Friday, January 15, 2021

प्रवास भाग 3

 प्रवास 


भाग 3




सगळे अंगणात गाद्या टाकून चांदण्यांनी भरलेल्या आकाशाकडे बघत पडले होते. आजूबाजूची किर्रर्र झाडी; गुड्डूप्प अंधार आणि चांदण्यांनी भरगच्च आकाश! एक वेगळंच गूढ वातावरण तयार झालं होतं. सहाजिकच गप्पांचा ओघ भुतं या विषयावर घसरला. कोणी सुरवात केली ते लक्षात आलं नाही पण अनघा आणि मनाली बाहेर आल्या तर मंदार त्याच्या कोणा काकांचा अनुभव सांगत होता.

मंदार : अरे काका घरीच निघाले होते...

मनाली : नक्की कशाबद्दल बोलतो आहेस रे?

असं म्हणत ती अगदी शेवटच्या खाटेवर टेकली.

मंदार हसत म्हणाला :अग काही नाही माझ्या काकांचा भुताचा अनुभव सांगत होतो.

मंदारने असं म्हणताच मनाली पटकन उठून उभी राहिली आणि वैतागलेल्या आवाजात म्हणाली;"काय यार! नवीन वर्ष सुरू होईल इतक्यात. जरा बरे विषय काढा की. त्यावर तिला चिडवत नवीन म्हणाला;"अग करोनामुळे जे गेलेत ना त्यांना श्रद्धांजली म्हणून आम्ही हा विषय निवडला आहे."

मनालीने मान उडवली आणि उठून सगळ्यांच्या मध्ये येऊन बसली. तिच्या शेजारी बसत अनघा म्हणाली;"मनाली, चिंता नको करुस. परवाच पौर्णिमा होऊन गेली आहे आणि त्यात त्यादिवशी दत्त जयंती होती. एकदम चांगला दिवस. बघ न वर चंद्र किती मस्त दिसतो आहे. मुंबईमध्ये आपल्याला असं इतकं सुंदर ताऱ्यांनी भरलेलं आकाश दिसतं का?"

तिने असं म्हणताच सगळेच वर बघायला लागले. क्षणभराने आनंद म्हणाला;"तारे कमी आहेत मॅडम. चंद्र असताना तारे नसतात."

अनघा : म्हणजे?

आनंद : म्हणजे राजा एकच असतो... मालक एकच असतो.... तो असताना बाकी कोणीच नसतं आजूबाजूला.

असं म्हणून आनंद एकदम विचित्र मोठ्याने हसला. खरंतर हा काही जोक नव्हता. त्यामुळे त्याचं ते हसणं सगळ्यांना विचित्र वाटलं. अनघाने सारवासारव केल्यासारखं म्हणलं;"बरं बरं! राजे आपण जरा गप्प बसा म्हणजे मँडीच्या काकांची स्टोरी तो सांगू शकेल." अनघाकडे दुर्लक्ष करत आनंदने आपलं बोलणं चालू ठेवलं आणि मनालीकडे बघत म्हणाला;"आणि मनाली, भुतं कॅलेंडर बघून नाही बाहेर पडत. त्यांना अमावस्या काय आणि पौर्णिमा काय.... इच्छा झाली की निघाली ती. त्यात दत्त जयंती न? अग दत्ताला भुतं आवडतात....

आनंद असं म्हणाला आणि अचानक घरातून काहीतरी पडल्याचा मोठ्ठा आवाज झाला. सगळेच दचकून घराकडे बघायला लागले. खाटेवर आडवा पडलेला आनंद एकदम उभा राहिला आणि कोणालाही कळायच्या आत घराकडे धावला. नवीन आणि मंदार देखील उभे राहिले. पण अचानक मागे वळून बघत आनंद म्हणाला;"कोणीही यायची गरज नाही. मी बघून घेतो काय ते." आणि एकदम घरात निघून गेला.

तो आत गेला त्या दिशेने बघत सगळे खाली बसले. नविनची नजर सहज आनंदच्या वाड्यावरून फिरायला लागली. आनंदने अजूनही घराचा जुनेपणा जपला होता. घराला अजूनही कौलं होती. उंच छताचं कौलारू घर बघताना नवीन सहज म्हणाला;"आता वीज आहे म्हणून ठीक आहे... पण पूर्वी हे घर संध्याकाळनंतर किती भयानक वाटत असेल नाही?"

नवीन असं म्हणाला आणि अचानक घरातले सगळे दिवे गेले. एकदम अंधार झाला सगळीकडे. त्याक्षणी रातकिडे अंगावर आल्यासारखे कर्रर्रर्र करत ओरडायला लागले. एकदम वातावरण थंड झाल्यासारखं वाटायला लागलं आणि मेन गेट जवळून कोणीतरी चालत येत असल्या सारखा आवाज यायला लागला. मंदार, नवीन, अनघा आणि मनाली प्रचंड घाबरून गेले. आवाज जवळ जवळ येत होता... अगदी सावकाश कोणीतरी चालत होतं. काहीही घाई नसल्यासारखं! सगळ्यांची नजर आवाज येत होता त्या बाजूला लागून राहिली होती. सगळ्यांनी नकळत आपापले मोबाईल हातात घेऊन टॉर्च चालू केली होती आणि एकदम सावध पवित्र्यात उभे राहिले होते. इतक्यात....

इतक्यात आनंद मागून येऊन त्यासगळ्यांच्या जवळ उभा राहिला आणि त्याने हातातून आणलेला मोठ्ठा फुगा टाचणी लावून फोडला. सगळे भयंकर दचकत घाबरून धडपडले. त्यांच्याकडे बघत आनंद खदाखदा हसायला लागला आणि एकदम ओरडला...

HAPPY NEW YEAR TO ALL OF U!!!

धडपडत उभे राहात सगळेच हसायला लागले आणि एकमेकांना मिठ्या मारत सगळ्यांनी नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या एकमेकांना.

घरातले दिवे आता लागले होते. अनघाचा हात धरत घराच्या दिशेने जात मनाली म्हणाली;"ए आपण आता आतच बसूया ह."

तिच्या मागून सगळेच निघाले. आत जाता जाता नविनने सहज मागे वळून बघितले तर; सगळे पुढे गेलेले बघून आनंद काहीसा बाहेरच्या बाजूला पुढे गेला होता आणि एका बाजूला असणाऱ्या गर्द झाडीच्या जवळ जाऊन काहीतरी करत होता. नविनने मागे वळत आनंदला हाक मारली;"आनंद.... काय करतो आहेस रे?"

नविनचा आवाज ऐकून आनंदने मागे वळून बघितले तर नविनला आनंदचे डोळे एकदम गुंजेसारखे लाल होऊन चमकत आहेत असं वाटलं. नवीन ते बघून दचकला आणि काही न बोलता घरात पळाला.

सगळे घराच्या दिवाणखान्यात जाऊन बसले होते. सगळे आले तरी आनंद आत आलेला नाही हे बघून अनघा परत मागे वळली. तिचा हात धरून तिला अडवत नवीन म्हणाला;"येईल तो. नको जाऊस तू बाहेर." नविनने अडवलेलं अनघाला आवडलं नाही. हात सोडवून घेत तिने कपाळावर आठ्या आणल्या आणि त्याच्याकडे दुर्लक्ष करून दाराकडे निघाली. अनघा घराबाहेर पडणार एवढ्यात घराच्या मागच्या बाजूने कोल्हेकुई ऐकायला यायला लागली. कोल्हा प्रचंड मोठ्या आवाजात ओरडत होता. आतामात्र घरातले सगळेच एकदम घाबरून गेले. बाहेर पाऊल ठेवणारी अनघा पण घाबरून थांबली. कोल्हेकुई हळूहळू घराच्या पुढच्या बाजूला सरकायला लागली. बाहेर जावं की नाही.... आनंद कुठे गेला आहे.... या संभ्रमात अनघा होती आणि अचानक आनंद बाहेरून आत आला. त्याच्या चेहेऱ्यावर घाबरलेले भाव होते. तो धावत आत आल्यामुळे दारातच उभ्या असलेल्या अनघावर तो आदळला आणि दोघेही घराच्या आत पडले. दोघे आत येताच घराचं दार एकदम धाडकन बंद झालं. दार बंद होताच कोल्हेकुई अचानक थांबली.

घरातले सगळेचजण अस्वस्थ झाले. सगळेच दिवाणखण्याच्या मध्यभागी येऊन उभे राहिले. सगळ्यांनीच नकळत एकमेकांचे हात धरले होते. गुपचूप उभे होते सगळे. वातावरण जणूकाही ढवळलं गेलं होतं. थोडावेळ तसाच गेला आणि सगळं एकदम शांत झालं. सगळेचजण अस्वस्थ झाले होते.

अनघाने सगळ्यांकडे एकदा बघितलं आणि म्हणाली;"चला रे झोपुया आपण सगळे. तसही उशीर झाला आहे. जागत बसलो तर आता नको ते विषय निघतील."

त्यावर आनंद अनघाकडे बघत म्हणाला;"अग इतक्या दिवसांनी भेटलोय आपण तर गप्पा मारत बसू की थोडावेळ अजून. नाहीतरी उद्या सकाळी उठायची घाई कोणाला आहे? आरामात उठून जेऊन निघू. आज की रात अपनी हें। तो उसका मजा उठाना ही चाहीये। क्या बोलते हें दोस्त लोग?" असं म्हणत आनंदने मंदार आणि नविनकडे बघितलं. वातावरण थोडं निवळलेलं असल्याने सगळेच सैलावले होते. समोरच्या दिवणावर बसत मंदारदेखील म्हणाला;"बसूया रे सगळे. आनंद म्हणतो आहे ते खरं आहे. इतक्या दिवसांनी भेटून फक्त झोपायचंच होतं तर इतकं लांब का आलो आपण?"

त्याच्याकडे बघत मनाली म्हणाली;"मुंबईमध्ये कर्फ्यु होता म्हणून इथे आलो आपण."

त्यावर टाळी वाजवत मंदार म्हणाला;"exactly! उशीर होईल आणि मग पकडले जाऊ म्हणून इथे आलो. उशीर का? कारण आपण गप्पा मारणार. म्हणजे मुळात गप्पा मारायलाच आपण इथे आलो आहोत. right?"

त्याचा युक्तिवाद पटल्यामुळे असेल किंवा वातावरण निवळल्यामुळे असेल नवीनने पण बसत मंदारला टाळी दिली.

आनंद देखील बसला आणि त्याने अनघाचा हात धरून तिला बसवलं. त्याने असं बसवल्याने अनघाला मनातून बरं वाटलं आणि ती पण मोकळेपणी हसली. मात्र जागून गप्पा मारणं मनालीच्या मनात मुळीच नव्हतं. तिला इथे पोहोचल्यापासूनच काहीसं अस्वस्थ वाटत होतं. त्यामुळे तिला खरंच खोलीत जायचं होतं. पण एकटीने आत जायची हिम्मत तिच्यात मुळीच नव्हती. त्यामुळे ती देखील मनाविरुद्ध खाली बसली.

ती बसलेली बघताच मंदारला तिची चेष्टा करायची हुक्की आली आणि अनघाकडे डोळा मारत तो म्हणाला;"अनघा, तू कोणत्या नको त्या विषयांबद्दल म्हणत होतीस ग?"

त्यावर एकदा मनालीकडे बघत अनघा म्हणाली;"ए आगाऊपणा नकोय ह. मनाली मनातून अस्वस्थ आहे. त्यामुळे भुतंखेतं असले विषय नकोत."

अनघा असं म्हणताच आनंद मोठ्याने हसला. सगळेच त्याच्या हसण्याने दचकले. त्यावर हसू दाबत आनंद म्हणाला;"सॉरी... सॉरी.... नाही बोलायचं असं म्हणत अनघानेच विषय काढला म्हणून मला हसायला आलं इतकंच."

त्यावर आनंदला फटका मारत अनघा म्हणाली;"उगाच काय? मनालीला कसली भिती वाटते ते मी सांगत होते इतकंच."

अनघाकडे शांतपणे बघत आनंद म्हणाला;"हो का? एकट्या मनालीला भिती वाटते का? तू एकदम झाशीची राणीच आहेस!! तसं असेल तर आत जाऊन बीअरच्या बोटल्स घेऊन ये की." आनंदाचं बोलणं अनघाला आवडलं नाही. पण ती काही न बोलता उठली आणि आत जायला वळली. ती जेमतेम आतल्या दाराजवळ पोहोचली असेल आणि एकदम त्या दारातून भिकू बाहेर आला. त्याच्या हातात बऱ्याच बीअरच्या बाटल्या होत्या. त्याला असं एकदम समोर आलेलं बघून अनघा दचकली. तिच्या हातात बाटल्या देत भिकू म्हणाला;"मी इथेच आहे आत ताई. काही लागलं तर हाक मारा."

त्याच्याकडे आश्चर्याने बघत अनघाने बाटल्या घेतल्या आणि ती मागे वळली. मधल्या टेबलावर बाटल्या ठेवत तिने आनंदला विचारलं;"तू थांबवलं आहेस का भिकुला?" अनघाकडे एकदा शांतपणे बघत त्याने 'हो' म्हणून मान डोलावली. त्यावर अनघाचे डोळे मोठे झाले. ती काहीतरी बोलणार होती पण मग गप बसली.

बिअरच्या बाटल्या उघडल्या आणि सगळेच सावकाश एक एक सिप घ्यायला लागले. नकळतच सगळेजण आपापल्या विचारात दंग झाले होते.

अनघा : असा का वागतो आहे हा आनंद? इथे आल्यापासून एकदम विचित्रच बोलतो आहे. आज ज्या दरवाजातून त्याने आम्हाला आत आणलं तो दरवाजाचं काय पण तिथल्या दोन्ही खोल्यांमध्ये त्याने कधी पाय ठेवला नव्हता. आम्ही जेव्हा जेव्हा आलो... तो मला म्हणाला आहे की त्याला तिथे असं काहीतरी जाणवतं ज्यामुळे तो अस्वस्थ होतो... आणि जी बेडरूम त्याने स्वतःसाठी घेतली ती देखील! मागे पहिल्यांदा त्याने मला आणलं तेव्हा एकदाच तो मला म्हणाला होता की ती बेडरूम त्याच्या सावत्र आईची होती. त्यामुळे त्या बेडरूमच्या आत जायला त्याला कधीच आवडलं नव्हतं. आज मात्र तीच खोली त्याने त्याच्यासाठी घेतली होती. सर्वात कमाल म्हणजे तो भिकू याला मुळीच आवडायचा नाही. भिकुला देखील ते माहीत होतं. त्यामुळे तो देखील आनंदच्या समोर यायचा नाही. आज मात्र तो बीअर घेऊन बाहेर येत होता... जेवण गरम करून द्यायला आला. अजूनही इथे थांबला आहे!

मनाली : इथे सगळंच कसं विचित्र वाटतंय आल्यापासून. अनघा आणि आनंद इतके सिरीयस असतील असं नव्हतं वाटलं मला. मागे एक-दोन वेळा आनंद मला भेटला होता मुंबईमध्ये तर मला वाटलं होतं की तो मला हिंट्स देतो आहे की त्याला माझ्यात इंटरेस्ट आहे. त्यामुळेच तर मला त्याच्याबद्दल काहीतरी वाटायला लागलं होतं. त्यात तो एकटा; आई वडील नाहीत; इतकी मोठी प्रॉपर्टी. त्याच्याशी लग्न म्हणजे सुखच सुख हे देखील आलं होतं मनात. बरं झालं इथे आले. माझ्या मनातल्या शंकांचं निरसन झालं.

मंदार : आनंद एकटा भेटतच नाहीये इथे. दोन मिनिटं मिळाली होती ब्रेकफास्टला थांबलो होतो तेव्हा. त्याचवेळी विचारलं होतं काही ठरलं का तुमचं. तर याने उत्तर देखील दिलं नाही. जेव्हा मदत हवी होती तेव्हा सतत फोन्स आणि डिनर्सना घेऊन जात होता साला. आता काम झालेलं दिसतंय. म्हणून ओळख पण देत नाही त्या विषयाची.

नवीन : अनघाला कसं कळत नाही की आनंद तिला फक्त वापरतो आहे. उद्या लग्न केलंच तरी घरात ठेवलेली भाऊली इतकीच किंमत ठेवेल तिची. हिला काहीच कसं दिसत नाही? की ती त्याच्या पैशावर इतकी भाळली आहे की दिसत असून दुर्लक्ष करते आहे?

सगळेच विचारात गढलेले होते. मध्ये कधीतरी भिकूने येऊन वेफर्स-चकल्या असं काहीबाही आणून ठेवलं होतं. त्याने अजून थोड्या बीअरच्या बाटल्या देखील आणून ठेवल्या होत्या.

सगळे विचारात गढले होते आणि आनंद मात्र शांतपणे प्रत्येकाचं निरीक्षण करत होता. त्याने पुढे होत बाटल्या उघडायला सुरवात केली आणि सगळेच तंद्रीतून जागे झाले. सगळ्यांकडे हसत बघत आनंद म्हणाला;"किती विचार करता रे या सगळ्याचा."

खरंतर हे अत्यंत साधं वाक्य होतं. पण प्रत्येकाने ते स्वतःच्या विचाराशी जुळवलं आणि प्रत्येकाच्या मनात आलं... याच्या कसं लक्षात आलं माझ्या मानत काय आहे ते? सगळ्यांची नजर आनंदकडे वळली. तो मात्र शांतपणे बाटल्या उघडत होता.

आनंदने नविनच्या हातात एक बिअर दिली आणि मंदारकडे वळताना म्हणाला;"नवीन पैसा जर फार महत्वाचा नाही तर मग तू का इनक्रिमेंटच्या मागे लागलेला आहेस रे?" त्याच्या प्रश्नाने नवीन मनात दचकला. पण चेहेऱ्यावर काहीही भाव येऊ न देता म्हणाला;"हे काय अचानक अन्या?" आनंदने मंदारकडे बघितलं आणि त्याच्या हातात एक बिअर देत म्हणाला;"तूच सांग मँडी त्याला मी अचानक काय काय म्हणत असतो." आनंदच्या त्या वाक्याने मंदार मनात चरकला. त्याने चोरट्या नजरेने अनघाकडे बघितलं आणि आनंदला म्हणाला;"मला काय माहीत तू अचानक काय बडबडतोस?" मनालीच्या हातात एक बिअर देत आनंदने एक अनघाला दिली आणि स्वतः एक घेऊन मग परत दिवाणावर येऊन बसला. क्षणभर मनालीकडे बघून हसत म्हणाला;"मनाली सांगू शकेल मी अचानक काय बडबडतो."

आनंद प्रत्येकाचं नाव घेऊन काहीतरी म्हणत होता आणि अनघा अजूनचं बुचकळ्यात पडत चालली होती.

अनघा : हा असं का वागतो आहे आज?

आनंदने सगळ्यांकडे एकदा निरखून बघितलं आणि मग अनघाकडे वळून म्हणाला;"जाऊ दे ग. फार विचार नाही करायचा कोण काय बोलतं आहे आणि विचार करतं आहे याचा."

आता सगळेचजण आनंदकडे संशयाने बघत होते आणि आनंद मात्र एक एक सिप घेत छताकडे बघत बसला होता. नविनला आनंदचा हा विचित्र स्थितप्रज्ञपणा आवडला नाही. तो उठला आणि आनंद जवळ जाऊन त्याच्या खांद्याला हात लावून म्हणाला;"अन्या तू न इथे आल्यापासून फारच विचित्र वागतो आहेस. त्यामुळे आम्ही सगळेच अस्वस्थ आहोत. अरे आम्ही काय पहिल्यांदाच आलो आहोत का इथे? पण यावेळचं सगळंच विचित्र वाटतं आहे. अर्थात मागच्या वेळी इथल्या त्या care taker होत्या. त्यामुळे घर वापरात होतं. आता बहुतेक बंद असतं त्यामुळे देखील एक विचित्र शांतता भरून राहिली आहे इथे. मुख्य म्हणजे अन्या इथे कोल्हे आहेत? आणि ते घराच्या इतक्या जवळ येतात? तो भिकू मग त्याच्या घरी कसा जातो? एकूण काय... तर तू जरा आम्ही comfortable होऊ असा वागशील का?"

नवीनच बोलणं ऐकून प्रत्येकाला वाटलं हा आपल्या मनातलंच बोलला आहे. त्यामुळे सगळेच आनंदकडे अपेक्षेने बघायला लागले. एकदा सगळ्यांवर नजर फिरवून आनंदने खांदे उडवले आणि म्हणाला;"हे खरं आहे की यावेळची इथली शांतता काहीशी वेगळी आहे. हे देखील खरं आहे की ती care taker होती म्हणून या घराला घरपण होतं. इथे कोल्हे येतात का? हम्म!! मला देखील तसं म्हंटल तर हे वेगळं आहे यार. त्यामुळे मी तरी काय सांगणार?" हे बोलताना अचानक आनंदचा आवाज खेळीमेळीचा होता. बऱ्याच वेळानंतर आनंद आपल्यातलाच एक आहे.... जुना आनंद आहे.... असं सगळ्यांना वाटलं. सगळेच हसले आणि वातावरण भलतंच हलकं झालं.

हळूहळू गप्पा रंगायला लागल्या. जुन्या आठवणी... कॉलेज मधले न भेटलेले जुने मित्र-मैत्रिणी; प्रोफेसर्स आणि त्याच्याशी केलेले pranks... सगळेच आता परत पहिल्यासारखे वागत होते. बघता बघता चार वाजून गेले. बिअरचा परिणाम प्रत्येकाच्या डोळ्यांवर दिसायला लागला आणि 'चला झोपुया' असं म्हणत सगळेच उठले.

नवीन आणि मंदार त्यांच्या बेडरूममध्ये गेले. मनाली देखील उठली. अनघा तिच्या मागोमाग जायला उठली. तिने एकदा आनंदकडे बघितलं. आनंदने तिला त्याच्या खोलीत येण्याची विनंती डोळ्यांनीच केली. पण अनघाने मानेनेच नाही म्हंटलं आणि ती मनालीच्या मागे गेली. आता दिवाणखान्यात एकटा आनंद बसला होता..... एकटा? की.....???

क्रमशः

Friday, January 8, 2021

प्रवास भाग 2

 प्रवास

भाग 2


अनघा : हॅलो आनंद?

..... : त्याचं शूट चालू आहे. तुम्ही कोण?

मुलीचा आवाज ऐकून अनघा गोंधळली.

अनघा : तुम्ही कोण बोलताय?

..... : मी कोण याच्याशी तुमचा काही संबंध नाही. मी आनंदचा मोबाईल attend केला आहे याचा अर्थ मी कोणीतरी नक्की आहे त्याची. तुम्ही फोन केला आहात तुमचं नाव सांगा अगोदर.

अनघाला त्या मुलीच्या बोलण्याचा राग आला. पण त्याक्षणी तरी ती काही करू शकणार नव्हती. त्यामुळे तिने फोन कट केला. पण अनघाचं मन तिला स्वस्थ बसू देईना. फोन नक्की कोणी उचलला होता हे तिला समजून घ्यायचं होतं. ती घरातल्या घरात अस्वस्थपणे फेऱ्या मारत होती. थोड्यावेळाने तिचा फोन वाजला. फोन आनंदचा होता. तिने काहीशा रागानेच फोन उचलला.

अनघा : हॅलो...

आनंद : तू फोन केला होतास का? अनघा, तुला किती वेळा सांगितलं आहे की असा मी शुटिंगवर असताना फोन करत जाऊ नकोस म्हणून.

अनघा : आनंद... राग मला आला पाहिजे. तुझा फोन एका मुलीने उचलला होता आणि ती माझ्याशी आगाऊपणा करून बोलत होती. तू माझं नाव sweetipie म्हणून save केलं आहेस ना? ती म्हणत होती की ती तुझी कोणीतरी आहे. हा काय प्रकार आहे?

अनघा चिडली होती आणि तिचा आवाज देखील चढला होता. तिचं बोलणं ऐकून आनंदचा आवाज खाली आला.

आनंद : ती? आहे एक आगाऊ मुलगी. आमच्या सिरीयल मधली. तू तिच्या बोलण्याकडे लक्ष नको देऊस. बरं, फोन का केला होतास?

आनंदच्या उत्तराने अनघाचं समाधान झालं नव्हतं. पण 'भेटल्यावर बोलता येईल;' असा विचार करून तिने तो विषय तिथेच सोडला.

अनघा : अरे नविनचा फोन होता. थर्टी फास्टला भेटूया का विचारत होता.

आनंद : कोणाला तुला?

आता मात्र अनघा वैतागली.

अनघा : अन्या हे अति होतं आहे हं. त्याला मी आवडते यात माझी काही चूक नाही. मी त्याला कोणतीही हिंट देत नाही किंवा माझा फोन देखील त्याच्या हातात नसतो.

आनंद तिच्या बोलण्याने एकदम वरमला.

आनंद : बरं बरं बाईसाहेब. माफ करा. मी सहज गम्मत केली. काय म्हणत होता नवीन.

अनघा : तो विचारत होता की थर्टी फास्टला भेटूया का सगळे.

आनंद : अग पण सध्या कर्फ्यु चालू झाला आहे न रात्री अकरा नंतर? कुठेही बाहेर जाणं शक्य नाही... आणि माझं शूटिंग पण चालू आहे.

अनघा : अन्या, फार नाटकं करू नकोस. शुक्रवारी आहे थर्टी फास्ट. शनिवार रविवार तुझं शूट नसतं न? निदान आपण दोघे तुझ्या वाड्यावर जायचो तेव्हा तू हेच सांगून न्यायचास मला.

आनंद तिचं बोलणं ऐकून चपापला.

आनंद : अनघा घरीच असशील न? जरा हळू बोल की. कोणी ऐकलं तर काय उत्तर देशील?

अनघा : आता यापुढे कोणीही काहीही विचारलं तर मी तुझा फोन लावून द्यायचं ठरवलं आहे.

अनघाचं बोलणं ऐकून आनंद अस्वस्थ झाला.

आनंद : बरं ते जाऊ दे. मला लक्षात नव्हतं थर्टी फास्ट शुक्रवारी आहे. काय आहे तुझा प्लॅन?

आनंदच्या प्रश्नाने अनघा खुलली.

अनघा : मी म्हणत होते आपण सगळे तुझ्या लोणावळ्याच्या वाड्यावर जाऊ या. बऱ्याच दिवसात सगळे भेटलेलो नाही आहोत. मस्त तीन दिवस मजा करूया. तू, मी, नवीन, मंदार आणि मनाली. जुने कॉलेजचे दिवस आठवू; गप्पा; कॅरम; पत्ते... सगळं enjoy करूया. आणि....

अनघाने मोठा पॉज घेतला. तिच्या गप्प बसण्याने आनंद वैतागला आणि तिच्यावर ओरडत म्हणाला...

आनंद : अनघा... आणि काय? बोल बघू एकदाचं काय ते. मी तुझ्यासारखा रिकामटेकडा नाही. शूट चालू आहे माझं. बोल लवकर.

आनंदच्या त्या अचानक बोलण्याने अनघाच्या डोळ्यात पाणी उभं राहिलं. पण तिने ते आनंदला कळू दिलं नाही.

अनघा : आणि काही नाही. बस् इतकंच! जमणार आहे का तुला? तर मी मंदार आणि मनालीशी बोलून घेते.

क्षणभर विचार करून आनंद म्हणाला...

आनंद : चालेल. खरंतर मला देखील नविनचा missed call होता. आता तूच बोल सगळ्यांशी आणि मला मेसेज करून ठेव किती वाजता निघायचं आहे ते.

आनंद हो म्हणलेला ऐकून अनघा एकदम खुश झाली आणि डोळ्यातलं पाणी पुसत म्हणाली...

अनघा : ok. मी कळवते सगळ्यांना. त्यांना एका स्पॉट वरून pick up करू आपण.

आनंद : म्हणजे मी तुला घ्यायला यायचं?

अनघा त्याच्या त्या प्रश्नाने एकदम घायाळ झाली.

अनघा : म्हणजे?

तिच्या त्या एका शब्दातला अर्थ आनंदच्या लक्षात आला आणि घाईघाईने फोन ठेवताना तो म्हणाला...

आनंद : ok ok. तुला सकाळी साधारण आठ वाजता pick करतो. मग त्यांना सायनला घेऊन पुढे जाऊ. चल ठेवतो फोन. माझा शॉट आहे आता. byeee my sweetipie

आनंदच्या बोलण्याने अनघाचं समाधान झालं नव्हतं. पण तरीही 'भेटल्यावर बोलू'; असा विचार करून तिने विषय मनावेगळा केला. आनंदचा फोन ठेवल्यावर अनघाने नवीन, मंदार आणि मनालीला फोन करून थर्टी फास्ट वीक एन्डचा प्लॅन सांगितला आणि साडे आठ पर्यंत सायनला पोहोचायला सांगितलं. तिघेही प्लॅन ऐकून excite झाले आणि लगेच तयार झाले. पण आनंदच्या बोलण्याने दुखवलेली अनघा मात्र आता फार उत्साहात नव्हती. तिच्या एक लक्षात आलं होतं की अलीकडे आनंद तिला टाळत होता.

***

आनंद, अनघा, नवीन, मंदार आणि मनाली कॉलेज मधला ग्रुप. एकदम खास मैत्री होती त्यांची. म्हणजे ग्रॅज्युएशन झाल्यानंतर सगळ्यांनी एकत्रच MBA पण केलं. सगळेच तसे करियर ओरिएंटेड असल्याने MBA संपता संपता नोकरीला लागले. आनंद अभिनय क्षेत्रात गेला. नविनला एका इंटरनॅशनल कंपनीमध्ये चांगल्या पोस्टवर जॉब लागला. मंदारने त्याच्या वडिलांना जॉईन केलं. मनालीने देखील एका event management कंपनीमध्ये जॉब मिळवला.

खरंतर अनघा या सगळ्यांमध्ये हुशार. पण तिला नोकरी करायची इच्छाच नव्हती. घर-संसार-मुलं हीच तिची आवड होती. तिचे बाबा तिला अनेकदा सांगत काहीतरी नोकरी किंवा स्वतःचा असा छोटासा व्यवसाय सुरू कर म्हणून. पण अनघा ते फार मनावर घेत नव्हती. मात्र आई-बाबांनी लग्नाची घाई करू नये म्हणून तिने MBA नंतर एम. कॉम. साठी ऍडमिशन घेतली होती. पण आता ते देखील संपत आलं होतं.

'आता तरी आनंदने लग्नाचा विचार करणं आवश्यक आहे. आता आई-बाबा ऐकणार नाहीत. आणि खरंतर मला देखील फार दिवस थांबता येणार नाही......' अनघाच्या मनात आलं. 'आनंद मला pick करेल तेव्हाच त्याच्याशी बोलून घेतलेलं बरं.' तिने ठरवलं.

ठरल्याप्रमाणे आनंदने अनघाला तिच्या घराखालून घेतलं आणि दोघे सायनच्या दिशेने निघाले. आनंदने गाणी खूप मोठ्याने लावली होती. खरंतर अनघाला काहीतरी बोलायचं होतं. पण गाण्यांचा आवाज कमी केला तर तो चिडेल आणि संपूर्ण पिकनिकचा मूड खराब होईल असा विचार करून ती काही बोलली नाही. ठरल्याप्रमाणे नवीन, मंदार आणि मनाली सायनला उभे होते. त्यांना घेतलं आणि आनंदने गाडी भरधाव सोडली त्याच्या वाड्याच्या दिशेने. बऱ्याच दिवसांनी भेटल्यामुळे सगळेच खुश होते. सगळ्यांच्या गाडीतच गप्पा सुरू झाल्या.

नवीन : यार, कितीतरी दिवसांनी असं बाहेर पडतो आहे न आपण?

मनाली : दिवस काय नवीन? महिने. या करोनामुळे मार्च नंतर काहीही केलं नाही. अगोदर तर घरातच कोंडून घेलल्यासारखं होतं. आता बाहेर पडतो आहोत पण तेसुद्धा work from home मधून वेळ मिळाला तर.

मंदार : हो ना यार!

मनाली : तू काय हो ना यार म्हणतो आहेस मँडी? तुझा स्वतःचाच business आहे.

मंदार : मनली तुला नाही कळणार व्यवसायिकांची दुःख! अरे यार business काही नाही पण कामगारांना पागर देतो आहोत. काम मिळवायला मी फिरतो आहे आणि बाबा फोनवरून प्रयत्न करत असतात. जाऊ दे. मी हो ना यार म्हणालो ते आपण सगळेच कामात अडकलो आहोत या विचाराने.

मंदारच शेवटचं वाक्य ऐकून सगळ्यांनीच माना डोलावल्या. मात्र मनाली अनघाकडे बघत म्हणाली...

मनाली : हीच बरं आहे. हिने ठरवलंच आहे न नोकरी नाही करायची. त्यामुळे करोना असो नसो ही घरीच असणार आहे.

असं म्हणून मनाली काहीसं कुत्सित हसली. अनघाने ते ऐकून न एकल्यासारखं केलं. खरंतर तिला वाटलं होतं आनंद मनालीला झापेल. पण तो काहीच बोलला नाही. उलट नवीन म्हणाला...

नवीन : मनाली, आयुष्यात काय करायचं हा ज्याचा त्याचा वयक्तिक choice असतो. अनघाला नोकरी करायची नसेल तर नको करू दे ना. त्यात तिला tont मारण्यासारखं काय आहे?

नवीन असं म्हणता क्षणी मंदार आणि मनाली एकमेकांकडे बघून फसकन हसले आणि त्यांनी एकमेकांना टाळी दिली. आनंद हे सगळं रेअरव्यू आरशातून बघत होता. पण तो काहीच म्हणाला नाही. मात्र आनंदच्या बाजूला बसलेल्या अनघाला मंदार आणि मनालीचं हसणं मुळीच रुचलं नाही. मागे वळून बघत ती म्हणाली...

अनघा : त्यात हसण्यासारखं काय आहे ग मनाली? नवीन म्हणाला ते खरंच तर आहे. नाही करायची मला नोकरी. मला संसार-मुलं हे आवडतं. आणि... मला काय आवडतं ते मला माहीत तरी आहे. तुझ्यासारखं नाही न! MBA करून आता ऍड एजन्सीमध्ये कारकुनी करते आहेस. का? कारण MBA च्या qualifications वर जो job मिळेल त्याची प्रेशर्स घेता येतील की नाही याची खात्री नाही.

अनघाचं बोलणं ऐकून मनाली एकदम उसळली. आता या चर्चेला वादाचं स्वरूप येणार हे लक्षात येऊन आनंदने एकदम गाडी रस्त्याच्या कडेला घेतली. गाडीतले सगळेच एकदम हबकले आणि ओरडले...

अरे अरे काय करतो आहेस अन्या? वर्षाच्या शेवटच्या दिवशी मारणार का आम्हाला?

सगळ्यांच्या ओरडण्यावर जोरजोरात हसत आनंद म्हणाला;"अरे या तुमच्या वादाच्या नादात breakfast miss होईल ना. चला समोर मॅक आहे. खाऊन घेऊ आणि पुढे जाऊ."

सगळ्यांनी गाडीबाहेर नजर टाकली आणि समोर मॅकडोनाल्ड बघून गपचूप गाडीखाली उतरले. मनाली आणि अनघा washroom च्या दिशेने गेल्या. नवीन सगळ्यांसाठी बर्गर आणायला गेला हे पाहून मंदारने आनंदला छेडलं.

मंदार : ठरलं का रे तुमचं काही?

आनंदने एकदा मंदारकडे बघितलं आणि काहीही उत्तर न देता तो मॅक्डोनल्डच्या दिशेने चालायला लागला. मंदारने लांब जाणाऱ्या आनंदकडे बघितलं आणि तो गंभीर झाला.

एक सिगरेट ओढून थोड्यावेळाने मंदार देखील मॅकमध्ये गेला. समोरच अनघा, मनाली आणि नवीन बसून खात होते. आनंद तिथे दिसत नव्हता. त्याला बघताच नवीन म्हणाला,"अरे कुठे राहिला होतास तू यार? चल खाऊन घे हा बर्गर. आनंद गाडी इथेच आणतो आहे. निघुया आता. खूप टाईमपास झाला."

मंदार : गाडी आणतो आहे आनंद म्हणजे?

अनघा : अरे त्याचं खाऊन झालं तर तो म्हणाला मी गाडी इथे आणतो तोवर तुम्ही बाहेर या.

मंदार : अग, पण मी आत्ता गाडीजवळूनच आलो. मला आनंद तिथे दिसलाच नाही.

मंदार असं म्हणताच अनघा तटकन उभी राहिली आणि बाहेरच्या दिशेने धावली. धावताना तिचा पाय एका खुर्चीला अडकला आणि ती एकदम पडली. तिला पडलेलं बघून नवीन धावला आणि त्याच्या मागे मनाली आणि मंदार देखील. नविनने अनघाला उठून बसायला मदत केली. तेवढ्यात आनंदची गाडी मॅकच्या दारासमोर येऊन उभी राहिली. आनंदने हॉर्न वाजवत मॅकच्या दिशेने बघितले तर नवीन अनघाला कुरवाळत होता आणि मंदार-मनाली एकमेकांकडे बघत हसत होते. ते पाहून आनंदचा पारा एकदम चढला. तो गाडीतून उतरून त्यांच्या दिशेने वेगाने आला.

आनंद : काय चालू आहे तुमचं?

त्याच्या प्रश्नातला चिडका विचित्र अर्थ समजून अनघाचे डोळे भरून आले. तिच्यापासून दूर होत नवीन म्हणाला; "अन्या या मँडीने जोक केला. पण अनघाने ते seriously घेतलं आणि ती बाहेरच्या दिशेने धावली. पण खुर्चीत पाय अडकून पडली. तर तिला मदत करायची सोडून हा गाढव हसतो आहे."

मंदार : ए फालतूपणा नको करुस हा. मी खरंच गाडीकडून चालत आलो आणि तुम्ही म्हणालात आनंद गाडीकडे गेला. तर मी म्हंटलं मला तो दिसला नाही. तर यात इतकं पॅनिक होण्यासारखं काय होतं? ही का धावली?

आनंद : अनघा, मी वॉशरूमला जाऊन मग गाडीकडे गेलो. म्हणून मँडीला दिसलो नसेन. उगाच धावाधाव करून सगळ्यांचं लक्ष नको वेधुस. समजलं?

आनंदच्या बोलण्याने अनघा फारच दुखावली. तिच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहायला लागलं. तिची ती अवस्था बघून नवीन म्हणाला;"अरे आनंद ती तुझ्या काळजीने बाहेर धावली आणि तू तिलाच दूषणं देतो आहेस? कमाल आहे ह तुझी."

नवीनचं बोलणं ऐकून आनंद भडकला. मंदारच्या ते लक्षात आलं आणि अजून वाद वाढायला नकोत म्हणून तो एकदम मोठ्याने म्हणाला;"यारो चलो निकलते हें! सगळे गाडीत बसा बघू. तुमचं खाऊन झालं आहे. मी माझा बर्गर घेऊन येतो आणि निघुया आपण."

उगाच ताणाताणी वाढायला नको म्हणून सगळ्यांनीच आवरतं घेतलं आणि उठून गाडीकडे जायला लागले. अनघा थोडी लंगडत होती. नविनच्या ते लक्षात आलं पण आनंद परत भडकेल म्हणून तो गप बसला. मनालीच्या देखील ते लक्षात आलं. ती अनघा जवळ गेली आणि म्हणाली;"फार जोरात लागलं का ग?"

अनघा : शरीरापेक्षा मनाला लागलं ग.

अनघाच्या डोळ्यात अजूनही पाणी होतं. तिचा हात हातात घेत मनाली म्हणाली;"सॉरी ग अनु. तू इतकी जोरात पडली असशील असं नाही वाटलं. एकदम हसायला आलं म्हणून हसले. तुला hurt करायला नाही ग."

मनालीचा हात प्रेमाने दाबत अनघा म्हणाली;"its ok ग मनाली. मला आनंदच्या reaction मुळे वाईट वाटलं. तुझ्या हसण्याने नाही."

पुढे जाणाऱ्या आनंदकडे बघत मनाली म्हणाली;"विचारलं का त्याने?"

मान खाली घालत अनघा म्हणाली;"नाही.... अजून नाही."

तिचा हात थोपटत मनाली म्हणाली;"don't worry dear. कदाचित नवीन वर्षाची सुरवात होईल तेव्हाच विचारेल. काहीतरी सरप्राईज ठेवलं असेल त्याने तुझ्यासाठी."

मनालीच्या बोलण्यावर अनघा काहीच बोलली नाही. तिच्याकडे बघून हसत अनघाने डोळे पुसले आणि दोघी गाडीत जाऊन बसल्या.

गाडी आनंदच्या वाड्यावर पोहोचेपर्यंत गाडीत कोणीही काहीच बोललं नाही. अनघा आणि मनाली डोळे मिटून बसल्या होत्या. नवीन आनंदच्या शेजारच्या सीटवर बसून रस्ता बघत होता. मंदारने बर्गर संपवला आणि कानात आयपॉड घालून त्याने त्याची गाणी ऐकण्याचा कार्यक्रम सुरू केला होता.

वाडा आला आणि सगळेच काहीसे सैलावले. नविनने गेट उघडलं आणि आनंदने गाडी आत घेतली.

मनाली : कधी आलो होतो बरं आपण last? मला वाटतं 2019. हो न ग अनघा?

अनघाने फक्त मान डोलावली आणि सगळे खाली उतरले. आपापल्या सॅक्स घेऊन सगळे वाड्याच्या मुख्य दरवाजाकडे निघाले. पण त्यांना थांबवत आनंद म्हणाला,"यार, आत आपण मधल्या दरवाजाने जाऊया."

सगळेच आश्चर्याने आनंदकडे बघायला लागले.

मनाली आणि मंदारने एकत्र म्हंटलं;"मधला दरवाजा?" एकत्र बोललं गेल्याने दोघेही एकमेकांकडे बघून हसले आणि मंदार म्हणाला;"अन्या, साल्या असं काही आहे या वाड्याला? आपण इतकी वर्ष येतो आहोत पण कधी बोलला नाहीस... आणि आम्ही पण बघितलेला नाही."

आनंद त्यावर काहीतरी बोलणार होता पण तेवढ्यात अनघा म्हणाली...

अनघा : अन्या हे काय अचानक? तुला तो मधला दरवाजा उघडलेला कधीच आवडला नाही न? आणि आता म्हणतोस तिथूनच वाड्यात जाऊया?

अनघाचं बोलणं ऐकून मंदारने मनालीकडे बघत डोळा मारला. ती देखील हलकेच हसली. नविनच्या ते लक्षात आलं पण तो काहीच बोलला नाही.

अनघाकडे शांतपणे बघत आनंद म्हणाला,"अग अनु, उगाच काहीतरी superstitions होती माझ्या मनात. पण आता माझं मत झालंय की जे असतं ते आपल्या मनात असतं. चला यार. तोच दरवाजा वापरणार आहोत आपण." असं म्हणून शीळ वाजवत आनंदने वाड्याला अर्धी फेरी मारली आणि वाड्याच्या मधल्या दरवाजाजवळ येऊन तो उभा राहिला. सगळेच त्याच्या मागून तिथे आले होते. आनंदने वळून सगळ्यांकडे बघत डोळा मारला आणि समोरच्या दरवाजाची कडी काढत तो ढकलला. आता मात्र सगळ्यांचेच डोळे मोठे झाले.

नवीन : अन्या... साल्या कुलूप नाही?

आनंद : अहं.... गरजच नाही. कोणालाही हा दरवाजा लक्षातच येत नाही. तुम्हाला तरी माहीत होता का? काय अनघा?

आनंदकडे संदिग्ध नजरेने बघत अनघाने नाही म्हणून मान हलवली आणि म्हणाली,"तू एकदोन वेळा उल्लेख केला होतास. पण म्हणालास की तुला तो दरवाजा आवडत नाही. त्या बाजूला जायला पण आवडत नाही. म्हणून तर हा दरवाजा उघडतो तिथल्या दोन खोल्यासुद्धा तू बंद ठेवल्या आहेस न?"

आनंद तिच्याकडे बघत म्हणाला;"सांगितलं न तुला. आता no more superstitions. त्या खोल्या उघडल्या मी." अस म्हणून हसत हसत आनंदने वाड्यात प्रवेश केला. अचानक आनंदचा मूड बदलला होता. इतक्यावेळ काहीसा घुम्यासारखा गाडी चालवणारा आनंद वाड्यात शिरला आणि हसत मोठ्याने ओरडला;"मी आssलोss!" त्याचा आवाज संपूर्ण वाड्यात घुमला... आणि सगळेच हसले. मनाली आनंदच्या पाठीवर हलकेच गुद्दा मारत म्हणाली;"कोणाला सांगतो आहेस हे? अख्या वाड्यात कोणीही नाही."

आनंदने तिच्याकडे बघितलं आणि डोळा मारत म्हणाला;"U never know!"

तो असं म्हणल्याक्षणी मनालीचा चेहेरा बघण्यासारखा झाला आणि ती मागे सरकत म्हणाली;"अन्या, फालतू बडबड करू नकोस हं. तुला माहीत आहे मला फोबिया आहे नवीन जागेचा. आठवतं न आपण पहिल्यांदा आलो होतो तेव्हा मी बाथरूममध्ये पण अनघाला घेऊन जायचे. गेल्या तीन-चार वर्षात येत होतो परत-परत म्हणून आता भीती गेली आहे माझ्या मनातली. तू असं काही बोललास तर अवघड होईल माझ्यासाठी."

तिचा उतरलेला चेहेरा आणि रडवेला आवाज ऐकून आनंदने तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि हलकेच हसत म्हणाला;"मिनू डार्लिंग, घाबरू नकोस ग. मी गंम्मत केली." आनंदने मनालीला डार्लिंग म्हंटलेलं अनघाला आवडलं नव्हतं. पण ती काहीच न बोलता पुढे गेली आणि डावीकडे वळली. मनाली चटकन पुढे होत अनघाबरोबर गेली. आनंदने नवीन आणि मंदारकडे बघत खांदे उडवले आणि तो समोरच्या खोलीकडे सरळ चालत गेला.

आनंद : दोस्तहो... ही आपली खोली आहे.

मंदार: म्हणजे? इतका मोठा वाडा असून आपण खोली शेअर करायची? अन्या....

आनंद : गप रे मँडी. मला म्हणायचं होतं ही माझी खोली आहे. तुम्ही ही बाजूची घ्या आणि....

अनघा तेवढ्यात तिथे आली होती. ती आनंदकडे बघत शांतपणे म्हणाली;"आम्ही दोघी समोरची खोली घेतो."

आनंदने वळून अनघाकडे बघितलं.

आनंद : समोरची?

अनघा : हो! का?

आनंद काहीतरी बोलणार होता; पण मग काहीच न बोलता तो त्याच्या खोलीच्या दिशेने निघून गेला.

मंदार त्याच्या खोलीच्या दिशेने जात म्हणाला;"चल रे नवीन." आणि मग जरा मोठ्याने म्हणाला;"दोस्तांनो सगळेच आराम करूया थोडा वेळ. जेवायच्या वेळेस भेटू."

त्याने असं म्हणताच खोलीकडे जाणारी मनाली मागे वळली आणि म्हणाली;"अरे जेवायच्या वेळेला भेटून जेवायचं काय? इथे काय सोय आहे?"

खोलीच्या आत जात मंदार म्हणाला;"बघू ग! काहीच नाही तर बाहेर तर जाता येतं ना?"

मान उडवत मनाली स्वतःच्या खोलीत शिरली आणि अनघाकडे बघत म्हणाली;"आत्ता ठीक आहे हं; पण रात्री मी नाही बाहेर येणार. इथेच सोय करूया ग."

बाथरूमच्या दिशेने जात अनघा म्हणाली;"मनाली काळजी करू नकोस. वाड्याच्या मागे भिकू राहातो. त्याची बायको मस्त नॉनव्हेज करते. आपण दोघी नंतर तिथे जाऊन तिला पैसे देऊन येऊ. तुझं म्हणणं बरोबर आहे; आत्ता बाहेर ठीक पण रात्री बाहेर जाणं एकूणच अवघड."

अनघाने असं म्हणताच पटकन पुढे होत मनालीने अनघाचा हात धरला आणि घाबरलेल्या आवाजात म्हणाली;"म्हणजे काय ग?"

त्यावर हसून तिचा हात थोपटत अनघा म्हणाली;"उगाच घाबरू नकोस. आज थर्टी फास्ट night आहे न. म्हणून म्हंटलं. कळलं मनु डार्लिंग!" आणि हात सोडवून घेत बाथरूममध्ये गेली. ती आत गेलेली पाहून मनालीने मोबाईल हातात घेतला आणि कोणालातरी मेसेज करायला लागली.

***

साधारण दोन वाजयचा सुमार होता. अनघा आणि मनाली त्यांच्या खोलीमधून बाहेर आल्या. मस्त झोप काढल्यामुळे दोघीही एकदम फ्रेश होत्या. मुलांच्या खोल्यांच्या दिशेने जात दोघींनी हाका मारायला सुरवात केली....

"अरे उठा रे. किती झोपणार आहात? चला जेऊन येऊ या. जाम भूक लागली आहे."

त्यांच्या हाका ऐकून नवीन डोळे चोळत खोलीबाहेर आला आणि म्हणाला;"अरे यार. काय घाई असते ग तुम्हाला? मस्त झोपलो होतो ना."

त्यावर थट्टेच्या सुरात अनघा म्हणाली;"नवीन सध्या work from home असल्याने दुपारची झोप होतच असेल न?"

त्यावर नवीन देखील हसत हसत म्हणाला;"हो न. दुपारची झोप तुझ्यापेक्षा चांगली कोणाला कळणार?"

अनघा हसत म्हणाली;"आगाऊपणा नको करुस ह नवीन." मग खोलीच्या दारातून आत डोकावत तिने मंदारला हाक मारली. "मँडी उठ रे आळशा. भूक लागली आहे आम्हाला दोघींना." मंदार आतूनच ओरडला;"तुम्ही जाऊन या रे. माझ्यासाठी पार्सल आणा. या मस्त गार गार हवेत मला उठवसंच वाटत नाही."

त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत अनघा नविनला म्हणाली;"त्याला उठव रे. मी आणि मनाली मागे जाऊन रात्रीच्या जेवणाची सोय करून येतो. तोपर्यंत तयार व्हा तुम्ही."

असं म्हणून ती मनालीला घेऊन मागच्या दाराच्या दिशेने चालायला लागली. तिला हाक मारत नवीन म्हणाला; "अनघा.... तू अन्याला नाही का उठवणार?"

मागे न वळता अनघा म्हणाली;"त्याला झोपेतून मध्येच उठवलेलं आवडत नाही. उगाच परत माझ्यावर ओरडेल. मला माझी संध्याकाळ खराब नाही करायची. तूच उठव त्याला."

अनघाचं बोलणं नविनला आवडलं नाही. पण तो त्यावर काहीच बोलला नाही. अनघा आणि मनाली मागचं दार उघडून मागच्या आडाच्या दिशेने चालायला लागल्या. थोडं पुढे गेल्यावर मनालीने अनघाचा हात धरला आणि तिला थांबवत विचारलं;"अनघा खरं सांग... तुझ्यात आणि अन्यामध्ये काही फारच सिरीयस आहे का? हे बघ, उगाच आढेवेढे घेऊ नकोस. जे खरं आहे ते सांग मला."

अनघा समोर बघत काही क्षण थांबली आणि मग मनालीकडे वळत म्हणाली;"मनाली, आनंद आणि मी लग्न करायचा विचार करतो आहोत. म्हणजे मी तर नक्की. दोन महिन्यांपूर्वी.... म्हणजे दिवाळीमध्ये आम्ही दोघेचं इथे आलो होतो. तुमचं सगळ्यांचं नाव सांगितलं होतं माझ्या घरी. करोनामुळे work from home आहे. त्यामुळे बाबांना पटलं की सगळेच येतो आहोत. आनंद खूपच प्रेमात होता माझ्या. ते तीन दिवस माझ्या आयुष्यातले सर्वात सुंदर दिवस होते. मी स्वप्नात वावरत होते. आम्ही निघणार होतो त्याच्या आदल्या संध्याकाळी आनंदने मला प्रपोज केलं. इथे या मागच्या दाराशेजारच्या त्या झोपाळ्यावर. माझ्या नकळत त्याने तो सुंदर सजवला होता... माझ्यासाठी एक ड्रेस घेऊन आला होता... त्याने मला अंगठी पण दिली ग मनाली. ही बघ!" असं म्हणत अनघाने तिचा हात पुढे केला. अनघाच्या बोटात एक सुंदर हिऱ्याची अंगठी होती. मनाली काहीच बोलली नाही. एकदा अंगठीकडे बघून अनघा परत चालायला लागली.

मनालीचा चेहेरा फारच गंभीर झाला होता. चालता-चालता थांबत तिने अनघाचा हात ओढला आणि म्हणाली; "अनघा, एक गोष्ट सांगू?"

तिच्याकडे वळत अनघाने प्रश्नार्थक नजरेनेच बोल म्हंटलं.

मनाली : अनघा, तू म्हणते आहेस की आनंद तुझ्या खूपच प्रेमात होता... होता! म्हणजे आता नाही का? कारण आज सकाळपासून तो जे आणि जसं वागतो आहे त्यावरून तर त्याचं तुझ्यावर प्रेमच काय... पण तू त्याच्यासाठी थोडीशी देखील वेगळी नाहीस असं दाखवून द्यायचा प्रयत्न तो करतो आहे; असं मला वाटतं."

अनघाने एकटक मनालीकडे बघितलं आणि काहीही न बोलता ती परत चालायला लागली. मनाली देखील तिच्या मागे जात होती. आडाला वळसा घालून दोघी थोड्या पुढे आल्या आणि अनघाने हाक मारली;"भिकू दादा... ओ भिकू दादा..." मागच्या झाडीमधून आवाज आला;"ताई? कधी आलात? मला वाटलंच होतं आज याल." त्याला जास्त बोलायला न देता अनघा म्हणाली;"आम्ही पाचजण आलो आहोत भिकू दादा. रात्रीच्या जेवणाचं करू शकाल ना?"

अनघा इतकं बोलेपर्यंत भिकू समोर येऊन उभा राहिला होता. दणकट शरीरयष्टीचा काळाकभिन्न भिकू बघून मनाली दोन पावलं मागे सरकली. तिच्याकडे एकदा बघून भिकू अनघाकडे बघून हसला. त्याच्याकडे हसून बघत अनघा म्हणाली;"मी आणि मालक आलो आहोत. आमच्या बरोबर आमची ही एक मैत्रीण आणि अजून दोन मित्र आले आहेत. रात्रीसाठी मस्त चिकन, पोळ्या, डाळ-भात कराल ना?" "हो ताई. हे काय विचारणं झालं? काही बिअर वगैरे आणून ठेऊ का फ्रीजमध्ये?" त्यावर अनघा हसून म्हणाली;"नको. आम्ही आत्ता बाहेर जातो आहोत तेव्हा आणून ठेऊ. प्रत्येकाचा चॉईस वेगळा असेल न. तुम्ही फक्त जेवण करा." असं म्हणून तिने भिकुला हजार रुपये दिले आणि मागे वळून परत निघाली.

भिकूने अनघाला हाक मारली. "ताई.... वरती नका जाऊ कोणी."

त्यावर गर्रकन मागे वळत अनघा म्हणाली;"वरती नाही जायचं? का भिकू? अरे आनंदला तर वरचा मोकळा दिवाणखानाच खूप आवडतो. एरवी कधी मधल्या दाराकडे जाऊ दिलं नाही.... पण तुला माहीत आहे; आज आम्ही त्या दारातून आत आलो. आनंद कधीच खालच्या खोलीत राहायला तयार होत नाही. सरळ वर जातो. पण आज त्याने वरच्या जिन्याकडे बघितलं देखील नाही... आणि आता तू.... काय चाललं आहे मला कळेल का?"

त्यावर एकदा मनालीकडे बघत भिकूने खांदे उडवले आणि म्हणाला;"मी नऊ पर्यंत जेवण घेऊन येतो ताई. मला जे योग्य वाटलं ते सांगितलं. बाकी तुम्ही मालकांना विचारा." असं म्हणून तो मागे वळला आणि निघून गेला.

झालेल्या सगळ्या प्रकाराने मनाली एकदम अवघडून गेली. पण ती काहीच बोलली नाही. अनघा आणि मनाली वाड्यात परत आल्या तर आनंद, नवीन आणि मंदार तयारच होते. सगळे बाहेर पडले जेवायला.

***

संध्याकाळ चांगलीच दाटून आली होती. अनघाने वाड्यात फिरून सगलीकडचे दिवे लावले होते. मधल्या मोठ्या खोलीत बसून सगळे गप्पा मारत होते. जुन्या कॉलेजच्या गप्पा चालू होत्या. कोण कोणाला कोणावरून चिडवायचं किंवा कोणते प्रोफेसर कसे होते... असलेच सगळे विषय होते. थोड्या वेळाने अनघा आतून पत्ते घेऊन आली आणि म्हणाली;"चला, झब्बूचा एक डाव टाकूया." आणि सगळेच तयार झाले. त्यानंतर पत्ते खेळण्यात पाचहीजण इतके रमले की किती वाजले आहेत याचं त्यांना भानच राहिलं नाही. अचानक मागच्या दाराकडून भिकुची हाक ऐकू आली... "ताई, जेवण घेऊन आलो आहे. दार उघडता न?"

त्याचा आवाज ऐकून अनघा पटकन उठली आणि मागच्या दाराकडे गेली. तिचं वाड्यात सहज वावरणं नवीन आणि मंदारच्या डोळ्यातून सुटलं नव्हतं. पण कोणीच त्यावर काहीही बोलत नव्हतं.

भिकूने दोन पिशव्यांमधून डबे आणले होते. ते घेऊन तो स्वयंपाकघरात गेला. अनघा देखील त्याच्याबरोबर गेली. मनालीने हातातले पत्ते खाली टाकले आणि म्हणाली;"मी पण जाऊन मदत हवी आहे का बघते." आणि पटकन आत गेली.

मनाली स्वयंपाकघरात शिरली तर भिकू अगदी हळू आवाजात अनघाला काहीतरी सांगत होता. मनालीला बघून तो थांबला. अनघाने देखील मनालीकडे बघितलं आणि म्हणाली;"बरं झालं ग तू आलीस. चल, आपण आणलेल्या बिअर्स बाहेर घेऊन जाऊ. पत्ते खेळताना नऊ वाजून गेलेले कळलंच नाही न." मग भिकुकडे वळून ती म्हणाली;"साधारण अकरा पर्यंत ये रे जेवण गरम करायला. तुला बाहेर आणून ठेवायची गरज नाही. फक्त स्वयंपाकघरात लागेल ती मदत कर आणि जा लगेच. भांडी घासायला उद्याच ये."

एकदा मनालीकडे बघत भिकूने बरं म्हणून मान डोलावली आणि तो निघून गेला. अनघा आणि मनाली बिअर्स घेऊन बाहेर आल्या आणि परत एकदा गप्पा-पत्ते-बिअर असा मस्त कार्यक्रम सुरू झाला सगळ्यांचा. साधारण अकरा वाजता अनघा आपणहून उठली. तिने मागचं दार उघडलं आणि परत येऊन सगळ्यांना जॉईन झाली. थोड्या वेळाने स्वयंपाकघरातुन भिकुची हाक आली... ताई.... आणि अनघाने सगळ्यांकडे बघत म्हंटलं;"चला रे जेऊन घेऊया आणि मग बाहेर अंगणात जाऊन बसूया थोडावेळ. इथे बारा वाजता रोषणाई करतात असं भिकू म्हणत होता. ती बघत नवीन वर्षाच स्वागत करूया."

सगळेच बिअरमुळे थोडेसे सैलावले होते. सगळ्यांना भूक देखील लागली होती. त्यामुळे पटकन जेवायला आले. जेवणं आटोपून सगळे बाहेर गेले. अनघा सगळ्यात शेवटी बाहेर जायला निघाली. तिने स्वयंपाकघराकडे बघत म्हंटलं;"भिकू, सगळं आवरून घेतलंस तरी चालेल. आम्ही सगळे बाहेर आहोत. आत्ता आत कोणीच येणार नाही."

मनाली अनघा बरोबरच होती. तिने एकदा स्वयंपाकघराकडे बघितलं आणि अनघाचा हात धरत ती अंगणात आली.

क्रमशः

Friday, January 1, 2021

प्रवास

 प्रवास


आनंद : यार आटपा आता. उशीर होतोय आपल्याला. थर्टीफस्टला जोडून शनिवार-रविवार आल्याने जमू शकलं इथे माझ्या या वाड्यावर येणं. साल्यांनो, तुम्हाला लॉक डाऊनमुळे work from home आहे; पण मला जावं लागणार आहे शूटला.... आणि अकरा नंतर कर्फ्यु आहे. Not more than four are allowed to travel together. उगाच कुठे थांबवलं तर लफडा होईल.

गाडीच्या दिशेने येत मंदारने आपली सॅक गाडीत टाकली आणि तो आनंदजवळ जाऊन उभा राहिला.

मंदार : अन्या तू कायमच रडया आहेस. लोणावळा ते मुंबई असं कितीसं अंतर आहे रे? जेम-तेम दोन तासात पोहोचू आपण. उगाच उशीर होतोय हे कारण नको देऊस. तुझा हा भूतिया वाडा तुला लवकर सोडायचा आहे... असं म्हण हवं तर.

आनंद : मँडी किती वेळा सांगू तुला असलं काही बोलू नकोस म्हणून.

मंदार : अरे यार.... भूतीयाला भूतिया नाही म्हणणार तर काय माणसांनी भरलेला वाडा म्हणणार का?

आनंद : मँडी आता गपतो का तू की देऊ एक ठेऊन?

मंदार : हिम्मत असेल तर हात लावून दाखव.

मंदार आणि आनंदमध्ये जुंपयला लागली. त्यांचा वाढता आवाज ऐकून अनघा धावत बाहेर आली.

अनघा : झाली का तुमची सुरवात परत?

आनंद : त्याला बोल काय ते. सुरुवात त्याने केली आहे.

अनघा : मँडी, खरंच गप बस् रे आता. इथे आल्यापासून तू भूत भूत बडबडून सगळ्यांचा मूड खराब केला आहेस. आपण सगळे इथे करोना मागे सोडून नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आलो न? अलीकडे सगळेच नोकऱ्यांमध्ये अडकलो आहोत. कधीतरी दोन-चार महिन्यात जेमतेम एखादं डिनर जमत होतं सगळ्यांना. त्यात या लॉक डाऊनने वाट लावली. गेल्या कित्येक महिन्यात आपली भेट नाही. त्यात अजूनही परिस्थिती फार सुधारलेली नाही आणि मुंबईत काहीच करणं शक्य नव्हतं; म्हणून इथे आलो. येताना पण एकएकटे पोहोचलो. पण शेवटी सगळ्यांनी वेळ काढलाच. जवळ जवळ दीड वर्षाने एकत्र आलोय आपण सगळे. ते काय तुमचं भांडण ऐकायला? का भूत भूत खेळायला?

मंदार : माफ करा अनघाबाई. तुम्ही समोर असताना श्रीयुत आनंद यांना कोणी काही म्हणेल का?

मंदारचं हे वाक्य ऐकून अनघाने क्षणभर आनंदकडे बघितलं आणि काही एक न बोलता परत घराकडे वळली. आनंदला तिचा चेहेरा दिसला नव्हता.

आनंद : गपतो का तू? की देऊ एक.........

ती गेल्याची खात्री करत आनंद म्हणाला. ती गेल्याची खात्री करत मंदार म्हणाला...

मंदार : साल्या तिला तू आवडतोस हे तुला पण माहीत आहे. पण मग तिला विचारत का नाहीस? आता तर तुझी ही दुसरी सिरीयल येते आहे न? जाहिराती पण करायला लागला आहेस तू. म्हणजे चांगली कमाई आहे. इतकी गोड मुलगी कधीपासून तुझ्या मागे आहे आणि तू साल्या भाव खातोस?

आनंद : अरे यार! माझ्या मनात देखील होतं रे. पण या लॉक डाऊनने वाट लावली आहे. पहिली सिरीयल लवकर गुंडाळली गेली. ही नवीन मिळाली आहे ती हॉरर सिरीयल आहे. त्यातसुद्धा मी भूत आहे. म्हणजे मला कधीही संपवू शकतात ते. बाकी जाहिराती मिळण्याची खात्री नाहीच. त्यामुळे थोडं थांबायचं ठरवलंय मी.

नवीन वाड्याच्या मागून अचानक उगवला आणि मंदार-आनंदच्या संभाषणाचा भाग होत म्हणाला...

नवीन : अन्या, तुला कधीपासून पैशाचा विचार करायची वेळ आली रे भाड्या? हे अभिनय वगैरे चोचले तुलाच परवडू शकतात. आमची इच्छा असूनही आम्हाला खर्डेघाशीच करावी लागणार आहे.

अचानक येऊन आनंदवर बरसणाऱ्या नविनकडे आश्चर्यचकित नजरेने मंदार बघायला लागला.

मंदार : तुला अभिनयात रस आहे? म्हणजे करियर म्हणून निवडायचं होतं तुला हे क्षेत्र?

नवीन : मँडी, अन्यापेक्षा जास्त चांगलं काम मी करायचो नाटकात हे तुला माहीत नाही का? कायम लीड रोल मला मिळाला आहे. अनघा माझी हिरोईन असायची नेहेमी. त्याचवेळी तिला विचारावं अशी माझी इच्छा देखील होती..... पण जाऊ दे तो विषय!

खरी आयुष्यातली लीड सिच्युएशन आनंदलाच मिळाली आहे. साल्याकडे पैसा भरपूर.... बाप पण गेला सगळं याच्या नावावर करून.... इतक्या प्रेमळ काकू; पण याच्या बापानंतर अचानक गेल्या. हा इथला वाडा, मागे ही एवढी मोठी शेती. शेतीचं उत्पन्न जबरदस्त असतं न रे अन्या? त्यात मलबार हिलवर दोन फ्लॅट. दोन्ही फ्लॅट भाड्यावर देऊन हा साला गोरेगावात भाड्यावर राहातोय. महिना तीन-चार लाख कमावतोय हा बसून. त्यात कोणतं ना कोणतं शूटचं काम मिळतंच की. अरे, आम्ही दोघांनी एकत्रच स्ट्रगलला सुरवात केली होती. स्क्रीन टेस्टमध्ये माझं कौतुक व्हायचं आणि काम याला मिळायचं. आपण कॉलेजमध्ये होतो तोपर्यंत ठीक होतं. नंतर आमच्या पिताश्रींनी फतवा काढला; घरात राहायचं असेल तर कमवून आणायला सुरवात करा; नाहीतर चालते व्हा. चालते कुठे होणार? याच्या मलबारच्या फ्लॅटवर? म्हणून मग गपचूप नोकरी शोधून कामाला लागलो.

मंदार : आयला... नवीन अन्यासमोर पहिल्यांदाच स्वतःहून कबूल केलंस नं तुला अनघामध्ये इंटरेस्ट आहे ते?

असं म्हणून मंदार मोठ्याने हसायला लागला. मंदारच्या त्या एका वाक्याने सगळं वातावरणच बदलून गेलं. आनंद आणि नविनने एकमेकांकडे निरखून बघितलं. नवीन दोघांकडे पाठ फिरवून वाड्याच्या दिशेने गेला आणि आनंद गाडीत जाऊन बसला. ते दोघेही निघून गेले आहेत हे मंदारच्या लक्षात आलं नाही. तो आपल्याच नादात खदखदून हसत उभा होता... आणि अचानक मंदारला मागच्या झाडीमधून कोणतीतरी ओढून घेतलं. मंदार ओढला गेला हे कोणाच्याच लक्षात आलं नाही. कारण नेमकं कोणीच नव्हतं तिथे. ड्रायव्हर सीटवर जाऊन बसलेल्या आनंदने एकदा हॉर्न वाजवला आणि तो जोरात ओरडून म्हणाला...

आनंद : अरे चला रे. नऊ वाजत आले. तुम्हाला सगळ्यांना सोडून मग मी घरी पोहोचणार. उद्या पाहाटेचं शेड्युल आहे माझं शूटचं.

आनंदचा आवाज ऐकून मनाली धावत बाहेर आली. तिच्या हातात तिची सॅक होती. गाडीचं मागचं दार उघडून हातातली सॅक आत टाकत ती म्हणाली...

मनाली : अन्या, काय बोललास रे नविनला? तो मागच्या दारात जाऊन बसला आहे तोंड पाडून. यार तुम्ही लोक ना त्याला फार बुली करता. तो पण मूर्ख अजूनही अनघाच्या बाबतीत आशा लावून बसला आहे. अभिनयात चांगलं करियर केलं असतं त्याने. पण तिच्यासाठी म्हणून नोकरीला लागला. मात्र सगळ्यांना सांगत फिरतो की बाबांनी सांगितलं म्हणून नोकरी पत्करली. आता जबरदस्त पगार कमावतो आहे. पण तरीही अनघा त्याला भाव देत नाही. परवा थर्टीफस्टला त्याने तिला प्रपोज पण केलं. पण ती काहीएक न बोलता निघून गेली. मी सगळं बघत होते लांबून.

मनालीचं बोलणं ऐकून आनंदला धक्काच बसला. गर्रकन मागे वळून मनालीकडे बघत त्याने विचारलं..

आनंद : नवीनने अनघाला प्रपोज केलं परवा? आणि तू हे मला आत्ता बोलते आहेस?

क्षणभर आनंदकडे निरखून बघत मनाली म्हणाली...

मनाली : तुला नव्हतं माहीत? मला वाटलं सगळ्यांना माहीत आहे.

तिचं बोलणं ऐकून आनंदने नकारार्थी मान हलवली. तो काहीतरी बोलणार होता पण मनाली स्वतःच्याच तंद्रीमध्ये होती.

मनाली : खरं सांगू? मला विचारलं असतं न नविनने तर मी लगेच हो म्हंटलं असतं त्याला. इतका हँडसम... कंपनीमध्ये उत्तम पोस्टवर... दणदणीत पगार... आणि मनाने इतका हळुवार!!!

तिचं बोलणं ऐकून आनंदचे डोळे मोठे झाले. तिच्या डोळ्यांसोमोर चुटकी वाजवत तो म्हणाला...

आनंद : मनु मॅडम ये क्या नया ट्विस्ट हें स्टोरी में? तुला नवीन...???

आनंदच्या बोलण्याने मनाली भानावर आली आणि कावरी-बावरी झाली. ती काही बोलणार तेवढ्यात नवीन हातात स्वतःची सॅक घेऊन आला आणि ती त्याने गाडीत टाकली. त्याला येताना बघून आनंद गाडीतून खाली उतरला आणि गाडीजवळ आलेल्या नविनच्या पाठीत त्याने गुद्दा घातला.

आनंद : साल्या... तू परवा रात्री अनघाला प्रपोज केलंस?

आनंदचं वाक्य ऐकून नवीनने चमकून मनालीकडे बघितलं. तिची नजर खाली झुकली होती. एकदा मनालीकडे बघून काहीसा विचित्र हसत आनंद म्हणाला...

आनंद : तिला का खुन्नस देतोयस? चुकून बोलून गेली ती. भाड्या तू मात्र छुपा रुस्तुम निघालास हा... डायरेक्ट प्रपोज??? साला....

आनंद अजूनही काहीतरी बोलला असता पण अनघाने त्याला वाड्यातून हाक मारली आणि तो वळून वाड्याच्या दिशेने गेला. तो जाताच नविनने एकदा परत मनालीकडे बघितलं आणि तो देखील वाड्याच्या दिशेने वळला. त्याचा हात धरत मनाली म्हणाली...

मनाली : सॉरी नवीन. चुकून निघून गेलं तोंडून. खरंच मला सांगायचं नव्हतं रे.

नविनने तिचा हात झिडकरला आणि वाड्याकडे जायचा विचार बदलून तो गेटकडे गेला. मनाली त्याच्या मागे जायला लागली. पण गाडीच्या उघड्या दारातून तिची सॅक खाली पडली. ती उचलायला ती वाकली. नवीन पुढे चालत गेला. मनाली सॅक घेऊन उभी राहिली आणि मागच्या झाडीतून एका हाताने तिला ओढून घेतलं. मनाली ओढली गेली आणि नुकतीच उचललेली तिची सॅक परत खाली पडली.

त्याचवेळी अनघा गाडीच्या दिशेने येत होती. ती गाडीकडे आली आणि मनालीच्या सॅकला पाय लागून धडपडली. स्वतःची सॅक गाडीत टाकत तिने मनालीची सॅक देखील उचलली आणि गाडीत टाकली. तिने वाड्याकडे वळून आनंदला हाक मारली...

अनघा : आनंद.... ए आनंद... ये की. मघा तूच घाई करत होतास आणि आता आत जाऊन बसला आहेस.

अस म्हणून ती स्वतःशीच खुदकन हसली. आनंद आतूनच ओरडला....

आनंद : येतो ग. तू हा फोडलेला फ्लॉवरपॉट आवरतो आणि येतो. तुम्ही सगळे बसा गाडीत.

अनघाने जीभ चावली आणि परत एकदा खुदकन हसत ती मागे वळली आणि एकदम दचकली. तिच्या मागेच नवीन उभा होता. तिच्याकडे क्षणभर बघून नवीन वाड्याच्या दिशेने चालायला लागला. अनघाने न राहून नविनला हाक मारली..

अनघा : नवीन!!!

नवीन : खरंच फ्लॉवरपॉट पडला का अनघा?

नविनने वळून विचित्र तिरकस आवाजात तिला विचारलं. त्याचा प्रश्न ऐकून अनघाचा चेहेरा स्थितप्रज्ञ झाला आणि तिने त्याच्याकडे पाठ केली. खांदे उडवून नवीन परत वाड्याच्या दिशेने चालायला लागला. नवीन निघून गेला आहे हे अनघाच्या लक्षात आलं नाही. ती अजूनही नवीन गेला त्या दिशेने पाठ करून उभी होती. तिला काय वाटलं कुणास ठाऊक; पण अचानक ती बोलायला लागली...

अनघा : नवीन... तुला मी परवाच सांगितलं आहे. मला तुझ्यात मुळीच इंटरेस्ट नाही. तुला पटतच नाही की माझं आनंदवर प्रेम आहे.... जसं तुझं माझ्यावर आहे. आनंदच्या पैशांकडे बघून जर मी त्याचा विचार करत असते तर त्याचे आई-वडील असतानाच मी त्याच्याकडे जाणं वाढवलं असतं आणि काकूंच्या माध्यमातून आनंदला भरीस पाडलं असतं. तुला माहीतच आहे काकूंना मी कायमच आवडत होते. पण आनंदने माझ्यावर स्वतःहून प्रेम करावं अशी माझी इच्छा होती. उगाच काहीतरी करून त्याला मिळवायचं नव्हतं मला. जाऊ दे! तुला का सांगते आहे हे सगळं मी? तू काही समजून घेणार आहेस का?

अनघा बोलता बोलता मागे वळली आणि तिच्या लक्षात आलं ती एकटीच आहे. एकटं आहे हे लक्षात आल्यावर तिचं लक्ष आजूबाजूच्या किर्रर्र झाडाझुडपांकडे गेलं आणि ती एकदम कावरी-बावरी झाली. गाडीचं उघडं दार झपाट्याने लावत ती वाड्यात जायला वळली आणि अचानक जवळच्या झाडीमध्ये ओढली गेली.

थोड्या वेळाने आनंद बाहेर आला. त्याच्या हातात त्याची सॅक होती. गाडीकडे येत त्याने डिक्की उघडली आणि स्वतःची सॅक आत टाकून तो ड्राइवर सीटवर येऊन बसला. त्याने रेअरव्यू अरशामधून मागे बघितलं तर अनघा, मनाली आणि मंदार गाडीत अगोदरच बसले होते. त्यांना बघून आनंदने रेअरव्यू आरसा नीट केला आणि खिडकीतून डोकं बाहेर काढत मोठ्याने ओरडला...

आनंद : नवीन चल रे लवकर. मुंबई गठेपर्यंतच अकरा वाजून जाणार आहेत. तुम्हाला सोडून मला घरी पोहोचायला किती वाजतील कोण जाणे.

आनंदचा आवाज चांगलाच घुमला आसमंतात. त्याचा आवाज ऐकून नवीन वाड्यातून बाहेर आला. तो अगदी सावकाश चालत होता. तो येऊन आनंदच्या शेजारी बसला. त्याने त्याचे दोन्ही हात स्वतःच्या मांडीवर ठेवले होते. एकदा त्याच्याकडे बघत आनंदने गाडी चालू केली आणि गेटमधून बाहेर काढत मार्गाला लावली.

आनंद शांतपणे गाडी चालवत होता. अधून मधून रेअरव्यू अरशातून तो मागे बसलेल्या अनघा, मनाली आणि मंदारकडे बघत होता. पण अगदीच निघताना झालेल्या विचित्र चर्चेमुळे कोणीच कोणाशी बोलत नव्हतं. अनघा आणि मंदार खिडकी बाहेर बघत होते. मनालीने डोळे मिटून मान मागे टाकली होती. बहुतेक तिला झोप लागली होती. नवीन देखील शांतपणे बाहेर रस्त्याकडे बघत होता. सगळेच शांत बसलेले बघून आनंदला अस्वस्थ वाटायला लागलं. नविनकडे बघत तो म्हणाला...

आनंद : गाणी लावू का रे? अजून आपण मेन रोडला लागलो नाही आहोत त्यामुळे रहदारी अजिबातच नाही. फारच शांत वाटतंय.

आनंदाचं बोलणं ऐकून नविनने फक्त एकदा त्याच्याकडे बघितलं आणि परत बाहेर बघायला लागला. आनंदच्या लक्षात आलं की नवीन फारच अपसेट आहे. म्हणून मग त्याने स्वतःच गाणी लावली. अजून झाडी संपली नसल्याने रेडियोतून देखील धड गाणी ऐकूच येत नव्हती. अधून मधून नुसती खरखर होत होती. पण तेवढ्यात समोर शेवटचं वळण आलं आणि आनंदने नेहेमीच्या सवयीने जोरदार स्पीडमध्ये सफाईदारपणे ते वळण घेतलं. पण त्याचा अंदाज पूर्ण चुकला होता. समोरून मोठी लॉरी येत होती. त्या लॉरीवर आनंदची गाडी जाऊन आदळली.... मोठ्ठा आवाज झाला आणि सगळं संपलं....

*****

रात्री उशिरा इंस्पेक्टर राठी आणि त्यांची टीम अपघात झालेल्या जागेवर पोहोचले. गाडी रस्त्याच्या बाजूला एका खड्ड्यात पडली होती. लॉरी मात्र कुठेच दिसत नव्हती. इंस्पेक्टर राठींचा वाँकीटॉकी वाजला आणि त्यांनी तो ऑन केला...

इंस्पेक्टर राठी : होय साहेब. बातमी खरी आहे. जबरदस्त अपघात आहे. गाडीची पूर्ण वाट लागली आहे. काय साहेब? काय? नाही....... नाही....... साहेब!!! इथेच गाडीसमोर उभा आहे मी. फक्त ड्रायव्हिंग सीटवर एक मुलगा आहे. बाकी कोणी नाही आत.!!!

समाप्त



Friday, December 25, 2020

हेवा (भाग 2)

 हेवा


भाग 2

...राधा फोन कट करणार एवढ्यात समोरून फोन उचलला गेला आणि तिच्या कानात एका स्त्रीचा आवाज घुमला... "बोल राधा... नक्की तुला काय हवं आहे?"

आता पुढे.....


तो आवाज ऐकून राधा तीनताड उडाली. फोन समोरच्या टेबलावर टाकत ती तटकन उभी राहिली. राधाचे हात कापत होते... अचानक बाहेरून अँब्युलन्स घंटानाद करत गेली आणि राधा एकदम धडपडली. तिचा धक्का टेबलाला लागला आणि मोबाईलमधून आवाज आला... 'राधा ठीक आहेस न?' एक स्त्री बोलत होती. अत्यंत प्रेमळ आणि मधाळ आवाज होता तो. तो आवाज ऐकून राधाच्या डोळ्यात पाणी उभं राहिलं.

'काही ओळख नाही.. संबंध नाही.. आणि ती कोणीतरी स्त्री मला विचारते आहे 'ठीक आहेस न!' इथे माझ्या आईला आणि नवऱ्याला मात्र माझी काही काळजीच नाही.' राधाच्या मनात आलं.

राधाने थरथरत्या हाताने मोबाईल उचलला आणि कानाला लावला. आवंढा गिळत राधा कापऱ्या आवाजात म्हणाली;"हॅलो... कोण?"

समोरून एका स्त्रीचा काळजीभरला आवाज राधाच्या कानात शिरला. "मी कोण याला फार महत्व नाही राधा. अगोदर मला सांग तुला लागलं तर नाही न? ठीक आहेस नं बाळा?"

"हो मी ठीक आहे." डोळ्यातून वाहणारं पाणी पुसत राधा म्हणाली.

"तुला एक पत्ता देते बाळा, उद्या दुपारी ये. मला माहीत आहे तुझ्या मनात काय आहे. विश्वास ठेव... माझ्याकडे उपाय आहे. बरं! लिहून घे बघू पत्ता. माझा मोबाईल बंद पडला आहे. त्यामुळे मेसेज नाही करता येणार ग मला." ती स्त्री म्हणाली.

घाईघाईने पेन हातात घेत राधाने समोरच्या वर्तमानपत्रावर पत्ता लिहिला आणि मोबाईल बंद करून तेवढा तुकडा फाडून घेत ती झोपण्यासाठी खोलीकडे वळली. राधा पलंगावर जाऊन आडवी पडली तर खरी; मात्र काही केल्या राधेला झोप येत नव्हती. 'कोण होती ती स्त्री? इतक्या प्रेमळ आवाजात माझ्याशी बोलली जणूकाही मला ओळखते. म्हणाली माझ्या मनात काय आहे ते तिला माहीत आहे. काय आहे माझ्या मनात?' राधेला खरोखरच हा प्रश्न पडला होता. मला नक्की काय हवं आहे?

.... आणि मग नकळत राधा विचार करायला लागली.... उर्वशी-देवेंद्रच्या दृष्ट लागावी अशा संसाराचा राधेला हेवा वाटायला लागला होता; हे तिने मनातल्या मनात मान्य करून टाकलं. पण सत्य हे होतं की तिला त्यांच्या संसारपेक्षा उर्वशीच्या सुखाचा मत्सर वाटत होता. 'उर्वशी सारखं माझं आयुष्य का नाही? प्रेमाने हाक मारून जागं करणारा आणि जाग आल्यावर हातात गरम गरम चहाचा कप देणारा नवरा माझ्या नशिबात का नाही?' राधाच्या मानत आलं. किती कौतुकाने देवेंद्र उर्वशीला नेलपॉलिश लावत होता. तिचा व्यायाम करून झाला की कौतुकाने तिच्या हातात ज्युसचा ग्लास आणून देतो. ती बाहेर जायला निघण्याची तयारी करत असेल तर तिच्या पुढे-मागे करत तिला मदत करतो. मी कित्येकदा बघितलं आहे उर्वशी निघताना देवेंद्र तिचे केस सारखे करण्याच्या निमित्ताने किंवा ड्रेस सारखा करण्याच्या निमित्ताने तिला जवळ घेतो. खरंच किती प्रेम आहे त्याचं उर्वशीवर.... आणि ती महामाया कशी वागत असते घरात. एखाद्या महाराणीसारखी सतत त्याला कामाला लावते. उशिरा उठणं, मोजकंच खाणं, आराम, व्यायाम, मस्त तयार होणं आणि भटकणं... किती मस्त आयुष्य आहे तिचं. मी उर्वशी होऊ शकले तर?(!) अहाहा! आयुष्यात बहार येईल. खरंच; मला उर्वशीचं आयुष्य मिळालं तर मी कधीतरी नक्की देवेंद्रला घरकामात मदत करेन. कौतुकाने एकदा पदार्थ पण बनवून देईन. अट एकच! प्रेम फक्त आणि फक्त प्रेम करावं त्याने माझ्यावर.... म्हणजे उर्वशीवर! हा विचार मनात आला आणि राधा खुदनकन हसली. 'उर्वशीचं आयुष्य! मला कळलंय मला काय हवंय.' तिच्या मनात आलं. डोळे मिटताना राधेने हाताच्या मुठीतलं ते पत्ता लिहिलेलं चिठोरं हलकेच उशीखाली सारलं आणि डोळे मिटले.

तिला स्वप्नात देवेंद्र तिचे पाय चेपतो आहे असं दिसलं आणि ती जागी झाली....

सकाळचे सहा वाजले होते. राधेचा नवरा अजून झोपलाच होता पण तिला उठणं भाग होतं. नवऱ्यासाठी नाश्ता आणि त्याचा डबा करून तिने ते सगळं टेबलावर ठेवलं. स्वतःचं सगळं उरकून नवरा निघाला आणि राधा हुश्य करत सोफ्यावर बसली. नेहेमीप्रमाणे राधाची नजर समोरच्या घराकडे गेली. देवेंद्र सफाई करत होता. पण त्याचा चेहेरा चिडचिडलेला होता. राधाला आठवलं आदल्या रात्री बाहेरून आलेल्या उर्वशीने देवेंद्रला ढकलून दिलं होतं. बहुतेक म्हणून तो चिडचिडला असावा. बायकोसाठी झुरणारा नवरा! किती नशीबवान आहे उर्वशी. पुन्हा एकदा तोच तो विचार राधेच्या मनात आला; आणि त्याक्षणी तिला आदल्या रात्रीच्या फोनची आठवण झाली.

तो कॉल आठवताच राधा काहीशी गोंधळून गेली. खरंच आला होता का तो कॉल की आपला भास होता? जर खरंच तो कॉल होता तर कोण होती ती स्त्री? मला ओळखत कशी होती ती? मुळात मी केला होता कॉल की आला होता मला? राधाला अनेक प्रश्न भेडसावायला लागले आणि तिने घाईघाईने जाऊन पलंगावर पडलेला मोबाईल हातात घेतला. तिने call log बघितला. खरोखरंच काल रात्री राधाने एका नंबरवर फोन केलेला दिसत होता. आता परत एकदा राधाचे हात थरथरायला लागले. तिच्या पायातली शक्तीच नाहीशी झाली. ती मटकन पलंगावर बसली आणि हलकेच तिने तिच्या उशीखाली हात घातला. तिच्या हाताला त्या कागदाच्या कपट्याचा स्पर्श झाला आणि चटका लागल्याप्रमाणे तिने हात बाहेर घेतला. राधाचं मन आता पुरत गोंधळून गेलं होतं. ती विचार करत होती....

जाहिरात बघून आपण फोन केला. पण त्यावेळी तो फोन आपण नक्की का करतो आहोत ते आपल्याला माहीत नव्हतं. मात्र ज्या स्त्रीने फोन उचलला ती आपल्याला ओळखत होती. तिने असं देखील म्हंटलं की माझ्या मनात काय आहे ते तिला माहीत आहे आणि तिच्याकडे त्यावर उपाय आहे. मला देखील त्याक्षणापर्यंत माहीत नव्हतं की माझ्या मनात काय आहे आणि मला काय हवं आहे; मग तिला कसं कळलं??? राधा विचार करत होती.... आणि एका क्षणी तिच्या लक्षात आलं की फोन करताना जरी तिला माहीत नव्हतं की तिला काय हवं आहे तरी आता तिच्या मनात खूप स्पष्ट होतं की तिला नक्की काय हवं आहे.

आता मात्र अत्यंत शांत मनाने राधेने उशीखालचा तो कागदाचा कपटा बाहेर काढला आणि त्यावर लिहिलेला पत्ता वाचला. पत्त्यावर लिहिलेला तो भाग राधाला साधारणपणे माहीत होता. घरातली कामं उरकून झटपट जेऊन राधा घराबाहेर पडली. आज सकाळपासून एकदाही तिचं लक्ष उर्वशीच्या घराकडे गेलं नव्हतं.

खाली येऊन तिने रिक्षा केली आणि पत्ता सांगितला. तिने पत्ता सांगताच रिक्षावाल्याने साशंक नजरेने तिच्याकडे वळून बघितलं... असा राधाला भास झाला. पण मग काही न बोलता त्याने रिक्षा सुरू केली. चिठोऱ्यावर लिहिलेल्या पत्त्यावर राधा पोहोचली खरी पण अजूनही तिची दाराची बेल वाजवण्याची हिम्मत होत नव्हती. ती तशीच दाराबाहेर उभी होती आणि अचानक दार उघडलं गेलं. राधा दचकून एक पाऊल मागे सरकली. तिने नजर उचलून समोर बघितलं तर समोर एक लाल रंगाचा गाऊन घातलेली स्त्री उभी होती. दिसायला अत्यंत सुंदर होती ती आणि राधाकडे बघत मंदपणे हसत होती. काही न बोलता तिने डावा हात पुढे करत राधेला आत घेतलं आणि ती आत येताच दार लावून घेतलं. दार बंद होताच राधाच्या लक्षात आलं की खोलीमध्ये बराच अंधार आहे. तिच्या मनात आलं म्हणूनच कदाचित आपल्याला दुपारी यायला सांगितलं असेल. त्या लाल गाऊनवाल्या स्त्रीने परत एकदा राधाचा हात धरला आणि तिला सोफ्यावर बसवलं. राधा बसताच ती राधाच्या पुढ्यात एका टेबलावर बसली. तिने राधाचे दोन्ही हात स्वतःच्या हातात घेतले आणि मंद स्मित करत म्हणाली;"मला वाटलं येतेस की नाही! तुझ्या फोनची कित्येक दिवस वाट बघत होते."

तिच्या बोलण्याने राधा गोंधळून गेली. "तुम्ही माझ्या फोनची वाट बघत होतात? पण आपण ओळखतो का एकमेकींना? मला तर नाही आठवत आपण कधी भेटलो असल्याचं." राधा म्हणाली.

त्यावर गूढ स्मित करत ती स्त्री म्हणाली;"आपण ओळखतो का?(!) यापेक्षा मी तुला ओळखते इतकंच पुरेसं आहे आत्ता. बरं बोल... तुला नक्की काय हवंय?"

राधा म्हणाली;"पण... काल तुम्ही म्हणालात तुम्हाला माहीत आहे मला काय हवंय."

तिच्याकडे रोखून बघत ती स्त्री म्हणाली;"नाही राधा. नीट आठव. मी म्हणाले तुझ्या मनात काय आहे ते मला माहीत आहे आणि माझ्याकडे उपाय आहे."

राधाने खरंच मेंदूला ताण द्यायचा प्रयत्न केला. पण त्याक्षणी तरी तिला काहीच नीटसं आठवत नव्हतं. त्या स्त्रीच्या नजरेत जणूकाही राधा अडकून गेली होती.

काहीसं पुढे सरकत ती स्त्री म्हणाली;"बोल राधा. काय हवंय तुला?"

"मला?" राधाच्या मनाचा पूर्ण गोंधळ उडाला होता. 'हिला माहीत आहे नं मला काय हवंय? की माझ्या मानत काय आहे ते फक्त माहीत आहे???' राधा विचार करत होती. आपण नक्की काय विचार करतो आहोत आणि आपल्याला काय बोलायचं आहे; यात तिचा पुरता गोधळ उडून गेला होता.

"हो! काय हवं आहे तुला?" राधापासून काहीशी लांब सरकत तिने राधाची. "देवेंद्रसरखा नवरा हवा आहे की उर्वशी सारखं आयुष्य?" राधाच्या डोळ्यात निरखून बघत ती म्हणाली. बोलत असताना ती तिच्या बोटांची काहीशी विचित्र हालचाल करत होती. राधाची नजर तिच्या डोळ्यात अडकली असली तरी तिची हलणारी बोटं राधाला अस्वस्थ करत होती.

त्या स्त्रीच्या प्रश्नांने राधाच्या आश्चर्याला पारावार राहिला नाही...........

मंद गूढ हसत ती स्त्री परत एकदा म्हणाली;"बोल राधा. तुला नक्की काय हवं आहे? माझ्याकडे फार वेळ नाही. देवेंद्र सारखा नवरा की उर्वशी सारखं आयुष्य?"

राधाने क्षणभर डोळे मिटून घेतले आणि एक दीर्घ श्वास घेतला. डोळे उघडून त्या स्त्रीकडे स्थिर नजरेने बघत राधा म्हणाली;"मला सारखं काही नको. मला उर्वशीचंच आयुष्य हवंय."

आता धक्का बसायची पाळी त्या स्त्रीची होती. पण अशा जगावेगळ्या मागण्या ऐकायची तिला सवय असावी. क्षणभरातच स्वतःला सावरत ती म्हणाली;"उर्वशी सारखं आयुष्य नको आहे तुला?"

आता राधा शांत झाली होती. तिने आत्मविश्वासपूर्वक म्हंटलं;"नाही. मला उर्वशी सारखं आयुष्य नको आहे. मला उर्वशीचंच आयुष्य हवं आहे. मला तिच्या कायेत शिरून तिच्या आयुष्याचा अनुभव घ्यायचा आहे. कोणा सारखं म्हंटलं की अनेकदा त्यात काहीतरी कमी-जास्त होऊ शकतं. बरं सारखं म्हंटलं की फक्त त्या व्यक्तीचं आयुष्य मिळतं. आजूबाजूची माणसं तीच राहातात. मला तसं नको आहे. माझ्या मते उर्वशीचं आयुष्य एकदम आदर्श आहे. प्रेमळ, लाड करणारा नवरा आणि शांत संथ आरामदायी जीवन आहे तिचं. म्हणून तीचंच आयुष्य.... तिच्या सारखं नाही." राधा म्हणाली.

"उर्वशीच्या आयुष्याबद्दल तुला सगळं माहीत आहे का राधा?" त्या स्त्री ने राधाला विचारलं. आपल्याच विचारात गढलेल्या राधाला तिचा प्रश्न तर ऐकू आला पण आवाजातला छद्मीपणा नाही कळला. एका तंद्रीत राधा म्हणाली;"हो! सगळं माहीत आहे मला. बस्! ठरलं. मला उर्वशीचं आयुष्यच हवं आहे. तुम्ही मला ते देऊ शकता का हाच आता प्रश्न आहे."

राधेकडे छद्मीपणे बघत ती स्त्री म्हणाली;"मी खूप काही करू शकते राधा. पण मला देखील त्याची परतफेड लागते. मी तुला उर्वशीच्या कायेत प्रवेश करविन; पण मग तू काय देशील मला?"

तिच्या त्या प्रश्नाने राधा गोंधळली. तिने याचा विचारच केला नव्हता. त्यामुळे ती नकळत म्हणून गेली;"मी काय देणार? तुम्हीच मागा मला शक्य असेल असं काही."

राधाचं बोलणं ऐकून त्या स्त्रीने राधाचे हात सोडले आणि मान मागे टाकत ती खदाखदा हसायला लागली. मग राधेकडे वळून ती म्हणाली;"हे असं काहीही मागा म्हणू नये राधा. पण ठीक! तू बोलून गेलीच आहेस.... एरवी मी देखील खूप काही मागितलं असतं. पण आत्ता एकच मागते... तुझ्या लग्नात आलेले सगळे दागिने आणून दे मला. अगदी हे आत्ता गळ्यात घातलेलं मंगळसूत्रसुद्धा!"

तिची ती विचित्र मागणी ऐकून राधा अवाक झाली. गळ्यातल्या मंगळसूत्राला घट्ट धरत "सगळे दागिने?" तिने विचारलं.

"हो." पुन्हा एकदा राधाच्या नजरेत नजर अडकवत ती गंभीर आवाजात म्हणाली. "आणि तसंही, एकदा तू उर्वशी झालीस की मग तुला काय उपयोग आहे त्या राधाच्या दागिन्यांचा?"

राधाने क्षणभर विचार केला आणि ती खुदकन हसली. तिला देखील त्या स्त्रीचं म्हणणं पटलं. 'एकदा मी उर्वशी झाले की राधेच्या आयुष्याशी काही संबंधच नाही न. मग राधेचे दागिने दिले तरी काय बिघडतं?' राधेच्या मनात आलं. त्या स्त्रीकडे हसत बघत राधा म्हणाली;"मान्य. कधी आणून देऊ मी दागिने?" त्यावर डोळे मिटत ती स्त्री म्हणाली;"उद्याच आण दागिने राधा. तुला जर खरंच उर्वशीच्या कायेत शिरायचं असेल तर उद्याच आण दागिने.... परवाचा दिवस फार महत्वाचा आहे. त्यादिवशी तू जागी होशील ते उर्वशी म्हणून. विश्वास ठेव माझ्यावर." असं म्हणून ती स्त्री गप्प झाली. तिने डोळे देखील मिटून घेतले होते. आता आपण नक्की काय करायला हवं ते राधेच्या लक्षात येईना. पण ती स्त्री आता काहीच बोलत नाही हे पाहून राधा उठली आणि घरी निघून आली.

राधाचं घरकामात लक्षच लागत नव्हतं. ती बाई खरं बोलत असेल का? असे दागिने देऊन टकून नंतर जर काहीच घडलं नाही तर? पण जर ती बाई खरं बोलत असेल तर आपण उर्वशी होऊ शकतो. मनात उर्वशीचा विचार येताच राधाने समोर उर्वशीच्या घराकडे बघितलं. उर्वशी गॅलरीमध्ये व्यायाम करत होती. राधेने भिरभिर नजरेने देवेंद्रला शोधलं. तो कुठेच दिसत नव्हता. त्याला शोधण्याच्या नादात राधा गॅलरीमध्ये बरीच पुढे आली आणि अचानक तिची आणि उर्वशीच्या नजरा-नजर झाली. उर्वशीने व्यायाम करण्याचं थांबवलं आणि अत्यंत गंभीर चेहेऱ्याने ती राधाकडे पाहू लागली. खरं तर राधेने अस्वस्थ होण्याचं काहीही कारण नव्हतं. पण उर्वशीची गंभीर थंड नजर बघून राधा गडबदली आणि पटकन घरात आली.

राधाने ठरवलं; आता त्या घराकडे वळून नाही बघायचं.............. आता एकदम उर्वशी म्हणून जगायचं!!! हा विचार मानत येताच राधा खुदकन हसली आणि परत कामाला लागली.

राधाने भराभर घरकाम आवरलं आणि नवरा यायच्या आत स्वयंपाक देखील करून ठेवला. रात्री नवरा आला. तो काहीतरी बोलत होता पण राधाचं लक्षच नव्हतं कशातही. ती आपल्याच नादात होती. जेवणं उरकली आणि सगळं आवरून राधा जाऊन पलंगावर पडली. खरंतर तिला वाटलं होतं की तिला झोप नाही येणार. पण ती आडवी पडली आणि एका क्षणात तिला झोप लागली.

दुसऱ्या दिवशी नवरा निघताच राधा देखील तयारी करून बाहेर पडली. ती कालच्या पत्त्यावर पोहोचली आणि दारासमोर जाऊन उभी राहिली. तिला माहीत होतं की बेल वाजवायची गरज नाही. आणि अगदी तसंच घडलं. राधा दारासमोर उभी होती आणि दार उघडलं गेलं. तीच ती सुंदर स्त्री दारात उभी होती. आज तिने पिवळ्याजर्द रंगाचा गाऊन घातला होता आणि त्यावर लालभडक रंगाचं काहीसं विचित्र चित्र होतं. तिने हसत राधेला आत घेतलं आणि दार लावून घेत तिला सोफ्यावर बसवलं. आज देखील ती कलच्याचप्रमाणे राधेच्या अगदी पुढ्यात एका टेबलावर बसली. तिने राधेच्या डोळ्यात डोळे घालत हसत हात पुढे केला आणि तिच्या नजरेच्या जाळ्यात अडकलेल्या राधेने स्वतःच्याही नकळत सोबत आणलेले सगळेच दागिने तिच्या स्वाधीन केले. त्या स्त्रीने राधेवरची नजर जराही ढळू न देता ते दागिने बाजूला ठेवले आणि राधेचे दोन्ही हात हातात घेतले. राधाला नक्की काय करावं कळेना. ती स्वस्थ बसून राहिली. परंतु थोड्या वेळाने राधेने देखील नकळत डोळे मिटले...... की आपोआप मिटले गेले?(!)

राधेने डोळे उघडले त्यावेळी ती खोलीत एकटी होती आणि खोली प्रचंड अंधारली होती. ती स्त्री कुठेच दिसत नव्हती. राधा पुरती गोंधळून गेली. आपण नक्की काय केलं पाहिजे हे तिच्या लक्षात येईना. तिने घड्याळ बघितलं. जवळ जवळ सात वाजत आले होते. 'बापरे! आपण सकाळपासून इथेच झोपलो आहोत की काय? नवरा घरी आला असला तर मोठीच पंचाईत होईल.' तिच्या मनात आलं आणि काही एक विचार न करता ती उठली आणि धावत त्या घराबाहेर पडली.

राधा घरी आली तर अजून नवरा पोहोचला नव्हता. तिने घाईघाईने घरातली कामं आवरली आणि स्वयंपाक उरकून ती हुश्य करत सोफ्यावर बसली.... तेवढ्यात नवरा आलाच. आज तिने खास गोडाचा स्वयंपाक केला होता. राधा आज गालातल्या गालात खुदखुदत होती. नवऱ्याने जेवणाचं कौतुक केलं तर एरवी तोंड फिरवणारी राधा हसून 'thank you' म्हणाली. रात्र झाली आणि तो झोपायला गेला. दिवणखान्याचा पडदा सारताना राधेने कटाक्षाने उर्वशीच्या घराकडे बघणं टाळलं. तिच्या मनात आलं.... आता काय बघायचं तिकडे? उद्यापासून तिथेच तर राहायला जायचं आहे. मात्र त्याचवेळी घराबाहेर पडणारी उर्वशी एका अधिऱ्या आणि भिरभिरणाऱ्या नजरेने पहिल्यांदाच राधेच्या घराकडे बघत होती; हे राधेच्या गावी देखील नव्हतं.

...................सकाळी सहाला सवयीनेच राधेला जाग आली. तिने झोपेत गझराचं घड्याळ चाचपडलं आणि काहीतरी पडल्याचा आवाज तिला आला. दचकून डोळे उघडत तिने पलंगाखाली काय पडलं याचा अंदाज घेतला तर ती एक सुंदर लॅम्प शेड होती. ही लॅम्प शेड आपल्या घरात कधी आली? तिच्या मनात आलं..... आणि दुसऱ्याच क्षणी तिचे डोळे टक्क उघडले. तिने पलंगावर बसत आजूबाजूला बघितलं. राधाच्या अंगात एक सुंदर सॅटीनचा गुलाबी रंगाचा गाऊन होता. ती उर्वशीच्या पलंगावर जागी झाली होती. तिने दचकून शेजारी पाहिलं... उर्वशीचा नवरा शेजारी झोपला होता.

'म्हणजे? म्हणजे!!! मी उर्वशी???? मी उर्वशी!!!!' राधा मनात म्हणाली आणि एका वेगळ्याच धुंदीमध्ये परत आडवी झाली. झोप येणं तर शक्यच नव्हतं; पण तरीही राधा आज मुळीच घाईने उठणार नव्हती. थोड्या वेळाने उर्वशीचा नवरा चुलबुळायला लागला तशी उर्वशीने/राधेने डोळे मिटून घेतले. देवेंद्र उठला आणि त्याने एकदा उर्वशीकडे बघितलं. तो खोलीबाहेर गेला आणि राधाने नकळत एक निश्वास सोडला. डोक्यावर गरगर फिरणाऱ्या पंख्याकडे बघत होती उर्वशी.... आणि नकळत तिला परत झोप लागली.

किती वाजले होते कुणास ठाऊक पण देवेंद्र उर्वशीला उठवत होता. "डार्लिंग, उठ ना! फार दमलीस का काल? उठतेस न? मी चहा आणला आहे." उर्वशीने डोळे उघडले आणि एक लाडिक हास्य करत ती उठली. देवेंद्रने दिलेला चहा घेऊन ती गॅलरीमध्ये आली आणि सहजच तिचं लक्ष समोरच्या घराकडे गेलं. समोरच्या गॅलरीमध्ये राधेचा नवरा उभा होता कपडे वाळत घालत. त्याच्याकडे बघून न बघितल्यासारखं करत उर्वशी घरात आली आणि दिवाणखान्यात जाऊन परत एकदा तिने समोरच्या घरात बघितलं. समोर राधा डस्टिंग करत होती. अगदी ती सकाळी करत असे तसं. तो विचार मनात येताच उर्वशीने स्वतःला फटकारलं. मी आता राधा नाही.... तेवढयात देवेंद्रने तिला एक मोठं envelop आणून दिलं. "आजचं invitation आहे baby. एकदम खास दिसतं आहे. आज तू तुझ्या नावासारखी दिसली पाहिजेस हं. अगदी स्वर्गातून उतरलेली अप्सरा! मस्त beaked vegis आणि सूप बनवतो जेवायला. आज व्यायाम पण करू नकोस. मस्त आराम कर दुपारी. झोप काढ. एकदम फ्रेश दिसली पाहिजेस हं. संध्याकाळी साधारण सातपर्यंत गाडी येईल." तो म्हणाला.

त्याच्याकडे हसून बघत तिने हातातलं envelop समोरच्या टेबलावर ठेवलं आणि ती अंघोळीला गेली. मस्त फ्रेश होऊन ती बाहेर आली तर देवेंद्रने गरमगरम पोहे केले होते नाश्त्याला. ती बाहेर येताच त्याने तिची प्लेट भरली आणि तिच्या हातात ठेवली. अगदी चविष्ट होते पोहे. "मस्त झालेत हं पोहे." ती अगदी लाडात येऊन म्हणाली. "अहो भाग्यम!!! नशीब उजळलं आज माझं. तुझ्या तोंडून माझं कौतुक?" देवेंद्र म्हणाला आणि उर्वशीच्या मनात आलं 'काय नशीब असतं! देवेंद्र इतकी सरबराई करतो उर्वशीची तरी तिला त्याचं कौतुक नाही.' पण मग चुकार मनाला फटकारत ती म्हणाली.... 'मीच तर उर्वशी आहे.' आणि गालातल्या गालात हसली. नाश्ता होताच उर्वशीने TV लावला आणि पाहात बसली. आज वेळ कसा झपाझप संपत होता. जेवायची वेळ झाली आणि देवेंद्रने टेबल सजवत उर्वशीला हाक मारली. "sweetheart, येतेस न?"

उर्वशी जेवणाच्या टेबलाजवळ आली आणि पाहाते तर फक्त एकच ताट. "तू नाही जेवणार माझ्यासोबत?" तिने देवेंद्रला विचारलं. काहीसा आश्चर्यचकित होत देवेंद्र म्हणाला;"मी जेवू तुझ्या सोबत?" त्यावर प्रेमळ हसत ती म्हणाली;"come on darling. असं काय विचारतोस? आण बघू तुझं ताट. दोघे जेऊ एकत्र." तिच्याकडे काहीसं विचित्र नजरेने पाहात देवेंद्र आत गेला.

जेवण आटोपून उर्वशी खोलीत आली आणि तिची नजर समोरच्या घराकडे गेली. राधा घरातला केर काढत होती. नकळत उर्वशी गॅलरीमध्ये गेली आणि राधेचं निरीक्षण करायला लागली. राधा फारच दमलेली दिसत होती. घरकामाची सवय नसल्याचं तिच्या हलचालींमधून कळत होतं. पण तरीही ती मन लावून काम करत होती. एकदा मान उडवून उर्वशी खोलीत आली आणि पलंगावर आडवी पडली.

उर्वशीला चांगलीच झोप लागली होती. देवेंद्र तिला जागं करत होता. "उठ ग. तयारी नाही का करायची?" तो म्हणाला. उर्वशीने उठून घड्याळात बघितलं तर पाच वाजले होते. "आत्तापासून तयारी?" तिने आश्चर्य वाटून विचारलं.

"कमाल करतेस! मी तुला म्हंटलं होतं नं; आजचं निमंत्रण खूप खास आहे. उठ बघू. मी ड्रेस काढून ठेवला आहे तोच घाल. जा फ्रेश होऊन ये मी ज्यूस घेऊन येतो." त्याच्या आवाजात किंचित अधिकारवणी होती. उर्वशी काहीशी गोंधळली. उठून बाथरूमकडे जात ती म्हणाली;"पण मला चहा हवा आहे." "गप! आत्ता चहा प्यायलीस तर डोळ्याखाली डार्क सर्कल्स दिसतील. ज्युसच पी." तो म्हणाला आणि खोलीबाहेर गेला.

काहीसं मनाविरुद्धच पण उर्वशी ज्युस प्यायली. देवेंद्रने एक नेलपॉलिश काढलं आणि उर्वशीला बसवत तिच्या हाताला लावायला सुरवात केली. उर्वशी कौतुकाने बघत होती. नेलपॉलिश लावून झालं आणि त्याने तिला मेक-अप करायला सांगितलं आणि बाहेर गेला. मेक-अप करायचं सगळं कसब पणाला लावत उर्वशी तयार झाली आणि देवेंद्रने काढून ठेवलेला अप्रतिम सुंदर ड्रेस घालून ती खोली बाहेर आली. तिला वाटलं होतं तिला पाहून देवेंद्र तिला मिठीत घेईल... पण तिला पाहाताच तो म्हणाला;"wwooww... amazing... आज एकदम वेगळीच दिसते आहेस. खरंच खूपच सुंदर. एकदम खुश होतील सगळे. तुझी निघायची वेळ झालीच आहे."

'सगळे? कोण हे सगळे? माझी निघायची वेळ झाली आहे; पण हा तयार नाही. हा नाही का येणार माझ्याबरोबर? मग जिथे बोलावलं आहे तिथे जर मी कोणाला ओळखलं नाही तर काय होईल?' उर्वशीच्या मनात आलं. पण तिला विचार करायला फार वेळ न देता देवेंद्रने तिच्या हातात सकाळचं invitation ठेवलं आणि तिला घेऊन तो खाली उरतला. समोर आलेल्या गाडीमध्ये तिला बसवत त्याने तिला flying kiss दिली आणि उर्वशी गेली.

................................रात्री उशिरा घरी आलेल्या उर्वशीचं अंगांग दुखत होतं. तिचा मेक-अप संपूर्ण चेहेऱ्यावर पसरला होता आणि हातातली फुगलेली पर्स सगळं सांगत होती. तिने घराची बेल वाजवली आणि देवेंद्रने दार उघडून उर्वशीकडे न बघताच तिच्या हातातल्या पर्सवर झडप घातली. ओलावलेल्या डोळ्यांनी दिवाणखान्यात शिरणाऱ्या उर्वशीची नजर समोरच्या घरातल्या खिडकीत उभ्या असणाऱ्या राधेकडे गेली आणि स्त्री मनाचं दुःख दोन डोळ्यांना कळलं.

समाप्त

Friday, December 18, 2020

हेवा (भाग 1)

 

हेवा


भाग 1


स्वप्नाळू राधाच्या लग्न करताना आयुष्याकडून खूप काही अपेक्षा होत्या. आजवर तिने जितके सिनेमे पाहिले होते त्यात सकाळी नवरा बायकोला प्रेमाने उठवतो... स्वतः बनवलेला नाश्ता देतो... गरम-गरम चहा आणून देतो असंच दाखवलं होतं. संध्याकाळी नवरा कामाहून येण्याच्या वेळेला बायको छान तयार होऊन त्याची वाट बघते; तो आला की तिच्या केसात गजरा माळतो आणि तिला उचलून घेऊन चुंबनांचा वर्षाव करतो... दोघे सतत गुलुगुलू बोलत असतात. हे सगळं पाहून तिला अपेक्षा होती की तिचा संसार पण तसाच असेल. त्यात लग्नानंतर ती आणि नवरा दोघेचजण त्याच्या बदलीच्या गावी राहाणार होते; त्यामुळे तर हे सगळं शक्य आहे असंच तिला वाटायचं. लग्न करून नवऱ्यासोबत बदलीच्या गावी आल्यानंतर राधेचा पूर्णच भ्रमनिरास झाला. ते आले त्यादिवशीच तिच्या नवऱ्याने तिला सांगितले की तो सकाळी आठ वाजता घराबाहेर पडणार आहे आणि त्याअगोदर त्याचा नाश्ता आणि चहा त्याला हवा असतो. त्याशिवाय जाताना डबा देखील तो नेणार होता. डब्यात फक्त भाजी पोळी त्याला चालणार नव्हती. व्यवस्थित अगदी चटणी-कोशिंबिरी पासून सगळंच हवं होतं. 


हे सगळं ऐकून राधा एकदम हिरमुसली झाली. पण काही न बोलता दुसऱ्या दिवशी ती सहाला उठली आणि नवऱ्याच्या मर्जीप्रमाणे तिने सगळं साग्रसंगीत केलं. तो गेल्यानंतर पसरलेलं घर आवरलं. भांडी घासणं, कपडे धुणं, घर झाडून-पुसून घेणं या रोजच्या कामांमध्ये ती अडकून गेली. दुपारी जेवणाची वेळ झाल्यावर कसतरी जेवून घेतलं. संध्याकाळी ती थोडी फ्रेश होऊन नवऱ्याची वाट बघत बसली. पण लग्नाच्या निमित्ताने बरेच दिवस सुट्टी घेतल्यामुळे नवऱ्याला घरी यायला खूपच उशीर झाला. तो आला तोच दमून. त्यामुळे त्याची वाट बघत बसलेल्या राधेकडे बघण्याचे त्राण देखील त्याच्यामध्ये नव्हते. जेमतेम जेऊन तो बेडरूममध्ये गेला. स्वयंपाकघरातलं काम झटपट आवरून राधा अधिरपणे बेडरूममध्ये शिरली आणि पाहाते तर नवरा पार डाराडूर झोपून घेला आहे. आता मात्र तिच्या डोळ्यात पाणी उभं राहीलं.

अजून माझ्या हातावरची मेहेंदी नाही उतरली आणि हा डाराडूर झोपून गेला आहे. रोमान्स म्हणजे काय याला माहीतच नाही का? हेच का लिहिलं आहे माझ्या नशिबात? ते नवऱ्याने लाडीकपणे चहा करणं... बायकोसाठी गजरा आणणं आणि तिच्या नकळत तो तिच्या डोक्यात माळणं... प्रेमाच्या गप्पा मारत बसणं... या अपेक्षा जगावेगळ्या तर नाहीत न! तिच्या मनात आलं. पण हे सगळं ती सांगणार कोणाला होती? नवीन शहर, नवीन जागा... त्यामुळे ओळखीचं कोणीच नाही.

दुसऱ्या दिवशी देखील नवरा असाच खाऊन आणि साग्रसंगीत केलेला डबा घेऊन निघून गेला आणि राधाने रडत-रडत आईला फोन केला.

"हॅलो आई...." राधाचा रडका आवाज ऐकून आईच्या काळजात धस्स झालं.

"राधा बेटा, काय झालं ग? तुझा आवाज असा का येतो आहे? जावाईबापू ठीक ना?" आईने काळजीने विचारलं.

"त्याला काय धाड भरली आहे? मस्त पोहे-चहाचा नाश्ता करून साग्रसंगीत डबा घेऊन गेला तो कामाला." राधा काहीश्या रागाने म्हणाली.

"हो न? मग तू रडते का आहेस? काही बोलले का तुला ते?" आईने गोंधळून विचारलं.

"तो काही बोलतच नाही ग आई. त्याचाच त्रास होतो आहे. काल आमचा पहिला दिवस इथला... पण तो रात्री उशिरा आला. माझ्याकडे बघितलं सुद्धा नाही ग. जेवला आणि झोपला. हे कसलं आयुष्य ग आई? ना माझ्यासाठी चहा केला ना गॅलरीत बसून गप्पा मारल्या... ते तर जाऊ दे; पण अग मी केलेल्या नाश्त्याचं आणि जेवणाचं एका अक्षराने कौतुक देखील नाही केलं ग. असा कसा हा... इतका unromantic?" राधा अजूनही घुश्यातच होती.

तिचं बोलणं ऐकून आई अवाक झाली आणि म्हणाली;"राधा, अग पूर्वी तू हे सगळं मला सांगायचीस तेव्हा तू लहान आहेस असं समजून मी काही बोलले नाही. पण ही असली फिल्मी स्वप्नं बघणं सोडून दे बघू. यामुळे घरात फक्त असंतोष राहातो. अग, संसार म्हणजे गुलूगुलू गप्पा; गजरा माळणं, मिठ्या मारणं नाही बेटा. रोमान्स तर हवाच पण त्याच बरोबर एकमेकांना समजून घेऊन सुख-दुःखात साथ देणं याला संसार म्हणतात. अग आपल्यासारखे मध्यम वर्गीय पैसे न कमावता फक्त गुलुगुलू बोलत राहिले तर जेवणार काय? स्वप्नांच्या दुनियेतून बाहेर हे राधे. नाहीतर एखाद दिवस तोंडघाशी पडशील."

आईचं बोलणं ऐकून राधा अजूनच हिरमुसली. फोन ठेवताना तिने मानत ठरवलं की आता आईशी या विषयावर बोलायचंच नाही. जे करायचं आहे ते आपणच करायचं. असं तिने ठरवलं खरं; पण नक्की काय करायचं तेच सुचत नसल्याने ती आला दिवस ढकलत होती.

...... आणि एक दिवस त्यांच्या इमारतीच्या समोरच्या इमारतीमध्ये अगदी त्यांच्या समोरच्याच घरात असंच एक जोडपं राहायला आलं. दोन्ही घरांच्या गॅलरीज अगदी समोरासमोर यायच्या. गम्मत म्हणजे स्वयंपाक घराची खिडकी आणि दिवणखान्याची खिडकी देखील अगदी समोरच. आजवर राधाला हे लक्षात आलं नव्हतं. मात्र हे जोडपं आलं आणि तिचं कुतूहल जागं झालं. पहिल्या दिवशी दोघे नवरा-बायको सकाळी तसे आरामातच उठले. नवऱ्याने चहा करून आणला होता आणि दोघे राजा-राणी गॅलरीमध्ये बसून गप्पा मारत होते. थोड्या वेळाने तिचं लक्ष गेलं तर दोघे दिवाणखान्यात बसून सकाळचा नाश्ता करत होते. पण तिने तर राणीला उठून स्वयंपाकघरात जाताना बघितलं नव्हतं. त्यामुळे ती काहीशी गोंधळली. मग मात्र कुतूहलापाई राधाचं लक्ष त्यांच्या घराकडे लागलं. एकीकडे ती स्वतःच्या घरातलं काम करतच होती. राधाने भाजी फोडणीला टाकली आणि तिचं समोर लक्ष गेलं आणि अहो आश्चर्यम्! राजा स्वयंपाक करत होता. बहुतेक त्याने हिंदी गाणी लावली होती आणि मजेत काहीतरी चिरत तो गुणगुणत होता.

राधाचं जेवण उरकलं आणि ती तिच्या खोलीत जरा पडावं या विचाराने आली. पडदा सरकवताना नकळत तिने वाकून समोरच्या घराकडे बघितलंच. राणी पलंगावर बसली होती आणि राजा चक्क तिच्या नखांना नेलपॉलिश लावत होता. 'नशीबवान राणी' राधाच्या मानत आलं. संध्याकाळी पुन्हा तिचं कथा पुढे होती.... राणी गॅलरीमध्ये व्यायाम करत होती... अगदी जोरदार; आणि राजा स्वयंपाकघरात होता.

दिवेलागणीची वेळ झाली आणि राधाने देवासमोर निरांजन लावलं. दिवाणखान्याचा दिवा लावताना चुकारपणे तिची नजर समोरच्या घरात गेलीच. राणी खूप मस्त तयार झाली होती. अगदी दृष्ट लागेल अशी! राजा तिचे कपाळावरचे केस मागे करत तिच्या अगदी जवळ उभं राहून काहीतरी बोलत होता. राणीची पाठ होती खिडकीकडे... पण राधाला खात्री होती की राजाच्या त्या प्रेमळ बोलण्यामुळे सुखावून राणी मंद स्मित करत असेल. तेवढ्यात राणी घराबाहेर पडली आणि अत्यंत स्वाभाविकपणे राधा खिडकीकडे धावली. राधाने खाली वाकून बघितलं तर राजा एका गाडीचं दार उघडून देत होता राणीला आणि राणी एकटीच गाडीत बसून निघून गेली.

राणी गेली आणि त्याचवेळी राधाला तिचा नवरा येताना दिसला. समोरच्या घरातल्या राजा-राणीच्या दुनियेतून राधा परत एकदा तिच्या संसाराच्या सत्य दुनियेत आली आणि नवऱ्यासाठी चहा करायला स्वयंपाकघराकडे वळली. रात्री स्वयंपाकघरातली शेवटची आवराआवर करून राधा तिच्या खोलीकडे जात होती आणि तिने सहज समोर बघितलं तर राणी नुकतीच घरी आली होती..... अगोबाई, रात्रीचे बारा वाजून गेले आहेत आत्ता येते आहे ही? कमाल आहे! राजाला बरं चालतं हिचं असं मजा करायला बाहेर जाऊन उशिरा येणं!!! राधाच्या मनात आलं. पण ती दिवसभराच्या घरातल्या कामाने दमून गेली होती. त्यामुळे फार विचार न करता ती पलंगावर जाऊन आडवी पडली.

राधाला वाटलं होतं पहिलाच दिवस आहे त्यामुळे दोघांनी ठरवून असं काही एन्जॉय केलं असेल. पण त्यानंतर राजा-राणीचा तोच दिनक्रम आहे हे राधाच्या लक्षात आलं; आणि त्यांच्याबद्दल तिच्या मनात कुतूहल जागं झालं. राणी काही आजारी-बिजारी असेल का? तिच्या मानत आलं. पण हा विचार तिने लगेच पुसून टाकला. दोघे छान जगताना दिसत होते; मग उगाच कशाला असे नकारात्मक विचार करायचे? राधाने स्वतःलाच फटकारलं.

ते दोघे समोर राहायला येऊन पाच/सहा दिवस झाले होते. एका संध्याकाळी राधा भाजी आणायला बाहेर पडली. मुद्दाम त्यांच्या इमारतीत जाऊन घर कोणी घेतलं आहे ते नाव बघायला गेली. नावाच्या पट्टीवर उर्वशी - देवेंद्र असं लिहिलं होतं. ते वाचून राधा खुदकन हसली. तिच्या मानत आलं नावं देखील किती मिळती-जुळती. ती उर्वशी आणि तो तिचा देवेंद्र! ती मागे वळली आणि तिला देवेंद्र समोरून येताना दिसला. तिने त्याच्याकडे बघत स्मित केलं. त्याने देखील स्मित केलं आणि तो जिना चढायला लागला.

उर्वशी आणि देवेंद्रच्या संसाराचं निरीक्षण करण्याचा नादच लागला राधाला. पण हळूहळू त्यांच्या सुखी संसाराच्या कौतुकाची जागा मत्सराने घ्यायला सुरवात केली. उर्वशीचं सुख राधेला टोचायला लागलं आणि आपलं आयुष्य नकोसं व्हायला लागलं. खरं तर तिचा नवरा काही अगदीच शुष्क नव्हता. शनिवार-रविवार तो फक्त आणि फक्त राधेबरोबर असायचा. मित्रांनी बोलावलं तरी जात नसे. राधेला घेऊन सिनेमाला जाणं; बाहेर जेवायला जाणं हे तो आवर्जून करायचा. त्यांच्या कंपनीची एक मोठी ऑर्डर पास झाली आणि बॉसने अचानक सगळ्यांना खास अलौन्स दिला तर त्याने राधेसाठी एक सुंदर साडी आणली. पण राधाला त्याचं प्रेम आता दिसतच नव्हतं. तिच्या डोळ्यांसमोर उर्वशी आणि देवेंद्रचा आदर्श संसार सतत नाचत होता आणि त्याहूनही जास्त उर्वशीच्या सुखाचा वाढता राग राधेच्या डोक्यात जात होता.

राधा त्या शहरालाच नवीन होती. तिथे त्यांचे कोणी नातेवाईक राहात नव्हते; ना राधेला कोणी मित्र-मैत्रिण होते. त्यामुळे तिच्या मनातली ही धुसमुस तिला कोणालाही सांगता येत नव्हती. आईला काही सांगणं शक्यच नव्हतं. आई परत तिचं तिची जुनी रेकॉर्ड लावेल याची राधाला खात्री होती. दिवस जात होते आणि राधाचा अस्वस्थपणा वाढत होता.

एकदिवस राधा दुपारी वर्तमानपत्र वाचत बसली होती आणि तिची नजर एका जाहिरातीवर पडली...

जे हवं असेल ते मिळेल.... पैसा, सन्मान, कोणापासून सुटका किंवा कोणालातरी मिळवणं... काहीच अवघड नसतं. फक्त इच्छा प्रामाणिक आणि जबरदस्त असावी लागेल... हवं आहे? संपर्क करा!! आणि त्याच्यापुढे एक नंबर लिहिला होता.

राधाने जाहिरात वाचली; तिच्या मनात ती अडकली. पण मग राधा तिच्या कामाला लागली. राधा काम करत होती आणि तिच्या आईचा फोन आला.

"काय करते आहेस ग बाळा?" आईने प्रेमाने राधेला विचारले.

"काय करणार? घरकाम! अजून काय लिहिलं आहे माझ्या नशिबात? नवऱ्याने केलेले लाड आणि नवऱ्याचं प्रेम फक्त उर्वशीच्या नशिबात." राधा नकळत बोलून गेली.

आईला कळेना राधा काय म्हणते आहे. आई म्हणाली;"कोण उर्वशी? तिचं काय? तुमचा नवीन संसार. त्यात नवीन शहर. ना सासू बरोबर ना सासरे. तुम्ही दोघे राजा राणी आहात न? मग शनिवार रविवार कुठे जात नाही तुम्ही?"

राधा म्हणाली;"होsss, जातो की. त्याच्या मनात असलं की सगळं होतं. जाऊ दे ग. माझं दुःख आणि मी. तू कसा काय आत्ता फोन केलास आई?"

त्यावर तिची आई म्हणाली;"राधा, अगं महत्वाचंच आहे तसं. चार दिवसांनी अमावस्या आहे हं; आणि ग्रहण देखील. चांगला दिवस नाही हो! इडापिडा टळो ती. तुला सांगायला फोन केला की तो दिवस शनिवार आहे. कदाचित तुम्ही दोघे बाहेर जायचं ठरवाल. तर तसं नको करुस हं. घरीच राहा या शनिवारी."

आईचं बोलणं उडवून लावत राधा म्हणाली;"आम्ही कुठ्ठे जात नाही ग. मुळीच काळजी करू नकोस. घरातच बसणार आहे मी. खिचडी खाणार आणि रात्री झोपणार. बास!!! चल, ठेवते फोन. तो यायची वेळ झाली." असं म्हणत राधेने फोन ठेवला.

तिची नजर सवयीने उर्वशी-देवेंद्रच्या घराकडे गेली. उर्वशी रोजच्या प्रमाणे अप्रतिम सुंदर दिसत होती. आज तिने सुंदर काळा चमकदार ड्रेस घातला होता आणि मेक-अप देखील जरा खासच केला होता. तिचं सुख बघून राधेच्या मनाचा तिळपापड झाला आणि ती तरातरा खोलीत जाऊन पलंगावर पडून हमसून-हमसून रडायला लागली. किती वेळ गेला होता कुणास ठाऊक. रडता-रडता झोपलेल्या राधेला जाग आली. पाहाते तर तिचा नवरा तिच्या शेजारी गाढ झोपला होता. त्याला शेजारी बघून ती एकदम गडबडून गेली. 'अरेच्या! हा कधी आला? उठवलं पण नाही याने मला. कमाल आहे!' तिच्या मनात आलं. तिने घड्याळाकडे बघितलं बारा वाजून गेले होते. राधेची झोप उडून गेली होती.

ती उठली आणि दिवाणखान्यात आली. सवयीप्रमाणे तिची नजर समोर उर्वशीच्या घराकडे गेली. देवेंद्र दरवाजा उघडत होता. राधा पुढे झाली आणि खिडकीला चिकटून पडद्याआड उभी राहून बघायला लागली. दार उघडताच उर्वशी आत आली. राधाला फक्त देवेंद्रची पाठ दिसत होती त्यामुळे नकळत राधा अजून थोडी वाकली. देवेंद्र हात पसरून उर्वशीला मिठीत घेण्याचा प्रयत्न करत होता बहुतेक... पण त्याचे हात रागाने ढकलून देत उर्वशी आत खोलीकडे धावली. तिचा मेक-अप चांगलाच उतरला होता आणि केस पण अस्ताव्यस्त झाले होते.

राधाच्या मनात आलं 'कमाल आहे उर्वशीची. भटकायलाच तर गेली होती न? आता जर नवरा प्रेमाने पुढे येतो आहे तर त्यालाच ढकलून दिलं हिने.' विचार करत करत राधा स्वयंपाकघरात गेली. पाहाते तर नवऱ्याने जेऊन घेऊन तिचं जेवण झाकून बाकी सगळं आवरून ठेवलं होतं. ते पाहून राधाच्या मानत आलं 'हं! बरी जमतात याला असली नाटकं. काल मेसेज केला होता की मला स्वयंपाक करायचा कंटाळा आला आहे; काहीतरी घेऊन ये येताना. तर रिप्लाय करतो... मला उशीर होणार आहे. तुझ्यासाठी काही असेलच न घरात; मी खाऊन येतो. म्हणजे मला कंटाळा आला तर हा मजा करणार आणि मी खायचं शीळ काहीतरी... आणि आज अचानक सगळं आवरून ठेवलंय. मला हाक सुद्धा मारावीशी वाटली नाही याला. माझ्यावर प्रेम तरी आहे की नाही याचं?' विचार करत करत राधा ग्लासभर पाणी प्यायली आणि परत झोपण्यासाठी खोलीकडे वळली. खोलीकडे जाताना तिचं लक्ष दुपारी टेबलावर ठेवलेल्या वर्तमानपत्रावर गेलं. तिच्या समोर दुपारी ओझरती वाचलेली जाहिरात होती. पिवळ्या लाल रंगातली ती जाहिरात दिवाणखान्यातल्या मंद उजेडात डोळ्यांना आकर्षून घेत होती. झोपायला जाण्याचा बेत रद्द करत राधा सोफ्यावर बसली आणि तिने परत एकदा ती जाहिरात वाचली.

जे हवं असेल ते मिळेल.... पैसा, सन्मान, कोणापासून सुटका किंवा कोणालातरी मिळवणं... काहीच अवघड नसतं. फक्त इच्छा प्रामाणिक आणि जबरदस्त असावी लागेल... काही हवं आहे? संपर्क करा!!

खरी असेल का ही जाहिरात? की काहीतरी ढोंगी बाबा सारखं असेल? राधा विचार करत हातातल्या मोबाईलशी चाळा करत होती. अचानक तिला काय झालं कोणास ठाऊक तिने जाहिरातीमधला नंबर मोबाईलवरून लावला आणि मोबाईल कानाला लावला. रिंग व्हायला लागली आणि हे बरोबर नाही... असं मनात येऊन राधा फोन कट करणार एवढ्यात समोरून फोन उचलला गेला आणि तिच्या कानात एका स्त्रीचा आवाज घुमला... बोल राधा... नक्की तुला काय हवं आहे?

क्रमशः

Friday, December 11, 2020

श्रीकृष्ण - उद्धव

 श्रीकृष्ण - उद्धव


मी नक्की कोण आहे हा प्रश्न मला कायम पडत आला आहे; आणि त्याहूनही मोठा प्रश्न हा की ज्याला सगळे द्वारकाधिश म्हणतात तो आजानुबाहु राजनीतीतज्ञ असूनही प्रत्येक स्त्री-पुरुषाचे भावविश्व व्यापून असलेला मुरलीधर मनमोहन श्रीकृष्ण कोण आहे?

सर्वसामान्य भाषेतील माझी ओळख म्हणजे श्रीकृष्णाचा कनिष्ठ चुलत बंधू उद्धव! माझी माता कंसा मथुराराज कंस यांची भगिनी. त्यामुळे मी श्रीकृष्णाचा मावस बंधू देखील होतोच. पण तरीही त्या वासुदेवाने आपणहून मला भावसखा म्हणून अनेकदा संबोधले आहे. त्यामुळे मला माझी ती ओळख जास्त प्रिय आहे. ज्यावेळी तो मला प्रिय बंधो उधो असे हाक मारतो त्यावेळी त्याच्या अंतर्मनातील नाद ऐकण्यासाठी माझे कान आतुर होतात. श्रीकृष्णाच्या अंतर्मनातील नाद ऐकण्याचे परमभाग्य मला माझ्या आयुष्यात नेहेमीच मिळाले आहे; आणि त्यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजतो.

कुरुक्षेत्रावरील भारतीय महायुद्ध झाल्यानंतर वासुदेव पूर्णपणे बदलून गेला होता. एकदा आम्ही त्याच्या लाडक्या श्रीसोपानावर गप्पा मारत बसलो असताना मावळतीच्या सुर्यबिंबकडे एकटक पाहात मृदुहृदयी मनमोहनाने मला म्हंटले,"उधो बंधो, मानवी जीवनात कर्तव्य आद्य स्थानी कायम असावं हे मी नेहेमीचं सर्वांना सांगत आलो आहे. पण तुला म्हणून मी त्यापुढे जाऊन सांगतो की हे कर्तव्य भावपूर्ण असावं. आज मनपटलावरील सर्वच भाव तुझ्या पुढ्यात बोलून टाकावेसे वाटते आहे. परंतु कुठून सांगण्यास सुरवात करू हा प्रश्न मला पडला आहे. बंधो आज महाभारतीय युद्ध आणि त्याअनुषंगाने त्यात उतरलेल्या अनेक व्यक्तींच्या निर्णय क्षमतेतील कमकुवतपणाबद्दल तुला काही सांगायचे आहे. उधो, कर्तव्य कठोर असतेच पण त्याला भावनिक किनार असते हे समजून घेतले पाहिजे. ज्यावेळी कर्तव्य भावनिक होते आणि त्याची किनार कठोर होते त्यावेळी भीष्म प्रतिज्ञा घेऊन आजन्म अग्निपरीक्षा देणे क्रमप्राप्त होते हे पितामह भीष्मांनी त्यांच्या जीवन प्रवासात समस्त जगाला दाखवून दिले.

कर्तव्य आणि भावना यांची योग्य सांकड घालणे न जमल्यामुळेच महाराज धृतराष्ट्रांनी हस्तिनापूर नरेश हे बिरुद हृदयाशी शेवटपर्यंत कवटाळून ठेवले आणि त्यातच त्यांनी त्यांचे शंभर पुत्र गमावले; राजमाता गांधारीदेवींनी कर्तव्यापेक्षा पुत्रप्रेमाला बळी पडून दुर्योधनाला लोहशरीराचा आशीर्वाद दिला आणि आपल्या आशीर्वादानंतर देखील आपल्या प्रिय पुत्राचा मृत्यू झाला हे सत्य त्या स्वीकारू शकल्या नाहीत. आत्या कुंतीने कर्णाला जन्म दिला तो देखील भावनिक डोलायमानतेतून आणि पुढे आपले पती माहाराज पांडु यांचे दुःख सहन न होऊन मिळालेल्या वरदानाचा वापर करून युधिष्ठीर, भीम आणि अर्जुनाला जन्म दिला. कदाचित म्हणूनच तो मंत्र माता माद्री सोबत अग्निमध्ये भस्म झाला.

पांडवांमधील जेष्ठ म्हणून युधिष्ठिराचे कर्तव्य आपल्या चारही बंधूंना सांभाळणे आणि पांडव पत्नी इंद्रप्रस्थ सम्राज्ञी द्रौपदी हिचा सन्मान कायम अबाधित ठेवणे हे होते. मात्र स्वतःच्या द्यूतक्रीडेरेवरील प्रेमाखातर भावनिक होत त्याने एकदा नाही तर दोन वेळा सर्वस्व गमावले..... आणि त्यानंतरचा वनवास त्याच्या सबोतच त्याच्या बंधूंच्या आणि पत्नीच्या भाळी आला."

कदाचित तंद्री लागल्यामुळे श्रीकृष्ण बोलता-बोलता थांबला. मात्र त्याच्या निर्मम कृष्ण वाणीमध्ये पडलेला खंड मला अस्वस्थ करू लागला. त्यामुळे त्याला पुन्हा एकदा बोलते करण्याच्या उद्देशाने मी म्हणालो;"वासुदेवा, पितामह असतील, महाराज धृतराष्ट्र असतील, राजमाता गांधारीदेवी, प्रिय आत्या कुंतीदेवी आणि जेष्ठ पांडव बंधू युधिष्ठीर असेल.... या सर्वांवर कर्तव्य पालन करण्यासोबतच निर्णय घेण्याची जवाबदारी आणि अधिकार देखील होता. तुझ्या म्हणण्याप्रमाणे हे सर्वच कर्तव्यापेक्षा भावनेचे बळी जास्त ठरले देखील असतील. परंतु कधी कधी कर्तव्य देखील बांधिलकी घेऊन येते."

माझ्या बोलण्याने आपले कमलनेत्र माझ्याकडे वळवून मोहक स्मित करून श्रीकृष्ण परत बोलू लागला;"उद्धवा, चिंता करू नकोस. आज मी बोलता-बोलता शांत होऊन समाधिस्थ नाही होणार. बंधो, तू माझा केवळ भावसखा नाहीस तर या काळ्या कृष्णाची उजळलेली सावली आहेस. त्यामुळे आज माझ्या अंतर्मनातील गुंजन तुला सांगून मी भावमोकळा होणार आहे.

तुझा रोख माझ्या लक्षात आला आहे बरं बंधो. तू भीम, अर्जुन, नकुल आणि सहदेव यांच्या कर्तव्य पालनासंदर्भात बोलतो आहेस न? केवळ या चौघांनाच नाही तर मानवीय आयुष्य जगणाऱ्या प्रत्येकाला एक नियम लागू होतो... तो आज मी तुला सांगणार आहे. तुझ्या मनात आले की भीम, अर्जुन, नकुल आणि सहदेव यांच्या मनात इच्छा असूनही केवळ जेष्ठ बंधूच्या विरोधात जाणे योग्य होणार नाही या विचाराने त्यांनी जे जे घडत गेले ते ते मौन बाळगून स्वीकारले. त्यांच्या हातात काहीच नव्हते... असे तुला सुचवायचे आहे; हे माझ्या लक्षात आले आहे.

उद्धवा, याचा अर्थ तू माझे सुरवातीचे प्रतिपादन अजूनही समजून घेतलेले नाहीस असे दिसते. जीवनात कर्तव्य आद्य स्थानी असावे हे अंतिम सत्य आहे! भिमासहित चारही भावंडांनी केवळ ज्येष्ठ बंधू संदर्भातील आपल्या कर्तव्याची जाण ठेवली. मात्र ते हे विसरले की एक मोठे अरण्य नेस्तनाबूत करून जी इंद्रप्रस्थ राजधानी त्यांनी आपल्या जेष्ठ बंधूच्या सोबतीने आणि माझ्या मदतीने उभी केली आहे या राजधानीमध्ये या पाचही भावांच्या युद्ध समर्थ बाहूंवर विश्वास ठेऊन भारतवर्षातील अनेक स्त्री-पुरुष इंद्रप्रस्थामध्ये राहण्यास आले. यासर्वांची सुखी जीवनाची जवाबदारी राजा म्हणून जितकी युधिष्ठिराची होती तितकीच ती इतर पांडव बंधूंची देखील होती. त्यामुळे मी तर म्हणेन की ज्येष्ठ बंधूसाठीच्या कर्तव्य भावनेतून त्यांनी युधिष्ठिराची प्रत्येक कृती स्वीकारताना इंद्रप्रस्थासाठीची त्यांची बांधिलकी ते विसरले... यातून परत एकदा हेच सिद्ध होते की मानवी जीवन हे कर्तव्यापेक्षा भावनेला जास्त महत्व देते.

उधो, कुरुक्षेत्रावर घडलेल्या भारतीय महायुद्धाची जवाबदारी प्रत्येकजण माझ्यावर टाकतो आहे. ही जवाबदारी मी देखील स्वीकारतोच! मात्र कुरुक्षेत्रावरील महायुद्ध हे खूप नंतरचे सत्य आहे. या महायुद्धाची गरज का निर्माण झाली याचा कधी कोणी विचार केला असेल का? जर पितामहांनी, महाराज धृतराष्ट्रांनी, राजमाता गांधारीदेवींनी, कुंती आत्येने, युधिष्ठिराने..... अगदी दुर्योधनाने देखील स्वतःच्या मनोद्वंद्वाला जिंकलं असतं तर भारतीय महायुद्ध घडलंच नसतं; हे सत्य आहे! उद्धवा, का झालं हे महायुद्ध?"

आम्ही दोघेच ज्यावेळी गप्पा मारत असतो त्यावेळी प्रश्न निर्माण करून त्याचे उत्तर देखील स्वतःच देण्याची सवय माझ्या ज्येष्ठ बंधुला आहे; याची मला कल्पना असल्याने त्याने प्रश्न जरी विचारला तरीही मी स्वस्थपणे तोच देणार असणाऱ्या उत्तराची वाट बघत होतो.

"प्रिय बंधो..." परत एकदा अनंतात दृष्टी स्थिरावत माझा भगवान बोलू लागला;"हे महायुद्ध केवळ द्रौपदीच्या स्त्रीसन्मानासाठी किंवा पांडवांच्या न्याय हक्कासाठी नाही झाले. हे युद्ध वैश्विक सत्यासाठी आणि पुढील पिढीपुढे निर्माण होणाऱ्या आदर्शांसाठी झाले आहे.

वडिलांच्या मनात निर्माण झालेली प्रेम भावना आपल्या युवराज म्हणून असणाऱ्या कर्तव्यापेक्षा श्रेष्ठ ठरवली देवव्रताने.... हा आदर्श नाही!

महाराज पांडूच्या राज्याची लालसा ठेवली मनात धृतराष्ट्राने.... हा आदर्श नाही!

अंध पतीवरील प्रेमाखातर धर्मपत्नीचे भाव-कर्तव्य योग्य रीतीने पूर्ण करत आयुष्यभर डोळ्यांवर पट्टी बांधून घेतली राजमाता गांधारीदेवींनी मात्र पुत्रप्रेमापुढे त्यांची कर्तव्यभावना तिठी पडली... हा आदर्श नाही!

तूच सांग..... कुंती आत्याची तारुण्यसुलभ उत्सुकता कर्णाला जन्म देऊन गेली... हा आदर्श तरुणींनी ठेवावा का?

द्यूतक्रीडेवरील प्रेमापोटी आपल्या लहान बंधूंना आणि प्रिय पत्नीला वनवास घडवला आणि कष्टाने उभे केलेले राज्याचे पुन्हा एकदा अरण्यात रूपांतर झाले... या युधिष्ठिराच्या कृतीला स्वीकारणे योग्य होईल का?

ही उदाहरणे तर केवळ वानगीदाखल उद्धवा! परंतु तू नीट विचार केलास तर अधर्मावर धर्माचा विजय, असत्यावर सत्याचा विजय आणि मानवी जीवनामध्ये योग्य आदर्श निर्माण करणे हे प्रत्येक युगातील प्रत्येक स्त्री-पुरुषाचे आद्य भाव-कर्तव्य आहे. मी केवळ एक सामान्य जीव आहे; असा विचार करून आपल्या जवाबदारी पासून लांब जाणे ही तर सर्वसामान्य कृती आहे. मात्र आपल्या आयुष्याला सामोरे जाणे हेच खरे जीवन आहे."

तो परत एकदा बोलता-बोलता थांबला होता. हीच संधी साधून मी माझ्या मनात निर्माण झालेला प्रश्न त्याच्यासमोर मांडला.

"श्रीकृष्णा, प्रत्येक युगातील स्त्री-पुरुषाचे आद्य कर्तव्य आहे हे तू म्हणतोस; मात्र एक सर्वसामान्य जीव... जो नात्यांच्या भावबंधनात कायमचा गुंतला आहे; ज्याचे रोजचे जीवन जगतानाच त्याची दमछाक होते आहे; तो आदर्श काय आणि कसा निर्माण करणार?"

माझा प्रश्न ऐकून भगवान श्रीकृष्ण मंद स्मित करून उठून उभे राहिले आणि म्हणाले;"उद्धवा, आज या श्रीसोपानावर बसून आपण गप्पा मारतो आहोत; ही तुझी भावनाच चुकीची आहे; हे पुढे ज्यावेळी तुझ्या लक्षात येईल त्यावेळी मी आत्ता जे सांगतो आहे; त्याचा अर्थ तुला लागेल....

आपले सर्वसामान्य जीवन योग्य प्रकारे जगणे हाच आदर्श आहे बंधो. योग्य पुत्र-पुत्री होणे, घेतलेल्या शिक्षणाचा राष्ट्र निर्मितीसाठी वापर करणे, माता-भगिनी-पत्नी-पुत्री यांच्या स्त्रीत्वाचा प्रत्येक पुरुषाने आदर करणे, स्त्रीने प्रत्येक पुरुषात आपल्या पित्याची छबी पाहणे आणि त्यायोग्य त्याचा आदर करणे यालाच कर्तव्य म्हणतात. धन संचय अयोग्य नाही बंधो... धन मिळवण्याचे अयोग्य मार्ग आणि त्या धनाचा अयोग्य वापर करणे चुकीचे आहे. अभिलाषा.. मग ती कसलीही असो.... सर्वात मोठा दुर्गुण आहे!"

त्याच्या बोलण्याने मी भारावून गेलो होतो. तो बोलताना उभा राहिला आणि माझ्याही नकळत मी त्याच्या चरणांशी लीन झालो. माझ्या दोन्ही स्कंधांना धरून मला उठवत आणि आपल्या हृदयाशी धरत माझ्या भावविश्वाचा भगवान मला म्हणाला;"माझ्या प्रिय बंधो... उधो... आता निर्वाणाची वेळ झाली आहे. तरीही अजूनही काही कर्तव्य पूर्ण करणे आवश्यक आहेच. परंतु आज इथून निघताना माझा तुला एकच परामर्श आहे, यानंतर तू हिमालयाच्या पायथ्याशी बद्रिकेदाराच्या परिसरात एक आश्रम उभार आणि पुढील काळात जीवनरस शरीरामध्ये जोवर धावतो आहे तोपर्यंत आजच्या आपल्या चर्चेचे सार मानवी जीवनापर्यंत पोहोचव. मला खात्री आहे की माझ्या हातून जर काही राहिले असेल तर ते पूर्ण करण्याची वैचारिक शक्ती फक्त तुझ्याकडेच आहे. चल आता निघू इथून."

असे म्हणून त्याने माझा उजवा हात आपल्या हातात धरला आणि श्रीसोपनाच्या पायदांड्या सावकाशपणे उतरू लागला. 

Friday, December 4, 2020

श्रीकृष्ण - सात्यकी

 श्रीकृष्ण - सात्यकी


मी सात्यकी. द्वारकेचा सेनापती... आणि द्वारकाधिशांचा सखा. हे मी म्हणत नाही तर स्वतः अच्युतांनी मला सांगितलं आहे. मी मात्र स्वतःला त्या राजनीतिकुशल मोहमयी कृष्णरूपाचा अंकित मानतो. या भावबंधनात अडकवणाऱ्या वासुदेवावर प्रेम करणारे अनेक आहेत; त्यांच्या पाणीदार नेत्रांमध्ये विरघळून जाणारे देखील अनेक आहेत; त्या कृष्णमयी रूपामध्ये बंधीत होणारे देखील अमाप आहेत... मी त्या अनेकांमधला एक असूनही मला स्वतःच्या हृदयात विशेष स्थान देऊन सतत सोबत ठेवणाऱ्या भगवान श्रीकृष्णांनी माझ्या अवगुणांना देखील स्वीकारून मला जिवंतपणी मोक्षप्राप्ती करून दिली आहे; असं मी मानतो. मोठेपण कसं सिद्ध होत असतं? अस्तित्वाने? वयाने? अनुभवाने? कर्तृत्वाने? अहं! मोठेपण मुळात असावं लागतं; मग ते सिद्ध करावं लागतंच नाही... ते आपोआपच स्वीकारलं जातं. नाहीतर ज्याला मी मुरलीधर गोकुळवासी गवळी समजत होतो तो पोरगेलासा काळा-सावळा नंद-यशोदा पुत्र माझ्यासाठी माझ्या आयुष्याचा आधारस्तंभ झालाच नसता.

खरं तर मी श्रीकृष्णांपेक्षा वयाने जेष्ठ. त्यांचं पहिलं रूपदर्शन महाराज कंस यांच्या वधाच्यावेळी मला झालं. मात्र त्यागोदरच त्यांच्याबद्दल बरंच काही ऐकून होतो. बलराम दादांसोबत त्यांचं मथुरेमध्ये आगमन झालं तेच मुळी गजराजाला सामोरं जात. त्यावेळी इतर अनेक मथुरावासीयांप्रमाणे मी देखील त्या मल्ल युद्धाचा साक्षीदार होतो. महाराज कंस यांचा वध त्यानंतर झाला. मी मात्र त्या सावळ्या रंगाच्या घननिळ्या नेत्रांच्या निळाईमध्ये तेव्हाच वाहून गेलो होतो. वसुदेव पुत्र म्हणून वासुदेवांनी महाराज वसुदेवांना मथुरेच्या आणि पुढे द्वारकेच्या सिंव्हासनावर बसवलं. ज्येष्ठ बंधू म्हणून बलराम दादा युवराज झाले. तरीही श्रीकृष्ण भगवानांचे अस्तित्व सार्वभौम आणि सर्वव्यापी होते; हे प्रत्येकाला मान्य होते. मथुरेतील महाराज कंस यांच्या वधानंतर श्रीकृष्णाने महाराज वसुदेवांच्या आज्ञेने मथुरा सेनापती अनाधृष्टी यांना पाचारण केले त्यावेळी त्यांच्यासोबत मी देखील होतो. त्यावेळची माझी ओळख केवळ एक होतकरू, आजानुबाहु योद्धा इतकीच होती. मात्र सेनापती अनाधृष्टी यांच्या शेजारी उभ्या असणाऱ्या माझ्याकडे आपली स्नेहदृष्टी वळवून त्या मनमोहनाने मला विचारले;"सेनापती अनाधृष्टी सोबत मथुरेचा सेनापती होऊन तिचा भार संभाळशील का?" त्याक्षणी मी त्या यादवश्रेष्ठ कृष्णदेवांचा अंकित झालो ते माझ्या जीवन अंतापर्यंत.

काय नाही बघितलं मी त्यांच्या सोबत? मथुरेवरील जरासंधाची सतरा आक्रमणे कृष्णदेवांनी परतून लावली. मात्र जरासंध आक्रमणे करणे थांबवणार नाही हे लक्षात आल्यानंतर सतराव्या आक्रमणानंतर मथुरावासीयांच्या होणाऱ्या हालापासून त्यांची सुटका करण्याच्या हेतूने कृष्णदेवांनी दूर सागर किनारी द्वारका नगरी वसवली... आणि कृष्णदेव द्वारकाधिश झाले. त्यानंतर ज्यांच्यावर द्वारकाधिशांनी निस्सीम प्रेम केले त्या देवी रुक्मिणींचे हरण त्यांनी केले त्यावेळी देखील मी त्यांच्या सोबतच होतो. स्यमंतक मणिरत्नामुळे द्वारकाधिशांवर आलेला चोरीचा आळ माझं हृदय घायाळ करून गेला. मात्र हाच स्यमंतक देवी सत्यभामा आणि देवी जाम्बवती यांना कृष्णदेवांच्या आयुष्यात घेऊन आला. द्वारकाधिशांनी नरकासुर वध करून कामरूपी सोळा सहस्त्र स्त्रियांना केवळ त्याच्या अत्याचारातून सोडवले नाही तर आपल्या नावाचे मंगळसूत्र त्यांना देववून यासर्व स्त्रियांना पुन्हा एकदा मानाने जगण्यासाठी त्यांचे पुनर्वसन केले आणि द्वारकाधिश कृष्णदेव समस्त मानवजातीसाठी भगवान झाले. त्यांनी कायमच कर्मयोग सर्वात मोठा मानला... आणि मी त्यांच्या अस्तित्वाचा अंकित झालो.

***

अर्जुन : श्रीकृष्णा, अरे सात्यकी द्वारकेचे सेनापती आहेत. तुझ्या श्वासाइतके तुझ्या जवळचे. केवळ इतकेच नव्हे तर ते वयाने अनुभवाने आणि कर्तृत्वाने देखील माझ्याहून ज्येष्ठ आणि महान आहेत. ते गेले अनेक दिवस मला आग्रह करत आहेत की मी त्यांचा शिष्य म्हणून स्वीकार करावा. तूच सांग यदुनाथा, वयाने आणि अनुभवाने त्यांच्याहुन लहान असणाऱ्या मी त्यांना शिष्य करून घेणे कितपत योग्य आहे?

श्रीकृष्ण : पार्था, कायम केवळ योग्य आणि अयोग्य याचा विचार करण्यापेक्षा राजकीय मूल्यमापन करून आवश्यक निर्णय घेणे जास्त महत्वाचे असते. तूच आत्ता म्हंटल्याप्रमाणे सात्यकी मथुरा नगरिपासून माझ्यासोबत आहे. तो मथुरेचा आणि आता द्वारकेचा सेनापती आहे. केवळ सेनापती या नात्याने नव्हे तर माझा सखा म्हणून तो माझ्या अनेक निर्णयांमध्ये माझ्या सोबत आहे. त्यामुळे तो केवळ एक युद्धकुशल योद्धाच नाही तर अत्यंत कुशल राजकारणी देखील झाला आहे. मी तर असे म्हणेन की सात्यकी म्हणजे एक परिपूर्ण राजकीय योद्धा आहे. अशी व्यक्ती कायम पांडवांसोबत असणे अत्यावश्यक आहे.

अर्जुन : यादवश्रेष्ठा, जिथे तूच आमच्या सोबत आहेस तिथे तुझे सोबती देखील कायमच आमच्या सोबत असणार हे त्रिकालाबाधित सत्य नाही का?

श्रीकृष्ण : (मंद हसत) पार्था, त्रिकालाबाधित सत्य असं काही नसतं बरं का! आणि मी तुमच्या सोबत असणं आणि माझ्या बरोबर असणारे योद्धे तुमच्या सोबत असणं यात खूप फरक आहे. कधीतरी अशी वेळही येऊ शकते की मी पांडवांसोबत उभा आहे आणि माझ्या समोर माझे सर्व सोबती, माझी सेना इतकेच काय तर माझे सेनापती देखील शत्रू म्हणून उभे आहेत. अशा परिस्तिथीमध्ये आपल्या बाजूने कोण असावं याचा विचार आत्तापासूनच करणं आवश्यक आहे. सात्यकी हा एक आजानुबाहु, आजानूस्कंध असा महारथी योद्धा आहे. तो तुझा शिष्य झाल्याने कधीच तुझ्या विरोधात युद्धाचा विचार करणार नाही. त्याचं तुमच्या सोबत असणं ही काळाची गरज ठरणार आहे. तेव्हा कोणताही विचार न करता द्वारका नगरीच्या सेनापतीला तू आपला शिष्य म्हणून स्वीकार आणि त्याला योग्य ती धनुर्विद्या शिकव.

अर्जुन : नारायणा, तू कोणत्या परिस्थितीबद्दल बोलतो आहेस?

श्रीकृष्ण : काही प्रश्न काळावर सोडावेत पार्थ.....


*****

#shrikrushna #krushnarjun #mahabharat #श्रीकृष्ण #कृष्णार्जुन #महाभारत #अथश्रीमहाभारात #महाभारातकथा