Friday, June 24, 2022

अनाहत सत्य (भाग 30) (समाप्त)

 अनाहत सत्य


30

"शेषा? जस्सी? काय झालं तुम्हाला?" गोविंद अस्वस्थपणे शेषा आणि जस्सी जवळ बसून त्या दोघांना उठवायचा प्रयत्न करत होता.

"काळजी करू नकोस. त्यांची शुद्ध हरपली आहे फक्त." नैना म्हणाली.

"पण का? तुला सतत काहीतरी दुष्ट अयोग्यच का करावंसं वाटतं नैना?" गोविंद चिडून म्हणाला.

"मूर्खासारखं बोलू नकोस गोविंद. मी काहीही केलेलं नाही. शांतपणे विचार केलास तर तुला लक्षात येईल की तुम्ही कोणीही सकाळच्या ब्रेकफास्ट नंतर काहीही खाल्लेलं नाही. आता दुपारचे चार वाजून गेले आहेत. आयुष्याचं सत्य समजून घेताना शरीराची गरज विसरून चालत नाही महाराज गोविंदराज." नैना अत्यंत उपरोधक आवाजात म्हणाली. ती जे म्हणाली ते टोचलं असलं तरी ते सत्य गोविंदने मान्य केलं.

"संस्कृती, मी मदत मिळवण्याचा प्रयत्न करतो. तू इथेच थांब." संस्कृतीकडे वळून गोविंद म्हणाला. संस्कृतीने नजरेनेच होकार दिला. महिकडे वळून गोविंदने विचारलं; "मही, आपल्या मागल्या अनेक आयुष्यांमध्ये काय काय घडलं हे याक्षणी तरी महत्वाचं नाही. एकामागोमाग एक घडणाऱ्या या घटनांमुळे आम्ही सगळेच सैरभैर झालो आहोत. त्यात नैना म्हणते त्याप्रमाणे आम्ही काहीही खाल्लेलं नाही हे देखील खरं आहे. इथे जवळपास पाणी देखील दिसत नाहीय. तू मला मदत करशील का? जस्सी आणि शेषाला एका बाजूला बसतं करूया आणि मग मी त्यांच्यासाठी जाऊन पाणी घेऊन येतो अगोदर. एकदा ते जागे झाले की मग पुढचं पाहू."

महिने होकारार्थी मान हलवली आणि जस्सी, शेषाला बसतं करण्यासाठी गोविंदला मदत केली. गोविंद संस्कृती जवळ आला आणि म्हणाला; "इथेच थांबशील न? मी आलोच."

"अजिबात चिंता करू नकोस गोविंद. मी आहे इथे." अगदी शांत आवाजात संस्कृती म्हणाली. तिच्या खांद्यावर थोपटल्यासारखं करून गोविंद तिथून निघाला.

"थांबा. मी देखील येतो. इथे बाहेर बरेच स्टॉल्स आहेत. तिथे तुम्हाला थोडं खायला मिळेल आणि पाणी देखील." मही म्हणाला आणि एकदा नैनाकडे बघून गोविंद सोबत निघाला.

हे सगळं घडत असताना नैना मात्र एका बाजूला हाताची घडी घालून शांत उभी होती. गोविंद आणि मही तिथून निघाले आणि संस्कृती नैनासमोर येऊन उभी राहिली.

"आपल्याला निघायला हवं अपाला." नैना अत्यंत शांत आवाजात म्हणाली.

"तुला माहीत आहे नैना मी तुझ्या सोबत कुठेही येणार नाही आहे. मला माहीत आहे; आमची जी काही चर्चा इथे झाली ती सगळी तू ऐकली आहेस. भीमाने एका अर्थी माझ्यावर केलेले आरोप देखील तुला माहीत आहेत; आणि ते काही अंशी सत्य आहेत हे देखील मी मान्य करते. त्यामागील कारण हे संपूर्णपणे माझं होतं. केवळ गोविंदच नाही तर अपाला देखील भावनिक झाली होती; हे सत्यच तर आहे. हो! मला माझ्या गोठवलेल्या जीवनापेक्षा माझं आणि गोविंदचं एकत्र येणं जास्त महत्वाचं वाटतं होतं. कुंजरला मोठं होताना मला बघायचं होतं. हळूहळू होणारी वृद्धत्वाकडची वाटचाल मला हवी होती. तीक्ष्णा हे वाटणं योग्य की अयोग्य हे मला माहीत नाही. कारण मला आजही हे सगळं हवं आहे; आणि त्यासाठी मी आज देखील तुझ्या विरोधात जायला तयार आहे." संस्कृती म्हणाली.

"अपाला; त्यावेळी कदाचित मी कमी पडले तुला काहीही समजावायला. कारण कदाचित गोविंद म्हणतो त्याप्रमाणे माझा इगो मोठा होता. पण तू जाणतेस. आता मात्र असं काही नाही आहे. मी तुला शोधण्यासाठी अनेक जन्म घेतले आहेत. या अनेक मानवीय जन्मांमध्ये माझा 'स्व' विरघळून गेला आहे. केवळ तुला परत नेण्यासाठी मी इथे आले आहे. त्यात देखील माझा स्वार्थ नाही आहे ग. अपाला; कदाचित तू विसरली आहेस; म्हणून परत एकदा तुला आठवण करून देते.... आपण मानवीय उत्क्रांतीमधल्या एका खास टप्यातले मानव आहोत. आपण म्हणजे एका मानवीय उत्क्रांती टप्प्यातील संपूर्ण समूहातील 'काही' खास आहोत ग. आपण ठरवून केवळ बौध्दिकतेला महत्व देऊन भावनिकता दूर सारत या निसर्गसुंदर वसुंधरेला जपण्यासाठी आपलं आयुष्य देण्याचा निर्णय घेणारे आहोत. उत्क्रांतीच्या उच्चतम बिंदूला पोहोचल्यानंतर स्वतःचा ह्रास होऊ न देता त्या उच्चतम बिंदूवर स्वतःला गोठवून टाकणारे 'काही' आहोत. आपण उत्क्रांतीची सुरवात आहोत; परमोच्च बिंदूवरील अत्यंत प्रगत मानव आहोत. हे आठव की आपण अनेक संस्कृती बघितल्या आहेत आणि बघणार देखील आहोत.

अपाला, तुला देखील माहीत आहे की आपल्यासाठी उत्क्रांती हा केवळ एक शब्द नाही... ती एक स्थिती आहे. त्या स्थितीला पोहोचण्यासाठी अनेक सहस्त्र आयुष्यांचा काळ जावा लागतो; तो काळ, ते दुःख, त्यावेळी आपल्यातून हरवलेले अनेक आपले जवळचे तू कशी विसरू शकतेस? आपल्यामध्ये हळूहळू बदल होत होते. नैसर्गिक पध्दतीने आपल्यात अशी काही गुणसूत्र निर्माण झाली की ज्यामुळे आपण भावनांपासून दूर गेलो. पण म्हणूनच आपण कोणत्याही विषयांच्या गर्भापर्यंत पोहोचू शकलो. त्यातूनच ग्रह-तारे, हे विश्व, ही वसुंधरा आणि तिच्या पोटातील अनेक गुपितं याविषयीचं ज्ञान आपल्याला उमगलं. त्यासोबतच निर्मिती आणि जपवणुक यांचं महत्व समजलं. ज्यांच्या गुणसूत्रांमध्ये असे बदल नाही झाले ते सर्वचजण सर्वसामान्य मानव राहिले. जशी तू वेगळी झालीस.... अपाला.... तसा गोविंद सर्वसामान्य मानवाचा प्रतिनिधी होतो.

अपाला, प्लीज आठव, आपल्या मानवीय प्रजातीमधल्या काही प्रमुखांनी निर्णय घेऊन आपले गट बनवले आणि पृथ्वीवरच्या विविध प्रदेशात आपण विखरून राहू लागलो. आताचे ग्रीस, इजिप्त हे असे काही देश की जिथे आपण आपलं वेगळेपण सर्वसामान्यांपर्यंत पोहोचू दिलं. अर्थात त्याचं कारण आपल्यासाठी स्पष्ट होतं. जे समूह विविध ठिकाणी होते; त्या आपण सर्वांनी ग्रहांच्या आणि ताऱ्यांच्या मदतीने एकमेकांशी संपर्क ठेवण्याचा निर्णय घेतला होता. अपाला; आपल्या गोठवण्याच्या काळातली एक तरी घटना तुला आठवते आहे का ग? त्यावेळी आपण आपल्या वसुंधरे बाहेरील जीवांशी देखील जोडले गेले होतो. म्हणूनच तर त्यावेळी अनेक मोठ्या निर्मिती आपल्याला सहज शक्य होत होत्या. अर्थात या निर्मिती आपण करत होतो. काहीशी त्यांची मदत घेऊन. अपाला, यासर्वाची जवाबदारी माझ्यावर होती; आणि तू..... तू यासर्वांमध्ये मला बिनशर्त स्वतःहून साथ देत होतीस. तुझं माझ्या सोबत असणं ही माझी गरज होती. अर्थात एका उदात्त हेतूसाठी. म्हणून तर तुझं राजकुमार गोविंदराज सोबत जाणं मला मान्य नव्हतं. अपाला...... संस्कृती...... तुला यातलं काहीच आठवत नाही का ग?

खरं सांगू? मी गेले अनेक जन्म स्वतःला दूषणं देत जगले आहे. या गुंफा.... ही लेणी... हे श्रीशिव मंदिर बांधणे हा माझा आग्रह होता. त्यावेळी आपण भारताच्या उत्तरेकडे होतो. म्हणून तर भीमाला श्लोक लिहिण्यासाठी तिथली गुंफा योग्य वाटली. पण त्याबाजूला अनेक नैसर्गिक बदल होत होते. त्यामुळे आपला इतरांशी होणारा संपर्क सतत तुटायला लागला होता. त्याचवेळी आपण इथे भूगर्भात नगर वसवलं होतं. पण ते वापरात नसल्याने तिथल्या वायुवीजनाची स्थिती चांगली नव्हती. माझा विश्वास होता की वायुविजन तू योग्य करशील. म्हणूनच मी इथेच येण्याचा आग्रह केला. सगळं कसं नीट चालू होतं. त्याचवेळी भूतप्रमुखांनी मला एक विचार बोलून दाखवला की जर सर्वसामान्य मानवातील योग्य व्यक्तीला आपण योग्य मार्गाने संगोपन केलं.... वाढवलं.... तर कदाचित भविष्यात आपल्याला सतत भूपृष्ठावर येण्याची गरज उरणार नाही. कदाचित आपल्या असण्याची देखील गरज उरणार नाही. मला देखील तो विचार पटला होता आणि म्हणूनच मी महाराज कृष्णराज यांच्याकडे राजकुमार गोविंदराजने आपल्या सोबत राहून काही धडे घ्यावेत हे सुचवलं. दुर्दैवाने राजकुमार गोविंदराज अति भावनिक निघाला. मी माझ्या मनात ठरवलेल्या प्रमाणे काही झालं नाही.... पण त्याहून देखील जास्त मोठं दुःख मला हे आहे की तू तुझ्या कर्तव्यापासून दूर गेलीस. तू माझा विरोध नव्हतीस करत अपाला, तू एका विस्तृत संस्कृतीचा.... तुझ्या खऱ्या अस्तित्वाचा विरोध करत होतीस....."

नैना अजूनही बोलली असती. पण संस्कृतीने तिला थांबवलं आणि म्हणाली; "नैना... तू विसरते आहेस की मी अपाला नाही; संस्कृती आहे. हे सातवं शतक नाही.... हे दोन हजार एक आहे. खूप काही बदललं आहे नैना. पण माझे त्या काळातले विचार मात्र बदललेले नाहीत. मी तेव्हा देखील गोविंदवर खूप प्रेम करत होते आणि आज देखील माझं त्याच्यावर इतकं प्रेम आहे की मी त्याला सोडून तुझ्या सोबत येणार नाही. त्यामुळे तू मला काहीही समजावण्याचा त्रास करून घेऊन नकोस."

संस्कृतीच्या बोलण्याचा नैनावर खूप मोठा परिणाम झाला. काही क्षणांसाठी तिचा चेहेरा दुःखी झाला. पण मग तिने स्वतःला सावरलं आणि संस्कृतीकडे बघत ती म्हणाली; "हाच जर तुझा निर्णय असेल संस्कृती तर काहीच हरकत नाही. तुला परत परत जन्म घ्यावा लागेल आणि मला देखील. माझी तयारी आहे..... तुला चॉईस नाही. मागील वेळी जे झालं तेच होणार असं दिसतं."

नैनाचा आवाज कमालीचा थंड होता. तिच्या त्या बोलण्याचा परिणाम संस्कृतीवर लगेच झाला. "काय म्हणायचं आहे तुला नैना?" संस्कृतीने नैनाला विचारलं.

"काहीच नाही संस्कृती. येते मी. आपण भेटूच.... भेटत राहूच." असं म्हणून नैना वळली आणि निघून गेली. तिला पाठमोरी जाताना संस्कृती बघत होती.... आणि नैनाच्या मनात नक्की काय चालू असेल याचा विचार करत होती.

नैना जात असतानाच संस्कृतीला गोविंद समोरून येताना दिसला. तिची नजर एका क्षणासाठी नैनावरून हलली. पण संस्कृतीने परत नैना ज्या दिशेने जात होती तिथे नजर वळवली तर नैना तिला कुठेही दिसली नाही. अर्थात आता तिला त्याचं कारण शोधायची इच्छा नव्हती. गोविंद पाणी घेऊन आला होता. संस्कृती आणि गोविंदने मिळून जस्सी आणि शेषाला शुद्धीत आणलं आणि दोघांना आधार देत लेण्यांच्या बाहेर आणलं. त्यांनी जी गाडी नक्की केली होती त्याचा ड्रायव्हर तिथे तयारच होता. चौघेही गाडीत बसले आणि त्यांनी गाडी हॉटेलच्या दिशेने न्यायला सांगितलं.

***

"आपण इथे राहण्याचं काहीच कारण नाही आता." हॉटेलमध्ये पोहोचल्यावर सरळ जेवायलाच गेले होते चौघेही. थोडं खाल्ल्यावर जस्सीच्या अंगात बळ आलं आणि त्याने स्वतःचं मत सांगितलं.

"खरंय. निघुया इथून. आपल्या त्या काळातल्या असण्याचं कारण आता आपल्याला कळलं आहे. त्या श्लोकाचा अर्थ देखील कळला आहे. पुढे काय हे अजून आपल्याला माहीत नाही. पण काय असेल ते ठरवायला आपण इथेच राहिलं पाहिजे असं नाही." शेषा म्हणाला.

"खरंय." गोविंद म्हणाला आणि त्याने अपेक्षेने संस्कृतीकडे बघितलं.

संस्कृती स्वतःच्याच विचारात होती. ती काहीच बोलत नाही पाहून गोविंदने तिला हलवलं. "संस्कृती कसला विचार करते आहेस?"

संस्कृतीने एकदा तिघांकडे बघितलं आणि म्हणाली; "खरं सांगू? माझ्या मनात अजूनही काही प्रश्न आहेतच. जस्सीला आणि शेषाला त्यांच्या पुनर्जन्माचं कारण समजलं आहे. आता त्यांना परत जन्म घेण्याची गरज उरली नाहीय. याचा अर्थ आता ते हा जन्म पूर्णपणे उपभोगून कदाचित अनंतात विलीन होतील. पण माझं गोविंदचं काय?"

"तुझं माझं काय संस्कृती? तू जे उत्तर नैनाला दिलंस न तेच आपलं सत्य नाही का? आपण सातव्या शतकात एकत्र येऊ शकलो नाही कारण तीक्ष्णाच्या हातात अनेक गोष्टी होत्या. अनेक शक्ती होत्या. तो काळच वेगळा होता. पण आता सगळंच बदलून गेलं आहे न? आपल्याला त्याकाळातलं आपलं सत्य कळलंय आणि या काळातल्या नैनाच्या हातात असं काहीच नाही की ती आपलं काही नुकसान करू शकेल. आताचे कायदे वेगळे आहेत संस्कृती. कोणी उठलं आणि मनात आलं म्हणून दुसऱ्याला संपवलं असं होणं शक्य नाही. त्यामुळे आपण देखील आपलं या जन्मातलं आयुष्य जस्सी आणि शेषा सोबत पूर्णपणे जगणार आहोत.... उपभोगणर आहोत. याहून जास्त काही विचार नको करुस संस्कृती." गोविंद म्हणाला आणि त्याने संस्कृतीचा हात प्रेमाने हातात घेतला.

"पण...." संस्कृती काहीतरी बोलणार होती. पण तिला थांबवत गोविंद म्हणाला; "खरंच आता काही फाटे नको फोडूस संस्कृती. जस्सी म्हणतो आहे तेच बरोबर वाटतं आहे मला. आपल्यासाठी इथे काहीही उरलेलं नाही. त्यामुळे चला... आपण निघुया इथून उद्याच."

"अरे पण आपल्या परतीच्या तिकिटांची सोय कुठे केली आहे आपण अजून?" शेषाने प्रश्न केला.

"अरे त्यात काय.... आठ दहा तासांचा तर प्रवास आहे. विमान नाही तर आपण गाडी घेऊ भाड्याने आणि निघू. पण उद्याच निघायचं हे नक्की." हसत गोविंद म्हणाला आणि चौघांनीही ते मान्य केलं.

***

दोन दिवसांनंतर नैना लायब्ररीमध्ये पोहोचली. समोरच्या रॅकवर ताजी वर्तमानपत्र ठेवली होती. त्यातलं एक तिने उचललं आणि आत लायब्ररीमध्ये जाऊन बसली. वर्तमानपत्राच्या दुसऱ्याच पानावर एक बातमी होती. औरंगाबाद ते मुंबई या महामार्गाचे काम सुरू असताना एका मोठ्या गाडीचा अपघात आदल्या दिवशी झाला होता आणि त्यात तीन तरुण आणि एका तरुणीचा मृत्यू झाला होता. ती बातमी वाचून नैनाने वर्तमानपत्र तिथेच ठेवलं आणि ती लायब्ररी बाहेर पडली.

नैना तिची डॉक्टरेट पूर्ण करायला कधीच आली नाही.... त्यासंदर्भात तिने महाविद्यालयाला काहीच कळवलं देखील नाही.

***

निर्मितीचा जन्म झाला आणि तिच्या आई वाडीलांसमोबत वहिनी देखील खूप खुश झाल्या होत्या. तिची वेगळी आवड जरी तिच्या विहिनींना आणि आईच्या जीवाला घोर लावत होती तरी तिच्या वडिलांनी तिला कायमच पाठबळ दिलं होतं.

म्हणूनच आज ती प्रोफेसर राणेंसोबत मिठठू समोर बसली होती.

"संस्कृती, गोविंद, जस्सी आणि शेषाचा मृत्यू अपघातात झाला न?" निर्मितीने मिठठूकडे बघून प्रश्न केला.

"हो! तुला शंका आहे का दिदी?" मिठठू थेट निर्मितीकडे बघत म्हणाला.

"अजिबात नाही. माझ्या मनात दुसराच प्रश्न आहे मिठठू." निर्मिती अत्यंत शांत आवाजात म्हणाली.

"तू विचार दिदी. मला जमलं तर नक्की उत्तर देईन." मिठठू देखील तितक्याच शांतपणे म्हणाला.

"आपण तिघेही नक्की कोण कोण आहोत मिठठू?" निर्मितीने प्रश्न केला आणि प्रोफेसर राणे एकदम उभे राहिले.

"सर..... नैना.... भागीनेय तीक्ष्णा इतकं अस्वस्थ होण्यासारखं काहीच नाहीय." मिठठू अजूनही अत्यंत शांत आवाजात बोलत होता. त्याच्या आवाजातला शांतपणा जाणवून प्रोफेसर राणे खाली बसले.

"सर, निर्णय केवळ अपाला, संस्कृती..... निर्मिती घेणार आहे. खूप काही बदललं आहे या गेल्या एकवीस वर्षांत. आज भारत एका अशा वळणावर उभा आहे की यापुढे त्याला कोणाच्याही कुबड्यांची गरज नाहीय. त्यावेळी राजकुमार गोविंदराजचा विचार ज्याकरणासाठी केला गेला होता.... त्याच विचारांची पूर्तता आपल्या भूतप्रमुखांनी वेगळ्या मार्गाने केली आहे. आज भारत .... आणि केवळ भारतच नाही; तर संपूर्ण पृथ्वी योग्य मार्गाने पुढे जाते आहे. त्यामुळे आपण तिघांनी परतीचा मार्ग स्वीकारायला काहीच हरकत नाहीय. अर्थात, तुम्ही आणि मी तयार आहोत. निर्मितीला जर अजूनही वेगळा विचार करायचा असेल तर ती तिची इच्छा असू शकते." मिठठू बोलायचा थांबला आणि त्याने निर्मितीकडे बघितलं.

"भीमा.... मला वाटलं होतं तू कायम माझी साथ देशील." निर्मिती मिठठूकडे बघत म्हणाली.

"त्याने कायमच तुझी साथ दिली आहे अपाला. प्रत्येकवेळी तुझ्या सोबत राहिला आहे तो. यावेळी फक्त मी एक बदल केला आहे." ताठ उभं राहात तीक्ष्णा म्हणाली. "गोविंदला तुझ्या आयुष्यात मी येऊ दिलेलं नाही अपाला. या जन्मात मी तुझ्या लहान वयापासूनच तुझ्यावर लक्ष ठेवण्यात यशस्वी झालो. मला योग्य वाटत होतं त्याप्रमाणे मी तुला मार्ग दाखवत गेलो आणि तुला देखील आपल्यातला खरा कनेक्ट कायम जाणवत असावा. कारण तू देखील कुठेही लक्ष न देता मी सांगितल्या प्रमाणे वाचन ठेवलं होतंस. अपाला.... निर्मिती.... आज मी तुला तोच प्रश्न परत विचारतो आहे.... या मंदिराच्या दारातून आपण आज प्रवेश करू तो परत न येण्यासाठी. तुला हे मान्य आहे का? आपल्या भूतप्रमुखांनी जरी अनेक गोष्टी मार्गी लावल्या असल्या तरी; तुझ्या अपाला असण्याला जे कारण होतं ते आज देखील तितकंच खरं आहे. तुला तुझी जवाबदारी मान्य आहे का? तरच पाऊल उचल निर्मिती."

निर्मिती मंद हसली आणि प्रोफेसर राण्यांच्या समोर जाऊन उभी राहिली. "सर, जर मी आजही नकार दिला तर परत अजून पंचवीस वर्षांनी आपण असेच एकमेकांच्या पुढे उभे असू हे सत्य आहे. तुम्ही मला परत घेऊन जाण्याची प्रतिज्ञा केली आहे; हे आता माझ्या लक्षात येतं आहे. पण तरीही मी कदाचित नकार दिला असता. पण सर, तुमच्याच प्रयत्नांमुळे आज माझ्या आयुष्यात गोविंद नाही. माझी कुठेही भावनिक गुंतवणूक नाही. त्यामुळे मी तुमच्या सोबत आणि भीमासोबत परत एकदा अपालाचं आयुष्य स्वीकारायला तयार आहे."

निर्मितीचं बोलणं संपलं आणि प्रोफेसर राणेंनी मंद हसत तिच्याकडे बघितलं.

तीक्ष्णा, अपाला आणि भीमा ज्यावेळी त्या मंदिराच्या प्रवेश द्वारातून आत जात होते त्यावेळी आजूबाजूचा निसर्ग पराकोटीचा स्थब्द झाला होता. जणूकाही एक मोठं पर्व कायमचं संपलं होतं; याचीच ती खूण तर नव्हती न?

समाप्त






Friday, June 17, 2022

अनाहत सत्य (भाग 29)

 अनाहत सत्य


भाग 29


मही, शेषा आणि जस्सी समोरच बसले होते. पण आता सर्वांची नजर बदलली होती. प्रत्येकाला एकमेकांची ओळख पटली होती.... त्या जन्मातली.

"जस्सी... तुझं अपालावर प्रेम होतं; पण म्हणजे नक्की काय? तू तर गोविंद आणि अपालाने एक व्हावं यासाठी सतत प्रयत्न करत होतास." शेषाने जस्सीकडे बघून प्रश्न केला.

काहीसं मंद हसत जस्सी म्हणाला; "तुला नाही कळणार शेषा..... कारण त्यावेळी नाथाच्या मनात असलेला संशय आता परत तुझ्या मनात निर्माण झाला आहे. भिमाच्या मनातल्या अपाला बद्दलच्या भावना समजून घेण्यासाठी मनात कोणताही किंतु असून चालणार नाही."

महीची नजर आता अजूनच कठोर झाली होती. "तीक्ष्णाच्या वागण्याचा अर्थ तरी सांगशील का भीमा?"

जस्सीच्या चेहेऱ्यावर अजूनही तेच मंद हसू होतं. "तिनेच तर सांगितला होता अर्थ."

मही त्या उत्तराने काहीसा चिडला आणि म्हणाला; "भीमा, उत्तर टाळू नकोस. कारण तुला माझा प्रश्न कळला आहे. तीक्ष्णाने अपालाला विरोध का केला हा माझा प्रश्नच नाही. गेले अनेक जन्म मी या लेण्यांमध्ये अडकून पडलो आहे; ते केवळ एका प्रश्नाचं उत्तर मला मिळालं नाही म्हणून."

आता भीमाचा चेहेरा थोडा गंभीर झाला. "मी नक्की उत्तर देईन तुमच्या प्रश्नाचं. तुमचा हक्कच आहे सत्य समजून घेण्याचा. पण त्यागोदर तुम्ही आम्हाला पूर्ण सत्य सांगा."

भिमाची ही मागणी पूर्ण होत असतानाच संस्कृती आणि गोविंद देखील गुंफेमधून बाहेर आले. दोघांचेही चेहेरे हसरे प्रसन्न होते. त्यांचे हात एकमेकांमध्ये गुंतले होते. त्यांच्यातलं प्रेम जस्सी आणि शेषाला माहीत होतं; पण ते असं दोघांनी सहज उघडपणे पहिल्यांदाच स्वीकारलं होतं. त्यादोघांकडे बघून जस्सीने हाय केलं. शेषा मात्र उठून त्यांच्या दिशेने गेला. शेषाला पाहाताच संस्कृतीचा चेहेरा बदलला.

"नाथा...... माझा कुंजर?" डोळ्यातलं पाणी मोकळेपणी वाहू देत संस्कृतीने प्रश्न केला.

"मला माहीत असतं तर लगेच सांगितलं असतं ग मी." तितक्याच भावूक आवाजात शेषा म्हणाला.

"मी सांगतो." मही म्हणाला आणि सगळ्यांनी वळून त्याच्याकडे बघितलं. "महाराज कृष्णराज यांच्या दृष्टांता प्रमाणे श्रीशंभो कैलास मंदिर निर्मिती नंतर जो हसतांतरण सोहळा झाला त्याला गालबोट लागलंच. अर्थात यामध्ये महाराज कृष्णराज यांनी त्यांच्या स्वतःच्या सुमंतावर आणि अत्यंत जवळच्या मित्रावर केलेला अविश्वास हे मोठं कारण होतं."

"नाही सुमंत कल्याण." गोविंद म्हणाला. "तुमच्या मनातली अढी ना महाराज कृष्णराज यांना दूर करता आली ना मला."

काहीशा क्रुद्ध नजरेने गोविंदकडे बघत मही म्हणाला; "अपालाच्या मृत्यूनंतर आपण कधी शुद्धीत होतात का राजकुमार?"

महीच्या त्या बोलण्याने गोविंद एकदम चिडला. "तोंड सांभाळून बोला सुमंत. अपालाच्या अकाली मृत्यूमुळे मी पूर्ण मोडून गेलो होतो; हे जितकं सत्य आहे तितकंच खरं हे देखील आहे की मला वेड लागलं नव्हतं. तुम्ही चांगलंच जाणता ते. सुमंत कल्याण, महाराज कृष्णराज माझा राज्यभिषेक करून जनकल्याणाच्या विचाराने राज्य व्याप्ती करण्यासाठी निघाल्यानंतर तुम्ही माझ्या धाकट्या भावासोबत.... ध्रुव धरावर्ष सोबत संगनमत केलंत आणि मला भ्रमिष्ट ठरवलं. मला राजसिंव्हासनावर बसवून तुम्ही आणि ध्रुव धरावर्ष दोघांनी मिळून राज्यकारभार चालवायला सुरवात केलीत. त्यावेळी मी जगत होतो ते केवळ राजकुमार कुंजरराजकडे बघून."

"ओह... माझा कुंजर.... राजकुमार कुंजरराज...." संस्कृतीच्या डोळ्यातलं पाणी थांबत नव्हतं. पण आता चेहऱ्यावरचे भाव बदलले होते. त्यावर आनंद पसरला होता. माता ही एकदा बाळाला जन्म दिला की कायमच ममत्वाची मूर्ती होते; याचं उदाहरण सर्वांना दिसत होतं.

"हो संस्कृती. आपला कुंजर.... राजकुमार कुंजरराज. तुझा पुत्र. तुझ्या हाडामासा पासून बनलेला एक तेजस्वी राजकुमार. वयाच्या केवळ बाराव्या वर्षी त्याने त्याच्या काका सोबत ध्रुव धरावर्ष सोबत राज्यकारभारात लक्ष घालायला सुरवात केली. तो माझ्यासारखा भावनिक नव्हता. अत्यंत हुशार, निधड्या छातीचा तरुण होता; आणि दुर्दैवाने त्याचे हेच गुण त्याच्या आड आले ग."

"म्हणजे?" संस्कृती, जस्सी आणि शेषाने एकाचवेळी प्रश्न केला.

त्या तिघांकडे एकदा बघून गोविंदने महीच्या दिशेने बघितलं आणि म्हणाला; "सुमंत कल्याण, जे घडलं त्यानंतर मोठा काळ लोटला आहे. तुमचा दोष असला तरी देखील आता तुमच्या विरोधात काहीही होणं शक्य नाही. त्यामुळे तुम्ही काय ते सत्य सांगितलंत तर बरं होईल."

"महाराज गोविंदराज. मी आपला क्रोध समजू शकतो. मी हे देखील मान्य करतो की आपले धाकटे बंधू ध्रुव धरावर्ष यांच्या सोबतीने मी काही निर्णय घेतले देखील. ते अयोग्य होते हे खूप नंतर मला कळलं. पण माझा उद्देश अत्यंत स्पष्ट होता. त्यामुळे मला त्यावेळी देखील माझी चूक आहे असं कधी वाटलं नाही.... ना आता मी ते मान्य करेन." मही बोलायला लागला. "महाराज गोविंदराज, आपण कायमच भावनिक राहिलात. आपण राज्यकारभाराचा स्वीकार देखील राजकुमार कुंजरराज यांच्याकडे बघून केला होतात. हे त्यावेळी प्रत्येक व्यक्तीला माहीत होतं. अर्थात ते योग्यच होतं. राजकुमार कुंजरराज हेच तुमचे योग्य उत्तराधिकारी होते. ते पूर्ण मोठे होऊन राज्यकारभारात निपुण होत नाहीत तोपर्यंतच मी आपले बंधू ध्रुव धरावर्ष यांच्या सोबत राजकारभार चालविन असं त्यांना सांगितलं होतं. सुरवातीला आपल्या बंधूंना देखील ते मान्य होतं. परंतु राजकुमार कुंजरराज यांची सर्वच विद्यांमधली अश्वगती पाहून आपल्या बंधूंच्या मनात काळ नितीने प्रवेश केला. राजकुमार कुंजरराज यांना सोबत घेऊन ते शिकारीला गेले; याची तुम्हाला जशी कल्पना नव्हती तशी मला देखील नव्हती महाराज. ज्याप्रमाणे राजकुमार अभिमन्यु यांना चक्रव्यूहात अडकवून त्यांचा घात केला गेला; त्याचप्रमाणे राजकुमार कुंजरराज नाहीसे झाले."

"माझा कुंजर....." संस्कृतीचे डोळे परत एकदा वाहू लागले. जस्सी आणि शेषा देखील स्वतःचा बांध थांबवू शकले नाहीत.

"हो! माझा कुंजर कधीच परत आला नाही. त्या दुःखात मी अंथरुणाला खिळलो." गोविंदचा आवाज देखील अत्यंत दुःखी होता.

"नाही महाराज." महीचा आवाज अत्यंत खोलातून आल्यासारखा होता. "तुम्हाला विषप्रयोग झाला होता."

"काय?" गोविंद, संस्कृती, जस्सी आणि शेषा एकाचवेळी ओरडले.

"हेच सत्य आहे." मही म्हणाला. "महाराज, जनतेला तुमच्या भावनिकतेची कल्पना होती. त्यामुळे तुमचं दुःखच तुम्हाला आजारी पाडतं आहे; याविषयी सर्वांची खात्री होती. अगदी माझी देखील. राजकुमार कुंजरराज यांचा घात आपल्या बंधूनी केला; याविषयी माझ्या मनात संशय असला तरी तसा कोणताही पुरावा मला मिळत नव्हता."

"कारण तुम्ही तोपर्यंत पराकोटीचे संशयी झाला होतात." अचानक शेषा म्हणाला.

महीने अत्यंत रागाने शेषाकडे बघितलं. "मही.... तू इथे या काळामध्ये सुमंत कल्याण नाहीस आणि मी नाथ नाही. त्यामुळे मी तुला घाबरत नाही. जे सत्य आहे ते संगण्यापासून आता मला कोणी थांबवू देखील शकत नाही. गोविंद, संस्कृती, जस्सी.... मी सांगतो पुढील सत्य. महाराज गोविंदराज अंथरुणाला खिळले होते. दिवसेंदिवस त्यांची तब्बेत खालावत होती. त्यांना कोणत्याही औषधाने उतारा मिळत नव्हता. महाराज गोविंदराज भावनिक होते; आणि हेच त्यांचं बल स्थान होतं. अपाला आणि त्यानंतर राजकुमार कुंजरराज असे त्यांच्या हृदयाचे दोन्ही भाग अनंतात विलीन झाल्यानंतर त्यांनी मनापासून ठरवलं होतं की आता केवळ प्रजेसाठी जगायचं. मात्र त्यांच्या बंधूंच्या मनात निर्माण झालेली राजगाडीची इच्छा त्यांना माहीत नव्हती. त्यामुळे जे औषध समोर येत होतं ते महाराज घेत होते."

"तू....." मही काहीतरी बोलणार होता.

"अहं! माझी पत्नी." काहीसं कुत्सित हसत शेषा म्हणाला.

"म्हणजे तू?" महीच्या डोळ्यात आश्चर्य होतं.

"हो! मी मुख्य नगरापासून लांब एका गावात एक उपरं आणि अज्ञात आयुष्य जगत होतो. अर्थात तरीही मी खुश होतो. कारण माझा मित्र राज्याचा कारभार बघत होता आणि माझा कुंजर अत्यंत योग्य प्रकारे मोठा होत होता. पण मग कुंजर गेला आणि गोविंद देखील.... मी माझ्या पत्नीला आग्रह पूर्वक महाराज गोविंदराज यांच्या अंत:पुरात कामाला रुजू करवल. तिच्याकडून मला सत्य कळत होतं. पण त्याकाळातल्या नाथाच्या हातात काहीच नव्हतं. त्याचा मित्र तिळ तिळ मरतो आहे; हे कळत असूनही तो काही करू शकत नव्हता. आणि सुमंत कल्याण एका वेगळ्याच विश्वात होते. महाराज गोविंदराज यांच्याशी प्रामाणिक न राहिल्याचं दुःख आणि राजकुमार कुंजरराज सारखा अत्यंत योग्य उत्तराधिकारी अचानक नाहीसा झाल्याचं दुःख यामुळे सुमंत कल्याण मोडून गेले. नाथा सारख्या अनेक प्रामाणिक आणि निष्ठावान लोकांना सुमंत कल्याण यांनी केवळ राजकारणाचा भाग म्हणून दूर केलं होतं. त्यामुळे आता त्यांच्यावर कोणी विश्वास ठेवत नव्हतं. अर्थात ते देखील कोणावरही विश्वास ठेवू शकत नव्हते. महाराजांचे बंधू ध्रुव धरावर्ष यांच्या तर ते पथ्यावरच पडलं. महाराज गोविंदराज यांना देवाज्ञा झाली; त्यानंतर काही दिवसातच सुमंत कल्याण यांना वानप्रस्थाश्रमासाठी पाठवलं गेलं. सुमंतांनी देखील ते स्वीकारलं. कारण........ मनातलं गिल्ट." शेषा म्हणाला.

"गिल्ट?" जस्सी.

"अपराधी भावना रे जस्सी." शेषा म्हणाला.

"ओह! मी इतका अडकलो आहे तुझ्या कथनामध्ये... शब्दाचा अर्थच कळला नाही मला. पण बरं झालं तू तो शब्द वापरलास. परत आलो या काळात मी." जस्सी म्हणाला आणि शेषाने त्याच्या खांद्यावर हात ठेवला.

"सगळं खरं आहे हे. मी मान्यच करतो आहे न; माझे निर्णय चुकले होते. पण तरीही मी या जन्ममृत्युच्या फेऱ्यात अडकलो आहे... हे सत्यच आहे न." मही म्हणाला.

"कारण तुला तीक्ष्णाच्या वागण्याचा अर्थ समजून घ्यायचा आहे मही. तुझा झालेला अपमान तू इतके जन्म मनात धरला आहेस." जस्सी म्हणाला.

"तुला जर माझ्या जन्म मृत्यूच्या फेऱ्यांचं कारण माहीत आहे; तर माझ्या प्रश्नाचं उत्तर देखील माहीतच असेल न?" मही जस्सीकडे बघत म्हणाला.

"हो!" जस्सीने एकदा संस्कृती आणि गोविंदकडे बघितलं आणि बोलायला सुरवात केली. "तीक्ष्णा असं का वागली. तिने महाराज कृष्णराज यांच्या सोबत एक वेगळीच गुप्तता सांभाळली. कारण तिने महाराजांना ही लेणी का निर्माण केली जात आहेत त्याचं सत्य सांगितलं होतं. अर्थात त्यावेळी महाराज कृष्णराज यांच्या कल्पनेच्या बाहेर होतं ते. पण किमान त्यांच्याकडे त्याबद्दलची स्वीकारार्हता होती."

"म्हणजे ती सुमंत कल्याणकडे नव्हती; असं तुला म्हणायचं आहे का?" दुखावलेल्या आवाजात महिने प्रश्न केला.

"तुझ्या प्रश्नातच उत्तर आहे मही. तू नाथावर विश्वास नाही ठेवलास. अरे इतकंच काय तू स्वतः तुझ्या राजावर आणि त्याच्या पुत्रावर विश्वास नाही ठेवलास. तुझ्यासाठी तुझा इगो सर्वात मोठा होता. तीक्ष्णाने तुझ्यासारख्या राष्ट्रकूट घराण्याच्या एकनिष्ठ सुमंताला आणि महाराजांच्या अत्यंत जवळच्या मित्राला बाजूला केलं.... बास! हे एकच दुःख तू आज देखील हृदयाला कवटाळून ठेवतो आहेस. मही, आज 2001 मध्ये तुला अनेक गोष्टींची माहिती उपलब्ध आहे. तुला तर या देशाचा इतिहास देखील माहीत आहे. अगदी तुझ्या काळातील सत्य देखील तुला आठवत असेलच. रामायण, महाभारत या दंतकथा नाहीत.... केवळ महाकाव्य नाहीत... तर आपल्या या देशाचा इतिहास आहे; हे माहीत असूनही तू आज देखील ते अमान्य करतो आहेस न?" जस्सी म्हणाला.

"अं?" मही एकदम अबोल झाला.

"जस्सी?" शेषाने जस्सीकडे बघत म्हंटलं. त्यावर शेषकडे बघत जस्सी म्हणाला; "हा मही.... वेरूळ लेण्यांची माहिती देणारा मोठा गाईड..... आजही इथे कथा सांगतो.... सत्य नाही. अरे शेषा थोडं आठवून बघ. आपल्याला देखील तो कथा रुपात सांगत होता. काय हरकत आहे त्याने 'हे असं घडलं;' अशा प्रकारे सत्य सांगायला?" जस्सी जरी शेषाशी बोलत होता तरीही ते सर्वस्वी महिला लागू होत होतं.

"तुला कारण कळणार नाही. त्या काळात राजकुमार गोविंद भावणीकतेत अडकले आणि अपालाच्या आणि कुंजरच्या दुःखातच निवर्तले. आज मी देखील एक कुटुंब चालवतो. समाजाच्या विरुद्ध... ते देखील इथे.... औरंगाबादमध्ये? हम्म.... ठीक! मला माझ्या प्रशांची उत्तरं मिळाली. चालतो मी." मही म्हणाला आणि त्या चौघांकडे पाठ करून चालू पडला.

"स्वतःला सांभाळ संस्कृती. जे घडून गेलं त्याला अनंत काळ लोटला आहे. तुझा पुत्र तुझ्यापासून हिरावला गेला हे मी मान्य करतो. पण तुला देखील विचार करायला हवा की तीक्ष्णावरील रागामुळे तू स्वदेह त्याग केलास त्यावेळी कुंजर आणि गोविंद यांचा विचार तुझ्या मनात नव्हता. आपण सुमंत कल्याणला दोष देतो आहोत की स्वअहंकारापाई त्याने अनेक जन्म घेतले.... पण तुझ्या बाबतीत देखील हेच सत्य नाही का?" जस्सी अत्यंत स्पष्टपणे म्हणाला. त्याचं बोलणं ऐकून दुःखात हरवून गेलेली संस्कृती देखील मान वर करून बघायला लागली.

"भीमा तू?" संस्कृती काही बोलणार होती पण जस्सीने तिला थांबवलं आणि म्हणाला; " अपाला, सत्य स्वीकार. तुझ्या त्यावेळच्या निर्णयामध्ये तुझं गोविंदवरचं प्रेम हे कारण जितकं खरं होतं न.... तितकंच सत्य हे देखील होतं की तुला तीक्ष्णाला हरवायचं होतं."

"हे तूच बोललास म्हणून बरं." मागून आवाज आला आणि गोविंद, संस्कृती, जस्सी आणि शेषा सर्वांनीच मागे वळून बघितलं. त्यांच्या पासून थोड्याच अंतरावर नैना उभी होती. तिला पाहाताच गोविंद पुढे झाला. शेषाने गोविंदला स्वतःच्या मागे टाकलं आणि अत्यंत रागीट चेहेऱ्याने तो नैनाकडे बघायला लागला. जस्सी पुढे झाला आणि त्याने सर्वांनाच शांतपणे मागे केलं.

"तुला नक्की काय म्हणू? तीक्ष्णा की नैना? कारण तुला काहीही म्हंटलं तरी तुझ्या पुनर्जन्माचं कारण कोणालाही कळणार नाही." जस्सी म्हणाला.

"तुला ते माहीत आहे न? मग इतरांना ते कळावं याची काळजी तू नको करुस. तुला मी त्याचवेळी म्हंटलं होतं की तू चूक केलीस तर तुला मानवी जन्म घ्यावा लागेल. ते लक्षात ठेवून तू तुझ्या हेतूने परत परत जन्म घेत राहिलास भीमा. जोवर तू अपालाला भेटला नाहीस. काय काय नाही केलंस त्यासाठी? तो श्लोक! इथे ज्या गुंफा आपण निर्माण केल्या; त्याचं सत्य त्या दूरवरच्या जंगलात गेलंच कसं भीमा? तुला आता आठवणार नाही.... कारण तू जो मानवीय जन्म स्वीकारला आहेस त्यासाठी तू तुझ्या शक्ती त्यागल्या होत्यास. अर्थात त्याची अंधुक आठवण सुरवातीच्या काळातील जन्मात होती तुझ्या मनात. त्याच आठवणींच्या मदतीने तू संपूर्ण भारतवर्षात भ्रमण करत राहिलास आणि अशा अनेक गुंफामधून तो श्लोक त्या त्या वेळच्या भाषेत लिहीत राहिलास. अर्थात.... गोविंदला प्राकृत भाषेतला श्लोक मिळाला. कदाचित तुम्ही इतर कुठे गेला असतात तर संस्कृत किंवा अगदी मागधी भाषेतील श्लोक देखील मिळाला असताच. तुला अपालाला सत्याचा आरसा दाखवायचा होता आणि तुझी शिक्षा देखील भोगायची होती. म्हणूनच प्रत्येक जन्मात तू फार बांधनांमध्ये अडकला नाहीस. केवळ जन्म घेत तिला शोधत राहिलास. अर्थात त्यामुळे माझं काम सोपं झालं. मी केवळ तुझ्या मागे जात राहिले."

"जर तुला इतकं सगळं माहीत आहे तर मग माझ्या जन्माचं प्रयोजन तर सांग." शेषा नैनाकडे बघून म्हणाला.

"once again guilt!! तुझ्या मनातली अपराधी भावना. तुझ्यामुळे कुंजरला काहीही झालं नाही हे तुला अपालाला आणि गोविंदला सांगायचं होतं." नैना हसून म्हणाली..... आणि अचानक भीमा आणि शेषा खाली कोसळले.

ते पाहताच गोविंद गोंधळून गेला. तो पटकन त्यांच्या दिशेने धावला. संस्कृती मात्र ताठ उभी राहात नैनाला सामोरी गेली.

क्रमशः




Friday, June 10, 2022

अनाहत सत्य (भाग 28)

 अनाहत सत्य


28

हस्तांतरण दिन म्हणजे एक महान कलाकृती सर्वसामान्यांसाठी खुली होण्याचा महत्वाचा दिवस होता. सर्वप्रथम महाराज आणि त्यांच्या सोबत राज घराण्यातील सर्वच तीक्ष्णा सोबत संपूर्ण निर्मिती बघणार होते. त्यानंतर सरदार आणि त्यांचे आप्तेष्ट आणि त्यानंतर नगरजन बघू शकणार होते. श्रीमंदिरातील श्रीशंभो पूजन आणि प्राणप्रतिष्ठापना देखील महाराज आणि महाराणी यांच्या शुभ हस्ते करण्यात येणार होती. त्यासाठी सप्त नद्यांचे पवित्र जल आणण्यात आले होते. महाराज आणि महाराणींसोबत राजकुमार गोविंद देखील संपूर्ण वेळ आणि त्यानंतर पूजन स्थानी उपस्थित राहणार होते. महाराजांनी आजवर विस्तारलेल्या सीमांमुळे दूर दूरहून अनेक परदेशी नागरिक देखील हा अपूर्व सोहळा बघण्यासाठी आले होते. दूरहुन आलेल्या या परदेशी नागरिकांनी जवळपासच्या मोकळ्या जागेवर आपापल्या राहुट्या उभारल्या होत्या. त्यामुळे संपूर्ण परिसराला एखाद्या लहानशा शहराचं रूप आलं होतं. सर्व वातावरण मंगलमय होतं. सतत वाजणाऱ्या ढोल, ताशे, नगाऱ्यांमुळे वातावरणाला एक वेगळीच धुंदी चढली होती. केवळ त्या एका दिवसासाठी देखील अनेक व्यापाऱ्यांनी तिथे आपली दुकाने थाटली होती. श्रीमंत गरीब असा भेद न करता सर्वचजण बाजारामधून फिरत होते.

महाराज आणि महाराणी अत्यंत खुशीत होते कारण राजकुमार गोविंदनी आज नगर प्रवेश करण्यास मान्यता दिली होती. तीक्ष्णाने श्रीशंभो पूजनाची घटिका दुपार नंतर योग्य असल्याचं महाराजांना सांगितलं होतं. त्यामुळे प्रथम संपूर्ण परिसर आणि नवनिर्मिती बघून झाल्यानंतर आणि भोजन पश्चात महाराज आणि महाराणी अभ्यंग स्नान करणार होते आणि त्यानंतरच संपूर्ण विधिपूर्वक श्रीशंभो पूजन आणि प्राणप्रतिष्ठापना होणार होती.

या एकूण आनंदी वातावरणात मनातून अत्यंत अस्वस्थ आणि काळजीने व्यापलेला गोविंद सतत भीमाला शोधत होता. खरं तर महाराज आणि महाराणी सोबत संपूर्ण परिसर फिरण्याची त्याची इच्छा नव्हती. परंतु त्या निमित्ताने तो तीक्ष्णावर लक्ष ठेऊ शकत होता. अपाला परत आली आहे हे एव्हाना तीक्ष्णाला कळले असण्याची शक्यता जास्त होती. त्यामुळे तिच्यावर लक्ष असणे आवश्यक होते. केवळ म्हणूनच त्याने फिरण्यास मान्यता दिली होती. तीक्ष्णाने महाराजांना प्रथम गुंफेपासूनचे काम दाखवण्यास सुरवात केली.

पहिल्या दोन गुंफा पहातानाच तीक्ष्णाकडे बघून महाराज म्हणाले; "या गुंफांमध्ये पाहण्यासारखे काहीच नाही. तरीही आपण आग्रह करत आहात याचं काही विशेष कारण आहे का?"

तीक्ष्णाने अत्यंत शांत नजरेने महाराजांकडे बघितलं आणि म्हणाली; "महाराज, या गुंफा कधीच आपल्यासाठी आणि सर्वसामान्य जनांसाठी महत्वाच्या नसणार आहेत. परंतु श्रीमंदिर निर्मितीसाठी हा परिसर नक्की करताना येथील इतर काही महत्वाचे बदल; जे पुढील अनेक मानवीय जन्मांसाठी आवश्यक असतील; ते करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत करतो आहोत. त्यादृष्टीने या गुंफा अत्यंत महत्वाच्या ठरतात. याविषयी विस्तृत माहिती आपणास राजकुमार गोविंद देखील देतील. त्यांच्या इथल्या वास्तव्यामध्ये त्यांनी या गुंफांची निर्मिती होत असताना ते काम अत्यंत जवळून बघितलं आहे."

तीक्ष्णाचं ते बोलणं गोविंदच्या मनाला चटका लावून गेलं. तीक्ष्णाने अपालाच्या 'स्व' ला तिच्या शब्दांनी डिवचले होते. एकवेळ गोविंदने स्वतःबद्दल काहीही ऐकून घेतलं असतं. पण अपालाच्या कामाबद्दल काहीसं कुत्सितपणे तीक्ष्णा बोलत होती. सोबत असणाऱ्या सरदार आणि इतर मानकऱ्यांसमोर काही बोलावं की नाही असा विचार राजकुमार गोविंद काही क्षण करत होता. त्यामुळे त्याच्या लक्षात नाही आलं की महाराज काही अपेक्षेने त्याच्याकडे बघत आहेत. परंतु ते लक्षात येताच पुढला मागचा कोणताही विचार न करता गोविंद म्हणाला; "महाराज, सत्य सांगत आहेत तीक्ष्णा. या गुंफांचे संरक्षण विशेष पद्धतीने झाले पाहिजे. या गुंफांची रचना अशा प्रकारे केली आहे की काही विशेष वायुविजन निर्माण होते...." गोविंद अजूनही काही सांगणार होता परंतु तीक्ष्णा एकदम सतर्क झाली आणि त्याचं बोलणं तोडत म्हणाली; "महाराज, राजकुमार अत्यंत सत्य तेच सांगत आहेत." महाराजांना एकूण त्यादोघांमधील शाब्दिक चकमकीतून निर्माण झालेल्या ताणाची जाणीव झाली. त्यांना आजच्या शुभप्रसंगी कोणतेही विघ्न नको होते. त्यांनी गोविंदला डोळ्यांनीच खुणावले आणि हसत म्हणाले; "तीक्ष्णा, आमच्या राजघराण्यात आजवर कोणीही असत्य बोलले नाही आहे. त्यामुळे आम्हाला इतर कोणाकडून राजकुमारांच्या प्रामाणिकपणाबद्दल आणि सत्य बोलण्याबद्दल साक्ष अपेक्षित नाही. तरीही आपण तसे सांगितलेत त्याबद्दल धन्यवाद. याविषयी आम्ही स्वतः राजकुमार गोविंद यांच्या सोबत चर्चा करू आणि आमच्याकडून आवश्यक अशी काळजी घेऊ. पण सध्या याविषयी जास्त चर्चा करण्याची आमची इच्छा नाही. त्यामुळे आपण पुढील निर्मिती पाहण्यासाठी जावं हेच योग्य."

महाराजांच्या बदललेल्या आवाजातून तीक्ष्णाला योग्य तो अर्थ लक्षात आला. तिने अत्यंत आदराने मान झुकवली आणि काही न बोलता महाराजांना पुढील गुंफेच्या दिशेने नेण्यास सुरवात केली. परंतु शब्दांच्या त्या चकमकी नंतर गोविंदला त्या लावाजम्यासोबत जाण्याची इच्छा उरली नव्हती. त्यामुळे थोडं पुढे गेल्यानंतर त्याने महाराजांकडून परवानगी घेतली आणि तो त्या गोतावळ्यामधून बाहेर पडला. मन थोडं शांत झालं आणि गोविंद भीमा कुठे असेल याचा विचार करायला लागला. खरं तर पुढे काय होणार आहे याची गोविंदला काहीच कल्पना नव्हती. केवळ अपालाला साथ देणे आणि तिच्या सोबत राहणे एवढंच त्याच्या हातात होतं. पण त्यासाठी त्याची आणि अपालाची भेट होणं आवश्यक होतं. गोविंदला सकाळपासून अपाला भेटली नव्हती किंवा भीमा देखील दिसला नव्हता. नाथा आजच्या दिवशी तिथे असणारच नव्हता. त्यामुळे गोविंदला एकटं पडल्याची भावना झाली होती.

गोविंद त्याच्या कक्षामध्ये बसला होता. भोजनासाठीचं बोलावणं येईपर्यंत कुठेही न जाण्याचा निर्णय त्याने घेतला होता. कोणीही त्रास देऊ नये असं त्याने त्याच्या कक्षाबाहेर सांगून ठेवलं होतं. इतक्यात समोरचा पडदा बाजूला झाला. ते पाहून गोविंदच्या कपाळावर आठयांचं जाळं निजर्मन झालं आणि अचानक त्याच्या समोर सुमंत कल्याण येऊन उभे राहिले. सुमंत कल्याणना बघून गोविंद गोंधळून गेला होता. त्याला अचानक लक्षात आलं की गेले काही दिवस चाललेल्या धामधुमीमध्ये सुमंत कल्याण कुठेही दिसले नव्हते.

"सुमंत आपण यावेळी इथे माझ्या कक्षात कसे? आत्ता तर आपण महाराजांसोबत असणं अपेक्षित नाही का?" गोविंदने सुमंत कल्याणना प्रश्न केला.

सुमंत कल्याण यांनी अत्यंत स्थिर नजरेने गोविंदकडे बघितलं आणि ते म्हणाले; "राजकुमार आपला माझ्यावर विश्वास नाही याची मला पूर्ण कल्पना आहे. परंतु आत्ताची परिस्थिती अशी आहे की आपल्याला माझं म्हणणं ऐकवच लागेल. केवळ तुमच्याशीच बोलू शकतो असा विषय असल्याने मी थेट तुमच्याकडे आलो आहे. हे खरं आहे की मी आत्ताच काय पण येथील सोहळा ठरल्यापासून महाराजांसोबत असणं अपेक्षित आहे. परंतु महाराजांसोबत असण्यापेक्षा महाराजांच्या आणि आपल्या सुरक्षेसाठी योग्य पावलं उचलणं हे माझं प्रथम कर्तव्य आहे."

गोविंदच्या मनात एकदम कुंजरचा विचार आला. कुंजर नाथासोबत होता. नाथा जरी गोविंद सोबत होता आणि त्याचा मित्र होता तरीही त्याची नेमणूक सुमंत कल्याण यांनी केली होती. त्यामुळे गोविंदहुन देखील अगोदर तो सुमंत कल्याणचं ऐकेल अशी शक्यता नाकारता येत नव्हती. त्यामुळे सुमंत कल्याणकडे दुर्लक्ष करणं गोविंदला योग्य वाटलं नाही. सुमंतांना बसण्याची खुण करून गोविंद देखील त्यांच्या समोर बसला. सुमंतांनी क्षणभर गोविंदकडे बघितलं आणि मग मान खाली घालून त्यांनी बोलण्यास सुरवात केली.

"राजकुमार, आपला पुत्र कुंजर; ज्याला आपण नाथासोबत सुखरूप राहण्यासाठी ठेवले होते....."

गोविंद सुमंतांच्या त्या बोलण्याने एकदम अस्वस्थ झाला. उठून उभा राहात त्याने तीव्र शब्दात सुमंत कल्याणना प्रश्न केला; "काय झालं आहे कुंजरला सुमंत? जर आपण काही दुष्ट विचार करून त्याला काही हानी पोहोचवली असेल तर...."

सुमंत कल्याण देखील उभे राहिले आणि त्यांनी गोविंदच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाले; "आपण कोणताही गैरसमज करून घेऊ नका राजकुमार. आपला पुत्र कुंजर या राज्याचं भविष्य आहे. त्याला कोणतीही हानी पोहोचवणे माझ्या मनात देखील येणार नाही. किंबहुना जर कोणी असं करणार असेल तर कोणताही विचार न करता मी स्वतः त्या व्यक्तीचा नायनाट करीन."

सुमंतांच्या त्या वक्तव्याने मात्र गोविंद हादरला. "सुमंत आपण? आपण नाथाला?"

"हो राजकुमार." सुमंत अत्यंत शांत आवाजात बोलायला लागले. "राजकुमार आपण मनाने फारच चांगले आहात. त्यामुळे आपण कोणावरही विश्वास ठेवता. मात्र सत्य हे आहे की नाथा विश्वास ठेवण्यासारखा नव्हता."

"सुमंत कल्याण! नव्हता? म्हणजे? नाथा कुठे आहे?" गोविंदने एकदम पुढे होत अत्यंत तीव्र आवाजात सुमंत कल्याणना प्रश्न केला.

"नाथा या जगात नाही राजकुमार." सुमंत तेवढ्याच शांतपणे म्हणाले.

"सुमंत!!! आणि माझा कुंजर?" गोविंदने अत्यंत दुखावलेल्या आवाजात प्रश्न केला.

"कुंजर....." सुमंत उत्तर देणार इतक्यात खुद्द महाराणींचं आगमन होत असल्याची वर्दी घेऊन एक सेवक आत आला आणि लगोलग महाराणी देखील आल्याच. त्यामुळे सुमंत कल्याण यांचं वाक्य अर्धवट राहिलं. महाराणी आल्यामुळे सुमंत कल्याण राजकुमार गोविंद यांची रजा घेऊन तिथून निघाले.

"राजकुमार आम्हाला असं आत्ताच कळलं आहे की आपण आपल्या जीवनाची जोडीदार निवडली आहे आणि तिच्यापासून पुत्र देखील आहे आपणास." सुमंत गेल्याक्षणी महाराणींनी गोविंदला प्रश्न केला.

"हो माई." गोविंदने उत्तर दिलं खरं. पण त्याचं मन महाराणींशी बोलण्यात नव्हतं. कुंजर कुठे आहे आणि अपालापर्यंत आपण कसं पोहोचायचं हा एकच प्रश्न त्याच्या मनात फिरत होता. त्यामुळे महाराणींना त्याचं सत्य कोणी सांगितलं असावं हा प्रश्न त्याच्या मनात आला नाही. मात्र महाराणी गोविंदकडून सत्य कळल्यानंतर अत्यंत दुःखी झाल्या.

"राजकुमार, आपण किमान एकदा तरी माझ्यावर किंवा आपल्या पित्यावर विश्वास ठेवून सगळं खरं सांगायला हवं होतं. तो बिचारा नाथा खरं सांगत होता पण महाराजांनी त्याच्यावर विश्वास ठेवण्यास नकार दिला. त्याच्या बाजूने बोलायला त्यावेळी कोणीच नव्हतं. सुमंत कल्याण आत्ता इथे काय करत होते ते माहीत नाही मला; पण त्यावेळी त्यांना निरोप देऊन देखील ते आले नाहीत. राजकुमार, तुम्ही निघून गेल्यानंतर ती तीक्ष्णा महाराजांसोबत बराच वेळ होती. तिने अजून काय काय सांगितलं असेल महाराजांना ते सांगता येत नाही. मला खात्री आहे तुम्ही कोणतंही चुकीचं पाऊल नसेल उचललं. परंतु तुमच्या सोबत जी कोणी तरुणी आज नगर प्रवेश करणार तिच्याबद्दल तुम्ही स्वतः महाराजांना सांगणं योग्य." महाराणी म्हणाल्या आणि गोविंद काही बोलण्याच्या अगोदर जशा आल्या तशा निघून गेल्या.

गोविंद अवाक होऊन थिजल्याप्रमाणे उभा राहिला. आपण काय करावं त्याला सुचत नव्हतं. अशातच किती वेळ गेला ते त्याला कळलंच नाही. त्याने नजर वर उचलून बघितलं तर त्याच्या समोर एक सेवक उभा होता. गोविंदने त्याच्याकडे पाहाताच त्याने महाराजांचा निरोप दिला....

"राजकुमार आपल्याला श्रीशंभो पूजन संस्कारासाठी महाराजांनी लगोलग येण्यास सांगितलं आहे."

गोविंदने हा निरोप ऐकला आणि त्याच्या मनात पहिला विचार आला तो अपालाचा. श्रीपूजन जर सुरू होणार आहे तर अपाला नक्की तिथेच कुठेतरी असावी. ती आपली वाट बघत असेल. आपण न दिसल्याने ती गोंधळून जाईल. अजून तिला नाथाचं सत्य कळलेलं नाही. त्यामुळे आपण तिथे उपस्थित असणं अत्यंत आवश्यक आहे. हे लक्षात येताच गोविंद अत्यंत जलद गतीने श्रीमंदिराच्या दिशेने निघाला. मात्र त्याच्या कक्षाच्या बाहेर येताच त्याला जाणवलं की एकूण वातावरण बदलून गेलं आहे. पर्जन्य झड येऊन गेली आहे आणि संपूर्ण आकाश अंधःकारमय झालं आहे. त्याला याची जाणीव होती की हा पर्जन्यकाल आहे; मात्र इतक्या लगेच संपूर्ण वातावरण बदलून जाईल याची त्याला कल्पना नव्हती.

गोविंद झपाट्याने श्रीमंदिराजवळ पोहोचला. पूजन संपून प्राणप्रतिष्ठापना झाली होती. तीक्ष्णा आणि महाराज एकूण सांगता करण्याच्या शेवटच्या टप्प्यात होते. हळूहळू पावसाला सुरवात झाली असल्याने सामान्य नगरजन आडोशाच्या मदतीने दूरवर उभे होते. आकाशात विजा चमकायला लागल्या होत्या. वादळी वारा वाहायला सुरवात झाली होती. गोविंदला पाहताच तीक्ष्णाने एक तीव्र कटाक्ष त्याच्याकडे फेकला. गोविंदच्या ते लक्षात आलं. पण आता खूप उशीर झाला होता. तीक्ष्णाशी कोणताही वाद घालण्यापेक्षा अपाला कुठे आहे ते शोधणं जास्त महत्वाचं होतं त्याक्षणी. म्हणूनच गोविंदने तीक्ष्णाकडे दुर्लक्ष केलं. जसजसा विधी पूर्ण होत येत होता तसतसं आभाळ देखील दाटून येत होतं. वादळाला सुरवात होणार हे स्पष्ट दिसत होतं. त्यामुळे सर्वच सरदार, त्यांचे आप्तेष्ट राजघराण्यातील सर्वच व्यक्ती सुरक्षित स्थानी गेले होते. पूजन स्थानी महाराज, महाराणी, राजकुमार गोविंद, राजगुरू आणि तीक्ष्णा असे मोजकेच प्रमुख होते. बाकी सेवक वादळापासून यासर्वांचं संरक्षण व्हावं यासाठी प्रयत्न करत होते.

विधी पूर्ण झाला आणि तीक्ष्णाने समोरच्या हवनकुंडामध्ये शेवटची आहुती अर्पण केली. तिने वळून हसत महाराजांना म्हंटलं; "महाराज, मी दिलेल्या शब्दाची पूर्ती मी केली आहे. आपल्या इच्छेनुसार हे श्रीशिव मंदिर इथे उभं राहिलं आहे. यावदचंद्रदिवाकरू या मंदिराचा लौकिक जगभरात राहणार आहे आणि त्यासोबत आपलं नाव देखील."

तिचं बोलणं ऐकून महाराजांनी अत्यंत आनंदाने मान डोलावली. महाराणी देखील संतोष पावल्याचं त्यांच्या चेहेऱ्यावरून दिसून येत होतं. त्याचवेळी अचानक अत्यंत जोरात पावसाची सर आली आणि संपूर्ण लवाझमा श्रीमंदिराच्या आत जाण्यासाठी वळला. त्याचवेळी गोविंदचं लक्ष हत्तीशीले जवळ उभ्या अपालाकडे गेलं आणि तो अत्यंत तीव्र गतीने तिच्याकडे गेला.

"राजकुमार माझा पुत्र?" त्याला जवळ आलेला बघून अपालाने पहिला प्रश्न केला.

"अपाला कुंजर तुझ्या समोर आणून उभा करायची जवाबदरी माझी. मला माहीत नव्हतं नाथा घात करेल. अर्थात याविषयी आपण नंतर बोलू. आज दिवसभर मला भीमा देखील दिसला नाही ग. मी नक्की काय करावं ते मला सुचत नाही आहे." गोविंद तिचे दोन्ही खांदे धरून तिला जवळ घेत म्हणाला.

"राजकुमार घात तीक्ष्णाने केला आहे. ती पहिल्या दिवसापासून याक्षणचं नियोजन करत होती. पण हे सगळं बोलण्याची ही वेळ नाही. याक्षणी मी भीमाने तयार केलेली राक्षकभिंत पार करणं आवश्यक आहे. कारण भीमाला देखील तीक्ष्णाने अडकवून टाकले आहे. अर्थात त्याने माझा मार्ग मोकळा ठेवला आहे. चला राजकुमार आपल्याकडे वेळ कमी आहे." एवढं बोलून अपालाने राजकुमार गोविंदचा हात धरला आणि ती श्रीमंदिराच्या उजव्या बाजूच्या पायऱ्या उतरायला लागली. एवढ्यात श्रीमंदिरातून तीक्ष्णा बाहेर आली आणि तिने तीव्र आवाजात अपालाला हाक मारली आणि म्हणाली; "अपाला, हा वेडेपणा करू नकोस. तुझा जन्म सर्वसाधारण मानव म्हणून झालेला नाही. अनेकदा जन्म घेण्यापेक्षा हा एकच जन्म जवाबदारीपूर्ण जग."

मागे वळूनही न बघता अपाला चालत राहिली आणि त्याक्षणी तीक्ष्णाने तिचे दोन्ही हात वर आकाशाकडे फेकले आणि म्हणाली;

"हे नक्षत्र-ताऱ्यांनो, या मंदिर कळसाची निर्मितीच मुळी तुमच्याशी संपर्क करण्यासाठी झाली आहे. आजचा हा पर्जन्य आणि हे घोंगावत येणारं वादळ; याची पूर्वकल्पना तुम्ही मला दिलीत ती त्या विशेष रचनेतून संपर्क करूनच. एका प्रकारे ही तुमची आणि माझी परीक्षाच आहे. तुमच्याकडून मिळालेल्या संकेतानुसार काही क्षणातच हा संपूर्ण परिसर वादळामध्ये वेढला जाणार आहे.... पण ते क्षण लवकर यावेत यासाठी मी माझ्या संपूर्ण शक्तीनिशी तुम्हाला आव्हान करते आहे."

तीक्ष्णाच्या त्या आव्हाहनाचा परिणाम संपूर्ण वातावरणावर झाला आणि प्रचंड घोंगावत वादळाने संपूर्ण परिसरावर धडक दिली. होणारे बदल तीक्ष्णा तिच्या जागी शांतपणे उभं राहून बघत होती. अपालावर देखील या निसर्ग कोपाचा परिणाम झाला नाही. मात्र गोविंद एक सर्वसामान्य मनुष्य होता. त्यात त्याचं मन अनेक डोलायमानते मधून गेल्याने तो क्षिण झाला होता. त्यामुळे होणारा बदल तो सहन करू शकला नाही आणि अपाला रक्षकभिंत ओलांडणार इतक्यात त्यादोघांचा हात सुटला. तक्षणी गोविंद लांब फेकला गेला आणि अपाला रक्षकभिंत ओलांडू न शकल्याने श्रीमंदिराच्या दिशेने ढकलली गेली. गोविंद उठू शकत नाही हे पाहून अपाला हताश झाली आणि तिने वळून तीक्ष्णाकडे बघितलं.

"तू मला रक्षकभिंत ओलांडण्यापासून अडवू शकतेस तीक्ष्णा; गोविंदपासून दूर देखील करूच शकतेस. मात्र मी जर स्वेच्छेने माझं आयुष्य त्यागण्याची इच्छा धरली तर तू मला अडवू शकत नाहीस. हे सत्य तू जाणतेस आणि मी देखील." अपाला हट्टाला पेटली होती. तिने इतकं बोलून तीक्ष्णाकडे पाठ केली आणि तीक्ष्णा प्रमाणेच आपले दोन्ही हात आकाशाकडे करत म्हंटलं; "मी माझ्या सर्व शक्ती त्यागते आहे. मला कल्पना आहे की या शक्तींसोबत माझी स्मरणशक्ती जाईल आणि सामान्य मानवीय आयुष्याच्या गर्तेत मी ढकलली जाईन. पण ते मला मान्य आहे. कारण मला खात्री आहे की कोणत्या ना कोणत्या जन्मामध्ये माझा गोविंद मला नक्की भेटेल."

इतकं बोलून अपालाने तिला आणि केवळ तिच्यासारख्यांना दिसणाऱ्या रक्षकभिंतीच्या दिशेने धाव घेतली. भीमाने श्रीमंदिराच्या संरक्षणासाठी अत्यंत कठोर असे रक्षक उभे केले होते. त्यांनी अपालाला त्यांच्याकडील विशेष आयुधाने अडवले. त्याचा परिणाम स्वरूप अपाला मोठा विजेचा धक्का लागल्याप्रमाणे पडली आणि गतप्राण झाली.

अपाला असं काही करेल असं तीक्ष्णाला अपेक्षित नव्हतं. अपालाने आपली जवाबदारी समजून सर्वसामान्य जीवन घेऊ नये अशी तीक्ष्णाची इच्छा होती. म्हणूनच तिने अपालाला थांबवण्यासाठी सर्व शक्य ते प्रयत्न केले होते. मात्र तीक्ष्णाच्या सर्व प्रयत्नांना असफल करत अपालाने स्वेच्छेने शरीरत्याग केला होता.

अपाला खाली पडली आणि त्याचवेळी भीमा धावत तिथे आला. त्याने एकदा अपालाकडे बघितलं आणि मागे वळून तीक्ष्णाकडे बघितलं.

"भीमा तू रक्षकभिंतीला भगदाड ठेवलंस. तुझ्या कामातील ही चूक कधीच मान्य केली जाणार नाही." तीक्ष्णाचा आवाज तीव्र होता.

"भागीनेय; हे खरं आहे की मी काही जागा शिल्लक ठेवली होती. मात्र ती जागा मी भारून टाकणार होतो. मात्र तुमची तशी इच्छा नव्हती. म्हणूनच तुम्ही मला दूर केलंत याजागेपासून. भूतप्रमुखांसमोर माझी चूक दाखवून तुम्हाला मला परत एकदा मर्त्य जीवनात धकलायचं होतं. त्यामागील कारण काहीही असेल.... कदाचित योग्य ..... कदाचित अयोग्य! मी तुमची इच्छा मान्य करतो. अर्थात मी चुकलो म्हणून नाही तर माझी प्रिय अपाला जिथे नाही तिथे मला देखील राहण्याची इच्छा नाही." भीमा म्हणाला आणि त्याने देखील स्वेच्छेने शरीरत्याग केला.

त्याचवेळी एक अत्यंत मोठी वीज शलाका तीक्ष्णावर येऊन कोसळली आणि आतून बाहेर येणाऱ्या सर्वांसमोर तीक्ष्णा तिथून नाहीशी झाली.

***

.........................."गोविंद; हेच सत्य आहे आपल्या पूर्व आयुष्याचं." तिच्या मागे आलेल्या गोविंदच्या डोळ्यात बघत संस्कृती म्हणाली आणि मंद हसत त्याचा हात धरून त्याला घेऊन ती गुंफेच्या बाहेर पडली.

क्रमशः

Friday, June 3, 2022

अनाहत सत्य (भाग 27)

 अनाहत सत्य

भाग 27  

भीमा आणि तीक्ष्णा श्रीमंदिरासमोर उभे होते. आता अगदीच शेवटचा हात फिरवण्याचं काम सुरू होतं. त्यामुळे केवळ कारागिरच मंदिराच्या परिसरात दिसत होते. मूळचे कामगार अगदीच तुरळक होते. मूलतः या कामगारांच्या कामाचा आवाकाच मोठा होता. त्यांचं रूप जरी अत्यंत विचित्र असलं तरी त्यांच्यामध्ये शारीरिक शक्तीचा साठा भीमाला देखील लाजवेल असा होता. असे कामगार एका कारागिराजवळ एक अशा प्रकारे उभे होते आणि कारागीर सांगेल ते काम पूर्ण करत होते.

तीक्ष्णाने अत्यंत प्रेमाने श्रीमंदिर वास्तूकडे बघितले. संपूर्ण पर्वतामधून काही भाग टेकडी अलग करून त्यानंतर या मंदिराच्या कामाचा शुभारंभ केला होता तीक्ष्णाने. केवळ हाताशी असलेल्या कामगारांच्या मदतीने.... त्यांच्या कामाच्या वेगाचा अंदाज असल्याने तिने एवढे मोठे आव्हान स्वीकारले होते. तरीही भूतप्रमुखांच्या सांगण्यावरून तिने कळसाचे काम अगोदर सुरू केले होते. कामाला सुरुवात करताना भूतप्रमुखांच्या मनात काम पूर्ण होऊ शकेल का याविषयी साशंकता होती. कारण काम मोठं होतं आणि त्यामानाने लवकरात लवकर संपण अपेक्षित होतं. त्यामुळेच जर काम अपूर्ण राहिलं तर निदान मंदिराच्या कळसाचा प्रमुख भाग पूर्ण झालेला असणं आवश्यक होतं. अर्थात तीक्ष्णाला तिच्या कामाच्या बाबतीत पूर्ण विश्वास होता. त्याच विश्वासाचं फळ आता तिच्या समोर दिमाखात उभं होतं.

एकाच अजस्त्र शिलेमधून कापून बांधलेलं श्रीमंदिर म्हणजे अप्रतिम कलेचा नमुना पृथ्वी अस्तित्वात असेपर्यंत राहणार होता. मंदिराच्या कामाला सुरवात झाली ते दिवस सर्रकन तीक्ष्णाच्या डोळ्यासमोरून सरकून गेले. त्यावेळी खडकाच्या तुकड्यांचा पडणारा खच; अहोरात्र काम करून तो उचलून बाजूला करणारे तिचे कामगार आणि त्यांच्यावर स्वतः देखरेख करत उभी असलेली तीक्ष्णा हेच दिसत असे. मात्र हळूहळू मंदिराचा आकार नजरेत भरायला लागला. तीक्ष्णाने कलात्मकतेने मंदिराची महल तीन बाजूंनी वर उचलली होती आणि मंदिराच्या वरच्या भागाला; जिथून श्रीदर्शनासाठी जाण्याचा मार्ग आहे तिथे जोडून घेतली होती. श्रीशंकर वाहन नंदी आणि प्रिय पुत्र गजानन यांच्या प्रेमाखातर गजराज मंदिराच्या दोन्ही बाजूने निर्माण केले होते. तीक्ष्णाने तिच्या स्थापत्य ज्ञानाचा संपूर्ण कस लावला होता या मंदिर निर्मितीमध्ये. ती स्वतः अत्यंत समाधानी होती तिच्या कामाच्या बाबतीत.

बराच वेळ स्वतःच्या निर्मितीकडे बघितल्या नंतर तीक्ष्णाने वळून भिमाकडे बघितलं आणि म्हणाली; "भीमा, तुझे शब्द विसरू नकोस. या मंदिरामधील एकही मूर्ती काकणभर देखील खंडित झाली तर तुला तुझ्या सर्व शक्ती त्यागून परत एकदा सर्वसामान्य मानवीय आयुष्याला सामोरं जावं लागेल. भीमा.... तू मला जाणतोस. असा निर्णय घ्यायची वेळ आली तर मी क्षणभराचा देखील विचार करणार नाही."

भीमाने अत्यंत विश्वासपूर्वक तीक्ष्णाकडे बघितलं आणि म्हणाला; "भागीनेय, आत्ता हे श्रीमंदिर, तुम्ही निर्मित केलेली ही अद्वितीय स्थापत्य कला; तुम्ही ज्या प्रेमाने बघत होतात त्यावरून मला कल्पना आलीच आहे. मी माझ्या बाजूने हे नक्कीच सांगू शकतो भागीनेय, तुम्हाला जसा तुमच्या निर्मितीचा अभिमान आहे आणि काळजी आहे; त्याचप्रमाणे मला देखील माझ्या कामाबद्दल पूर्ण विश्वास आहे आणि चूक होणार नाही याबद्दल अभिमान आहे."

"येणारा कालच याचं उत्तर देईल याची मला खात्री आहे." तीक्ष्णा अत्यंत गंभीर आवाजात म्हणाली आणि पुढे चालू लागली. भीमाला तिच्या शेवटच्या वाक्याचा अर्थ लक्षात नाही आला. पण तिला कोणताही प्रश्न विचारण्याची त्याची इच्छा नव्हती. त्यामुळे तो देखील तिच्या सोबत चालत त्याच्या कामाची माहिती द्यायला लागला.

***

"भीमा..... भीमा.....? भीमा कुठे आहेस?" गोविंद भीमाला शोधत फिरत होता. अमावास्या उलटून तीन दिवस झाले होते. पुढील प्रत्येक दिवस अत्यंत महत्वाचा होता. अजूनही रात्रीच्या वेळी केवळ चांदण्यांचा लुकलूकता प्रकाश भूतलावर पोहोचत होता. त्यात पर्जन्यकाल असल्याने तो प्रकाश देखील ढगांच्या कृपेवरच अवलंबून होता. अशा परिस्थितीत गोविंद भीमाला शोधत फिरत होता.

अलीकडे सूर्यास्त देखील खूपच लवकर व्हायला लागला असल्याने रात्र काल वाढला होता. त्यामुळे नक्की किती रात्र उलटून गेली आहे ते गोविंदला कळत नव्हतं. तो आणि अपाला काही वेळापूर्वी पर्यंत एकत्र होते. कुंजर देखील त्यांच्या डोळ्यासमोरच होता. नुकताच पाऊस पडून गेला असल्याने मंद वाऱ्याच्या झुळका आल्हाददायक वाटत होत्या. काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या हस्तांतरण सोहोळयाबद्दल गोविंद आणि अपाला बोलत बसले होते. मूलतः त्यादिवशीच्या सोहोळयानंतर अपाला आणि गोविंद एकत्र कसे येऊ शकतील हाच विषय सतत त्यांच्या चर्चेत होता. बोलता बोलता गोविंदला कधी झोप लागली ते त्याचं त्यालाच कळलं नाही. त्याला अचानक जाग आली होती ते कुंजरच्या हाकेमुळे. गोविंद जागा झाला आणि क्षणभरासाठी तो कुठे आहे हे त्याला कळलंच नाही. कारण तो आणि अपाला तिसऱ्या गुंफेच्या मागील टेकडीवर बसले होते. मात्र गोविंदला जाग आली त्यावेळी तो गुंफेच्या आत होता.

गोविंद धपडपडून उठला आणि त्याने आजूबाजूचा अंदाज घेतला. त्यावेळी त्याला अनेक पावलांचा आवाज आला. अत्यंत घाईघाईने कोणीतरी चालत होतं आणि त्यांच्या पायांचा आवाज त्या शांत वेळी गुंफेच्या आत घुमत होता. आतील भाग पूर्ण काळोखात झाकोळलेला होता. अनेक वर्ष तिथे राहिल्यामुळेच केवळ गोविंद त्या गुंफेच्या आत उभा राहू शकत होता. इतर कोणीही असतं तर काळोखाचे हात आपल्याला सामावून घेण्यासाठी आपल्यामध्ये मुरत आहेत अशी भावना मनात साकळून आली असती आणि केवळ भीतीनेच मृत्यूला ओढवून घेतलं असतं.

गोविंदला अचानक अपालाने हाक मारल्याचा भास झाला आणि आवाज आला त्यादिशेने त्याने नकळत धाव घेतली. पण तो गुंफेच्या भिंतीवर जाऊन आदळला. काय झालं ते गोविंदच्या लक्षात नाही आलं; पण तो एकदम भोवळ येऊन खाली पडला.

गोविंदला जाग आली आणि तो धडपडत गुंफेबाहेर पडला. आतापर्यंत अपाला आणि कुंजर आपल्यापासून बरेच लांब गेले असणार याची त्याला कल्पना आली होती. त्यामुळे गुंफेच्या आत थांबून त्यांना शोधण्यात काहीच अर्थ नाही हे त्याच्या लक्षात आलं होतं. म्हणूनच तो भीमाला शोधायला बाहेर पडला होता.

***

"भीमा.... तू इथे या गुंफेच्या दुसऱ्या टोकाला काय करतो आहेस? मी बराच वेळ तुला शोधतो आहे." मंदिराच्या डावीकडील सर्वात शेवटच्या गुंफेच्या मागील टेकडीवर बसून आकाशाचे निरीक्षण करणाऱ्या भिमाजवळ उभा राहून गोविंद म्हणाला.

"अरे गोविंद? तू इथे यावेळी काय करतो आहेस? अपाला आणि कुंजर नाहीत का तुझ्यासोबत?" भीमाने गोविंदने विचारलेले प्रश्न ऐकलेच नव्हते. तो त्याच्याच विचारात गाढलेला होता हे गोविंदच्या लक्षात आलं.

भीमा अपाला आणि कुंजर सोबत मी दुसऱ्या बाजूच्या गुंफेच्या मागील टेकडीवर होतो. मी आणि अपाला बोलत होतो आणि कुंजर आमच्या सोबत आडवा पडून तारका बघत होता. बोलताना मला झोप लागली. मला कुंजरने मारलेल्या हाकेमुळे जाग आली त्यावेळी मी गुंफेच्या आत होतो." गोविंद बोलत असताना आडवा पडून आकाशाकडे बघणाऱ्या भीमाने एकदम उठून गोविंदकडे बघत प्रश्न केला; "तू तिसऱ्या गुंफेमध्ये होतास का?" गोविंदला भीमाच्या प्रश्नांचं आश्चर्य वाटलं.

"हो! का?" गोविंद म्हणाला.

काही क्षण भीमा शांत बसला.

"माझ्या संयमाचा अंत बघू नकोस भीमा. मला कल्पना येऊन चुकली आहे की मी अपाला आणि कुंजर पासून दुरावलो आहे. मला केवळ तुझा आधार आहे. अशा वेळी तू जर काही न बोलता मला कोड्यात टाकणारे प्रश्न विचारू नकोस." गोविंद म्हणाला.

"गोविंद" अत्यंत शांत आवाजात भीमाने बोलण्यास सुरवात केली. "अपाला आणि कुंजर दोघांपासून तू दुरावला आहेस इतकंच नाही तर त्यांना तू परत बघू शकशील असं मला वाटत नाही."

भीमाच्या पहिल्याच वाक्याने गोविंद हतबल होऊन गेला. भीमा पुढे म्हणाला; "अपाला आणि कुंजर एव्हाना आमच्या नगरमध्ये पोहोचले असतील. राजकुमार, पूर्वी अंदाज लावल्याप्रमाणे आमच्यातील कामगार इथून परतीच्या वाटेला लागले होते. त्यांच्या सोबत काही कारागीर देखील जायला लागले होते. मात्र अपाला आणि कुंजर यांना भूगर्भाच्या दिशेने इतक्यात पाठवण्याची चूक तीक्ष्णा करेल असं मला वाटलं नव्हतं. परंतु आपण चिंता करू नका. मला खात्री आहे की अपाला यातून मार्ग काढेल."

"मला तुझ्या खात्रीबद्दल खात्री नाही भीमा. जर अपाला काहीच मार्ग शोधू शकली नाही तर मग? आता केवळ हातावर मोजण्याइतकेच दिवस आहेत आपल्या हातात." गोविंद अत्यंत अस्वस्थ झाला होता.

"राजकुमार तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी आणि अपालाने मार्ग शोधून काढला आहे. त्यामार्गातील सगळ्याच अडथळ्यांचा आम्ही विचारपूर्वक मार्ग काढला आहे. आम्हाला अंदाज होताच की भागीनेय तीक्ष्णा अपाला आणि कुंजरला सोहण्याच्या दिवसा अगोदरच बाहेर काढणार. म्हणूनच मी तिच्याच सांगण्यावरून भूतप्रमुखांशी बोललो होतो. अपालाने केलेल्या मेहेनतीच फळ म्हणून ती हस्तांतरण सोहळा बघण्याची हकदार असू शकते; याविषयी मी भूतप्रमुखांकडे विनंती केली होती. त्याचवेळी अपाला या सोहळ्याच्या वेळी तिथे असू नये अशी इच्छा तीक्ष्णाने व्यक्त केल्याचं मला कळलं. परंतु भूतप्रमुखांनी माझी विनंती मान्य केली आणि अपालाला हस्तांतरणाच्या दिवशी इथे उपस्थित राहण्याची परवानगी दिली. त्यामुळे जरी तीक्ष्णाच्या आदेशावर अपाला आणि कुंजर यांना इथून नेण्यात आलं असलं तरी ती शेवटच्या दिवशी इथे असेल याबद्दल मला खात्री आहे." भीमाने गोविंदला माहिती दिली.

"याचा अर्थ केवळ त्याच दिवशी मी अपाला आणि कुंजर यांना इथून नेऊ शकतो. त्याअगोदर पुढचे काही दिवस अपाला मला दिसणार देखील नाही आह.... बरोबर न?" गोविंदने हताश आवाजात भीमाला प्रश्न केला.

अत्यंत प्रेमाने गोविंदच्या हातावर हात ठेवत भीमा म्हणाला; "माझ्यावर विश्वास ठेवा राजकुमार. तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल."

"पण भीमा, तू तुझं काम देखील करतो आहेस. तुझ्याच म्हणण्याप्रमाणे एकदा तू तटरक्षक भिंत उभी केलीस की तुमच्यातील कोणीच ती भिंत पार करून आमच्या बाजूला येऊ शकणार नाही. असं असताना अपालाने केवळ सोहळा बघायला येऊन काय साध्य होणार आहे? त्याशिवाय कुंजर बद्दल तू काहीच बोलला नाही आहेस. त्याचं काय भीमा?" गोविंदचे प्रश्न संपत नव्हते.

"राजकुमार, मी देखील अपालाला हाच प्रश्न केला होता. तिने मला आश्वस्त केलं होतं की यावरील उपाय ती शोधून काढणार आहे. राजकुमार, अपाला आपल्या दोघांपेक्षा देखील तल्लख आहे. ती स्वतः स्त्री असल्याने भागीनेय तीक्ष्णा कशा प्रकारे विचार करत असेल याचा तिला अंदाज देखीलं असणार. त्यामुळे आपण तिच्यावर विश्वास ठेवणं योग्य होईल." भीमा म्हणाला.

***

प्रत्येक जाणाऱ्या दिवसा बरोबर गोविंदचा धीर सुटत होता. अपाला आणि कुंजर नाहीसे झाल्या दिवसापासून नाथा देखील दिसेनासा झाला होता. गोविंदला याचं वैषम्य वाटत होतं खरं पण तो त्याच्याच दुःखात इतका बुडाला होता की नाथाला शोधावं असं त्याच्या मनात आलं नाही.

हस्तांतरण सोहळ्याला केवळ एक दिवस राहिला होता. आदल्या दिवसाच्या सकाळपासूनच संपूर्ण परिसर विविध सुगंधी फुलांनी फुलून गेला होता. त्याशिवाय नगराकडून महाराजांच्या सेवेतील काही प्रमुख सोहळ्याच्या जागी येऊन स्वतःच्या देखरेखीखाली सोहळ्याची तयारी करत होते. नगरजन देखील नगरातील आपली घरं दारं बंद करून श्रीमंदिर हसतांतरणाचा सोहळा पाहण्यासाठी सोहळा स्थानी येऊन राहिले होते. संपूर्ण परिसराला उत्सवाचं स्वरून आलं होतं. एकूण परिस्थिती बघून सुमंत कल्याण यांनी सैनिक तैनात केले होते. सोहळ्याच्या ठिकाणी आलेले नगरजन आणि प्रमुख राजकुमार गोविंद यांना मुद्दाम भेटायला येत होते आणि राजकुमारांनी देखील आता नगर प्रवेश करत महाराजांचे काम कमी करावे यासंदर्भात राजकुमारांना विनंती करत होते. गोविंद जरी सगळ्यांना भेटत असला तरी तो त्याच्या विचारांमध्येच सतत राहात होता. संध्याकाळ होता होता गोविंदचा धीर सुटला. त्याने भीमाला गाठलं आणि त्याला घेऊन तो तिसऱ्या गुंफेच्या मागील टेकडीवर गेला.

"भीमा.... माझी अपाला.... माझा कुंजर..." अस्वस्थ आवाजात गोविंद म्हणाला. त्याचे डोळे भरून आले होते. त्याला बोलता देखील येत नव्हतं. त्याची परिस्थिती बघून भिमाचं मन देखील द्रवलं.

"राजकुमार तुम्ही धीर सोडलात तर अपालाने कोणाकडे बघावं?" भीमा म्हणाला.

"धीराची तर अपाला आहे भीमा. मी .... मला काहीच सुचत नाही. मला माझी अपाला आणि माझा पुत्र कुंजर हवे आहेत. त्यांच्याशिवाय मी जगूच शकत नाही भीमा. मला आता केवळ तुझाच आधार आहे." गोविंद भरल्या डोळ्यांनी म्हणाला.

"राजकुमार........." भीमा काहीतरी सांगणार होता. पण त्याला बोलू देखील न देता गोविंद म्हणाला; "भीमा... आता मी कोणतीही वाट बघायला तयार नाही. मी तुला इथे घेऊन आलो आहे याचं कारण अत्यंत स्पष्ट आहे. मला माहीत आहे की तुमच्या नगरीच्या दिशेने जाणारा मार्ग इथेच कुठेतरी आहे. तू मला तो मार्ग दाखवणार आहेस. मी त्या मार्गाने जाऊन अपाला आणि कुंजरला घेऊन येणार आहे आणि उद्याच्या सोहळ्याच्या वेळी इथून बाहेर पडण्यासाठी तू मला मदत करणार आहेस."

"मी? तुम्ही म्हणाल ती मदत करायला मी तयार आहे राजकुमार." भीमा म्हणाला.

"भीमा.... मग माझी तुला कळकळीची विनंती आहे.... तू तुझ्या तटरक्षक भिंतीमधला एक असा मार्ग... केवळ एक व्यक्ती बाहेर पडू शकेल इतकाच........ उघडा ठेव भीमा. केवळ अपाला बाहेर पडू शकेल इतका. बाकी मी बघून घेईन." गोविंदचा आवाज आता खूप वेगळा होता.

"राजकुमार आपण मला जे करायला सांगता आहात ते केवळ अशक्य आहे." भीमा एकदम म्हणाला.

गोविंद काही क्षण शांत राहिला आणि मग अत्यंत शांत आवाजात तो भीमाला म्हणाला; "जर माझी विनंती तुला मान्य नसेल भीमा तर ही माझी आज्ञा समज. आणि तरी देखील जर तू नकार देणार असलास तर तुमचं सत्य जगासमोर यावं यासाठी जे जे म्हणून करावं लागेल ते ते मी करीन. भीमा..... तुला माहीत आहे.... मी काहीही करून अपाला आणि कुंजरला मिळवणारच."

गोविंदचं ते रूप बघून भीमा एकदम गोंधळून गेला आणि गोविंदकडे एकटक बघत उभा राहिला. "राजकुमार, मी तुम्हाला मार्ग दाखवीन. परंतु अपाला आणि कुंजर या दोघांना उद्याच्या सोहळ्याच्या अगोदर घेऊन येणं तुम्हाला शक्य होईल असं मला वाटत नाही. राजकुमार आपण आपलं मन माझ्यासाठी कलुषित करू नका. मी आपल्याला सत्य तेच सांगतो आहे. तरीही... जर आपण त्यांना घेऊन आलातच तरी आपण मला जे करायला सांगत आहात ते केवळ अशक्य आहे....."

"भीमा तुला ते शक्य करावंच लागेल." मागून अपालाचा आवाज आला. भीमा आणि गोविंद दोघांनी एकाचवेळी मागे वळून बघितलं.

"अपाला तू?" भीमा म्हणाला. गोविंद अपालाच्या दिशेने धावला आणि त्याने तिला घट्ट मिठीत घेतलं. भीमा त्या दोघांकडे बघत उभा होता. इतक्यात तिथे नाथा देखील पोहोचला.

नाथाला बघून भीमा पुढे झाला आणि त्याला विचारलं; "गेले कित्येक दिवस मी तुला बघितलं नव्हतं नाथा. कुंजर आणि अपाला यांना कपटाने तीक्ष्णाने परत पाठवलं. त्यासाठी तिने बळाचा आणि केवळ तिच्याजवळ असणाऱ्या अशा खास शक्तींचा वापर केला. पण मला खात्री होती अपाला नक्की त्याची तोड शोधेल. त्याप्रमाणे अपाला परत देखील आली आहे. पण या अवघड वेळी तू राजकुमारांसोबत असणं आवश्यक होतं. मात्र तू कुठेच नव्हतास. असं का?"

"कारण मी कुंजरला घेऊन इथून दूर गेलो होतो." नाथा म्हणाला. भीमा आणि गोविंदला मोठाच धक्का बसला. परंतु अपाला शांत होती. तिने नाथाकडे बघून एक मंद स्मित केलं आणि म्हणाली; "हो! मीच कुंजरला नाथा सोबत पाठवून दिलं होतं. भीमा म्हणतो त्याप्रमाणे मी आणि गोविंद बेसावध असताना तीक्ष्णाने गोविंदला संमोहित केलं आणि मला बळाचा वापर करून आमच्या स्थानी पाठवून दिलं. पण गोविंद मनाने माझ्याशी इतका जोडला गेला होता की संमोहित अवस्थेत देखील तो मला वाचवायचा प्रयत्न करत होता. पण जसजशी मी त्याच्यापासून दूर भूगर्भाच्या दिशेने जाऊ लागले तसा आमचा संपर्क तुटूला आणि गोविंद जागा झाला. त्याला मी मनातून मारलेली हाक ऐकू आली आणि तो पूर्ण जागा झाला. असं काहीसं होईल याची मला कल्पना होती; म्हणूनच मी नाथावर लक्ष ठेऊन होते. नाथाच्या मनात भीमा आणि माझ्याबद्दल संदेह निर्माण झाला आहे; हे मला लक्षात आलं आणि मी कोणाच्याही नकळत त्याला भेटून सर्व सत्य सांगितलं. नाथाचा आजही त्या सर्वावर विश्वास नाही.... पण माझं राजकुमार गोविंद यांच्यावर खरं प्रेम आहे आणि मी त्यांच्या सोबत नगर प्रवेश करणार आहे... याची त्याला खात्री आहे. म्हणूनच तो माझ्या सांगण्यावरून कुंजरला घेऊन इथून गेला होता."

नाथाने मान खाली घातली आणि अत्यंत हळू आवाजात तो म्हणाला; "कुंजरला नेण्याचं एक महत्वाचं कारण हे देखील आहे अपाला की तू तुझ्या पुत्रप्रेमासाठी तरी नक्कीच राजकुमारांची साथ देशील." त्याचं बोलणं ऐकून भीमा, अपाला आणि गोविंद तिघेही हसले.

"मी समजू शकते नाथा." अपाला म्हणाली. त्यानंतर ती भिमाकडे वळली आणि म्हणाली; "भीमा, राजकुमार तुला जे सांगत होते तसं करणं अत्यंत आवश्यक आहे. मी इथे आले आहे ते मीच निर्माण केलेल्या एका गुप्त मार्गातून. आपलं ठरलं होतं त्याप्रमाणे मी भूतप्रमुखांना विनंती केली आणि त्यांनी ती मान्य देखील केली. पण मी आपल्या स्थानी गेल्या गेल्या मला संस्कारित करण्यात आलं आहे. त्यामुळे मी भीमाने निर्माण केलेली रक्षित भिंत पार करू शकणार नाही. केवळ म्हणूनच मी तुम्ही इथे येण्याची वाट बघत होते. भीमा, मी आत्ता देखील तुझ्या तटाच्या जवळ जाऊ शकणार नाही आहे. हो! मला तुझा तट दिसतो आहे. तुझे रक्षक देखील माझ्याकडे एका सावजाकडे बघावं तसं बघत आहेत. अर्थात त्यात त्यांचा दोष नाही. नेमकं इथे माझ्या कामाच्या संरक्षणासाठी तू जे वेगळेपण निर्माण केलं आहेस; ते माझ्या संपूर्ण विरोधात उभं आहे. भीमा त्यामुळे आता मात्र माझी सगळी आस तुझ्यावर आहे. मला खरंच माझ्या आयुष्यातलं प्रेम राजकुमार गोविंदच्या रूपाने मिळालं आहे. सर्वसाधारण मर्त्य जीवनातील उणिवा मला माहीत आहेत. मला हे देखील माहीत आहे की पुढे जाऊन कदाचित असे अनेक प्रसंग येतील की मी आता जो निर्णय घेते आहे तो चुकला असं मला वाटेल. तरीही हे सगळं मान्य करून देखील मला राजकुमार गोविंद यांच्या सोबत वृद्धत्वाचा स्वाद घ्यायचा आहे."

अपाला बोलायची थांबली आणि तिने अत्यंत प्रेमाने गोविंदचा हात हातात घेतला. भीमा काहीही न बोलता तिथून निघण्यासाठी वळला. त्याला थांबवत गोविंद म्हणाला; "भीमा.... आता सगळं तुझ्या हातात आहे."

"म्हणूनच निघतो आहे राजकुमार. मीच केलेल्या तटाला भगदाड निर्माण करावं लागणार आहे. राजकुमार तुम्हाला खरंच कळणार नाही माझं दुःख. पण अपालासाठी काहीही स्वीकारीन मी." भीमा म्हणाला आणि अपालाच्या दिशेने तो वळला. "अपाला तुला माहीत आहे मी काय करणार आहे. फक्त ती फट.... भगदाड.... कुठे असेल ते तुलाच कळू शकेल हे लक्षात ठेव. बाहेर पडताना तुझा हात राजकुमारांच्या हातात असला पाहिजे. फक्त आणि फक्त राजकुमारांच्या हातातच. कारण आजवर आपल्या सोबत असल्याने त्यांच्या भोवती देखील एक वेगळी शक्ती निर्माण झाली आहे. त्या शक्तीचा उपयोग तुला होणार आहे. बरं, आता मी निघतो. माझं ऐकणार असाल तर राजकुमार तुम्ही देखील निघा इथून. नगर जणांमध्ये जाऊन मिसळा. पण तुमच्या मनातला आनंद एकदम चेहेऱ्यावर आणू नका. आता इथे आपला शत्रू कोण आणि मित्र कोण हे समजून घेणं अवघड आहे. नाथा तू तर इथे थांबुच नकोस. कुंजर सोबत राहा. राजकुमार आणि अपाला नक्की नगर प्रवेश करणार उद्या. त्यावेळी तू त्यांचं स्वागत कर." भीमा बोलायचा थांबला आणि अपालाने आवेगाने त्याला मिठी मारली.

तिथून जाण्यासाठी निघालेल्या नाथाच्या कपाळावर परत एकदा एक आठी निर्माण झाली होती. पण भीमा, अपाला आणि गोविंद यांचं लक्ष नाथाकडे नव्हतं.

क्रमशः