श्रीकृष्ण - दारूक
मनात अनेक प्रश्न कायम दाटत आले. अनेकदा हे प्रश्न स्वामींकडे उधकृत करावेत आणि त्यांची उत्तरे समजून घ्यावीत असा मोह देखील झाला. मात्र मी केवळ एक सारथी आहे, हे माझ्या जीवनाचे सत्य विसरणे मला शक्य नव्हते. त्यामुळे हे प्रश्न कायम मी माझ्या मनातच ठेवले.
कंस माहाराजांच्या वधानंतर कोवळ्या वयातील त्या सावळ्या मोहमयी अस्तित्वाने मी भारित झालो ते आजवर. स्वामींनी माझ्यासारख्या मुखदुर्बल आणि शरीरयष्टीने अत्यंत किरकोळ सारथी पुत्राला आयुष्याचा सोबती करणे म्हणजे मुंगीने आकाशाला प्राप्त करून घेण्यासारखे आहे. त्यावेळेस माझ्या मनामध्ये पहिला प्रश्न निर्माण झाला होता.... कोवळ्या वयातील या सावळ्याच्या मनात माहाराज कंसाच्या अत्याचाराने विटलेले मथुरावासीयांच्या दुःखाचे पडसाद कधी उमटले असतील? मात्र तो प्रश्न मी माझ्या मनपटलावरून क्षणात पुसून टाकला होता. कारण या प्रश्नाच्या उत्तरापेक्षा देखील त्या सावळ्या मोहक व्यक्तिमत्वाची जादू मोठी होती.
कंस माहाराजांचे श्वसुर जरासंध माहाराज यांनी स्वामींच्या मथुरेवर अठरा वेळा हल्ला केला. शेवटच्या युद्धाच्या वेळी तर त्यांनी स्वतःसोबत दूर देशीचा योद्धा कालिवाहन यास त्यांच्या सोबत मथुरेवर हल्ला करण्यास आमंत्रण दिले. तो देखील त्याची महाप्रचंड सेना घेऊन आला त्यावेळी युद्धनिती निपुण माझ्या स्वामींनी मला त्यांच्या अंतःपुरात बोलावून घेतले आणि सांगितले की त्यांनी खूण केल्याक्षणी मी रथ युद्धभूमीमधून लांब पळवून न्यायचा आहे. त्यावेळी माझे तरुण उसळते रक्त ही आज्ञा मान्य करण्यास तयार नव्हते. मात्र माझ्या मनापेक्षादेखील माझा माझ्या स्वामींवर जास्त विश्वास आहे. त्यांनी निरोप पाठवून आव्हाहन केले की युद्ध करून दोन्हीकडील सैनिकांना मृत्युमुखी पडण्यापेक्षा कालिवाहन आणि मी असे दोघेच द्वंद्वयुद्ध करू. स्वतःच्या शक्तीवर आणि बाहूंवर प्रचंड विश्वास असणाऱ्या कालिवाहनाने हे आव्हाहन स्वीकारले. आम्ही युद्धभूमीवर पोहोचलो. केवळ गरुडध्वज रथ चालवणारा मी आणि रथारुढ माझे स्वामी, श्रीकृष्ण! स्वामींनी रथातून उतरताना माझ्या खांद्याचा आधार घेतला. इतरांसाठी ती एक लक्षातही न येणारी कृती होती. मात्र मला त्यांच्या अंतःपुरातील आमची चर्चा पुन्हा एकदा आठवून देणारी होती. भर युद्धामध्ये एका क्षणी स्वामींनी अचानक कालिवाहनाकडे पाठ केली आणि डोळ्याचे पाते लवण्याअगोदरच ते रथारूढ झाले. कोणालाही काहीही समजण्या अगोदर मेघपुष्प, बलाहक, शैब्य, सुग्रीव या स्वामींच्या प्राणप्रिय अश्वांनी आम्हाला दूर सागरकिनारी नेले होते. हो! सागरकिनारी... जिथे स्वामींनी जरासंध माहाराजांच्या लक्षात येण्याअगोदरच त्यांच्या संपूर्णपणे आवाक्याबाहेर असलेल्या या सागरकिनारी द्वारका नगरी वसवली होती. कालिवाहनाशी ठरवलेले द्वंदाचे कारण मथुरावासीयांना द्वारकेस सुखरूप पोहोचवण्यासाठीचा लागणारा वेळ घेणे हे होते..... आणि तरीही माझ्या मनात प्रश्न निर्माण झालाच; स्वामींना कालवाहनास द्वंदात हरवणे अशक्य नव्हते; मग तरीही युद्ध सोडून पळ का काढला असेल स्वामींनी? अर्थात द्वारकेमध्ये प्रवेश करताच मनातील प्रश्न विरघळून गेला.
देवी सुभद्रा यांचे हरण हा तर माझ्या यादवी मनाची हळुवार जखमच आहे. देवींना द्वारकेच्या बाहेरील शिव मंदिरामध्ये नेण्याची जवाबदारी स्वामींनी माझ्यावर टाकली होती. स्वामींच्या सानिध्यात राहून मी देखील काही प्रमाणात शस्त्र विद्या आत्मसाद केली होती. त्यादिवशी देवींना घेऊन जाण्यासाठी मी रथ त्यांच्या अंतःपुरासमोर आणून उभा केला त्यावेळी स्वामींनी हसत मला म्हंटले;'दारुका, तू देवालयात जातो आहेस; युद्धावर नाही. त्यात आता रथावर माझी प्रिय भगिनी सुभद्रा असणार आहे. मग ही शस्त्र सिद्धी कशासाठी? तिचे नाजूक मन दुखावले जाईल रे बाबा. काढून ठेव बघू ती शस्त्रे. स्वामींची आज्ञा शिरसावंद्य मानून मी माझी शस्त्रे जवळच उभ्या सैनिकाकडे सुपूर्द केली. देवी सुभद्रा रथारूढ झाल्या आणि मी आसुडाचा आवाज करणार एवढ्यात स्वामींची दुसरी सूचना आली... दारुका, मित्रा... रथ अंमळ दूरच ठेव हो देवाल्यापासून.... माझे यादवी मन स्वामींच्या मिश्किलतेतील अर्थ शोधत राहिले... आणि स्वामींच्या प्रिय अर्जुन माहाराजांनी देवी सुभद्रा यांचे हरण केले. डोळ्यासमोर घडणारी घटना असूनही मी स्वस्थ राहीन असे स्वामींना का वाटले असेल? या प्रश्नाने मला आयुष्यभर सतावले आहे.
ज्यावेळी स्वामी पांडवांच्या बाजूने शिष्ठाई करण्यासाठी हस्तिनापुरामध्ये दाखल झाले त्यावेळी मीच त्यांना राजसभेच्या द्वाराशी सोडले होते. हस्तिनापुराकडे आम्ही प्रयाण केले त्याक्षणापासून माझे स्वामी अस्वस्थ होते. हस्तिनापुरास आम्ही पोहोचलो आणि रथाचा वेग मर्यादेत आणत मी मेघपुष्प, बलाहक, शैब्य, सुग्रीव यांना दुडक्या चालीने चालण्याचा आदेश दिला. त्यावेळी माझ्या खांद्याला स्पर्श करीत स्वामी म्हणाले होते;"दारुका, परतीच्या वेळी आपणासोबत रथावर काही वेळासाठी तुझ्या हृदयाजवळ असणारी व्यक्ती असणार आहे. जर बोलणे यशस्वी झाले तर हे युद्ध होणार नाही." स्वामींच्या चिंतीत आवाजामुळे व्यथित होऊन मी म्हणालो होतो;"स्वामी, माहाराज भीष्म पांडवांवर जीवापाड प्रेम करतात. ते पांडवांवर कधीच अन्याय होऊ देणार नाहीत. आपली शिष्ठाई कधीच वाया जाणार नाही." यावर त्यापरिस्थितीत देखील स्मितहास्य करीत स्वामी म्हणाले;"अरे, राजसभेमध्ये होणारा निर्णय मला आताच माहीत आहे. मी कर्ण भेटीसाठी उत्सुक आहे." त्यांच्या या उदगारांनी मी अचंबित होऊन मागे वळून बघितले. मात्र तोवर राजसभेचे द्वार समोर आले होते. त्यामुळे स्वामींच्या चेहेऱ्यावरील भाव मला दिसले नाहीत. राजसभेमध्ये नक्की काय चर्चा झाली ते माझ्यासारख्या सारथ्या कळणे दुरापस्थ होते. मात्र परतीच्या वेळी स्वामींसोबत सुतपुत्र अंगराज कर्णाला येताना बघून मी गोंधळून गेलो होतो. स्वामी जे म्हणाले होते ते खरे होते. आमच्या कुळामध्ये जन्म घेतलेले माहाराज कर्ण आज स्वकर्तुत्वाने अंगराज झाले होते. त्यामुळे ते दुष्ट दुर्योधनाच्या बाजूने असले तरीही ते मला फार प्रिय होते. स्वामी अंगराजांच्या भेटीसाठी उत्सुक होते.... माहाराज कर्ण स्वामींसोबत रथारूढ झाले आणि मी रथ हस्तिनापुराबाहेर काढला. गंगेकिनारी एका वटवृक्षाच्या छायेत मी अश्वांना मोकळे केले आणि त्यांच्या सोबत गंगेच्या दिशेने पाऊल उचलले. रथाजवळ आता स्वामी आणि अंगराज कर्ण तेवढे होते. मी अश्वांना पाणी पाजून परतलो त्यावेळी मात्र रथाजवळ विचारात गढलेले एकटे स्वामी होते. रथ सज्ज होताच रथारूढ होत स्वामी अत्यंत कष्टी आवाजात मला म्हणाले;"दारुका, युद्ध आता नक्कीच अटळ!" अशी काय चर्चा झाली होती अंगराज कर्ण आणि माझे स्वामी यांच्यामध्ये?
खरंच; युद्ध अटळ होते आणि माझ्या स्वामींचे पांडवांची बाजू घेणे देखील. हातात शस्त्र न धरण्याचे वचन दिलेले... आपल्या प्रिय पार्थाच्या रथाचे सारथ्य स्वीकारणारे माझे स्वामी धर्म-अधर्माचे युद्ध घडवत होते. येणाऱ्या पुढील प्रत्येक युगांसाठी आदर्श निर्माण करण्यासाठी स्वतःकडे कमीपणा घेत.... प्रसंगी बदनामी सहन करत माझे स्वामी सर्वांचाच जीवनरथ हाकत होते.... आणि युद्ध घडले. माझी भूमिका बजावणाऱ्या माझ्या स्वामींच्या सोबत या युद्धाच्या वेळी देखील मी होतोच. एक सारथी आपल्या स्वामींना सोडून कुठे जाणार? संपूर्ण युद्धामध्ये प्राणप्रिय जनांच्या मृत्यूला स्वामी धीराने सामोरे जात होते. प्रिय अभिमन्यूच्या मृत्यूनंतर पार्थाला धीर देऊन दुसऱ्या दिवशी युद्धाला उभे करताना त्यांच्या मनाला झालेल्या यातना मी अनुभवल्या देखील. मात्र सतराव्या दिवशी कौरव सेनापती अंगराज कर्ण आणि अर्जुन यांच्या युद्धसमयी माझ्या स्वामींच्या जिव्हेचे खडग अंगराजांना घायाळ करीत होती आणि अर्जुनाला पेटवत होते याचा मी साक्षीदार होतो........ आणि तरीही युद्धसमाप्ती नंतर सुतपुत्र कर्णाच्या मृतदेहाला एका कातळावर अग्नी देताना स्वामींसोबत देखील मीच होतो. का बरे माझ्या स्वामींचे डोळे पाणावले होते एका सुटपुत्राला अग्नी देताना.... ज्याच्या मृत्यूला त्यांचीचं जिव्हा कारणीभूत होती?
.............. आणि स्वामींनी मला प्रभास तीर्थी नेण्यास सांगितले आणि रथातून उतरताना मला परतीचा प्रवास सुरू करण्यास सांगितले............. का? आयुष्यभर ज्याला सतत सोबत ठेवले त्याचा त्याग स्वामींनी शेवटच्या प्रवासाच्या वेळी का केला?
प्रश्न केवळ प्रश्न!!!! उत्तर एकच.......
श्रीकृष्णार्पणमस्तू!!!
.
Wonderful
ReplyDeletethank u
ReplyDelete