Friday, April 8, 2022

अनाहत सत्य (ग 19)

 अनाहत सत्य

भाग 19

"गोविंद तुला देखील माहीत आहे हे दोन्ही शक्य नाही." अत्यंत स्थिर आवाजात भीमा म्हणाला.

"का? का शक्य नाही?" गोविंदच्या ऐवजी नाथानेच प्रश्न केला.

भीमा काही क्षण नाथाकडे स्थिर नजरेने पहात राहिला. सर्वच सत्य नाथा समोर उघडं करावं किंवा नाही याबद्दल तो मनात विचार करत होता. पण मग त्याला जाणवलं की नाथाला संपूर्ण सत्य माहीत नसलं तरी आतापर्यंत काहीतरी वेगळं आहे याची कल्पना आणि नाथाला जरी सुमंत कल्याण यांनी काही उद्दिष्टाने पाठवलं असलं तरी तो दोन्ही बाजू समजून घेऊ शकेल... एकदा मनातला विचार पक्का झाल्यानंतर भीमा शांतपणे बोलायला लागला;

"नाथा, तुला आतापर्यंत हे लक्षात आलं आहे की मी, अपाला, तीक्ष्णा आणि आमच्या सोबत सुरवातीपासून इथे काम करणारे सगळेच थोडे वेगळे आहोत. मात्र ते वेगळेपण नक्की काय ते कदाचित तुला कळलं नसेल. गोविंदला कदाचित अपालाने सगळंच संगीतलेलं असू शकतं. त्यामुळे आज मी तुला एक वेगळं सत्य सांगतो आहे.... आजवर कोणालाही माहीत नसलेलं... आणि भविष्यात देखील कोणालाही कळणार नसल्याने; हे सत्य कायमच अस्पर्श अनाहत राहणार आहे. मी जे सांगणार आहे ते माझं आणि माझ्यासारख्यांच सत्य असल्याने ते तू मान्यच करशील. परंतु तू जर कधी कोणालाही याबद्दल सांगायला गेलास तर तुला वेड्यात काढून लोक दूर ढकलतील हे लक्षात ठेव....

तर... नाथा.... गोविंद.... आम्ही सृष्टी निर्माते आहोत. परंतु देव नाही. अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर या पृथ्वीची निर्मिती झाली आणि त्यानंतर इथे सजीव निर्मित झाले. त्यांच्यातील विविध बदल आणि वेगवेगळ्या सजीवांमधील संकरांमधून वेगवेगळे जीव निर्मित होत गेले. त्याच प्रमाणे मानवाचा देखील जन्म झाला. सर्वसाधारणपणे तुम्ही मानता की मानव निर्मिती ही माकडांपासून सुरू झाली. परंतु नीट विचार कर नाथा; जर मानव माकडापासून निर्माण झाला तर मग माकड कसं अजूनही अस्तित्वात असेल? म्हणजे जर माकडापासून मानव विकसित झाला तर मग त्याचं माकडपण असणं खरं तर संपलं पाहिजे न? पण तरीही माकड आजही आहेच की. त्यामुळे माकड हा एकच प्राणी नाही मानवाच्या निर्मितीमध्ये. माकडाच्या मादीचा इतर कोणत्यातरी प्राण्यासोबत संकर होऊन मानव निर्मिती झाली आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर एका माकड मादीचा संकर एकदा नर माकडाशी झाला आणि एकदा इतर कोणत्या तरी प्राण्याशी झाला. इतर कोणत्या तरी प्राण्यापासून जे मूल झालं तो म्हणजे पहिला मानव. आणि तिचा नर माकडाशी संकर झाल्याने जे मूल झालं ते मात्र माकडच राहिलं.

जो पहिला मानव झाला; तो स्वतःला जगवू शकला. मग त्याने इतर कोणाशीतरी संकर केला. अजून एक मानवीय जीव निर्माण झाला. तो जगला. अशा प्रकारे मानव उत्पत्ती आणि वाढ व्हायला लागली. सुरवातीला मानव देखील इतर प्राण्यांप्रमाणे जंगलातून राहात होता. त्याच्याहुन कमी ताकदीचे प्राणी मारून खात होता. मूलतः त्याच्यात माकडाचा अंश असल्याने हळूहळू त्याने स्वतः सारखे इतर शोधले आणि तो झुंडीतून राहायला लागला. त्याने त्याची प्रजा वाढवली. माकडांप्रमाणे त्यांच्यामध्ये एक प्रमुख नर आणि इतर त्याचे अनुयायी असे त्यांचे जीवन होते."

भीमा स्वतःच्या तंद्रीमध्ये बोलत होता. नाथा आणि गोविंद मन लावून ऐकत होते. नाथाने भीमाला थांबवत म्हंटलं; "भीमा, एक प्रश्न विचारू?"

तंद्रीतून जागा होत भीमाने नाथाकडे बघितलं.

"आपण इतर प्राण्यांप्रमाणे होतो तर मग आपण इतके वेगळे कसे झालो?" नाथाने विचारलं.

भीमा मनापासून हसला आणि म्हणाला; "नाथा, भाषा! आपण बोलतो. तू इतर कोणताही प्राणी बोलताना बघितला आहेस का?"

"त्यांची भाषा असणारच न भीमा?" नाथाने भाबडेपणाने म्हंटलं.

"नक्कीच. पण त्यांची भाषा म्हणजे मादीला भुलवणे आणि धोका असल्यास इतरांना सावध करणे इतकीच मर्यादित असते नाथ. आपण मात्र भाषा या बाबतीत खूप पुढे गेलो आहोत. आपण एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे आपण आपल्याला मिळालेली माहिती संकरित करतो. आपण त्याला ज्ञान म्हणतो. असं काही इतर कोणत्याही प्राण्यांमध्ये होतं का? नाथा, केवळ आपण बोलतो ती भाषा इतकाच का भाषेचा अर्थ रे? भाषा म्हणजे संस्कृती... प्रकृतापासून सुरू होऊन आज तुम्ही बोली भाषा म्हणून वापरता आहात त्या सर्वसमावेशक संवादाबद्दल मी बोलतो आहे." भीमा म्हणाला.

"अगदी बरोबर आहे भीमा. नाथ, मला देखील या संपूर्ण काल प्रवाहाबद्दल अपाला सांगायचा प्रयत्न करते. पण अजूनही काही गोष्टी माझ्यासाठी अगम्यच आहेत." गोविंद म्हणाला. "पण भीमा, तू सांग. तुझ्याकडून देखील समजून घ्यायला आवडेल मला."

"आणि मला देखील. अर्थात मानवीय इतिहासाबद्दल आणि मानव निर्मिती बद्दल.... आणि भीमा, मुळात हे माहीत करून घ्यायला आवडेल की तू कोण आहेस! अपाला, तीक्ष्णा आणि ही सर्वच कामकरी कोण आहेत? " हसत नाथ म्हणाला.

"ठीक नाथा! सगळं सांगतो. मला जमेल तितकं सोपं करून. अर्थात त्यावर विश्वास ठेवायचा किंवा नाही हा तुमचा प्रश्न उरतो. कारण तू हे जरी इतर कोणालाही सांगायला गेलास तरी कोणीही ते खरं मानणार नाही. असो! तर... मानव उत्पत्ती मी तुला सांगितली. हळूहळू मानव वाढत होता. त्याच्या शरीरात आणि त्याचवेळी पृथ्वीतलावर बदल होत होते. या सर्वच बदलांना जे सहन करू शकले ते जगत गेले. स्वतःत बदल घडवत मानव हळूहळू उत्क्रांत होत होता. या सुंदर वसुंधरेतील विविध प्रांतात तो विखरत होता..... आणि या उत्क्रांतीच्या प्रवासात मानवामधील होणारे बदल अनेक स्तरांवरचे होते. इथेच जे एक वेगळेपण निर्माण झाले ते म्हणजे तुम्ही आणि आम्ही नाथा." इतकं बोलून भीमा थांबला. त्याने स्थिर नजरेने नाथाकडे आणि गोविंदकडे बघितलं.

"तुम्ही आणि आम्ही? काय आहे वेगळेपण भीमा? जर असं म्हंटलं की तू खरंच भीमकाय आहेस; तर आमचे सेनापती आणि त्यांचा पुत्र देखील तुझ्या तोडीचे आहेत. तू 'तुम्ही आणि आम्ही' म्हणतो आहेस. याचा अर्थ तू एकटा नाहीस. मग तुमच्या सोबत आलेले; अपाला आणि तीक्ष्णाच्या हाताखाली काम करणारे हे सर्व तर पूर्णपणे वेगळे दिसतात भीमा. बुटके, कमी वजनाचे, भाषिक ज्ञान कमी असलेले, बुद्धीची पोहोच कमी असलेले... मुळात गुलाम वाटतील असे. मग हे 'तुम्ही आणि आम्ही' काय आहे?" गोविंदने विचारलं.

"सांगतो." भीमा शांतपणे म्हणाला. "गोविंद, हे खरं आहे की इथे दगड उचलणारे हे सगळेच दिसायला अत्यंत किरकोळ आणि शक्तीहीन वाटतात. पण तुला त्यांच्या शक्तीची कल्पना आलीच असेल आतापर्यंत. अगोदर त्यांच्याबद्दल माहिती देतो. म्हणजे तुमच्या मनातील शंका कमी होईल. हे मानवीय इतिहासातील आश्चर्य आहेत. यांचे पूर्वज कधीतरी एका बेटावर गेले. अचानक आलेल्या सागर वादळामुळे ते तिथे अडकले. सुरवातीस पाण्यावर तरंगायची कला येत नसल्याने ते तिथेच राहिले आणि वाढले. तो जमिनीचा तुकडा असा काही फार मोठा नव्हता. त्यामुळे तिथे मिळणारे अन्न खूप कमी होते. त्यातून ज्या मानवाने तो बदल स्वीकारला आणि तग धरू शकला तो हा. कमी अन्न आणि तिथे राहण्यास योग्य असे बदल होत हे सगळे जेमतेम आपल्या कंबरेपर्यंत येतील इतके वाढले आणि मी एका हाताने उचलू शकेन इतक्याच वजनाचे राहिले. सतत बदलणाऱ्या वातावरणात टिकण्यासाठी ते चपळ झाले. पण या सगळ्या बदलांना सामोरे जाताना दुर्दैवाने त्यांच्या मेंदू फार विकसित झाला नाही. त्यामुळे भरपूर शक्ती, कमी आहारात देखील सतत आणि खूप जास्त काम करण्याची ऊर्जा त्यांच्यात निर्माण झालीय. बुद्धी कमी असल्याने सांगितलेले काम विचार न करता प्रचंड गतीने आणि शक्तीने ते पूर्ण करतात."

"ठीक... अगदी मान्य. मग हे 'आम्ही आणि तुम्ही' मधले तुमच्यतले कसे?" नाथाने संभ्रमित होत विचारलं.

"ते देखील सांगतो. आता 'आम्ही' बद्दल अजून थोडं. तर हे कामकरी झाले. थोडं मी आणि अपाला यांच्याबद्दल." भीमा म्हणाला.

"म्हणजे?" गोविंदने भीमाला थांबवत विचारलं; "तू आणि अपाला? फक्त? मग तीक्ष्णा? ती?"

"मी सगळं सांगतो आहे गोविंद. थोडा धीर धर." हसत भीमा म्हणाला.

"तर मानवामध्ये जे एक वेगळेपण निर्माण झाले ते म्हणजे तुम्ही आणि आम्ही; हे मी म्हणालो त्या आम्ही मध्ये देखील अनेक स्तर आहेत गोविंद. मुळात अगोदर तुम्ही म्हणजे आमच्या दृष्टिकोनातून कोण ते सांगतो. भावनिकता, नात्यात गुंतणे, अधिकार गाजवणे, द्वेष करणे, मोहात गुंतणे... अशा सगळ्याच भाव भावनांचे मिश्रण असलेली मानसिकता घेऊन उत्क्रांत होत गेलात ते तुम्ही. केवळ बौध्दिकतेला महत्व देऊन भावनिकता दूर सारत या निसर्गसुंदर वसुंधरेला जपत मानवाची उत्क्रांती आणि ह्रास यांच्या मधला दुवा म्हणजे आम्ही. आमच्यामध्ये भावना कमी आहेत गोविंद. आम्हाला नातं निर्माण करायला आवडतं. पण त्यात आम्ही गुंतत नाही. मोह, राग, प्रेम हे आमच्यात देखील आहेत; पण अत्यंत कमी प्रमाणात. गोविंद, म्हणूनच तुझा प्रेमळ स्वभाव अपालाला आवडतो; पण ती फक्त तुझ्यात गुंतलेली नाही. ती तिचं काम आणि जवाबदरी याचं देखील पूर्ण भान ठेऊन आहे. तू मात्र नगरात परत जाण्याची तुझी जवाबदरी विसरून इथे तिच्यासाठी थांबलेला आहेस." भीमा अत्यंत गंभीरपणे बोलत होता.

भिमाचं बोलणं ऐकून गोविंदला धक्का बसला. त्याची नजर पाणावली. "भीमा, म्हणजे तुला म्हणायचं आहे की अपाला माझ्या सोबत कधीच येणार नाही?"

गोविंदकडे मान वळवत थंड नजरेने भीमाने नकारार्थी मान हलवली. त्याक्षणी गोविंद मनातून हलला. तो धडपडून उभा राहिला आणि मागे वळूनही न बघता चालू पडला. नाथा देखील त्याच्या मागे निघाला. पण भीमाने नाथाचा हात धरून त्याला थांबवलं.

"जाऊ दे त्याला नाथा. काही सत्य एकट्यानेच स्वीकारावीत. त्याक्षणी जर सांत्वनाचा खांदा मिळाला तर बुद्धी काम करेनाशी होते." भीमा शांतपणे म्हणाला.

"तुला नक्की काय म्हणायचे आहे भीमा? मला कळलं नाही." नाथा थांबत आणि परत बसत म्हणाला.

"गोविंदला हे स्वीकारणं खूप जड जाणार आहे की अपाला त्याच्या सोबत नगर प्रवेश करणार नाही. पण त्याचं कारण भावनिकता कमी आहे हे नाही." भीमा म्हणाला.

भिमाकडे गर्रकन नजर वळवत नाथा आश्चर्याने म्हणाला; "अरे! मग? मग काय कारण आहे? आणि जर तुला हे माहीत आहे तर तू ते गोविंदला सांगायला नकोस का? त्याला जर कळलं की त्याने अपालाला भावनिक हाक दिली तर ती त्याच्या सोबत थांबेल; तर तो त्या दृष्टीने प्रयत्न करायला लागेल न."

"हो. खरं आहे तुझं म्हणणं नाथा. पण एक लक्षात घे. हे मी सांगितल्या नंतर पुढे गोविंदने काय करावं हे देखील तो मलाच विचारेल. त्यामुळे तो त्याच्या मनातील खरी भावना शोधणार नाही; पुढे जाऊन जर त्याचा निर्णय चुकला तर तो आयुष्यभर एकच म्हणत राहील की त्याने भिमाचं ऐकून निर्णय घेतला; आणि सगळं चुकीचं घडलं. हाच अजून एक मोठा फरक आहे तुमच्यात आणि आमच्यात नाथा. तू बघतो आहेस की अपाला आणि तीक्ष्णा दोघींमध्ये सतत वाद होत आहेत. पण तरीही एका क्षणी अपाला जेव्हा तिच्या निर्णय क्षमतेबद्दल बोलते त्यावेळी तीक्ष्णा वाद थांबवून तिथून निघून जाते. कारण तीक्ष्णाला माहीत आहे की निर्णय अपालाने घ्यायचा आहे. या निर्णयापर्यंत पोहोचण्याच्या प्रवासात तीक्ष्णाचा हस्तक्षेप योग्य नाही." भीमा म्हणाला.

"ओह! बरं.... भीमा मला अजून एक गोष्ट सांगशील?" नाथाने थोडं थांबून विचारलं. त्याच्या प्रश्नातच 'विचारू की नको' ही डोलायमानता दिसत होती. भीमाने त्याच्याकडे हसत बघितलं आणि म्हणाला; "तू विचारायची गरज नाही नाथा. जे ऐकण्यासाठी गोविंद थांबला नाही ते तुला समजून घ्यायचं आहे. मघा बोलताना मी केवळ माझा आणि अपालाचा उल्लेख केला; तीक्ष्णाचा नाही. असं का... ते तुला समजून घ्यायचं आहे. खरं न? पण कसं विचारू असा प्रश्न पडला आहे."

भिमाकडे बघत नाथाने हसत मान हलवली.

"तीक्ष्णा! ती खूपच वेगळी आहे नाथा. ती आणि तिच्यासारखे अजून काही. तिच्यामध्ये भावणीकतेचा लवलेश देखील नाही. तिचं काम हेच तिचं आयुष्य आहे. निर्मिती - जपवणूनक - झालेला ह्रास भरून काढणं आणि परत स्वस्थानी जाणं; इतकंच माहीत आहे तिला. आणि.........." असं म्हणून भीमा थांबला.

"आणि?" नाथा नकळत म्हणाला.

"आणि तिला मृत्यू नाही नाथा.... पण हे तुला भीमा सांगणार नाही. कारण हे सत्य त्याचं आणि माझं देखील आहे." मागून अपालाचा आवाज आला आणि नाथाने गर्रकन मागे वळून बघितलं.

"तुझ्या असण्याची जाणीव झाली म्हणूनच मी बोलायचा थांबलो होतो अपाला. मला खात्री आहे की यापुढे जे काही सांगणं आवश्यक आहे ते तू माझ्याहूनही जास्त चांगल्या प्रकारे सांगशील." अपालाकडे बघत प्रेमळ हसत भीमा म्हणाला.

"भीमा... तू तुझ्या नावाला अगदी शोभून दिसतोस. भीमतटरक्षक! सर्वच बाजुंनी तू रक्षण करतो आहेस. माझं... आपलं... आणि या निर्मितीचं!" त्याच्याकडे जाऊन त्याला अत्यंत प्रेमाने मिठी मारत अपाला म्हणाली. तिला जवळ घेत भीमा हसला.

क्रमशः

No comments:

Post a Comment