Friday, August 27, 2021

एका भितीची गोष्ट (भाग 1)

 एका भितीची गोष्ट


भाग 1


भाग 1


"आई शप्पथ सांगतो त्या झाडावर काहीतरी होत." दिघ्या थरथर कापत म्हणाला. 


" झाल... सुरु झाले याचे भास आणि आभास. दिघ्या साल्या चढली बहुतेक तुला. काहीतरी नाही कोणीतरी म्हण."जेटली हसत म्हणाला.


"म्हणजे?" डोळे विस्फारून दिघ्याने जेटलीकडे बघितले.


"हा हा हा! म्हणजे साल्या तुला हडळ दिसली असेल तिथे त्या झाडावर. अशक्य घाबरट आहेस तू. गपचूप पेग भर आणि तोंडाला लाव. आपण इथे इतक्या बाजूच्या व्हिलामध्ये आलो कारण कोणी डिस्टर्ब करायला नको. आणि नशिबाने खरच कोणी नाही इथे आजूबाजूला. तर तुला काहीतरी आणि कोणीतरी दिसतं आहे." जेटली वैतागत म्हणाला.


जेटलीच्या  पहिल्याच वाक्याने दिघे कमालीचा दचकला होता. पण ते जेटलीच्या लक्षात आल नाही. "जेटली... खरच रे! तू एकदा मागे वळून त्या झाडाकडे बघ तरी. हलतं आहे कधीचं काहीतरी त्या झाडावर." दिघ्या विनवणीच्या स्वरात म्हणाला.


"तो इतकं म्हणतो आहे तर बघ की रे जेटली." शांतपणे आपल्या ग्लासातल्या बर्फाच्या तुकड्याकडे बघत काणे म्हणाला.


"भडव्या तू बघ न. तू मात्र तुझ्या ग्लासातल्या बर्फाकडे बघतो आहेस ना?" जेटली काणेला टोचत म्हणाला. 


"अरे मी दिघ्याच्या वटवटीने डोक फिरू नये म्हणून बर्फाकडे बघत डोक शांत करतो आहे." काणेने दिघ्याला टोमणा मारला आणि जेटली आणि काणे मोठ्याने हसायला लागले.


"करा...... माझी चेष्टा करा. पण मग तुमची अवस्था माझ्या जुन्या मालकांसारखी.....नारायण रावांसारखी....झाली तर माझी जवाबदारी नाही." दिघ्या त्या झाडाकडे बघत जेटली आणि काणेला म्हणाला.


"त्यांची आणि आमची अवस्था सारखी कशी होईल? ते चार पेग नंतरही तुझी बकवास ऐकायला शुद्धीवर राहू शकतात का?" काणे बर्फावारची नजर उचलून थंडपणे दिघ्याला म्हणाला.


"राहीलं! तुम्ही दोघ संपवा तुमचा चौथा पेग. मग मी पुढचा भरतो. फक्त पीत राहूया हा आपण." दिघ्या चिडून म्हणाला. पण अजूनही त्याची नजर बाहेरच्या झाडावरून हलत नव्हती.


"दिघ्या........... भेनच्यो......"जेटलीने सुरवात केली.


"जेटली... शिव्या आवर. मी माणसांना नाही घाबरत समजल. तुझ्या शिव्याना मीसुद्धा शिव्यांनीच उत्तर देऊ शकतो हे लक्षात ठेव. साल्या तू एसी वाल्या थंडगार खोलीत बसून कागदावर जे काम ठरवतोस ना ते मी कामगारांबरोबर  फ्लोरवर उभा राहून करून घेतो. त्यामुळे असली भाषा तू क्वचित बोलत असशील. माझी रोजचीच आहे." दिघ्या आता पेटला होता.


एकूण प्रकरण तापतं आहे हे लक्षात येऊन जेटली काही म्हणायच्या आत काणेने विषय बदलला. "दिघ्या आजकाल तू सारखा चिडायला लागला आहेस. चल सोड ते! बर, सांग बघू कोण ते तुझे नारायणराव? काय झालं त्याचं? बाकी आपण असे बाहेर पडलो की एखादी इंटरेस्टिंग स्टोरी असलीच पाहिजे न. पण आज आपण असली सोय केलेली नाही. तेव्हा दिघ्याच्या नारायाणरावांच्या गोष्टीवर आज तहान भागावूया."


"ओके. मान्य. सॉरी दिघे साहेब. कृपया आपण माझे बोलणे मनावर न घेता आपली स्टोरी सांगाल का?" नाटकी अविर्भावात  जेटली म्हणाला. जेटलीच्या माघार घेण्याने वातारणातला तणाव थोडा कमी झाला; आणि  त्याला जरा जास्तच चढली आहे हे काणे आणि दिघे दोघांच्याही लक्षात आले. नाहीतर जेटली इतका सहज सॉरी म्हणालाच नसता. त्यामुळे त्याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करून आणि अधूनमधून खिडकी बाहेरच्या झाडाकडे बघत दिघ्याने नारायणरावाची गोष्ट सांगायला सुरवात केली.


"मी पूर्वी जिथे नोकरी करत होतो ती नोकरी आणि गाव मी जरी सोडून आलो असलो तरी तिथल्या मालकाचा माझ्यावार खूप विश्वास होता." दिघ्या बोलायला लागला. पण अजूनही जेटलीची दिघेचा पाय खेचायची खुमखुमी गेली नव्हती. त्याने दिघेच वाक्य तोडलं आणि म्हणाला,"हो... हो... तर! इतका विश्वास होता की त्याला वेड लागणार आहे हे जेव्हा त्याच्या लक्षात आलं, तेव्हा  त्याने तुला मुद्दाम बोलावून नोकरी सोडायला सांगितलं. आणि फक्त नोकरीच नाही तर ते गाव सुद्धा. हो ना?"


काणेला वाटल आता परत दिघ्या उखडणार आणि दोघांची जुंपणार. कारण जरी दिघ्याने पहिला जॉब आणि ते गावही सोडला होतं; तरी त्याने त्याचं कारण कधी सांगितल नव्हतं. कायम एकच म्हणायचा की मालकाने सांगितल जायला म्हणून सोडलं.  पण त्याच्या त्या जुन्या मालकाबद्दल मात्र तो खूप आदराने बोलायचा. खर तर त्याच्यामुळेच कमी शिकलेला दिघ्या काणे आणि जेटली असलेल्या मल्टी नाशन्ल कंपनीमध्ये चांगल्या नोकरीला लागला होता. अर्थात जेटली जे म्हणत होता त्यात देखील सत्य होतं. कारण दिघेचा पूर्वीचा मालक वेड लागून मेला होता. त्यावेळी ते प्रकरण वर्तमानपत्रातून खूप गजलं होत. स्वतःच्या कारखान्याला आणि बंगल्याला आग लावून मालकाने गळफास लावून आत्महत्या करून घेतली होती.


जेटलीच्या कॉमेंटमुळे दिघ्या भडकेल अस वाटून त्याला शांत करायला काणे काहीतरी बोलणार होता; पण त्याअगोदार दिघे जेटलीकडे बघत शांतपणे म्हणाला,"हो जेटली. वेड लागणार हे त्यांना माहित होत म्हणूनच त्यांनी मला ते गाव आणि नोकरी सोडून जायला सांगितलं. कारण मी जर तिथेच राहिलो असतो तर त्यांच्याप्रमाणे मलादेखील वेड लागल असतं.... विचार करून करून."


आता मात्र जेटली आणि काणे चक्रावले. "दिघ्या ... साल्या.... वातावरण निर्मिती करतो आहेस की काय??" काणेने दिघेला विचारले.


"नाही... खरी घटना सांगतो आहे. मला माहित आहे तुमचा विश्वास बसणार नाही. पण तरीही... आज मला जेटलीला पटवून द्यायचं आहे की मला भास होत नाहीत. मी जे दिसत तेच सांगत असतो. तर....


मी बीड जिल्ह्यातल्या एका आड गावात नोकरीला होतो. मी काही फारसा शिकलेलो नाही. त्यामुळे मी कधीच मोठ्या शहराची, मोठ्या कंपनीतल्या मोठ्या पगाराची स्वप्न बघितली नाहीत. वडील लहानपणीच गेले होते. त्यामुळे आई बरोबर कष्ट करून जितकं शिकता आल तितकं शिकलो आणि ती गेल्यावर गाव सोडून जिथे नोकरी मिळेल तिथे रहायचं अस ठरवून निघालो. बीडमध्ये नोकरी शोधताना मला कळल की जवळच्या एका गावात एक छोटासा लाकडाचा कारखाना आहे आणि तिथे मला नोकरी मिळू शकते. त्यामुळे मग मी फारसा विचार न करता तिथे गेलो आणि त्या कारखान्याच्या मालकांना जाऊन भेटलो. 


त्यांनीही मला फार काही प्रश्न विचारले नाहीत. मी सडा फटिंग होतो त्यामुळे वेळेचं बंधन मला नव्हत हा त्यांच्या दृष्टीने मोठाच प्लस पॉईंट होता. त्यात तरुण होतो आणि मुख्य म्हणजे गरजू होतो. त्यांनी मला त्यांच्या कारखान्यात ठेवून घेतलं. जंगलातली लाकडे आणून घेणे आणि ती कापून विकणे असा तो एकूण व्यवसाय होता. सुरवातीला मी फक्त येणाऱ्या ट्रक्स मधून आलेले लाकूड वजन करून उतरवून घेण्याचे काम करत होतो. पण त्या आड गावात जवाबदारीने काम करणारं कोणीच नव्हत. बिनडोकपणे काम करणारे अनेक कामगार मिळायचे. पण ते रोजंदारीवर. आज येतील तर उद्या नाही. हातात पैसे पडले की दारू पिणे एवढच आयुष्य असणारे लोकं होते तिथे. म्हणून मग मीच आपणहून एक एक काम अंगावर घ्यायला सुरवात केली. लाकडं नीट उतरवून घेतली जातात की नाही; कापण्यासाठी मशीनवर किती घेतली आहेत; नको असणारी फळकुटं कारखाना बंद होण्याअगोदर निट लॉक केली आहेत ना... सगळच बघायला लागलो. 


मी मुद्दाम केवळ साहेबांचा विश्वास मिळवायला असं काही करत नव्हतो; आणि मी असं काही मनात ठेवून काम करतो आहे अस म्हणण्यासाठी कोणी नव्हतच. कामगार सोडले तर एकूण कायमचा स्टाफ असा कमीच. एक स्टेनो. तीसुद्धा बोलावल्यावर यायची. कारण रोज काही काम नसायचं. तीच अकौंटस बघायची. दुसरा म्हणजे ऑफिसमध्ये असणारा जीवा.  त्याला ऐकू कमी यायचं. तो सकाळी नऊ म्हणजे नऊला हजार व्हायचा आणि साहेबांचा दुपारचा चहा तीन वाजता झाला की निघून जायचा. 


मी नोकरीला लागलो आणि हळू हळू माझ्या कामात रमून गेलो. गावात मी कोणाला ओळखत नाही हे माहीत असल्याने मला साहेबांनी राहण्यासाठी त्यांच्या आउट हाउसमध्ये जागा दिली होती. एका माणसाच्या मानाने भरपूर जागा होती. लहानस स्वयंपाक घर आणि एक खोली. मी खुप खुश होतो माझ्या आयुष्यावर. फार काही स्वप्न नव्हतीच. लाकडं भरलेले ट्रक्स रात्रीचा प्रवास करून पहाटेच यायचे. ट्रक ड्रायव्हर्सना लाकडं उतरवून लगेच जायचं असायचं. त्यामुळे मी सकाळी पाच-सहा जशी गरज पडेल तसा कारखान्यावर जायचो. लाकडं मोजून उतरवून घ्यायचो आणि परत येऊन झोपायचो. मग थोडं उशिरा म्हणजे दहापर्यंत परत जाऊन कामगारांना एकत्र करायचो आणि  मशीनवर कोणती आणि किती लाकडं लावायची त्याची यादी द्यायचो. सगळ काम दुपारपर्यंत आटपून जायचं. तीन-चार नंतर तर काहीच काम नसायचं. जीवा गेला की थोड्या वेळाने मी देखील निघायचो. आठ-दहा दिवसातून एकदा लाकडं असलेल्या ऑर्डर प्रमाणे रवाना करायची असायची. मालक फक्त त्यात लक्ष घालायचे. एकूण मस्त चाललं होतं माझं. खुश होतो मी माझ्या कामावर. 


लहानसं आड बाजुच गाव असल्याने फार काही करण्यासारखं नसायचं. म्हणून मग कामावरून परतून आणि अंघोळ करून रोज संध्याकाळी मी गावातल्या देवळात जायला लागलो. त्यामुळे हळू हळू ओळखी देखील व्हायला लागल्या. लोक मला आडून आडून माझ्या मालकाबद्दल विचारायचे. कसा आहे माणूस; गावात कोणाशी बोलत नाही तर तुमच्याशी तरी बोलतो का? एकदा मात्र एका गावकऱ्याने विचारले,"का हो तुम्ही बंगल्याच्या आवारातील जागेत राहाता ना? मग तुम्ही तुमच्या मालकांच्या पत्नीला बघितल आहे का...?" मी या प्रश्नाने गोंधळून गेलो. मुळात मालकांचं लग्न झालं आहे किंवा नाही ते मला माहित नव्हतं. आणि झालंच असलं तरी त्यांच्या पत्नीला मी कसा आणि का बघेन? असा मलाच प्रश्न पडला. पण यावर काही चर्चा सुरु होण्याअगोदरच मंदिराचे पूजारीबुवा प्रसाद घेऊन आमच्यात येऊन बसले आणि कसा कोण जाणे पण तो विषय तिथेच राहिला. अर्थात जरी त्या अगाऊ माणसाने विषय चालू ठेवला असता तरी मी काय सांगणार होतो त्यांना? मलाही फारशी माहिती नव्हतीच. मालकांनी मला नोकरी दिली होती. चांगला पगार होता. कामाच्या वेळेचं बंधन नव्हतं. रोज कटकट करणारं कोणी नव्हतं. त्यामुळे मालकांच्या वय्यक्तिक आयुष्यात लक्ष घालून मी कशाला माझ सुखाच आयुष्य दु:खात घालू?


रोज साहेब यायचे साडे नऊ दहाला. ते त्यांच्या केबिनमध्ये बसलेले असायचे. कधी फोनवर बोलत असायचे तर कधी मान खाली घालुन काही-बाही लिहीत असायचे. दुपारचा चहा झाला की जायचे. तेच ऑर्डर्स मिळवायचे आणि फोन करून स्टेनोला बोलावून सगळी पत्र करून घ्यायचे. बास! त्यांचं प्रत्येकाच्या कामावर बारीक लक्ष असायचं. पण फार कोणाशी बोलायचे नाहीत. सुरवातीला मशीनवर काम चालू असताना फेऱ्या मारायचे. पण मग बहुतेक त्यांचा माझ्यावर विश्वास बसला. कारण त्यांनी हळुहळू कारखान्यात खाली मशीनकडे येण कमी करत बंदच केल. मला ऑफिसमध्ये बोलावून सगळी माहिती घ्यायचे... याहून जास्त तर मलाही साहेबांबद्दल काही माहित नव्हत.


मी रोज संध्याकाळी देवळात जायचो. गावातले सगळेच तिथे रोज असायचे असं नाही. पण देऊळ असल्याने पूजारीबुवा मात्र असायचेच. त्यामुळे देवळातल्या पुजारीबुवांची चांगलीच ओळख झाली होती. त्यांनी माझी अडून आणि उघडपणे बरीच चौकशी केली आणि ते ही माझ्याचकडे. पण मी एकटाच आहे ; याव्यतिरिक्त माझ्याकडे माझ्याबद्दल सांगण्यासारखं काहीच नव्हत. कधीतरी असच गप्पा मारताना पुजारीबुवांनी त्यांच्या कुटुंबाची माहिती मला दिली. त्यांच्या दोन मुली होत्या. एकीच लग्न झालं होत म्हणे. दुसरीच लग्नाचं वय होऊन गेलं होतं पण पैशाअभावी लग्न होत नव्हतं. त्यांनी माहिती सांगितली आणि मी ऐकून घेतली.... माझ्यासाठी विषय इथेच संपला होता. पण पूजारीबुवांसाठी मात्र ती सुरवात होती.



असेच दिवस जात होते. मला त्या गावात नोकरी लागून दोन-चार महिने झाले असतील, पुजारीबुवांनी एकदा मी एकटाच असताना विषय काढला.


"अच्युतराव लग्नाचा काही विचार आहे की नाही? अहो तुमच वय होऊन  चालल न लग्नाच." पुजारीबुवा म्हणाले.


त्यांचा रोख न कळल्यामुळे मी म्हणालो,"बुवा, कोण देणार मला मुलगी. असा सडाफटींग माणूस मी. तिशी उलटली आहे. बरी नोकरी आहे... ती ही आत्ताच लागली आहे. ना गावाचा पत्ता... ना नातेवाईकांचा. स्वतःची अशी राहायची जागा देखील नाही. मालकांच्या कृपेमुळे छत आहे ते नशीब. त्यामुळे मी लग्न हा विषय माझ्या आयुष्यातून पुसून टाकला आहे."


"अहो अस काय म्हणता. आत्ता तरुण आहात म्हणून अस बोलता आहात. वय वाढलं की कोणीतरी सोबत असावं अस वाटत सर्वांनाच. त्यावेळी काय कराल?"


"खर आहे बुवा. पण आता मी कुठे माझ्याचसाठी मुलगी शोधायला जाऊ? आणि आपणहून कोण मला मुलगी द्यायला बसलं आहे?" मी विषय संपवायचा म्हणून म्हणालो.


"अच्युतराव तुम्हाला मालिनी; माझी मुलीगी माहीतच आहे." हे खर होत. मालिनी अनेकदा देवळात पुजारीबुवांना मदत करायला यायची. त्यामुळे मी तिला बघितले होते. मालिनी दिसायला अत्यंत सुंदर आणि सालस होती. पुजारीबुवा बोलतच होते,"तुमच्याच वयाची आहे. एखाद-दोन वर्ष पुढे मागे. दिसायला देखील चांगली आहे हो. पण या छोट्या गावातल्या देवळातून अशी काय कमाई असणार माझ्यासारख्याची. त्यामुळे तिच लग्न झालेलं नाही. तुम्ही देखील एकटेच आहात. बघा विचार करून... पटलं तर हो म्हणा; पण जर नसेल इच्छा तर कृपा करून मी हा विषय तुमच्याकडे बोललो हे गावात कोणाकडे बोलू नका. बिचारी मालिनी तशीच दु:खात असते. आता या वयात 'नकार आला' अशी चर्चा गावात झाली तर जीव देईल ती." खालच्या मानेने पुजारीबुवा बोलत होते. त्यांनी अचानक समोर ठेवलेल्या प्रस्तावामुळे मी एकदम चक्रावून गेलो. 


"विचार करून कळवतो." अस तुटक बोलून मी उठलो आणि चालू पडलो. रात्रभर मी विचार करत होतो. माझ्यासारख्याला कोण मुलगी देणार होतं आता. मालिनी तर दिसायला खरच खुप सुंदर होती. मी तिला देवळात देवासाठी हार करताना बघितले होते. इतक्या सुंदर मुलीच लग्न केवळ पैशांमुळे झाल नाही ही खरच दुःखाची गोष्ट होती. पण माझ्यासारख्या नुकत्याच त्या गावात आलेल्या माणसाला स्वतःची मुलगी द्यायला पूजारीबुवा तयार झाले होते; यात त्यांचा काही अंतस्थ हेतू तर नसेल न... माझ्या मनात आलं. मग माझ्या लक्षात आलं की पुजारीबुवा म्हणाले होते की मालिनी माझ्याहून एखाद-दोन वर्ष पुढे मागे आहे... म्हणजे कदाचित् ती माझ्याहून मोठीच असावी. पण गरिबी पोटी पूजारीबुवांनी मला विचारले असावे. हे मनात आलं आणि मी शांत झालो. त्या बाबतीत माझी काहीच हरकत नव्हती. पण प्रश्न हा होता की मी मालकांच्या आउट हाउसमध्ये राहत होतो. माझ स्वतःच अस घर नव्हत. त्यामुळे लग्नाचा निर्णय घेण्याअगोदर मला मालकांना विचारण आवश्यक होत. रात्री डोळा लागायच्या अगोदर ठरवून टाकल की मालकांना उद्या विचारायचं आणि लगेच पुजारीबुवांकडे जायचं.


दुसऱ्या दिवशी दुपारी मालकांच जेवण झाल आणि ते थोडे निवांत वाटले म्हणून हिंमत करून मी त्यांच्या समोर जाऊन उभा राहिलो.


"बोला दिघे..." ते मला माझ्या पहिल्या नावाने कधीच हाक मारायचे नाहीत. 


"मालक... एक विचारायचं होत." विषय कसा सुरु करावा ते मला सुचत नव्हतं.


"काय... लग्नाचा बार उडवता आहात का दिघे? वा वा! चांगल आहे." मालक हसत म्हणाले.


मी पुरता चक्रावून विचारल, "तुम्हाला कस कळल मालक?" त्यावर मालक हसत हसत म्हणाले... "अहो, लग्न न झालेला मुलगा नोकरी लागल्यानंतर काही महिन्यात जर मालकाचा मूड बघून काही विचारायला आला तर त्याचा अजून काय अर्थ होऊ शकतो? बरं, कोण मुलगी आहे? याच गावातली की तुमच्या गावाकडची?" मी लाजलो. "मालक, गावातले पुजारीबुवा आहेत ना... त्याची  मुलगी... मालिनी." मी म्हणालो. ते ऐकताच मालकांनी माझ्याकडे दचकून बघितले. क्षण दोन क्षण ते शांत बसले आणि म्हणाले,"चला बरं झालं. तस मालिनीचं लग्नाचं वयही उलटून चालाल होतं. बरं, पण तुम्हाला हे माहित आहे का की पुजारीबुवांच्या दुसऱ्या मुलीशी मी लग्न केलं आहे." त्यांच्या त्या वाक्याने मी उडालोच. म्हंटल,"नाही मालक. मला अस काहीच नाही बोलले पुजारीबुवा." त्यावर मालक समजुतीच्या सुरात म्हणाले,"अहो तुमचा होकार आला की सांगतीलच. उगाच घरातल्या गोष्टी अगोदर कशाला कोणी सांगेल. बर, मग कधी करता आहात लग्न?" मी यावर काय बोलणार. म्हणालो,"मालक माझ स्वतःच अस घर नाही. तुमच्या आउट हाउसमध्ये रहातो ते तुमची मेहेरबानीच आहे. लग्न करून बायकोला कुठे आणू?"


"दिघे, अहो, तुम्ही आल्यापासून मला कारखान्यात काहीच काम नसतं. तुम्ही सगळीच जवाबदारी चांगली पार पाडता. मेहेरबानी कशाबद्दल? अहो अशा आड गावात असा कोणी विश्वासू आणि चांगला माणूस मिळण फक्त अवघड नाही तर अशक्यच आहे. त्यामुळे तुम्ही कोणताही संकोच ठेवू नका. उरकून टाका लग्न." मालक म्हणाले.


त्यांच्या या बोलण्याने मला हायसं वाटलं. कारण ज्या क्षणी त्यांनी मला सांगितलं की ते देखील पूजारीबुवांचे जावई आहेत त्याच क्षणी मी ठरवलं होतं की आपण या विषयातून अंग काढून घ्यायचं. पण त्यांनी आपणहून लग्नाला परवानगी दिली म्हणजे त्यांची काही हरकत नाही हे माझ्या लक्षात आलं. मी त्यांना नमस्कार केला आणि मनापासून म्हणालो; "तुम्ही मला नोकरी दिलीत आणि आता या लग्नाला परवानगी दिलीत; अजून काय हव? खूप उपकार झाले मालक."


त्यादिवशी संध्याकाळी छान तयार होऊन मी थोडा लवकरच देवळात गेलो. अजून गावकाऱ्यापैकी कोणी बसायला आलं नव्हतं. मी पूजारीबुवांना गाठलं आणि माझा होकार सांगितला. बुवांचा चेहेरा खूप आनंदी झाला. त्यांच्या डोळ्यात पाणी उभं राहील. माझा हात धरून ते म्हणाले,"अच्युतराव तुम्ही हो म्हणून माझ्या मनावरच ओझ उतरवलंत. चला असेच घरी. मालिनीच्या आईला सांगू ही बातमी." पण अजूनही पूजारीबुवांनी मला सांगितल नव्हतं की त्यांच्या दुसऱ्या मुलीच लग्न मालकांबरोबर झाल आहे. मीदेखील ठरवलं की आपणहून विषय काढायचं नाही. पूजारीबुवा सांगतीलच नं! म्हणून मग काही न बोलता मी त्यांच्या बरोबर त्यांच्या घराकडे निघालो. 


क्रमशः

No comments:

Post a Comment