Friday, November 26, 2021

अनाहत सत्य (भाग 1)

 अनाहत सत्य


भाग 1



"निमा... ए निमु? उलथली वाटत ही परत त्या टेकडीच्या टोकाला! काय कराव या मुलीचं कळत नाही." वहिनी निर्मितीला हाका मारून कंटाळल्या होत्या. दुपारी आईचा आणि वहिनीचा डोळा लागलेला बघून परत निर्मिती तिच्या लाडक्या टेकडीकडे पळाली होती असं दिसत होतं. तिची आई चहा टाकता टाकता वहिनींना म्हणाली," वहिनी कशाला हाका मारून तुम्ही तुमचा गळा सुकवता आहात. येईल ती तिन्हीसांजेच्या आत. एकटी फार नाही फिरत ती. सारखं त्या टेकडीकडे पळायचं आणि त्या गुहांमधून फिरायचं खूळ लागलय तिला. पण काsssssही नाही त्या गुहांमध्ये वहिनी. हे हिला कोण समजावणार? आणि आपण ढीग समजावू; हिने समजून घेतल पाहिजे न! पूर्वी मला काळजी वाटायची तिची त्या उजाड गुहांकडे एकटी भटकत असते म्हणून. मग गण्याला पळवायची मी हिच्या मागे. पण मध्ये ते इतिहास की जीवशास्त्र की असेच कोणी संशोधक आले होते ना... त्यांनी त्या गुहा निट आतून बाहेरून बघितल्या आणि म्हणाले इथे काही नाही. तेव्हापासून मी काळजी सोडून दिली आहे." 

"तुझ खरं आहे गं, संशोधनवाल्यांना काही नसेल मिळालं; पण कोणी जादूटोणा करणारे किंवा साता जन्मापूर्वीचं काहीतरी असलं तर तिथे? मला तर बाई काळजी वाटते." वहिनी म्हणाल्या. 

निमाची आई यावर मात्र ठामपणे उभी राहून म्हणाली,"वहिनी काहीतरी नका आणू मनात. या सगळ्यावर ना माझा विश्वास, ना ह्यांचा आणि असले विचार निमाच्याही मनात यायची गरज नाही. हे असले जादू-टोणे, मंत्र-तंत्र, पूर्व जन्मीच असलं आपणच तयार करतो आणि घाबरत रहातो. जगात जे काही घडत न त्याला काहीतरी शास्त्रीय कारण आणि पाठबळ असत ह वहिनी."

मग मात्र वहिनीने या विषयावर बोलणं टाळालं. तिला माहित होत की निमाचे आई-वडील असल्या गोष्टींवर विश्वास ठेवत नसत. त्यामुळे याबाबतीत गप्प राहिलेलं बरं असं तिचं कायमचं धोरण होतं. म्हणून मग तिने विषय बदलला. "अग, पण त्या संशोधनवाल्या  लोकांनी या निमीला काहीतरी खूळ डोक्यात घालून दिलं आहे न त्याचं काय? काल रात्री माझ्या जवळ झोपली होती तेव्हा मला सांगत होती की तिला पुराणशास्त्राचा अभ्यास करायचा आहे. मी म्हंटलं अग आपल्या पुराणांमध्ये खुप व्रत-वैकल्य आहेत. अनेक देव आहेत... तुला कोणत्या देवाचं व्रत करायचं आहे? तर मला म्हणते वहिनी तू म्हातारी झालीस. मी पुराणशास्त्र म्हणाले ना म्हणजे खूप खूप वर्षांपूर्वी... अगदी लाखो वर्षापूर्वी मनुष्य कसा रहात होता? त्याकाळची संस्कृती... त्यावेळचे राहणीमान... सगळ्याचा अभ्यास करणार आहे मी. बोल आता यावर मी काय म्हणणार होते. काहीतरी डोक्यात घेते ही मुलगी." चहा बरोबर खायला चकल्या काढत वहिनी म्हणाली.

***

कोकणातल्या एका लहानश्या गावात आयुष्य गेलेल्या वहिनीला निर्मितीची स्वप्न समजणं अवघडच होते. मात्र निर्मितीचे वडील परिस्थितीमुळे फार शिकू शकले नसले  तरी हुशार होते. मुळात त्यांचा प्रगत शास्त्रावर विश्वास होता आणि त्यांनी निर्मितीच्या आईला वेळोवेळी समजावून आणि प्रसंगी दाखले देऊन जुन्या चुकीच्या कल्पना तिच्या मनातून पुसून टाकल्या होत्या. त्यांनी प्रयत्नपूर्वक तिचा शास्त्रनिष्ठ गोष्टींवर विश्वास निर्माण केला होता. त्यामुळे तीदेखील अंधश्रद्ध नव्हती. 

निर्मिती अशा समजूतदार घरात जन्माला आली होती. त्यामुळे तिला तशी फारशी बंधनं नव्हती. तस लहानसं गाव असलं तरी निर्मितीच्या वडिलांना तिथे खूप मान होता. निर्मिती इतर मुलांपेक्षा थोडी वेगळी होती. लहानपणापासूनच तिला घरामागच्या टेकडीचं खूप आकर्षण होतं. कधीतरी पूर्वी गावातल्या लोकांनी त्या टेकडीवर काही गुहा आहेत हे शोधलं. निर्मितीला त्या गुहांबद्दल आकर्षण होतं. त्या गुहांमधून काही चित्र कोरलेली होती. ती बघत बसायला निर्मितीला खूप आवडायचं. ती कधी कधी तिच्या वडिलांना देखील आग्रह करून तिथे घेऊन जायची आणि त्या कोरलेल्या चित्रांमधून काय कथा आहेत ते विचारायची.  तिच्या वडिलांना देखील याबद्दल काहीच माहिती नव्हती. पण अर्थात ते तसे समजूतदार होते. ते  कायम मुंबई पुण्याकडे कामाच्या निमित्ताने जात असल्याने अशा काही गोष्टी कळल्या तर त्याची माहिती शहरातल्या पुरातत्व विभागाला द्यायला हवी हे त्याना माहित होत. त्यामुळे त्यांनी गावातल्या इतर जाणकार आणि समजुतदार लोकांशी बोलून या गुहांची माहिती मुंबईमधल्या पुरातत्व विभागाला दिली होती. तेच लोक येऊन त्या गुहांची पहाणी करून गेले होते. परंतु त्यांनी सांगितल होत की तिथे अशी कोणती पुराणशास्त्राला निगडीत माहिती नाही. फार तर काही ३००-४०० वर्षांपूर्वी त्यावेळच्या काळाच्या गरजेपोटी या गुहा तयार केल्या गेल्या असतील तिथेल्या लोकांकडून... एक आडोसा किंवा तत्सम काहीतरी म्हणून किंवा अजूनही काही कारण असेलही. पण त्यातून फार काही निष्पन्न नव्हते. तिथे अजून काही माहिती मिळणे शक्य नाही. पण अर्थात त्या गुहा एक पुरातत्व स्थापत्य म्हणून सांभाळण आवश्यक होत; आणि त्यासंदर्भात आवश्यक त्या गोष्टी तिथे आलेल्या लोकांनी त्यांच्या संस्थेशी बोलून केल्या होत्या. 

पुरातत्व विभागाचे लोक गावात येऊन गेल्यानंतर निर्मितीमध्ये मात्र खूप मोठा बदल झाला होता. मुळातच त्या गुहांमधील चित्रांमधल्या गोष्टी समजून घ्यायची इच्छा असल्येल्या निर्मितीला आणि तिच्या विचारांना एक दिशा मिळाली होती. ते लोक आठ  दिवस त्यांच्या गावात होते तितके दिवस निर्मिती त्यांच्याबरोबरच फिरत होती. एरवी शांत आणि अबोल स्वभाव असलेल्या निर्मितीने त्यांच्याशी मात्र मैत्रीच केली होती; कारण तिला त्यांच्या चर्चांमध्ये आणि एकूणच त्या विषयामध्ये खूपच रस होता. प्रोफेसर राणे आणि त्यांचे दोन असिस्टट रोज सकाळी उठून त्या टेकडीकडे जायचे आणि प्रत्येक गुहेच बारकाईने निरीक्षण करून त्याच परीक्षण लिहून ठेवायचे. निर्मितीसुद्धा त्यांच्याबरोबर तिथे जायची. त्यांची एकमेकांशी होणारी चर्चा ऐकायची. मग दुपारी प्रोफेसर साहेब थोडी विश्रांती घ्यायला बसले की मनातले प्रश्न हळू हळू त्यांना विचारायची. अगोदर एखाद्या लहान मुलीची चिमणी उत्सुकता असा विचार करून प्रोफेसर राणे तिला सोपी आणि साधी माहिती देत होते. परंतु दोन दिवसात त्यांच्या लक्षात आलं की निर्मितीला बाल वयातली बालिश उत्सुकता नाही. तिचे प्रश्न खुप विचार करून केलेले असतात. तिने स्वतः प्रयत्न पूर्वक याविषयातली माहिती गोळा केली आहे. याचं त्यांना खूप कौतुक वाटलं. मग मात्र कामाव्यतिरिक्तच्या वेळात त्यांनी तिला जवळ बसवून एकूणच आपला पुरातत्व वारसा आणि स्थापत्यातून समजणारा इतिहास हा  विषय समजावायला सुरवात केली. 

निघायच्या आदल्या रात्री प्रोफेसर राणेंनी निर्मितीला जवळ बोलावलं, समोर बसवलं आणि म्हणाले,"निर्मिती बेटा, तुझ्या वयाच्या मानाने तू खूपच समजूतदार आहेस. तुला पडणारे प्रश्न देखील बालिश नाहीत तर खूप विचर करून अभ्यासू मनाने विचारलेले आहेत. म्हणून मी तुला आज थोडी  माहिती देणार आहे. हे बघ आजचा मानव खूप खूप प्रगत आहे. आपल्यामध्ये आणि इतर कोणत्याही जनावरांमध्ये एकच फरक आहे आणि तो म्हणजे आपण विचारशील आहोत. आपण अन्न, निवारा आणि प्रजनन यापुढेही विचार करतो. आणि म्हणूनच आपण आज इतके प्रगत आहोत. परंतु लाखो वर्षांपूर्वी मानव इतर जनावरांसारखाच होता. त्याची हळू हळू स्थित्यंतरं झाली. त्यामुळे त्यावेळची भौगोलिक परिस्थिती आणि मानवाचं रहाणीमान हा आताच्या प्रगत शास्त्रामाधला अभ्यासाचा विषय आहे. मी याच विषयावर अभ्यास केला आहे आणि अजूनही करतो आहे. पण मला इथे आल्यानंतर त्या गुहांमध्ये काहीच मिळालं नाही याच वाईट वाटत. मात्र माझी तुझ्यासारख्या मुलीशी ओळख झाली याचा आनंद आहे." अस म्हणून त्यांनी तिच्या डोक्यावार हात ठेवला. 

निर्मितीला देखील प्रोफेसर राणेंबरोबर गप्पा मारायला खूप आवडायला लागलं होतं. ती त्यांच्याकडे बघून हसली आणि म्हणाली,"सर, तुम्ही खूप छान समजावून सांगता. खरं तर मला हे असं गुहांमधून फिरणं आणि मनुष्याच्या जन्माची माहिती करून घ्यायला  खूप आवडतं. पण आता तर माझ्या मनात या विषयाबद्दल खूपच जास्त उत्सुकता निर्माण झाली आहे. मला करता येईल का या विषयाचा अभ्यास सर?"

तिच्या प्रश्नावर प्रोफेसर राणे मनापासून हसले आणि तिला म्हणाले,"निर्मिती बेटा, तुझी इच्छा असेल तर तू नक्की या विषयाचा अभ्यास करू शकतेस. फक्त त्यासाठी तुला कायम चांगले मार्क्स घेऊन पास व्हायला लागेल. एकदा तू बारावी झालीस न की तुझ्या बाबांबरोबर मला भेटायला ये मुंबईला. पुढे कसं आणि काय करायचं ते मी सांगेन ह."

त्यांच्या गप्पा निर्मितीचे बाबा एकत होते. त्यांनी निर्मितीला जवळ घेतलं आणि म्हणाले," बेटा जा बघू झोपायला. खूप उशीर झाला आहे." निर्मिती बरं म्हणली आणि प्रोफेसर राणेंना अच्छा करून आत झोपायला गेली. ती आत गेलेली बघितल्यावर निर्मितीच्या वडिलांनी प्रोफेसर राणेंना विचारले,"सर, खरच मला माझ्या मुलीला इतके शिकवता येईल का? हा विषय तसा वेगळा आहे आणि इथे आमच्या गावात अशी काहीच सोय नाही. त्याशिवाय मला देखील याबद्दल फारशी माहिती नाही. पण माझी खुप इच्छा आहे की माझ्या मुलीने तिला हव ते शिकावं. परिस्थितीमुळे मी फार शिकलो नाही. पण माझ्या मुलीला मात्र मी खूप शिकवणार आहे."

त्यावर प्रोफेसर साहेब म्हणाले," तुमची मुलगी खूप हुशार आहे. मुख्य म्हणजे तिला पुरातत्व शास्त्राची उपजत आवड आहे आणि तिची विचारशक्ती असामान्य आहे. तिला तुम्ही खूप शिकवाल याची मला खात्री आहे, परंतु तिला जर या विषयाची आवड असली आणि पुढे जाऊन याच विषयात तिने उच्च शिक्षण घेतले तर तिचे आणि तिच्या बरोबर आपल्या समाजाचे भले होईल. तुमच्या गावात काय इथे या पंचक्रोशीतसुद्धा फारशी सोय असेल असे नाही. पण तुम्ही तिला घेऊन मुंबईला या. मी करेन सगळी मदत. माझी खात्री आहे की ही मुलगी पुढे जाऊन पुरातत्व शास्त्रातली मोठी तत्वज्ञ होऊ शकते." प्रोफेसर साहेबांचे बोलणे एकून निर्मितीच्या वडिलांनी  ठरवलं की जर खरच निर्मितीची इच्छा असेल तर तिला ज्या विषयात अभ्यास करायचा असेल तो करु दे. आपण कायम तिच्या पाठीशी उभे रहायचे. 

लहानग्या निर्मितीने त्यानंतर कधी मागे वळून बघितलंच नाही. दहावीमध्ये तिने उत्तम गुण मिळवले आणि त्यानंतर बारावीमध्येसुद्धा. तिची डिग्री कॉलेजला जायची वेळ आली तेव्हा तिची आई थोडी धास्तावली होती. कारण पंचक्रोशीत चांगले कॉलेज नव्हते. त्यात निर्मितीने तर पुरातत्व विषयातच पुढे शिकायचे हे नक्की केले होते. त्यामुळे तिला पुण्या-मुंबईलाच शिकायला जावे लागणार होते. बारावीनंतर पुढचं शिक्षण तिथेच चांगलं होतं. निर्मितीच्या वडिलांनी तिच्या आईची समजूत काढली. निर्मितीने अशा विषयाचा ध्यास घेतला होता की कधीतरी निर्मितीला एकटं रहायला लागणारच होतं. सध्या ती मुंबईमध्ये त्यांच्या एका नातेवाईकांकडे रहाणार होती. मनावर दगड ठेऊन निर्मितीची आई तिला मुंबईला पाठवायला तयार झाली.

निर्मितीचे वडील तिला घेऊन मुंबईला आले. कॉलेजच्या प्रवेशाची प्रक्रिया झाली आणि निर्मितीचे वडील तिला घेऊन प्रोफेसर राणेंना भेटायला गेले. प्रोफेसर राणे सहा वर्षानंतर निर्मितीला बघत होते. 

"अरे किती मोठी दिसायला लागली ही. तुमच्या गावाला आलो होतो तेव्हा लहानसं पिल्लू होती." निर्मितीला बघून प्रोफेसर म्हणाले. तिला बघून प्रोफेसर राणेंना खूप आनंद झाला होता.

"सर, निर्मितीला आर्ट्स विषयात एका कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आहे. तुम्हाला भेटल्यापासून आणि तुमच्याशी त्या चार -सहा दिवसात गप्पा मारल्यापासून ही खूपच बदलून गेली. मला तर असं वाटतं की तुम्ही तिला तिच्यातल्या आवडीची ओळख करून द्यायलाच आला होतात." निर्मितीचे वडील हसत म्हणाले.

"अरे वा! निर्मिती आता डिग्री कॉलेजला जाणार तर! very good. अहो मुळात तुमची निर्मिती हुशार आहे आणि तिला पुराणशास्त्र आणि ऐतिहासिक वारसा विषयाची इतकी आवड होती की ती मला सारखी प्रश्न विचारायची. तिच्याशी गप्पा मारायला मला देखील आवडायला लागलं होतं." प्रोफेसर राणे म्हणाले. "बरं झालं तुम्ही तिला इथे मुंबईमध्ये आणलं आहात. मी तिच्या कॉलेजमध्ये लेक्चर द्यायला जात असतोच. त्यामुळे तिची आणि माझी भेट होतच राहील." आणि मग त्यांनी निर्मितीला सांगितलं,"बेटा, आता तू मला कधीही येऊन भेटू शकतेस ह. खूप खूप शिक. माझी इच्छा आहे की तू या विषयात पी. एच. डी. कराव आणि काहीतरी चांगल संशोधन कराव. काय?" 

प्रोफेसर राण्यांच्या बोलण्याने निर्मितीला देखील हुरूप आला. ती त्यांना हसत म्हणाली,"सर, तुम्ही पाठीशी असलात तर तुम्ही म्हणाल तसं शिकीन. आणि तुम्हाला फक्त भेटायलाच नाही तर सारखा त्रास द्यायला येणार आहे मी." तिचं बबोलणं एकून प्रोफेसर राणे मनापासून हसले.

क्रमशः

Friday, November 19, 2021

शेजारी (भाग 2) (शेवटचा)

 शेजारी

(भाग 2) (शेवटचा)


त्यावर त्यांना थांबवत इन्स्पेक्टरने त्या पोराकडे बघितले. इंस्पेक्टरची नजर वळताच तो पोरगा घाबरून गेला आणि म्हणाला;"साहेब, परवा संध्याकाळी इथं राहाणाऱ्या बाईसाहेबांचा दुकानात फोन आला होता. त्यांनी सामानाची यादी सांगितली आणि म्हणाल्या सामान उद्या सकाळी पाठवा. म्हणून मग मला मालकांनी काल सकाळी सामान घेऊन पाठवलं. पण सकाळी कोणीच दार उघडलं नाही. म्हणून मग मी दुपारी पण येऊन गेलो... तरी तेच... मग मालकच म्हणाले उद्या जा. म्हणून आज आलो सामान घेऊन. तर हे सगळे आजी-आजोबा इथं उभे होते. मी म्हंटल बाईसाहेबांनी मागवलेलं सामान आहे. आणि इथे ठेऊन निघणार होतो तर या आजोबांनी म्हंटल दार कोणी उघडत नाही. तर मी सांगितलं की काल पण सकाळी आणि दुपारी कोणी दार उघडत नव्हतं. ते म्हणाले तुझ्या मालकाला घेऊन ये. तसा मी दुकानात गेलो आन मालकांना घेऊन आलो...."

आता इंस्पेक्टरची नजर पोराकडून मालकाकडे वळली. मध्यम वयाचे ते गृहस्थ शांत होते. त्यांनी एकदा आपल्याकडे काम करणाऱ्या पोऱ्याकडे बघितलं. मग त्यांची नजर त्या सगळ्या म्हाताऱ्यांकडे वळली. त्यांच्या करूण अवस्थेची त्यांना खूप दया आली. त्यानंतर त्यांनी परत एकदा इन्स्पेक्टरकडे बघितलं आणि म्हणाले;"साहेब, माझा हा पोऱ्या जे सांगतो आहे ते खरं आहे; आणि मला देखील त्याच्या इतकंच माहीत आहे. बाईसाहेबांचा नेहेमीच सामान मागवण्यासाठी फोन येतो. त्यांचं बाळ लहान असल्याने त्या नेहेमी घरी सामान मागवायच्या. त्यांनी परवा संध्याकाळी खरंच म्हंटल होत की घरी कोणी नसेल तर सामान उद्या पाठवा. आता कालच्या दिवसभरात पण कोणी दार उघडलं नाही तर आम्हाला वाटलं घरी कोणी नसावं. म्हणून आज सकाळी सामान पाठवलं. त्यावेळी या आजोबांनी माझ्या पोऱ्याला मला बोलवायला सांगितलं. मी आलो... एकूण परिस्थिती बघून मला वाटलं आपण स्वतःच काही निर्णय घेण्यापेक्षा तुम्हाला बोलावलेलं बरं; म्हणून तुम्हाला फोन केला. बरं झालं तुमच्या समोरच घराचं दार उघडलं गेलं. नाहीतर हे जे काही झालं आहे त्याची जवाबदारी कोणी घेतली असती?"

मालक बोलायचे थांबले आणि सगळ्यांची नजर पांढऱ्या चादरीमध्ये गुंडाळून ठेवलेल्या तीन कलेवारांवर पडली.

.....................................................

काका सकाळी नेहेमीप्रमाणे दूध घ्यायला नेहेमीच्या दुकानावर पोहोचले. काका दूध घेऊन निघतच होते पण मालक काकांच्या दिशेने हलकेच सरकत महणाले;"काका तुम्हाला काही कळलं की नाही?"

"कशाबद्दल हो?" काकांनी नकळून विचारलं.

"अहो, ते एक तरुण गृहस्थ कधीकधी यायचे न तुमच्या बरोबर सकाळी दूध घ्यायला.... ते, त्यांची बायको आणि तीन वर्षाचा मुलगा गेले की हो चार दिवसांपूर्वी."

"अरेच्या? कुठे गेले? तसं आमचं फारसं बोलणं नाही व्हायचं. तुम्हाला माहीतच आहे न काकूंचा स्वभाव! त्यामुळे मी कधीच त्यांच्याशी संबंध ठेवले नव्हते. त्यामुळे ते कुठे जाणार होते की काय मला माहीत नव्हतं." काका शांतपणे दूध घेत म्हणाले.

"अहो काका, गेले म्हणजे तिघेही मेले की हो. तुम्ही ज्यादिवशी काकूंना घेऊन गावातल्या घराकडे गेलात त्याच्या दुसऱ्या दिवशी झालं हे सगळं. तुम्ही इथे नव्हता म्हणून. पोलिसांनी सगळीकडे चौकशी केली होती. सगळ्यांच्या दुकानात घरात जाऊन आले होते ते." दुकान मालकाने माहिती दिली.

काका एकदम आश्चर्यचकित झाले. त्यांना काय बोलावं कळेना. "कमाल आहे हो! कसं काय झालं हे सगळं?"

मालक आवाज आणखी खाली आणत म्हणाले;"अहो, बहुतेक विषबाधा झाली त्यांना. त्यांच्या घरातल्या फ्रिजमध्ये गाजराचा हलवा होता. पोलिसांनी तपास केला तेव्हा लक्षात आलं की ते साहेब संध्याकाळीच मिठाईवाल्याकडून गाजर हलवा घेऊन गेले होते. बहुतेक त्यात काहीतरी गडबड झाली. कारण मिठाईवाल्याने त्यादिवशी इतरांना देखील गाजर हलवा विकला होता. पण बाकी कोणाचीही काहीही तक्रार आली नाही. त्यामुळे पोलिसांना देखील तपास लागला नाही."

काकांचा चेहेरा अगदी उतरून गेला. मालकाकडे दुःखी चेहेऱ्याने बघत काका म्हणाले;"फार वाईट झालं हो. नेहेमी मनात यायचं कसं सुखी त्रिकोणी कुटुंब आहे. असंच सुखी राहावं. त्याच्या मनात काय असत कोणालाही सांगता येत नाही." अस म्हणून काका घराकडे जायला वळले.

...........................

आपल्या बंगल्याचं गेट उघडताना एकदा काकांची नजर दूरवरच्या अवि-सरूच्या घराकडे वळली आणि मग ते गेट लावून त्यांच्या घराच्या दाराकडे वळले.

काका घरात शिरले तेव्हा काकू दिवाणावर बसून होत्या. त्यांचा चेहेरा अत्यंत आजारी दिसत होता. काकांनी एकदा त्यांच्याकडे बघितलं आणि हातातली दुधाची पिशवी आत नेऊन ठेवली. काका काकूंच्या समोर येऊन बसले. पण काकू आपल्याच तंद्रीत बसून होत्या. त्यांच्या शेजारीच खिडकी होती. पण आता ती घट्ट बंद केलेली होती. अगदी खिळे ठोकून! काकू त्या खिळ्यांकडेच टक लावून बघत होत्या. काकांनी एकदा त्या खिळ्यांकडे बघितले आणि काकूंकडे बघत म्हणाले;"असं बघितल्यामुळे ते खिळे बाहेर येणार नाहीत. त्यामुळे उठा आणि चहाच्या तयारीला लागा." काकूंनी नजर उचलून रिकाम्या नजरेने एकदा काकांकडे बघितलं आणि त्या उठून स्वयंपाकघराकडे निघाल्या. दोन पावलं पुढे जाऊन काकू मागे वळल्या आणि अगदी न राहावल्यामुळे दुखऱ्या-दुःखी आवाजात काकांना विचारलं;"पण का?"

हातात वर्तमानपत्र घेऊन बसलेल्या काकांनी थंड नजरेने काकूंकडे बघत म्हंटल;"उगाच नको ते प्रश्न विचारू नकोस. तू फक्त माझा आणि माझाच विचार करायचास बाकी कोणाचाही नाही; हे तूला मी कायम सांगत आलो. तुझ्या लेकाकडे तुझा ओढा वाढतो आहे हे लक्षात आल्यावर मी जे करणार होतो ते केलं असतं तर त्यानंतरचं हे काही घडलंच नसतं. पण त्यावेळी तुझ्या केविलवाण्या चेहेऱ्याकडे बघून त्याला परदेशी पाठवून दिलं. त्याच्याशी कधी संबंध नाही ठेवला. मात्र तू कसा कोण जाणे त्याच्यापर्यंत निरोप पोहोचवलास आणि तो आला की लगेच तुला भेटायला. त्याचा पोरगा बघून पाघळून गेलीस आणि माझ्याकडे पूर्ण दुर्लक्ष करायला लागलीस. म्हणून मग त्याचा काटा काढला."

नातवाच्या आणि लेकाच्या आठवणीने काकूंच्या डोळ्यातून अश्रू वाहायला लागले. त्यांच्या डोळ्यात पाणी बघून काका उठले आणि काकुंजवळ जाऊन त्यांचे डोळे पुसत म्हणाले;"अग, अस काय करतेस? त्या सगळ्या प्रसंगा नंतर त्या घरात राहण्याचा तुला त्रास व्हायला लागला म्हणून ते घर असूनही इथे तुझ्यासाठी नवीन घर घेतलंच न मी? किती सुखात होतो आपण इथे आल्यानंतर... तो मूर्ख अवि आणि त्याची ती अति शहाणी बायको सरू इथे येईपर्यंत. बर आला तर राहावं न आपलं आपण. सारख आपलं आपल्या घराचं दार वाजवत राहिले दोघे.... आणि मागचा अनुभव ताजा असूनही तुझी अक्कल ठिकाणावर आली नाही. माझ्या नकळत त्यांच्याशी बोलायला-त्यांच्याकडे बघायला सुरवात केलीस... त्यांच्या बाळाला जीव लावायचा प्रयत्न सुरू केलास.... कमाल आहे हं तुझी! इतक्या वेळा समजावलं तुला की मी सोडून इतर कोणाशीही सरळ बोलायचं नाही... तरीही तू नरम पडायला लागलीस. त्या दिवशी सरूने येऊन सांगितलं तोपर्यंत मला अंदाज देखील आला नव्हता की तू इतकी पुढे गेली असशील. म्हणून मग मी निर्णय घेतला आणि त्याच दिवशी त्या सगळ्यांना घरी बोलावलं. अगोदरच ठरवून ठेवल्याप्रमाणे अविलाच हलवायाकडून गाजर हलवा आणून ठेवायला सांगितलं होतं. तरी तुझा आगाऊपणा नडणार होता..... म्हणे सरू आणि बाळाला गाजर हलवा आवडत नाही.... मी विचारच करत होतो आता तो हलवा त्या तिघांच्या गळी कसा उतरवायचा. पण मध्येच त्या दोघांचं भांडण झालं आणि सगळं कस एकदम सोपं होईन गेलं माझ्यासाठी." अस म्हणून काका खळखळून हसले आणि पुढे बोलायला लागले;"सरू निघून गेली आणि तिच्या मागून अविदेखील. मग मी आपल्या घरातला विष मिसळलेला गाजर हलवा घेऊन त्यांच्या घरी गेलो थोड्या वेळाने. तोवर त्यांच्यातला वाद संपलेला होता. तसा मला अंदाज होताच. असे नवरा-बायको मधले वाद फार नाही टिकत. आपल्या दोघांमधले वाद कधी राहिले आहेत का? मी त्यांच्या घरी पोहोचलो तर दोघे झोपायची तयारी करत होते. मला बघून दोघेही ओशाळले आणि माफी मागायला लागले. ते माझ्या अजूनच पथ्यावर पडलं. त्या दोघांना आग्रह करून तो गाजराचा हलवा खायला घातला. त्यांचा तो छोकरा अगदी झोपेला आला होता. सरू म्हणाली त्याला ती दुसऱ्या दिवशी भरवेल. मनात म्हंटल अग तू कुठे असणार आहेस उद्या.... पण वरवर हसत म्हणालो अग दोन घास तरी दे. गोड खाऊन झोपलं की चांगली झोप लागते. पटलं तिला ते. तिघांचं खाणं नीट झालेलं स्वतः बघितलं आणि मगच निघालो. निघताना म्हंटलं देखील झोपा सौख्यभरे! त्यावर ते दोघेही मूर्ख हसले."

काकांचं बोलणं ऐकून काकूंच्या पायातले त्राणच गेले. त्या तिथल्या तिथे हताशपणे मटकन खाली बसल्या. तेवढ्यात दाराची बेल वाजली. काकांनी काकूंना सावरून उठवलं आणि दिवाणावर नेऊन बसवलं. काकांनी पुढे होऊन घराचं दार उघडलं. दारामध्ये इन्स्पेक्टर उभे होते. काकांनी दार उघडताच काकू कर्कश्य आवाजात कडाडल्या;"कोण आहे दारात? तुम्हाला किती वेळा सांगितलं आहे मला सकाळी कोणीही आलेलं चालत नाही म्हणून. तरीही तुम्हाला सगळ्यांशी बोलायची हौस आहे."

काकूंचा आवाज ऐकून घराच्या आत पाऊल टाकणारे इन्स्पेक्टर देखील दचकले आणि कासानुसा चेहेरा करत काकांनी त्यांना बाहेरच चलायची खूण केली आणि एकदा काकूंकडे कटाक्ष टाकून काका त्यांच्या बरोबर घराबाहेर गेले.........

समाप्त

Friday, November 12, 2021

शेजारी (भाग 1)

 शेजारी

(भाग 1)

"नमस्कार, नुकतेच तुमच्या शेजारी राहायला आलो आहोत. याबाजूला तशी शांतता असते. इथली काहीच माहिती नाही आम्हाला.....इथे वाण्याचं दुकान.... दूध कुठे मिळतं.... थोडी माहिती हवी होती." काकूंनी दार उघडल्या उघडल्या त्याने बोलायला सुरवात केली.

खराच नवखा असावा तो. नाहीतर एकतर काकूंच्या बंगल्याच्या आत जाण्याचं धाडस त्याने केलं नसतं; आणि गेलाच असता तरी बेल वाजवण्याचा वेडेपणा तर नक्कीच केला नसता.

दुपार टळून संध्याकाळची उन्ह उतरायची वेळ झाली होती. दार उघडल्यावर अंधारातून बाहेर डोकावणाऱ्या काकूंच्या डोळ्यांवर उन्हाची तिरीप आली होती. त्यामुळे त्या मनातून चिडचिडल्या होत्या. मुळात त्या काकांची वाट बघत होत्या आणि या अनोळखी तरुणाला बघून त्यांच्या कपाळावरची आठयांची जाळी अजून दाट झाली.

"माझ्याकडे कसलीही माहिती नाही. जा इथून... आणि याद राख परत कधी बंगल्याच्या गेटच्या आत आलास तर. गेटवरची पाटी नाही वाचलीस? अनाहूत आणि अनोळखी लोकांना आत येण्यास मनाई आहे. चल, चालता हो." काकू कर्कश्य आवाजात कडाडल्या आणि तो अनोळखी-अनाहूत गोंधळून एकदम मागे वळून चटचट पावलं उचलत गेटकडे धावला. तो गेटमधून बाहेर पडत असताना काका आत येत होते. त्याच्या चेहेऱ्यावरचे गोंधळलेले भाव बघून त्यांनी त्या तरुणाला थांबवले आणि त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने बघितले. एकवार मागे बंगल्याच्या दाराकडे बघून तो तरुण बोलायला लागला.

"नमस्कार काका. मी आणि माझं कुटूंब इथे नवीन आहोत. आज सगळं घर लावून झालं आणि बायको म्हणाली इथे वाण्याचं दुकान, फळं-भाजी-दूध कुठे मिळतं ते बघून या. म्हणून चौकशी करायला बाहेर पडलो होतो. इथले अनेक बंगले अजून रिकामेच आहेत; या बंगल्यात कोणी राहात असावं अस वाटलं म्हणून आत शिरून बेल वाजवली इतकंच. पण त्या बाईंनी एकदम अंगावर येत ओरडायलाच सुरवात केली हो. माझं काय चुकलं तेच नाही कळलं मला." तो अजून देखील बोलला असता. पण मागे बंगल्याचं दार उघडल्याचा आवाज त्याला आला आणि तो पुढे काही न बोलता तिथून निघून गेला. काकांनी बंगल्याच्या दाराकडे वळून बघितलं. काकू एक हात कंबरेवर ठेऊन आणि एक हात डोळ्यांवर ठेऊन गेटच्या दिशेने बघत होत्या. त्यांना येतो असा हात करून काकांनी गेट उघडले आणि ते बंगल्याच्या दिशेने निघाले.

'अभूतपूर्व 'ही एक लहानशी बंगल्यांची कॉलनी होती. काहीशी गावाबाहेर; निसर्गाच्या सानिध्यात! साधारण सेकंड होम इन्व्हेस्टमेंटसाठी अगदी योग्य. ही एकूण स्कीम खूपच चांगली होती आणि अत्यंत प्रतिथयश बांधकाम व्यवसायिकांची स्कीम असल्याने सगळेच प्लॉट्स विकले गेले होते. हळूहळू बंगले उभे राहायला लागले होते. तीन-चार बंगले एकत्र असे एकूण काही बंगल्यांचं बांधकाम झालेलं होतं. कॉलनीच्या आत-बाहेर पडण्यासाठी चारही बाजुंनी मोठी गेट्स होती. त्यातल्याच एका गेटच्या जवळ जुनी वस्ती होती. तिथल्या काहींनी कॉलनीच्या जवळपास आवश्यक गोष्टींची वेगवेगळी दुकानं सुरू केली होती. या दुकानांची चांगलीच चलती होती.

दुसऱ्या दिवशी सकाळी काका दूध आणायला बाहेर पडले त्यावेळी तो तरुण काकांच्या मागूनच चालत होता. त्याने एकदा मागे बंगल्याकडे नजर वळवून दार बंद आहे याची खात्री करून घेतली आणि चालण्याचा वेग वाढवून काकांना तरुणाला गाठलेच. काकांकडे बघून हसत तो म्हणाला,"नमस्कार काका. बोलुका थोडं तुमच्याशी? आम्ही त्या पलीकडच्या बंगल्यात राहायला आलो आहोत. आमचा नाही बांगला. हिच्या ओळखीच्यांचा आहे. काही महिन्यांसाठी मिळाला आहे. ते गावात राहातात. रिटायरमेंट नंतर इथे येऊन राहायचं म्हणून आतापासून त्यांनी घेऊन ठेवला आहे. हिनेच त्यांना म्हंटल की काही दिवस राहायला मिळाला तर घर स्वच्छ राहील आणि आम्ही भाडं देखील देऊ. ते तयार झाले आणि आम्ही आलो राहायला." काका काही न बोलता चालत होते. तो तरुण थोड्या वेळाने एकेठिकाणी वळला. काकांनी न राहून त्याला थांबवत विचारले,"अरे तिथे कुठे जातो आहेस? सगळी दुकानं या बाजूच्या गेटजवळ आहेत." वळून आश्चर्यचकित चेहेऱ्याने तो म्हणाला,"अरे हो का? काल मी चौकशी केली होती. पण तोवर बराच अंधार झाला होता त्यामुळे नक्की कोणतं गेट ते मला कळलंच नाही. बरं झालं तुम्ही भेटलात. अजून इथली इतकी सवय नाही न मला. चुकलो असतो तर ऑफिसला जायला उशीर झाला असता. आभारी आहे हं मी तुमचा." त्याच्या खांद्यावर थोपटत काका हसले आणि म्हणाले,"अरे आभार कसले मागतोस?" मग मनगटावरच्या घड्याळाकडे बघत ते म्हणाले,"चल, पटपट उचल पावलं. नाहीतर तुला उशीर होईल." दोघेही आपापलं सामान घेऊन आणि एकमेकांचा निरोप घेऊन आपापल्या घराकडे वळले.

त्या संध्याकाळी काकांबरोबर फिरायला म्हणून काकू देखील बाहेर पडल्या होत्या. अनेक महिन्यांनंतर त्या आपणहून येते म्हणाल्या होत्या. दोघेही एकमेकांच्या आधाराने चालत होते. समोरून सकाळचा तो तरुण येत होता. हातात बरेच सामान दिसत होते. बहुतेक कामावरून येताना घरचं सामान घेतलेलं दिसत होतं. सकाळीच काकांशी बोलणं झालं असल्याने त्याने ओळखीचं हसून काकांना हात केला. पण काकांनी त्याला बघून न बघितल्यासारखं करत पुढे चालायला सुरवात केली. तो एकदम गोंधळून गेला. आदल्या संध्याकाळचा काकूंचा आलेला अनुभव आठवून तो काही न बोलता पुढे निघून गेला. काकू काहीच बोलल्या नाहीत; मात्र त्या तरुणाने हसून हलवलेला हात त्यांच्या नजरेतून सुटला नव्हता. काका-काकू फिरून परतले आणि गेटचं कुलूप काढून बंगल्याच्या आत शिरले.... काकू वळून गेट बंद करत असताना त्यांना लांब तोच तो तरुण आणि त्याच्या शेजारी एक नाजूक अंगकाठीची तरुणी दिसले. ते दोघे एकमेकांशी गप्पा मारण्यात पुरते गुंगले होते हे इतक्या लांबून देखील काकूंच्या लक्षात आलं. काकूंनी डोळे बारीक करून बघितलं तर त्यांना त्यांच्या जवळच एक लहान मूल तीनचाकी सायकल फिरवताना दिसलं. काकू गेटजवळ थांबलेल्या काकांना माहीत नव्हतं. त्यामुळे त्यांनी पुढे जाऊन बंगल्याचा दरवाजा उघडला होता. दरवाजा उघडतानाचा कुरकुर आवाज काकूंच्या तीक्ष्ण कानांना जाणवला आणि एकदा त्या लहानशा गोड कुटुंबाकडे बघून आणि गेटकडे पाठ करून त्या बंगल्याच्या दिशेने चालू लागल्या.

दुसऱ्या दिवशी सकाळी परत एकदा काकांची आणि त्या तरुणाची गाठ पडली. आता आपण बोलावं की नाही या संभ्रमात तो असल्याचं काकांना त्याच्या चेहेऱ्यावरून स्पष्ट कळलं. मग त्याच्याकडे हसून बघत काकांनीच हात हलवला. तसा थोडा बाचकतच त्याने देखील प्रतिसाद दिला. दोघे न बोलताच एकत्र चालायला लागले. थोड्या वेळाने त्या तरुणाने घसा खाकरला आणि काकांची लागलेली तंद्री भंगली. तो काहीतरी बोलणार होता; पण त्याच्या खांद्यावर हात ठेवत काका म्हणाले,"एक सांगू का तुला पोरा.... ही असली न बरोबर तर त्यावेळी आपण न बोललंच बरं. मला माहीत आहे तुला हे जरा विचित्र वाटेल. पण काही काळापूर्वीच ती मनाने दुखवलेली आहे. त्यामुळे तिने संपूर्ण जगाशीच जणू वैर घेतलं आहे. माझ्याशी बोलते हे तरी नशीब आहे; असं वाटत एकेकदा. तिला सांभाळणं हे एकच काम आहे सध्या माझं." त्यांच्या हातावर थोपटत तो हसला फक्त. काकाच पुढे बोलायला लागले....."अशी नव्हती रे ती. खुप मोकळ्या स्वभावाची होती. आम्ही गावात अगदी भर बाजार भागात राहात होतो. आमच्या ओसरीत कायम पाण्याने भरलेला माठ ती ठेवायची. संध्याकाळी चार-साडेचार नंतर तर चणे-दाणे घेऊन ओसरीतच बसून असायची. येणारे-जाणारे तिला हाक मारल्याशिवाय पुढे नाही जायचे. पण मग ते सगळं बदलून गेलं आणि मी तिला घेऊन इथे आलो." बोलताना काका बहुतेक भूतकाळात शिरले होते. त्या तरुणाने परत एकदा काकांच्या खांद्यावर थोपटले आणि काका परत वर्तमानात आले आणि चेहेऱ्यावर हसू आणत म्हणले,"तुला इतकंच सांगायचं होतं की ती असताना आपण ओळख नको दाखवुया.... आणि... तिच्या बद्दल गैरसमज नको करून घेऊस." तो समंजसपणे हसला आणि दोघे आपापल्या घराकडे वळले.

या बंगल्यावर राहायला आल्यानंतर काकू सहसा कोणत्याही खिडकीजवळ देखील जात नसत. खुप उजेड येतो असं कारण सांगत त्यांनी सगळ्याच खिडक्यांना जाड पडदे करून घेतले होते. काका घरात नसले तरच त्या दार उघडायला पुढे होत. नाहीतर इथे आल्यापासून त्या आणि गेल्या काही वर्षात त्यांनी जमवले देव-पोथ्या-पुराणे इतकंच त्यांचं विश्व त्यांनी सीमित केलं होतं. पण त्यादिवशी त्या काकांबरोबर बाहेर पडल्या होत्या आणि त्याचवेळी ते लहानसं कुटुंब त्यांना दिसलं होतं. ते कुटुंब काही अंतरावरच्या एका बंगल्यात राहायला आलं होतं; हे त्यांच्या लक्षात आलं होतं. त्या कुटुंबाला बघितल्यापासून काकूंच्या मनात काहीशी चलबिचल झाली होती. काकांच्या नकळत त्या वेगवेगळ्या खिडक्यांजवळ जाऊन ते कुटुंब राहात असलेल्या बंगल्याच्या दिशेने बघायला लागल्या होत्या. त्यांच्या डोळ्यात त्या कुटुंबाबद्दल एक अनामिक उत्सुकता होती. आजूबाजूचे सगळे प्लॉट्स रिकामेच होते. त्यामुळे त्या तरुण कुटुंबाचा बंगला अगदी सहज दिसायचा काकूंना. अजून शाळेत जायचं वय नसल्याने त्या जोडप्याचा तो लहानगा सतत त्या बंगल्याच्या आवारात खेळत असायचा. त्याचं ते धावणं; धावताना धडपडण आणि मग रडत आईला बिलगण.... काकू त्या माय-लेकाकडे बघत होत्या की स्वतःच्या भूतकाळात हरवत होत्या?

एक दिवस संध्याकाळी काकू खिडकीजवळ उभ्या होत्या. त्यांना तो तरुण आणि त्याची पत्नी एकीकडून येताना दिसले. 'हाक मारावी का?' काकूंच्या मनात आलं. काका घरात नव्हते; क्षणभर विचार कारून काकूंनी घराचं दार उघडलं आणि त्या गेटजवळ गेल्या. तोपर्यंत ते दोघेही काकूंच्या बंगल्याच्या गेटजवळ पोहोचले होते. दोघेही एकमेकांत गुंतले होते. त्यामुळे त्यांचं गेटजवळ उभ्या काकूंकडे लक्ष नव्हतं. "अरे ऐकलंत का?...." काकूंनी त्यांना हाक मारली... काकूंचा आवाज ऐकून दोघेही दचकले.

बहुतेक त्या तरुणाने त्याच्या पत्नीला काकूंबद्दल सांगितलं असावं. त्यामुळे काकूंना बघून तिच्या चेहेऱ्यावर एकदम घाबरल्याचे भाव उमटले. तिच्याकडे दुर्लक्ष करत काकूंनी त्या तरुणाला विचारले,"काय रे कुठून आलात इतक्या उशिरा? आणि दोघेच? तुमचा छोकरा कुठे आहे?"

आपल्या पत्नीला हलकेच मागे सारत तो म्हणाला,"काकू, थोडं कामासाठी गेलो होतो आम्ही. बस आता घरीच जातो आहोत. कशा आहात तुम्ही?"

"मी बरी आहे. पण इतक्या संध्याकाळी तुम्ही दोघे बाहेर गेलात तर तुमच्या पिल्लाला कोणाकडे सोडलंत?" काकू अजूनही काहीतरी बोलल्या असत्या पण त्यांना काका दुरून येताना दिसले; तशा त्या गर्रकन वळून घराच्या दिशेने गेल्या.

त्यांच्या त्या विचित्र वागण्याने ते दोघेही गोंधळात पडले. तेवढ्यात काका त्यांच्याजवळ पोहोचले. काकांकडे हसत बघत तो तरुण आपल्या पत्नीला म्हणाला,"सरू, मी तुला सांगितलं न ते हे काका." त्या तरुणांच्या पत्नीने काकांकडे हसून बघितले आणि नमस्कार केला. "असुदे; असुदे!" काका हसत म्हणाले आणि त्यांनी वळून आपल्या बंगल्याकडे बघितले. बंगल्याचे दार बंद होते. एक सुस्कारा टाकत त्यांनी विचारलं,"ही बोलत होती न तुमच्याशी? काय म्हणाली?"

"काही नाही काका.... काकू अविला आमच्या पिल्लुबद्दल विचारत होत्या." अवीच्या पत्नीने सरूने उत्तर दिलं.

तिच्याकडे बघत आणि भुवया उंचावत काकांनी 'बर' अशी मान हलवली आणि म्हणाले,"सरू.... मी तुला सरू म्हंटलं तर चालेल न?" "हे काय विचारणं झालं काका?" तिने हसत म्हंटल. ".... तर सरू, ही कधी काही उलट-सुलट बोलली तर मनावर घेऊ नकोस हं. तसा मी सतत तिच्या सोबत असतोच. पण कधीतरी काही ना काही कामासाठी बाहेर पडावं लागतंच नं. खरतर ती सहसा एकटी बाहेर पडतच नाही आता. पण जर चुकून माझ्या अपरोक्ष तुला.... तुम्हाला कधी कुठे भेटलीच तर मोघम बोलून तिला घरी आणून सोडा हं. ते तसं झाल्यापासून तिचं मन थाऱ्यावर नसतं."

अविने काकांचा हात हातात घेतला आणि म्हणाला,"काका मी तुमची अस्वस्थता समजू शकतो. ही जागा तशी आमच्यासाठी नवीन आहे. त्यात ही आणि बाळ दोघेच असतात घरी दिवसभर. त्यामुळे मला कामावरून यायला जरा उशीर झाला तरी माझं मन अस्वस्थ होतं. तुम्ही दोघ तर आयुष्य एकत्र जगला असाल. तुम्हाला किती काळजी वाटत असेल. काळजी करू नका; काही लागलं तर आम्हाला कधीही हाक मारा. आम्ही आहोतच. सगळं ठीक होईल." त्याच्या हातावर थोपटल्या सारखं करून काहीसं उदास हसत काका बंगल्याकडे वळले आणि अवि-सरू त्यांच्या घराच्या दिशेने.

दिवस सरत होते. अधून-मधून काका आणि अवि सकाळी भेटायचे त्यावेळी त्यांच्या गप्पा होत असत इतकंच. अवि न चुकता काकूंची चौकशी करायचा काकांकडे. काका कधी उदासवणं हसायचे तर कधी आकाशाकडे बघून नमस्कार करायचे; कधीतरी अगदीच उद्विग्न असले तर म्हणायचे;"मी असेपर्यंत हे असच चालणार; मी मेलो की तिचं ती जगायला मोकळीच आहे." त्यांचं हे बोलणं अविला अजूनच दुखावून जायचं. मग त्याने ठरवूनच काकूंबद्दल विचारणं बंद करून टाकलं. आपल्यामुळे काकांना त्रास नको; अस त्याच्या मानत यायचं. कधीतरी अवि आणि सरू त्यांच्या बाळाला घेऊन बाहेर पडायचे. त्यावेळी जर ते काकांच्या बंगल्यावरून गेले तर सरूला जाणवायचं की काकू हळूच पडदा हलकासा सारून या तिघांकडे बघत आहेत. पण ती काहीच बोलायची नाही. हळूहळू सरूला लक्षात आलं की काकू दिवसासुद्धा आपल्या घराकडे बघत बसलेल्या असतात. तिला हे सगळंच थोडं विचित्र वाटायला लागलं होतं. पण तिला प्रत्यक्ष काहीच त्रास होत नव्हता त्यामुळे ती गप होती.

त्यादिवशी काकूंना दारात बघून सरू थोडी दचकलीच. पण चेहेरा शांत ठेवत तिने काकूंना आत घेतलं. काकू पदराने घाम पुसत आत आल्या आणि त्यांनी घरात नजर फिरवली. "तुझा लहानगा नाही ग दिसत?" त्यांनी अगदी सहज विचारल्यासारखं केलं. त्यांची नजर घरभर भिरभिरत होती, बाकी काही न बोलता काकूंनी एकदम तिच्या बाळाबद्दल विचारावं हे सरूला थोडं विचित्र वाटलं. पण मनातले विचार बाजूला सारत ती म्हणाली,"दुपारची वेळ आहे न; झोपला आहे. तसा रोज नाही झोपत. पण आता उन्हाळा फार वाढला आहे न; त्यात आज खूपच मस्ती केली त्याने म्हणून मग मी त्याला जबरदस्ती झोपवला."

"तरीच! तो दिसला नाही सकाळपासून म्हणून आले विचारायला. बर जाते मी." अस म्हणून काकू मागे वळल्या आणि निघाल्या देखील. सरूने काकूंना हाक मारली आणि म्हणाली,"आल्यासारखं थांबा की जरा वेळ काकू. मस्त गारेगार कोकम सरबत करते तुमच्यासाठी." तशी परत जायला वळलेल्या काकू मागे फिरल्या आणि एकदम वस्कन सरुवर ओरडल्या,"मला भिकारी समजतेस का? काही नको मला. जरा कुठे कामाला जाताना आत डोकावले तर लागली चिकटायला." अचानक काकूंचं काय बिनसलं ते सरूला कळलंच नाही. ती काही बोलण्याच्या आत काकू घरातून बाहेर पडून गेटजवळ पोहोचल्या देखील होत्या. सरूच्या कपाळावर आठी उमटली आणि तिने दार लावून घेतलं.

संध्याकाळी अवि आल्यावर तिने त्याला दुपारी घडलेला प्रसंग सांगितला आणि म्हणाली;"तू काकांना सांगून टाक की असं काकूंना एकटीला बाहेर जाऊ देऊ नका. अशा कोणावरही त्या ओरडल्या तर प्रत्येकजण ऐकून घेईलंच असं नाही. उगाच एक करता दुसरंच व्हायचं." सगळं ऐकून घेऊन अवि म्हणाला;"सरू, मी काही नाही सांगणार काकांना. अगोदरच त्यांच्या मनाला किती त्रास होत असेल या वयात अशी भ्रमिष्ट पत्नी सांभाळताना. त्यात आपण काकूंची तक्रार केली तर त्यांना अजून ओशाळवाणं होईल. तू दुर्लक्ष कर बघू त्यांच्याकडे. अशा कितीशा येणार आहेत त्या आपल्याकडे? इथे येऊन आता सहा महिने झाले आपल्याला आणि आज पहिल्यांदा त्या आल्या ना." "हो रे अवि. पण त्या आत आल्या ना त्यावेळी त्यांच्या आवाजात खूपच ओलावा होता आणि मग मागे वळल्या तर एकदम खर्जातल्या आवाजात बोलायला लागल्या. मला थोडं विचित्र वाटलं त्यांचं ते वागणं." "बरं, परत आल्या तर आपण मुद्दाम काकांना भेटून सांगू. ठीक? चल मला चहा दे बघू." विषय संपवत अवि म्हणाला.

आज सरुचं अंग थोडं ठणकत होतं. त्यामुळे सकाळी अविला डबा देखील तिने केला नव्हता. जेमतेम बाळासाठी खिचडी टाकून ती व्हरांड्यात आराम खुर्चीत बसली होती. खरं तर तिला आत जाऊन पडावंस वाटत होतं; पण बाळ घरात यायला तयार नव्हता. त्याला आवारात एकटं सोडणं सरूला बरोबर वाटत नव्हतं. म्हणून ती तशीच व्हरांड्यात बसली होती. बसल्या-बसल्या सरूला झोप लागली. अचानक बाळाच्या आवाजाने तिला जाग आली. बाळ गेटजवळ उभा राहून कोणालातरी हात करत 'टाटा' म्हणत होता. सरू धडपडत उठत गेटकडे धावली; पण तिथे तिला कोणीच दिसलं नाही. बाळाला उचलून घेत ती घराकडे वळली. त्याचा पापा घेत सरूने त्याला विचारलं;"कोणाला टाटा करत होतास पिल्लू? अस अनोळखी लोकांशी बोलू नये सांगितलं आहे न तुला." त्यावर आपल्या बोबड्या शब्दात बाळ म्हणाला;"ती आजी येते लोज. ती खाऊ देते न मला कधी-कधी. हे बघ." असं म्हणुन त्याने आपली इवलीशी मूठ उघडून दाखवली. त्यात चार-पाच चणे-दाणे होते. ते पाहून सरू घराच्या दिशेने चालताना थबकली आणि त्याच्या हातातले चणे-दाणे फेकत ती म्हणाली; "कोण देतं तुला खाऊ पिल्लू? असं घेऊ नकोस कोणाकडून काहीतरी." तिच्या हातातून सुटायचा प्रयत्न करत बाळ म्हणाला;"ती आजी येते न मला बघायला ती देते दाने मला. ती म्हनाली तू नाई लागावनाल. म्हनुन घेतले." अस म्हणून तिच्या हातातून सुटत बाळ पळाला आणि "मला सायकल हवी." म्हणत त्याची तीन चाकी चालवायला लागला.

बाळाचं बोलणं ऐकून सरूला मात्र खूप राग आला. ती तशीच मागे फिरली आणि बाळाला उचलून काकांच्या घराकडे तरातरा चालू पडली. तिने काकांच्या बंगल्याचे गेट जोरात उघडले आणि वेगात जाऊन दार वाजवले. दार उघडले जाईपर्यंत सरू बेल वाजवत होती. दार उघडले गेले आणि दारात काका उभे होते आणि आत थोड्या अंतरावर काकू होत्या. सरू प्रचंड संतापली होती. तिने काकूंकडे एक तीक्ष्ण कटाक्ष टाकला.... बहुतेक काकूंच्या डोळ्यातले भाव भेदरलेल्या सशाचे होते; पण सरूने त्याकडे पूर्ण दुर्लक्ष केलं आणि ती काकांना जोरात म्हणाली;"काका आजवर तुमच्याकडे बघून मी गप बसले होते. पण आता मात्र अति झालं हं. तुमच्या पत्नी कधीच आमच्याशी नीट बोलल्या नाहीत. तुम्हाला कदाचित माहीत नसेल; पण त्या सतत पडद्या आडून आमच्या घराकडे बघत असतात; मी अनेकदा ते बघितलं होतं. कधीतरी सकाळच्या वेळी त्या आमच्या बंगल्यावरून जातात आणि त्यावेळी माझ्या बाळाकडे टक लावून बघत असतात हे देखील मी पाहिलं आहे. पण मी तुमचा विचार करुन यासगळ्याकडे दुर्लक्ष केलं. मात्र आता हद्द झाली.... त्यांनी आज माझ्या पिल्लाला चणे-दाणे दिले. बर, हे पहिल्यांदा नाही झालेलं हे देखील माझ्या लक्षात आलं आहे. त्या असं का वागतात? माझ्याशी आणि अविशी शत्रू असल्याप्रमाणे ओरडून बोलतात. मात्र माझ्या नकळत माझ्या बाळाशी सलगी करायचा प्रयत्न करतात. काका, तुम्हाला स्पष्ट सांगते; जर त्यांना काही मानसिक आजार असेल तर तुम्ही योग्य डॉक्टरचा सल्ला घ्या. गरज असेल तर मी तुम्हाला मदत करेन. पण हे त्यांचं अस वागणं मी चालवून घेणार नाही."

काकांनी सरूचं बोलणं शांतपणे ऐकून घेतलं आणि वळून एकवार आत काकूंकडे बघितलं. काकूंनी अंग चोरून घेत नजर खाली वळवली. सरूला ते जरा विचित्र वाटलं. कारण काकू वस्कन ओरडत पुढे आल्या असत्या; असा तिचा कयास होता. परत सरूकडे वळत काका म्हणाले;"हे अस व्हायला नको होतं. पण ती समजूनच घेत नाही; त्याला मी तरी काय करू? बर झालं तू मला येऊन सगळं सांगितलंस. ती अशी बाहेर पडायला लागली आहे हे मला माहीत नव्हतं. कदाचित मी अंघोळीला किंवा घरचं सामान आणायला गेलो असताना ती तुमच्या बंगल्याच्या दिशेने येत असावी. चिंता करू नकोस. आता मी योग्य तो उपाय करतो. परत असं होणार नाही. शेवटी मला ती.... आणि तिला मीच आहे नं." काकांचं बोलणं ऐकून सरुचं समाधान झालं. ती तिच्या बाळाला घेऊन परत जायला वळली. वळताना तिची नजर परत एकदा घरात उभ्या असलेल्या काकूंकडे वळली. तिला त्यांच्या डोळ्यातलं भेदरलेपण परत एकदा जाणवलं. पण त्याक्षणी ती इतर काही विचार करण्याच्या मनस्थितीत नव्हती.

संध्याकाळी अवि आल्यावर तिने सकाळचा सगळा प्रकार त्याच्या कानावर घातला. सगळं ऐकून घेऊन अवि म्हणाला;"कशाला उगाच तू काकांना त्रास दिलास सरू. चणेच तर दिले होते त्यांनी. कदाचित आपल्या बाळात त्यांना त्यांचा नातू दिसत असेल."

"आता यात त्यांच्या नातवाचा काय संबंध अवि?" सरूने विचारले.

"अग, परवाच काका मला सांगत होते की त्यांचा मुलगा आणि सून अमेरिकेला असतात. शिकायला गेलेला मुलगा कधीच आला नव्हता. तो अचानक आला ते बायको मुलाला घेऊनच वर्षभरापूर्वी आला होता. काही दिवस काका-काकुंजवळ राहून मग मुलगा आणि त्याची बायको दोघे त्यांच्या तीन वर्षांच्या मुलाला काका-काकूंकडे ठेऊन चार दिवसांसाठी फिरायला गेले होते. नेमकं त्याचवेळी बाळाला काहीतरी झालं आणि साध्याशा आजाराने तो दगावला. बाळ गेल्याचं कळल्यावर मुलगा-सून धावले. पण त्याचं अंत्यदर्शन देखील त्याच्या आई-वडिलांना होऊ शकलं नाही. ते सगळंच काकूंनी इतकं मनाला लावून घेतलं की त्यांनी स्वतःला एका खोलीत डांबून घेतलं होतं. त्या आपल्या मुलाला देखील भेटल्या नाही. अनेक दिवस काही खात देखील नव्हत्या म्हणे. त्यांच्या खोलीत फक्त काकाच जाऊ शकत होते. शेवटी मुलगा-सून काकूंना न भेटताच कायमचे परत गेले. त्यानंतर काकू त्या घरात राहायला तयार नव्हत्या म्हणून काकांनी हे घर घेतलं. इथे देखील त्या कधीच कोणाशी बोलत नव्हत्या. मुळात इथे एकूणच कमी वस्ती. त्यात काकुंच हे अस अबोल आणि काही वेळा फकटुन वागणं. यामुळे काका-काकू वाळीत टाकल्यासारखे एकटेच पडले होते. मात्र काकांना देखील वाटायला लागलं होतं की अलीकडे काकू आपल्या घराकडे अधून मधून बघत असतात. म्हणूनच ते मला सांगत होते की जर त्या आपल्या घराजवळ दिसल्या तर काकूंच्या नकळत ते आपण त्यांना सांगावं. त्यावेळी मी त्यांना सांगितलं की तू काकूंना आपल्या घराजवळ बघितलं आहेस. ते ऐकून काका काहीसे विचारात पडलेले वाटले मला. म्हणून मग उगाच त्यांना त्रास नको म्हणू मी फार डिटेल्स दिले नाहीत. तुला हे सगळं सांगायचं राहूनच गेलं."

अविचं बोलणं ऐकून सरू एकदम शांत झाली आणि म्हणाली;"अरे.... काय सांगतोस? अस झालं होतं का? अरेरे.... म्हणून त्या आपल्या बाळाला बघायला येत असाव्यात. उगाच मी त्यांची तक्रार केली काकांकडे."

अवि आणि सरू बोलत होते आणि तेवढ्यात त्यांच्या घराची बेल वाजली. अविने उठून दार उघडले. दारात काका उभे होते. त्यांना बघून अविला खूपच आश्चर्य वाटते. दारातून बाजूला होत त्याने काकांचे स्वागत केले. "अरे काका.... या या! बरं झालं आलात. मी आणि सरू तुमच्याबद्दलच बोलत होतो आत्ता." काका आत आले आणि सरूला नमस्कार करत सोफ्यावर बसले. काही बोलावं म्हणून काकांनी घसा खाकरला पण तेवढ्यात सरुच पुढे झाली आणि म्हणाली;"माफ करा हं काका, उगाच मी तुमच्या घरी येऊन अस काहीतरी बोलले. तुम्हाला किंवा काकूंना त्रास द्यायचा किंवा दुखवायचा हेतू नव्हता माझा." तिच्याकडे शांतपणे बघत काका काहीसं गंभीर हसले आणि म्हणाले;"अग बरं झालं तू मला सगळं सांगितलंस. मला वाटायला लागलंच होतं की ही माझ्या नकळत घराबाहेर पडायला लागली आहे. पण कधी जाते ते कळत नव्हतं. कारण ती ते फारच लपवून ठेवत होती." त्यावर त्यांच्या समोर बसत सरू म्हणाली;"काका आमच्याकडे येऊन जर काकूंना बरं वाटत असेल तर त्यांना घेऊन तुम्ही जरूर येत चला. त्यांची आणि बाळाची गट्टी झाली आणि त्यामुळे जर त्या परत माणसात आल्या तर आम्हाला पण खुप आनंद होईल. तसे आमच्या दोघांचेही आई-वडील लांब असतात. अवीच्या नोकरीमुळे आम्ही या गावात येऊन राहिलो आहोत."

सरू बोलत होती आणि काका बाळाकडे टक लावून बघत होते. काकांचं आपल्या बोलण्याकडे लक्ष नाही हे सरूच्या लक्षात आलं. बाळाला बघून कदाचित त्यांना त्यांचा नातू आठवला असेल अस वाटून सरू बोलायची थांबली. काही क्षण शांततेत गेले आणि काकांची तंद्री मोडली. बाळावरची नजर काढत त्यांनी अवि आणि सरूकडे बघितलं आणि म्हणाले,"मी तुम्हाला जेवणाचं आमंत्रण द्यायला आलो आहे. सरू, तू गेल्यावर मी हिच्याशी बोललो. तिने कबूल देखील केलं की अलीकडे तिला तुझ्या बाळाला बघावसं वाटतं.... त्याच्याशी बोलावसं वाटतं. मी म्हंटल मग तुम्हाला घरीच बोलावतो जेवायला. म्हणजे छान ओळख होईल तुमची तिच्याशी आणि तिचे आणि बाळाचे संबंध देखील मार्गी लागतील." यावर सरु हसली आणि म्हणाली;"नक्की येऊ एकदा काका; आणि तुम्ही दोघे देखील येत जा अधून मधून आमच्याकडे. तशी इथे जवळपास गप्पा मारायला किंवा ओळख ठेवायला कोणिच नाही. मी आणि काकू छान राहात जाऊ. मला देखील आईची आठवण मग कमी येईल." त्यावर काका हसले आणि त्यांनी मान हलवली. "पुढचं पुढे बघू ग; मी आजच रात्रीचंच आमंत्रण घेऊन आलो आहे. नक्की आजच रात्री या जेवायला... काकूंचा आग्रहाचा निरोप आहे बर का! बरं, काय आवडतं बाळाला आणि तुम्हाला? म्हणजे तसा बेत करता येईल असं ती म्हणत होती.... आणि किती वाजता जेवता? त्याप्रमाणे ती तयारी ठेवेल." काका आजच बोलावत आहेत हे ऐकून सरूला थोडं आश्चर्य वाटलं. पण तिने पटकन सावरून घेत म्हंटल;"काहीही चालेल काका.... भेटणं महत्वाचं न. आम्ही येतो आठपर्यंत. तसे एरवी आम्ही नऊ साडेनऊला जेवतो. पण आज मला थोडं बरं वाटत नाहीये... आणि बाळ देखील दुपारी झोपला नाही आज. त्यामुळे कदाचित आज आम्ही लवकरच झोपु." त्यावर काका परत एकदा मान हलवत म्हणाले;"हो पोरी! भेटणं महत्वाचं आणि तब्बेत पण महत्वाची. या तुम्ही तिघेही. वाट बघतो." आणि काका त्यांच्या घरून निघाले. बाहेर पडून परत वळत त्यांनी अविला हाक मारली आणि काहीतरी सांगितलं. अविने बर म्हणून मान हलवली आणि काका वळून निघून गेले.

काका गेले तरी सरू अजूनही सोफ्यावर बसून होती. तिच्याजवळ बसत अविने तिचा हातात हातात घेतला आणि म्हणाला;"कशाचा विचार करते आहेस सरू?" अविकडे बघत सरू म्हणाली;"अवि, मला न हे सगळं थोडं विचित्र वाटतं आहे. कालपर्यंत त्या काकू आपल्याशी नीट बोलायला तयार नव्हत्या आणि आज अचानक आपल्याला सहकुटुंब जेवायला बोलावलं आहे.असं कसं?" त्यावर अवी देखील क्षणभर विचारात पडला आणि म्हणला;"अग, कदाचित आज तुझ्या जाण्याने काकूंच्या मनाला एक धक्का बसला असेल आणि त्या त्यांच्या जुन्या दुःखातून बाहेर आल्या असतील. किंवा नातू गेल्याबद्दल त्या स्वतःला अपराधी मानत असतील तर त्या अपराधी भावनेला देखील थोडा धक्का लागला असेल. काकांनी देखील त्यांना समजावलं असेल की जर काकांपासून न लपवता काकू आपल्याशी बोलल्या तर त्यामुळे त्या दोघांनाही बरं वाटेल आणि आपल्याला देखील सगळं सोपं जाईल... आणि त्यांना पटलं असेल. मग कुठूनतरी सुरवात करायची म्हणून त्यांनी आज आपल्याला बोलावलं असेल. बर, ते जाऊ दे. इतका विचार नको करुस तू. तुला देखील बरं वाटत नव्हतं तर वेळेत जाऊ आणि वेळेत परत येऊ." त्यावर हसत मान हलवत सरू उठली.

अवि आणि सरू बाळाला घेऊन काका-काकूंच्या घरी पोहोचले तेव्हा आठ वाजले होते. काकांनीच दार उघडले आणि सगळ्यांना घरात घेतले. घर फारच छान होतं. सगळं कसं नीट-नेटकं मांडून ठेवलं होतं. एका बाजूला काही खेळणी ठेवली होती. खेळणी दिसताच बाळ अवीच्या कडेवरून खाली उतरला आणि खेळणी घेऊन खेळायला लागला. काका हसले आणि म्हणाले;"ती सगळी खेळणी त्यांच्यासाठीच आहेत. खेळून घेऊ दे त्याला." सरूची नजर आतल्या दाराच्या दिशेने वळली. "काकू दिसत नाहीत ते?" सरूने काकांना विचारले आणि तशीच ती आत जायला वळली. "अग येईल ती. बस तू." काका म्हणाले. "काका, बिचाऱ्या काकू किती करतील? मी थोडी मदत करते त्यांना. तुम्ही बसा अविबरोबर." असं म्हणत सरू आत गेलीच.

काकू ओट्याजवळ उभ्या होत्या. हातात जपाची माळ होती; पण त्यांची कुठेतरी तंद्री लागली होती. काकू कशी प्रतिक्रिया देतील याचा सरूला अंदाज नव्हता... त्यामुळे थोडं बिचकतच तिने काकूंना हाक मारली. "काकू...... काही मदत हवी आहे का?" काकूंची तंद्री भंगली आणि त्यांनी नजर उचलून सरूकडे बघितले. त्यांची नजर अजूनही हरवलेलीच होती; पण सरूला बघून एकदम त्यांच्या नजरेत ओळख आली. त्यांनी काहीसं हसत सरूला जवळ बोलावलं आणि तिचा हात हातात घेतला. क्षणभर तिच्या डोळ्यात बघून काकू म्हणाल्या;"एक सांगू का? माझं थोडं चुकलंच...." त्यांना थांबवत सरू म्हणाली;"काकू, मलाच माफ करा. मी जरा जास्तच बोलले आज दुपारी. तुमच्या किंवा काकांच्या भावना मला दुखवायच्या नव्हत्या; काय झालं कोण जाणे त्याक्षणी मला." तिला थांबवत काकू म्हणाल्या;"सरू..... एक सांगू का तुला? आज जे झालं ते झालं; पण आता तुम्ही...."

तेवढ्यात काका आत आले आणि हसत हसत म्हणाले;"काय गप्पा चालू आहेत." काकांना बघताच काकूंनी सरूचा हात सोडला आणि काकांकडे वळत म्हणाल्या;"काही नाही... जेवण तयार आहे तर जेवायला बसू म्हणत होती ही. मी म्हंटल मुद्दाम गाजराचा हलवा आहे तुमच्यासाठी; तर म्हणाली तिला आणि बाळाला नाही आवडत गाजराचा हलवा." काकुंच बोलणं ऐकून सरूला एकदम आश्चर्य वाटलं. ती काही म्हणायच्या आत काका सरूकडे वळले आणि म्हणाले;"अग तुला गाजर हलवा नाही का आवडत? तुमच्याकडे आलो होतो तेव्हा विचारायला हवं होतं काय आवडतं ते. मग पटकन जाऊन श्रीखंड घेऊन येऊ का? ते तर तुला आणि बाळाला आवडत असेल न?" त्यांनी असे म्हणताच काकू एकदम घाईघाईने म्हणाल्या;"हो! जाच तुम्ही आणि घेऊन या श्रीखंड." काकुंच हे अस वागणं बघून सरू अजूनच गोंधळात पडत चालली होती. ती एकदम सावरून घेत म्हणाली;"छे छे काका. आता कुठेही जाऊ नका. थोडा थोडा गाजर हलवा सगळेच खाऊ." काकांनी एकवार काकूंकडे बघितलं आणि ते बाहेर निघून गेले.

काकू परत एकदा सरूला काहीतरी सांगण्यासाठी तिच्याकडे वळल्या. तेवढ्यात सरुचा बाळ बाहेरून धावत धावत आत आला आणि सरूला बिलगून म्हणाला;"मया भूक लागली." त्याला उचलून घेत सरू म्हणाली;"हो रे बाळा. या आजीने तुझ्यासाठी छान छान खाऊ केला आहे. चल तुला भरवते." आणि मग काकूंकडे वळून ती म्हणाली;"मी याला वरण भात भरवून घेते आणि मग आपण मोठे बसू. चालेल न?" काकूंनी प्रेमळ नजरेने बाळाकडे बघत त्याच्या डोक्यावरून हात फिरवला आणि सरूला म्हणाल्या;"मी कालवून देते हो त्याच्यासाठी वरण भात. छान साजूक तूप आणि बनतिखटाचं लिंबाचं लोणचं पण घालते." काकुंच बोलणं एकूण सरू हसली आणि काकूंनी वरण भात कालवून सरूच्या हातात दिला; तो ती बाळाला भरवायला लागली. काकूंनी मोठ्यांच्या जेवणाची तयारी करायला सुरवात केली.

बाळाचं जेवण झालं आणि त्याला खेळायला सोडून सरू काकूंना मदत करायला आली. सगळेजण टेबलावर बसून गप्पा मारत जेवत होते. काका अगदी आग्रह करून वाढत होते. जेवताना काका अचानक म्हणाले;"अरे, गाजर हलवा राहिला वाटत आतच." त्यावर काकांकडे बघत काकू म्हणाल्या;"अहो, त्यांना आवडत नाही म्हणून सांगितलं न मी तुम्हाला. म्हणून तर नाही आणला गाजर हलवा मी इथे टेबलावर." काकुंच उत्तर ऐकून का कोण जाणे पण काका एकदम गंभीर झाले. काकू देखील अस्वस्थपणे चुळबुळ करायला लागल्या. वातावरणातला ताण वाढायला लागला म्हणून मग तणाव कमी करायला सरूने बाळाला हाक मारली. "बाळ, हे बघ आजीने तुझ्यासाठी काय गम्मत केली आहे. ये पटकन." बाळ देखील धावत आला. काकू त्याला घेण्यासाठी पुढे होत होत्या तेवढ्यात उभे राहून काकांनीच बाळाला उचलून घेतले आणि अविला विचारले;"काय रे बाळाचं नाव काय ठेवलं आहे तुम्ही? कधी नावाने हाक मारताना नाही ऐकलं म्हणून विचारतो." त्यावर हसत अवि म्हणाला;"या सरूची अंधश्रद्धा दुसरं काय काका. आहो, हिला कोणीतरी सांगितलं की बाळाचं नाव नका ठेऊ तीन वर्षांचा होईपर्यंत. त्यामुळे अजून आम्ही त्याचं नाव नाही ठेवलं. पण आता दोनच दिवसात त्याचा तिसरा वाढदिवस आहे. त्यावेळी त्याच बारसंच करणार आहोत. हा पठ्ठ्या पहिलाच असेल की तिसऱ्या वर्षी पाळण्यात बसेल आणि बारसं करुन घेईल."

त्यावर सगळेच हसले. काकूंनी सरूला विचारलं;"काही नाव ठरवलं आहेस का ग?" त्यावर सरू म्हणाली;"उगाच अपशकुन नको म्हणून मी अजून नावाचा विचार देखील केलेला नाही." तीच बोलणं ऐकून अवि हसायला लागला आणि काकूंना म्हणाला;"ही फारच भोळी आणि वेडी आहे. पण मी मात्र माझ्या लेकाचा नाव ठरून टाकलं आहे. मी त्याचं नाव हर्ष ठेवणार आहे. तो आला आणि आमचं सगळं कुटुंब आनंदलं... आनंद देतो तो हर्ष."

अविचं बोलणं ऐकून सरू मात्र एकदम अस्वस्थ झाली आणि जेवणावरून उठत म्हणाली;"अवि, आपलं ठरलं होतं न याविषयी अजिबात बोलायचं नाही. एवढी एक गोष्ट देखील तू ऐकत नाहीस न माझी." आणि एकदम काकांच्या हातातून बाळाला घेऊन सरु निघालीच. अवि देखील तिच्या पाठोपाठ जात म्हणाला;"अग इतकं काय लावून घेतेस मनाला? दोन दिवसात तर आपण करतो आहे सगळं तुझ्या मनाप्रमाणे." पण सरू त्याचं काही ऐकायला थांबलीच नाही. काका काकूंना देखील न सांगता ती घराबाहेर पडली आणि तरातरा स्वतःच्या घराकडे निघून गेली. अवीची फारच पंचाईत झाली... तो पटकन मागे वळला आणि एकूण झालेल्या प्रकाराने स्तंभित झालेल्या काका-काकूंना म्हणाला;"काका... काकु... तुम्ही हीचं हे वागणं फार मनाला लावून घेऊ नका हं. बाळाच्या बाबतीत ती थोडी जास्तच हळवी आहे. आता ती काही ऐकायची नाही. घरी जाऊन परत वाद घालत बसेल. पण आता ती गेली आहे तर मला पण जावं लागेल. उद्या येऊन जातो मी. आता तर काय येणं-जाणं चालेलंच आपलं. अच्छा" आणि काका-काकूंना बोलायला काही वाव न देता तो देखील सरूच्या मागे निघून गेला.

......................................

दोन वृद्ध जोडपी अवि-सरूच्या दिवाणखान्यात बसली होती. दोन्ही वृद्ध महिला हमसून हमसून रडत होत्या. दोन्ही पुरुषांची अवस्था देखील फारशी ठीक नव्हती. घरात पोलिसांचा वावर चालू होता. त्यामुळे त्यांना त्यांचं दुःख बाजूला ठेऊन पोलिसांना तोंड द्यावं लागत होतं.

पोलीस इन्स्पेक्टर : तुमचं नातं काय यासर्वांशी?

त्यातील एक पुरुष स्वतःला सावरत पुढे आले आणि म्हणाले;"मी सरूचा.... म्हणजे या मुलीचा बाप आणि ही तिची आई. ते मुलाचे वडील आणि त्या त्याच्या आई.

पोलीस इन्स्पेक्टर : तुमच्या कधी लक्षात आला हा सगळा प्रकार?

सरुचे वडील : अहो, आज संध्याकाळी आमच्या नातवाचं बारसं आम्ही ठरवलं होतं. त्यासाठीच तर आम्ही चौघेही आज सकाळीच आलो. काल आम्ही निघायच्या अगोदर फोन करत होतो तर दोघांनीही फोन उचलला नाही. त्यामुळे आम्ही पार गोंधळून गेलो होतो. त्यात अवि आम्हाला घ्यायला स्टेशनवर येणार होता; तो आलाच नाही. काही कळायला मार्ग नव्हता. पण पत्ता होता आमच्याकडे. त्यामुळे आम्हीच टॅक्सी केली आणि आलो. घरी पोहोचलो आणि सारखी बेल वाजवत होतो. कोणी दार देखील उघडायला येत नव्हतं. बरं, इथे कोणी शेजार-पाजार देखील नाही की कोणाला तरी काहीतरी विचारता येईल. पण तेवढ्यात हा पोरगा आला सामान घेऊन....


क्रमशः










Friday, November 5, 2021

चिरंजीवी (भाग 8) (शेवटचा)

 चिरंजीवी


भाग 8

......कालौघात सर्वच अशक्य गोष्टी शक्य होतात यावर त्यांचा विश्वास होता.

"पंजू... म्हणूनच तुम्ही आणि स्वीटुने मिळून ही ग्रीन वर्ल्ड सिटी तयार केलीत का?" जनमेजयने..... सिध्दार्थच्या पणतुने त्याला विचारलं.

"जनमेजया एकतर ती तुझी नाही माझी स्वीटु आहे." मोकळेपणी हसत सिध्दार्थ म्हणाला. "दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे इथे सर्वात कमी आंग्ल भाषिक शब्द वापरले जातील हा नियम आहे; हे तू विसरू नकोस. या 'सत्यतापर जगत' चं नाव बदलण्याची चूक तू करू नकोस आणि सर्वात महत्वाचं म्हणजे माझ्या लक्षात आलं आहे की अलीकडे आम्हाला भेटायला येण्याच्या नावाखाली तू वानप्रस्थाश्रम विभागात जास्त वावरायला लागला आहेस. अर्थात मला त्याचा आनंदच आहे. तुमच्यासारखी तरुण पिढी आमच्या आजूबाजूला असली की खूप बरं वाटतं. पण तुला दिलेल्या जवाबदाऱ्या पूर्ण करून मगच इथे आलास तर बरं होईल बाळा."

"ओह! पंजू.... मला माफ करा... अजूनही पटकन आंग्लभाषिक शब्द तोंडातून सहज बाहेर पडतात. मुळात एरवी तेच शब्द वापरण्याची सवय आहे न म्हणून. अर्थात मी पूर्ण प्रयत्न करतो असं होऊ नये. विशेषतः तुमच्या सोबत आणि स्वीटु सोबत असतो तेव्हा... आणि तुमची स्वीटु ही तुम्हाला ज्या अर्थाने स्वीटु आहे त्या अर्थाने ती माझी स्वीटु नाही. इतकी गोड पणजी कोणालाही नाही... म्हणून ती माझी स्वीटु आहे. त्यामुळे तुम्हाला पटलं नाही तरी मी तिला स्वीटुच म्हणणार." खदाखदा हसत जनमेजय म्हणाला. "पंजू, मला खरंच इथे तुमच्या सर्वांच्या सोबत राहायला आवडतं. त्यामुळे माझा अभ्यासाचा वेळ आणि शाळेचा वेळ सोडला तर मी इथेच पळून येतो. एक सांगू का? मला तुमच्या वानप्रस्थाश्रम विभागातील संपूर्ण निसर्गासोबत ही कल्पना खूप आवडते. ही मातीची घरं, नैसर्गिक प्रकाश जास्तीत जास्त घरात येईल असे झरोके, भरपूर झाडं; आणि सर्वात महत्वाचं म्हणजे इतक्या प्रकारचे प्राणी -पक्षी अत्यंत मोकळेपणी आपल्यासोबत राहातात. हे एकूणच सगळं कितीतरी छान आहे पंजू."

"आहे खरं छान. पण आता तू इथून पळ बघू बेटा. तुझ्या आईने निरोप धाडला आहे; जेवून अभ्यासाला बसायची वेळ झाली आहे तुझी." मागून आवाज आला. सिध्दार्थ आणि जनमेजयाने एकाचवेळी मागे वळून बघितलं आणि "माझी स्वीटु" असं म्हणून हसायला लागले.

"पुरे झाला तुमचा दोघांचा चावटपणा. सिध्दार्थ तुला किती वेळा सांगितलं आहे; याला पळवून लावत जा चार वाजायच्या अगोदर हा इथे आला तर. स्वतःच्या लेकाच्या आणि नातवाच्या बाबतीत कडक राहिलास; पण पणतू तुला सहज गुंडाळून ठेवायला लागला आहे. आता मात्र तू खरंच म्हातारा झालास हं." पुढे येऊन जनमेजयाच्या पाठीत हलकासा धपाटा घालत आणि सिध्दार्थच्या शेजारी बसत कृष्णा म्हणाली. "अग स्वीटु..." जनमेजय काहीतरी बोलायला गेला पण त्याच्याकडे बघून त्याच्या ओठांवर बोट ठेवत कृष्णा म्हणाली; "हे बघ, आता माझ्या हातात जोर नाही राहिला त्यामूळे तुला आत्ता जो धपाटा बसला आहे तो म्हणजे कौतुक वाटलं असेल. पण घरी जाऊन तुझ्या बाबाला विचार या धपट्याचा अर्थ. तुझा आजा असता तर कदाचित त्याने तर तुझ्या पंजूच्या धपाट्याचे किस्से पण सांगितले असते. बरं ते जाऊ दे. पळ बघू तू आता. तुझी आई वाट बघते आहे."

खुदकन हसत तेरा वर्षाचा जनमेजय बाकावरून उठला आणि वेलांनी आच्छादलेल्या फटकातून बाहेर पडला.

"सिध्दार्थ, तू त्याला इथे फार अडकवून ठेवत जाऊ नकोस." तो जाताच सिध्दार्थकडे वळत कृष्णा म्हणाली.

आपल्या वृद्ध हातांमध्ये तिचे सुरकूटलेले हात घेत सिद्धार्थ म्हणाला; "अग, तो आणि त्याचे मित्र येतात इथे हे खूप महत्वाचं आहे. त्यांना आपण केलेला विचार फक्त आवडून नाही चालणार... तो त्यांनी पुढे नेला पाहिजे. त्यामुळे त्यांना केवळ आपले अनुभवच नव्हे तर त्यामागील आपला अभ्यास आणि इतका मोठा निर्णय घेऊन निर्माण केलेलं हे जग कळलं पाहिजे."

"मला मान्य आहे सिध्दार्थ. अभिमन्यूच्या आकसमिक मृत्यूनंतर तू किती सैरभैर झाला होतास ते मी कधीच विसरू शकणार नाही. अगदी महाभारतीय परिस्थिती प्रमाणे आपली स्थिती झाली होती. अर्थात मृण्मयीने; त्याच्या पत्नीने; आपल्याच सोबत राहायचा निर्णय घेतला आणि परीक्षिताचा जन्म झाला. अभिमन्यु नाव आपण हौसेने ठेवलं पण मग परीक्षित आणि आता हा जनमेजय... ही दोन नावं तुझा आग्रह म्हणून." असं म्हणून कृष्णा हसली.

"कृष्णा, पुरणकाळातल्या जनमेजया नंतर किंबहुना जनमेंजया पासूनच कलियुगाने चंचुप्रवेश केला होता. त्यावेळी हळूहळू मानवीय मानसिकता बदलायला लागली होती. पण तो बदल इतका सूक्ष्म होता की तो लक्षात येईपर्यंत समाजाची एकत्रितपणे आणि मनुष्याची वयक्तिक पातळीवरील विचारसरणी आणि वागणं बदलून गेलं होतं. परीक्षिताने न्यायाने राज्य केलं आणि जनमेंजयाने होणारा ह्रास फक्त उघड्या डोळ्यांनी बघितला. केवळ एकाच पिढीच्या अंतराने अचानक झालेला बदल. कृष्णा, ज्याप्रमाणे आपल्या बाबतीत एक कालातीत अनुभव घडला; कदाचित त्यावेळी परीक्षिताला किंवा जनमेंजयाला देखील सूचित केलं गेलं असेल. पण तुला एक सांगू का; आजवरच्या माझ्या आयुष्यातल्या अनुभवांनंतर माझ्या मनाची खात्री पटली आहे की प्रत्येक काळ स्वतःचा महिमा स्वतः निर्माण करत असतो. कोणीही कोणाचाही पालक किंवा चालक असत नाही किंवा कोणाचंही नशीब कोणीही बदलू शकत नाही; हे त्रिकालाबाधित सत्य आहे."

"आणि तरीही आपली भेट घेतली गेली सिध्दार्थ! किती वर्षं झाली त्या घटनेला?" कृष्णा विचार करत म्हणाली.

"एकहत्तर वर्ष झाली." सिध्दार्थ म्हणाला. त्याच्या त्या उत्तराने कृष्णाने त्याच्याकडे वळून बघितलं. तिच्या डोळ्यात अनेक भाव होते.... इतकी वर्षं?! तुला अचूक कसं लक्षात आहे?! आपण खरंच खूपच म्हातारे झालो आहोत!!!

इतक्या वर्षांच्या सोबतीमुळे सिध्दार्थला तिचे डोळे नीट वाचता यायला लागले होते. प्रत्येक भाव लक्षात आल्याने सिध्दार्थने तिच्या खांद्यावर हात ठेवून तिला थोपटलं आणि म्हणाला; " कृष्णा, आपण जेमतेम पंचविशीत होतो जेव्हा ती पेटी आपल्याला मिळाली आणि ते अनुभव! त्यानंतर वर्षभरात आपलं लग्न झालं आणि लगेचच्या वर्षी तर अभिमन्यूचा जन्म झाला. अभिमन्यू सव्वीस वर्षांचा असताना तो अपघात घडला. मृण्मयी वाचली पण आपला अभि आपल्याला सोडून गेला. तीन महिन्यात परीक्षिताचा जन्म! जनमेजय झाला तेव्हा परीक्षित अठ्ठावीस वर्षांचा; आणि आता जनमेजय तेरा वर्षांचा. मोज बघू! आपण आत्ता चौऱ्याण्णव वर्षांचे आहोत....

कृष्णा.... आपल्या आयुष्यात हा जो अनुभव आला तो आपण अभिमन्यूला सांगितला होता. कसं कोण जाणे पण त्याच्या मानत एकदाही असं आलं नाही की आपण काहीतरी खोटं किंवा आपल्याच मनातलं अतिरंजित काहीतरी सांगतो आहोत. परीक्षिताला सांगितलं तेव्हा देखील त्याने त्यावर विश्वास ठेवलाच की... आणि आपला जनमेजय! तो तर रोज काही ना काही कारण काढून तोच तो अनुभव मला परत परत सांगायला लावतो. पण तरीही त्याने अविश्वास नाही दाखवलेला कधीही.

कृष्णा, आपल्याला मुनी व्यासांनी आदेश दिला होता की 'धर्माचा आणि पर्यायाने मानवीय अस्तित्वाचा होणारा ह्रास थांबवा. त्यासाठी तुम्ही काय करायला हवं ते तुम्हाला नक्की सुचेल.' त्यांना आपल्या भविष्यकाळाची पावलं समजली असतील कदाचित. म्हणूनच त्यांनी आपल्याकडे त्यांचं मन मोकळं केलं असेल. पण एक भगवन व्यास सोडले तर इतरांशी झालेला संवाद खूप वेगळ्या भावनिक पातळीवरचा आहे.

महात्मन बिभीषण म्हणाले होते की 'माझी न्याय सम्मत संसार निर्मितीची उर्मी श्रीरामांच्या लक्षात आली आणि त्यांनी माझा हाच विचार पुढील पिढ्यांमध्ये मी रुजवावा यासाठी मला चिरंजीवित्व दिले. पण आज मी माझ्या उद्दिष्टापासून अनेक दशके दूर गेलो आहे... आणि तरीही चिरंजीवित्व वागवतो आहे. सिद्धार्थ, तुला भेटण्याचे हेच एक प्रयोजन आहे... तू एका वेगळ्या प्रवासाला निघतो आहेस. त्यामुळे या प्रवासादरम्यान जर तुझी गाठ अशा व्यक्तीशी झाली की ती व्यक्ती या माझ्या चिरंजीवित्वाचा परत एकदा विचार करू शकणार असेल; तर माझ्या मनातील व्यथा तू नक्की त्या व्यक्तीपर्यंत पोहोचव.'

काहीशी तशीच व्यथा गुरू कृपाचार्यांची होती. त्यांनी देखील मला जे सांगितलं ते शब्दशः मला आठवतं आहे. 'ज्ञान हे दान आहे आणि दाता आणि युयुत्सु दोघेही आपापल्या जागी योग्य असणे आवश्यक आहे; हे सार्वभौम सत्य लयाला जाते आहे. अशा या काळामध्ये जिवीतकार्यहीन असे हे माझे जीवन मला किंकर्तव्यमूढ करते आहे. त्यागणे शक्य नाही आणि जगणे नाकारावे तर ते कोणापुढे या प्रश्नाने मी ग्रासलो आहे. पुत्रा... सिध्दार्थ... तुझ्या या नवीन प्रवास कार्यामध्ये जर खरंच तुझी भेट त्या सर्वसाक्षी परमपित्याशी झालीच... तर माझ्या मनीची व्यथा उद्धकृत नक्की कर.'

याचा अर्थ महात्मन दोघांना एका उद्दिष्टासाठी चिरंजीवित्व मिळाले होते. मात्र या कलियुगामध्ये ते दोघेही त्या उद्दिष्टाप्रत पोहोचत नव्हते. त्यामूळे ते व्यथित होते.

बळी राजाचं दुःख खूपच वेगळ्या पातळीवरचं होतं. कृष्णा, तुला मी अनेकदा म्हंटलं आहे की तू पातालराज बळींना बघूच शकली नसतीस. त्यांचं शरीर जितकं जराजर्जर झालं होतं त्याहून जास्त त्यांचं मन प्रत्येक दिवस मोजत असल्याने दुःखी होतं. ते म्हणाले होते; 'मी यमराजाला माझ्यापर्यंत पोहोचण्यास मज्जाव केला; श्रीविष्णूंना माझ्या सीमेचे द्वारपाल करून. मात्र मर्त्य मानवाला हळूहळू का होईना शरीर ह्रास सहन करत वृद्धत्वाकडे वाटचाल करावीच लागते... हे त्याक्षणी विसरून गेलो होतो. पण विधिलिखित कोणाला टळतं का? दुर्दैवाने मला उमजलेलं हे सत्य मी पुढील मर्त्य मानवापर्यंत पोहोचवू शकत नाही; ते केवळ माझ्या या जराजर्जर शरीरामुळे. म्हणूनच तुला विनंती करण्यास आलो आहे की पुढील प्रवासात जेव्हा कधी तू त्या आदिशक्तीला भेटशील तर माझी व्यथा नक्की सांगावीस.'

राजा बळींना काळाच्या अंतापर्यंत जगण्याचं कोणतंही उद्दिष्ट नव्हतं; मात्र हेच त्यांचं दुःख होतं."

"सिध्दार्थ या तिघांचं दुःख तू बघितलं आहेस; आणि त्यांची एका वेगळ्या पातळीवरची मागणी देखील आपल्याला पटली आहे. मात्र भगवन परशुरामांचे विचार अत्यंत स्पष्ट आणि स्वच्छ होते. ते म्हणाले होते; 'एकूणच सर्वस्वाचा अंत नक्की आहे... मात्र मानवजातीला काहीतरी देणं लागतात तुमच्यासारखे. त्याची जाणीव लवकर व्हावी तुम्हाला हीच त्या परमपित्याकडे मागणी करतो.' त्यांना स्वतःसाठी काहीच नको होतं. केवळ त्यांनाच नाही तर भगवन हनुमंत देखील आपल्याकडून काहीही अपेक्षित करतच नव्हते. जाता जाता ते फक्त इतकंच सांगून गेले; 'आजच्या काळामध्ये ज्याची अवहेलना सतत होते असे भक्तीरूप; तन-मनात साठवून आपल्या उद्दिष्टाशी तादात्म्य ठेवा मानवांनो!'

अश्वत्थामांचं दुःख मात्र यासगळ्याहून वेगळंच. 'मी तुमची भेट घेतो आहे ते; आपली सद्सद्विवेक कायम जागृत ठेवा आणि भक्तीरूप विश्वासाने आयुष्य क्रमित करा हे सांगायला. मनात इच्छा असूनही मी माझ्या चिरंजीवित्व नाकारू शकत नाही हे दुखरं टोचर सत्य मी आयुष्यभर वागवतो आहे. तुम्ही अशा कोणत्याही पापाचे भागीदार होऊ नका.'

भगवन परशुराम, हनुमंत आणि अश्वत्थामा यांचं आपल्याकडे मागणं काहीही नव्हतं." कृष्णाने पुढच्या तिन्ही चिरंजीवाचे अनुभव परत एकदा डोळ्यासमोर उभे केले होते.

"तरीही कृष्णा, जर अभिमन्यु आपल्या सोबत असता तर आज जे आपण उभं केलं आहे ते केलं नसतं. कदाचित आपण अति सामान्य आयुष्य जगत हाच विचार करत राहिलो असतो की भगवन व्यास आपल्याला म्हणाले तशी संधी कधी येईल. मात्र अभिमन्यु गेला आणि..........."

"आणि आम्ही आलो.......... आजी, आजोबा आता तरी तुम्ही तेच ते बोलणं बंद करा बघू." त्यांच्या समोर उभा राहिलेला उंचा-पुरा परीक्षित म्हणाला. त्याला समोर बघितल्या बरोबर कृष्णाने हसत म्हंटलं; "तुझं येणं बघून घड्याळ स्वतःची वेळ लावून घेत असेल परीक्षित. चार वाजले न? बरं! तू बस् इथे मी जरा काही कामं उरली आहेत ती पूर्ण करून येते." असं म्हणून कृष्णा बाकावरून उठली.

कृष्णा त्यांच्या मातीने बांधलेल्या घराचा दिशेने गेली. ती गेली त्या दिशेने बघत परीक्षित म्हणाला; "आजोबा, तुम्ही खरंच नशीबवान आहात की तुम्हाला समजून घेणारी सहचारणी मिळाली."

"हो रे बाबा, म्हणून तर इतका मोठा पसारा निर्माण करू शकलो आणि आजही निभावून नेतो आहे." सिध्दार्थ हसत म्हणाला. "अभि गेला आणि मन सगळ्यातूनच उडून गेलं होतं. त्यावेळी कृष्णानेच मला सुचवलं होतं की व्यवसाय आणि घर विकून आपण काहीसं दूर मोठी जागा घेऊन वृद्धाश्रम सुरू करूया. मला ते पटलंच. तू दोन वर्षांचा होतास; आम्ही सगळं आवरायला घेतलं आणि त्याचवेळी मृण्मयीने आम्हाला सांगितलं की तिच्या आयुष्यात कोणीतरी आहे. तिच्या इच्छेनुसार आम्ही तीच लग्न लावून दिलं. तू आमच्या जवळ वाढलास; शिक्षण घेतलंस आणि अगदी परदेशात जाऊन पुढचं शिक्षण घेऊन आलास."

"आजोबा, तुम्हा दोघांकडे बघून आणि तुमची मेहेनत बघूनच मी ठरवलं होतं की आवश्यक पैसा कमावायचा असेल तर शिक्षण हवं. मात्र इथे परत आलो आणि आपण तिघांनी ही स्वप्ननगरी उभी केली."

"परीक्षिता जेव्हा सुरवात केली त्यावेळीच ठरवलं होतं इथे काहीतरी असं करायचं की मरताना समाधान भरून राहील मनात. अगोदर समोरच्या भागामध्ये आपण दोनच इमारती बांधल्या. कसा असेल प्रतिसाद याचा विचार सतत करत होतो आम्ही. पण आम्ही जाहिरात दिली आणि सहा महिन्यात दोन्ही इमारती भरल्या. ते ही आपण बांधून दिलेले सर्व नियम मान्य करून." सिध्दार्थने असं म्हणताच परीक्षिताने हसत टाळीसाठी हात पुढे केला. "आजोबा तुमचे नियम? आहो त्याला हट्ट म्हणतात. या आपल्या 'सत्यतापर जगत' मधलं सामाजिक व्यवस्थेचं आयुष्य 1985 मध्ये पोहोचून थांबलं आहे; ते तुम्ही ठरवलं म्हणून. त्यावेळी केवळ दोन इमारतींनी सुरवात केली आपण. पण आज इथे पंधरा मजली जवळ जवळ अठ्ठावीस इमारती आहेत. प्रत्येक मजल्यावर चार घरं. शाळा देखील आपण सगळ्या परवानग्या घेऊन सुरू केली; त्याला देखील बरीच वर्ष झाली आता."

"परीक्षिता, तू मोठा झाला असलास तरी माझ्याहून नाही हं." हसत हसत सिध्दार्थ म्हणाला. "अरे माझे हट्ट नाही रे... पंचमहाभूतांची आवश्यकता असं म्हण हवं तर. तुम्ही आजच्या काळातील मुलं अनेक गोष्टी मान्यच करणार नाहीत. पण साधारण 1985 च्या कालखंडात एका इमारतीमध्ये किमान एक असे दूरध्वनी आले होते. म्हणजे दूरवरचा संवाद आवश्यकतेनुसार होऊ शकत होता. इतर आवश्यक उपकरणं देखील होतीच. त्यामुळे मी अभ्यासपूर्वक विचार करून आणि अनेकांशी बोलणं करून मग ठरवलं की इथे राहणाऱ्या कुटुंबांनी एका प्रमाणापलीकडे नवीन उपकरणं वापरायची नाहीत. लोकांनी ते मान्य केलं आणि एक एक करत या इमारती आणि त्या अनुषंगाने आवश्यक अशा सुखसोयी निर्माण झाल्या."

"पंजू, परत एकदा सांगा ना कोणती पंच महाभुतं ते." तिथेच घुटमळणारा जनमेजय म्हणाला आणि हसत सिध्दार्थने सांगितलं; "पृथ्वी, आकाश, वायू, अग्नी आणि जल ही पंच महाभुतं आहेत. अत्यंत वंदनीय असा हा निसर्ग असूनही आपण त्यांना भुतं का म्हणतो माहीत आहे का?" सिध्दार्थने जन्मेजयला विचारलं.

"अरे कमल करता पंजू तुम्ही. तुम्हीच तर सांगितलं आहे; कोणतंही कारण नसताना यातील एक जरी डळमळलं तर मानवी जीवनाचा संपूर्ण ह्रास होईल. त्यामुळे ही पंच माहाभुतं आणि पुढील पिढी यांच्यातील दुवा म्हणून जितकं जमेल तेवढं कर्तव्य करणे." हसत जनमेजय म्हणाला. "पण तरीही सांगू का पंजू.... तुम्ही हा वानप्रस्थाश्रम सुरू केला आहात ना तो सर्वात मस्त आहे. मला तर इथेच येऊन राहावंसं वाटतंय."

"तुला खुपकाही कायमच वाटत असतं बेटा. पण आपण आपल्या....." कृष्णा तिथे येऊन बसली होती ती जन्मेजयला काहीतरी सांगायला सुरवात करत होती. पण तिचं वाक्य अर्धवट तोडत जनमेजय म्हणाला; "आपण आपल्या त्या त्या वयातील कर्तव्य आणि जवाबदाऱ्या पूर्ण करून मगच पुढचा विचार करायचा असतो... माहीत आहे ग स्वीटु." त्याची बडबड ऐकून सगळेच हसले.

"माहीत आहे न? मग सहा वाजले. पळ बघू तुझ्या घराकडे."कृष्णा म्हणाली आणि जनमेजय आपल्या इतर मित्र-मैत्रिणींना हाक मारायला गेला. इथे राहणारी सर्वच तरुण मंडळी आणि त्यांची पिल्लं चार ते सहा या वेळात वानप्रस्थाश्रमात येऊन आपापल्या आई-वडिलांना भेटून जात होती.

सत्तर एकर जमिनीवर पसरलेला हा पसारा सुरू झाला होता तेव्हा सिध्दार्थ आणि कृष्णाने शहरातलं सगळं विकून टाकून एक स्वप्न साकारायला सुरवात केली होती. अगोदर जेमतेम दोन इमारती असणारी सुरवात आता पंधरा मजल्याच्या एकूण अठ्ठावीस इमारतींची निर्मिती करण्यात आली होती. सरकार दरबारी धावपळ करून शाळा बांधली होती. काय सोयी नव्हत्या या ठिकाणी? आणि तरीही 1900 मध्ये काळ थांबला होता काहीसा. मात्र आता इथे घर मिळावं म्हणून अनेक लोक वाट बघत होते. जास्तीत जास्त निसर्गाच्या सानिध्यातल्या आयुष्याचं महत्व आता लोकांना पटायला लागलं होतं.

आपण लावलेलं रोपटं इतकं सुंदर वाढतं आहे हे बघून सिध्दार्थ आणि कृष्णा समाधानी झाले होते. सहाच्या पुढे काटा सरकायला लागला आणि वानप्रस्थाश्रमामधीली माणसांच्या पिल्लांची किलबिल कमी होत गेली. त्यानंतर थोड्याच वेळाने प्राणी आणि पक्षी देखील त्यांच्या गप्पा आवरून शांत व्हायला लागले. इतर अनेक वृद्ध जोडपी देखील आपापल्या घराकडे वळली.

कृष्णाचा हात हातात घेऊन सिध्दार्थ देखील त्याच्या घराकडे वळला. मोजून चार पायऱ्या होत्या. त्या चढताना मात्र त्याने त्याचा वेळ कमी केला. कारण....... फक्त दार लोटून घेतलेल्या घरातून महामृत्युंजयाच्या जपाचा आवाज त्याला ऐकू यायला लागला.

कृष्णाकडे बघत मिश्कीलपणे सिध्दार्थ म्हणाला; "हा जप आपल्यासाठी की अलीकडे त्यांच्यापैकी काहींच्या अधून मधून होणाऱ्या भेटींपैकी एक?"

सिध्दार्थकडे हसत बघत कृष्णा म्हणाली; "परीक्षित आणि जनमेजय आला त्यावेळी मी घराकडे गेले ते ह्याच कारणासाठी. आज...."

"अहं, तू नको सांगूस.... चल दोघे आत जाऊ! मला प्रत्यक्षात दर्शन घेऊ दे." सिध्दार्थ म्हणाला आणि लोटलेलं दार उघडून त्याने घरात पाऊल टाकलं.

समाप्त







Friday, October 29, 2021

चिरंजीवी (भाग 7)

 चिरंजीवी


भाग 7

हॉस्पिटल मधून discharge मिळाल्यानंतर सिद्धार्थ घरी आला. त्याला काही दिवस संपूर्ण विश्रांती घेण्यास सांगितलं होतं. त्यामुळे तो कुठेही बाहेर जाणं शक्य नव्हतं. कृष्णाने एक दोन दिवस घरी आराम केला खरा.. पण मग ती रोज संध्याकाळी सिध्दार्थकडे जायला लागली. दहा दिवस झाले होते. सिद्धर्थच्या अनेक टेस्ट्स करण्यात आल्या होत्या. झालेल्या अपघाताचा कोणत्याही प्रकारचा परिणाम त्याच्या शरीरावर झालेला नाही न याची खात्री करण्यासाठी हे सगळं करण्यात आलं होतं. सिध्दार्थ या प्रकाराला कंटाळला होता. कारण या सततच्या हॉस्पिटलच्या वाऱ्यांमुळे तो कृष्णाशी कोणत्याही विषयावर निवांतपणे बोलू शकत नव्हता. त्याचा अस्वस्थपणा तिला कळत होता पण तिला देखील त्यावर उपाय सुचत नव्हता.

कृष्णाला सिध्दार्थला घराबाहेर काढायचं होतं. पण त्याचे वडील त्यासाठी परवानगी देत नव्हते. कृष्णला सिध्दार्थला घराबाहेर का न्यायचे आहे त्याचं कारण माहीत असूनही सिध्दार्थची आई देखील नकार देत होती. कृष्णा अगदीच हवालदिल झाली होती. त्यात एकदिवस तिला तिच्या कॉलेजमधून फोन आला की तिची अटेंडेन्स कमी पडायला लागली होती. परीक्षा द्यायचा विचार असेल तर तिने एकदा कॉलेजमध्ये जाणं आवश्यक होतं. कृष्णाने सिध्दार्थला फोन करून सांगितलं की आज तिला यायला थोडा उशीर होईल; कारण ती कॉलेजमध्ये जाऊन येणार आहे.

कॉलेजमध्ये कृष्णा तिच्या सरांना भेटली आणि तिने अपघाताचं कारण सरांना सांगितलं. त्यांना देखील ते पटलं कारण कृष्णाच्या कपाळावरची जखम दिसत होती. सरांना भेटून कृष्णा लायब्ररीमध्ये जायला वळली. सध्या कॉलेजमध्ये येणं शक्य नाही हे तिच्या लक्षात आलं होतं; त्यामुळे किमान काही पुस्तकं घेऊन जाऊन जमेल तसा घरीच अभ्यास करायचं तिने ठरवलं होतं. त्याप्रमाणे तिने हवी ती पुस्तकं मागून घेतली आणि ती निघाली.

कृष्णा तिच्या गाडीजवळ पोहोचली तर तिच्या गाडीला टेकून एक व्यक्ती उभी होती. पांढरीशुभ्र दाढी, धोतर आणि स्वच्छ पांढरा कुर्ता असा त्यांचा पेहेराव होता. कृष्णाने एकदा त्यांच्याकडे बघितलं आणि स्वतःची गाडी उघडली.

"कृष्णा, मी ऋषी पराशर आणि माता सत्यवती यांचा पुत्र व्यास. माझी ओळख वेद व्यास अशी देखील आहे. मला तुझी आणि सिध्दार्थची भेट घ्यायची आहे. हे कसं शक्य होईल?" व्यासांनी अत्यंत शांतपणे कृष्णला विचारलं.

'आपल्या समोर उभी असणारी व्यक्ती खरंच वेद व्यास आहे का?' कृष्णाच्या मनात प्रश्न उभा राहिला.

"मुली, अत्यंत स्वाभाविक आहे तुझ्या मनात हा प्रश्न येणं. हेच तर भगवान हनुमान सांगत होते. विश्वास असणे हे जीवनावश्यक सत्य आहे. स्थिर मनासाठी आणि वाहत्या जीवन प्रवासासाठी विश्वास ही भावनिक गरज आहे. हा विश्वास केवळ पूर्ण भक्तीतून येतो. तू सध्या महाभारतीय युद्धातील पांडव पुत्र संहार या विषयाचा अभ्यास करते आहेस ना... मग त्यातलंच एक उदाहरण देतो...

अर्जुनाने ज्यावेळी समोर युद्धासाठी उभे असलेले सर्व आप्त बघितले आणि त्याने युद्धास नकार दिला. त्यावेळी श्रीकृष्णाने त्याला जीवन सार सांगितले. मुली, हे काही 'पी हळद आणि हो गोरी'; इतके सोपे नसते. जरी श्रीकृष्णाने भगवत गीतेच्या स्वरूपात जीवन सत्य उघड केले होते तरी युद्धभूमीवर उभा अर्जुन त्यावेळी शिष्य दशेमध्ये नव्हता. त्यामुळे गीतेमध्ये कथित केलेल्या जीवन सत्याची उपरती होऊन अर्जुन युद्धास तयार झाला.... यापेक्षा थोडा असा विचार पटतो का बघ. भगवत गीता अर्जुनाला सांगणारा खुद्द श्रीकृष्ण होता; त्याचा परमप्रिय मित्र! मात्र गीतेमध्ये सांगितलेले विचार हे एका मित्राने दुसऱ्या मित्राला सांगितलेले नव्हते. त्यामुळे युद्धभूमीवर असताना गीतेमधील कर्तव्य आणि सामाजिक जवाबदारी हे मुद्दे किती लक्षात आले असतील अर्जुनाच्या ते सांगता येत नाही. मात्र भावनेच्या दृष्टिकोनातून अत्यंत नाजूक अशा विषयाला आपला मित्र-बंधू एका वैश्विक दृष्टिकोनातून सांगतो आहे हे नक्की अर्जुनाच्या लक्षात आलं. विचारांनी इतका स्थिर असणारा आपला बंधू जर आपल्याला युद्ध करायला सांगतो आहे तर ते योग्यच असेल; या विश्वासातून पुढील परिणामांचा विचार न करता अर्जुनाने युद्धासाठी धनुष्य पेललं. मग या विश्वासाला हनुमंत भक्ती म्हणतील आणि तुम्ही पूर्वानुभवातून आलेलं शहाणपण म्हणा.. पण मूलतः सत्य हेच राहातं की विश्वास होता म्हणूनच अर्जुनाने गांडीव उचललं."

व्यास मुनी बोलायचे थांबले आणि त्यांचं बोलणं पूर्ण लक्ष देऊन एकणारी कृष्णा मंद हसली. "चला, मी सिध्दार्थलाच भेटायला जाते आहे." ती म्हणाली.

***

"अरे काका तुम्ही आज इतक्यात घरी कसे?" घरी पोहोचताच कृष्णाने समोर सिध्दार्थच्या वडिलांना बघून प्रश्न केला.

"अग, वैदेहीचं एक महत्वाचं सेमिनार आहे पुढचे तीन दिवस. म्हणून तिने मला घरी थांबायला सांगितलं आहे. नाहीतर तुम्ही दोघे अगदी बेभरवशाचे आहात. कोणी थांबवायला नाही म्हंटल्यावर लगेच भटकायला बाहेर पडाल." हसत हसत सिध्दार्थचे बाबा म्हणाले.

बोलताना त्यांची नजर कृष्णा सोबत असलेल्या व्यक्तीकडे पडली. कृष्णला ते लक्षात आलं आणि अगदी सहज आवाजात ती म्हणाली; "काका, हे माझे सर आहेत. व्यास सर. सिध्दार्थला ते ओळखतात. त्याला भेटायला आले आहेत ते."

"ओह! ठीक ठीक. म्हणजे तुमच्या गप्पा आता मस्त रंगतील न? एन्जॉय. सर, आता तुम्ही इथे आला आहात तर सिध्दार्थ कुठेही बाहेर जाणार नाही. बरं, मग मी जरा ऑफिसला जाऊन येतो." असं म्हणून ते लगेच निघाले देखील.

व्यास मुनींनी एकदा कृष्णाकडे बघितलं आणि म्हणाले; "हेच सांगायचा प्रयत्न मी करतो आहे. बघ! सिध्दार्थच्या वडिलांचा त्यांच्या कामावर दृढ विश्वास आहे; भक्ती करतात ते त्यांच्या कामाची.. त्यामुळे त्यांच्या समोर साधारण त्यांच्याच वयाची व्यक्ती दिसल्या क्षणी त्यांना आपल्या विश्वासाच्या किंवा भक्तीच्या मागे जाणं जास्त योग्य वाटलं. 'भक्ती' हा शब्द तुम्ही कशा प्रकारे समजून घेता त्यावर 'विश्वास' ही भावना अवलंबून आहे."

एक अत्यंत वेगळा विचार समोर घडलेल्या घटनेतून इतक्या सोप्या प्रकारे त्यांनी सांगितला होता की कृष्णा एकदम सीमित झाली. तिला भानावर आणत मुनी व्यास म्हणाले; "आपण इथे सिध्दार्थला भेटण्यास आलो आहोत मुली."

कृष्णाने पुढे होत त्यांना सिध्दार्थच्या खोलीकडे आणले आणि दार उघडत ती म्हणाली; "सिध्दार्थ, माझ्या सोबत...."

"गुरुवर्य अखेर आपण आलात!" कृष्णाचं वाक्य अर्धवट तोडत सिध्दार्थ पलंगावर उठून बसत म्हणाला.

"पुत्रा, मी येईन हे वचन दिलं होतं तुला स्वप्नात; आणि मी अशा कालातील आहे की चुकून झोपेत देखील दिलेला शब्द पाळण्यासाठी आम्ही सर्वस्वाचा त्याग करतो." मुनी व्यास खोलीमध्ये येत म्हणाले.

कृष्णला त्या दोघांच्या बोलण्यावरून अंदाज आला की सिध्दार्थला स्वप्नामध्येचं मुनी व्यास त्याला भेटायला येणार आहे हे कळले होते. ती काहीएक न बोलता सिध्दार्थच्या शेजारी जाऊन बसली.

"सिध्दार्थ, मुला 'स्वप्नात देखील दिलेलं वचन आम्ही पाळतो' याचा अर्थ तुला समजला आहे का?" मुनी व्यास सिध्दार्थ समोर बसत म्हणाले.

"होय गुरुवर्य." सिध्दार्थने तात्काळ उत्तर दिले.

सिध्दार्थने दिलेल्या उत्तराने कृष्णा एकदम चमकली. त्यावर तिच्याकडे बघत मुनी व्यास म्हणाले; "मुली थोडा धीर धर आणि तुला सर्वच विषयांची उकल होईल." एकदा कृष्णाकडे बघून सिध्दार्थने बोलायला सुरवात केली.

"गुरुवर्य, अपघातानंतर मी घराबाहेर पडू शकत नाही हे मला लक्षात आले. त्यामुळे मी फार अस्वस्थ झालो. पण मग माझ्या मनात आलं, कदाचित या सक्तीच्या विश्रांतीचं देखील काहीतरी प्रयोजन असेल. मी गेली अनेक वर्षे योगाभ्यासकरतो आहे; त्यामुळे ध्यानस्थ बसणे; ज्याला आजच्या आमच्या युगामध्ये मेडिटेशन म्हणतात; सुरू केले. अगोदर काही मिनिटांचे ध्यान करणे मी आत्मसद केले. त्यानंतर हळूहळू मी वेळ वाढवायला लागलो. गुरू कृपाचार्यांनी सांगितले होते की; आत्मविश्वास आणि स्वप्रजल्पनं.... स्वतःशी साधलेला संवाद.... ही दोन सुखी मानवीय आयुष्याची सत्य आहेत. याची अनुभूती मला हळूहळू यायला लागली. मुनिवर, यातूनच मला तुमच्या पर्यंत मनोबलाने पोहोचता आलं. अत्यंत खेदाने मला सांगावंसं वाटतं गुरुवार की या मात्र आजचा मानव या दोन सत्यांपासून दूर जातो आहे; हे दुर्दैव आहे."

"मुला, स्वप्रजल्पनं असणे आणि स्वकेंद्री असणे यात जमीन अस्मानाचा फरक आहे. याचं अत्यंत योग्य उदाहरण म्हणजे महात्मन बिभीषण. रावणासारखा अत्यंत हुशार आणि दशग्रंथी ब्राम्हण; मात्र त्याने लंकेचा उत्कर्ष घडवून आणला आणि स्वप्रजल्पनं ह्रास पाऊन केवळ स्वकेंद्री मानसिकता राहिली त्याची. त्याचे फळ देखील त्याला मिळालेच. बिभीषणांच्या बाबतीत मात्र त्यांनी स्वप्रजल्पनं कधीच सोडले नाही. म्हणूनच श्रीरामांनी ज्यावेळी त्यांना चिरंजीवित्व बहाल केले त्यावेळी त्यामागील मतितार्थ ते समजू शकले होते. किंबहुना म्हणूनच त्यांची याकाळातील किंकर्तव्यमूढता जास्त समजून घेतली जाऊ शकते.

जे सत्य बिभीषणासाठी अबाधीत होतं तेच सत्य बळी राजाच्या बाबतीत देखील लागू होतं. मात्र बळी राजाचा प्रवास स्वकेंद्रीपणा पासून सुरू होऊन स्वप्रजल्पनं पर्यंत येऊन थांबतो. म्हणूनच कृपाचार्य हस्तिनापुराचे राजगुरू होऊ शकले." आपण जे बोलतो आहोत ते सिध्दार्थ आणि कृष्णाला पटतं आहे का याचा अंदाज घ्यायला मुनी व्यास थांबले.

"मुनिवर, गेल्या काही दिवसातील अनुभवांमुळे आम्ही दोघेही समोरच्या व्यक्तीचे विचार स्विकारण्याच्या मानसिकतेमध्ये आलो आहोत. अर्थात सत्यासत्यता समजून घेतल्या नंतरच." मुनिवर बोलण्याचे का थांबले असावेत याचा अंदाज घेऊन कृष्णा म्हणाली.

"मुली, तू आत्ता जे बोललीस न त्यामुळे महात्मन परशुरामांचा निर्णय योग्य होता हे मला पुन्हा एकदा पटलं." मुनी व्यास म्हणाले. त्यांचं बोलणं ऐकून कृष्णा आणि सिध्दार्थ एकदम गोंधळले.

"मुली, भगवान परशुराम यांनी तुला सांगितलं होतं स्वतःला दुय्यम स्थान देऊ नकोस; तू सिध्दार्थहून कोणत्याही बाबतीत कमी नाहीस.. ज्यावेळी या काळातील कोण? असा आम्ही विचार केला त्यावेळी केवळ सिध्दार्थ नाही तर त्याच्या बरोबरीने विचारपूर्वक पाय उचलणारी अशी तू असू शकतेस हे परशुरामांनी आम्हाला संगीतलं होतं.

बरं, नमनालाच घडाभर तेल घटल्यासारखं झालं आहे. माझी आणि तुमची भेट का व्हावी याचं कारण अगोदरच ठरलेलं आहे. त्यानुसार मी माझे विचार तुमच्यासमोर मांडतो आहे...."

असं म्हणून मुनिवर पद्मासन घालून बसले आणि बोलायला सुरवात केली;

आपल्या हिंदू संस्कृतीला स्वतःच्या अस्तित्वावर इतका विश्वास होता की आपण आपल्या धर्मचा प्रचार करण्याचा विचार कधीही केला नाही. परंतु त्याचा परिणाम असा झाला की पुरातन काळापासून अस्तित्वात असलेली आपली संस्कृती आज आपण परदेशीय लोकांडून समजून घेतो आहोत. किती मोठा ह्रास आहे हा आपल्या अस्तित्वाचा. आजच्या पिढीतील अनेकांना 'मी नास्तिक आहे'; हे बिरुद मिरावण्यास आवडतं. मात्र नास्तिकता म्हणजे काय हे समजून घेण्या अगोदर आस्तिकता समजून घेणे जास्त महत्वाचे वाटते मला. मी नास्तिक आहे, धर्म, जात, असमानता मी मानत नाही... असं म्हंटलं की कोणतीही गोष्ट नाकारणे सोपे जाते. प्रामुख्याने धर्म आणि जात या दोन्ही विषयी जितक्या जोरात नकारात्मक तुम्ही बोलाल तितके जनमानसात चर्चिले जाल; ही मानसिकता तर सर्वात धोकादायक.

आपला उज्वल इतिहास बघितला तर सम्राट शंतनु यांनी एका मासे पकडण्याऱ्या स्त्रीशी लग्न केलं. माझा जन्म त्याच स्त्रीच्या गर्भातून आहे. माता सत्यवती आणि पराशर मुनींचा मी पुत्र आहे. म्हणजे मी जन्माने कोळी पुत्र असलो तरीही स्वकर्तृत्वावर महर्षी पदाला पोहोचलो आहे. आज ज्या live in नात्याबद्दल नकारात्मक भावनेने चर्चिले जाते ते त्याकाळात स्त्री-पुरुषाच्या इच्छेचा भाग होता. त्यामुळे सामाजिक बंधनांचा ह्रास होत नव्हता. विवाह संस्था देखील तितक्याच ताकदीने अस्तित्वात होती. याचाच अर्थ स्वीकाराह्यता होती मानवात. जी आजच्या काळात नाहीशी झाली आहे.

विदुर अंबालिकेच्या दासीला माझ्याकडून प्राप्त झालेले पुत्र आहेत. तसेच धृतराष्ट्र आणि पांडू देखील अनुक्रमे अंबिका आणि अंबालिकेला झालेले माझेच पुत्र आहेत. विदुर महान पंडित म्हणून ओळखले गेले तर धृतराष्ट आणि पांडू महान क्षत्रिय होते.

त्यानंतरच्या पिढीतील भीमाने वनवासी हिंडीबेशी विवाह केलाच न! पुत्र प्राप्ति नंतर भीम परत निघून आला. हिडिंबेने स्त्रीसत्ताक राज्य पद्धती सुरू करून आपल्या पुत्राला उत्तम युद्धनीती शिकवली. तोच भीम आणि हिडिंबेचा पुत्र पुढे महाभारतीय युद्धात पांडवांच्या बाजूने लढला.

स्वतः श्रीकृष्णाने राजपुत्र असून दूध विकणाऱ्या पुरुषांसोबत काम केले; तर बलराम शेती करत असत.

थोडक्यात सांगायचं तर पुराण काळापासूनच कोणतीही व्यक्ती जन्माने त्यांच्या आयुष्याचं कर्तव्य ठरवत नसे... तर त्याचे कर्तव्य त्यांची ओळख ठरवत असे.

परंतु आज मात्र धर्म, जात, लिंगभेद यामध्येच समाजमन अडकून गेलं आहे. त्यामुळे प्राचीन इतिहास असणाऱ्या स्वतःच्याच धर्माचा अभ्यास करण्याची इच्छा आणि उर्मी उरलेली नाही. मुलांनो.... स्वतःच्या मूळ अस्तित्वाचा जेव्हा आपल्याला विसर पडतो आणि आपण ते नाकारू लागतो त्यावेळी मनुष्य कर्तव्यहीन आणि अल्पायु होतो. हाच मोठा फरक आहे... चिरंजीवित्व आणि मानवीय आयुष्यात.

त्यामुळे मी चार वेदांचा रचिता मुनी व्यास... सातवा चिरंजीवी तुम्हा दोघांना हा आदेश देतो आहे की हा धर्माचा आणि पर्यायाने मानवीय अस्तित्वाचा होणारा ह्रास थांबवा. त्यासाठी तुम्ही काय करायला हवं ते तुम्हाला नक्की सुचेल. कधीतरी मार्ग अवघड होईल... कधीतरी तो खुंटला आहे असं वाटेल. पण चालत राहा! कधीही विसरू नका की एखादं दार बंद झालं तर दुसरं नक्की उघडलं जातं. फक्त आपण डोळे उघडे ठेवून दार बंद होऊ द्यायचं नाही; आणि झालंच तर दुसरं दार शोधण्यास सुरवात करायची."

सिध्दार्थ आणि कृष्णला व्यास मुनींनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट पटली होती. मात्र इतक्या मोठ्या विषयाला हात कसा घालायचा हा प्रश्न होता. अर्थात कालौघात सर्वच अशक्य गोष्टी शक्य होतात यावर त्यांचा विश्वास होता.

क्रमशः

Friday, October 22, 2021

चिरंजीवी (भाग 6)

 चिरंजीवी


भाग 6

परशुराम पुढे पुढे चालत होते.. ते गेले त्यादिशेने काही वेळ कृष्णा बघत बसली आणि मग तिची नजर सागराकडे वळली. तिच्याही नकळत ती तिथेच आडवी झाली आणि तिला झोप लागली.

समुद्राच्या गाजेने कृष्णाला जाग आली तेव्हा उजाडलं देखील नव्हतं. आकाशात अजूनही तारे लुकलुकत होते. आपण असे वाळूत का झोपलो आहोत; हे काही क्षण तिच्या लक्षात आलं नाही. पण मग एक एक कडी जोडत गेली आणि आदल्या रात्रीच्या प्रसंगांची साखळी तिच्यासमोर उभी राहिली. सगळं आठवून ती पटकन उभी राहिली आणि भराभर पावलं टाकत घराच्या दिशेने निघाली. ती घरी पोहोचली तरीही सिध्दार्थ झोपलेलाच होता. त्याला उठवण्या अगोदर तिने तिचं सगळं उरकून घेतलं आणि ब्रेकफास्टसाठी सांगून मग त्याला हाक मारली.

"वा मॅडम. उशिरा उठायचं आणि निवांत निघायचं ठरलं असूनही लवकर उठून एकदम फ्रेश तयार होऊन मला हाक मारते आहेस?" सिद्धार्थ म्हणाला.

शांतपणे सिध्दार्थकडे बघून कृष्णा म्हणाली; ''खूप काही सांगण्यासारखं आहे. म्हणून तयारच होऊन बसले. तू पटकन तयार होऊन खाली ये. तोवर ब्रेकफास्ट येईलच. टांगा देखील पोहोचेल."

तिचा आवाज थोडा सिरीयस आहे हे सिध्दार्थच्या लक्षात आलं. पण त्यावेळी काही न बोलता तो उठला. कृष्णा खाली आली आणि ब्रेकफास्टची तयारी नीट आहे न बघितलं. सिध्दार्थ आला आणि दोघे ब्रेकफास्ट करायला बसले.

"सिद्धार्थ, काल संध्याकाळी आपल्याला जी व्यक्ती भेटली होती...."

"Don't tell me Krushna.... seriously? तेच परशुराम होते? खरं सांगू... माझ्या मनात देखील त्यावेळी आलं होतं पण मी काही म्हंटलं नाही. पण तुला कसं कळलं? ओह... ती पेटी! श्लोक वाचलास का तू सकाळी? काय लिहिलं आहे?" सिध्दार्थ बोलायचा थांबत नव्हता. कृष्णाने देखील त्याला बोलू दिलं. तो शांत झाला आणि ती म्हणाली; "सिध्दार्थ, परशुराम मला भेटले. त्यांची identity त्यांनी माझ्यासमोर revil केली."

क्षणभर सिध्दार्थला कळलं नाही की कृष्णा काय म्हणते आहे. पण लक्षात आलं आणि त्याच्या चेहेऱ्यावर आश्चर्य पसरलं. कृष्णाने त्याला शांतपणे आदल्या रात्रीची संपूर्ण घटना सांगितली. सिध्दार्थचा चेहरा अत्यंत समाधानी झाला.

"कृष्णा, खूप मोठी गोष्ट आहे ग ही. एक सांगू का? एक ऋषी कन्या गार्गी हिचं उदाहरण सोडलं तर आपल्याला अशी पुराण कालीन स्त्रियांची नावंच माहीत नाही ज्या पंडिता होत्या. त्याकाळात देखील स्त्रियांना पूर्ण शिक्षणाचा अधिकार होता. होणारे यज्ञ, होम-हवनं, धर्मचर्चा, वाद-विवाद यासोबतच युद्धभूमीवरील सर्व डावपेच त्यांना शिकवले जात असत. पण तरीही याविषयी फार बोललं जात नाही. कितीतरी उदाहरणं आहेत ग अशी. आपण सीतेला त्यागाची मूर्ती म्हणतो. अबला, सहनशीलतेची मूर्ती असंच बरंच काही.... सीता स्वयंवरमध्ये ज्या धनुष्याला रामाने प्रत्यंच्या बांधली आणि त्यावेळी ते धनुष्य मोडून पडलं ते परशुरामांचं होत हे तर आपल्याला माहीत आहे; पण ते राजा जनकाकडे कसा आलं याचा विचार किती लोक करतात? एक अशीही कथा आहे की राजा जनकाला परशुराम भेटण्यास आले होते त्यावेळी त्यांनी त्यांचं धनुष्य राजमहालाच्या बाहेरच ठेवलं होतं. काही वेळाने परशुराम बाहेर आले तर त्या धनुष्याशी सीता खेळत होती. तिने ते धनुष्य लीलया पेललं होतं... ते पाहून परशुरामांनी राजा जनकाला सांगितलं की या धनुष्याला जो प्रत्यंच्या बांधेल तो सीतेसाठी योग्य वर असेल. म्हणूनच तो पण स्वयंवरात ठेवला गेला. याचा अर्थ त्याकाळात देखील परशुराम वेगळ्या विचारांचे होते... किंवा असं म्हणूया की कदाचित आपण बुरसटलेल्या विचारांचे आहोत.... मात्र रामायण काळात स्त्रीला पुरुषांइतकंच महत्व होतं.

अग, इतकंच का... त्या काळातील स्त्रियांना स्वयंवराचा अधिकार होता. स्वयं-वर. स्वतःचा वर निवडण्याचा अधिकार. आपण अंबा, अंबिका, अंबालिका किंवा अशी काही गिनीचुनी उदाहरणं देतो आणि म्हणतो की स्त्रियांचं अपहरण केलं जायचं. अग, पण आपल्याला माहीत असलेल्या कथांमधील पत्रांव्यतिरिक्त भारतवर्षात इतर कोणीच नव्हतं का? हिडिंबेने स्वतः भीमाला choose केलं होतं; द्रौपदी स्वयंवरामध्ये जेव्हा कर्ण मस्यनेत्र वेधण्यासाठी उभा राहिला तेव्हा द्रौपदीने त्याला थांबवलं होतं. याचा अर्थ जरी पण ठेवला असला तरीही तो कोणी स्वीकारायचा ते ठरवण्याचा अधिकार स्त्रीला होता... पुढे श्रीकृष्णाला द्रौपदीचं मन वळवायला लागलं होतं की तिने पाचही पांडवांचा पती म्हणून स्वीकार करावा. याचा अर्थ तिला चॉईस होता नकार देण्याचा! या सगळ्या उदाहरणांवरून हेच तर सिद्ध होतं की त्या काळात देखील स्त्रियांना मानाने आणि बरोबरीने वागवलं जात होतं. त्यामुळे मला मुळीच आश्चर्य वाटत नाहीय की परशुरामांनी तुला निवडलं त्यांचं मन मोकळं करायला.

अर्थात आपल्या मनातला मूळ प्रश्न मात्र अनुत्तरीतच आहे अजून. Why us? Or now we can say; why we?! अर्थात माझा परशुरामांच्या म्हणण्यावर विश्वास आहे; जर आपली निवड झाली आहे; तर त्याचं कारण देखील ठरलंच असेल; आणि योग्य वेळी कळेलच. बरं, चल निघुया न आपण?" असं म्हणून सिध्दार्थ उठला.

कृष्णाला सिध्दार्थच्या समंजसपणाचं कौतुक वाटलं आणि त्याच वेळी तिच्या मनात विचार आला.... सिध्दार्थ समंजस आहे याचं मला कौतुक वाटतंय हीच गोष्ट मुळात किती चुकीची आहे! सिध्दार्थच काय सर्वच पुरुषांनी त्यांची मानसिकता बदलणं हे त्यांचं कर्तव्य आहे आणि आम्ही स्त्रियांनी अशा एखाद्या सिध्दार्थचं कौतुक देखील करणं बंद करणं आवश्यक आहे. स्त्रीने शालीन असावं.... मग पुरुषाने का नाही? शालीनता म्हणजे लाजरी भाऊली नाही तर वागण्यामध्ये आदब असणं... स्वतःचा मान राखून दुसऱ्याला मानाने वागवण. मग असं तर पुरुषांनी देखील वागलं पाहिजे. पुरुष साहसी... स्त्रीला प्रोटेक्ट करणारे.... का? स्त्रीने स्ट्रॉंग असणं का नाही? स्वतःला सांभाळण्यात तिने समर्थ असावं की. मुळात दोघांनी पूरक असावं.... हे जास्त योग्य. कृष्णा अजूनही विचार करत बसली असती; पण सिध्दार्थने तिला हाक मारली आणि ती पटकन उठून बाहेर पडली.'

"कुठे जातो आहोत आपण?" टांग्यात बसल्यावर सिध्दार्थने विचारलं.

"surprise आहे रे. थोडा धीर धर की." कृष्णा हसत म्हणाली; आणि तितक्यात टांगेवल्याने मागे वळत सिध्दार्थला विचारलं; साहेब, जागृत हनुमान मंदिराकडेच घेऊ न सर्वात अगोदर?''

त्याचा प्रश्न ऐकून कृष्णाने कपाळाला हात मारला आणि सिध्दार्थ खळखळून हसायला लागला....

मंदिरातून दर्शन घेऊन दोघेही बाहेर पडले आणि सिध्दार्थने कृष्णाला विचारलं; "तू मुद्दाम.... ''

''Not exactly.... पण या मंदिराबद्दल ऐकलं आणि मनात आलं काय हरकत आहे इथे यायला? इतकंच! कृष्णा म्हणाली.

त्यानंतर वेगवेगळे समुद्र किनारे आणि असंच कोकणाचं निसर्ग सौंदर्य बघत दोघे फिरले. एका घरगुती खाणावळीमध्ये मस्त मासे आणि सोलकढी असं जेवण देखील घेतलं. दोघे घराकडे परतले. रात्री झोपताना सिध्दार्थ कृष्णाला म्हणाला; "मला वाटतंय आपण परत जावं. हे असं इतकं obous करून काहीही होणार नाही आहे.''

कृष्णाला ते फारसं पटलं नाही. पण तिने वाद नाही घातला. जबरदस्तीने सिध्दार्थला इथे अडकवण्यात अर्थ नव्हता. मुळात हा प्लॅन बनवताना इथे चिरंजीवी भेटावेत असं तिच्या मानत नव्हतं... किंबहुना that was not her first priority... यानिमित्ताने दोघांनी एकत्र छान वेळ घालवावा; अशी तिची इच्छा होती. पण सध्या सिध्दार्थ अशा मूडमध्ये नाही आहे; हे तिच्या लक्षात आलं.

दुसऱ्या दिवशी परतीच्या प्रवासात कृष्णा तशी अबोलच होती. पुणे मुंबई एक्सप्रेस वे ला लागल्यावर सिध्दार्थने सहज कृष्णाला विचारलं; "ए, कालपासून ती पेटी तुझ्याजवळच आहे. एकदा बघ तरी त्यावर काही नवीन...."''

एकदम ताठ बसत कृष्णाने सिध्दार्थकडे बघितलं आणि सिध्दार्थच्या काळजात चर्रर्र झालं.

''मी ती पेटी काल पाहाटे समुद्रावर सोडून आले सिध्दार्थ!" कानात गरम तेल पडावं तसे ते शब्द सिध्दार्थच्या कानात शिरले. एक्सप्रेस वे असल्याने तो गाडी थांबवू शकत नव्हता.... पण आता त्याचं मन सैरभैर झालं होतं. कृष्णाला ते लक्षात आलं होतं. 'सॉरी, चुकले, परत फिरुया का' यापैकी कोणताही शब्द ऐकायच्या मनःस्थितीत सिध्दार्थ नाही हे तिच्या पहिल्याच क्षणी लक्षात आलं होतं.

सिध्दार्थने नकळत गाडीचा वेग वाढवला होता.

"सावकाश सिध्दार्थ. चूक होऊन गेली आहे. आपण शांतपणे त्यावरचा उपाय शोधायला हवा आहे." सिध्दार्थने घाट सुरू झाल्यानंतर देखील जेव्हा स्पीड कमी केला नाही तेव्हा न राहून कृष्णा म्हणाली.

तिच्या त्या शांतपणे बोलण्याने सिध्दार्थ एकदम भडकला; नकळत त्याची नजर तिच्याकडे वळली आणि.....

कृष्णाने डोळे उघडले तर तिला वर पांढरशुभ्र छत दिसलं. एका क्षणात पूर्ण भानावर येत ती ताडकन उठून बसली. तिच्या डोक्यातून सण्णकन् कळ गेली आणि डोळ्यासमोर अंधारी आली. ती परत पलंगावर आडवी झाली. तिची आई शेजारीच होती. ती तिच्या जवळ येऊन म्हणाली; ''कृष्णा, बेटा, तुला जाग आली न? कशी आहेस आता?''

''ममा, सिध्दार्थ? कुठंय तो?''
''अजिबात चिंता करू नकोस बेटा. शेजारच्या रूममध्ये आहे तो. अगदी व्यवस्थित आहे. तूच बेशुद्ध होतीस. तो पूर्ण शुद्धीत आहे. In fact accident नंतर गाडीतून उतरून मागून येणाऱ्या गाडीला त्यानेच थांबवलं होतं. पण त्याच्या हाताला फ्रॅक्चर झालंय आणि पाठीला बराच मार लागला आहे. Air bags open झाल्यामुळे दोघेही वाचला आहात.'' आईचं बोलणं ऐकून कृष्णा थोडी शांत झाली.

''मला नक्की काय-काय झालंय? डोक्याला मार आहे. बहुतेक टाके पडले आहेत; हे कळलंय. पण बाकी?'' कृष्णाने विचारलं.

''बाकी काहीही झालेलं नाहीय तुला. थोड्या वेळात दोघांनाही डिस्चार्ज मिळेल. तुझे पपा formalities पूर्ण करण्यासाठीच तर गेलेत.'' कृष्णाची आई तिचा हात हातात घेत म्हणाली.

"म्हणजे मी सिध्दार्थच्या रूममध्ये जाऊ शकते. ok. मॉम प्लीज मला थोडी मदत कर. त्याला प्रत्यक्ष बघितल्या शिवाय माझं मन स्वस्थ नाही होणार." कृष्णा पलंगावरून उठत म्हणाली. आपण काहीही सांगितलं तरी ही ऐकणार नाही; याची कल्पना असल्याने कृष्णाच्या आईने तिचा हात धरला आणि तिला बाजूच्या खोलीच्या दिशेने नेलं. कृष्णा आत गेली आणि तिची आई परत कृष्णाला ठेवलं होतं तिथे आली आणि तिने कृष्णांचं सामान आवरायला सुरवात केली.

''I am really so sorry Sidharth. मला खरंच कळतंय ती पेटी किती महत्वाची होती. ही चूक...'' कृष्णाचं वाक्य मध्येच थांबवत सिध्दार्थ म्हणाला, ''इतका विचार नको करुस कृष्णा; कदाचित आपल्याला येणारा तो जगावेगळा अनुभव आपल्यापुरता इथेच संपत असेल. म्हणून कदाचित तुझ्या हातून ती पेटी तिथेच राहिली असेल. आता परत त्या विषयावर नको बोलूया.'' कृष्णाने सिध्दार्थचा फ्रॅक्चर नसलेला हात हातात घेतला तिचे डोळे भरून आले होते. इतक्यात दोघांचेही आई-वडील खोलीत आले. "कृष्णला discharge मिळाला आहे. पण सिध्दार्थला अजून एक दोन दिवस ओबसर्वशन खाली ठेवण्याचा विचार आहे डॉक्टरचा. इतका मोठा अपघात होऊनही त्याला म्हणावं तसं काहीही झालेलं नाही; हे थोडं unusual वाटतंय त्यांना. So they r keeping him under observation.'' खोलीत येताच सिध्दार्थच्या वडिलांनी माहिती दिली.

''मग मीच थांबते त्याच्या सोबत इथे.'' कृष्णाचा आवाज इतका ठाम होता की तिच्याशी कोणीच वाद घातला नाही.

रात्रीचं जेवण आलं दोघांनी जेवून घेतलं आणि औषध घेऊन सिध्दार्थने डोळे मिटले.

कृष्णा देखील फ्रेश होऊन झोपण्याच्या विचाराने बाथरूममध्ये गेली. तिने हलक्या हाताने तोंड धुवायला सुरवात केली. कोमट पाण्याने ती हळूहळू चेहेरा शेकत होती. तिच्या नकळत वाफ समोरच्या आरशावर जमा होत होती; आणि त्यावर काही शब्द उमटत होते. कृष्णाने मान वर केली आणि तिला समोरच्या आरशावर उमटलेला श्लोक दिसला.

अवशप्त अस्य जायते तद्नंतरम् अनुभूत
तस्मात् अहम् किमर्थम् तादृश मह्यम् मिलति

त्या श्लोकावरून नजर ढळू न देता हाताशी असलेला मोबाईल उचलून तिने झट्कन त्या श्लोकाचा फोटो काढला. जणूकाही तिची नजर ढळली असती तर तो श्लोक गायब झाला असता. फोटो नीट आला आहे याची खात्री झाल्यावर ती झट्कन खोलीत वळली आणि तिने हलक्या आवाजात सिध्दार्थला हाक मारली. त्याला झोप लागली असली तर काय करायचं या विचाराने ती अस्वस्थ झाली होती. पण तिने सिध्दार्थला हाक मारली आणि त्याने डोळे उघडले. कृष्णाने हातातला मोबाईलमधला फोटो त्याच्या समोर धरला. ते काय आहे लक्षात येऊन सिध्दार्थ एकदम उठून बसला आणि कृष्णाला कळायच्या आत पलंगावरुन उतरून बाथरूमच्या दिशेने धावला. सिध्दार्थ पाठोपाठ कृष्णा देखील धावली.

अजूनही समोर श्लोक दिसत होता. सिध्दार्थचे डोळे भरून आले होते आणि तो त्या श्लोकाकडे टक लावून बघत होता. कृष्णा त्याच्या शेजारी उभी राहिली आणि तिने आरशाच्या दिशेने बघितलं. समोरचा श्लोक बघून तिचे डोळे मोठे झाले. त्क्षणी तिने परत एकदा समोरच्या आरशाचा फोटो काढला होता.

सार्वत्रिक सत्य विश्वास अस्तु भक्तिरुपात् निर्मित:!
तत् विश्वास निर्माणार्थम् अस्मात् चिरंजीवी जायते!

सिध्दार्थने तिला परत फोटो काढताना बघितलं आणि विचारलं; ''पहिला नीट नाही का आला?''

''अहं! सिध्दार्थ हा दुसरा आहे.'' कृष्णाने शांतपणे म्हंटलं.

''खरंच?''

''हो!''

''फोटो नीट आलेत?''

''हो!''

''चल न बाहेर. अर्थ समजून घेऊया.'' सिध्दार्थ म्हणाला आणि दोघेही बाहेर आले.

सिध्दार्थ पलंगावर बसला. अचानक केलेल्या हालचालींमुळे फ्रॅक्चर झालेल्या हातातून एकदम कळ आली आणि सिध्दार्थने कळवळून हाताकडे बघितलं.

''कृष्णा..... पटकन.... अजून एक फोटो काढ.''

कृष्णा पुढे झाली आणि तिने फोटो काढला.

सगळ्याच घटना इतक्या वेगाने झाल्या होत्या की दोघेही एकदम स्थितप्रज्ञ होऊन बसले. असेच काही क्षण गेले आणि अगोदर कृष्णा भानावर आली. तिने शेजारीच असलेलं हॉस्पिटलचं नोटिंग पॅड हातात घेतलं आणि सिध्दार्थ समोर ठेवून पेन त्याच्या हातात दिलं. सिध्दार्थने देखील पेन घेतलं आणि तिच्याकडे बघितलं. कृष्णाने पहिला फोटो उघडला आणि श्लोक मोठ्याने वाचला. काही क्षण विचार केला आणि सिध्दार्थकडे बघून म्हणाली "मला जो अर्थ कळतो आहे तो मी सांगते; तू लिही. मग तुझ्या मनातला अर्थ लिहू आणि compair करूया.'' सिध्दार्थने 'बरं' म्हणून मान हलवली आणि डोळे बंद करून कृष्णा अर्थ संगायला लागली.

समजण्यास अवघड परंतु सत्य आले की जो अपराध मागे घेता येत नाही तो समजून होऊ देणे म्हणजे पाप आहे. मी शापित झाल्यानंतर उपरती झाली; असा मी काबरं कोण मला भेटावं.

सार्वभौम सत्य विश्वास आहे जो भक्तितून निर्माण होतो; त्या विश्वासाच्या प्रचारार्थ मी चिरंजीवी आहे.

दोन चिरंजीवांना भेटताच जीवन रहस्य नक्की कळेल.

कृष्णाने डोळे उघडले आणि सिध्दार्थकडे बघितलं. सिध्दार्थ काही वेळ कृष्णाने सांगितलेले अर्थ वाचत होता. तो म्हणाला; ''मला देखील हाच अर्थ लक्षात येतो आहे ग. पण मग पुढे काय?''

बाथरूमच्या दिशेने एक अंधारा कोपरा होता तिथून गंभीर आवाज आला; ''बेटा, जर श्लोक आणि त्यांचे लावलेले योग्य अर्थ समोर आहेत तर त्याअनुषंगाने पुढे होणारी घटना देखील ओघाने आलीच न.''

सिध्दार्थ आणि कृष्णाने एकाचवेळी आवाज येत होता त्या दिशेने बघितलं.

अत्यंत सुदृढ असा एक पुरुष पुढे आला. सर्वसाधारण लोकांपेक्षा खूप जास्त उंची होती त्याची. सावळी कांती अत्यंत तकतकीत होती. दाढी-मिशीने संपूर्ण चेहेरा झाकलेला होता आणि तरीही त्याच्याकडे फार वेळ टक लावणं शक्य नव्हतं. सिध्दार्थ आणि कृष्णा दोघांची नजर खाली झुकली. इतक्यात खोलीबाहेर काहीतरी गडबड झाल्याप्रमाणे आवाज आला आणि अत्यंत स्वाभाविकपणे कृष्णाने उठून दार उघडलं. अनपेक्षितपणे समोर कोणीसं उभं होतं; ते बघून ती दचकली आणि मागच्या दिशेने धडपडली. त्या व्यक्तीच्या मागून नर्सचा आवाज आला; ''मॅडम तुम्ही ठीक आहात न? अहो, हे गृहस्थ आजच इथे ऍडमिट झाले आहेत. अपघात केसच आहे. मोठी जखम आहे कपाळावर. खरं तर त्यांनी आराम केला पाहिजे. पण माझं लक्ष नसताना दोन वेळा खोली बाहेर आले आणि आत्ता तर नजर चुकवून थेट तुमच्या खोलीत...''

नर्सचा आवाज कावरा-बावरा होता. कारण सिध्दार्थ म्हणजे मोठं प्रस्थ आहे याची तिला कल्पना होती. सर्वात मोठी आणि आरामदायक खोली त्याच्या वडिलांनी मुद्दाम मागून घेतली होती. त्यामुळे सिध्दार्थ-कृष्णा डिस्टर्ब झाले असते तर तिची काही खैर नव्हती. कृष्णा काही बोलायच्या आत खोलीमध्ये असलेले गृहस्थ काहीसे मोठ्याने म्हणाले; ''मॅडम, अहो ओळखतो आम्ही त्यांना. येऊ दे त्यांना आत.'' आत देखील कोणी अनोळखी व्यक्ती आहे हे पाहून नर्स अजूनच वैतागली. पण बडी मंडळी म्हणजे रुल्स तोडणारच असा विचार करून खांदे उडवून निघून गेली. कृष्णा दारातून बाजूला झाली आणि..... अश्वत्थामा खोलीच्या आत आले.

''तू ठीक आहेस ना अश्वत्थामा?'' कृष्णाच्या मागून आवाज आला आणि अश्वत्थाम्याने खाली घातलेली मान हलवून होकार दिला आणि तो एका बाजूस जाऊन उभा राहिला. कृष्णाला अचानक एकामागोमाग एक घडणाऱ्या घटना सहन करणं अवघड वाटायला लागलं. ती झट्कन जाऊन सिध्दार्थच्या जवळ बसली.

हनुमंत मंद स्मित करून बोलायला लागले; ''मला कळतं आहे की सकाळपासून तुम्ही दोघेही ज्या अनुभवातून जात आहात त्यामुळे तुम्ही भांबावून गेला आहात. अत्यंत स्वाभाविक आहे ते. परंतु सुरू झालेली घटनांची शृंखला अशी मध्येच थांबवणं शक्य नव्हतं. त्यामुळे आम्ही इथे तुमच्या समोर उभे आहोत. सिध्दार्थ-कृष्णा येत्या काही दिवसांमध्ये तुम्ही वेदव्यास ऋषींना भेटणार आहात. त्याच्या मुखातून बाहेर पडणारी शब्दरूपी मौत्यीके मनाच्या कुपीत जतन करून ठेवा. या भेटींचे प्रयोजन ते तुम्हाला सांगतीलच. पण त्याअगोदर मला तुम्हाला काहीतरी सांगायचे आहे... बेटा, त्रेता युग.... त्यानंतरचं द्वापार... दोन्ही युगं मी अनुभवली आहेत. त्यानंतर अनेक जिवशक्ती उदयास आल्या आणि ह्रास पावल्या. मात्र तुम्ही आज ज्याला भारत म्हणता अशी ही मानवधर्म सर्वोच्च मानणारी भूमी खूप प्रगत पावली आहे. तुमच्या इतका जास्त उदय झालेली संस्कृती दुसरी कोणतीही नाही. परंतु दुर्दैवाने बाह्य शक्ती मिळवण्याच्या नादात तुम्ही मानव आंतरशक्तीचा ह्रास करता आहात. तरीही मानवीय आयुष्य गणनेनुसार तुमच्या नंतरची तिसरी पिढी निसर्गाच्या होणाऱ्या ह्रासाचा अनुभव प्रत्यक्ष घेईल. मग तरीही आम्ही तुम्हाला का भेटतो आहोत. कारण होणाऱ्या बदलांमुळे तुम्ही सारासार विचारबुद्धी देखील गहाण ठेवायला सुरवात केली आहे. याचा अत्यंत वाईट परिणाम तुमच्या आयुष्यावर होतो आहे. मूलतः तुम्ही मानव आयुष्यातील एक अत्यंत महत्वाची भावनिक गरज विसरता आहात. विश्वास!!! तुम्ही जितके शास्त्रीय दृष्टिकोनातून मोठे होत जाल तितके तुम्ही विश्वास या जीवनावश्यक सत्यापासून दूर जाणार आहात. त्यानंतर ह्रासाला सुरवात होईल आणि एकदा उताराला लागलेलं चक्र थांबवता येत नाही. विश्वास जर अढळ ठेवायचा असेल तर मनातील सत्यतेवर पूर्ण विश्वास ठेवा. विश्वास हा केवळ निस्सीम भक्तिमधून येतो; हे त्रिकालाबाधित सत्य देखील विसरू नका. माझ्या येण्याचं प्रथम प्रयोजन अश्वत्थाम्याला तुमच्या पर्यंत पोहोचवणं होतं; आणि आजच्या काळामध्ये ज्याची अवहेलना सतत होते असे भक्तीरूप तन-मनात साठवून आपल्या उद्दिष्टाशी तादात्म्य ठेवा मानवांनो!'' हनुमंत बोलायचे थांबले आणि त्यांच्या आवाजाने भारून गेलेली खोली तशीच उबदार ठेवून ते निघून गेले....

सिध्दार्थ आणि कृष्णाची नजर समोर एका कोपऱ्यात उभ्या अश्वत्थाम्याकडे गेली. काहीसा अंधारा असणारा कोपरा... झुकलेली नजर... काही क्षण तर असेच गेले.

''तुम्ही बसा न."न राहून कृष्णा म्हणाली.

"एक शाप म्हणून चिरंजीवित्व मिळालेला मी... ज्या कारणासाठी श्रीकृष्णाने मला हा शाप दिला ते कारण उराशी घेऊन एक एक दिवस जगतो आहे.''

''महात्मन, जी पुराण कथा आम्हाला माहीत आहे त्याप्रमाणे; आपल्या पिताश्रींचा कपटाने केलेला वध आणि आपला प्रिय मित्र दुर्योधन याचा झालेला मृत्यू यामुळे विवेकबुद्धिपासून दूर जात आपण ब्रम्हास्त्र पांडव पुत्रांवर सोडलंत. त्यांचा संहार आपण केलात म्हणून आपणास चिरंजीवित्वाचा शाप मिळाला. हे खरे आहे का?'' सिध्दार्थने अत्यंत आदरपूर्वक अश्वत्थाम्याला प्रश्न केला.

''हे अर्ध सत्य आहे वत्सा; आणि ते खोट्यापेक्षा देखील जास्त धोकादायक असतं. मी सोडलेलं ब्रम्हास्त्र परत घेण्याचे ज्ञान माझ्याकडे नव्हते. रागाच्या भरात त्याच्या शक्तीचा संपूर्ण विचार मी केला नाही आणि त्याच्याही पुढे जाऊन ज्यावेळी उत्तरेच्या गर्भावर तो वार होणार होता त्यावेळी मी तिथून पळ काढला. माझ्या या कृत्यामुळेच मला चिरंजीवित्वाचा शाप मिळाला. मूलतः सद्सद विवेकबुद्धी दूर करून ज्यांचा मृत्यू झाला होता आणि जे स्वतःच त्यांच्या मृत्यूला कारणीभूत होते; ते केवळ माझे हृदया जवळचे होते म्हणून त्यांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी मी जे कृत्य केले ते अत्यंत निंदनीय होते. त्यातूनही पांडव पुत्रांवर ब्रम्हास्त्र सोडताना त्याच्या शक्तीचा अंदाज मला नव्हता... ही दुसरी गोष्ट आणि केलेल्या कृतीचे परिणाम स्वीकारण्याची मनाची तयारी नव्हती त्यामुळे मी पळून गेलो. यासर्वाचा परिपाक मला शाप मिळाला. जी चूक सुधारता येत नाही किंवा माफीच्या लायकीची नसते ती चूक म्हणजे महान पाप आहे. याची उपरती मला शाप मिळाल्यानंतर झाली. आज मी श्रीहनुमंतांसोबत तुम्हाला भेटायला आलो आहे; त्याचं कारण म्हणजे कदाचित तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलून जाणार आहे. मात्र आपली सद्सद्विवेक कायम जागृत ठेवा आणि भक्तीरूप विश्वासाने आयुष्य क्रमित करा हे सांगायला. मनात इच्छा असूनही मी माझ्या चिरंजीवित्व नाकारू शकत नाही हे दुखरं टोचर सत्य मी आयुष्यभर वागवतो आहे. तुम्ही अशा कोणत्याही पापाचे भागीदार होऊ नका... "

अश्वत्थअमा बोलण्याचा थांबला. सिध्दार्थ आणि कृष्णा त्याचं बोलणं मन लावून ऐकत होते. ते बोलायचे थांबले आणि सिध्दार्थ आणि कृष्णाचे डोळे आपोआपच मिटले गेले.

सकाळी जाग आली तेव्हा कृष्णा सिध्दार्थच्या कुशीत झोपली होती आणि खोलीमध्ये आशावादी स्वच्छ प्रकाश पसरला होता.

क्रमशः

Friday, October 15, 2021

चिरंजीवी (भाग 5)

 भाग 5


सिध्दार्थला बळी राजाच्या बोलण्याचा मतितार्थ कळला आणि हातातली पेटी सावरत एकदाही मागे वळून न पाहाता तो पुढे निघाला.

ओढ्याच्या बाजूने चालताना नकळत सिध्दार्थ सतत पेटीवरील श्लोकाकडे बघत होता. 'कदाचित श्लोक बदलेल आणि पुढील चिरंजीवी आपल्याला या काही मिनिटांच्या प्रवासात भेटेल'; असं त्याला सतत वाटत होतं. पण तसं काही न होता सिध्दार्थ मचाणपर्यंत पोहोचला. मधली बॅरिकेट्स पार करत त्याने परत एकदा मचाणच्या आवारात प्रवेश केला आणि रेस्टॉरंटच्या दिशेने चालायला लागला. समोरूनच हॉटेलचा मॅनेजर येत होता; तो स्वतः पुढे आला आणि त्याने सिध्दार्थला शेक हॅन्ड केलं आणि म्हणाला; "नमस्कार सर, आपली गाडी तयार आहे आणि इथे पार्किंगमध्ये येऊन उभी आहे. गाडीच्या सर्विसिंगचे जे काही पैसे झाले आहेत ते मचाणकडून भरले गेलेले आहेत. आपल्याला झालेल्या त्रासाबद्दल आम्ही दिलगीर आहोत सर."

सिध्दार्थने त्याचं म्हणणं ऐकून घेतलं आणि म्हणाला; "अरे तुमच्या चुकीने गाडी बंद पडली नव्हती. त्यामुळे तुम्ही त्यासाठी तसदी घेणं योग्य नाही."

पण सिध्दार्थला पुढे बोलू न देता मॅनेजर म्हणाला; "सर, प्लीज! आपल्यासारखे आमचे मोठे कस्टमर इथून जाताना जर काही प्रोब्लेममध्ये आले तर आमचं कर्तव्य बनतं मदत करणं. सर, आपण परत मागे येऊन आम्हाला सांगितलं असतं तर आपल्याला जो त्रास झाला तो झाला नसता. आत्तासुद्धा आपण या आड रस्त्याने चालत आलात; त्याबद्दल देखील आम्ही दिलगीर आहोत."

सिध्दार्थ हसला आणि म्हणाला; "अहो मॅनेजर साहेब; इतक्या formalities ठेवू नका. मला काहीही त्रास झालेला नाही. बस् आत्ता मात्र मस्त भूक लागली आहे. जेवण मिळणार असेल तर ते द्या; म्हणजे मी निघायला मोकळा. या गाडीमुळे माझ्या कामाचा बराच वेळ वाया गेला आहे. त्यामुळे लवकरात लवकर मला मुंबईला पोहोचणे आवश्यक आहे."

सिध्दार्थचं बोलणं ऐकून मॅनेजरचा जीव भांड्यात पडला. सिध्दार्थने जर काही तक्रार केली तर त्याची नोकरी थेट गेलीच असती याची त्याला कल्पना होती. तो स्वतः सिध्दार्थला रेस्टॉरंटमध्ये घेऊन गेला आणि जेवणाची ऑर्डर दिली. सिध्दार्थ स्थिरस्थावर झाला आहे याची खात्री करून तो मागे वळणार होता इतक्यात त्याला काहीतरी आठवलं आणि परत सिध्दार्थकडे येऊन तो म्हणाला; "सर, आपण एकदा आपल्या घरी आणि मॅडम कृष्णा यांना फोन केलात तर बरं होईल. दोन्ही ठिकाणाहून मला अनेक कॉल्स आले आहेत."

मॅनेजरचं बोलणं ऐकून सिध्दार्थला एकदम लक्षात आलं की त्याने सकाळपासून घरी किंवा कृष्णाला कॉन्टॅक्ट करण्याचा एकदाही प्रयत्न केलेला नाही. त्यामुळे मॅनेजरला 'मी बोलतो घरी;' असं म्हणून त्याने मोबाईल हातात घेतला. मात्र हॉटेलच्या आत रेंज नसल्याचं त्याच्या लक्षात आलं. इतक्यात हॉटेल स्टाफपैकी एकाने लँडलाईन फोन आणून दिला आणि सिद्धर्थने अगोदर घरी फोन लावला. त्याच्या अपेक्षेप्रमाणे गोपाळने फोन उचलला. सिध्दार्थने आईसाठी निरोप ठेवला की तो ठीक आहे थोड्याच वेळात घरी येतो आहे. त्यानंतर त्याने कृष्णाला फोन लावला.

"प्लीज न रागावता दोन मिनिटं माझं एक. विषय खूप गहन आहे कृष्णा. तुझ्याशी बोलणं आवश्यक आहे. मी आत्ता मचाणमध्ये जेवतो आहे. इथून बाहेर पडलो की रेंजमध्ये येताच तुला फोन करतो. किमान प्रवासात आपण बोलू. कारण घरी पोहोचून फ्रेश होऊन मला ऑफिसमध्ये जाणं भाग आहे. गेल्या दोन दिवसात मी एका वेगळ्या जगात जगतो आहे; मात्र त्यामुळे मी माझ्या जवाबदरीपासून लांब जातो आहे; हे मला जाणवलं आहे. त्यात आज बाबा माझी वाट बघणार होते; ऑफिस hours नंतर. त्यांना भेटून कामं उरकायची आहेत. मी जे सांगेन त्याचा तू विचार करून ठेव आणि मग रात्री आपण परत बोलू; फोनवर किंवा प्रत्यक्ष भेटून."

***

सिध्दार्थ गाडी घराच्या खाली पार्क करत असताना फायनली त्याने कृष्णाला बाय म्हंटलं. "रात्री प्रत्यक्ष भेटूच सिध्दार्थ. बाय" असं म्हणून कृष्णाने फोन ठेवला; आणि लिफ्टने वर जाताना सिध्दार्थच्या मनात ऑफिसमधले विचार यायला लागले.

***

'हे अचानक येणारे अनुभव सिध्दार्थच्याच आयुष्यात का असावेत?' कृष्णा विचार करत होती. तिला सिध्दार्थचा स्वभाव माहीत होता. तो अत्यंत भावुक असूनही प्रॅक्टिकल निर्णय घेताना स्थिर मनाचा होता. पुरुषी ईगो नव्हता त्याला. श्रीमंत घरातला.... अत्यंत लाडात वाढलेला होता तरीही डोक्यात हवा गेलेला नव्हता. अत्यंत एक्सप्रेसिव्ह सिध्दार्थ प्रेमळ, समजूतदार होता. अनेकदा तर कृष्णाने त्याला म्हंटलं होतं की तू सतत receiving end ला का राहातोस सिध्दार्थ? त्यावरचं त्याचं उत्तर ऐकून ती एकदमच शांत झाली होती.

तो म्हणाला होता; "Sweetheart, receiving end is a huge turm. But if you really want to say so; let me tell you something... when we are at receving end that means opposite person is either angree on us or is frustrated. Not on us or because of us... but still there is not a conversation; but explosion of feelings. अशा प्रत्येक वेळी मी स्वतःला विचारतो... समोरची व्यक्ती जो राग व्यक्त करते आहे तो माझ्यामुळे आहे का? माझी यात काही चूक आहे का? जर उत्तर 'नाही' आलं तर मग मी केवळ कान उघडे ठेवतो; मन नाही. पण जर माझी चूक असेल तर ऐकून घेऊन परत असं होणार नाही असा प्रयत्न करण्याचं वचन देतो; स्वतःला आणि समोरच्या व्यक्तीला. यामुळे relationship hurt होत नाही; आणि solution मिळतं. अर्थात मी इतका समजूतदार कायम नसतोच. राग येणं, चुका होणं आणि कधी कधी या चुका कोणालाही कळू नयेत असं वाटणं; कधी त्या लपवण्याचा प्रयत्न करणं हे सगळं मी देखी करतोच. पण in larger aspect emotional expresion some times is relising negativity from mind and heart; असं मला वाटतं.... म्हणून as you said... I am at receiving end at times.

तो असं बोलायला लागला की त्याचं बोलणं ऐकत राहावं असं वाटतं. त्याचं हे असं समजूतदार असणं कदाचित त्याला हे अनुभव देतं आहे का?' कृष्णा स्वतःचाच तंद्रीत होती.

'बिभीषण, कृपाचार्य आणि बळी राजा.... तीन चिरंजीव भेटले सिध्दार्थला. म्हणजे अजून चार बाकी आहेत. सिध्दार्थचं आयुष्य वेगळं वळण घेणार आहे; असं तर नाही न? पण जे तिघे भेटले त्यांनी त्यांच्या मनातील व्यथा सांगताना; किंवा आजच्या काळातील अत्यंत चुकीच्या परिस्थितीबद्दलचं त्यांचं मत सांगताना कुठेही सर्वसंगपरित्याग करून साधुत्व स्वीकारून निघून जाऊन तपश्चर्या करावी असं म्हंटलेलं नाही. मात्र कालौघात सामाजिक मानसिकतेत झालेले बदल आणि त्यामुळे त्यांच्या अस्तित्वाचा irrilevence emphasis केला आहे. पण असं कसं होऊ शकतं?' कृष्णाच्या मनातल्या विचारांचं आवर्तन थांबत नव्हतं. सिध्दार्थला भेटून त्याच्याशी बोलल्याशिवाय मन स्वस्थ होणार नाही हे तिच्या लक्षात आलं आणि हातातली कामं झटपट उरकून साधारण नऊच्या सुमारास ती सिध्दार्थच्या घरी पोहोचली.

"बरं झालं तू आलीस ते." तिला बघताच सिध्दार्थची आई वैदेही म्हणाली आणि तिचा हात धरून तिला सोफ्याच्या दिशेने घेऊन गेली.

"तो नुकताच आला आहे; फ्रेश होतो आहे. तुला घेऊन बाहेर जाण्याच्या विचार होता त्याचा. पण मीच नको म्हंटलं. कृष्णा, तो एका जगावेगळ्या अनुभवातून जातो आहे; याची त्याने मला कल्पना दिली आहे. दुपारी घरी आला आणि ऑफिसमध्ये जायला निघाला तेवढ्या वेळात मला घरी बोलावून घेऊन बोलला आहे तो. म्हणूनच मी त्याला म्हंटलं की कुठेही बाहेर जाऊ नकोस. त्याचं मन स्थिर नाही सध्या... अशावेळी उगाच ड्राईव्ह करणं योग्य नाही. तुम्ही दोघे गच्चीवर जाऊन बसा... मी जेवण तिथेच पाठवते. थोडं मोकळं वाटेल आणि नीट बोलता देखील येईल. पण माझं एक suggession आहे... जमलं तर दोघे कुठेतरी बाहेर जा काही दिवस. मी त्याला देखील हे म्हंटलं आहे. हे बघ... जर खरंच सिध्दार्थ chosen one असेल; for whatever reason... best known to those unknown.... तर सिध्दार्थ कुठेही गेला तरी हे जे वर्तुळ सुरू झालं आहे ते पूर्ण होणारच. मग तसंच असेल तर किमान रोजच्या धकाधकीच्या आयुष्यापासून लांब असलं तर विचार करायला आणि घडणाऱ्या गोष्टींचं analysis करायला नीट वेळ तर मिळेल. काय वाटतं तुला?" वैदेही बोलायची थांबली. कृष्णाला त्यांचं बोलणं पटलं. बोलते त्याच्याशी. तिने स्मित करत उत्तर दिलं. तेवढ्यात सिध्दार्थ बाहेर आला आणि दोघांनी एकमेकांकडे हसून बघितलं.

"चल, जाऊया न गच्चीवर." तो म्हणाला; आणि तिघेही मोकळेपणी हसले.

***

"कृष्णा; why me? या प्रश्नाचा विचार करणं मी सोडून दिलं आहे. गच्चीत येताच सिध्दार्थ म्हणाला. सध्या तरी येणाऱ्या प्रत्येक प्रसंगाला मोकळ्या मनाने सामोरं जायचं असं ठरवलं आहे. आई म्हणाली ते पटलं मला. हे जे अनुभव येत आहेत त्यामध्ये मला चॉईस नाही आहे. मग त्रास करून न घेता..... as you always say; I will be at receiving end; till I get to know why me?" गच्चीत येताच सिध्दार्थ म्हणाला.

त्याच्याकडे हसून बघत कृष्णा म्हणाली; "You are right."

"अग, तुला पटलं आहे तर इतका गहन विचार करत असल्यासारखा चेहेरा का केला आहेस?" सिध्दार्थने हसत हसत तिला विचारलं. त्यावर मिश्कीलपणे हसत कृष्णा म्हणाली; "माझ्या मॉमला काय कारण देऊ याचा विचार करते आहे. तसं मला कोकण बघायचं आहे; आणि आपण दोघे जायचा विचार करतो अहोत असं मी मध्ये एकदा सहज आणि उगीच तिला म्हंटलं होतं. तेच कारण सांगून खरंच आपण कोकणात जायचं का? तसंही अशा अनेक कथा ऐकल्या आहेत की लोकांना परशुराम कोकणात भेटतात." असं म्हणून कृष्णा खळखळून हसली. तिच्या हसण्याला साथ देत सिध्दार्थ देखील मनापासून हसला.

"मस्त कल्पना आहे कृष्णा. आई कितीही म्हणाली तरी मला विमानाने कुठेही प्रवास करायचा नाही आहे. स्वतः ड्राईव्ह करून जाण्यात एक वेगळी मजा आहे. तू तुझ्या आईशी बोलून बुकिंग करशील का? मला बाबांना थोडं पटवायला लागेल. हे गेले दोन दिवस मी ऑफिसमध्ये अजिबात लक्ष घातलेलं नाही. त्यांना ते पटत नाहीय; पण अजून तरी ते रागावलेले नाहीत. आज संध्याकाळी आमची मोठी आणि detailed मीटिंग झाली आहे. मी मुद्दाम स्वतःकडे मोठं काम घेतलं नव्हतं. पण तरीही अचानक काही दिवसांसाठी मी ऑफिसमध्ये नाही हे त्यांना पटणार नाही. तशी त्यांना मी असण्याची सवय झाली आहे हे एक कारण आणि अलीकडे त्यांना झेपत देखील नाहीय एकट्याने. पण तुझं नाव घेतलं तर ते नाही म्हणायचे नाहीत. परवा निघू आपण... सकाळी सहा चालेल न तुला?" सिध्दार्थने जवळ जवळ सगळं ठरवूनच टाकलं हे लक्षात येऊन कृष्णा हसली. प्रॅक्टिकल निर्णय घेताना स्थिर मनाचा आहे तो. तिच्या मनात दुपारचा विचार परत एकदा येऊन गेला.

तेवढ्यात जेवण आलं आणि मग मात्र अगदीच वेगळ्या विषयांवर बोलत दोघेही जेवले.

***

सिध्दार्थने छान 80s ची गाणी लावली होती. दोघेही गुणगुणत गाणी एन्जॉय करत होते. सगळी बुकिंग्ज कृष्णाने केली असल्याने ती सिध्दार्थला रस्ता सांगत होती. एका लहानशा गावातला होम स्टे तिने राहाण्यासाठी निवडला होता. साधारण एकच्या सुमाराला दोघे पोहोचले. सिध्दार्थ तर एकदम खुश झाला तो होम स्टे बघून. खरंच खूप सुंदर कल्पना होती. संपूर्ण मातीचं घर. खाली एक हॉल आणि स्वयंपाकघर आणि लाकडी जिन्याने वर गेलं की मोठी बेडरूम. लाकडी पलंग. सौर ऊर्जेचे दिवे आणि झरोके... कंदील.... जवळच होम स्टेचे मालक राहात होते. त्यांच्याकडे रोजचा ठरलेला मेन्यू असायचा. त्याव्यतिरिक्त काही हवं असेल तर सांगायचं होतं. कृष्णाने आजूबाजूला बघण्यासारख्या ज्या जागा होत्या त्यांची देखील लिस्ट बनवून ठेवली होती. जेवून थोडा आराम करून दोघेही संध्याकाळी जवळच्याच समुद्रकिनाऱ्यावर गेले होते.

दोघे हातात हात घालून ओल्या वाळूतून चालत होते... आपापल्या विचारांमध्ये हरवून.

"काय वाटतं तुला? आता कोण भेटेल?" सिध्दार्थने अचानक कृष्णाला प्रश्न केला... आणि त्याचवेळी कृष्णाने त्याला विचारलं; "सिध्दार्थ, असं म्हणतात की परशुरामांनी कोकणाची निर्मिती केली. म्हणजे नक्की काय रे? तुला माहीत आहे का?"

"मला माहीत आहे!" मागून एक आवाज आला आणि दोघांनी मागे वळून बघितलं.

एक अत्यंत हँडसम व्यक्ती मागे उभी होती. कुर्ता पायजमा घातलेली. चेहरा काहीसा राकट, कातीव दाढी, हसरे हृदयाचा ठाव घेणारे डोळे....

"कोण तुम्ही दोघे? नवीन लग्न झालेलं जोडपं दिसता! आमचं कोकण बघायला आलात वाटतं. खरी आवड दिसते आहे तुम्हाला निसर्गाची. नाहीतर या आडगावी सहसा असं कोणी फिरायला येत नाही." असं म्हणून ती व्यक्ती स्वतःशीच खो-खो हसली. कृष्णाला थोडा राग आला. पण ती काही बोलली नाही. सिध्दार्थ देखील शांत होता.

दोघे काही बोलत नाहीत हे पाहून ती व्यक्ती थोडी गंभीर झाली आणि म्हणाली; "तुम्हाला डिस्टर्ब करतो आहे का मी? या बाजूच्या किनाऱ्यावर कधीतरी येत असतो; तसा शांत आहे आणि फार कोणी नसतं म्हणून. सूर्यास्त बघत होतो आणि तुम्ही दोघे दिसलात; आश्चर्य वाटलं म्हणून तुमच्या दिशेने आलो... नेमकं या मुलीचं शेवटचं वाक्य कानावर पडलं आणि बोलण्याचा मोह आवरू शकलो नाही. पण ठीक आहे! निघतो मी. सॉरी."

त्यांचं बोलणं ऐकून कृष्णाचं मन एकदम बदललं आणि ती म्हणाली; "असं काही नाही. आम्ही दोघे एकटेच होतो इथे आलो तेव्हा; त्यामुळे अचानक तुमचा आवाज ऐकून गोंधळलो. पण आम्हाला दोघांना समजून घ्यायला आवडेल; परशुरामांनी का निर्माण केली ही भूमी."

"वा! तुमच्या वयातल्या मुलांना देखील जुन्या काळातल्या कथा आवडतात हे ऐकून बरं वाटलं. चला वाळून बसूया का? उभं राहून किती वेळ गप्पा मारणार आपण?" असं म्हणून ती व्यक्ती कोरड्या वाळूच्या दिशेने चालू लागली. सिध्दार्थ आणि कृष्णा देखीलं त्यांच्या मागे चालत जाऊन काही अंतर राखत कोरड्या वाळूत बसले.

"तर..... परशुरामांनी कोकण भूमी का निर्माण केली? परशुरामांनी एकवीस वेळा संपूर्ण पृथ्वी क्षत्रियहीन केल्यानंतर त्यांना काही काळ एकांतवास हवा होता. तपश्चर्या करून मन:शांती मिळवायची होती. त्यासाठी ते एखादं शांत ठिकाण शोधत शोधत या भागात आले. विपुल निसर्गाने नटलेला हा संपूर्ण समुद्र किनारा, या नारळी-पोफळीच्या बागा, रानमेव्याने भरपूर झाडं आणि निर्मनुष्य परिसर बघून ते समाधान पावले आणि इथेच काही काळ राहून तपश्चर्या करावी असं त्यांनी ठरवलं. त्याप्रमाणे रोज सकाळी उठून प्रातर्विधी उरकून ते एका गुहेमध्ये तप करण्यासाठी बसत असत. असाच बराच कालखंड गेला... किती दिवस, वर्षं, युगं ते कोणालाही सांगता येणार नाही... पण कधीतरी अचानक त्यांच्या या दिनक्रमात एक बाधा आली. तप करण्यासाठी गुहेच्या दिशेने जाणाऱ्या परशुरामांच्या समोर काही मानव येऊन उभे राहिले आणि म्हणाले: 'देवन, आम्ही या परिसरामध्ये नवीन आहोत. आमच्या सोबत स्त्रिया आणि लहान मुले देखी आहेत. हा परिसर निसर्गाने भरपूर आहे; पण तरीही आम्ही भुकेले आणि तहानलेले आहोत. राहण्यासाठी कुठेही जागा नाही. कारण समुद्र कधी रुद्रावतार धारण करेल आणि आम्हाला ओढून नेईल सांगता येत नाही. आम्ही कायम भितीच्या छायेत वावरतो आहोत. आपणास आम्ही रोज एकच दिनक्रम पाळताना बघतो आहोत. त्यामुळे आमच्या मनात एक आशा जागृत झाली आहे... आम्ही जर इथे राहायचा विचार केला तर आपण आम्हाला मदत कराल असा आम्हाला विश्वास वाटतो आहे.'

त्या लोकांचं गाऱ्हाणं ऐकून परशुरामांचं हळवं मन पांघळलं. 'उद्या सकाळी तुम्ही या... तुमचं इप्सित पूर्ण होईल'... ते म्हणाले. ते मानव नमस्कार करून तिथून निघून गेले. परशुरामांनी रोजच्याप्रमाणे त्यांची साधना पूर्ण केली आणि सूर्यास्त समयी सागरासमीप येऊन उभे राहिले. त्यांच्या हातात त्याचं लाडकं आयुध परशु होतं. डाव्या हातात ते तोलत त्यांनी सागराकडे एक दृष्टिक्षेप टाकला. परशुरामांनी त्याचं परशु उचललं आणि त्यांच्या समोर साक्षात समुद्रदेवता येऊन उभ्या राहिल्या.

'आमचा काहीही दोष नसताना आपण आमचा संहार का करता आहात देवन?' त्यांनी हात जोडत परशुरामांना प्रश्न केला.

'तुमचा संहार करण्याचा माझा काहीच मानस नाही. परंतु इथे काही मानव आहेत; ते गुण्यागोविंदाने जवळील भूमीवर राहू इच्छितात. परंतु सागराला येणारी भरती आणि अंतरी उठणारी वादळं यामुळे त्यांचं जीवन सतत नष्ट पावतं आहे. त्यामुळे ते माझ्याकडे मदतीसाठी आले.'

हे ऐकताच समुद्रदेवता म्हणाले; 'महात्मन आपण परशूने वार करण्यापेक्षा आपला परशु सागरामध्ये फेकावात. तो जिथे जाऊन थांबेल तिथवर आम्ही मागे हटू. त्यानंतर मानवाने सागरकिनारी वस्ती करावी आणि आम्ही आमच्या मर्यादेत सुखी राहू.'

परशुरामांनी ते मान्य केलं आणि परशु सागरामध्ये लांबवर फेकला. तो जिथे जाऊन थांबला तिथवर सागर मागे हटला... अशाप्रकारे कोकणाची निर्मिती करून परशुराम मागे फिरले आणि विध्य पर्वतावर जाऊन तपश्चर्येत मग्न झाले."

ती व्यक्ती बोलायची थांबली. सिध्दार्थ आणि कृष्णा मंत्रमुग्ध होऊन त्यांच्या गंभीर आवाजातली परशुरामांची कहाणी ऐकत होते. दोघेही एकदम भानावर आले.

"तर अशी आहे ही कहाणी. मला माहीत आहे तुमच्या सारख्या तरुणांना असल्या कहाण्यांमध्ये विश्वास नसेल. पण माझं असं एक लॉजिक सांगतो.... कदाचित ते लोक परशुरामांना भेटायला गेले आणि त्यांना संकडं घातलं; त्यावेळी सुर्यदशा आणि चांद्रदशा अशी असेल की ज्यामुळे समुद्राला ओहोटी लागून तो खूप आत खेचला जाणार असेल आणि मग त्याची सीमा त्याअनुषंगाने बदलून काही योजने मागे हटणार असेल. ज्याचा अभ्यास परशुरामांनी केला असेल. आपल्या अभ्यासानुसार सागर मागे हटतो आहे का हे बघण्यासाठी स्वतः परशुराम उभे राहिले असतील. त्यावेळी ओहोटीच्या वेळी सागरातील जीवांचे हाल झाले असतील.... पशु-पक्षी-जलचर हे देखील एका वेगळ्या दशेमध्ये संवाद साधतात; ती दशा परशुरामांना अवगत असेल आणि ओहोटीच्या वेळी त्या जीवांना परशुरामांनी मदत केली असेल. हे तिथे असलेल्या लोकांनी बघितलं असेल. पुढे हेच सत्य आपभ्रंशीत होऊन परशुरामांनी सागराला मागे जायला लावून कोकण प्रदेश निर्माण केला अशी कथा प्रचलित झाली असेल..... काय बरं म्हणतात या प्रकाराला.... हा! greapwine! नाही नाही.... कानगोष्टीचा खेळ. पहिली व्यक्ती कानात जे सांगते आणि शेवटची व्यक्ती जे मोठ्याने बोलते त्यात जमीन अस्मानाचा फरक असतो. मला तर वाटतं या जुन्या गोष्टींचं काहीसं असंच असावं. बरं! आता तुम्हाला निघायला हवं. गप्पांमध्ये बराच उशीर झाला आहे."

त्यांनी असं म्हणताच सिध्दार्थचं लक्ष मोबाईलकडे गेलं. तसा फार उशीर नव्हता. पण इथे रस्त्यावरचे विजेचे दिवे नसल्याने खूपच अंधार वाटायला लागला होता. अनोळखी प्रदेश आणि सोबत कृष्णा असल्याने सिध्दार्थ कपडे झटकत उठला. त्याला उठलेलं बघून कृष्णा देखील उठली.

"तुम्ही सांगितलेली कथा आणि त्यावरचा तुमचा अंदाज... दोन्ही आवडलं. धन्यवाद सर. पण खरंच आता आम्ही निघालेलं बरं. उशीर फार नाही झालेला पण हा भाग ओळखीचा नाही आणि आम्ही दोघेही आज दिवसभराचा प्रवास करून आलो आहोत; त्यामुळे वेळेत झोपू. नमस्कार!" असं म्हणून सिध्दार्थने हात जोडले. ते गृहस्थ अजूनही तिथेच बसून होते. त्यांनी फक्त हात जोडले.

सिध्दार्थ आणि कृष्णा राहात्या जागी आले. दोघे जेवायला बसले आणि कृष्णा सिध्दार्थला म्हणाली; "कोण असतील कोण जाणे; पण छान माहिती दिली त्यांनी. आपल्याला माहीतच नाहीत काही गोष्टी हे खरं. बरं! ते राहू दे. सिध्दार्थ उद्या आपण कुठे जायचं आहे ते मी ठरवून ठेवलं आहे. तुझी हरकत नसेल तर थोडं आरामात निघू आणि उद्या गाडी नाही ह काढायची; इथला लोकल टांगा बुक केला आहे मी. त्यातूनच फिरुया उद्या." सिध्दार्थने हसून 'बरं' म्हणून मान डोलावली. जेवण आतपलं आणि दोघेही दमले असल्याने लगेच झोपायला गेले.

सिध्दार्थला लगेच झोप लागली. दिवसभराची दगदग आणि नकळत त्याच्या डोक्यात चाललेले विचार! खूप दमला होता तो. पण कृष्णाला काही केल्या झोप येत नव्हती. ती उठून जवळच्या खिडकीमध्ये जाऊन उभी राहिली... इतकं सुंदर चांदणं तिने कधीच बघितलं नव्हतं. संपूर्ण परिसर न्हाऊन निघाला होता चंदेरी उजेडात. मंद वाहणारा वारा आणि झाडांमधून येणारी शीळ... अगदी प्रसन्न वातावरण होतं. कृष्णाला उर्मी दाटून आली की सिध्दार्थला उठवावं आणि थोडं फिरून यावं. पण मग तो दमला असेल या विचाराने तिने त्याला हाक नाही मारली. आपल्या हालचालीमुळे तो जागा होऊ नये म्हणून कृष्णा हळूच खाली उतरून आली. त्यांचं सामान समोरच एका सोफ्यावर होतं. तिथे बहुतेक एखादा दिवा विझवायचा राहून गेला होता बहुतेक. कृष्णा त्यादिशेने गेली आणि समोरचं दृष्य बघून एकदम स्थब्द झाली...... पेटीमधून हिरव्या रंगाचा प्रकाश परावर्तित होत होता.

तसंच मागे फिरावं आणि सिध्दार्थला उठवावं अशी उर्मी दाटून आली कृष्णाच्या मनात. पण समोरच्या दृष्यतली उत्सुकता जास्त मोठी ठरली आणि तिने पुढे होऊन लाकडी पेटी हातात घेतली.

कृष्णाने श्लोक वाचला:

नि:क्षत्रिय अवनि भवेत् परशुराम कारणे!
मंजुषा भवन्तम् विद्यति करणेन परशुराम भवत् मेलनं करोति!

तिच्या मनात श्लोक वाचतानाच अर्थ उमटतं होता:

नि:क्षत्रिय पृथ्वी झाली परशुरामांच्यामुळे! मंजुषा तुला मिळाली कारण (तेच) परशुराम तुला भेटणार!!!

कृष्णाने परत एकदा अर्थ मनात घोळवला. मंजुषा तुला मिळाली..... 'तुला!' 'ती मी आहे?'

कृष्णाच्या मनात परत एकदा सिध्दार्थला उठवावं असं आलं... पण मग कोणत्याशा अनामिक उर्मिने तिने ती पेटी हातात घेतली... मोबाईल सोबत असल्याची खात्री केली आणि दार उघडून कृष्णा बाहेर पडली.

समुद्राच्या गार वाऱ्याने तिच्या अंगावर शहारा आला... 'आपण एकटीने इथे येऊन चूक तर नाही ना केली? असं तर नाही की तो निरोप सिध्दार्थसाठी होता आणि आपण आगाऊपणा करून......'

"नाही मुली! स्वतःला दुय्यम स्थान देऊ नकोस. तू सिध्दार्थहून कोणत्याही बाबतीत कमी नाहीस... फक्त तूच का... समस्त स्त्रीजात पुरुषांच्या बरोबरीने सर्वत्र असते. तरीही समाजमन अजूनही स्त्रीला दुर्बल मानतं हे आपलं दुर्दैव आहे."

कृष्णाने मागे वळून बघितलं... पण त्यागोदरच तिने आवाज ओळखला होता.

"सर, तुम्ही!?"

"तुझ्या या तुम्ही मध्ये दोन अर्थ दडलेले आहेत. त्या दोन्हीचं उत्तर हो आहे पोरी. मी! तुम्हाला संध्याकाळी भेटलेला.... मी! परशुराम!!!"

"पण....."

"या रुपात!? तुमच्या बोलीभाषेप्रमाणे बोलणारा!? हेच ना?"

"कृष्णा.... खूप सुंदर नाव ठेवलं आहे तुझ्या आई-वडिलांनी तुझं! अगदी तुला शोभेलसं. तू सावळी आहेस म्हणून नाही; तर विचारी आहेस त्या सर्वेश्वराप्रमाणे... म्हणून! माझ्या या रूपाचा फार विचार करू नकोस. कृष्णा, मी एकटाच असा आहे जो सत्य, त्रेता, द्वापार आणि कली युगामध्ये सहज प्रवास करू शकलो आहे. बाळा, स्वीकाराह्यता हा माझा स्वभावधर्म आहे. त्यामुळेच मी प्रत्येक युगात तग धरू शकलो. माझा जन्म सत्ययुगात झाला. जन्माने ब्राम्हण आणि धर्माने क्षत्रिय झालो. वडिलांची इच्छा पूर्ण करताना हा विचार मनात होताच की आशीर्वाद घेताना परत एकदा मातेची आणि बंधूंची मागणी करायची. जमदग्नी पुत्र आहे मी. एका अतिज्ञानी महान ऋषींचा पुत्र. योग्य निर्णयशक्ती उपजत आहे माझ्यात."

"आणि तरीही तुम्ही एकवीस वेळा पृथ्वी क्षत्रियहीन केलीत. देवा...."

"मुली मी तुला तुमच्या कल्पनेतल्या देवासारखा दिसतो का?" कृष्णाला थांबवत परशुराम म्हणाले.

"म्हणजे?" कृष्णा गोंधळली.

"अग, तुमच्या आजच्या कल्पनेत राजा रविवर्माने चितारलेली देवता-ऋषी-मुनी संकल्पना आहे न. मी तुला तसा दिसतो आहे का?"

"नाही महात्मन." काहीसं हसू येऊन कृष्णा म्हणाली.

"मग माझ्याशी बोलताना देवा... महात्मन... असं संबोधण्यापेक्षा सर म्हण मला. तुला सोपं जाईल बोलायला. उगाच दडपण घेऊन बोललीस तर मनातील सर्व शंकांचं निरसन होणार नाही." मंद हसत परशुराम म्हणाले.

"बरं! तर.... सर.... खुदकन हसत कृष्णा म्हणाली; तुम्ही एकवीस वेळा पृथ्वी क्षत्रियहीन कशी केलीत? मुळात पहिल्या वेळीच जर पृथ्वी क्षत्रियहीन झाली होती तर मग पुढच्या वीस वेळा नक्की काय केलंत?"

"बघ! केवळ देवा... या उपाधी ऐवजी सर म्हणता क्षणी तुझ्या प्रश्नात मोकळेपणा आला." परशुराम देखील मोकळेपणी हसत म्हणाले.

"बस! किती वेळ उभं राहणार आहोत आपण." असं म्हणत स्वतः गार आणि तरीही उबदार वाळूमध्ये ते बसले.

"बेटा, नि:क्षेत्रीय पृथ्वी म्हणजे काय ते समजून घे. म्हणजे मग एकदा की एकवीस वेळा की... अजून किती वेळा... ते तुलाच लक्षात येईल. पहिल्या वेळी मी पृथ्वी नि:क्षेत्रीय का केली ते माहीत आहे का तुला? त्यासाठी मूलतः क्षत्रिय म्हणजे कोण ते तुला समजून घ्यावे लागेल. या कली युगातील जातीय क्षत्रियता हा विचार नाही खऱ्या क्षत्रियतेमध्ये. ज्याचे कर्म आहे गरीब-दिन-दुबळ्यांचे संरक्षण करणे तोच जर मदमस्त होऊन या दिनांना त्रास देऊ लागला तर? ज्या ज्या वेळी अशा प्रकारे स्वकर्तव्य जो विसरला आणि दिन-दुबळ्यांना केवळ स्वतःच्या शक्तीमुळे त्रास द्यायला लागला अशा क्षत्रियला मी नेस्तनाबूत केलं आहे. पहिल्या वेळी देखील केवळ तोच जो दुष्टपणे वागला आणि शक्तीचा गैरवापर करायला लागला त्याचा सांहर केला आणि एकविसाव्या वेळी देखील तेच केलं. पण मग माझ्या लक्षात आलं की मी परशुराम असं कितीही वेळा करत राहिलो तरी परत परत अशा मानसिकतेचे मानव निर्माण होणार आहेत. त्यामुळे मग मात्र मी थांबलो. मिळालं का तुझ्या प्रश्नाचं उत्तर?" परशुराम बोलायचे थांबले. चांदण्यामध्ये त्यांच्या चेहेऱ्यावरील मंद स्मित कृष्णाला दिसत होते.

"सर.... सिध्दार्थ का? म्हणजे... आम्ही का?" कृष्णाने मनात असलेला पुढचा प्रश्न विचारला.

"बेटा याचं योग्य उत्तर तुला माझ्याकडून मिळणं अवघड आहे. पण उत्तर मात्र नक्की मिळेल; याची खात्री बाळग. आता काही माझ्या बाजूने. राजा बिभीषण, कुलगुरू कृपाचार्य आणि राजा बळी यांनी त्यांच्या भेटीमध्ये आजच्या काळामध्ये त्यांचं असणं निरर्थक असल्याचं सांगितलं असेल याची मला कल्पना आहे. मात्र मी थोडं वेगळं काही सांगणार आहे. म्हणूनच मी आज संध्याकाळी भेटून नक्की कोणाशी बोलायचं त्याचा अंदाज घेतला. कृष्णा, सिध्दार्थ नक्कीच विचारी आहे; पण तितकाच भावनाप्रधान आहे. अनेकदा त्याचे निर्णय हे भावनेच्या भरात घेतलेले असतात. याचं अगदी ताज उदाहरण म्हणजे... पहिल्या दिवशी पेटीका मिळाली आणि श्लोक वाचता क्षणी दुसरा कुठलाही विचार न करता तो त्या मुलाला शोधायला धावला. भावनिकता हेच त्याचं कारण आहे. मात्र त्यामानाने तू जास्त विवेकी विचारांची आहेस; त्यामुळे सिध्दार्थची सोबत कधीही सोडू नकोस.

आता फक्त शेवटचे काहीतरी. मी का भेटतो आहे तुम्हाला! बेटा, ज्याप्रमाणे मला एकवीस वेळा पृथ्वी क्षत्रियहीन केल्यानंतर उपरती झाली की याहून जास्त मी काही करू शकत नाही... तद्ववतच या कालामध्ये वावरताना मला एक गोष्ट लक्षात आली आहे; अत्यंत दुःखाने सांगावं लागतं आहे; की कली युगाचा अंत अगदी काही शतकांवर आला आहे. कदाचित तोच कालांत असेल; आणि त्याचाच अर्थ चिरंजीवित्वाचा अंत असेल. पण ज्याप्रमाणे चिरंजीवी असल्याने मृत्यू नाही... परंतु शरीर ह्रास आहे. अर्थात तो तुमच्या शंभर वर्षांच्या आयुष्यात जसा होतो तसाच आमच्या आयुष्यात काही हजार शतकांमध्ये होतो आहे. त्याप्रमाणे तत्वह्रास हा कली युगातील मानवाला मिळालेला शाप आहे. यातून अगदीच काही मोजके वेगळे आहेत. त्यातील तुम्ही दोघे! बस् माझ्याकडून इतकंच! मुली, एकूणच सर्वस्वाचा अंत नक्की आहे... मात्र मानवजातीला काहीतरी देणं लागतात तुमच्यासारखे. त्याची जाणीव लवकर व्हावी तुम्हाला हीच त्या परमपित्याकडे मागणी करतो... आणि तुझी रजा घेतो."

असं म्हणून परशुराम उठले आणि चालू पडले. त्यांना हाक मारावी किंवा थांबवावं असं कृष्णाला वाटलं नाही. त्यांना जाताना ती बघत राहिली.

काहीसं पुढे जाऊन ते थांबले... परशुराम मागे वळले नाहीत तरीही त्यांचा स्पष्ट आणि घनगंभीर आवाज "कृष्णाच्या मनात गुंजला... तू कमी नाहीस बेटा! You both are equals. निसर्गाचा balance आहेत तुम्ही. येतो मी!"

परशुराम पुढे पुढे चालत होते.. ते गेले त्यादिशेने काही वेळ कृष्णा बघत बसली आणि मग तिची नजर सागराकडे वळली. तिच्याही नकळत ती तिथेच आडवी झाली आणि तिला झोप लागली.

क्रमशः