Friday, April 15, 2022

अनाहत सत्य (भाग 20)

 अनाहत सत्य

भाग 20

भीमा आणि अपाला यांच्या बोलण्याचा आणि वागण्याचा वेगळा परिणाम नाथावर झाला. "अपाला, माझा असा समज होता की तुझं केवळ राजकुमार गोविंद यांच्यावर प्रेम आहे." अत्यंत दुखावलेल्या आवाजात नाथ म्हणाला.

नाथाकडे वळत अपाला म्हणाली; "नाथ, तुझा समज होता म्हणजे? माझं केवळ राजकुमार गोविंद यांच्यावर प्रेम आहे आणि ते कायम राहील. हे अबाधित सत्य आहे."

"अपाला, जर तुझं राजकुमार गोविंद यांच्यावर प्रेम आहे तर मग तुझं भीमाच्या जवळ त्याच्या मिठीत स्वतः जाणं कितपत योग्य वाटतं तुला?" नाथाने स्पष्ट शब्दात अपालाला प्रश्न केला.

"इथेच तुम्ही चुकता नाथ." अत्यंत गंभीर स्वरात अपाला म्हणाली.

"म्हणजे?" आश्चर्य वाटून नाथा म्हणाला.

"नाथा, माझं प्रेम आहे गोविंदवर. अगदी मनापासून! त्याच्याबद्दल माझ्या मनात ज्या भावना आहेत त्या इतर कोणाही बद्दल कधीच येणार नाहीत. माझ्या आजवरच्या जीवनाच्या कालखंडामध्ये गोविंद इतकं प्रिय असं कोणी मला भेटलंच नाही. अनेक पुरुष येऊन गेले आयुष्यात. पण ती भावनिक गुंतवणूक नव्हती. अनेकदा काही क्षण, काही काळ इतकीच मर्यादा होती. कधीतरी तर केवळ गरज होती त्यात्यावेळची. भीमाबद्दल सांगायचं तर ते देखील असंच शब्दांपालिकडे आहे न. भीमा आणि मी एकत्र आहोत ती कालगणना तुला करताच येणार नाही. आम्ही खूप काही एकत्र बघितलं आहे; अनुभवलं आहे. आमचं एकमेकांना समजून घेणं एका वेगळ्या पातळीवरचं आहे. माझं प्रेम आहेच भिमावर! पण गोविंदच्या बाबतीत जी भावना आहे तसं ते नाही." अपाला बोलत होती. मात्र नाथा अजूनच गोंधळत होता.

"अपाला, काय बोलते आहेस? तुझं राजकुमार गोविंदवर प्रेम आहे. ते इतकं आहे की तुला त्यांच्या पासून कुंजर झाला. तरीही तुझ्या आयुष्यात अनेक पुरुष येऊन गेले आहेत. तुझं भिमावर देखील प्रेम आहे. अपाला, माझ्या मतीला हे सगळं समजेनासं झालं आहे ग." नाथ म्हणाला. त्याच्या बोलण्यावरून तो गोंधळलेला तर वाटतच होता; पण त्याहूनही जास्त दुखावलेला होता; हे कळत होतं. अपालाच्या आयुष्यात आपल्या प्रिय राजकुमारा व्यतिरिक्त अनेक पुरुष येऊन गेले आहेत; हे ऐकून तो अस्वस्थ झाला होता.

"नाथा, तू गोंधळून किंवा दुखावून जाऊ नकोस. मी तुला नीट सांगतो. समजून घे. मला कळतं आहे की तुला हे समजणं अवघड आहे. तरीही....." भीमा म्हणाला.

"एक अक्षरही बोलू नकोस भीमा. तू..... मला वाटलं होतं की तू देखील राजकुमार गोविंद यांचा खरा मित्र आहेस. मात्र तू राजकुमारांच्या प्रिय स्त्रीवर प्रेम करतो आहेस. कितीतरी मोठा धोका आहे हा राजकुमारांसाठी." अचानक नाथा चिडला आणि त्याने भिमावर तो राग काढला.

"नाथा, उगाच काहीतरी बोलू नकोस. तुला वाटतं आहे तसं काही नाही. शांतपणे ऐकलंस तर कळेल तुला देखील." भीमा आवाज चढवत म्हणाला.

"अजून काही बाकी आहे का सांगायचं?" नाथ अजूनच चिडत म्हणाला.

"हो! खूप काही बाकी आहे नाथा. ऐकून घे." भीमा म्हणाला. तरीही नाथ तिथून निघून जाण्यासाठी उभा राहिला.

"थांब नाथा. विषय पूर्ण समजून घेतल्याशिवाय मी तुला जाऊ देणार नाही." त्याला अडवत अपाला शांतपणे म्हणाली. नाथाने चिडून तिच्याकडे बघितलं. पण तिच्या नजरेतील बदल त्याला लक्षात आला. काय झालं ते नाथाला नक्की कळलं नाही; पण तो अचानक शांत झाला आणि खाली बसला.

"नाथा, माझं कोणावर प्रेम आहे किंवा नाही यापेक्षा देखील अगोदर तुला हा प्रश्न नको का पडायला की तीक्ष्णा, भीमा आणि मी.... आम्हाला तिघांनाही मृत्यू नाही." एवढंच बोलून अपाला थांबली आणि नाथाच्या अचानक मनात आलं की केवळ भीमा आणि अपाला एकमेकांच्या जवळ गेले आणि आपल्या मनात वेगवेगळ्या शंका उत्पन्न झाल्या. पण त्यामुळे अपालाने जे एक मोठं सत्य सांगितलं ते आपण क्षणात विसरलो. खरंच हे जाणून घेणं जास्त महत्वाचं ठरतं की तीक्ष्णा, अपाला आणि भीमा यांना मृत्यू नाही म्हणजे नक्की काय?

नाथाच्या मनातले विचार अपालाच्या लक्षात आले. ती त्याच्या समोर जाऊन बसली आणि म्हणाली; "नाथा, मी आता जे सांगते आहे ते शांतपणे ऐक आणि समजून घेण्याचा प्रयत्न कर."

"अपाला, तुझं भीमाच्या जवळ जाणं इतकं सहज होतं की तू काय बोलत होतीस ते एका क्षणात मी विसरून गेलो. पण हे सत्य आहे की जर खरंच मृत्यूवर तुम्ही विजय मिळवला असेल तर ते मला समजून घ्यायला आवडेल." नाथ म्हणाला.

"आम्ही मृत्यूवर विजय नाही मिळवलेला नाथा.... आम्हाला मृत्यू नाही!" भीमा देखील समोर येऊन बसत म्हणाला.

"म्हणजे? मी खरंच नाही समजलो." नाथ गोंधळून जाऊन म्हणाला.

"नाथा, ऐक! मी इथे येण्या अगोदर भीमा तुला मानव जन्म, उत्क्रांती आणि मानवीय संस्कृती याबद्दल सांगत होता. हो न?" अपाला अत्यंत समजूतदार आवाजात म्हणाली.

"हो!" मान हलवत नाथ म्हणाला.

"भीमाने तुला सांगितलं की इथे काम करणारे आम्ही सगळेच वेगळे आहोत. ते कसे हे समजून घेण्यासाठी त्याअगोदर तुला बरंच काही समजून घ्यावं लागेल. मंदिर निर्मितीसाठी काहीसा आड बाजूचा जंगलातील डोंगरकडा आम्ही का निवडला? या मंदिराचं गेल्या आठ वर्षातील काम तू स्वतः बघतो आहेस नाथ. तुला काहीच प्रश्न पडले नाहीत का?" अपालाने नाथाच्या डोळ्यात खोल बघत विचारलं.

"अपाला, प्रामाणिकपणे सांगायचं तर मनात खूप प्रश्न आहेत. पण मला प्रश्न विचारण्याची परवानगी नाही. मी केवळ दिलेलं काम पूर्ण करण्यासाठी इथे आलो आहे." नाथाने मान खाली घालत म्हंटले.

"नाथ, आत्ता इथे भीमा, तू आणि मी; फक्त आपण तिघे आहोत. तू मनात असणारे सगळे प्रश्न विचार नाथा. तुला सगळी उत्तरं देईन मी. अगदी सगळी." अपाला म्हणाली. "अपाला???" भीमा काहीतरी बोलणार इतक्यात अपालाने त्याला थांबवलं. "भीमा, सगळं समजून घेण्याचा हक्क आहे तो केवळ दोघांना. गोविंदला आणि नाथाला. अर्थात महाराज कृष्णराज यांना देखील तितकाच अधिकार आहे. मात्र मी त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाही; किंवा त्यांच्या मनात असे काही प्रश्न आहेत तरी का हे देखील मला माहीत नाही. पण हे मी नक्की सांगू शकते की नाथाला खूप काही जाणून घ्यायचं आहे. मी ती उत्सुकता त्याच्या डोळ्यात कायम बघितली आहे. त्यामुळे आत्ता जर आपण यावर बोलतो आहोत; तर नाथाने सगळंच समजून घेणं योग्य ठरेल." अपाला म्हणाली.

"जसं तू योग्य समजशील तसं अपाला. तुला देखील माहीत आहे की जरी भागीनेय तीक्ष्णा हिने सांगितलेलं काम पूर्ण करणं आणि या उच्चतम निर्मितीचं संरक्षण करणं हे माझं कर्तव्य असलं तरीही मी तुझ्या तुझ्या इच्छेबाहेर नाही." भीमा म्हणाला.

"अपाला, मग तूच मला सांगितलेल्या प्रश्नाचं उत्तर देऊन तू सुरवात कर. हीच जागा का?" नाथाने विषयाला सुरवात केली.

"ही जागा!" एक दीर्घ सुस्कारा सोडत अपाला बोलायला लागली. "नाथा, हीच जागा कारण या पर्वतमाळांचं आयुष्य कोणालाही माहीत नाही."

"पर्वताचं देखील आयुष्य असतं का अपाला?" नाथाने आश्चर्याने विचारलं.

"नाथा, आयुष्य सगळ्यांना असतं. नाथा, तू आत्ता जिथे राहातोस ते नगर, तुमचे महाराज कृष्णराज, हे राज्य, त्यापुढे जाऊन अनेक राज्ये आणि असं करता करता ही संपूर्ण वसुंधरा... आणि या वसुंधरेतील प्रत्येक अंश सगळ्यांना आयुष्य आहे. तर... या पर्वतांचं स्वतःचं एक आयुष्य आहे. जे तू किंवा मी कोणीही मोजू शकणार नाही; इतकं पुरातन आहे. या जगाच्या निर्मिती सोबत आपोआप निर्मित झालेले आहेत हे पर्वत. संपूर्णपणे निसर्ग निर्मित आणि निसर्गाने अत्यंत प्रेमाने जोपासलेले हे पर्वत आमच्यासाठी खूप महत्वाचे आहेत. कारण याच पर्वताच्या... विशेषतः हे मंदिर जिथे निर्मित होत आहे त्याच्या खाली आणि त्याच्या आजूबाजूच्या परिसरात; या डोंगरकड्यांच्या खाली आमचं नगर वसलेलं आहे. आमची संस्कृती आहे इथे.

नाथा, काही एक न बोलता ऐक. हो! मी, भीमा आणि तीक्ष्णा आम्ही मानवीय उत्क्रांतीच्या सुरवातीच्या काळातील आहोत. भीमाने तुला सांगितलं की इथे हे अत्यंत अवघड आणि शक्तीचं काम करणारे कोण आहेत. त्याचप्रमाणे आम्ही त्यांच्याहुन थोडे वेगळे पण त्यांच्याच प्रमाणे मानवीय उत्क्रांतीमधील एका टप्यातले आहोत. आम्ही म्हणजे एका मानवीय उत्क्रांती टप्प्यातील संपूर्ण समूहातील काही 'आम्ही'. याच टप्प्यातील काही वसुंधरेच्या इतर भागामध्ये स्थायिक झाले. हळूहळू आम्ही जिथे स्थायिक झालो तिथल्या वातावरणात रमून गेलो. मात्र वसुंधरेतील इतर ठिकाणी देखील 'आम्ही' होतोच.

नाथा, इथे हे समजून घेणं तुला अत्यंत आवश्यक आहे की केवळ बौध्दिकतेला महत्व देऊन भावनिकता दूर सारत या निसर्गसुंदर वसुंधरेला जपणारे असे 'आम्ही' आहोत. उत्क्रांतीच्या उच्चतम बिंदूला पोहोचल्यानंतर स्वतःचा ह्रास होऊ न देता त्या उच्चतम बिंदूवर स्वतःला गोठवून टाकणारे 'आम्ही' आहोत. आम्ही उत्क्रांतीची सुरवात आहोत. आम्ही परमोच्च बिंदूवरील अत्यंत प्रगत मानव आहोत नाथा. आम्ही अनेक संस्कृती बघितल्या आहेत आणि बघणार आहोत." अपाला बोलताना थांबली.

तिच्या लक्षात आलं की नाथाला हे काहीही लक्षात येत नाही आहे. त्यामुळे तो दबून जातो आहे. ती हसली आणि नाथाच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाली; "नाथा, केवळ उत्क्रांती हा शब्द नाही... ती एक स्थिती आहे. त्या स्थितीला पोहोचण्यासाठी अनेक सहस्त्र आयुष्यांचा काळ जावा लागतो. आमच्यामध्ये अशी काही गुणसूत्र निर्माण झाली की ज्यामुळे आम्ही भावनांपासून दूर गेलो. परंतु त्यामुळे आम्ही कोणत्याही विषयांच्या गर्भापर्यंत पोहोचू शकलो. त्यातूनच ग्रह-तारे, हे विश्व, ही वसुंधरा आणि तिच्या पोटातील अनेक गुपितं याविषयीचं ज्ञान आम्हाला उमगलं. त्यासोबतच निर्मिती आणि जपवणुक यांचं महत्व समजलं. आमच्या सोबत अनेक मानवीय प्रजाती निर्माण झाल्या होत्या. त्या मात्र भावनिकता, मोह, राग, मत्सर या भावनांमध्ये अडकत गेल्या. त्यामुळे जरी त्या त्यांच्या वेगाने प्रगत झाल्या तरी त्यांचा ह्रास होणं अपरिहार्य होत. दुर्दैवाने हे मानव स्वतःचा ह्रास करून घेताना या वैविध्यपूर्ण वसुंधरेला देखील संपवून टाकतील हे सत्य आमच्या मानवीय प्रजातीला लक्षात आलं; आणि म्हणून मानवीय जीवन शृंखला अविरत पुढे सरकण्यासाठी आम्ही मानवाचे रक्षक होण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय झाल्यानंतर आमच्या या मानवीय प्रजातीमधील काही प्रमुखांनी निर्णय घेऊन आमच्यात गट बनवले आणि आत्ताच तुला सांगितल्याप्रमाणे वसुंधरेच्या विविध प्रदेशात आम्ही विखरून राहू लागलो. आम्ही स्वतःला या विविध मानव प्रजातींपासून आणि त्यांच्या विकसित होत जाणाऱ्या संस्कृतींपासून वेगळं ठेवलं. जेणेकरून कोणत्याही भावणीकतेला बळी न पडता पुढील संस्कृतीसाठी निर्मिती करत राहाणं आम्हाला शक्य होईल. आमचे जे समूह विविध ठिकाणी होते; त्या आम्ही सर्वांनी ग्रहांच्या आणि ताऱ्यांच्या मदतीने एकमेकांशी संपर्क ठेवला. गेली अनेक आयुष्य आमच्या संपर्काचे ठिकाण भारतवर्षाच्या उत्तरेकडे होते. मात्र काही कारणांमुळे आम्हाला ते बदलणे आवश्यक झाले. नाथा कदाचित तुझा विश्वास बसणार नाही; पण हे ठिकाण बदलणे आवश्यक आहे हे आम्हाला समजून देखील सहस्त्र आयुष्यांचा काळ लोटला आहे. त्याचवेळी आमच्यातील काहींनी त्यांच्या अंतर्मनाच्या शक्तीने हे ठिकाण योग्य आहे हे जाणले. आम्ही इथे आलो. परंतु त्यावेळेपर्यंत तुम्ही इथे तुमची संस्कृती निर्माण केली होती. एक अत्यंत मोठे असे महाभारतीय युद्ध त्यावेळी घडत होते. ह्रास थांबवण्याची वेळ आमच्या हातातून गेली आहे हे आमच्या लक्षात आलं. त्यामुळे काही काळ - म्हणजे काही सहस्त्र काळ आम्हाला थांबणं आवश्यक झालं. म्हणून मग आम्ही आमचं नगर या निसर्गनिर्मित अत्यंत परिपूर्ण अशा डोंगरकाढ्याच्या गर्भात वसवलं. त्यानंतर आम्ही तिथेच होतो. मात्र काही काळापासून आमच्या नगरातील काही त्रुटींमुळे आम्हाला काही व्याधीं होतील हे लक्षात आलं. त्यासाठी आमच्या नगराचं वायुविजन योग्य करणं आवश्यक होतं. त्यामुळे परत एकदा वसुंधरेच्या पृष्ठभागावर येऊन आम्हाला काही निर्मिती आणि काही बदल करावे लागणार होते. म्हणून मग तुमच्या महाराज कृष्णराज यांना काही संकेत पाठवून आम्ही आमच्या इथल्या अस्तित्वाची जाणीव करून दिली आणि त्यांच्या परवानगीने इथे आम्हाला आवश्यक असे काम सुरू केले." अपाला बोलत होती. त्याचवेळी तिच्या लक्षात आलं की नाथाच्या चेहेऱ्यावरील भाव अचानक बदलले आहेत. त्यामुळे बोलणं थांबवून तिने त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने बघितलं.

"अपाला, एक प्रश्न मला सतत सतावतो आहे... जर तुमची मानवीय प्रजाती इतकी प्रगत होती तर तुम्हाला या वसुंधरेच्या पृष्ठभागावर येताना किंवा काहीही बदल करताना इतर कोणत्याही मानवीय संस्कृतीची परवानगी का हवी होती?" नाथाने स्पष्ट शब्दात तिला प्रश्न केला.

"नाथा, आम्ही प्रगत आहोत... या तीन शब्दांमध्येच त्याचं उत्तर आहे. तरीही तुझ्या मतीला पटेल अशा प्रकारे सांगते. हे बघ, जरी आम्ही प्रगत असलो तरी आम्ही वसुंधरेच्या पृष्ठावर राहण्याचा आमचा हक्क सोडला आहे. त्यामुळे आत्ता जी संस्कृती वास करते आहे त्या संस्कृतीला कोणतीही ठेच पोहोचू न देता आम्ही आमचे कार्य करणे योग्य ठरते." हसत अपाला म्हणाली.

"मान्य अपाला. तरीही...." नाथाला थांबवत भीमा म्हणाला; "हो आम्ही मनात आलं तर काहीही करू शकतो; तरीही... मूलतः आम्ही नष्ट करणे, हक्क सांगणे, हिसकावून घेणे या प्रकारच्या कृत्याचा निषेध करत असल्याने इथे प्रकट होताना परवानगी असणे आवश्यक वाटले आम्हाला. नाथा.... अरे तुला अजूनही एक गोष्ट लक्षात नाही का आली की आम्ही जसे आहोत तसेच आहोत?"

"भीमा तू जसा आहेस तसाच असणार ना?" नाथाने नकळून भीमाला प्रश्न केला. त्यावर मंद हसत भीमा म्हणाला; "अरे, आम्ही आत्ता हे मंदिर निर्माण करतो आहोत... तू गेल्या सात वर्षातील काम बघतो आहेस..... मात्र आम्ही इथे गेली वीस वर्ष काम करतो आहोत... हे सत्य तर तुला माहीतच आहे. नाथा... गेली वीस वर्ष तीक्ष्णा, अपाला आणि मी इथे आहोत... तुझ्या समोर जसे आहोत तसेच!!!"

भीमाचा रोख लक्षात येऊन नाथा विचारात पडला आणि भीमा नक्की काय म्हणतो आहे हे कळून एकदम गडबडून गेला. त्याच्या चेहेऱ्यावरील होणारे बदल बघत भीमा आणि अपाला मंद हसत होते.

क्रमशः

No comments:

Post a Comment