Friday, September 18, 2020

 'स्वामी' रणजित देसाई लिखित

 'स्वामी' रणजित देसाई लिखित 


मला खात्री आहे की 'स्वामी' कादंबरी आपल्यापैकी अनेकांनी अनेकवेळा वाचली असेल. मी देखील ही कादंबरी अनेक वेळा वाचली आहे. आज 'स्वामी' बद्दल लिहायचंच असं ठरवून गेले काही दिवस निवांतपणे वाचत असलेली ही कादंबरी आजचं संपवली. या कादंबरीने माझ्या आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर मला वेगवेगळी सत्य सांगितली. त्यामुळे या कादंबरीमध्ये काय आहे हे सांगण्यापेक्षा मला माझ्या वाढत्या आयुष्यात या कादंबरीने काय दिलं ते सांगायला जास्त आवडेल.

मी पहिल्यांदा 'स्वामी' कादंबरी वाचली तेव्हा मी साधारण सतरा-अठरा वर्षांची होते. त्यामुळे त्यावेळी मला या कादंबरीमधले फक्त रमा-माधवच दिसले. त्यांचं एकमेकांविषयीचं प्रेम, आदर खूप भावून गेला मला. माधवराव पेशव्यांना पेशवाईच्या जवाबदरीमुळे रमेला वेळ देता येत नसे; त्याचा सल त्यांच्या मनात कायम होता. मात्र त्यांनी तो सल रमाबाईंकडे कधी मोकळेपणी बोलून नाही दाखवला. संपूर्ण कादंबरीमध्ये माधवराव मोकळेपणी रमाबाईंशी बोलले असतील तर त्यांच्या शेवटच्या थेऊरच्या वास्तव्याच्या वेळी. आजही त्यादोघांचे संभाषण वाचताना डोळे भरून येतात. वयाच्या सोळाव्या वर्षी माधवरावांनी पेशवाईची वस्त्र धारण केली; आणि केवळ अकरा वर्षात; वयाच्या अठ्ठावीसाव्या वर्षी; त्यांचे देहावसान झाले. या अकरा वर्षात त्यांनी अनेक स्वाऱ्या-मोहिमा केल्या. त्यामुळे संपूर्ण तारुण्य रमाबाईंनी शनिवारवाड्यात माधवरावांची वाट पाहण्यात घालवलं. त्यांना माधवरावांचा खरा सहवास लाभला तो त्यांच्या शेवटच्या काही दिवसांचा; थेऊरच्या वास्तव्याच्या वेळी....... मात्र माधवरावांना रमाबाईंचा सहवास त्यांच्या मृत्यूनंतर देखील लाभला. रमा-माधवाचं प्रेम शब्दातीत होतं हेच खरं. खरा संसार असा दोघांनी केलाच नाही आणि तरीही एकमेकांमध्ये गुंतलेलं त्यांचं मन मृत्यूला देखील वेगळं करता आलं नाही.

लग्नानंतर परत एकदा 'स्वामी' हातात घेतली. त्यावेळी संपूर्ण कादंबरीमधील एक प्रसंग आयुष्यभराचं सार शिकवून गेला. माधवरावांनी राघोबादादांना शनिवारवाड्यावर नजरकैदेत ठेवले होते. राघोबादादा तेथून पळून जात असताना पकडले गेले. त्यावेळी माधवराव थेऊरला त्यांच्या शेवटच्या काही दिवसांमध्ये राहण्यास गेले होते. पकडलेल्या राघोबादादांना माधवरावांसमोर पेश केले. त्यावेळी माधवरावांनी हताशपणे राघोबादादांना पेशवाईची वस्त्रे बहाल केली. त्यावेळी डोळ्यात पाणी आणून राघोबादादांनी माधवरावांना म्हंटले की त्यांच्या पदरचे लोक त्यांचे कान भरतात आणि त्या तिरिमिरीमध्ये राघोबादादा चुकीचे निर्णय घेत मराठेशाहीशी बंड करतात.... त्यावेळी माधवरावांनी दिलेले उत्तर आपण सर्वांनीच आयुष्यभर लक्षात ठेवण्यासारखे आहे... ते म्हणाले... आमच्या पदरीही सारे योग्य सल्ला देणारे आहेत, असं नाही.... अक्कल शाबूत ठेवायची ती आम्ही. थोडक्यात सांगायचे तर कोणीही काहीही सांगितले तरी कोणावर विश्वास ठेवायचा आणि आयुष्यतले निर्णय स्थिर बुद्धीने घ्यायचे हे आपण समजून घेतले पाहिजे.

त्यानंतर माझ्या दोन्ही लेकींच्या जन्मानंतर कधीतरी परत एकदा 'स्वामी' हातात घेतली आणि माझ्याही नकळत त्यावेळी देखील झापटल्यासारखी वाचून संपवली. यावेळी जाणवलं ते जेमतेम सोळाव्या वर्षी पेशवेपद स्वीकारून माधवरावांनी सावरलेली कर्जबाजारी पेशवाई. हलक्या कानांच्या काकांच्या बंडखोरीचा आयुष्यभर सोसलेला त्रास; कठोर निर्णयामुळे दुरावलेला मातोश्रींचा सहवास; सततच्या लढाया आणि मोहिमांमुळे पेशवाईवर झालेलं कर्ज या माधरावांच्या पेशवे पदाच्या काळातील अडचणी अगदी अंगावर आल्या. माझ्या वयाच्या जेमतेम चोविसाव्या वर्षी माझ्या पदरात माझ्या लाडक्या दोन लेकी होत्या. त्यावयात देखील त्या दोघींचे शिक्षण; शालेय शिक्षणाव्यतिरिक्त काय शिकवावं; त्यांचं व्यक्तिमत्व परिपूर्ण व्हावं यासाठी काय आणि कसं करावं हेच विचार मनात घोळायचे. 'स्वामी' वाचताना सतत जाणवलं की माधवरावांनी केवळ आणि केवळ मराठी साम्राज्याचा विचार केला ते या साम्राज्याला पुत्रवत मानलं म्हणूनच.

नंतर कधीतरी एकदा पुन्हा ही कादंबरी हातात आली. यावेळी ती अगदी तब्बेतीत वाचली. प्रत्येक प्रसंग जगण्याचा प्रयत्न केला आणि खरं सांगू? जगले देखील. यावेळच्या वाचनात एक मात्र प्रकर्षाने जाणवलं; आपल्याला तो काळ कधीच उमजणार नाही.... पेशवाईच्या काळातील अनेक धारावाईक आणि सिनेमे आपण सर्वांनी बघितले आहेत. तरीही ही कादंबरी वाचताना मनात येत होतं की त्यावेळचं पुणं.... तेथील सर्वसामान्य जनजीवन.... राजकीय स्थैर्य-अस्थैर्य... याची खरी कल्पना आपण या धारावाईक किंवा सिनेमांमधून करूच शकत नाही. मात्र तरीही या दृक्श्राव्य माध्यमांमुळे आपला उज्वल इतिहास किमान थोड्याफार प्रमाणात आपल्यापर्यंत आणि आपल्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचतो आहे; याचं समाधान आहे.

..... आणि आज जेव्हा ही कादंबरी पुन्हा एकदा वाचली त्यावेळी मनापासून भावलेला भाग तुम्हाला सांगितल्याशिवाय राहावंत नाही आहे......

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ #yogiaditynath यांनी आग्र्यामधील #agra मुघल म्युझियमला #mughalmuseum छत्रपती शिवाजी माहाराजांचे #chatrapatishivajimaharaj नाव देण्याचे घोषित केले आहे. यावेळी त्यांनी म्हंटले आहे की 'हम सबके नायक शिवाजी माहाराज हैं!' किती सत्यता आहे या एका वाक्यात. आपल्यापैकी कितीजणांना माहीत आहे की मराठ्यांची सत्ता केवळ माहाराष्ट्रपुर्ती मर्यादित नव्हती; तर दिल्लीच्या तक्तापासून ते पार कर्नाटकापर्यंत मराठा साम्राज्य पसरलेले होते. माधवराव पेशव्यांनी निजामाला हरवून शरणागती पत्करायला लावली होती; आणि त्यानंतर त्याला सौहार्दपूर्ण वागणूक देत त्याच्याशी मैत्री करून मराठा साम्राज्याचा एक शत्रू कायमचा संपवून टाकला होता. हैदराचा कायमचा बंदोबस्त केला होता. पेशवाईचा कारभार मार्गी लावत असताना माधवरावांचा आजार बळावला. मात्र त्या आजारात देखील त्यांनी दख्खन स्वारीवर आपले खंदे मुत्सद्दी वीर पाठवून त्यांच्याकरवी तेथे विजय मिळवला. माधवराव पेशव्यांच्या शेवटच्या काही दिवसात दक्खन स्वारीवरील वीरांनी दिल्लीपतीला सिंहासनस्थ केले. म्हणजेच मराठ्यांच्या मदतीमुळेच केवळ दिल्लीमधील मुघलांचे राज्य टिकले. मराठ्यांचे मांडलिक होणे मान्य करून त्यांनी दिल्ली राखली. आपल्याला सगळ्यांना पेशव्यांचा आणि पर्यायाने मराठी साम्राज्याचा पानिपतचा पराजयच केवळ माहीत आहे. मराठ्यांच्या पराभवामुळे पेशवाईला लागलेले पानिपताचे गालबोट देखील या स्वारीत पुसले गेले. याची इतिहासात ठळक नोंद नाही.... किंवा खेदाने म्हणावे लागते आहे की या विजयाची नोंद सर्वसामान्य लोकांच्या सहज वाचनात येईल असा प्रयत्न आपल्या इतिहासकारांनी केला नाही. दुर्दैवाने आपल्याला माहीत असणारा इतिहास हा भारतावर इंग्रजांच्या अगोदर मुघलांचे राज्य होते; हाच आहे. मात्र मराठेशाही.... मराठा साम्राज्य.... उत्तरेपासून ते थेट दक्षिणेपर्यंत पसरले होते; हे समजून घेणे खूप महत्वाचे आहे.

मुघलांना नमवणाऱ्या त्या दूरदृष्टी लाभलेल्या जनतेच्या राजाचे छत्रपतींचे नाव आजवर मुघल नाव वागवणाऱ्या संग्रहालयाला देण्याचा निर्णय घेऊन योगी आदित्यनाथ यांनी मराठा साम्राज्याचा इतिहास सर्वांनी परत एकदा समजून घ्यावा हे सांगितले आहे असे मला वाटते.

आज पुन्हा एकदा 'स्वामी' कादंबरी वाचून संपवताना या कादंबरी मधील रमा-माधवाचं प्रेम; माधवरावांची दूरदृष्टी; सार्वभौम भारतामध्ये बसवला गेलेला पेशवाईचा अंमल... आणि सर्वात महत्वाचे म्हणजे मराठा साम्राज्याचा आवाका नजरेसमोर आला आणि खूप खूप समाधान वाटलं.


2 comments:

  1. अतिशय मनोज्ञ!
    खरोखरच आपल्या इतिहासातून वेळोवेळी शिकण्यासारख बरंच काही आहे.
    सुंदर लिहिलंयस ज्योती.

    ReplyDelete