Friday, October 25, 2019

तो आणि ती.... मित्रविंदा, सत्या, लक्ष्मणा, भद्रा, कालिंदी! (भाग 10)

तो आणि ती.... मित्रविंदा, सत्या, लक्ष्मणा, भद्रा, कालिंदी!


(श्रीकृषणाच्या अष्ट पत्नींपैकी मित्रविंदा, सत्या, लक्ष्मणा, भद्रा, कालिंदी या पंचम पत्नींबद्दल फार माहिती पुराणात मिळत नाही. त्यातही मित्रविंदा, सत्या, लक्ष्मणा, भद्रा यांच्याशी श्रीकृष्णाचा विवाह म्हणजे भविष्यातील महाभारतीय युद्धाच्या दृष्टीने घेतलेले निर्णय आहेत; असेच प्रतीत होते. त्यामुळे या स्त्रियांच्या मनीचे भाव शब्दात उतरवणे थोडे कठीण होते. मात्र प्रत्यक्ष नारायणाशी विवाह होणे ही घटना देखील या स्त्रियांच्या मनाला आयुष्यभर दडपून टाकणारी असावी; असे मला सतत वाटते. त्याच अनुषंगाने मी त्यांच्या मनाचा विचार करून तो मांडला आहे. श्रीकृष्णाने कालिंदीशी मात्र प्रेम/गांधर्व विवाह केला... तिला पाहताक्षणी त्याच्या मनात प्रेमभाव निर्माण झाले असा उल्लेख आहे. त्यामुळे कालिंदीच्या मनीचे भाव त्या थोडे वेगळे लिहिले आहेत.)
तो आणि ती........ मित्रविंदा!
"श्रीश्वरा, तुमच्या आयुष्याचा य:किंचित का होईना; पण एक भाग झाल्याने माझ्या आयुष्याचे सार्थक झाले. तुमच्या अस्तित्वात मी इतकी हरवून गेले की माझी मी उरलेच नाही."
"मित्रविंदे, तू माझी धर्मपत्नी आहेस. मला माहित आहे की तू माझ्यात हरवून गेली आहेस. परंतु तरीही आपले स्वत्व असे त्यागून देणे योग्य नाही."
"यदुकुलभूषणा, मी तुम्हाला कधीतरी समजू शकेन का? सत्यभामाताई ज्यावेळी त्यांच्या क्षत्राणी तेजाने बोलतात किंवा हट्ट करतात त्या प्रत्येक वेळी तुम्ही त्यांना प्रेमळ रुक्मिणीताईंचे उदाहरण देता आणि सांगता की एकरूप होणे हेच पूर्णत्व आहे. मग हे देवेश्वरा, आज मी एकरूपतेबद्दल सास्न्ग्ताच तुम्ही मला हे असे का सांगता आहात?"
"प्रिये, तू देखील एक क्षत्राणी यादव कन्या आहेस. आत्या राजधिदेवी आणि अवंती नरेश जयसेन यांची सुपुत्री आहेस. जरी मी तुला तुझ्या स्वयंवरातून हरण करून आणले असले तरी देखील मी हे मनोमन जाणून आहे की त्यावेळेपासूनच  तुझ्या मनात माझ्याप्रती प्रेमभाव होते. खरे तर त्यावेळी मी नरकासुरावर चाल करून जाण्यासाठी सत्यभामेला घेऊन निघालो होतो. मात्र तुझ्या स्वयंवराच्या बातमीने मन विचलित झाले आणि नकळतच तुझ्याकडे ओढले गेले.... मित्रे.... प्रिये.... तुला तुझ्या क्षात्र तेजाची जाणीव आहे परंतु त्याचा गर्व नाही; हे एक कारण आहे की मी तुझ्यामध्ये गुंतलो गेलो. मात्र हे क्षत्राणी तेज हा तुझा मान आहे; त्या आंतरतेजाला विसरू नकोस. तू म्हणतेस ते खरेच; मी सत्यभामेला जरूर म्हणतो की एकरूप होणे हेच पूर्णत्व आहे. मात्र त्यावेळी हे लक्षात ठेवले पाहिजे की  सर्वस्वाने विलीन होण्यापेक्षा सर्वार्थाने विलीन होणे महत्वाचे."
"मी समजले नाही.........."
"मित्रविदे, प्रिये............. प्रेम आणि भक्ति यांचे जेव्हा मिलन होते आणि स्वत्वावर विश्वास असूनही त्याचा मोह उरत नाही त्याला सर्वार्थाने विलीन होणे म्हणतात.............. तू क्षत्राणी तेजाचा अभिमान न करता त्याचा मान राखूनही माझ्या आयुष्याला आपलेसे केले आहेस; हे निस्सीम प्रेमाचे प्रतिक आहे आणि ते तसेच मी मनापासून स्वीकारले आहे. त्यामुळे तू आहेस तशीच राहा! केवळ मी सत्यभामेला एकरूपतेबद्दल काही सांगितले म्हणून तू तुझ्या भावनांचा शोध घेण्याचा प्रयत्न करू नकोस. प्रत्येकाने आपल्या स्वभावारूप राहावे; हेच अंतिम सत्य आहे. प्रिये, तू जशी आहेस तशीच मला प्रिय आहेस! येतो मी!"


----------------------------------------


तो आणि ती........ सत्या!


"द्वारकाधीशा, तुमच्या पत्नीपदाचे स्थान प्राप्त करून मी समाधानी आहे. मला राज्ञीपद नसले तरी चालेल. श्रीश्वरा, जन्मापासूनच मी आपल्या दिंगत कीर्तीवर मोहित झाले होते. ज्यावेळी माझ्या पिताश्रींनी माझे स्वयंवर मांडले त्याचवेळी माझ्या मनात आले की केवळ तुम्हीच मला जिंकावेत म्हणून सात वृशभांना वेसण घालून वृशभरथाला जोडण्याचा पण माझ्या पिताश्रींनी ठेवला आहे. मात्र स्वयंवराचे आमंत्रण करताना आपला अपमान केला गेला हे कानावर आल्यावरआपण या आमंत्रणाचा स्वीकार कराल की नाही याविषयी माझे मन शाशंक झाले होते. मात्र आपण केवळ आमंत्रणाचा स्वीकार केलात असे नाही तर; लाहानपणीच्या गोकुळातल्या आठवणी जागवत त्या वृशभांना काबूत आणून रथनिडाला जुंपलेत आणि मी सर्व कोसलनगरवासीयांच्या समोर कायमची आपली झाले. तरीही का कोण जाणे माझ्या मनात राहून राहून एकच विचार येतो की माझे अस्तित्व तुम्हाला जाणवत असेल का?"
"सत्या, आपण आता द्वारकेच्या राज्ञी आहात. माझ्या प्रिय पत्नी आहात. कायम थंड असणाऱ्या हिमवानाच्या पायथ्याच्या कोसल राज्याच्या कन्या असूनही आपण सागरकिनारी वसलेल्या या द्वारकेला आपलसं केलत... यातच आपल्या मनातील भाव माझ्यापर्यंत पोहोचले आहेत; हे वेगळे सांगायला हवे का? एकात्मता ही केवळ शब्दात व्यक्त होत नसते प्रिये........ आपल्या त्यागातून देखील ती आपल्या भावमूर्तिकडे पोहोचत असते. तुझ्या कौसल देशातील हिमाच्छादित थंड प्रदेश तू केवळ माझ्या प्रेमाखातर सोडलास आणि तुझ्या निरामय अस्तित्वाचा भाग मी माझ्यात सामावून घेतला."
"मोहेश्वरा! याहून जास्त मोठी पोचपावती ती काय असू शकते? माझ्या आयुष्याची सांगता आता केवळ आपल्या चरणीच असू दे इतकीतच या श्रीचरणी इच्छा!"
"शुभमsभवतु!"


-------------------------------------------


तो आणि ती............... लक्ष्मणा आणि भद्रा!


"लक्ष्मणे... प्रिये.... तुझ्या स्वयंवराचा पण द्रौपदी स्वयंवराप्रमाणे मत्स्य नेत्र भेदाचा ठेवण्याचा मानस तुझ्या पूज्य पिताश्रींनी.... मद्र नरेश बृत्सेन महाराजांनी... का ठेवला हे एक कोडंच आहे. जलातील प्रतिबिंबाचा वेध घेऊन छतातील मत्स्याचा नेत्रभेद! तोवर संपूर्ण भारतवर्षाला हे समजले होते की हा पण केवळ धनुर्धर अर्जुन पूर्ण करू शकतो. कारण नुकतेच द्रौपदी स्वयंवरात हा पण जिंकून अर्जुनाने हे सिद्ध केलेच होते. तरीही हा पण ठेवून तुझ्या वडिलांनी सर्व योद्ध्यांना स्वयंवरासाठी आमंत्रित केले... त्यात द्वारकेला देखील आमंत्रण पोहोचले. या आमंत्रणाचा मान राखून मी या स्वयंवरामध्ये उतरलो आणि तो पण जिंकलो देखील. राज्ञी, मात्र या स्वयंवरातील पण जिंकण्याचा उद्देश...."
"महाराज, काही गोष्टी न सांगता देखील स्त्रीमनाला जाणवतात. तुम्ही न सांगता देखील मला तुमच्या मनीचा उद्देश माहित आहे. आपल्या कृष्णनितीचा अचूक फासा आपण हा पण जिंकून टाकलात. पांचाल देशाप्रमाणे मद्र देशीच्या लढाऊ योध्यांचा विचार करूनच आपण हा पण जिंकलात ना?"
"....................... लक्ष्मणे........... असे क्षण माझ्या आयुष्यात क्वचित आले आहेत की ज्यावेळी मी शब्दातित होऊन जातो. प्रिये, तू म्हणते आहेस ते जरी सत्य असले तरी माझ्या मनातील तुझ्याबद्दलचे प्रिती भाव अगदीच खरे आहेत; हे तू जाणून आहेस ना?"
"देवेश्वरा, केवळ मीच नाही तर माझ्यानंतर माझ्याच पावलांवर पाउल ठेऊन द्वारका नगरीमध्ये आपली सप्तम पत्नी म्हणून आलेली भद्रा देखील हे जाणून आहे. केकेय राज धृष्टकेतु आणि आपली आत्या श्रुताकीर्ती देवी यांच्या कन्येशी.... भद्रेशी... आपण विवाह केलात तो केवळ आपल्या आत्येची इच्छा पूर्ण करण्यासाठी नसून भविष्यात जर युद्ध स्थितीला सामोरे जावे लागले तर त्यावेळी मद्र योध्यांप्रमाणे पंचनादातील योद्धा बळ देखील आपल्या पाठीशी उभे राहावे हा उद्देश देखील होताच."
"प्रिये...... तू आणि भद्रा दोघीही मला तितक्याच प्रिय आहात........."
"परमेश्वरा, आम्हाला आपल्या पत्नीपदाचे स्थान मिळाले........ त्याला कारण काहीही असुदे! आमचे अस्तित्व कदाचित पुढील आयुष्यात फार चर्चिले जाणार नाही. मात्र त्याची चिंता आम्ही का करावी? लाभलेला स्वर्गतुल्य मान शिरोधार्य मानून आम्ही मानाने आणि स्वतंत्र मनाने रुक्मिणीताईंच्या प्रेमछायेत सुखात नांदतो आहोत.... हे देवकीनंदना.......... मी आपल्याला आश्वस्त करते की याहून जास्त मला किंवा आपल्या सप्तम पत्नीला भद्रेला काहीच नको!"


-------------------------------------


तो आणि ती........... कालिंदी!


"मनमोहना........... आपल्यापर्यंत माझी तापसी हाक पोहोचेल याची अलीकडे मी आशाच सोडली होती."
"कालिंदी........ तुझ्यासारखी केतकी कांतीची, सुडौल रुपसुंदरी अशाप्रकारचे तापस व्रत करू शकते हे पाहून मला पार्वतीने त्या भोळ्या शंभोसाठी केलेल्या तपश्चर्येची आठवण झाली. आज यामुनाजलातील तुझ्या ओलेत्या मोहक मात्र तापसी तेजाने झळाळून गेलेल्या चर्येला पाहून मी देहभान हरपून गेलो आहे. तुझ्या म्हणण्याप्रमाणे तू माझी वाट पाहाते आहेस........ मात्र तुला पाहातच माझ्या मनाने मला ग्वाही दिली आहे की आज जर तू माझा स्वीकार तुझा पती म्हणून केलास तर प्रेमतपस्येचे सार्थ महत्व सिध्द होईल."
"प्रभू.............. माझ्याशी गांधर्व विवाह करून माझ्या आयुष्याला अर्थप्राप्ती करून द्यावीत ही विनंती."
-----------------------------------

Friday, October 18, 2019

तो आणि ती.... (भाग ८) आणि (भाग ९)

तो आणि ती........... सत्यभामा!

"महाराज, मी तुमची तृतीय पत्नी असून देखील तुम्ही मला मानाचे स्थान कायम दिलेत... माझे हट्ट पुरवलेत... पण तरीही माझ्या मनी एक प्रश्न कायम तसाच राहिला."

"सत्यभामे, प्रिये.... तुला प्रश्न तरी किती पडतात? तू एका शूर ज्येष्ठ यादवांची सुकन्या आहेस. त्यामुळे तू देखील युद्धकुशल शूर वीरांगना आहेस... तेवढीच तू कोमल तनु-सुंदर स्त्री देखील आहेस. माझ्या मनात कायम हा प्रश्न राहिला आहे की तुझ्या पिताश्रींच्या तिजोरीतील तो स्यमंतक जास्त तेजस्वी की तुझे हे मुखमंडल.... तू का हे जाणून नाही की तुझ्या प्रत्येक हट्टामध्ये माझीच इच्छा सुप्तपणे अंतर्भूत असायची."

"हो ना वीरेश्वरा? मी रुक्मिणीताईना हेच तर कायम सांगत आले. आपण जी इच्छा बोलून दोखवतो ती खरे तर तुमच्या मनातील भाव असतात. पण मी असे म्हंटले की त्या केवळ मंद हसतात.................. पहा पहा.......... अगदी असंच.... तुम्ही जसे गालात हसता आहात तसं...... कारण विचारलं की म्हणतात, भामे मी नाही ग हसत; तुला भास झाला असेल. सांगाना हो प्राणेश्वरा, त्या असं मंद गूढ का हसतात?"

"द्वारका नगरीच्या तृतीय का होईना माहाराणी आहात आपण.... आणि असल्या शुल्लक हास्याचा विचार करता? नका विचार करू रुक्मिणीच्या हास्याचा."

"महाराणी................ हम्म.............. जाऊ दे झालं! मात्र मला माझ्या प्रश्नाच उत्तर हवंच आहे आज."

"महाराणी.... पहा बर.... मग मन दुखाल्याची तक्रार नाही एकून घेणार मी..... तर रुक्मिणी गूढ का हसते! भामे, रुक्मिणीने आयुष्यभर फक्त माझाच विचार केला. ती माझी प्रथम पत्नी... आपल्या बंधूच्या आणि पर्यायाने रक्ताच्या सर्व नात्यांना कायमचे त्यजून तिने माझ्या मनात वरमाला घातली. एकमेकांना न पाहाता देखील आत्ममिलन होऊ शकते; हे रुक्मिणीने दाखवून दिले..."

"माझ्या मनातील प्रश्नाचे उत्तर न देता जर आपणाला ताईंच्या आपल्यावरच्या प्रेमाचे कौतुक करायचे असेल तर राहुदेमुळी हा संवाद."

"अग भामे... अशी लगेच का चिडतेस? तुझ्या प्रश्नाच्या उत्तराचा कार्यकारण भाव नको का तुला कळायला."

"राहिलं! आपण बोलावत.... मी प्रश्न करून फसले आहे ना? आता मला एकून घावे लागेल."

"प्रिये...... तुझ्या पिताश्रींकडील स्यमंतक मणीरत्न हरवण्याच्या अगोदर त्याची मागणी मी द्वारकेच्या भरभराटीसाठी केली होती हे तर तू जाणतेसच. मात्र त्यामुळेच ते मणीरत्न हरवताच ते मी घेतले असेल असे सत्रजितकाकांच्या............ तुझ्या पिताश्रींच्या............ मनात आले. स्यमंतक मणीरत्न मिळवून आणिन हा त्यांना दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी मी द्वारका सोडली आणि या मणीरत्नासोबत जांबवतीला घेऊन मी द्वारकेत परतलो. त्या मणीरत्नाच्या शोधाचे फळ म्हणून तर तू मला मिळालीस. मात्र तुझ्यातील तडफदार स्त्रीमुद्रा कधीच कमी झाली नाही.... अर्थात ती होऊ देखील नये. तुझ्यात असलेल्या क्षत्राणीतेज असलेल्या ... शूर.... युद्धकुशल स्त्रीने स्वत्व कधीच त्यजले नाही. म्हणूनच हट्टाने मनीच्या इच्छा पूर्ण करून घेणे तुला कायम जमले. मात्र प्रिये...... रुक्मीणीच्या मनी इच्छा कधी उपजालीच नाही.... ती कर्म... आणि कर्त्यव्य केवळ प्रेम भावनेने करत गेली. त्यामुळे तू ज्यावेळी तिला म्हणतेस की तुझा हट्ट ही माझ्या मनीची इच्छा आहे.... त्यावेळी रुक्मिणी मंद हसून तुला सांगते की पतीमानाची इच्छा ही मन:स्पर्शाने समजून घ्यावी. त्यासाठी शब्दछल करण्याची गरज नाही......"

......................................................................................

तो आणि ती......... जांबवती!

"जांबवती, प्रिये...... मला आज तुला काहीतरी सांगायचे आहे. केवळ त्यासाठीच आज मी तुझ्या प्रासादात थांबणार आहे असा निरोप धाडला होता. परंतु तुझ्या चेहेरा मात्र मला दुसरेच काही सांगत आहे."
"यादवश्रेष्ठ, तुमच्या पासून कधी काही लपून राहिले आहे का? आज मला देखील मनमोकळेपणी तुमच्याशी बोलायचे आहे. यदुकुल भूषणा, आज इतकी वर्षे मी तुमची द्वितीय पत्नी म्हणून या प्रासादात राहात आहे.... तुमच्या सुपुत्राची माता आणि वसुदेव बाबा आणि देवकी आईंची सून म्हणून मिरवते आहे. तसे बघितले तर मला काहीच कमी नाही. परंतु तरीही मला माझ्या मनीचे गूज तुम्हाला सांगण्याची इच्छा गेले अनेक दिवस होते आहे..... तुमच्या सारख्या मनकवड्या देवेश्वरापासून हे कसे लपून राहील? त्यामुळे माझी खात्री आहे की म्हणूनच आज तुम्ही माझ्या प्रासादात थांबण्याचे ठरवले आहे. देवकीनंदना, तुमची आणि माझी गाठ बांधली गेली ते केवळ आणि केवळ त्या अनमोल स्यमंतक मणीरत्नामुळे; याची मला पूर्ण जाणीव आहे. स्यमंतक मणीरत्न बाळगणाऱ्या सत्रजीत महाराजांच्या बंधूंच्या; प्रसेन महाराजांच्या मृत शरीराच्या गळ्यातून ते मणीरत्न माझ्या वडिलांनी; जांबवान बाबांनी आपल्या बरोबर आणला. परंतु हे वसुदेव पुत्रा, तुम्ही चांगलेच जाणता की त्यांनी त्या मणीरत्नाच्या मोहामुळे असे काही केले नव्हते. श्रीदेवा, तुम्हाला सर्व यादवांना जाणवून द्यायचे होते की कोणतेही मणीरत्न सुदिन आणत नाही जोपर्यंत त्यामागील भावना स्वच्छ आणि प्रामाणिक नसते. त्यासाठी तुम्ही नामानिराळे राहात सर्व लीला केली होती; याची चर्चा संपूर्ण द्वारका नगरीमध्ये त्यावेळी झाली होती. त्याचप्रमाणे तुम्ही या मानिरत्नासाठी माझ्या बाबांशी मल्लयुद्ध देखील केलेत. त्या युद्धात हरल्यानंतर बाबांनी त्या स्यमंतक रत्नासोबत मला देखील तुमच्याकडे सुपूर्द केले."

"प्रिये, तुझ्या मनातील भाव बोलण्याचे सोडून तू हे काय सांगते आहेस मला?"

"द्वारकाधीशा, माझ्या मनातले भाव तुम्ही जाणताच. तरीदेखील मनीची इच्छा व्यक्त करताना त्यामागील कार्यकारण भाव देखील तुम्हाला मी स्वमुखे वदित करावा असे वाटले; म्हणून हे सर्व सांगते आहे."

"बोल जांबवती, काय आहे तुझी इच्छा?"

"देवेश्वरा, तुम्ही ज्याप्रमाणे स्यमंतकापेक्षा शुद्ध भावना महत्वाची हे सांगण्यासाठी ती घटना घडवून आणलीत त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या मागील अवतारकार्य आयुष्यात माझ्या वडिलांना दिलेल्या वचन पूर्ततेसाठी देखील ती घटना घडवून आणली होतीत; हे मी जाणून आहे. रावण वधानंतर माझ्या वडिलांनी तुमचा निरोप घेताना तुम्हाला विचारले होते की त्यांना तुमच्या त्या निरामय श्रीराम रूपाचे दर्शन परत कधी होईल. त्यावेळी तुम्ही त्यांना वचन दिले होते की पुढील अवतार आयुष्यात तुम्ही त्यांना परत भेटून दर्शन द्याल.... आणि त्याप्रमाणे माझ्या बाबांना दिव्य श्रीराम दर्शन झाले....."

"जांबवती, तू बुद्धिमान खरीच..... मात्र तुझी इच्छा तू मला सांगते आहेस हे विसरू नकोस. इच्छा व्यक्त करण आणि काहीतरी मागण यात फरक असतो बर..... "

"मग माझे शब्दच खुंटले! विश्वेश्वरा............ माझ्या जन्मोजन्मीच्या पुण्याचे फळ म्हणूनच या जन्मी श्रीकृष्ण पत्नीचे स्थान मला मिळाले. तरीही..... बहुदा मानवाच्या मनाला शापच आहे की कितीही मिळाले तरी इच्छा संपत नाही आणि मी एक मानवी ह्रृदय असलेली सामान्य स्त्रीच आहे. त्यामुळे मी माझी इच्छा या श्रीचरणी ठेवते. मोहेश्वरा.... माझ्या बाबांना ज्याप्रमाणे श्रीरामांचे दर्शन झाले त्याप्रमाणे मला देखील व्हावे................... "

"देवी, आपल्या सुकार्मांचे फळ आपल्याला जरूर मिळते. मात्र आपण ते प्रसादरुपी फळ शिरोधार्य समजावे. तुझ्या पिताजींच्या पुण्यकर्माचे फळ म्हणूनच तू म्हणतेस त्याप्रमाणे श्रीराम दर्शन त्यांना झाले; तसेच तूच म्हंटल्याप्रमाणे तुझ्या पुण्यकर्माचे फळ म्हणून तू महाराणी झाली आहेस............. अजून काय सांगू? बर, ते जाऊ दे... चल; आज सारीपाटाचा एक डाव तुझ्यासोबत खेळण्याची माझी इच्छा आज तू पूर्ण कर. प्रश्न इच्छापूर्तीचा आहे ना? मग तुझी इच्छापूर्ती आणि माझी इच्छापूर्ती यात फरक तो काय?"
....................................................................

Friday, October 11, 2019

 तो आणि ती ....... द्रौपदी (भाग 7)



 तो आणि ती ....... द्रौपदी! (भााा 7)गग

"कृष्णे, तुझ्या बोलावण्यावरून मी आलो. पांडवांच्या विजयामुळे संपूर्ण आर्यवर्त दुष्ट, दुर्जन राजापासून मुक्त झालय. चर्चा मात्र हीच होणार की महाभारताचे युद्ध केवळ द्रौपदीच्या अपमानाच्या बदल्यासाठी झालं. याद्न्सेनी, तुझ्या रूपापेक्षा तुझी कुशाग्र बुद्धी मला कायम मोहवून गेली. पांचाली म्हणून जगताना देखील तू तुझं स्वत्व कधीच सोडलं नाहीस. म्हणूनच पांडवांच्या संदर्भातील प्रत्येक निर्णयात मला तुझा सहभाग हवा असायचा. तुझ्या वेगळेपणामुळे तू माझी सखी झालीस."

"यादवा...तू माझ्याबद्दल जे सांगितलस ते खरं असलं तरी यासर्वापलिकडे मी मातादेखील आहे! माझे पुत्र माझ हृदय होते.
तू जरी जगद्नियंता असलास तरीही तू माता नाहीस. यदुकुलभूषणा, प्रत्येक अपत्य जन्माच्या वेळी मातेचा अनेकार्थाने पुन्हा जन्म होत असतो. स्रीहृदयातील पुत्रशोक तुला कसा कळावा? कृष्णा, युद्ध संपल्यानंतर माझ्या पाची पुत्रांना झोपेत कपटाने मारण्यात आलं रे...."

"सखे, त्या कृत्याची शिक्षा अश्वथाम्याला.............."

"कृष्णा....नंतर काय झालं याचा हिशोब कशाला? पुढच्या पिढीच्या आदर्शासाठी, न्याय-अन्याय, नीति-अनीती यातील फरक कळावा म्हणून मी किती सहन करायचं? माधवा...माझा जन्मचमुळी सूडासाठी! माझ्या अस्तित्वाला पाचजणात वाटून माझ्या व्यक्तित्वाचा अपमान झाला, भर दरबारात माझ्या स्त्रीत्वाचा अपमान झाला, महाभारताचे युद्ध देखील माझ्यामुळे-माझ्यासाठी झाले. मी मात्र आयुष्याचा प्रत्येक क्षण कर्त्यव्यपूर्तीसाठी जगले. यादवा, जन्मापासून आजवर माझ्या आयुष्यातला प्रत्येक प्रसंग ही तुझीच करणी आहे! महाभारताचा करविता तूच आहेस! तूच तर जग्त्नियंता आहेस!
केशवा....आज मात्र मी तुझ्याकडे जे मागणार आहे ते आपल्या शब्दापलीकडच्या नात्याला साक्ष ठेवून."

"कृष्णे....मी तुझ्यासारख्या सम्राज्ञीला काय देणार?"

"मोहना.......शब्दछल नको. थकले आता. सम्राज्ञीपद-राज्ञीपद काही नको मला. बस् एकच मागणं आहे. यापुढे मला कोणाचाही मृत्यू बघण्याची वेळ न येवो. नाहीतर तू माझी जी कणखर मनाच्या स्त्रीची प्रतिमा पुढील पिढीसाठी उभी केली आहेस ती ढासळून जाईल. माझ्यातील दुःखी, हताश आणि कमजोर स्त्रीच केवळ भारतवर्षाला लक्षात राहील. म्हणूनच हे मधुसूदना...मला एक वरदान दे...यापुढे मला कोणाचाही मृत्यू बघायची वेळ न येवो. कृष्णा तुझ्या कृष्णेच शेवटच....स्वतःसाठी मागितलेल दान तिच्या पदरात टाक. सखया...यापुढे माझा मृत्यु सर्वात अगोदर होईल इतकंच माझं मागण पूर्ण कर!"

"तथास्तु कृष्णे! तथाsअस्तू!!!"


Friday, October 4, 2019

तो आणि ती.... (भाग५ आणि भाग ६)



तो आणि ती...................... सुभद्रा! (भाग ५)


"दादा रे....................... गेला माझा लाडका पुत्र.... तुझा लाडका भाचा आज मृत्युमुखी पडला रे. माझ्या तेजस्वी पुत्राचा अभिमन्यूचा मृत्यू चक्रव्यूहात अडकल्याने नाही झाला दादा.... तो अभेद्य चक्रव्यूह भेदत असताना त्याच्या संरक्षणासाठी त्याचे पिता त्याच्या सोबत नव्हते.............. आणि त्याहूनही महात्वाचे म्हणजे त्याचा मामा नव्हता........ तू नव्हतास दादा.......... म्हणून त्याचा मृत्यू झाला..... माझ्या कोवळ्या पुत्राचा मृत्यू मी कसा सहन करू? दादा तू तर जग्त्तत्राता आहेस ना? मग मला माझा पुत्र आणून दे.... पुन्हा आयुष्यात मी तुझ्याकडे काहीच मागणार नाही रे....... पण मला माझा पुत्र हवा आहे."


"सुभद्रे........... सावर स्वतःला. तुझ्या पुत्राला वीर मरण आलं आहे. अभिमन्यूने एकट्याने कौरव सेनेला त्राही त्राही करून सोडले. तो तर पितामह भीष्म, गुरु द्रोणाचार्य यांच्याच्याने देखील आवरत नव्हता....."


"नको........ नको करूस त्या युद्धाचे वर्णन मधुसूदना. हाय माझ्यासारखी करंटी मीच असेन या भूतलावर. ज्याच्यावर जीवापाड प्रेम केल त्याच्याशी विवाह देखील पळून जाऊन करावा लागला. द्रौपदी ताईने मला स्वीकारले ते देखील तुझ्या प्रेम नितीमुळे हे का मला माहित नाही? तिला भेटताच पदस्पर्श करून 'तुमच्या सख्याच्या धाकट्या बहिणीचा प्रणाम स्वीकार करावात ताई;' असे मी म्हणावे हे तूच तर मला देवळात जाताना सांगितले होतेस. त्यावर काही प्रश्न विचारण्याच्या अगोदरच मला तुझ्या लाडक्या अर्जुनाने रथात घेतले. त्यांच्या विषयीचे प्रेम देखील तूच माझ्या मनात जागवले होतेस.......... सतत त्यांच्या पराक्रमाच्या कथा सांगून."


"भद्रे......... तू माझी लाडकी धाकटी बहिण आहेस. मी तुझ वाईट व्हावं अशी कामना करेन का?"


"नाही रे दादा..... माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. मात्र माझ्या आयुष्याचा तीर माझ्याच वर्मी येऊन बसला आहे त्याला काय करू? मी गर्भवती होते त्याचवेळी पांडवांसमवेत द्रौपदी ताईना वनवासात जावे लागले. इच्छा असूनही मी माझ्या प्राणप्रिय पती समवेत राहू शकले नाही. त्याकाळात मी दु:खी राहू नये म्हणून तू कायम माझी सोबत करायचास. अनेक युद्ध कथा अनेक युद्ध रहस्ये सांगून तू माझं मन वीररसाने भारलेले राहील याची काळजी घ्यायचास हे का मला माहित नाही. माझ्या गर्भारपणीच सातव्या महिन्यात तू मला चक्रव्यूह भेदाचे रहस्य सांगितले होतेस; हे मला अजूनही आठवते. मात्र त्यातून बाहेर पडण्याचे रहस्य मात्र तू हेतुपुरस्सर मला सांगायला विसरलास आणि तुझी करणी लक्षात न आलेली मी........ तू जितके सांगितलेस तितकेच मनात घोळवत राहिले. मात्र त्या अपराधाचे फळ हे असे असेल याची मला त्यावेळी किंचित देखील शंका आली नव्हती."


"लाडके...... भद्रे........... आवर हे दु:ख. जन्माला येणारा प्रत्येक जीव एक जीवितकार्य घेऊन आलेला असतो. तुझा तेजस्वी पुत्र अभिमन्यू देखील केवळ चक्रव्यूह भेदण्यासाठी जन्माला होता........"


"दादा.............. काय बोलतो आहेस हे? माझ्या पुत्राचा मृत्यू तुला माहित होता? हाय रे माझ्या नशिबा!!! माझा जाग्त्नीयन्ता बंधूच जर माझ्या पुत्राच्या दीर्घायुष्याची कामना करत नव्हता तर माझ्यासारख्या य्कंचित स्त्रीच्या इच्छेचा प्रश्नच उद्भवत नाही. जा दादा जा............ याहून जास्त मला तुझ्याशी काहीच बोलायचे नाही. मात्र मला एका प्रश्नांचे उत्तर देऊन जा.... त्या नवयौवना...... नववधू.......... गर्भवती उत्तरेला मी कसे तोंड दाखवू? दादा........ तिच्या गर्भातील बाळाच्या आयुष्याची दोरी देखील तू अशीच लहान ठेवली आहेस का रे?"


"सुभद्रे.......... तू अतीव दु:खात आहेस त्यामुळे तू काय बोलते आहेस ते तुला समजत नाही आहे. अर्थात तुझे दु:ख मी समजू शकतो. तुझे सात्वन करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाही आहेत भद्रे. कदाचित् तुझ्या दु:खासोबत तुला एकटे सोडणे हाच एक उपाय आहे याक्षणी. मात्र जाताना शब्द देतो धाकटे......... उत्तरेचा पुत्रच पुढे जाऊन पांडवांचे राज्य सांभाळेल. तो महान पराक्रमी आणि अजिंक्य राजा असेल.......... येतो मी!'


-----------------------------------------------------------------------------------------




तो आणि ती ........ कुंती! (भाग ६)

"श्रीकृष्णा, तू जरी माझा भाचा असलास तरीही माझ्या आयुष्यातील तुझं स्थान वेगळ्या भावनेने व्यापलेलं आहे. तुझं असणं माझ्या पाचही मुलांच्या आयुष्याचं संरक्षण कवच; हे मी कधीही विसरणार नाही. केवळ त्यांच्याच बाबतीत नाही तर तू मला देखील अनेकदा धर्म संकटातून वाचवलं आहेस. द्रौपदीला घेऊन अर्जुन दारात उभा राहिला होता; तो प्रसंग तर मी आयुष्यात विसरणार नाही."

"आते, मी द्रौपदीला समजावलं हे खरं असलं आणि त्यासाठी तू मला कितीही महत्व दिलंस तरीही तुझ्या मनातील सत्य मी का जाणत नाही? द्रौपदीच्या अनन्यसाधारण सौंदर्यामुळे तुझ्या पाचही पुत्रांमध्ये फूट पडू नये म्हणून त्याक्षणी तू घेतलेला तो निर्णय योग्यच होता. त्यामुळे तू घेतलेल्या निर्णयाला शास्त्राधार देणं हे माझं कर्तव्यच होतं."

"मुकुंदा! हस्तिनापूराच्या महासभेत तू खांडववनाचा हिस्सा मान्य केलास त्यावेळी माझा तुझ्या त्याच शास्त्राधारावर गाढ विश्वास होता. त्यानंतरची द्यूतक्रीडा तू थांबवू शकला असतास. हे अनेकदा माझ्या मनात आलं; मात्र ज्याप्रमाणे द्रौपदी पांडवांची पत्नी व्हावी हे विधिलिखित तू ओळखलं होतंस; त्याचप्रमाणे द्युतक्रीडा आणि पांडवांचा बारा वर्षांचा वनवास आणि एक वर्षाचा अज्ञातवास देखील विधिलिखित असावं याची मला कल्पना होती. मात्र द्रौपदीने त्यांच्याबरोबर हा वनवास भोगू नये असं मला त्यावेळी खूप वाटत होतं."

"आते, तिचं पांडवांबरोबर असणं आवश्यक होतं ग. नाहीतर माझ्या प्राणप्रिय सखीला मी असं रानावनात जाऊ दिलं असतं का?"

"खरंय तुझं मधुसूदना! त्या तेरा वर्षानंतरची तुझी कौरवसभेतील शिष्ठाई आणि त्यानंतरचं युद्ध...."

"आते, आज तुझे पुत्र जेते आहेत आणि धर्मप्रस्थापना झाली आहे. मग हे असं भूतकाळातील घटनांबद्दल तू का बोलते आहेस? तुझे पाच पुत्र माझे कोणीच नसल्यासारखे का बोलते आहेस? तुला का माहित नाही....."

"थांब श्रीकृष्णा! आज मी तुला भूतकाळाबद्दल बोलण्यासाठी पाचारण नाही करवलं. आज आयुष्याच्या संध्याकाळी.... विविध चढ-उतारांच्या अनुभवातून गेल्यानंतर माझ्या मनात आयुष्याबद्दल कोणतीच शंका नाही. मात्र हे जग्दनियंत्या, मनात एक किंतु आहे; त्याचे निरसन झाले नाही तर मृत्यूसमयी  मला शांती मिळणार नाही."

"आते, काय बोलते आहेस? तू ज्यावेळी अल्लड पृथा होतीस त्यावेळी देखील कदाचित् मनात किंतु आणला नसशील. मात्र आता सर्वच उत्तम झालं असताना तुझ्या मनात किंतु यावा हे माझ्या आकलना बाहेरचं आहे."

"मोहना, तुझ्या आकलना बाहेर चराचरातील बिंदू देखील नाही. तरीही.... तुला माझ्या मुखातूनच ऐकायचे आहे आणि मला देखील तुला स्पष्ट विचारायचे आहे. मिलिंदा.... अनेक दिवसांच्या प्रयत्नाअंति आज मी धाडस एकटवलं आहे; बोलुदे मला!"

"जशी तुझी इच्छा..... तुझ्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देण्यास मी बांधील आहे."

"हे श्रीकृष्णा, कुरुक्षेत्रावरील युद्ध नक्की होणार हे ठरल्यानंतर केवळ तुझ्या सांगण्यावरून मी माझ्या सर्वात मोठ्या पुत्राकडे गेले होते...."

"ती काळाची गरज होती आते...."

"मान्य मधुसूदना.... त्याबद्दल माझी काहीच तक्रार नाही. नकळत्या वयात असली तरी चूक ती चूकच हे मी मान्य करते. माझा प्रश्न निराळा आहे. कर्ण माझा पुत्र आहे; पांडवांचा ज्येष्ठ बंधू आहे हे समजताच माझ्या पुत्राने युधिष्ठिराने मला उद्देशून समस्त स्त्रीजातीला शाप दिला.... 'यापुढे आम्ही कोणतेही गुपित उदरात सामावून ठेऊ शकणार नाही!' जग्दउद्धारा, कर्णाच्या जन्माचे सत्य मी इतर पाचांना सांगू नये; हे तूच मला सांगितले होतेस. मग ज्यावेळी माझाच पुत्र मला उद्देशून मात्र समस्त स्रीजातीला शापित होता त्यावेळी तू मध्ये का नाही पडलास? त्या घटनेने मी शब्दातीत झाले होते. परंतु संपूर्ण सत्य माहीत असणारा; किंबहुना ते घडविणारा तू समोर असूनही त्यावेळी तो शाप तू थांबवला नाहीस.... का?"

"कुंतीआते, युधिष्ठिराच्या शापामुळे स्रीजातीला गुपित सांभाळता येणार नाही; असे खरच तुला वाटते का? पुरुष कायमच सर्व गुपिते स्वतःजवळ ठेवतात आणि ठेवतील; यावर तुझा पूर्ण विश्वास आहे का?"

"श्रीविश्वेश्वरा, प्रश्नाचे उत्तर प्रश्नाने नको देऊस. आता कोडी सोडविण्याचे बळ माझ्या अंगात राहिलेले नाही."

"बरं! आते, केवळ तुला म्हणून सांगतो.... सत्य समजल्या नंतर धर्माधारावर चालणाऱ्या युधिष्ठिराचे मन त्याला खाऊ लागले. नकळत का होईना आपल्याकडून आपल्या ज्येष्ठ बंधुवर अन्याय झाला आहे; आणि त्याबदल्यात कर्णाने मात्र सर्वस्व जाणून अर्जुनाचे प्राण आपल्या झोळीत टाकले आहेत; हे सत्य त्याचे मन जाळू लागले. त्या आंतराग्नीच्या ज्वाला युधिष्ठिराला सहन होईनात. त्यामुळे केवळ मन:शांति प्राप्तीसाठी त्याने तो शाप उच्चारला होता."

"जर हे सत्य असेल...."

"अहं! आते, मी तुझ्या प्रश्नांचे उत्तर देण्यास बांधील आहे; हे जितके सत्य आहे... तितकेच सत्य हे देखील आहे की जगद् चक्र चालण्यासाठी प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देणे योग्य नाही; येतो मी. सुखम्sभवतु!"