Friday, March 22, 2019

डायरी (लघु कथा)

डायरी (लघु कथा)


शनिवार

तो....

नेहमीच्या सवयीने घरी येताना बागेतल्या नेहमीच्या वळणावर उभा होतो. त्या वळणावरचा काळ माझ्यासाठी गेली कित्तेक वर्ष तसाच थांबला आहे. आणि त्याची आता सवयही झाली आहे. रोज जस गणपति-मारुती स्त्रोत्र म्हणतो; तेव्हा पूर्ण तल्लीन होऊन जातो; तस रोज त्या वळणावर मी काही क्षणांसाठी फ़क्त माझा उरतो.

पण आजचा दिवस वेगळा आहे. आज ती दिसली. तोच जुना वड... तेच जुन बाक... आणि ती देखिल तशीच! काळजाचा ठोका चुकला. गडबडलो... आणि तिच्याशी बोलायची उफाळून आलेली उर्मि दाबून घरी आलो.

 माझ्या मनाचा भास? की सत्य?

 -----------

ती....

10 वर्ष पूर्ण झाली हे शहर सोडून. त्यानंतर कधी मागे वळून नाही पाहिल. पण कंपनीने या ब्रांचची जवाबदारी दिली आणि परत एकदा या शहरात आले.

 त्या वडाखालिसुद्धा गेले होते आज. तो वड आणि ते बाक तसंच आहे... बस! बाकी सगळच बदलल आहे.

जाऊ दे. काही गोष्टींचा विचार न केलेला बरा.

----------


रविवार

तो...


ती खरच होती तिथे काल संध्याकाळी की मला झालेला भास्? वर्षानु वर्षांच wishfull thinking अचानक समोर साकार झाल होत... की तिने मार्ग बदलला आहे? का कुणास ठाऊक... आज गेलोच नाही तिथे. गेल्या 10 वर्षात पहिल्यांदा!

----------------

ती....

आजदेखिल गेले होते त्या वडाखाली. काय शोधते आहे मी? काही वर्षांपूर्वी जे हट्टाने नाकारल ते? की आता फ़क्त आठवणी... ज्या मधल्या काळात धूसर झाल्या होत्या... त्यांना जागवते आहे? की काहीतरी घडाव अस वाटत आहे? की पुढच्या आयुष्याच्या काही निर्णयांच्या अगोदर जुन्या धूसर आठवणी संपूर्ण पुसून टाकल्या आहेत का हे स्वतःला तपासून खात्री करून घेते आहे?

आज परत कॉलेजचा annual day आठवतो आहे. रवि आणि माझी ओळख या annual day च्या निमित्तानेच झाली. लाजरा, अबोल रवि पण त्याचा आवाज एकत राहावा असा आणि हिंदी गाणी आणि त्यांच्या विषयीचा अभ्यास सुद्धा दंडगा. म्हणून तर साने सरांनी त्याला माझ्या बरोबर सूत्रसंचालन करायला सांगितल. आणि रविशी बोलल्यानंतर मला ही पटल की तो आणि मी धमाल उडवून देऊ. नाहीतर मी कधीच कोणालाही माझ्या बरोबर उभ केल नव्हत. झाल देखिल माझ्या एस्पेक्टशन्स प्रमाणे. अप्रतिम रंगला एनुअल डे आणि स्पेशली शेवटचा गायनाचा कार्यक्रम. आयुष्यात प्रत्येक गोष्ट कशी परफेक्ट असावी अस मला कायमच वाटत आल आहे. तसच झालं. अगदी दृष्ट लागण्यासारखा झाला होता कार्यक्रम... अगदी माझ्या मनासारखा. सर्वानी खूप कौतुक केल आमच दोघांच.

त्यानंतर खर तर इंजिनीअरिंगच शेवटच वर्ष असल्याने अभ्यासाला लागण अपेक्षित होत. पण माझ्या आणि रविच्या भेटी आणि गप्पा अचानक वाढल्या. अगोदर 15 दिवस एनुअल च्या निमित्ताने रोज एकत्रच होतो. आता कारण संपल होत आणि तरीही दोघांनाही भेटायची आणि बोलायची ओढ़ लागली होती.

माझे माझ्या करियरचे आणि पुढच्या आयुष्याचे प्लान्स पूर्ण ठरले होते. म्हणूनच मी कधीच इतर कुठल्याही गोष्टींकडे वळले नव्हते.पण रविचं नाव घेतलं की अलीकडे मन हळवं होत होतं. त्याच्या सानिध्यात कस निवांत वाटायच. मुळात आमचे जरी स्वभाव दोन टोकाचे असले तरी त्याच्या माझ्या आवडी-निवड़ी खूप सारख्या होत्या. वाचन, निसर्ग, साइकलिंग, स्विमिंग आणि मुख्य म्हणजे दोघांनाही अभ्यासाची असलेली आवड. त्यामुळे annual मुळे झालेली ओळख पुढे मैत्रीत बदलली.


मात्र या मैत्रिने ते ख़ास वळण कधी घेतल ते मला तेव्हा समजलच नाही. खूप आवडायचा रवि मला. म्हणूनच जेव्हा त्याने प्रपोज़ केल तेव्हा मी खूप खूप खुष झाले होते. I found my Mr. Right of life! अस वाटल होत मला. पण त्याने प्रपोजल बरोबर जे  सांगितल; ते ऐकून मी हबकलेच. इथेच याच शहरात त्याच्या जॉइंट फॅमिलीमधे राहायच? मी रविला खूप खूप समजावल. माझे करियर प्लान्स त्याला माहीत होते. माझा स्वभाव.. माझे विचार... घरातल मोकळ वातावरण... माझ्या आयुष्यातले सगळेच निर्णय मी स्वतःच घेते.... सगळ सगळ माहीत असूनही त्याने अशी इच्छा ठेवावी माझ्याकडून? कस शक्य होत ते मला?

जाऊ दे! काही गोष्टी मनासारख्या होत नाहीत.... आपण स्विकारायला शिकल पाहिजे.

----------------------


बुधवार

तो....

गेले 3 दिवस त्याच वळणावर उभा आहे. मुद्दाम लवकर पोहोचतो आहे आणि जास्त वेळ थांबतो आहे. आज आईने विचारल देखिल... उशीर का होतो आहे अलीकडे म्हणून... मी डिस्टर्ब वाटलो तिला. आणि मी कायम जो विषय टाळतो; तेच नेमकं तिने विचारल. "रवि, ती भेटली की काय परत तुला?" आता काय सांगू आईला? ती माझ्या मनातून कधीच दूर गेली नव्हती मग परत भेटायचा प्रश्न येतोच कुठे? आणि प्रत्यक्ष म्हणायच तर मीच गोंधळून गेलो आहे. शनिवारी मी तिला खरच पाहिल का? गेले 3 दिवस अपेक्षेने उभा आहे पण ती परत नाही दिसली... म्हणजे भासच असावा...

ती सोडून गेली त्यावेळी देखिल असेच भास् नव्हते का होत. का केल तिने अस? आमचे स्वभाव दोन टोकाचे होते हे मान्य. पण आवडी-निवडी तर किती सारख्या होत्या. तिला वाचायला आवडायच... कित्ती भटकलो होतो आम्ही दोघे... शहरात आणि शाहराबाहेर देखिल. ती कुठेही कधीही यायची माझ्याबरोबर. कधी तिच्या वडिलांनी अडवलं नाही तिला. आईने हरकत घेण्याचा प्रश्नच नव्हता... कारण तिच्या लहानपणीच तिची आई देवाघरी गेली होती.

 त्या वेळी फ़क्त एकदाच भेटले होते तिचे वडील मला; पण तेव्हाच त्यानी मला सांगितल होत की त्यांचा त्यांच्या मुलीवर आणि तिच्या निर्णयांवर पूर्ण विश्वास होता. मी तिला लग्नासाठी विचारल होत त्या अगोदर मी तिच्या वडिलांना भेटलो होतो. त्यांच्या घरातल मोकळ वातावरण आणि आमच्या घरातल थोड़ जुन्या विचारांचा पगडा असलेल वातावरण हे तिच्यापेक्षा तिच्या वडिलांना समजेल आणि ते तिला समजावतील अस वाटल होत मला. त्यांना माहीत होत की त्यांची लेक माझ्यावर खूप प्रेम करते; पण तरीही त्यांनी मला स्पष्ट शब्दात सांगितल की ती जो निर्णय घेईल तो त्यांना मान्य असेल. ते तिला काही समजावायला किंवा ती घेईल त्या निर्णयात काही बदलायला जाणार नाहीत.


का नाही समजावल त्यांनी त्यांच्या लेकिला? माझी घालमेल... तिच्या दूर जाण्याने होणा-या यातना त्यांना कधी समजल्याच् नाही का? की ती माझ्यात कधी गुंतलीच नव्हती? आणि ते त्यांना माहित होत? आजही मी फोन केला की खूप छान बोलतात ते माझ्याशी. पण मग त्यावेळी त्यांनी असा पवित्रा का घेतला होता?

 मला मान्य आहे माझ्या आई वडिलांनी खूपच स्वच्छ आणि ठाम पवित्रा घेतला त्यावेळी. पण तिने देखिल अज्जिब्बात एकल नाही. प्रेमाखातर तरी तिने थोड़ पडत घ्यायला हव होत न!  मी नंतर सावकाश आई-बाबांना समजावल असतच न. पण तिने मला वेळच् दिला नाही. एक घाव दोन तुकडे असाच स्वभाव होता तिचा कायम.... पहिल्यापासूनच! आणि म्हणूनच जेव्हा मी तिला सांगितल की आपण आई-बाबांना हळूहळू समजाऊ निदान तोपर्यंत तरी त्यांच्या बरोबर इथे राहु.. तेव्हा तिने स्पष्ट नकार दिला. तिने कायमच मला तिची भविष्याची स्वप्न सांगितली होती. तिला परदेशात जायच होत; स्वतःच्या जीवावर! आणि म्हणूनच वडिलांची आर्थिक परिस्थिति जेमतेम आहे हे ओळखून तिने खूप मेहेनत घेतली होती शिक्षणात. कायम 1st class मिळवला. कायम स्कॉलरशिप्स मिळवल्या. सगळ सगळ मला मान्य.. पण मग करीयर म्हणजे आयुष्याच सर्वस्व कस असू शकत? आणि लग्नानंतर मी आई-बाबांची समजूत काढल्यावर त्यांनी पाठवलच असत न आम्हाला? पैशाचा प्रश्न कधी नव्हताच. का नाही तिला हे पटल कधी?



मी आजही तिची वाट पाहतो आहे... आजही बाबा ऑफिसमधे पोहोचायच्या अगोदर जाऊन मी तिचे फेसबुक अकौंट बघतो... तिचे ब्लॉग्स... तिचा यशाचा आलेख रोज पाहतो आहे. म्हणूनच तर गेल्या आठवद्यातल्या तिच्या 'back to old memories' या स्टेटसने आणि शनिवारच्या भासामुळे मी अस्वस्थ आहे.

भास्? की.....?

------------------

ती....


गेले 3 दिवस मान वर करायला वेळ मिळत नव्हता. रोज रात्रि 11 वाजून जात आहेत. बाबांना सांगितल थांबू नका जेवायला पण ते एकत नाहीत. तू किती दिवस असशील सांगता येत नाही. डिनरच्या निमित्ताने तरी भेटतेस अस म्हणून हट्टाने थांबतात. पण बर आहे... त्यामुळे तरी ऑफिस मधून निघता येत.

आज मात्र बाबांनी गुगली टाकला. "पुढे काय ठरवल आहेस बेटा?" त्यांच्या या प्रश्नाने थोड़ी गड़बडले. काही कळलच नाही अस दाखवत 'अगोदर ऑफिस सेट तर होऊ दे; मग इथेच राहायच की कंपनी परत बोस्टन ला बोलावते ते पाहू.' अस भलतच उत्तर देऊन मी विषय टाळला. बाबांना कळल. ते काहीच बोलले नाहीत. तस ते कधीच काहीच बोललेले नाहीत मला. पण मला माहीत आहे ते नक्की परत हा विषय काढणार. आजवर त्यानी कधीच माझा कुठलाही निर्णय खोडला नाही. पण अलीकडे त्यांच् वय झाल आहे आणि माझ्या भविष्याची... भविष्याची पेक्षा माझ्या लग्नाची काळजी त्यांना आहे; हे मला कळत आहे.


लग्न! आज परत एकदा त्या भुतकाळातल्या आठवणी जाग्या झाल्यात. मी रविला नाही म्हणाले आणि घरी आले. खूप खूप रडले होते त्या दिवशी बाबांच्या कुशीत शिरून. ज्याच्यावर मनापासून प्रेम केल... ज्याच्याबरोबर संपूर्ण आयुष्य जगायची स्वप्न बघितली होती; त्याला नाकारुन मी घरी परतले होते. बाबांनी आईच्या मायेने मला जवळ घेतल होत. मला कधीच आईची उणीव जाणवली नव्हती आणि त्यादिवशी देखिल मी त्यांच्या कुशीत हुंदके देऊन रडले होते. ते फ़क्त मला थोपटत राहिले.


मी पुढच्या शिक्षणासाठी परदेशात जाणार हा निर्णय मी त्यांना सांगितला तेव्हा ते रविबद्दल विचारतील अस मला वाटल होत; पण त्यांनी नाही विचारल. बस! निर्णय घेतला आणि भराभर फॉर्म्स भरून मी तडकाफडकी बोस्टन युनिवर्सिटीमध्ये अडमिशन घेऊन निघून गेले. मी पोस्ट ग्रेजुएशन नंतर तिथेच जॉब घेतला आणि सिटीझनशिप देखिल; तरीही त्यांच काहीही म्हणण नव्हत. अधुन मधुन तेच येत राहिले मला भेटायला. पण आता मला येऊन जेमतेम 10 दिवस झाले आहेत आणि मला त्यांच्या डोळ्यात अनेक प्रश्न दिसत आहेत. फार दिवस बाबांना टाळता येणार नाही हे मला लक्षात आल आहे. पाहू!

 ----------------------

बाबा....

छोकरी खरच खूप मोठी झाली. आज पहिल्यांदा तिने सरळ प्रश्नाच् उत्तर सरळ दिल नाही. तिलाही समजल आहे माझा रोख कुठे होता; पण तिने विषय टाळला. ठिक आहे. बोलेन थोड्या दिवसानी. येऊन 10 दिवस झाले आहेत पण तिने अजुन रवि बद्दल एक अवाक्षर काढलेल नाही. काय असेल तिच्या मनात? आई निराळी पोर म्हणून कायम तिचे लाड केले. जसे आणि जितके शक्य होते तसे. पण पोर पण समजुतदार आहे. कधी कुठला हट्ट नाही केला. कदाचित तिच्या बापाचा आवाका तिने लहान वयातच जोखला होता. खूप लवकर स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायला लागली. अगोदर थोड़ा त्रास झाला तिच्या अशा लवकर स्वतंत्र होण्याचा. पण ती तिच्या आईसारखी आहे; हे लक्षात आल आणि शांत झालो. तिचे विचार खूप स्वच्छ असतात हे मी बघितल आहे. मुख्य म्हणजे एकदा घेतलेला निर्णय ती कधीच बदलणार नाही; याची मला पूर्ण कल्पना आहे. त्यामुळे मी कधी प्रयत्न देखिल केला नाही तिचे निर्णय बदलायचा. अर्थात तिने कधी चुकीचा मार्ग नाही घेतला... पण तरीही ज्या दिवशी ती रविला नकार देऊन घरी आली होती त्यादिवसशी तिला समजावायची खूप इच्छा झाली होती; की अस स्थळ शोधून सापडणार नाही. साठे इंडस्ट्रीजच नाव खूप मोठ आहे. तुला परदेशात जायचच आहे तर लग्नानंतर थोड्या दिवसांनी रविबरोबर जाशीलच... रविने मला मुद्दाम अगोदर भेटून हे सांगितल होत. पण मी माझ्या लेकीला चांगलच ओळखतो. तिच्या स्वाभिमानी स्वभावाला हे कधीच पटल नसत... आणि म्हणूनच ओठांपर्यंत आलेले शब्द गिळून मी तिला फ़क्त थोपटत राहिलो.


आज तिने तिला जे हव ते मिळवल आहे आणि त्याच समाधान तिच्या डोळ्यात दिसत आहे मला. पण या सगळ्या धावपळीत ती काहीतरी खूप महत्वाच् मिस करते आहे... अस माझ मत आहे. 

आजही रवि मला फोन करतो. कधीतरी भेटूनही जातो. सांगू का तिला की त्याने अजूनही लग्न केलेले नाही. तिची वाट पहातो आहे तो. काय आहे हिच्या मनात? एकटयाने संपूर्ण आयुष्य जगण अवघड असत. आप बिती तिला कशी समजाऊ... हम्... येत्या काही दिवसात बोलल पाहिजे परत एकदा.

--------------


शनिवार

ती...

आज खूप दिवसानी निवांत वेळ मिळाला आणि परत त्या बागेतल्या बाकावर जाऊन बसले. तेच जूने दिवस आठवत होते. आयुष्य किती वेगळ होत. त्यावेळी कितीतरी स्वप्न होती मनात. आज मी खरच समाधानी आहे. मी जे ठरवल होत ते मी मिळवल आहे.... स्वमेहिनतीने! काहीतरी सुटत गेल या धावपळीत... मान्य आहे! जर रविशी लग्न केल असत तर आज आहे त्यापेक्षा जास्त आरामाच आयुष्य असत. पण ते माझ नसत... ते आयुष्य मिसेस रवि साठेच असत. मला माझ्यातली 'मी' शोधायची होती. आज ती गवसली आहे. आज मी खूप खुप समाधानी आहे.

आज मी बाबांच्या प्रश्नाच उत्तर द्यायला तयार आहे! --

--------------------

तो....

ती तिच आहे... इथे आली आहे. कायमची असेल का? आज पाहिल तिला त्याच बाकावर! निवांत चणे खात बसली होती. माझा विचार करत असेल का ती कधीतरी? जाऊ का समोर तिच्या? सांगू का की मी अजूनही तिचीच वाट पहातो आहे?

त्यादिवशी मी तिला प्रपोज़ केल तेव्हा ती किती खुष होती. मला तर आभाळ दोन बोट उरल होत. पण मग जेव्हा मी तिला आई-बाबांची इच्छा सांगितली तेव्हा ती अगोदर एकदम गप्प झाली. आणि मग सतत तिचे प्लान्स सांगत आणि मला समजावत राहिली. अगदी मला राग येईपर्यंत.  मी काही तिला तिचे प्लान्स बदलायला सांगत नव्हतो. फ़क्त थोड्या दिवसांसाठी पुढे ढकलुया अस म्हणण होत माझ. पण तिने ठामपणे नाही म्हंटल. शेवटी 'रवि माझे विचार आणि प्लान्स माहीत असूनही तू अस बोलतो आहेस याचच वाईट वाटत;' अस म्हणून ती उठली आणि मी काही बोलायच्या आत निघुनही गेली. मी सुन्न होऊन बसलो. त्यानंतर ती कधीच भेटली नाही. मला माहीत होत तिने पुढच्या कोर्सचे पेपर्स फॉरवर्ड केले आहेत, पण ती इतक्या झटपट निर्णय घेईल आणि निघुन जाईल अस वाटल नाही. मी सावरून तिला भेटण्याचा-बोलण्याचा प्रयत्न केला तोवर ती निघुनही गेली होती.

तो दिवस आणि आज.... किती वेडापिसा झालो होतो मी तिच्यासाठी. ते depression चे दिवस आठवले तरी आजही अंगावर काटा येतो. आईचं सतत लग्नासाठी मागे लागण आणि माझ तिच्या आठवाणींमधे जगण.... पण मग डँड मधे पडले आणि त्यांनी स्पष्ट सांगितल की यापुढे रवि जोपर्यंत स्वतःहुन बोलत नाही तोपर्यंत त्याच लग्न हा विषय संपला.

आज 10 वर्ष झाली... पण त्यानंतर कधीच कोणीही मला माझ्या लग्नाबद्दल विचारल नाही आणि माझ्या मनात देखील तो विषय कधी आला नाही.


आज मात्र तिला बघितल आणि परत आशा पल्वलित झाल्या. आज बाबांना गाठलच्. ते म्हणाले आहेत की त्यांच्याही मनात तिच्याकडे तिच्या लग्नाचा विषय काढायचा अस आहे आणि ते आजच तिच्याशी बोलणार आहेत. त्यांनी मला उद्या संध्याकाळी बोलावल आहे.


देवा! बस ती हो म्हणू दे आता! Waiting for tomorrow evening...

-----------------------------

बाबा...

थोड़ी लवकर आली आज. म्हणाली जुन्या बागेत गेली होती. पण डिस्टर्ब नाही वाटली. उलट खुश होती. जेवताना मुद्दाम स्पष्ट लग्नाचा विषय काढला मी... तिने टाळाटाळ देखिल केली नाही. म्हणाली 'मला देखिल तुमच्याशी या विषयावर बोलायच आहे.  बाबा आता मी लग्नाला पूर्ण तयार आहे. मला मान्य आहे माझ्या बरोबरीच्या मुलींच्या पेक्षा माझ लग्न उशिरा होईल पण मला त्यात वावग काहीच वाटत नाही. कारण आज मी पूर्ण समाधानी आहे. माझ्या मनात माझ करियर कस असाव याच चित्र होत, ते पूर्ण झाल आहे... त्यामुळे आता मी लग्न करून संसारात रामणार आहे.'

 तिला मी उद्या घरीच थांबायला संगीतल आहे. तिने कारण नाही विचारल. म्हणाली 'मलाही तुमच्याशी बोलायच आहे.' कदाचित् परत जाण्याचा विचार असेल का? कोण जाणे! मात्र उद्या रवि येणार आहे संध्याकाळी. मीच बोलावल आहे त्याला. दोघांनी समोर बसून बोलाव अशी माझी इच्छा आहे. तिला मात्र तो येतो आहे याची कल्पना नाही दिलेली.  तिचा बाप असूनही तिच्या मनातल ओळखण मला कधी जमलच नाही. पण तिने घरी थांबायच कबूल केल आहे. बाकी उद्याच् उद्या पाहू.

-------------------


............रविवार संध्याकाळ. 4 ची वेळ. बाबा थोड़े अस्वस्थ होते. तिचा स्पष्ट आणि थोडा हट्टी स्वभाव ते जाणून होते. त्यामुळे अचानक रविला तिच्या समोर उभ करून ते चूक नाही न करत आहेत या विचारात ते सकाळपासून होते. पण आज तिचा मूड सकाळपासूनच छान होता. कित्ती तरी दिवसानी ती आज गाणं गुणगुणत होती. कितीतरी दिवसानी संपूर्ण स्वयंपाक तिने स्वतः केला होता आणि आत्तासुद्धा तिची स्वयंपाक घरात काहीतरी खुडबुड़ चालु होती. त्यामुळे तेसुद्धा relaxed मूड मधे होते.


"बाबा" अचानक तिने हाक मारली. "मी कोथिंबीर वड़ी केली आहे. येऊन बघता का नीट जमली आहे का?" बाबा तिच्या उत्साही आवाजाने खुश झाले. स्वयंपाक घराकडे जातच होते तेवढ्यात बेल वाजली.

"मी बघते. तुम्ही चव बघा न." ती म्हणाली. आणि बाबा काही म्हणायच्या आत तिने दरवाजा उघडला. दारात रवि होता. बाबा आत जाताना थबकले. ती देखिल स्तब्ध झाली होती. रविची नजर तिच्या   चेह-यावर खिळली होती. ती मिनीटभराने भानावर आली आणि दारातून बाजूला झाली; रविला आत येण्यासाठी मार्ग मोकळा व्हावा म्हणून.


बाबांनी रविचे हसून स्वागत केले. "ये रवि. कितीतरी दिवसानी दिसतो आहेस. कसा आहेस?" " मी मजेत बाबा." रवि म्हणाला आणि सोफ्यावर बसला. ती देखिल तिथेच सॉफ्यावर बसली होती. शांत हसरा चेहेरा होता तिचा. सगळेच थोड़े अवघडले होते. शेवटी तिनेच पेच सोडवला. "कसा आहेस रवि? कितीतरी वर्षानी दिसतो आहेस.  काय करतोस आजकाल?" तिने विचारले. "जगतो आहे! तुला माहित आहेच की बाबांचा गारमेंट्स एक्स्पोर्टचा व्यवसाय होता. मी त्याना त्यांच्या ऑफिस जातो. आता वयापरत्वे त्याना झेपत नाही. त्यामुळे आता तर संपूर्ण business मिच बघतो. ते फ़क्त सकाळी 2 तास येतात. माझ राहुदे ग! तू सांग... बाकी तू कशी आहेस?" त्याने उत्तर दिल.



"Am on the top of the world. Have achieved everything that i had dreamed. हव तस शिक्षण आणि मग best नोकरी. Am really very happy and satisfied. Now is the time to take a break and think of future in a different way."

 
"मग काय ठरवल आहेस बेटा? खर सांगू मीच आज रविला बोलावल आहे. तुमच्याशी दोघांशी एकाच वेळी बोलावे अस ठरवल आहे मी." तिचा उत्साही आवाज एकून बाबा म्हणाले.


तिने मात्र आश्चर्य वाटून विचारल; "बाबा, आमच्याशी एकाच वेळी बोलाण्यासारख काय आहे?"


रविने तिच्याकडे चमकून पाहिल. "मी अजुन लग्न नाही केलेल. तुझे फेसबुक updates, तुझे ब्लॉग्स, तुझ्या achievements... तुझ्या आयुष्यात घडणारी प्रत्येक गोष्ट मी उत्सुकतेने रोज वाचतो. आणि तरीही तुला अस वाटत नाही की आपण दोघांनी एकदा भेटल पाहिजे? बोलल पाहिजे?" रविने काकुळतिला येऊन विचारल.


"आता इतक्या वर्षांनंतर आपण का भेटाव? का बोलाव? आणि तू आता तुझ्या आयुष्यात काय करतोस ते मला का माहीत असेल?" तिने रविकडे वळुन विचारल.


"अग! का म्हणून काय विचारतेस. माझ तुझ्यावर प्रेम होत आणि अजूनही आहे. अगदी मनापासून. तू अचानक मला न सांगता निघुन गेलीस. नंतर कोणताही contact देखिल ठेवला नाहीस. मला मान्य आहे की तुझे प्लान्स खूप क्लियर होते. तुला परदेशात शिकायला जायच होत. तिथे नोकरी करून स्वतःला सिद्ध करायच होत. अग, पण लग्नानंतर देखील आपण जाऊ शकलो असतोच न. दोघेही एकत्र. मला हे देखिल मान्य आहे की माझे आई-वडील तेव्हा तयार नव्हते माझ्या परदेशात जाण्याला. त्यांना घर सांभाळणारी, सुंदर, सुशिक्षित अशी त्यांच्या नियमांमध्ये बसणारी सुन हवी होती.   ते थोड़े जुन्या विचारांचे आहेत मान्य; पण दुष्ट नाहीत. मी त्यांना समजावल असत. आणि एक-दोन वर्षात ते तयार देखिल झाले असते. पण तू मला थोड़ा देखिल वेळ दिला नाहीस. अचानक निघुन गेलीस मला न सांगता. परत कधी वळूनही बघितल नाहीस तू. प्रेम केल होतस न माझ्यावर? मग कधी वाटल नाही मी जगलो की मेलो ते बघाव? तू अशी कशी अचानक निघुन गेलीस? मी तुझ्यासाठी वेडापिसा झालो. सुरवातीला आईने माझ लग्न लावायचा खूप प्रयत्न केला. पण मी माझ्या निर्णयावर ठाम होतो. मी एवढ्यात लग्न करणार नाही; हा विषय परत काढायचा नाही.. अस मी घरात ठामपणे सांगितल. तुला माहीत नाही, but i faced serious depression syndromes too. Was on medication for nearly a year. सतत तुझाच विचार. M. B. A. करणार होतो, पण अभ्यासात कधी लक्षच लागल नाही. मला विश्वास होता की तू परत येशिल एक दिवस. माझी तपश्चर्या नक्की फळाला येईल एक दिवस. मी नेहमी तुझ्या बाबांच्या contact मधे होतो. कायम फ़क्त तुझ्याबदद्लच प्रश्न! ती कशी आहे? कधी येणार आहे? माझ्याबद्दल कधी काही विचारते का? गेली 10 वर्ष फ़क्त आणि फ़क्त तुझाच विचार केला आहे. श्वास घेतो म्हणून जगतो आहे एवढच. ध्यानिमनि फ़क्त तूच असतेस. business सेट आहे... तो नीट चालवतो आहे... त्यामुळे बाबा काही म्हणत नाहीत. पण आता तू आली आहेस.. तूच म्हणालीस आत्ता की तुला आयुष्यात जे achieve करायच होत ते केल आहेस. मग आता तर आपल्या लग्नाला काही प्रोब्लेम नाही न? तू हो म्हणालीस तर मी आई-बाबांशी बोलेन. ते आता नाही म्हणणार नाहीत. आता बस हो म्हण आणि माझ्या 10 वर्षांच्या तपश्च् र्येच फळ माझ्या पदरात घाल." रवि काकुळतीला येऊन बोलत होता, तो थांबला.


 ती स्तब्ध होती. शांत होती. कोणतीही reaction तिच्या चेहे-यावर नव्हती.

"बेटा, बोल न काहीतरी. तो बोलतो आहे ते खर आहे. तो खरच गेली 10 वर्ष तुझी वाट पाहतो आहे. आठवद्यातुन एकदा तरी तो मला फोन करून तुझ्याबद्दल बोलायचा.. सगळ मान्य आहे मला. पण मला तुझ्या मनात काय आहे ते जाणून घ्यायच आहे. आजही जरी मीच त्याला बोलावलं असलं तरी मी कायम तुझ्या निर्णयात तूझ्या बरोबर आहे, हा विश्वास ठेव." बाबा तिच्या डोक्यावरुन हात फिरवत म्हणाले.

तिच्या डोळ्यात टचकन पाणि उभ राहील. "खूप त्रास दिला न बाबा मी तुम्हाला? खरच तुम्ही कायम माझ्या निर्णयात माझ्या बाजूने ठाम उभे राहिलात." ती म्हणाली.

 "बेटा, तुझी आईसुद्धा अशीच ठाम होती ग. विचारी, करियर घडवायची इच्छा असलेली, शांत! माझ शिक्षण ... मी आयुष्यभर केलेली नोकरी... सर्वकाही तिच्यामुळे. माझे असे काही आयुष्याचे प्लान्स नव्हतेच्. तिच्यावर प्रेम केल बस. तिने मात्र सगळ कस छान ठरवून केल होत. तू 14 वर्षाची असताना.. तुझ्या नववित.. ती अचानक साधा ताप येण्याच्या निमित्ताने गेली; आणि मी मोडून पडलो. त्यानंतर मी अनेक वर्ष माझ्याच दुःखात होतो. आणि तू ठामपणे तुझ्या आयुष्याचा दोर धरून पुढे जात होतिस. मी तुझ्या पाठीशी उभा आहे अस आपल् म्हणायच. खर तर मी तुझ्या आईसारखा... तुझ्यासारखा strong minded नाही, हे सत्य आहे. त्यामुळे ती गेली आणि मी मनाने कमकुवत झालो. मग तुझ्यात तुझ्या आईला शोधत राहिलो. म्हणूनच कदाचित् रविमधे मी स्वतःला बघतो ग. आणि म्हणूनच मी जरी आज रविला इथे बोलावल असल तरी तू जो निर्णय घेशील तो योग्य असेल असा माझा विश्वास आहे. Am always with u बेटा." बाबा म्हणाले.


ती बाबांचा हात हातात घेऊन हसली. ती काहीतरी बोलणार तेवढ्यात बेल वाजली. तिने पुढे होऊन दार उघडल. दारात एक स्मार्ट दिसणारा पुरुष उभा होता.


"हाय! come in भास्कर." आणि ती बाबांकडे वळत म्हणाली, "बाबा हा तुमचा होणारा जावई आहे."


"आज मी मुद्दाम त्याला इथे बोलावल आहे. मला खात्री होती की तुम्ही माझ्या लग्नाचा विषय काढणार आज. म्हणूनच मी भास्करला बोलावून घेतल. मात्र रवि येईल अस वाटल नव्हत. रवि... मला माहीत आहे तुझ्या मनात खूप प्रश्न असतील. आज तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मी देते. माझ खरच तुझ्यावर खूप प्रेम होत. पण त्याहुनही जास्त मला माझा आत्मसन्मान मोठा होता आणि आहे. तू म्हणतोस की तु तुझ्या आई-वडीलांना समजावल असतस आणि ते तयार देखील झाले असते आपल्या लग्नाला आणि कदाचित् पुढे आपण परदेशात जाऊ त्या गोष्टीला, मान्य! ते दुष्ट आहेत अस माझ म्हणण मुळीच नाही. पण मग त्यांनी आयुष्यभर मला हे जाणवून दिल असत की केवळ त्यांच्यामुळे मी माझ स्वप्न पूर्ण करू शकले. माझ्यासारख्या स्वाभिमानी मुलीला हे कधीच मान्य झाल नसत. अरे मी माझ संपूर्ण शिक्षण स्कोलरशिप्स मिळवून केल; माझ्या बाबांना देखील कधी माझ्या शिक्षणाचा खर्च करू दिला नाही; मग मी तुझ्या पालकांकडून काही घेतल असत का? आणि माझा हा independent स्वभाव तुझ्या घरातल्याना झेपला असता का? मी तुला न सांगता गेले अस म्हणतो आहेस. पण तुला चांगलच माहीत होत की मी पुढच्या शिक्षणासाठी परदेशात जाणार होते आणि त्याची तयारी करत होते. तू मला प्रपोज़ करायची घाई केलीस. आणि त्यात तू तुझ्या अटी सांगितल्यास. मी तुला त्यावेळी देखील म्हणाले होते की आपण अजुन थांबू आणि विचार करुया. पण तू एकायलाच तयार नव्हतास. माझ तुझ्यावर प्रेम होत रवि, पण प्रेमाचा हक्क आणि possessiveness यातला फरक तुला कधी समजलाच नाही. आणि आजही तू मला तुझी तपश्चर्या... तुझ वाट पहाण.. सांगतो आहेस; यातही मला मी कुठेच् दिसत नाही. जर आजही आपण लग्न केलं तर  गेली १० वर्ष तुझ माझ्यासाठी थांबण... तुझ दुःख.... या pressure खाली मी जगायच? मला हे अमान्य आहे. तो माझा स्वभाव नाही रवि. Infact रवि तुला मी कधीच समजले नाही. तू कायम तुझ्या विश्वात जगलास. तू म्हणतोस मी तुझ विश्व आहे; but the fact according to me is,am just a small part of ur world.



 हा भास्कर. तुला आठवतो का हा? आपल्या कॉलेज मधे नव्हता. पण प्रत्येक डिबेट कॉम्पिटिशन मधे त्याच्या कॉलेज मधून असायचा. आम्ही अनेकदा गप्पा मारायचो. नंतर कॉलेज संपल, आणि मी परदेशात शिक्षणासाठी गेले तरी आमचा संपर्क काही ना काही कारणांनी होता. कायम एकमेकांचे updates आम्ही एकमेकांना द्यायचो. गप्पा व्हायच्या त्यादेखिल करियर आणि काम आणि अशा विषयांच्या. आणि मग माझ्या लक्षात येत गेल की जरी मला तू आवड़ायचास आणि आपल्या आवडी-निवडी सारख्या होत्या तरी आपले स्वभाव खूप वेगळे होते. पण आयुष्य जगताना स्वभाव जुळण जास्त आवश्यक असत हे मला भास्करला भेटल्यानंतर लक्षात आल. आपल्या दोघांच्या आयुष्याकडून अपेक्षा देखिल वेगळ्या होत्या. मी तुला दोष नाही देत रवि. कस जगाव हां प्रत्येकाचा आपापला choice असतो. तू खूप भावनिक आहेस, मी तुझ्यासाखी नाही. U always made me feel special. But that feeling never remains forever. Eventually आपले खूप खटके उड़ाले असते. I respect that u really waited for me. But according to me... आयुष्य कधी थांबत नाही. also life can't b lived under any pressure. आपल कधी जमल नसत रवि. Am really very sorry for everything. पण मी शिक्षणासाठी हा देश सोडला तेव्हा सर्वच मागे सोडून गेले. आणि तू अजूनही 10 वर्षांपूर्वीच्या दिवसांमधे अडकला आहेस. इथेच आपल्या दोघांच्या स्वभावातला फरक लक्षात येतो.  I see my  future with Bhaskar."

ती बोलायची थांबली आणि रवि भानावर आला. सर्वकाही समजल्या सारख त्याने मान हलवली.

"तुझ खर आहे. We always lived in different worlds. I agree." तो म्हणाला.

  "All the best Bhaskar. U have got the world's best lady in ur life. All the best to both of u." रवीने तिच्याकडे बघितल. पण तिच लक्ष भास्करकडे होत. तिच्या चेहेऱ्यावर शांत आणि समाधानी हसू होत. ते पाहून रविच्या लक्षात आल की ती कधीच त्याच्यातून बाहेर पडली होती. त्याने स्वतःला अडकवून... बांधून ठेवाल होत. मात्र आज त्याने सत्य स्वीकारलं आणि आपली पावल बाहेरच्या दिशेने वाळवली.



------------------समाप्त-------------------------







































2 comments:

  1. खूपच छान....खिळवून ठेवल. वरकरणी साम्य असूनही दोन भिन्न व्यक्तींच्या स्वभावाचे पैलू छान उलगडत नेले... मस्तच

    ReplyDelete
  2. खूप खूप धन्यवाद

    ReplyDelete