Friday, February 25, 2022

अनाहत सत्य (भाग 13)

 अनाहत सत्य

भाग 13

गोविंदने संध्याकाळी त्याच्या वडिलांच्या ऑफिसमधल्या प्युनला पाठवून संस्कृतीला निरोप दिला होता; 'सकाळी चार वाजता गेट जवळ ये. लवकरचं विमान आहे.'

नैना हॉस्टेलवर पोहोचली तेव्हा संस्कृती तिची बॅग भरत होती. नैना खोलीत आली तरी संस्कृतीने तिची दाखल घेतली नाही; कारण संस्कृतीला कोणताही वाद नको होता. नैना खोलीत आली आणि शांतपणे आपल्या पलंगावर बसून संस्कृतीचं निरीक्षण करायला लागली. संस्कृतीने बॅग भरली आणि एका बाजूला केली. एककीकडे हात काम करत होते आणि संस्कृतीच्या मनात नकळत वादळ सुरू होतं. तिने वॉर्डनला 'वडिलांकडे जाते आहे'; असं सांगितलं होतं. जर काही विषय निघाला तर तेच कारण नैनाला सांगायचं तिने मनात ठरवलं होतं. गोविंदने सकाळी चारला तयार राहायला सांगितलं होतं; त्यामुळे संस्कृती लवकर झोपण्याची तयारी करत होती. बराच वेळ झाला तरी नैना काही एक न बोलता संस्कृतीकडे बघत बसली होती. का कोण जाणे पण नैनाचं असं बघणं संस्कृतीला अस्वस्थ करायला लागलं होतं. दुर्लक्ष करायचं कितीही ठरवलं तरी संस्कृतीला ते अवघड व्हायला लागलं. शेवटी स्वतःच्या पलंगावर बसत तिने नैनाकडे थेट बघितलं आणि विचारलं; "असं का बघते आहेस तू माझ्याकडे?"

"संस्कृती, तुला वेरूळ लेण्यांना जायचं आहे न; चल... मी घेऊन चालते तुला. पण गोविंद बरोबर नको जाऊस." नैनाने एकदम बॉम्बच फोडला संस्कृतीच्या डोक्यावर.

"तुला कोणी सांगितलं मी गोविंद बरोबर वेरूळ लेणी बघायला जाते आहे?" संस्कृतीने नकळत मान्यच करून टाकलं नैनाकडे.

"कोणी सांगितलं हे महत्वाचं नाही सांस्कृती... तू गोविंद सोबत जाते आहेस आणि ते योग्य नाही; असं माझं मत आहे." नैना अत्यंत निर्विकार चेहेऱ्याने पण गंभीर आवाजात म्हणाली.

"नैना! हे अति होतं आहे बरका. मला माझे वडील देखील सांगत नाहीत मी कुठे, कधी आणि कोणासोबत जायचं ते. मग तू कोण मला सांगणारी? मला जे हवं ते करीन मी." संस्कृती तावातावाने म्हणाली.

"मी कोण.... तू कोणाचं एकतेस किंवा नाही ऐकत... तुझ्या वडिलांचा तुझ्या आयुष्यातला नक्की रोल काय आहे... हे सगळं एका पॉइंटला क्षुल्लक आहे संस्कृती. आत्ता सर्वात महत्वाचा मुद्दा हा आहे की तू वेरूळ लेण्यांकडे गोविंद सोबत जाणं बरोबर नाही." अजूनही नैना त्याच त्या गंभीर आवाजात बोलत होती.

मात्र नैनाच्या त्याच त्या बोलण्याने संस्कृतीचा पारा चढत होता. "बरं! जर तुझं मत आहे की मी गोविंद सोबत तिथे जाऊ नये तर मला कारण सांग. ते कारण पटलं तरच मी तुझं एकेन. केवळ तुला वाटतं म्हणून मी तुझं ऐकायला मी तुझ्या हाताखाली काम करत नाही. माझं स्वतःचं असं अस्तित्व आहे तिक्ष्णा." संस्कृतीच्या तोंडून फटाके फुटल्यासारखे शब्द बाहेर पडत होते.

संस्कृतीचं शेवटचं वाक्य ऐकून नैना एकदम ताठ झाली. तिचे मुळात मोठे असलेले डोळे खूपच मोठे झाले. तिने तिच्या पलंगाची गाडी घट्ट धरून ठेवली.... एकटक संस्कृतीकडे बघत नैना बसून राहिली. असेच अत्यंत तंग वातावरणातले काही क्षण गेले आणि संस्कृती भानावर आली. तिला नैनाचा खूपच राग आला होता. त्यामुळे एकही अक्षर न बोलता ती नैनाकडे पाठ करून पलंगावर आडवी झाली आणि तिने डोळे मिटले. संस्कृतीला वाटलं होतं की झालेल्या चिडचिडीमुळे तिला झोप लागणार नाही. पण काही क्षणातच संस्कृती गाढ झोपली होती. संस्कृतीला नक्की झोप लागली आहे याची खात्री करून घेत नैनाने खोलीचा दिवा बंद केला आणि दार ओढून घेत ती खोलीच्या बाहेर आली.

नैना परत एकदा कालच्याच खिडकीजवळ जाऊन उभी राहिली.

"हो! तिने मला तिक्ष्णा म्हणून हाक मारली." नैना बाहेर बघत बोलत होती. पण ती कोणाशी बोलत आहे ते मुळीच कळत नव्हतं. तिची मान मात्र वर होती. "मला मान्य आहे की हे योग्य नाही. पण तिला कोणीही काही सांगून ती ऐकत नाही; तुम्हाला देखील ते चांगलंच माहीत आहे...... मला ही असंच वाटतंय की तिला काहीतरी आठवतं आहे. पण ती अजूनही एकूण सत्यापासून खूप दूर आहे...... हो.... मी तिच्या घड्याळच बंद करून टाकलं आहे. त्यामुळे तिला इतक्या लवकर जाग येणार नाही आणि तो इथे या इमारतीच्या आत येऊ शकत नाही. त्यामुळे किमान एका दिवसासाठी तरी मी तिचं जाणं टाळू शकते...... मान्य आहे की हा कायमचा उपाय नाही. पण मला सत्य माहीत आहे; त्यामुळे प्रत्येक पाऊल उचलताना मला विचार करावा लागतो. तिला काहीच कल्पना नसल्याने ती केवळ संस्कृती म्हणून विचार करते आहे..... हो! मी यावर कायमस्वरूपी उत्तर शोधून काढीन." नैना बोलायची थांबली आणि मागे वळली. त्यावेळी तिथे एकही मुलगी नव्हती हे नैनाचं नशीब होतं. नाहीतर नैनाचं ते रूप बघून त्या मुलीने घाबरून किंकाळी फोडली असती किंवा बेशुद्ध देखील पडली असती. अत्यंत ताठ मानेने आणि सरळसोटपणे चालणाऱ्या नैनाचे डोळे पारदर्शक काचेप्रमाणे चमकत होतेआणि तिची लांबलचक वेणी जिवंत असल्याप्रमाणे तिच्या पाठीवर वळवळत होती.

नैना एका क्षणासाठी देखील झोपली नव्हती. तिने संस्कृतीचा फक्त गझर बंद केला होता असं नाही तर तिने तिचं घड्याळ देखील बंद करून टाकलं होतं. त्यामुळे संस्कृतीला जाग येणं शक्यच नव्हतं. तरीही संस्कृतीला आपसूक जाग आली तर तिला जाण्यापासून परावृत्त करण्यासाठी नैना तिच्या पलंगावर ताठ बसून होती.

साडेतीन वाजण्याच्या सुमाराला अचानक त्यांच्या खोलीच्या दारावर थाप पडली. वेळ इतकी शांततेची होती की तो आवाज खूपच मोठा झाला. अनपेक्षितपणे खोलीचं दार वाजल्याने नैना क्षणभरासाठी गोंधळून गेली. उठून दार उघडून कोण आहे हे बघण्याच्या अगोदरच नैनाला बाहेरून वॉर्डनचा आवाज आला.

"संस्कृती.... ए संस्कृती.... उठलीस का ग? तुला निघायचं आहे न?" वॉर्डनच्या त्या मोठ्या आवाजाने संस्कृतीला जाग आली. ती पटकन पलंगावर उठून बसली. नेहेमीची सवयीची वेळ नसल्याने संस्कृती पूर्ण गोंधळून गेली होती. इतक्यात परत एकदा खोलीचं दार वाजलं आणि पाठोपाठ वॉर्डनचा आवाज; "अग नैना... तुला तरी हाका ऐकू येता आहेत का? त्या संस्कृतीला उठव बघू... ती आज तिच्या वडिलांकडे जायला निघणार आहे. खूप लवकरचं विमान आहे तिचं." वॉर्डनच्या आवाजाने आजू बाजूच्या खोल्यांमधल्या मुली देखील जाग्या झाल्या होत्या बहुतेक. संस्कृतीला तर पूर्ण जाग आली होती. झटकन पलंगावरून खाली उतरत तिने खोलीचं दार उघडलं. समोर वॉर्डन हसत उभी होती. "अग अलार्म लावायला विसरली होतीस की काय? बरं झालं न मला उठवायला सांगितलं होतंस ते. मला रात्रीची झोपच नसते ग धड. त्यामुळे तीन वाजल्या पासून माझं घड्याळाकडे लक्ष होतं. साडेतीन झाले आणि आले इथे तुला उठवायला. बरं; आता पटकन आवर आणि निघ. तसही आत्ता मेस बंद आहे; त्यामुळे तुला चहा देखील मिळणार नाही आहे... काय?" वॉर्डन तिच्या नेहेमीच्या मोकळ्या बाडबडण्याच्या सवयीप्रमाणे बोलायला लागली. तिला अडवत संस्कृती हलक्या आवाजात म्हणाली; "Thank you very much madam. खरंच गाढ झोप लागली होती मला. तुम्ही उठवलंत ते बरं झालं." त्यावर हसत वॉर्डन म्हणाली; "तू म्हणाली होतीस उठवा जमलं तर... मी म्हंटलं न जमायला काय? उठवते! बरं आवर तुझं आणि निघ हो."

वॉर्डन गेली आणि संस्कृती खोलीचं दार लावून घेत मागे वळली. तिने एकदा तिच्या घड्याळाकडे बघितलं. संस्कृतीचं घड्याळ बंद होतं. ते नक्कीच नैनाने बंद केलं असणार हे संस्कृतीच्या लक्षात आलं. पण तिला नैनाशी वाद घालायचा नव्हता. तिने पलंगावर ताठ बसलेल्या नैनाकडे बघितलं आणि पटकन स्वतःचं आवरून बॅग उचलून ती खोली बाहेर पडली.

संस्कृती खोलीबाहेर गेली आणि नैनाने अस्वस्थ होत डोळे मिटले... 'यापुढच्या घटनांवर माझा ताबा नाही...' तिने मानत म्हंटलं. अचानक तिच्या मानत आवाज उमटला.... 'त्यावेळी तरी होता का? तिक्ष्णा; एखाद्याचे विचार दाबण्यापेक्षा बदलण्याचा प्रयत्न कर; उत्तर सापडेल. दाबल्याने ज्वालामुखी अजून भडकतो आणि वाट करून दिली तर लाव्हा शांतपणे ओघळून जातो...' नैनाने खाडकन डोळे उघडले. परत एकदा तिचे डोळे चमकत होते... आणि खोली एका निळसर प्रकाशाने भरून गेली होती.

***

"अग, उशीर केलास न. मला वाटलं झोप लागली तुला. आत येणं शक्य नाही आणि तुला बोलावण्याचं दुसरं एकही साधन नाही... अशा कात्रीत सापडलो आम्ही तिघे." संस्कृतीला बघताच तिच्या हातातून बॅग घेत गोविंद म्हणाला.

"झोपच लागली होती. वॉर्डनला सांगून ठेवलं होतं ते बरं झालं. नाहीतर काही खरं नव्हतं." गाडीत बसत संस्कृती म्हणाली.

"मला वाटलं नैनाने अडवलं की काय..." खिदळत शेषा म्हणाला.

"गप रे.... तिला गोविंद आवडत नाही म्हणून ती संस्कृतीला अडवेल असं मला वाटत नाही." जस्सी म्हणाला. यावर गोविंद, शेषा आणि जस्सी काहीतरी बोलायला लागले. गाडीच्या मागच्या काचेतून संस्कृतीने मागे वळून हॉस्टेलकडे बघितलं. तिच्या खोलीतून परावर्तित होणारा निळसर उजेड तिला दिसला.... गाडी पुढचं वळण घेतलं आणि हॉस्टेल संस्कृतीच्या नजरेआड झालं.

***

"यार गोविंद, इतकं पॉश हॉटेल? यार मी इतके पैसे नाही आणलेले... म्हणजे नाहीचेत माझ्याकडे." हॉटेलच्या दारात पोहोचल्या पोहोचल्या गोविंदला एका बाजूला घेत जस्सी म्हणाला.

"जस्सी, फलतुपणा करू नकोस. मी तुझ्याकडे पैसे मागितले का? चल आत. पटकन आवरून निघायचं आहे आपल्याला." गोविंद जस्सीला म्हणाला आणि संस्कृती, शेषा सोबत हॉटेलमध्ये शिरला. क्षणभर थांबून जस्सीने खांदे उडवले आणि तो देखील हॉटेलमध्ये शिरला.

"दोन रूम्स फक्त? गोविंद.....???" संस्कृती गोविंद सोबत रिसेप्शन जवळ उभी होती. दोन रूम्सच्या किल्ल्या गोविंदने घेताच तिने गोंधळून गोविंदला विचारलं.

"संस्कृती त्या जस्सीने हॉटेलच्या बाहेर मुक्ताफळं उधळली आहेत; आता तू सुरू होऊ नकोस. एक single occupency आहे आणि दुसरी tripal occupency आहे." गोविंद म्हणाला. मागून आलेला शेषा म्हणाला; "हो! Internally connected."

"शेषा...." गोविंदने काही म्हणायच्या अगोदर संस्कृतीच म्हणाली; "हो का? बरं झालं बाई... मला एकटीला झोप नाही येत. मधलं दार उघडं ठेऊ रात्री झोपताना." यावर गोविंद आणि जस्सी फसकन हसले आणि शेषाने खांदे उडवले. सगळे लिफ्टच्या दिशेने निघाले. पण थांबत गोविंद परत एकदा मागे वळला आणि त्याने रिसेप्शनला जाऊन चौकशी केली; "आम्हाला वेरूळ लेणी बघायला जायचं आहे. गाडीची सोय होऊ शकेल का? आणि एखादा चांगला जाणकार गाईड देखील."

"नक्की सर. किती वाजता निघणार आहात? त्याप्रमाणे गाडी बोलावून ठेवतो. तसे तिथे अनेक गाईड असतात. पण आमच्या हॉटेलमध्ये रजिस्टर्ड गाईड्स आहेत. त्यातला कोण आता आहे ते बघतो आणि त्याला देखील बोलावून घेतो. म्हणजे जाताना गाडीतच तो तुम्हाला माहिती सांगायला सुरवात करेल."

"That's great. लगेच निघू आम्ही. अगदी पंधरा मिनिटात." गोविंद हसत म्हणाला आणि लिफ्टच्या दिशेने निघाला.

चौघेही तयार होऊन आले. रिसेप्शनवरच्या मुलीने त्यांना गाडीचा नंबर दिला आणि म्हणाली; "सर, गाईड तुम्हाला लेण्यांजवळ येऊन भेटेल."

बरं म्हणून मान हलवत गोविंद हॉटेल बाहेर आला. त्याने तिघांना खुणेने समोरची गाडी दाखवली आणि चौघेही गाडीत जाऊन बसले.

"साब... क्या देखनेका पैले आपकु?" चौघेही गाडीत बसताच ड्रायव्हरने विचारले.

"मतलब?" शेषाने नकळून प्रश्न केला.

"सर, इधर बोहोत कूच है ना देखने जैसा. तो आप को पैले क्या देखना करके पुछा." ड्रायव्हर गाडी सुरू करत म्हणाला.

"सिधा एलोरा केव्हस लेना." चर्चेला संपवत गोविंद म्हणाला.

"हा साहाब." असं म्हणत ड्रायव्हरने गाड़ी हॉटेल बाहेर काढली.

"साहाब, हम पोहोच गये." ड्रायव्हरच्या आवाजाने चौघांनाही जाग आली. अवेळी उठून प्रवास केल्याने तसे चौघेही दमले होते. त्यामुळे गार हवा लागताच त्यांना झोप लागली होती. गाडी खाली उतरत त्यांनी आळस दिला.

"साहाब, उधरसे अंदर जानेका. उधर तिकीट मिलता है." ड्रायव्हरने माहिती दिली आणि चौघेही निघाले.

ड्रायव्हरने मागून हाक मारली आणि म्हणाला; "साहाब, कितना टाइम लगेगा?"

"अरे? अभि तो आये है.. क्या मालूम कितना टाइम लगेगा." शेषाने उत्तर दिलं.

"साहाब, मेरा भांजा इधर को एक साडी के दुकान मे काम करता है. तो सोचा उस्को जाके मिलके आता हु." ड्रायव्हर अजिजीने म्हणाला.

"हां. ठीक है. जाओ. बोहोत टाइम लगेगा इनको." तो आवाज ऐकून संस्कृती, गोविंद, जस्सी आणि शेषाने आश्चर्याने त्या दिशेने बघितलं.

एक उंचापुरा गोरासा मनुष्य त्यांच्या पासून चार फुटावर उभा होता. त्याचे घरे डोळे भेदक होते. चेहेऱ्यावर डाव्या गालावर एक मोठा व्रण होता. "तुमचीच वाट बघत होतो गोविंदजी." चौघांच्या दिशेने चालत येत तो म्हणाला.

"तुम्ही?" गोविंदने विचारलं.

"गाईड हवा होता ना तुम्हाला?" तो हसत म्हणाला.

"ओह! बरोबर !हॉटेलच्या रेसेप्शनमध्ये सांगितलं होतं मी. हॅलो. मी गोविंद." गोविंद हसत म्हणाला.

"हो! मी इथे पोहोचलो होतो आणि मग मला फोन आला. नमस्कार मॅडम." संस्कृतीकडे वळत तो म्हणाला.

"हाय." संस्कृती हसत पुढे येत म्हणाली. पण तिच्याकडे काहीसं दुर्लक्ष करत त्याने शेषाकडे बघत अगदी ओळखीचं हास्य केलं.

गोंधळलेल्या चेहेऱ्याने शेषाने त्याच्याकडे बघितलं. जस्सी काहीसं मागे उभं राहून होणाऱ्या ओळखी बघत होता. तो काहीसा अलिप्तच होता त्यासागळ्यांपासून. आपला कॅमेरा सावरत लेन्स चेक करत होता तो.

"साहाब?!" ड्रायव्हरने हाक मारली.

"हां हां! जाओ तुम." गोविंद त्याच्याकडे वळत म्हणाला.

"चला, तुमची तिकिटं काढून ठेवली आहेत मी." गाईड म्हणाला.

"तुमचं नाव काय म्हणालात?" शेषाने त्याला विचारलं.

"मही...." आपले भेदक डोळे शेषावर रोखत तो म्हणाला.

"मही? म्हणजे?" संस्कृतीने विचारलं.

"मही... महिरक्षक नाव आहे माझं. नावाचा अर्थ राजाचा रक्षक. अर्थात आता रक्षकांची गरजच नाही कारण आता राजेच राहिले नाहीत." मही... महिरक्षक बोलत होता. पण त्याच्या आवाजातून तो गम्मत करतो आहे की काहीतरी गंभीर सांगतो आहे ते कळत नव्हतं. संस्कृतीला एकूणच त्याचं व्यक्तिमत्व फारसं आवडलं नाही. त्यामुळे काही न बोलता ती चालायला लागली.

संस्कृती सोबत जस्सी देखील चालायला लागला. गोविंद आणि मही एकत्र निघाले आणि सर्वात शेवटी शेषा... आजूबाजूचा निसर्ग न्याहाळत निघाला.

ही मंडळी निघालेली बघून ड्रायव्हर गाडीकडे आला. आता गाडीत बसून तो निघणार एवढ्यात एक माणूस त्याच्याकडे आला आणि म्हणाला; "किधर है साहाब लोग?"

"क्या? कौन लोग?" ड्रायव्हरने आश्चर्याने विचारलं.

"अरे ये देख. मेरेको तुम्हारी गाडी का नंबर दिया था होटलसे. बोला साहाब लोग आये है अपना केव्हज देखनेको. तो मै आया. गाइड हूं ना." तो माणूस गोंधळून ड्रायव्हरकडे बघत म्हणाला.

"अरे? तू गाईड है? तो वो कौन था? साहाब लोग तो उसके साथ अंदर भी गये." ड्रायव्हर म्हणाला.

"साला... कौन था यार? मेरा पैसा मार गया?" गाइड म्हणाला. "देखता हूं अंदर जा के." असं म्हणून तो गाईड गेला.

नक्की काय झालं ते ड्रायव्हरला कळलं नाही. पण आता तर त्याच्यासोबत आलेले साहेब लोक आत गेले होते आणि त्यांना यायला वेळ लागेल हे नक्की होतं. त्यामुळे परवानगी घेतल्या प्रमाणे गाडी घेऊन तिथून निघाला.

लांबवर लेण्यांच्या दिशेने गोविंद, संस्कृती, जस्सी आणि शेषा सोबत आत जाणाऱ्या महिने एकदा मागे वळून बघत गाडी गेल्याची खात्री केली. त्याच्या चेहेऱ्यावर एक मंद हास्य पसरलं होतं.... मात्र ते या चौघांच्या गावी देखील नव्हतं.

क्रमशः





Friday, February 18, 2022

अनाहत सत्य (भाग 12)

 अनाहत सत्य

भाग 12

नैनाने बोलणं बंद केलं पण संस्कृतीचा मेंदू मात्र विचार करायला लागला. "सामंतच्या मनात काय होतं ते बोलत होता का शेषा?" या नैनाच्या प्रश्नामागे काय अर्थ असेल? कोण सामंत? शेषाला का माहीत असेल त्याच्या मनात काय आहे? संस्कृती विचारांमध्ये गाढली होती. तिचे डोळे बंद होते; पण झोप नव्हती लागली तिला.... आणि अचानक तिला जाणवलं की नैना उठली आहे. संस्कृतीने डोळे किलकिले करून बघितलं. खोलीत अंधार होता; खिडकीमधून रस्त्यावरच्या दिव्याचा जो काही हलकासा उजेड येत होता तेवढाच काय तो उजेड. त्यामुळे संस्कृतीला नैनाचा चेहेरा दिसत नव्हता; साहजिक होतं की नैनाला देखील संस्कृती जागी आहे हे कळणार नव्हतं. तरीही संस्कृतीला जाणवलं की नैना पलंगावर उठून बसून संस्कृतीच्याच दिशेने बघत होती. तिचं ते अत्यंत स्थिर बसून संस्कृतीकडे बघणं संस्कृतीला अस्वस्थ करत होतं. पण तरीही कोणतीही हालचाल न करता संस्कृती तशीच पडून राहिली. असाच काही वेळ गेला आणि नैना पलंगावरून खाली उतरली. अजिबात आवाज होऊ न देता नैना हलकेच खोलीबाहेर गेली. नैनाचं हे असं अचानक खोली बाहेर जाणं संस्कृतीला खटकलं. त्यामुळे थोडा वेळ जाऊ देऊन संस्कृती देखील उठली आणि अगदीच हलकी पावलं टाकत तिने देखील दरवाजा गाठला आणि हळूच उघडून तिने बाहेर डोकावून बघितलं.

त्यांची खोली दुसऱ्या मजल्यावर होती... त्यामुळे व्हरांड्याच्या एका बाजूला पायऱ्या आणि दुसऱ्या बाजूला आवाराच्या मागच्या बाजूला उघडणारी खिडकी होती. संस्कृतीला दिसलं की नैना व्हरांड्याच्या एका टोकाला जाऊन उभी होती; जिथे खिडकी होती! नैना खाली उतरलेली नाही हे बघून संस्कृतीला आश्चर्य वाटलं आणि त्याहूनही मोठा धक्का बसला तिला खिडकीच्या बाजूला बघून. नैनाने खिडकी उघडली होती आणि ती खिडकी बाहेर बघत होती. मागून बघत असूनही संस्कृतीला लक्षात आलं की नैना खिडकीच्या बाहेर बघत होती.... पण खाली नाही तर वर! आता मात्र संस्कृतीला सगळंच विचित्र वाटायला लागलं. तिची उत्सुकता पराकोटीची ताणली गेली. पायांचा आवाज होऊ न देता ती नैनाच्या मागे जाऊन उभी राहिली.

नैनाने तिचे दोन्ही हात खिडकी बाहेर पसरले होते. ती वर आकाशाच्या दिशेने बघत काहीतरी पुटपुटत होती. संस्कृती नकळत अजून थोडी पुढे सरकली; तिला समजून घ्यायचं होतं नैना नक्की काय बोलते आहे.... आणि कोणाशी?

"होय! विचारलं मी गोविंद काय म्हणाला. पण ती म्हणाली; तो काहीच म्हणाला नाही. याचा अर्थ त्याला अजूनही काही माहीत नाही. अहं! मला खात्री आहे तोच आहे... गोविंद! नाही.... अपाला अजूनही...." आणि अचानक बोलणं थांबवून नैना गर्रकन मागे फिरली. तिचं असं मागे फिरणं संस्कृतीला अगदीच अनपेक्षित होतं. ती अगदीच बेसावध होती. संस्कृतीने नैनाकडे बघितलं. नैनाचे डोळे आग ओकत होते.

"तू इथे काय करते आहेस?" नैनाने संस्कृतीला प्रश्न केला. नैनाचा आवाज अगदीच वेगळा वाटला संस्कृतीला.

पण एकदम स्वतःला सावरून घेत संस्कृती म्हणाली; "मी? मी तुझ्या मागे आले. मला जाग आली तर तू नव्हतीस तुझ्या पलंगावर. अचानक कुठे गेलीस ते बघायला मी खोलीबाहेर डोकावले तर तू पॅसेजच्या या टोकाला दिसलीस. इथे खिडकीकडे काय करते आहेस याचं आश्चर्य वाटलं म्हणून आले इथे. तूच सांग तू काय करते आहेस इथे? ही तर हॉस्टेलची मागची बाजू आहे. कोण आहे बाहेर नैना? कोणाशी बोलते आहेस तू? ते ही वर बघत!"

संस्कृतीचं बोलणं ऐकून नैना एकदम स्तब्ध झाली. तिने संस्कृतीकडे स्थिर नजरेने बघितलं आणि तिला कोणतेही उत्तर न देता चालू पडली. संस्कृती देखील तिच्या सोबत निघाली. नैना खोलीमध्ये शिरली आणि स्वतःच्या पलंगावर जाऊन आडवी झाली. तिने संस्कृतीकडे पाठ केली होती; त्यामुळे तिच्या सोबत खोलीत येताना 'खिडकीबाहेर कोणाशी बोलत होतीस?' हा प्रश्न नक्की विचारायचा असं जरी संस्कृतीने ठरवलं होतं तरी तिला काहीच बोलता आलं नाही.

संस्कृती काही वेळ तिच्या पलंगावर बसून राहिली. पण नैनाने कोणतीही हालचाल केली नाही. शेवटी संस्कृती आडवी झाली आणि थोड्या वेळाने तिला झोप लागली.

सकाळी संस्कृती जागी झाली आणि तिची नजर नैनाच्या पलंगाकडे गेली. नैना पलंगावर नव्हती. संस्कृतीला ते काहीसं अपेक्षितच होतं. तिने उठून पटापट आवरलं आणि ती गोविंदला भेटायचं ठरवून होस्टेलच्या बाहेर आली. तिची नजर गेटकडे गेली आणि तिला एकदम आश्चर्य वाटलं. गेटजवळ गोविंद, जस्सी आणि शेषा उभे होते.

"कमाल आहे! सकाळी सकाळी इथे काय करता आहात तुम्ही?" त्यांच्या दिशेने चालत येत संस्कृती म्हणाली.

"चल! काहीतरी खूप महत्वाचं सांगायचं आहे तुला." गोविंद तिच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत म्हणाला. तिला त्याच्या घाईचं एकदम आश्चर्य वाटलं. तिने जस्सीकडे बघत भुवया उडवत काय म्हणून विचारलं. जस्सीचा चेहेरा देखील चांगलाच गंभीर होता. त्याने डोळ्यांनीचं तिला 'चल' अशी खूण केली. चौघेही एकत्र चालायला लागले.

इडली, मेदूवडा आणि फिल्टर कॉफी अशी ऑर्डर देऊन संस्कृतीने प्रश्नार्थक नजरेने गोविंदकडे बघितलं.

"You got to know this!" गोविंद म्हणाला.

"I know. But for that u need to tell me your 'this'!" संस्कृती गंभीर चेहऱ्याने पण मिश्किल आवाजात म्हणाली.

"जोक नाही संस्कृती." गोविंद म्हणाला.

मग मात्र संस्कृतीने चेहेरा अगदीच गंभीर करत शांतपणे काय म्हणून मान हलवली.

"जस्सीच्या काकांचा काल रात्री उशिरा मला फोन होता." गोविंद म्हणाला आणि संस्कृती सावरून बसली.

"काय म्हणाले ते गोविंद? इतकं सिरीयस का झाला आहेस तू.... in fact तुम्ही तिघेही?" संस्कृतीने विचारलं.

"संस्कृती;" जस्सी एकदा गोविंदकडे बघून बोलायला लागला. "काकांनी घरी पोहोचल्या पोहोचल्या काही जुने ग्रंथ, वेद चाळून बघितले. ते म्हणाले तो श्लोक त्यांना खूपच अस्वस्थ करत होता. कारण जरी त्या श्लोकाची भाषा प्राकृत असली तरी त्यात खूप गहन अर्थ आहे असं त्यांना सारखं वाटत होतं. त्यामुळे न राहवून त्यांनी त्या श्लोकाची भाषा शोधण्या अगोदर त्या श्लोकासंदर्भात इतर काही रेफरन्स मिळतात का ते बघितलं. बराच वेळ काही मिळालं नाही; म्हणून मग त्यांनी मूळ प्रश्नाला; म्हणजे श्लोकामध्ये वापरलेली प्राकृत भाषा नक्की कोणत्या ठिकाणची आहे; ते शोधायला घेतलं. ते मात्र त्यांना पटकन मिळालं. अग, या प्राकृत भाषेला महाराष्ट्री म्हणतात. हिचा वापर महाराष्ट्रात साधारण इसवीसन 757 मध्ये होत असे. लिखित स्वरूपात फार नाही मिळत ही भाषा. पण तात्कालीन हिंदू, बौद्ध आणि जैन संतांनी प्रयत्नपूर्वक थोडसं स्क्रिप्ट तयार केलं होतं. त्याचाच वापर करून हा श्लोक लिहिला आहे. ही महाराष्ट्री भाषा राष्ट्रकूट घराण्यातील राजांनी - विशेषतः कृष्ण राष्ट्रकूट पहिला याने - वेरूळ लेण्यांमधलं शंकर मंदिर बांधायला घेतलं त्यावेळी वापरली आहे. त्या लेण्यांमधल्या एका लेण्यांमध्ये कृष्ण राष्टक्त पहिला याच्या चुलत्याच्या; तो स्वतः राजगाडीवर असतानाचा; काळातील एक शिलालेख देखील आहे."

संस्कृती शांतपणे जस्सी जे सांगत होता ते ऐकत होती. जस्सी बोलायचा थांबला आणि तिने परत एकदा प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे बघितलं. तिघेही तिच्याकडे बघत होते; पण बोलत कोणीच नव्हतं. त्यामुळे तिला काहीच कळेना.

"जस्सी, महाराष्ट्री प्राकृत भाषा राष्टकुट राजाच्या काळात; विशेषतः वेरूळ लेणी बांधली गेली त्यावेळी; म्हणजे इसविसन 757 या काळात बोलली आणि लिहिली जात होती. कळलं मला! पण यामध्ये इतकं गंभीर होण्यासारखं काय आहे?" संस्कृतीने काहीसं वैतागत विचारलं.

"संस्कृती, गंभीर होण्यासारखा विषय पुढे आहे." गोविंद म्हणाला.

"आणि तो काय ते मला सांगाल का कोणी? नमनाला घडाभर तेल झालं आहे ओतून...." संस्कृतीने शांत आवाजात म्हंटलं.

"काकांना एकदा लिंक लागल्या नंतर त्यांनी श्लोकाचा गाभा शोधायला सुरवात केली." जस्सी म्हणाला.

"बरं मग?" अजूनही संस्कृतीला कळत नव्हतं की ते तिघे इतके सिरीयस का आहेत.

"संस्कृती, तुला आठवतं काका म्हणाले होते; त्या 'स्व' ची काहीतरी निर्मिती करण्याची इच्छा आहे आणि ती कोणीतरी पूर्ण करतं आहे. पण पुढच्या संपूर्ण श्लोकामध्ये त्या इच्छा पूर्ण करणाऱ्यांचा उल्लेख नाही. त्या नरेशाला त्याच्या आप्तांकडून धोका झाला आहे; आणि तरीही त्याने त्याच्या जवळच्यांवर विश्वास ठेवणे आवश्यक आहे." गोविंद म्हणाला. "हो! आठवतं. मग? त्याचं काय?" संस्कृतीने विचारलं. "काका म्हणाले होते; त्या नरेषाच्या इच्छेप्रमाणे निर्मिती करणारे ते कोण हे जास्त महत्वाचं आहे. ते असं का म्हणाले होते ते आपल्याला कळलं नव्हतं. पण काकांच्या मनात तो प्रश्न सतत घोळत होता. त्यामुळे एकदा ती भाषा कुठली आणि कोणत्या काळातली हे कळल्यावर काकांनी त्या श्लोकाचा अर्थ अजून समजून घेण्याचा प्रयत्न केला. आणि...." गोविंद बोलायचा थांबला.

आता मात्र संस्कृती वैतागायला लागली. "गोविंद, हा सस्पेन्स संपव बघू. काय आहे ते पटकन सांग." तिच्या आवाजतला अस्वस्थ वैतागलेपणा गोविंदला जाणवला. पण तरीही तो शांत होता.

"संस्कृती, काकांना काहीतरी मिळालं... अर्थ लागला.... आणि त्यांनी रात्री खूप उशिरा; खरं तर अगदी पाहाटे; मला फोन केला. त्यांनी मला जे सांगितलं ते जर नीट विचार केला तर खूपच महत्वाचं आहे. काकांनी अगोदर मला माझा अनुभव परत एकदा सांगायला सांगितलं. मी त्यांना सगळं अगदी नीट आठवून परत एकदा सांगितलं. 'तू त्या गुहेतून बाहेर पडल्या नंतर परत तुला ती गुहा परत सापडली नाही न?' काकांनी विचारलं. त्यावेळी मी त्यांना सांगितलं की तिथले फॉरेस्ट ऑफिसर म्हणाले तिथे अशी कोणतीही गुहाच नाही. त्यानंतर काही वेळ काका काहीच बोलत नव्हते. मला काही कळेना... आणि मग अचानक काका बोलले.... गोविंद; हा श्लोक तुझ्यासाठी लिहिला गेला आहे. फक्त तुझ्याचसाठी! मला काहीच कळेना; काका अचानक असं काय म्हणत होते. असेच काही क्षण शांततेत गेले आणि काकांनी मला सांगितलं; 'गोविंद मला वाटतं तू एकदा वेरूळ लेण्यांना भेट देऊन ये.' मला कळेना काका असं का म्हणत होते. मी त्यांना कारण विचारलं. त्यावर ते जे म्हणाले त्यामुळे मी एकदम गंभीर झालो... कधी एकदा सहा वाजतात आणि बाहेर पडून तुम्हाला गाठतो असं झालं मला." गोविंद म्हणाला.

"काय म्हणाले काका?" संस्कृतीने विचारलं. तिला एव्हाना लक्षात आलं होतं की जस्सी आणि शेषाला गोविंदने सगळं सांगितलं आहे. त्यामुळे ती त्यांच्याकडे बघत देखील नव्हती.

"संस्कृती, काका म्हणाले.... तो श्लोक केवळ माझ्यासाठीच लिहिला गेला होता; म्हणूनच तो केवळ मला दिसला. म्हणूनच तो मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला. पण तो यशस्वी झाला नाही. त्याहूनही महत्वाचं म्हणजे त्यांच्या मनातला प्रश्न.... त्या नरेषाच्या इच्छेप्रमाणे निर्मिती करणारे ते कोण हे जास्त महत्वाचं आहे! कारण.... तो श्लोक जरी महाराष्ट्री प्राकृत भाषेत लिहिला असला तरी तो कोणा समकालीन व्यक्तीने लिहिलेला नाही. तो श्लोक नरेषाच्या इच्छेप्रमाणे निर्मिती करणाऱ्या त्या ज्या कोणी शक्ती होत्या... त्यांनी लिहिला होता; नरेषासाठी." गोविंद बोलायचा थांबला आणि संस्कृती अवाक होऊन त्याच्याकडे बघायला लागली.

"तू काय बोलतो आहेस ते तुला कळतं आहे का गोविंद? तू अगोदर म्हणालास की काकांनी तुला सांगितलं की तो श्लोक केवळ तुझ्यासाठीच लिहिला गेला होता.... आणि मग ते म्हणाले की तो श्लोक वेरूळ लेणी बनवणाऱ्या व्यक्तींनी..... सॉरी शक्तींनी..... लिहिला आहे..... आणि.... आणि म्हणून तू वेरूळ लेण्यांना जाऊन भेट देऊन आलं पाहिजेस! काय मूर्खपणा आहे हा सगळा?" संस्कृती म्हणाली आणि त्याक्षणी शेषाने मोठा निश्वास सोडला. सगळेच त्याच्याकडे बघायला लागले. तसा तो म्हणाला; "यार, जस्सी, राग मानू नकोस... पण गोविंदने सकाळी आपल्याला हे सगळं संगीतल्यापासून मला हे सगळं म्हणजे काहीतरी तथाकथित मूर्खपणा वाटत होता. पण मी असं म्हंटलं असतं तर तुम्ही सगळे वैतागला असतात. म्हणून मी गप होतो. पण आता संस्कृतीला देखील तसंच वाटतं आहे हे ऐकून बरं वाटलं. हे बघ; तुझे काका खरंच ग्रेट आहेत. त्यांनी एका क्षणाची उसंत न घेता त्या श्लोकाची भाषा; तिचा वापर असलेला भाग शोधला. पण हा श्लोक केवळ गोविंदसाठीच बनला होता हे त्यांना कसं कळलं? त्याहूनही मोठी गोष्ट.... यार वेरूळ लेणी बनवणाऱ्या लोकांनी आसामच्या खोऱ्यात जाऊन एका गुहेमधल्या वाहत्या पाण्याच्या तलावाच्या भिंतीवर हा श्लोक का लिहिला? अगदीच अशक्य आणि अतर्क्य आहे यार हे. यार, त्या श्लोकाचा अर्थ आणि त्याची भाषा शोधण्याच्या नादात तुम्ही हे तर नाही न विसरलात की आपल्याला मुळात तो श्लोक आसामच्या खोऱ्यात एका गुहेत दिसला होता.... I mean.... फक्त गोविंदला दिसला होता."

"शेषा, मला माहीत आहे की तो श्लोक आसामच्या खोऱ्यात एका गुहेत मला दिसला होता. ऐका सगळे.... काकांनी मला सांगितलेली माहिती! भाषेचा शोध लागला तरी काकांचं समाधान झालं नव्हतं. त्यामुळे त्यांनी परत एकदा आपण सांगितलेली माहिती आठवली. त्यावेळी आसाम मधल्या एका गुहेत हा श्लोक केवळ मला दिसला हे सांगितलेलं त्यांना आठवलं. त्यावरून त्यांनी भारतीय इतिहासातील वेगवेगळ्या काळांच्या संदर्भातली आसांमधली माहिती वाचायला सुरवात केली. एक एक करत ते मागच्या कालांचे वाचन करत होते. पुराण काळ, महाभारत काळ, रामायण काळ, उपनिषद काळ, ब्राम्हण ग्रंथ काळ आणि वैदिक काळ. प्रत्येक काळामध्ये आसाम खोऱ्याचे संदर्भ आहेत. विशेषतः उपनिषद, रामायण आणि महाभारत काळात तर आहेतच. त्याकाळात तिथे एक सुबक मंदिर बांधण्यात आल्याचा उल्लेख आहे. जगद् द्वार असा काहीसा उल्लेख आहे त्या मंदिराचा. त्यानंतर त्यांनी अलीकडच्या काळात त्या मंदिराचा उल्लेख कुठे आहे का बघितलं. त्यावेळी आसाम खोऱ्यात एक मंदिर आहे; जे नरभक्षक मनुष्यवस्तीमध्ये आहे; अशी माहिती त्यांना मिळाली. या मंदिराजवळ कोणीही जाऊ शकत नाही. जर गेलं तर ती व्यक्ती एकतर नाहीशी होते किंवा तिला वेड लागतं अशी माहिती त्यांना मिळाली."

"या सगळ्या माहितीचा श्लोकाशी काय संबंध गोविंद?" शेषाने अत्यंत थंड आवाजात प्रश्न केला.

"शेषा.... मी ज्या गुहेत होतो ती गुहा त्या मंदिराच्या आजूबाजूलाच असावी असा काकांचा अंदाज आहे. याचा अर्थ ते मंदिर ज्या कोणी बांधलं त्यांनी तो श्लोक लिहिला आणि.... त्यांनीच वेरूळ लेणी साकारली असा देखील होऊ शकतो; असा काकांचा अंदाज आहे." गोविंद म्हणाला.

"अरे गोविंद, किती काहीही सांगतो आहेस तू. यार, मला जस्सीच्या काकांबद्दल आदर आहे. प्लीज तुम्ही कोणी गैरसमज करून घेऊ नका. पण यार हे किती व्हेग आणि अनबिलिव्हेंबल आहे यार." शेषा वैतागत म्हणाला.

"हो हे खूपच व्हेग आणि अनबिलिव्हेंबल आहे; पण तरीही माझा विश्वास बसला आहे. गोविंद! मी येणार आहे तुझ्या सोबत औरंगाबादला. बोल कधी जायचं?" संस्कृती अत्यंत गंभीर आवाजात म्हणाली.


'संस्कृती....???" शेषाला काय बोलावं कळेना.

"शेषा, कदाचित तुला आणि जस्सीला हा सगळा मूर्खपणा वाटत असेल. पण मला नाही वाटत. हो! मीच काही मिनिटांपूर्वी म्हंटलं हे मान्य आहे मला. तरीही.... मला माहीत आहे गोविंद नक्की जाणार आहे औरंगाबादला आणि मी देखील जाणार आहे त्याच्या सोबत. का विचारू नका. मला जायचं आहे. बरं! जाता जाता तुमच्या अतर्क्य घटनांच्या लिस्टमध्ये अजून एक घटना ऍड करा...." असं म्हणून संस्कृतीने आदल्या रात्री नैना आणि तिच्यामध्ये झालेलं बोलणं आणि त्यानंतर नैनाचं वागणं त्या तिघांना सांगितलं.

"अबे ये तो और भी कॉम्प्लिकेटेड होता जा रहा है यार।" शेषा परत एकदा वैतागत म्हणाला.

इतकावेळ सगळं शांतपणे ऐकणारा जस्सी मात्र एकदम ताठ बसत म्हणाला; "गोविंद, संस्कृती मी पण येणार तुमच्या सोबत औरंगाबादला. मला वाटतं तिथे काहीतरी नक्की आहे. शेषा... हे कॉम्प्लिकेटेड आहे; अतर्क्य आहे; कदाचित सगळं एकदम खोटं देखील आहे.... पण तरीही मी जाणार गोविंद सोबत. का माहीत आहे? कारण त्या श्लोकामध्ये म्हंटलं आहे की; तुझ्या जवळच्या लोकांची सोबत तुझ्या बरोबर असेल तर तुझे आयुष्य बदलून जाईल. पण जर काही कारणाने ही तुझ्या जवळच्या लोकांची सोबत तुला नाही लाभली; तर सगळंच अर्थहीन होईल. त्यामुळे त्यांचा विश्वास तुला कायम समजून घ्यावा लागेल. आपण तिघे आणि काका सोडले तर या श्लोकाबद्दल माहीत असणारं कोणी नाही. काकांना आपण मदत म्हणून हा श्लोक सांगितला. म्हणजे काकांचा गोविंदशी तसा डायरेक्ट संबंध नाही. याचा अर्थ सध्या आपण तिघेच गोविंदच्या जवळचे आहोत; आणि म्हणून आपण त्याची साथ दिली पाहिजे. अर्थात हे माझं मत आहे. तुला जर यायचं नसेल तर नको येऊस."

"बस् क्या यार? इतना ही गिनते हो ना मुझे? साला.... मला हे सगळं पटत नाहीय हे खरं आहे. पण तरीही मी येणार. तुमच्या सोबत म्हणून. यार, त्या निमित्ताने वेरूळ लेणी बघून घेईन. बाकी तुम्ही शोधा त्या श्लोकाचाअर्थ जो शोधायचा आहे तो." शेषा म्हणाला आणि चौघेही हसले.

"बरं! कधी निघुया?" संस्कृतीने विचारलं.

"शुभस्य शीघ्रम्!" हसत हसत गोविंद म्हणाला. "मी बाबांच्या बुकिंग ऑफिसरला सांगून आपली विमानाची तिकिटं आणि हॉटेलचं बुकिंग करून घेतो. उद्याच निघू. किती वाजताचं विमान असेल ते आज संध्याकाळपर्यंत कळेल. काय?"

यावर सगळेच हसले आणि कॉफीचा शेवटचा घोट घेऊन उठले.

ही चौकडी बाहेर पडली आणि आपापल्या दिशांना पांगली. पण त्या कोणाच्याही लक्षात आलं नव्हतं की ते सगळे गप्पांमध्ये गढले असताना त्यांच्या जवळच्याच टेबलवर नैना येऊन बसली होती. त्यांच्याकडे पाठ करून बसलेली नैना त्या उडप्याच्या हॉटेलमध्ये इडली खायला तर नक्कीच आली नव्हती....

क्रमशः





Friday, February 11, 2022

अनाहत सत्य (भाग 11)

 अनाहत सत्य


भाग 11

जस्सी काकांना सोडायला जाणार असल्याने थांबला आणि गोविंद, शेषा आणि संस्कृती मात्र निघाले.

"चला. आता जस्सीचे काका अर्थ सांगेपर्यंत हरी हरी करत बसायचं." शेषा हसत म्हणाला.

मात्र संस्कृती अजूनही गंभीर होती. तिने एकदा शांतपणे शेषाकडे बघितलं आणि मग गोविंदकडे वळून म्हणाली; "आपण परत एकदा संपूर्ण श्लोकाचा अभ्यास आपल्यापरीने करूया का?" तिचा गंभीर चेहेरा बघून शेषाने चेष्टेसाठी उघडलेलं तोंड बंद केलं.

"तुला गरज वाटते आहे का संस्कृती?" गोविंदने विचारलं.

"हो गोविंद. काका आपल्याला अर्थ आणि या श्लोकामध्ये वापरलेली प्राकृत भाषा भारताच्या नक्की कोणत्या भागात प्रचलित होती हे सांगणार आहेत. पण तरीही मला वाटतं आपण तो श्लोक समजून घेण्याचा आपल्या परीने देखील प्रयत्न करूया." संस्कृती म्हणाली.

"चालेल." असं म्हणून गोविंद शेषाकडे वळला आणि म्हणाला; "शेषा, तुला कंटाळा आला असला तर तू निघ. काहीच हरकत नाही. आमचं जे काही बोलणं होईल ते तुला नंतर कळवतो मी."

"यार काय करू निघून आणि घरी जाऊन? मला दुकानावर नाही जायचं. मी येतो तुमच्याबरोबर." शेषा म्हणाला.

"शेषा, तिथे येऊन जर चेष्टा करणार असलास तर नको हं येऊस." संस्कृती शांतपणे म्हणाली.

"नाही माझे आई. तुम्ही दोघे बोला. मी फक्त ऐकण्याचे काम करेन." शेषा हसत तिच्यासमोर हात जोडत म्हणाला. त्याच्या त्या एका कृतीने देखील तिघे हसायला लागले.

उडप्याकडे जाऊन बसल्यानंतर संस्कृतीने बॅगमधून एक वही काढली आणि लिहायला सुरवात केली. "ए, तू म्हणाली होतीस आपण एकत्र अर्थ शोधायचा आहे. तू जर एकटीच लिहीत बसणार असलीस तर आम्ही काय तुझं तोंड बघत बसू? बरं! एकवेळ गोविंदला आवडेल ते करायला.... माझं काय?" शेषाने तोंड उघडलंच.

"चालता हो बघू तो शेषा." वैतागत संस्कृती म्हणाली. दोघांच्या मध्ये पडत गोविंद म्हणाला; "भांडू नका यार. शेषा, गप ना साल्या. चर्चा करण्या अगोदर आपल्याकडे तो श्लोक नको का? संस्कृती तो श्लोक लिहिते आहे. कारण कागद काकांकडे आहे. आणि ते एका परीने योग्य देखील आहे. नाहीतर आपल्याला परत एकदा नैनाचे पाय धरायला लागतील; श्लोक आणि त्याचा अर्थ.... दोन्हीसाठी."

"आयला! मला काय माहीत ही श्लोक लिहिणार आहे ते. मी आपलं सहज बोललो." शेषा गोविंदला डोळा मारत म्हणाला. त्याच्याकडे दुर्लक्ष करून संस्कृतीने लिहिण्यास सुरवात केली.

सृष्टी निर्माता नच जरी स्व हा।
तुझी कामना पूर्त विश्वात।
निर्मिती नष्ट दुष्ट प्रकृती करिती।
शोध घे तू मानवात।
सोबत सोबतांची तुजसवे असता।
आयुष्य बदलते सर्वस्व।
नच सोबत अर्थहीन मग।
समजून घे तू विश्वास।
तू नच नर - नरेश तु।
फलप्राप्ती तुज इष्ट।

लिहून झालं आणि गोविंद आणि शेषाला ऐकायला येईल अशा आवाजात संस्कृतीने तो श्लोक वाचला.

"यार, अर्थ पण सांग न." शेषा बोललाच. गोविंदने त्याच्या टपलीत मारली आणि संस्कृतीने पाठीत चापाटी.

"गप रे शेषा. थोडा धीर धर न." संस्कृती हसत म्हणाली. ती हसते आहे हे बघून गोविंदलाच हायसं वाटलं. संस्कृतीने वही समोर ओढली आणि ती अर्थ लिहायला लागली.

सृष्टी निर्माता नच जरी स्व हा।
तुझी कामना पूर्त विश्वात।
हा श्लोक ज्याच्यासाठी आहे तो (स्व) तो जरी सृष्टी निर्माता नाही; तरी तुझी (या स्व ची) (कामना) इच्छा याच विश्वात पूर्ण होईल आणि त्याने इच्छा केलेली निर्मिती होईल.

निर्मिती नष्ट दुष्ट प्रकृती करिती।
शोध घे तू मानवात।
ही निर्माण झालेली निर्मिती दुष्ट प्रवृत्तीचे लोक नष्ट करतील. तू त्यांचा शोध मानवांमध्येच घे.

सोबत सोबतांची तुजसवे असता।
आयुष्य बदलते सर्वस्व।
तुझ्या जवळच्या लोकांची सोबत तुझ्या बरोबर असेल तर तुझे आयुष्य बदलून जाईल.

नच सोबत अर्थहीन मग।
समजून घे तू विश्वास।
पण जर काही कारणाने ही तुझ्या जवळच्या लोकांची सोबत तुला नाही लाभली; तर सगळंच अर्थहीन होईल. त्यामुळे त्यांचा विश्वास तुला कायम समजून घ्यावा लागेल.

तू नच नर - नरेश तु।
फलप्राप्ती तुज इष्ट।
तू केवळ एक नर (सर्वसामान्य माणूस) नाहीस तर नरेश म्हणजे राजा आहेस; हे विसरू नकोस. तू जर हे कायम लक्षात ठेवलेस तर तुला इष्ट ती फलप्राप्ती होईल.

लिहून झालं आणि संस्कृतीने मोठ्याने वाचलं परत एकदा.

"मी बोलू का?" गोविंद म्हणाला. "यार गोविंद परवानगी घेऊन तू कधीपासून बोलायला लागलास रे? बर, चल बोल." शेषा म्हणाला.

"शेषा, जस्सीचे काका म्हणाले होते की तो जो कोणी राजा आहे त्याने काहीतरी निर्माण करायची इच्छा केली. पण निर्मिती दुसऱ्याच कोणीतरी केली. तर ते कोण होते ते समजून घेतलं पाहिजे. पण काकांचं हे म्हणणं थोडं विचित्र नाही का वाटत? अरे यार, कोणत्याही राजाने काहीतरी निर्माण करायचं ठरवलं तर तो स्वतः थोडीच ते तयार करतो? म्हणजे ताज महाल काय शहाजहानने स्वतः थोडीच बांधला? त्याने तो कामगारांकडून बांधून घेतला ना? तसंच या श्लोकातल्या त्या राजाने इच्छा केली आणि ती कामगारांकडून पूर्ण केली... मग त्या नरेषाच्या इच्छेप्रमाणे निर्मिती करणारे ते कोण हे जास्त महत्वाचं आहे; असं काका का म्हणाले?" गोविंदने शंका व्यक्त केली.

त्यावर शेषा गोविंदच्या शंकेने एकदम खुश झाला आणि म्हणाला; "मी बोलू का?"

त्याच्या त्या विधानाने गोविंद आणि संस्कृतीने एकाचवेळी त्याच्याकडे वैतागून बघितलं. "यार नेहेमी चेष्टा नाही करत मी. मी गोविंदची नक्कल नाही करत. मला काहीतरी सुचलंय गोविंदची शंका ऐकून. एका तर खरं." शेषाचा आवाज थोडा गंभीर होता. त्याच्या आवाजातला बदल समजून गोविंद म्हणाला; "बोल." शेषा शांतपणे बोलायला लागला; "गोविंद, मला कळणारं लॉजिक सांगतो... शहाजहानने इच्छा केली आणि काय कामगारांना सांगितलं.... जा रे बांधा माझ्या मनातला ताज? मूर्ख कुठला! अरे, शहाजहानने मनातील इच्छा 'त्याच्या प्रिय पत्नीची आठवण म्हणून काहीतरी भव्य-दिव्य बांधाव;' असं त्याच्या सामंतला बोलून दाखवल असेल. मग सामंताने असं काहीतरी भव्य काय असू शकतं याचा विचार इतर प्रमुख सरदार किंवा विचारवंतांशी केला असेल. सगळ्यांनी मिळून एक दोन ऑप्शन्स ठरवले असतील. मग ते राजाला सांगितले असतील. त्यातली एक कल्पना राजाने पास केली असेल. मग त्या कल्पनेला मूर्त स्वरूप देण्यासाठी त्याचा आराखडा तयार केला करण्यासाठी कोणीतरी आर्किटेक्ट सामंताने शोधला असेल. त्या आर्किटेक्टने तयार केलेलं प्रारूप जर राजाला आवडलं असलं तर मग त्याने त्यावर होणारा खर्च विचारला असेल. तो त्याला पटल्यानंतरच राजाने काम सुरू करायला सुरवात परवानगी दिली असेल. त्यानंतर जागा ठरवणं, लागणारा कच्चा माल आणण, कारागीर; जे मूर्तींचं, मंदिराचं काम करतील ते; आणि कामगार जे मजुरीचं काम करतील असे यांना शोधूलं गेलं असेल. त्यांना एकत्र केल्यानंतर काम सुरू झालं असेल. ज्या आर्किटेक्टला ही संपूर्ण जवाबदारी दिली असेल तो तर कदाचित सामंतला उत्तरदायी नसेलसुद्धा. थेट राजाशीच त्याचं बोलणं होत असेल. त्यामुळे कदाचित सामंताचा राग होत असेल. कदाचित सामंताने स्वतःची माणसं नेमली असतील. सामंत प्रामाणिक आहे राजाशी. पण अचानक आर्किटेक्ट आणि राजा गुप्तपणे भेटायला लागले असल्याने तो पूर्ण गोंधळून गेला आहे. या भेटींचं रूपांतर नक्की कशात होतार याबद्दल तो शशांक आहे. म्हणूनच कदाचित त्याने त्याचा विश्वासू माणूस...." शेषाची बोलताना तंद्री लागली होती.

पण आता गोविंद आणि संस्कृती गोंधळून गेले. सुरवातीला शेषा शहाजहान आणि ताज बद्दल बोलत होता. पण मग त्याची गाडी अचानक राजा-सामंत करत कुठेतरी घसरायला लागली. तो नक्की काय बोलतो आहे; ते दोघांनाही कळेनासं झालं होतं. शेवटी संस्कृतीने शेषाचा हात जोरात हलवला आणि त्याला भानावर आणत म्हणाली; "शेषा.. ए.... अरे काय बोलतो आहेस तू? कोण राजा? तू शहाजहान वरून अचानक कोणत्या राजावर सरकलास?"

"अं... काय?" शेषा तंद्रीतून जागा झाला. पण त्याची नजर हरवून गेली होती. संस्कृतीने त्याला परत एकदा हलवलं. "ए.... शेषा!" "अं?! ओह! काय? काय झालं ग?" संस्कृतीकडे बघत शेषा म्हणाला. त्याच्या नजरेत आता ओळख आली होती.

"तू नक्की काय सांगतो आहेस शेषा?" संस्कृतीने त्याला परत एकदा विचारलं.

"काय सांगत होतो मी?" शेषानेच संस्कृतीला विचारलं.

"शेषा, आपण तिघे इथे आपल्याला मिळालेल्या श्लोकाचा अर्थ वाचायला आणि समजून घ्यायला बसलो आहोत. त्यात गोविंदने एक सरळ साधा प्रश्न विचारला की जस्सीचे काका असं का म्हणाले की निर्मिती कोणी केली ते समजून घेतलं पाहिजे. त्यावर तू ताज महाल आणि शहाजहानचं उदाहरण देत समजावायला लागलास. पण मग तुझी गाडी कुठेतरी वेगळीकडेच घसरली. तू काय म्हणत होतास ते आम्हाला मुळीच कळलं नाही." संस्कृती म्हणाली.

"अं... हो! म्हणजे मी माझं लॉजिक सांगत होतो; पण खरं सांगू का.... मध्ये मला कळलंच नाही की मी काय बोलत होतो. काय बोलत होतो मी?" शेषा म्हणाला.

"साल्या, परत चेष्टा ना?" गोविंद वैतागत म्हणाला.

"नाही यार गोविंद. खरं सांगतो. मला कळलंच नाही तंद्री कशी आणि कधी लागली. काय बोललो ते सांगतोस का?" शेषा म्हणाला. तो खरं बोलतो आहे हे गोविंद आणि संस्कृतीच्या लक्षात आलं. शेषाने टेन्शन घेतलं आहे हे देखील गोविंदच्या लक्षात आलं आणि शेषाच्या खांद्यावर थोपटत तो म्हणाला; "काही नाही रे. शहजहांचा उल्लेख तू राजा म्हणून करत होतास. साला आपल्याला सवय नाही ना असं ऐकायची. म्हणून आम्ही गोंधळलो. बाकी तुझी नेहेमीचीच बडबड चालू होती. म्हणून तर तू चेष्टा करतो आहेस असं वाटलं आम्हाला." शेषाला गोविंदचं म्हणणं फारसं पटलं नाही; पण तो काहीच बोलला नाही. एकदम शांत होत मान खाली घालून बसला तो.

"तर, जस्सीचे काका म्हणाले होते की तो जो कोणी राजा होता त्याने काहीतरी इच्छा धरली होती आणि ती इच्छा पूर्ण करणारे जे कोणी होते ते कोण होते हे समजून घेणं महत्वाचं आहे." संस्कृतीने परत चर्चेची गाडी श्लोक आणि त्याअनुषंगाने आत्तापर्यंत झालेल्या चर्चेपर्यंत आणून ठेवली.

"बरोबर! पण मला वाटतं की या श्लोकामध्ये वापरलेली प्राकृत भाषा कोणत्या भागातली होती हे कळलं की खूप काही सोपं होईल संस्कृती. कारण ही भाषा साधारण पाचव्या शतकातली आहे; हे काकांनी आपल्याला सांगितलं आहे. जर आपल्याला कोणता भाग कळलं तर त्या भागात असणारी ऐतिहासीक वास्तु कोणती ते शोधणं सोपं जाईल आपल्याला; नाही का?" गोविंद म्हणाला.

अचानक शेषाने मान वर केली आणि गोविंदकडे बघत तो म्हणाला; "आज नाही सतत तुझ्या सोबत राहणार मी. मला देखील काही कारणं शोधून काढावी लागतील. योग्य-अयोग्य आणि चूक-बरोबर यातला फरक माझा मला समजून घेणं आवश्यक आहे. येतो मी." तो काय म्हणाला ते संस्कृती आणि गोविंदला कळायच्या अगोदरच शेषा ताडकन उठून निघून गेला. ते दोघेही अवाक होऊन तो गेला त्या दिशेने बघत राहिले.

थोडा वेळ गेला आणि संस्कृती अगोदर भानावर आली. "गोविंद, काहीतरी गडबड आहे रे. शेषा जे काही बोलला आणि असा ताडकन निघून गेला; नाटक नव्हतं ते. आपण निघुया. तू जरा त्याच्या घरी जा आणि तो ठीक आहे न बघ. पण उगाच त्याच्या घरच्यांना काही संशय येणार नाही याची काळजी घे. काय वाटतं तुला?"

"हम्म! You are right. काहीतरी बिनसलं आहे त्याचं. बघतो मी. तू पण निघ. उशीरच झाला आहे तसा. तुला पण हॉस्टेलमध्ये कटकट नको व्हायला." गोविंद म्हणाला. संस्कृती आणि गोविंद बाहेर पडले आणि दोन वेगळ्या दिशांनी निघाले.

"हाय संस्कृती! आत्ता येते आहेस?" संस्कृतीला बघून नैना म्हणाली.

"हो!" सांस्कृतीने उत्तर दिलं. तिला त्याक्षणी तरी नैनाशी काहीही बोलायची इच्छा नव्हती.

"का ग? बरं वाटत नाही का?" कधी नव्हे तो नैनाचा आवाज थोडा ओलावलेला होता असं संस्कृतीला वाटलं. कदाचित एरवी संस्कृतीला असं काही सुचलं नसतं. पण नैनाने तब्बेतीबद्दल विचारलं आणि संस्कृतीने अजून चेहेरा पाडत म्हंटलं; "हो ग. थोडी दगदग झाली. त्या श्लोकाच्या नादात आम्ही धड काही खाल्लं नाही दिवसभर. त्यामुळे आता डोकं दुखतं आहे माझं. गोळी घेऊन झोपेन म्हणते."

"ओह! बरं झोप. खरं तर मी पण दिवसभर त्याच श्लोकात अडकले होते ग." नैना म्हणाली.

तिच्या त्या एका वाक्याने संस्कृतीचे कान टवकारले गेले. "का ग? अजून काही अर्थ लागला का तुला?" तिने नैनाला विचारलं.

"अहं! मी जो अर्थ सांगितला ना तोच आहे. पण...." नैना बोलताना थांबली. तिचा आवाज काहींसा अस्थिर वाटला संस्कृतीला.

"पण काय नैना?" संस्कृतीने अधीर होत विचारलं.

"गोविंद काय म्हणाला ग तो श्लोक आणि त्याचा अर्थ ऐकून?" नैनाने विचारलं.

नैनाच्या प्रश्नमुळे मात्र संस्कृती परत बंद झाली मनातून. "तो काय म्हणणार? ऐकून घेतला अर्थ." तिने शांतपणे उत्तर दिलं.

"काहीच नाही म्हणाला तो?" नैनाने विचारलं.

"नाही. गोविंद काहीच नाही म्हणाला. तो चक्रम शेषा मात्र काहीतरी बरळला." संस्कृती सहज म्हणाली.

"शेषा? तो काय म्हणाला?" नैनाच्या आवाजात पराकोटीची उत्सुकता होती.

संस्कृतीने हसत हसत घडलेला प्रसंग सांगितला.

"सामंतच्या मनात काय होतं ते बोलत होता का शेषा? की त्याला दुसरा अर्थ अभिप्रेत होता?" नैनाने संस्कृतीला विचारलं. तिच्या प्रश्नाने नकळत संस्कृती सावध झाली. संस्कृतीच्या मनात पाल चुकचुकली. शेषा जे काही बोलला होता ते तंद्रीमध्ये काहीतरी होतं असा संस्कृतीचा समज होता. पण नैनाने विचारलेल्या प्रश्नामुळे संस्कृतीच्या मनात आलं... कदाचित शेषाच्या तोंडून नकळत काहीतरी बाहेर पडलं असेल का? खरं तर नैनाला काहीच माहीत नाही. तरीही तिचा प्रश्न तसा थेट आहे.

संस्कृती विचारात पडलेली बघून नैनाने एकदम बोलणं आवरतं घेतलं आणि उठून स्वतःच्या पलंगाकडे जात म्हणाली; "झोप तू संस्कृती. तुला बरं नाही आणि उशीर देखील खूप झाला आहे. उद्या बोलू. good night." आणि संस्कृती अजून काही बोलायच्या आत ती आडवी झाली आणि तिने डोळे मिटून घेतले.

क्रमशः



Friday, February 4, 2022

अनाहत सत्य (भाग 10)

 अनाहत सत्य

भाग 10

"काय अर्थ आहे या श्लोकाचा?" दहाव्यांदा कागदावरचा अर्थ मोठ्याने वाचून परत तो कागद समोरच्या टेबलावर ठेवत वैतागलेल्या गोविंदने म्हंटलं. जस्सी आणि शेषा तर गप्पच होते. त्यादोघांच्या मख्ख चेहेऱ्याकडे बघून गोविंद अजूनच वैतागला. "अबे... माझं तोंड बघायला आला आहात का तुम्ही?" एकदा जस्सीकडे बघून शेषा म्हणाला; "गोविंद, तू विसरतो आहेस; जरी आम्ही इतकं छान मराठी बोलत असलो तरी; आमची पहिली भाषा मराठी नाही. त्यामुळे श्लोक आणि त्याचा अर्थ जरी समोर असला तरी हे सगळं नक्की काय आहे ते आम्हाला सांगता येणं अवघड आहे." शेषाच्या बोलण्यावर जस्सी म्हणाला; "बरं, काही क्लू तरी असायला हवा न." त्याच्या त्या वाक्याने संस्कृतीला हसायला आलं. "जस्सी, हाच क्लू आहे. यातून आपल्याला शोधायचं आहे." तिने असं म्हणताच जस्सीने जीभ चावली आणि हसला.

शेषाने संस्कृतीकडे बघितलं आणि म्हणाला; "संस्कृती, तू हे सगळं अजून सोपं करू शकतेस का?" क्षणभर त्याच्याकडे बघून संस्कृतीने तो कागद पुढे ओढला आणि परत एकदा तो श्लोक ती मनात वाचायला लागली. थोड्या वेळाने समोर बघत तिने म्हंटलं; "हे बघा, मी मला कळतो आहे तो अर्थ काढला आहे; बरोबर असेलच असं नाही. पण बहुतेक हाच अर्थ असावा... एका राजाने मनात काहीतरी इच्छा धरून कोणती तरी निर्मिती या विश्वात कोणाच्यातरी मदतीने केली आहे. त्या निर्मितीची दुष्ट मनाच्या लोकांकडून नष्ट होऊ शकते किंवा होणार आहे किंवा झाली आहे... ते लोक त्या राजाच्या आजूबाजूचेच असावेत. त्या दुष्ट प्रवृत्तीच्या लोकांचा शोध तू तुझ्या सोबतच्याच लोकांच्या मदतीने घे. म्हणजे तुला जे जवळचे किंवा विश्वासाचे आहेत त्यांच्या मदतीने... असं असेल. तू एक राजा आहेस हे लक्षात ठेवलेस आणि त्याप्रमाणे योग्य वागलास तर त्या दुष्ट लोकांना शोधून तू तुझी निर्मिती वाचवू शकशील."

संस्कृती बोलायची थांबली आणि गोविंदने परत एकदा तो कागद हातात घेतला. त्याने तो श्लोक आणि त्याचा अर्थ परत एकदा वाचला... तो वाचत असताना संस्कृती एकदम काहीतरी आठवल्यासारखं म्हणाली; "गोविंद, नैनाने अर्थ सांगायच्या अगोदर मला एक विचित्र प्रश्न विचारला होता...."

तिने असं म्हणताच तिघेही सावरून बसले. "म्हणजे?" गोविंदने विचारलं.

"म्हणजे नैनाने अगोदर तो श्लोक वाचला. त्यावेळी मी डोळे मिटून त्याचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करत होते. तिचा श्लोक वाचून झाला आणि मी तिला आपणहून सांगितलं की हा श्लोक गोविंदला मिळाला आहे...." असं म्हणत संस्कृतीने तिच्या आणि नैनामध्ये झालेलं सगळं बोलणं सांगितलं.

"तुमचं नातं नक्की काय आहे... या प्रश्नाचा अर्थ काय?" शेषाने विचारलं.

"तू अजून तीच आहेस.... असं का म्हणाली ती? संस्कृती तुमची दोघींची ओळख इथलीच आहे न?" गोविंदने विचारलं.

"हो रे. ती नक्की कुठून आली आहे ते देखील मला माहीत नाही." संस्कृती म्हणाली.

"तुझं माझं नातं काय? तू अजून तशीच आहेस... मला या श्लोकाचा अर्थ तू सांगू नयेस... असं सगळं ती नैना का म्हणाली? काहीतरी कारण नक्की आहे यामागे." गोविंद म्हणाला.

सर्वांचं बोलणं शांतपणे एकणाऱ्या जस्सीने अचानक संस्कृतीला विचारलं; "ए, तू नैनाला म्हणालीस असं का म्हणालीस की तुझं अंतर्मन तुला सांगतंय की या श्लोकाचा अर्थ कळल्या नंतर अचानक सगळं बदलून जाणार आहे. एक मन म्हणतं आहे की अर्थ समजून न घेता हे सगळं विसरून जाणं बरं. त्याचवेळी दुसरं मन मात्र त्या अनादी-अनंत आणि अनोळखी भविष्याकडे ओढ घेतं आहे..."

जस्सीच्या प्रश्नाने संस्कृती अंतर्मुख झाली. तिघेही तिच्याकडे बघत होते. पण तिचं लक्ष त्यांच्याकडे नव्हत. तिची अचानक बोलता-बोलता तंद्री लागली होती. त्याच नादात ती म्हणाली; "माहीत नाही मी असं का म्हणाले. पण खरं सांगू? हा श्लोक मला त्याच्याकडे ओढतो देखील आहे आणि त्याचवेळी यासगळ्यापासून लांब जावं असं देखील वाटतं आहे. तुम्हाला खरं सांगू का? मला वाटतंय की आपण सगळेच या एका वेगळ्याच जगातल्या वेगळ्या घटनांशी जोडले गेलो आहोत; या श्लोकामुळे. काहीतरी ईश्वरी संकेत आहे यात."

"ए, गप ग. कसला ईश्वरी संकेत घेऊन बसलीस? यार तुम्ही सगळेच उगीच फार सिरीयस होता आहात. अरे यार.... कुठली गुहा त्यात लिहिलेला हा कुठला तरी श्लोक आणि त्या चक्रम नैनाने सांगितलेला त्याचा अर्थ! सगळं अजब आहे. सोडा यार हे सगळं. चला फक्कड चहा घेऊ आणि हे सगळं विसरून जाऊ." शेषा म्हणाला आणि गोविंद, जस्सी आणि संस्कृती एकदम स्थब्द होऊन त्याच्याकडे बघायला लागले. त्यांच्याकडे बघून शेषा एकदम वरमला. "म्हणजे मला म्हणायचं आहे की आपण उगाच एका काहीही आकलन न होणाऱ्या श्लोकाच्या मागे लागलो आहोत. बरं, क्षणभर धरून चालू की यात खूप मोठा अर्थ आहे आणि आपण सगळे त्याच्याशी जोडले गेलो आहोत... तर मग हा नरेश कोण? कुठला? त्याने काय निर्माण केलं? कुठे? कोणाच्या मदतीने? त्याची वाट कोणी लावली? जर वाट लावणारे त्याच्या जवळचे होते तर मग श्लोकात असं का म्हंटलं आहे की जवळच्या लोकांची सोबत असेल तरच फलप्राप्ती होईल?" एका दमात शेषा बोलला.

"तेच तर शेषा! या सगळ्या प्रशांची उत्तरं आपण शोधावीत असं मला वाटतंय. म्हणजे एकदा असं वाटतंय की शोधावीत आणि एकदा असं वाटतंय की सोडून द्यावं हे सगळं." संस्कृती म्हणाली.

"संस्कृती..." गोविंदने संस्कृतीला हाक मारली. त्याच्या आवाजातला फरक फक्त संस्कृती नाही तर जस्सी आणि शेषाला देखील जाणवला. " मला वाटतंय की त्या नैनाला काहीतरी माहीत आहे किंवा कळलं आहे या श्लोकातून. पण कदाचित तिला ते मला कळू द्यायचं नाही आहे. त्यामुळे ते ती तुला सांगत नाही आहे." काही क्षण विचार केल्यावर संस्कृतीला देखील ते पटलं. "हे खरं आहे की तिला तू आवडत नाहीस; आणि ती ते लपुनही ठेवत नाहीय. याचा अर्थ तिला माहीत असूनही ती आपल्याला काही सांगणार नाही. मग आता काय करायचं?" संस्कृती म्हणाली.

गोविंद म्हणाला; "संस्कृती, हा श्लोक किती जुना जुना आहे; त्याची भाषा किती जुनी आहे आणि त्या भाषेच्या लहीज्याचा वापर कुठल्या प्रांतात केला जात होता हे जर आपण शोधू शकलो तर कदाचित काहीतरी क्लुल शकेल."

गोविंदचं बोलणं सगळ्यांनाच पटलं. "पण मग कसं शोधणार आपण हा श्लोक कोणत्या काळातला आहे?" जस्सीने उत्साहाने विचारलं.

"कोणी पुरातन भाषातज्ञ शोधावे लागतील." संस्कृती म्हणाली.

"अबे ज्यादा लंबा नही जाना होगा।" जस्सी परत एकदा उत्साहाने खुलला. "म्हणजे?" गोविंद, शेषा आणि संस्कृती तिघांनी एकदमच विचारलं.

"अरे निशिगंध स्वामी यादव!" जस्सी हसत हसत म्हणाला.

"अबे जस्सी के बच्चे.... ये कोन स्वामी लाया तू? हा गोविंद गुहेतल्या दगडावर श्लोक शोधतो; ही त्याचा अर्थ एका चक्रम बाईकडून आणते आणि आता तू स्वामीला आणतोस. हे काय चालू आहे मला जरा कळेल का?" शेषा थोडा वैतागत म्हणाला.

"मित्रांनो.... मला काहीतरी सांगायचं आहे." गोविंद एकदम गंभीर आवाजात म्हणाला. "शेषा, हे बघ; तुला जर हे काही पटत नसेल न तर तू जाऊ शकतोस. आता लगेच अपमान करून घेऊ नकोस. माझं हे सांगणं फक्त तुलाच नाही; तर या दोघांना देखील आहे. मी अगदी प्रामाणिकपणे सांगतो आहे. तो श्लोक बघितल्या पासून मी मनातून अस्वस्थ आहे. या सगळ्याच्या शेवटापर्यंत जोवर मी पोहोचत नाही; तोवर आता मला शांतता मिळणार नाही आहे. त्यामुळे माझं समाधान होईपर्यंत मी शोध घेत राहणार आहे."

"गोविंद, मला देखील हे सगळं समजून घेण्याची खूप इच्छा आहे. तुझ्याप्रमाणे माझं मन देखील सतत या श्लोकाकडे ओढ घेतं आहे. I am in!" संस्कृती म्हणाली.

फार वेळ न दवडता जस्सी म्हणाला; "हम तो तय्यार है भाई। काहीतरी नवीन आहे. Exciting आहे... आणि सध्या दुसरं करण्यासारखं काही नाही आहे. त्यामुळे मी पण आहे तुमच्या बरोबर."

"फालतू लोक आहात तुम्ही. तुम्हाला सोडून मी कुठे जाणार आहे का? हे सगळं म्हणजे मूर्खपणा आहे...." शेषाने असं म्हणताच तिघेही उसळले. पण त्यांना काहीही बोलू न देताच तो हसत म्हणाला; "पण मी आता असं काहीही म्हणणार नाही आहे. तुम्ही जे काही कराल त्यात मी आहे. आपली मदत झाली तर ठीक; नाहीतर एन्जॉय करणार आपण! बरं, बोला महाराज जगदीश यादव कोण हे स्वामी काढलेत?"

जस्सीला त्याच्या संपूर्ण नावाने हाक मारलेलं आवडत नसे. हे गोविंद आणि शेषाला चांगलं माहीत होतं. तरीही जस्सिची कळ काढण्यासाठी शेषाने त्याचं पूर्ण नाव घेतलं आहे हे गोविंदला लक्षात आलं. त्यामुळे एकदा शेषाकडे वैतागलेली नजर टाकून तो जस्सीला म्हणाला; "लक्ष देऊ नको यार जस्सी त्याच्याकडे. मुद्दाम करतो आहे तो. तू बोल."

खरं तर जस्सीला देखील राग आला होता. पण तरीही शेषाकडे दुर्लक्ष करून तो बोलायला लागला; "निशिगंधस्वामी यादव म्हणजे कोणी स्वामी-बुवा नाहीत. त्यांचं नावच निशिगंधस्वामी आहे. ते पुरातन ते अर्वाचीन म्हणजे नवीन सगळ्याच भाषांचे अभ्यासक आहेत. वाराणसीमध्ये त्यांचा गुरुकुल आहे. ते आपल्याला या श्लोकातील भाषेबद्दल सांगू शकतात."

"जस्सी, यार, शेषा सरळ सरळ चेष्टा करतो आहे. तू काय गोल फिरून करतो आहेस का? एक तर ते जर इतके मोठे गुरुकुल चालवतात तर ते आपल्या या श्लोकाबद्दल आपल्याला माहिती का सांगतील हा पहिला प्रश्न. आणि जर समजा त्यांना आपण विचारायचं ठरवलं तर काय वाराणसीला जायचं का आपण?" गोविंदने विचारलं.

"यार गोविंद, मला काहीतरी कळतं न? अरे, निशिगंधस्वामी यादव माझे काका आहेत." जस्सी म्हणाला आणि गोविंद, शेषा आणि संस्कृती तिघेही धक्का बसून एकदमच ओरडले... "काय? जस्सी?! तू?"

त्यांना जास्त काही बोलू न देता जस्सी बोलायला लागला; "हो! मी वयाच्या सोळा वर्षापर्यंत गुरुकुलात राहून अभ्यास केला. माझे बाबा गणितज्ञ. त्यांची इच्छा होती की मी देखील माझ्या मोठ्या भावाप्रमाणे आणि इतर चुलत भावंडांप्रमाणे शिक्षणात लक्ष घालावं. पण माझं मन त्या पुस्तकांमध्ये रमलं नाही. मला नेहेमीच आजूबाजूच्या निसर्गात राहायला आवडायचं. सतत आखाड्यात वर्जिश करायचो. माझ्या बाबांना ते पटायचं नाही. मी यावरून त्यांचा अनेकदा मार खाल्ला आहे. माझ्या काकांना समजत होती माझी कुचंबणा. शेवटी माझे काका निशिगंधस्वामी मध्ये पडले आणि त्यांनी बाबांना समजावलं की मला पुस्तकी शिक्षणात रस नाही तर मग माझ्यावर जबरदस्ती करण्यात अर्थ नाही. त्यांनी बाबांना सांगितलं; जस्सीला हवं ते करू दे. जबरदस्ती करून कदाचित तो इथे राहील आणि आपल्या इतर पोरांप्रमाणे इथे शिक्षक देखील होईल. पण तो चांगला शिक्षक होणार नाही; कारण मुळात त्याला याची आवड नाही. बाबांना ते पटलं; त्यांनी मला वाराणासीमधून बाहेर पडायची परवानगी दिली. मी खुशीने बाहेर पडलो. निघताना काकांना भेटायला गेलो त्यावेळी त्यांनी मला सांगितलं; आयुष्यात कोणतीही नशा करायची नाही आणि आपलं मूळ विसरायचं नाही. कधीही अडचण आली तर मोकळेपणी आपल्या घराकडे वळायचं. त्यानंतर मी इथे आलो; आणि निघाल्यापासून आजपर्यंत काकांशी माझा रेग्युलर कॉन्टॅक्ट आहे."

"अरे वा जस्सी. तू तर एकदम छुपारुस्तुम निघालास रे. जबरदस्त आहे की तुझा इतिहास." संस्कृती हसत म्हणाली.

"ते सगळं ठीक. पण तुझ्या काकांना भेटायला जायला लागेल न. ते कसं जमवायचं?" गोविंदने विचारलं.

"यार, आपलं नशीब जोरदार आहे. पौराणिक भाषा आणि त्याचं विश्लेषण याविषयावर बोलण्यासाठी ते सध्या इथे आले आहेत. आत्ता घरीच असतील. चला आत्ताच जाऊया घरी." जस्सी म्हणाला आणि चौघेही उत्साहाने निघाले.

जस्सीने घरी पोहोचताच त्याच्या काकांना गोविंद, शेषा आणि संस्कृतीची ओळख करून दिली आणि त्यांच्या येण्याचं कारण देखील सांगितलं.

"अरे वा! एकदम इंटरेस्टिंग आहे तुमचा सगळाच अनुभव." निशिगंधस्वामी म्हणाले. "बघू बरं तो श्लोक. आणि मला तो गोविंदने काढलेला फोटो देखील दाखवा हं." वेळ न दवडता ते म्हणाले. संस्कृतीने श्लोक लिहिलेला कागद आणि फोटो दोन्ही त्यांच्या हातात दिलं. निशिगंधस्वामी तो फोटो बराचवेळ बघत होते. मग त्यांनी श्लोक लिहिलेला कागद हातात घेतला.

"या श्लोकाचा अर्थ कोणी लिहिला आहे इथे?" त्यांनी वर बघत प्रश्न केला.

"माझी एक मैत्रीण आहे होस्टेलमध्ये. ती पी. एचडी. करते आहे. तिने लिहून दिला तो अर्थ. चुकला आहे का?" संस्कृतीने विचारलं.

"नाही नाही. उलट अगदी बरोबर लिहिला आहे अर्थ. म्हणून तर आश्चर्य वाटलं मला. खरं तर ही भाषा समजायला तशी अवघड. कारण या भाषेला व्याकरण असं नाही." निशिगंधस्वामी म्हणाले.

"म्हणजे?" गोविंदने विचारलं.

"म्हणजे असं या भाषेला प्राकृत भाषा म्हणतात. प्राकृत हा शब्द प्रकृतीवरून आला. प्राकृत म्हणजे जे नैसर्गिक आहे ते. प्राकृत म्हणजे जनसामान्यांची भाषा. या भाषेचा उगम लक्षात घेता तिचे व्याकरण फार समग्र नव्हते. संस्कृतच्या मानाने प्राकृत भाषेतली व्यंजने, व्याकरण हे मर्यादित होतं. बऱ्याच जुन्या संस्कृत नाटकांमध्ये उच्चभ्रू लोकांची भाषा संस्कृत, तर इतर लोकांची भाषा प्राकृत दिसते; त्याचं तात्कालिक कारण देखील प्राकृत भाषेतील व्याकरणातील कमजोरी हे असावं. लेखी आणि कामकाजाच्या भाषेसाठी प्राकृताचा वापर न होता संस्कृत वापरली जात असावी; ते याचमुळे.

इ.स.पूर्व ६व्या शतकात प्राकृत भाषा बोलली गेल्याचे पुरावे आढळतात. तर सम्राट अशोकाच्या कारकिर्दीत लेखी प्राकृताचे पुरावे मिळालेले आहेत. प्राचीन व मध्ययुगीन भारतात सुमारे ३८ प्राकृत भाषा बोलल्या जात, असे सांगितले जाते. असे असले तरी तत्कालीन समाजव्यवस्थेमुळे या भाषांना मातृभाषेचा किंवा राज्यभाषेचा दर्जा प्राप्त नव्हता.

प्राकृत भाषेचे प्रमुख प्रकार असे:

वेदकालीन प्राकृत- प्राथमिक अवस्था.
मध्ययुगीन प्राकृत - पाली, महाराष्ट्री, शौरसेनी इत्यादी
महाराष्ट्री- शौरसेनी सारख्या भाषांची अपभ्रंश भाषा

वेदपूर्वकालीन भाषा, वैदिक भाषा, संस्कृत, प्राकृत, अपभ्रंश भाषेच्या स्वरूपावरुन प्रत्येक भाषेतील काही वैशिष्ट्ये मराठी भाषेत दिसतात. त्यामुळे मराठी ही वेदपूर्वकालीन भाषेपासून, संस्कृतपासून, पालीपासून, प्राकृत भाषेपासून, महाराष्ट्री किंवा अपभ्रंश भाषेपासून तयार झाली असावी असं मानलं जातं.

काही प्राकृत भाषा याप्रमाणे - मागधी, शौरसेनी, पैशाची, महाराष्ट्री भाषा, अर्धमागधी भाषा, अपभ्रंश भाषा, पाली इत्यादी. यापैकी महाराष्ट्री भाषा ही भाषा सातवाहन राज्यकाळातील प्रमुख भाषा गणली जाते. या भाषेत साहित्य लिहिले गेल्याचे पुरावे मिळतात. ख्रिस्तपूर्व काळातील प्राकृत शिलालेखही सापडले आहेत, सातवाहन राजा हलाने प्राकृत कवितांचे संकलन केल्याचे उल्लेख मिळतात. मराठी हे महाराष्ट्री भाषेचे सुधारित रूप आहे.

बरं, हे सगळं झालं प्राकृत भाषेविषयी. यातलं तुमच्यासाठी महत्वाचं म्हणजे या श्लोकामध्ये वापरलेली भाषा. या भाषेचा वापर साधारण इसवीसनाच्या सहाव्या शतकात केला होता. इथे जो अर्थ लिहिला आहे तो देखील बरोबर आहे... पण तुम्ही जो अर्थ काढता आहात तो थोडा चुकतो आहे. बघा श्लोक काय आहे....

सृष्टी निर्माता नच जरी स्व हा।
तुझी कामना पूर्त विश्वात।

म्हणजे;

हा श्लोक ज्याच्यासाठी आहे तो (स्व) तो जरी सृष्टी निर्माता नाही; तरी तुझी (या स्व ची) (कामना) इच्छा याच विश्वात पूर्ण होईल आणि त्याने इच्छा केलेली निर्मिती होईल.

याचा अर्थ; त्या 'स्व' ची काहीतरी निर्मिती करण्याची इच्छा आहे आणि ती कोणीतरी पूर्ण करतं आहे. पण पुढच्या संपूर्ण श्लोकामध्ये त्या इच्छा पूर्ण करणाऱ्यांचा उल्लेख नाही. त्या नरेशाला त्याच्या आप्तांकडून धोका झाला आहे; आणि तरीही त्याने त्याच्या जवळच्यांवर विश्वास ठेवणे आवश्यक आहे. सगळं बरोबर आहे... पण त्या नारेषाच्या इच्छेप्रमाणे निर्मिती करणारे ते कोण हे जास्त महत्वाचं आहे."

काका बोलायचे थांबले आणि मंत्रमुग्ध होऊन त्यांचं ओघवतं बोलणं ऐकणारे गोविंद, संस्कृती, शेषा आणि जस्सी एकदम भानावर आले.

"काय रे पोरांनो, झोपलात का?" काका हसत म्हणाले.

"नाही नाही काका. किती छान माहिती दिलीत तुम्ही. ही प्राकृत भाषा आहे सहाव्या शतकातली आहे... पण नक्की कुठली. म्हणजे कोणत्या भागातली ते कसं कळेल?" गोविंदने विचारलं.

"बेटा, थोडं अवघड आहे. पण नक्की सांगेन. मी आजच वाराणसीला जायला निघतो आहे. रात्री पोहोचेन. ही भाषा माहाराष्ट्रातली नक्की! मात्र कुठल्या भागातली याचा माझ्याकडच्या पुस्तकांमध्ये बघून अभ्यास करतो आणि जस्सीला उद्यापर्यंत कळवतो. ठीक?" काका म्हणाले.

"हो चालेल न." गोविंद म्हणाला.

"बरं, मुलांनो... आता फक्त एकाच प्रश्नाचं उत्तर द्या. का शोधता आहात तुम्ही हे सगळं?" काकांनी गंभीर होत विचारलं.

"माहीत नाही काका. पण हा श्लोक वाचल्यापासून आम्ही... विषेशतः मी आणि गोविंद खूप अस्वस्थ आहोत. त्यामुळे जोपर्यंत मन शांत होत नाही तोपर्यंत शोध घ्यायचा असं आम्ही ठरवलं आहे." संस्कृतीने उत्तर दिलं.

"ठीक! All the best. मी माझ्याकडून होईल ती मदत करतोच आहे. अजून काही लागलं तर निःसंकोचपणे विचारा. पण ते पुढे. चला; मला निघायला हवं. माझ्या फ्लाईटची वेळ झाली." असं म्हणून काका उठले.

जस्सीच्या घरून बाहेर पडताना गोविंद, संस्कृती आणि शेषाच्या चेहेऱ्यावर एक समाधान होतं.

क्रमशः