Friday, March 18, 2022

अनाहत सत्य (भाग 16)

 अनाहत सत्य


भाग 16

"आयला! गोविंद भडकली रे ती. पहिल्यांदा तुला असं वागताना बघितलं यार! असा अचानक तिच्यावर काय गेलास? जा आता मस्का मारून परत आण तिला. By the way; महिजी तुम्ही मात्र मस्त स्टोरी रंगवत होतात हा. मजा येत होती ऐकताना." शेषा बडबड करत होता. त्याचं गोविंदकडे लक्ष नव्हतं. गोविंदचा चेहेरा कमालीचा चिडलेला होता. त्याने एकदा शेषाच्या दिशेने रागीट कटाक्ष टाकला आणि संस्कृती गेली होती त्या दिशेने तो तरातरा निघून गेला.

"स्टोरी? तुम्हाला काय मी उगाच रचून सांगितलेली गोष्ट वाटते का ही?" महिचा आवाज देखील चढला होता.

"मग काय? तुम्ही होतात का त्या राजदरबारामध्ये? राजा बरोबर? तो राजा काय बोलतो; काय करतो ते बघायला?" खदाखदा हसत शेषाने प्रश्न केला.

शेषाच्या त्या वाक्याने तर मही भलताच चिडला आणि ताडकन उभा राहिला. परिस्थिती एकदम तापलेली बघून जस्सी मध्ये पडला आणि एकदम दोघांना शांत करत म्हणाला; "अरे... अरे... तुम्ही दोघेसुद्धा काय भांडायला लागलात? शांत व्हा बघू! जाऊ दे ही सगळी चर्चा. यार शेषा.... तुझं घड्याळाकडे लक्ष आहे का? यार चार वाजून गेले आहेत. अजून आपण फक्त या सुरवातीच्या काही गुंफा बघितल्या आहेत. त्यात इथे कशाला आलो होतो ते राहीलं आहे बाजूला आणि आपण या गुंफा बघत फिरायला लागलो आहोत. आता गोविंद आणि संस्कृतीला येऊ दे. आपण निघू परत जायला. उद्या येऊया परत. काय हो महिरक्षक; तुम्ही उद्या असाल का पुढच्या गुंफा दाखवायला? की आम्ही उद्यासाठी वेगळा गाईड शोधायचा?"

जस्सी बोलत होता. मात्र शेषा आणि मही एकमेकांकडे खाऊ की गिळू असे बघत उभे होते. खरं तर जस्सीला ते कळत होतं; पण तो त्याकडे दुर्लक्ष करत होत. त्याने गोविंद गेला त्या दिशेने तोंड करत मोठ्याने गोविंदला हाक मारली; "गोविंद... यार संस्कृतीला घेऊन बाहेर ये; आपण निघुया. आजसाठी इतकंच पुरे."

मात्र.... जस्सीचा आवाज गोविंद आणि संस्कृतीपर्यंत पोहोचत होता की नाही.............

"सॉरी संस्कृती! मला लक्षात आलं की तू नक्की काहीतरी असं बोलून जाणार आहेस की त्याचा परिणाम अवघड होईल सांभाळायला. अग, जस्सी आणि शेषा आपलेच आहेत. पण हा गाईड! मला मुळात तो फार पटत नाहीय. त्यात त्याच्या समोर तू काहीतरी असं बोलली असतीस; ज्यामुळे सगळं एकदम उघड झालं असतं; म्हणून तुला थांबवायला मी....." गोविंद बोलत बोलत गुंफेच्या आत जात होता. त्याला संस्कृती दिसत होती. काहीशी आत गेलेली. त्याच्याकडे पाठ करून उभी असलेली. तो जसजसा आत जात होता; तसतसा त्याचा आवाज घुमायला लागला होता. त्याचं त्यालाच ते थोडं विचित्र वाटत होतं. तो एकीकडे संस्कृतीशी बोलत होता; तिला विनवत होता.... आणि दुसरीकडे त्याच्या मनात वेगळेच विचार चालू होते. 'आपला आवाज इतका धीरगंभीर आहे? वा! मस्तच वाटतं आहे आपलाच आवाज ऐकताना!' हा विचार आला आणि त्याचं त्यालाच हसू आलं. तो क्षणभर थांबला.

समोरच संस्कृती उभी होती..... 'अं!? संस्कृती!?' बांधा सांस्कृतीसारखाच होता. गोविंदची चूक होऊच शकत नव्हती.... पण तरीही..... ती?? 'यार भुरे कुरळे तर आहेत केस संस्कृती सारखे. फक्त विचित्र बांधले आहेत. संस्कृती घट्ट बो बांधते किंवा मोकळे ठेवते. बाजूला सॅक आहे की संस्कृतीची. जीन्सच आहे न? की काय असं घट्ट घातलं आहे? दोन्ही हात कंबरेवर ठेऊन अशी उभी राहात नाही संस्कृती. आयला! लाकडी बांगड्या आहेत का? गळ्यात काय आहे ते? कधी घेतलं? आपण पुढे येत होतो तेव्हा ते बाहेर हातात माळा घालून विकायला उभे राहिलेले लोक होते त्यांच्याकडून घेतलं की काय? पण आपल्या लक्षात नाही आलं का?' गोविंदचं मन आता अजून गोंधळायला लागलं होतं.

"जीन्स आणि टॉप घालून गुंफेच्या आत आलीस न ग? मग आता हे काय घातलं आहेस? कपडे कधी बदललेस ग?" काहीसा चेष्टेचा आणि खुपसा आश्चर्य वाटलेला आवाज होता गोविंदचा. "ए! संस्कृती!?" गोविंदने संस्कृतीला हाक मारली. 'दुसरी कोणी असावी की काय ती? पण कसं शक्य आहे? आपण सगळे बाहेर बसलो होतो तेव्हा या गुंफांच्या दिशेने कोणीच आलं नव्हतं. संस्कृती चिडून आतल्या दिशेने आली तेव्हा तर नक्की कोणी नव्हतं. मग...!???....' गोविंद पुरता सैरभैरला होता. तो तसाच थोडा पुढे गेला.

"यार संस्कृती! काय चेष्टा चालवली आहेस?" त्याच्या आवाजातला गोंधळ आणि खर्ज वाढत होता. तो आता त्या मुलीच्या अगदी जवळ येऊन पोहोचला होता. त्याने हात पुढे करून तिच्या खांद्यावर ठेवला आणि ती मागे वळली.

सुंदर भुऱ्या डोळ्यात काजळ, नाकामध्ये लाकडी पण सुंदर नाजूक दागिना, उंच मानेचं सौंदर्य वाढवणारी लाकडी नक्षीदार जाड पट्टी होती गळ्यात. तशाच नक्षीदार पट्ट्या हातात आणि पायाशी देखील; तिने घातलेल्या चांबडी बूट सदृश पायताणांच्या वर. ते बूट.... किंवा जे काही होतं ते..... गुढग्याच्याही वरपर्यंत बांधलेलं होतं. दोन्ही खांद्यांवर गाठी बांधलेला जाड कपडा.... तिच्या शेलाट्या सुंदर कोरीव-बांधीव बांध्याची कल्पना देत होता........ ती..... ती तीच होती!

...... संस्कृती!!! अहं!!! ...................... अपाला!!! बाजूला पडलेल्या चांबडी पिशवीतून बाहेर दिसणारी हत्यारं.... आणि सुंदर, मोहक चेहेऱ्यावरचा आत्मविश्वास आणि डोळ्यातली घट्ट पकड!!! ती अपालाच होती. गोविंदची खात्री झाली. 'माझी अपाला! याच मोहक सर्वांवर केवळ डोळ्यांनी नियंत्रण ठेवणाऱ्या चेहेऱ्याने वेड लावलंय आपल्याला.'

"गोविंदराज.... " अपालाने त्याला हाक मारली आणि त्यांची नजरानजर झाली.

गोविंदराजच्या पायात देखील अपाला प्रमाणे बूट सदृश काहीतरी होतं. अगदी मांड्यांपर्यंत पोहोचणारं. कंबरेला बांधलेल्या अधनियाचा काचा मांड्यांवर व्यवस्थित गच्च बसला होता. मात्र हातात आणि गळ्यात असलेल्या सोनेरी आणि चंदेरी धातूच्या कड्यांमुळे गोविंदचं 'राज' असणं अधोरेखित होत होतं.

"आपण दोघेच असताना तू मला फक्त गोविंद म्हणशील असा शब्द दिला आहेस अपाला." त्याचा आवाज प्रेमाने ओथंबलेला होता.

"हो! पण आपण इथे एकटे नाही आहोत." अपालाचा आवाज काहीसा मृदू, मिश्किल होता. तिने नजरेनेच तिच्या मागे कोणीतरी असल्याची खूण केली आणि गोविंदने तिच्या खांद्यावरून मागे नजर टाकली. जेमतेम तीन-साडेतीन फूट उंचीचे तिघे उभे होते. लुकलूकणाऱ्या डोळ्यातले भेदरलेले भाव, एका हातातली अवजारं सांभाळत आणि दुसरा हात मागे घेतलेला, तोंडात काहीतरी खाल्ल्याचा तोबरा भरलेला.... मात्र शरीराचा पिळदार, मजबूत घाट नजरेत भरण्याजोगा होता. त्यांच्याही मागे कोणीतरी होतं.... दोन गोड लूकलूकणारे हसरे डोळे.

"कुंजरराज....." गोविंदचा हुकमी आवाज गुंफेमध्ये घुमला.

"मी असाच इथे आलो होतो. मला नव्हतं माहीत इथे काम चालू आहे." एक गोड बालिश आवाज आला.

"बाहेर ये आधी." अपालाने हसत हात पुढे केला आणि तिच्या करंगळीला लहानशा नाजूक बोटांची मिठी बसली.

"कुंजर... किती वेळा सांगितलं आहे; मी काम करत असताना असं येऊ नकोस." अपालाने आपल्या लेकाचा; कुंजरचा; चेहेरा कुरवाळत म्हंटलं.

"पण मला तुला हे द्यायचं होतं मा." हातातल्या टोपलीतलं फळ पुढे करत तो म्हणाला. त्याने दिलेलं फळ प्रेमाने हातात घेत तिने त्याचा हात गोविंदच्या हातात दिला आणि म्हणाली; "मी येतेच थोड्या वेळात."

"हो! मी वाट बघतो." गोविंद म्हणाला आणि कुंजरचा हात हातात घेऊन गुंफेतून बाहेर पडला.

***

"गोविंदराज; आपण मंदिराजवळील वृक्षवाटिकेमध्ये थांबलात तर बरे होईल." गुंफेतून बाहेर येणाऱ्या गोविंदला सामोरे जात नाथा म्हणाला.

"बरं. चल; सोबतच जाऊ." गोविंदने कुंजरचा हात सोडून दिला. उड्या मारत कुंजर पुढे निघाला आणि गोविंदच्या दोन पावलं मागून नाथा चालायला लागला.

"राजकुमार!" काहीसं पुढे गेल्यावर नाथाने गोविंदला हाक मारली.

"बोल नाथा. मी ऐकतो आहे." मागे वळूनही न बघता गोविंद म्हणाला.

"महाराजांचे सुमंत कल्याण आपल्या भेटीसाठी थांबले आहेत." नाथाचा आवाज अजिजीचा होता.

"नाथा, तू वृक्षवाटिकेचा उल्लेख केलास त्याचवेळी माझ्या लक्षात आलं होतं. परत एकदा तेच प्रश्न आणि माझी तीच उत्तरं. तीच चर्चा आणि ..... जाऊ दे. तुला तरी मी काय सांगणार? मित्र आहेस माझा. सोबतीने चाल; इतकी विनंती देखील तू मान्य करत नाहीस माझी. मग इतरांना मी काही सांगून ते कितपत माझं म्हणणं ऐकतील याबद्दल मला शंकाच आहे." गोविंद शांतपणे बोलत होता. त्याचा स्वर मात्र दुखावलेला होता.

"राजकुमार, तुम्ही मला मित्र मानता हा माझा सन्मान आहे. एरवी मी नक्कीच तुमच्या सोबत चाललो असतो. मात्र सुमंत कल्याण यांनी जर मला तुमच्या सोबत पाऊल उचलताना बघितलं तर नगरातील माझे वृद्ध वडील मला परत कधीच दिसणार नाहीत; याची मला कल्पना आहे." नाथाचा आवाज दबलेला होता.

"मलाही त्याची कल्पना आहे नाथा. चल.... सुमंत कल्याण वाट बघत आहेत." गंभीर आवाजात गोविंद म्हणाला.

"राजकुमार गोविंदराज; प्रणाम." कंबरेत झुकत सुमंत कल्याण म्हणाले. मात्र त्यांच्या आवाजातला ताठरपणा आणि ताठ मानेने गोविंदच्या नजरेला दिलेली नजर यातून 'प्रणाम' शब्द कितपत अर्थपूर्ण होता याबद्दल गोविंदच्या मनात शंका होती.

"प्रणाम सुमंत. आज इथे या दगडांच्या राशींमध्ये येण्याचं प्रयोजन?" गोविंदने चेहेऱ्यावर कोणतीही भावना येऊ न देता प्रश्न केला.


"राजकुमार, आपण जाणताच. आदरणीय मही कृष्णराज उत्तरेकडील स्वारीची तयारी करत आहेत. त्यांची इच्छा आहे की आपण एकदा तरी नगरात येऊन त्यांना येऊन भेटून जावेत." सुमंत कल्याणने महाराजांची इच्छा बोलून दाखवली.

"बरं. येईन म्हणून निरोप द्यावात." गोविंदचा स्वर अजूनही भावनाहीन होता.

"कधी याल म्हणून सांगू?" सुमंत कल्याणने परत एकदा प्रश्न केला.

"या तुम्ही सुमंत." गोविंद म्हणाला आणि मागे वळून तिथून निघून गेला.

"नाथ." सुमंत कल्याणने नाथाला हाक मारली.

"सुमंत!" मान खाली घालून अत्यंत लीन आवाजात नाथाने उत्तर दिलं.

"तू बहुतेक केवळ मित्रत्वाचं नातं लक्षात ठेऊन आहेस." सुमंत कल्याण यांच्या आवाजातला थंडपणा नाथाच्या अंगावर काटा उभा करून गेला.

"सुमंत......" नाथ काहीतरी बोलणार होता. पण सुमंत कल्याणने उजवा हात वर करत त्याला थांबवलं आणि म्हणाला; "नाथा हे कधीही विसरू नकोस. आपली प्रामाणिकता राजसिहासनाशी असते. व्यक्तीसापेक्ष नसते. आज आदरणीय महाराज कृष्णराज या सिंहसनाधीश आहेत. त्यामुळे तुझी सेवा त्यांच्या चरणी रुजू होणे आवश्यक आहे."

"सुमंत... मी आपल्या शब्दाबाहेर नाही." नाथाचा आवाज अजूनच केविलवाणा झाला होता.

"मी सुमंत... राष्ट्रकूट घराण्यातील महिंचा रक्षक आहे. माझ्यासाठी माझे काम हा माझा कर्मयोग आहे. महिरक्षक असणे हा माझा सन्मान समजतो मी. परंतु मला असं का वाटतं आहे की तुझी सेवा महिंच्या चरणी रुजू करण्यापेक्षा इथे राजकुमार गोविंदराज यांच्या सोबत एक मित्र म्हणून राहण्यात तुला जास्त धन्यता वाटते आहे!" सुमंत कल्याण त्याच थंड आवाजात बोलत होते.

"सुमंत आपण विश्वास बाळगावात. माझ्या मानत कायम मही कृष्णराज यांच्या मनीची इच्छा हाच एक विचार असतो. वेळ येईल तेव्हा माझी सेवा मही चरणी अर्पण करेन; याची आपण पूर्ण खात्री बाळगावीत." नाथाच्या शब्दांवर सुमंत कल्याण यांचा कितपत विश्वास बसला ते नाथाला कळले नाही. पण एक उग्र कटाक्ष त्याच्या दिशेने टाकून सुमंत तिथून निघून गेले.

नाथाने एक दीर्घ निश्वास टाकला आणि मागे वळून तो राजकुमार गोविंदला शोधण्यास निघाला. दूरवर त्याला राजकुमार गोविंदराज दिसले. ते लेण्यांच्या रक्षणासाठी सतत जागरूक भीमतटरक्षक सोबत बसले होते. नाथाने भराभर पावलं उचलली आणि त्यांच्या जवळ जाऊन पोहोचला.

भीमतटरक्षक उंचापुरा प्रचंड मोठी शरीरयष्टी लाभलेला होता. आकाशातील घारीच्या चोचीतला साप देखील एका सध्या दगडाच्या फेकीत तो खाली पाडू शकत असे; इतकी तेज नजर होती त्याची. मात्र लेण्यांच्या संपूर्ण रक्षणाची जवाबदारी तीक्ष्णा त्याच्याकडे सुपूर्द करताना त्याच्या तल्लख बुद्धीचा विचार जास्त केला होता.

नाथाने पुढे होत भीमाला वळसा घातला आणि त्याच्या पुढ्यात गेला. भीमा लहानग्या कुंजरचा हात धरून त्याला उंच उडी मारण्यास शिकवत होता. कुंजर प्रत्येक उद्दीनंतर खिदळत होता. "कुंजर, तू केवळ मस्ती करतो आहेस हं. मी तुला खेळवत नाही आहे बेटा. उंच उडी आणि लांब उडी हा चपळतेवर मिळवायच्या नियंत्रणावरचा पहिला पाडाव आहे." भीमा एकीकडे हसत पण कुंजरला रागावत असल्याप्रमाणे बोलत होता.

कुंजरवर मात्र त्या बोलण्याचा काहीही परिणाम होत नव्हता. "पण भीमा काका, मी तेच तर करतो आहे. पाडाव पार करण्यासाठी तुमच्या हाताची गरज आहे मला." खिदळत कुंजरने उत्तर दिलं. त्याच्या उत्तरावर गोविंद, भीमतटरक्षक आणि नाथ सगळेच हसले. नाथ आलेला बघून भीमाने कुंजरच्या उड्यांच्या खेळाला थांबवलं आणि त्याच्याकडे बघत म्हणाला; "छे! दमलो बुवा तुझ्या शक्तीपूढे. आता मला थोड्या विश्रांतीची गरज आहे. तू पळ बघू. जा तुझ्या सोबत्यांसोबत खेळ."

"भीमा काका, मी लहान आहे; मंदबुद्धी नाही. तुम्हाला तातांसोबत आणि नाथ काका सोबत काहीतरी महत्वाचं बोलायचं असावं. ठीक. जातो मी खेळायला." असं म्हणून कुंजर निघाला. पण परत मागे वळून गोविंदकडे बघत तो म्हणाला; "तात, मा येईलच एवढ्यात. याल ना तुम्हीसुद्धा?" गोविंदने होकारार्थी मान हलवली आणि कुंजर गोडसं हसत तिथून पळत गेला.

"हुशार आहे कुंजर." तो गेला त्या दिशेने बघत नाथ म्हणाला.

"प्रश्नच नाही. म्हणूनच अपालाने त्याचं नाव कुंजर ठेवलं आहे. कुंजर.... गजराज आहे तो. अत्यंत बुद्धिवान! त्याचं शक्तीसामर्थ्य मी नक्कीच गजराजांप्रमाणे निर्माण करीन." कुंजर गेलेल्या दिशेने कौतुकाने बघत भीमतटरक्षक म्हणाला.

"तुम्हा दोघांचं कुंजरचं कौतुक करणं संपलं असलं तर आपण थोडं महत्वाचं बोलूया का?" गोविंदच्या आवाजातील गंभीरता लक्षात येऊन भीमा आणि नाथ दोघेही गोविंद समोरील दगडांवर बसले.

"सुमंत कल्याण परत तेच सांगायला आले होते न?" बराच वेळ शांततेत गेल्यानंतर कुठूनतरी सुरवात करावी या विचाराने भीमाने विषयाला तोंड फोडले.

"हो" इतकंच म्हणून गोविंद शांत बसला.

"पण त्यांचं म्हणणं मला तरी चुकीचं नाही वाटत राजकुमार." नाथाचा आवाज अजिजीचा होता.

"नाथ, मला देखील पिताजींची इच्छा चुकीची नाही वाटत. उत्तरेकडे चाल करून जाण्याचा त्यांचा मानस आहे. मला माहीत आहे की त्यांना सर्व ऋतू दोनवेळा अनुभवावे लागतील या प्रवासात. त्यामुळे त्यांची इच्छा आहे की मी राजगादी स्वीकारावी. सुमंत कल्याण यांनी देखील मला अनेकदा हे सांगितलं आहे. सुमंत पिताजींचे केवळ सल्लागार नाहीत; तर अत्यंत जवळचे मित्र आहेत. त्याहूनही महत्वाचं म्हणजे ते राष्ट्रकूट राजपरिवाराचे अत्यंत विश्वासार्ह सल्लागार आणि हितचिंतक आहेत." गोविंदचा स्वर आता थोडा समजूतदार होता. त्याच्या आवाजातला फरक जाणवल्याने नाथाने मनातच निश्वास सोडला.

"राजकुमार तुम्हाला सर्वच माहीत आहे. मग तरीही तुम्ही त्यांचं म्हणणं मान्य करत नाही आहात." नाथ म्हणाला.

"नाथा, तुला देखील सगळं माहीत आहे. तरी देखील तेच ते माझ्या तोंडून वदवून घ्यायला तुला का आवडतं ते मला अजूनही कळलेलं नाही. मी एकदाही म्हंटलेलं नाही की मला राजगादी नको. सुमंत कल्याण यांना देखील मी अनेकदा सांगितलं आहे की नगरात येऊन मही कृष्णराज यांच्या चरणी स्वतःला ठेवण्यात मला माझ्या आयुष्याची पूर्तता वाटते. मात्र; नाथा; तू चांगलंच जाणून आहेस की राजसीहासनापेक्षा देखील माझ्या आयुष्यात अपाला आणि कुंजर जास्त महत्वाचे आहेत. ज्याक्षणी अपाला आमच्या विवाहाचा प्रस्ताव मान्य करेल आणि माझ्या सोबत नगरात येण्यास रुकार देईल; मी एक क्षण देखील इथे थांबणार नाही." गोविंद म्हणाला.

"आणि मी का देईन रुकार आपल्या विवाहाला?" मागून अपालाचा आवाज ऐकून तिघांचेही डोळे मोठे झाले. भीमा आणि नाथ उठून उभे राहिले.

"माझी कामाची वेळ झाली. एकदा पूर्ण फिरून योग्य जागी रक्षक उभे आहेत का ते बघून घेतो." असं म्हणत भीमाने तिथून काढता पाय घेतला.

"कुंजरने बोलावलं होतं मला." नाथा स्वतःशीच बोलल्या सारखं करून भीमाच्या मागोमाग गेला.

"गोविंद! तुला देखील जायचं आहे का?" अपालाने गोविंदकडे बघत म्हंटलं.

"नाही. मला जाणून घ्यायचं आहे; का नाही करणार तू विवाह?" गोविंद शांतपणे म्हणाला.

"पुन्हा तेच? ज्याप्रमाणे सुमंत तुला नगरात येण्याविषयी सांगण्यास थकत नाहीत; त्याप्रमाणे तू मला तोच प्रश्न परत परत विचारण्यास थकत नाहीस. बरं! मी देखील उत्तर देण्यास थकणार नाही. गोविंद, विवाह बंधन का? आपण दोघेही एकमेकांच्या प्रेमात आहोत; एकमेकांशी प्रामाणिक आहोत. तुझ्यामुळेच मला कुंजर प्राप्त झाला आहे. त्यासाठी नक्कीच मी तुझ्याशी आयुष्यभर एकनिष्ठ राहीन. मात्र गोविंद, कुंजर इतकंच माझं माझ्या कामावर प्रेम आहे. तीक्ष्णा सोबत मी देखील या विशाल शिव मंदिराच्या पूर्णत्वाचं स्वप्न बघितलं आहे. सर्वोत्तम मूर्ती निर्मिती आणि कळसाकडून मंदिर निर्मिती हा स्थापत्य अविष्कार तीक्ष्णा आणि मी नक्कीच पूर्णत्वास नेणार आहोत. त्यामुळे माझं काम पूर्ण होईपर्यंत मला त्यामध्ये खंड होईल असा कोणताही निर्णय घ्यायचा नाही." अत्यंत स्थिर आवाजात अपाला बोलत होती.

तिच्या जवळ जात तिचा हात हातात घेऊन गोविंद म्हणाला; "पण मी तुझ्या कामाच्या आड येतच नाही अपाला. तुझं हे स्वत्व जपून माझ्यावर प्रेम करणंच तर मला तुझ्या प्रेमात जास्त गुंतवून ठेवतं आहे. मी तुला आत्ता विवाह कर असं मुळीच म्हणत नाही. फक्त शब्द दे अपाला; की तू तुझ्या मंदिर पूर्ती नंतर देखील माझ्या सोबत असशील. तू कोणत्याही क्षणी मला सोडून निघून जाशील ही भीती मला कायम असते ग. म्हणून तर एका दिवसासाठी देखील मी नगरात जाण्याचा विचार करत नाही. अपाला; तुझ्या सर्व जवाबदारी संपल्या की मग आपण विवाह करू. नाहीतरी मही कृष्णराज यांना येण्यास दोन ऋतू काळ इतका अवधी लागणार आहे. तोवर तुझं निर्मिती कार्य पूर्ण होईलच. त्यानंतर आपण विवाह करू."

"अपाला विवाह करणार नाही." मंदिराच्या बाजूने सामोरे येत तीक्ष्णाने स्पष्ट शब्दात विधान केले.

क्रमशः


No comments:

Post a Comment