Friday, September 25, 2020

 'युगंधर' शिवाजी सावंत लिखित कादंबरी

 'युगंधर' शिवाजी सावंत लिखित कादंबरी


शिवाजी सावंत हे सिद्धहस्त कादंबरीकार. 'मृत्युंजय' ही त्यांची कर्णावरील सर्वात जास्त गाजलेली कादंबरी, 'छावा' ही संभाजी राजांवरील कादंबरी, आणि 'युगंधर' ही श्रीकृष्णवरील एक अद्भुत कादंबरी. याव्यतिरिक्त देखील श्रीयुत सावंत यांनी बरेच लेखन केलं आहे. मी आज थोडं 'युगंधर' बद्दल सांगणार आहे.

'श्रीकृष्ण'! या एका व्यक्तिमत्वाबद्दल आपण जितकं लिहू किंवा वाचू तितकं कमीच असं मला नेहेमी वाटतं. खरं सांगू? कधी कधी वाटतं आपण उगाच त्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाला देवत्व देऊन आपल्यापासून दूर नेऊन ठेवलं आहे. खरं तर तो आपल्यातलाच एक आहे. त्याने प्रत्येक वयात त्या-त्या वयातल्या टप्प्याचा पूर्ण उपभोग घेतला आहे किंवा फारतर असं म्हणू की प्रत्येक वयात सर्वसामान्य व्यक्तीने कसं वागावं याचा आदर्श ठेवला आहे आपल्यासमोर. कडेकोट बंदोबस्तामध्ये जन्मलेलं देवकी-वसुदेवाचं बाळ संपुर्णपणे आपल्या आई-वडिलांच्या निर्णयावर अवलंबून होतं. नंदराज-यशोदेचा कान्हा बाललीलांमध्ये रमला होता. मोठा होत असताना घरच्या गाई चरायला नेताना त्याने घरची जवाबदारी आपल्या वयाप्रमाणे घ्यावी हे आपल्याला सांगितलं. मथुरेहून कंस मामाचं बोलावणं आलं आणि कृष्णाने नंदनवन सोडलं. त्याचबरोबर बालपणाचा निरागस किसना संपून गेला. त्यानंतरचं श्रीकृष्णाचं आयुष्य म्हणजे वयाच्या प्रत्येक टप्प्यावर जगासाठी आदर्शवत राहूनदेखील आकंठ जगणे; असंच आहे. 'युगंधर' मध्ये हेच अत्यंत उत्कृष्ट रितीने सांगितलं आहे. संपूर्ण कादंबरी विविध व्यक्तिरेखांच्या मनाचा मागोवा घेत पुढे सरकते. सुरवातच श्रीकृष्णापासून होते.

श्रीकृष्णाने सुरवातीलाच त्याला 'देव' न मानता आपल्यातलाच एक मानण्यास सांगितलं आहे; आणि त्यानंतर कृष्णाने त्याच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या असण्याचा कार्यकारणभाव मोकळेपणी सांगितला आहे. 'राधा माझी पहिलीच 'स्त्री गुरू' होती'; हे म्हणताना स्त्रीत्वाच्या भाव-भावनांचा अर्थ कृष्णाने सामजावून सांगितला आहे.

श्रीकृष्णच्या मनोगतानंतर त्याची प्रथम पत्नी आणि त्याची खऱ्या अर्थाने जीवनसाथी रुक्मिणीचं मनोगत आपल्या सोमोर येतं. श्रीकृष्णाने खरोखर प्रेम केलं ते रुक्मिणीवर. मात्र पुढे त्याने अजून सात लग्न केली. रुक्मिणीने देखील तिच्या सात सवतींना आपल्या धाकट्या बहिणींप्रमाणे स्वीकारून कायम आदराने वागवलं. कदाचित रुक्मिणीच्या मनाचा हाच वेगळेपणा कृष्णाने ओळखला होता. जांबवती, सत्यभामा, मित्रविंदा, सत्या, लक्ष्मणा, भद्रा आणि कालिंदी या रुक्मिणीनंतर द्वारकेत आलेल्या कृष्ण पत्नी. दोन माता, अष्ट पत्नी, बहीण सुभद्रा, प्रेयसी राधा अशी अनेक स्रीरूपं आयुष्यात असूनही कृष्णाची खरी सखी मात्र कायम यज्ञासेनी राहिली.

'युगंधर'मध्ये रुक्मिणी नंतर एका वेगळ्याच व्यक्तीचं मनोगत आपल्या समोर येतं. ते म्हणजे दारुकाचं! दारूक म्हणजे श्रीकृष्णाचा सारथी. ज्या श्रीकृष्णाने जगाचा रथ हाकला त्याचं सारथ्य करण्याचं भाग्य लाभलेला एक अबोल आणि आयुष्यभर साथ दिलेला जीव. त्याचं मनोगत वाचताना आयुष्याचे वेगळेच पैलू आपल्या सोमर येतात. दारुकानंतर येते ती द्रौपदी. श्रीकृष्ण आणि द्रौपदीचं नातंच शब्दातीत आहे असं मला वाटतं. मला वाटतं द्रौपदीशी हितगुज करणारा कृष्ण आपल्याला नेहेमी सांगायचा प्रयत्न करतो की आयुष्यात कोणताही विचार न करता मनमोकळं बोलण्यासाठी एकतरी सखी/सखा असलाच पाहिजे. द्रौपदी प्रमाणेच एका व्यक्तीवर कृष्णाने मनापासून प्रेम केलं; तो म्हणजे अर्जुन! अर्जुनाचं मनोगत म्हणजे गुरू-शिष्य नात्याचे विविध पदर उलगडून समोर आल्यासारखं आहे. खरं तर महारथी कर्ण हा अर्जुनापेक्षा काकणभर सरसच होता सर्वच बाबतीत... आणि याची श्रीकृष्णाला पूर्ण जाणीव होती. मात्र अंगीचे गुण अयोग्य ठिकाणी वापरले तर काय होतं हे अधोरेखित करण्यासाठी श्रीकृष्णाने अर्जुनाचं सारथ्य केलं आणि ज्यावेळी महारथी कर्णाच्या रथाचं चाक जमिनीने गिळंकृत केलं त्यावेळी अर्जुनाला न्याय-अन्याय आणि योग्य-अयोग्य याची महती समजावून देत धनुष्याची प्रत्यंचा खेचण्यास भाग पाडलं. अर्जुनानंतर आपलं मन आपल्यासमोर मोकळं करतो तो सात्यकी. श्रीकृष्णाच्या अफाट मोठ्या सेनेचा सेनापती आणि कृष्णाचा आयुष्याच्या शेवटापर्यंत असलेला सोबती. सर्वात शेवटी आपल्यासमोर येतो तो उद्धव! मी श्रीकृष्णाचा 'भावविश्वस्त' होतो; या उद्धवाच्या एकाच वाक्यात त्याचं आणि श्रीकृष्णाचं नातं अधोरेखित होतं.

'युगंधर' म्हणजे श्रीकृष्णाचं आपल्यातलाच एक असणं! 'युगंधर' म्हणजे न्यायप्रविण, उत्तम राजकारणी, आपल्या भावनांवर विजय मिळवूनही अत्यंत भावुक असणाऱ्या त्या आकाशायेवढ्या महानायकाचं 'देवत्व' त्यागून मानवात वावरणं!!!

'युगंधर' एकदा तरी नक्की वाचावी अशी कादंबरी! श्रीकृष्णार्पणमस्तु!





Friday, September 18, 2020

 'स्वामी' रणजित देसाई लिखित

 'स्वामी' रणजित देसाई लिखित 


मला खात्री आहे की 'स्वामी' कादंबरी आपल्यापैकी अनेकांनी अनेकवेळा वाचली असेल. मी देखील ही कादंबरी अनेक वेळा वाचली आहे. आज 'स्वामी' बद्दल लिहायचंच असं ठरवून गेले काही दिवस निवांतपणे वाचत असलेली ही कादंबरी आजचं संपवली. या कादंबरीने माझ्या आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर मला वेगवेगळी सत्य सांगितली. त्यामुळे या कादंबरीमध्ये काय आहे हे सांगण्यापेक्षा मला माझ्या वाढत्या आयुष्यात या कादंबरीने काय दिलं ते सांगायला जास्त आवडेल.

मी पहिल्यांदा 'स्वामी' कादंबरी वाचली तेव्हा मी साधारण सतरा-अठरा वर्षांची होते. त्यामुळे त्यावेळी मला या कादंबरीमधले फक्त रमा-माधवच दिसले. त्यांचं एकमेकांविषयीचं प्रेम, आदर खूप भावून गेला मला. माधवराव पेशव्यांना पेशवाईच्या जवाबदरीमुळे रमेला वेळ देता येत नसे; त्याचा सल त्यांच्या मनात कायम होता. मात्र त्यांनी तो सल रमाबाईंकडे कधी मोकळेपणी बोलून नाही दाखवला. संपूर्ण कादंबरीमध्ये माधवराव मोकळेपणी रमाबाईंशी बोलले असतील तर त्यांच्या शेवटच्या थेऊरच्या वास्तव्याच्या वेळी. आजही त्यादोघांचे संभाषण वाचताना डोळे भरून येतात. वयाच्या सोळाव्या वर्षी माधवरावांनी पेशवाईची वस्त्र धारण केली; आणि केवळ अकरा वर्षात; वयाच्या अठ्ठावीसाव्या वर्षी; त्यांचे देहावसान झाले. या अकरा वर्षात त्यांनी अनेक स्वाऱ्या-मोहिमा केल्या. त्यामुळे संपूर्ण तारुण्य रमाबाईंनी शनिवारवाड्यात माधवरावांची वाट पाहण्यात घालवलं. त्यांना माधवरावांचा खरा सहवास लाभला तो त्यांच्या शेवटच्या काही दिवसांचा; थेऊरच्या वास्तव्याच्या वेळी....... मात्र माधवरावांना रमाबाईंचा सहवास त्यांच्या मृत्यूनंतर देखील लाभला. रमा-माधवाचं प्रेम शब्दातीत होतं हेच खरं. खरा संसार असा दोघांनी केलाच नाही आणि तरीही एकमेकांमध्ये गुंतलेलं त्यांचं मन मृत्यूला देखील वेगळं करता आलं नाही.

लग्नानंतर परत एकदा 'स्वामी' हातात घेतली. त्यावेळी संपूर्ण कादंबरीमधील एक प्रसंग आयुष्यभराचं सार शिकवून गेला. माधवरावांनी राघोबादादांना शनिवारवाड्यावर नजरकैदेत ठेवले होते. राघोबादादा तेथून पळून जात असताना पकडले गेले. त्यावेळी माधवराव थेऊरला त्यांच्या शेवटच्या काही दिवसांमध्ये राहण्यास गेले होते. पकडलेल्या राघोबादादांना माधवरावांसमोर पेश केले. त्यावेळी माधवरावांनी हताशपणे राघोबादादांना पेशवाईची वस्त्रे बहाल केली. त्यावेळी डोळ्यात पाणी आणून राघोबादादांनी माधवरावांना म्हंटले की त्यांच्या पदरचे लोक त्यांचे कान भरतात आणि त्या तिरिमिरीमध्ये राघोबादादा चुकीचे निर्णय घेत मराठेशाहीशी बंड करतात.... त्यावेळी माधवरावांनी दिलेले उत्तर आपण सर्वांनीच आयुष्यभर लक्षात ठेवण्यासारखे आहे... ते म्हणाले... आमच्या पदरीही सारे योग्य सल्ला देणारे आहेत, असं नाही.... अक्कल शाबूत ठेवायची ती आम्ही. थोडक्यात सांगायचे तर कोणीही काहीही सांगितले तरी कोणावर विश्वास ठेवायचा आणि आयुष्यतले निर्णय स्थिर बुद्धीने घ्यायचे हे आपण समजून घेतले पाहिजे.

त्यानंतर माझ्या दोन्ही लेकींच्या जन्मानंतर कधीतरी परत एकदा 'स्वामी' हातात घेतली आणि माझ्याही नकळत त्यावेळी देखील झापटल्यासारखी वाचून संपवली. यावेळी जाणवलं ते जेमतेम सोळाव्या वर्षी पेशवेपद स्वीकारून माधवरावांनी सावरलेली कर्जबाजारी पेशवाई. हलक्या कानांच्या काकांच्या बंडखोरीचा आयुष्यभर सोसलेला त्रास; कठोर निर्णयामुळे दुरावलेला मातोश्रींचा सहवास; सततच्या लढाया आणि मोहिमांमुळे पेशवाईवर झालेलं कर्ज या माधरावांच्या पेशवे पदाच्या काळातील अडचणी अगदी अंगावर आल्या. माझ्या वयाच्या जेमतेम चोविसाव्या वर्षी माझ्या पदरात माझ्या लाडक्या दोन लेकी होत्या. त्यावयात देखील त्या दोघींचे शिक्षण; शालेय शिक्षणाव्यतिरिक्त काय शिकवावं; त्यांचं व्यक्तिमत्व परिपूर्ण व्हावं यासाठी काय आणि कसं करावं हेच विचार मनात घोळायचे. 'स्वामी' वाचताना सतत जाणवलं की माधवरावांनी केवळ आणि केवळ मराठी साम्राज्याचा विचार केला ते या साम्राज्याला पुत्रवत मानलं म्हणूनच.

नंतर कधीतरी एकदा पुन्हा ही कादंबरी हातात आली. यावेळी ती अगदी तब्बेतीत वाचली. प्रत्येक प्रसंग जगण्याचा प्रयत्न केला आणि खरं सांगू? जगले देखील. यावेळच्या वाचनात एक मात्र प्रकर्षाने जाणवलं; आपल्याला तो काळ कधीच उमजणार नाही.... पेशवाईच्या काळातील अनेक धारावाईक आणि सिनेमे आपण सर्वांनी बघितले आहेत. तरीही ही कादंबरी वाचताना मनात येत होतं की त्यावेळचं पुणं.... तेथील सर्वसामान्य जनजीवन.... राजकीय स्थैर्य-अस्थैर्य... याची खरी कल्पना आपण या धारावाईक किंवा सिनेमांमधून करूच शकत नाही. मात्र तरीही या दृक्श्राव्य माध्यमांमुळे आपला उज्वल इतिहास किमान थोड्याफार प्रमाणात आपल्यापर्यंत आणि आपल्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचतो आहे; याचं समाधान आहे.

..... आणि आज जेव्हा ही कादंबरी पुन्हा एकदा वाचली त्यावेळी मनापासून भावलेला भाग तुम्हाला सांगितल्याशिवाय राहावंत नाही आहे......

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ #yogiaditynath यांनी आग्र्यामधील #agra मुघल म्युझियमला #mughalmuseum छत्रपती शिवाजी माहाराजांचे #chatrapatishivajimaharaj नाव देण्याचे घोषित केले आहे. यावेळी त्यांनी म्हंटले आहे की 'हम सबके नायक शिवाजी माहाराज हैं!' किती सत्यता आहे या एका वाक्यात. आपल्यापैकी कितीजणांना माहीत आहे की मराठ्यांची सत्ता केवळ माहाराष्ट्रपुर्ती मर्यादित नव्हती; तर दिल्लीच्या तक्तापासून ते पार कर्नाटकापर्यंत मराठा साम्राज्य पसरलेले होते. माधवराव पेशव्यांनी निजामाला हरवून शरणागती पत्करायला लावली होती; आणि त्यानंतर त्याला सौहार्दपूर्ण वागणूक देत त्याच्याशी मैत्री करून मराठा साम्राज्याचा एक शत्रू कायमचा संपवून टाकला होता. हैदराचा कायमचा बंदोबस्त केला होता. पेशवाईचा कारभार मार्गी लावत असताना माधवरावांचा आजार बळावला. मात्र त्या आजारात देखील त्यांनी दख्खन स्वारीवर आपले खंदे मुत्सद्दी वीर पाठवून त्यांच्याकरवी तेथे विजय मिळवला. माधवराव पेशव्यांच्या शेवटच्या काही दिवसात दक्खन स्वारीवरील वीरांनी दिल्लीपतीला सिंहासनस्थ केले. म्हणजेच मराठ्यांच्या मदतीमुळेच केवळ दिल्लीमधील मुघलांचे राज्य टिकले. मराठ्यांचे मांडलिक होणे मान्य करून त्यांनी दिल्ली राखली. आपल्याला सगळ्यांना पेशव्यांचा आणि पर्यायाने मराठी साम्राज्याचा पानिपतचा पराजयच केवळ माहीत आहे. मराठ्यांच्या पराभवामुळे पेशवाईला लागलेले पानिपताचे गालबोट देखील या स्वारीत पुसले गेले. याची इतिहासात ठळक नोंद नाही.... किंवा खेदाने म्हणावे लागते आहे की या विजयाची नोंद सर्वसामान्य लोकांच्या सहज वाचनात येईल असा प्रयत्न आपल्या इतिहासकारांनी केला नाही. दुर्दैवाने आपल्याला माहीत असणारा इतिहास हा भारतावर इंग्रजांच्या अगोदर मुघलांचे राज्य होते; हाच आहे. मात्र मराठेशाही.... मराठा साम्राज्य.... उत्तरेपासून ते थेट दक्षिणेपर्यंत पसरले होते; हे समजून घेणे खूप महत्वाचे आहे.

मुघलांना नमवणाऱ्या त्या दूरदृष्टी लाभलेल्या जनतेच्या राजाचे छत्रपतींचे नाव आजवर मुघल नाव वागवणाऱ्या संग्रहालयाला देण्याचा निर्णय घेऊन योगी आदित्यनाथ यांनी मराठा साम्राज्याचा इतिहास सर्वांनी परत एकदा समजून घ्यावा हे सांगितले आहे असे मला वाटते.

आज पुन्हा एकदा 'स्वामी' कादंबरी वाचून संपवताना या कादंबरी मधील रमा-माधवाचं प्रेम; माधवरावांची दूरदृष्टी; सार्वभौम भारतामध्ये बसवला गेलेला पेशवाईचा अंमल... आणि सर्वात महत्वाचे म्हणजे मराठा साम्राज्याचा आवाका नजरेसमोर आला आणि खूप खूप समाधान वाटलं.


Friday, September 11, 2020

विश्वस्त' वसंत वसंत लिमये लिखित कादंबरी





 

विश्वस्त' वसंत वसंत लिमये लिखित कादंबरी

विश्वस्त. श्रीकृष्णाच्या अस्तित्वाचा ठसा!

महाभारताचा काळ! आपल्या पुराणकथा की आपला इतिहास?

याच महाभारत काळातील माझं - किंबहुना अनेकांचं आवडतं व्यक्तिमत्त्व म्हणजे श्रीकृष्ण! तो अनादि-अनंत, तो सर्वत्र-समावेशक, कर्ता-करविता. तो निर्गुण-सगुण, निर्मोही. मात्र त्याचं अस्तित्व मोहमयी! देवत्व असूनही आपल्यातलाच एक असा! तो व्यावहारिक, हिशोबी, बेरकी आणि तो द्रष्टाही! म्हणूनच कदाचित स्वतःच्या मानव असण्याचा आणि मानवी मर्यादांचा त्याने कायम स्वीकार केला. त्याच श्रीकृष्णाच्या असीम दूरदृष्टीची कथा म्हणजे वसंत वसंत लिमये लिखित 'विश्वस्त'! श्रीकृष्णाच्या बालपणाचा काळ, तारुण्य, त्याचं प्रौढत्व, त्याची सुजाण बुद्धी याबद्दल आपण खूप वाचलं आहे. मात्र ‘विश्वस्त’च्या निमित्ताने आपल्याला कृष्ण नावाच्या मानवाचा वृद्धापकाळ समोर येतो. आपल्या वारसदारांचा होणारा र्‍हास याचि देही याचि डोळा पाहात असतानादेखील पुढच्या अनादि-अनंत काळातील आपल्या पिढ्यांसाठी त्या द्रष्ट्या पुरुषाने करून ठेवलेली तजवीज म्हणजे ‘विश्वस्त’!


c26d6f64095649329af6d96da7918602

ही कादंबरी अनेक दिवस डोळ्यासमोर ठेवली होती. पण वाचायचा मुहूर्त लागत नव्हता. ५२३ पानं असल्याने कसा वेळ मिळेल असं सारखं वाटत होतं. पण मिसळपाववरील दिवाळी अंकाचं आवाहन वाचलं आणि ठरवलं - 'विश्वस्त'चं रसग्रहण लिहायचं. मग लगेच पुस्तक हातात घेतलं आणि तीन दिवसात, किंबहुना तीन रात्रींत वाचून संपवलं. त्या तिन्ही रात्री मी एका वेगळ्याच जगात होते. तो श्रीकृष्णाचा काळ होता.... चाणक्याचा काळ होता.... आणि तरीही वर्तमानाचं पूर्ण भान होतं. श्रीकृष्ण आणि पर्यायाने महाभारत काळ म्हणजे आपल्या 'पौराणिक कथा' असं आजवर मी मानत आले. मात्र त्या विचारालाच या कादंबरीने धक्का दिला आहे. चाणक्य काळ आपण आपला इतिहास आहे असंच मानतो. त्यापूर्वीदेखील आपला इतिहास होताच नं? तो काय होता? याचा विचार करायला लावणारं पुस्तक म्हणजे 'विश्वस्त'! साध्या सरळ शब्दात विश्वस्त म्हणजे संचिताचा 'सांभाळ करणारा' आणि योग्य व्यक्तीस किंवा योग्य वेळेस पुढे सुपुर्द करणारा. हा सांभाळ करण्याचा काळ ज्या वेळी खूप मोठा होतो आणि योग्य व्यक्ती किंवा योग्य वेळ किंवा योग्य समाजव्यवस्था जोपर्यंत प्राप्त होत नाही, तोपर्यंत सांभाळ करता करताच त्याला वारसदारदेखील व्हावं लागतं, याची उकल करून सांगणारं पुस्तक म्हणजे 'विश्वस्त'!

लेखकाने स्पष्ट शब्दात म्हटलं आहे - कल्पित आणि सत्य यांच्यामधल्या पुसट, धूसर सीमारेषांवर आट्यापाट्या खेळणारी नाट्यपूर्ण, वेगवान घटनांच्या प्रवाहात वाचकाला खेचून नेणारी आणि खिळवूनही ठेवणारी कादंबरी... आणि तरीही ही एक कल्पित कथा नसून संपूर्ण सत्यकथन आहे असं आपल्याला प्रत्येक क्षणी वाटत राहतं. यातील अनेक प्रसंग आणि अनेक दाखले आपल्याला खिळवून ठेवतात. आजच्या अगदी पाच-सात वर्षांपूर्वीचे दाखले जसे यात आहेत, तसेच महाभारत काळातले आणि चाणक्य काळातलेदेखील दाखले आहेत.

एक कथा म्हणून विश्वस्त कशी आहे हे प्रत्येक वाचकाचं वैयक्तिक मत असू शकतं. पण या कादंबरीची खासियत ही की ती आपल्याला विचारात पाडते. काय असेल आपला खरा इतिहास? असं म्हणतात की आपण जो वाचतो किंवा ऐकतो, तो जेत्याचा इतिहास असतो. मग असं तर नाही की आपण इंग्रजांनी सांगितलेल्या आणि लिहिलेल्या कथनाला आपला इतिहास मानतो? हिंदू हा धर्म नसून सिंधू, सरस्वती नद्यांच्या किनारी उगम पावलेली आणि पुढे संपूर्ण आर्यवर्तात पसरलेली ही एक सारस्वत संस्कृती आहे. म्हणूनच कदाचित इतर धर्म (की पंथ?) यांचे प्रेषित किंवा स्थापनकर्ते आपल्याला माहीत आहेत. मात्र हिंदू धर्म यांनी स्थापन केला असा संदर्भ कधी माझ्या वाचनात आला नाही. पूर्वी लिखित साहित्यापेक्षा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे मौखिक माध्यमातून ऐतिहासिक सत्य सांगितलं जायचं. दुर्दैवाने एखादी शृंखला ढळली तरी त्यामुळे आपल्या इतिहासाचं केवढं तरी नुकसान झालं असेल. ‘विश्वस्त’मध्ये आपल्या इतिहासाची आणि पुराणांची खूप रोचक सांगड घातलेली आहे.

या कादंबरीमध्ये अनेक ठिकाणांची ऐतिहासिक किंवा पौराणिक दाखले देत गुंफण केली आहे. मुंबई, नालासोपारा, दापोली ते अगदी द्वारका आणि सोमनाथ मंदिर असा आपला वारसा इतका सुंदर रितीने समोर येतो की एकदा हातात घेतलेली ही कादंबरी संपूर्ण वाचल्याशिवाय खाली ठेवावीशी वाटतच नाही. तर, 'विश्वस्त' ही एक वाचायलाच हवी अशी कादंबरी आहे; हे सांगणे नलगे!

P-20170521-103302

***

माझ्या मनात गेली अनेक वर्षं येत आहे की आपल्या मुंबईला एक वलयांकित इतिहास आहे. तो आपण समजून घेतला पाहिजे. या कादंबरीच्या निमित्ताने 'जरा हटके, जरा बचके' अशा या 'मुंबई मेरी जान'मधील ऐतिहासिक संदर्भ आणि खदाडीसाठीच्या काही जागा मला समजल्या, त्या आपल्यासमोर या लेखाच्या निमित्ताने मांडते आहे.

खादाडी :

१. लीलावती हॉस्पिटलसमोरील चिंचोळ्या गल्लीमधील 'जमवा आओजी' हे खास पार्शी हॉटेल. 'आकुरी' खास पार्शी पद्धतीची मसालेदार अंडाभुर्जी.

२. नागीनदास मास्टर रोड, फोर्ट येथील 'कॅफे मिलिटरी'. मटण कटलेट ग्रेव्ही आणि सली बोटी.

३. मेट्रोजवळील 'कयानी' इराणी रेस्टॉरंट

४. याझदानी बेकरी, फोर्ट. ब्रून मस्का पाव. आजही या बेकरीमध्ये लाकडावर आणि कोळशावर चालणारी पारंपरिक भट्टी आहे. जिंजर बिस्किट्स आणि अ‍ॅपल पायदेखील खास.

ऐतिहासिक मागोवा :

१. जीपीओ परिसरातील जमिनीखाली सापडलेलं भुयार (कामा हॉस्पिटल, मिडल ग्राउंड आणि ऑईस्टर रॉक ही मूळ मुंबई येते आणि मलबार हिल अशा दक्षिण मुंबईतील विविध भागात भुयारी मार्ग असू शकतात.)

२. आत्ताचं वेस्टर्न नेव्हल कमांडचं हेडक्वार्टर, फोर्ट भागात ज्या ठिकाणी आहे, त्याचं मूळचं नाव ‘कॅसा डी ओरटा’ ( Casa da Orta) म्हणजेच बाँबे कॅसल.

३. एलिफंटा केव्हज म्हणजेच घारापुरीची लेणी (सहाव्या शतकातील निर्मिती)
जवाहरद्वीप म्हणजेच 'बुचर आयलंड', 'मिडल ग्राउंड' आणि 'ऑईस्टर रॉक' बेटं मुंबईच्या इतिहासाची शान अजूनही जपतात.

४. तेराव्या शतकातील राजा भीमदेव याची राजधानी महिकावती म्हणजे आजचं माहीम.

५. फोर्ट भागात सहज फिरलं तरी विसाव्या शतकाच्या सुरुवातीस बांधलेल्या 'निओ गॉथिक' आणि 'आर्ट डेको' अशा शैलीत बांधलेल्या अनेक इमारती दिसतात.

६. वाळकेश्वर येथील बाणगंगा तलाव (जबरेश्वर मंदिराच्या कोपऱ्यावर उजवीकडील चिंचोळी गल्ली)

७. ओल्ड कोर्ट हाऊस ते आझाद मैदान, सेंट जॉर्जेस हॉस्पिटल ते कामा हॉस्पिटल, मिडल ग्राउंड ते जी.पी.ओ., मिडल ग्राउंड ते ऑईस्टर रॉक, सेंट जॉर्ज फोर्ट ते सेंट जॉर्जेस हॉस्पिटल
(कदाचित मुंबईच्या या ऐतिहासिक वास्तूंना जोडणारी भुयारं असू शकतील)

८. बाँबे कॅसलच्या ईशान्य टोकाकडे सेंट जॉर्ज फोर्ट (सेंट जॉर्ज हॉस्पिटल, पी. डिमेलो रोड) होता. तेथे दारूगोळ्याचं कोठार होतं. आता तिथे महाराष्ट्र राज्याच्या पुरातत्त्व खात्याचं ऑफिस आहे.


श्रेयनिर्देश : प्रकाशचित्रं श्री. वसंत वसंत लिमये ह्यांजकडून


पुस्तकाचे नाव: विश्वस्त
लेखक: वसंत वसंत लिमये
प्रकाशक: राजहंस प्रकाशन ( प्रथम प्रकाशन १ जानेवारी २०१७)
ISBN 8174349995 (ISBN13: 9788174349996)


Friday, September 4, 2020

एक प्याला स्त्रीजन्माचा (कविता)

 एक प्याला स्त्रीजन्माचा


पुढील जन्मी पुन्हा फिरुनी
लाभू दे मज जन्म स्त्रीयेचा
या जन्मी जे राहील जगणे
आकंठुन रस प्रशिन मी त्याचा

नसेन दश भुजा काली मी
किंवा मखरातील कोणी देवी
सर्वव्यापी मानव ज्योत ती
अंतरी ठेवीन माझ्या तेवती

थोडे जगणे स्वतःसाठी अन्
मग थोडा विचार इतरांचा 
वैचारिक-सामाजिक बेडीला
झुगारून स्वीकारी स्वच्छंदाला

सन्मानाचा-सुंदर-तृप्त जन्म
या जन्मी लाभला मला हा
मागून घेईन त्या आत्मशक्तीतून
एक प्याला परत स्त्रीजन्माचा