Friday, June 12, 2020

गूढ (रहस्य कथा)(भाग 4)

गूढ (भाग4)

गूढ (भाग 4)


पूजारीबुवांनी सांगितलेली घटना ऐकून चंद्र्भान अजूनच बुचकळ्यात पडला. निशा इथे आली होती हे खरे होते. ती पूजारीबुवांना भेटली होती. तिने आपणच लिहिलेली कथा त्यांना सांगितली होती आणि तिचे म्हणणे होते की त्या कथेचा शेवट अजून झालेला नाही. म्हणजे तिला नक्की काय म्हणायचे होतं? ती आपल्या स्वप्नात का येत असेल? मुळात ती स्वप्नात येते आहे की ... आपल्याला भास होत आहेत... की.... चन्द्रभानला शेवटचा पर्याय मनातही आणायची इच्छा होती. त्याने पुजारीबुवांकडे बघितलं आणि त्यांना विचारलं,"काका तुम्हाला काय वाटतं? निशा का आली होती इथे. मी जी कथा लिहिली होती ती खूप पूर्वी..  त्या कथेचा निशाशी काय संबंध असेल. कारण मी तर माझ्या मित्राने केवळ या गावाचा आणि वाड्याचा उल्लेख केला होता आणि सांगितलं होतं की या वाड्याबद्द्ल बऱ्याच गूढ कथा प्रचलीत आहेत; त्यावरून एक कल्पना केली होती."

"खरंच सांगू बेटा, मलाही काहीच सुचत नाही आहे. काहीतरी चुकतं आहे किंवा तुला आणि मला माहित नाही असं यात काहीतरी आहे." पुजारीबुवा म्हणाले.

"काका... तुम्ही मला त्या म्हादूचा पत्ता सांगता का? त्याला भेटीन म्हणतो." चंद्रभान थोडा विचार करून म्हणाला.

"बेटा, नको पडूस तू या फंदात. मी निशालासुद्धा हेच सांगितलं होतं. जे भूतकाळात होऊन गेलं ते गेलं. आता त्यातील सत्यता उकरून काढून काहीही मिळणार नाही आहे. तो वाडा आहे हे सत्य आहे आणि तेवढंच खरं हे देखील आहे की त्या वाड्याबद्दल वाईट वंदता देखील आहेत. त्यामुळे आपल्याला माहित नसलेल्या वाटेने न जाणंच चांगलं." पूजारीबुवांनी चंद्रभानला म्हंटलं.

"तुमचं म्हणणं मान्य आहे काका... पण मग माझ्या स्वप्नात येऊन माझ्याकडे मदत मागणाऱ्या निशाचं काय? बर ते फक्त स्वप्न म्हणून सोडून द्यावं तर मीराताईंना ती भेटली आहे असं त्याचं म्हणणं आहे. त्याकडे कसं दुर्लक्ष करायचं?" चंद्रभानने पूजारीकाकांना विचारलं.

"खर आहे तुझ म्हणणं. पण मग पुढे काय?" पुजारीबुवा म्हणाले.

"काका... माझ मन मला सांगतं आहे की मी गप्प बसणं योग्य नाही. निशा खरंच अडचणीत असावी. तिला माझ्या मदतीची गरज असावी. म्हणूनच तिने ज्या मार्गाने शक्य आहे त्या मार्गाने माझ्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे. आणि म्हणूनच मी तिच्या मदतीला गेलंच पाहिजे." चंद्रभान म्हणाला.

"ठीक आहे. तुला मी म्हादूच्या घराचा रस्ता दाखवतो." असे म्हणून पुजारीबुवा उठले आणि गाभाऱ्यात गेले. चंद्रभानदेखील त्यांच्या मागे गाभाऱ्यात गेला. पूजारीबुवानी शंकराच्या पिंडीला साष्टांग नमस्कार घातला आणि पिंडीसमोरच्या धुनीतून भस्म उचलले आणि चान्द्रभानच्या हातावर ठेवले. चंद्रभानचे दोन्ही खांदे धरून पुजारीबुवांनी त्याच्या डोळ्यात स्थिर नजरेने बघितले आणि ते म्हणाले,"मी तुला तुझे नाव विचारेल नाही किंवा विचारणार देखील नाही कारण तू इथे कोणाच्या तरी हाकेला ओ देऊन मदतीसाठी आला आहेस. याचा अर्थ तुझा उद्देश चांगलाच आहे. तू म्हणतोस ते खरंच असेल कदाचित. निशाला तुझ्या मदतीची गरज असेलही कदाचित. बेटा, तुझ्या बरोबर माझे आशीर्वाद आहेत. मुख्य म्हणजे प्रामाणिक आणि चांगला उद्देश असणाऱ्या लोकांच्या पाठीशी देव देखील असतो. त्यामुळे यापुढे तुला जे योग्य वाटत ते तू कर. फक्त एकच सांगतो... केवळ यापूर्वी या गावात आलेल्या त्या बाबूने किंवा निशाने जे केलं तेच तसंच तू करावस असं नाही. तुझ्या इथे येण्याला एक वेगळं कारण आहे. ते समजून घे. निशाच्या मागे जाणं महत्वाचं आहे की तिला सोडवणं महत्वाचं याचा विचार कर. आणि मगच तुझी कृती ठरव."

चंद्रभानने पूजारीबुवांच सांगण मनापासून स्वीकारलं आणि  देवाच्या दिशेने तोंड करून नमस्कार केला. मग पूजारीबुवांना देखील वाकून नमस्कार केला आणि म्हादुच्या घराचा रस्ता समजून घेतला. मग मात्र मागे वळूनही न बघता तो देवळातून बाहेर पडला. पुजारीबुवा चालत जाणाऱ्या चंद्रभानच्या पाठमोऱ्या आकृतीकडे काही क्षण बघत उभे राहिले आणि आपल्या घराकडे निघाले.

चंद्रभान म्हादुच्या घराच्या दिशेने चालतच  निघाला. गाडी त्याने देवळाजवळच ठेवली. गाव इतकं लहान होतं की तिथे रस्ते देखील नव्हते. त्यामुळे गाडीने जाणं शक्यच नव्हतं. कालपासून सतत लागोपाठ घटनाचक्र चालू होतं. त्यामुळे खरं तर चंद्रभानला शांतपणे विचार करायला वेळच मिळाला नव्हता. पण आता चालताना त्याच्या मनात विचार यायला लागले. तो राजनच्या स्टुडियोमध्ये पोहोचल्यापासून जो घटनाक्रम सुरु झाला होता तो आता इथे या वळणावर येऊन थांबला होता. आतापर्यंत तो केवळ एक घटक होता. पण आता यापुढे त्याला एकूणच घडणाऱ्या घटनांचा ताबा घेणं आवश्यक होतं. कारण केवळ आता तो प्रेक्षक राहिला नव्हता तर एकूण घडणाऱ्या गोष्टींचा एक भाग झाला होता. चन्द्रभानच्या एक लक्षात आलं की  म्हादुला भेटण्याच्या अगोदर त्याने एकूण सद्यपरिस्थितीचा निट विचार केला पाहिजे. कारण म्हादू अशिक्षित आणि गावंढळ असला आणि गावातले लोक त्याला वेडा समजत असले तरी शेवटी तोच एक मार्ग होता चंद्रभानकडे सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळवायचा.

विचार करताना परत एकदा चंद्रभान त्याने लिहिलेल्या गोष्टीकडे वळला. त्याने ती गोष्ट अगदी सहजच लिहिली होती. मित्राशी मारलेल्या गप्पांमधून जे सुचलं होतं ते त्याने त्यावेळी लिहीलं होतं. मग त्याने लिहीलेल्या गोष्टीमधला म्हादू खरंच कसा होता? याचं त्याला राहून राहून आश्चर्य वाटत होतं. बरं... म्हादू नावाची व्यक्ती सर्वसाधारणपणे सर्वच गावातून असते असं म्हणावं तर हा म्हादू त्या शहरी बाबुला भेटल्याचे सगळ्यांना सांगत फिरत असतो. असाच विचार करताना चंद्रभानच्या मनात आलं की खरं तर निशाचा त्याने लिहिलेल्या गोष्टीशी काय संबंध असावा? उमरगावात कोणा खरातांचा वाडा असेल, मी त्यावर एक गोष्ट लिहिली असेल, त्या गोष्टीतला म्हादू देखील खरंच असेल... पण अशा एक कल्पना करून लिहिलेल्या गोष्टीचा आणि निशाच काय संबंध? असा विचार चंद्रभानच्या मनात आला आणि त्याला निशाचं आणि त्याचे संभाषण आठवलं.

त्या दोघांनी गप्पा मारायला सुरवात केली तेव्हा निशा स्वतःमधेच हरवली होती. चन्द्रभानने बोलायला सुरवात केली होती तेव्हा तिचे त्याच्या बोलण्याकडे फारसे लक्ष नव्हते हे त्याला आता जाणवलं. त्यावर त्याने तिला विचारलं देखील होतं की ती ठीक आहे ना की हरवली आहे. त्यावरचं तिचं उत्तर त्यावेळी चंद्रभानला कळलं नसलं तरी आता एकूण घडलेल्या घटनांचा विचार करता ते उत्तर म्हणजे घटनाक्रमाची सुरवात होती हे त्याच्या लक्षात आलं. तिने म्हंटलं होतं,' मी हरवलेच आहे आणि तरीही इथेच आहे.' काय अर्थ असावा तिच्या त्या वाक्याचा? चंद्रभानच्या मनात आलं. त्यानंतर तिने त्याला कथा कशा सुचतात ते विचारलंं होतं. आणि त्यावर तो उत्तर देताना आपल्याच विचारात क्षणभरासाठी हरवला होता. त्यानंतर तिने काहीतरी म्हंटलं होतं आणि 'हो की नाही,' असे त्याला विचारलं होतं. काय म्हणाली होती ती? चंद्रभानच्या मनात आलं. ती जे काही म्हणाली ते आठवणं आवश्यक आहे असं चंद्रभानला वाटलं, कारण कदाचित ती त्यावेळी जे म्हणाली त्याचा या घडणाऱ्या घटनांशी जवळचा संबंध असू शकतो.

त्याने मेंदूला ताण दिला आणि त्याला अचानक आठवलं. ती म्हणाली होती,"अहो, शेवट काहीही असला तरी कथा तर तुम्हीच लिहिता ना? कदाचित सुरवात करताना तुम्ही एक शेवट ठरवत असालही. पण मग जसजशी कथा पुढे सरकते तुम्हाला वाटत असेल की जो शेवट ठरवला त्यापेक्षा काहीतरी वेगळं असू शकतं. आणि म्हणून तुम्ही शेवट बदलत असाल किंवा एखाद्या कथेचा शेवट तुम्ही नंतरही बदलू शकत असाल. तुमचीच कथा आणि तरीही शेवट तुमच्या मनात नसलेला असं कसं होईल? कथेचा शेवट तुम्हाला अगोदरच माहित असेलच नं? हो की नाही?" त्यावेळी आपण तिच्या बोलण्याकडे फारसं लक्ष दिल नव्हतं आणि तिच्या 'हो की नाही' या प्रश्नच उत्तर 'हो' म्हणून दिलं होतं... चंद्र्भानच्या मनात आलं. याचा अर्थ तिला आपल्या कथेचा शेवट वेगळा असायला हवा होता तर! ती म्हणाली होती ............................... एखाद्या कथेचा शेवट तुम्ही नंतरही बदलू शकत असाल......................... याचा अर्थ आपण त्या कथेचा शेवट बदलावा अशी तिची इच्छा आहे का? जर बदलायचा झालाच शेवट तर तो काय अपेक्षित होता तिला? विचार करता करता चंद्र्भानला हे देखील आठवलं की तो कथा वाचून झाल्यावर झोपला होता. त्यावेळी कथेचा शेवट म्हणजे तो शहरी बाबू वाड्यात शिरला इतकाच होता. पण आज सकाळी त्याला त्याच्या पुढे काहीतरी लिहिलेलं मिळाल होत. त्याने परत एकदा मेंदूला ताण दिला आणि त्याला आठवलं; त्याने लिहिलेल्या शेवटाच्या पुढे लिहिलेलं होत की..................................

आणि तरीही ती तिथे जायला निघाली होती. बाबूचं नक्की काय झालं हे तिला माहित करून घ्यायचं होतं. एकटीच.... पण तिला खात्री होती तिच्या मदतीला तो येईल!!!

याचा अर्थ इंटरव्हूच्या ठिकाणी भेटलेली निशा..... सकाळी त्याला झोपेतून उठवणारी निशा.... मीराताईंना भेटलेली निशा.......... आणि त्याच्या कथेच्या शेवटी उमटलेली ती अक्षरे... या सगळ्याचा अर्थ निशा त्या खरातांच्या वाड्यात आहे. ती तिथे अडकली आहे. तिने कुठेल्यातरी वेगळ्या शक्तीच्या मदतीने आपल्याला साद घातली आणि ती आपल्यापर्यंत पोहोचली. तिला आपल्या मदतीची गरज आहे. आता फक्त एकच प्रश्न उरला होता की निशा तिथे का गेली. एकदा ते कारण कळल असतं तर मग त्याला तिची मदत कारण सोप गेलं असतं.

एका मागोमाग एक कोडं सुटायला लागल्यावर चंद्रभानला हुरूप आला. तो म्हादूच्या घराच्या दिशेने भराभर पावलं टाकत निघाला.

चंद्रभान म्हादुच्या घराजवळ पोहोचला. घराच्या पडवीत कोणीतरी बसलेलं त्याला दिसलं. म्हणून चंद्रभान पडवीत शिरला. त्याबरोबर त्या व्यक्तीने अचानक ओरडायला सुरवात केली,"जा म्होरं... व्हय चालत हितून... उगा नग माज्या मागं लागू." या त्याच्या अचानक ओरडण्यामुळे तो क्षणभर मागे झाला. पण मग मनाचा हिय्या करून तो त्या व्यक्तीच्या शेजारी जाऊन बसला आणि म्हणाला,"म्हादू दादा... तिला तुमची गरज आहे. तुम्ही मला फक्त तिचं काय झालं ते सांगा. बाकी मी बघून घेतो." चंद्र्भानचं बोलणं ऐकून म्हादू शांत झाला. त्याने चिमणी वर करून त्या उजेडात चंद्रभानच्या डोळ्यात निरखून बघितलं. चंद्रभानची शांत आणि आश्वासक नजर बघून म्हादुच्या डोळ्यात पाणी उभं राहीलं. चिमणी खाली ठेऊन त्याने चंद्रभानचे हात घट्ट धरले आणि म्हणाला,"का आलास हितं? त्यो बाबू आल्ता कैक वरसा पूर्वी त्याला बी मी म्हन्ल हुतं जा हितून. पन त्यो न्हाई ऐकला माज. मंग ती पोर आल्ती. तिला बी मी हाकलंल. म्हन्ल नग घीउस ईसाची परीक्षा. पन ती बी न्हाई ऐकली माज. तू का आलास बाबा? जा हितून...." असं म्हणून म्हादुने त्याचे हातात घेतलेले हात सोडले.

चंद्रभान काही न बोलता तसाच म्हादुच्या शेजारी बसून राहिला. थोड्या वेळ म्हादू स्वस्थ बसून राहिला. पण मग त्याची चुळबुळ सुरु झाली. अजून थोडा वेळ गेला आणि म्हादुने आपणहून बोलायला सुरवात केली. "ऐक.... त्यो बाबू अल्ता कारण त्येला कामाची गरज हुती. जवा त्यो मले भेटला तवा आमच्यात बोलना झाला हुता. त्यो म्हन्ला त्याले पैका हवा हाई म्हनून या आड गावात कामाच्या शोधात आला हाई. म्या म्हन्ल सहर सोडून हित कोन तुले काम द्येनार आन काय पैका मिलनार. तर म्हन्ला खरातांच्या वाड्यावर काम हाई. म्या म्हन्ल तिथं नग जाऊ बाबू. जा हितून परत. तिथं ग्येलेलं कोनी कंदी परत न्हाई आलं. पण त्यो मानला न्हाई. त्यो आला हुता तवा रात व्हायाला आल्ती. त्याले उत्तर न देता मी निघालू. म्हन्लं  हित पारावर आजून कुनीबी न्हाई. मी ग्येलू तर हा बाबू बी जाईल. पन मी निघालू आन मला मागून मेरीचा आवाज आला. म्या तवाच समजंलु बाबू जानार खरातांच्या वाड्याकडं. म्या लई घाबरलु आन पलालू माज्या घरला. बस! त्ये तिथच संपल." म्हादू बोलायचा थांबला.

चंद्रभान म्हादुचं बोलणं मन लावून ऐकत होता. म्हादू जे सांगत होता तेच त्याने त्याच्या कथेमध्ये लिहील होतं. पण त्याने त्यात केवळ गूढता निर्माण करण्यापुरता एका मुलीचा उल्लेख केला होता फक्त. तिच नाव किंवा तिच्याबद्दल काहीच लिहील नव्हतं. त्यामुळे हे काहीतरी वेगळ आणि नवीन आहे हे त्याच्या लक्षात आलं. त्याने म्हादूला विचारलं,"दादा, ही मेरी कोण? अजून एक विचारायचं होतं... काही महिन्यांपूर्वी जी मुलगी तुम्हाला भेटायला आली होती तिचं काय झालं?"

म्हादुने चंद्रभानला एकदा वर पासून खालपर्यंत न्याहाळलं. मग परत त्याने बोलायला सुरवात केली. "पोरा... मेरी म्हंजी पोरकी किरीस्ताव पोर हुती. दिसाया पार रंभा उर्वासी जणू. सारा गाव तिच्या माग हुता. पन तिचा जीव जडला हुता खरातांच्या सुन्यावर. खरात म्हंजी गावातलं बडं मानुस. त्यात सुन्या म्हंजी गावचा राजाच जनू. त्येच्यात आन मेरीत काय बाय शिजतं हाय याची चर्चा गावात व्हायाला येळ न्हाई लागला. आन मंग त्याची कुनकुन मोठ्या खरातांना  लागली न्हाई तर नवल. मंग मात्र त्येनी सुन्याला काय कारन काढून दिल पाट्वून सहराकडं. मेरी बिचारी ऱ्हाईली न्हवं हितंच. तिला वाटलं सुन्या यील आन घिऊन जाईल तिला. पन तस कंदी झाल न्हाई. ती सहर रस्त्याला डोलं लावून बसली आन काय. कंदीतरी तिच्याबी ध्यानात आलं की आता काय सुन्या यायाचा न्हाई. आन मंग मात्र ती चवतालली राव. त्यानंतर तीन दिस ती खरातांच्या वाड्याला  फेऱ्या मारत हुती. ना काय खालं, ना काय प्याली. कुटून हितका जोर आल्ता कुनास ठाऊक... बस... गोल गोल चक्कर मारीत हुती आन काय बाय पुटपुटत हुती. चौथे दिशी तिचं कलेवर वाड्याच्या मागच्या हिरीत सापडलं म्हनं. थोरल्या खारातांनी तीन बाप्ये उतरवून काडलं हुतं. माशांनी पुरत खाल्ल हुतं. लोक काय बाय बोलाय लागलं तस मोटे खरात डाफरले सर्वांवर आन हाकलून दिल सर्वास्नी. मंग त्या कालेवराच काय झाल कोनाला ठाव न्हाई.

आसंच काही दिस गेलं आन खरातांकडे काम करनारी कमळी सांजच्याला तिच्या घरला जात हुती तर तिला मेरी दिसली की मागच्या अंगाला. कमळीची बोबडी बसली जनु. त्यानंतर ती परत खरातांच्या वाड्याकड न्हाई ग्येली. हलूहलू कित्येकांना मेरी वाड्याच्या आजूबाजूने दिसाया लागली. लोकांनी त्या वाड्याकडं जानं सोडून दिलन. थोरले खरात सोता आठवडा बाजारला यायाचे आन लागलं ते सामान घिऊन जायाचे. सुरवातीला त्यांच्या चालन्यामंदी ताठा हुता. सांजच्याला मंदिरातबी यायचे ते. पण मंग मंदिर बंद जालं. आठवडा बाजारला पन पहिल्याच ठोक्यात येऊन जायाचे. आन मंग कंदितरी थोरले खरात गेले आसं कानावर आलं. पण तरीबी कुनी सुदिक तिथं न्हाई ग्येलं. मंग फकस्त मालकीणबाई राहिल्या त्या भल्या मोठ्या वाड्यात.

आनी मंग अचानक एक दिस त्यो बाबू आला. त्याले कुनी कसं सांगिटलं कुनास ठाव की खरातांना कुनी कामाला मानुस हवं हाय. म्या त्याचेकडे पाठ क्येली आन त्याले मेरीने धरला. खरातांचा वाडा दावते सांगून ती त्याले घिऊन पारावरून ग्येली खरं... पन मंग काय जालं कुणाला माहित. पार कैक वर्स ग्येली त्याला. हा आन तू म्हनतूस तसं आल्ती ती पोर. म्हन्ली ती तिच्या थोरल्या भावाक घ्यायाला आली हाय. म्या म्हन्ल नग जाउस. तरी न्हाई ऐकली. मंग मी तिच्याकडं पन पाठ क्येली.. तर मेरी आली आन तिला सुदिक घ्येऊन ग्येली की खरातांच्या वाड्याकडं." एवढं बोलून परत म्हादू बोलायचा थांबला.

म्हादू बोलायचा थांबला आणि चंद्रभानकडे बघायला लागला. चंद्रभानला का कोणजाणे पण अस वाटायला लागलं होतं की म्हादुला अजूनही काहीतरी माहित आहे पण तो सांगायला धजावत नाहीये. चंद्रभानने म्हादूकडे निरखून बघितलं आणि म्हणाला," दादा, का कोण जाणे पण मला वाटतं आहे की तुम्ही माझ्यापासून काहीतरी लपवत आहात. तसं असेल तर खरंच तुम्हाला माहित असलेलं सगळं मला सांगा. दादा, एका मुलीच्या आयुष्याचा प्रश्न आहे. दादा, ती माझी कोणीच लागत नाही, तरीदेखील तिच्या मनाने माझ्या मनाला घातलेली साद ऐकून मी इथपर्यंत आलो आहे. ती कोणत्यातरी संकटात अडकली आहे असं माझं मन मला सांगत आहे. मला तिला मदत करायची आहे दादा. पण संपूर्ण सत्य समजल्याशिवाय मी तिला मदत करू शकणार नाही. त्यामुळे आता तरी काहीही आडपडदा न ठेवता तुम्हाला माहित असलेलं सगळं मला सांगा."

चंद्राभानच्या बोलण्याने म्हादुच्या डोळ्यात पाणी उभं राहिलं. त्याचा आवाज दाटून आला आणि तो म्हणाला,"आरं पोरा काय सांगू? खर काय आन खोट काय... समद हाताभाईर ग्येलं हाय रं. पोरा, मेरी चांगली हुती रं. तिचा खराखुरा जीव जडला हुता खरातांच्या सुन्यावर. त्यो ग्येला आन ती पार वेडीपिशी झाली. दिसाया अप्सरा हुती माजी मेरी. तिच्या मागं गावातलं कितीक पोरं लागली हुती याची काही गिनतीच न्हाई. पर ती कुनालाबी भिक घालत न्हवती. माजाबी तिच्यावर लई जीव जडला हुता. तिला आसं सुन्यासाठी खुल्यागत भटकताना बघून माझा जीव जलायचा. म्हनून मंग मी एकदा तिला गाटलं आन म्हन्ल तू गावाभाईरच्या भगताकड चल. त्यो तुला मदत करल. तिन माज ऐकलं आन एका राती म्या तिला घेऊन भागताकड ग्येलो. भगतान तिच समद बोलन ऐकून घ्येतलं आन तिला एक भुकटी दिली. आन म्हन्ला ही भुकटी खराताच्या वाड्याभावताली तीन दिस आन ती राती टाक. बग तुझा सुन्या यील परत. मेरी खुश झाली आन आमी दोघ परतलु. म्या तिला म्हन्ल म्या टाकतू ती भुकटी. तुला वाड्याजवल मोठ्या खरातांनी बघितला तर तुला त्यो सोडनार न्हाई. पन मेरी माजं ऐकेना. म्हन्ली तिची लढाई तिच लढनार. म्या तिला कायबी न्हाई बोललो. ती जे बोलल त्ये म्या ऐकायचो. पार खुळावून ग्येलू हुतु म्या.

मेरीनं दुसऱ्या दिसापास्न वाड्याच्या भवताली फेऱ्या माराया सुरवात केली. तिसऱ्या दिशी सांजच्याला मेरी फेऱ्या मारत हुती आन मी दूर एका झाडावर बसून तिच्याकडं बघत हुतु तर अचानक थोरले खरात भाईर आल्ये. त्यांनी खासकिनी मेरीचा हात धरला आन तिला मातीत ढकलली. त्यांच्यात कायतरी बाचाबाजी जाली. मी दुरून सारं बघत हुतु. पन मला मेरीची मदत कराया जायाची हिम्मत न्हाई जाली. अचानक थोरातांनी तिच्या काल्या झग्याला हात घातला आन मेरीनं जीवाच्या आकांतान हंबरडा फोडला. खरात थांबायला तयार न्हवतं. ती वरडत हुती आन त्ये ओरबाडत हुते. थोड्या येलान मेरीला तिथंच टाकून खरात निघून ग्येले. तवर पार अंधार झाला हुता. म्या झाडावरून उतरलु आन मेरीकडं धावलू. म्या तिच्याजवळ पोहोचेपर्यंत ती मागच्या विहिरीपर्यंत पोचली हुती. म्या तिला थांबवायचा प्रयत्न क्येला.. पन ती कायबी ऐकायला तयार न्हवती. तिची पाठ माज्याकड हुती. ती फकस्त एकच म्हन्ली... म्हादू माज एक काम करशील? म्या लगोलग हो म्हण्लू. तशी ती म्हन्ली... सुन्यानं मले धोका दिला. मला वाटलं हुत त्याला थोरल्या खरातान जबरदस्ती धाडला. पन सुन्या आपल्या मर्जीन ग्येला हाय. मी एकयेळ त्ये मी पचवलं असतं. पन आज माज्या संगती जे झालं त्यानंतर मले जगायची इच्छा न्हाई राहिली. तू मातर माज येक काम कर................ भगतान माले सांगितलं हुतं की येक तरुणाचा बळी हित द्यायला होवा. त्यो तू दये. मंग मी हाईच....... आस म्हनून मेरीन माज काई ऐकायच्या अगुदर हिरीत उडी घ्येतली."

म्हादू क्षणभर बोलायचा थांबला. त्याने जवळच्या लोट्यातून घोटभर पाणी घेतलं आणि शून्यात बघत तो परत बोलायला लागला. "पोरा.... म्या मघा सांगताना थोडं खोटं बोललु व्ह्तु. पोरा मेरीला पयले खरातांचा जीव घ्यायाचा हुता. त्यासाटी येक तरून तिथं जान महत्वाचं हुतं. पन गावातलाच कुनी तरुण म्या वाड्याकडं न्यायाचा म्हन्ल तरी त्ये जमणारं न्हवतं. कारण थोरल्या खरातांना सगले घाबरून आसायचे. म्हनून मंग म्याच शक्कल लढवली आन सहराकडं जाऊन एका पेपरमंदी 'खरातांच्या वाड्याला म्यानेजर हवा हाई' म्हनून जायरात द्येऊन आलू. फार वाट न्हाई बघावी लागली. त्यो बाबू आला आन कसा कोन जाने मलाच येऊन भेटला. म्या मेरीला दिलेला सबूत पुरा क्येला. मेरी त्याले वाड्याकडं घिऊन ग्येली. त्यो बाबू आत ग्येला आन थोरलं थोरात ग्येले. मला वाटलं आता मेरीचा आत्मा शांत हुईल. पन मंग त्यानंतर तिनं वाड्याच्या भवताली ठाण मांडलं.

दिसा मागून दिस जात हुतं. मेरी कुनाकुनाला दिसाया लागली. पन म्या कितीदा तरी शोधली तरी न्हाई दिसली. आन मंग ती पोर आली. माज्या मनात आलं जर ही पोर आत ग्येली तर माजी मेरी सुटल आन माज्याकड यील. म्हनून मी त्या पोरीला मेरीच्या हवाली क्येली.

पोरा मला कुनाचबी वाईट न्हवतं करायचं. मले फकस्त मेरी हवी हुती. पन मेरीला मी नकू हाय. पोरा... चुकलं रं माज. त्या पोरीचा हकनाक बली दिला मी. ती पोर मले म्हन्ली हुती की त्यो बाबू तिचा थोरला भाऊ हाय. आन त्याले शोधाया ती आली हाय. पोरा... त्यायेली मला फकस्त माजी मेरी दिसत हुती. पन आता मला होश आला हाय. मेरी कंदीच येणार न्हाई. मले म्हाईत हाय. तवा त्या पोरीला तरी त्या शापित वाड्यातून सोडवाया हवं. मले म्हाईत नाही आता काय करता यील. पण चल पोरा आपन वाड्याकडं जाऊ. मार्ग मिलल आपल्याला तिथंच." असं म्हणत म्हादू जागेवरून उठून उभा राहीला.

क्रमशः


2 comments:

  1. वाह उत्कंठा पूर्ण

    ReplyDelete
  2. धन्यवाद.... पुढील भाग शेवटचा आहे

    ReplyDelete