Friday, February 4, 2022

अनाहत सत्य (भाग 10)

 अनाहत सत्य

भाग 10

"काय अर्थ आहे या श्लोकाचा?" दहाव्यांदा कागदावरचा अर्थ मोठ्याने वाचून परत तो कागद समोरच्या टेबलावर ठेवत वैतागलेल्या गोविंदने म्हंटलं. जस्सी आणि शेषा तर गप्पच होते. त्यादोघांच्या मख्ख चेहेऱ्याकडे बघून गोविंद अजूनच वैतागला. "अबे... माझं तोंड बघायला आला आहात का तुम्ही?" एकदा जस्सीकडे बघून शेषा म्हणाला; "गोविंद, तू विसरतो आहेस; जरी आम्ही इतकं छान मराठी बोलत असलो तरी; आमची पहिली भाषा मराठी नाही. त्यामुळे श्लोक आणि त्याचा अर्थ जरी समोर असला तरी हे सगळं नक्की काय आहे ते आम्हाला सांगता येणं अवघड आहे." शेषाच्या बोलण्यावर जस्सी म्हणाला; "बरं, काही क्लू तरी असायला हवा न." त्याच्या त्या वाक्याने संस्कृतीला हसायला आलं. "जस्सी, हाच क्लू आहे. यातून आपल्याला शोधायचं आहे." तिने असं म्हणताच जस्सीने जीभ चावली आणि हसला.

शेषाने संस्कृतीकडे बघितलं आणि म्हणाला; "संस्कृती, तू हे सगळं अजून सोपं करू शकतेस का?" क्षणभर त्याच्याकडे बघून संस्कृतीने तो कागद पुढे ओढला आणि परत एकदा तो श्लोक ती मनात वाचायला लागली. थोड्या वेळाने समोर बघत तिने म्हंटलं; "हे बघा, मी मला कळतो आहे तो अर्थ काढला आहे; बरोबर असेलच असं नाही. पण बहुतेक हाच अर्थ असावा... एका राजाने मनात काहीतरी इच्छा धरून कोणती तरी निर्मिती या विश्वात कोणाच्यातरी मदतीने केली आहे. त्या निर्मितीची दुष्ट मनाच्या लोकांकडून नष्ट होऊ शकते किंवा होणार आहे किंवा झाली आहे... ते लोक त्या राजाच्या आजूबाजूचेच असावेत. त्या दुष्ट प्रवृत्तीच्या लोकांचा शोध तू तुझ्या सोबतच्याच लोकांच्या मदतीने घे. म्हणजे तुला जे जवळचे किंवा विश्वासाचे आहेत त्यांच्या मदतीने... असं असेल. तू एक राजा आहेस हे लक्षात ठेवलेस आणि त्याप्रमाणे योग्य वागलास तर त्या दुष्ट लोकांना शोधून तू तुझी निर्मिती वाचवू शकशील."

संस्कृती बोलायची थांबली आणि गोविंदने परत एकदा तो कागद हातात घेतला. त्याने तो श्लोक आणि त्याचा अर्थ परत एकदा वाचला... तो वाचत असताना संस्कृती एकदम काहीतरी आठवल्यासारखं म्हणाली; "गोविंद, नैनाने अर्थ सांगायच्या अगोदर मला एक विचित्र प्रश्न विचारला होता...."

तिने असं म्हणताच तिघेही सावरून बसले. "म्हणजे?" गोविंदने विचारलं.

"म्हणजे नैनाने अगोदर तो श्लोक वाचला. त्यावेळी मी डोळे मिटून त्याचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करत होते. तिचा श्लोक वाचून झाला आणि मी तिला आपणहून सांगितलं की हा श्लोक गोविंदला मिळाला आहे...." असं म्हणत संस्कृतीने तिच्या आणि नैनामध्ये झालेलं सगळं बोलणं सांगितलं.

"तुमचं नातं नक्की काय आहे... या प्रश्नाचा अर्थ काय?" शेषाने विचारलं.

"तू अजून तीच आहेस.... असं का म्हणाली ती? संस्कृती तुमची दोघींची ओळख इथलीच आहे न?" गोविंदने विचारलं.

"हो रे. ती नक्की कुठून आली आहे ते देखील मला माहीत नाही." संस्कृती म्हणाली.

"तुझं माझं नातं काय? तू अजून तशीच आहेस... मला या श्लोकाचा अर्थ तू सांगू नयेस... असं सगळं ती नैना का म्हणाली? काहीतरी कारण नक्की आहे यामागे." गोविंद म्हणाला.

सर्वांचं बोलणं शांतपणे एकणाऱ्या जस्सीने अचानक संस्कृतीला विचारलं; "ए, तू नैनाला म्हणालीस असं का म्हणालीस की तुझं अंतर्मन तुला सांगतंय की या श्लोकाचा अर्थ कळल्या नंतर अचानक सगळं बदलून जाणार आहे. एक मन म्हणतं आहे की अर्थ समजून न घेता हे सगळं विसरून जाणं बरं. त्याचवेळी दुसरं मन मात्र त्या अनादी-अनंत आणि अनोळखी भविष्याकडे ओढ घेतं आहे..."

जस्सीच्या प्रश्नाने संस्कृती अंतर्मुख झाली. तिघेही तिच्याकडे बघत होते. पण तिचं लक्ष त्यांच्याकडे नव्हत. तिची अचानक बोलता-बोलता तंद्री लागली होती. त्याच नादात ती म्हणाली; "माहीत नाही मी असं का म्हणाले. पण खरं सांगू? हा श्लोक मला त्याच्याकडे ओढतो देखील आहे आणि त्याचवेळी यासगळ्यापासून लांब जावं असं देखील वाटतं आहे. तुम्हाला खरं सांगू का? मला वाटतंय की आपण सगळेच या एका वेगळ्याच जगातल्या वेगळ्या घटनांशी जोडले गेलो आहोत; या श्लोकामुळे. काहीतरी ईश्वरी संकेत आहे यात."

"ए, गप ग. कसला ईश्वरी संकेत घेऊन बसलीस? यार तुम्ही सगळेच उगीच फार सिरीयस होता आहात. अरे यार.... कुठली गुहा त्यात लिहिलेला हा कुठला तरी श्लोक आणि त्या चक्रम नैनाने सांगितलेला त्याचा अर्थ! सगळं अजब आहे. सोडा यार हे सगळं. चला फक्कड चहा घेऊ आणि हे सगळं विसरून जाऊ." शेषा म्हणाला आणि गोविंद, जस्सी आणि संस्कृती एकदम स्थब्द होऊन त्याच्याकडे बघायला लागले. त्यांच्याकडे बघून शेषा एकदम वरमला. "म्हणजे मला म्हणायचं आहे की आपण उगाच एका काहीही आकलन न होणाऱ्या श्लोकाच्या मागे लागलो आहोत. बरं, क्षणभर धरून चालू की यात खूप मोठा अर्थ आहे आणि आपण सगळे त्याच्याशी जोडले गेलो आहोत... तर मग हा नरेश कोण? कुठला? त्याने काय निर्माण केलं? कुठे? कोणाच्या मदतीने? त्याची वाट कोणी लावली? जर वाट लावणारे त्याच्या जवळचे होते तर मग श्लोकात असं का म्हंटलं आहे की जवळच्या लोकांची सोबत असेल तरच फलप्राप्ती होईल?" एका दमात शेषा बोलला.

"तेच तर शेषा! या सगळ्या प्रशांची उत्तरं आपण शोधावीत असं मला वाटतंय. म्हणजे एकदा असं वाटतंय की शोधावीत आणि एकदा असं वाटतंय की सोडून द्यावं हे सगळं." संस्कृती म्हणाली.

"संस्कृती..." गोविंदने संस्कृतीला हाक मारली. त्याच्या आवाजातला फरक फक्त संस्कृती नाही तर जस्सी आणि शेषाला देखील जाणवला. " मला वाटतंय की त्या नैनाला काहीतरी माहीत आहे किंवा कळलं आहे या श्लोकातून. पण कदाचित तिला ते मला कळू द्यायचं नाही आहे. त्यामुळे ते ती तुला सांगत नाही आहे." काही क्षण विचार केल्यावर संस्कृतीला देखील ते पटलं. "हे खरं आहे की तिला तू आवडत नाहीस; आणि ती ते लपुनही ठेवत नाहीय. याचा अर्थ तिला माहीत असूनही ती आपल्याला काही सांगणार नाही. मग आता काय करायचं?" संस्कृती म्हणाली.

गोविंद म्हणाला; "संस्कृती, हा श्लोक किती जुना जुना आहे; त्याची भाषा किती जुनी आहे आणि त्या भाषेच्या लहीज्याचा वापर कुठल्या प्रांतात केला जात होता हे जर आपण शोधू शकलो तर कदाचित काहीतरी क्लुल शकेल."

गोविंदचं बोलणं सगळ्यांनाच पटलं. "पण मग कसं शोधणार आपण हा श्लोक कोणत्या काळातला आहे?" जस्सीने उत्साहाने विचारलं.

"कोणी पुरातन भाषातज्ञ शोधावे लागतील." संस्कृती म्हणाली.

"अबे ज्यादा लंबा नही जाना होगा।" जस्सी परत एकदा उत्साहाने खुलला. "म्हणजे?" गोविंद, शेषा आणि संस्कृती तिघांनी एकदमच विचारलं.

"अरे निशिगंध स्वामी यादव!" जस्सी हसत हसत म्हणाला.

"अबे जस्सी के बच्चे.... ये कोन स्वामी लाया तू? हा गोविंद गुहेतल्या दगडावर श्लोक शोधतो; ही त्याचा अर्थ एका चक्रम बाईकडून आणते आणि आता तू स्वामीला आणतोस. हे काय चालू आहे मला जरा कळेल का?" शेषा थोडा वैतागत म्हणाला.

"मित्रांनो.... मला काहीतरी सांगायचं आहे." गोविंद एकदम गंभीर आवाजात म्हणाला. "शेषा, हे बघ; तुला जर हे काही पटत नसेल न तर तू जाऊ शकतोस. आता लगेच अपमान करून घेऊ नकोस. माझं हे सांगणं फक्त तुलाच नाही; तर या दोघांना देखील आहे. मी अगदी प्रामाणिकपणे सांगतो आहे. तो श्लोक बघितल्या पासून मी मनातून अस्वस्थ आहे. या सगळ्याच्या शेवटापर्यंत जोवर मी पोहोचत नाही; तोवर आता मला शांतता मिळणार नाही आहे. त्यामुळे माझं समाधान होईपर्यंत मी शोध घेत राहणार आहे."

"गोविंद, मला देखील हे सगळं समजून घेण्याची खूप इच्छा आहे. तुझ्याप्रमाणे माझं मन देखील सतत या श्लोकाकडे ओढ घेतं आहे. I am in!" संस्कृती म्हणाली.

फार वेळ न दवडता जस्सी म्हणाला; "हम तो तय्यार है भाई। काहीतरी नवीन आहे. Exciting आहे... आणि सध्या दुसरं करण्यासारखं काही नाही आहे. त्यामुळे मी पण आहे तुमच्या बरोबर."

"फालतू लोक आहात तुम्ही. तुम्हाला सोडून मी कुठे जाणार आहे का? हे सगळं म्हणजे मूर्खपणा आहे...." शेषाने असं म्हणताच तिघेही उसळले. पण त्यांना काहीही बोलू न देताच तो हसत म्हणाला; "पण मी आता असं काहीही म्हणणार नाही आहे. तुम्ही जे काही कराल त्यात मी आहे. आपली मदत झाली तर ठीक; नाहीतर एन्जॉय करणार आपण! बरं, बोला महाराज जगदीश यादव कोण हे स्वामी काढलेत?"

जस्सीला त्याच्या संपूर्ण नावाने हाक मारलेलं आवडत नसे. हे गोविंद आणि शेषाला चांगलं माहीत होतं. तरीही जस्सिची कळ काढण्यासाठी शेषाने त्याचं पूर्ण नाव घेतलं आहे हे गोविंदला लक्षात आलं. त्यामुळे एकदा शेषाकडे वैतागलेली नजर टाकून तो जस्सीला म्हणाला; "लक्ष देऊ नको यार जस्सी त्याच्याकडे. मुद्दाम करतो आहे तो. तू बोल."

खरं तर जस्सीला देखील राग आला होता. पण तरीही शेषाकडे दुर्लक्ष करून तो बोलायला लागला; "निशिगंधस्वामी यादव म्हणजे कोणी स्वामी-बुवा नाहीत. त्यांचं नावच निशिगंधस्वामी आहे. ते पुरातन ते अर्वाचीन म्हणजे नवीन सगळ्याच भाषांचे अभ्यासक आहेत. वाराणसीमध्ये त्यांचा गुरुकुल आहे. ते आपल्याला या श्लोकातील भाषेबद्दल सांगू शकतात."

"जस्सी, यार, शेषा सरळ सरळ चेष्टा करतो आहे. तू काय गोल फिरून करतो आहेस का? एक तर ते जर इतके मोठे गुरुकुल चालवतात तर ते आपल्या या श्लोकाबद्दल आपल्याला माहिती का सांगतील हा पहिला प्रश्न. आणि जर समजा त्यांना आपण विचारायचं ठरवलं तर काय वाराणसीला जायचं का आपण?" गोविंदने विचारलं.

"यार गोविंद, मला काहीतरी कळतं न? अरे, निशिगंधस्वामी यादव माझे काका आहेत." जस्सी म्हणाला आणि गोविंद, शेषा आणि संस्कृती तिघेही धक्का बसून एकदमच ओरडले... "काय? जस्सी?! तू?"

त्यांना जास्त काही बोलू न देता जस्सी बोलायला लागला; "हो! मी वयाच्या सोळा वर्षापर्यंत गुरुकुलात राहून अभ्यास केला. माझे बाबा गणितज्ञ. त्यांची इच्छा होती की मी देखील माझ्या मोठ्या भावाप्रमाणे आणि इतर चुलत भावंडांप्रमाणे शिक्षणात लक्ष घालावं. पण माझं मन त्या पुस्तकांमध्ये रमलं नाही. मला नेहेमीच आजूबाजूच्या निसर्गात राहायला आवडायचं. सतत आखाड्यात वर्जिश करायचो. माझ्या बाबांना ते पटायचं नाही. मी यावरून त्यांचा अनेकदा मार खाल्ला आहे. माझ्या काकांना समजत होती माझी कुचंबणा. शेवटी माझे काका निशिगंधस्वामी मध्ये पडले आणि त्यांनी बाबांना समजावलं की मला पुस्तकी शिक्षणात रस नाही तर मग माझ्यावर जबरदस्ती करण्यात अर्थ नाही. त्यांनी बाबांना सांगितलं; जस्सीला हवं ते करू दे. जबरदस्ती करून कदाचित तो इथे राहील आणि आपल्या इतर पोरांप्रमाणे इथे शिक्षक देखील होईल. पण तो चांगला शिक्षक होणार नाही; कारण मुळात त्याला याची आवड नाही. बाबांना ते पटलं; त्यांनी मला वाराणासीमधून बाहेर पडायची परवानगी दिली. मी खुशीने बाहेर पडलो. निघताना काकांना भेटायला गेलो त्यावेळी त्यांनी मला सांगितलं; आयुष्यात कोणतीही नशा करायची नाही आणि आपलं मूळ विसरायचं नाही. कधीही अडचण आली तर मोकळेपणी आपल्या घराकडे वळायचं. त्यानंतर मी इथे आलो; आणि निघाल्यापासून आजपर्यंत काकांशी माझा रेग्युलर कॉन्टॅक्ट आहे."

"अरे वा जस्सी. तू तर एकदम छुपारुस्तुम निघालास रे. जबरदस्त आहे की तुझा इतिहास." संस्कृती हसत म्हणाली.

"ते सगळं ठीक. पण तुझ्या काकांना भेटायला जायला लागेल न. ते कसं जमवायचं?" गोविंदने विचारलं.

"यार, आपलं नशीब जोरदार आहे. पौराणिक भाषा आणि त्याचं विश्लेषण याविषयावर बोलण्यासाठी ते सध्या इथे आले आहेत. आत्ता घरीच असतील. चला आत्ताच जाऊया घरी." जस्सी म्हणाला आणि चौघेही उत्साहाने निघाले.

जस्सीने घरी पोहोचताच त्याच्या काकांना गोविंद, शेषा आणि संस्कृतीची ओळख करून दिली आणि त्यांच्या येण्याचं कारण देखील सांगितलं.

"अरे वा! एकदम इंटरेस्टिंग आहे तुमचा सगळाच अनुभव." निशिगंधस्वामी म्हणाले. "बघू बरं तो श्लोक. आणि मला तो गोविंदने काढलेला फोटो देखील दाखवा हं." वेळ न दवडता ते म्हणाले. संस्कृतीने श्लोक लिहिलेला कागद आणि फोटो दोन्ही त्यांच्या हातात दिलं. निशिगंधस्वामी तो फोटो बराचवेळ बघत होते. मग त्यांनी श्लोक लिहिलेला कागद हातात घेतला.

"या श्लोकाचा अर्थ कोणी लिहिला आहे इथे?" त्यांनी वर बघत प्रश्न केला.

"माझी एक मैत्रीण आहे होस्टेलमध्ये. ती पी. एचडी. करते आहे. तिने लिहून दिला तो अर्थ. चुकला आहे का?" संस्कृतीने विचारलं.

"नाही नाही. उलट अगदी बरोबर लिहिला आहे अर्थ. म्हणून तर आश्चर्य वाटलं मला. खरं तर ही भाषा समजायला तशी अवघड. कारण या भाषेला व्याकरण असं नाही." निशिगंधस्वामी म्हणाले.

"म्हणजे?" गोविंदने विचारलं.

"म्हणजे असं या भाषेला प्राकृत भाषा म्हणतात. प्राकृत हा शब्द प्रकृतीवरून आला. प्राकृत म्हणजे जे नैसर्गिक आहे ते. प्राकृत म्हणजे जनसामान्यांची भाषा. या भाषेचा उगम लक्षात घेता तिचे व्याकरण फार समग्र नव्हते. संस्कृतच्या मानाने प्राकृत भाषेतली व्यंजने, व्याकरण हे मर्यादित होतं. बऱ्याच जुन्या संस्कृत नाटकांमध्ये उच्चभ्रू लोकांची भाषा संस्कृत, तर इतर लोकांची भाषा प्राकृत दिसते; त्याचं तात्कालिक कारण देखील प्राकृत भाषेतील व्याकरणातील कमजोरी हे असावं. लेखी आणि कामकाजाच्या भाषेसाठी प्राकृताचा वापर न होता संस्कृत वापरली जात असावी; ते याचमुळे.

इ.स.पूर्व ६व्या शतकात प्राकृत भाषा बोलली गेल्याचे पुरावे आढळतात. तर सम्राट अशोकाच्या कारकिर्दीत लेखी प्राकृताचे पुरावे मिळालेले आहेत. प्राचीन व मध्ययुगीन भारतात सुमारे ३८ प्राकृत भाषा बोलल्या जात, असे सांगितले जाते. असे असले तरी तत्कालीन समाजव्यवस्थेमुळे या भाषांना मातृभाषेचा किंवा राज्यभाषेचा दर्जा प्राप्त नव्हता.

प्राकृत भाषेचे प्रमुख प्रकार असे:

वेदकालीन प्राकृत- प्राथमिक अवस्था.
मध्ययुगीन प्राकृत - पाली, महाराष्ट्री, शौरसेनी इत्यादी
महाराष्ट्री- शौरसेनी सारख्या भाषांची अपभ्रंश भाषा

वेदपूर्वकालीन भाषा, वैदिक भाषा, संस्कृत, प्राकृत, अपभ्रंश भाषेच्या स्वरूपावरुन प्रत्येक भाषेतील काही वैशिष्ट्ये मराठी भाषेत दिसतात. त्यामुळे मराठी ही वेदपूर्वकालीन भाषेपासून, संस्कृतपासून, पालीपासून, प्राकृत भाषेपासून, महाराष्ट्री किंवा अपभ्रंश भाषेपासून तयार झाली असावी असं मानलं जातं.

काही प्राकृत भाषा याप्रमाणे - मागधी, शौरसेनी, पैशाची, महाराष्ट्री भाषा, अर्धमागधी भाषा, अपभ्रंश भाषा, पाली इत्यादी. यापैकी महाराष्ट्री भाषा ही भाषा सातवाहन राज्यकाळातील प्रमुख भाषा गणली जाते. या भाषेत साहित्य लिहिले गेल्याचे पुरावे मिळतात. ख्रिस्तपूर्व काळातील प्राकृत शिलालेखही सापडले आहेत, सातवाहन राजा हलाने प्राकृत कवितांचे संकलन केल्याचे उल्लेख मिळतात. मराठी हे महाराष्ट्री भाषेचे सुधारित रूप आहे.

बरं, हे सगळं झालं प्राकृत भाषेविषयी. यातलं तुमच्यासाठी महत्वाचं म्हणजे या श्लोकामध्ये वापरलेली भाषा. या भाषेचा वापर साधारण इसवीसनाच्या सहाव्या शतकात केला होता. इथे जो अर्थ लिहिला आहे तो देखील बरोबर आहे... पण तुम्ही जो अर्थ काढता आहात तो थोडा चुकतो आहे. बघा श्लोक काय आहे....

सृष्टी निर्माता नच जरी स्व हा।
तुझी कामना पूर्त विश्वात।

म्हणजे;

हा श्लोक ज्याच्यासाठी आहे तो (स्व) तो जरी सृष्टी निर्माता नाही; तरी तुझी (या स्व ची) (कामना) इच्छा याच विश्वात पूर्ण होईल आणि त्याने इच्छा केलेली निर्मिती होईल.

याचा अर्थ; त्या 'स्व' ची काहीतरी निर्मिती करण्याची इच्छा आहे आणि ती कोणीतरी पूर्ण करतं आहे. पण पुढच्या संपूर्ण श्लोकामध्ये त्या इच्छा पूर्ण करणाऱ्यांचा उल्लेख नाही. त्या नरेशाला त्याच्या आप्तांकडून धोका झाला आहे; आणि तरीही त्याने त्याच्या जवळच्यांवर विश्वास ठेवणे आवश्यक आहे. सगळं बरोबर आहे... पण त्या नारेषाच्या इच्छेप्रमाणे निर्मिती करणारे ते कोण हे जास्त महत्वाचं आहे."

काका बोलायचे थांबले आणि मंत्रमुग्ध होऊन त्यांचं ओघवतं बोलणं ऐकणारे गोविंद, संस्कृती, शेषा आणि जस्सी एकदम भानावर आले.

"काय रे पोरांनो, झोपलात का?" काका हसत म्हणाले.

"नाही नाही काका. किती छान माहिती दिलीत तुम्ही. ही प्राकृत भाषा आहे सहाव्या शतकातली आहे... पण नक्की कुठली. म्हणजे कोणत्या भागातली ते कसं कळेल?" गोविंदने विचारलं.

"बेटा, थोडं अवघड आहे. पण नक्की सांगेन. मी आजच वाराणसीला जायला निघतो आहे. रात्री पोहोचेन. ही भाषा माहाराष्ट्रातली नक्की! मात्र कुठल्या भागातली याचा माझ्याकडच्या पुस्तकांमध्ये बघून अभ्यास करतो आणि जस्सीला उद्यापर्यंत कळवतो. ठीक?" काका म्हणाले.

"हो चालेल न." गोविंद म्हणाला.

"बरं, मुलांनो... आता फक्त एकाच प्रश्नाचं उत्तर द्या. का शोधता आहात तुम्ही हे सगळं?" काकांनी गंभीर होत विचारलं.

"माहीत नाही काका. पण हा श्लोक वाचल्यापासून आम्ही... विषेशतः मी आणि गोविंद खूप अस्वस्थ आहोत. त्यामुळे जोपर्यंत मन शांत होत नाही तोपर्यंत शोध घ्यायचा असं आम्ही ठरवलं आहे." संस्कृतीने उत्तर दिलं.

"ठीक! All the best. मी माझ्याकडून होईल ती मदत करतोच आहे. अजून काही लागलं तर निःसंकोचपणे विचारा. पण ते पुढे. चला; मला निघायला हवं. माझ्या फ्लाईटची वेळ झाली." असं म्हणून काका उठले.

जस्सीच्या घरून बाहेर पडताना गोविंद, संस्कृती आणि शेषाच्या चेहेऱ्यावर एक समाधान होतं.

क्रमशः

No comments:

Post a Comment