Friday, July 31, 2020

खिडकी पलीकडचं जग (भाग 3) (शेवटचा)

खिडकी पलीकडचं जग

भाग 3 (शेवटचा)

खिडकी पलीकडचं जग

भाग 3

आता गौरीला थोड़ी भिती वाटायला लागली होती. काहीतरी वेगळ आहे दादाजींमध्ये. असा विचार करत गौरीने दादाजींच्या त्या घोळदार झग्याचे निरीक्षण केले आणि तिच्या लक्षात आलं की त्यांच्या पायाकडे हलकासा निळसर प्रकाश आहे. ते पाहून तिचा उर धपापायला लागला होता. तिची भिती खूप वाढली होती.

"गौरी... घाबरु नकोस. मी तुला काही करणार नाही. करूच शकत नाही. आपण दोन भिन्न जगातील एकक आहोत." दादाजिंना तिची अस्वस्थता जाणवली आणि ते थोड़े हसत म्हणाले.

"एकक म्हणजे काय दादाजी? आणि तुम्हाला अजुन काय काय दिसतं दादाजी? तुम्ही आज इथे या वेळी कसे आणि का आला आहात?" गौरीने धीर करून एका मागोमाग एक प्रश्न विचारले.

आपली गंभीर मुद्रा सोडून दादाजी आकाशाकडे बघत मोठ्ठयाने हसले. "हाssहाssहाss! गौरी किती प्रश्न? पण मी समजू शकतो. ठिक... एका एका प्रश्नाच उत्तर देतो. एकक! एकक म्हणजे... तुझ्या भाषेत व्यक्ति. प्रश्न दोन; मला काय काय दिसतं. मला पुढचा प्रवाह दिसतो. पण तो सांगण्याचा अधिकार मला नाही.... कोणालाच नाही गौरी! प्रवाह जगायचा असतो आणि अर्थात जे मला दिसतं ते सापेक्ष असतं. म्हणजे सर्वसाधारणपणे एकक आयुष्यात जे निर्णय घेऊ शकतात त्याचा विचार करून जो प्रवाह तयार होतो; तो मला दिसतो. पण जर एखाद्या एककाने निर्णय बदलला तर संपूर्ण प्रवाह बदलतो. प्रवाह म्हणजे काळ बरंका! आता तुझा शेवटचा प्रश्न... आज मी इथे या वेळी कसा आणि का आलो आहे! हम्... हे मात्र खूप महत्वाच आहे गौरी. नीट ऐक. तू आमच्या जगात येणार की नाही हा संपूर्ण तुझाच निर्णय आहे; हे मी अगोदरच मान्य केल होतं. पण माझा ओरस अजुन वहन-प्रवाहात नाही आला. तुला समजेल अशा भाषेत सांगायच तर; ओरस अजुन पूर्ण समजुतदार नाही झाला. जवाबदारीने आपले निर्णय घेण्यासारखा नाही झाला. मात्र तो त्या प्रवासाला निघायच्या उंबरठ्यावर असताना तू भेटलीस त्याला. त्याचा तुझ्यावर जीव जडला आहे. ख़ास मैत्रीण मानतो तो तुला.

आता तुझ्याशिवाय राहु नाही शकत तो. मला हे मान्य आहे की तू तुझ्या जगाप्रमाणे अजुन बरीच लहान आहेस.... पण मूली तू खूप हुशार आहेस. आमच्या जगातील भाषेत सांगायचं तर हे जग चालवण्याचं शिक्षण ज्या मोजक्या मुलांना दिलं ज़ातं, त्यातील सर्वात वरच्या फळीतली एक तू होऊ शकतेस. माझ्या ओरससारखी! तुझ गणितही बरोबर आहे. आमचं जग तुमच्या जगातील प्रवाहापेक्षा... काळापेक्षा... थोड़ पुढे पळतं.... तर त्यामुळे तुझ्या काळात जरी फ़क्त दोन आठवडे झाले असले तरी आमचा प्रवाह जास्त पुढे सरकला आहे. तू कदाचित् अजुन तुझा निर्णय घेतला नसशील. किंवा असा निर्णय घेतला असशील की आमच्या जगात नाही येणार; पण अजुन ओरसला सांगण्याची हिम्मत नसेल तुझ्यात. म्हणून तू तुझी खिड़की बंद करून बसतेस. पण त्याचा फार वाईट परिणाम ओरसवर झाला आहे. आमच्या जगात अस्वस्थता ही भावना माहीत नाही. त्यामुळे तू न दिसल्याने अस्वस्थ झालेला ओरस काही सांगता येत नसल्याने स्वस्थ बसून असतो. इतरांना काही कळत नसल्याने ते येता-जाता त्याला प्रश्न विचारतात. तो त्यांना त्याची अस्वस्थता सांगू शकत नाही आणि इथले कोणी त्याला समजू शकत नाहीत. केवळ मी त्याला समजू शकतो आणि म्हणून मी आज मुद्दाम तुला भेटायला आलो आहे." एवढं बोलून दादाजी क्षणभर थांबले आणि मग त्यांनी अचानक गौरीला विचारले," गौरी तू काय ठरवलं आहेस? तू इथे येणार आहेस की नाही?"

गौरी पार गोंधळून गेली होती. हे सगळं तिच्या समजुतीच्या बाहेर होतं. एकीकडे तिला तिच्या आई-बाबांना कायमच सोडून नव्हतं जायच आणि दादाजी कितीही म्हणाले की ती परत येऊ शकते तरीही तिला परत येता येईल याची खात्री वाटत नव्हती. दुसरीकडे ओरसची काळजी वाटत होती. कारण आतापर्यंत ती देखील त्याच्याशी भावनेने जोडली गेली होती. ओरस तिचा खूप खास मित्र झाला होता. शेवटी तिने दादाजींना विचारलं,"तुम्हीच सांगा दादाजी मी नक्की काय करू?"

दादाजी हसले. म्हणाले,"गौरी आमच्या जगात प्रत्येकजण स्वतः चा निर्णय स्वतःच घेतो. मी काय सांगू?"

गौरी शांत झाली. विचार करत बसून राहिली. दादाजिंना वाटलं तिला यायची इच्छा नाही. ते मागे वळले आणि चालू लागले. गौरीने दादाजींना जाताना बघितलं आणि हाक मारली,"दादाजी थांबा ना."

दादाजी थांबले आणि मागे वळले. गौरीने निर्णय घेतला. "मी येते दादाजी. आत्ता... लगेच. तुमची रात्र लवकर संपेल पण माझ्या इथली नाही. आत्ता कुठे अकरा वाजत आहेत इथे. म्हणजे मी ओरसला भेटून नक्की परत येऊ शकेन. हो न दादाजी?" गौरीने दादाजींकडे आशेने बघत म्हंटले.

दादाजी दोन मिनिट शांत उभे राहिले आणि मग तिच्या दिशेने हात उघडून म्हणाले,"गौरी ये!"

गौरी क्षणभर गोंधळली. कारण अधु पायांनी ती त्या जगात कशी उतरणार होती ते तिचं तिलाच माहीत नव्हतं. पण मग तिने हिम्मत केली. तिने स्वतःच संपूर्ण वजन हातावर तोलल आणि प्रयत्नपुर्वक स्वतःला खिड़कीच्या कट्यावर खेचलं. मग व्हील चेयरवर बसल्यावर ज्याप्रमाणे ती तिचे पाय हाताने खेचायची तसे तिने स्वतःला खेचले. ती आता खिड़कीत बाहेर पाय सोडून बसली होती. तिला खिडकी बाहेरून एक अनामिक खेच जाणवत होती. तिने दादाजींकड़े बघितलं. तिला घरातून बोलताना ते खूप नीट दिसत होते. पण आता मात्र ते धुरकट वाटत होते. नक्की कुठे आणि कसे उभे आहेत ते तिला समजत नव्हतं. त्यांना बघायला ती थोड़ी अजुन पुढे सरकली आणि तिचा तोल गेला. तिच्या लक्षात आलं की तिचा तिच्या जगाशी संपर्क तुटला आहे. तिला वाटलं ती खोल .गर्तेत पड़ते आहे. तिने हात हवेत फ़ेकले आधारासाठी. ती खूप घाबरली. मागे वळून परत खिड़कीचा आधार शोधायला लागली. तिला परत जायचं होतं... आईच्या कुशीत शिरायचं होतं... तिची छाती पार दडपून गेली होती...... या अनामिक भितिशी ती एकटी तोंड देऊ शकत नव्हती. खूप घाबरली होती गौरी... मागे मिट्ट अंधार होता आणि पुढे फ़क्त आणि फ़क्त धूसर अनोळखी प्रकाश! असा किती वेळ गेला कोण जाणे. तिने डोळे घट्ट मिटून घेतले होते आणि ती मनातल्या मनात दादाजिंना हाका मारत होती.

.........................आणि अचानक तिला जाणवलं की तिला कोणीतरी दोन्ही हातात तोललं आहे. तिने हळूच डोळे उघडले. ती दादाजींच्या कुशीत होती. त्यांनी तिला लहान बाळाला दोन्ही हातात उचलावं तसं उचलून घेतल होतं आणि ते शांतपणे चालत होते.

"दादाजी?" तिने प्रश्नार्थक हाक मारली त्यांना. ते हसले.

"अग, किती घाबरलीस? तू ओरससाठी येते आहेस की मी तुझ्यासाठी त्याला आणायला हवं असं वाटायला लागलं मला." दादाजी म्हणाले.

गौरी हसली. "बरं गौरी आता तुझी तू चालतेस का? मी असं तुला उचलून नेलं तर ओरस गोंधळून जाईल." दादाजी म्हणाले.

गौरीचा चेहेरा एकदम उतरला. "दादाजी तुम्हाला ओरसने सांगितलं नाही का? माझा एक अपघात झाला होता अलीकडे. त्यामुळे माझे पाय अधु आहेत." गौरी म्हणाली.

"ओह हो का? नाही बोलला तो मला. अपघात अलीकडे झाला होता म्हणजे तुला त्या अगोदर चालता येत होत नं?" दादाजींनी विचारलं.

गौरी हसत म्हणाली,"हा काय प्रश्न झाला दादाजी? मी जन्मने अधु नव्हते. अहो, शाळेत सगळ्या स्पोर्ट्समधे भाग घ्यायचे मी. अगदी पहिली नाही आले, पण एक चांगली स्पोर्ट्स गर्ल होते मी."

"बरं. मग चल तुला जमेल. मी हात धरतो तुझा." असं म्हणून दादाजींनी गौरीला काही कळायच्या आत एकदम त्यांच्या बाजूला उभं केलं. ती खूप गोंधळली... आपण आता तोल जाऊन पडू असं तिला वाटलं. तिने आधारासाठी दादाजींच्या दिशेने हात फेकले. पण मग तिच्या लक्षात आल की ती पूर्वी.... म्हणजे अपघाताच्या अगोदर जशी सहज उभी राहायची तशीच आत्ता देखील तिच्या दोन्ही पायांवर उभी होती..... दादाजींच्या आधाराशिवाय! तिचा विश्वासच बसत नव्हता. तिने आवंढा गिळला आणि दादाजिंकडे बघितलं. ते गालातल्या गालात हसत होते.

"चल गौरी. ओरस वाट बघत असेल. मी त्याला म्हंटल होतं की मी तुला आणायचा प्रयत्न करिन. आणि तुला ही वेळेत परत जायचं असेल न."

गौरीने एकदा दादाजिंकडे बघीतलं. आणि विश्वासाने पाऊल उचललं. गौरी पूर्वीसारखी चालु लागली. आता तिला आश्चर्य वाटलं नाही. तिने दादाजींकडे बघितलं आणि तिच्या लक्षात आलं की खिडकीतून दादाजी जितके उंच वाटत होते ते त्याहूनही उंच आहेत. तिने दादाजींचा हात धरला आणि म्हणाली,"दादाजी, मला सांगाल हे सगळ नक्की काय आहे? ओरस आणि इथली इतर जी माणसं दिसतात ती आमच्या जगातल्या माणसांसारखीच आहेत. भाषा देखील एकच आहे. पण तरीही खूप काही वेगळं आहे. मुख्य म्हणजे तुम्ही आमचे असे वाटता आणि तरीही काहीतरी वेगळं आहे तुमच्यात."

"खरंय गौरी... आमच्या जगात आणि तुमच्या जगात फारसा फरक नाही. फ़क्त प्रवाह थोड़ा वेगळा आहे." असं म्हणून मग क्षणभर थांबले आणि परत बोलायला लागले. "प्रवाह म्हणजे काळ. दूसरा थोड़ा फरक म्हणजे आम्ही तुमच्या जगापेक्षा खूप जास्त प्रगत आहोत. तुमच्याकडे अनेक देश आहेत आणि त्यांना चालवणारी वेगळी सरकारं आहेत. आमचं जग एकत्र बांधलेलं... एकच आहे. आम्ही बुद्धीच्या, हुशारीच्या आणि स्थिर मनाच्या निकशावर आमच्या जगातली मुलं निवडतो आणि त्यांना योग्य ते किंवा असं म्हणू आवश्यक ते शिक्षण देतो. एकदा आमची खात्री झाली की ही मुलं तयार झाली आहेत की मग आम्ही हे आमचं प्रगत जग त्यांच्या हातात सुपुर्द करतो. आमच्या जगात उत्तम बुद्धि असलेली मूलं लहानपणीच शोधून वेगळी केली जातात. त्यांना आम्ही वेगवेगळ्या प्रकारे त्यांच्याही नकळत शिकवत असतो. आम्ही अनेको वर्षे प्रयत्न करून विविध शोध लावले आहेत. त्यामुळे या जगात आजार, दु:ख, वेदना नाहीत. तसे कोणी भांडत देखील नाहीत. पण तरीही इथे आयुष्याला एक जिवंतपणा आहे. या जगातलं आयुष्य देखील तुमच्या सारखं सर्वसाधारण आहे. लोक रोज नोकरीला जातात. संसार करतात. जी मुलं वेगळी केली जातात त्यांचं आयुष्य सुरवातीला जरी इतरांसारखं असलं तरी मग ते वेगळं होतं. ओरस असाच वेगळा निवड झालेला मुलगा आहे. पण अजुन त्याला वहन प्रवाहात सामिल केलेलं नाही. म्हणून तर मी त्याची काळजी घ्यायला त्याच्या बरोबर असतो. माझ्यासारखे अजून काही दादाजी इथे कार्यरत आहेत. आम्ही काही एकक मात्र अनेको प्रवाह अजुन आहोत. तुला समजेल असं सांगायचं तर मला मृत्यू नाही... माझ वय वाढत नाही... मी गेले अनेक प्रवाह असाच आहे. ओरस सारखी अनेक मुलं मी तयार केली आहे. तेच माझ काम आहे. माझ्यासारखे जे दादाजी आहेत ते सर्व मिळून पुढची पिढी तयार करण्याचं काम करतात."

गौरी दादाजींचा हात धरून चालत होती. तिला दादाजी जे सांगतात ते सगळं समजत होतं. पण तरीही स्वीकारणं थोडं अवघड वाटत होतं. ती दादाजींचं बोलणं ऐकून विचारात पडली होती. त्यामुळे ती किती चालली किंवा कुठे आली ते तिला कळलं देखील नाही. अचानक दादाजी थांबले आणि म्हणले, "गौरी आपण पोहोचलो."

गौरी विचारातून जागी झाली आणि समोर बघायला लागली. समोर एक अति प्रचंड इमारत उभी होती. इमारत म्हणाण्यापेक्षा एक चिरेबंदी आकाशाला भिडलेला किल्ला होता तो. काळ्याभोर दगडांचा, कौलारु आणि तरीही उंच. मोठ-मोठ्या खिडक्या आणि दरवाजे होते त्या किल्ल्याला. खिड़क्या-दरवाजांवर कोरीव काम केलेल्या महिरपी होत्या. रात्र असूनही त्याच्याभोवती एकप्रकारचा उजेड प्रसवत होता. त्यामुळे तो किल्ला गुलाबी-निळ्या उजेडात प्रकाशमान झाला होता. एका वेगळ्याच दिमाखात उभा होता तो आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर. तिला एकदम हॅरी पॉटरच्या हॉगवॉर्डसची आठवण झाली आणि ती खुदकन हसली.

दादाजींनी गौरीचा हात सोडला आणि समोरच्या दरवाजाशेजारी असणारा जाड दोर ओढला. आत खोल कुठेतरी घंटानाद झाला. आतून दरवाजाजवळ कोणीतरी आल्याचा आवाज झाला आणि त्या प्रचंड मोठ्या वाड्याचा तसाच मोठ्ठा दरवाजा हळूहळू उघडला गेला. आत अजुन एक दादाजी उभे होते. गौरी चमकली आणि दोघांमधलं साम्य बघुन चक्रावून गेली. तिच्या शेजारचे ओरसचे दादाजी हसले. "माझा प्रवाह स्नेही" त्यांनी ओळख करून दिली. गौरी त्या दुसऱ्या दादाजिंकडे बघुन हसली आणि तिने नमस्कार केला. "तूच का ग...व......री?" त्या दादाजींनी विचारलं. "हो! पण ग...व....री... नाही गौरी." तिने हसत उत्तर दिलं. तेही मजेत हसले. "चल ओरस तुझी वाट बघतो आहे" असं म्हणून ते चालु लागले.

लांबच लांब बोळ होता तो. दुतर्फा दरवाजे असलेला. काळयाभोर सागवानी लाकडाचे मजबूत दरवाजे होते ते. त्या बोळात देखील मंद गुलाबी-नीळा उजेड होता. मात्र ते तिघे जसजसे पुढे जात होते तसे बोळाच्या दुतर्फा असलेले दिवे जास्त प्रज्वलित होत होते आणि ते पुढे सरकले की मंद होत होते. ते बघुन गौरीला गम्मत वाटली. तिने दादाजिंकडे बघितलं. ते मात्र शांतपणे पुढे सरकत होते. तिचं लक्ष पुढुन चालणाऱ्या दादाजिंकडे गेलं. त्यांची पाठच फ़क्त दिसत होती. तिची नजर सरकत सरकत खाली गेली आणि ती दचकली. त्यांच्या झग्याच्या खालूनही निळसर प्रकाश येत होता मात्र त्यांचे पायच दिसत नव्हते. ते पायाला चाकं लावल्यासारखे सरकत होते. ते पाहून ती दचकली आणि तिचं लक्ष स्वाभाविकपणे ओरस च्या दादाजिंकडे गेलं. तिच्या लक्षात आलं की ते पण निळ्या उजेडात फ़क्त सरकत होते. तिला आठवलं की तिने तिच्या खिड़कीतून जेव्हा दादाजिंना बघितलं होतं तेव्हासुद्धा तिला तो उजेड दिसला होता. तिला दादाजींनी त्यांच्या हातातून खाली उतरवून उभं केलं; त्यावेळी ती उभी राहू शकते आणि चालू शकते या आनंदात तिने दादाजींच्या चालण्याकडे लक्षच दिलं नव्हतं हे आता तिच्या लक्षात आलं. याचा अर्थ दादाजी तिच्या सारखे किंवा ओरस सारखे चालत नव्हते... त्यांना पायाच नव्हते. फक्त होता तो निळा प्रकाश. तिला हे लक्षात आलं आणि दादाजिंबद्दल मनात एक आदरयुक्त भिती निर्माण झाली.

ती दादाजिंकडे वळली आणि तिने विचारलं,"दादाजी तुमचे पाय असे कसे?"

"गौरी मी तुला म्हंटल ना आम्ही अनेक प्रवाह बघितलेले जे आहोत ते थोड़े वेगळे आहोत. किंवा असं म्हणू की आम्ही मुद्दाम आमच्यात थोड़े बदल करुन घेतले आहेत. येणाऱ्या प्रत्येक पिढीला पूर्ण तयार करायची जवाबदारी आमची आहे. त्यासाठी आम्ही असणं आवश्यक आहे. म्हणून हे बदल आवश्यक होते." दादाजींनी तिच्याकडे न बघताच पुढे सरकत तिला उत्तर दिलं.

त्यांच्या उत्तराने तिच समाधान झालं. मग मात्र तिने काही विचारलं नाही. थोड़ चालून पुढे गेल्यावर ते तिघे थांबले. समोर एक बोळ दिसत होता; गौरी आणि ओरसचे दादाजी त्या बोळात शिरले आणि दादाजिंनी समोरच्या दरवाजाची कड़ी वाजवली. दार उघडले गेलं आणि दारात ओरस उभा होता. खिड़कीतून दिसायचा त्यामानाने जास्तच उंच होता तो. दिसायला मोहक होता. मजबूत बांधा आणि नुकतीच फुटलेली मिसरूड; यामुळे त्याचं मुळातलं राजबिंड रूप अजूनच खुलून दिसत होतं. 'तो खिडकीतून दिसत होता त्याहून जास्त समंजस आणि मोठा वाटतो आहे,' गौरीच्या मनात विचार चमकून गेला. मात्र आत्ता तो बराच वाळला होता. किंबहुना आजारीच वाटत होता. नुकतीच फुटायला लागलेली दाढ़ी-मिशी आणि डोक्यावरचे केस सगळच् अस्ताव्यस्त होतं. गौरीला बघुन त्याचे खोल गेलेले डोळे मोठ्ठे झाले.

"तू???" त्याचा आवाज खोल गेला होता पण आवाजात प्रचंड आनंद होता. तिला बघुन तो खुश झाला. तिचे दोन्ही हात धरून त्याने तिला खोलीत नेलं आणि समोरच्या पलंगावर बसवल. "ग...व...रि...मला माहीत होत तू येशिल. नक्की येशिल." गौरी हसली. तो ही तिच्याकडे बघून हसला. त्याचे डोळे आनंदाने चमकत होते. त्याने गौरीचे दोन्ही हात आपल्या हातात घट्ट धरून ठेवले होते. जणूकाही त्याने हात सोडले तर ती त्याला न सांगता पळून जाईल. आणि अचानक म्हणाला,"अग पण तू म्हणाली होतीस की तू चालत नाहीस. पण मग तू इथे कशी आलीस? आणि तू तर चालते आहेस." काय उत्तर द्यावं ते न सुचुन गौरी परत फ़क्त हसली आणि म्हणाली,"चालता येतं मला इथे. बर ते जाऊ दे. तुला काय झालं आहे नक्की? तू असा का दिसतो आहेस? तब्बेत ठिक नाही का?" क्षणभर शांत राहून मग ओरस म्हणाला,"तुझी वाट बघत होतो ग. अग आता काही दिवसात मी पुढचं शिक्षण घेण्यासाठी जाणार आहे. मग मला तुझ्या खिड़कीपर्यंत नाही येता येणार. तू अचानक त्या खिडकीत यायची बंद झालीस. मला कळेना तुला हाक तरी कशी मारू? तुझी खिडकी बंद असताना माझा आवाज तुझ्यापर्यंत पोहोचणार नाही याची मला कल्पना होती. मुख्य म्हणजे एकदा मी इथून गेलो की मग मी परत कधी येणार याची मला कल्पना नव्हती. जाण्याअगोदर मला एकदा तरी तुला भेटायचं होतंच. पण ते कसं जमेल याचाच मी विचार करत होतो. त्यामुळे थोड खाण्याकडे दुर्लक्ष झालं आणि म्हणून मी असा दिसतो आहे इतकंच! मी दादाजींशी पण बोललो होतो तुला भेटण्याबद्दल. ते तर म्हणाले तुझी इच्छा असेल तर तू पण माझ्याच बरोबर येऊ शकशील; जिथे मी जाणार आहे तिथेच.... आमच्या प्रवाहात. त्याचं बोलणं एकून तर मी खूपच खुश झालो होतो ग...व....री. ते म्हणतात की तू तशीच एक एकक आहेस; माझ्यासारखि! त्यामुळे तू देखील माझ्याप्रमाणे शिक्षण घेऊन इथेच राहू शकतेस. ग...व...री.... येतेस इथे? कायमची?"

ओरसचं बोलणं ऐकून गौरी एकदम गोंधळली. तिने प्रश्नार्थक नजरेने दादाजिंकडे बघितलं. दादाजी हसले. ओरसकड़े वळून ते म्हणाले,"ओरस गौरीला निघालं पाहिजे. तिने अजुन काही निर्णय घेतलेला नाही. तोपर्यंत तरी तिला तिच्या खिडकीतून परत जायला हव न." आणि दोघांनाही काही जास्त बोलायची संधी न देता त्यांनी गौरीला हाताला धरून उठवलं आणि ते दाराच्या दिशेने चालु लागले.

गौरीला देखिल जाणिव झाली की तिला देखील आत्ता तरी नक्कीच निघायला हवं. जर चुकून आई किंवा बाबा खोलीत आले आणि ती खोलीत दिसली नाही तर घाबरतील. त्यामुळे ती देखील दादाजींबरोबर निघाली. मात्र तिने मनातच ठरवलं की परतीच्या प्रवासात दादाजींकडून सगळाच खुलासा करून घ्यायचा.

दाराबाहेर पड़ताना तिने ओरसकड़े वळून बघितलं आणि हसत म्हणाली,"निघते ह आत्ता ओरस. पण आपण नक्की परत भेटणार आहोत. स्वतःची काळजी घे. अच्छा!" ओरस जणूकाही ती मागे वळून बघण्याचीच वाट बघत होता. तो तिच्या जवळ आला आणि अच्छा म्हणतांना तिचा हात हातात धरायच्या निमित्ताने त्याने दादाजींच्या नकळत तिच्या हातावर काहीतरी ठेवलं. तिनेही दादाजींच्या नकळत ते जे काही होत ते पटकन खिशात टाकलं आणि ओरसच्या खोलीचं दार ओढुन घेतलं.

दादाजी आणि गौरी परतीच्या वाटेला लागले. गौरी सुरवात कशी करायची याच विचारात होती; पण तिने काही विचारायच्या अगोदरच दादाजी बोलायला लागले.

"गौरी मला माहीत आहे तूझ्या मनात अनेक प्रश्न आहेत. मी तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देईन. प्रत्येक शंकेच निरसन करेन. पण अगोदर मी जे सांगतो ते नीट ऐक. कदाचित् मग तुला प्रश्नच पडणार नाहीत."

गौरीने डोळे मोठ्ठे केले. पण काहीच बोलली नाही. दादाजी खोट बोलणार नाहीत किंवा तिला चुकीच काही सांगणार नाहीत याची आतापावेतो तिला खात्री झाली होती. ती दादाजींच बोलण मन लावून ऐकायला लागली.

"गौरी ओरस जे म्हणाला ते खरं आहे. तू इथे आमच्या जगात जर आलीस तर तू त्याच्या बरोबरीने एक वेगळ्या प्रकारचं शिक्षण घेऊ शकाशील. मी तुला थोड्या वेळापूर्वी सांगितल्या प्रमाणे आम्ही हे जग चालवण्यासाठीचं शिक्षण काही ठराविक मुलांना देतो. त्या समूहाचा एक भाग तू देखिल असशील. मी नंतर तुझ्याशी हे बोलणारच होतो; परंतु ओरसने उल्लेख केला आहेच तर मग आत्ताच बोलणं योग्य असं मला वाटतं.

ऐक.... मी तुला जे म्हंटलं की काही प्रवाहांपूर्वी त्या जगातुन या जगात काही आले होते. मी त्यांच्यातीलच एक आहे गौरी. म्हणूनच मी तुझी भाषा इतक्या चांगल्या प्रकारे बोलू शकतो. ओरस किंवा ते दुसरे दादाजी तुझ नाव ग..व..री... अस घेतात पण तुझ्या लक्षात आलं असेल की मी तुझ्या नावाचा योग्य उच्चार करू शकतो. मीच आपली भाषा इथल्या जगात जागृत केली आणि शिकवली. त्यागोदर इथे मनाच्या जोडणीतून एकमेकांशी संवाद होत असे. परंतु ही जोडणी एकाच वेळी जर दोघांशी झाली तर त्यातून अनेकदा गोंधळ निर्माण होत असे. त्यामुळे मग मी इथे ही बोली भाषा शिकवली. आता जर गरज पडली तरच मनाची जोडणी करून संवाद साधला जातो. बाकी आपल्याप्रमाणे बोली भाषाच वापरली जाते इथे देखील." अस म्हणून दादाजिंनी तिच्याकडे बघुन एक मंद हास्य केलं. हे ऐकून मात्र गौरीच्या आश्चर्याला पारावार राहिला नाही.

"पण मग......" गौरीने बोलायचा प्रयत्न केला. दादाजींनी हात वर करून तिला थांबवलं. "माझ पूर्ण बोलणं ऐकून घे गौरी मग तुझे प्रश्न विचार. कारण आपल्याकडे तसा वेळ कमी आहे. तुला तुझ्या जगात तिकडच्या पहाटेच्या अगोदर पोहोचणं आवश्यक आहे; हे विसरु नकोस."

गौरीला दादाजींचे म्हणणं पटलं. ती त्यांचं बोलणं ऐकु लागली.

"तर.... मी तुमच्याच जगातला एक वैज्ञानिक होतो. आम्ही दोन मित्र मिळून आपल्या जगा व्यतिरिक्त जग असतं का या शोधावर काम करत होतो आणि खूप मेहेनतीने आम्हाला या जगाचा शोध लागला. हे जग त्यावेळी देखील जास्त प्रगत होत. आम्ही त्यावेळी इथे अनेकदा येऊन गेलो. त्यावेळच्या इथल्या प्रगती टप्प्यावर विविध देश एकत्र करून एकसंघत्व करण्याची प्रक्रिया सुरु झाली होती. लढाया, वाद, एकमेकांचा नाश हे सर्व त्यांनी संपवून टाकायला सुरवात केली होती. आमच्या नशिबाने आमची ओळख इथल्या सरवोच्च पदस्थांशी झाली. आमची बुद्धि आणि योग्यता बघुन त्यांनी आम्हाला या जगात येण्यासाठी विचारलं. कारण त्यांनादेखील त्यावेळी अशा लोकांची खूप गरज होती. त्यांना हे जग शांतता प्रिय आणि भय रहित जगण्यायोग्य करायचं होतं. आम्हाला दोघांनाही या सर्वच गोष्टींबद्दल उत्सुकता होती आणि अभ्यास करण्याची इच्छा होती. त्या जगात आमची भावनिक गुंतवणूक अशी नव्हती. त्यामुळे आम्ही दोघेही इथे आलो. ही झाली माझी इथे येण्याची कहाणी.

आता तुझ्या मनात येणाऱ्या प्रश्नांची उत्तरं. त्या जगातील काळापेक्षा इथला काळ दीड पटीने पुढे आहे. त्यामुळे मी इथे जन्मणाऱ्या लोकांपेक्षा जास्त काळ जगलो. त्यामुळे जास्त शोधांमद्धे भाग घेऊ शकलो. मग मी प्रयत्न पूर्वक हळूहळू आयुष्य मर्यादा वाढवली. म्हणून मी इथले अनेक प्रवाह..... त्या जगातला काळ..... बघितला आहे. हे झालं माझ्या या जगातल्या आयुष्याबद्दल.

तुझ्या मनात हा प्रश्न नक्की असेल की ओरस असं का म्हणाला की तूसुद्धा इथे येऊ शकतेस. गौरी नीट ऐक. मी शोध करत होतो; अभ्यास करत होतो. मला आणि माझ्याबरोबर काम करणाऱ्या माझ्या मित्राला दोघांना मिळून हे जग प्रयत्न करून सापडलं. त्यानंतर या जगाशी संपर्क प्रस्थापित करण्यासाठी आम्हाला खूप मेहेनत घ्यावी लागली. पण तुला खूप लहान वयात अगदी सहज हे जग दिसलं आहे. त्याहुनही महत्वाचं म्हणजे संपर्क तू नाही केलास; तर इथून तुझ्याशी झाला. म्हणूनच जेव्हा ओरसने मला तुझ्याबद्दल सांगितलं तेव्हा मला आश्चर्य तर वाटलंच पण त्याहुनही जास्त कुतूहल वाटलं. मी तुझा अभ्यास केला आणि माझ्या लक्षात आलं की तुझ्यात एक वेगळेपण आहे; म्हणूनच तू हे जग बघू शकते आहेस आणि तुला इथे संपर्क साधणं सहज शक्य होतं आहे. गौरी ओरस म्हणाला ते खरं आहे. तू वेगळी आहेस आणि तू या जगात आलीस तर त्याचा फायदा जसा तुला होईल तसाच या जगाला देखील होईल. तू जर इथे आलीस तर तुझ्या आयुष्याला एक खूप वेगळं वळण लागेल यात शंकाच नाही. परंतु हे देखिल तेवढंच खरं की मी इथे येण्याचा निर्णय घेतला तेव्हा मी बराच मोठा होतो आणि माझी कुठलीही भावनिक गुंतवणूक त्या जगात उरली नव्हती. शिवाय मुळात मला असा काही शोध लागावा अशी इच्छा होती; माझ्या प्रयत्नांना फळ आलं आणि फ़क्त शोध लागला असं नाही तर या वेगळ्या जगात येण्याची संधी मिळाली आणि ती मी घेतली.

मला माहित आहे की तुझ्या वयाची त्या जगातली मूलं अजुन स्वतंत्र विचार करुन निर्णय घेतातच असं नाही. त्यात तू त्या जगात असताना तुझ्या आई-वडिलांवर पूर्णपणे अवलंबून आहेस. त्यामुळे तू नीट विचार कर. हवं तर तुझ्या आई-वडिलांशी बोल. फ़क्त एकच विनंती अशी; खूप उशीर करू नकोस निर्णय घेताना. त्या जगाच्या कालमानाप्रमाणे तू ओरसशी बहुतेक फ़क्त दोन आठवडे बोलली नाहीस. पण इथे प्रवाह जवळ-जवळ चार आठवाड़े पुढे गेला आहे. हे लक्षात असू दे. दुसरी महत्वाची गोष्ट; जर तू इथे न येण्याचा निर्णय घेतलास तर माझी तुला विनंती आहे की या जगाबद्दल कधीच कुठेही वाच्यता करू नकोस. याबद्दलची माहिती फक्त तुझ्याचकडे ठेव. अजून ते जग इतकं प्रगत नाही की या जगाचा ते स्वीकार करू शकतील. त्यामुळे कदाचित् दोन्ही जगांचा ऱ्हास होईल. एवढं करशील ना गौरी?" शेवटचा प्रश्न विचारून दादाजींनी गौरीकडे बघितलं. गौरीने देखील त्यांच्याकडे बघितलं आणि एक मंद स्मित केलं. ती दादाजींना म्हणाली,"दादाजी, मी काय निर्णय घेईन ते मला देखील माहित नाही. पण मी तुम्हाला वचन देते की जर मी न येण्याचा निर्णय घेतला तर ही खिडकी मी कायमसाठी बंद करून इथून निघून जाईन आणि कधीच कोणालाही याबद्दल माहिती देणार नाही. मला तुमचं म्हणणं पटलं आहे."

बोलता बोलता दोघेही गौरीच्या घराच्या खिड़कीजवळ पोहोचले. दादाजींनी गौरीच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हाणाले,"गौरी आता ओरस इथे येऊ शकणार नाही. त्याची पुढील शिक्षणाला जाण्याअगोदारची तयारी सुरु होईल. पण तू जो काही निर्णय घेशील तो मला सांग. मला हाक मार; मी लगेच तुझ्याशी संपर्क साधेन. अच्छा. तुमच्याकड़ची पाहाट व्हायला लागली आहे. चल, तुला परत जायला हवं."

दादाजींनी गौरीला उचलून घेतलं आणि एखादं फूल सहज ठेवावं तसं तिला खिड़कीच्या कडेवर बसवून ते मागे सरकले. गौरीला मात्र त्या जगात जाताना जशी एक खेच जाणवली होती; तशीच काहीशी जाणीव झाली; पण आता तिला तिच्या खिडकीकडे ढकलल्यासारखं वाटलं. तिने खिड़कीच्या कठड्यावर बसून दादाजींच्या दिशेने पाहिलं. ते खूप लांब उभे आहेत अस वाटत होतं. ती घरात जाण्यासाठी वळली आणि तिच्या लक्षात आलं की परत तिचे पाय निकामी झाले आहेत. तिला मोठा धक्का बसला. एव्हाना ती हे विसरून गेली होती की ती अधू झाली आहे. खूप मजेत ती दादाजिंबरोबर चालत होती. त्यामुळे क्षणात झालेला हा बदल स्वीकारणं तिला खूप अवघड वाटलं. पण मग स्वतःला सावरून ती घरात तिच्या पलंगावर उतरून बसली. तिने वळून खिड़कीतून बाहेर बघितलं. दादाजी तिथेच उभे होते. त्यांनी हात हलवून तिचा निरोप घेतला आणि मागे वळले. गौरी पलंगावर आडवी पडली. ती मनाने आणि शरीराने खूप थकुन गेली होती. त्यामुळे तिला लगेच झोप लागली.

सकाळी गौरी खूप उशिरा उठली. बाबा कामावर जायला निघतच होते. आईदेखिल स्वयंपाकाला लागली होती. गौरी विचार करत होती, काल जे काही तिने अनुभवलं होतं ते खरंच होतं की स्वप्न! विचार करता करता तिचा हात सहज तिच्या खिशाकडे गेला आणि तिच्या हाताला काहीतरी कड़क दगडा सारखं लागलं. तिने तो गोळा बाहेर काढला. काळाभोर आणि तरीही स्वतःचा असा एक निळसर रंगाचा प्रकाश असलेला चमकणारा दगड होता तो. तो दिसता क्षणी तिला आठवलं की ओरसने ती निघत असताना जे काहीतरी तिच्या हातात ठेवलं होतं ते म्हणजे हाच दगड. मग मात्र रात्रीच्या सर्व घटना खऱ्या होत्या याची तिला खात्री पटली.

'काय करावं? ते जग खरंच आहे. दादाजी स्वतः म्हणाले की ते आपल्याच जगतले आहेत. अर्थात आपल्या जगात ते कोणत्या काळात होते ते मात्र आपल्याला माहित नाही. आता ते तिथलेच झाले आहेत; कदाचित् गेली अगणित वर्ष.' विचार करत असताना गौरीच्या लक्षात आलं,'तिथे मी चालु शकते, अजुन खूप शिकु शकते.... पण तिथे आई-बाबा नसतील माझे. ते आयुष्य कसं असेल ते सांगता येणं अशक्य आहे. इथे माझे आई-बाबा कायम असणार आहेत माझ्याबरोबर. पण इथे या जगात मी आयुष्यभर अधुच रहाणाऱ आहे. मी रोज व्यायाम करतेच की. ते आईचं समाधान म्हणून. त्याचा फारसा उपयोग आजवर झालेला नाही. याची मला कल्पना आहे.' गौरी विचार करत बसली होती.

"अग बेटा उठलीस? रात्रि झोप नव्हती का लागली? आणि अशी इतकी दमलेली का दिसते आहेस? बरं नाही का वाटत तुला?" आई तिच्या जवळ बसत तिला विचारत होती. ऑफिसला निघालेले बाबा देखिल तिच्या डोक्यावरून हात फिरवत तिथेच बसले.

"मी एकदम ठिक आहे आई-बाबा. इतकी ठिक तर मी गेल्या कित्येक महिन्यात नव्हते." गौरी हसत म्हणाली.

तिला हसताना पाहुन त्या दोघांना बरं वाटलं.

"आई जर मला चालता यायला लागलं तर तुला काय वाटेल ग?" अचानक गौरीने तिच्या आईला विचारलं.

आईच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. "म्हणजे? हा काय प्रश्न झाला राणी? जगातली सर्वात आनंदी व्यक्ति असेन मी. आणि मीच का तुझे बाबा देखील. अग, देवाने जर मला म्हंटलं की तू चल माझ्याबरोबर तुझे पाय देतो मी गौरीला; तर मी हसत जाईन त्याच्याबरोबर त्याच क्षणी."आईने उत्तर दिलं.

"काय ग आई काहीतरीच बोलतेस ह. बरं आणि जर तुम्हाला कोणी सांगितलं की तुमच्या गौरीला चालता येईल इतकंच नाही तर पुढे खूप शिकता येईल. फ़क्त त्यासाठी तुम्हाला तिला कायमचं दूर पाठवावं लागेल; तर मग तूम्ही काय कराल बाबा?" गौरीने बाबांना विचारलं.

"बेटा, आज तू असे प्रश्न का विचारते आहेस ते मला खरच कळत नाही. पण विषय निघालाच आहे तर सांगतो. आपण जरी इथे नाशिकला आलो असलो तरी मी मुंबईच्या डॉक्टर्सच्या संपर्कात सतत आहे. त्यांचं म्हणणं आहे की एक ऑपरेशन आहे; ते केलं तर कदाचित् तू चालु शकाशील. पण त्याचा ख़र्च खूप जास्त आहे. परदेशात न्याव लागेल तुला. मी पैसे जमवायला सुरुवात केली आहे. खरं तर मुंबईहून इथे आलो त्याचवेळी मी आपलं मुंबईचं घर विकून टाकलं होतं आणि ते सगळे पैसे तुझ्या नावाने गुंतवून ठेवले होते. तुझे पाय कदाचित ठीक होतील असं मला डॉक्टर बर्वेनी त्यावेळी म्हंटल होतं. ज्यांनी तुझी सगळी ट्रीटमेंट केली होती; त्यांना तेव्हाच थोड़ी आशा आहे असं वाटलं होतं.पण सगळं ठरलं तर मात्र त्यावेळी तुला एकटिलाच जावं लागणार आहे. आम्ही नसु तुझ्याबरोबर. कारण तुझ्या बरोबर येणाऱ्या व्यक्तीचा देखील खर्च असेलच न. तेवढी सोय नाही करता येणार मला. गौरी एक सांगू? बेटा आम्ही काही तुला आयुष्यभर नाही पुरणार आहोत. कधी ना कधी तुला स्वतःची काळजी घ्यावीच लागणार आहे. त्यावेळी तुला कोणाची मदत घ्यावी लागू नये किंवा तू कोणावर अवलंबून राहू नयेस म्हणून तर हे सगळे प्रयत्न करतो आहे मी. जर तुझ्या आयुष्याचं भल होत असेल न बेटा तर आम्ही तुला कधीच अडवणार नाही." बाबा बोलत होते.

बाबा खूप मनापासून बोलत होते. त्याक्षणी गौरीला वाटलं आपणही सर्वकाही सांगून टाकावं. पण तिने मनाला आवरलं. कितीही झाल तरी दुसऱ्या जगाचं असणारं अस्तित्व, तिचे तिथले अनुभव यावर कोणाचाही विश्वास बसला नसता; आणि जरी तिच्या आई-बाबांनी तिच्यावर विश्वास ठेवलाच असता तरी तिने दादाजींना शब्द दिला होता की ती त्या जगाबद्दल इथे कोणालाही काहीही सांगणार नाही. म्हणून मग तिने विषय बदलला. थोडावेळ तिच्या सोबत बसून बाबा कामाला गेले आणि आई देखील तिच्या रोजच्या कामाला लागली.

काही केल्या गौरीच्या मनातले विचार मात्र जात नव्हते. एकीकडे एक उत्तम सुदृढ़ सक्षम आयुष्य त्या जगात तिची वाट बघत होतं आणि दुसरीकडे या जगात आई-बाबांची भावनिक गुंतवणूक होती. काय करावं काही केल्या तिला सुचत नव्हतं.

गौरी सतत विचार करत होती. ती दिवसभर अस्वस्थ आहे हे आईच्या लक्षात आलं. मग त्या दिवशी ती शेजारच्या काकुंकडे नाही गेली. मुद्दाम गौरीला घेऊन त्यांच्या पुढील दाराजवळच्या गॅलरीमध्ये बसली. दोघीजणी गप्पा मारत होत्या. समोरच्या झाडावर एक माकडीण तिच्या पिल्लाबरोबर बसली होती. ती पिल्लाचं लक्ष नसताना अचानक कुठेतरी गेली. आई जवळ नाही हे पाहुन ते पिल्लू कावरं-बावरं झालं. ते बघुन गौरीला वाईट वाटलं. ती आईला म्हणाली,"बघ ग आई, बिचाऱ्या पिल्लाला एकट सोडून ती माकड़ीण निघुन गेली." ते ऐकून गौरीची आई हसली. म्हणाली,"बेटा कोणी कोणाला आयुष्यभर पुरत नसतं. ज्याने-त्याने आपापला मार्ग शोधायचा असतो. चिंता करु नकोस. थोडावेळ ते पिल्लू गोंधळेल; पण मग आपला मार्ग बरोबर शोधेलच. हा निसर्ग नियमच आहे गौरी."

"आई, म्हणजे हा नियम सर्वांनाच लागू होत असेल का?" गौरीने आईकडे बघत विचारलं.

तिच्या मनात काय चालु आहे याची अजिबात कल्पना नसलेल्या आईने सहज शब्दात उत्तर दिलं,"हो बेटा. हे जग असंच चालतं. ती कविता आहे न.... जन पळभर म्हणतील हाय हाय.... किती योग्य शब्दात त्यांनी सत्य मांडलं आहे. या जगात कोणीही कोणासाठी थांबत नाही बेटा. आज सकाळी बाबांनी देखील हेच सांगितलं न तुला. तू तुझ्या पायावर उभं रहावस ही आमची मनापासूनची इच्छा आहे. कारण आमच्या नंतर देखील तुला तुझं आयुष्य जगायचं आहेच न बेटा."

आई जे सांगत होती ते गौरी मन लावून एकत होती. त्यावर ती काहीच बोलली नाही. थोड्या वेळाने बाबा आले. सगळं विसरून गौरी बाबांच्या गळ्यात पडली. तिघांनी नेहेमीप्रमाणे एकत्र जेवण घेतलं. खूप वेळ गपा मारत बसले होते ते.

रात्र वाढत होती पण गौरीच्या गप्पा संपत नव्हत्या. शेवटी बाबा म्हणाले,"गौरी बेटी झोप आता. काल रात्रिदेखिल तू नीट झोपली नव्हतीस न."

गौरीने हसून बर म्हंटलं. आई दिवा मालवण्यासाठी उठली. गौरीने आईचा हात धरला आणि तिला जवळ बोलावून तिच्या गालावर ओठ टेकवले. आईने तिला कुशीत घेतलं आणि कुरवाळलं. "झोप ह बेटा स्वस्थ." अस म्हणून आणि तिला कपाळाच चुंबन घेतलं.

बाबा देखिल उठले आणि गौरीच्या डोक्यावरून हात फिरवून त्यांच्या खोलीत गेले.

"आज वारा चांगलाच सुटला आहे नाही हो? कधीची वाऱ्यावरून एक वेगळीच अशी शीळ एकु येते आहे. अगदी कोणीतरी सतत साद घालत असल्यासारखी." गौरीची आई खोलीत येत म्हणाली आणि तिने दिवा मालवला. दिवा मालवताना एक क्षण तिला वाटललं की गौरीच्या खोलीत काहीतरी हालचाल झाली आहे, पण मग वाऱ्यामुळे झाडांची सावली हलत असेल अस मनात येऊन ती स्वतःशीच हसली आणि आडवी पडली.

........ सकाळी बराच वेळ झाला तरी गौरीच्या खोलीतून काहीच हालचाल जाणवली नाही."बरं नाही की काय पोरीला..." असं म्हणून गौरीचे बाबा तिच्या खोलीत शिरले. परंतु गौरी तिच्या पलंगावर नव्हती. तिची व्हील चेअर देखील तिथेच होती. ते बघून बाबा गोंधळले आणि तिच्या पलंगाजवळ गेले......... तिच्या पलंगावर एक काळाभोर दगड आपल्या निळसर तेजाने चमकत असलेला बाबांना दिसला. बाबांनी तो दगड हातात घेतला आणि गौरीला हाक मारली...."गौरी..... बाळा......" पण गौरीच्या बाबांना कल्पना नव्हती की गौरी तिच्या खोलीतच काय .... या जगातच नव्हती..... तिने तिचा निर्णय घेतला होता! एका सुदृढ आणि सक्षम आयुष्याचा!!!!!

समाप्त

Friday, July 24, 2020

खिडकी पलीकडचं जग (भाग 2)

खिडकी पलीकडचं जग

भाग 2

खिडकी पलीकडचं जग
भाग 2
मात्र खोल मनात गौरीला कुठेतरी खात्री वाटत होती की तिने त्या मैदानावर मुलांना बघितले होते. ती दुसऱ्या दिवशीच्या संध्याकाळची वाट पाहात होती. साधारण पाचची वेळ झाली आणि गौरीची आई आणि ती खिडकीतून त्या मैदानाकड़े डोळे लावून बसल्या. पाचचे साडे पाच झाले... साडे पाचचे सहा. पण त्या मैदानावर चिटपाखरुही दिसले नाही. गौरी खूपच हिरमुसली. तिच्या आईने तिची समजूत काढली की आदल्या दिवशी नक्कीच गौरीचा डोळा लागला असणार आणि त्या झोपेत तिला तो भास झाला असणार. असेच दोन-तीन दिवस गेले. गौरी रोज संध्याकाळी त्या खिडकीतून बाहेर मैदानाकडे बघत होती. पण तिला परत तिथे कोणीही खेळतानाच काय पण साधे उभे असलेले देखील दिसले नाही. आता मात्र गौरीलासुद्धा आई म्हणते ते खरे वाटायला लागले. तिने त्या मैदानावर आपल्यला कोणी दिसेल या विचाराचा नाद सोडला.

दिवस जात होते. गौरी आता त्या घराला आणि तिच्या खोलीला रुळली होती. ती आता स्वतःहून आपल्या व्हील चेअरवर बसायला लागली होती. आईला लहान लहान कामात काही ना काही मदत करणे आणि चित्र काढत बसणे असे गौरीचे दिवस जात होते. एक दिवस गौरी आणि तिची आई दुपारी गप्पा मारत जेवत होत्या तेव्हा शेजारच्या मावशींनी दार वाजवले. गौरीच्या आईने उठून दार उघडले आणि म्हणाली,"अरे मावशी तुम्ही या वेळेला कशा? बसा ना. जेवता का आमच्या बरोबर?" त्यावर हसत हसत मावशी म्हणल्या, "अहो गौरीची आई बसते कसली, बारीच कामं आहेत. आज न मी हळदी-कुंकु ठेवल आहे संध्याकाळी. त्याचच आमंत्रण करायला आले होते. तुम्ही नक्की या हं." आणि मग गौरीकडे वळून त्या म्हणल्या," गौरी तू पण ये न. तुलाही थोड़ा बदल होईल." काकुंनी प्रेमाने आमंत्रण केले.

"येते हं काकू." गौरी हसत म्हणाली.

संध्याकाळी पाचच्या सुमारास गौरीची आई तयार झाली आणि व्हील चेयर गौरीजवळ आणून म्हणाली,"चल बेटा. मावशी वाट बघत असतील. हळदी-कुंकवाला जाऊन येऊ."

गौरी हसली आणि म्हणाली,"आई तू जाऊन ये. मी घरीच थांबते. अग आज बाबा लवकर येणार म्हणाले आहेत नं? उगाच त्यांचा गोंधळ व्हायला नको." गौरीला व्हील चेअरवर बसून हळदी-कुंकवाला जायचे नव्हते. कारण मावशी जरी चांगल्या असल्या आणि त्यांनी गौरी समोर कधी तिच्या अपघाताबद्दल विषय काढला नसला तरी नवीन येणाऱ्या बायकांनी तिच्या आईला गौरीबद्द्ल प्रश्न विचारलेच असते. गौरीला ते सगळे परत एकदा ऐकायचे नव्हते. परत त्याच यातना अनुभवायच्या नव्हत्या; आणि आईला पण त्यांना उत्तर देताना त्रास झाला असता हे गौरीला चांगले माहित होते. म्हणून मग बाबा लवकर येणार आहेत अस सांगून तिने जाणे टाळले होते. गौरीची आई देखील अलीकडे तिच्या बाबतीत फारच हळवी झाली होती. म्हणून मग ती बरं म्हणाली आणि लवकरच येते असं सांगून मावशींकडे गेली. काही दिवसांपूर्वी गौरीने खिडकी बाहेर जे जीवंत मैदान बघितलं होतं, ते तिच्या मनात खोल घर करून बसलं होतं. त्यामुळे तिने त्याचं जसं आठवेल तसं चित्र काढायला घेतलं होतं. आई निघाल्यावर तिने ड्राइंग बोर्ड पुढे ओढला आणि चित्र काढण्यात गढुन गेली.

बहुतेक अवघी पाच मिनिटं झाली असतील-नसतील आणि तिला खिडकीबाहेरुन मुलांच्या खेळण्याचा कोलाहल ऐकू यायला लागला. त्या गोंगाटाने गौरी दचकली. तिची नजर खिड़की बाहेर वळली आणि तिला आश्चर्याचा धक्का बसला. तिने काही दिवसांपूर्वी बघितलेलं जीवंत मैदान परत तसंच मुला-माणसांनी भरलं होतं. तोच गोंगाट... तसेच मुलांनी खेळ खेळणं.. मोठ्या लोकांचं बसून गप्पा मारणं. गौरीला आश्चर्याचा धक्का बसला आणि त्याचवेळी खूप आनंद देखील झाला. ती टक लावून त्या जिवंत झालेल्या मैदानाकडे बघत बसली. बराच वेळ झाला. हळूहळू अंधार पडायला लागला. एक-एक करत सगळे मैदानावरुन बाहेर पडायला लागले. मैदानाच्या आजूबाजूला असलेल्या घरांमधून लुकलुकते दिवे दिसायला लागले. तेव्हा गौरीच्या लक्षात आलं की त्या मैदानाच्या आजू-बाजूला थोडी दूर वाटतील अशी घरं देखील आहेत. ती घरं बघून गौरी थोडीशी गोंधळली. एरवी ही घरं आपल्यला कशी दिसली नाहीत असा विचार तिच्या मनात आला. हळूहळू तिथली सगळी मंडळी निघून गेली आणि ते मैदाना रिकामं झालं. आता त्या मैदानावरचा अंधार देखील भलताच दाटला होता.

'बहुतेक तीन-एक तास आपण त्या मैदानावरच्या मुलांच्या खेळाकडे बघण्यात रमलो होतो वाटतं. अरे! इतका वेळ झाला तर मग अजुन आई कशी नाही आली?' गौरीच्या मनात आलं. तिने मैदानावरची नजर हटवली आणि घड्याळात बघितलं. ती घड्याळ बघुन दचकली. जेम-तेम साडे सहा झाले होते. म्हणजे आई जाऊन फ़क्त दिड तास!

'हे कस शक्य आहे? मी कित्तितरी वेळ बसले होते मैदानावरची गंमत बघत. अगदी मैदानावर अंधार होईपर्यंत. तरी फ़क्त दीड तासच झाला?' गौरी विचार करत होती. तिने परत मैदानाकड़े वळून बघितलं. आता मैदाना रिकामं झालं होतं; पण ते आता एरवी सारखं रिकामं आणि एकटं वाटत नव्हतं. मस्ती करून दमलेल्या लहान मुलासारखं शांत झालं होतं. मैदानाच्या आजूबाजूच्या पण थोडं दूर असणाऱ्या घरांमधून येणारा मंद प्रकाश तिला जाणवत होता.

"गौरी काय बघते आहेस ग त्या मैदानाकड़े? मी दोनदा हाक मारली. पण तुझ लक्षच नाही." गौरीच्या आईने तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हंटलं. गौरी आईच्या आवाजाने भानावर आली. तिने आईकडे बघितलं. तिच्या मनात आलं की सांगून टाकावा आपला अनुभव आईला. पण मग ती थांबली. अजुन तिलाही हा प्रकार नक्की काय आहे ते समजलं नव्हतं. आज तिने जे बघितलं होतं ते खरं होतं. कोणताही भास किंवा स्वप्न किंवा कल्पनाविलास नव्हता; याची तिला खात्री होती. पण मग मधले काही दिवस आपल्याला ते मैदान अस हसरं-खेळतं असलेलं का नाही दिसलं? तिला या प्रश्नाचं उत्तर शोधायच होतं. तिने ठरवलं की नीट उलगडा होईपर्यंत कोणालाही काहीच सांगायचं नाही. असा विचार करत असताना तिची नजर परत एकदा त्या मैदानाच्या दिशेने वळली आणि परत एकदा तिला आश्चर्याचा धक्का बसला. कारण काही वेळा पूर्वी गौरीने त्या मैदानाच्या आजूबाजूला जी घरं बघितली होती आणि त्या घरांमधला मंद उजेड तिच्या डोळ्यांना दिसला होता ती घरं आता तिथे नव्हती. मग मात्र तिच्या मनातला विचार अगदीच पक्का झाला.

ती आईकडे बघुन हसली आणि म्हणाली,"काही नाही ग; चित्र काढण्यात मग्न होते. तर त्याबाजूने काहीतरी आवाज आला अस वाटलं म्हणून बघत होते; तेवढ्यात तू आलीस." आई तिच्याकडे बघुन हसली आणि 'बरं' म्हणाली. मग त्या दोघी गप्पा मारत बसल्या. थोड्या वेळात बाबा पण आले आणि एकूण घरातला माहोल बदलून गेला. इच्छा असुही गौरी तिला आलेल्या अनुभवाचा विचार करू शकली नाही किंवा मानतली शंका आई-बाबांकडे बोलू देखील शकली नाही.

रात्री आई-बाबांबरोबर जेवण वगैरे सगळं आटपुन गौरी आपल्या गादीवर आडवी झाली आणि मग तिला तिच्या संध्याकाळच्या अनुभवावर विचार करायला वेळ मिळाला. 'काय होत ते? चार दिवसांपूर्वी आपल्याला ते मैदाना गजबजलेलं दिसलं आणि आज पण. मग मधले दिवस का नाही दिसलं? हा नक्की काय प्रकार आहे?' गौरी विचार करत होती. ती तशी समंजस मुलगी होती. त्यामुळे उगाच भुताटकी असेल असा विचारही तिच्या मनाला शिवला नाही. मात्र हे असं मध्येच मैदानावर खूपसे लोक दिसतात आणि ते ही रोज नाही तर अचानक एखाद्या दिवशी हे का? त्याचा उलगडा तिला होत नव्हता. असाच विचार करताना तिच्या अचानक लक्षात आल की पहिल्यांदा तिला तिथे माणसं दिसली तेव्हा ती तिच्या घरात एकटीच् होती. आणि आज पण तिची आई हळदी कुंकवासाठी गेली होती त्यामुळे गौरी घरात एकटीच होती. पहिल्यांदा तिला जेव्हा त्या मैदानावर लोक दिसले हे तिने आईला सांगितलं त्यानंतर ते परत दिसतात का याची वाट तिने आणि आईने मिळून बघितली होती. दोघीही खिडकीत बसून गप्पा मारत त्या मैदानाकडे बघायच्या; हे गौरीला लक्षात आलं.

'म्हणजे फ़क्त मला दिसतं ते सगळं!' हा विचार मनात येताच गौरी एकदम खुलली. अवघी सोळा-सतरा वर्षांची मुलगी. अचानक झालेल्या अपघाताने कायमची अधु झालेली. नवीन जागा. ना मित्र-मैत्रिणी... ना कुठे जाणं-येणं. त्यामुळे अपघातानंतर तिच्या आयुष्यात यापुढे कधी काहीतरी वेगळं... थरारक घडेल याची तिने आशाच सोडली होती. अचानक हे एक वेगळ गुपित... फ़क्त तिचंच असं.... तिला मिळालं होतं. त्या नवीन शोधामुळे खूप खुश झाली होती गौरी. मात्र आपल्याला लागलेल्या या शोधाची खात्री करून घ्यायला हवी हे देखील तिच्या मनात आलं. दुसऱ्या दिवशीची संध्याकाळ कधी एकदा होते याचा विचार करत करतच गौरी त्या रात्री झोपली. झोपेतसुद्धा तिला त्या मैदानाची स्वप्नं पडत होती आणि ती खुदखुदून हसत होती.

गौरी दुसऱ्या दिवशी सकाळपासूनच संध्याकाळचे पाच वाजायची वाट पाहात होती. आज तिचं कशातही लक्ष लागत नव्हतं. ती आईशी गप्पा मारत होती पण तरीही तिचं लक्ष सारखं घड्याळाकडे लागलं होतं. एकदा तर आईने तिला विचारलं देखील,"काय गं गौरी सारखं घड्याळाकडे का बघते आहेस?" आईने असं विचारता क्षणीच आपली अधीरता आईच्या लक्षात आली तर कदचीत आपल्या मनात असलेलं आपल्याला करता येणार नाही; हे गौरीच्या लक्षात आलं. मग उगाच सारवासारव केल्यासारखी ती म्हणाली,"काही नाही गं आई... आज थोडा कंटाळाच आला आहे. आजचा दिवस फारच सावकाश सरकतो आहे असं वाटतं आहे. म्हणून मी सारखी घड्याळाकडे बघते आहे इतकंच." आईला खरंच वाटलं की आज गौरी कंटाळलेली आहे. त्यामुळे तिने मनात ठरवलं की आज गौरीला घेऊन कुठेतरी बाहेर जायचं संध्याकाळी. अर्थात आईला माहित नव्हतं की गौरीने संध्याकाळसाठी काय करायचं ते अगोदरच ठरवून ठेवलं आहे.

साधारण पावणे पाच वाजता तिने आईला हाक मारली आणि म्हणाली, "आई, अग माझे ऑइल पेंट्स संपले आहेत. आणून देतेस का गं?"

गौरीच्या आईला कळेना की अचानक गौरी ओईल पेंट्स का मागते आहे. ती गौरी जवळ येऊन म्हणाली,"अग आता गेले तर उशीर होईल. ऑइल पेंट्स जवळ नाही नं मिळत. एक काम करुया. तू पण तयार हो. आपण दोघी जाऊन घेऊन येऊ. त्या निमित्ताने तू घराबाहेर पडशील आणि तुला देखील बरं वाटेल. चालेल?" आईचं बोलणं एकून गौरीची पंचाईत झाली. कारण गौरीला आईने एकटीनेच जायला हवं होतं. त्यामुळे मग तिने हट्ट धरला. "मला आत्ताच हवेत ते कलर्स. असं काय करतेस? मी तयार होणार आणि मग आपण निघणार. त्यात कितीतरी वेळ जाईल. मला आताच त्या कलर्सनी रंगवायचं आहे हे चित्र. तू एकटीच गेलीस तर तासाभरात येशीलसुद्धा. आण नं प्लीज."

आईला तिचं मन मोडवेना; म्हणून मग तिने एकटीनेच जाऊन येणं मान्य केलं. म्हणाली,"बर मी पटकन जाऊन येते. शेजारच्या मावशींना सांगून जाते. त्यांना हाक मार हं काही लागल तर." गौरी खुशीत 'हो' म्हणाली आणि तिची आई पटकन तयारी करून बाहेर पडली. आईने दरवाजा ओढुन घेतला आणि गौरीने पराकोटीच्या उत्सुकतेने मैदानाच्या दिशेने मान वळवली................

.............मैदानावर मुलांचा खेळ रंगात आला होता. मोठी माणसं कुठे गप्पा... कुठे पाय मोकळे करायला चालणं अशी विखुरली होती. ते दृश्य बघून गौरी हरकून घेली. 'आपला अंदाज बरोबर आहे तर. आई असताना हे दृश्य नाही दिसत.' तिच्या मनात आलं,'पण मला तर रोज हे बघायला आवडेल. मी आता खेळू शकत नसले, तरी या मुलांना खेळताना बघून खूप बरं वाटेल मला.' गौरी मनात विचार करत हसत होती. आणि अचानक तिच्या मनात आलं,'पण रोज कस आईला बाहेर पाठवणार? आणि तिला हे सांगितलं तरी तिला हे कुठे पटणार?' गौरी विचारात पडली. ती त्या मैदानाकड़े बघत बसली होती. थोड्यावेळाने तिला घराच दार उघडण्याचा आवाज आला म्हणून तिने वळून दाराकडे बघितलं. आई काहीतरी बोलत गौरीच्या खोलीच्या दिशेने येत होती. आई आलेली बघून गौरीने परत मैदानाच्या दिशेने मान फिरवली. ते रिकामं होतं. स्विच ऑफ करून जसा आपण टी. व्ही. बंद करतो... तस काहिसं. गौरीला मनातून माहित होतं की हे असंच होणार आहे. पण तरीही ती थोड़ी हिरमुसली. अर्थात ते तिने आईला कळू दिलं नाही. कारण बिचारी आई केवळ गौरीने हट्ट केला होता म्हणून बाजारात जाऊन तिचे ऑइल कलर्स घेऊन आली होती. तिने हसत आईकडे बघितलं आणि तिने आणलेले ओईल पेंट घेऊन पुढ्यातलं चित्र रंगवायला घेतलं.

असेच अजून दोन-तीन दिवस गेले. आई घरातच असल्याने गौरीला मैदानावर खेळणारी मुलं दिसली नव्हती; आणि त्या विचाराने गौरी मनातून थोडी दु:खी होती. मात्र तिने ते आईला कळू दिलं नव्हतं. गौरीची आई त्यादिवाशी सकाळी कोपऱ्यावरच्या वाण्याकडे गेली होती. नेमका अवेळी अचानक पाऊस आला होता आणि त्यात ती भिजली होती. त्यामुळे गौरीच्या आईला दुपारी अंगात जरा कणकण जाणवली. म्हणून मग गौरीला सांगून आणि औषध घेऊन तिची आई दुसऱ्या खोलीत दुपार पासूनच झोपली होती. चारचा सुमार होता. गौरी तिचं चित्र पूर्ण करत बसली होती. गौरीचं सहज मैदानाकडे लक्ष गेलं आणि तिला धक्काच बसला. कारण नेहेमीची सवाय असल्यासारखी हळूहळू मैदानावर मूलं जमायला लागली होती. फ़क्त मुलंच नाही तर नेहेमी प्रमाणे मोठी माणसं देखिल मैदानावर आली होती. आता मात्र गौरीच्या आश्चर्याला पारावार उरला नाही. तिच्या मानत आलं,' घरात आई आहे आणि तरीही आपल्यला या मैदानावरची ही सर्व मंडळी कशी दिसत आहेत? त्यात आता जेमतेम चार वाजलेत आणि इतक्या लवकर कशी आली ही मुलं खेळायला? गौरीच्या मनात एका मागून एक विचार यायला लागले. पण मग गौरीच्या लक्षात आल की बाहेर मैदाना जवळ उन्हाचा तडाखा चार सारखा वाटत नव्हता. मात्र घरातलं घड्याळ चारची वेळ दाखवत होतं आणि एरवी चार वाजता जसं वातावरण असत तसंच वातावरण घरात होतं. हा वेळेचा फरक कसा ते गौरीला कळेना. ती विचार करायला लागली आणि तिच्या लक्षात आलं की मागच्या दोन्ही वेळेला आपल्याकडे संध्याकाळचे सहा वाजतात न वाजतात तोवर हे मैदान मोकळं व्हायला लागलं होतं. म्हणजे कदाचित याचं घड्याळ आपल्यापेक्षा थोडं पुढे आहे की काय?'

मैदानावर नजर खिळवून गौरी विचार करत होती. समोर जी लोकं दिसत होती त्यांच्या घडाळ्यात किती वाजले असतील याचा अंदाज तिला नव्हता. पण तिच्या घरातल्या घडाळ्यात जेम तेम चारच वाजले होते. याचा अर्थ त्याचं घडयाळ आपल्यापेक्षा थोडं पुढे आहे हे तिच्या लक्षात आलं होतं. हा विचार मनात पक्का झाला आणि मग मात्र गौरीने स्वतःचे असे ठोकताळे बांधायला सुरवात केली. एक म्हणजे फ़क्त तिलाच ते जीवंत मैदान, तिथे खेळणारी मुलं आणि माणसं दिसतात. आज आई घरात आहे पण ती दुसऱ्या खोलीत झोपलेली आहे. म्हणजे ही लोकं ज्यावेळी या मैदानावर यायला सुरवात करतात त्यावेळी गौरी खोलीत एकटी हवी आणि सारखं कोणी त्रास देणारं नको. आता गौरीला त्या ऐकूण प्रकाराचा विचार करण्यात आणि त्या मैदानावरच्या लोकांचा शोध घेण्यात अजुन गंमत वाटायला लागली. आता तिला तिची उत्सुकता स्वस्थ बसु देत नव्हती. पण त्या लोकांबद्दल अजून जाणून घ्यायचं तर गौरीला घरात एकटं असणं आवश्यक होतं. कारण आज आईला बरं नव्हतं म्हणून ती दुसऱ्या खोलीत झोपलेली होती. नाहीतर तिची आई सतत गौरीच्या भोवतीच असायची. आणि आई घरात असताना गौरी काहीच करू शकत नव्हती.

गौरीने विचार करून गप्पा मारताना हळूहळू आईला पटवून दिलं की तिने सतत गौरीचा विचार करत राहाणं बरोबर नाही. थोडं घराबाहेर पड़लं पाहिजे. गौरीमुळे ती खूप अडकून पडली आहे. पूर्वी मुंबईला असताना तिची आई एका सेवाभावी संस्थेमध्ये मदत म्हणून त्यांचं ऑफिस सांभाळायला जायची रोज. ३-४ तासाचं काम होतं. पण त्यामुळे तिची आईदेखील थोडी बिझी असायची. तसच इथे देखील तिने काही करावं असं गौरीने सुचवालं. पण तिची आई गौरीला सोडून कुठे लांब जायला तयार नव्हती. पण मग यावर गौरीनेच एक तोडगा शोधून काढला.

रोज संध्याकाळी शेजारच्या मावशींकडे आजुबाजूची मूलं गणपती स्तोत्र, मारुती स्तोत्र, पाढे वगैरे म्हणायला जमायची. तास-दीड तासाचा कार्यक्रम. गौरेने आईला सुचवलं की ती मावशींना मदत करायला शेजारी जाऊ शकते. मावशींचं घर शेजारीच होत. त्यामुळे आई कुठे लांब जाण्याच्या प्रश्न नव्हता. आणि गौरी अगोदर दोन-तीन दिवस आईबरोबर गेली. आईला ते सगळं आवडतं आहे हे लक्षात आल्यावर हळूच तिने अंग काढून घेतलं. तिने आईला समजावलं की असं खूप वेळ व्हील चेअर मध्ये बसायची तिला सवय नसल्याने तिला त्रास होतो. आईलादेखील ते पटलं. आणि मग गौरी घरीच थांबली; आणि आईला जायला भाग पाडलं. हळूहळू आईला पण सवय झाली. आणि गौरीला स्वर्ग सापडल्याचा आनंद झाला.

मग मात्र गौरी रोज संध्याकाळी आई गेल्या बरोबर खिडकीत बसून त्या मुलांचं निरिक्षण करायची. त्याच मैदानाची वेगवेगळी चित्रं काढायला तिने सुरवात केली. प्रत्येक वेळचे चित्रातले बारकावे वेगळे असायचे. एक दिवस ती अशीच निरिक्षण करत बसली होती; आणि अचानक त्या मैदानावर फुटबॉल खेळणाऱ्या मुलांचा बॉल गौरीच्या खिड़कीच्या दिशेने आला. गौरी थोड़ी दचकली. पण तिचं मत होतं की ती काही त्यांना दिसणार नाही. कारण आतापर्यंत तिला हे लक्षात आलं होतं की ते जग वेगळं होतं. तिची खिड़की हा केवळ त्या जगात डोकावायचा एक लहानसा झरोका होता. तिचं त्या जगात काहीही स्थान नव्हतं. त्यामुळे तिला कोणी बघू देखील शकणार नव्हतं. म्हणून मग बॉल तिच्या दिशेने येऊनही गौरी शांत होती.

"ए बॉल तुझ्या खिड़कीत आला आहे. टाक ना...." त्या आवाजाने आणि समोर कंबरेवर हात ठेऊन उभ्या मुलाकडे बघुन मात्र गौरी पुरती गडबडली.

"क...काय? कोण?..... मी? म्हणजे ... मला म्हणालास?" गौरीने अडखळत विचारलं. ती पुरती गोंधळून गेली होती. तिच्या मनातला समज चुकीचा आहे हे तिच्या लक्षात येऊनही तिला ते पचत नव्हते.

"हो... कमाल करतेस. खिड़कीत तूच बसली आहेस न? मग दुसऱ्या कोणाला कसं सांगेन?" तो मुलगा सहज आवाजात म्हणाला.

"तुला मी दिसते आहे?" तिने आश्चर्याने विचारलं.

"तू वेडी आहेस का? तू दिसत नसतीस तर मी काय हवेशी बोलतो आहे का?" त्याने हसत उत्तर दिलं. " नेहमीच बघतो मी तुला. तशी रोज दिसतेस अलीकडे. पण अगोदर जेव्हा दिसली होतीस तेव्हा मला आश्चर्य वाटलं होतं. तुझ्याशी बोलायचं ठरवलं होतं, पण मग तू दुसऱ्या दिवशी दिसलीच नाहीस. मग मधेच एक दिवस दिसलीस. परत गायब. मग मी तुझा नाद सोडला. अलीकडे मात्र रोज दिसत असतेस. पण तू कधी खेळायला येत नाहीस. एकदा येणार पण होतो तुला विचारायला. पण दादाजी नको म्हणाले. आणि तसंही हे मैदान म्हणजे आमची सीमा रेषा आहे असं म्हंटलं जातं. इथपर्यंत येण्याची वेगळी परवानगी घ्यावी लागते. म्हणून मग उगाच माझ्या हातून काही चूक व्हायला नको असा विचार केला आणि मग नाही आलो. शिवाय दादाजी म्हणाले तू आपणहुन हाक मारशील आणि येशिल तेच चांगलं. पटल ते मला. म्हणून तू हाक मारायची वाट बघत होतो. आज मात्र आमचा बॉल आला आहे तुझ्या खिडकीजवळ. त्या निमित्ताने निदान तुझ्याशी बोलतो तरी आहे. बरं ते जाऊ दे. तो बॉल टाक. आमचा खेळ खोळंबला आहे;" तो मुलगा रोजची ओळख असल्या सारखा गौरीशी बोलत होता. गौरी मात्र आश्चर्याने पार गारद झाली होती. तिने काही न बोलता बॉल टाकला. त्या मुलाने झेलला आणि परत मैदानाकड़े पळाला.

'मी पण त्यांना दिसते? गेले अनेक दिवस....? असं तो मुलगा म्हणाला खरं. पण असं कसं? दादाजी कोण असतील? त्यांनी असं का सांगितलं की मी हाक मारेपर्यंत थांबायचं? तो मुलगा म्हणाला हे मैदान एक सीमारेषा आहे... म्हणजे नक्की काय? हे एकूण काय असेल?' गौरी जाम गोंधळली होती; पण घाबरली मात्र नव्हती. ती विचार करत होती. विचार करण्यात किती वेळ गेला ते तिच्या लक्षात आलं नाही. पण थोड्या वेळाने तिची आई आली आणि मग बाबा देखील आले. आई-बाबा असताना त्यांच्याशी अगदी नेहेमीसारखं वागत-बोलत होती ती. पण तिचं आंतर मन सतत विचार करत होतं. तिचं वयच असं होतं की तिची उत्सुकता तिला स्वस्थ बसु देत नव्हती. आणि मग तिने स्वतःच हाक मारायच ठरवलं.

"ए..... ए... शुक-शुक... ए मुलगा......" गौरीने हाक मारली.

काल बॉल घेऊन जाणाऱ्या त्या मुलाने वळून बघितलं. त्याने तिच्या दिशेने हात हलवला आणि धावत येऊन तिच्या समोर उभा राहिला.

"ए शुक-शुक काय? मला नाव आहे." कंबरेवर हात ठेऊन तो म्हणाला.

"अरे पण मला माहीत नाही न तुझ नाव..." गौरी हसत म्हणाली.

"ओरस..." तो शांतपणे म्हणाला.

"काय?" गौरी गोंधळून म्हणाली.

"माझ नाव ग... ओ...र...स... आणि तुझं?" तो म्हणाला.

"गौरी" तिने उत्तर दिलं.

"काय? ग...व...री? असं कसं नाव?" त्याचा चेहरा गोंधळाला होता. "बरं. ते जाऊ दे. येतेस खेळायला?" त्याने विचारलं आणि एकदम दाताखाली जीभ चावली. त्याने कसानुसा चेहेरा करत इथे-तिथे बघितलं.

"नाही जमणार रे..." गौरी दुःखी होत म्हणाली. "आणि असा का केलास चेहेरा?" तिने विचारलं.

"अग मी तुला पहिल्यांदा बघितलं ना तेव्हा मला खूप आश्चर्य वाटलं होतं. मग अचानक तू गायब होतिस काही दिवस. मग एक दिवस परत दिसलिस आणि मग रोज दिसायला लागलीस. मी हे सगळ दादाजिंना सांगितलं....." ओरस बोलत होता. त्याला मध्येच थांबवत गौरीने विचारलं,"हे दादाजी कोण रे?"

"आहेत... अम्.... म्हणजे ते एक आहेत त्यांना आम्ही सगळेच दादाजी म्हणतो. सगळे म्हणजे माझ्याहून मोठेसुद्धा आणि माझ्याहून लहानसुद्धा. ते आमच्यातले खूप काहीतरी आहेत. त्यांना मी जेव्हा सांगितलं तू दिसतेस तेव्हा ते म्हणाले अस होत कधी-कधी. नकळत एखादी खिड़की दिसते उघडलेली. जरी ती खिडकी दोन्ही बाजूंनी उघडलेली असली तरी आमच्या बाजूने बोलायला सुरवात करणं योग्य नाही असं ते म्हणाले. आणि म्हणाले की तू स्वतः बोलेपर्यंत नाही बोलायचं. म्हणून तर मी खूप वाट बघितली की तू बोलशील. पण तू नुसतीच् बघत बसलेली असायचीस. एक गंमत सांगू? कोणाला सांगू नकोस हं... पण मी काल मुद्धाम बॉल इथे मारला आणि त्या निमित्ताने आलो इथे तुझ्यासमोर. बघ, झाला की नाही उपयोग. लागलो की नाही आपण बोलायला. मला वाटलं होतं कोणाला कळणार नाही मी मुद्दाम बॉल याबजुला मारला आहे. पण दादाजिंपासून काहीच लपत नाही. दादाजींच्या ते लक्षात आलं की मी मुद्धाम बॉल इथे मारला होता. ते म्हणाले मला ... ओरस मला कळलं बर का... बास इतकंच! तसा मी त्यांचा लाडका आहे न. त्यामुळे रागावले नाहीत." तो....ओरस... हसत म्हणाला.

ते सगळं ऐकून गौरी थोड़ी गोंधळली. पण मग हसून म्हणाली,"बरं झालं तू स्वतःहून मला हाक मारलीस. अरे मला वाटायचं की फ़क्त मलाच तुम्ही दिसता. तुम्हाला मी दिसत असेन असं वाटलंच नाही; नाहीतर कधीच हाक मारली असती."

त्यावर ओरस हसला. "ग.....व.....री... चल येतेस खेळायला?" असं ओरसने विचारलं आणि गौरी एकदम गप्प झाली.

"का ग तुला खेळायला नाही आवडत?" तिला असं अचानक गप झालेलं बघून त्याने विचारलं.

"ओरस माझ नाव न गौरी आहे रे... ग...व...री... नको ना म्हणुस. शेणाच्या गवऱ्यांसारखं वाटतं." गौरी म्हणाली... "आणि किनै मला पण खूप आवडतं खेळायला. पण... पण किनै मी कंबरेखालुन अधु आहे. त्यामुळे मी नाही येऊ शकणार खेळायला." गौरीने खालच्या आवाजात सांगितलं.

"अधु? म्हणजे?" ओरसने गोंधळून विचारलं. अगोदर गौरीला वाटलं तो तिच्या अधू असण्याची चेष्टा करतो आहे आणि तिला राग आला. पण मग त्याचा गोंधळलेला चेहेरा बघुन ती म्हणाली,"अरे म्हणजे मी कमरेखालुन हलु शकत नाही."

"अरे?असं कसं? का नाही? सगळेच कमरे खालून हलू शकतात. मग तू का नाही?" आता ओरस अजुन गोंधळला.

"माझा एक अपघात झाला होता." तिने उत्तर दिलं.

"अपघात? म्हणजे?" त्याने परत विचारलं. आता मात्र गौरी थोड़ी वैतागली. "जा विचार तुझ्या त्या दादाजिंना. तू म्हणतोस न त्यांना सगळं कळतं? मग त्यांना अपघात म्हणजे काय ते पण सांगता येईल तुला. मला याहून जास्त नाही समजावता येत." अस म्हणून गप बसली.

"हो ग. त्यांना न सगळं कळतं आणि माहीत असतं. त्यांनी खूप जास्त प्रवाह बघितले आहेत." ओरस म्हणाला.

"प्रवाह? म्हणजे? तुमच्याकडे खूप नद्या आहेत का?" आता न समजण्याची पाळी गौरीची होती.

"अग नद्या नाही ग. अग प्रवाह.. म्हणजे हा जो आहे तो.. म्हणजे आपण हे जे करतो ते..." ओरस त्याच्या परीने समजावत होता. आता समजावायची पाळी त्याची होती न. त्यांच्या गप्पा अजूनही लांबल्या असत्या. पण अचानक एक मोठी शीळ वाजली आणि त्याने डोळे विस्फारुन मैदानाच्या दिशेने वळून बघितलं. शिळेचा आवाज ऐकताच सगळे परत निघाले होते. त्याने तिला घाईघाईने अच्छा असा हात केला आणि बोलतानाचं वाक्य अर्धवट सोडून तो मैदानाच्या दिशेने धुम पळाला.

गौरीने पण "बाय" म्हंटलं. पण बहुतेक त्याला ते एकु नाही गेलं. तिने मान आत वळवुन घरात बघितलं. अजुन आई आली नव्हती. तिने हलकासा निश्वास टाकला. 'ओरसशी बोलण्याच्या नादात आपण आपलं घर आणि आई-बाबा विसरलो होतो. हे बरोबर नाही. सांभाळलं पाहिजे.' तिच्या मनात आलं. तेवढ्यात आई आलीच आणि मग इतर विचार बाजूला ठेवत गौरी आईशी गप्पा मारण्यात मग्न झाली.

असेच काही दिवस गेले. ओरस तिच्या खिडकीकडे रोज यायला लागला होता. तो आणि गौरी रोज गप्पा मारायला लागले होते. आता गौरीची ओरसशी छान गट्टी देखील जमली होती. त्याचे दादाजी म्हणजे त्याचे खरे आजोबा नव्हते हे एव्हाना गौरीच्या लक्षात आले होते. ते त्यांच्या जगातले एक अत्यंत जुने गृहस्थ होते. त्यांना सगळेच 'दादाजी' म्हणायचे कारण त्यांनी त्या जगातल्या अनेक पिढ्या बघितल्या होत्या. पण दिसायला ते वृद्ध नव्हते असं ओरसचं मत होतं. त्यांच्याकडे ट्रॅफिक.... मोठ्ठे आवाज... भांडणं.... अपघात..... अस काहीच नव्हतं म्हणे. कारण ती असं काही सांगायला लागली की ओरस गोंधळून जात असे. हे सगळं समजून गौरीला थोड़ विचित्रच वाटलं.

तिने तिच्या जगाची माहिती दिली. त्यात मोठ्ठे आवाज होते; गोंधळ-कलकलाट होते; अपघात होते.... ओरसच्या मते ते सगळं खरं नव्हतंच. कारण त्याला या सगळ्याची कल्पना करताच येत नव्हती.

हळूहळू गौरीची आणि ओरसची चांगली दोस्ती झाली होती. दोघांनाही आता हे लक्षात आलं होतं की ते दोघे वेगवेगळ्या जगातले होते. गौरीच्या खिडकीमध्ये काहीतरी होतं की ज्यामुळे ती ओरसच्या जगाला बघू शकत होती, आणि ते जग... त्यातला ओरस...... तिला बघू शकत होता. गेला आठवडाभर ते दोघे गप्पा मारत होते. खरं सांगायचं तर एकमेकांच्या वेगळेपणाचा अंदाज घेत दोघेही माहिती गोळा करत होते. तो तास-दीड तास म्हणजे गौरीच्या रुक्ष आयुष्यातलं एक सुंदर हिरवं वळण होतं. फ़क्त तिच्यासाठी उघडलं गेलेलं; याची तिला पूर्ण कल्पना आली होती. ती या आणि त्या जगाच्या उंबरठ्यावर उभी होती याची तिला आतापर्यंत कल्पना आली होती.

गौरीचा जीव आई-बाबांमधे जितका रमायचा तितकाच् तो आता ओरसबरोबर गप्पा मारताना खुलायचा. ओरस देखिल तिला बघितलं की खेळ सोडून धावत यायचा. कधीतरी तिची आई घरीच थांबायची गौरीला बरं वाटावं म्हणून. मग गौरीदेखील काही म्हणायची नाही. ती आईशी गप्पा मारताना सारखी खिड़कीबाहेर बघायची. पण तिथे ओरस आणि त्याचं जग दोन्ही नाही दिसायचं. अर्थात त्याची तिला कल्पना होती. तिला हे देखील लक्षात आलं होतं की तिची आई असताना जरी गौरी खिडकीमद्धे बसली तरी ओरसला ती दिसत नव्हती.

असाच अनेक दिवसांपैकी एक दिवस होता. ओरस आणि गौरी गप्पा मारत होते. आणि अचानक ओरस म्हणाला,"गौरी किती दिवस आपण अस गप्पा मारणार? ये न इथे. आपण एकत्र खेळूया." गौरी काही न बोलता गप बसली. तिच गप बसणं म्हणजे होकार आहे असं ओरसला वाटलं आणि मग ओरस् तिच्या मागेच् लागला.

त्याचा आग्रह वाढला तशी गौरी म्हणाली,"अरे ओरस् कस समजाऊ तुला. मला नाही येता येणार तिथे. मुळात मला एकटीने हलताच येत नाही. आणि मी प्रयत्न करून आलेच तिथे तरी तुमचं जग माझ्या जगापेक्षा वेगळं आहे. मी परत येऊच नाही शकले तर? माझ्या आई-बाबांचं कसं होईल असं मला अचानक गायब झालेलं बघुन? अरे अजुन तुझ्या लक्षात नाही का आलं? आपण दोघे एका अशा सीमारेषेवर उभे आहोत; की मी तिथे आले तर परत येऊ शकेन याची मला शाश्वती नाही आहे." गौरीने त्याला शांत करत उत्तर दिलं.

त्यावार ओरस म्हणाला,"मी दादाजींना विचारलं."

"काय म्हणाले ते?" तिने उत्सुकतेने विचारलं.

"तुझ्या परत जाण्याबद्दल ते काहीच म्हणाले नाहीत. ते म्हणाले इथे येण्याचा निर्णय तुला स्वतः ला एकटीने घ्यायचा आहे. त्यांनी मला तुझा निर्णय विचारायला सांगितले आहे." तो म्हणाला.

त्याचं बोलणं ऐकून गौरी थोडी गंभीर झाली. "समजा मी म्हणाले हो येते तर? तुझे दादाजी मला मदत करतील? मला परत इथे माझ्या आई-बाबांकड़े येता येईल? मला चालता येत नाही. फार तर खिड़कीत चढु शकेन; मला ते तिकडे उतरवून घेऊ शकतील? तुमचं जग आमच्या जगापेक्षा अनेक बाबतीत पुढे आहे. तुम्ही जास्त प्रगत आहात. तुमचं कालमापन आमच्यापेक्षा थोडं वेगळं आहे. आमचा तास म्हणजे तुमच्याकडचा बहुतेक दीड तास असावा; असा माझा अंदाज आहे. हे सगळं वेळेचं गणित तुझे दादाजी जमवू शकतील? ओरस मलाही तिथे तुमच्या जगात यावसं वाटतं रे. पण परतीची वाट बंद होईल की काय या भितीने मी तिथे येण्याचा विचार देखील करत नाही. आणि अर्थात हे माझं अधू असणं देखील एक मोठा प्रश्न आहे...... या सगळ्याची उत्तरं तुझे दादाजी देऊ शकतीलं?" तिने एका मागोमाग एक प्रश्न विचारले.

ओरसला काय बोलावं ते सुचत नव्हतं. तो गौरीकडे बघत होता आणि गौरी त्याच्याकडे.... आणि अचानक एक खूप गंभीर आणि खोल खर्जातला आवाज आला..."हो गौरी! सगळ जमेल"

ओरस् आणि गौरी दोघेही दचकले. ओरसने वळून बघितलं. शेजारच्या एका मोठ्ठया झाडामागुन एक अत्यंत उंच आणि गोरिपान, तेजस्वी व्यक्ति ओरस च्या शेजारी येऊन उभी राहिली. त्यांनी शुभ्र पांढरा गाऊन घातला होता... ख्रिश्चन फादर्स घालतात तसा.... मोठी शुभ्र दाढ़ी होती. पण दिसायला ते म्हातारे नव्हते वाटत. उलट चेहेरा तकतकीत, गंभीर, अत्यंत तेजस्वी आणि तरीही थोड़ा मिशिक्ल होता. मोठ्ठे आश्वासक डोळे होते. छान छाप पडावी असं एकूण व्यक्तिमत्व होतं त्याचं. गौरी त्यांना बघुन मंत्रमुग्ध झाली. ओरसला खूप आनंद झाला.

"दादाजी हीच गौरी. माझी नवी मैत्रीण. खरंच तिला आपल्याकडे घेता येईल?" त्याने उत्सुकतेने विचारले.

".....आणि थोड्या वेळात परत पण जाता आले पाहिजे ह..."गौरीने तिच्या मनातला विचार जोडला.

दादाजी दोघांकडे बघुन हसले. "हो... दोन्ही जमेल. पण त्यासाठी गौरीने स्वतः प्रयत्न करावा लागेल. ओरस तिला जे समजलं ते तुला पटत नाही आहे. आपण दोन वेगळ्या जगांच्या सीमा रेषेवर आहोत. तिला इथे येण्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे. मी मदतीला आहेच. पण सुरवात तिने करावी लागेल. गौरी मागे अनेक प्रवाहांपूर्वी; म्हणजे तुला कळेल अशा भाषेत सांगायचं तर; तुमच्या अनेक वर्षांपूर्वी मी हा प्रयोग केला होता. त्यावेळी ते मला सहज जमलं होतं. त्यामुळे हे नक्की की तू इथे येऊ शकतेस आणि परत जाऊ ही शकतेस. पण सुरवात तू करायची आहेस. बस एवढंच." अस म्हणून दादाजी आश्वासक हसले.

दादाजींच्या आश्वासक हास्याने गौरीला धीर आला. तिने शांतपणे दादाजींकडे बघितलं आणि म्हणाली,"दादाजी, हा खूप मोठा निर्णय आहे माझ्यासाठी. मला वेळ हवा विचार करायला. खूप आवडेल मला तिथे यायला. पण भिती पण वाटते आहे मनातून."

"मी समजु शकतो गौरी. ठिक आहे. विचार कर. तू तुझा वेळ घे... आम्ही आहोतच इथे." दादाजी म्हणाले आणि ओरसकड़े वळून म्हणाले,"चल ओरस. आपली हाक येईल एवढ़यात. मला तुझ्यासारखं पळायचं नाही." आणि मग गौरीला अच्छा करून; लवकर भेटण्याचं वचन देऊन ते मागे वळले.

"अच्छा गौरी. लवकर विचार करून ठरव आणि इथे ये ह." असं हसत म्हणून ओरस देखिल वळला आणि दादाजींना गाठून त्यांच्या बरोबर गप्पा मारत चालायला लागला. गौरीने मान घरात वळवली. आई यायची वेळ झाली होती; पण अजुन ती आली नव्हती.

'काय करावं बरं? खरंच दादाजी म्हणतात तस पूर्वी कोणीतरी कधीतरी गेलं होतं? दादाजी म्हणाले त्यांनीच असं केलं होतं... असेलही. पण मग मला जमेल? या अशा अवस्थेत? आणि परत कशी येणार मी? नाहीच येऊ शकले तर? आईला सांगू का हे सगळं? तिचा विश्वास बसेल का? काय करू?' गौरीच्या मनात विचारांवर विचार चालु होते. तिचं मन पार गोंधळून गेलं होतं. तिला ओरसच्या जगात जावंसं तर वाटत होतं; पण परत येता येईल की नाही याची शाश्वती वाटत नसल्याने ती गोंधळून गेली होती.

"अग कधिपासून हाक मारते आहे बेटा. कुठल्या विचारात बुडली आहेस? " गौरीची आई तिला हलवत म्हणाली.

"अं? अरे आई तू कधी आलीस?" दचकुन गौरी म्हणाली.

"झाला थोडा वेळ. आज काकुंना बरं नाही म्हणून लवकर आटपलं आम्ही. पाहिलं तर खिड़की बाहेर बघुन स्वतःशीच बोलत होतीस तू. मी बाहेर नजर टाकली तर कोणीच नव्हतं, पण तू मात्र दोन-तीन लोक बाहेर असल्यासारखी बोलत होतीस. हसत होतीस. खुश होतीस ग राणी. तुला असं खूप दिवसानी हसताना बघुन डोळ्यात पाणी आलं... मग तुला हाक मारावीशी वाटली नाही आणि मी स्वयंपाकघरात वळले. पण मग अचानक शांत झालीस आणि विचार करत बसलीस. म्हणून मग हाक मारली." आई तिच्या केसातून हात फिरवत म्हणाली.

याचा अर्थ आज आई खोलीत होती तरी गौरीला ते जग आणि ओरस आणि दादाजी दिसाले होते. पण मग त्यावेळी गौरीला तिची आई आणि आईची हाक नव्हती लक्षात आली. किंबहुना तिला आई दिसली देखील नव्हती. हा अजून एक वेगळा झालेला असा बदल होता. जेव्हा ती त्या जगाच्या संपर्कात येत होती त्यावेळी ती या जगाच्या संपर्कातून तुटत होती. म्हणजे त्या काळासाठी ती तिच्या आईपासून तुटत होती. या विचाराने देखील गौरी बावरली. समोर आईला बघून गौरीला एकदम भरून आलं. आईच्या कुशीत शिरत ती म्हणाली,"आईं मी न तुला सोडून कुठ्ठे जाणार नाही. मी तुझ्याजवळ खूप खुश आहे ग."

आईला कळेच ना काय झालं अचानक गौरीला. तिला जवळ घेऊन थोपटत ती म्हणाली,"बेटा कोण आणि का नेईल तुला माझ्यापासून दूर? आणि मी तरी असं होऊ देईन का? अज्जीबात घाबरु नकोस ह. स्वप्न पड़लं का काही तुला राणी?"

"हो.. स्वप्नच... खूप छानसं... हवहवसं वाटेल अस स्वप्न. जाऊ दे न पण तो विषय. चल आज तू लवकर आली आहेस तर काहीतरी खास पदार्थ बनवुया बाबांसाठी. मी पण मदत करते तुला." डोळे पूसत गौरी म्हणाली आणि स्वतःची व्हील चेयर जवळ ओढुन त्यात बसायला तिने सुरवात केली देखिल.

आई थोड़ी गोंधळली. पण ती शक्यतोवर गौरीला दुखवायची नाही. त्यामुळे जास्त प्रश्न न विचारता तिला मदत करायला लागली. आईने गौरीला तिच्या खुर्चीत बसवलं आणि काहीतरी बोलत स्वयंपाक घराच्या दिशेने वळली. गौरीने तिच्या खुर्चीची व्हील्स पुढे केली आणि परत एकदा क्षणभरासाठी मागे वळून त्या खिडकीकडे बघितलं. पण मग तिने काहीसा विचार केला आणि ती स्वयंपाकघराच्या दिशेने वळली. दोघी माय लेकी हसत-गप्पा मारत काहीतरी नवीन पदार्थ करायला लागल्या.

अजूनही आई संध्याकाळी काकुंकड़े जात होती; पण गौरी मोह होऊनही त्या खिड़कीपासून आणि ओरस पासून लांब राहत होती. तिने मनातल्या मनात एक निर्णय घेतला होता. त्यामुळे ठरवून ती त्या खिडकीपासून लांब राहात होती. एरवी दिवसभर ती खिडकीतून बाहेर काही दिसतं आहे का याचा अंदाज घ्यायची. पण आई निघायच्या वेळेस खिड़की ओढुन घेऊन ती तिचा चित्राचा कॅनवास घेऊन बसायची.

असेच दोन आठवडे गेले.

त्या दिवशी रात्री चंद्र खूपच मोठ्ठा दिसत होता. पौर्णिमा होती.मात्र वारा अज्जीबात नव्हता. पण तरीही उकड़त नव्हतं. आज बाबांनी मस्त कुल्फी आणली होती घरी. जेवणं झाल्यावर गौरी आणि आई-बाबा तिच्या खोलीत गप्पा मारत कुल्फी खात होते. सहज गौरीच लक्ष खिड़कीतून बाहेर गेलं आणि ती दचकली. खिड़कीच्या समोरचं जे झाड़ होतं त्याला टेकुन कोणीतरी उभं होतं. अगोदर तिला वाटल भास् होतो आहे. पण मग तिथे हालचाल झाली आणि तिच्या लक्षात आलं की खरंच कोणीतरी उभं आहे. तिने त्या व्यक्तीला बघितलं हे त्या व्यक्तीच्या देखील लक्षात आलं. कारण खिडकी बाहेर होणारी हालचाल थोडी वाढली. आता गौरीचं मन गप्पात रमना. सारखी तिची नजर बाहेर जात होती. शेवटी ती म्हणाली,"आई बाबा झोपुया का आता? मला झोप येते आहे." असा अचानक तिचा मूड का बदलावा हे त्यांच्या लक्षात नाही आलं. पण तसा उशीरही झाला होता. म्हणून मग तिला नीट आडवं व्हायला मदत करून ते दोघे त्यांच्या खोलीत गेले.

त्यांच्या खोलीचा दिवा बंद झाला आणि त्याक्षणी गौरीला तिच्या नावाने मारलेली हाक एकु आली.

"गौरी... गौरी..." आवाज गंभीर आणि खोल होता. ते दादाजी होते. गौरी उठून बसली. तिने खिडकीचा बंद दरवाजा उघडला.

"दादाजी? तुम्ही आहात का?" गौरीने हलक्या आवाजात विचारले.

"हो गौरी. मी.... ओरसचा दादाजी." दादाजी पुढे आले. चंद्राच्या उजेडात. त्यांचे पाणीदार डोळे आज जास्तच चमकत होते.

"काय झाल दादाजी? तुम्ही आज असे या वेळी कसे काय येऊ शकलात? आई-बाबा झोपेपर्यंत तुम्ही थांबलात ते माझ्या लक्षात आलं. याचा अर्थ तुम्हाला इथलं सगळं दिसत होतं न? आणि मुख्य म्हणजे आई-बाबांशी बोलत असताना मला तुम्ही दिसलात. म्हणजे या जगातली माणसं त्या जगाकडे बघताना देखील दिसतात का?" गौरीने त्यांना विचारलं. ती पार गोंधळून गेली होती.

"गौरी.. मला इथलंच काय.. इतरही खूप काही दिसतं. सोय म्हणून मी स्वतःला दादाजी म्हणून घेतो. पण माझा प्रवाह... म्हणजे मी जगलेला काळ.... कोणालाही सांगता येणार नाही इतका आहे."दादाजी त्याच गंभीर आणि खोल शांत आवाजात बोलत होते. बोलता बोलता ते खिडकीच्या खूपच जवळ आले.

क्रमशः

Friday, July 17, 2020

खिडकी पलीकडचं जग (भाग 1)

खिडकी पलीकडचं जग

भाग १

गौरी नावासारखीच गोड, मोहक आणि बड़बडया स्वभावाची मुलगी होती. लाघवी आणि मित्र-मैत्रिणींचा मोठा परिवार असलेली. पहिला नंबर वगैरे नाही... पण तशी हुशार म्हणण्यासारखी. आई-बाबांची एकुलती आणि लाडकी लेक. गौरी उत्तम चित्र काढायची. त्यामुळे शाळेतून तिला वेगवेगळ्या स्पर्धांना देखील पाठवालं जायचं. अनेकदा तिने शाळेला बक्षीस मिळवून दिलं होतं.

त्या दिवशी गौरीची 10वी च्या परीक्षेचा शेवटचा पेपर होता. त्यामुळे गौरी आणि तिच्या मैत्रिणी खूप खुशीत होत्या. सगळ्या मैत्रिणी मिळून जुहुला भटकायला जाणार होत्या. आता आपण कॉलेजमध्ये जाणार म्हणजे थोडे मोठे झालो असं सगळ्यांच्याच मनात होत. त्यामुळे घरून सर्वांनीच बाहेर खाण्यासाठी पैसे घेतले होते. हसत-खिदळत सगळा ग्रुप बीच वर पोहोचला. पाण्यातली धम्माल... भेळ... गोळा... धावाधाव... एकदम खुशीचा माहोल होता. एकूण यासगळयामधे कधी अंधार झाला ते मुलींना कळलच नाही. उशीर झाला आहे हे लक्षात आल्यावर मात्र सगळ्याजणी गड़बडल्या. ज्या मुली एकमेकींजवळ राहणाऱ्या होत्या त्यांनी सोबतीने जाण्याच्या दृष्टीने एकत्र रिक्शा केल्या आणि दुसऱ्या दिवशी भेटायचं ठरवून निघाल्या. गौरी आणि अक्षरा जवळ जवळ रहायच्या त्यामुळे त्यांनी दोघींनी एकच रिक्षा केली होती. अक्षरा अगोदर उतरणार होती; तिला सोडून गौरीची रिक्शा पुढे गेली त्यावेळी साधारण साडे सात वाजले होते.

"हॅलो अक्षरा आहे का? मी गौरीची आई बोलते." रात्रीचे नऊ वाजले होते आणि अक्षराच्या घरी गौरीच्या आईचा धास्तावलेल्या आवाजातला फोन आला.

"हॅलो काकू.. मी अक्षरा. काय झाल काकू?" अक्षराने फोन घेतला.

"अक्षरा, अग मी आत्ता मितालीला फोन केला होता. ती म्हणाली तू आणि गौरी एकत्र निघालात. मग गौरी तुझ्याकडे थांबली आहे का? अजुन ती घरी नाही आलेली." काकुंचा आवाज अस्वस्थ होता.

"असं कसं होईल काकु? अहो काकू उशीर झाला होता ना आम्हाला जुहुहून निघताना त्यामुळे आम्ही दोघींनी एकच रिक्षा केली. घरीच गेलेलं बर असं आम्ही ठरवलं. म्हणून मी रिक्षातून उतरले आणि गौरी तीच रिक्शा घेऊन पुढे गेली. आम्ही उद्या दुपारी भेटायचं ठरवलं आहे. काय झाल काकू?" अक्षरा गोंधळून गेली.

"ठीके... काही झाल नाही ग. पण तुला जर गौरीचा फोन आला तर तिला अगोदर मला फोन करायला सांग." असं म्हणून गौरीच्या आईने फोन ठेवला.

अक्षराचा फोन ठेवून गौरीची आई अस्वस्थपणे विचार करत बसली. कारण गौरी अजूनही घरी पोहोचली नव्हती. गौरीचे बाबा कधीचेच तिला शोधायला बाहेर पडले होते. शेवटी काही न सुचुन गौरीची आई पोलिस स्टेशनमधे गेली.
"अहो, माझी मुलगी अजुन घरी नाही आलेली. आजच 10वी ची परीक्षा झाली आणि सगळ्या मैत्रिणी जुहू बीचवर फिरायला गेल्या होत्या. तिने तिच्या मैत्रिणीला रिक्षाने सोडलं आणि ती पुढे गेली; असं तिची मैत्रीण म्हणते. पण माझी मुलगी घरी नाही हो आली." पोलीस स्टेशनला पोहोचल्या पोहोचल्या गौरीच्या आईने बोलायला सुरवात केली. ती फारच रडवेली झाली होती.

त्यांना बसवत आणि हातात पाण्याचा ग्लास देत एका पोलिस अधिकाऱ्याने विचारलं," कुठे रहाता तुम्ही? काय वय आहे तुमच्या मुलीचं?"
गौरीच्या आईने दिलेला ग्लास नाकारला आणि म्हणाली, "खार पूर्वेला. 16 वर्षाची आहे हो. गौरी नाव आहे. मी तिचा फोटोसुद्धा आणला आहे. हा बघा." आणि फोटो काढून दाखवला.

फोटो बघताच त्या पोलिस अधिकाऱ्याने गौरीच्या आईला विचारले,"रिक्षात होती का ती?"

"हो साहेब. तुम्हाला काही माहिती आहे का हो?" आता मात्र आईचा धीर सुटायला लागला होता. त्यांचे डोळे वाहायला लागले.

"अहो मॅडम असं रडु नका. तुमच्या मुलीचे वडील कुठे आहेत? हा घ्या फोन आणि त्यांना बोलवा बघू. काळजी करु नका. आपण शोधु तुमच्या मुलीला." पोलीस अधिकारी चांगला होता. त्याने गौरीच्या आईला बसायला सांगितलं आणि तिच्या हातात फोन दिला.

गौरीच्या आईने वडीलाना फोन केला. आपली पत्नी पोलीस स्टेशन मधून बोलते आहे आणि पोलिसांनी लग्गेच बोलावले आहे समजले तसे गौरीचे वडील धावत पळत पोलिस स्टेशनला पोहोचले. पोलीस अधिकारी त्यांना घेऊन बाजूला गेले. थोड्या वेळाने गौरीचे बाबा आईजवळ आले आणि म्हणाले,"विजया, एका रिक्षाचा संध्याकाळच्या वेळी आपल्या घराजवळच अपघात झाला आहे. रिक्षात एक मुलगी होती. साधारण आपल्या गौरीच्याच वयाची. असं हे साहेब म्हणत आहेत. तिला जवळच्याच् हॉस्पिटल मधे नेले आहे. चल आपण जाऊन बघू या."

हे ऐकून गौरीची आई मटकन खाली बसली. बाबांनी तिला हाताला धरून उठवलं आणि ते हॉस्पिटलच्या दिशेने निघाले.

या घटनेला आज तीन महीने झाले होते. गौरीचा रिजल्ट होता. पण तो घ्यायला गौरी जाऊ शकणार नव्हती. त्या अपघातामधे गौरीचे दोन्ही पाय निकामी झाले होते. तिच्या पायांमधली शक्तीच जणूकाही कोणीतरी काढून घेतली होती. ती कमरेखाली पूर्ण अधु झाली होती. खळ-खळ वाहणाऱ्या झऱ्यासारखी गौरी गंभीर डोहासारखी शांत झाली होती.

अगोदर सतत येणाऱ्या मित्र-मैत्रिणींचा ओघ रिजल्ट नंतर कमी झाला. सगळे आपापल्या पुढच्या मार्गाला लागले. गौरी त्या अपघातातून पूर्ण सावरली नव्हती आणि आता या नव्या परिस्थितीत पुढे काय करायचं याचा विचारही तिने केला नव्हता. तिच्या मित्र-मैत्रिणींचे गप्पांचे विषय आता बदलले आणि गौरीचा एकाकीपणा वाढला.

खूप दिवसांनंतर त्या दिवशी बाबा घरी आले ते एकदम उत्साहात. त्यांनी गौरीसाठी नवीन ड्रॉइंग बोर्ड आणला होता. गौरी तिच्या सोयीप्रमाणे तो पलंगावर उभा किंवा आडवा ठेऊ शकणार होती. पण तो बघुनही गौरी शांतच होती. रात्री जेवायची वेळ झाली होती. आई-बाबा अलीकडे तिच्या पलंगाजवळच जेवायला बसायचे. त्याप्रमाणे तिघे जेवायला बसले. त्यावेळी मात्र बाबांनी एक मोठी बातमी दिली.

"बेटा... मी माझी बदली करून घेतली आहे. आपण नाशिकला जातो आहोत." बाबांनी गौरीच्या मूडचा अंदाज घेत तिला सांगितले. हे एकताच मात्र गौरीचा चेहेरा बदलला. "खरंच बाबा? खूप बरं होईल हो. इथे न मला सारखं असहाय्य आणि एकटं वाटतं हो." गौरी अगदी मनापासून म्हणाली आणि खूप दिवसांनी तिच्या चेहेऱ्यावर हसू फुटलं. तिला हसताना बघून गौरीच्या आईचे डोळे भरून आले. तिने गौरीला जवळ घेतलं.

नाशिकचं घर खरंच खूप सुंदर होतं. पण गावाच्या एका बाजूला. शेवटच घर होते ते. जरी हे घर शेवटचं होत तरी आजूबाजूला भरपूर वस्ती होती. हे घर म्हणजे एक इटुकली बंगली होती ती. एक हॉल, दोन बेड रूम्स, हॉल, स्वयंपाक घर. एक लहानशी सामान साठवण्याची खोली. बस्.. मात्र घराला मोठ्या मोठ्या खिड़क्या होत्या. पुढे एक मोठासा व्हरांडा होता आणि छानसं आवार होतं, पण मागे वेगळं असं आवार मात्र नव्हतं. मास्टर बैडरूम घराच्या मागिल अंगाला होती. गौरीने स्वतःसाठी मास्टर बेडरूम निवडली. कारण खिड़कीला अगदी लागुनच मोठ्ठ मैदान होतं. संध्याकाळी त्या मैदानावर मुलं खेळायला येत असतील असा विचार करून गौरीने स्वतःसाठी मास्टर बेडरूम मागून घेतली होती. मैदानात खेळणाऱ्या मुलांना बघत संध्याकाळचा वेळ चांगला जाईल असा विचार तिने केला होता. तिची खोली अगदी तिच्या सोयीप्रमाणे तिने लावून घेतली. तिची कॉट मोठ्या खिड़कीच्या शेजारी ठेवली गेली. तिचा हात पोहोचेल असा तिचा नविन ड्रॉइंग बोर्ड ठेवला होता.

गौरीला आणि तिच्या आई-बाबांना तिथे रहायला लागून आठ दिवस झाले होते. खिडकी समोरचं मैदान मोठं आणि झाडांची मस्त सावली असलेलं असूनही गौरीला तिथे कोणी खेळायला आलेलं अजून तरी दिसलं नव्हतं. त्यामुळे गौरी थोड़ी हिरमुसली होती. नवीन जागा असल्याने तिची कोणाशी ओळख झाली नव्हती. त्यात गौरी आपणहून कुठेही बाहेर पडू शकत नव्हती. त्यामुळे तिला त्या मैदानाचा खूपच दिलासा वाटला होता सुरवातीला. मात्र त्या मैदानामध्ये कधीच कोणीही खेळायला येत नाही हे पाहून तिला फारच वाईट वाटायला लागलं होतं. तिने आईला सांगून आजू-बाजूला चौकशी करायला लावली की त्या मैदानावर कोणी खेळायला का येत नाही. एक दोघांनी सांगितलं की तसं काही कारण नाही तिथे न जाण्याचं... पण त्या बाजूला गेलं की मुलं अस्वस्थ होतात असा इथल्या लोकांचा अनुभव आहे; म्हणून तिथे जाण्याचं सगळे टाळतात आणि मुलांना सक्त ताकीद आहे की तिथे एकटं अजिबात जायचं नाही. सवयीचं नसल्याने मुलं देखील त्या मैदानात जात नाहीत. हे समजल्यावर मात्र गौरी अजूनच हिरमुसली.

असेच एक-दोन दिवस गेले. त्यादिवशी गौरीचा मूड तसा चांगला होता. त्यामुळे ती तिच्या चित्रकलेचा जामाजीमा उघडून चित्र काढत बसली होती. संध्याकाळचे पाच वाजले होते. पण तसा छान उजेड होता. गौरीच्या वडिलांना यायला अजून वेळ होता. घरातल्या काही वस्तू संपल्या होत्या म्हणून त्या आणायला गौरीची आई तिला सांगून कोपऱ्यावरच्या वाण्याकडे गेली होती. आणि अचानक गौरीला त्या मैदानाच्या बाजूने बऱ्याच मुलांचा आवाज ऐकायला आला. तिने आश्चर्याने त्या दिशेने नजर वळवली.

त्याबाजूला बघताच गौरीचे डोळे विस्फारले गेले. कारण अगदी अचानक ते मैदान जीवंत झालं होतं. तिथे खूपशी मूलं वेगवेगळे खेळ खेळताना दिसत होती. काही मोठी माणसं एका बाजूला रांगेने लावलेल्या बाकड्यांवर बसून गप्पा मारत होती. अगदी जिवंत झाल होत ते मैदान. जणू काही जमिनीतून उगवले होते ते सर्वजण. गौरी मंत्रमुग्ध होऊन तो जीवंत नजारा बघत होती. हळू-हळू अंधार पडायला लागला; मूलं एक-एक करून घरी जायला लागली. मोठी माणसं देखील उठून जायला निघालेली गौरीला दिसली. बहुतेक तास-दिड तास गौरीची तन्द्रि लागली होती, अस तिला वाटलं.
तेवढ्यात गौरीच्या आईने तिला हाक मारली. "गौरी.. सॉरी ह बेटा... थोडा उशीर झाला यायला. शेजारच्या मावशी भेटल्या त्यांच्याशी बोलत होते. कंटाळली नाहीस न?"

आईच्या हाकेने गौरीने वळून दाराकडे बघितले. आई हसत आत येत होती. "अग आई अज्जिब्बात कंटाळले नाही. अग, इथे ये. गम्मत बघ. आज मैदानावर अचानक जत्रा भरली आहे बघ." गौरीचा आवाज एकदम आनंदी होता.
तिची आई आश्चर्याने आणि उत्सुकतेने पुढे आली. तिने आणि गौरीने वळून एकत्रच मैदानाच्या दिशेने बघितले. आणि...... तिथे तेच ते मैदाना होते... भरपूर झाडांची सावली असलेले पण तरीही शांत आणि रिकामे!
गौरीचे डोळे आश्चर्याने विस्फारले गेले.

"अग आई... आत्ता... तू हाकमारेपर्यंत माझी नजर त्या मैदानावरच खिळलेली होती. अग काही सेकंदांपूर्वी इथे खूपशी मूलं खेळत होती. मोठी माणसं तिथे त्या बाजूला असलेल्या बाकड्यांवर बसली होती." गौरीच्या आवाजात आश्चर्य आणि अविश्वास होता. आपल्याला भास झाला की काय असा विचार तिच्या मनाला चाटून गेला.

"पण बेटा... आत्ता तरी तिथे असं काहीच दिसत नाही मला. अग तुला भास झाला असेल. मी फ़क्त अर्ध्या तासासाठी गेले होते ग. तू म्हणजे ना.. तुला झोप लागली असेल आणि स्वप्न पड़लं असेल..." आईने गौरीच्याच मनातला विचार बोलून दाखवला. त्यामुळे गौरी थोडी शांत झाली.

"अ........हम....असेलही....." ती थोड़ी गोंधळून गेली होती. एकीकडे तिला वाटत होतं की तो भास नाही तर खरंच आपण त्या मैदानावर खूपशी मुलं आणि मोठी माणसं बघितली. आणि त्याचवेळी ते क्षणात रिकामं झालेलं मैदान बघून आपल्यला भासच झाला असावा अस वाटत होतं. या विचारांच्या गोंधळामुळे गौरीचा चेहेरा अगदी उतरून गेला. तिचा उतरलेला चेहेरा बघून तिच्या आईला देखील वाईट वाटलं. तिच्या डोक्यावरून हात फिरवत तिची आई म्हणाली,"बरं ग बेटा... जर तू आज तिथे इतकी मूलं बघितली आहेस तर मग ती मूलं उद्या पण येणारंच न? मग उद्या बघू आपण. चल तुझी व्ययामाची वेळ झाली." गौरीने देखील मनातला उदासपणा बाजूला ठेवत आईच्या मदतीने व्यायाम करायला सुरवात केली.

क्रमश:

Friday, July 10, 2020

प्रेमाची भाषा

प्रेमाची भाषा


प्रेमाची दोघांचीच अशी भाषा असते...
झुकलेल्या पापण्यात ती रुजवायची असते...
शब्दांशिवाय हृदयात उतरवायची असते...
प्रेमाच्या हितगुजात घोळवायची असते!

ती कधी कविता होऊन शब्दात विरघळते...
कधी गुलजार.. कधी जगजीत.. कधी मेहँदी हसन बनते;
लता-आशाच्या गळयातुन... ए. आर. रेहेमानच्या संगीतातुन...
घरंगळते,  मोहवते; दोघांचं हितगुज दोघांना सांगते!

प्रेमाची भाषा स्पर्शातुन देखील फुलते;
भावनांचे खत-पाणी मात्र तिला लागते...
रुजुन, बहरुन, मग ती उमलते....
दोघांचे हितगुज दोघांना सांगते!

Friday, July 3, 2020

गुपीत (कविता)


गुपीत


पैंजण पावलांच्या
या ओल्या संध्याकाळी...
हुरहूर मज हृदयाची;
ती वाढवून गेली....


गंभीर खोल सागराची...
उर्मी उचंबळलेली...
सरिते तुझ्या स्पर्शाने...
तगमगून अजून गेली....


अलवार तारुण्य तिचे...
मिठीत सामावले...
अन् वर्षेतील दाहाचे...
मज गुपीत उलगडले......