Friday, May 22, 2020

गूढ (रहस्य कथा)(भाग 1)



गूढ


भाग


चंद्रभान एक प्रथितयश  लेखक. विशेषतः भय कथा आणि गूढ कथा लिहिण्यात त्याचा हात कोणी धरू शकत नसे. त्याच्या प्रत्येक पुस्तकाच्या किमान दोन ते तीन आवृत्या निघत असत. येत्या काही दिवसात त्याची टी. व्ही. वर मुलाखत दाखवण्यात येणार होती; त्यामुळे चंद्रभान खुप खुश होता. तो स्टुडियोमध्ये वेळेच्या अगोरच पोहोचला. कार्यक्रमाचा दिग्दर्शक राजन पूर्णपात्रे त्याचा मित्र होता. चंद्रभानला बघून तो खूप खुश झाला.
"ये ये भानू! लवकर बरा आलास?" राजनने त्याला मिठी मारत विचारले.

"अरे आयुष्यात पहिल्यांदा टी. व्ही. वर मुलाखत आहे. त्यामुळे थोडा एक्साईट झालो आहे. राहावलं नाही म्हणून लवकर आलो. तू बिझी आहेस का? तस असेल तर तुझ्या केबिनमध्ये थांबतो मी." चंद्रभान हसत म्हणाला. राजन काही म्हणणार इतक्यात... "अरे वा! तुमच्यासारखी भय आणि गूढ कथा लिहिणारी व्यक्तीसुद्धा एक्साईट होऊ शकते?" एक नाजूक किनाऱ्या आवाजातला प्रश्न चंद्रभानच्या मागून आवाज आल्यामुळे त्याने मागे वळून बघितले.

आवाजाप्रमाणेच नाजूक आणि मोहक तरुणी त्याच्या मागे उभी होती. गुलाबी रंगाची साडी आणि स्लीव्जलेस ब्लाऊज असा तिचा पेहेराव होता. चेहेऱ्यावर हलकासा मेकप होता.

'मेकपशिवायच चांगली दिसेल ही.' चान्द्रभानच्या मनात आलं. राजनकडे वळत त्याने 'ही कोण?' असे नजरेनेच विचारले.

राजनने चंद्रभानकडे हसून बघितले आणि त्याच्या पाठीवर थाप मारून म्हणाला,"निशा तुझ्या मनात जे प्रश्न आहेत ते आत्ताच विचारून घे भानुला. त्या निमित्ताने तुमची ओळखसुद्धा होईल. तुलाही गरज आहे त्याची ओळख होण्याची. भानु ही निशा बर का! आमची स्टार मुलाखतकार. असे गुगली टाकते ना एक एकदा...  तयार रहा हो तिच्या प्रश्नांना." आणि मग निशाकडे वळत तो म्हणाला,"निशा, तुम्ही दोघे इथे गप्पा मारत बसा. सगळी अरेन्ज्मेंट झाली की मी तुम्हाला बोलावून घेतो सेटवर."

"नमस्कार निशा. तुम्हाला असं का वाटलं की गूढ किंवा भय कथा लिहिणारी व्यक्ति एक्साईट होऊ शकत नाही. मी तुमच्यासारखाच एक माणूस आहे हो." हसत हसत चंद्रभान म्हणाला आणि जवळच्याच एका खुर्चीवर बसला. अजून एक खुर्ची ओढून घेत निशा देखील त्याच्या समोर बसली; पण अजूनही तिच्या चेहेऱ्यावर हसू नव्हतं. काहीसं गूढ आणि हरवलेल्या नजरेने ती चंद्रभानकडे बघत होती.

"काय हो? अस का बघता आहात माझ्याकडे? मी कोणी भूत किंवा जादूटोणा करणारा वाटतो आहे की काय तुम्हाला? एक साधासा लेखक आहे मी फक्त." चंद्रभान हसत म्हणाला.

तरीही निशा मात्र शांत होती. ती एक टक त्याच्याकडे बघत होती. तिची नजरदेखील अजूनही गूढ... हरवलेली होती. आता मात्र चंद्रभानला तिच हे वागणं आवडलं नाही. तिच्या चेहेऱ्यासमोर टिचकी वाजवत त्याने तिला भानावर आणण्याचा प्रयत्न केला. त्याच्या त्या टिचकीचा परिणाम मात्र लगेच झाला. निशा एकदम खोल झोपेतून जागी व्हावी तशी दचकली आणि काहीश्या गोंधळलेल्या आणि आश्चर्यचकित चेहेऱ्याने चंद्रभानकडे बघायला लागली.

"काय हो निशाजी. कुठल्या जगात अडकला आहात? मी तुमच्याशी बोलतो आहे आणि तुम्ही मात्र नजर माझ्यावार रोखून कुठल्यातरी दुसऱ्याच विचारात हरवल्या आहात. सगळ ठीक आहे ना?" चान्द्रभानाने तिला विचारले.

"हो... ठीकच असावं....  मी खर तर हरवलेच आहे आणि तरीही इथेच आहे. जाऊ दे; मी कशी आहे हे फारसं महत्वाचं नाही. पण खर सांगू का...... मला आश्चर्य वाटतं की तुमच्यासारख्या तिशीतल्या तरुण व्यक्तिने हे असं भय आणि गूढ कथांमध्ये का गुंतून राहावं? मला माहित आहे की तुम्ही इतरही साहित्य लिहिता. काही रोमँटिक कथा देखील तुम्ही लिहिल्या आहात. पण तरीही तुमची ओळख गूढ किंवा भय कथा लेखक अशीच आहे. अस का? रोमँटिक किंवा इतर असं काही लेखन जास्त करावसं नाही वाटत का तुम्हाला?" निशाने चन्द्रभानला विचारलं. अजूनही ती त्याच्याकडे ऐकटक बघत होती.

"बऱ्याच वेग-वेगळ्या कथा मी लिहिल्या आहेत हे खरं आहे. पण मला गूढ आणि भय हे दोन विषय आकर्षित करतात. अशा कथा लिहिण्यात खूप थ्रील आहे हो." चन्द्रभानाने तिला म्हंटल.

"पण असे विषय तुम्हाला कसे सुचतात?" निशाने विचारले.

"कसे सुचतात ते मला नाही माहित. बस सुचतात." चंद्रभान म्हणाला. पण निशाच्या चेहेऱ्यावर उत्तराने समाधान झालं नसल्याचं त्याला दिसलं. मग हसत म्हणाला,"त्याचं असं आहे नं निशाजी की एखादी छोटीशी पण वेगळी घटना किंवा एखादी वेगळी वस्तू ..... जागा... बघितली की मला त्यातून काहीतरी गूढ असं आपोपाप दिसायला लागतं आणि मग पुढे असंच सुचत जातं. मग  लिहायला सुरवात केली ना की आपोआप कथा तयार होत जाते." चंद्रभान असाच मूडमध्ये येऊन बोलायला लागला होता. पण त्याला मध्येच थांबवत निशाने विचारले,"आपोआप तयार होते कथा? म्हणजे नक्की काय चंद्रभान?" तिचा किनारा आवाज थोडा कातर झाला होता.

तिच्या अशा कातर आवाजाने तो थोडा गोंधळला. पण मग त्याकडे दुर्लक्ष करून परत बोलायला लागला,"म्हणजे असं निशाजी की एखादी शांत जागा किंवा एखादी जुनी वास्तू बघितली की तिथे कधीतरी काहीतरी वेगळ घडलं असेल असं माझं मन मला सांगतं. मग ते काय असेल याचा विचार मी करायला लागतो आणि कागद पेन घेऊन बसलो की आपोआप सुचायला लागतं आणि मी लिहित जातो. अनेकदा तर कथा लिहित असताना माझ्या मनात शेवट वेगळाच असतो. पण कथा पूर्ण होते तेव्हा माझ मलाच आश्चर्य वाटतं कारण शेवट मी अजून काहीतरी वेगळाच लिहिलेला असतो." अस म्हणून चंद्रभान थांबला.

"आश्चर्य का वाटतं चंद्रभान?" निशाने अधिरतेने विचारले.

"निशा... मला आश्चर्य वाटतं कारण मी जो शेवट माझ्या मनात ठरवलेला असतो तो मी लिहीतच नाही. माझ्या हातात जी कथा असते तिचा शेवट काहीतरी खूप वेगळा मी न विचार केलेला असाच असतो. जसं काही तो शेवट मी लिहिलेलाच नाही." बोलता बोलता चन्द्रभानची तंद्री लागली. पण निशाच्या ते लक्षात आलं नाही. ती त्याच्या उत्तराने थोडी अस्वस्थ झाली होती. तिची नजर खाली जमिनीवर खिळलेली होती. तशीच नजर असताना ती म्हणाली,"अहो शेवट काहीही असला तरी कथा तर तुम्हीच लिहिता ना? कदाचित सुरवात करताना तुम्ही एक शेवट ठरवत असालही. पण मग जसजशी कथा पुढे सरकते; तुम्हाला वाटत असेल की जो शेवट ठरवला त्यापेक्षा काहीतरी वेगळं असू शकतं. म्हणून तुम्ही शेवट बदलत असाल किंवा एखाद्या कथेचा शेवट तुम्ही नंतरही बदलू शकत असाल. तुमचीच कथा आणि तरीही शेवट तुमच्या मनात नसलेला असं कसं होईल? कथेचा शेवट तुम्हाला अगोदरच माहित असेलच नं?"

निशाच्या प्रश्नामुळे चंद्रभानची तंद्री भंगली. मुळात तंद्रीमध्ये असल्याने ती काय म्हणाली ते त्याला समजलं नव्हतं. पण माझं तुमच्या बोलण्याकडे लक्ष नव्हतं असं म्हणणं वाईट दिसेल असं वाटून त्याने तिच्या हो ला हो केलं. मात्र त्याच्या त्या एका 'हो'मुळे निशा एकदम खुश झाली.

"तुम्हाला माहित नाही चंद्रभान पण तुमच्या या एका 'हो' ने मला किती मोठा दिलासा दिला आहे. कधी कधी काही शेवट अर्धवट असतात. त्यामुळे अनेक जीव अडकून राहातात नाही का? पण आता मला खात्री आहे की असं होणार नाही.  आता माझ्या मनातल्या प्रश्नाचं उत्तर मला नक्की मिळेल. आता मी उमरगावला जायला मोकळी झाले. " निशा मनापासून हसत चंद्रभानला म्हणाली.

आपण नक्की कशाला 'हो' म्हणालो आहोत याची चंद्रभानला अजूनही कल्पना नव्हती. आणि अचानक मुलाखती संदर्भातले प्रश्न विचारायचे सोडून ही निशा हे असं कुठेतरी जाण्याबद्दल का बोलायला लागली हे देखील त्याला कळलं नव्हतं. 'उमरगाव? कुठेतरी ऐकलं आहे हे नाव!' चंद्रभानच्या मनात आलं. त्याबद्दल निशाला विचारावं म्हणून चंद्रभान तिच्याकडे वळला आणि तेवढ्यात राजनचा असिस्टंट तिथे आला आणि म्हणाला,"निशा काम झालं आहे. चल."

"हो! आलेच मी वैभव. तू हो पुढे." निशा चंद्रभानची नजर चुकवत म्हणाली. निदान अस चंद्रभानला वाटलं.

"नाही नाही. तुला पुढ्यात घालून घेऊन यायला सांगितलं आहे. चल तू माझ्याबरोबर." वैभव अगदी तिच्या शेजारी उभा राहून म्हणाला.

"इतका वेळ गेला तरी माझी  आठवणसुद्धा नव्हती तुम्हाला. आणि आता काम  झाल्यावर एका क्षणाची फुरसत नाही काय?" ती थोडी वैतागत म्हणाली. "बरं! माझी मी पोहोचेन. तू यांना घेऊन जा." असं म्हणून ती बाजूच्या दारातून निघून गेली.

"सर, तुम्ही चला माझ्या बरोबर." क्षणभर निशा गेली त्या दिशेने बघून वैभव चंद्रभानकडे वळून म्हणाला आणि चंद्रभानदेखील त्याच्या मागे निघाला.

चंद्रभान काही न बोलता वैभवच्या मागोमाग सेटवर आला. ते दोघे तिथे पोहोचले पण सेट वरचे सगळेच दिवे बंद होते. "अरे सगळे दिवे का बंद आहेत कळत नाही. मी आलो तेव्हा सेटवर लखलखाट होता. सर तुम्ही इथेच थांबा. मी बघून येतो. काहीतरी घोटाळा झालेला दिसतो आहे. कुठेतरी शॉर्ट सर्किट असेल. राजन सर वैतागले असतील. मी आलोच." अस म्हणून आणि चंद्रभानला काही लक्षात यायच्या आत वैभव गायब झाला.

चंद्रभानला काही कळले नाही. तो बराच वेळ तिथे थांबला. पण त्याला कोणत्याही प्रकारची हालचाल आजूबाजूला जाणवत नव्हती. सेट जर तयार असेल आणि फक्त दिवे बंद असतील तर मग कोणी एकमेमांशी बोलत का नाही; याचं त्याला राहून राहून आश्चर्य वाटत होतं. शेवटी अंधारात उभं राहून वैतागलेला चंद्रभान राजनला हाक मारत पुढे सरकला. नवीन-अनोळखी जागा  असल्याने त्याला नक्की कुठे जावं ते लक्षात येत नव्हतं.

"राजन... राजन.... अरे भय कथा मी लिहितो तू नाही. हे असे दिवे बंद करून तू मला घाबरवायचा प्रयत्न तर करत नाहीस ना?" राजनला हाक मारत आणि काहीसं मोठ्याने बोलत चंद्रभान पुढे सरकत होता. अचानक त्याचा धक्का कशाला तरी लागला आणि मोठ्ठा आवाज झाला. चंद्रभान देखील चांगलाच धडपडला. झालेल्या आवाजाने एकदम अनेकजण तिथे आले. कोणीतरी दिवेसुद्धा लावले. त्याठिकाणी एकदम लखलखाट झाला. चंद्रभानला खाली पडलेला बघून राजनला खूप आश्चर्य वाटले.

"अरे चंद्रभान तू कधी आलास? बरं, आलास तर सरळ माझ्या ऑफिसमध्ये यायचं नं. इथे या बंद सेटवर काय करतो आहेस?" त्याला उठायला मदत करत राजन म्हणाला.

"राजन काय चेष्टा चालवली आहेस? अरे मी कधीच आलो आहे. तुझ्या ऑफिसमध्ये आपण भेटलो. मग तू सेट लावायला गेलास तेव्हा निशाला माझ्या बरोबर सोडून गेलास. आम्ही गप्पा मारत होतो तर तुझा असिस्टंट वैभव आला बोलवायला. निशा बहुतेक तयार व्हायला गेली असेल. मी तुझ्या त्या वैभव बरोबर इथे आलो. पण इथे अंधार होता. त्याचं कारण शोधायला म्हणून तो वैभव मला इथेच सोडून गेला. मी बराच वेळ थांबलो पण काहीच हालचाल नाही वाटली. कोणी इथे आहे की नाही ते देखील कळत नव्हते. बरं तुला सोडून मी इथे कोणालाही ओळखत नाही. म्हणून मग तुला हाक मारत पुढे सरकलो तर धडपडलो." चंद्रभान राजनला म्हणाला.

चंद्रभान जे सांगत होता त्यामुळे राजनला खूप आश्चर्य वाटलं. पण इतरांच्या मनात काही येऊ नये म्हणून त्याने चंद्रभानचा हात धरला आणि म्हणाला,"बरं बरं... चल. जरा चहा घेऊ. मग सुरु करू तुझी मुलाखत." आणि त्याला घेऊन परत आपल्या केबिनच्या दिशेने निघाला.

केबिनमध्ये शिरताच राजनने चंद्रभानला सोफ्यावर बसवले आणि विचारले,"हा आता बोल. हे काय  चालवालं आहेस तू? कोणत्यातरी गूढ कथेचा काहीतरी प्लॉट मनात आहे का? त्याचा प्रयोग तू माझ्यावर करून बघतो आहेस का?"

"मी? मी काय चालवालं आहे? म्हणजे काय राजन? काय म्हणायचं आहे तुला नक्की?" राजनच्या भडीमराने गोंधळून चंद्रभान म्हणाला.

"तू बाहेर काय म्हणत होतास चंद्रभान? निशा तुला भेटली? वैभव बोलवायला आला होता? तू कसं ओळखतोस निशाला आणि त्या वैभवला?" राजनने चंद्रभानला विचारले.

"मी कसं ओळखतो? अरे तूच ओळख करून दिलीस ना निशाशी आता थोड्या वेळा पूर्वी इथेच तुझ्या ऑफिसमध्ये." चंद्रभान वैतागत म्हणाला.

"मी? भानू... अरे मी कधी ओळख करून दिली तुझी?" राजन आश्चर्याने म्हणाला.

राजनच्या बोलण्याने चंद्रभानच्या लक्षात आले काहीतरी गडबड होते आहे. त्यामुळे तो एकदम शांत झाला आणि म्हणाला,"राजन काहीतरी गैरसमज होतो आहे दोघांचाही. काय घडलं ते मी सांगतो आणि मग तुला काय माहित आहे ते तू सांग. ठीक?"

"ठीक आहे." राजनने मान्य केले.

"तर असं झालं आहे की मी आयुष्यात पहिल्यांदा टी. व्ही. इंटरव्यू देणार असल्याने थोडा एक्साईट होतो. म्हणून तू सांगितलेल्या वेळेच्या अगोदरच आलो; काही वेळापूर्वी. इथेच तुझ्या केबिनमध्ये आपली भेट झाली. तू माझ्याशी बोलत असताना इथे निशा आली. तू मला तिची ओळख करून दिलीस की ती तुमची स्टार मुलाखतकार आहे आणि माझी मुलाखत देखील तिच घेणार आहे. मग तू तिला म्हणालास की माझी चांगली ओळख व्हावी महणून आम्ही दोघांनी इथे बोलत बसावं आणि पुढची तयारी करायला म्हणून तू  गेलास. आम्ही दोघे इथे गप्पा मारत बसलो होतो. थोड्यावेळाने वैभव इथे आला. निशाने त्याचे नाव घेतले म्हणून मला कळले त्याचे नाव. तर... तू आम्हाला बोलावले आहेस असे त्याने म्हंटले. बहुतेक निशाला मेकअप करायचा होता म्हणून मग ती या इथल्या दाराने आत गेली आणि मी वैभव बरोबर बाहेर पडलो. सेटवर आम्ही पोहोचलो तर अंधार होता. काहीतरी शॉर्टसर्किट झालं असेल अस म्हणून वैभव गेला. जाताना म्हणाला देखील की तू रागावशील. त्याने मला तिथेच उभं राहायला सांगितलं म्हणून मी थोडावेळ उभा राहिलो. पण कोणतीच हालचाल जाणवत नव्हती किंवा कोणाचाही आवाज येत नव्हता. म्हणून मग मी तुला हाक मारत थोडा पुढे सरकू लागलो आणि धडपडलो. झालेल्या आवाजाने तुम्ही सगळे तिथे आलात.... पुढचं तुला माहीतच आहे." चंद्रभान म्हणाला.

राजन चंद्रभानचं बोलणं शांतपणे ऐकत होता. चंद्रभानच्या प्रत्येक वाक्यागणिक त्याच्या चेहेऱ्यावर आश्चर्य फुलत होत. चंद्रभान बोलायचा थांबला आणि राजन म्हणाला,"चंद्रभान................. हे सगळ आत्ता झालं? तू मला काही वेळापूर्वी इथेच भेटला होतास असं तुझ म्हणणं आहे का? मी तुझी आणि निशाची ओळख करून दिली? मग तुम्हाला सोडून मी सेटवर गेलो? मी वैभवला पाठवलं?"

आता मात्र चंद्रभान पूर्ण वैतागला आणि म्हणाला, "राजू, अरे मी तुला जे घडलं ते सगळं तसंच्या तसं सांगितलं ना? मग हे असे परत परत तेच प्रश्न विचारून तू मला परत तेच सांगायला का लावतो आहेस?"

"मी तुला परत परत तेच विचारतो आहे भानू; पण तू तेच परत सांगू नयेस असं मला वाटतं आहे............ कारण तू जे म्हणतो आहेस तसं काहीही घडलेलं नाही. मी सकाळपासूनच स्टुडियोच्या दुसऱ्या कोपऱ्यात काम करतो आहे. कारण तुझ्या मुलाखतीसाठी फार मोठा सेट लावायची गरजच नाही. मी माझ्या दुसऱ्या एका सिरीयलच्या सेटची तयारी करतो होतो. बरं........ त्याहूनही महत्वाचं म्हणजे निशाला माझ्याकडचं काम सोडून अनेक महिने झाले आहेत. महत्वाचं म्हणजे वैभव नावाचा माझा कोणी असिस्टंट नाहीच आहे." राजन चंद्रभानकडे एकटक बघत म्हणाला.

हे ऐकताच चंद्रभानला मोठा धक्का बसला. "राजू........... अरे.............. तू काय बोलतो आहेस?" चंद्रभान सुन्न झाला.

चंद्रभानची अवस्था बघून राजनला काळजी वाटली. त्याच्या हातावर थोपटत राजनने विचारले,"भानू बरा आहेस नं तू? अरे काहीतरी भास झाला असेल तुला. जाऊ दे. मी आत येतानाच दोन कॉफी पाठवायला सांगितल्या आहेत. मस्त कॉफी घेऊ या आणि मग तुझा इंटरव्यू घेऊया. ठीक?"

"राजू आज इंटरव्यू नको प्लीज. मला खूप अस्वस्थ वाटतं आहे. मी घरी जातो." अचानक अस्वस्थ होत चंद्रभान म्हणाला.

त्याची एकूण मानसिक स्थिती बघून राजनने देखील त्याला आग्रह केला नाही. " ठीक. इंटरव्ह्यू काय कधीही होईल. तू जाऊ शकशील ना एकटा? की माझ्या गाडीने जातोस? माझा ड्रायव्हर सोडेल तुला.  मी सगळं काम आटपलं की तुझी गाडी घेऊन तुझ्या घरी सोडायला येतो. तेव्हा गप्पा मारू." राजन म्हणाला.

"ठीक! तुझ्याच गाडीने जातो मी. रात्री नक्की भेटू. अच्छा." चंद्रभान म्हणाला आणि कॉफीची वाटही न बघता राजनच्या गाडीत बसून निघून गेला.

रात्री साधारण दहा साडेदहाच्या सुमाराला राजन चंद्रभानच्या घरी पोहोचला. चंद्रभान त्याचीच वाट बघत होता. "खूप उशीर झाला रे तुला राजू? सध्या कसलं शूटिंग चालू आहे तुझं?" उगाच काहीतरी विचारायचं म्हणून चंद्रभानने विचारलं आणि राजनला बसायला सांगून तो बारच्या दिशेने वळला. "काय घेणार ते बोल. एक मस्त स्कॉच आणली आहे. नवीनच आहे; उघडतो. काय?"

"नको भानू. तू बस बघू माझ्या शेजारी. मला तुझ्याशी बोलायचं आहे." चंद्रभानला अडवत आणि त्याचा हात धरून आपल्या शेजारी बसवत राजन म्हणाला. "त्यात मला देखील अजून एका पार्टीला जायचं आहे."

"अरे तुला यापुढे पार्टी आहे? बापरे! बर मग तू निघ हव तर. आपण काय उद्या बोलू." चंद्रभान म्हणाला.

"नाही. मला तुझ्याशी बोलायचंच आहे." राजन आग्रहाने म्हणाला.

त्यावर हसत चंद्रभान म्हणाला,"बर बोल. माझी काही हरकत नाही."

"भानू; अरे आज सकाळी जे काही घडलं ते तुला विचित्र नाही वाटत का?" राजनने अस्वस्थ होत चंद्रभानला विचारले.

"विचित्र? नाही. थोड वेगळं वाटलं मला. पण असं काळजी करण्यासारखं काही वाटलं नाही. त्यावेळी मी थोडा गोंधळलो होतो. पण आता नाही."चंद्रभानच्या चेहेऱ्यावर हसू होते.

"याचा अर्थ तू खोटं बोलत होतास ना सकाळी? तू त्या सेटवर मला भेटलास तेव्हाच आला होतास ना तू तिथे?" राजनने चंद्रभानचा हात धरून त्याला विचारले.

त्यावर चंद्रभान क्षणभर राजनकडे टक लावून बघत राहिला आणि मग अचानक खो-खो हसत सुटला. आता मात्र राजनचा धीर सुटायला लागला.

"अरे असा हसतो का आहेस? काय ते निट सांग बघू मला. तू सकाळी खोट बोलत होतास ना?" राजनने चिडून चंद्रभानला विचारले.

त्यावर अजून गडगडाटी हसून चंद्रभानने होकारार्थी मान हलवली. आणि आपलं हसू आवरत म्हणाला,"अरे राजू; थोडी गम्मत केली तुझी तर तू इतका अस्वस्थ झालास? जर असं खरंच घडलं असतं तर बहुतेक तुझी चड्डीच फाटली असती. चल विसर ते आणि निघ बघू आता. नाहीतर अजून उशीर होईल तुला तुझ्या पार्टीला."

त्यावर सुटकेचा निश्वास टाकत राजन उठला आणि "साल्या ही कसली चेष्टा रे?" असं म्हणत निघाला. दारापर्यंत जाऊन मात्र तो गरकन मागे वळला मोठे डोळे करत चंद्रभानला त्याने विचारले,"जर तू खोटं बोलत होतास भानू तर मग तुला निशाबद्दल कसं कळलं?"

"राजू; अरे मी सकाळी तुझ्याकडे यायला निघालो त्यावेळी तुझ्या सेटच्या अगोदरच्या सेटवर निशा मला भेटली. जाम सुंदर आहे रे ती. मला बघून स्वतः बोलायला आली. तिनेच मला सांगितलं की ती अगोदर तुझ्याकडे काम करत होती. पण आता नाही. मग मला हे सुचलं आणि तुझी गम्मत करावी म्हणून मी हे नाटक केलं. तिचा नंबर मी घेतला आहे. काही निरोप आहे का तिला? असेल तर मला सांग. त्या निमित्ताने तिला फोन करीन म्हणतो." डोळा मारत चंद्रभान म्हणाला.

"भानू... तू खरं बोलतो आहेस नं? निशा तुला भेटली? खरंच?" राजनने डोळे बारीक करत चन्द्रभानला विचारले.

"कमाल करतोस राजू. नाहीतर निशा नावाची तरुण सुंदर मुलगी तुझ्याकडे काम करते असं मला स्वप्न पडेल का? असं का विचारतो आहेस तू?" चंद्रभान काहीसा मनात गोंधळा होता पण वरकरणी मात्र शांतपणे म्हणाला.

"भानू देव करो आणि तू म्हणतो आहेस तेच खरं असो. कारण निशा जेव्हा तिचा राजीनामा द्यायला आली होती तेव्हा मी तिला विचारले होते की दुसरीकडे कुठे अजून चांगला पगार मिळतो आहे म्हणून सोडते आहेस का? तर म्हणाली नाही.. तिला तिच्या गावाला जायचे ठरवले होते. काहीतरी घडलं होत म्हणे; आणि त्याचा शेवट तिला स्वतःलाच करायला लागणार होता, अस तिचं म्हणणं होतं.  मी तिला खूप समजावले होते असं अचानक चांगली नोकरी सोडून जाऊ नकोस. तुला खूप प्रोस्पेक्ट्स आहेत इथे. सुंदर आणि हुशार मुलींची आमच्या इंडस्ट्रीमध्ये वानवाच आहे. हवं तर सुट्टी घे काही दिवसांची. तू खूप चांगलं काम करते आहेस; त्यामुळे तुला सुट्टी मिळेल. गावाकडेचं काम झालं की ये परत. पण तिने ऐकले नाही. म्हणाली परत आलेच तर नक्की येईन तुमच्याचकडे. पण परत येईन की नाही ते मलाच माहित नाही. मला कळलंच नाही ती नक्की काय म्हणत होती. पण मग मी अजून काही नाही विचारलं तिला. कदाचित तिला अवडलं नसतं. उगाच कशाला कोणाच्या वयक्तिक गोष्टीत लक्ष घालायचं? परत आलीस तर जरूर ये अस म्हंटल होतं. तरीही ती माझ्याकडे आली नाही आणि दुसरीकडे जॉईन झाली... आणि ते ही तू सांगतो आहेस तेव्हा कळलं. ठिक! तिची इच्छा." राजनने चंद्रभानला सांगितले.

"तिने तिच्या गावाला जाण्यासाठी नोकरी सोडली? कमाल आहे!"चंद्रभान म्हणाला.

"अरे मला देखील आश्चर्य वाटलं होतं. मुख्य म्हणजे एकीकडे ती म्हणत होती की फक्त काहीतरी काम आहे आणि तरीही ती परत येईल की नाही ते तिलाच माहित नव्हतं. हे थोड विचित्र वाटलं मला." राजनने माहिती दिली.

एकूण राजन जे सांगत होता ते एकून चंद्रभान थोडा विचारात पडला. पण ते राजनच्या लक्षात आल नाही. तो आपल्याच नादात निघाला. राजनने दार उघडले आणि चंद्रभान भानावर आला. "अरे राजू; तिच्या गावाचं नाव काय म्हणालास रे?" त्याने बाहेर पडणाऱ्या राजनला विचारले.

"गावाचे नाव? सांगितलं होतं खरं तिने...... एक मिनिट.... हा ...... उमरगाव का नगर  असं काहीसं होतं."असे म्हणून राजन घराबाहेर पडला.

राजन गेला. त्याच्या शेवटच्या वाक्याने चंद्रभानला धक्का बसला होता. चंद्रभान विचारात पडला. कारण तो राजनशी खोट बोलला होता. त्याचा सकाळचा अनुभाव त्याच्या इतकाच सच्चा आणि खरा होता. याचा काय अर्थ असू शकतो? चंद्रभानने आजवर अनेक कथा आणि कादंबऱ्या लिहिल्या होत्या. त्याचा कल भय कथा आणि गूढकथांकडेच जास्त होता. पण सकाळी आलेल्या अनुभवाने त्याला पुरतं गोंधळवून टाकलं होतं. त्यात जाता जाता राजनने ज्या गावाचा उल्लेख केला होता... सकाळी भेटलेल्या त्या निशाने त्याच गावाचा उल्लेख केला होता. हा योगायोग नव्हता. हे नक्की काय चाललं आहे ते चंद्रभानला कळत नव्हतं. मात्र सकाळी  आलेला अनुभव खरा होता याची त्याच्या मनाला खात्री होती. त्यामुळे तो अनुभव येण्यामागे काहीतरी कारण असणार असं त्याला प्रकर्षाने वाटत होतं. त्यामुळे वेळ न घालवता त्याने स्वतः लिहिलेल्या कथा-कादंबऱ्या ठेवलेले कपाट उघडले आणि उमरनगर किंवा उमरगाव असा उल्लेख असलेली कथा शोधायला सुरवात केली.

खूप शोधल्यानंतर चन्द्रभानला ती कथा मिळाली. त्याच्या खूप सुरवातीच्या कथांमधली ती एक अत्यंत लहान अशी कथा होती. आता त्याला ती फारशी आठवत देखील नव्हती कारण त्यावेळी तो कॉलेजमध्ये शिकत होता आणि एक आवड म्हणून अधून मधून कथा लिहित होता. ती कथा देखील त्याला सुचली होती कारण मित्रांबरोबर रत्नागिरीला जाताना मध्ये एक उमरगाव थांबा लागला होता. त्यावेळी एका मित्राने तिथेल्या वाड्याचा उल्लेक करून त्याबद्दलच्या काही वंदता सांगितल्या होत्या. आणि मग एक गम्मत म्हणून त्याने ती कथा लिहिली होती. कथा मित्राने वाचली होती आणि चांगली आहे म्हणून चंद्रभानच्या मागे लागून त्याला ती एका मासिकाकडे पाठवायला लावली होती. कशी कोणजाणे पण ती छापून आली होती. खर तर चंद्रभानच्या अगदी सुरवातीच्या काळात.... म्हणजे लेखकच व्हायचं असा केवळ मनात विचार होता........ त्यावेळी छापून आलेली ती कथा होती. ती कथा मिळाली आणि त्यानुषंगाने चंद्रभानला मागील सगळं आठवलं. या कथेचा आणि आजच्या सकाळच्या अनुभवाचा काहीतरी संबंध असावा असं त्याला वाटायला लागलं. पण त्याला अजूनही ती कथा पूर्ण आठवत नव्हती. म्हणून मग त्याने आपलीच कथा परत एकदा वाचायला घेतली.

क्रमशः

2 comments:

  1. सुरुवात छान झाली आहे.

    ReplyDelete
  2. खुप छान सुरुवात

    ReplyDelete