारायला गेली. तिने दार उघडलं तर रामुकाका दारातच उभे होते.

"विचारा जी." ते म्हणाले.

"काय? काय विचारा? तुम्ही काय दाराला कान लावून उभे होतात का?" चिडून मैथिलीने त्यांना विचारले.

"नाही जी. तुम्ही बोलावते म्हणालात; आनी आलो जी." रामुकाकांनी अवनीकडे बघत शांतपणे उत्तर दिलं.

"मी इथे पलंगावर बसून जे बोलले ते तुम्हाला माजघरात ऐकू आलं असं म्हणणं आहे का तुमचं?" मैथिलीचा तोल आता सुटायला लागला त्यामुळे तिचा आवाज देखील टिपेला पोहोचला होता.

रामुकाकांवर मैथिलीच्या चिडण्याचा किंवा ओरडण्याचा काहीही परिणाम झाला नव्हता. त्यांनी शांतपणे उत्तर दिलं,"होय जी. म्हंजी तुम्ही म्हणाल तसंच होईल जी."

"काय बोलता आहात तुम्ही काका? तुम्हाला तरी कळतं आहे का? जा इथून. परत मला तुमचं तोंड दाखवू नका. समजलं?" मैथिली भडकून म्हणाली.

"ठीक जी. जस तुम्ही म्हणाल तसं जी."अस म्हणून रामुकाका माघारी वळले. मात्र वळताना त्यांनी परत एकदा अवनीकडे एक कटाक्ष टाकला. त्यांचं असं सतत तिच्याकडे बघणं अवनीला खटकत होतं. पण ती त्यावर काहीच बोलली नाही. रामुकाका निघून गेले आणि मैथिलीने खोलीचे दार लावून घेतले. मैथिली खरंच खूपच ओरडली होती. तिचा घसा कोरडा पडला होता. त्यामुळे ती पलंगाजवळच्या टेबलावर ठेवलेल्या तांब्यातून पाणी पिण्यासाठी गेली. पण तांब्या रिकामाच होता. ती अजून वैतागली. कोणताही विचार न करता तांब्या घेऊन परत दाराकडे येऊन तिने दार उघडले आणि मोठ्याने ओरडली,"रामू काका... पाणी आणा...." 

जिन्यावर पावलं वाजली. तांब्या भांड्याचा आवाज झाला म्हणून मैथिली पुढे झाली. दारातून रामुकाकांचा हात पुढे आला. हातात तांब्या आणि भांड होतं ते सगळ्यांनाच दिसलं... आणि मैथिली अचानक मोठ्याने किंचाळून खाली पडली.

क्रमशः

Friday, May 7, 2021

'स्टुडिओ अपार्टमेंट' शॉर्ट फिल्म रिलीज

'स्टुडियो अपार्टमेंट' शॉर्ट फिल्म रिलीज

आयुष्यात पहिल्यांदाच एक शॉर्ट का होईना पण फिल्म तयार केली... करताना देखील सगळं नवीन होतं. मार्ग काढत पुढे जात होते. सोबत माझे खूप जवळचे असे अर्चना आणि मंदार होते. फिल्म तयार तर झाली. अचानक आणि अनपेक्षितपणे आमच्या या पहिल्या प्रयत्नाला भारत सरकार फिल्म डिव्हिजन कडून बक्षीस देखील मिळालं. नंतर इंदापुरम फिल्म फेस्टिव्हलच सेमिफिनलिस्ट बक्षीस देखील मिळालं. पण मग पुढे काय? हा प्रश्न होताच. 


एक मार्ग मिळाला तो म्हणजे 'Pocket फाईल्स' या YouTube चॅनेलवर आमची फिल्म रिलीज होऊ शकेल हा दिलासा. मग प्रयत्न करत राहिले. आणि त्याच फळ आज मिळतं आहे. आज आमची फिल्म रिलीज झाली आहे. नक्की बघा.


https://youtu.be/8tIe8Esgwqo




 https://youtu.be/8tIe8Esgwqo