Friday, January 29, 2021

प्रवास (भाग 5)

 


प्रवास

भाग 5

आनंद (?) खोलीबाहेर पडला तो थेट मागच्या दाराने घराबाहेर गेला. त्याची पावलं भराभर पडत होती. तो भिकुच्या झोपडीजवळ आला. झोपडीमध्ये शिरण्याअगोदर त्याने एकदा मागे वळून वाड्याकडे बघितलं आणि मग तो त्या झोपडीत शिरला.

***

मनाली खोलीत शिरली आणि तिने अगोदर मोबाईल हातात घेत किती वाजले आहेत ते बघितलं. दुपारचे बारा वाजून गेले होते. ते पाहून मनालीला धक्काच बसला.

मनाली : बारा वाजून गेले? अरे बापरे! इथे एकूणच या झाडांच्या गर्दीमध्ये बाहेरच्या जगाशी संबंध तुटतो आणि त्यात या थंडगार वातावरणामुळे तर वेळेचा अंदाजच येत नाही.

अस म्हणत तिने अनघाला हाक मारली. मनालीच्या पहिल्या हाकेतच अनघा उठली. तिने डोळे चोळत मनालीकडे बघितलं.

मानली :अनघा, किती वाजले आहेत तुला माहीत आहे का?

अनघाने मनालीकडे प्रश्नार्थक नजरेने बघितलं.

मनाली : अग, बारा वाजून गेले आहेत.

मनालीच्या त्या वाक्याने अनघा एकदम उठून बसली आणि तिने तिचा फोन हातात घेतला.

अनघा : हा मेला!

अनघाकडे नीटसं लक्ष नसलेली मनाली अनघाच्या त्या शब्दांनी एकदम दचकली आणि पटकन अनघा जवळ जात तिने अनघाचा हात धरला.

अनघा :अग सारखी काय घाबरतेस? माझा फोन बंद पडला आहे असं म्हणायचं होतं मला. तुझ्याकडे चार्जर आहे न? दे न मला. माझा बहुतेक विसरले आहे मी. काल गरज नाही पडली न.

मनाली : अग माझा फोन पण बंद पडला होता. आत्ताच चार्जिंगला लावला आहे मी. बघ न. जेमतेम 12% चार्ज झाला आहे.

असं म्हणत मनालीने फोन हातात घेतला.

मनाली : अरेच्या! चार्जिंग नाही होते. काय झालं आता?

अनघा : अग वीज गेली असेल. दिवा किंवा पंखा लावून बघ बघू.

अनघाच्या बोलण्याने मनालीचं मन थोडं खट्टू झालं. तिने उठत पंख्याचं बटण लावलं. पंखा चालू झाला नाही. ते पाहून अनघा हसली आणि मनाली अजूनच वैतागली.

मनाली : अग मोबाईल नाही म्हणजे एकदम आयुष्य संपल्यासारखं वाटतं ग.

अनघा : मनाली नको ते काहीतरी नको ह बोलुस सकाळी सकाळी.

मनाली : सकाळी?

मनालीच्या त्या एका शब्दाने अनघा आणि मनाली खळखळून हसल्या. पलंगावरून खाली उतरत अनघा म्हणाली;"ए मी फ्रेश होऊन येते. तोपर्यंत त्या भिकुला हाक मारून तू त्याला चहा आणि त्यासोबत काहीतरी खायला करायला सांगशील का?"

अनघाकडे बघत मनाली म्हणाली;"तू ये ग फ्रेश होऊन मग एकत्रच बाहेर जाऊ. तू भिकुला काय ते सांग आणि मी नवीन आणि मंदारला उठवते. ठीक?"

मनालीकडे बघत अनघा हसली आणि 'ओके' अशी मान हलवत बाथरूममध्ये गेली. अनघा आत गेल्यावर मनाली काहीतरी गुणगुणत सहज म्हणून खिडकीकडे वळली आणि तिला जाणवलं की खिडकीबाहेर कोणीतरी उभं आहे. पण खिकडीबाहेरच्या झाडांमुळे कोण आहे ते तिला कळत नव्हतं. त्यामुळे कोण उभं आहे ते बघण्यासाठी ती खिडकीच्या अजूनच जवळ गेली पण ती खिकडीजवळ आल्याचे लक्षात आल्यामुळे असेल किंवा दुसऱ्या कारणामुळे असेल पण तिथे जे कोणी उभं होतं ते एकदम तिथून निघून गेलं. मनालीला त्या एका घडनेमुळे अस्वस्थ वाटायला लागलं. तिला रात्री घडलेले सगळेच प्रसंग एकामागोमाग एक आठवायला लागले आणि ती एकदम घाबरून गेली. ती परत मागे वळली आणि त्याचवेळी अनघा बाथरूममधून बाहेर आली. मनाली अनघाकडे वळत म्हणाली;"कोणीतरी बाहेर उभं होतं." अनघाला त्यात काहीच वावगं वाटलं नाही. त्यामुळे खांदे उडवत ती म्हणाली;"मग?"

मनाली : अनघा, कोणीतरी आपल्या खिडकीबाहेर उभं राहून निरीक्षण करत होतं आत. यात तुला काही वेगळं नाही वाटत?

अनघा : अग मनाली; एकतर इथे आजूबाजूला फार कोणी राहात नाही. जे राहातात ते अगदीच गावंढळ आणि साधी माणसं आहेत. त्यामुळे त्यांना वाड्यावर कोण येतं त्याबद्दल एक कुतूहल असतं. त्यामुळे वाड्यावर जाग दिसली की येतात उगाच बघायला. तू फार मनावर घेऊ नकोस ते. चल आपण बाहेर जाऊ.

असं म्हणून अनघा मनालीला घेऊन बाहेर आली आणि म्हणाली;"तू नवीन, मंदार आणि आनंदला उठव. मी भिकुला हाक मारून चहा आणि खाण्याचं बघते. बघ एक वाजून गेला आहे. आता ब्रेकफास्ट नावाचा फार्स न करता व्यवस्थित काहीतरी खाऊन घेऊया आणि लगेच निघुया असं मला वाटतं. काय?"

मनाली अनघाकडे मोठे डोळे करून बघत म्हणाली;"तुला कसं कळलं एक वाजून गेला आहे? तुझा मोबाईल तर बंद आहे न?"

त्यावर तिच्या टपलीत मारत अनघा म्हणाली;"अहो भितरट भागूबाई या घरात घड्याळ आहे म्हंटलं. समोर बघ." आणि खो-खो हसायला लागली. समोरच्या घड्याळाकडे बघून मनाली देखील खदखदून हसायला लागली. त्यांच्या हसण्याचा आवाज ऐकून नवीन आणि मंदारला जाग आली. ते दोघेही उठून बसले. पण दोघांनाही काहीसं चक्कर आल्यासारखं वाटलं आणि तसेच परत आडवे पडले. एकमेकांकडे बघत त्यांनी कपाळाला आठ्या घातल्या. क्षणभराने डोकं गच्च धरत मंदारने अनघा आणि मनालीला हाक मारली;"ए माहामायांनो! ही काय हसायची वेळ आहे का? अजून आमची उठायची वेळ देखील झालेली नाही. तुमची झोप पूर्ण झाली म्हणजे सगळं जग जागं झालं की काय? किती मोठ्याने हसताय आणि ओरडताय!" मंदारचा आवाज ऐकून अनघा आणि मनाली त्यांच्या खोलीमध्ये गेल्या.

मंदार आणि नवीन अजूनही पलंगावर पडून होते. त्यांच्याकडे बघत मनाली म्हणाली;"ए कुंभकरणाच्या अवलादांनो! घड्याळ बघा. दुपारचा एक वाजून गेला आहे. नवीन वर्षाची सुरवात अशी करायची आहे का तुम्हाला? उठा आता."

नवीन मोबाईल शोधत म्हणाला;"काय सांगतेस मनाली? दुपारचा एक वाजून गेलासुद्धा? आयला! म्हणजे असे किती तास आम्ही झोपलो आहोत? आईशप्पथ! मला तर आठवत देखील नाही कधी झोपलो.... कसे झोपलो!!!"

अनघाकडे बघत मनाली म्हणाली;"नवीन, तू आमच्या खोलीतून आलास आणि थेट तुमच्या खोलीत शिरलास. बहुतेक लगेच झोपलाच असशील न?"

नविनला काही केल्या रात्री तो कधी आणि कसा झोपला ते आठवत नव्हतं. त्याने मंदारकडे बघितलं आणि विचारलं; "यार तू कधी झोपलास? मला तर काहीही आठवत नाही. अनघाशी बोलायला गेलो होतो त्यानंतर नक्की काय घडलं कोणजाणे? त्यानंतर आत्ता जाग येते आहे; आणि इतकंच आठवतंय."

मंदार अजूनही डोकं धरून होता. पाळीपाळीने अनघा, मनाली आणि नविनकडे बघत तो म्हणाला;"मी? मी कधी झोपलो? काय माहीत कधी झोपलो. अग मनाली आपण दोघे तर गप्पा मारत बसलो होतो न? मग तू कधी उठून गेलीस? की आपण दोघे एकत्रच उठलो? काहीही आठवत नाही आता."

मंदारचं बोलणं ऐकून मनाली एकदम कावरी-बावरी झाली. कारण आनंदने अनघाला प्रपोज केलेली गोष्ट ती नकळत मंदारला बोलून गेली होती; हे तिला आठवलं. अर्थात ही घटना अनघाला सगळ्यांना सांगण्याची इच्छा आहे किंवा नाही याची तिला कल्पना नव्हती. त्यामुळे आता जर मंदारने त्यांच्या गप्पांचा उल्लेख केला तर परत अनघा आणि तिच्यात वाद होईल याची तिला कल्पना आली. त्यामुळे ती घाईघाईने म्हणाली;"मला काय माहीत तू काय करत होतास? अनघा आनंदवर वैतागून खोलीत गेली... तिच्या मागे तिला समजावायला नवीन गेला... तू आणि मी दिवाणावर बसलो होतो तर आनंद समोर आला. मला त्याच्या वागण्याचा राग आला होता; म्हणून मी त्याच्याशी बोलणं टाळायला माझ्या खोलीकडे गेले. बस्! मला तर इतकंच माहीत आहे. तू कधी गेलास झोपायला मला काय माहीत. तू आणि आनंद तर गप्पा मारत बसला नव्हतात न? आणि नवीन मी खोलीत शिरताना तू बाहेर पडलास आमच्या खोलीतून. मग तू काय केलंस? तुम्ही मुलगे किती वेळ जागत होतात आणि काय करत होतात? infact त्यावेळी बाहेरून नको नको ते आवाज येत होते. आम्ही दोघी किती घाबरलो होतो. पलंगावरून खाली उतरून तुम्हाला हाका मारायला येण्याची देखील हिम्मत नव्हती आमच्यात. मग तशाच झोपलो आम्ही घाबरत-घाबरत."

तिचं बोलणं ऐकून मंदार आणि नवीन अजून गोंधळले.

मंदार : नको-नको ते आवाज? म्हणजे काय म्हणायचं आहे तुला मनाली?

त्याच्या प्रश्नाने वैतागत मनाली म्हणाली;"come on मँडी! एका सेकंदात झोपलात का तुम्ही? अरे कोल्हे ओरडत होते बाहेरून. अगदी वाड्याच्या जवळून. जस काही फेऱ्या मारत होते वाड्याला. तुम्हाला कळलं नाही? कमाल आहे?!"

तिचं बोलणं ऐकून मंदार आणि नवीन अजूनच बुचकळ्यात पडायला लागले होते.

नवीन : कोल्हे ओरडत होते? कधी? काल रात्री? आयला!!! आणि मला कळलं नाही? यार!!! काय मुली आहात. हाका मारल्या असत्या तुम्ही तर किमान फोटो तरी काढले असते ना कोल्ह्यांचे.

त्याच्या या बोलण्याने मात्र अनघा वैतागली.

अनघा : फोटो काढणार होतास कोल्ह्यांचे? मग आपण दिवाणखान्यात बसलो होतो आणि अचानक त्यांचे आवाज यायला लागले त्यावेळी का नाही गेलास बाहेर? तेव्हा का फाटली होती तुझी?

अनघाचं टोचून बोलणं नविनला लागलं. त्याचा चेहेरा एकदम उतरला. मंदारला ते लक्षात आलं. तो अनघाकडे बघत म्हणाला;"अनघा, काहीही काय बोलते आहेस? आपण बसलो होतो तेव्हा कोल्ह्यांच्या ओरडण्याचा आवाज कधी आला होता ग? If am not mistaken; आपण बाहेर बसलो होतो तेव्हा एकदा एकदम आवाज आला आणि आपण सगळे घरात येऊन बसलो. मग थोड्या गप्पा झाल्या आणि मग....... मग! मग??? मग काय झालं? मला काहीही आठवत नाही. पण बहुतेक आपण झोपलो."

नवीन आणि मंदारला काहीही आठवत नाही हे मनालीला थोडं विचित्र वाटलं. पण तिला त्याविषयी फार चर्चा नको होती. कारण एकतर जर मंदारने चुकून आनंद आणि अनघाच्या प्रपोजवाल्या घटनेचा उल्लेख केला असता तर कदाचित अनघाला आवडलं नसतं... कदाचित आनंदला देखील! त्यामुळे मनाली टार्गेट झाली असती; आणि त्याहूनही जास्त महत्वाचं म्हणजे काल रात्रीच्या आठवणी फार काही चांगल्या नव्हत्या... त्यामुळे तिची भिती वाढली असती. त्यामुळे ती सगळ्यांकडे आळीपाळीने बघत म्हणाली;"यार काल की बात पुरानी.. पिछ्ले साली की थी ना! भूल जाओ. आज नवीन वर्षाचा पहिला दिवस उगवला आहे. नवीन सुरवात होणार आहे. त्यामुळे.... नवीन नावाच्या माझ्या मित्रा उठ आणि फ्रेश होऊन बाहेर ये." तिचा कोटी करण्याचा केविलवाणा प्रयत्न बघून सगळेच हसले. नवीन आणि मंदारला थोडं गरगरल्या सारखं होत होतं. पण दोघेही पलंगावरून खाली उतरले आणि म्हणाले;"तुम्ही काहीतरी खाण्याचं बघता का ग. आम्ही आलोच... आणि तो अन्या उठला आहे का ते पण बघा."

ते दोघे उठलेले बघून अनघा आणि मनाली हसत हसत खोलीच्या बाहेर आल्या. अनघाची नजर आनंदच्या खोलीकडे वळली. खोलीचं दार उघडं होतं. तिला खोलीत डोकावून बघण्याचा खूप मोह झाला. पण अजूनही ती रात्रीचा अपमान विसरली नव्हती. त्यामुळे त्याच्या खोलीकडे दुर्लक्ष करून ती स्वयंपाकघराकडे वळली. अनघाने आनंदच्या खोलीकडे जाण्याचं टाळलेलं मनालीच्या लक्षात आलं. पण ती काहीच बोलली नाही. खरंतर काल रात्रीच्या सगळ्या घटनांनंतर तिच्या मनात आनंद बद्दल एक विचित्र भीती निर्माण झाली होती. अर्थात ती हे कोणाकडे बोलू शकत नव्हती. त्यामुळे काही एक न बोलता ती देखील अनघा सोबत स्वयंपाकघरात गेली.

मंदार आणि नवीन उठले खरे पण दोघांचंही डोकं खूप दुखत होतं. नवीन मंदारकडे बघत म्हणाला;"यार मँडी, डोकं खूप दुखतं आहे रे. काय कारण असेल काय माहीत. साधी बिअर तर प्यायलो होतो आपण. ती पण लिमिटमध्ये. आपण झोपायला गेलो... पण मग सगळेच परत बाहेर आलो. मग अनघाचं आणि अन्याचं काहीतरी कारणावरून वाजलं आणि ती फणफणत तिच्या खोलीत गेली आणि तिला समजावायला मी गेलो इतकंच आठवतंय मला. यार झोपायला कधी आलो... परत पीत बसलो होतो का... काहीही आठवत नाही मला."

मंदार देखील स्वतःचं डोकं दाबत म्हणाला;"यार मला पण काहीही आठवत नाही आणि माझं डोकं पण जाम दुखतंय. नवीन... यार तुला असं नाही का वाटत की इथे काहीतरी abnormal घडतंय. किंवा काहीतरी वेगळं आहे नेहेमीपेक्षा?"

मंदार असं म्हणाला आणि तितक्यात आनंद खोलीत आला. आनंदला येताना बघून काहीतरी बोलायला तोंड उघडलेला नवीन गप्प बसला आणि बाथरूमकडे गेला. आनंदला बघून मंदारला देखील काही फार बरं नाही वाटलं. पण तो काही बोलला नाही. आनंद मंदारच्या शेजारी बसत म्हणाला;"मँडी कसं वाटतंय आता तुला? रात्री तुला काहीतरी त्रास व्हायला लागला होता न? मीच नाही का आणून सोडलं तुला तुझ्या पलंगावर. बरा आहेस न आता?"

आनंदचं बोलणं ऐकून मंदारला आश्चर्य वाटलं.

मंदार : मला कसला त्रास झाला?

आनंद : माझा!!!

मंदार : काय?

आनंद काहीतरी बोलणार होता तेवढ्यात नवीन बाथरूममधून बाहेर आला. नविनला बघताच आनंदने विषय बदलला आणि हसत म्हणाला;"यार गंमत करत होतो. चल उठ फ्रेश होऊन बाहेर ये. चल नवीन आपण जाऊया बाहेर." अस म्हणून आनंद नवीन सोबत दिवाणखान्यात आला. नविनच्या मनात अजूनही आनंदबद्दल राग होता. अर्थात त्याला या रागाचं कारण आठवत नव्हतं. त्यामुळे तो आनंदशी काहीही न बोलता स्वयंपाकघराकडे गेला. त्याने आत डोकावलं तर अनघा चहा बनवत होती आणि मनाली बाजूला उभी होती. मनालीकडे बघत नवीन म्हणाला;"मनली तुझा चार्जर घेऊ का जरा. माझा फोन बंद झालाय." त्याच्याकडे बघत हसत मनाली म्हणाली;"हो घे की. पण चार्जिंग होणार नाही ह." नवीन गोधळून तिच्याकडे बघायला लागला. त्यावर ती म्हणाली;"अरे वीज गेली आहे इथे. कोणाचाही मोबाईल चार्ज होणार नाही. माझा पण जेमतेम 12 टक्के चार्ज झाला होता आणि आता 9 टक्क्यांवर आलाय." तिचं बोलणं ऐकून नवीन थोडा वैतागला आणि काही एक न बोलता बाहेर गेला. अनघाने चहा होताच सगळ्यांसाठी कप भरले. मनालीने एका प्लेटमध्ये थोडी बिस्किटं काढली आणि दोघी बाहेर आल्या. बाहेर आनंद, नवीन आणि मंदार बसले होते पण कोणीही कोणाशीही बोलत नव्हतं. सगळ्यांनी चहा घेतला. अजूनही सगळेच शांत होते. शेवटी अनघा उभी राहात म्हणाली;"तो भिकू काय करतो आहे बघून येते. आता एकदम जेऊन घेऊ आणि निघुयाच." बाकीच्यांनी तिच्या म्हणण्यावर मान डोलावली. पण आनंद तिची नजर चुकवत मंदारकडे बघत म्हणाला;"तो भिकू पिऊन टाईट होऊन पडला असेल आता. काल आपल्या पैशांची फुकट मिळाली आहे न. सोडा त्याला. मीच बाहेर जाऊन काहीतरी घेऊन येतो. खाऊन घेऊ आणि निघू." असं म्हणून इतरांचं मत समजून घेण्याच्या भानगडीत न पडता तो उठून उभा राहिला.

मनालीला हा प्लॅन फार काही पटला नाही. ती पटकन उभी राहात म्हणाली;"अरे आपण सगळेच तयार होऊन बाहेर पडुया न. जेऊ आणि तसेच निघू. काय?"

अनघाला देखील तिथे फार थांबायची इच्छा नव्हती. त्यामुळे ती देखील उभी राहिली. पण मंदार म्हणाला;"यार खाऊन मग तयारी करूया प्लीज. मला खूप त्रास होतो आहे. माहीत नाही नक्की कसला. पण डोकं दुखतं आहे. खरं तर भूक पण लागली आहे. आपण तयार होऊन बाहेर पडणार; मग खानावळ शोधणार मग खाणार. यात खूप वेळ जाईल यार. आनंद आणतो आहे तर आणू दे ना. तोपर्यंत आपण सगळे तयार होऊन बसूया." मंदारच्या बोलण्यावर नविनने देखील मान डोलावली. कारण त्याचं डोकं देखील अजूनही जड होतं.

मंदारचं बोलणं ऐकून आनंदने एकदा मनालीकडे बघितलं आणि तो घराबाहेर निघून गेला. तो गेलेल्या दिशेने बघत मनाली म्हणाली;"friends, let me tell you... there's something fishi about this person. He is not our Anand!!!"

तिचं बोलणं ऐकून अनघाच्या डोळ्यात पाणी उभं राहिलं आणि ती पटकन बेडरूमकडे पळाली. मंदार आणि नविनला देखील मनालीचं म्हणणं पटलं होतं. पण ते दोघेही काहीच बोलले नाहीत. एकदा त्यादोघांकडे बघून मनाली देखील बेडरूमच्या दिशेने जात म्हणाली;"यार, तुम्ही मान्य करा किंवा नाही.... पण हा आनंद बदलला आहे आणि मला आता इथे थांबायची खरंच खूप भिती वाटते आहे. त्यामुळे तो आला की लगेच खाऊन निघणार आहोत हा आपण. प्लीज त्यावेळी काही नाटकं करू नका. I beg of you both."

मनाली गेली आणि मंदार आणि आनंद एकमेकांकडे बघत तसेच बसून राहिले. त्यांना तिथून उठून तयारी करायला जायची इच्छाच होत नव्हती. असा किती वेळ गेला कोण जाणे. मुली अजूनही त्यांच्या खोलीतच होत्या आणि मंदार आणि नवीन दिवाणखान्यातच बसून होते. सहज मंदारचं लक्ष स्वयंपाकघराकडे गेलं तर तिथे हाताची घडी घालून यादोघांकडे खुनशीपणे बघत उभा असलेला भिकू त्याला दिसला. भिकुला असं बघून मंदार एकदम दचकला आणि ताठ बसत त्याने नविनला खूण केली. नविनने देखील स्वयंपाकघराकडे बघितलं आणि तिथे भिकुला बघून तो पण दचकला. चेहेऱ्यावर कोणतेही भाव न दाखवता मंदार उभा राहिला आणि भिकुकडे बघत म्हणाला;"अरे आनंद... म्हणजे तुझे मालक... बाहेर गेले आहेत. तू नंतर ये." भिकूने मात्र मंदारकडे दुर्लक्ष केलं आणि तो तसाच तिथे उभा राहिला. उलट आता त्याच्या डोळ्यातला खुनशीपणा वाढला होता.

तो तिथेच उभा आहे हे बघून मंदार आणि नवीन उठून त्यांच्या खोलीच्या दिशेने जायला लागले. त्याबरोबर भिकू त्यांच्या समोर येऊन उभा राहिला. आता खोली आणि मंदार-नवीन यांच्या मध्ये भिकू होता. भिकूने हात पाठीकडे ठेवले होते आणि तो अर्धवट मान खाली घालून तिरप्या नजरेने मंदार-नविनकडे बघत होता. त्याच्या तशा बघण्याने मंदार आणि नवीन अस्वस्थ झाले आणि एक पाऊल मागे सरकले. ते मागे जात आहेत हे लक्षात येऊन भिकू पुढे यायला लागला. मंदार आणि नवीन पूर्णपणे गोंधळून गेले होते. नक्की काय करावं ते त्यांना सुचेना. तेवढ्यात अनघा दिवाणखान्यात आली. समोर भिकुला बघून ती तिच्या भुवया ताणल्या गेल्या आणि एकदम ती ओरडली;"भिकू!!! भिकू?? काय करतो आहेस? मागे हो बघू."

तिचा आवाज ऐकताच भिकू पुढे येता-येता थांबला. पण त्याची नजर अजूनही मंदार आणि नाविनवर खिळलेली होती. अनघाला बघताच मंदार तिच्याजवळ सरकला आणि म्हणाला;"ए आवर ग हे धूड. आनंद म्हणाला ते खोटं नाही. बहुतेक खूप प्यायला आहे तो. डोकं ठिकाणावर नाही वाटत त्याचं. जायला सांग बघू त्याला आणि तो गेल्यावर आपण दारं लावून घेऊ आतून."

मंदारचं बोलणं ऐकून भिकू एकदम बिथरला. झटकन पुढे येत त्याने मंदारची मान पकडली आणि म्हणाला; "मालकांच्या वाड्यावर कोणीही हक्क सांगू शकणार नाही. हा वाडा मालकांचा आहे. समजलं?" बोलताना भिकू मंदारची मान जोरात दाबत होता. त्यामुळे मंदारचा श्वास अडकल्यासारखं व्हायला लागलं. तो खुसमटल्यामुळे ओरडायचा प्रयत्न करायला लागला. बाहेर चाललेला आवाज ऐकून मनाली खोलीच्या दारात आली. भिकू अचानक असं काहीतरी करेल असं अनघाला वाटलं नव्हतं. त्यामुळे ती एकदम अवाक होऊन समोर घडणारं नाटक बघत होती. नक्की काय करावं तिला सुचेना..... आणि अचानक भिकुच्या मागून त्याच्या मानेवर कसलातरी प्रहार झाला. भिकूने मंदारचा गळा सोडला आणि आपली मान धरत तो मागे वळला. भिकुची मागे नवीन उभा होता. त्याच्या हातात पितळ्याचा मोठा फ्लॉवरपॉट होता. भिकू धडपडत नविनच्या दिशेने वळला. आता तो नविनला धरणार एवढ्यात मनालीने हाताला लागलेल्या मोठ्या लॅम्पशेडने भिकुवर मागून प्रहार केला.

खरंतर मनालीच्या अंगात असा कितीसा जोर असणार? पण दारू प्यायलेला असल्याने भिकुचा स्वतःवर ताबाच नव्हता. तो धडपडत मागे गेला आणि खाली पडला. होणारा प्रकार बघून अनघा एकदम गडबडली आणि ओरडली; "अरे.... अरे.... थांबा! त्याला का मारताय तुम्ही? तो तसा harmless आहे." तिचं बोलणं ऐकून मंदार चिडला आणि म्हणाला;"हा माणूस harmless आहे अनघा? तुला वेड लागलं आहे का? अग काही कारण नसताना त्याने माझ्यावर हल्ला केलाय... आणि harmless असला तरी आत्ता त्याचं डोकं फिरलंय त्याचं काय? तो काहीही करू शकतो आणि आपल्यावर भारी पडू शकतो हे तुला कळतंय का?"

मंदार इतकं बोलेपर्यंत भिकू परत उभा राहिला होता. काळाकभिन्न धिप्पाड भिकू त्याचे लाल डोळे गरागरा फिरवत नाविनवर चालून गेला. ते बघून अनघा परत एकदा बेंबीच्या देठापासून ओरडली;"भिकू थांब आधीच्या आधी. मालकांची शपथ आहे तुला."

ती असं म्हणताच भिकू होता तिथेच थांबला. पण आता तो एखाद्या पिसाळलेल्या जंगली कुत्र्यप्रमाणे गुरगुरत होता. तो ऐकूण प्रकार बघून मंदार आणि नवीन एकदम अनघाशेजारी येऊन उभे राहिले. भिकू देखील वळून त्यांच्या दिशेने बघायला लागला. वातावरण इतकं ताणलं गेलं होतं की कोणाच्याही लक्षात येत नव्हतं नक्की काय केलं पाहिजे. भिकुचा तो अवतार बघून अनघा देखील मनातून पुरती घाबरली होती. पण तिच्या लक्षात आलं होतं की भिकूने ऐकलं तर फक्त तिचं तो ऐकणार होता... आणि त्याने ठरवलं तर या चौघांचं काही खरं नव्हतं. त्यामुळे हलकेच एक पाऊल पुढे येत ती भिकुला म्हणाली;"अरे शांत हो बघू भिकू. कोणीही तुझ्या मालकांचा वाडा घेणार नाही आहे. हे सगळे एका दिवसाचे पाहुणे आहेत. आता जातील ते. तू जा बघू आता. आम्ही पण तयारी करतोय निघण्याची."

अनघाचं बोलणं ऐकून भिकू कसा कोणजाणे पण शांत झाला आणि मागे वळून मागच्या दाराकडे जायला लागला. तो जाताना बघताच मंदारने सुटकेचा श्वास सोडला आणि अनघाला म्हणाला;"नशीब तुझं ऐकून हे जनावर जातंय. मला कळत नाही तो फालतू अन्या असल्या लोकांना का पाळतो इथे."

मंदार त्याच्या नादात बोलत होता आणि अचानक भिकू मागे वळला आणि मंदारच्या दिशेने धावला. भिकू परत मागे वळला आहे हे नविनने बघितलं आणि त्याने तोच पितळ्याचा फ्लॉवरपॉट हातात घेतला. भिकुचं नविनकडे लक्ष नव्हतं. त्याने धावत येऊन मंदारचा गळा पकडला. त्याचवेळी नविनने परत एकदा फ्लॉवरपॉटने भिकुला मारलं... मनालीने देखील अंगातली सगळी शक्ती एकटवत परत एकदा लॅम्पशेडचा एक प्रहार भिकुवर केला. आतापर्यंत अनघाला देखील भिकुला आवरण शक्य नाही हे लक्षात आलं होतं. त्यामुळे तिने देखील बाजूलाच असलेली एक लाकडी मूर्ती उचलली आणि भिकुला मारायला लागली. नवीन-मनाली-अनघा भिकुवर प्रहरांवर प्रहार करत होते आणि भिकू मंदारला धरून होता.

काही क्षणच ही झटापट झाली आणि नवीन-मनाली-अनघाच्या मारण्याचा परिणाम होऊन भिकू एकदम खाली कोसळला. त्याच्या हातातून मंदारचा गळा सुटताच मंदार देखील खाली पडला. नवीन, मनाली आणि अनघा धापा टाकत उभे राहिले. भिकु बेशुद्ध पडला होता आणि त्याच्या डोक्यातून रक्त वाहात होतं. मंदार खोकत-खोकत उभा राहिला. आता आपण नक्की काय करावं हे चौघांनाही कळेना. ते एकमेकांकडे बघत उभे होते. सर्वात पहिल्यांदा अनघा सावरली आणि म्हणाली;"अरे आज पहिल्यांदाच याला मी असं वागताना बघितलं यार. हा असा नाही आहे. फक्त शरीराने माजला आहे; असाच माझा समज होता. पण ते जाऊदे. आता पुढे काय? आपण एक करू शकतो. आपण याला त्याच्या झोपडीमध्ये नेऊन टाकू आनंद यायच्या आत. येऊन आपल्या बॅग्स भरून तयार राहू. तो आला तरी तो भिकूच्या भानगडीत पडणार नाही हे नक्की. कारण त्याला माहीत आहे की भिकू प्यायला की काही कामाचा नसतो. त्यामुळे आनंदला तयार व्हायला लाऊ आणि लगेच निघू."

तिचं बोलणं ऐकून मनालीने मान हलवली. ती आता रडायच्याच बेतात होती. पण मंदार म्हणाला;"अनघा अग त्याला बरंच लागलंय असं दिसतं. आपण त्याला असाच सोडला आणि अति रक्तस्त्रावामुळे तो मेला वगैरे तर?"

मंदारचं बोलणं ऐकून मनाली एकदम रडायलाच लागली. ते बघून नवीन वैतागला आणि म्हणाला;"मंदार काहीही बोलू नकोस. इतका स्ट्रॉंग आहे हा माणूस आपल्या मारण्याने तो नक्की मरत नाही... आणि तरीही तुला असं वाटतंय तर आपण त्याची मलमपट्टी करू. पण अगोदर त्याला उचलून त्याच्या झोपडीत नेऊया. अनघा तू चल आमच्या बरोबर. आम्हाला याची झोपडी कुठे आहे ते माहीत नाही. मनाली तोपर्यंत तू सगळ्यांच्या बॅग्स भरून ठेव."

मनाली नाही नाही अशी मान हलवत म्हणाली;"NO WAYS! मी एकटी इथे थांबणार नाही. मी पण येणार." नवीन थोडा वैतागला. पण त्याला तिची मनस्थिती लक्षात आली. त्यामुळे तो काही न बोलता वाकला आणि त्याने भिकुचे पाय धरले. मंदारने त्याचे हात धरले. अनघा आणि मनालीने देखील त्यांना मदत केली आणि चौघांनी मिळून भिकुला त्याच्या झोपडीच्या दिशेने नेले.

झोपडी जवळ येताच अनघाने पुढे होऊन झोपडीचं दार उघडलं. भर दुपार असूनही आत पूर्ण काळोख होता. अनघा दार उघडून उभी राहिली. मनाली देखील तिच्या जवळ दारापाशीच थांबली. मंदार आणि नवीन भिकुला घेऊन आत शिरले.... आणि दुसऱ्या क्षणी आतून नविनचा आवाज आला;"अनघा.... मनाली आत्ताच्या आत्ता आत या................."

क्रमशः

Saturday, January 23, 2021

प्रवास भाग 4

 


प्रवास

भाग 4

आनंद दिवाणखान्यात बसून गुणगुणत होता. सगळेच आपापल्या खोलीत गेले होते. त्यांच्या खोल्यांकडे आळीपाळीने बघत तो तिथेच बसून होता. अचानक परत एकदा कोल्हेकुई सुरू झाली आणि मंदार, नवीन, अनघा आणि मनाली धावत त्यांच्या खोल्यांमधून बाहेर आले. सगळेच काहीसे घाबरले होते. आनंद मात्र दिवाणावर स्वस्थ बसला होता. मघाशी कोल्हेकुई सुरू झाली त्यावेळी बाहेरून धावत आलेला आनंद आणि आत्ता दिवाणावर बसलेला आनंद वेगळे की काय असं वाटण्या इतका तो शांत होता; हातातल्या बिअरचा एक एक सिप घेत तो त्या सगळ्यांकडे बघत होता.

अनघा पुढे झाली आणि आनंदच्या हातातली बिअर काढून घेत वैतागलेल्या आवाजात म्हणाली;"आनंद, असा का वागतो आहेस? आम्ही सगळेच घाबरलो आहोत. परत एकदा कोल्हे ओरडायला लागले आहेत. तुला काहीच ऐकू येत नाहीये का? अरे आजवर मी इतक्या वेळा तुझ्याबरोबर इथे आले पण ही असली कोल्हेकुई कधी ऐकली नव्हती.

अनघाने 'मी इतक्या वेळा तुझ्याबरोबर इथे आले...' असं म्हणताच नविनचे डोळे मोठे झाले आणि मंदार-मनालीने एकमेकांकडे बघितलं.

अनघा तावातावाने बोलत होती. पण आनंदाचं तिच्या बोलण्याकडे लक्षच नव्हतं. तो आळीपाळीने नवीन, मंदार आणि मनालीकडे बघत होता. आनंदच्या दुर्लक्ष करण्याने अनघा खूपच दुखावली आणि काही एक न बोलता मागे वळून तिच्या खोलीत निघून गेली. नविनने एकदा आनंदकडे रागाने बघितलं आणि तो अनघाच्या मागे गेला. मंदार आणि मनालीला काय करावं कळत नव्हतं. आनंद स्वतः उतरलेल्या खोलीच्या दिशेने एकटक बघत होता. अनघा आत गेली तरी त्याने काहीच हालचाल केली नव्हती. अनघा नक्की रडत असणार होती; नवीन तिची समजूत घालत असणार... म्हणजे त्या खोलीत जाणं शक्य नव्हतं. मंदारला एकट्याने त्याच्या खोलीत जायचं नव्हतं.... आणि मनालीची तिथे उभं राहण्याची तयारी नसल्याने ती चुळबूळ करत होती. असेच काही क्षण गेले आणि अचानक आनंद उभा राहिला आणि मंदार-मनालीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून त्याच्या खोलीकडे निघून गेला. तो जाताच मनाली दिवाणावर बसली; मंदार देखील तिच्या शेजारी बसला.

मनालीने मंदारकडे बघितलं आणि म्हणाली;"मँडी, इथे काहीतरी विचित्र घडतं आहे असं सारखं मला वाटतंय. अरे हा आनंद मध्येच नीट वागतो... मध्येच असा विचित्र वागतो... त्याचा काही अंदाजच येत नाही.

मंदार : अग, तो थोडा डिस्टर्ब आहे असं मला वाटतंय. या करोनाच्या अगोदर तो मला सारखा भेटत होता. त्याला अनघाला प्रपोज करायचं होतं. काय करावं-कसं करावं हे बोलण्यासाठी तो मला सतत भेटायचा. पण मग 21 मार्च पासून सगळी परिस्थितीच बदलून गेली. त्यानंतर आमचा काहीच कॉन्टॅक्ट नव्हता. भेटलो ते आज... म्हणजे काल सकाळी इथे यायला निघालो तेव्हा. आपण ब्रेकफास्टसाठी थांबलो होतो तेव्हा त्याला मी विचारलं अनघाला प्रपोज करण्याबद्दल. पण त्याने काही उत्तरच दिलं नाही ग.

मंदारच बोलणं ऐकून मनालीचे डोळे मोठे झाले. त्याच्याकडे बघत ती म्हणाली;"अरे काय संगोतोस? अनघा तर मला म्हणाली त्याने तिला दिवाळीत प्रपोज केलं होतं. इथेच... याच वाड्यात... मागच्या झोपाळ्याजवळ."

तिचं बोलणं ऐकून मंदारला एकदम शॉक बसला. "अन्याने अनघाला प्रपोज केलं? साला.... बोलला नाही मला काही. आयला हा काय मला खुळखुळा समजतो? इतक्या वेळा मला भेटला... इतके प्लॅन्स बनवले आम्ही कसं प्रपोज करता येईल त्याचे.... आणि याने प्रपोज केलं तर सांगितलं देखील नाही???" मंदारचा आवाज चढला होता. अचानक आनंद त्याच्या खोलीच्या दाराशी येऊन उभा राहिला. त्याला बघताच मंदार उभा राहिला आणि म्हणाला;"अन्या साल्या तू अनघाला प्रपोज केलसदेखील? बोलला नाहीस मला!!!"

मंदार बोलत होता आणि आनंद मनालीकडे रोखून बघत होता. मनाली त्याच्या नजरेने अस्वस्थ झाली आणि काही एक न बोलता पटकन तिच्या बेडरूमच्या दिशेने पाळली.

ती निघून जाताच मंदार आनंदच्या जवळ गेला आणि त्याची बखोट धरून म्हणाला;"काय फालतूपणा चालवला आहेस अन्या तू?"

थंड नजरेने मंदारकडे बघत आनंद म्हणाला;"बरोबर! फालतूपणा चालवला आहे आनंदने!! मग त्याला जाऊन सांग ते. मला नको."

आनंदच्या बोलण्याने मंदार बुचकळ्यात पडला. तो काहीतरी बोलणार इतक्यात आनंदने मंदारच्या हातातलं आपलं बहोत सोडवून घेतलं आणि मंदारच्या खांद्यावर हात ठेवत कोणतीतरी नस दाबली. एका क्षणात मंदार खाली कोसळला. त्याला तसाच ओढत आनंदने शेजारच्या खोलीत नेला आणि पलंगावर उचलून टाकला. आनंद मंदारच्या खोलीच्या बाहेर आला तर समोरच मनाली तिच्या बेडरूमच्या आत न जाता पडद्याआडून खोलीत बघत असलेली त्याला दिसली. तिच्याकडे दुर्लक्ष करत तो परत त्याच्या खोलीत निघून गेला.

मनालीचं बाहेर काय घडत होतं त्याकडे मुळीच लक्ष नव्हतं. कारण खोलीमध्ये नवीन अनघाशी जे बोलत होता ते समजून घेण्यात तिला जास्त इंटरेस्ट होता. तिने त्यांचं बोलणं ऐकण्याचा खूप प्रयत्न केला पण तिला फारसं काही ऐकायला नाही आलं. मात्र नविनने अनघाला प्रपोज केल्याचं तिच्या लक्षात आलं आणि अनघाने नाही म्हंटल्याचं देखील तिने ऐकलं. नवीन खोलीच्या बाहेर येत आहे हे तिच्या लक्षात आलं आणि ती बाजूला जाणार एवढ्यात नवीन बाहेर आला आणि त्याने मनालीकडे बघितलं. तिने सगळं ऐकलेलं आहे हे त्याच्या लक्षात आलं. पण काही एक न बोलता तो त्याच्या खोलीच्या दिशेने गेला.

नवीन खोलीच्या दारापासून दूर होताच मनाली पटकन खोलीत शिरली आणि तिने खोलीचं दार लावून घेतलं. मनालीने खोलीचं दार लावून घेतलं आहे हे नविनच्या लक्षात आलं आणि स्वतःच्या खोलीत जाण्याऐवजी तो आनंदच्या खोलीच्या दाराशी जाऊन उभा राहिला. त्याने हलकेच आनंदच्या खोलीचं दार वाजवलं.

आनंद खोलीच्या दारात येऊन उभा राहिला. त्याला बघताच नवीन म्हणाला;"अन्या, का वागतो आहेस असा अनघाशी? तिचं तुझ्यावर किती प्रेम आहे याची तुला कल्पना तरी आहे का?"

आनंदने थंड नजरेने नविनकडे बघितलं आणि म्हणाला;"अनघाचं प्रेम आहे!! कोणावर?"

नविनला त्याच्या बोलण्याचा राग आला. त्याचे दोन्ही खांदे धरत तो म्हणाला;"अन्या फालतूपणा बंद कर. कोणावर काय विचारतो आहेस. तुझ्यावर आहे तिचं प्रेम साल्या. तुझ्यावर! आनंदवर!!!"

आनंद अजूनही थंड नजरेने नविनकडे बघत होता. आपले दोन्ही खांदे सोडवून घेत तो म्हणाला;"आनंदवर प्रेम आहे न तिचं? मग जा आनंदला जाऊन सांग!" आनंद काय म्हणतो आहे ते नविनच्या लक्षात येण्याच्या अगोदरच आनंदने मंदारप्रमाणे त्याला देखील बेशुद्ध पाडत खोलीत नेऊन टाकलं.

आनंद नविनला आत टाकून आला आणि त्याच्या समोर भिकू उभा राहिला. त्याला बघताच आनंद काहीसं विचित्र क्रूरसं हसला.... आनंद हसताच भिकू देखील हसला.... आनंदने अचानक भिकुला मिठी मारली. दोघे तसेच उभे होते काही क्षण. आणि मग आनंद भिकुपासून लांब होऊन त्याच्या खोलीत निघून गेला. तो जाताच भिकू देखील मागे वळला आणि मागच्या दाराने बाहेर पडून त्याच्या घराच्या दिशेने निघाला. जाताना तो शीळ घालत होता आणि....

................ आणि घरात मात्र अनघा आणि मनालीला परत एकदा कोल्हेकुई ऐकू येत होती. एकमेकांचा हात धरून त्या दोघीही पलंगावर अवघडून बसल्या होत्या. वेळ जात होता आणि हळूहळू त्या दोघींनाही पेंग यायला लागली. दोघीही नकळत त्याच अवघडल्या अवस्थेत झोपून गेल्या.

***

मनालीला सकाळी जाग आली. अनघा अजूनही झोपलेलीच होती. मनालीने किती वाजले आहेत ते बघायला मोबाईल हातात घेतला पण तो पूर्ण डिस्चार्ज झाला होता. त्यामुळे तिने उठून तो पहिल्यांदा चार्जिंगला लावला आणि बाथरूममध्ये गेली. ती बाहेर आली तरी अनघा अजून झोपलेलीच होती. मनालीने खिडकीबाहेर बघितलं. वेळेचा काहीच अंदाज येत नव्हता. एकतर खूपच गार होतं आणि बाहेरचं वातावरण देखील कुंद होतं. मनालीला गरम गरम चहा हवासा वाटायला लागला. त्यामुळे अनघा उठायची वाट न बघताच ती खोलीबाहेर आली. तिची नजर मंदार-नविनच्या बेडरूमच्या दिशेने वळली. त्यांच्या खोलीचा दरवाजा उघडा बघून ती तिथे गेली आणि तिने दारातूनच दोघांना हाक मारली. पण आतून उत्तर आलं नाही. म्हणून मग तिने खोलीत डोकावून बघितलं तर दोघेही पलंगावर अस्ताव्यस्त पसरले होते. ते बघून तिला हसू आलं आणि मागे वळून ती स्वयंपाकघराच्या दिशेने निघाली. आनंदच्या खोलीवरून जाताना तिने अंदाज घेतला. पण आनंदच्या खोलीचा दरवाजा अजूनही बंद होता. मानेला झटका देत मनाली स्वयंपाकघरात आली. तिने चहाचं सामान शोधून काढलं आणि स्वतःसाठी मस्त चहा करून घेऊन ती दिवाणखान्यात येऊन बसली.

अजूनही अनघा, मंदार आणि नवीन झोपेलेलेच होते. तिचं लक्ष आनंदच्या खोलीच्या दिशेने गेलं आणि त्याच्या खोलीचं दार उघडं होतं. तिच्या मानत आलं आनंद उठला आहे का बघावं. पण मग तो विचार बदलून तिने चहा संपवला आणि ती परत तिच्या खोलीकडे गेली.

तिच्या हालचाली पडद्याआडून बघणारा आनंद दिवाणखान्यात आला आणि इथे तिथे न बघता सरळ मागच्या दाराने घराबाहेर पडला......

क्रमशः



Friday, January 15, 2021

प्रवास भाग 3

 प्रवास 


भाग 3




सगळे अंगणात गाद्या टाकून चांदण्यांनी भरलेल्या आकाशाकडे बघत पडले होते. आजूबाजूची किर्रर्र झाडी; गुड्डूप्प अंधार आणि चांदण्यांनी भरगच्च आकाश! एक वेगळंच गूढ वातावरण तयार झालं होतं. सहाजिकच गप्पांचा ओघ भुतं या विषयावर घसरला. कोणी सुरवात केली ते लक्षात आलं नाही पण अनघा आणि मनाली बाहेर आल्या तर मंदार त्याच्या कोणा काकांचा अनुभव सांगत होता.

मंदार : अरे काका घरीच निघाले होते...

मनाली : नक्की कशाबद्दल बोलतो आहेस रे?

असं म्हणत ती अगदी शेवटच्या खाटेवर टेकली.

मंदार हसत म्हणाला :अग काही नाही माझ्या काकांचा भुताचा अनुभव सांगत होतो.

मंदारने असं म्हणताच मनाली पटकन उठून उभी राहिली आणि वैतागलेल्या आवाजात म्हणाली;"काय यार! नवीन वर्ष सुरू होईल इतक्यात. जरा बरे विषय काढा की. त्यावर तिला चिडवत नवीन म्हणाला;"अग करोनामुळे जे गेलेत ना त्यांना श्रद्धांजली म्हणून आम्ही हा विषय निवडला आहे."

मनालीने मान उडवली आणि उठून सगळ्यांच्या मध्ये येऊन बसली. तिच्या शेजारी बसत अनघा म्हणाली;"मनाली, चिंता नको करुस. परवाच पौर्णिमा होऊन गेली आहे आणि त्यात त्यादिवशी दत्त जयंती होती. एकदम चांगला दिवस. बघ न वर चंद्र किती मस्त दिसतो आहे. मुंबईमध्ये आपल्याला असं इतकं सुंदर ताऱ्यांनी भरलेलं आकाश दिसतं का?"

तिने असं म्हणताच सगळेच वर बघायला लागले. क्षणभराने आनंद म्हणाला;"तारे कमी आहेत मॅडम. चंद्र असताना तारे नसतात."

अनघा : म्हणजे?

आनंद : म्हणजे राजा एकच असतो... मालक एकच असतो.... तो असताना बाकी कोणीच नसतं आजूबाजूला.

असं म्हणून आनंद एकदम विचित्र मोठ्याने हसला. खरंतर हा काही जोक नव्हता. त्यामुळे त्याचं ते हसणं सगळ्यांना विचित्र वाटलं. अनघाने सारवासारव केल्यासारखं म्हणलं;"बरं बरं! राजे आपण जरा गप्प बसा म्हणजे मँडीच्या काकांची स्टोरी तो सांगू शकेल." अनघाकडे दुर्लक्ष करत आनंदने आपलं बोलणं चालू ठेवलं आणि मनालीकडे बघत म्हणाला;"आणि मनाली, भुतं कॅलेंडर बघून नाही बाहेर पडत. त्यांना अमावस्या काय आणि पौर्णिमा काय.... इच्छा झाली की निघाली ती. त्यात दत्त जयंती न? अग दत्ताला भुतं आवडतात....

आनंद असं म्हणाला आणि अचानक घरातून काहीतरी पडल्याचा मोठ्ठा आवाज झाला. सगळेच दचकून घराकडे बघायला लागले. खाटेवर आडवा पडलेला आनंद एकदम उभा राहिला आणि कोणालाही कळायच्या आत घराकडे धावला. नवीन आणि मंदार देखील उभे राहिले. पण अचानक मागे वळून बघत आनंद म्हणाला;"कोणीही यायची गरज नाही. मी बघून घेतो काय ते." आणि एकदम घरात निघून गेला.

तो आत गेला त्या दिशेने बघत सगळे खाली बसले. नविनची नजर सहज आनंदच्या वाड्यावरून फिरायला लागली. आनंदने अजूनही घराचा जुनेपणा जपला होता. घराला अजूनही कौलं होती. उंच छताचं कौलारू घर बघताना नवीन सहज म्हणाला;"आता वीज आहे म्हणून ठीक आहे... पण पूर्वी हे घर संध्याकाळनंतर किती भयानक वाटत असेल नाही?"

नवीन असं म्हणाला आणि अचानक घरातले सगळे दिवे गेले. एकदम अंधार झाला सगळीकडे. त्याक्षणी रातकिडे अंगावर आल्यासारखे कर्रर्रर्र करत ओरडायला लागले. एकदम वातावरण थंड झाल्यासारखं वाटायला लागलं आणि मेन गेट जवळून कोणीतरी चालत येत असल्या सारखा आवाज यायला लागला. मंदार, नवीन, अनघा आणि मनाली प्रचंड घाबरून गेले. आवाज जवळ जवळ येत होता... अगदी सावकाश कोणीतरी चालत होतं. काहीही घाई नसल्यासारखं! सगळ्यांची नजर आवाज येत होता त्या बाजूला लागून राहिली होती. सगळ्यांनी नकळत आपापले मोबाईल हातात घेऊन टॉर्च चालू केली होती आणि एकदम सावध पवित्र्यात उभे राहिले होते. इतक्यात....

इतक्यात आनंद मागून येऊन त्यासगळ्यांच्या जवळ उभा राहिला आणि त्याने हातातून आणलेला मोठ्ठा फुगा टाचणी लावून फोडला. सगळे भयंकर दचकत घाबरून धडपडले. त्यांच्याकडे बघत आनंद खदाखदा हसायला लागला आणि एकदम ओरडला...

HAPPY NEW YEAR TO ALL OF U!!!

धडपडत उभे राहात सगळेच हसायला लागले आणि एकमेकांना मिठ्या मारत सगळ्यांनी नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या एकमेकांना.

घरातले दिवे आता लागले होते. अनघाचा हात धरत घराच्या दिशेने जात मनाली म्हणाली;"ए आपण आता आतच बसूया ह."

तिच्या मागून सगळेच निघाले. आत जाता जाता नविनने सहज मागे वळून बघितले तर; सगळे पुढे गेलेले बघून आनंद काहीसा बाहेरच्या बाजूला पुढे गेला होता आणि एका बाजूला असणाऱ्या गर्द झाडीच्या जवळ जाऊन काहीतरी करत होता. नविनने मागे वळत आनंदला हाक मारली;"आनंद.... काय करतो आहेस रे?"

नविनचा आवाज ऐकून आनंदने मागे वळून बघितले तर नविनला आनंदचे डोळे एकदम गुंजेसारखे लाल होऊन चमकत आहेत असं वाटलं. नवीन ते बघून दचकला आणि काही न बोलता घरात पळाला.

सगळे घराच्या दिवाणखान्यात जाऊन बसले होते. सगळे आले तरी आनंद आत आलेला नाही हे बघून अनघा परत मागे वळली. तिचा हात धरून तिला अडवत नवीन म्हणाला;"येईल तो. नको जाऊस तू बाहेर." नविनने अडवलेलं अनघाला आवडलं नाही. हात सोडवून घेत तिने कपाळावर आठ्या आणल्या आणि त्याच्याकडे दुर्लक्ष करून दाराकडे निघाली. अनघा घराबाहेर पडणार एवढ्यात घराच्या मागच्या बाजूने कोल्हेकुई ऐकायला यायला लागली. कोल्हा प्रचंड मोठ्या आवाजात ओरडत होता. आतामात्र घरातले सगळेच एकदम घाबरून गेले. बाहेर पाऊल ठेवणारी अनघा पण घाबरून थांबली. कोल्हेकुई हळूहळू घराच्या पुढच्या बाजूला सरकायला लागली. बाहेर जावं की नाही.... आनंद कुठे गेला आहे.... या संभ्रमात अनघा होती आणि अचानक आनंद बाहेरून आत आला. त्याच्या चेहेऱ्यावर घाबरलेले भाव होते. तो धावत आत आल्यामुळे दारातच उभ्या असलेल्या अनघावर तो आदळला आणि दोघेही घराच्या आत पडले. दोघे आत येताच घराचं दार एकदम धाडकन बंद झालं. दार बंद होताच कोल्हेकुई अचानक थांबली.

घरातले सगळेचजण अस्वस्थ झाले. सगळेच दिवाणखण्याच्या मध्यभागी येऊन उभे राहिले. सगळ्यांनीच नकळत एकमेकांचे हात धरले होते. गुपचूप उभे होते सगळे. वातावरण जणूकाही ढवळलं गेलं होतं. थोडावेळ तसाच गेला आणि सगळं एकदम शांत झालं. सगळेचजण अस्वस्थ झाले होते.

अनघाने सगळ्यांकडे एकदा बघितलं आणि म्हणाली;"चला रे झोपुया आपण सगळे. तसही उशीर झाला आहे. जागत बसलो तर आता नको ते विषय निघतील."

त्यावर आनंद अनघाकडे बघत म्हणाला;"अग इतक्या दिवसांनी भेटलोय आपण तर गप्पा मारत बसू की थोडावेळ अजून. नाहीतरी उद्या सकाळी उठायची घाई कोणाला आहे? आरामात उठून जेऊन निघू. आज की रात अपनी हें। तो उसका मजा उठाना ही चाहीये। क्या बोलते हें दोस्त लोग?" असं म्हणत आनंदने मंदार आणि नविनकडे बघितलं. वातावरण थोडं निवळलेलं असल्याने सगळेच सैलावले होते. समोरच्या दिवणावर बसत मंदारदेखील म्हणाला;"बसूया रे सगळे. आनंद म्हणतो आहे ते खरं आहे. इतक्या दिवसांनी भेटून फक्त झोपायचंच होतं तर इतकं लांब का आलो आपण?"

त्याच्याकडे बघत मनाली म्हणाली;"मुंबईमध्ये कर्फ्यु होता म्हणून इथे आलो आपण."

त्यावर टाळी वाजवत मंदार म्हणाला;"exactly! उशीर होईल आणि मग पकडले जाऊ म्हणून इथे आलो. उशीर का? कारण आपण गप्पा मारणार. म्हणजे मुळात गप्पा मारायलाच आपण इथे आलो आहोत. right?"

त्याचा युक्तिवाद पटल्यामुळे असेल किंवा वातावरण निवळल्यामुळे असेल नवीनने पण बसत मंदारला टाळी दिली.

आनंद देखील बसला आणि त्याने अनघाचा हात धरून तिला बसवलं. त्याने असं बसवल्याने अनघाला मनातून बरं वाटलं आणि ती पण मोकळेपणी हसली. मात्र जागून गप्पा मारणं मनालीच्या मनात मुळीच नव्हतं. तिला इथे पोहोचल्यापासूनच काहीसं अस्वस्थ वाटत होतं. त्यामुळे तिला खरंच खोलीत जायचं होतं. पण एकटीने आत जायची हिम्मत तिच्यात मुळीच नव्हती. त्यामुळे ती देखील मनाविरुद्ध खाली बसली.

ती बसलेली बघताच मंदारला तिची चेष्टा करायची हुक्की आली आणि अनघाकडे डोळा मारत तो म्हणाला;"अनघा, तू कोणत्या नको त्या विषयांबद्दल म्हणत होतीस ग?"

त्यावर एकदा मनालीकडे बघत अनघा म्हणाली;"ए आगाऊपणा नकोय ह. मनाली मनातून अस्वस्थ आहे. त्यामुळे भुतंखेतं असले विषय नकोत."

अनघा असं म्हणताच आनंद मोठ्याने हसला. सगळेच त्याच्या हसण्याने दचकले. त्यावर हसू दाबत आनंद म्हणाला;"सॉरी... सॉरी.... नाही बोलायचं असं म्हणत अनघानेच विषय काढला म्हणून मला हसायला आलं इतकंच."

त्यावर आनंदला फटका मारत अनघा म्हणाली;"उगाच काय? मनालीला कसली भिती वाटते ते मी सांगत होते इतकंच."

अनघाकडे शांतपणे बघत आनंद म्हणाला;"हो का? एकट्या मनालीला भिती वाटते का? तू एकदम झाशीची राणीच आहेस!! तसं असेल तर आत जाऊन बीअरच्या बोटल्स घेऊन ये की." आनंदाचं बोलणं अनघाला आवडलं नाही. पण ती काही न बोलता उठली आणि आत जायला वळली. ती जेमतेम आतल्या दाराजवळ पोहोचली असेल आणि एकदम त्या दारातून भिकू बाहेर आला. त्याच्या हातात बऱ्याच बीअरच्या बाटल्या होत्या. त्याला असं एकदम समोर आलेलं बघून अनघा दचकली. तिच्या हातात बाटल्या देत भिकू म्हणाला;"मी इथेच आहे आत ताई. काही लागलं तर हाक मारा."

त्याच्याकडे आश्चर्याने बघत अनघाने बाटल्या घेतल्या आणि ती मागे वळली. मधल्या टेबलावर बाटल्या ठेवत तिने आनंदला विचारलं;"तू थांबवलं आहेस का भिकुला?" अनघाकडे एकदा शांतपणे बघत त्याने 'हो' म्हणून मान डोलावली. त्यावर अनघाचे डोळे मोठे झाले. ती काहीतरी बोलणार होती पण मग गप बसली.

बिअरच्या बाटल्या उघडल्या आणि सगळेच सावकाश एक एक सिप घ्यायला लागले. नकळतच सगळेजण आपापल्या विचारात दंग झाले होते.

अनघा : असा का वागतो आहे हा आनंद? इथे आल्यापासून एकदम विचित्रच बोलतो आहे. आज ज्या दरवाजातून त्याने आम्हाला आत आणलं तो दरवाजाचं काय पण तिथल्या दोन्ही खोल्यांमध्ये त्याने कधी पाय ठेवला नव्हता. आम्ही जेव्हा जेव्हा आलो... तो मला म्हणाला आहे की त्याला तिथे असं काहीतरी जाणवतं ज्यामुळे तो अस्वस्थ होतो... आणि जी बेडरूम त्याने स्वतःसाठी घेतली ती देखील! मागे पहिल्यांदा त्याने मला आणलं तेव्हा एकदाच तो मला म्हणाला होता की ती बेडरूम त्याच्या सावत्र आईची होती. त्यामुळे त्या बेडरूमच्या आत जायला त्याला कधीच आवडलं नव्हतं. आज मात्र तीच खोली त्याने त्याच्यासाठी घेतली होती. सर्वात कमाल म्हणजे तो भिकू याला मुळीच आवडायचा नाही. भिकुला देखील ते माहीत होतं. त्यामुळे तो देखील आनंदच्या समोर यायचा नाही. आज मात्र तो बीअर घेऊन बाहेर येत होता... जेवण गरम करून द्यायला आला. अजूनही इथे थांबला आहे!

मनाली : इथे सगळंच कसं विचित्र वाटतंय आल्यापासून. अनघा आणि आनंद इतके सिरीयस असतील असं नव्हतं वाटलं मला. मागे एक-दोन वेळा आनंद मला भेटला होता मुंबईमध्ये तर मला वाटलं होतं की तो मला हिंट्स देतो आहे की त्याला माझ्यात इंटरेस्ट आहे. त्यामुळेच तर मला त्याच्याबद्दल काहीतरी वाटायला लागलं होतं. त्यात तो एकटा; आई वडील नाहीत; इतकी मोठी प्रॉपर्टी. त्याच्याशी लग्न म्हणजे सुखच सुख हे देखील आलं होतं मनात. बरं झालं इथे आले. माझ्या मनातल्या शंकांचं निरसन झालं.

मंदार : आनंद एकटा भेटतच नाहीये इथे. दोन मिनिटं मिळाली होती ब्रेकफास्टला थांबलो होतो तेव्हा. त्याचवेळी विचारलं होतं काही ठरलं का तुमचं. तर याने उत्तर देखील दिलं नाही. जेव्हा मदत हवी होती तेव्हा सतत फोन्स आणि डिनर्सना घेऊन जात होता साला. आता काम झालेलं दिसतंय. म्हणून ओळख पण देत नाही त्या विषयाची.

नवीन : अनघाला कसं कळत नाही की आनंद तिला फक्त वापरतो आहे. उद्या लग्न केलंच तरी घरात ठेवलेली भाऊली इतकीच किंमत ठेवेल तिची. हिला काहीच कसं दिसत नाही? की ती त्याच्या पैशावर इतकी भाळली आहे की दिसत असून दुर्लक्ष करते आहे?

सगळेच विचारात गढलेले होते. मध्ये कधीतरी भिकूने येऊन वेफर्स-चकल्या असं काहीबाही आणून ठेवलं होतं. त्याने अजून थोड्या बीअरच्या बाटल्या देखील आणून ठेवल्या होत्या.

सगळे विचारात गढले होते आणि आनंद मात्र शांतपणे प्रत्येकाचं निरीक्षण करत होता. त्याने पुढे होत बाटल्या उघडायला सुरवात केली आणि सगळेच तंद्रीतून जागे झाले. सगळ्यांकडे हसत बघत आनंद म्हणाला;"किती विचार करता रे या सगळ्याचा."

खरंतर हे अत्यंत साधं वाक्य होतं. पण प्रत्येकाने ते स्वतःच्या विचाराशी जुळवलं आणि प्रत्येकाच्या मनात आलं... याच्या कसं लक्षात आलं माझ्या मानत काय आहे ते? सगळ्यांची नजर आनंदकडे वळली. तो मात्र शांतपणे बाटल्या उघडत होता.

आनंदने नविनच्या हातात एक बिअर दिली आणि मंदारकडे वळताना म्हणाला;"नवीन पैसा जर फार महत्वाचा नाही तर मग तू का इनक्रिमेंटच्या मागे लागलेला आहेस रे?" त्याच्या प्रश्नाने नवीन मनात दचकला. पण चेहेऱ्यावर काहीही भाव येऊ न देता म्हणाला;"हे काय अचानक अन्या?" आनंदने मंदारकडे बघितलं आणि त्याच्या हातात एक बिअर देत म्हणाला;"तूच सांग मँडी त्याला मी अचानक काय काय म्हणत असतो." आनंदच्या त्या वाक्याने मंदार मनात चरकला. त्याने चोरट्या नजरेने अनघाकडे बघितलं आणि आनंदला म्हणाला;"मला काय माहीत तू अचानक काय बडबडतोस?" मनालीच्या हातात एक बिअर देत आनंदने एक अनघाला दिली आणि स्वतः एक घेऊन मग परत दिवाणावर येऊन बसला. क्षणभर मनालीकडे बघून हसत म्हणाला;"मनाली सांगू शकेल मी अचानक काय बडबडतो."

आनंद प्रत्येकाचं नाव घेऊन काहीतरी म्हणत होता आणि अनघा अजूनचं बुचकळ्यात पडत चालली होती.

अनघा : हा असं का वागतो आहे आज?

आनंदने सगळ्यांकडे एकदा निरखून बघितलं आणि मग अनघाकडे वळून म्हणाला;"जाऊ दे ग. फार विचार नाही करायचा कोण काय बोलतं आहे आणि विचार करतं आहे याचा."

आता सगळेचजण आनंदकडे संशयाने बघत होते आणि आनंद मात्र एक एक सिप घेत छताकडे बघत बसला होता. नविनला आनंदचा हा विचित्र स्थितप्रज्ञपणा आवडला नाही. तो उठला आणि आनंद जवळ जाऊन त्याच्या खांद्याला हात लावून म्हणाला;"अन्या तू न इथे आल्यापासून फारच विचित्र वागतो आहेस. त्यामुळे आम्ही सगळेच अस्वस्थ आहोत. अरे आम्ही काय पहिल्यांदाच आलो आहोत का इथे? पण यावेळचं सगळंच विचित्र वाटतं आहे. अर्थात मागच्या वेळी इथल्या त्या care taker होत्या. त्यामुळे घर वापरात होतं. आता बहुतेक बंद असतं त्यामुळे देखील एक विचित्र शांतता भरून राहिली आहे इथे. मुख्य म्हणजे अन्या इथे कोल्हे आहेत? आणि ते घराच्या इतक्या जवळ येतात? तो भिकू मग त्याच्या घरी कसा जातो? एकूण काय... तर तू जरा आम्ही comfortable होऊ असा वागशील का?"

नवीनच बोलणं ऐकून प्रत्येकाला वाटलं हा आपल्या मनातलंच बोलला आहे. त्यामुळे सगळेच आनंदकडे अपेक्षेने बघायला लागले. एकदा सगळ्यांवर नजर फिरवून आनंदने खांदे उडवले आणि म्हणाला;"हे खरं आहे की यावेळची इथली शांतता काहीशी वेगळी आहे. हे देखील खरं आहे की ती care taker होती म्हणून या घराला घरपण होतं. इथे कोल्हे येतात का? हम्म!! मला देखील तसं म्हंटल तर हे वेगळं आहे यार. त्यामुळे मी तरी काय सांगणार?" हे बोलताना अचानक आनंदचा आवाज खेळीमेळीचा होता. बऱ्याच वेळानंतर आनंद आपल्यातलाच एक आहे.... जुना आनंद आहे.... असं सगळ्यांना वाटलं. सगळेच हसले आणि वातावरण भलतंच हलकं झालं.

हळूहळू गप्पा रंगायला लागल्या. जुन्या आठवणी... कॉलेज मधले न भेटलेले जुने मित्र-मैत्रिणी; प्रोफेसर्स आणि त्याच्याशी केलेले pranks... सगळेच आता परत पहिल्यासारखे वागत होते. बघता बघता चार वाजून गेले. बिअरचा परिणाम प्रत्येकाच्या डोळ्यांवर दिसायला लागला आणि 'चला झोपुया' असं म्हणत सगळेच उठले.

नवीन आणि मंदार त्यांच्या बेडरूममध्ये गेले. मनाली देखील उठली. अनघा तिच्या मागोमाग जायला उठली. तिने एकदा आनंदकडे बघितलं. आनंदने तिला त्याच्या खोलीत येण्याची विनंती डोळ्यांनीच केली. पण अनघाने मानेनेच नाही म्हंटलं आणि ती मनालीच्या मागे गेली. आता दिवाणखान्यात एकटा आनंद बसला होता..... एकटा? की.....???

क्रमशः

Friday, January 8, 2021

प्रवास भाग 2

 प्रवास

भाग 2


अनघा : हॅलो आनंद?

..... : त्याचं शूट चालू आहे. तुम्ही कोण?

मुलीचा आवाज ऐकून अनघा गोंधळली.

अनघा : तुम्ही कोण बोलताय?

..... : मी कोण याच्याशी तुमचा काही संबंध नाही. मी आनंदचा मोबाईल attend केला आहे याचा अर्थ मी कोणीतरी नक्की आहे त्याची. तुम्ही फोन केला आहात तुमचं नाव सांगा अगोदर.

अनघाला त्या मुलीच्या बोलण्याचा राग आला. पण त्याक्षणी तरी ती काही करू शकणार नव्हती. त्यामुळे तिने फोन कट केला. पण अनघाचं मन तिला स्वस्थ बसू देईना. फोन नक्की कोणी उचलला होता हे तिला समजून घ्यायचं होतं. ती घरातल्या घरात अस्वस्थपणे फेऱ्या मारत होती. थोड्यावेळाने तिचा फोन वाजला. फोन आनंदचा होता. तिने काहीशा रागानेच फोन उचलला.

अनघा : हॅलो...

आनंद : तू फोन केला होतास का? अनघा, तुला किती वेळा सांगितलं आहे की असा मी शुटिंगवर असताना फोन करत जाऊ नकोस म्हणून.

अनघा : आनंद... राग मला आला पाहिजे. तुझा फोन एका मुलीने उचलला होता आणि ती माझ्याशी आगाऊपणा करून बोलत होती. तू माझं नाव sweetipie म्हणून save केलं आहेस ना? ती म्हणत होती की ती तुझी कोणीतरी आहे. हा काय प्रकार आहे?

अनघा चिडली होती आणि तिचा आवाज देखील चढला होता. तिचं बोलणं ऐकून आनंदचा आवाज खाली आला.

आनंद : ती? आहे एक आगाऊ मुलगी. आमच्या सिरीयल मधली. तू तिच्या बोलण्याकडे लक्ष नको देऊस. बरं, फोन का केला होतास?

आनंदच्या उत्तराने अनघाचं समाधान झालं नव्हतं. पण 'भेटल्यावर बोलता येईल;' असा विचार करून तिने तो विषय तिथेच सोडला.

अनघा : अरे नविनचा फोन होता. थर्टी फास्टला भेटूया का विचारत होता.

आनंद : कोणाला तुला?

आता मात्र अनघा वैतागली.

अनघा : अन्या हे अति होतं आहे हं. त्याला मी आवडते यात माझी काही चूक नाही. मी त्याला कोणतीही हिंट देत नाही किंवा माझा फोन देखील त्याच्या हातात नसतो.

आनंद तिच्या बोलण्याने एकदम वरमला.

आनंद : बरं बरं बाईसाहेब. माफ करा. मी सहज गम्मत केली. काय म्हणत होता नवीन.

अनघा : तो विचारत होता की थर्टी फास्टला भेटूया का सगळे.

आनंद : अग पण सध्या कर्फ्यु चालू झाला आहे न रात्री अकरा नंतर? कुठेही बाहेर जाणं शक्य नाही... आणि माझं शूटिंग पण चालू आहे.

अनघा : अन्या, फार नाटकं करू नकोस. शुक्रवारी आहे थर्टी फास्ट. शनिवार रविवार तुझं शूट नसतं न? निदान आपण दोघे तुझ्या वाड्यावर जायचो तेव्हा तू हेच सांगून न्यायचास मला.

आनंद तिचं बोलणं ऐकून चपापला.

आनंद : अनघा घरीच असशील न? जरा हळू बोल की. कोणी ऐकलं तर काय उत्तर देशील?

अनघा : आता यापुढे कोणीही काहीही विचारलं तर मी तुझा फोन लावून द्यायचं ठरवलं आहे.

अनघाचं बोलणं ऐकून आनंद अस्वस्थ झाला.

आनंद : बरं ते जाऊ दे. मला लक्षात नव्हतं थर्टी फास्ट शुक्रवारी आहे. काय आहे तुझा प्लॅन?

आनंदच्या प्रश्नाने अनघा खुलली.

अनघा : मी म्हणत होते आपण सगळे तुझ्या लोणावळ्याच्या वाड्यावर जाऊ या. बऱ्याच दिवसात सगळे भेटलेलो नाही आहोत. मस्त तीन दिवस मजा करूया. तू, मी, नवीन, मंदार आणि मनाली. जुने कॉलेजचे दिवस आठवू; गप्पा; कॅरम; पत्ते... सगळं enjoy करूया. आणि....

अनघाने मोठा पॉज घेतला. तिच्या गप्प बसण्याने आनंद वैतागला आणि तिच्यावर ओरडत म्हणाला...

आनंद : अनघा... आणि काय? बोल बघू एकदाचं काय ते. मी तुझ्यासारखा रिकामटेकडा नाही. शूट चालू आहे माझं. बोल लवकर.

आनंदच्या त्या अचानक बोलण्याने अनघाच्या डोळ्यात पाणी उभं राहिलं. पण तिने ते आनंदला कळू दिलं नाही.

अनघा : आणि काही नाही. बस् इतकंच! जमणार आहे का तुला? तर मी मंदार आणि मनालीशी बोलून घेते.

क्षणभर विचार करून आनंद म्हणाला...

आनंद : चालेल. खरंतर मला देखील नविनचा missed call होता. आता तूच बोल सगळ्यांशी आणि मला मेसेज करून ठेव किती वाजता निघायचं आहे ते.

आनंद हो म्हणलेला ऐकून अनघा एकदम खुश झाली आणि डोळ्यातलं पाणी पुसत म्हणाली...

अनघा : ok. मी कळवते सगळ्यांना. त्यांना एका स्पॉट वरून pick up करू आपण.

आनंद : म्हणजे मी तुला घ्यायला यायचं?

अनघा त्याच्या त्या प्रश्नाने एकदम घायाळ झाली.

अनघा : म्हणजे?

तिच्या त्या एका शब्दातला अर्थ आनंदच्या लक्षात आला आणि घाईघाईने फोन ठेवताना तो म्हणाला...

आनंद : ok ok. तुला सकाळी साधारण आठ वाजता pick करतो. मग त्यांना सायनला घेऊन पुढे जाऊ. चल ठेवतो फोन. माझा शॉट आहे आता. byeee my sweetipie

आनंदच्या बोलण्याने अनघाचं समाधान झालं नव्हतं. पण तरीही 'भेटल्यावर बोलू'; असा विचार करून तिने विषय मनावेगळा केला. आनंदचा फोन ठेवल्यावर अनघाने नवीन, मंदार आणि मनालीला फोन करून थर्टी फास्ट वीक एन्डचा प्लॅन सांगितला आणि साडे आठ पर्यंत सायनला पोहोचायला सांगितलं. तिघेही प्लॅन ऐकून excite झाले आणि लगेच तयार झाले. पण आनंदच्या बोलण्याने दुखवलेली अनघा मात्र आता फार उत्साहात नव्हती. तिच्या एक लक्षात आलं होतं की अलीकडे आनंद तिला टाळत होता.

***

आनंद, अनघा, नवीन, मंदार आणि मनाली कॉलेज मधला ग्रुप. एकदम खास मैत्री होती त्यांची. म्हणजे ग्रॅज्युएशन झाल्यानंतर सगळ्यांनी एकत्रच MBA पण केलं. सगळेच तसे करियर ओरिएंटेड असल्याने MBA संपता संपता नोकरीला लागले. आनंद अभिनय क्षेत्रात गेला. नविनला एका इंटरनॅशनल कंपनीमध्ये चांगल्या पोस्टवर जॉब लागला. मंदारने त्याच्या वडिलांना जॉईन केलं. मनालीने देखील एका event management कंपनीमध्ये जॉब मिळवला.

खरंतर अनघा या सगळ्यांमध्ये हुशार. पण तिला नोकरी करायची इच्छाच नव्हती. घर-संसार-मुलं हीच तिची आवड होती. तिचे बाबा तिला अनेकदा सांगत काहीतरी नोकरी किंवा स्वतःचा असा छोटासा व्यवसाय सुरू कर म्हणून. पण अनघा ते फार मनावर घेत नव्हती. मात्र आई-बाबांनी लग्नाची घाई करू नये म्हणून तिने MBA नंतर एम. कॉम. साठी ऍडमिशन घेतली होती. पण आता ते देखील संपत आलं होतं.

'आता तरी आनंदने लग्नाचा विचार करणं आवश्यक आहे. आता आई-बाबा ऐकणार नाहीत. आणि खरंतर मला देखील फार दिवस थांबता येणार नाही......' अनघाच्या मनात आलं. 'आनंद मला pick करेल तेव्हाच त्याच्याशी बोलून घेतलेलं बरं.' तिने ठरवलं.

ठरल्याप्रमाणे आनंदने अनघाला तिच्या घराखालून घेतलं आणि दोघे सायनच्या दिशेने निघाले. आनंदने गाणी खूप मोठ्याने लावली होती. खरंतर अनघाला काहीतरी बोलायचं होतं. पण गाण्यांचा आवाज कमी केला तर तो चिडेल आणि संपूर्ण पिकनिकचा मूड खराब होईल असा विचार करून ती काही बोलली नाही. ठरल्याप्रमाणे नवीन, मंदार आणि मनाली सायनला उभे होते. त्यांना घेतलं आणि आनंदने गाडी भरधाव सोडली त्याच्या वाड्याच्या दिशेने. बऱ्याच दिवसांनी भेटल्यामुळे सगळेच खुश होते. सगळ्यांच्या गाडीतच गप्पा सुरू झाल्या.

नवीन : यार, कितीतरी दिवसांनी असं बाहेर पडतो आहे न आपण?

मनाली : दिवस काय नवीन? महिने. या करोनामुळे मार्च नंतर काहीही केलं नाही. अगोदर तर घरातच कोंडून घेलल्यासारखं होतं. आता बाहेर पडतो आहोत पण तेसुद्धा work from home मधून वेळ मिळाला तर.

मंदार : हो ना यार!

मनाली : तू काय हो ना यार म्हणतो आहेस मँडी? तुझा स्वतःचाच business आहे.

मंदार : मनली तुला नाही कळणार व्यवसायिकांची दुःख! अरे यार business काही नाही पण कामगारांना पागर देतो आहोत. काम मिळवायला मी फिरतो आहे आणि बाबा फोनवरून प्रयत्न करत असतात. जाऊ दे. मी हो ना यार म्हणालो ते आपण सगळेच कामात अडकलो आहोत या विचाराने.

मंदारच शेवटचं वाक्य ऐकून सगळ्यांनीच माना डोलावल्या. मात्र मनाली अनघाकडे बघत म्हणाली...

मनाली : हीच बरं आहे. हिने ठरवलंच आहे न नोकरी नाही करायची. त्यामुळे करोना असो नसो ही घरीच असणार आहे.

असं म्हणून मनाली काहीसं कुत्सित हसली. अनघाने ते ऐकून न एकल्यासारखं केलं. खरंतर तिला वाटलं होतं आनंद मनालीला झापेल. पण तो काहीच बोलला नाही. उलट नवीन म्हणाला...

नवीन : मनाली, आयुष्यात काय करायचं हा ज्याचा त्याचा वयक्तिक choice असतो. अनघाला नोकरी करायची नसेल तर नको करू दे ना. त्यात तिला tont मारण्यासारखं काय आहे?

नवीन असं म्हणता क्षणी मंदार आणि मनाली एकमेकांकडे बघून फसकन हसले आणि त्यांनी एकमेकांना टाळी दिली. आनंद हे सगळं रेअरव्यू आरशातून बघत होता. पण तो काहीच म्हणाला नाही. मात्र आनंदच्या बाजूला बसलेल्या अनघाला मंदार आणि मनालीचं हसणं मुळीच रुचलं नाही. मागे वळून बघत ती म्हणाली...

अनघा : त्यात हसण्यासारखं काय आहे ग मनाली? नवीन म्हणाला ते खरंच तर आहे. नाही करायची मला नोकरी. मला संसार-मुलं हे आवडतं. आणि... मला काय आवडतं ते मला माहीत तरी आहे. तुझ्यासारखं नाही न! MBA करून आता ऍड एजन्सीमध्ये कारकुनी करते आहेस. का? कारण MBA च्या qualifications वर जो job मिळेल त्याची प्रेशर्स घेता येतील की नाही याची खात्री नाही.

अनघाचं बोलणं ऐकून मनाली एकदम उसळली. आता या चर्चेला वादाचं स्वरूप येणार हे लक्षात येऊन आनंदने एकदम गाडी रस्त्याच्या कडेला घेतली. गाडीतले सगळेच एकदम हबकले आणि ओरडले...

अरे अरे काय करतो आहेस अन्या? वर्षाच्या शेवटच्या दिवशी मारणार का आम्हाला?

सगळ्यांच्या ओरडण्यावर जोरजोरात हसत आनंद म्हणाला;"अरे या तुमच्या वादाच्या नादात breakfast miss होईल ना. चला समोर मॅक आहे. खाऊन घेऊ आणि पुढे जाऊ."

सगळ्यांनी गाडीबाहेर नजर टाकली आणि समोर मॅकडोनाल्ड बघून गपचूप गाडीखाली उतरले. मनाली आणि अनघा washroom च्या दिशेने गेल्या. नवीन सगळ्यांसाठी बर्गर आणायला गेला हे पाहून मंदारने आनंदला छेडलं.

मंदार : ठरलं का रे तुमचं काही?

आनंदने एकदा मंदारकडे बघितलं आणि काहीही उत्तर न देता तो मॅक्डोनल्डच्या दिशेने चालायला लागला. मंदारने लांब जाणाऱ्या आनंदकडे बघितलं आणि तो गंभीर झाला.

एक सिगरेट ओढून थोड्यावेळाने मंदार देखील मॅकमध्ये गेला. समोरच अनघा, मनाली आणि नवीन बसून खात होते. आनंद तिथे दिसत नव्हता. त्याला बघताच नवीन म्हणाला,"अरे कुठे राहिला होतास तू यार? चल खाऊन घे हा बर्गर. आनंद गाडी इथेच आणतो आहे. निघुया आता. खूप टाईमपास झाला."

मंदार : गाडी आणतो आहे आनंद म्हणजे?

अनघा : अरे त्याचं खाऊन झालं तर तो म्हणाला मी गाडी इथे आणतो तोवर तुम्ही बाहेर या.

मंदार : अग, पण मी आत्ता गाडीजवळूनच आलो. मला आनंद तिथे दिसलाच नाही.

मंदार असं म्हणताच अनघा तटकन उभी राहिली आणि बाहेरच्या दिशेने धावली. धावताना तिचा पाय एका खुर्चीला अडकला आणि ती एकदम पडली. तिला पडलेलं बघून नवीन धावला आणि त्याच्या मागे मनाली आणि मंदार देखील. नविनने अनघाला उठून बसायला मदत केली. तेवढ्यात आनंदची गाडी मॅकच्या दारासमोर येऊन उभी राहिली. आनंदने हॉर्न वाजवत मॅकच्या दिशेने बघितले तर नवीन अनघाला कुरवाळत होता आणि मंदार-मनाली एकमेकांकडे बघत हसत होते. ते पाहून आनंदचा पारा एकदम चढला. तो गाडीतून उतरून त्यांच्या दिशेने वेगाने आला.

आनंद : काय चालू आहे तुमचं?

त्याच्या प्रश्नातला चिडका विचित्र अर्थ समजून अनघाचे डोळे भरून आले. तिच्यापासून दूर होत नवीन म्हणाला; "अन्या या मँडीने जोक केला. पण अनघाने ते seriously घेतलं आणि ती बाहेरच्या दिशेने धावली. पण खुर्चीत पाय अडकून पडली. तर तिला मदत करायची सोडून हा गाढव हसतो आहे."

मंदार : ए फालतूपणा नको करुस हा. मी खरंच गाडीकडून चालत आलो आणि तुम्ही म्हणालात आनंद गाडीकडे गेला. तर मी म्हंटलं मला तो दिसला नाही. तर यात इतकं पॅनिक होण्यासारखं काय होतं? ही का धावली?

आनंद : अनघा, मी वॉशरूमला जाऊन मग गाडीकडे गेलो. म्हणून मँडीला दिसलो नसेन. उगाच धावाधाव करून सगळ्यांचं लक्ष नको वेधुस. समजलं?

आनंदच्या बोलण्याने अनघा फारच दुखावली. तिच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहायला लागलं. तिची ती अवस्था बघून नवीन म्हणाला;"अरे आनंद ती तुझ्या काळजीने बाहेर धावली आणि तू तिलाच दूषणं देतो आहेस? कमाल आहे ह तुझी."

नवीनचं बोलणं ऐकून आनंद भडकला. मंदारच्या ते लक्षात आलं आणि अजून वाद वाढायला नकोत म्हणून तो एकदम मोठ्याने म्हणाला;"यारो चलो निकलते हें! सगळे गाडीत बसा बघू. तुमचं खाऊन झालं आहे. मी माझा बर्गर घेऊन येतो आणि निघुया आपण."

उगाच ताणाताणी वाढायला नको म्हणून सगळ्यांनीच आवरतं घेतलं आणि उठून गाडीकडे जायला लागले. अनघा थोडी लंगडत होती. नविनच्या ते लक्षात आलं पण आनंद परत भडकेल म्हणून तो गप बसला. मनालीच्या देखील ते लक्षात आलं. ती अनघा जवळ गेली आणि म्हणाली;"फार जोरात लागलं का ग?"

अनघा : शरीरापेक्षा मनाला लागलं ग.

अनघाच्या डोळ्यात अजूनही पाणी होतं. तिचा हात हातात घेत मनाली म्हणाली;"सॉरी ग अनु. तू इतकी जोरात पडली असशील असं नाही वाटलं. एकदम हसायला आलं म्हणून हसले. तुला hurt करायला नाही ग."

मनालीचा हात प्रेमाने दाबत अनघा म्हणाली;"its ok ग मनाली. मला आनंदच्या reaction मुळे वाईट वाटलं. तुझ्या हसण्याने नाही."

पुढे जाणाऱ्या आनंदकडे बघत मनाली म्हणाली;"विचारलं का त्याने?"

मान खाली घालत अनघा म्हणाली;"नाही.... अजून नाही."

तिचा हात थोपटत मनाली म्हणाली;"don't worry dear. कदाचित नवीन वर्षाची सुरवात होईल तेव्हाच विचारेल. काहीतरी सरप्राईज ठेवलं असेल त्याने तुझ्यासाठी."

मनालीच्या बोलण्यावर अनघा काहीच बोलली नाही. तिच्याकडे बघून हसत अनघाने डोळे पुसले आणि दोघी गाडीत जाऊन बसल्या.

गाडी आनंदच्या वाड्यावर पोहोचेपर्यंत गाडीत कोणीही काहीच बोललं नाही. अनघा आणि मनाली डोळे मिटून बसल्या होत्या. नवीन आनंदच्या शेजारच्या सीटवर बसून रस्ता बघत होता. मंदारने बर्गर संपवला आणि कानात आयपॉड घालून त्याने त्याची गाणी ऐकण्याचा कार्यक्रम सुरू केला होता.

वाडा आला आणि सगळेच काहीसे सैलावले. नविनने गेट उघडलं आणि आनंदने गाडी आत घेतली.

मनाली : कधी आलो होतो बरं आपण last? मला वाटतं 2019. हो न ग अनघा?

अनघाने फक्त मान डोलावली आणि सगळे खाली उतरले. आपापल्या सॅक्स घेऊन सगळे वाड्याच्या मुख्य दरवाजाकडे निघाले. पण त्यांना थांबवत आनंद म्हणाला,"यार, आत आपण मधल्या दरवाजाने जाऊया."

सगळेच आश्चर्याने आनंदकडे बघायला लागले.

मनाली आणि मंदारने एकत्र म्हंटलं;"मधला दरवाजा?" एकत्र बोललं गेल्याने दोघेही एकमेकांकडे बघून हसले आणि मंदार म्हणाला;"अन्या, साल्या असं काही आहे या वाड्याला? आपण इतकी वर्ष येतो आहोत पण कधी बोलला नाहीस... आणि आम्ही पण बघितलेला नाही."

आनंद त्यावर काहीतरी बोलणार होता पण तेवढ्यात अनघा म्हणाली...

अनघा : अन्या हे काय अचानक? तुला तो मधला दरवाजा उघडलेला कधीच आवडला नाही न? आणि आता म्हणतोस तिथूनच वाड्यात जाऊया?

अनघाचं बोलणं ऐकून मंदारने मनालीकडे बघत डोळा मारला. ती देखील हलकेच हसली. नविनच्या ते लक्षात आलं पण तो काहीच बोलला नाही.

अनघाकडे शांतपणे बघत आनंद म्हणाला,"अग अनु, उगाच काहीतरी superstitions होती माझ्या मनात. पण आता माझं मत झालंय की जे असतं ते आपल्या मनात असतं. चला यार. तोच दरवाजा वापरणार आहोत आपण." असं म्हणून शीळ वाजवत आनंदने वाड्याला अर्धी फेरी मारली आणि वाड्याच्या मधल्या दरवाजाजवळ येऊन तो उभा राहिला. सगळेच त्याच्या मागून तिथे आले होते. आनंदने वळून सगळ्यांकडे बघत डोळा मारला आणि समोरच्या दरवाजाची कडी काढत तो ढकलला. आता मात्र सगळ्यांचेच डोळे मोठे झाले.

नवीन : अन्या... साल्या कुलूप नाही?

आनंद : अहं.... गरजच नाही. कोणालाही हा दरवाजा लक्षातच येत नाही. तुम्हाला तरी माहीत होता का? काय अनघा?

आनंदकडे संदिग्ध नजरेने बघत अनघाने नाही म्हणून मान हलवली आणि म्हणाली,"तू एकदोन वेळा उल्लेख केला होतास. पण म्हणालास की तुला तो दरवाजा आवडत नाही. त्या बाजूला जायला पण आवडत नाही. म्हणून तर हा दरवाजा उघडतो तिथल्या दोन खोल्यासुद्धा तू बंद ठेवल्या आहेस न?"

आनंद तिच्याकडे बघत म्हणाला;"सांगितलं न तुला. आता no more superstitions. त्या खोल्या उघडल्या मी." अस म्हणून हसत हसत आनंदने वाड्यात प्रवेश केला. अचानक आनंदचा मूड बदलला होता. इतक्यावेळ काहीसा घुम्यासारखा गाडी चालवणारा आनंद वाड्यात शिरला आणि हसत मोठ्याने ओरडला;"मी आssलोss!" त्याचा आवाज संपूर्ण वाड्यात घुमला... आणि सगळेच हसले. मनाली आनंदच्या पाठीवर हलकेच गुद्दा मारत म्हणाली;"कोणाला सांगतो आहेस हे? अख्या वाड्यात कोणीही नाही."

आनंदने तिच्याकडे बघितलं आणि डोळा मारत म्हणाला;"U never know!"

तो असं म्हणल्याक्षणी मनालीचा चेहेरा बघण्यासारखा झाला आणि ती मागे सरकत म्हणाली;"अन्या, फालतू बडबड करू नकोस हं. तुला माहीत आहे मला फोबिया आहे नवीन जागेचा. आठवतं न आपण पहिल्यांदा आलो होतो तेव्हा मी बाथरूममध्ये पण अनघाला घेऊन जायचे. गेल्या तीन-चार वर्षात येत होतो परत-परत म्हणून आता भीती गेली आहे माझ्या मनातली. तू असं काही बोललास तर अवघड होईल माझ्यासाठी."

तिचा उतरलेला चेहेरा आणि रडवेला आवाज ऐकून आनंदने तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि हलकेच हसत म्हणाला;"मिनू डार्लिंग, घाबरू नकोस ग. मी गंम्मत केली." आनंदने मनालीला डार्लिंग म्हंटलेलं अनघाला आवडलं नव्हतं. पण ती काहीच न बोलता पुढे गेली आणि डावीकडे वळली. मनाली चटकन पुढे होत अनघाबरोबर गेली. आनंदने नवीन आणि मंदारकडे बघत खांदे उडवले आणि तो समोरच्या खोलीकडे सरळ चालत गेला.

आनंद : दोस्तहो... ही आपली खोली आहे.

मंदार: म्हणजे? इतका मोठा वाडा असून आपण खोली शेअर करायची? अन्या....

आनंद : गप रे मँडी. मला म्हणायचं होतं ही माझी खोली आहे. तुम्ही ही बाजूची घ्या आणि....

अनघा तेवढ्यात तिथे आली होती. ती आनंदकडे बघत शांतपणे म्हणाली;"आम्ही दोघी समोरची खोली घेतो."

आनंदने वळून अनघाकडे बघितलं.

आनंद : समोरची?

अनघा : हो! का?

आनंद काहीतरी बोलणार होता; पण मग काहीच न बोलता तो त्याच्या खोलीच्या दिशेने निघून गेला.

मंदार त्याच्या खोलीच्या दिशेने जात म्हणाला;"चल रे नवीन." आणि मग जरा मोठ्याने म्हणाला;"दोस्तांनो सगळेच आराम करूया थोडा वेळ. जेवायच्या वेळेस भेटू."

त्याने असं म्हणताच खोलीकडे जाणारी मनाली मागे वळली आणि म्हणाली;"अरे जेवायच्या वेळेला भेटून जेवायचं काय? इथे काय सोय आहे?"

खोलीच्या आत जात मंदार म्हणाला;"बघू ग! काहीच नाही तर बाहेर तर जाता येतं ना?"

मान उडवत मनाली स्वतःच्या खोलीत शिरली आणि अनघाकडे बघत म्हणाली;"आत्ता ठीक आहे हं; पण रात्री मी नाही बाहेर येणार. इथेच सोय करूया ग."

बाथरूमच्या दिशेने जात अनघा म्हणाली;"मनाली काळजी करू नकोस. वाड्याच्या मागे भिकू राहातो. त्याची बायको मस्त नॉनव्हेज करते. आपण दोघी नंतर तिथे जाऊन तिला पैसे देऊन येऊ. तुझं म्हणणं बरोबर आहे; आत्ता बाहेर ठीक पण रात्री बाहेर जाणं एकूणच अवघड."

अनघाने असं म्हणताच पटकन पुढे होत मनालीने अनघाचा हात धरला आणि घाबरलेल्या आवाजात म्हणाली;"म्हणजे काय ग?"

त्यावर हसून तिचा हात थोपटत अनघा म्हणाली;"उगाच घाबरू नकोस. आज थर्टी फास्ट night आहे न. म्हणून म्हंटलं. कळलं मनु डार्लिंग!" आणि हात सोडवून घेत बाथरूममध्ये गेली. ती आत गेलेली पाहून मनालीने मोबाईल हातात घेतला आणि कोणालातरी मेसेज करायला लागली.

***

साधारण दोन वाजयचा सुमार होता. अनघा आणि मनाली त्यांच्या खोलीमधून बाहेर आल्या. मस्त झोप काढल्यामुळे दोघीही एकदम फ्रेश होत्या. मुलांच्या खोल्यांच्या दिशेने जात दोघींनी हाका मारायला सुरवात केली....

"अरे उठा रे. किती झोपणार आहात? चला जेऊन येऊ या. जाम भूक लागली आहे."

त्यांच्या हाका ऐकून नवीन डोळे चोळत खोलीबाहेर आला आणि म्हणाला;"अरे यार. काय घाई असते ग तुम्हाला? मस्त झोपलो होतो ना."

त्यावर थट्टेच्या सुरात अनघा म्हणाली;"नवीन सध्या work from home असल्याने दुपारची झोप होतच असेल न?"

त्यावर नवीन देखील हसत हसत म्हणाला;"हो न. दुपारची झोप तुझ्यापेक्षा चांगली कोणाला कळणार?"

अनघा हसत म्हणाली;"आगाऊपणा नको करुस ह नवीन." मग खोलीच्या दारातून आत डोकावत तिने मंदारला हाक मारली. "मँडी उठ रे आळशा. भूक लागली आहे आम्हाला दोघींना." मंदार आतूनच ओरडला;"तुम्ही जाऊन या रे. माझ्यासाठी पार्सल आणा. या मस्त गार गार हवेत मला उठवसंच वाटत नाही."

त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत अनघा नविनला म्हणाली;"त्याला उठव रे. मी आणि मनाली मागे जाऊन रात्रीच्या जेवणाची सोय करून येतो. तोपर्यंत तयार व्हा तुम्ही."

असं म्हणून ती मनालीला घेऊन मागच्या दाराच्या दिशेने चालायला लागली. तिला हाक मारत नवीन म्हणाला; "अनघा.... तू अन्याला नाही का उठवणार?"

मागे न वळता अनघा म्हणाली;"त्याला झोपेतून मध्येच उठवलेलं आवडत नाही. उगाच परत माझ्यावर ओरडेल. मला माझी संध्याकाळ खराब नाही करायची. तूच उठव त्याला."

अनघाचं बोलणं नविनला आवडलं नाही. पण तो त्यावर काहीच बोलला नाही. अनघा आणि मनाली मागचं दार उघडून मागच्या आडाच्या दिशेने चालायला लागल्या. थोडं पुढे गेल्यावर मनालीने अनघाचा हात धरला आणि तिला थांबवत विचारलं;"अनघा खरं सांग... तुझ्यात आणि अन्यामध्ये काही फारच सिरीयस आहे का? हे बघ, उगाच आढेवेढे घेऊ नकोस. जे खरं आहे ते सांग मला."

अनघा समोर बघत काही क्षण थांबली आणि मग मनालीकडे वळत म्हणाली;"मनाली, आनंद आणि मी लग्न करायचा विचार करतो आहोत. म्हणजे मी तर नक्की. दोन महिन्यांपूर्वी.... म्हणजे दिवाळीमध्ये आम्ही दोघेचं इथे आलो होतो. तुमचं सगळ्यांचं नाव सांगितलं होतं माझ्या घरी. करोनामुळे work from home आहे. त्यामुळे बाबांना पटलं की सगळेच येतो आहोत. आनंद खूपच प्रेमात होता माझ्या. ते तीन दिवस माझ्या आयुष्यातले सर्वात सुंदर दिवस होते. मी स्वप्नात वावरत होते. आम्ही निघणार होतो त्याच्या आदल्या संध्याकाळी आनंदने मला प्रपोज केलं. इथे या मागच्या दाराशेजारच्या त्या झोपाळ्यावर. माझ्या नकळत त्याने तो सुंदर सजवला होता... माझ्यासाठी एक ड्रेस घेऊन आला होता... त्याने मला अंगठी पण दिली ग मनाली. ही बघ!" असं म्हणत अनघाने तिचा हात पुढे केला. अनघाच्या बोटात एक सुंदर हिऱ्याची अंगठी होती. मनाली काहीच बोलली नाही. एकदा अंगठीकडे बघून अनघा परत चालायला लागली.

मनालीचा चेहेरा फारच गंभीर झाला होता. चालता-चालता थांबत तिने अनघाचा हात ओढला आणि म्हणाली; "अनघा, एक गोष्ट सांगू?"

तिच्याकडे वळत अनघाने प्रश्नार्थक नजरेनेच बोल म्हंटलं.

मनाली : अनघा, तू म्हणते आहेस की आनंद तुझ्या खूपच प्रेमात होता... होता! म्हणजे आता नाही का? कारण आज सकाळपासून तो जे आणि जसं वागतो आहे त्यावरून तर त्याचं तुझ्यावर प्रेमच काय... पण तू त्याच्यासाठी थोडीशी देखील वेगळी नाहीस असं दाखवून द्यायचा प्रयत्न तो करतो आहे; असं मला वाटतं."

अनघाने एकटक मनालीकडे बघितलं आणि काहीही न बोलता ती परत चालायला लागली. मनाली देखील तिच्या मागे जात होती. आडाला वळसा घालून दोघी थोड्या पुढे आल्या आणि अनघाने हाक मारली;"भिकू दादा... ओ भिकू दादा..." मागच्या झाडीमधून आवाज आला;"ताई? कधी आलात? मला वाटलंच होतं आज याल." त्याला जास्त बोलायला न देता अनघा म्हणाली;"आम्ही पाचजण आलो आहोत भिकू दादा. रात्रीच्या जेवणाचं करू शकाल ना?"

अनघा इतकं बोलेपर्यंत भिकू समोर येऊन उभा राहिला होता. दणकट शरीरयष्टीचा काळाकभिन्न भिकू बघून मनाली दोन पावलं मागे सरकली. तिच्याकडे एकदा बघून भिकू अनघाकडे बघून हसला. त्याच्याकडे हसून बघत अनघा म्हणाली;"मी आणि मालक आलो आहोत. आमच्या बरोबर आमची ही एक मैत्रीण आणि अजून दोन मित्र आले आहेत. रात्रीसाठी मस्त चिकन, पोळ्या, डाळ-भात कराल ना?" "हो ताई. हे काय विचारणं झालं? काही बिअर वगैरे आणून ठेऊ का फ्रीजमध्ये?" त्यावर अनघा हसून म्हणाली;"नको. आम्ही आत्ता बाहेर जातो आहोत तेव्हा आणून ठेऊ. प्रत्येकाचा चॉईस वेगळा असेल न. तुम्ही फक्त जेवण करा." असं म्हणून तिने भिकुला हजार रुपये दिले आणि मागे वळून परत निघाली.

भिकूने अनघाला हाक मारली. "ताई.... वरती नका जाऊ कोणी."

त्यावर गर्रकन मागे वळत अनघा म्हणाली;"वरती नाही जायचं? का भिकू? अरे आनंदला तर वरचा मोकळा दिवाणखानाच खूप आवडतो. एरवी कधी मधल्या दाराकडे जाऊ दिलं नाही.... पण तुला माहीत आहे; आज आम्ही त्या दारातून आत आलो. आनंद कधीच खालच्या खोलीत राहायला तयार होत नाही. सरळ वर जातो. पण आज त्याने वरच्या जिन्याकडे बघितलं देखील नाही... आणि आता तू.... काय चाललं आहे मला कळेल का?"

त्यावर एकदा मनालीकडे बघत भिकूने खांदे उडवले आणि म्हणाला;"मी नऊ पर्यंत जेवण घेऊन येतो ताई. मला जे योग्य वाटलं ते सांगितलं. बाकी तुम्ही मालकांना विचारा." असं म्हणून तो मागे वळला आणि निघून गेला.

झालेल्या सगळ्या प्रकाराने मनाली एकदम अवघडून गेली. पण ती काहीच बोलली नाही. अनघा आणि मनाली वाड्यात परत आल्या तर आनंद, नवीन आणि मंदार तयारच होते. सगळे बाहेर पडले जेवायला.

***

संध्याकाळ चांगलीच दाटून आली होती. अनघाने वाड्यात फिरून सगलीकडचे दिवे लावले होते. मधल्या मोठ्या खोलीत बसून सगळे गप्पा मारत होते. जुन्या कॉलेजच्या गप्पा चालू होत्या. कोण कोणाला कोणावरून चिडवायचं किंवा कोणते प्रोफेसर कसे होते... असलेच सगळे विषय होते. थोड्या वेळाने अनघा आतून पत्ते घेऊन आली आणि म्हणाली;"चला, झब्बूचा एक डाव टाकूया." आणि सगळेच तयार झाले. त्यानंतर पत्ते खेळण्यात पाचहीजण इतके रमले की किती वाजले आहेत याचं त्यांना भानच राहिलं नाही. अचानक मागच्या दाराकडून भिकुची हाक ऐकू आली... "ताई, जेवण घेऊन आलो आहे. दार उघडता न?"

त्याचा आवाज ऐकून अनघा पटकन उठली आणि मागच्या दाराकडे गेली. तिचं वाड्यात सहज वावरणं नवीन आणि मंदारच्या डोळ्यातून सुटलं नव्हतं. पण कोणीच त्यावर काहीही बोलत नव्हतं.

भिकूने दोन पिशव्यांमधून डबे आणले होते. ते घेऊन तो स्वयंपाकघरात गेला. अनघा देखील त्याच्याबरोबर गेली. मनालीने हातातले पत्ते खाली टाकले आणि म्हणाली;"मी पण जाऊन मदत हवी आहे का बघते." आणि पटकन आत गेली.

मनाली स्वयंपाकघरात शिरली तर भिकू अगदी हळू आवाजात अनघाला काहीतरी सांगत होता. मनालीला बघून तो थांबला. अनघाने देखील मनालीकडे बघितलं आणि म्हणाली;"बरं झालं ग तू आलीस. चल, आपण आणलेल्या बिअर्स बाहेर घेऊन जाऊ. पत्ते खेळताना नऊ वाजून गेलेले कळलंच नाही न." मग भिकुकडे वळून ती म्हणाली;"साधारण अकरा पर्यंत ये रे जेवण गरम करायला. तुला बाहेर आणून ठेवायची गरज नाही. फक्त स्वयंपाकघरात लागेल ती मदत कर आणि जा लगेच. भांडी घासायला उद्याच ये."

एकदा मनालीकडे बघत भिकूने बरं म्हणून मान डोलावली आणि तो निघून गेला. अनघा आणि मनाली बिअर्स घेऊन बाहेर आल्या आणि परत एकदा गप्पा-पत्ते-बिअर असा मस्त कार्यक्रम सुरू झाला सगळ्यांचा. साधारण अकरा वाजता अनघा आपणहून उठली. तिने मागचं दार उघडलं आणि परत येऊन सगळ्यांना जॉईन झाली. थोड्या वेळाने स्वयंपाकघरातुन भिकुची हाक आली... ताई.... आणि अनघाने सगळ्यांकडे बघत म्हंटलं;"चला रे जेऊन घेऊया आणि मग बाहेर अंगणात जाऊन बसूया थोडावेळ. इथे बारा वाजता रोषणाई करतात असं भिकू म्हणत होता. ती बघत नवीन वर्षाच स्वागत करूया."

सगळेच बिअरमुळे थोडेसे सैलावले होते. सगळ्यांना भूक देखील लागली होती. त्यामुळे पटकन जेवायला आले. जेवणं आटोपून सगळे बाहेर गेले. अनघा सगळ्यात शेवटी बाहेर जायला निघाली. तिने स्वयंपाकघराकडे बघत म्हंटलं;"भिकू, सगळं आवरून घेतलंस तरी चालेल. आम्ही सगळे बाहेर आहोत. आत्ता आत कोणीच येणार नाही."

मनाली अनघा बरोबरच होती. तिने एकदा स्वयंपाकघराकडे बघितलं आणि अनघाचा हात धरत ती अंगणात आली.

क्रमशः

Friday, January 1, 2021

प्रवास

 प्रवास


आनंद : यार आटपा आता. उशीर होतोय आपल्याला. थर्टीफस्टला जोडून शनिवार-रविवार आल्याने जमू शकलं इथे माझ्या या वाड्यावर येणं. साल्यांनो, तुम्हाला लॉक डाऊनमुळे work from home आहे; पण मला जावं लागणार आहे शूटला.... आणि अकरा नंतर कर्फ्यु आहे. Not more than four are allowed to travel together. उगाच कुठे थांबवलं तर लफडा होईल.

गाडीच्या दिशेने येत मंदारने आपली सॅक गाडीत टाकली आणि तो आनंदजवळ जाऊन उभा राहिला.

मंदार : अन्या तू कायमच रडया आहेस. लोणावळा ते मुंबई असं कितीसं अंतर आहे रे? जेम-तेम दोन तासात पोहोचू आपण. उगाच उशीर होतोय हे कारण नको देऊस. तुझा हा भूतिया वाडा तुला लवकर सोडायचा आहे... असं म्हण हवं तर.

आनंद : मँडी किती वेळा सांगू तुला असलं काही बोलू नकोस म्हणून.

मंदार : अरे यार.... भूतीयाला भूतिया नाही म्हणणार तर काय माणसांनी भरलेला वाडा म्हणणार का?

आनंद : मँडी आता गपतो का तू की देऊ एक ठेऊन?

मंदार : हिम्मत असेल तर हात लावून दाखव.

मंदार आणि आनंदमध्ये जुंपयला लागली. त्यांचा वाढता आवाज ऐकून अनघा धावत बाहेर आली.

अनघा : झाली का तुमची सुरवात परत?

आनंद : त्याला बोल काय ते. सुरुवात त्याने केली आहे.

अनघा : मँडी, खरंच गप बस् रे आता. इथे आल्यापासून तू भूत भूत बडबडून सगळ्यांचा मूड खराब केला आहेस. आपण सगळे इथे करोना मागे सोडून नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आलो न? अलीकडे सगळेच नोकऱ्यांमध्ये अडकलो आहोत. कधीतरी दोन-चार महिन्यात जेमतेम एखादं डिनर जमत होतं सगळ्यांना. त्यात या लॉक डाऊनने वाट लावली. गेल्या कित्येक महिन्यात आपली भेट नाही. त्यात अजूनही परिस्थिती फार सुधारलेली नाही आणि मुंबईत काहीच करणं शक्य नव्हतं; म्हणून इथे आलो. येताना पण एकएकटे पोहोचलो. पण शेवटी सगळ्यांनी वेळ काढलाच. जवळ जवळ दीड वर्षाने एकत्र आलोय आपण सगळे. ते काय तुमचं भांडण ऐकायला? का भूत भूत खेळायला?

मंदार : माफ करा अनघाबाई. तुम्ही समोर असताना श्रीयुत आनंद यांना कोणी काही म्हणेल का?

मंदारचं हे वाक्य ऐकून अनघाने क्षणभर आनंदकडे बघितलं आणि काही एक न बोलता परत घराकडे वळली. आनंदला तिचा चेहेरा दिसला नव्हता.

आनंद : गपतो का तू? की देऊ एक.........

ती गेल्याची खात्री करत आनंद म्हणाला. ती गेल्याची खात्री करत मंदार म्हणाला...

मंदार : साल्या तिला तू आवडतोस हे तुला पण माहीत आहे. पण मग तिला विचारत का नाहीस? आता तर तुझी ही दुसरी सिरीयल येते आहे न? जाहिराती पण करायला लागला आहेस तू. म्हणजे चांगली कमाई आहे. इतकी गोड मुलगी कधीपासून तुझ्या मागे आहे आणि तू साल्या भाव खातोस?

आनंद : अरे यार! माझ्या मनात देखील होतं रे. पण या लॉक डाऊनने वाट लावली आहे. पहिली सिरीयल लवकर गुंडाळली गेली. ही नवीन मिळाली आहे ती हॉरर सिरीयल आहे. त्यातसुद्धा मी भूत आहे. म्हणजे मला कधीही संपवू शकतात ते. बाकी जाहिराती मिळण्याची खात्री नाहीच. त्यामुळे थोडं थांबायचं ठरवलंय मी.

नवीन वाड्याच्या मागून अचानक उगवला आणि मंदार-आनंदच्या संभाषणाचा भाग होत म्हणाला...

नवीन : अन्या, तुला कधीपासून पैशाचा विचार करायची वेळ आली रे भाड्या? हे अभिनय वगैरे चोचले तुलाच परवडू शकतात. आमची इच्छा असूनही आम्हाला खर्डेघाशीच करावी लागणार आहे.

अचानक येऊन आनंदवर बरसणाऱ्या नविनकडे आश्चर्यचकित नजरेने मंदार बघायला लागला.

मंदार : तुला अभिनयात रस आहे? म्हणजे करियर म्हणून निवडायचं होतं तुला हे क्षेत्र?

नवीन : मँडी, अन्यापेक्षा जास्त चांगलं काम मी करायचो नाटकात हे तुला माहीत नाही का? कायम लीड रोल मला मिळाला आहे. अनघा माझी हिरोईन असायची नेहेमी. त्याचवेळी तिला विचारावं अशी माझी इच्छा देखील होती..... पण जाऊ दे तो विषय!

खरी आयुष्यातली लीड सिच्युएशन आनंदलाच मिळाली आहे. साल्याकडे पैसा भरपूर.... बाप पण गेला सगळं याच्या नावावर करून.... इतक्या प्रेमळ काकू; पण याच्या बापानंतर अचानक गेल्या. हा इथला वाडा, मागे ही एवढी मोठी शेती. शेतीचं उत्पन्न जबरदस्त असतं न रे अन्या? त्यात मलबार हिलवर दोन फ्लॅट. दोन्ही फ्लॅट भाड्यावर देऊन हा साला गोरेगावात भाड्यावर राहातोय. महिना तीन-चार लाख कमावतोय हा बसून. त्यात कोणतं ना कोणतं शूटचं काम मिळतंच की. अरे, आम्ही दोघांनी एकत्रच स्ट्रगलला सुरवात केली होती. स्क्रीन टेस्टमध्ये माझं कौतुक व्हायचं आणि काम याला मिळायचं. आपण कॉलेजमध्ये होतो तोपर्यंत ठीक होतं. नंतर आमच्या पिताश्रींनी फतवा काढला; घरात राहायचं असेल तर कमवून आणायला सुरवात करा; नाहीतर चालते व्हा. चालते कुठे होणार? याच्या मलबारच्या फ्लॅटवर? म्हणून मग गपचूप नोकरी शोधून कामाला लागलो.

मंदार : आयला... नवीन अन्यासमोर पहिल्यांदाच स्वतःहून कबूल केलंस नं तुला अनघामध्ये इंटरेस्ट आहे ते?

असं म्हणून मंदार मोठ्याने हसायला लागला. मंदारच्या त्या एका वाक्याने सगळं वातावरणच बदलून गेलं. आनंद आणि नविनने एकमेकांकडे निरखून बघितलं. नवीन दोघांकडे पाठ फिरवून वाड्याच्या दिशेने गेला आणि आनंद गाडीत जाऊन बसला. ते दोघेही निघून गेले आहेत हे मंदारच्या लक्षात आलं नाही. तो आपल्याच नादात खदखदून हसत उभा होता... आणि अचानक मंदारला मागच्या झाडीमधून कोणतीतरी ओढून घेतलं. मंदार ओढला गेला हे कोणाच्याच लक्षात आलं नाही. कारण नेमकं कोणीच नव्हतं तिथे. ड्रायव्हर सीटवर जाऊन बसलेल्या आनंदने एकदा हॉर्न वाजवला आणि तो जोरात ओरडून म्हणाला...

आनंद : अरे चला रे. नऊ वाजत आले. तुम्हाला सगळ्यांना सोडून मग मी घरी पोहोचणार. उद्या पाहाटेचं शेड्युल आहे माझं शूटचं.

आनंदचा आवाज ऐकून मनाली धावत बाहेर आली. तिच्या हातात तिची सॅक होती. गाडीचं मागचं दार उघडून हातातली सॅक आत टाकत ती म्हणाली...

मनाली : अन्या, काय बोललास रे नविनला? तो मागच्या दारात जाऊन बसला आहे तोंड पाडून. यार तुम्ही लोक ना त्याला फार बुली करता. तो पण मूर्ख अजूनही अनघाच्या बाबतीत आशा लावून बसला आहे. अभिनयात चांगलं करियर केलं असतं त्याने. पण तिच्यासाठी म्हणून नोकरीला लागला. मात्र सगळ्यांना सांगत फिरतो की बाबांनी सांगितलं म्हणून नोकरी पत्करली. आता जबरदस्त पगार कमावतो आहे. पण तरीही अनघा त्याला भाव देत नाही. परवा थर्टीफस्टला त्याने तिला प्रपोज पण केलं. पण ती काहीएक न बोलता निघून गेली. मी सगळं बघत होते लांबून.

मनालीचं बोलणं ऐकून आनंदला धक्काच बसला. गर्रकन मागे वळून मनालीकडे बघत त्याने विचारलं..

आनंद : नवीनने अनघाला प्रपोज केलं परवा? आणि तू हे मला आत्ता बोलते आहेस?

क्षणभर आनंदकडे निरखून बघत मनाली म्हणाली...

मनाली : तुला नव्हतं माहीत? मला वाटलं सगळ्यांना माहीत आहे.

तिचं बोलणं ऐकून आनंदने नकारार्थी मान हलवली. तो काहीतरी बोलणार होता पण मनाली स्वतःच्याच तंद्रीमध्ये होती.

मनाली : खरं सांगू? मला विचारलं असतं न नविनने तर मी लगेच हो म्हंटलं असतं त्याला. इतका हँडसम... कंपनीमध्ये उत्तम पोस्टवर... दणदणीत पगार... आणि मनाने इतका हळुवार!!!

तिचं बोलणं ऐकून आनंदचे डोळे मोठे झाले. तिच्या डोळ्यांसोमोर चुटकी वाजवत तो म्हणाला...

आनंद : मनु मॅडम ये क्या नया ट्विस्ट हें स्टोरी में? तुला नवीन...???

आनंदच्या बोलण्याने मनाली भानावर आली आणि कावरी-बावरी झाली. ती काही बोलणार तेवढ्यात नवीन हातात स्वतःची सॅक घेऊन आला आणि ती त्याने गाडीत टाकली. त्याला येताना बघून आनंद गाडीतून खाली उतरला आणि गाडीजवळ आलेल्या नविनच्या पाठीत त्याने गुद्दा घातला.

आनंद : साल्या... तू परवा रात्री अनघाला प्रपोज केलंस?

आनंदचं वाक्य ऐकून नवीनने चमकून मनालीकडे बघितलं. तिची नजर खाली झुकली होती. एकदा मनालीकडे बघून काहीसा विचित्र हसत आनंद म्हणाला...

आनंद : तिला का खुन्नस देतोयस? चुकून बोलून गेली ती. भाड्या तू मात्र छुपा रुस्तुम निघालास हा... डायरेक्ट प्रपोज??? साला....

आनंद अजूनही काहीतरी बोलला असता पण अनघाने त्याला वाड्यातून हाक मारली आणि तो वळून वाड्याच्या दिशेने गेला. तो जाताच नविनने एकदा परत मनालीकडे बघितलं आणि तो देखील वाड्याच्या दिशेने वळला. त्याचा हात धरत मनाली म्हणाली...

मनाली : सॉरी नवीन. चुकून निघून गेलं तोंडून. खरंच मला सांगायचं नव्हतं रे.

नविनने तिचा हात झिडकरला आणि वाड्याकडे जायचा विचार बदलून तो गेटकडे गेला. मनाली त्याच्या मागे जायला लागली. पण गाडीच्या उघड्या दारातून तिची सॅक खाली पडली. ती उचलायला ती वाकली. नवीन पुढे चालत गेला. मनाली सॅक घेऊन उभी राहिली आणि मागच्या झाडीतून एका हाताने तिला ओढून घेतलं. मनाली ओढली गेली आणि नुकतीच उचललेली तिची सॅक परत खाली पडली.

त्याचवेळी अनघा गाडीच्या दिशेने येत होती. ती गाडीकडे आली आणि मनालीच्या सॅकला पाय लागून धडपडली. स्वतःची सॅक गाडीत टाकत तिने मनालीची सॅक देखील उचलली आणि गाडीत टाकली. तिने वाड्याकडे वळून आनंदला हाक मारली...

अनघा : आनंद.... ए आनंद... ये की. मघा तूच घाई करत होतास आणि आता आत जाऊन बसला आहेस.

अस म्हणून ती स्वतःशीच खुदकन हसली. आनंद आतूनच ओरडला....

आनंद : येतो ग. तू हा फोडलेला फ्लॉवरपॉट आवरतो आणि येतो. तुम्ही सगळे बसा गाडीत.

अनघाने जीभ चावली आणि परत एकदा खुदकन हसत ती मागे वळली आणि एकदम दचकली. तिच्या मागेच नवीन उभा होता. तिच्याकडे क्षणभर बघून नवीन वाड्याच्या दिशेने चालायला लागला. अनघाने न राहून नविनला हाक मारली..

अनघा : नवीन!!!

नवीन : खरंच फ्लॉवरपॉट पडला का अनघा?

नविनने वळून विचित्र तिरकस आवाजात तिला विचारलं. त्याचा प्रश्न ऐकून अनघाचा चेहेरा स्थितप्रज्ञ झाला आणि तिने त्याच्याकडे पाठ केली. खांदे उडवून नवीन परत वाड्याच्या दिशेने चालायला लागला. नवीन निघून गेला आहे हे अनघाच्या लक्षात आलं नाही. ती अजूनही नवीन गेला त्या दिशेने पाठ करून उभी होती. तिला काय वाटलं कुणास ठाऊक; पण अचानक ती बोलायला लागली...

अनघा : नवीन... तुला मी परवाच सांगितलं आहे. मला तुझ्यात मुळीच इंटरेस्ट नाही. तुला पटतच नाही की माझं आनंदवर प्रेम आहे.... जसं तुझं माझ्यावर आहे. आनंदच्या पैशांकडे बघून जर मी त्याचा विचार करत असते तर त्याचे आई-वडील असतानाच मी त्याच्याकडे जाणं वाढवलं असतं आणि काकूंच्या माध्यमातून आनंदला भरीस पाडलं असतं. तुला माहीतच आहे काकूंना मी कायमच आवडत होते. पण आनंदने माझ्यावर स्वतःहून प्रेम करावं अशी माझी इच्छा होती. उगाच काहीतरी करून त्याला मिळवायचं नव्हतं मला. जाऊ दे! तुला का सांगते आहे हे सगळं मी? तू काही समजून घेणार आहेस का?

अनघा बोलता बोलता मागे वळली आणि तिच्या लक्षात आलं ती एकटीच आहे. एकटं आहे हे लक्षात आल्यावर तिचं लक्ष आजूबाजूच्या किर्रर्र झाडाझुडपांकडे गेलं आणि ती एकदम कावरी-बावरी झाली. गाडीचं उघडं दार झपाट्याने लावत ती वाड्यात जायला वळली आणि अचानक जवळच्या झाडीमध्ये ओढली गेली.

थोड्या वेळाने आनंद बाहेर आला. त्याच्या हातात त्याची सॅक होती. गाडीकडे येत त्याने डिक्की उघडली आणि स्वतःची सॅक आत टाकून तो ड्राइवर सीटवर येऊन बसला. त्याने रेअरव्यू अरशामधून मागे बघितलं तर अनघा, मनाली आणि मंदार गाडीत अगोदरच बसले होते. त्यांना बघून आनंदने रेअरव्यू आरसा नीट केला आणि खिडकीतून डोकं बाहेर काढत मोठ्याने ओरडला...

आनंद : नवीन चल रे लवकर. मुंबई गठेपर्यंतच अकरा वाजून जाणार आहेत. तुम्हाला सोडून मला घरी पोहोचायला किती वाजतील कोण जाणे.

आनंदचा आवाज चांगलाच घुमला आसमंतात. त्याचा आवाज ऐकून नवीन वाड्यातून बाहेर आला. तो अगदी सावकाश चालत होता. तो येऊन आनंदच्या शेजारी बसला. त्याने त्याचे दोन्ही हात स्वतःच्या मांडीवर ठेवले होते. एकदा त्याच्याकडे बघत आनंदने गाडी चालू केली आणि गेटमधून बाहेर काढत मार्गाला लावली.

आनंद शांतपणे गाडी चालवत होता. अधून मधून रेअरव्यू अरशातून तो मागे बसलेल्या अनघा, मनाली आणि मंदारकडे बघत होता. पण अगदीच निघताना झालेल्या विचित्र चर्चेमुळे कोणीच कोणाशी बोलत नव्हतं. अनघा आणि मंदार खिडकी बाहेर बघत होते. मनालीने डोळे मिटून मान मागे टाकली होती. बहुतेक तिला झोप लागली होती. नवीन देखील शांतपणे बाहेर रस्त्याकडे बघत होता. सगळेच शांत बसलेले बघून आनंदला अस्वस्थ वाटायला लागलं. नविनकडे बघत तो म्हणाला...

आनंद : गाणी लावू का रे? अजून आपण मेन रोडला लागलो नाही आहोत त्यामुळे रहदारी अजिबातच नाही. फारच शांत वाटतंय.

आनंदाचं बोलणं ऐकून नविनने फक्त एकदा त्याच्याकडे बघितलं आणि परत बाहेर बघायला लागला. आनंदच्या लक्षात आलं की नवीन फारच अपसेट आहे. म्हणून मग त्याने स्वतःच गाणी लावली. अजून झाडी संपली नसल्याने रेडियोतून देखील धड गाणी ऐकूच येत नव्हती. अधून मधून नुसती खरखर होत होती. पण तेवढ्यात समोर शेवटचं वळण आलं आणि आनंदने नेहेमीच्या सवयीने जोरदार स्पीडमध्ये सफाईदारपणे ते वळण घेतलं. पण त्याचा अंदाज पूर्ण चुकला होता. समोरून मोठी लॉरी येत होती. त्या लॉरीवर आनंदची गाडी जाऊन आदळली.... मोठ्ठा आवाज झाला आणि सगळं संपलं....

*****

रात्री उशिरा इंस्पेक्टर राठी आणि त्यांची टीम अपघात झालेल्या जागेवर पोहोचले. गाडी रस्त्याच्या बाजूला एका खड्ड्यात पडली होती. लॉरी मात्र कुठेच दिसत नव्हती. इंस्पेक्टर राठींचा वाँकीटॉकी वाजला आणि त्यांनी तो ऑन केला...

इंस्पेक्टर राठी : होय साहेब. बातमी खरी आहे. जबरदस्त अपघात आहे. गाडीची पूर्ण वाट लागली आहे. काय साहेब? काय? नाही....... नाही....... साहेब!!! इथेच गाडीसमोर उभा आहे मी. फक्त ड्रायव्हिंग सीटवर एक मुलगा आहे. बाकी कोणी नाही आत.!!!

समाप्त