Friday, February 11, 2022

अनाहत सत्य (भाग 11)

 अनाहत सत्य


भाग 11

जस्सी काकांना सोडायला जाणार असल्याने थांबला आणि गोविंद, शेषा आणि संस्कृती मात्र निघाले.

"चला. आता जस्सीचे काका अर्थ सांगेपर्यंत हरी हरी करत बसायचं." शेषा हसत म्हणाला.

मात्र संस्कृती अजूनही गंभीर होती. तिने एकदा शांतपणे शेषाकडे बघितलं आणि मग गोविंदकडे वळून म्हणाली; "आपण परत एकदा संपूर्ण श्लोकाचा अभ्यास आपल्यापरीने करूया का?" तिचा गंभीर चेहेरा बघून शेषाने चेष्टेसाठी उघडलेलं तोंड बंद केलं.

"तुला गरज वाटते आहे का संस्कृती?" गोविंदने विचारलं.

"हो गोविंद. काका आपल्याला अर्थ आणि या श्लोकामध्ये वापरलेली प्राकृत भाषा भारताच्या नक्की कोणत्या भागात प्रचलित होती हे सांगणार आहेत. पण तरीही मला वाटतं आपण तो श्लोक समजून घेण्याचा आपल्या परीने देखील प्रयत्न करूया." संस्कृती म्हणाली.

"चालेल." असं म्हणून गोविंद शेषाकडे वळला आणि म्हणाला; "शेषा, तुला कंटाळा आला असला तर तू निघ. काहीच हरकत नाही. आमचं जे काही बोलणं होईल ते तुला नंतर कळवतो मी."

"यार काय करू निघून आणि घरी जाऊन? मला दुकानावर नाही जायचं. मी येतो तुमच्याबरोबर." शेषा म्हणाला.

"शेषा, तिथे येऊन जर चेष्टा करणार असलास तर नको हं येऊस." संस्कृती शांतपणे म्हणाली.

"नाही माझे आई. तुम्ही दोघे बोला. मी फक्त ऐकण्याचे काम करेन." शेषा हसत तिच्यासमोर हात जोडत म्हणाला. त्याच्या त्या एका कृतीने देखील तिघे हसायला लागले.

उडप्याकडे जाऊन बसल्यानंतर संस्कृतीने बॅगमधून एक वही काढली आणि लिहायला सुरवात केली. "ए, तू म्हणाली होतीस आपण एकत्र अर्थ शोधायचा आहे. तू जर एकटीच लिहीत बसणार असलीस तर आम्ही काय तुझं तोंड बघत बसू? बरं! एकवेळ गोविंदला आवडेल ते करायला.... माझं काय?" शेषाने तोंड उघडलंच.

"चालता हो बघू तो शेषा." वैतागत संस्कृती म्हणाली. दोघांच्या मध्ये पडत गोविंद म्हणाला; "भांडू नका यार. शेषा, गप ना साल्या. चर्चा करण्या अगोदर आपल्याकडे तो श्लोक नको का? संस्कृती तो श्लोक लिहिते आहे. कारण कागद काकांकडे आहे. आणि ते एका परीने योग्य देखील आहे. नाहीतर आपल्याला परत एकदा नैनाचे पाय धरायला लागतील; श्लोक आणि त्याचा अर्थ.... दोन्हीसाठी."

"आयला! मला काय माहीत ही श्लोक लिहिणार आहे ते. मी आपलं सहज बोललो." शेषा गोविंदला डोळा मारत म्हणाला. त्याच्याकडे दुर्लक्ष करून संस्कृतीने लिहिण्यास सुरवात केली.

सृष्टी निर्माता नच जरी स्व हा।
तुझी कामना पूर्त विश्वात।
निर्मिती नष्ट दुष्ट प्रकृती करिती।
शोध घे तू मानवात।
सोबत सोबतांची तुजसवे असता।
आयुष्य बदलते सर्वस्व।
नच सोबत अर्थहीन मग।
समजून घे तू विश्वास।
तू नच नर - नरेश तु।
फलप्राप्ती तुज इष्ट।

लिहून झालं आणि गोविंद आणि शेषाला ऐकायला येईल अशा आवाजात संस्कृतीने तो श्लोक वाचला.

"यार, अर्थ पण सांग न." शेषा बोललाच. गोविंदने त्याच्या टपलीत मारली आणि संस्कृतीने पाठीत चापाटी.

"गप रे शेषा. थोडा धीर धर न." संस्कृती हसत म्हणाली. ती हसते आहे हे बघून गोविंदलाच हायसं वाटलं. संस्कृतीने वही समोर ओढली आणि ती अर्थ लिहायला लागली.

सृष्टी निर्माता नच जरी स्व हा।
तुझी कामना पूर्त विश्वात।
हा श्लोक ज्याच्यासाठी आहे तो (स्व) तो जरी सृष्टी निर्माता नाही; तरी तुझी (या स्व ची) (कामना) इच्छा याच विश्वात पूर्ण होईल आणि त्याने इच्छा केलेली निर्मिती होईल.

निर्मिती नष्ट दुष्ट प्रकृती करिती।
शोध घे तू मानवात।
ही निर्माण झालेली निर्मिती दुष्ट प्रवृत्तीचे लोक नष्ट करतील. तू त्यांचा शोध मानवांमध्येच घे.

सोबत सोबतांची तुजसवे असता।
आयुष्य बदलते सर्वस्व।
तुझ्या जवळच्या लोकांची सोबत तुझ्या बरोबर असेल तर तुझे आयुष्य बदलून जाईल.

नच सोबत अर्थहीन मग।
समजून घे तू विश्वास।
पण जर काही कारणाने ही तुझ्या जवळच्या लोकांची सोबत तुला नाही लाभली; तर सगळंच अर्थहीन होईल. त्यामुळे त्यांचा विश्वास तुला कायम समजून घ्यावा लागेल.

तू नच नर - नरेश तु।
फलप्राप्ती तुज इष्ट।
तू केवळ एक नर (सर्वसामान्य माणूस) नाहीस तर नरेश म्हणजे राजा आहेस; हे विसरू नकोस. तू जर हे कायम लक्षात ठेवलेस तर तुला इष्ट ती फलप्राप्ती होईल.

लिहून झालं आणि संस्कृतीने मोठ्याने वाचलं परत एकदा.

"मी बोलू का?" गोविंद म्हणाला. "यार गोविंद परवानगी घेऊन तू कधीपासून बोलायला लागलास रे? बर, चल बोल." शेषा म्हणाला.

"शेषा, जस्सीचे काका म्हणाले होते की तो जो कोणी राजा आहे त्याने काहीतरी निर्माण करायची इच्छा केली. पण निर्मिती दुसऱ्याच कोणीतरी केली. तर ते कोण होते ते समजून घेतलं पाहिजे. पण काकांचं हे म्हणणं थोडं विचित्र नाही का वाटत? अरे यार, कोणत्याही राजाने काहीतरी निर्माण करायचं ठरवलं तर तो स्वतः थोडीच ते तयार करतो? म्हणजे ताज महाल काय शहाजहानने स्वतः थोडीच बांधला? त्याने तो कामगारांकडून बांधून घेतला ना? तसंच या श्लोकातल्या त्या राजाने इच्छा केली आणि ती कामगारांकडून पूर्ण केली... मग त्या नरेषाच्या इच्छेप्रमाणे निर्मिती करणारे ते कोण हे जास्त महत्वाचं आहे; असं काका का म्हणाले?" गोविंदने शंका व्यक्त केली.

त्यावर शेषा गोविंदच्या शंकेने एकदम खुश झाला आणि म्हणाला; "मी बोलू का?"

त्याच्या त्या विधानाने गोविंद आणि संस्कृतीने एकाचवेळी त्याच्याकडे वैतागून बघितलं. "यार नेहेमी चेष्टा नाही करत मी. मी गोविंदची नक्कल नाही करत. मला काहीतरी सुचलंय गोविंदची शंका ऐकून. एका तर खरं." शेषाचा आवाज थोडा गंभीर होता. त्याच्या आवाजातला बदल समजून गोविंद म्हणाला; "बोल." शेषा शांतपणे बोलायला लागला; "गोविंद, मला कळणारं लॉजिक सांगतो... शहाजहानने इच्छा केली आणि काय कामगारांना सांगितलं.... जा रे बांधा माझ्या मनातला ताज? मूर्ख कुठला! अरे, शहाजहानने मनातील इच्छा 'त्याच्या प्रिय पत्नीची आठवण म्हणून काहीतरी भव्य-दिव्य बांधाव;' असं त्याच्या सामंतला बोलून दाखवल असेल. मग सामंताने असं काहीतरी भव्य काय असू शकतं याचा विचार इतर प्रमुख सरदार किंवा विचारवंतांशी केला असेल. सगळ्यांनी मिळून एक दोन ऑप्शन्स ठरवले असतील. मग ते राजाला सांगितले असतील. त्यातली एक कल्पना राजाने पास केली असेल. मग त्या कल्पनेला मूर्त स्वरूप देण्यासाठी त्याचा आराखडा तयार केला करण्यासाठी कोणीतरी आर्किटेक्ट सामंताने शोधला असेल. त्या आर्किटेक्टने तयार केलेलं प्रारूप जर राजाला आवडलं असलं तर मग त्याने त्यावर होणारा खर्च विचारला असेल. तो त्याला पटल्यानंतरच राजाने काम सुरू करायला सुरवात परवानगी दिली असेल. त्यानंतर जागा ठरवणं, लागणारा कच्चा माल आणण, कारागीर; जे मूर्तींचं, मंदिराचं काम करतील ते; आणि कामगार जे मजुरीचं काम करतील असे यांना शोधूलं गेलं असेल. त्यांना एकत्र केल्यानंतर काम सुरू झालं असेल. ज्या आर्किटेक्टला ही संपूर्ण जवाबदारी दिली असेल तो तर कदाचित सामंतला उत्तरदायी नसेलसुद्धा. थेट राजाशीच त्याचं बोलणं होत असेल. त्यामुळे कदाचित सामंताचा राग होत असेल. कदाचित सामंताने स्वतःची माणसं नेमली असतील. सामंत प्रामाणिक आहे राजाशी. पण अचानक आर्किटेक्ट आणि राजा गुप्तपणे भेटायला लागले असल्याने तो पूर्ण गोंधळून गेला आहे. या भेटींचं रूपांतर नक्की कशात होतार याबद्दल तो शशांक आहे. म्हणूनच कदाचित त्याने त्याचा विश्वासू माणूस...." शेषाची बोलताना तंद्री लागली होती.

पण आता गोविंद आणि संस्कृती गोंधळून गेले. सुरवातीला शेषा शहाजहान आणि ताज बद्दल बोलत होता. पण मग त्याची गाडी अचानक राजा-सामंत करत कुठेतरी घसरायला लागली. तो नक्की काय बोलतो आहे; ते दोघांनाही कळेनासं झालं होतं. शेवटी संस्कृतीने शेषाचा हात जोरात हलवला आणि त्याला भानावर आणत म्हणाली; "शेषा.. ए.... अरे काय बोलतो आहेस तू? कोण राजा? तू शहाजहान वरून अचानक कोणत्या राजावर सरकलास?"

"अं... काय?" शेषा तंद्रीतून जागा झाला. पण त्याची नजर हरवून गेली होती. संस्कृतीने त्याला परत एकदा हलवलं. "ए.... शेषा!" "अं?! ओह! काय? काय झालं ग?" संस्कृतीकडे बघत शेषा म्हणाला. त्याच्या नजरेत आता ओळख आली होती.

"तू नक्की काय सांगतो आहेस शेषा?" संस्कृतीने त्याला परत एकदा विचारलं.

"काय सांगत होतो मी?" शेषानेच संस्कृतीला विचारलं.

"शेषा, आपण तिघे इथे आपल्याला मिळालेल्या श्लोकाचा अर्थ वाचायला आणि समजून घ्यायला बसलो आहोत. त्यात गोविंदने एक सरळ साधा प्रश्न विचारला की जस्सीचे काका असं का म्हणाले की निर्मिती कोणी केली ते समजून घेतलं पाहिजे. त्यावर तू ताज महाल आणि शहाजहानचं उदाहरण देत समजावायला लागलास. पण मग तुझी गाडी कुठेतरी वेगळीकडेच घसरली. तू काय म्हणत होतास ते आम्हाला मुळीच कळलं नाही." संस्कृती म्हणाली.

"अं... हो! म्हणजे मी माझं लॉजिक सांगत होतो; पण खरं सांगू का.... मध्ये मला कळलंच नाही की मी काय बोलत होतो. काय बोलत होतो मी?" शेषा म्हणाला.

"साल्या, परत चेष्टा ना?" गोविंद वैतागत म्हणाला.

"नाही यार गोविंद. खरं सांगतो. मला कळलंच नाही तंद्री कशी आणि कधी लागली. काय बोललो ते सांगतोस का?" शेषा म्हणाला. तो खरं बोलतो आहे हे गोविंद आणि संस्कृतीच्या लक्षात आलं. शेषाने टेन्शन घेतलं आहे हे देखील गोविंदच्या लक्षात आलं आणि शेषाच्या खांद्यावर थोपटत तो म्हणाला; "काही नाही रे. शहजहांचा उल्लेख तू राजा म्हणून करत होतास. साला आपल्याला सवय नाही ना असं ऐकायची. म्हणून आम्ही गोंधळलो. बाकी तुझी नेहेमीचीच बडबड चालू होती. म्हणून तर तू चेष्टा करतो आहेस असं वाटलं आम्हाला." शेषाला गोविंदचं म्हणणं फारसं पटलं नाही; पण तो काहीच बोलला नाही. एकदम शांत होत मान खाली घालून बसला तो.

"तर, जस्सीचे काका म्हणाले होते की तो जो कोणी राजा होता त्याने काहीतरी इच्छा धरली होती आणि ती इच्छा पूर्ण करणारे जे कोणी होते ते कोण होते हे समजून घेणं महत्वाचं आहे." संस्कृतीने परत चर्चेची गाडी श्लोक आणि त्याअनुषंगाने आत्तापर्यंत झालेल्या चर्चेपर्यंत आणून ठेवली.

"बरोबर! पण मला वाटतं की या श्लोकामध्ये वापरलेली प्राकृत भाषा कोणत्या भागातली होती हे कळलं की खूप काही सोपं होईल संस्कृती. कारण ही भाषा साधारण पाचव्या शतकातली आहे; हे काकांनी आपल्याला सांगितलं आहे. जर आपल्याला कोणता भाग कळलं तर त्या भागात असणारी ऐतिहासीक वास्तु कोणती ते शोधणं सोपं जाईल आपल्याला; नाही का?" गोविंद म्हणाला.

अचानक शेषाने मान वर केली आणि गोविंदकडे बघत तो म्हणाला; "आज नाही सतत तुझ्या सोबत राहणार मी. मला देखील काही कारणं शोधून काढावी लागतील. योग्य-अयोग्य आणि चूक-बरोबर यातला फरक माझा मला समजून घेणं आवश्यक आहे. येतो मी." तो काय म्हणाला ते संस्कृती आणि गोविंदला कळायच्या अगोदरच शेषा ताडकन उठून निघून गेला. ते दोघेही अवाक होऊन तो गेला त्या दिशेने बघत राहिले.

थोडा वेळ गेला आणि संस्कृती अगोदर भानावर आली. "गोविंद, काहीतरी गडबड आहे रे. शेषा जे काही बोलला आणि असा ताडकन निघून गेला; नाटक नव्हतं ते. आपण निघुया. तू जरा त्याच्या घरी जा आणि तो ठीक आहे न बघ. पण उगाच त्याच्या घरच्यांना काही संशय येणार नाही याची काळजी घे. काय वाटतं तुला?"

"हम्म! You are right. काहीतरी बिनसलं आहे त्याचं. बघतो मी. तू पण निघ. उशीरच झाला आहे तसा. तुला पण हॉस्टेलमध्ये कटकट नको व्हायला." गोविंद म्हणाला. संस्कृती आणि गोविंद बाहेर पडले आणि दोन वेगळ्या दिशांनी निघाले.

"हाय संस्कृती! आत्ता येते आहेस?" संस्कृतीला बघून नैना म्हणाली.

"हो!" सांस्कृतीने उत्तर दिलं. तिला त्याक्षणी तरी नैनाशी काहीही बोलायची इच्छा नव्हती.

"का ग? बरं वाटत नाही का?" कधी नव्हे तो नैनाचा आवाज थोडा ओलावलेला होता असं संस्कृतीला वाटलं. कदाचित एरवी संस्कृतीला असं काही सुचलं नसतं. पण नैनाने तब्बेतीबद्दल विचारलं आणि संस्कृतीने अजून चेहेरा पाडत म्हंटलं; "हो ग. थोडी दगदग झाली. त्या श्लोकाच्या नादात आम्ही धड काही खाल्लं नाही दिवसभर. त्यामुळे आता डोकं दुखतं आहे माझं. गोळी घेऊन झोपेन म्हणते."

"ओह! बरं झोप. खरं तर मी पण दिवसभर त्याच श्लोकात अडकले होते ग." नैना म्हणाली.

तिच्या त्या एका वाक्याने संस्कृतीचे कान टवकारले गेले. "का ग? अजून काही अर्थ लागला का तुला?" तिने नैनाला विचारलं.

"अहं! मी जो अर्थ सांगितला ना तोच आहे. पण...." नैना बोलताना थांबली. तिचा आवाज काहींसा अस्थिर वाटला संस्कृतीला.

"पण काय नैना?" संस्कृतीने अधीर होत विचारलं.

"गोविंद काय म्हणाला ग तो श्लोक आणि त्याचा अर्थ ऐकून?" नैनाने विचारलं.

नैनाच्या प्रश्नमुळे मात्र संस्कृती परत बंद झाली मनातून. "तो काय म्हणणार? ऐकून घेतला अर्थ." तिने शांतपणे उत्तर दिलं.

"काहीच नाही म्हणाला तो?" नैनाने विचारलं.

"नाही. गोविंद काहीच नाही म्हणाला. तो चक्रम शेषा मात्र काहीतरी बरळला." संस्कृती सहज म्हणाली.

"शेषा? तो काय म्हणाला?" नैनाच्या आवाजात पराकोटीची उत्सुकता होती.

संस्कृतीने हसत हसत घडलेला प्रसंग सांगितला.

"सामंतच्या मनात काय होतं ते बोलत होता का शेषा? की त्याला दुसरा अर्थ अभिप्रेत होता?" नैनाने संस्कृतीला विचारलं. तिच्या प्रश्नाने नकळत संस्कृती सावध झाली. संस्कृतीच्या मनात पाल चुकचुकली. शेषा जे काही बोलला होता ते तंद्रीमध्ये काहीतरी होतं असा संस्कृतीचा समज होता. पण नैनाने विचारलेल्या प्रश्नामुळे संस्कृतीच्या मनात आलं... कदाचित शेषाच्या तोंडून नकळत काहीतरी बाहेर पडलं असेल का? खरं तर नैनाला काहीच माहीत नाही. तरीही तिचा प्रश्न तसा थेट आहे.

संस्कृती विचारात पडलेली बघून नैनाने एकदम बोलणं आवरतं घेतलं आणि उठून स्वतःच्या पलंगाकडे जात म्हणाली; "झोप तू संस्कृती. तुला बरं नाही आणि उशीर देखील खूप झाला आहे. उद्या बोलू. good night." आणि संस्कृती अजून काही बोलायच्या आत ती आडवी झाली आणि तिने डोळे मिटून घेतले.

क्रमशः



No comments:

Post a Comment