अनाहत सत्य
भाग 14
गोविंद, जस्सी, शेषा आणि संस्कृती चौघेही समोरच दिसणाऱ्या शंकराच्या मंदिरासमोर उभे होते. चौघेही आपल्याच तंद्रीमध्ये त्या प्रचंड मोठ्या मंदिर असलेल्या लेण्याकडे बघत उभे होते. मही मागून येऊन त्यांच्या सोबत उभा राहिलेला त्यांना चौघांनाही कळला नाही.
"चला, एका वेगळ्या काळ सफरीला." महिचा आवाज ऐकून चौघेही तंद्रीतून जागे झाले आणि दचकून त्याच्याकडे बघायला लागले.
"काळ सफर? नक्की काय म्हणायचं आहे तुम्हाला?" शेषाने विचारलं.
महिने शेषाकडे बघितलं पण त्याच्या प्रश्नाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत त्याने एक पाऊल पुढे टाकलं. गोविंदला ते अजिबात आवडलं नाही.
"शेषा काहीतरी विचारतो आहे." गोविंदचा आवाज काहीसा कठोर होता. गोविंदच्या त्या वाक्याने शेषा, संस्कृती आणि जस्सीने देखील गोविंदकडे थोडं आश्चर्याने बघितलं. आजवर गोविंदच्या आवाजात असा कठोरपणा त्यांना कधीच जाणवला नव्हता. जस्सी आणि संस्कृतीने एकमेकांकडे बघितलं. शेषा मात्र गोविंदकडे एकटक बघत होता, त्याला गोविंदच्या त्या बोलण्याने आतून खूपच बरं वाटलं. पुढे जायला निघालेला मही मात्र तटकन थांबला. त्याने गर्रकन वळून गोविंदकडे बघितलं. त्याच्या डोळ्यात एकप्रकारचं आश्चर्य होतं. तो क्षणभर थांबला आणि मागे येत म्हणाला; "अरे तुम्ही तर एकदम रागावलात. तुमच्या मित्राच्या प्रश्नामध्ये काही अर्थ नाही असं वाटलं मला; म्हणून उत्तर नाही दिलं. अहो काळ सफर म्हणजे ही लेणी आणि त्यांची कथा.... त्या सफरीवर चला इतकंच म्हणत होतो मी." मही म्हणाला.
"ओह! आम्हाला सगळ्यांना वाटलं तुमच्या म्हणण्याचा अर्थ आहे की वेगळ्या काळामध्ये चला." काहीसं तापलेलं वातावरण हलकं करण्यासाठी संस्कृती हसत म्हणाली.
"मॅडम, तुम्हाला काहीही वाटू शकतं. पण ते तसंच असतं किंवा होतं असं नाही न." मही बोलला. त्याची नजर कुठेतरी लांब लागली होती. तो संस्कृतीकडे अजिबात बघत नव्हता. का कोण जाणे पण संस्कृतीला वाटलं महिला तिच्याशी बोलण्याची इच्छा नाही. पण अजून वाद वाढू नयेत म्हणून ती शांत राहिली.
"बरं महिजी, तुम्ही आम्हाला या लेण्यांच्या सफरीवर घेऊन चला बघू." जस्सी त्याचा कॅमेरा सावरत म्हणाला आणि सगळेच निघाले.
"वेरूळ लेणी ही अत्यंत खास लेणी आहेत. ही सह्याद्रीच्या सातमाळा पर्वत रांगेतील डोंगरकड्यात साधारणतः पाचव्या ते दहाव्या शतकाच्या कालखंडात कोरलेल्या एकूण चौतीस लेणी आहेत. यामध्ये सुरवातीची बारा लेणी बौद्ध स्थापत्याची आहेत; नंतरची सतरा लेणी हिंदू संस्कृती बद्दल माहिती देतात आणि ही डाव्या बाजूची शेवटची पाच जैन लेणी आहेत. इसविसन १९५१ साली भारत सरकारने या लेण्याला 'राष्ट्रीय स्मारक' म्हणून घोषित केलं आणि त्यानंतर ती भारत सरकारच्या पुरातत्त्व विभागाकडे सोपवण्यात आली आहेत. युनेस्कोने इसविसन १९८३ मध्ये वेरूळ लेण्यांचा समावेश जागतिक वारसास्थळांच्या यादीत केला. आपल्याला हे समोर जे दिसतं आहे ते कैलास मंदिर. हे या जगातील त्याच्या स्थापत्यशास्त्रामधलं सर्वात अदभुत आहे. तुम्ही जर पृथ्वी बाहेरील सॅटेलाइट मधून पृथ्वीकडे बघितलंत तर काही ठळक खुणा दिसतात. त्यामध्ये या कैलास मंदिराच्या वरच्या भागाचा समावेश आहे." मही बोलत बोलत मंदिराच्या दिशेने चालत होता.
गोविंद, संस्कृती, जस्सी आणि शेषा महिच्या मागे चालत होते. त्यांची नजर समोरच्या कैलास मंदिरावर होती आणि कान मही जे सांगत होता त्याकडे होते. पण तरीही प्रत्येकाच्या डोक्यामध्ये काहीतरी वेगळंच चाललं होतं.
"या लेण्यांची खासियत अशी आहे की संपूर्ण पर्वत बाहेरून मूर्तीसारखे कोरून ही लेणी निर्माण केलेली आहेत. आपल्याला समोर हे जे कैलास मंदिर दिसते आहेत ते द्रविडी शैलीचे मंदिर म्हणून आकारले गेले आहे. एकूण two senventy six फूट लांब, one fifty four फूट रुंद असं हे मंदिर केवळ एक खडक कापून बांधलेलं आहे. त्याहूनही महत्वाचं म्हणजे सर्वसाधारणपणे कोणतंही बांधकाम हे पायापासून कळसाकडे जातं. पण हे मंदिर वरपासून खालपर्यंत तयार केलेलं आहे. ते बांधण्यासाठी, खडकातून सुमारे चाळीस हजार टन दगड काढला गेला असा अंदाज आहे. पहिल्या भागात हा एकूण पर्वत बांधकामासाठी वेगळा करण्यात आला. म्हणजे लेण्यांसाठी हीच जागा योग्य आहे; हे ठरल्यानंतर संपूर्ण पर्वताची लांबी रुंदी मोजली गेली. मग हा भाग संपूर्ण पर्वतापासून वेगळा केला गेला. त्यानंतर मंदिरासाठी हा पर्वत भाग आतून कापला गेला आणि नव्वद फूट उंचीच हे कैलास मंदिर बांधण्यात आलं. याची वेगळी बाजू म्हणजे हे मंदिर बाहेरील बाजूने मूर्तींनी भरलेले आहे. विशेष म्हणजे या मंदिराची महल तीन बाजूंच्या वर होती, जी मंदिराच्या वरच्या भागाला जोडलेली होती. आता ते पुल पडले आहेत. पण त्यावेळचा नजरा डोळे दिपवणाराच होता. खुल्या मंडपात समोर नंदी आणि विशाल हत्ती आणि स्तंभ आहेत. हे काम भारतीय स्थापत्य शास्त्र कौशल्यांचा एक अद्भुत नमूना आहे." मही तंद्री लागल्यासारखा बोलत होता; जणूकाही त्याला ते मंदिर बांधलं जात असताना दिसत होतं. तो स्वतःच्या नादात हळूहळू मंदिराच्या दिशेने चालत होता. मागून गोविंद, संस्कृती, जस्सी एका वेगळ्याच ओढीने चालत होते.
त्यांच्यातला शेषा मात्र महिच्या बोलण्यामध्ये फार गुंतला नव्हता. त्याचं लक्ष इतर लोकांकडे देखील होतं. तो गोविंदच्या मागून चालत होता. दोन पावलांचं अंतर ठेऊन. अर्थात तो जरी महिच्या माहितीमध्ये गुंतला नव्हता तरी त्याचं पूर्ण लक्ष होतं त्याच्या बोलण्याकडे.
"लांबी, रुंदी मोजायला तुम्ही होतात का?" शेषाने अचानक प्रश्न केला आणि सगळ्यांनीच त्याच्याकडे वळून बघितलं. खांदे उडवत शेषा हसला. काही वेळापूर्वीच्या अनुभवामुळे यावेळी त्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष न करता महीनेच उलट प्रश्न विचारला; "का? तुला का असं वाटलं?" हसत हसत शेषा म्हणाला; "अहो, तुम्ही जे वर्णन करता आहात ना... त्यावरून तर असं वाटतं की तुम्हीच ही जागा ठरवलीत, हे पर्वत मोजलेत आणि....."
"आणि?" संस्कृतीने आवाज थोडा मोठा करत विचारलं.
तिच्या त्या प्रश्नामुळे शेषा बोलायचा थांबला. "आणि काही नाही." तो तिच्याकडे बघत म्हणाला.
"काही नाही न? मग ठिक. चला, आपण हे मंदिर बघूया." संस्कृती म्हणाली आणि सगळेच मंदिराच्या दिशेने निघाले.
नेहेमीच्या सवयीमुळे असेल पण मही काहीसा भरभर चालत पुढे निघाला. गोविंद आणि जस्सीने देखील त्याला गाठण्यासाठी वेग वाढवला. तेवढी संधी साधून संस्कृती शेषाकडे आली आणि म्हणाली; "मला माहीत आहे तुला या सगळ्यामध्ये फारसा इंटरेस्ट नाही. पण म्हणून प्रत्येकवेळी त्या महिला उलट प्रश्न विचारून डिस्टर्ब करू नकोस. कळलं?"
हसत हसत शेषाने बरं म्हणून मान हलवली आणि ते दोघे देखील मंद हसत मंदिराच्या दिशेने निघाले.
पुढे गेलेल्या गोविंदचं संपूर्ण लक्ष महिला गाठण्यामध्ये होतं; आणि अचानक त्याला जाणवलं की कोणीतरी लहानग्याने खिदळत येऊन त्याच्या पायाला येऊन मिठी मारली आहे. पायाला ओढ जाणवून गोविंद एकदम थांबला आणि त्याची नजर खाली वळली. पण त्याच्या पायाजवळ कोणीच नव्हतं. आता पायाला ओढ देखील जाणवत नव्हती. क्षणापूर्वी त्याची शंभर टक्के खात्री होती की लहानसं बाळ... कदाचित तीन-चार वर्षांचं असेल; त्याच्या पायाला मिठी मारून हसत होतं. पण पायाजवळ कोणीच नाही बघून तो पूर्णपणे गोंधळून गेला. तोपर्यंत काहीसे मागे राहिलेले शेषा आणि संस्कृती त्याच्या जवळ आले आणि संस्कृतीने नजरेनेच त्याला काय म्हणून विचारलं. गोविंदने देखील काही नाही असं मानेनेच सांगितलं आणि ते तिघे पुढे गेलेल्या जस्सी आणि महिच्या दिशेने निघाले.
जस्सी काहीसा मोठ्या ढांगा टाकत महिला गाठायचा प्रयत्न करत होता.... आणि अचानक त्याला जाणवलं की त्याच्या आजूबाजूला खूपशी गर्दी आहे. घामाचा दर्प त्याला जाणवत होता. तो थांबून आजूबाजूला बघायला लागला. कोणीच नव्हतं त्याच्या बाजूला. त्याला देखील ते कळत होतं. पण तरीही ती गर्दी त्याला जाणवत होती. अगदी स्पष्टपणे! पण ती जी भावना होती त्यावर काही विचार मनात येण्याअगोदरच गोविंद, शेषा आणि संस्कृती त्याच्या शेजारी आले. जस्सीने त्यांच्याकडे बघितलं; आणि क्षणभरापूर्वी झालेला भास मनाच्या मागे टाकून तो देखील पुढे निघाला.
"अरे तुम्ही मागे राहिलात. मी आपला एकटाच बोलत होतो." मागे वळून हसत मही म्हणाला.
"हो! ते जरा फोटो काढत होतो मी संपूर्ण लेण्यांच्या परिसराचे." जस्सी मोघम म्हणाला.
"लेणी सुरू होतात उजवीकडून. त्या तिथल्या पहिल्या लेण्यापासून. अगोदर उल्लेख केल्याप्रमाणे साधारण स्थापत्य सांगायचं तर ती उजवीकडची पहिली बारा लेणी बौद्ध पद्धतीची आहेत, त्यानंतरची सतरा हिंदू आणि नंतरची या बाजूची शेवटची पाच जैन लेणी आहेत. हे फरक कसे तर आतील मूर्ती आणि बांधकाम स्थापत्यावरून केलेले आहेत. मात्र सर्वसाधारण लोक या कैलास मंदिरापासून सुरवात करतात. पहिली काही लेणी तर लोक बघत देखील नाहीत. एकदम त्या नवव्या लेण्यापासून सुरवात करतात बघायची. तसं पहिल्या लेण्यांमध्ये बघण्यासारखं वेगळं असं काहीच नाही." आता महिमधला टिपिकल गाईड जागा झालेला दिसत होता.
"आम्हाला सगळंच नीट बघायचं आहे." पुढे होत संस्कृती म्हणाली.
"वाटलंच मला." मही काहीसा रुक्ष स्वरात म्हणाला. पण आपल्या आवाजातला बदल लगेच लपवत पुढे म्हणाला; "अरे वा! नक्की बघा. मला पण आवडेल सगळं नीट दाखवायला. पण सुरवात कुठून करणार?"
संस्कृतीने मागे वळून गोविंद, जस्सी आणि शेषाकडे बघितलं. ते तिघे शांत उभे होते. त्यामुळे तिनेच निर्णय घेतला आणि म्हणाली; "आपण त्या पहिल्या लेण्यापासून सुरवात करू."
"चला तर मग. आपण त्यादिशेने चालायला लागुया." मही म्हणाला आणि उजवीकडे वळून चालायला लागला.
"तिथे पोहोचेपर्यंत इथल्या एकूण इतिहासाची थोडी कल्पना द्याल का?" जस्सी फोटो काढत म्हणाला. चालताना देखील त्याच्या हाताल्या कॅमेराला क्षणभराची देखील उसंत नव्हती.
"नक्कीच. पाचव्या ते दहाव्या शतकाच्या कालखंडात निर्माण झालेल्या या लेण्यांमधलं प्रसिद्ध कैलास मंदिर हे बारा जोतिर्लिंगांपैकी एक आहे. घृष्णेश्वर मंदिर म्हणून ओळखलं जातं हे मंदिर. त्याची निर्मिती पहिल्या राष्ट्रकूट माहाराजांनी केली. त्याचं नाव पाहिले कृष्ण महाराज!" मही माहिती देत चालत होता. बोलताना त्याने गोविंदकडे बघितलं आणि हसला. गोविंद देखील महिकडे बघत सहज हसला. महिच्या कपाळावर हलकीशी आठी आली असावी असं त्याला वाटलं. पण त्याकडे त्याने दुर्लक्ष केलं आणि पुढे चालायला लागला. मही पुढे बोलायला लागला; "या लेण्यापैकी १० क्रमांकाच्या गुहेतील मागच्या भिंतीवर राष्ट्रकूट महाराज दंतीदुर्ग याचा शिलालेख आहे. पहिले कृष्ण महाराज हे दंतीदुर्ग महाराजांचे चुलते होते. इसवी सनाच्या ७५३ ते ७५७ या काळातील हा लेख आहे. यावरून कैलास मंदिर लेण्याची निर्मिती ही इसवी सनाच्या ७५७ ते ७८३ या काळातील असावी असा अंदाज केला जातो.
हा लेणीसमूह व्यापारी मार्गावर असल्याने तत्कालीन समाजाच्या दृष्टिपथात कायम राहिला. विविध राजघराण्यातील व्यक्ती आणि उत्साही अभ्यासू प्रवासी यांनी या लेण्यांना वेगवेगळ्या काळांमध्ये भेटी दिल्या आहेत. दहाव्या शतकात अरब प्रवासी अल-मस-उदी याने देखील इथे भेट दिली आहे. बहामनी सुलतान गंगू याने इथे आपला तळ ठोकला होता आणि ही लेणी आतून बाहेरून पूर्णपणे पाहिली. फिरिस्टा, मालेट यांसारख्या परदेशी प्रवासी अभ्यासकांनी इथे भेट दिल्या आहेत. ही लेणी काही काळ हैदराबादच्या निजामाच्या नियंत्रणात देखील होती. त्याला मात्र या लेण्यांबद्धल मुळीच आस्था नव्हती. त्याने त्याच्या एका सरदाराला इथे तळ ठोकून या लेण्यांची नासधूस करण्याचे फर्मान सोडले होते. त्या सरदाराने खूप प्रयत्न केला. असंख्य मजूर लावले होते त्याने ही लेणी फोडण्यासाठी..."
"इतकं सोपं नाही या लेण्यांना हात लावणं. लेण्यांची सुरक्षा हा अत्यंत महत्वाचा आणि मूलभूत प्रश्न दुर्लक्षित कसा असेल?" जस्सी म्हणाला. खरं तर फोटो काढण्यात गुंतला होता. त्याचं महिच्या बोलण्याकडे लक्ष होतं की नाही ते कळणं देखील अवघड होतं. इतका तो कॅमेऱ्यामध्ये गुंतला होता. त्यामुळे त्याच्या बोलण्याने सगळेच चमकले.
"खरंय! तुला काय वाटतं? निजामाच्या सरदाराला इतका प्रयत्न करूनही का नसेल फोडता आली ही लेणी?" महिने जस्सीकडे वळत विचारलं.
"कारण ज्यांनी ही लेणी बांधली असतील त्यांनी त्यांच्या सुरक्षिततेची व्यवस्था केलीच असेल न?" जस्सी म्हणाला. अजूनही त्याचा डोळा कॅमेऱ्याच्या लेन्सला लागलेला होता आणि चेहेरा कॅमेऱ्याच्या मागे लपला होता.
"हो न. तूच होतास न सगळी व्यवस्था बघायला आणि सूचना द्यायला." शेषा थट्टेच्या सुरात म्हणाला आणि परत एकदा वादाला तोंड फुटेल असं वाटून संस्कृती मध्ये पडली.
"यार आपण शांतपणे लेणी बघणार आहोत की सतत फालतू बडबड करून सगळ्यांचा वेळ वाया घालवणार आहोत?" तिच्या काहीशा रागावलेल्या आवाजाचा अंदाज येऊन जस्सी आणि शेषा गप्प बसले आणि सगळेच परत एकदा चालायला लागले.
जस्सीचा कॅमेरा फटाफट क्लीक आवाज करत फिरत होता. अचानक जस्सीला दूर काहीतरी वेगळं वाटलं. त्याने कॅमेरा डोळ्यापासून लांब केला आणि अंदाज घेतला. त्याची नजर इतरांकडे वळली. पण सगळेच पुढे चालत होते. परत एकदा कॅमेराच्या लेन्समध्ये बघत त्याने त्या जागी फोकस केलं. "च्यायला....." त्याच्या तोंडून एक कचकचीत शिवी बाहेर पडली. "ही इथे?" त्याने हलकेच स्वतःशी म्हंटलं आणि पटकन दोन तीन फोटो क्लीक केले. डोळ्यापासून कॅमेरा लांब करत त्याने परत एकदा त्या दिशेने बघितलं आणि त्याचे डोळे विस्फारले गेले.
त्याला लांब एका दिशेने नैना दिसली होती. म्हणूनच आश्चर्य वाटून त्याने पटकन फोटो काढले होते. पण कॅमेरा डोळ्यापासून लांब करून त्या दिशेने बघितल्यावर तिथे कोणीच नाही हे त्याच्या लक्षात आलं. तसा तो भाग पहिल्या लेण्यांच्या बाजूला होता. तिथे अजून कोणीच नव्हतं आणि इथून लांबून तरी लपण्यासाठी काही जागा असेल असं वाटत नव्हतं... अर्थात ती खरंच नैना असली आणि यांना बघून लेण्याच्या आत गेली असली तर अचानक गायब होण्याचा अर्थ कळला असता. फोटो काढला असूनही जस्सीला खात्री नव्हती की त्याने नैनाला बघितलं... दुसरं म्हणजे त्याला उगाच नको ते वाद आत्ता तरी निर्माण करायचे नव्हते. त्यामुळे तो काही एक न बोलता चालायला लागला.
"१९व्या शतकात भारतात ब्रिटीश राजवट असताना वेरुळ लेणी पूर्णपणे दुर्लक्षित होती. आक्रमकांमुळे किंवा काळाच्या ओघात मूर्तींचेही नुकसान झालं होतं हे खरं. ब्रिटिशांनी दुरुस्तीचे थोडेफार प्रयत्न केले; कारण या लेण्यांच्या ऐतिहासीक महत्वाची त्यांना कल्पना होती. मात्र त्यांचे ते प्रयत्न अगदीच सुरवातीच्या काळातले आणि वरकरणी होते. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर १९६०च्या दशकात या लेण्यांची काळजी घेण्याचा खरा प्रयत्न सुरू झाला. याच काळात अजिंठा-वेरूळच्या लेण्यांचा आंतरराष्ट्रीय दर्जाची पर्यटनस्थळे म्हणून प्रसार सुरू झाला आणि मग ही लेणी बघण्यासाठी प्रवाशांची रीघ लागली. आमच्या सारख्या गाईड्सच्या पोटापाण्याची सोय झाली." मही माहिती देत होता.
बोलता बोलता ते सगळे पहिल्या लेण्याजवळ पोहोचले. मही पहिल्या लेण्याच्या आत प्रवेश करत म्हणाला; "सर्वसाधारण प्रवासी या लेण्यांपर्यंत येत नाहीत कारण इथली रचना फारशी आकर्षक नाही."
"आठ खणी स्तूप रचना आहे ही. बाहेर कडाक्याची थंडी असो किंवा उन्हाळा आतलं वातावरण कायमच समतोल असतं. साहजिक आहे... वयोवृद्ध राहणार तर त्याप्रमाणे रचना असणं आवश्यक नाही का?" संस्कृती म्हणाली. ती काहीशी वेगळी उभी होती इतरांपासून आणि टक लावून बघत होती त्या गुहा सदृश खोली किंवा स्तूप जे काही होतं त्याकडे.
"चल, आत जाऊया का?" गोविंद हलकेच तिच्या खांद्याला स्पर्श करत म्हणाला. संस्कृती काहीशी दचकली आणि त्याच्या लक्षात आलं की तिची तंद्री लागली होती. "ये तू थोड्या वेळाने आत किंवा थांब इथेच. आम्ही आत जाऊन येतो." तो अगदीच समजूतदार प्रेमळ आवाजात म्हणाला आणि जस्सी, शेषाला त्याने खूण केली. मही अगोदरच आत गेला होता. गोविंद, जस्सी आणि शेषा देखील आत गेले. संस्कृतीची नजर अजूनही त्या लेण्याच्या वरच्या बाजूला लागली होती. तिची खात्री होती की तिने तिथे नैनाला बघितलं होतं. नैनाची उंची आणि तिची तीच ती केशभूषा! सगळे केस एकत्र घेऊन घट्ट बांधलेला बो आणि त्याला खाली घातलेली लांबलचक वेणी. ती नैनाच होती.... पण आता याती तिथे दिसत नव्हती. नजर खाली करत संस्कृती आत जाणार इतक्यात तिला लाहान बाळ खिदळण्याचा आवाज आला. तिने मागे वळून बघितलं तर एक तीन-चार वर्षांचा मुलगा मोठ्याने हसत एका झुडपाकडे बघत होता.
'अरे? इथपर्यंत कोणी येत नाही. इतर कोणी मोठे दिसत नाहीत; मग हा एकटा लहानगा काय करतो आहे इथे?' संस्कृतीच्या मनात आलं. तिला एकदम त्या बाळाची काळजी वाटायला लागली. अचानक तिला आतून शेषाने हाक मारली.
"संस्कृती ये न आत. बघ इथे इतकं मस्त वाटतं आहे ग." तो म्हणाला. तिने वळून शेषाकडे बघितलं आणि 'आलेच' अशी खुण करून परत समोर बघितलं तर ते लहान बाळ तिथे नव्हतं. तिच्या कपाळावर आठ्या आल्या. पण काही एक न बोलता ती आत गेली.
"ओह! मी जशी कल्पना केली होती तसंच आहे इथलं वातावरण अजूनही." आत जाताच ती म्हणाली.
"हम्म! हा मधला हॉल आहे. हे इथे बुद्ध देवांची मूर्ती कोरली आहे आणि ही पहा तारा बोधिसत्व मूर्ती. समोर चौथरा आहे तो निवांत बसून ध्यान करावं किंवा गप्पा मारण्यासाठी बसण्याची सोय आहे. या दोन्ही बाजुंनी खोल्यांसारखे खण आहेत; तिथे बौद्ध भिक्खू राहायचे." मही सांगत होता.
"ते खूप नंतर....." संस्कृती म्हणाली आणि गोविंदने तिचा हात धरून हलकेच दाबला. तसा आत अंधार होता त्यामुळे इतरांच्या ते लक्षात आलं नाही.
"बरं! इथे अजून काही बघण्यासारखं नाही. पुढच्या लेण्यात जाऊया का?" काही क्षण शांत राहून मही म्हणाला आणि इतर कोणी काही म्हणायची वाट न बघता तिथून बाहेर पडत पुढच्या लेण्याकडे वळला. जस्सी आणि शेषा देखील बाहेर पडले आणि ती संधी साधून गोविंद संस्कृतीच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला; "संस्कृती, मला देखील जाणवतं आहे की इथे काहीतरी वेगळं आहे. पण ते कदाचित तुला आणि मला... इतकंच मर्यादित आहे. त्यातल्या त्यात जस्सी आणि शेषा समजून घेतील ग आपल्याला. पण हा महिरक्षक.... उगाच काहीतरी वाटेल त्याला. त्यामुळे जे काही वेगळं वाटतं आहे किंवा दिसतं आहे; ते मनात साठव. हॉटेलवर गेल्यावर बोलू आपण." त्या अर्धवट उजेड असलेल्या स्तूप सदृश खोलीमध्ये देखील संस्कृतीला गोविंदचे प्रेमाने ओथंबलेले डोळे समजले. मंद हसत तिने मानेनेच 'हो' म्हंटलं आणि ते दोघे तिथून बाहेर पडले.
"ही दुसरी आणि तिसरी लेणी. अगदी पहिल्या लेण्याप्रमाणेच आहे रचना यांची. आतून बघणार का हे पण?" मही दुसऱ्या लेण्याच्या बाहेर उभं राहून म्हणाला.
"नको.... आपण पुढे जाऊ चला." गोविंद म्हणाला.
"पण मला आत जाऊन बघायचं आहे काही वाट लागली आहे का आतून." जस्सी म्हणाला.
"मग तू आत जाऊन बघून ये आणि पुढे येऊन आम्हाला भेट. गोविंदजी म्हणाले ना पुढे जायचं... मग झालं तर." मही म्हणाला आणि पुढे चालायला लागला.
यावर शेषा काहीतरी बोलणार होता पण जस्सीने त्याला थांबवलं आणि 'चल पुढे जाऊ;' अशी खुण केली. सगळेच शांतपणे पुढे निघाले. गोविंदच्या मागे दोन-तीन पावलांचं अंतर ठेऊन शेषा चालत होता. त्याची नजर सगळीकडे फिरत होती. अचानक त्याला मागून कोणीतरी चालत येत असल्याचा भास झाला आणि थांबून तो मागे वळला. त्याच्या समोर नैना उभी होती.
उंच बांधलेली लांबलचक वेणी, काळे कपडे, डोळ्यांमध्ये असलेल्या काजळामुळे तिचे मूळचे तीक्ष्ण डोळे शेषाच्या काळजाचा वेध घेत होते. मुळात उंच असलेली नैना आत्ता मूळ उंचीपेक्षा देखील खूप जास्त उंच वाटत होती. शेषाची नजर नैनाच्या नजरेत गुंतली होती आणि त्याचं स्थळ काळाचं भान हरपलं होतं.
क्रमशः
No comments:
Post a Comment