सिझोफ्रेनिया..... आजार की परसेप्शन!(?)
भाग 2
ठरल्याप्रमाणे गिता लंचच्या वेळी बाहेर पडली. दुपारी क्लिनिक बंद असायचं. परंतु विक्रम तिथे बसून सगळे रिपोर्ट्स टाईप करायचा. म्हणून मग गीता रोजच एकटी निघायची. त्यामुळे विक्रमला काही त्यात वेगळ नाही वाटलं.
ठरल्याप्रमाणे गिता डॉक्टर खरातांना भेटली. त्यांच्याबरोबर अजून एक गृहस्थ होते. हॉटेलमध्ये बसल्यावर डॉक्टरांनी त्यांची ओळख गिताला करून दिली. ते विक्रमचे वडील होते. त्यांना डॉक्टरांनी बोलावलेलं पाहून गिताला खूप आश्चर्य वाटलं. डॉक्टर म्हणाले;"गिता, हे विक्रमचे वडील. सुहास राजे! तुझ्या बोलण्यात असा उल्लेख होता की वडील बोलवायला येईपर्यंत विक्रम गच्चीत मित्रांबरोबर बसला होता. बरोबर? तू ते सांगितलंस तेव्हाच माझ्या मनात आलं की असं काही जर विक्रम म्हणाला असेल तर त्याच्या वडिलांनी मला कसं काहीच कळवलं नाही? म्हणून मग मी त्यांना फोन करून इथे बोलावून घेतलं. एकतर आपलं बोलणं त्यांच्या समोर झालेलं बरं म्हणजे त्यांना ही जर काही सांगायचं असेल तर ते सांगतील आणि मुख्य म्हणजे विक्रमच्या वागण्यात काही बदल झालेच असतील आणि त्यांना ते कळले नसतील तर आता ते निट लक्ष ठेऊ शकतील.
तर मी तुला सांगितलं की विक्रमची केस माझ्याकडे कशी आली आणि तोवरचे त्याच्याबाबातीतले अनुभव ते देखील मी तुला सांगितले. विक्रम त्यावेळेस खूपच लहान होता. त्यामुळे त्याला कोणता मानसिक आजार आहे हे सांगूनही त्याला समजले नसते. आणि जर ही गोष्ट बाहेर पडली असती तर त्याच्या एकूणच आयुष्यावर यासर्वाचा परिणाम झाला असता. त्यामुळे आम्ही असं ठरवलं की सुरवातीला विक्रमला त्याचे मित्र म्हणजे त्याच्या मनातली कल्पना आहे असं सांगायचं नाही. कारण त्यावेळी विक्रम त्याचे विचार त्याच्या या नसलेल्या मित्रांच्या नावाने सांगत होता."
"म्हणजे नक्की काय काका?" गीताने विचारले.
संभाषणात प्रथमच भाग घेत विक्रमचे वडील म्हणाले," मलाच ते लक्षात आलं होतं. त्याचं असं झालं; जेव्हा मी त्याला विचारलं की, तू मित्रांना घरी का नाही आणत खेळायला? तेव्हा तो म्हणाला, आजीला कदाचित माझे मित्र नाही आवडणार. कारण तिला माझी आईदेखील आवडत नाही. त्याचं उत्तर एकून मला खूप आश्चर्य वाटलं. आणि जेव्हा मी खोलात जाऊन माहिती घेतली तेव्हा माझी आई विक्रमला त्याच्या आईवरून जे बोलायची ते विक्रमने मला सांगितलं. मी त्याला विचारलं,'बेटा तू मला अगोदर का नाही सांगितलंस हे सगळं?' तेव्हा तो म्हणाला,'बाबा, आईने सांगितलं होतं की तुम्हाला त्रास होईल. म्हणून मी नाही सांगितलं आणि आजीला पण आवडलं नसतं. मग ती मला खूप रागावली असती. मला आजीची भिती वाटते. म्हणून तर तुम्ही नसताना मी घरी फार वेळ नाही थांबत. त्यामुळेच तर राजन, प्रकाश, आणि हरीशी माझी मस्त मैत्री झाली आहे.' त्याचं हे उत्तर एकून मला वाटलं की माझ्या आईमुळेच कदाचित माझ्या मुलाला असले भास होऊ लागले आहेत."
"त्यांचा हा गैरसमाज मी दूर केला." डॉक्टर खरात म्हाणाले. " हे खरं आहे की अशा पेशंट्सवर आजुबाजूच्या लहान लहान भावनिक घटनांचा परीणाम होतो. पण अशा घटनांमुळे किंवा कोणा एका व्यक्तीमुळे हा आजार होत नाही; हे सुहासजींना सांगणे खूप महत्वाचं होतं. नाहीतर त्यांच्या मते त्यांची आईच दोषी ठरली असती आणि त्यामुळे प्रश्न सुटण्या ऐवजी वाढला असता."
"खरंय डॉक्टर. मला अगोदर माझ्या आईचा खूप राग आला. परंतु तुमच्याशी बोलल्यानंतर माझ्या लक्षात आलं की ती जुन्या पिढीतली स्त्री आहे. त्यामुळे सून कायम आजारी असते हे स्वीकारणं तिच्यासाठी खूप अवघड आहे. कदाचित म्हणूनच ती कधी काही बोलली असेल. हे सर्वसाधारणपणे स्वाभाविक आहे. तिला बिचारीला हे कळलंच नसेल की तिच्या अशा वागण्याचा लहानग्या विक्रमवर चुकीचा परिणाम होत असेल. कारण तिचा तिच्या नातवावर खूप जीव होता. परंतु जेव्हा मी तिला विक्रमच्या आजाराबद्धल सांगितलं तेव्हा मात्र तिने ऐकून घ्यायची तयारी नाही दाखवली. तिच्या मते विक्रमला त्याची आई दिसत होती आणि हे नसलेले मित्रही दिसत होते; याचा अर्थ त्याला भूताने पछाडलं होतं. आणि त्यासाठी तिच्याप्रमाणे मी देखील कसलेसे तंत्र-मंत्र करावेत असं तिचं म्हणणं होतं. ते ऐकल्यावर मात्र मला कठोर निर्णय घ्यावा लागला. मी आमचं मोठं घर विकलं आणि दुसऱ्या ठिकाणी एकाच इमारतीमध्ये पण वर-खाली अशी दोन लहान घरं घेतली. आता माझी आई आमच्या वरच्याच मजल्यावर राहाते. तिच्या वयामुळे आता तिच्या सोबतीसाठी एक मुलगी देखील मी ठेवली आहे. हा बदल विक्रमच्या आयुष्याच्या दृष्टीने खूप महत्वाचा ठरला. पण मग विक्रमला शाळेव्यतिरिक्त कुठे ठेवायचं हा प्रश्न उभा राहिला. त्याला सर्वसाधारण पाळणाघरात ठेवणं शक्य नव्हतं. कारण त्याचा आजार एका वेगळ्या दृष्टीने बघितला गेला असता. म्हणून मग मी माझी ऑफिसची जागा देखील विकली आणि माझं काम मी घरातूनच करायला लागलो."
"हे सगळे बदल सुहासजींनी माझ्याशी बोलूनच केले होते. विक्रम अजून बराच लहान होता. त्यामुळे जागा बदलल्यामुळे तो कदाचित लवकर सुधारला असता. मुख्य म्हणजे त्याचे मित्र मागेच जुन्या घराजवळ राहिले आहेत आणि आता त्याने नवीन मित्र करावेत हे त्याच्या मनावर बिंबवणे सोपे झाले असते."
"पण मग विक्रमने हा बदल सहज स्वीकारला का?"गीताने विचारले.
"नाही गिता. तुझा अंदाज बरोबर आहे. मुळात घर बदलण्यासाठी विक्रम तयार नव्हता. पण मग त्याच्या वडिलांनी त्याला समजावलं; आणि सांगितलं की नवीन जागी नवीन मित्र मिळतील तेव्हा तो अनिच्छेने का होईना पण तयार झाला." डॉक्टर म्हणाले.
"आम्ही नवीन जागी राहायला आलो. मी त्याची शाळादेखील बदलली. असे अनेक बदल अचानक झाले होते त्याच्या आयुष्यात. पण सुरवातीचे दोन दिवस सोडले तर मग त्याने फारसा त्रास नाही दिला हे बदल स्वीकारताना. तो नवीन घरात आणि नवीन शाळेत छान रमला. मात्र या नव्या इमारतीमधल्या मुलांशी त्याने मैत्री नाही केली. तसा तो आपल्यातच मग्न असायचा. अधून मधून खाली जायचा. बराचवेळ. पण डॉक्टर म्हणाले होते त्याला फार प्रश्न विचारू नका. किंवा त्याच्यावर लक्ष ठेवता आहात असं त्याला कळू देऊ नका. विक्रम मोठा होत होता....
त्याचं दहावीचं वर्ष होतं. त्यामुळे शाळा, क्लासेस आणि अभ्यास यात तो खूपच अडकला. त्याने परत कधी त्याच्या मित्रांचा उल्लेख नाही केला आणि त्याची आईदेखील देवाघरी गेली आहे हे स्वीकारलं त्याने. खूप शहाण्यासारखा वागायचा तो. खरं तर म्हणूनच मग मला ते थोडं विचित्र वाटायला लागलं. दहावीचा निकाल लागला. तो उत्तम गुणांनी पास झाला आणि जवळच्या एका चांगल्या कॉलेजमध्ये मी त्याचा दाखला करून घेतला. सगळ सुरळीत होतं. एक दिवस तो घरी आला ते खूप खुश होऊन. मी त्याला कारण विचारलं तेव्हा तो म्हणाला की राजन, प्रकाश आणि हरीसुद्धा त्याच्याच कॉलेजमध्ये आहेत. आता जुन्या मित्रांबरोबर जास्त वेळ राहता येणार म्हणून तो खुश आहे. त्याच्या 'जास्त वेळ' या शब्दांचा मला संशय आला. पण त्याक्षणी मी काहीच बोललो नाही. मात्र रात्री जेवताना त्याच्या कलाने घेत प्रश्न विचारले आणि माझ्या लक्षात आलं की मला वाटत होतं की माझा विकी बरा झाला आहे, परंतु तो जे कधी कधी बाहेर जायचा संध्याकाळी ते त्याचे जुने मित्र त्याला भेटायला यायचे म्हणून. मग मी त्याला विचारलं की आता तर आजीदेखील नाही आपल्याकडे. मग तू त्यांना घरी का नाही आणलंस कधी. त्यावर त्याचं उत्तर मलाच निरुत्तर करून गेलं... तो म्हणाला बाबा खरं सांगा तुमचा विश्वास आहे का की माझे हे मित्र घरी आले तर तुम्ही त्यांच्याशी नीट बोलू शकाल? मुळात त्याचे असे कोणी मित्र नव्हतेच. तर मग मी काय उत्तर देणार होतो त्याला."
"त्यांच्यातल्या या संभाषणा नंतर सुहासजी मला येऊन भेटले. याचा अर्थ विक्रम त्याच्या विचारांमधून बाहेर पडला नव्हता हेच खरं होतं. म्हणून मग मी सुहासजींना सांगितलं की आता विक्रम एवढा मोठा आहे की त्याला त्याच्या आजाराची कल्पना आपण दिली पाहिजे. त्यांना देखील हे पटले. मी विक्रमला भेटायला सुरवात केली. तुला तर माहीतच आहे आपला सायकॉलॉजिच्या दृष्टिकोनातून भेटी कशा असतात! अगोदर त्याचं सगळं ऐकून घेतलं आणि मग त्याच्या कलाने घेत त्याला सत्य सांगत गेलो. सुरवातीला विक्रमला काही पटायचं नाही. तो माझ्याकडे यायला देखील तयार नसायचा. पण मग हळू हळू त्याने सत्य स्वीकारायला सुरवात केली. हे मी आत्ता सांगताना सोपं वाटत असलं तरी यासगळ्याला बराच कालावधी लागला. तो त्याच्या वयाच्या इतर मुलांप्रमाणे सामान्य वागायला लागला तोवर तो पदवीधर देखील झाला होता. गिता तुला अंदाज आहेच, असे पेशंट्स मनाने खूप कमकुवत....हळवे म्हणू हवे तर.... असे असतात. त्याला पुढे शिकायचं होतं. त्याच्या वडिलांनी आणि मी देखील त्याच्या या निर्णयाला प्रोत्साहन दिलं. पण आता तो अशा वयात होता की त्याच्यावर सतत लक्ष ठेवलेलं त्याला आवडलं नसतं आणि अजूनही तो पूर्ण बरा झाला आहे की नाही याची खात्री करण्यासाठी त्याच्यावर लक्ष असणं आवश्यक होतं. म्हणून मग मीच त्याला म्हंटलं की तू माझ्याकडे कामाला यायला लाग. दुपारी क्लिनिक बंद असेल तेव्हा अभ्यास करत जा. बाकी माझं काम बघशील. त्यामुळे तुला स्वतःसाठी थोडं फार कमावता पण येईल आणि अभ्यास देखील होईल. त्याने देखील थोडा विचार करून ते मान्य केलं. त्याला माझी सवय झाली होती आणि तोच म्हणायचा की त्याला इथे सुरक्षित वाटतं. म्हणून मग सुहासजींनी देखील त्याने माझ्याकडे कामाला येण्याला हरकत घेतली नाही." डॉक्टरांनी सुहासजी सांगत होते त्यापुढची माहिती गिताला दिली.
हे सगळं ऐकून गीताने विचारलं,"काका, जर त्याने एकूणच स्वीकारलं होतं की त्याचे राजन, प्रकाश आणि हरी नावाचे मित्रच नाहीत; तर मग हे अचानक त्याने माझ्याकडे त्यांचा उल्लेख का केला? सुहास काका, तो मला म्हणाला होता की काल तो आणि त्याचे मित्र गच्चीत होते आणि तुम्ही आलात म्हणून त्याचे मित्र पळाले आणि विकी तुमच्याबरोबर घरी आला. काल नक्की काय झालं होतं?"
"गिता हे खरं आहे की विकी कुठे आहे आणि इतका वेळ का लावतो आहे हे बघण्यासाठी मी गच्चीत गेलो. विकी टाकीवर बसून कुठलंस गाणं गुणगुणत होता. मी हाक मारली तसं त्याने माझ्याकडे वळून बघितलं आणि आलो म्हणून लगेच खाली उतरून आला आणि माझ्याबरोबर घरी आला. अग, मला कल्पनाच नव्हती की त्याला परत त्याचे ते मित्र दिसायला लागले आहेत, नाहीतर मी त्याला तिथेच छेडलं असतं." विक्रमचे वडील म्हणाले.
"बर मग आता पुढे काय काका?" गीताने डॉक्टर खरातांना प्रश्न केला.
"पुढे असं गिता, की तू त्याच्याशी बोलत रहायचं. कारण त्याचा तुझ्यावर विश्वास बसला आहे. त्याच्या मित्रांना तू आवडली नाही आहेस असं त्याचं म्हणणं आहे. पण तरीही तो तुझ्याशी बोलतो आहे याचा अर्थ तो हळूहळू तुला सगळं सांगणार. मी त्याची औषध चालू करतो. सुहासजी आपण त्याची औषध चालू करोत आहोत हे मात्र त्याचा संशय आल्यामुळे नाही; हे त्याला सामजावावं लागेल. ते मी बघतो." डॉक्टर खरात विचार करून म्हणाले.
"डॉक्टर साहेब, का हो असं होतं आहे माझ्याच मुलाबरोबर?" सुहासजींच्या डोळ्यात पाणी आलं. "आता माझी शक्ती संपत आली आहे हो. जरा बरा झाला आहे असं म्हणेपर्यंत परत हा त्या कुठल्याश्या नसलेल्या मित्रांचा उल्लेख करतो आणि मी हताश होऊन जातो. त्याला कधीच सर्वसामान्य आयुष्य जगता नाही येणार का हो?" सुहासजी खूपच दुःखी झाले होते. त्यांना गिता खूप आवडली होती. अशी आपली सून असती तर; असा विचार मनात येऊन ते जास्त कष्टी झाले होते. कारण असं कधीच होणार नाही याची त्यांच्या मनाला कल्पना होती.
डॉक्टर खरातांनी त्यांच्या खांद्यावर थोपटलं. पण ते काहीच बोलले नाहीत. डॉक्टर खरातांना विक्रमच्या वडिलांना खोटी आशा दाखवायची नव्हती आणि विक्रमचे वडील त्याक्षणी तरी खरं ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते.
पूर्वी गीताचा विक्रमकडे बघण्याचा दृष्टीकोन वेगळा होता. तिला तो मनापासून आवडायला लागला होता. पण आता मात्र मनाच्या एका कोपऱ्यात तो एक पेशंट आहे हा विचार कायम जागा राहायला लागला.
गीतामधली सायकोलॉजीस्ट तिला कायम आठवण करून द्यायची की विक्रम आजारी आहे. त्यामुळे आता ती त्याच्याशी बोलताना कायम सतर्क राहायला लागली. पण तिचं तरुण मन विक्रमकडे सारखं ओढ घेत होतं. त्यामुळे तिची मनापासून इच्छा होती की तो पूर्ण बरा व्हावा.
त्याच दिवशी रात्रीच्या जेवणाच्यावेळी तिने तिच्या आई-वडिलांकडे विक्रमचा विषय काढला. तिने त्याअगोदर जेव्हा विक्रमच्या मित्रांना ती आवडत नाही हे तिच्या आई-वडिलांना सांगितलं होतं तेव्हा त्यांनी तो विषय थोडा थट्टेवारी नेला होता. कारण साहजिक होतं. गिता आता लग्नाच्या वयाची झाली होती. त्यामुळे चांगल्या घरच्या सुशिक्षित मुलासोबत गीताची मैत्री होत असेल तर त्यात तिच्या आई-वडिलांना काही वावग वाटत नव्हतं.
परंतु जेव्हा गीताने विक्रमचा एकूण आजार आणि त्याचं वागणं सांगितलं तेव्हा मात्र तिच्या आईचा पवित्रा बदलला. गीताने विक्रममध्ये जास्त इंटरेस्ट दाखवू नये अस त्यांना ठामपणे वाटायला लागलं. मोकळ्या स्वभावाची आपली आई असा विचार करेल असं गिताला कधीच वाटलं नव्हतं. तिने तिचं मन मोकळं केलं होतं तिच्या आई-वडिलांकडे.
"आई असं काय करतेस? अग त्याच्यात इंटरेस्ट घेऊ नको म्हणजे नक्की काय करू? तो मला रोज भेटतो आणि भेटणार आहे. मी काही त्याला अजून I love you म्हंटलेलं नाही किंवा त्यानेही असं काही म्हंटलेलं नाही. पण मला तो आवडतो हे सत्य मी किती दिवस डोळ्याआड करू? त्याच्याशी बोलताना तो पेशंट आहे हे कायम कसं मनात राहील? बरं! एक त्याचे ते नसलेले मित्र हा विषय सोडला ना तर एरवी तो खूप नॉर्मल असतो ग. अग, त्याने डॉक्टर काकांना किंवा त्याच्या वडिलांना नाही सांगितलं कधी. पण तो कविता करतो ग. आणि खूप भावूक असतात त्याच्या कविता. त्याने ते फक्त मलाच सांगितलं आहे." गिता म्हणाली.
प्रथमच एकूण संभाषणात भाग घेत तिच्या वडिलांनी तिला विचारलं;"गिता फक्त तुलाच सांगितलं आहे? नक्की?"
"हो बाबा! मी का खोटं बोलेन?" गिता वडिलांच्या प्रश्नाने दुखावून म्हणाली.
"गिता, बेटा तू खोटं बोलशील म्हणून नाही विचारलं. बरं, मला सांग तो नक्की काय म्हणाला?" तिचे बाबा तिच्या जवळ जाऊन खांद्यावर थोपटत म्हणाले.
गिता म्हणाली;"बाबा, त्याने एकदा गप्पांच्या ओघात मला सांगितलं की मी कविता करतो. मला खूप आश्चर्य वाटलं. मी म्हणाले खरंच? मग एखादी वाचून दाखव बघू. तर लगेच त्याने एक कविता वाचून दाखवली. मन या विषयावर होती ती कविता. खूप सुंदर होती हो! मी विचारलं कविता कधी पासून करतोस? तो म्हणाला अग खूप दिवस झाले... दिवस नाही वर्ष. मी करतो कधी कधी कविता. पण कधी बाबांना नाही सांगितलं. मी विचारलं, म्हणजे तुझी कविता ऐकणारी मीच पहिली ना? त्यावर तो हसून म्हणाला; हो तूच पहिली मुलगी. तस राजन, प्रकाश आणि हरीला माहित आहे. पण ते फक्त ऐकून घेतात. तुझ्यासारखे त्यांचे डोळे चमकत नाहीत माझी कविता ऐकताना. मला एकदम लाजल्यासारखं झालं बाबा. किती हळुवार आहे हो तो. प्रेमसुद्धा कसं हळुवार व्यक्त करतो." गिता सांगताना हरवून गेली होती.
तिच्या वडिलांनी एकदा आईकडे बघितलं आणि 'मी बघतो' अशी डोळ्यानीच खुण केली. ते गीताच्या जवळ बसले आणि म्हणाले;"गिता, अग तू त्याच्या कवितेत आणि त्याच्या हळूवारपणात इतकी अडकलीस की त्यामुळे तुला हे लक्षातच आलं नाही विक्रम बोलता-बोलता म्हणाला,'त्याच्या त्या तीन मित्रांनी देखील कविता ऐकल्या आहेत. तू पहिली मुलगी आहेस.' गिता याचा अर्थ असा आहे की त्याने खरातची आणि त्याच्या वडिलांची कायम दिशा भूल केली आहे. तो कधीच बरा झालेला नाही. गिता, तुला भले तो आवडत असेल, पण तू हे कधीच विसरून चालणार नाही की तो एक पेशंट आहे. अग त्या एका वाक्यातून त्याने तुला खूप काही सांगितलं. त्याचे ते फक्त त्यालाच दिसणारे तीन मित्र त्याच्याबरोबर कायम आहेत. अगदी त्यांनी घर बदललं तरी आणि तो कॉलेजला गेला तरी... किंबहुना त्यानंतरही; अगदी आजपर्यंत! फक्त त्याने त्यांचा उल्लेख सर्वांसमोर करणं सोडून दिलं होतं. कारण त्याचं असं मत झालं असणार की खरात किंवा त्याचे वडील त्याच्या या मित्र असण्यावर विश्वास ठेवणार नाहीत. पण तुझ्याबाबतीत थोडं वेगळं घडलं आहे. गिता, त्याच्या मते तुला त्याच्या आजाराची माहिती नाही. अजून तू त्याच्या त्या मित्रांवर अविश्वास व्यक्त नाही केला आहेस. महत्वाची गोष्ट म्हणजे त्याला तू आवडायला लागली आहेस. तू म्हणतेस की अजून त्याने स्पष्ट शब्दात तुला असं म्हंटलं नाही. पण कधीतरी भावूक झालाकी तो त्याच्या भावना मोघमपणे तुला सांगतो. हो ना? गिता, सर्वात महत्वाचं म्हणजे अजून तू त्याच्याकडे त्या मित्रांना भेटण्याची इच्छा व्यक्त नाही केली आहेस. त्यामुळे त्याने स्वतःभोवती निर्माण केलेलं सुरक्षा कवच अजून अबाधित आहे.
बेटा, तुला तो आवडतो आहे आणि त्याला तू कदाचित मैत्रिण किंवा प्रेयसी किंवा अगदी सहचारिणी म्हणूनही हवी असशील. कदाचित् तुलाही त्याच्याबद्दल अशाच काहीशा भावना असतील. पण तू हे विसरून कसं चालेल की तो पहिल्यांदा एक पेशंट आहे आणि तू एक सायकालोजीस्ट."
गीताने एकदा वडिलांकडे बघितलं. तिला त्यांचं म्हणणं पटत होत ही आणि नव्हतं ही. तिने मान खाली घातली. तिच्या मनात विचार आला,'खरंच की. विकीच्या त्या एका वाक्यातून खूप काही अर्थ निघू शकतात. मला त्यावेळी लक्षात आलं नाही. किंबहुना आत्ता बाबांनी सांगेपर्यंत हा मुद्दासुद्धा असू शकतो हे मनात आलं नाही. खरंच का मी इतकी त्याच्या प्रेमात अडकायला लागले आहे?'
क्रमशः
Waiting.
ReplyDeleteNext Friday for sure
Deleteछान। dhananjay gangal
ReplyDelete