Friday, January 28, 2022

अनाहत सत्य (भाग 9)

 अनाहत सत्य



भाग 9

सकाळी संस्कृती उठली तर तिच्या लक्षात आलं की नैना खोलीमध्ये नाही आहे. रात्री देखील संस्कृतीला झोप लागेपर्यंत नैना समोर दोन मोठी पुस्तकं उघडून ठेऊन काहीतरी वाचत होती; हे संस्कृतीने बघितलं होतं. आपण दिलेल्या श्लोकांचा शोध नैना घेते आहे हे देखिल तिच्या लक्षात आलं होतं. पण नैना 'अर्थ सांगते'; म्हणाली आहे तर नक्की सांगेल याची खात्री असल्याने आणि प्रचंड झोप येत असल्याने संस्कृती झोपून गेली होती.

आपलं सगळं आवरून संस्कृती बाहेर पडली तर गोविंद, जस्सी आणि शेषा तिची वाट बघत होस्टेलच्या गेटजवळ उभे असलेले तिला दिसले. त्यांना बघून तिला खूप हसायला आलं.

"काय रे रात्रभर इथेच होतात की काय? मी तर बाबा मस्त झोपले होते. आत्ता उठून आवरून बाहेर पडते आहे. यार, जाम भूक लागली आहे. चला न... कुठेतरी काहीतरी खायला जाऊ या. मिसळ खायची का? कितीतरी दिवसात मिसळ नाही मिळालेली. त्यामुळे एकदम पोटात खड्डा पडल्यासारखं वाटतंय." त्यांच्या जवळ येत अगदी सहज आवाजात संस्कृती म्हणाली.

ती फोटोमधल्या स्क्रिप्ट बद्दल काहीच बोलत नाही हे बघून तिघेही वैतागले. गोविंदने तिचे दोन्ही खांदे धरले आणि म्हणाला; "ए, उगाच नाटक करू नकोस हं. काय म्हणाली ती नैना त्या फोटोंबद्दल? सकाळपासून आम्ही इथे उभे आहोत. तू मात्र एकदम निवांत येते आहेस. जस्सी इथे पोहोचला तर त्याला नैना कॉलेजच्या दिशेने जाताना दिसली होती. पण उगाच तिच्या मागे जाऊन तिला संशय येईल असं वागायला नको म्हणून तो इथेच थांबला. तसही आम्ही इथेच भेटायचं ठरवलं होतं."

"तुम्ही ठरवलं होतं नं? मग भेटा की एकमेकांना. मी निघते." अजूनही संस्कृती थट्टेच्या मूडमध्ये होती.

"ए पकवू नकोस ग. सांग न काय म्हणाली नैना. आम्हाला खूप उत्सुकता लागली आहे. अर्थ सांगायला तयार झाली का नैना? मुळात तिला ती स्क्रिप्ट कळते का? काही बोलली की नाही ती घुमी नागीण?" जस्सी म्हणाला. त्याच्याकडे बघत संस्कृती म्हणाली; "जस्सी, नागीण? इतकी वाईट आहे का रे ती?" त्यावर एकदम सावरून घेत तो म्हणाला; "अग तसं नाही ग! पण बघ न... एकदम बारीक आणि खूप जास्त उंच आहे ती. सतत काळे कपडे; घट्ट वर बांधलेली वेणी; डोळ्यात काळं काजळ असा पेहेराव असतो तिचा. हातावर एक काय तो काळ्या रंगाचा जाडा दोरा आहे. कोणाशीही आपणहून बोलत नाही. कोणी समोरून बोलायला लागलं तर मोठे डोळे अजून मोठे करत फक्त निरखून बघत बसते. उत्तर तर कधीच देत नाही. एकदम गूढ वाटते यार ती. त्यामुळे सगळे मुलगे तिला नागीण म्हणतात." त्याच्याकडे बघत शांतपणे हसत संस्कृती म्हणाली; "माहीत आहे मला सगळे मुलगे तिला नागीण म्हणतात ते. अरे तुम्ही मुलं तर ठीक... मी तिच्या सोबत एकच रूममध्ये राहाते तर अनेक मुली मला विचारतात कसं जमतं मला. पण खरं सांगू का? तिचं आणि माझं पहिल्या दिवसापासून जमतं. सुरवातीला तिने मला थोडं हे कर - ते करू नकोस असं सांगायचा प्रयत्न केला. पण मग मी तिचं ऐकत नाही हे लक्षात आल्यावर तिने मला काही सांगायचं सोडून दिलं. हळूहळू मैत्री झाली आमची. त्यात तिचा पी. एच. डी. चा विषय माझा पण लाडका असल्याने आमचे गप्पांचे विषय एकच असतात. इतरांना ती थोडी खडूस, अबोल, शिष्ठ वाटत असेल; पण माझ्याशी ती मोठ्या बहिणीसारखी आहे. म्हणून तर मला खात्री आहे ती त्या श्लोकांचा अर्थ मला नक्की सांगेल. काल ती आपणहून म्हणाली की तिला लायब्ररीमध्ये जाऊन काही पुस्तकं बघावी लागतील. पण मुळात तिला ती स्क्रिप्ट माहीत आहे; त्यामुळे अर्ध काम झालंय."

संस्कृतीने दिलेली माहिती ऐकून जस्सी आणि शेषा खुश झाले. चौघेही त्यांच्या नेहेमीच्या उडप्याकडे नाश्ता करायला गेले. जस्सी आणि शेषा थोडं पुढे चालत होते ती संधी साधून गोविंदने संस्कृतीचा हात हलकेच धरला आणि चालण्याचा वेग अजून थोडा कमी करत तिला हलक्या आवाजात विचारलं; "काय म्हणाली नक्की नैना? खूप चौकशी केली का ग तिने?" गोविंदकडे बघत मंद हसत संस्कृतीने आदल्या रात्रीचा सगळा प्रसंग गोविंदला सांगितला आणि म्हणाली; "तिने खात्री केली की हे स्क्रिप्ट मलाच मिळालं आहे न. खरं सांगू तर मला वाटतं तिचा फार विश्वास नाही बसला माझ्या सांगण्यावर... तसं मला तिच्या डोळ्यात दिसलं. पण मी जास्त काही बोलले नाही आणि तिने फार खोलात जाऊन काही विचारलं नाही." "चल, ठीक! ती अर्थ सांगायला तयार झाली न; खूप झालं." लांब बघत गोविंद म्हणाला.

"गोविंद!" संस्कृतीने हाक मारली.

गोविंदचं तिच्याकडे लक्ष नव्हतं. "हं?!" कुठेतरी बघत तो हुंकारला.

"गोविंद! तू अस्वस्थ आहेस का? काही झालंय का?" संस्कृतीने त्याचा दंड धरून त्याला थांबवत हलकेच विचारलं.

गोविंद थांबला आणि त्याने तिच्याकडे बघितलं. त्याचे डोळे काहीसे हरवलेले होते. तो तिच्याकडे टक लावून बघत होता; पण तरीही तो स्वतःतच हरवला आहे हे संस्कृतीला कळत होतं.

"काय झालंय गोविंद?" तिने परत एकदा मऊ आवाजात त्याला विचारलं.

आता मात्र गोविंद संस्कृतीकडे थेट बघत होता. "संस्कृती... त्या रात्रीपासून काहीतरी नक्की बदललं आहे." गोविंद म्हणाला. संस्कृतीला त्याच्या म्हणण्याचा अर्थ कळला नाही; पण तो गंभीर झाला आहे हे संस्कृतीच्या लक्षात आलं.

संस्कृती आणि गोविंद अचानक मागेच थांबून काहीतरी बोलत आहेत हे जस्सी आणि शेषाच्या लक्षात आलं आणि ते देखील मागे फिरले आणि त्यांच्या जवळ येऊन उभे राहिले.

"काय झालं तुम्हाला? असे रस्त्यात मध्येच का थांबले आहात तुम्ही दोघे?" शेषाने विचारलं.

"अरे गोविंद थोडा अबोल वाटला म्हणून मी त्याला सहज विचारलं काय झालंय. तर तो...." संस्कृतीला थांबवत जस्सी म्हणाला; "गोविंद! All good? त्या रात्रीनंतर परत घडलंय का?" जस्सीच्या प्रश्नामुळे शेषा आणि संस्कृतीने गोविंद वरून नजर काढून जस्सीकडे वळवली.

"ओये! माझ्याकडे नका बघू तुम्ही. कमाल करता यार.... तुमच्या लक्षात नाही आलं? गोविंद त्यारात्री नंतर थोडा शांत झाला आहे. त्याची सतत तंद्री लागते आहे. मी जितक्या वेळा फोटो काढताना कॅमेरा गोविंदवर नेला तितक्या वेळा तो मला तंद्री लावून कुठेतरी बघताना दिसला. अगोदर मला वाटलं तिकडच्या जंगलाचा परिणाम असेल. पण इथे आल्यानंतर देखील तेच दिसतं आहे. अरे यार शेषा; आपण संस्कृतीची वाट बघत आत्ता उभे होतो तेव्हा देखील मी त्याला किमान पाच वेळा आपल्या गप्पांमध्ये ओढण्याचा प्रयत्न केला. पण हा पठ्ठ्या दुसरंच काहीतरी बघत होता." "हो! ते आलं माझ्या लक्षात. पण मला वाटलं त्या फोटोमधून काय निघत आहे याची उत्सुकता असल्याने तो गप आहे." शेषा म्हणाला.

"तुम्ही दोघे शांत झालात तर गोविंदला आपण विचारू शकतो." संस्कृतीने शांतपणे म्हंटलं. तिचं म्हणणं पटल्याने जस्सी शेषा शांत होऊन गोविंदकडे बघायला लागले. इतका वेळ सगळ्यांच बोलणं ऐकत उभा असलेला गोविंद म्हणाला; "लेको... खरे दोस्त आहात तुम्ही. हो! काहीतरी बदललं आहे.... चला खाता-खाता बोलूया." असं म्हणून गोविंद भरभर चालायला लागला. त्याच्या सोबत जस्सी, शेषा आणि संस्कृती देखील निघाले.

खाण्याची ऑर्डर देऊन चौघे बसले आणि गोविंदने बोलायला सुरवात केली. "यार, त्या रात्री मी त्या गुहेत थांबलो. फुल्ल हालत खराब होती माझी. त्यामुळे रात्रभर झोपलो नव्हतो. खूप उशिरा कधीतरी डोळा लागला त्यावेळी मला काहीतरी स्वप्न दिसलं. कोणीतरी पाठमोरं होतं... कळलं नाही कोण. बरं! कपडे पण इतके काहीतरी होते.... सुपरमॅन सारखं पाठीवरून काहीतरी बांधलं होतं आणि ते गुंडाळलं होतं अंगभर. केस वर घट्ट बांधले होते. उंच होतं कोणीतरी... चांबड्याचे बूट होते. त्या व्यक्तीने मान मागे करून खांद्यावरून मागे वळून बघितलं माझ्याकडे. मला ती नजर नाही आवडली. त्यामुळे मी दुर्लक्ष केलं. काही क्षणांनी परत बघितलं तर ती व्यक्ती नव्हती. त्याचवेळी मला जाग आली आणि हाका पण ऐकू आल्या. त्या हाका ऐकून जीवात जीव आला होता माझ्या. त्यामुळे त्या स्वप्नाचा अर्थ शोधत न बसता मी पटकन तिथून निघालो. पण खरं सांगू? मला आत्ता देखील असं वाटतंय की ती नजर ओळखीची होती आणि ते स्वप्न जरी असलं तरीही खरंच तसं कधीतरी घडलं आहे. कोणीतरी माझ्याशी बोलून पुढे गेलं आणि मी मागून येत नाही आहे हे जाणवून मागे वळून बघत होतं माझ्याकडे. मात्र मला त्या व्यक्तीच्या सोबत जायचं नव्हतं. त्यामुळे मी दुर्लक्ष केलं आणि ते त्या व्यक्तीला पटलं नसल्याने त्या व्यक्तीने मागे वळून माझ्याकडे बघत नजरेतून मला दाखवून दिलं होतं." गोविंद बोलायचं थांबला. जस्सी, शेषा आणि संस्कृती गोविंदकडे बघत ऐकत होते. सगळेच शांत झाले.

काही क्षण गेले आणि संस्कृती काहीतरी बोलायला तोंड उघडणार इतक्यात तिला हॉटेलच्या दारात नैना दिसली. हाताची घडी घालून स्थिर नजरेने ती संस्कृतीकडे बघत होती. संस्कृती दाराकडे बघत होती म्हणून इतरांनी देखील त्या दिशेने बघितलं. नैना किती वेळ ती तिथे उभी होती कोण जाणे.... ते कोणाच्याही लक्षात आलं नव्हतं. संस्कृतीने नैनाकडे बघताच नैनाने तिला खुणेनेच जवळ बोलावलं. संस्कृतीने एकदा गोविंदकडे बघितलं आणि शांतपणे स्वतःची पर्स उचलून ती नैनाच्या दिशेने गेली. संस्कृती जवळ येताच नैनाने तिचा हात धरला आणि तिला काहीतरी म्हणाली. संस्कृतीने मागे वळून त्या तिघांकडे बघितलं. नैनाने देखील गोविंदकडे बघितलं. संस्कृतीने बाय करण्यासाठी हात उचलला आणि गोविंद, जस्सी आणि शेषाला काही कळण्याच्या आत संस्कृती नैनासोबत तिथून बाहेर पडली.

"अरे यार! हे काय? ही अशी काय न काही बोलता निघून गेली?" आश्चर्य वाटून जस्सी म्हणाला. उठत शेषा म्हणाला; "कोण समजते ती नैना स्वतःला. सरळ आली आणि संस्कृतीला घेऊन गेली. थांब तिला परत घेऊन येतो. असली दादागिरी नाही चालणार."

शेषाचा हात धरून त्याला परत बसवत गोविंद म्हणाला; "शेषा, उगाच काहीतरी करू नकोस. असं कोणीतरी आलं आणि चल म्हणाल तर सोबत जाणारी नाही संस्कृती. तरीही ती गेली आहे याचा अर्थ काहीतरी नक्की असेल. बरं! आपल्याला नैना पटत नाही; पण तिचं आणि संस्कृतीचं चांगलं पटत. मुख्य म्हणजे त्या फोटोमधले अर्थ आपल्याला नैनाच सांगणार आहे.... आपल्याला म्हणजे संस्कृतीला. कदाचित नैनाला तो अर्थ कळला असेल; तेच सांगायला नैना आली असेल आणि तोच अर्थ समजून घेण्यासाठी संस्कृती गेली असेल. त्यामुळे तुम्ही दोघेही एकदम शांत व्हा. चला, दिलेली ऑर्डर आली आहे तर आपण खाऊन घेऊ. कदाचित तोपर्यंत संस्कृती येईल देखील." गोविंदचं बोलणं जस्सी आणि शेषा दोघांनाही पटलं. तिघेही खायला बसले. एकदम जस्सीला काय सुचलं कोण जाणे.... तो फसकन हसत गोविंदला म्हणाला; "अबे; तुझ्या स्वप्नातली ती व्यक्ति म्हणजे ही महान नैना तर नसेल ना? तसही तिला तू आवडत नाहीस; आणि मला वाटतं तुला देखील ती आवडत नाही. त्यामुळे कधी काळी ती जर काही सांगायला आली तुला तर तू ऐकून घेणार नाहीस. मग ती पुढे जाईल आणि मागे वळून तुला खुन्नस देईल." त्याच्या कल्पना विलासावर गोविंद आणि शेषा दोघेही हसले.

संस्कृती नैनाजवळ गेली तेव्हा नैनाने तिला म्हंटलं; "संस्कृती; एक सांग.... तू मला जे फोटो दिलेस त्याबद्दल त्या तिघांना सांगितलं आहेस का?" तिचा प्रश्न ऐकून एक क्षण संस्कृतीने विचार केला आणि त्या तिघांकडे वळून बघितलं. तिला वाटलं नाकारावं. पण मग मनात काहीतरी विचार करून संस्कृतीने हलकेच 'हो' म्हणून मान हलवली. त्यावर संस्कृतीकडे स्थिर नजरेने बघत नैना म्हणाली; "काहीतरी खूप महत्वाचं बोलायचं आहे तुझ्याशी संस्कृती. चलतेस का माझ्या सोबत?" कुठलाही विचार न करता संस्कृतीने मागे वळून बाय केलं आणि ती नैना सोबत निघाली.

"नैना थोडं हळू चालशील का?" संस्कृतीने नैनाचा हात धरत म्हंटलं. नैनाने तिचा चालण्याचा वेग कमी केला आणि काहीसं हसत संस्कृतीकडे बघितलं. "सॉरी ग. मी अशी कोणासोबत कधी चालत नाही; त्यामुळे लक्षात नाही आलं की मी फारच पटापट चालते आहे." संस्कृती देखील हसली आणि म्हणाली; "अग तू इतकी उंच आहेस की तुझे पाय आपोआप लांब पडतात. त्यामुळे देखील तुझा वेग जास्त असतो. दमछाक होते आहे माझी तुझ्या सोबतीने चालताना. "बर! पण आता जरा बोलशील का? काय महत्वाचं बोलायचं आहे तुला? त्या श्लोकांचा अर्थ शोधलास का तू? काही खास आहे का त्यात?" संस्कृतीने नैनाकडे बघत म्हंटलं.

"संस्कृती आपण रूमवर जाऊन बोलूया का?" नैनाने अगदी हलक्या आवाजात म्हंटलं. "का ग? सांग की इथेच." संस्कृतीने आग्रह धरला.

"इथे? भर रस्त्यात? नको. आणि प्लीज... हॉटेलमध्ये पण नको. मला खूप लोक असले की अस्वस्थ वाटतं. चल न आपण आपल्या रूमवरच जाऊ." नैनाने आग्रह केला.

संस्कृतीला त्या श्लोकांचा अर्थ समजून घ्यायचाच होता. त्यामुळे नैनाला दुखावून चालणार नव्हतं. मानेनेच बरं म्हणून संस्कृती नैनासोबत चालत रूमवर गेली.

नैनाचा हात धरून तिला समोर बसवत संस्कृती म्हणाली; "हं! सांग!"

नैनाचा चेहेरा खूप गंभीर होता. "संस्कृती, मी तुला त्या लेखनाचा अर्थ सांगणारच आहे. पण त्याअगोदर तू मला काही प्रशांची उत्तरं देशील का?" ती म्हणाली.

संस्कृतीच्या कपाळावर आठ्या आल्या. "नैना, हे ब्लॅकमेलिंग आहे का? मी उत्तरं दिली तरच तू अर्थ सांगणार आहेस का?" काहीसं नाराज आवाजात संस्कृतीने विचारलं.

"उगाच काहीही बोलू नकोस संस्कृती. कारण नसताना नको ते अर्थ नको काढुस." अगदी शांत आवाजात नैना म्हणाली. तिचा शांतपणा संस्कृतीच्या मनाला आत भिडला. तिच्या डोळ्यात एक टक बघून संस्कृती म्हणाली; "बरं! विचार तुझे प्रश्न."

"संस्कृती, गोविंद आणि तू.... तुमचं नक्की नातं काय आहे?" नैनाने पहिला प्रश्न केला आणि संस्कृती तटकन उभी राहिली. "नैना, नको सांगूस अर्थ. तसही ते लिहिलेलं दिसण्या आगोदर देखील माझं आयुष्य साधं होतं आणि नंतर देखील राहणार आहे. पण केवळ त्याचा अर्थ सांगणार या नावाखाली तू मला माझ्या वयक्तिक आयुष्यातल्या लोकांबद्दल प्रश्न विचारणार असलीस तर मला ते मान्य नाही." एका श्वासात संस्कृती म्हणाली.

"संस्कृती..... तू अजूनही तीच आहेस ग." नैना बोलून गेली.

"तीच? म्हणजे?" आता संस्कृतीला राग यायला लागला होता. "काय म्हणायचं आहे तुला?" तिने आवाज चढवत विचारलं.

संस्कृती क्षणा-क्षणाने चिडत होती. तरीही नैना मात्र शांत होती. तिने तिच्या मनावरचा आणि आवाजावरचा ताबा अजिबात सोडला नव्हता.

"काही नाही संस्कृती. बस तू. मी तुला कोणताही प्रश्न न विचारता अर्थ सांगते. मात्र संपूर्ण अर्थ समजला की मग तू आपणहून..... मी काय म्हणते आहे ते नीट ऐक... आपणहून इच्छा झाली तर मला खरं काय आणि कसं घडलं होतं ते सांग." नैना म्हणाली.

"काय खरं आणि कसं घडलं नैना? का कोड्यात बोलते आहेस?" अजूनही संस्कृती वैतागलेली होती.

"बस! कळेल तुला मी काय म्हणते आहे ते.... बरं! अर्थ सांगू न? ऐक.... अगोदर काय लिहिलं आहे ते सांगते. कदाचित ते ऐकतानाच तुला अर्थ कळेल. जर नाही कळला तर मी सांगेनच....

सृष्टी निर्माता नच जरी स्व हा।
तुझी कामना पूर्त विश्वात।
निर्मिती नष्ट दुष्ट प्रकृती करिती।
शोध घे तू मानवात।
सोबत सोबतांची तुजसवे असता।
आयुष्य बदलते सर्वस्व।
नच सोबत अर्थहीन मग।
समजून घे तू विश्वास।
तू नच नर - नरेश तु।
फलप्राप्ती तुज इष्ट।

नैनाने हातातल्या कागदावरची नजर उचलली आणि संस्कृतीकडे बघितलं. संस्कृती डोळे मिटून ऐकत होती. तिचा चेहेरा अगदी शांत होता. तिने डोळे उघडले आणि नैनाकडे बघितलं.

"मला नाही गोविंदला दिसलं होतं ते. त्याने नवीनच डिजिटल कॅमेरा घेतला आहे. त्यावर त्याने ते फोटो काढले. आम्हाला त्या लेखाचा किंवा श्लोकाचा अर्थ समजणं शक्य नव्हतं. तुलाच कळला असता. पण तुला गोविंद आवडत नाही; त्यामुळे त्याने फोटो काढले आहेत हे कळल तर तू अर्थ सांगणार नाहीस असं मनात आलं माझ्या आणि मी तुला खोटं सांगितलं की ते फोटो मीच काढले आहेत." नैनाच्या डोळ्याला डोळा देत संस्कृती म्हणाली.

पुढे झुकून नैनाने संस्कृतीचा हात हातात घेतला आणि म्हणाली; "संस्कृती, या लेखामध्ये खूप मोठा आणि खूप खोल अर्थ दडलेला आहे."

"खरं सांगू का नैना, मला काहीही कळलेलं नाही. पण माझं अंतर्मन मला सांगतंय की या श्लोकाचा अर्थ कळल्या नंतर अचानक सगळं बदलून जाणार आहे. एक मन म्हणतं आहे की अर्थ समजून न घेता हे सगळं विसरून जाणं बरं. त्याचवेळी दुसरं मन मात्र त्या अनादी-अनंत आणि अनोळखी भविष्याकडे ओढ घेतं आहे...." संस्कृती शांतपणे बोलत होती. बाहेरून एकणाऱ्या एखाद्या व्यक्तीला वाटलं असतं की कुठल्यातरी अंमलाखाली ही बोलते आहे. पण संस्कृती पूर्ण शुद्धीत होती. तिची द्विधा मनस्थिती तिची तिला जाणवत होती.

"संस्कृती, मी तुला त्या श्लोकाची फोड करून सांगणार आहे. फक्त माझी एकच विनंती आहे.... तू गोविंदला या श्लोकाचा अर्थ सांगू नयेस असं मला वाटतं. अर्थात हे सांगतानाच मला माहीत आहे की तू माझं ऐकणार नाही आहेस. हमम! ठीक" नैना म्हणाली.

"तर अर्थ आहे....

सृष्टी निर्माता नच जरी स्व हा।
तुझी कामना पूर्त विश्वात।
हा श्लोक ज्याच्यासाठी आहे तो (स्व) तो जरी सृष्टी निर्माता नाही; तरी तुझी (या स्व ची) (कामना) इच्छा याच विश्वात पूर्ण होईल आणि त्याने इच्छा केलेली निर्मिती होईल.

निर्मिती नष्ट दुष्ट प्रकृती करिती।
शोध घे तू मानवात।
ही निर्माण झालेली निर्मिती दुष्ट प्रवृत्तीचे लोक नष्ट करतील. तू त्यांचा शोध मानवांमध्येच घे.

सोबत सोबतांची तुजसवे असता।
आयुष्य बदलते सर्वस्व।
तुझ्या जवळच्या लोकांची सोबत तुझ्या बरोबर असेल तर तुझे आयुष्य बदलून जाईल.

नच सोबत अर्थहीन मग।
समजून घे तू विश्वास।
पण जर काही कारणाने ही तुझ्या जवळच्या लोकांची सोबत तुला नाही लाभली; तर सगळंच अर्थहीन होईल. त्यामुळे त्यांचा विश्वास तुला कायम समजून घ्यावा लागेल.

तू नच नर - नरेश तु।
फलप्राप्ती तुज इष्ट।
तू केवळ एक नर (सर्वसामान्य माणूस) नाहीस तर नरेश म्हणजे राजा आहेस; हे विसरू नकोस. तू जर हे कायम लक्षात ठेवलेस तर तुला इष्ट ती फलप्राप्ती होईल."

नैनाने अर्थ सांगितला आणि संस्कृतीकडे बघितलं.

"नैना मला अजूनही काहीही कळलेलं नाही." संस्कृती म्हणाली.

"संस्कृती; ऐक.... तो जो स्वतःला नर समजतो तो खरं तर एक नरेश आहे. हे तो विसरला आहे. जर त्याला ते आठवलं आणि ते त्याने लक्षात ठेवलं तर त्याला इष्ट फल प्राप्ती होईल. पण त्यासाठी त्याने काही शक्तींच्या मदतीने सर्वसामान्य मानवांकडून विश्वामध्ये जी निर्मिती करून घेतली आहे आणि काही दुष्ट प्रवृत्तीच्या लोकांनी जिचा विध्वंस करण्याचा प्रयत्न केला आहे; त्या निर्मितीकडे त्याच्या जवळच्या, विश्वासाच्या सोबत्यांबरोबर जावं लागेल." नैनाने अजून नीट फोड करून अर्थ सांगितला.

संस्कृतीने नैनाकडे एकटक बघितलं आणि म्हणाली; "मी माझ्या मित्रांना भेटायला जाते आहे. त्याला पटो अथवा न पटो नैना.... मी त्यांना भेटणं आवश्यक आहे."

नैनाने काही क्षण एकटक संस्कृतीकडे बघितलं आणि मग मान खाली घातली. तिने शांतपणे हात पुढे केला आणि हातातला कागद संस्कृतीला दिला. तो कागद हातात घेताना संस्कृतीला जाणवलं की नैना खूपच हताश झाली आहे. पण त्याक्षणी तिला गोविंद, जस्सी आणि शेषाला भेटणं जास्त महत्वाचं वाटत होतं. आपण नंतर नैनाशी बोलू... असं मनात ठरवून तिने तो कागद घेतला आणि ती रूम बाहेर पडली.

क्रमशः

Friday, January 21, 2022

अनाहत सत्य (भाग 8)

 अनाहत सत्य

भाग 8

गुहेजवळून निघताना त्याने बॅगमधून पांढरा खडू काढला आणि मोठया झाडांवर खुणा करत तो निघाला. त्याला फार लांब जावं नाही लागलं. समोरच त्याला त्याचे ट्रेकर मित्र दिसले. त्यांना हाक मारून तो त्यांच्या जवळ जाऊन पोहोचला.

"आयला, गोविंद! तू जिवंत आहेस? आम्हाला तर वाटलं एव्हाना तुला जंगलातल्या प्राण्यांनी किंवा माणूस खाणाऱ्या माणसांनी मारून टाकलं असेल. पण ती संस्कृती मागे लागली केवळ म्हणून तुला शोधत आलो आम्ही. बरा वाचलास रे." त्यांच्यातला एकजण म्हणाला. त्यावर हसत गोविंद म्हणाला; "मेलोच असतो यार. पण नशिबाने इथे एक गुहा दिसली आणि आत जनावर आहे की नाही याचा अंदाज घेऊन तिथेच थांबलो होतो." "अरे इथे कोणती गुहा रे? आम्ही तर कधी कोणती गुहा बघितली नाही. इतक्या वेळा आलो आहोत या भागात...." कोणीतरी म्हणालं. त्यावर गोविंद म्हणाला; "मला अगदी वाटलं होतं तुम्ही असच म्हणाल म्हणून मी खुणा करत करतच आलो आहे. हवं तर चला आपण बघू आत्ताच." त्याचे मित्र तयार झाले आणि ते परत मागे फिरले. गोविंदच्या मनात तेच होतं. त्याला सोबत असताना आणि जास्त उजेड असताना परत एकदा त्या तलावाच्या जवळ जायचं होतं.

गोविंदने केलेल्या खुणांच्या मदतीने ते तिघे परत एकदा गुहेच्या दिशेने निघाले. थोडं अंतर ते गेले आणि मग गोविंदच्या लक्षात आलं की अनेक झाडांवर तशाच खुणा आहेत. तो काहीसा गोंधळला. तेवढ्यात त्या तिघांना कोणीतरी बोलल्याचा आवाज आला आणि त्यांना ध्यानी मनी नसताना समोरून काही लोक आले.

"कोण रे पोरं तुम्ही? ट्रेकर्स दिसता. या भागात काय करता आहात?" त्यातला एक माणूस पुढे होत म्हणाला. "हो! आम्ही ट्रेकर्सचं आहोत. आमचा हा मित्र रात्री इथेच एका गुहेत अडकला होता. तो आत्ता आम्हाला भेटला. पण इथे गुहा असावी असं वाटत नाही. कारण आम्ही इथे नेहेमी येतो; तरी कधी दिसली नव्हती. म्हणून त्याच्या सोबत आम्ही ती गुहा शोधतो आहोत. त्याने तर झाडावर खुणा देखील केल्या आहेत." त्यांच्यातल्या एकाने उत्तर दिलं. त्यावर तो माणूस मोठ्याने हसला आणि म्हणाला; "कोणत्या खुणा म्हणता आहात? या पांढऱ्या खडूच्या का? त्या आमच्या स्टाफने केल्या आहेत. कोणती झाडं कीड लागलेली आहेत आणि कोणत्या झाडांची वेगळी छाटणी करायची आहे ते ठरवण्यासाठी. मुळात इथे कोणतीही गुहा नाही. त्यात जर याने खुणा केल्या आहेत तर त्या आम्ही नेहेमी करतो तशाच कशा असतील? सर्वसाधारणपणे फुली किंवा बरोबरची खुण केली जाते. इथे खूण जी आहे ती आम्ही करतो तशी आहे. काय रे! तुला ही खुण करायला कशी सुचली?" त्या माणसाने विचारलं.

त्याचा एकूण पेहेराव आणि अधिकार वाणीने बोलणं यावरून तो फॉरेस्ट ऑफिसर असावा असा अंदाज गोविंदने बांधला आणि अगदी शांत आवाजात तो म्हणाला; "सर, मला सहज सुचलं तशी खुण पहिल्यांदा केली आणि मग तशाच खुणा करत मी पुढे निघालो. फार विचार नव्हता केला मी. मला माझ्या मित्रांच्या हाका ऐकू येत होत्या. ते दूर जाण्याच्या आत मला त्यांना गाठायचं होतं. पण मी खरंच सांगतो आहे सर, मी काल रात्री इथे एका गुहेमध्ये राहिलो होतो. आत एक मोठा तलाव आहे.... आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या तलावाचं पाणी वाहातं आहे."

त्याचं बोलणं ऐकून तो अधिकारी क्षणभर विचारात पडला आणि मग गोविंद जवळ जाऊन त्याने त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाला; "मुला, तू म्हणतो आहेस तशी गुहा इथे जवळ पास नाही हे मी तुला नक्की सांगतो. त्याच सोबत हे देखील खरं आहे की कदाचित रात्री तुला चकवा लागला आणि तू कुठेतरी भरकटत गेलास. तिथे झाडांच्या गर्दीत कदाचित तुला कोणता तरी तलाव दिसला. पण अंधारामुळे तुला ती गुहा वाटली असेल. इथे असे अनेक तलाव काही काळासाठी निर्माण होतात आणि नाहीसे होतात. पण ते सगळं जाऊ दे. मुख्य म्हणजे अशा पाणथळ जागेजवळ रात्रभर राहून देखील तू जिवंत आहेस ही देवाची कृपा समज आणि आता निघा तुम्ही सगळे इथून. तसा हा भाग देखील रिस्ट्रिकटेड आहे फिरण्यासाठी."

त्यांचं बोलणं ऐकून ते तिघे मागे फिरले आणि तिथून निघाले. काही पावलं पुढे जाऊन गोविंदने मागे वळून बघितलं. पण मागे कोणीही दिसलं नाही त्याला. 'ते सगळे मिळून किमान पाच लोक होते. अचानक सगळेच कसे दिसेनासे झाले?' गोविंदच्या मनात आलं. पण मग काही न बोलता तो त्याच्या मित्रांसोबत निघाला आणि त्यांच्या कॅम्पवर जाऊन पोहोचला.

त्याला बघताच संस्कृती धावत समोर आली आणि त्याचा हात धरत म्हणाली; "गोविंद!!! अरे कुठे गायब झाला होतास? हे सगळे तर म्हणत होते आता तू मिळणार नाहीस. खूप घाबरले होते मी." संस्कृतीच्या मागून आलेले जस्सी आणि शेषादेखील आले होते. त्या तिघांनाही गोविंदने एका बाजूला घेऊन त्याचा रात्रीचा अनुभव सांगितला. त्यानंतर त्याच्या मित्रांनी आणि जंगलात भेटलेल्या ऑफिसरने सांगितलेली मतं देखील सांगितली. संस्कृती, जस्सी आणि शेषा गोविंदचा अनुभव ऐकून एकदम गप झाले. थोडा वेळ गेला आणि जस्सी म्हणाला; "मला उत्सुकता आहे यार ती गुहा बघण्याची. यार अशी गुहा असेल आणि तिथे तलाव वगैरे असेल तर याचा अर्थ तिथले फोटो झकास येतील. काहीतरी वेगळं बघायला मिळेल यार. चला न आपण शोधुया ती गुहा." त्याचं बोलणं ऐकून शेषा वैतागून म्हणाला; "जस्सी, तुला वेड लागलं आहे का? अरे अशी कोणतीही गुहाच नाही. मग तू काय म्हणतो आहेस की जाऊया.... बघूया???"

शेषाचं बोलणं ऐकून गोविंदने त्याची सॅक उघडली आणि त्याचा कॅमेरा बाहेर काढला. नवीन डिजिटल कॅमेरा त्याने चालू केला आणि गोविंदने फोटो दाखवायच्या अगोदरच जस्सीने कॅमेरा हातात घेऊन त्याची स्क्रीन चालू केली. शेवटचे चारही फोटो त्या तलावाजवळचे होते!!!

"अबे!!!! देखो यारो!!! गोविंद सच बोल रहा है। कूच तो अलग है इन फोटो मे।" जस्सी म्हणाला. त्याबरोबर शेषा आणि संस्कृतीने डोकं पुढे करत कॅमेरामध्ये बघितलं. गोविंद थोडा मागे उभा राहून बघत होता. भिंतीचा फोटो बघून संस्कृतीने कॅमेरा खेचून घेतला आणि ती फोटो निरखून बघायला लागली. काही क्षण त्या फोटोकडे बघून ती गोविंदकडे वळली आणि म्हणाली; "तुला माहीत आहे का तू नक्की कशाचा फोटो काढला आहेस?" शांतपणे संस्कृतीकडे बघत गोविंद म्हणाला; "हो संस्कृती. ती लिपी आहे. आपली नेहेमीची नाही. पण काहीतरी लिहिलं आहे या भिंतीवर. ते जाणवलं म्हणून तर मी फोटो काढला त्या भिंतीचा." डोळे मोठे करत संस्कृती म्हणाली; "काहीही झालं तरी मला ती गुहा.... ती भिंत बघायचीच आहे. आपण आत्ताच जायचं तिथे."

तिचं शेवटचं वाक्य इतर ट्रेकर्स पैकी एकाने ऐकले आणि त्यांच्या जवळ येऊन म्हणाला; "अरे यार. तुम्ही अजूनही गोविंद जे म्हणतो आहे त्यात अडकला आहात का? तिथे असं काहीही नाही बघण्यासारखं. अरे इथल्या फॉरेस्ट ऑफिसरने देखील सांगितलं की इथे गुहा वगैरे काहीही नाही. गोविंदला भास झाला. चला बॅग्स पॅक करा. आपल्याला पुढच्या डेस्टिनेशनला निघायचं आहे."

 त्याचं बोलणं ऐकून संस्कृतीने गोविंदकडे वळून बघितलं. गोविंदने तिला डोळ्यांनीच शांत राहायला सांगितलं. शेषा आणि जस्सीला देखील गोविंदने शांत राहायला सांगितलं आणि सगळेच आवरायला गेले. ट्रेक सुरू झाला आणि जस्सी, शेषा, संस्कृती आणि गोविंद एकत्र चालायला लागले.


"गोविंद, ती गुहा नक्की कुठे आहे हे आता समजण शक्य आहे का? मला खरंच तिथे जायचं आहे." संस्कृती गोविंद बरोबर चालत म्हणाली.

"आता तिथे जाणं अशक्य आहे संस्कृती. त्यामुळे तिथे न जाता देखील ती लिपी कोणती आहे आणि त्या भिंतीवर काय लिहिलं आहे ते कसं कळेल आपल्याला? यावर विचार करायला सुरवात कर." गोविंद म्हणाला.

"माझ्या मते ती खूप जुनी लिपी आहे. नीटसं दिसत नाहीय. त्यामुळे त्यावर फार काही आत्ताच सांगता नाही येणार मला. पण आमच्या अभ्यासात हा विषय होता. पण आपल्याला याबद्दलची सगळी माहिती नैना देऊ शकेल. यार ती याच विषयात पी. एच. डी. करते आहे. आपण तिला हे फोटो दाखवुया. काय वाटतं?" संस्कृती म्हणाली.

तिचं बोलणं ऐकून जस्सी फसकन हसला आणि म्हणाला; "हे बेस्ट आहे. तिच्याकडे हे फोटो घेऊन गोविंदला जाऊ दे. म्हणजे तर ती लगेच सगळी माहिती घडाघडा सांगेल. ती तर वाटच बघते आहे न; की कधी एकदा गोविंद येतो आणि मी त्याच्याशी गप्पा मारते." जस्सीच बोलणं ऐकून शेषा देखील खदाखदा हसायला लागला.

"गप यार जस्सी." गोविंद म्हणाला. चालता चालता तो संस्कृतीला म्हणाला; "तुला वाटतं का नैना आपल्याला मदत करेल?"

"गोविंद तिला तू पटत नाहीस. का ते मला माहीत नाही. पण हे फोटो तू काढले आहेस हे सांगायची गरजच काय? मी तिला प्रिंटआउट नेऊन दाखवते. ते बघून ती सांगेल. जर तिने काही जास्त प्रश्न विचारले तर मीच फोटो काढले आहे असं सांगीन. तुझा अनुभव मी माझा आहे असं सांगेन; म्हणजे झालं न? हे आपल्या चौघांमध्ये क्लिअर असलं की इतर कोणाला काही उत्तर देण्याचा प्रश्नच येत नाही न? काय वाटत तुम्हाला?" संस्कृती म्हणाली.

"ये ठीक लगता है।" शेषा म्हणाला.

जस्सी आणि गोविंदने देखील होकारार्थी मान हलवली. एकदा निर्णय झाला आणि हा विषय बाजूला ठेऊन त्यांनी संपूर्ण लक्ष ट्रेकवर घातलं.

ते परत आले आणि त्याच दिवशी गोविंदने फोटो डेव्हलप करून संस्कृतीला दिले.

रात्री संस्कृती तिच्या खोलीत आली तर समोरच नैना काहीतरी वाचत बसली होती. संस्कृतीला आत आलेलं बघून देखील नैना काहीच बोलली नाही. आपण ट्रेकला गोविंद बरोबर गेलो होतो हे नैनाला आवडलं नव्हतं याची संस्कृतीला जाणीव होती. पण अर्थात नैनाला काय आवडतं आणि काय पटत नाही; याचा विचार संस्कृतीला करायचा नव्हता. त्यामुळे तिला राग आला आहे हे आपल्याला कळलेलंच नाही असा आव आणून संस्कृती तिच्याजवळ जाऊन बसली.

"ए बिझी आहेस का?" तिने गोड आवाजात नैनाला विचारलं.

"उगाच लाडात येऊ नकोस संस्कृती. काय हवंय तुला? नक्की कोणती तरी स्क्रिप्ट आणली आहेस अर्थ विचारण्यासाठी." नैना तिच्याकडे न बघताच म्हणाली. नैनाचं बोलणं ऐकून संस्कृती क्षणभर चमकली. पण मग हसत-हसत म्हणाली; "अय्या हो ग. तुला कसं कळलं? अग, मला एक वेगळाच अनुभव आला या ट्रेकला. कोणाशीही शेअर नाही केलाय मी हा अनुभव. हे फोटो बघतेस का? अग ट्रेकच्या पहिल्याच दिवशी मी चुकले होते ग; आणि एक संपूर्ण रात्र मी एका गुहेत होते. सगळं शांत झाल्यावर मला आतून पाण्याचा आवाज ऐकू आला. मला खूप ताहान लागली होती. म्हणून मग अंदाज घेत मी आत गेले...." असं म्हणत संस्कृतीने गोविंदचा अनुभव स्वतःचा म्हणून नैनाला सांगितला आणि शेवटी फोटो नैनाच्या हातात ठेवत विचारलं; "तुला ही स्क्रिप्ट माहीत असेल न ग? मला अर्थ सांगू शकशील का?"

तिचं सगळं बोलणं नैनाने शांतपणे ऐकून घेतलं होतं. तिने फोटो हातात घेतले आणि बघितले. त्या फोटोंकडे बघताना नैना नकळत ताठ बसली. बराचवेळ फोटो निरखून बघितल्यावर नैनाने नजर वर उचलली आणि संस्कृतीला विचारलं; "तू काढले आहेस का हे फोटो?" संस्कृती तिच्या प्रश्नाने मनातून काहीशी हलली. पण आवाजात बदल होऊ न देता तिने शांतपणे म्हंटलं; "अग, मी काढले नसते तर ते माझ्याकडे आले असते का? काहीही का विचारतेस? बरं, तू अर्थ सांगतेस का याचा?"

"थोडा अर्थ लागतो आहे; पण मला उद्या लायब्ररीमध्ये बसून एक दोन पुस्तकं बघायला लागतील. मगच मी नक्की सांगू शकते काय लिहिलं आहे. श्लोक आहे काहीतरी... इतकचं आत्ता सांगते." नैना म्हणाली.

ती फार काही न विचारता अर्थ सांगायला तयार झाली यामुळे संस्कृती खुश झाली आणि हसून बर म्हणून स्वतःच्या बेडकडे गेली.

क्रमशः

Friday, January 14, 2022

अनाहत सत्य (भाग 7)

 अनाहत सत्य

भाग 7

"मिठठू, तिथे प्रवेश करण्याच्या अगोदर काही प्रश्नांची उत्तरं माहीत असावीत यासाठी मी सतत धडपडत होतो. मागच्या वेळी 'आत जाऊ या का?' या तुझ्या प्रश्नाला म्हणूनच मी बगल दिली होती. आणि आता तू म्हणतो आहेस की आपण त्या जागेमध्ये प्रवेश करण्या अगोदर आम्हाला दोघांना सगळं सत्य माहीत असणं आवश्यक आहे... म्हणजे असं तर नाही न की मी जे शोधायचा प्रयत्न करत होतो ते तुला अगोदरच माहीत होतं; आणि तरीही तू मला सांगितलं नाहीस? अचानक निर्मितीच्या येण्याने असं काय झालं आहे मिठठू की सगळी गणितं बदलून गेली?" सरांच्या प्रश्नाने निमिर्ती दचकली आणि तिने सरांकडे बघितलं. तिच्या येण्याने काय झालं हे तिला कळलं नव्हतं. मुख्य म्हणजे अचानक तिचं तिथे असणं सरांना खटकत आहे की काय असं तिला वाटलं. कदाचित ते तिच्या डोळ्यात दिसलं असेल; तिच्याकडे बघत तिच्या पाठीवर थोपटत सर म्हणाले; "निर्मिती, मी तुला कोणताही दोष देत नाही आहे. मुळात दोष तर कोणालाही देत नाही आहे. फक्त हे समजून घ्यायचा प्रयत्न करतो आहे की हे संपूर्ण नाटक अगोदरच लिहून तयार आहे का? आपण फक्त आपापली भूमिका करणारी पात्र आहोत का? जर हे खरं असलं तर मात्र मला हे समजून घ्यायला आवडेल की मी नक्की कुठलं पात्र आहे या नाटकात....

"सर, तुमचा काहीतरी गैरसमज होतो आहे." मिठठू अजिजिने म्हणाला.

"नाही रे मिठठू! तक्रार नाही आहे माझी. फक्त आयुष्याच्या सारिपाटावरचं माझं स्थान समजून घ्यायचा प्रयत्न करतो आहे.... आणि आता तर वाटतं आहे की त्याचा विचार देखील करू नये. मी कोण विचारणारा आणि समजून घेणारा... पण माझ्यापुरता एक आनंद तर नक्की मी ठेऊ शकतो; की तिथे काहीतरी असं आहे जे अगम्य आहे; पण खोटं नाही! थोडासा कदाचित अंधविश्वास आहे; पण अंधश्रद्धा नाही... आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ते जे काही आहे... किंवा जे कोणी आहे... त्याचा माझ्यावर विश्वास आहे हे नक्की." सर एक दीर्घ श्वास घेत म्हणाले.

"सर... फक्त विश्वास नाही तर खात्री आहे की जर काही शक्य असलं तर ते तुमच्या हातूनच शक्य आहे....

"का?"

"याचं कारण.... सर... याचं कारण खूप खूप मागच्या काळात दडलं आहे.... मी केवळ आणि केवळ एक दुवा आहे जोडणारा. माझा या नाटकातला रोल इतकाच आहे.... पण तरीही तुमच्या प्रमाणे मी देखील खुश आहे की त्यांनी माझी निवड केली आहे. सर, आपण आत्ता एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर आणि विसाव्या शतकात आहोत. दिदी तुमचं वय केवळ बावीस वर्षांचं आहे. तरीही तुम्ही ग्रॅज्युएशनच्या वेळी मानवीय जीवन उत्पत्ति आणि त्याचा ऱ्हास हाच विषय का घेतलात? आज देखील तुम्हाला प्रत्येक युगातील मानवी आयुष्याबद्दल जाणून घ्यायची ओढ आहे. मानव जन्माला कसा आला असेल? त्याने स्वतःला कसं प्रगत केलं असेल? कसे जगत असतील ते लोक त्या काळात? त्यावेळची संस्कृती किती प्रगत झाली होती? कधी ऱ्हास पावली .... त्याची कारणं काय असतील? त्यावेळची भाषा, व्यवहार, धर्म, चाली-रिती...... दिदी तुम्हाला सगळं सगळं समजून घ्यायचं आहे. पण हाच विषय का? कारण तुमच्या लहानपणी तुमच्या त्या लहानशा गावाच्या जवळच्या टेकड्यांमध्ये काही गुहा होत्या. ज्या तुम्हाला सतत आकृष्ट करायच्या. त्या गुहांच्या अभ्यासासाठी राणे सर तिथे आले. त्यांना त्या गुहांमध्ये काहीच मिळालं नाही... पण तुम्हाला राणे सर भेटले; तुमच्या आयुष्याचं उद्दिष्ट मिळालं. शिक्षणाला दिशा मिळाली. त्यानंतर तुम्ही मागे वळून बघितलंच नाहीत. हे सगळं जितकं खरं आहे तुमच्या बाबतीत; तितकंच हे देखील खरं आहे न दिदी की तुम्हाला फारसे मित्र-मैत्रिणी नाहीत...." मिठठू बोलायचा थांबला आणि त्याने निर्मितीकडे बघितलं.

निर्मितीचा चेहेरा अगदी शांत होता. त्यावर कोणतेही आश्चर्याचे भाव नव्हते. तिने अगदी शांतपणे मिठठूकडे बघत म्हंटलं; "मिठठू तू जे जे सांगितलं आहेस न ते सगळं अगदी तंतोतंत खरं आहे; एकही शब्द खोटा नाही. खरं तर मला आश्चर्य वाटायला हवं नाही का? तुला हे सगळं इतकं नीट कसं माहीत? तू तर वयाने देखील खूप लहान आहेस. पण तरीही मला मुळीच आश्चर्य वाटलेलं नाही; कारण ही सगळी माझ्या आयुष्यातली सत्य आहेत... कधीच लपून न राहिलेली. त्यामुळे माझ्याबद्दल माहिती काढायची ठरवलं तर हीच आणि इतकीच माहिती असू शकते सगळ्यांना. तुझं वय लहान असलं तरीही तू ही माहिती मिळवू शकतोस; हा विश्वास आहे मला. तू ज्या प्रकारे काल रात्रीपासून बोलतो आहेस; त्यावरून तुझा आवाका माझ्या लक्षात आला आहे."

निर्मितीचं बोलणं ऐकून सर शांतपणे हसले आणि मिठठू देखील. "दिदी, तुम्हाला इम्प्रेस करायला नाही सांगितलं मी हे सगळं. त्यामागे एक वेगळी कारणमीमांसा आहे. ती तुम्हाला पटावी अशी माझी इच्छा आहे. म्हणूनच थोडक्यात तुम्हाला तुमचाच इतिहास.... या जन्मातला पास्ट.... मी सांगितला. सर, दिदी... मी तुम्हाला सुरवातीलाच सांगितलं की आपण त्या जागेमध्ये प्रवेश करण्या अगोदर तुम्हाला दोघांना सगळं सत्य माहीत असणं आवश्यक आहे; असं माझं मत झालं... आणि म्हणूनच तुम्हाला सगळं खरं सांगण्याची परवानगी मी घेतली आहे." मिठठू म्हणाला.

"मिठठू, नमनालाच घडाभर तेल झालं आहे बरं का तुझं." निर्मिती हसत हसत म्हणाली. तिने वापरलेली म्हण ऐकून सर आणि मिठठू दोघेही हसले. पण क्षणात मिठठूचा चेहेरा गंभीर झाला आणि तो सावरून बसला. सर आणि निर्मिती देखील मिठठू आता काय सांगतो ते ऐकायला सरसावून बसले.

"सर, दिदी... आता मी जे सांगणार आहे ते सुरवातीला कदाचित तुम्हाला पटणार नाही. मनात काही प्रश्न निर्माण होतील .पण तरीही एक विनंती आहे; सगळे प्रश्न माझं सांगून झालं की मग विचारा...

तर दिदी... मला तुझा सगळा पास्ट माहीत आहे; कारण तो मला कोणीतरी सांगितला. अगदी खरं आहे तुझं म्हणणं. फक्त तो कोणी सांगितला हे थोडं वेगळं आहे. ते सांगण्या अगोदर मी तुम्हाला एक सत्य घटना सांगतो... कारण ती तुम्हाला कळणं आवश्यक आहे. फार जुनी नाही ही घटना. जेमतेम बावीस-तेवीस वर्षांपूर्वीची आहे. म्हणजे नीट सांगायचं तर दिदी तुझ्या जन्माच्या जस्ट आधीचीच.

दिदी, तू आत्ता ज्या वयाची आहेस न त्याच वयाची होती संस्कृती. आर्कियोलॉजि विषय घेऊन तिने ग्रॅज्युएशन केलं होतं आणि मग पोस्ट ग्रॅज्युएशन करणार होती. तुझ्या प्रमाणेच ती देखील होस्टेलमध्ये राहात होती. तू तशी अबोल आहेस आणि तुला मित्र-मैत्रिणी नाहीत; पण संस्कृतीला होते. फक्त मित्र असं नाही तर अगदी खास मित्र देखील होता तिला. गोविंद! संस्कृती आणि गोविंद एकमेकांच्या प्रेमात होते. गोविंद खूप श्रीमंत होता. ग्रॅज्युएशन नंतर त्याने घरच्या व्यवसायामध्ये लक्ष घालावं असं त्याच्या वडिलांना वाटायचं. पण गोविंदचं मन या कामात रमत नव्हतं. आपण दुसरं काहीतरी करावं असं त्याला खूप वाटत होतं. पण नक्की काय ते मात्र त्याला सांगता येत नव्हतं. त्याचे दोन अगदी खास मित्र! शेषा... म्हणजे शेषवाहनस्वामी आयांगार. शेषा खरं तर गोविंदचा मित्र तर होता पण तरीही गोविंदची परफेक्ट लाईफ बघून त्याला नेहेमी वाटायचं की त्याचं आयुष्य देखील तसंच असावं. अर्थात त्याने तसं कधीच गोविंदला म्हंटलं नाही. पण गोविंदची मैत्री देखील कधी सोडली नाही. शेषाच्या वडिलांचं स्वतःचं दुकान होतं. पण गोविंद प्रमाणे शेषा देखील वडिलांच्या दुकानात बसायला तयार नव्हता. जस्सी म्हणजे जगदीश यादव हा या त्रिकुटातला तिसरा कोन. त्याला फोटोग्राफीचा नाद होता. खूप सुंदर फोटो काढायचा तो. अत्यंत उत्तम प्रतीचा कॅमेरा होता त्याच्याकडे. जिममध्ये अंगमेहेनत करायची आणि निसर्गाचे फोटो काढायचे इतकंच त्याला माहीत होतं. त्याच्या घरी कोण होतं; तो कुठे राहात होता ते गोविंद आणि शेषाला माहीत नव्हतं. जस्सीला त्याबद्दल बोलायला आवडत नसे. त्यामुळे ते दोघे त्याला त्याविषयावरून कधी छेडत नसत.

संस्कृती सोबत तिच्या हॉस्टेलच्या रूममध्ये तिची पार्टनर नैना राहायची. ती पी. एच. डी. ची तयारी करत होती. नैना रूपाने सावळी होती. पण तिची उंची मुलींच्या मानाने खुपच जास्त होती. सडसडीत अंगाची नैना कायम काळे कपडेच घालायची आणि कधीच कोणाशीही बोलायची नाही. सुंदर लांब केसांची एक घट्ट वेणी, काळी जीन्स आणि तसाच काळा किंवा फार तर ग्रे टॉप असा तिचा वेष असायचा. तिच्या डाव्या हाताच्या मनगटात एक जाड काळा धागा वेणीप्रमाणे गुंफलेला होता. इतरांशी न बोलणारी नैना संस्कृतीशी मात्र मोकळेपणी बोलायची. नैनाला गोविंद अजिबात आवडत नव्हता. "संस्कृती, अग शिक्षण पूर्ण झालं तरी तो काहीही करत नाही आहे. ना वडिलांच्या व्यवसायात लक्ष घालतो आहे; ना काही नवीन शिकण्याचा मानस आहे त्याचा. का आहेस तू त्याच्यासोबत?" नैना अलीकडे संस्कृतीला सतत हाच एक प्रश्न करत होती. संस्कृतीला ते आवडत नव्हतं; पण का कोण जाणे तिला नैनाला दुखवायचं नव्हतं. त्यामुळे ती सतत या विषयाला बगल देत होती.

रिझल्ट लागल्यानंतर संस्कृती तिच्या घरी जाणार होती. पण तिच्या वडिलांचा तिला फोन आला की काही कामाच्या निमित्ताने ते परदेशात जात आहेत. संस्कृतीची आई लहानपणीच वारली होती. वडील नाहीत म्हंटल्यावर तिने तिचं जाणं रहित केलं. पण आता काय करावं तिला माहीत नव्हतं. कॉलेज सुरू होईपर्यंत नैना सोबत होस्टेलमध्ये राहायची तिची इच्छा नव्हती. त्यामुळे त्यादिवशी संध्याकाळी जेव्हा गोविंद, शेषा आणि जस्सी नेहेमीच्या उडप्याकडे तिला भेटले तेव्हा तिने त्यांना कल्पना दिली की ती बाबांकडे जात नाही आहे. ते ऐकताच जस्सीने एकदम उत्साहात उडी मारली आणि म्हणाला; "ये बेस्ट हो गया. अरे माझ्या माहिती मधला एक ग्रुप आसामच्या खोऱ्यामध्ये ट्रेकसाठी जातो आहे. तुमची हरकत नसेल तर आपण पण जाऊया का? अप्रतिम निसर्ग आणि घरच्यांची कटकट नाही. बोलो!" जस्सिची ऑफर ऐकून सगळेच खुश झाले. पण मग शेषाचा चेहेरा एकदम उतरला. "तुम्ही जा यार. आप्पा परवानगी नाही देणार. मग पैसे कसे भरू मी?" तो म्हणाला. त्याच्या खांद्यावर हात टाकत गोविंदने डोळा मारला आणि म्हणाला; "तू फक्त परवानगी घेऊन ये. बाकी मी बघतो."

.... आणि अशा प्रकारे ही चौकडी आसामच्या खोऱ्यात येऊन पोहोचली.

पहिलाच दिवस होता त्याचा ट्रेकचा. सर्वांनी एकत्र राहायचं आणि आधार होण्याच्या आत कॅम्पसाठी ठरवलेल्या जागी पोहोचलंच पाहिजे; हे सगळ्यांना सांगण्यात आलं आणि सगळा ग्रुप निघाला. त्यावेळी नुकताच डिजिटल कॅमेराचा शोध लागला होता. जस्सी त्याचा कॅमेरा देणार नाही हे माहीत असल्याने गोविंदने स्वतःसाठी एक डिजिटल कॅमेरा घेतला होता. संस्कृतीला कॅमेरा दाखवून तो म्हणाला; "हा जस्सी आपले फोटो काढणार नाही; म्हणून मी मुद्दाम नवीन कॅमरा घेऊन आलो आहे." कॅमेरा बघून संस्कृती हसली आणि म्हणाली; "ते ठीक आहे गोविंद. पण त्या नवीन कॅमेराच्या नादात हरवून जाऊ नकोस हं. हा भाग खूपच अवघड आहे. इथे फक्त आदिवासी नाही.... तर नरभक्षक आदिवासी राहातात. सोबत राहा सगळ्यांच्या."

संस्कृतीच्या तोंडाने नियती तर बोलत नव्हती? कारण कसं कोण जाणे...... पण कुठल्यातरी एका चुकार क्षणी गोविंद सगळ्या ग्रुपपासून तुटूला आणि एकटा पडला. गोविंदच्या लक्षात आलं की तो हरवला आहे. क्षणभर तो गांगरून गेला. आपण हरवलो आहोत.... कायमचे की काय? त्याच्या मनात आलं. पण अंधारायला लागलं होतं आणि कुठेतरी सुरक्षित ठिकाणी थांबणं याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. आता ग्रुपला शोधणं सोडून त्याने स्वतःसाठी सुरक्षित ठिकाण दिसतं आहे का ते पाहायला सुरवात केली.... आणि त्याला एका मोठ्या झाडाच्या मागे लपलेली एक गुहा दिसली. गुहा!!! म्हणजे प्राणी!!! पण मग तो हसला. आपल्या कथांमध्ये असतं तसं वाघ आणि सिंव्ह असे गुहांमध्ये राहात नाहीत याची त्याला कल्पना होती. पण तरीही कोणताही इतर प्राणी तिथे असू शकतो ही शक्यता तो विसरला नव्हता. त्यामुळे आडोसा आहे इतपतच तो गुहेजवळ जाऊन बसला. हळूहळू अंधार झाला आणि पक्षी शांत झाले. गोविंदला भूक आणि तहान लागली होती. त्याच्याकडे मॅगी आणि ते बनवण्यासाठी भांडं देखील होतं. पण पाणी संपलं होतं. काय करावं त्याला सुचेना.

थोडा अजून वेळ गेला आणि त्या शांततेमध्ये गोविंदला गुहेच्या आतून वाहणाऱ्या पाण्याचा आवाज आला. नक्की पाण्याचा आवाज आहे की आपल्याला भास होतो आहे; ते गोविंदला कळेना. पण लागलेली तहान त्याला स्वस्थ देखील बसू देत नव्हती. शेवटी हिम्मत करून त्याने एका हातात टॉर्च आणि एका हातात कॅमेरा घेऊन हळूहळू आत जायला सुरवात केली. अगदीच कोणता प्राणी समोर आला तर त्याच्या डोळ्यावर फ्लॅशचा उजेड टाकून धूम बाहेर पळायचं असं त्याने ठरवलं होतं.

गोविंदला फार आत जावं नाही लागलं... अगदीच पंधरा-वीस पावलांवर त्याच्या समोर एक तलाव होता. आता रात्र झाली होती; तरीही गोविंदला तो तलाव.. त्याची लांबी-रुंदी दिसत होती. तलाव असूनही पाणी वाहतं होतं... वाहातं पाणी आहे म्हणजे चांगलंच असणार. असा विचार करून गोविंद तलावा जवळ गेला आणि ओंजळीने पाणी प्यायला. थंड पाणी प्यायल्यावर त्याला बरं वाटलं. कुठून उगम आहे या पाण्याचा? त्याच्या मानत आलं. सावकाश अंदाज घेत तो तलावाच्या कडेने एका बाजूला चालायला लागला. साधारण तलाव निमुळता होत जिथे भिंतीमध्ये शिरला होता तिथे गोविंद पोहोचला. उगम पाहण्यासाठी तलावात उतरणं आवश्यक आहे हे लक्षात आलं आणि गोविंदने अंदाजाने कडेचा आधार घेतला. भिंत ओबडधोबड होती... पण... अहं.... फक्त ओबडधोबड नव्हती; तर त्याला काहीतरी अर्थ असावा; असं गोविंदला वाटलं. त्याने भिंतीवर हात फिरवून बघितलं आणि त्याला धक्का बसला. तो काही निर्माण झालेला ओबडधोबडपणा नव्हता. तिथे काहीतरी लिहिलं होतं. गोविंदने अंदाज घेत हातातल्या कॅमेऱ्याने भराभर फोटो काढले. इतक्यात त्याला पाण्यात काहीतरी हालचाल जाणवली. गोविंद मागे फिरला आणि भराभर चालत परत गुहेच्या तोंडाशी येऊन बसला.

आत्ता आपण आत जो अनुभव घेतला तो खरा होता की खोटा तेच त्याला कळत नव्हतं. तो तसाच बसून राहिला... पण दमलेल्या गोविंदचा कधीतरी डोळा लागला. सकाळी पक्षांच्या आवाजाने त्याला जाग आली. रात्रीचा अनुभव खरा होता का.... त्याच्या मनात प्रश्न आला. पण त्याचवेळी त्याच्या नावाने हाका मारलेल्या त्याला ऐकू आल्या. त्याच्या ग्रुप मधले नेहेमीचे ट्रेकर्स त्याला शोधण्यासाठी आले आहेत हे लक्षात येऊन गोविंदने त्याची बॅग उचलली आणि झपझप चालत तो तिथून बाहेर पडला.

क्रमशः

Friday, January 7, 2022

अनाहत सत्य (भाग 6)

 अनाहत सत्य



भाग 6

निर्मिती जागी झाली. आजूबाजूला अगदीच शांत होतं. तिने उठून बघितलं तर सर देखील नव्हते. काहीसं गोंधळून ती बाहेर आली. एकूण आजूबाजूच्या वातावरणावरून तिला वेळेचा अंदाज येत नव्हता; म्हणून तिने हातातल्या घड्याळाकडे बघितलं... पण तिचं डिजिटल घड्याळ बंद पडलं होतं. तिने न राहावून सरांना हाक मारली; आणि जवळच्याच झाडीमधून सर तिच्या समोर येऊन उभे राहिले.

"आली का जाग तुला? good! मी मुद्दामच तुला उठवलं नव्हतं. तसही आज आपण काहीच करणार नव्हतो. त्यात इतक्या प्रवासानंतर देखील काल रात्री तुझी झोप झाली नव्हती. म्हणून म्हंटलं तुझी झोप पूर्ण होईपर्यंत उगाच कशाला उठवा." सर तिच्याकडे बघत हसत म्हणाले.

यावर निर्मिती देखील मनापासून हसली आणि म्हणाली; "होय सर. मला तर वाटलं होतं की विचारांच्या गर्दीत मला झोपच येणार नाही. पण आडवी पडले आणि डोळे मिटताच मला गाढ झोप लागली. ते थेट आत्ता जाग आली. पण सर माझं घड्याळ बंद पडलं आहे. त्यामुळे किती वाजले आहेत याचा अंदाजच येत नाहीय. त्यात इथे इतकी झाडं आहेत की बाहेरच्या वातावरणाच्या मदतीने अंदाज बांधणं देखील अशक्य आहे."

"निर्मिती, दुपारचे दोन वाजले आहेत." सर हसत स्वतःच्या मनागटावरील घड्याळ बघत म्हणाले.

"ओह! भलतीच गाढ झोप होती मग माझी. अर्थात इथे तशी इतकी शांतता आहे की कोणी मुद्दाम हाक मारली तरच जाग येईल. नाहीतर पूर्ण झोप झाली की मगच!" निर्मिती म्हणाली. त्याचवेळी तिच्या मनात प्रश्न आला आणि तिने सरांना विचारलं; "पण सर तुमचं घड्याळ कसं चालू आहे?" "अग निर्मिती, तू इथे पहील्यांदा येते आहेस; मी नाही. मला माहीत आहे की इथे डिजिटल गोष्टी चालत नाहीत नीट. त्यामुळे मी अगदीच साधंस घड्याळ घातलं आहे. अर्थात आत्ता तरी ते वेळ दाखवतं आहे. पण कधी बंद पडेल सांगता येत नाही.... आणि का बंद पडेल ते देखील कळणार नाही. बर ते जाऊ दे. तुला भूक लागली असेल ना? ये काहीतरी खाऊन घे." असं म्हणून सर निर्मितीला घेऊन परत जवळच्याच झाडीमध्ये शिरले. निर्मिती देखील त्यांच्या मागे निघाली. अगदीच दहा-बारा पावलं गेल्यावर निर्मितीला समोर एक साधीशी झोपडी दिसली. समोर छान अंगण होतं आणि तिथे लहान मुलं खेळत होती. बाजूलाच काही बायका बसून काहीतरी करत होत्या. निर्मितीला त्या काय करत होत्या ते कळलं नाही; पण एक मंद गोड वास येत होता त्यांच्या पुढ्यात ठेवलेल्या ढिगातून. त्या बायकांनी कंबरेला जेमतेम झाकेल असं काहीतरी गुंडाळलं होतं. गळ्यात फुलांच्या माळा होत्या... पण इतकंच. त्याहून जास्त त्यांच्या अंगावर काहीच नव्हतं. निर्मितीला बघून त्या एकमेकींकडे बघून खुसखुसत हसल्या आणि परत आपल्या कामाला लागल्या.

त्यांच्या पासून थोडं लांब पण त्यांच्याकडे तोंड करून सर बसले आणि अगदी सहज त्या बायकांशी गप्पा मारायला लागले.... त्यांच्या भाषेतून. निर्मितीला ते सगळंच थोडं अवघड वाटलं. नकळत ती त्या बायकांना पाठ करून बसायला लागली. पण सरांनी तिला लगेच थांबवलं आणि म्हणाले; "निर्मिती त्यांच्या दृष्टीने तू इतकं अंग झाकलं आहेस ते विचित्र आहे. त्यात जर तू त्यांना पाठ करून बसलीस तर तू त्यांचा स्विकार केलेला नाहीस असा अर्थ होईल. त्यामुळे निःसंकोच त्यांच्याकडे तोंड करून बस आणि चेहेरा हसरा ठेव." सरांचं बोलणं ऐकून निर्मितीने लगेच तिचा मोहोरा बदलला आणि ती त्या बायकांच्याकडे तोंड करून बसली. त्याचवेळी त्यांच्यातली एक उठली आणि समोरच्या ढिगात हात घालून तो ढीग तिने ओंजळीत घेतला. येऊन सर आणि निर्मितीच्या मध्ये ते ठेऊन ती झोपडीच्या दिशेने गेली आणि आतून एक लांबलचक बांबू घेऊन आली. तो बांबू देखील तिने हसत सरांच्या हातात दिला आणि परत एकदा तिच्या जागेवर जाऊन बसली.

त्या बायका नक्की काय करत आहेत याचा अंदाज घेण्यासाठी निर्मितीने त्यांच्या दिशेने सरकत त्यांचं निरीक्षण केलं. तिच्या लक्षात आलं की त्या समोरच्या ढिगाला निवडत आहेत. आपण शेंगा जसे निवडतो आणि फोडून आतले दाणे काढतो... तसा काहीसा उद्योग चालू होता त्यांचा. म्हणजे त्या बाईने त्यांच्यातल्या शेंगा खाण्यासाठी आपल्याला आणून दिल्या आहेत तर... असा विचार करून निर्मिती तिच्या पुढ्यातल्या शेंगांकडे वळली. पण पुढ्यातल्या त्या प्रकाराकडे बघून तिला मोठा धक्का बसला. तिच्या पुढ्यात ठेवलेला ढीग म्हणजे प्रचंड मोठ्या आकाराच्या मुंग्या होत्या. तिने नजर उचलून सरांकडे बघितलं आणि तिचे डोळे विस्फारले गेले. सरांनी एक मुंगी उचलली होती आणि तिचं डोकं मोडून तोंडात टाकली होती. ते बघूनच निर्मिती शहारली. सरांनी दुसरी मुंगी उचलली आणि त्यांचं लक्ष निर्मितीकडे गेलं. तिच्या चेहेऱ्यावरचे भाव बघून सरांच्या लक्षात आलं की हा एकूण प्रकार निर्मितीच्या आवाक्याबाहेरचा आहे. त्यांनी मंद स्मित केलं आणि म्हणाले; "निर्मिती; मला कळतंय तुला धक्का बसला आहे. पण चिंता करू नकोस. अग, या मुंग्या अत्यंत चविष्ट आहेत. क्षणभरासाठी असा विचार कर की तू तुझ्या गावाकडे असलेला रानमेवा खाते आहेस. या मुंग्यांचं डोकं तोडून टाकलं की या अत्यंत चविष्ट लागतात. काहीसा आंबट आणि तिखट वाटावं असं चर्चरीतपणा आहे या चवीमध्ये. त्यात अगदी दहा-बारा मुंग्या खाल्यास ना तरी पोट गच्च भरेल."

"पण सर मुंग्या? म्हणजे मला ही कल्पना देखील असह्य होते आहे हो." निर्मितीने प्रांजळपणे काबुल केलं. तिची मनस्थिती समजून घेत सर म्हणाले; "मी समजू शकतो निर्मिती... हा तुला मोठा धक्का आहे. पण आता तू मनाची तयारी कर की यापुढे इथे असेपर्यंत प्रत्येक क्षणी तुला काहीतरी वेगळं अगदी तुझ्या कल्पनेच्या पलीकडचं दिसणार - अनुभवाला येणार आहे. कारण मुळात आपण सर्वसाधारण परिस्थितीत नाही आहोत." निर्मितीला सरांचं म्हणणं पटलं. पर तरीही मुंगी खाण्याच्या कल्पनेनेच तिला अस्वस्थ वाटायला लागलं. ती या मुंग्या खाऊ शकणार नाही हे लक्षात आल्याने सरांनी तिच्या पुढ्यात बाजूला ठेवलेला बांबू दिला आणि म्हणाले; "ठीक आहे. आज एकदम हे असं खाणं तुला जमणार नाही; मान्य आहे मला. बरं, पण हा बांबू घे. एका बाजूने तोंडाला लाव. एक प्रकारचं वेगळंच पेय आहे. आवडेल तुला चव आणि मुख्य म्हणजे तब्बेतीला एकदम छान आहे ते." निर्मितीने एकदा सरांकडे आणि एकदा बांबूकडे बघितलं. तिचं मन तयार नव्हतं; पण भूक देखील चांगलीच लागली होती. त्यामुळे बांबू उचलून तिने हातात घेतला. एका बाजूने झाडाच्या जाड पानांनी बंद केला होता तो बांबू. ते पण काढून तिने वास घेऊन बघितला. गोडसर वास जाणवला तिला. वासावरून ते पेय चांगलं असावं असं तिच्या मनात आलं आणि तिने तो बांबू तोंडाला लावला आणि घाबरत-घाबरत एक लहानसा घोट घेतला. पण तिला ती गोडसर आंबट चव आवडली. ती एकदा सरांकडे बघत हसली आणि मग बांबू तोंडाला लावून तिने बरचसं पेय संपवलं.

ते पेय पिऊन तिला खरंच पोट भरल्यासारखं वाटायला लागलं. बांबू सरांकडे देत ती म्हणाली; "सर, खरंच छान चव आहे याची. नक्की काय आहे हे?" तिच्याकडे बघत हसत सर म्हणाले; "ते काय आहे ते समजलं तर तुला नाही आवडणार; कदाचित उलटून देखील पडेल जे प्यायली आहेस ते." सरांच्या वाक्याने ती थोडी अस्वस्थ झाली. पण मग स्वतःला शांत करत म्हणाली; "सर, आत्ताच तुम्ही म्हणालात न मनाची तयारी कर; मी केली आहे तयारी. उलटून नक्की नाही पडणार. कदाचित थोडी अस्वस्थ होईन मी... पण सर चालेल मला. सांगा ना सर... काय आहे हा पदार्थ?" "निर्मिती, ते कोणत्या तरी पक्षाच्या रक्तापासून बनवलेलं आहे. कोणता पक्षी ते मला देखील माहीत नाही." सरांचं बोलणं ऐकून निर्मिती खरंच खूप अस्वस्थ झाली. पण मग तिने स्वतःला सावरलं. ती शांत आहे हे लक्षात येऊन सरांना देखील हायसं वाटलं. तिच्याकडे बघत सर म्हणाले; "एका क्षणासाठी मला वाटलं की तुला इथे आणून चूक केली मी." हे ऐकून मात्र निर्मितीने शांतपणे नजर उचलून सरांच्या नजरेला भिडवली आणि म्हणाली; "सर, कधीच असा विचार करू नका. तुम्ही मला इथे येण्याबद्दल सांगितलंत तेव्हाच मी मनाची तयारी केली होती इथे जे अनुभव येतील ते स्वीकारण्याची." निर्मितीचं बोलणं ऐकून सरांना थोडं बरं वाटलं आणि तिच्याकडे बघत हसत त्यांनी समोरच्या ढिगातली अजून एक मुंगी उचलली. सरांच्या नजरेतला मिश्किल भाव बघून निर्मिती देखील हसली आणि म्हणाली; "सर, मनाची तयारी अजून होते आहे हं." आणि दोघेही मनापासून हसले.

निर्मितीने परत एकदा जवळ बसलेल्या त्या बायकांचं निरीक्षण करायला सुरवात केली. त्या एकमेकींशी काहीतरी गप्पा मारत समोरच्या मुंग्यांची डोकी मोडून ठेवत होत्या. इतक्यात बाजूची झाडं हलली आणि तिथून मिठठू पुढे आला. त्याला बघताच सर सावरून बसले आणि निर्मिती देखील. मिठठू त्या दोघांच्या जवळ येऊन बसला.

"नक्की कशासाठी गेला होतास मिठठू? काय आहे तुझ्या मनात ते अगदी स्पष्ट सांगशील का मला?" सरांनी मिठठूच्या डोळ्यात बघत विचारलं.

एकदा निर्मितीकडे बघून मिठठूने सरांकडे बघितलं आणि बोलायला सुरवात केली....

"सर, तुम्हाला असं वाटतंय की इथे जे मंदिर आहे त्याचं महत्व मला कळलंय आणि आपली ही पुराण वास्तू सर्वांसोमोर यावी.... तिचं खरं सत्य सर्वांना समजावं... तिचं महत्व सिद्ध व्हावं... इथली अंधश्रद्धा दूर व्हावी म्हणून मी तुम्हाला इथे बोलावलं आहे....."

"मिठठू, तुला नक्की काय म्हणायचं आहे? उगाच गोल गोल काहीतरी बोलू नकोस...." सर अजून काही बोलायच्या अगोदर मिठठूने त्यांचं वाक्य तोडलं आणि म्हणाला;

"सर, आज आत्ता मी तुम्हाला सगळंच अगदी स्पष्ट आणि सरळ सांगणार आहे. तुम्हाला पहिल्यांदा संपर्क केला होता तेव्हा पासूनच मला सगळं सांगायचं होतं. पण मला तशी परवानगी नव्हती. पण काल रात्री दिदी सोबत गप्पा झाल्या आणि माझं मला जाणवलं की दिदीला तिथे नेण्याअगोदर तुम्हाला आणि दिदीला सगळं खरं समजलं पाहिजे. म्हणूनच मी तसाच परवानगी घेण्यासाठी गेलो.

सर, परवानगी मुखीयची नाही! त्या मंदिरची..... किंबहुना.... त्या मंदिरामधून जो मार्ग जातो आणि जिथे खुला होतो... तिथे जे आहेत... त्यांची.

सर..... मी तुम्हाला पहिल्यांदा संपर्क करावा... तुम्ही इथे याल यासाठी जे करणं आवश्यक आहे ते करावं हा संकेत मला मिळाला. त्या संकेतानुसार मी पावलं उचलली आहेत. सर, तुम्हीच विचार करा.... इथे या जंगलात अनेक नरभक्षक जमाती अजूनही आहेत; हे सत्य आहे. अगदी लांब कशाला जायला हवं... आमच्या वस्तीच्या मुखीयाला तुम्ही भेटला आहात. त्याच्या डोळ्यात तुम्हाला एक राग-चीड कायम दिसली आहे; तुम्ही अनेकदा मला ते सांगितलंत. मी तुमची समजून करून दिली की तो राग माझा आहे; मी तुम्हाला इथे आणलं त्याचा. पण सर, तुम्ही बरोबर होतात. तो राग खरा तुमचाच. पण तरीही त्याने तुम्हाला काहीही केलं नाही... कोणीच काही केलं नाही. तुम्ही इथे आलात... परत गेलात... आणि असं अनेकदा झालं. तरीही तुम्हाला काहीही अडचण आली नाही... कारण सर; तुम्ही इथे यावं अशी ज्यांची इच्छा होती... आहे.... ते या जागेचे; फक्त या जागेचे नव्हे तर संपूर्ण जगाचे अनभिषिक्त नियंत्रक आहेत."

मिठठू जे बोलत होता ते सरांना आता सहन होईनासं झालं आणि त्यांनी त्याला बोलणं थांबवण्याची खुण केली. सर बोलायला लागले त्यावेळी रागाने थरथरणारा आवाज ते कसाबसा नियंत्रित करत आहेत हे निर्मितीच्या लक्षात आलं. तिने सरांना इतकं चिडलेलं कधीच बघितलं नव्हतं. तिला देखील मिठठूचं बोलणं पटत नव्हतं. कोणाकडून तरी मिळालेला संकेत... अनभिषिक्त नियंत्रक... हे सगळं म्हणजे अंधश्रद्धा आहे; हे तिला कळत होतं. पण सरच बोलत आहेत म्हंटल्यावर ती गप्प बसली... पण तेव्हढ्यापुरतच होतं ते... कारण सर जे बोलले ते ऐकून तिचे डोळेच विस्फारले गेले.... सर म्हणाले....

"मिठठू, मला कल्पना आली होती... मी तुला विचारलं देखील होतं याविषयी. पण त्यावेळी तू ते सगळं टाळत होतास. मी इथे येऊन देखील तू मला त्या मंदिराच्या जवळ देखील न्यायला तयार नव्हतास. मी आपणहून; तुझ्या मदतीशिवाय प्रयत्न केला तो यशस्वी झाला नाही... तेव्हाच माझ्या लक्षात आलं होतं की इथे काहीतरी वेगळं असं आहे. निर्मिती आठवतं का तुला मी या जागेविषयी सांगायला सुरवात केली तेव्हाच तुला मी म्हंटलं होतं की इथे एका खूप जुन्या संसकृतीचं अस्तित्व मला सापडलं आहे. अग, ते जे काही मंदिर सदृश आहे तिथून एका गूढ अस्तित्वाची सुरवात आहे; हे मला जाणवलं होतं. तिथे पूर्वी कदाचित् अनेक युगांपूर्वीची संस्कृती नांदत असावी असा मी कयास बांधला होता. पण मी याविषयी खूपच शाशंक होतो त्यामुळे कुठेही काहीही बोललो नव्हतो."

"सर, तुम्ही कुठेही काहीही बोलला नव्हतात म्हणूनच इथे परत परत येऊ शकत होतात." मिठठू परत एकदा सरांचं बोलणं तोडत म्हणाला.

निर्मितीची अवस्था मात्र अगदीच विचित्र झाली होती. सरांनी आठवण करून दिल्यावर तिला आठवलं होतं की सर अगदीच सुरवातीला असं काहीसं म्हणाले होते. पण असं काहीतरी गूढ असेल असं सहज बोलून गेले असतील सर; असं तिला वाटलं होतं. शास्त्रोत अभ्यास करणारे सर... हे असलं काही गूढ अतिरंजित असेल यावर विश्वास ठेवतील हे तिला खरंच वाटलं नव्हतं. नक्की काय बोलावं ते तिला कळत नव्हतं... त्यामुळे ती अगदीच शांत झाली होती.

"सर, तुम्ही सत्य समजून घेण्याच्या मनस्थितीत आला आहात हे त्यांना कळल्या नंतरच त्यांनी तुमचं इथलं येणं पूर्णपणे स्वीकारलं. पण यावेळी येताना तुम्ही दिदीला आणलंय. दिदीचं येणं मला पूर्ण अनपेक्षित होतं. त्यामुळे मी पूर्ण गोंधळलो होतो. पण मग तुम्ही दोघेही किमान इथपर्यंत यायला हरकत नाही; हा संकेत मला मिळाला आणि तुम्ही दोघे इथे आलात. मात्र जस मी म्हणालो; दीदीशी बोलल्यानंतर मला जाणवलं की आपण त्या जागेमध्ये प्रवेश करण्या अगोदर तुम्हाला दोघांना सगळं सत्य माहीत असणं आवश्यक आहे... आणि म्हणूनच तुम्हाला सगळं खरं सांगावं हे त्यांना सांगून परवानगी घ्यायला गेलो होतो मी." मिठठू म्हणाला.

एक क्षण निर्मितीकडे बघून सरांनी मिठठूला विचारलं..... "मग?"

"सर, परवानगी घेऊन आलो आहे....." मिठठू म्हणाला आणि सरांचा चेहेरा खुलला तर निर्मितीचे डोळे मोठे झाले.

क्रमशः

Friday, December 31, 2021

अनाहत सत्य (भाग 5)

अनाहत सत्य

भाग 5

निर्मिती आत शिरली आणि तिच्या लक्षात आलं की सर जागेच आहेत.

"सर? जागे आहात तुम्ही?" तिने काहीसं अवघडून सरांना विचारलं.

"हो! म्हणजे थोड्या वेळापूर्वी जाग आली. तू आत येत होतीस आणि परत मागे वाळलीस न तेव्हा..." सर शांतपणे म्हणाले.

"अरे!? मग तुम्ही बाहेर का नाही आलात?" निर्मितीने आश्चर्याने विचारलं.

"मी आलो असतो तर कदाचित मिठठू बोलायचा थांबला असता आणि सगळंच माझ्यावर सोडून निघून गेला असता. खरं तर माझी इच्छा होती की त्याने तुला स्वीकारावं. फक्त त्यानेच नाही तर... त्यासर्वांनीच." सर उठून बसत म्हणाले.

"सर्वांनी म्हणजे या कबिल्यातल्या सर्वांनी न सर?" निर्मितीने विचारलं.

"अहं! हा कबिला आणि त्यांचा मुखीया हे केवळ नाममात्र ग. खरे ते कोणी वेगळेच आहेत." सर शांतपणे म्हणाले.

निर्मितीला काही कळत नव्हतं सर काय म्हणत आहेत.... त्यामुळे ती काही एक न बोलता सर जे बोलत होते ते ऐकत होती.

"निर्मिती.... मिठठू जे बोलत होता ते काही तंद्रीमध्ये किंवा झोपेत नाही.... तो जाता-जाता म्हणाला ना की तो परवानगी घ्यायला जातो आहे.... मला तेच अपेक्षित होतं." सर जे बोलत होते ते अजूनही निर्मितीला कळत नव्हतं. "सर, मला काहीही कळत नाही आहे. नीट फोड करून सांगाल का प्लीज." निर्मिती म्हणाली आणि सर हसले.

"अग, मला देखील नक्की माहीत नाही. पण जे कळतंय ते सांगतो. मला हे देखील माहीत आहे की मी तुला जे सांगणार आहे ते कदाचित तुला पटणार देखील नाही.... पण आता इथवर आल्यानंतर तुला काही गोष्टी सांगणं आवश्यक आहे. निर्मिती... बेटा.... आपण जे देऊळ बघायला जाणार आहोत ते फक्त पुराण वास्तु इतकंच नाही तर त्याहूनही खूप काही जास्त आहे." सर सावरून बसत म्हणाले.

"खूप काही जास्त? म्हणजे नक्की काय सर?" निर्मिती पूर्ण बुचकळ्यात पडली होती.

"निर्मिती.... ते मंदिर म्हणजे एका वेगळ्या जगाचा मार्ग आहे... किंवा सुरवात आहे.... किंवा... असंच काहीतरी आहे. मला देखील नक्की सांगता येणार नाही. कारण अजून मी देखील चाचपडतो आहे. तुला आठवतं का या मंदिरासंदर्भात माहिती सांगताना तुला मी सांगितलं होतं की ते जे काही मंदिर सदृश आहे तिथून एका गूढ अस्तित्वाची सुरवात आहे. तिथे पूर्वी कदाचित् अनेक युगांपूर्वीची संस्कृती नांदत असावी असा माझा कयास आहे. परंतु अजूनही मी याविषयी खूपच शाशंक असल्याने कोणाकडेही फारसं बोललेलो नाही.  हा परिसर घनदाट झाडांनी आच्छादलेला आहे. त्यामुळे भर दिवसा देखील तिथे फारसा उजेड नसतो. त्यात तिथेल्या आदिवासींमध्ये असा समाज आहे की तो एकूण भाग  शापित  आहे. मी हळूहळू त्या लोकांचा विश्वास मिळवून त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न केला तेव्हा मला समजलं की त्या आदिवासींचा अनुभव असा आहे की तिथे येणाऱ्या आपल्यासारख्या बाहेरच्या लोकांना वेड लागतं किंवा मग ते अचानक गायब होतात . अर्थात तिथल्या स्थानिकांना मात्र कधी हा त्रास झालेला नाही. त्यामुळे त्यांचा त्या भागातला वावर अगदी सहज असतो. निर्मिती.... प्रश्न हा आहे की इथल्या लोकांना तिथे जाताना काहीही त्रास होत नाही; मग बाहेरून येणाऱ्यांना तो भाग स्वीकारत का नाही? या प्रश्नाचं उत्तर अगोदर मिळवणं आवश्यक वाटल्यामुळेच मी स्वतः इथे अनेकदा येऊन माझ्या अस्तित्वाची तिथे ओळख निर्माण केली. मला यांच्यातलाच एक असल्याप्रमाणे स्वतःची ओळख निर्माण करायची होती... आणि त्याचवेळी असं कोणीतरी माझ्या सोबत हवं होतं जे या जागेसाठी नवीन असेल पण या विषयासंदर्भात नवीन नसेल." सर म्हणाले आणि निर्मितीला एक मोठ्ठा धक्का बसला.

"सर, मला तुम्ही गिनीपिग म्हणून आणलं आहात?" अत्यंत दुखावलेल्या आवाजात निर्मिती म्हणाली.

"निर्मिती, उगाच काहीतरी शब्द वापरू नकोस. तुला मी गिनीपिग करेन का? तू इथे माझ्या सोबत आहेस कारण तुला ऐतिहासिक.... पौराणिक विषयांमध्ये रस आहे. त्याच सोबत तुझा अभ्यास देखील खूप प्रामाणिक आणि फक्त पुस्तकांच्या आतला नाही. सर्वात महत्वाचं म्हणजे जर काही वेगळं नवीन असेल तर तू लगेच ते नाकारणार नाहीस... अशी मला खात्री आहे." सर म्हणाले.

"सर, वेगळं.... नवीन.... नक्कीच नाकारणार नाही. पण अतिरंजित किंवा काहीतरी अंधश्रद्धा असली तर मात्र मी नाही स्वीकारणार." निर्मिती काहीशा स्थिर आणि गंभीर आवाजात म्हणाली.

"निर्मिती, तुला वाटतं का की काहीतरी अतिरंजित असं मी तुला सांगेन? बेटा... अंधश्रद्धा असली तर मी देखील ते मान्य करणार नाही. इथे काहीतरी वेगळं आहे. ते आपल्या नेणिवेच्या जाणिवेपलीकडे आहे." सर शांतपणे म्हणाले.

"सर.... नेणिवेच्या जाणिवेपलीकडे म्हणजे नक्की काय?" निर्मितीने विचारलं.

"निर्मिती... कधी कधी आपण विचारात गढलेले असतो किंवा तंद्रीमध्ये असतो आणि अचानक आपल्याला कोणीतरी हाक मारल्यासारखं वाटतं. म्हणजे... खरंच हाक मारली आहे असं वाटतं आणि आपण वळून बघतो; पण मग लक्षात येतं की कोणीच नाही... आणि मग आपल्याला भास झाला अशी स्वतःची समजून काढतो आपण. पण कल्पना कर... की खरंच त्यावेळी त्या व्यक्तीने आपल्याला तीव्रतेने आठवलं असेल... किंवा हाक मारली असेल तर?..." सरांना मध्येच थांबवत निर्मिती म्हणाली; "सर, होतं की असं कधी कधी.... कोणीतरी सांगतं आपल्याला की अग परवाच तुझी आठवण काढली... आणि आपल्याला आठवतं की आपल्याला देखील त्या व्यक्तीने हाक मारल्यासारखं वाटलं होतं... किंवा ती व्यक्ती अगदी तीव्रतेने आठवली होती त्याक्षणी. पण त्याचा इथे काय संबंध सर?"

"निर्मिती.... तुझ्या उदाहरणामध्ये आपल्या माहितीमधल्या व्यक्तीने आपली आठवण काढलेली असते किंवा आपल्याला हाक मारली असते असं म्हणते आहेस. मी त्याहूनही वेगळं काहीतरी सांगायचा प्रयत्न करतो आहे. समज.... तू ओळखत नाहीस... आणि तरीही एखादी व्यक्ती किंवा एखादं अस्तित्व तुला बोलावायला लागलं तर तू काय म्हणशील त्याला?" सर निर्मितीकडे एकटक बघत म्हणाले.

सरांच्या नजरेने निमिर्ती अस्वस्थ झाली आणि त्यांची नजर चुकवत म्हणाली; "सर, हे काहीतरी विचित्र आहे. म्हणजे तुमचा प्रश्नच मला कळला नाही आहे. जर मला ओखत नाही तर का कोणी मला हाक मारेल?"

"निमिर्ती तुला कळलं नाही आहे मी काय म्हणतो आहे.... तू ओखत नाहीस.... पण जर ती व्यक्ती..... ते अस्तित्व तुला ओळखत असेल तर? एका वेगळ्याच मितीमध्ये तुला हाक मारली असेल त्या अस्तित्वाने तर? तू तुझ्याही नकळत ओ दिली असलीस तर?" सर अजूनही निर्मितीकडे एकटक बघत बोलत होते.

"सर.... मी ओखत नाही.... पण तरीही जर कोणी मला हाक मारत असेल तर कदाचित मी उत्तरच देणार नाही. हे झालं सर्वसाधारणपणे सर्वसामान्य परिस्थितीतलं माझं वागणं. पण मला कळतंय की तुम्ही सर्वसामान्य परिस्थितीबद्दल बोलत नाही आहात. तुम्हाला नक्की काय म्हणायचं आहे ते मला नीट फोड करून सांगाल का सर? कारण तुमच्या या बोलण्याने मी अस्वस्थ होते आहे... आणि खूपच गोंधळून गेले आहे. मुळात मला असं वाटायला लागलं आहे की तुम्ही आणि मिठठूने मिळून मला मुद्दाम इथे आणलं आहे. सर, माझा तुमच्यावर विश्वास आहे... अगदी डोळे मिटून मी तुमच्या सोबत कधीही कुठेही येईन. पण तरीही आत्ता आपल्यामध्ये जो संवाद होतो आहे... त्यामुळे मी खूप अस्वस्थ होते आहे." निमिर्ती स्पष्टपणे बोलली.

तिचं बोलणं ऐकून सर मनापासून हसले आणि म्हणाले; "निर्मिती तुझा माझ्यावर विश्वास आहे हे मला माहीत आहे. मुळात तुला अस्वस्थ करण्याचा किंवा गोंधळवून टाकण्याचा माझा उद्देश नाही; पण खरं सांगू का? मला देखील कल्पना नाही की नक्की काय सांगावं तुला. माझे त्या भागाविषयीचे अनुभव हे केवळ माझ्या आतेंद्रियांना जाणवणारे आहेत. काहीतरी वेगळं आहे तिथे. म्हणजे कसं ते सांगतो.... कधी कधी आपण सरळ समोर बघत असतो; पण डोळ्यांच्या कडेला काहीतरी हालचाल जाणवते आपल्याला जी आपल्या मागे किंवा अगदी दूर झालेली असते. अनेकदा आपला त्या हालचालीशी संबंध देखील नसतो; पण केवळ आपल्याला डोळ्यांच्या कडांकडून जाणवत आणि आपण वळून बघतो... पण आपण वळलो की आपला संबंध नाही त्याच्याशी. त्या भागात गेलं की असं काहीसं जाणवत राहातं मला. काहीतरी असतं तिथे... जे घडत असतं. मला जाणवतं देखील... पण तरीही मी त्यातला भाग नसतो... किंवा अजून तरी नाही. पण तरीही मी तिथे असावं; किंवा असं म्हणूया की माझं अस्तित्व तिथे असलंच पाहिजे अशी त्या डोळ्यांच्या कडांकडच्या हालचाली करणाऱ्यांची इच्छा असावी."

सरांचं बोलणं निर्मिती मनापासून ऐकत होती. ते बोलायचे थांबले तशी ती म्हणाली; "सर, म्हणजे तुमचा sixth sence तुम्हाला जाणवतो का तिथे गेल्यावर?"

"Excatly निर्मिती! मी तिथे असण्यात त्यांना काही प्रॉब्लेम नाही; पण माझं असणं हे केवळ कार्यकारण भाव आहे; असं देखील मला जाणवतं ग." सर म्हणाले.

"म्हणजे काय सर?" निर्मितीने नकळून विचारलं.

"अग, म्हणजे त्यांना माझ्याकडून काहीतरी अपेक्षा आहे; म्हणून माझं तिथे असणं ते स्वीकारत आहेत; असं मला जाणवतं सतत." सर म्हणाले.

"सर पण हे ते जे कोणी आहेत... ते कोण? ते तर सांगा न. मी अजूनच गोंधळून जाते आहे." निर्मिती न राहून म्हणाली.

सर उठून तिच्या जवळ येऊन बसले आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाले; "बाळ निर्मिती, मला देखील अजून ते कळलेलं नाही. पण हे नक्की की मला आतून असा एक संकेत जाणवला की मी तुला घेऊन आलं पाहिजे इथे. म्हणूनच मी तुला विचारलं. अर्थात तू जर नाही म्हणाली असतीस तर मी तुला आग्रह केला नसता. पण का कोण जाणे मला खात्री होती की तू नाही म्हणणार नाहीस. निर्मिती, कदाचित मी तुला इथे आणण्याचा एक दुवा असेन. किंवा आपण दोघांनी एकत्र इथे असणं ही त्यांची गरज असेल."

निर्मिती सरांच्या बोलण्याने काहीशी अस्वस्थ झाली होती. सरांच्या ते लक्षात आलं. परत एकदा स्वतःच्या बिछान्याकडे वळत सर म्हणाले; "आत्ता फार विचार नको करुस निर्मिती. कदाचित मी देखील तुला नीट समजावू शकत नाही आहे. मिठठू जाताना काय म्हणाला ते आठव... तो परवानगी घेऊन येतो म्हणून सांगून गेला आहे न. याचा अर्थ कदाचित मी जे माझा sixth sence म्हणतो आहे... माझ्या अतींद्रिय जाणिवा..... ते खरं असेल. त्या मंदिराच्या जवळ जे काही आहे... ते इथल्या लोकांना माहीत आहे; जाणवतं आहे किंवा कदाचीत त्यांचा त्याच्याशी सहज संपर्क देखील आहे. त्या आपल्याला माहीत नसलेल्या कशाची तरी.... आपल्या सोयीसाठी आपण त्याला अकल्पित शक्ती म्हणू.... तिची परवानगी घ्यायला गेला आहे मिठठू. म्हणजे नक्की कसली परवानगी हे मला विचारू नकोस... कारण मला देखील ते माहीत नाही. पण बेटा एक नक्की की आपण एका वेगळ्या परिस्थितीमध्ये शिरतो आहोत. मात्र माझ्यावर एक विश्वास ठेव निर्मिती; मी तुला कोणत्याही अडचणीत टाकणार नाही."

खूप शांत आणि हसऱ्या आवाजात निर्मिती म्हणाली; "सर, मी मगाशीच म्हंटलं की माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे मला स्वतःची कोणतीही काळजी नाही. फक्त सत्य आणि अतिरंजित यामध्ये आपण सत्याचा स्वीकार कायम केला पाहिजे हा माझा आग्रह आहे आणि राहील."

तिच्याकडे बघत मोकळेपणी हसत सर म्हणाले; "अगदी मान्य निर्मिती. माझं देखील कायमच हे म्हणणं राहिलं आहे. बरं, आता थोड्यावेळ पड बेटा तू. घड्याळात बघितलंस तर पाहाट होण्याची वेळ झाली आहे हे तुझ्या लक्षात येईल. पण इथे तसही खूप उजाडलं असं होत नाही.... अगदी दिवस वर येईपर्यंत. एकतर तुझं पूर्ण रात्र जागरण झालं आहे; जे एका अर्थी बरं झालं... पण आता तसही मिठठू परत येइपर्यंत आता आपल्याला करण्यासारखं काहीही नाही. त्यामुळे आपण दोघेही परत एकदा झोपुया. इथून निघाल्यानंतर पुढे काय काय घडणार आहे ते आपल्या हातात नाही; किंबहुना आपल्याला माहीत नाही किंवा आपण कल्पना देखील करू शकणार नाही. त्यामुळे आपलं मन आणि शरीर फ्रेश असणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे झोप तू. मी पण परत एकदा झोपतो आहे."

असं म्हणून सर परत एकदा आडवे झाले आणि त्यांनी डोळे मिटून घेतले. सरांकडे एकदा एकटक बघून निर्मिती देखील तिच्या अंथरुणावर जाऊन पडली. विचार करता करता नकळत निर्मितीला झोप लागली... अगदी गाढ!

क्रमशः

Friday, December 24, 2021

अनाहत सत्य (भाग 4)

 अनाहत सत्य

भाग 4



भाग 4

"दीदी....." परत एकदा मागून मिठठू ची हाक ऐकून निर्मिती बाहेर आली.

"क्या हुवा मिठठू?" त्याच्याकडे बघत तिने विचारलं.

"दीदी, तुम्हाला प्रश्न पडला असेल नं की मला इतकी माहिती कशी? मी मराठी कसं बोलू शकतो? असंही वाटत असेल की सरांना यातील काहीही माहीत नाही? दीदी, एक सांगू.... सरांना सगळं माहीत आहे. माझी तर खात्रीच आहे की त्या मंदिराचं गूढ देखील त्यांनी शोधलं आहे. किंवा किमान त्यांना अंदाज आला आहे; तिथे नक्की काय आहे त्याचा." मिठठू परत एकदा जवळच्या दगडावर बसत म्हणाला.

निर्मितीच्या लक्षात आलं की आज मिठठू मनातलं सगळं बोलून टाकायच्या मनस्थितीत आहे. तिला देखील अनेक गोष्टी समजून घ्यायची इच्छा होती. त्यामुळे ती देखील त्याच्या समोर बसली आणि म्हणाली; "मिठठू, हे खरं आहे की तू इतकं चांगलंमआराठी कसं बोलू शकतोस; हा प्रश्न मला सतावतो आहे. पण तुला इतकी सगळी माहिती कशी... हा प्रश्न नाही आला मनात. उलट कौतुक वाटलं. तू ज्या परिस्थितीमधून पुढे आला आहेस; त्याचा बाऊ न करता तू जिद्दीने अभ्यास करतो आहेस हेच सिद्ध होतं तुझ्याकडे असणारी माहिती ऐकून."

".... आणि दीदी, मी जर तुम्हाला म्हंटलं की माझ्याकडची माहिती मी पुस्तकातून नाही वाचलेली; तर?" स्थिर आवाजात मिठठू म्हणाला. निर्मितीला त्याचा चेहेरा चांदण्यामध्ये अगदीच अस्पष्ट दिसत होता. तरीही त्याचे चमकणारे डोळे तिला काहीतरी वेगळी जाणिव करून देत होते.

"मिठठू थोड्या वेळापूर्वी तर तू म्हणालास की तू मला जरुरी पेक्षा जास्त माहिती दिली आहेस... आणि तरीही तू परत एकदा मला स्वतः हाक मारून बोलतो आहेस. असं काय आहे की जे तुझ्या ओठांपर्यंत येतं आहे पण तू मागे ढकलतो आहेस? तू जर बोललास तर कोणी तुला शिक्षा करेल अशी भीती आहे का तुला?" निर्मितीने त्याला विचारलं.

"भिती का मतलब हम कोई भी नही जानते दिदी. हम हमारे आजूबाजू की इस खूबसुरत दुनिया के साथ मिलजुलकर रेहेना जानते है... और चाहते भी है. हमरा बस चले तो यहा किसींको भी न आने दे हम." मिठठू तंद्रीमध्ये बोलत होता.

"पण तू स्वतःच तर सरांना बोलावून घेतलं आहेस न...." निर्मितीने त्याला अचानक प्रश्न केला.

"वो संकेत मुझे मिला और फिर मैने मुखीया को समझाया... वो मान गाये और मैने सर से बात की. मुझे..." मिठठू त्याच तंद्रीत बोलून गेला आणि बोलता बोलता थांबला.

"दिदी....."

"मिठठू, आत्ता तू मला जे जे सांगशील ते फक्त तुझ्या माझ्यात राहील हा शब्द देते मी तुला. पण मोकळेपणी बोल. एक लक्षात घे की तुझी माहिती कदाचित आम्हाला उद्या ते मंदिर बघताना उपयोगी पडेल." त्याच्या जवळ सरकून त्याचा हा अत्यंत प्रेमाने हातात घेत अगदी मऊ शब्दात निर्मिती म्हणाली.

"दिदी.... मुझे मालूम था की एक दिन आप आओगे. म्हणजे तुम्ही.... निर्मिती.... येणार असं नव्हतं माहीत. पण मला जो संकेत मिळाला होता... त्यात दोन व्यक्ती अपेक्षित होत्या. अनेक महिने एकटे सर येत होते... त्यामुळे मी अलीकडे अस्वस्थ झालो होतो. मला संकेत कळला नाही की काय; असं वाटायला लागलं होतं. पण तुम्हाला बघितलं आणि लक्षात आलं की तुम्हीच ती दुसरी व्यक्ती आहात. दिदी, मला फार काही माहीत नाही.... पण तुमचं आयुष्य नक्की बदलणार आहे इथून जाताना; हे मला माहीत आहे. मुख्य म्हणजे इथून तुम्ही वेड न लागता जाणार आहात याची मला खात्री आहे." मिठठू म्हणाला. त्याच्या बोलण्याने निर्मिती थोडी दचकली आणि तिने मिठठूला विचारलं; " तू नक्की काय म्हणतो आहेस मिठठू?"

"दिदी, तुम्हाला सरांनी सांगितलं नाही का मंदिराचं सत्य? मला माहीत आहे; नक्की सांगितलं असेल. कारण प्रोफेसर सर कोणालाही इथे फसवून आणणार नाहीत. ते तसे आहेत; म्हणूनच तर मी त्यांनाच कॉन्टॅक्ट केलं. नाहीतर आज त्यांच्याहूनही जास्त शिकलेले आणि माहिती असलेले अनेक तरुण प्रोफेसर्स आहेत की. पण ते मंदिर बघताना हुशारी आणि माहिती असणं जसं आवश्यक आहे तसच भावनिकता देखील महत्वाची आहे. मुळात आम्ही इथे राहाणारे सगळे आदिवासी आजही केवळ भावनिकतेवरच तर जगतो आहोत. " मिठठू म्हणाला.

निर्मितीला त्याच्या बोलण्याचा काहीच अर्थ लागला नाही. "काय म्हणतो आहेस तू मिठठू? मंदिराचं सत्य? नाही रे! सरांनी मला असं काहीच वेगळं सांगितलं नाही." निर्मिती गोंधळून म्हणाली.

"दिदी, नीट आठवा.... सरांनी तुम्हाला सांगितलं असेल की इथे येणारे लोक एकतर वेडे होतात किंवा गायब होतात."

"हो! हे त्यांनी सांगितलं होतं मला. पण हे सगळं इथल्या लोकांनी पसरवलेलं असेल न. त्या देवळापाशी सहसा कोणी जाऊ नये म्हणून." निर्मिती अजूनही गोंधळलेलीच होती.

"होय दिदी! थोडं पसरवलेलं आहे. पण मुळात काहीतरी असेल म्हणून तर धूर काढू शकतो आहोत आपण." मिठठू म्हणाला.

"मिठठू, तू कोड्यात बोलणं बंद करशील का जरा? नीट काय ते सांग मला." निर्मिती काहीशी वैतागत म्हणाली.

"दिदी, मी थोड्या वेळापूर्वी तुम्हाला म्हंटलं न की या भागात जे होमो सेपियन्स आले आणि मग नाहीसे झाले.... ते जर नाहीसे झालेच नसतील तर?" मिठठू म्हणाला.

निर्मिती क्षणभर शांत राहिली आणि मग बोलायला लागली; " मिठठू, तू उगाच माझ्या मनात साशंकता निर्माण करतो आहेस असं आता मला वाटायला लागलं आहे. कारण तू जे म्हणालास की होमो सेपियन्स इथे आले आणि मग गायब झाले... तर ते तसं फारसं खरं नाही. कारण... तू इथेच राहातो आहेस. तुमच्या या कबिल्याप्रमाणे इथे अनेक कबिले आहेत.... अगदी नरभक्षक देखील आहेत खोल जंगलात. हे कोण आहेत असं तुला वाटतं? अरे आपण सगळेच त्या होमो सेपियन्सचे वंशज आहोत. हे बघ मिठठू..... होमो सेपियन्सची उत्पत्ती तू थोड्या वेळापूर्वी मला सांगत होतास न तेव्हा मला तुझं खूप कौतुक वाटत होतं. म्हणून मी तुला अडवलं नाही. पण अरे माझा अभ्यासाचा विषयच मानव जन्म आणि आपला इतिहास हा आहे.

मिठठू, साधारण 13.5 बिलियन वर्षांपूर्वी एक माहास्फोट झाला आणि वेळ, ऊर्जा, अवकाशआणि पदार्थ अस्तित्वात आले. त्यानंतर देखील साधारण चार बिलियन वर्षांपूर्वी आपल्या या ग्रहावर काही विशिष्ठ रेणू विशिष्ठ ऊर्जेच्या संपर्कात आले आणि त्यातून सजीव निर्माण झाले. मग कधीतरी साधारण 70000 वर्षांपूर्वी या सजीवांमधल्या होमो सेपियन नावाच्या एका प्रजातीने अजूनच गुंतागुंतीची आणि विस्तृत रचना तयार केली, तिला संस्कृती म्हटलं जातं, या संस्कृतींचा अभ्यास म्हणजे इतिहास. अर्थात हा एक सिद्धांत आहे. सिद्धांत म्हणजे नियम नाही... एखाद्या निरीक्षकाच्या अनेक निरीक्षणांचा तपासून सिद्ध करता येईल असा संच म्हणजे सिद्धांत. आपले पूर्वज.. ज्यांचा उल्लेख तू केलास... होमो सेपियन्स... ते होमो सेपियन्स निर्माण होण्या अगोदर अनेक संक्रमणं झाली हे तुला माहीत आहे का?

होमो सेपियन्सचे चुलत भाऊ... म्हणजे होमो सेपियन्स मधील नर किंवा मादी आणि अजून एक प्रजाती यांच्या संक्रमणातून हे चुलत भाऊ निर्माण झाले होते. त्यांना होमो निअंडरथल म्हणतात. आपल्याहून ताकदवान, मोठा मेंदू असणारे मानव होते ते. अगदी तीस हसज वर्षांपूर्वीपर्यंत ते आपल्या सोबत या ग्रहावर नांदत होते. त्याच्या प्रमाणेच होमो सेपियन्सचे अनेक इतर भाऊ.... म्हणजे होमोच्या प्रजाती होत्या. होमो फ्लोरिसीएनसिस, होमो हबिलीसहोमो, हैडेलबेग्रेसीस, होमो नालेंदी, होमो निअंडरथलेसिस असे अनेक होते. आपण मुळात माकडांपासून नाही बनलो; तर माकड सदृश प्राण्यापासून उत्क्रांत झालो आहोत. त्या प्राण्यापासून एक शाखा मानव बनली आणि दुसरी माकड.

मिठठू, अरे विचार कर, जर आपण फक्त माकडापासून उत्क्रांत झालो असतो तर माकडं आज असती का? त्यामुळे आपण हे समजून घेतलं पाहिजे की; जेंव्हा एखादी नवीन स्पिसिज या भूतलावर येते तेंव्हा काही हजार/ लाख वर्ष ती ज्या प्रजातीपासून फुटून वेगळी झालीय ती प्रजातीही या जगात असते, त्या काळात हि नवीन तयार झालेली प्रजाती आपल्या मूळ प्रजातीबरोबर सतत संकर करत असते कारण त्यांची गुणसूत्र जवळ जवळ सारखी असतात, आणि अशा कित्येक प्रजाती तयार होत असतात. काही काळात जर हि नवीन प्रजाती मूळ प्रजातिपेक्षा जगण्याच्या शर्यतीत यशस्वी ठरली तर ती जुन्या प्रजातीत आपले सगळे जीन्स पसरवून टाकते आणि जुनी प्रजाती नामशेष होते.

तसे आपल्यातले जे होमो जुळवून घेऊ शकले नाहीत ते नष्ट पावले आणि ज्यांनी बदलणाऱ्या परिस्थितीमध्ये स्वतःला बदललं ते त्यांची उत्क्रांती होत राहिली. होमो सेपियन... म्हणजे आपला पूर्वज हा इतर सर्व प्रजातीपासून वेगळा झाला कारण त्याने बदलत्या प्रत्येक गोष्टीचा स्वीकार स्वतःच्या जनुकीय उत्पत्ती मध्ये केला. आपल्या पूर्वजासोबत ज्या इतर जाती होत्या किंवा असं म्हणू की जे होमो होते त्यांनी होणारे बदल एकतर स्विकारले नाहीत किंवा त्यांच्यात जनुकीय बदल टिकले नाहीत; किंवा हे बदल काही प्रजातींना झेपले नाहीत. त्यामुळे पुढे कालौघात या जाती नष्ट पावल्या .

पण आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की Nature is enormous but not intelligent. त्यामुळे सर्वसाधारणपणे जगण्यासाठीचे बदल हे आपोआप होत गेले. अगदी सोप्या शब्दात सांगायचं तर... आपल्या हाताच्या अंगठ्याचे बोटं इतर चार बोटांपेक्षा दूर असले तर आपली पकड अजून मजबूत होईल हे आपल्या पूर्वजाला माहीत नव्हतं, पण अपघाताने असा एखादा जन्माला आला, मग या सोयीमुळे तो जास्त जगला, त्याला जास्त मुलं झाली आणि हळूहळू आपल्या सगळ्यांचे अंगठे माकडांना ठेंगा दाखवण्या इतपत बदलले." निर्मिती स्वतःच्याच तंद्रीमध्ये बोलत होती. पण अचानक तिला भान आलं आणि बोलायचं थांबवून तिने मिठठूकडे बघितलं.

"कंटाळलास ना मिठठू? मी पण बघ न कुठे तुला काहीसा कंटाळवाणा इतिहास... माहिती देत बसले आहे." हसत निर्मिती म्हणाली.

"दिदी, असं नका म्हणू. ही सगळीच माहिती माझ्यासाठी नवीन नाही. पण तरीही तुम्ही ती ज्या पद्धतीने समजावता आहात न... त्यातून मला काही वेगळेच अर्थ लागायला लागले आहेत. दिदी, तुम्ही इतक्या मनापासून आणि मोकळेपणी बोलता आहात की वाटतं तुमच्याशी असंच बोलत राहावं. खर सांगू का? माझ्या मनात खरंच खूप काही आहे... जे मला तुम्हाला सांगावंसं वाटतं आहे. सर माझ्याहून वयाने खूपच मोठे आहेत. त्यामुळे इच्छा असूनही त्यांच्याशी बोलताना एक दडपण येतं... आणि माझ्या सोबतचे इथले जे आहेत... त्याच्या स्वतःच्या अशा काही कल्पना आहेत... विचार आहेत... त्यामुळे ते मला समजून घेऊ शकत नाहीत; असं मला वाटतं. दिदी; इथली काही सत्य आहेत... जी मी तुम्हाला सांगणार आहे.... पण त्यासाठी मला वेगळी परवानगी घ्यावी लागेल. त्यासाठी मला थोडा वेळ हवा आहे. तुम्ही असं काही करू शकता का... की आपण उद्याच्या ऐवजी परवा जाऊ मंदिराकडे?" मिठठू अगदी मनापासून बोलतो आहे हे निर्मितीच्या लक्षात आलं. त्याच्याकडे बघत हसत निर्मिती म्हणाली; "अरे अगदी सोपं आहे. तू उद्या नको येऊस आम्हाला घ्यायला... म्हणजे तुझी वाट बघत आम्ही थांबून राहू आणि उद्याचा दिवस टाळता येईल."

तिचं बोलणं ऐकून मिठठू हसला आणि म्हणाला; " दिदी, तुम्ही अजून सरांना ओळखलं नाही वाटतं? त्यांना माझी गरज नाही देवळाकडे जायला. इथवर येण्यासाठी देखील... मी म्हणजे एक सोबत असतो... वाटाड्या नाही. दिदी, एक सांगू? सरांनी काहीतरी नक्की शोधून काढलं आहे... पण ते अजून त्यावर काही बोलत नाही आहेत. कदाचित त्यांना स्वतःची खात्री करून घ्यायची असेल... कदाचित म्हणूनच त्यांनी तुम्हाला इथे आणलं असेल. म्हणूनच म्हणतो आहे; की त्यांना माझी गरज नाही आहे... त्यात एकदा सरांनी स्वतःचं शेड्युल ठरवलं की ते कोणाचंही ऐकणार नाहीत. म्हणून विचारलं तुम्हाला की अगदी त्यांना पटेल असं कारणच सांगावं लागेल त्यांना. तुम्हाला बरं वाटत नाही असं काही सांगू नका... ते त्यांना पटणार नाही. किंवा मग तुम्हाला सोडून ते निघतील." एका दमात मिठठू बोलला.

निर्मितीला त्याचं म्हणणं पटलं आणि ती देखील हसली. काही क्षण विचार करून ती मिठठूला म्हणाली; "मिठठू, खोटं बोललेलं कायमच पकडलं जात आणि त्याचे परिणाम फार वाईट होतात.... आणि खरं सांगितल्याने कदाचित समोरची व्यक्ती दुखावली जाते किंवा नाराज होते... पण आपण समजून काढू शकतो. त्यामुळे मला वाटतं उद्याचा एक दिवस थांबून आपण परवा देवळाकडे जायला निघुया हे सत्य आपण सरांना सांगितलं पाहिजे. मला खात्री आहे... त्यांना हे पटेल. कोणतीही रिस्क घेऊन ते काही करणार नाहीत."

मिठठूला देखील निर्मितीचं म्हणणं पटलं आणि त्याने हसून मान डोलावली. असेच काही क्षण गेले आणि मिठठूने निर्मितीला विचारलं; "दिदी, आपले पूर्वज होमो सेपियन्स होते... म्हणजे आपली जनुकं त्यांच्यातील बदलांमुळे निर्माण झालेली आहेत. पण मला हे कळत नाही की तुम्ही आत्ता जी नावं संगीतलीत ते सर्व होमो म्हणजे मूलतः एकच तर होते. मग हे असे बदल कसे होत गेले?"

त्याच्या प्रश्नाचं निर्मितीला कौतुक वाटलं. तिला वाटलं होतं की एव्हाना मिठठूला कंटाळा आला असेल तिच्या या माहितीपूर्ण बदबडीचा... त्यामुळे हसून ती म्हणाली; "अरे अगदी सोपं आहे हे समजायला... हे बघ; एकत्र कुटुंबातून जेंव्हा एखादं जोडपं वेगळं निघून स्वतःच घर करतं, तेंव्हा त्याचे काही टप्पे असतात, सुरवातीला झोपायची खोली वेगळी होते, मग वस्तू वेगळ्या होतात, हळूहळू चूल वेगळी होते आणि मग ते कुटुंब वेगळं घर म्हणून ओळखलं जातं. निसर्गात जेंव्हा एखादी नवीन प्रजाती तयार होते, तेंव्हा अर्थातच ती एकदम अवतीर्ण होतं नाही. तिचे कुणीतरी पूर्वज असतात, या पूर्वजांपासून एकाच वेळी अनेक प्रजाती फुटून जगात येण्याचा प्रयत्न करत असतात. अर्थातच या सगळ्या प्रजाती आपल्या पूर्वजाशी आणि एकमेकांशी अत्यंत सारख्या असतात. त्या एकमेकांशी सहजपणे संकर करू शकतात, त्यांना अपत्य होऊ शकतात आणि त्या अपत्यांनाही पुढे संतती होते. उत्क्रांतीचा हा प्रवाह असा एखाद्या पाण्याच्या अनिर्बंध लोंढ्यासारखा ज्या दिशेने वाट मिळेल तिकडे सुसाटत पुढे जात असतो. पण एक लक्षात घे की ही प्रक्रिया लाखो वर्ष घडत असते. आपल्याही नकळत.... पण उत्क्रांती होत असते.

ही उत्क्रांती कशी होते हे जर तुला समजून घ्यायचं असेल तर तुला गेली अब्जावधी वर्ष कसे बदल होत गेले हे समजून घ्यावं लागेल. हे बघ.... मानवी कळपात आणि माकडांच्या/लांडग्यांच्या कळपात लाखभर वर्षांपूर्वीपर्यंत फक्त एक महत्वाचा फरक होता, तो म्हणजे मानवाने आगीवर नियंत्रण मिळवले होते.

काही काळानंतर बहुदा मानवाने स्वतःहून जंगलांना आगी लावायला सुरवात केली. जाळलेलं जंगल म्हणजे जणू मानवाचं पहिलं स्वयंपाकघर होतं. जमिनीत गाडलेली अनेक कंदमुळं, बिळात लपलेले प्राणी हे जंगल पेटताच आयती शिकार होऊन मानवाच्या हाती सापडू लागले. पण आगीने अजून महत्वाची गोष्ट केली जी अन्यथा शक्य नव्हती. जे अन्न मानव कच्च खाऊ शकत नव्हता, तेही त्याला भाजून खाणं शक्य झालं.

अग्नीचे नियंत्रण करू शकणारा मानव आणि इतर प्राणी यांच्यात हळू हळू एक दरी तयार होतं गेली. बहुतेक प्राणी त्यांच्या जीवितासाठी स्वतःच्या शक्तीवर अवलंबून राहतात पण मानव मात्र बाहेरची साधनं वापरू लागला, अगोदर अग्नी आणि मग हत्यारं..

अनेक शास्त्रज्ञांच्या मते, अग्नीने अजून एक महत्वाचा बदल मानवी शरीरात घडवला, भाजलेले आणि पचायला हलके अन्न खायला लागल्यावर मानवाला खूप मोठ्या आतड्याची गरज उरली नाही. त्यामुळे मानवाचं आंतडं हळूहळू आकसायला लागलं. शरीरातल्या दोन अवयवांना खूप जास्त ऊर्जा लागते, एक म्हणजे आतडी, दुसरा मेंदू. आतडी लहान व्हायला लागली तशी हि वाचलेली ऊर्जा मेंदूकडे वळवली गेली, या उपलब्ध फ्री ऊर्जेमुळे हळूहळू मानवी मेंदूचा आकार वाढायला लागला. मानव एका वेगळ्या वाटेवर चालायला लागला.

मिठठू कदाचित तुला हे समजणं सोपं जाईल की ;मोठ्या मेंदूमुळे सगळ्यात जास्त नुकसान सुरवातीच्या काळातल्या स्त्रियांचं झालं. कारण आजही अनेक आदिवासी जातींमध्ये मोठ्या डोक्याची अर्भक जन्मतात. तू अशी अनेक उदाहरणं बघितली असशील. यात आपण एक समजून घेणं आवश्यक आहे की एकतर मनुष्य हा दोन पायांवर चालणार प्राणी, त्यामुळे मनुष्य प्राणाच्या स्त्रियांमध्ये गर्भाशयाचा आकार मर्यादित, त्यात लहान कटीभाग. या छोट्या जागेत या स्त्रियांना अशी बाळं वाढवायची होती ज्यांचा मेंदू सतत मोठा होतं होता आणि मेंदू बरोबरच डोकं.. हे मोठं डोकं असलेली मुलं शरीराबाहेर काढणं हे मानवी स्त्रीसाठी प्रचंड कठीण काम आहे. आजही मानवी स्त्रीइतक्या प्रसववेदना प्राणीजगतातली कोणतीही मादी बहुदा सहन करत नाही. त्या सुरवातीच्या काळात बहुदा कित्येक मुलं आणि स्त्रिया बहुदा अशाच मेल्या असाव्या.

या समस्येवर उत्क्रांतीच्या चक्रात एक तोडगा मिळाला, अशा स्त्रिया, ज्यांची मुलं अपुरी वाढ झालेली असतानाच जन्माला यायचे, त्यांच्या आणि त्यांच्या मुलांच्या जगण्याची शक्यता वाढली. भले अपुरी वाढ झाली असल्याने बऱ्याच मुलांचे बालमृत्यू होतं असतील पण आईचा मृत्यू होण्यापेक्षा हे चांगलं. त्यामुळेच बाळाचा मेंदू आणि डोकं लहान असतानाच मानव प्राणी त्याला जन्म देऊ लागला. आजही आपण तुलना केल्यास मानवी बाळं खूप जास्त काळ आपल्या आई वडिलांवर अवलंबून असतं, याच साधं कारण हे आहे की ते मुळातच अविकसित अवस्थेत जन्माला येतं.

प्राण्याचे अन्नसाखळीतील स्थान तो हि ऊर्जा आपल्या शरीरात कोणत्या टप्प्यावर ग्रहण करतो, आणि त्याच्या कडून हि ऊर्जा कोण काढून घेते यावर ठरते. वाघ सिंहासारखे मांसाहारी प्राणी या पृथ्वीवर आल्यापासून या अन्नसाखळीत सर्वोच्च स्थानी आहेत. हरीण, माकडं, म्हशी असे प्राणी पहिल्यापासूनच मधल्या स्थानावर आहेत. मानव हा एकमेव असा प्राणी आहे ज्याचं अन्नसाखळीतील स्थान बदललंय. माकड आणि हरिणांबरोबर लाखो वर्ष अन्नसाखळीत मधल्या स्थानी राहिल्यावर काही हजार वर्षात मानवाने अन्नसाखळीतील सर्वोच्च स्थान व्यापले.

आता तुझ्या लक्षात आलं का... म्हणूनच मधमाशीचं पोवळ, हरणं - म्हशी -झेब्रा यांच्या झुंडी आणि हत्ती माकडं रानडुक्कर यांचे कळप असतात...."

निर्मिती अजूनही बोलत राहिली पण तिला अडवत मिठठू म्हणाला; "दिदी, जर एकूणच उत्क्रांती सगळ्याच होमोज मध्ये होत होती... तर केवळ होमो सेपियन्स कसे शिल्लक राहिले?"

मिठठूकडे बघत निर्मिती म्हणाली; "मिठठू, तू खरंच अगदी मनापासून ऐकतो आहेस हे कळलं मला. नाहीतर अगदी योग्य प्रश्न योग्य वेळी तू विचारला नसतास. या प्रश्नच उत्तर तसं म्हंटलं तर अगदी सोपं आणि लहानसं आहे... होमो सेपियन्स जगले आणि उत्क्रांत होत गेले... कारण इतर कोणत्याही होमोंमध्ये जे विकसित झालं नाही ते होमो सेपियन्सनी विकसित केलं होतं. एकमेकांमधील संवाद! भाषा!! इतर सर्व होमोजपेक्षा वेगळी अशी स्वतःची भाषा निर्माण केली होमो सेपियन्सनी. त्यामुळे विचारांची देवाण-घेवाण आणि होणाऱ्या प्रत्येक बदलाचा एकमेकांना सांगून केलेला स्वीकार... यामुळे होमो सेपियन्स अब्जावधी वर्षांनंतर देखील आजही आहेत आणि त्यांच्यात उत्क्रांती होत आहे."

"अगदी खरं दिदी. And here I differ with my opnion. आपली उत्क्रांती आजही होत आहे.... अंह! आता आपण अधोगतीला लागले आहोत.... आणि ही घसरणीला लागलेली गाडी त्यांच्या लक्षात आली आहे; म्हणूनच आज तू आणि सर इथे आला आहात." मिठठू खोल अंधारात बघत म्हणाला.

बहुतेक तंद्रीमध्ये किंवा झोप आली असल्याने मिठठू काहीतरी बोलतो आहे असं निर्मितीला वाटलं... तिने त्याला हाक मारली... "मिठठू... काय बोलतो आहेस तू?"

अगदी शांतपणे निर्मितीकडे नजर वळवून मिठठू म्हणाला; "दिदी, जा झोपायला. सरांना माझा निरोप दे... मी परवानगी घ्यायला जातो आहे. एक दिवस थांबा म्हणून सांग...."

इतकं बोलून मिठठू एकदम उठला आणि अंधारात सर्रकन चालत निघून गेला. काहीही कळायच्या आत निघून गेलेल्या मिठठूच्या दिशेने बघत गोंधळलेली निर्मिती तशीच बसून राहिली काही वेळ... आणि मग तो नक्की परत येत नाही हे लक्षात आल्यावर उठून झोपण्यासाठी वळली.

क्रमशः

Friday, December 17, 2021

अनाहत सत्य (भाग 3)

 अनाहत सत्य 

भाग 3

मिठ्ठुने थोड्याच वेळात प्रोफेसर आणि निर्मिती यांच्यासाठी जेवण आणलं आणि त्याचबरोबर सोबतीला एका मुलाला घेऊन आला. दोघांनी मिळून खोलीच्या मध्ये बांबूच्या सहाय्याने आडोसा केला. त्यामुळे आता त्या एका खोलीचे दोन भाग झाले होते. निर्मितीने शांतपणे तिचं समान उचललं आणि ती आतल्या बाजूला गेली. कपडे बदलून आणि जेवून घेऊन प्रोफेसर राणे आणि निर्मिती आडवे झाले. वयापरत्वे आणि झालेल्या दगदगीमुळे प्रोफेसरना लगेच झोप लागली. झोपडीच्या बाहेरून वेगवेगळे प्राण्यांचे आणि किड्यांचे आवाज येत होते. बदललेली जागा आणि दुसऱ्या दिवशी सुरु करायच्या कामाबद्दलची उत्सुकता यामुळे निर्मितीला दमली असूनही झोप येत नव्हती. तिच्या मनात विचारांची आवर्तन उठत होती.

'सर इथे गेले काही महिने येत आहेत. तरीही त्यांच्या मते फारशी प्रगती नाही झालेली. अस का बरं? सरांच्या अनुभवाचा विचार करता अजून काही मिळत नसूनही ते इथे येत आहेत म्हणजे नक्कीच त्या मंदिरात काहीतरी आहे.' विचार करता-करता निर्मितीच्या लक्षात आलं की ते मंदिर कोणत्या देवतेचं आहे किंवा कोणत्या काळातलं आहे; याबद्दल आपल्याला सरांनी काहीच सांगितलं नाही. मग तिच्या लक्षात आलं की मुद्दामच सरांनी तिला फारशी माहिती दिली नव्हती; आणि तसं त्यांनी इथे पोहोचल्यावर तिला सांगितलं होतं.

प्रोफेसर गाढ झोपले हे त्यांच्या लयीत घोरण्यावरून निर्मितीच्या लक्षात आलं आणि ती हळूच उठून दार उघडून बाहेर आली. बाहेरच्या सुंदर, शांत आणि रात्रीच्या निसर्गाने आच्छादित आकाशाकड निर्मितीचीे नजर गेली आणि ती मंत्रमुग्ध होऊन त्या शुभ्र आकाशगंगेकडे बघत उभी राहिली.

"आस्मान से चांदी बरस रही है ना बीबीजी?"

मिठठू निर्मितीच्या शेजारी कधी येऊन उभा राहिला होता ते तिला कळलंच नव्हतं. त्यामुळे त्याच्या आवाजाने ती एकदम दचकली आणि मग हसून तिने मान डोलावली. "मिठठू मै भी एक गांव मे ही पली बडी हूं. फिर भी मैने इतना सुंदर आस्मान कभी नही देखा." मिठठू हलकस हसला आणि त्याने तिला सोबत चलण्याची खुण केली आणि तो तिच्याकडे पाठ करून लगोलग चालू पडला. एकदा मागे वळून बघून मग निर्मिती देखील तिच्यामागून निघाली. फर्लांगभर चालून गेल्यावर तिच्या लक्षात आलं की रस्त्याला थोडा चढ आहे. तिचा श्वास फुलायला लागला... आणि अचानक मिठठू थांबला. तो थांबला म्हणून ती देखील थांबली. रात्रीची वेळ आणि अनोळखी प्रदेश असल्याने निर्मिती पूर्ण वेळ खाली बघत चालत होती. थांबल्यावर तिची नजर मिठठूकडे वळली. तो समोर एकटक बघत होता... आणि रात्रीची वेळ असूनही आणि मिठठू सावळा असूनही त्याच्या चेहेऱ्यावरचे मंत्रमुग्ध भाव तिला दिसले... रात्रीच्या वेळी मिठठूच्या चेहेऱ्यावरचे भाव दिसले... तिचं तिलाच हसू आलं तिच्या मनातल्या वाक्याचं. पण ते किती खरं आहे हे देखील तिला समोरच दिसत होतं. अर्ध्या सेकंदामध्ये आलेले हे सगळे विचार तिच्या मन:पटलावरून एका क्षणात पुसले गेले; कारण जिथे मिठठू बघत होता तिथे तिची नजर वळली होती.

समोर लाल, निळ्या, पिवळ्या आणि पांढरऱ्या नाजूक लहान दिव्यांच्या उजेडाने एक मोठ्ठ झाड... कदाचित वडाच असावं.... भरून गेलं होतं. ते दिवे इथे तिथे उडत होते पण झाडापासून लांब जात नव्हते. त्यामुळे टेकाडावरचं ते झाड झमझम चमकत होतं. त्या उजेडाने आजूबाजूचा परिसर व्यापून गेला होता. तोच उजेड मिठठूच्या चेहेऱ्यावर पडला होता.

"मिठठू... इस कुदरत की कमाल का वर्णन मै नही कर सकती. स्वर्ग तो यही है." निर्मिती स्थिर नजरेने त्या झाडाचं सौंदर्य मनात आणि डोळ्यात साठवत म्हणाली.

"बीबीजी, ये तो कूच भी नही है. आप जो मंदिर देखने आई हो... ऊस मंदिर के पास पोहोचते पोहोचते तो आप होश ही गवा बैठोगी. आप कुदरत का जो रूप यहा देखोगी वो कही और आप नही देख पाओगी. वैसे मैने पढा है के आस्ट्रेलिया मे भी गहरे जंगल है. लेकिन फिर भी इधर की बात कूच और है. ये मेरा प्यार नही बोल रहा है बिबीजी... यह सच्चाई है. जो इतिहास भारत का है; विशेषतः इस भगवान की भूमी का है; वह इतिहास आप को पुरी धरती पर कही नही मिलेगा. मैने पढा है के हमारे पूर्वज... मतलब होमो सेपियन्स, जो केवल बंदर की उत्पत्ती नही थे, तो किसी और दो जानवरो के संगम से बने थे; वह पैसठ हजार वर्ष पाहिले, आफ्रिका से भारतीय उपमहाद्वीप पाहुचे थे. वह पुरे भारत मे विविध क्षेत्रोमे बखर गए. जो होमो सेपियन्स यहा आए वो एक काल के बाद जैसे गायब हो गए. मात्र जो सिंधू घाटी मे, दक्षिण एशिया मे विकसित हुवे उहोने धीरे धिरे अपनी संस्कृती विकसित की. और फिर गावं और शहर की और हम चल पडे. धिरे धिरे मकान, कपडा... फिर लकडे का इस्तमाल... फिर धातू.. फिर हम तन कपडेसे ढकने लगे. फिर आई बोलने - खाने - पीने की संस्कृती. और फिर हमने.... मतलब के होमो सेपियन्स ने कभी मूड के नहीं देखा. बस प्रगती करते ही चले गये.

ऐसी संस्कृती फिर धरती के और भी भागो मे विकसित होती गयी. और फिर धिरे धिरे... बिबीजी... जैसे आप ये भूल गये हो के मैने कहा के जो होमो सेपियन्स यहा आये वो गायाब हो गये... वैसेही वो प्रगतीके नाम पे जो आगे निकल गये वो ये भूल गये की इन जंगलो मे भी उनके भाई आये थे. और अब वो नही है."

त्याचं बोलणं मन लावून ऐकताना त्याला माहीत असणाऱ्या माहितीचं मनात आश्चर्य करणारी निर्मिती त्याच्या शेवटच्या वाक्याने एकदम चमकली. त्याने केलेला उल्लेख तो बोलत असताना लक्षात आला असूनही पुढच्या त्याच्या बोलण्याच्या ओघात आपल्या मनातून एकदम निघूनच गेला की. मिठठूने आठवण करून दिल्या नंतर तिच्या लक्षात आलं ते!

त्याचा हात धरून त्याला एका दगडावर बसवत ती देखील खाली बसली. त्याच्याकडे एक टक बघत होती निर्मिती. "मिठठू... तुम्हारे मन मे एक अलग ही घुस्सा है ना? कूच केहेना तो चाहते हो लेकिन हर वक्त खुद को खिंच ले रहे हो न?" त्याच्या हातावर थोपटत निर्मिती म्हणाली. आजूबाजूला तसा अंधार होता. दूरवर चमकणारं ते जादुई झाड आणि आकाश गंगेतून बरसणारा तो चंदेरी प्रकाश! रातकिड्यांची आणि त्याच सोबत असंख्य अशा किड्यांची आणि न जाणे कोणकोणत्या जनावरांच्या आवाजाची भर... पण त्याक्षणी निर्मितीला हे काहीही जाणवत नव्हतं. त्या धूसर उजेडात मिठठूच्या चेहेऱ्यावरचे भाव समजून घेण्याचा प्रयत्न ती करत होती.

"दिदी, घुस्सा नहीं है, दुख है." अत्यंत स्थिर आवाजात मिठठू म्हणाला.

"कसलं दुःख?" निर्मितीने ओल्या आवाजात पण नकळतपणे मराठीत त्याला प्रश्न केला.

"दिदी, हे जंगल आणि इथे राहाणारे हे आदिवासी... यांना so called शहरी लोक विसरून गेले आहात; हे दुर्दैवाने सत्य आहे. ज्यांना आमच्याबद्दल काही भावना आहेत; त्या म्हणजे फक्त अशिक्षित, जंगली लोक अशाच आहेत. पण दिदी, कोणाच्याही मनात हे नाही आलं की आम्ही अजूनही हे असं इथे जंगलांमध्ये प्रगती पासून दूर स्वतःच्या इच्छेने राहात असू का?" मिठठू बोलत होता. त्याच्या अस्खलित मराठी बोलण्याचं आश्चर्य वाटून घ्यायचं की त्याच्या वयाहूनही जास्त समंजसपणे बोलण्याचं हे निर्मितीच्या लक्षात येत नव्हतं.

निर्मिती काही बोलायच्या अगोदरच मिठठूने तिला थांब अशी खुण केली आणि पुढे बोलायला लागला...

"दिदी, इस जंगल का अपना ही एक राज है. आपले असे नियम आहेत; कायदे आहेत; आणि त्याहूनही जास्त असं स्वतःला जपणं आहे. इथल्या मनुष्य प्राण्याला आता बाहेर काय चालू आहे; ते कळतंय. त्याबद्दल त्याला उत्सुकता आहे; वेगळया प्रगत जीवनाची इच्छा आहे आणि तरीही इथला आदिवासी इथे त्याच्या जन्म जागी... या जंगलाला बदलायला तयार नाही. क्योंकी हमे हमारे बचपनसे एक ही बात समजाई गयी है; के ये जो जंगल की संस्कृती है उसे किसीं भी प्रगत संस्कृती से बचाकर रखना यह हमरा प्रथम कर्तव्य आहे. और आप को क्या लगता है किसने समजाया है हर आदिवासी को ये? दिदी, आमच्या आई-बापाने नाही; याच जंगलाने संगीतल आहे. फक्त आम्हालाच नाही; तर प्रत्येक पिढीला गेली हजारो वर्षं हे माहीत आहे. अर्थात तरीही असे अनेक आहेत की जे हे समजावणं मान्य करत नाहीत... पण मग त्यांच्या बाबतीत हे जंगल देखील योग्य तो निर्णय घेतंच."

मिठठूचं बोलणं ऐकून निर्मिती आश्चर्यचकित तर झालीच पण त्याहूनही जास्त गोंधळून गेली. त्याच्याकडे बघत आणि त्याच्या चेहेऱ्यावरचे भाव समजून घेण्याचा प्रयत्न करत निर्मिती म्हणाली; "मिठठू, तू नक्की काय सांगतो आहेस? अरे तू स्वतः शिक्षण घेतो आहेस. तूच स्वतः सरांना फोन करून इथे बोलावलं आहेस; गूढ उकलण्यासाठी. आणि तरीही तू म्हणतो आहेस की इथे या जंगलांमध्ये प्रगतनशीलता स्वीकारली जात नाही. ते ही केवळ हे जंगल तुम्हाला तसं सांगत म्हणून? मला काहीच कळत नाही आहे."

"दिदी, शिक्षण घेणं चुकीचं नाहीच. मात्र ते कशा प्रकारे वापरावं हे समजणं जास्त महत्वाचं असतं; हे आम्हाला या जंगलाने समजावलं. तुम्ही बरोबर बोललात! मी स्वतः शिक्षण घेतो आहे... मीच सरांना इथे बोलावलं आहे... याच शिक्षणामुळे मला हे समजलं की आदिवासी लोकांना हे प्रगत जग एका वेगळ्या नजरेने बघतं. आम्ही नाकारलेली जमात आहोत... मनुष्यप्राण्यांमध्ये. तुम्हाला लक्षात येण्यासाठी म्हणून सांगतो... ज्या प्रमाणे अनेक युरोपियन देशांमध्ये अजूनही भारत म्हंटलं की केवळ जंगलाने अच्छादलेला प्रदेश आणि जादूटोणा - करणी करणारे लोक असं वाटतं न; तसा विचार अनेक शहरातील लोक आमच्याबद्दल करतात. हा विचार बदलावा यासाठी आम्ही शिक्षण घेतो... आमच्या बद्दलचे हे चुकीचे समज बदलण्यासाठी आम्हाला तुमच्यामध्ये येऊन राहाण आवश्यक आहे; आणि हेच कारण आहे की मी सरांना इथे बोलावलं आहे. आम्ही दुष्ट नाही; जादूटोणा करणारे देखील नाही; आमच्यामध्ये अजूनही काही जमाती नरभक्षक असतीलही; पण म्हणून आम्ही सगळेच तसे नाही. हे जर इथे येऊन सरांनी स्वतः बघितलं आणि मग पुढच्या प्रत्येक कॉन्फरन्समध्ये सांगितलं तर कदाचित आमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल." मिठठू बोलत होता आणि निर्मिती समजून घेत होती.

मिठठू बोलायचा थांबला आणि काही क्षणांनी निर्मिती उठून उभी राहिली आणि म्हणाली; "मिठठू, तू आत्ता मला जे सांगितलं आहेस त्याहूनही खूप जास्त असं काहीतरी आहे; हे मला जाणवतं आहे. पण मला हे देखील कळून चुकलं आहे की तू मला ते सांगणार नाहीस. त्यामुळे मी आग्रह देखील धरणार नाही. बरं, चल परत फिरू. खूप रात्र झाली आहे आणि उद्या आपल्याला बराच प्रवास आहे."

तिच्या सोबत उठून उभा राहात मिठठू म्हणाला; "दिदी, मला जितकं सांगायची परवानगी होती त्याहूनही जास्त मी बोलून गेलो आहे. त्यामुळे आता तुम्ही म्हणता त्याप्रमाणे हे होईल ते पहाणं हेच योग्य आहे. चला; तुम्हाला सोडून मी देखील काही वेळ विश्रांती घेतो."

निर्मिती मिठठू सोबत परत निघाली. पण इथे येताना तिची असलेली मनस्थिती आणि परत फिरताना लागलेली विचारांची तंद्री यात जमीन अस्मानाचा फरक होता.... परत एकदा चंदेरी आकाशगंगेकडे बघून तिने तिच्या कुटीचा दरवाजा उघडला आणि ती आत शिरली.

क्रमशः