Friday, February 14, 2020

दुरून डोंगर साजरे 

दुरून डोंगर साजरे


अनंत आणि त्याची पत्नी अनन्या लग्नाचा पंधरावा वर्धापन दिन साजरा करायला न्यूझीलंडला गेले होते. एक चर्च बघायला गेले असताना साधारण त्यांच्याच वयाचं एक जोडपं त्यांना तिथे भेटलं. सहज गप्पा सुरू झाल्या; त्यात त्या परदेशी जोडप्याने सांगितलं की हे दोघांचंही दुसरं लग्न आहे आणि अफेअर्स त्यांनी फार लक्षात ठेवली नाहीत. अनंतने कौतुकाने सांगितलं की त्यांच्या लग्नाला पंधरा वर्ष झाली आहेत आणि लग्ना अगोदर चार वर्ष त्याची पत्नीच त्याची प्रेयसी होती. हे ऐकून ते परदेशी जोडपं काहीसं गोंधळल.

"Are you serious? You mean you both are styaing together for last ninteen years?"

"No! We know each other for last ninteen years. But we started staying together after we got married."

"How many kids you have? Do they stay with you?"

"We have two kids and of course they both stay with us. Infact we stay with my parents and our kids in one home."

"Good loard! That's a remarkable lifestyle!"

"I don't think so. That's a very normal and happily accepted lifestyle in India." अनंत अभिमानाने म्हणाला.

काहीवेळ गप्पा मारून दोन्ही जोडपी आपापल्या मार्गाने गेली. ते दोघे परत आल्यानंतर एकदा अनन्यायची मैत्रीण अजिता त्यांच्याकडे गेली असताना अनन्याने तिला ही घटना सांगितली. अजिता म्हणाली; "खरंच आहे न ग! आपल्याकडे कुटुंब म्हंटल की अजूनही आजी-आजोबा, आई-वडील आणि नातवंड हेच डोळ्यासमोर येतं. पूर्वी आई-वडील, दोन भावंड आणि त्यांचं कुटुंब असं असायचं; आता मात्र दोन भाऊ वेगळे राहातात."

अनन्या म्हणाली; "हे सगळं मला माहीत नाही का? माझी हरकत वेगळीच आहे. हा म्हणाला 'happily accepted lifestyle'.... कशावरून ग मी ही कुटुंब व्यवस्था happily स्वीकारली आहे?"

अजिता थोडीशी गोंधळली. कारण अनन्याची सासू तशी बरीच active होती. दोघींचं भांडण झालेलं कधी ऐकलं नव्हतं. थोडे मान-अपमान असायचे... पण अनन्यानेच अनेकदा म्हंटल होत की एकत्र असलं की भांड्याला भांड लागणारच. ते ना मी धरून बसत ना त्या. मग तिने हे असं अचानक का म्हणावं ते अजिताला कळलंच नाही. अजिता तिच्याकडे प्रश्नर्थक नजरेने बघितलं. अनन्या म्हणाली,"अग, आमच्यात काहीच प्रश्न नाहीत आता. उलट बरीचशी सवय झाली आहे. त्या कुठे आणि कधी कसं बोलतील हे मला माहीत असतं; आणि माझे शालजोडीतले त्यांना देखील कळतात. सवय झाली आहे आम्हाला एकमेकींची. पण खरं सांगू? नवीन लग्न झालं तेव्हा अनेकदा काही गोष्टी अजिबात पटायच्या नाहीत. पण तसं बघितलं तर त्या गोष्टी इतक्या शुल्लक असायच्या की ते विषय धरून ठेवले असते तर इतर अनेक गोष्टींमध्ये अडचण आली असती म्हणुन गप्प बसायचे."

तिचं बोलणं अजूनही अजिताच्या लक्षात येत नव्हतं. ती म्हणाली; "ऐ काय ते स्पष्ट सांग. हे तुझं कोड्यात बोलणं मला कळत नाही."

त्यावर अनन्या म्हणाली, "अग, मी लग्न करायच्या अगोदरच सांगितलं होतं की मी नोकरी कायम करणार आहे. सासूबाई फारच उत्साही होत्या. त्यामुळे त्यांची कधीच हरकत नव्हती माझ्या नोकरीला. रोज नवऱ्याच्या बरोबरीने त्या माझा डबासुद्धा भरायच्या. पण मग दर रविवारी किंवा कोणत्याही सुट्टीच्या दिवशी स्वयंपाकघराची सगळी जवाबदारी माझी असायची. त्यातच एप्रिल-मे मध्ये तिखट-हळद भरणे, गोडा-गरम मसाला करून ठेवणे ही कामं सुट्टीच्या दिवशी असायची. मला खूपदा वाटायचं ग की हे सगळे पदार्थ विकत आणावेत..... सुट्टीच्या दिवशी आरामात उठावं.... नवऱ्याबरोबर बाहेर जावं..... कधीतरी जीन्स आणि टॉप किंवा शॉर्ट वन पीस घालावा..... पण हे कधीच करता आलं नाही. तुझं बरं होतं. तू कायमच वेगळी राहिलास आणि हवं तसं जगलीस."

"अग, पण तुम्ही तर तुमच्या ऑफिस मधल्या पिकनिक्सना नेहेमी जायचात की. जोडप्याने जायचात. तू माझ्याकडे येऊन जीन्स आणि टॉप घालून जयचीस. आठवत न? तुझी मुलं देखील तुझी सासू सांभाळायची त्यावेळी. विसरलीस की काय?" अजिता म्हणाली.

"हो. अगदी शंभर टक्के मान्य! म्हणून तर म्हंटल की विषय शुल्लकच होते; त्यामुळे त्यावरून वाद-भांडण करावंसं वाटलंच नाही. अग, पण एखाद्या सुट्टीच्या दिवशी मला फक्त आम्ही दोघांनी बाहेर भटकायला जावं असं फार वाटायचं ग. मात्र फक्त आम्ही दोघेच गेलो तर आईला काय वाटेल? ती कायम घरात असते आणि आपण कामाच्या निमित्ताने बाहेर.... असं म्हणून सुरवातीला याने ते टाळलं.... मग मुलं झाल्यावर मुलांबरोबर अगदी नेमाने जायचो. पण ते दोघांनी हातात हात घालून भटकणं मी नाही कधी अनुभवलं. एक अजून सांगू? मी कधीच आळसावलेली सकाळ माझ्याच घरात नाही अनुभवली." अनन्या म्हणाली.

"अग, पण मग आता कर न हवा तितका आळशीपणा. आता तर तुम्ही चोवीस तासासाठी कामाला बाई ठेवली आहे. त्याव्यतिरिक्त स्वयंपाकाला बाई........." अजिता म्हणाली. तिला थांबवत अनन्या म्हणाली,"अग, आता सगळंच मी बघते. त्यामुळे साठवणीचे पदार्थ विकत, चोवीस तास बाई असली सुखं आहेत. मुलं आता आपलं आपण सगळं करतात. गेल्याच वर्षी मला चांगली पोस्ट मिळाली आणि पगार देखील वाढला आहे. अनंत देखील चांगलं कमावतो आहे. तसं म्हंटल तर आता सगळी सुखं हात जोडून समोर उभी आहेत. पण त्या वयातली ती काहीशी वेडी स्वप्न हरवली आहेत ग.... आणि आता कितीही पैसे दिले न तरी ना ते वय परत येणार आहे; ना त्यातलं थ्रिल." काहीशी उसासत अनन्या म्हणाली. अजिताला तिचं म्हणणं पटत होतं देखील आणि नाही देखील.

गम्मत अशी होती की अजिताला अनन्याच्या आयुष्याबद्दल कायम हेवा वाटत आला होता. अजिता लग्नाच्या पहिल्या दिवसापासून वेगळी राहिली होती. लग्न करतानाची तिची तीच तर अट होती. ती मोकळ्या वातावरणात वाढलेली मुलगी होती. त्यामुळे तिला एकत्रित कुटुंब नको होतं. वेगळं घर असल्यामुळे अजिताला मनाला येईल तस वागता यायचं. कधीही उठावं... मित्र-मैत्रिणींना कधीही बोलावता यायचं. उशिराची जागरणं आणि हवा तसा आळशीपणा. पण वेगळ्या घराबरोबर सगळ्याच जवाबदऱ्या देखील आल्या होत्या. सगळी बिले वेळेत भरली गेली की नाही ते बघणं. घर कामाची बाई आली नाही की एकटीने सगळं काम उरकणं. हे तर करावं लागायचं; पण स्वप्नालीच्या जन्मानंतर तर अनेकदा खूपच तारांबळ उडून जायची. तिचा नवरा केशव खूप मदत करायचा. तरीही अजिताची ओढाताण व्हायचीच. मुख्य म्हणजे स्वप्नाली जर आजारी असली आणि महत्वाच्या कामांमुळे दोघांनाही सुट्टी घेणं शक्य नसलं की आजारी स्वप्नाली तशीच डे-केअरमध्ये सोडली जायची. त्याची टोचणी अजूनही अजिताची मनाला होती. खर तर या अडचणींमुळेच केशव आणि अजिताने एकच बाळ पुरे असा निर्णय घेतला होता.

त्यामुळे अजिताला नेहेमीच वाटत आलं होतं की अनन्या तिच्यापेक्षा कितीतरी सुखी आहे. तिची मुलं सांभाळायला सासू आहे. अनन्या कधीही कुठेही फिरायला जाऊ शकते. काहीच बंधनं नाहीत तिला.

आज मात्र अनन्याच्या घरून बाहेर पडताना अजिताला मनात हसायला येत होत. अजिताला अनन्याच्या आयुष्याचा हेवा वाटत आला होता आणि अनन्याला मात्र कायम अजिताच आयुष्य हवस वाटलं होतं. दोघींनाही एकमेकींचे डोंगर दुरून साजरे वाटले होते.

4 comments:

  1. आहो पुस्तक लिहा आता 👌👌👌

    ReplyDelete
    Replies
    1. एक लिहिलं आहेच. परत एकदा पुस्तक लिहिण्यापेक्षा ब्लॉग बरा अस वाटतं

      Delete
  2. छान वाटले वाचून.. आपण सर्व जणी अश्या अनुभवातून जगलो. दुरून डोंगर साजरे हे खरंय.

    ReplyDelete