Friday, November 15, 2019

मस्तानीचं मनोगत

मस्तानीचं मनोगत



नुकतीच 'राऊ' कादंबरी परत एकदा वाचून संपवली. खरं तर या विषयावर अनेकांनी अनेकदा लिहिलं आहे. पेशवेकाळाबद्दल अनेक प्रकारच्या चर्चा झाल्या आहेत. त्यात अलीकडेच बाजीराव-मस्तानी सिनेमा येऊन गेला होता. त्यावेळी तर पेशवे... मराठा साम्राज्य... त्या काळातील विवाहेतर प्रेम संबंध... बेबंद स्वभावाचे बाजीराव पेशवे... त्यांच्यावर जान कुर्बान करणारी मस्तानी... या सगळ्यावर खूप खुप उहापोह झालाच होता. पण म्हणूनच जरा वेळ मिळाला आणि परत एकदा राऊ कादंबरी हातात घेतली होती. या कादंबरीमधले वेगवेगळे भावनिक बंध मला दरवेळी वेगवेगळ्या प्रकारे भिडतात. यावेळी ही कादंबरी वाचताना त्यातील एक प्रसंग मनाला स्पर्शून गेला; काहीसा टोचला!

मस्तानीला आप्पा (पेशव्यांचे धाकटे बंधू) अचानक एक दिवस 'पुणे सोडून जा'; सांगतात आणि बाजीराव पेशव्यांचा निरोपही न घेता मस्तानी बुंदेलखंडाला रवाना होते. ही बातमी समजताच बाजीराव पेशवे दोन दिवसांची अविरत घोडदौड करत तिला गाठतात. त्यावेळचा हा प्रसंग. मी एकट्या मस्तानीच्या शब्दात मांडण्याचा अल्पसा प्रयत्न केला आहे. एकीकडे राऊ तिच्यासाठी आले हा झालेला आनंद; दमलेल्या राऊंबद्दल वाटणारी काळजी आणि त्याचवेळी पुण्यात उडालेल्या गदरोळाची जाणीव... तिच्या अस्तित्वामुळे निर्माण झालेला तिढा आणि हट्टी राऊ हे भावनांचे कल्लोळ मस्तानीच्या मनात घोंगावत असतील. मात्र त्याचवेळी नसलेल्या माहेरच्या; त्या बुंदेलखंडाच्या वाटेवरून दोन दिवस प्रवास करताना तिच्या स्त्रीमनाला काय आणि किती टोचण्या लागून राहिल्या असतील. सोबत लहानगा समशेरबहाद्दर आणि आयुष्याचं फरफरणारं सुकाणूशिवायचं जाहाज... या सर्वच भावनांची सरमिसळ लिहायचा प्रयत्न इथे केला आहे.

केवळ आणि केवळ राऊ कादंबरीच्या प्रेमाखातर आणि या प्रसंगातून मस्तानीचा एक वेगळा पैलू मांडता येईल अस वाटून....

**********

राऊ... राऊ तुम्ही आलात? या यत्किंचित कंचनीसाठी? पाउस-वादळी वारा यामुळे इथवरचा प्रवास करण्यास या दासीला दोन दिवस लागले. तोच प्रवास आपण काही प्रहरात पूर्ण केलात... ओह राऊ! ये क्या हें? अरे, आप तो पसिनेसे भिग गये हो! सार शरीर थकलेल दिसतंय. कुठ माझा शोध करीत आलात राऊ? राऊ एकटे धावत इतक्या दूर येतील ही या दासीला कल्पना नव्हती. आता मात्र काही न बोलता दमलेल्या राऊंनी विश्रांती घ्यावी. माझ्या या राहुटीत जे काही असेल ते स्वीकारावं एवढीच विनंती आहे. (राऊ मात्र ताठपणे एकाजागी उभे आहेत. ते कठीण चेहेऱ्याने आणि करड्या नजरेने मस्तानीकडे बघत असतात; जणू त्यांची नजर म्हणत असते 'मस्तानी तू परत चल';) तुमच्यावर मी जीव ओवाळून टाकला आहे माझ्या हृदयेश्वरा! पण परत पुण्याला चल असा हट्ट बरा नव्हे. राऊ पेशवे आहेत हे त्यांनी विसरू नये. एका कंचनीसाठी पेशवे पुण्याहून अखंडपणे इथपर्यंत दौडत आले, हे पुण्यात समजलं तर केवढा हाहाकार होईल. तिकडे पुण्यामध्ये शोधाशोध सुरु झाली असेल. राऊ इथे आले याची वर्दी तरी पुण्याला पाठवावी. मग आम्ही सांगूच आमची कर्मकहाणी.

राऊ आपण रागावू नये. ही दासी आपल्या मनानं पुण्यातून बाहेर पडली नाही. राऊंच्या सावलीत राहण्याची शपथ घेऊन पुरते चार प्रहरसुद्धा उलटले नाहीत, तोच मस्तानीवर हा प्रसंग आला. आम्ही खुशीनं पुणं सोडलं नाही. कोणी जबरदस्ती केली म्हणून का विचारता राऊ? त्यांचं नाव समजून देखील काय होणार आहे? या चौकशीची काही जरुरी आहे का? वाटल्यास असं समजावं की आम्ही आपल्या मनानंच बाहेर पडलो आहोत. आमच्यावर कुणीही जबरदस्ती केली नाही.( तिच्या या वाक्याने राऊंच्या नजरेत अंगार फुलतो. नाही नाही अशी मान हलवत नजर खाली वळवत मस्तानी म्हणते) राऊ नका अस भरीस पाडू आम्हाला. आम्हाला हुकुम झाला.... पण यापुढे अजून काहीही सांगण्याअगोदर आम्हाला एक वाचन मिळेल तर सांगू. मी नाव सांगेन पण त्यांना अभय मिळालं पाहिजे. आणि मग शब्द फिरवू देणार नाही आम्ही...(राऊंचा हात हातात घेऊन त्यावर प्रेमाने थोपटत मस्तानी बोलते) आप्पास्वामींच्या कारकुनानं सांगितलं की मस्तानीनं सूर्य उगवायच्या आत पुण्याची वेस ओलांडून बुंदेलखंडाच्या रोखानं निघून जावं. आप्पास्वामींनी आम्हाला हुकुम केला आणि आम्ही पुण्याच्या बाहेर पडलो. आम्हाला सक्त हुकुम होता की आम्ही कुणालाही काहीही न कळवता ताबडतोब पुण्याची वेस ओलांडून मार्गाला लागलं पाहिजे. सारी तयारी करूनच आम्हाला हुकुम दिलेले होते. (दोन क्षण शांतता. मस्तानी खुरमांडी बदलून पाय समोर घेते आणि गूढघ्यानवर हाताचा विळखा घालत म्हणते) राऊ... तुम्ही दिलेल्या वाचनाची आठवण आहे ना? आप्पास्वामींनी हुकुम दिला आणि मीही तो मानला. (राऊंची मुद्रा अत्यंत दुःखी होते. त्यांचं मन समजून घेणं त्यांच्या लहान बंधूंना मान्य नाही याचं दुःख त्यांच्या चेहेऱ्यावर दिसून येत आणि मस्तानीचं मन पिळवटून निघतंं.) राऊंनी दु:खी होऊ नये. ज्याचा इलाज माणसाच्या हातात नसतो त्याचं दु:ख करूनही उपयोग नसतो. आप्पास्वामींची मर्जी मोडायची नसेल तर मला पुण्यात राहता येत नाही. तुम्ही आलात खरे मला परत पुण्यात नेण्यासाठी परंतु आप्पास्वामींची आज्ञा नसतानासुद्धा आम्ही याव? त्यापरीस या चरणांशी एक विनंती आहे. मी पुण्यात राहाणं आता शहाणपणाचं होणार नाही. माझ्याबद्दल आता राऊंच्या हवेलीपर्यंत गवगवा झालेला आहे. छोटे समशेरबहाद्दरही यातून सुटलेले नाहीत. तेव्हा राऊंनी आता मला परत पुण्यास ठेवण्याचा हट्ट धरू नये. कारण मी पुण्यात परत येणं याचा आता अर्थ एकच आहे. लोक असं म्हणतील की राम-लक्ष्मणासारख्या या दोन भावांच्यात मस्तानिमुळे वितुष्ट आलं. या विषारी शब्दांनी लोक मला टोचून मारतील. राऊ! कुणी तोंडावर म्हंटल नाही तरी मनात म्हणतीलच. मनातले शब्द प्रत्यक्ष बोलण्यापेक्षाही जास्त जहरी असतात. तरीही राऊंच्या आज्ञेबाहेर ही दासी नाही.

(डोळ्यातून वाहणारी आसवं रोखण्याचा प्रयत्न करत मस्तानी पुढे बोलू लागते) एक सांगायचं होत राऊ... आम्हा बायकांना माहेरची वाट जिवाभावाच्या मैत्रिणीसारखी प्रिय असते. पण राऊ, त्या दिवशी पुण्याहून आम्ही माहेरच्या या वाटेला लागलो तेव्हा तीच वाट आम्हाला वैरिणीसारखी झाली. आमचं माहेर आता तुमच्यामध्येच आहे. ते वेगळ नाही. पण हा जन्म स्त्रीचा पडला. आम्ही दोन दिवस वाट चालत असताना मनात एक विचार आतून कसा डंख देत होता. साऱ्यांनी वाऱ्यावर सोडलं तरी स्त्रीला आपल्या माहेरची आशा असते. तो आसरा, ती सावली स्वप्नासारखी असली तरी त्या आधारावर कठीण प्रसंगातही सतीला दिवस काढता येतात. पण राऊ, ही वाट आमच्या माहेरची आहे अस फक्त म्हणायचं. कोण आहे आमचं तिथं? अस वाटत की, आपल्याला कुठतरी माहेर असावं. जेव्हा आयुष्यात पराभवाचा क्षण येईल किंवा परमेश्वराच्या मनात आपली ताटातूट अटळ असेल तर तेव्हा कुशीत दडायला कुठतरी माती असावी. लग्न झालेल्या बाईला माहेरकडून चोळी-बांगडी मिळते. आम्हा कलावंतीणीना कोण देणार ही चोळीबांगडी? कुणाच्या कुशीत मान खुपसून आम्ही मनातलं दु:ख सांगाव? इतक्या दूर, एकाकी वारा, वादळ, पावसात माझ्यासारख्या क्षुल्लक कंचनीसाठी राऊंच इथवर येणं झालं. माझी समजूत काढून इथून मला परत पुण्याला घेऊन जाणं होत आहे. राऊंना सोडून माहेरच्या दिशेन मी तुडवालेली वाट आता इथेच संपली आहे. आता हातात हात घालून परतीचा प्रवास पुण्यापर्यंत आपण जोडीनं करणार आहोत. ही वाट जिथ संपली तेच गाव चोळी-बांगडी म्हणून राऊ या मस्तानीला द्या. अर्थात मनात असेल तरच! आमचा कशासाठीच हट्ट नाही.

***********




4 comments:

  1. नाविनं वेगळं छान

    ReplyDelete
  2. खरोखरची मस्तानी अगदी अस्सच बोलली असेल....निव्वळ अप्रतिम शब्दांकन....hats off

    ReplyDelete