Friday, April 30, 2021

हंपी... एक अनुभव (भाग 3)

 हंपी.... एक अनुभव (बॅग 3)


विजयनगर ही राजा कृष्णदेवराय यांची राजधानी होती. सहाजिकच महाराजांच्या इतमामाला शोभेल असाच तामझाम इथे पाहावयास मिळतो. अर्थात हे म्हणत असताना एक सत्य विसरणे शक्यच नाही की माहाराज कृष्णदेवराय अत्यंत सृजनशील राजे होते. त्यांना केवळ उत्तम स्थापत्य निर्माणाची आवड होती असं नसून ते सर्वच क्रीडाप्राकारांचे भोक्ते होते. याची कितीतरी उदाहरणं जागोजागी दिसून येतात. मागील भागामध्ये मी ज्या पुष्कर्णी उल्लेख केला आहे त्या पुष्कर्णीच्या बाजूलाच एक अत्यंत मोठा तरण तलाव निर्माण केला आहे. आजच्या भाषेत सांगायचं तर आंतरराष्ट्रीय तरण स्पर्धेसाठी अत्यंत योग्य असा हा तरण तलाव आहे. ऐंशी फूट लांब आणि किमान पस्तीस/चाळीस फूट रुंद असा हा तरण तलाव आहे. त्याच्या दोन्ही बाजुंना बसण्याची सोय आहे. बहुतेक स्वतः महाराज कृष्णदेवराय देखील या तरण तलावात होणाऱ्या स्पर्धांना भेट देत असावेत. कारण या तरण तलावाच्या एका बाजूला दगडी घुमत असलेली मेघडंबरी आहे. एका नजरेत न मावणारा विस्तार आहे या तलावाचा.

तरण तलावाजवळील मेघडंबरी


तरण तलावाची माहाराज बसत असलेली बाजू


या फोटो वरून तरण तलावाचा अंदाज येऊ शकतो


तरण तलावाच्या एका बाजूला पुष्कर्णी आहे आणि त्याच्या पुढेच माहाराजांच्या नागरिकांसाठी भरणाऱ्या दरबाराचा उंचवटा येतो. (हे इतकं मोठं वाक्य लिहिताना या राजदरबारासाठी एक उल्लेख मनात आला. 'दीवणे-आम'. पण मग मनात आलं हा काही आपल्या शब्दकोशातील शब्द नाही. मग थोडं मोठं वाक्य होईल... पण नागरिकांसाठी भरणाऱ्या दरबाराचा उंचवटा.... असं म्हणणंच जास्त योग्य होईल! असो!) माझ्या गाईडने मला सांगितलं की महाराज कृष्णदेवराय ठराविक दिवशी सर्वसामान्यांसाठी म्हणून खास दरबार भरवायचे. यावेळी माहाराज एका उच्चासनावार बसत असत. त्यामागे दोन कारणं होती... अर्थात पहिलं कारण माहाराजांची सुरक्षा हे होतं आणि दुसरं कारण ऐकून माझा कृष्णदेवराय माहाराजांबद्दलचा मनातील आदर खूपच वाढला. ते कारण म्हणजे.... या उच्चसनावरून माहाराजांना समजू शकत असे की नक्की किती लोक त्यांना भेटण्यासाठी आले आहेत. त्यामूळे दारवान किंवा शिपाई किंवा कोणी अधिकारी जर कोणा नागरिकाला थांबवत असेल तर ते महाराजांना दिसत असे आणि ते असं होऊ देत नसत. किती वेगळा विचार करणारा राजा होता तो.... 'जेव्हा मी माझ्या रयतेचं गाऱ्हाणं ऐकण्यासाठी वेळ काढीन त्यावेळी सर्वांचं म्हणणं पूर्ण होईपर्यंत मी तिथे उपस्थित राहीन.' कदाचित म्हणूनच अगदी नेपाळ-भूतान पर्यंत महाराज कृष्णदेवरायांनी युद्ध मजल मारली आणि त्यांच्या सोबत त्यांचं सैन्य कायम राहिलं. 


महाराजांचे उच्चसन



माहाराजांच्या नागरिकांना भेटण्यासाठी असलेल्या उच्चसनावरून दिसणारा संपूर्ण भाग. इथून होळी समारंभासाठी बांधलेला चौथरा देखील दिसतो आहे. 


महाराजांच्या नागरी दरबाराच्या चौथऱ्यावरून दिसणारा ऐकूण भाग.

पुढच्या एका अत्यंत सुंदर आणि कौतुकास्पद भुयाराबद्दल सांगण्या अगोदर एक खूपच महत्वाच्या स्थापत्य निर्माणाबद्दल सांगण आवश्यक आहे. त्याकाळातील स्थापत्य विशारदांचं कौतुक करू तितकं कमीच. किंबहुना मी तर म्हणेन की आपली लायकीच नाही त्या अत्यंत विचारी आणि समयोचित नियोजन करण्याचं सामर्थ्य असलेल्या लोकांचं कौतुक करण्याची. त्यांनी निर्माण केलेले स्थापत्य आपण बघावं आणि तोंडात बोट घालून गप बसावं इतकंच काय ते आपलं कर्तृत्व असू शकतं. तर...

महाराज कृष्णदेवराय यांचा राज परिवार सामावणारा परिसर अत्यंत मोठा आणि दूरवर पसरलेला आहे हे आतापर्यंत तुमच्या लक्षात आलंच असेल. या अतिप्रचंड भागामध्ये राज परिवार आणि त्यासोबत त्यांच्या सेवेसाठी असणाऱ्या सर्वांसाठी विविध सोयी तर केल्या तरी सर्वात महत्वाची आणि अत्यावश्यक सोय म्हणजे पाणी. अचंबित करणारी गोष्ट म्हणजे या संपूर्ण परिसराला योग्य प्रकारे पाणीपुरवठा होईल अशाप्रकारचे दगडी चर संपूर्ण परिसरात फिरवलेले आहेत. तरण तलावात पडणारे पाणी असो किंवा पुष्कर्णीमध्ये जाणारे पाणी असो... महाराजांच्या राज महालाचे आता फार अवशेष उरले नसले तरीही त्याठिकाणी पाणी पुरवठा करणारे कालवे अजूनही शाबूत आहेत. खरंच हे निर्माण करणं फारच अवघड आहे. या पाणीपुरवठयाचा विचार किती खोलवर केला असेल हे देखील समजून घेण्यात मजा आहे. माहाराजांच्या राजपरिवरासाठी निवडण्यात आलेल्या जागेच्या थोड्या दुरावरून नदी वाहाते. नदीच्या पात्राच्या उताराचा अभ्यास करून पाण्याच्या दबाव तंत्राचा वापर करून राजपरिवर जागेपासून काही अंतरावर दोन तलाव बांधण्यात आले आहेत. हे तलाव दगडाचे असले तरी यामध्ये नैसर्गिक झरे येऊन मिळतात. या तलावांपासून एक मोठा कालवा तयार करून तो राजपरिवार जागेपर्यंत आणण्यात आला आहे. संपूर्ण जागेवरून हा कालवा फिरवल्या नंतर त्याचा उतार एका अशा बाजूला निर्माण केला आहे की जिथे त्याकाळात राज परिवाराव्यतिरिक्तच्या लोकांसाठी अन्न शिजवलं जात असे. (माहाराज कृष्णदेवराय यांना भेटण्यासाठी अनेक राजे-माहाराज येत असत. त्यांच्या सोबत त्यांचा लावाजमा असे. त्यांच्यासाठी अन्न बनवले जात असे ती जागा). तिथून हा कालवा अजून पुढे देखील जातो आणि मग हळू हळू जमिनीला समांतर जात अजून एका मानव निर्मित तलावात त्याचे पाणी सोडलेले आढळते. जिथे तो कालवा जमिनीला समांतर जातो त्याच्या दोन्ही बाजुंनी दगडात कोरलेली जेवायची ताटं आहेत. काही केळीच्या पानांच्या आकाराची तर काही नुसती आयताकृती. वट्यांसाठीचे खड्डे देखील आहेत त्यात. या ताटांमधून देखील नादनिर्मिती होते.



विविध आकारांमधील ताटे आणि उजव्या बाजूला असणारा खड्डा म्हणजे कालवा






पुढचा विडिओ नक्की बघा हं. एका कृत्रिम तलावाखाली तयार केलेली खोली आहे. सहज बघितलं तर राज परिवारासाठी तयार केलेला पाण्याचा साठा. मात्र खाली एक महत्वाच्या व्यक्तींसोबत खलबतं करण्याची खोली. यातील अत्यंत महत्वाचा भाग म्हणजे वरती पाणी असल्याने खालील चर्चा इच्छा असूनही कोणालाही ऐकायला येणे शक्य नाही. (हा खलबतखाना बघताना मला शिवरायांची आठवण झाली. अनेक गड आणि किल्ले बघितले आहेत मी आजवर. त्यापैकीच कोणत्यशा गडावर शिवाजी माहाराजांनी देखील असाच काहीसा खलबतखाना तयार करून घेतला होता; तो बघितल्याचं आठवत मला. पण कोणता किल्ला आणि कधी बघितलं आहे ते मात्र आता आठवत नाही. अर्थात इथे एक इंग्रजी म्हण चपखल बसते असं वाटतं... All great people think alike.)



या चोर खोलीच्या पुढेच महाराज कृष्णदेवराय यांचा कला दरबार भरत असे. इथे एक मोठा चौथरा आहे. चार फूट उंच असा. याच्या चारही बाजूंनी बसता येईल अशी सोय असल्याचं दिसतं. चारही बाजूनी या चौथऱ्यावर चढता येतं. या जिन्यांच्या दोन्ही बाजूंना हत्ती आहेत आणि या हत्तींच्या कानांना भोकं आहेत. त्याशिवाय चौथऱ्याच्या प्रत्येक कोणाकडे देखील भोक आहे. माझा गाईड सांगत होता की या चौथऱ्याच्या मध्यावर एक सुंदर रंगीत तलम कापडांनी सजवलेला प्रचंड उंच बांबू उभारला जायचा. त्या कापडांची दुसरी टोकं या हत्ती आणि इतर चार कोनांमधील भोकांमधून घालून एक सुंदर आणि वेगळी सजावट केली जात असे. या चौथऱ्यावर कला प्रदर्शन करण्यासाठी परदेशातून नामवंत कलाकार येत असत. त्याशिवाय महाराज कृष्णदेवराय यांच्या पदरी देखील अनेक अलौकिक नृत्यांगना होत्या. यांची कला देखील या चौथऱ्यावर प्रदर्शित होत असे. राजा कृष्णदेवराय यांचे वेगळेपण असे की ज्याप्रमाणे राज परिवारासाठी किंवा येणाऱ्या पाहुण्यांसाठी असे कार्यक्रम आयोजित होत; त्याचप्रमाणे आम जनतेसाठी देखील असे कला प्रदर्शनाचे कार्यक्रम होत असत. त्यात देखील अजून एक वेगळी बाजू म्हणजे जर महाराजांच्या जनतेमधून आयत्यावेळी कोणी पुढे येऊन स्वतःची कला सादर करण्याची इच्छा व्यक्त केली तर माहाराज ही इच्छा देखील पूर्ण करत असत.




                                    कला दरबार चौथऱ्यावरून काढलेला फोटो. दूरवर महानवमी चौथरा दिसतो आहे


                                                         चौथऱ्याच्या बाजूच्या भोकांचा विडिओ

दंडनायकाचा बुरुज नावाचा एक बुरुज आहे कमल महालाजवळ. अशी वदंता आहे की कृष्णदेवराय माहाराज स्वारीवर जात असत त्यावेळी त्यांचा स्त्रीपरिवर या कमल महाल आणि परिसरात राहायला येत असे. त्यावेळी त्यांच्या सुरक्षिततेसाठी हा दंडनायकाचा बुरुज बांधलेला होता. केवळ या बुरुजावर काही पुरुष पाहरेकरी ठेवले जात. बाक आतील बाजूस केवळ महिला पाहारेकरी आणि दासी असत.



                                                                          दंडनायकाचा बुरुज

कृष्णदेवराय माहाराजांची गजशाला खरच पाहण्यासारखी आहे. माहाराजांच्या प्रमुख अकरा हत्तींना राहण्यासाठी बनवलेली ही गजशाला अजूनही अत्यंत सुंदर आणि सुस्थितीत आहे. हत्तीच्या एका दालनातून दुसऱ्या दालनात जाण्यासाठी आतून लहान दरवाजे देखील आहेत. प्रत्येक दळणाला वर गोल घुमट आहे आणि घुमटाखाली लोखानदी हुक आहे. यांच्या आधारे दोरखंडांनी हत्तींना बांधून ठेवत असत. गजशालेच्या एका बाजूला अजून एक इमारत दिसते. ती देखील अजूनही उत्तम स्थितीत आहे. मात्र आता लोखंडी गेट्स बसवून ती बंद केली आहे. इथे पाहारेकरी आणि माहुतांचे वसतिस्थान असावे. 


सुस्थितीत असलेली गजशाला


माहुतांचे निवासस्थान


गजशाला


                                        हत्तीच्या एका दालनातून दुसऱ्या दालनात जाताना मध्ये लहान दरवाजे आहेत

राजा कृष्णदेवराय यांच्या राज परिवारासाठी तयार केलेला परिसर वरील फोटोंमधून आपल्याला दिसलाच असेल. या हजारो एकरांवर पसरलेल्या महाराजांच्या राहण्याच्या जागेबरोबरच; विविध सण-समारंभ किंवा कला प्रदर्शनासाठी तयार केलेल्या विविध वस्तूंच्या चोहोबाजूंनी एक कणखर तटबंदी होती. परंतु दुर्दैवाने काळाच्या ओघात ती नष्ट झाली आहे. मात्र या तटबंदीच्या मधोमध एका अखंड शिळेतून बनवलेला दरवाजा मात्र अजूनही एका बाजूस ठेवलेला दिसतो. कदाचित फोटोमधून त्या अजस्त्र दरवाजाचा अंदाज पूर्ण येणार नाही. पण थोडी तरी कल्पना करू शकाल तुम्ही म्हणून हा फोटो देखील इथे देते आहे.





पुरातन काळातील स्थापत्य शैलीचं कौतुक करावं तितकं कमीच म्हणता येईल. महाराज कृष्णदेवराय यांनी त्यांच्या राजकुळातील स्त्रियांसाठी विविध वैशिष्ट्यांनी सजवलेले स्नानगृह देखील निर्माण करवले होते. या स्नानगृहाला वरून गोपुराचा आकार दिला गेला आहे. मध्यभागी तलाव निर्माण करून त्यात दगडी पन्हाळीमधून पाणी सोडण्याची सोय केली आहे. कौतुकाचा भाग हा की या तलावातील वापरलेले पाणी वेगळ्या पन्हाळीमधून बाहेर काढून ते सभोवतालच्या बगीचाला पुरवले जाईल अशाप्रकारे सोय केली आहे. कितीतरी खोल विचार केला आहे हे स्नानगृह बांधताना. स्नानगृहातील तलावाच्या चारही बाजूनी व्हरांडा आहे आणि त्याला तलावाच्या बाजूने झरोके देखील केले आहेत. कोपऱ्यांमधून स्नानगृहाच्या वरील गच्ची सदृश भागात जाण्यासाठी जिने आहेत. परंतु ते आता बंद करून टाकले आहेत. माझ्या गाईडने सांगितले की लहानपणी इथे सर्व मुलं लपाछपी खेळण्यास येत असत. कधीतरी पुढे वास्तुशास्त्र तज्ञ आले आणि मग लहान मुलांसाठी खेळण्याची एक जागा बंद झाली.





हंपीमध्ये आलात आणि सूर्योदयाचं नयनमनोहर दृष्य बघितलं नाहीत असं नक्की करू नका. हजारराम मंदिराच्या जवळच लहानशी टेकटी आहे. तिथे थोडं चढून गेलं की दगडी कुटी आहे. कदाचित पूर्वकाळातील साधू-संतांच्या राहण्यासाठी आणि तपश्चर्येसाठी तयार केलेल्या त्या परिसरातील अनेक कुटींमधली ही कुटी असावी. तर अगदी अंधार असताना या कुटीच्याही वर चढून जाऊन बसावं लागतं. एक लांबलचक वाट बघण्याची वेळ... पण मग ते लवकर उठणं, ते धडपडत वरपर्यंत चढून जाणं आणि ते वाट बघणं खरंच फळतं.... केशररंग घेऊन सामोरा येणाऱ्या आदिनारायणाचं ते शुचिर्भूत दर्शन पुढचे अनेक दिवस मन प्रसन्न ठेवायला पुरेसं ठरतं.


त्या आदित्यनारायणाची वाट पाहताना


हजारराम मंदिर आणि एकूण परिसर



माझ्या मोबाईलच्या कॅमेऱ्यामधून घेतलेला विडिओ


दिनकराला वंदन करून खाली उतराल तर समोरच हजारराम मंदिर म्हणून ओळखलं जाणारं रामाचं मंदिर दिसतं. या मंदिराचं विशेष म्हणजे असं मानतात की रावणाने सितामातेचे हरण केल्यानंतर ज्यावेळी श्रीराम आणि लक्ष्मण सितामातेला शोधायला निघाले त्यावेळी त्यांनी याठिकाणी काहीकाळ विश्रांती घेतली होती. मंदिराच्या आवारामध्ये एक प्रचंड मोठा सभामंडप आहे. या सभामंडपाचं विशेष म्हणजे या सभांमंडपामध्ये कोरलेली शिल्पे ही रामायण काळातील कथांवर आधारित असली तरी या शिल्पांचे चेहेरे प्रचंड भिन्न आहेत. काही चेहेरे हे नेपाळ-भूतान येथील लोकांसारखे आहेत; तर काहींचे चेहेरे लांबाकृती आहेत. या मंदिराच्या आजूबाजूला अनेक कुटी असल्याचं मी म्हंटलंच आहे. मला वाटतं कदाचित या मंदिरामध्ये शिल्पकला शिकण्यासाठी येणारे दूरदेशीचे विद्यार्थी राहात असतील. आपल्या शिक्षकांनी शिकवलेली विद्या येथील सभामंडपातील खांबांवर ते कोरत असतील. मात्र आपल्या देशाची किंवा जेथून आलो तिथली ओळख या ठिकाणी राहावी या उद्देशाने कथा गुरूंनी सांगितल्याप्रमाणे कोरली तरी त्यातील चेहेरेपट्टी आपल्या देशाची निर्माण करत असतील. 




कर्नाटकातलं हे हंपी म्हणजेच राजा कृष्णदेवराय यांचं विजयनगर किंवा रामायण काळातील किष्किंदा नगरी म्हणजे निसर्ग आणि पुरातन स्थापत्याने नटलेलं गाव/शहर. तुम्ही जितकं फिराल तितकं कमीच. आपापल्या आवडीनुसार किती दिवस जायचं ते प्रत्येकाने ठरवावं. माझ्याबद्दल सांगायचं तर सानापूर मधल्या home stay मध्ये काहीही न करता मी आठवडाभर राहूच शकते. रोज उठून नदीवर जायचं आणि खळाळत पाणी बघत राहायचं. जमलंच तर गावातल्या पोरांबरोबर मासे पकडायचे. दहा मिनिटात फिरून संपणाऱ्या गावात फिरायचं.... आणि मग पुरातन वारसा लाभलेलं जगाच्या नकाशावर ठळकपणे दिसणारं हंपी बघायला निघायचं. अर्थात या संपूर्ण वर्णनामध्ये इथल्या कर्नाटकी जेवणाचा उल्लेख मी केला नाही... तुम्हाला असं तर नाही ना वाटलं की मी न खाता-पिता फिरत होते. असं मुळीच नाही हं. इथले लोक खाण्याच्या बाबतीत प्रचंड हौशी आहेत. विरुपाक्ष मंदिराच्या जवळच एक अत्यंत स्वच्छ आणि सुंदर खानावळ आहे. तिथलं जेवण अप्रतिम आहे. एकदम कर्नाटकी पध्दतीचं. मी माझ्या गाईडला आग्रहपूर्वक सांगितलं होतं की मला रोज इथल्या सर्वसाधारण ढाब्यावर जाऊन जेवायचं आहे. दोन वेळा तर आम्ही एकशे पंचवीस रुपये प्रत्येकी भरून बुफेमध्ये जेवलो. भरपूर भात... मग तो एकदा सांबार बरोबर, एकदा रस्सम बरोबर, मग भाजी बरोबर आणि शेवटी दही-दुधाबरोबर खायचा असतो. गोड म्हणून इथे खीर देतात. इथली थंड पेय देखील अगदी खास... एक तर ताक; साधं किंवा मसाला घातलेलं. दुसरं पोटासाठी अत्यंत उत्तम असं पुदीना सरबत. इथले ढाबे अत्यंत स्वच्छ आणि भारतीय बैठकी असलेले आहेत. अर्थात ज्यांना खाली बसता येत नाही त्यांच्यासाठी टेबल-खुर्ची अशी सोय देखील आहेच.


विरुपाक्ष मंदिराजवळील ढाबा


मँगो ढाब्यामधील टेबल खुर्ची बैठक


मँगो ढाब्यामधील भारतीय बैठक


थंडगार ताक


कर्नाटकी शाकाहारी जेवण. विरुपाक्ष मंदिर जवळ असल्याने इथे मांसाहार वर्ज आहे. मात्र थाळी unlimited



गावातील ढाबा भारतीय बैठक


जेवणाची सुरवात साडेबारा नंतर होते. त्याची तयारी अगोदर करण्यात येते


भातासोबतची थाळी


गावातील ढाब्यावर मांसाहार मिळतो


पोळी सोबतची थाळी


पुदिना सरबत


हंपी बद्दल इथे मी जरी लिहिलं असलं तरी हंपी पाहणं हा एक खरंच अनुभव आहे आणि प्रामाणिकपणे सांगायचं तर तो अनुभव एकट्याने घेण्यात खरी मजा आहे. म्हणजे तुम्ही तुमच्या आवडीच्या ठिकाणी जरी थोडा जास्त वेळ थांबलात तरी चल-चल म्हणून कटकट करणारं कोणी नसतं. माझं मत विचाराल तर हंपीमधला निसर्ग फक्त डोळ्यात नाही तर मनात साठवून घ्या. इतक्या सहज नदीच्या किनाऱ्यावर जाऊन बसता येण्याचं सुख आता भारतात फारसं उरलं नाही. एकतर भडभुंजे मागे लागतात नाहीतर काही न काही विकायला येणारे लोक असतात. तुंगभद्रेचा किनारा अजूनही अशा दृष्टीकोनातून अस्पर्श आहे. इथे अजूनही शांतता आणि पक्षांची किलबिल आहे. एक अजून अनाहूत सल्ला. इथल्या नदीकिनारी बसताना कोणतंही गाणं नका हं लावू... मला देखील आशा-किशोर-लता-मन्ना डे आणि सगळेच जवळ घेऊन बसावंस वाटलं होतं पहिल्या दिवशी. पण मग लक्षात आलं की मी गाण्याच्या शब्दांमध्ये हरवते आहे.... समोर पसरलेल्या या प्राकृतात नाही.... आणि मग फक्त आणि फक्त हंपी जगायचं ठरवून फिरायला बाहेर पडले.

जाता जाता.... हा माझा लेख वाचून जर हंपीला जाणं ठरवलंत आणि खरंच गेलात तर नक्की कळवा हं मला.

अच्छा!!!!


#निसर्गसुंदर आणि #ऐतिहासिक_वारसा लाभलेलं #कर्नाटक मधील #हंपी म्हणजे #सर्वार्थाने #नेत्रसुख देणारं #गाव  याच हंपीचा माझ्या कॅमेऱ्यातून घेतलेला आढावा! #sanapur #hampi #humpi #introducing #hampitourism  through my #videocapture hope #everyone will #likeit  #hampifocus #ancient #scalptures #architecturephotography #beautifulhampi #beautifulnature #homestays #peace_in_nature #realworld #loveyourhistory #indianhistoryvideos #ancientindia






























Friday, April 23, 2021

हंपी.... एक अनुभव (भाग 2)

 हंपी... भाग अनुभव (भाग 2)


हंपी तुंगभद्रा नदी किनारी वसलेलं एक गाव आहे. खरं सांगू.... हंपीचा उल्लेख गाव म्हणून करताना माझं मन तुटतं आहे. चाळीस ते पन्नास किलोमीटर परिसरात उभे असलेले महाल, मोठमोठी मंदिरे, स्थापत्याचा अद्भुत नमुना म्हणावा अशा दगडी कमानी, स्नानकुंडे, जिकडे नजर फिरवाल तिथे असंख्य टेकड्यांमधून दिसणारे छोटे छोटे मंडप, मंदिरांच्या बाहेर असणाऱ्या एक मजली-दुमजली बाजारपेठा.... इतकं समृद्ध स्थापत्य असलेला भाग हा गाव कसं असेल? पण आपलं दुर्दैव की आता हे फक्त भग्नावस्थेतले ऐतिहासिक स्त्यापत्य सौंदर्य आहे. मात्र प्रत्येकवेळी मनात एकच विचार येतो.... हा आपल्या भारतवर्षातील सुवर्णकाळाचा भव्यदिव्य साक्षात्कार आहे.

इ. स. 1336 ते 1565 मधील विजयनगर म्हणजे बलाढ्य हिंदू साम्राज्य जे महाराज कृष्णदेवराय यांनी सुवर्ण कळसाला पोहोचवलं. मात्र हंपीचा इतिहास हा त्याहूनही मागचा आहे. अगदी त्रेतायुगातील रामायण काळातला. इथे मला एक थोडा वेगळा मुद्दा अधोरेखित करायचा आहे.

माझा विश्वास आहे की आपण श्री भागवत रामायण ज्याला पौराणिक कथा मानतो आणि त्यामध्ये वर्णन केलेल्या व्यक्तिमत्वांना देव किंवा दानव या दोन श्रेणींमध्ये विभागतो ते चूक आहे. रामायण काही पौराणिक कथा नाही.... तो आपला गौरवशाली इतिहास आहे. अनेक उदाहरणं आहेत आपल्याकडे या सत्याला दुजोरा देणारी. अगदी अलीकडंच उदाहरणच सांगायचं तर श्रीराम जन्मभूमी येथील श्रीरामजन्म स्थळ हे खरेच असल्याचे पुरावे आदरणीय कोर्टाने देखील मान्य केले आहेत. त्याचप्रमाणे श्रीलंका आणि भारत यामधील रामायण काळात बांधल्या गेलेल्या पुलाचे काही भग्न अवशेष अजूनही अस्तित्वात आहेत. त्यामुळे..... हंपीचा इतिहास हा कृष्णदेवराय यांच्याहूनही मागील काळातला म्हणजे अगदी रामायण काळातला आहे.... हे सत्य आहे.

रामायणातील उल्लेखा प्रमाणे वानरराज सुग्रीव यांची नगरी होती किष्किंधा. जी तुंगभद्रा (त्रेतायुगात या नदीचे नाव पंपा नदी होते) नदीच्या जवळ वसलेली होती. रामायण काळातील ऋष्यमूक पर्वताचा उल्लेख श्रीराम आणि लक्ष्मणाने राहण्यासाठी वापरलेला पर्वत असा आहे. तो पर्वत देखील किष्किंधे जवळ असल्याचा आहे आणि विजयनगर साम्राज्याचा मानबिंदू असलेल्या विरुपाक्ष मंदिराच्या जवळच एक पर्वत होता ज्याचा उल्लेख ऋष्यमूक म्हणूनच केलेला लिखित स्वरूपात आढळतो. त्रेता युगातील पंपा नगरी म्हणून ओळखली ही नगरी पुढे आपभ्रंशीत होऊन हंपी म्हणून ओळखली जायला लागली; अशी देखील मान्यता आहे. तर असं हे आजचं हंपी गाव आणि आपल्या सुवर्ण काळातील एक सर्वांग श्रीमंत शहर पाहण्यासाठी मी निघाले होते.

आपण सुरवात वरती उल्लेख केलेल्या विरुपाक्ष मंदिरापासूनच करूया.

विरुपाक्ष मंदिर हे श्रीमहादेवाचे मंदिर आहे. येथील रहिवासी विरुपाक्ष महादेवांना पांपापति या नावाने देखील उल्लेखताट. या देवालयाच्या स्थापत्य सौंदर्याबद्दल वर्णन करायला मला शब्द कमी पडतील आणि तुम्हाला कधी गेलात तर बघायला वेळ कमी पडेल... इतकं हे देवालय अप्रतिम सुंदर आणि अत्यंत कल्पकतेने वातावरणातील नैसर्गिक बदल आणि त्याचा होणारा स्त्यापत्यावरील परिणाम याचा विचार करून बनवलेले आहे. विरपाक्ष मंदिराच्या दरवाजावरील नक्षीकाम अजोड आहे. आजच्या काळातील कलाकारांचा पूर्ण मान राखत मी म्हणेन की अनेकविध आयुधं उपलब्ध असूनही त्यांना इतकं सुंदर नक्षीकाम जमणार नाही. मंदिराच्या बाहेर प्रचंड मोठी बाजारपेठ आहे. आज जरी ती भग्नावस्थेत असली तरी ते स्थापत्य कृष्णदेवराय महाराजांच्या काळातील वैभव आजही मिरवताना दिसते.

माझ्या गाईडने मला सांगितले की हंपीच्या इतिहासामध्ये या मंदिराचा वेळोवेळी झालेल्या जीर्णोद्धाराचा उल्लेख आहे. मात्र हे मंदिर नक्की कधी आणि कोणी बांधले याचा ठोस पुरावा नाही. एक अत्यंत महत्वाची बाब ही की भारतावर अनेक आक्रमणे झाली. या प्रत्येक आक्रमणामध्ये हिंदू मंदिरांचे अतोनात नुकसान करण्यात आले. भग्न मूर्ती, अत्यंत विचारपुर्वक बांधलेले स्थापत्य लयाला गेले. मात्र विरुपाक्ष मंदिराला कधीच हात लागला नाही. त्यामुळे येथील लोकांमध्ये एक मान्यता ही देखील आहे की आपल्या ऐतिहासिक रामायण काळात या जागेवर एक मंदिर उभे राहावे यासाठी काही यज्ञ किंवा बंधन निर्माण केले गेले असेल. मला माझ्या गाईडने अजून एक कारण सांगितले... अर्थात हे कारण स्वीकारणे प्रत्येकाच्या मानसिकतेवर आहे. त्याच्या सांगण्याप्रमाणे; मुसलमान मूर्ती पूजेच्या विरोधात आहेत आणि विरुपाक्ष मंदिरात शिव पिंडी आहे... मूलतः हिंदू देव हे मानवीय शरीराप्रमाणे असल्याने इतर मंदिरे भग्न पावली. पण शिवाला मानवीय रूप नसल्याने हे मंदिर वाचले. आठव्या शतकापासून सोळाव्या शतकापर्यंत हे मुख्य विजयनगरचे केंद्रस्थान होते. राज्याचा विध्वंस झाला पण हे मंदिर तसेच राहिले. हे पंपातिर्थ स्वामीस्थल म्हणून देखील ओळखतात. पूर्वेकडील गोपुर एकशे पाच फूट म्हणजे जवळ जवळ दहा मजले उंच आहे. मध्ये मोठे प्रांगण असून त्यात अनेक गोपुरे आहेत. संपूर्ण मंदिराभोवती राम, कृष्ण, विष्णू, शिव या अवतारांच्या कथा शिल्प स्वरूपात कोरलेल्या आहेत. प्रत्येक कथा परिपूर्ण आहे. या शिल्प कथा बघताना मला असं वाटलं की राम, कृष्ण, विष्णू आणि शिव यांच्या आयुष्यातील विविध प्राण्यांसंदर्भातील कथा या विशेष करून इथे शिल्पित केल्या आहेत. (अर्थात हे माझं मत झालं.) मंदिराच्या बाजूने खळखळा वाहणारी तुंगभद्रा नदी आहे आणि नदीकडे उतरणारे अनेक घाट देखील आहेत. या ह नदीचे पाणी दगडी पन्हाळींमधून मंदिराच्या प्रांगणात खेळवले आहे आई वरून या पन्हाळीं दगडांनी बंदिस्त केलेल्या आहेत. स्वच्छ आणि शुद्ध पाणी सहज उपलब्ध होण्यासाठी आवश्यक अशी उत्तम सोय आहे इथे. मंदिर अति प्राचीन आहे यात शंकाच नाही. मात्र कृष्णदेवरायाने आपल्या पट्टाभिषेकाच्या स्मरणार्थ या देवळाचा रंगमंडप बनवला आहे.

विरुपाक्ष मंदिरासंदर्भात अजून एक कथा प्रचलित आहे. दक्ष यज्ञामधील सती देवींच्या दहना नंतर भगवान शंकर कैलास सोडून हेमकूट पर्वताच्या पायथ्याशी येऊन राहिले. तिथे पंपा देवी (पार्वती) भगवान शंकराची प्रेमभावनेने सेवा करीत होती. मात्र उग्र तापश्चर्येत मग्न श्रीशंकरांचे मन विचलित होत नव्हते. त्याचवेळी राक्षसांच्या सततच्या आक्रमाणांमुळे इंद्रादि देव त्रस्त झाले होते. त्यावेळी ब्राम्हदेवांनी दूरदृष्टीने जाणले की राक्षसांचा संहार केवळ शिवकुमारच करू शकतो. मात्र तपस्येत लीन श्रीशंकरांना जागे करणे अशक्य होते. त्यामुळे मन्मथाला पाचारण करण्यात आले. पंपादेवी श्रीशंकरची पूजा करण्यास नेहेमीप्रमाणे आली असता मन्मथाने पुष्पतीर सोडून श्रीशंकरांची तपस्या भंग केली. क्रोधीत श्रीशंकरांनी आपला तृतीय नेत्र उघडून मन्मथाला भस्म केले. मात्र त्यानंतर त्यांचे लक्ष देवी पंपा (पार्वती) कडे गेले आणि यथावकाश शिवकुमार (कुमार स्वामी) यांचा जन्म झाला आणि त्यांनी राक्षसांचा संहार केला. मात्र मन्मथ पत्नी मन्मथाच्या मृत्यूने शोकाकुल झाली आणि जीव देण्यास निघाली. त्यावेळी तिला पंपादेवींनी थांबवले आणि श्रीशंकरांना संकडे घातले. त्यावेळी श्रीशंकरांनी मन्मथाला उ:शाप दिला. मात्र त्याला त्यानंतरचे जीवन बिना रूपाचे व्यतीत करावे लागले. बिनारूपाचा उ:शाप दिल्याने श्रीशंकरांना विरुपाक्ष हे नामाभिधान पडले आणि त्याचवेळी पंपादेवींचे पति म्हणून पंपापती देखील म्हंटले जाते. 




























विरुपाक्ष मंदिर बघून मी पुढे निघाले. कोदंडधारी रामाचे मंदिर देखील असेच निसर्गसौंदर्याने नटलेल्या ठिकाणी असल्याचे मी वाचले होते. त्यामुळे ते बघण्याची मला खूप उत्सुकता होती. (थोडं विषयांतर होईल खरं पण... 'कोदंडधारी राम' हा उल्लेख झाला आणि पु. ल. देशपांडेंची सहकुटुंब सहपरिवार पार्ले भेट आठवते नाही.) त्यावेळी तुंगभद्रा नदीच्या तिरावरून लहान-मोठे चढ उतार पार करून पुढे जात होते. शेजारून वाहणारी भद्रा नदी मला प्रेमाने खुणावत होती. 'मंदिर बघशीलच ग.... थोडं माझ्याजवळ येऊन बस् तरी.' असं तर सुचवत नव्हती न ती? शेवटी मोह न आवरून तिचं आग्रहाचं आमंत्रण स्वीकारत मी तिच्याशी हितगुज करत बसले होते. तो शांत परिसर आणि तिचं ते खळाळत वाहाणं... निसर्गाच्या ओंजळीत हरवल्यासारखं वाटत होतं मला. बराचवेळ असंच रमल्या नंतर रामदर्शन घेण्यासाठी मी निघाले. अप्रतिम सुंदर राम, लक्ष्मण आणि सीतेची काळ्या दगडातील किमान दहा फुटी मूर्ती मन प्रसन्न करत होत्या. रामाच्या हातातील कोदंड (धनुष्य) सुंदर बांक असलेलं होतं. पूजा करणाऱ्या गुरुजींशी सहज गप्पा मारायला लागले आणि आश्चर्य म्हणजे मी महाराष्ट्रातुन आले आहे आणि मराठी आहे हे कळल्यावर ते उत्तम मराठी बोलायला लागले. अनेक वर्ष मुंबईमध्ये ते नोकरी करत होते. पण मूळचे हंपी सारख्या निसर्गरम्य ठिकाणचे असल्याने त्यांचे मन मुंबईमध्ये रमले नाही आणि काही वर्षातच परत हंपीमध्ये येऊन ते पूर्वापार चालत आलेल्या कोदंडधारी रामाच्या सेवेत रुजू झाले; असे म्हणाले.




कोदंडधारी राममंदिर बघून पुढे निघाले ते विठ्ठल मंदिर बघण्यासाठी. कदाचित माझा हा लेख वाचायला सुरवात करतानाच तुम्ही या मंदिराचे वर्णन अपेक्षित केले असेल. कारण हंपी म्हंटलं की कोणार्कच्या सुर्यमंदिराच्या धर्तीवर भव्य कोरीवकाम केलेल्या जगप्रसिद्ध दगडी रथाचे फोटो आणि वर्णन सर्वात प्रथम अपेक्षित असते. विठ्ठल मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे राजा कृष्णदेवरयांनी स्वतःच्या दिग्विजया प्रित्यर्थ हे मंदिर बनवले आहे. असंख्य कोनांनी नटवलेला मुख्य चौथरा हा अजस्त्र कोरीव शिलांनी बनवलेला आहे. आता या चौथऱ्यावर जाण्यास परवानगी नाही. मात्र माझ्या गाईडने दिलेल्या माहिती प्रमाणे या चौथऱ्यावरील जे स्तंभ आहेत ते अत्यंत मजबूत आणि दगडांचे असले तरी त्यातून ह्रिदम निर्माण होते. म्हणजे जर एका ठराविक पद्धतीने या खांबांवरून आपण बोटं फिरवली तर नाद निर्माण होतो. पूर्वी मंदिरामध्ये ज्यावेळी मोठे मोठे समारंभ, विवाह, उत्सव होत असत त्यावेळी या स्तंभांचा उपयोग वाद्य म्हणून केला जाई. या स्तंभांवर प्राणी, पक्षी यांचे कोरीव काम आहे. तर मंदिराच्या भिंतींवर विविध देवतांची शिल्पे आहेत. मंदिरासमोरील जगप्रसिद्ध दगडी रथ म्हणजे डोळ्यांचे पारणे फिटवणारे वास्तुशिल्प आहे. अनेक दगडीणी रचनात्मक रीतीने साधलेला आणि अप्रतिम कोरीव नक्षकाम केलेला, दगडी चाके असणारा आणि पुढील बाजूस दोन दगडी हत्ती असणारा हा रथ एकेकाळी चालवत असत. या रथाच्या मध्यभागी दगडी सोपान आहे आणि चाकांमध्ये आरीचा दांडा आहे. या रथाचे विशेष म्हणजे रथावरील सैनिकांचे शिल्प आहेत त्याचे चेहेरे अरब, पर्शियन किंवा पौर्तुगीज लोकांशी मिळते-जुळते आहेत.

माझ्या गाईडने सांगितले की तुम्ही जर प्रत्येक मंदिर किंवा राजाच्या राजवाडा आणि त्याच्या आजूबाजूचे स्थापत्य बघितलेत तर प्रत्येक ठिकाणी तुम्हाला असे विविध चेहेरे दिसतील. त्याच्या म्हणण्यानुसार विजयनगर भारतवर्षातील सर्वात श्रीमंत शहर होते. राजा कृष्णदेवराय अत्यंत कलासक्त आणि आगत्यशील होता. त्यामुळे दूरदूर देशातील (किंबहुना असं म्हणू की सर्वदूर पसरलेल्या भारतवर्षातील) लोक आपल्या वस्तू, कला-कौशल्य घेऊन राजाश्रयाच्या आशेने इथे येत असत; आणि त्यांची ही आशा राजा कृष्णदेवराय पूर्ण करत असे.


कदाचित असं देखील असेल की महाराज कृष्णदेवराय यांच्या कलाप्रेमाविषयी समजल्यानंतर अनेक कलाप्रेमी विद्यार्थी शिल्पकला शिकण्यासाठी विजयनगरीमध्ये दाखल झाले असतील; आणि शिक्षणादरम्यान शिल्पकलेतील कथा तर रामायण, महाभारतातील घेतल्या असतील आणि स्वतःची ओळख सांगण्यासाठी (special signature establishment) चेहेरे मात्र आपल्या देशातील जडणघडणी प्रमाणे निर्माण केले असतील.













हंपी मधील हमखास बघावे अशी एक खास गणपतीची मूर्ती आहे. कडलेकलू या नावाने ओळखली जाणारी ही गणेश मूर्ती एका उंच गर्भगृहात स्थापित असुन ती अखंड कातळात कोरलेली आहे. गर्भागृहासमोर रंगमंडप असून तो उंच स्थभांनी तोललेला आहे. 








पुढील शिल्प म्हणजे बडवी शिवलिंग. अखंड काळ्या पाषाणात कोरलेले एक भव्य शिवलिंग आहे हे. याचे गर्भगृह अत्यंत साधे असून याला वर छत देखील नाही. शिवलिंगाचा तळ सतत पाण्यात असतो.





लक्ष्मी नरसिंव्ह ही 6.7 मित्र उंच सर्वात भव्य मूर्ती असावी हंपीमधील. या मूर्तीची निर्मिती एका ब्राम्हणाद्वारे केली गेली असे मानले जाते. मात्र आर्य कृष्णभट्ट यांच्या शुभहस्ते या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना झाली असे मानले जाते. या मूर्तीचे विशेष म्हणजे नरसिंव्ह मूर्ती असूनही त्यांच्या उजव्या मांडीवर लक्ष्मी बसलेली असल्याचे शिल्प होते. मात्र ही लक्ष्मी मूर्ती खंडित झाली आहे. आता केवळ लक्ष्मीचा डावा हात उरला आहे जो अत्यंत मनोहरपणे भगवान नरसिंव्हांच्या कमरेला धरलेला आहे.






यापुढच्या हंपी वर्णनाच्या अगोदर थोडा श्वास घेऊया का? मला माहीत आहे; तुम्हाला वाटतंय की ज्याप्रमाणे मी एकामागून एक वर्णन करत सुटले आहे त्यावरून संपूर्ण हंपी मी एका दमात आणि एका दिवसात बघितलं आहे. पण तसं नाही हं. निसर्गात आणि अप्रतिम शिल्पकला आणि स्त्यापत्य कला यात रमत मी एकूण पाच दिवस फिरले हंपीमध्ये. तसं तीन दिवस पुरेसे असतात. पण मला सगळंच मनापासून बघायचं आणि त्याहूनही जास्त अनुभवायचं होतं. त्यामुळे मी मुद्दाम दोन दिवस जास्त राहिले. अर्थात प्रत्येकाने आपापल्या आवडीप्रमाणे दिवस ठरवावेत असं मला वाटतं. या हंपी वर्णनातला एक खास वेगळा अनुभव आहे. पण तो वर्णन करण्यापेक्षा तुम्ही प्रत्यक्ष पाहिलात तर जास्त मजा येईल.



महानवमी डिब्बा ही एक विशाल पाषाणाची वेदी आहे. हिचा आकार चौकोनी असून तळ प्रचंड मोठा असून हळूहळू तो लहान होत जातो. राजा कृष्णदेवराय यांच्या ओरिसा विजयाच्या स्मरणार्थ ही वेदी उभारली गेली होती. या वेदीच्या चारही बाजुंनी शिल्पपट कोरलेले आहेत. यामध्ये स्त्रिया शिकार करताना, युद्धकला शिकत आहेत अशी शिल्प देखील आहेत. याचा अर्थ असा होतो की महाराज केवळ कलासक्त, हुशार, उत्तम स्त्यापत्यकार नव्हते; तर स्त्रीसन्मान कसा केला जावा आणि त्यासाठी स्त्रियांना देखील बरोबरीची वागणूक मिळावी हा विचार त्यांच्या राज्यात केला जात होता असे दिसते. या शिल्पांमध्ये होळीचे, पौराणिक आणि ऐतिहासिक प्रसंग शिल्पित केले आहे. एकेठिकाणी डोक्यावर पर्शियन टोपी घातलेली आणि लहान दाढी असलेली व्यक्ती शिल्पित आहे. या व्यक्तीला हत्ती नमस्कार करतो आहे असे शिल्पित आहे. कदाचित त्याकाळात महाराज कृष्णदेवराय यांना दूरदूरहुन इतर राजे देखील भेटायला येत असतील आणि त्यांचा यथोचित सत्कार केला जात असेल. याच प्रसंगाला शिल्पित केले गेले असेल.













स्थापत्य सौंदर्याने नटलेल्या हंपीमधील काळ्या दगडाची पुष्कर्णी अत्यंत खास आहे. अलीकडे लग्नाच्या अगोदर मुलगा-मुलगी विविध ठिकाणी जाऊन सुंदर फोटो काढतात. ज्याच्या-त्याच्या हौसे प्रमाणे आणि आर्थिक सोयीनुसार ही ठिकाणं ठरतात. या prewedding shoots मधील अगदी खास ठिकाण म्हणजे ही पुष्कर्णी. काळ्या पाषाणात बनवलेली पायऱ्या-पायऱ्यांची स्थापत्य रचना आहे हिची. अनेक वर्षे मातीच्या टेकडीखाली दबली गेलेली ही पुष्कर्णी अप्रतिम सुंदर आहे. पूर्व काळापासून एका दगडी पन्हाळीतून या पुष्कर्णी मध्ये पाणी खेळवले गेले आहे. माझा गाईड संगत होता की ही पुष्कर्णी शोधताना जे कामगार होते त्यात तो देखील होता... अर्थात त्यावेळी तो खूपच लहान होता. मात्र नाजूक ब्रश आणि जमिनीवर जवळ-जवळ सरपटत जाऊन एक एक भाग मोकळा करावा लगत असे. प्रत्येक फुट स्वच्छ केल्यानंतर तिथे असणाऱ्या वास्तू संशोधकांपैकी कोणाला तरी बोलावून झालेले काम दाखवावे लागायचे. तो बोलत असताना त्याच्या डोळ्यातील भाव सांगत होते की तो परत एकदा लहान होऊन सरपटत ती पुष्कर्णी शोधत होता.

या पुष्कर्णीच्या बाजूलाच एक मंदिर आहे. या पुष्कर्णीची कथा अशी आहे की राज घराण्यातील स्त्रियांनी या पुष्कर्णीमध्ये पाय धुवून मगच या मंदिरातील देवीच्या दर्शनाला रोज जाणे अपेक्षित होते.
 








महानवमी डिब्बा, पुष्कर्णी यानंतर राज परिवारातील स्त्रियांसाठी बनवलेला कमल महाल ही देखील एक सौंदर्यपूर्ण कलाकृती आहे. लोटस महाल असा याचा उल्लेख अलीकडे केला जातो. या स्थापत्यामध्ये मुसलमानी शैलीचा काहीसा भास होतो. या तीन मजली इमारतीमध्ये जाण्यासाठी आतल्या बाजूस जिने आहेत. पण आता ते बंद करून टाकले आहेत. कड उन्हात देखील या महालात थंड हवा खेळती असते. सर्वात मोठे आश्चर्य म्हणजे ही थंड हवा खेळती राहण्यासाठी हवेच्या दाबावर पाणी या महालाच्या सर्वात वरील टोकापर्यंत पोहोचवण्याची सोय केली आहे. हे पाणी वरून महालाच्या चोहीकडून कारंज्याप्रमाणे खाली येते. त्यामूळे भर उन्हाळ्यात देखील पाऊस पडत असल्याप्रमाणे हा महाल पाण्यात भिजत असतो. कौतुकास्पद स्थापत्य हे की खाली पडणारे पाणीचं नाल्यामधून एका बाजूस एकत्र करून परत वर चढवले जाते. खरंच मानत येतं त्या काळातील भारतीय स्थापत्यकार आजच्या मानाने कितीतरी पुढचा विचार करणारे होते.



क्रमशः


#hampi #indiancalture #indianarchitecture #beautifularchitecture #historyofindia #architectureofinda #hampiiland #hippyiland #historia #indianhistory #truth_of_indian_architecture #trueth_of_indian_calture #architecture #beautifulnature #historyofhampi #natureofhampi #factsofindianarchitecture #स्थापत्य #भरतीयस्थापत्य #भारताचा_इतिहास #हंपी #निसर्ग #ऐतिहासिक_वास्तू #सुवर्ण_कालीन_भारत #पौराणिक #कथा #भारतीय_इतिहासाचे_सत्य #भारतीयइतिहासाचेसत्य