Friday, April 16, 2021

हंपी.... एक अनुभव

 हंपी एक अनुभव 


गेले अनेक दिवस... दिवस का गेलं वर्षभर हंपीला जावं असं मानत होतं. पण 2020 आलं आणि सगळ्यांचं आयुष्य आणि भविष्यातली स्वप्न बदलून गेलं. दिवाळीपर्यंत पुढचा काही... विशेषतः आपल्या स्वप्नांचा काही विचार करण्याची हिंमत देखील नव्हती. पण मग हळूहळू आयुष्य काहीसं पूर्व पदावर येतं आहे असं वाटायला लागलं आणि मग पूर्वी बघितलेली स्वप्न परत डोकं वर काढायला लागली.... मला पुन्हा एकदा हंपीची स्वप्न पडायला लागली. अर्थात इतक्या लांब स्वतः ड्राईव्ह करून जायचं म्हंटल्यावर नीट विचार करून योग्य नियोजन करणं अत्यंत आवश्यक होतं. विशेषतः सध्याच्या परिस्थितीमध्ये स्वच्छता राखणे (sanitaisation) हा अत्यंत महत्वाचा मुद्दा होता. त्यामुळे दोन आठवडे सतत हंपीचा अभ्यास करतानाच तिथे राहण्यासाठी योग्य अशा जागा शोधत होते; त्यामध्ये स्वच्छता हा महत्वाचा मुद्दा होता माझा.

हंपीचा अभ्यास करताना खरंच खूप मजा आली. केवळ गूगल वरची माहितीच नाही तर youtub वरचे अनेक विडिओ पाहिले हंपी संदर्भातले. ऐतिहासिक वस्तू आणि शिल्पकला यांनी श्रीमंत आलेले हंपी मला अजूनच जास्त खुणावायला लागले.

कर्नाटकातले हम्पी म्हणजे मुबाईहून जवळ जवळ चौदा तासांचा प्रवास. हा प्रवास करोना नंतरच्या परिस्थितीत स्वतःच्या गाडीने करायचा म्हणजे सर्व काळजी नीट घेणं आवश्यक होतं. साधारण सातशे पन्नास किलोमीटर आहे मुंबई-हंपी अंतर. म्हणजे चौदा तास तर नक्की. मग ठरवलं मुंबई ते बेळगाव असा प्रवास करायचा आणि मग बेळगाव ते हंपी. त्याप्रमाणे तयारी केली. शक्यतोवर घरगुती राहण्याची सोय (होम स्टे) सारखं काही असल्यास पाहायचं. एकतर ते स्वस्त असतं आणि कमी लोक अशा ठिकाणी जात असल्याने सध्यासाठी योग्य असेल. मग बेळगावमध्ये home stay असं गूगल मित्रावर शोधलं आणि अनेक पर्याय मिळाले. अगदी मोठासा बंगला आणि त्यातल्या एक किंवा दोन खोल्या राहण्यासाठी देणारे पर्याय देखील होते. त्यातल्याच एका घरातली खोली फोनवरून राखून ठेवली आणि एक दिवस भल्या पाहाटे निघाले.

मुद्दाम ठरवून मुंबई-पुणे महामार्गावर थांबले नाही. पुण्याच्या पुढे माथेरानला जाण्याचे जे वळण आहे त्याअगोदर एक लहानसा मॉल आहे. तिथे पोहोचायला मला साधारण साडेचार तास लागले. तिथे थांबून व्यवस्थित खाऊन घेतले. मॉल मधील स्वच्छतागृह खरंच चांगले असल्याने काहीच प्रश्न उदभवला नाही. तिथून निघाल्यावर मात्र कुठेही न थांबता थेट बेळगाव गाठले. मुंबई-बेळगाव चारशे चौर्याऐंशी किलोमीटर्स आहे. म्हणजे साधारण आठ तास. मी मधला थांबण्याचा वेळ धरून देखील सात तासात पोहोचले. एकतर पुण्याच्या पुढचा रस्ता चौपदरी आणि अत्यंत सुंदर आहे; आणि मला कुठेही फार वाहतूक जाणवली नाही. बेळगावात पोहोचले आणि खोली ताब्यात घेऊन मस्त ताणून दिली. संध्याकाळी उठून थोडी चालून आले आणि त्याचवेळी एका उडपी हॉटेलमध्ये मस्त डोसा, इडली आणि तिथली खास बनवलेली कॉफी घेतली. सकाळी सहा पर्यंत निघण्याचा विचार होता. मात्र घरमालकांनी मला सांगितलं की इथून तुम्ही फार तर चार तासात हंपीला पोहोचाल. का घाई करता. आठ पर्यंत निघालात तरी अगदी वेळेत पोहोचाल. तसही हंपी सोबतच तुम्ही पहिल्यांदा जिथे उतरणार आहात त्या सानापूरला देखील निसर्ग सुंदर आहे. मालकांनी दिलेल्या माहितीनुसार दुसऱ्या दिवशी काहीशी आरामातच निघाले. पोहोचण्याची घाई नव्हती. त्यामुळे आजूबाजूचा निसर्ग पाहात अगदी निवांतपणे गाडी चालवत होते. प्रशस्त रस्ते आणि अजिबात नसलेली वाहातुक यामुळे गाडी चालवणे म्हणजे सुख वाटत होतं.

आजूबाजूच्या निसर्गात मी इतकी अडकत गेले की काही वेळानंतर माझ्या लक्षात आलं की गुगुल बाईने मला जो रस्ता सांगितला आहे तो गावांमधून जातो आहे.... म्हणजे नक्की मी रस्ता चुकले आहे. कारण बेळगाव सोडताना मला घरमालक म्हणाले होते; सुंदर हामरस्ता आहे. तुम्हाला कुठेही काहीही अडचण येणार नाही. लहान-लहान गावं लागायला लागल्यावर मी थोडी गडबडले आणि एक दोन ठिकाणी गाडी थांबवून रस्ता विचारला. प्रत्येकजण सरळ पुढे जाण्याबद्दल सांगत होतं. त्यामुळे रस्ता चुकले नसून कोणतं तरी वेगळं वळण घेतलं गेल्याचं माझ्या लक्षात आलं. 'जोपर्यंत अंधार होत नाही आणि गाडीमधलं पेट्रोल लाल कात्यापर्यंत येत नाही तोपर्यंत घाबरण्याची गरज नसते'; हे माझ्या भावाचं तत्व मनात ठेऊन पुढे जात होते. मनात भिती नसल्याने उलट आजूबाजूला लागणारी शेतं आणि पवनचक्क्या पाहात आणि या अफाट पसरलेल्या निसर्गाचा मनमुराद अनुभव घेत मी पुढे जात होते. साधारण एकच्या सुमारास मला सानापूर पंधरा मिनिटांवर दिसायला लागलं आणि मी जिथे माझी खोली राखून ठेवली होती तिथे फोन केला. ज्याने फोन उचलला त्याने लगेच मला लोकेशन पाठवलं आणि मग मात्र त्या लोकेशनच्या अनुषंगाने गाडी हाकत मी निघाले. आता आजूबाजूची हिरवाई संपून मोठे मोठे दगड दिसायला लागले होते. पण खरं सांगू.... त्या उंच अजस्त्र दगडांमध्ये देखील एक वेगळंच सौंदर्य होतं. डिसेंबर महिना असल्याने फार उकडत नव्हतं. मग गाडीच्या काचा खाली करत दर पाच मिनिटांनी थांबून फोटो काढत मी पुढे सरकत होते. सानापूर जवळ आलं आणि मी परत एकदा त्याच मुलाला फोन लावला.

"Madam, keep driving and come streate. Am standing on the road." त्याने मला म्हंटलं आणि त्याच्याशी हे बोलेपर्यंत मला तो दिसला देखील. एक पोरगेलासा लाल टीशर्ट घातलेला काळा पण हसऱ्या चेहेऱ्याचा तरुण होता. गाडीतून हात बाहेर करून मी त्याचं लक्ष वेधलं आणि त्याने खूण केल्याप्रमाणे गाडी आत वळवली.

मी गाडीतून उतरले आणि................. माझ्या समोर स्वर्ग होता जणू!!! समोर पाच सुंदर झोपड्या होत्या. मध्ये थोडं अंतर ठेऊन एक मोठा आणि खुला हॉल होता. जिथे खाण्यासाठी बसण्याची सोय होती. संपूर्ण बांधकाम बांबू आणि नारळाच्या सुकलेल्या झावळ्यांनी केलेलं होतं. पण त्यात जे सौंदर्य होतं ते तुम्हाला कोणत्याही पंच तारांकित हॉटेलमध्ये दिसणार नाही. आजूबाजूला असणाऱ्या टेकड्यांच्या खळगीतलं सानापूर हे अगदीच लहानसं आणि गोंडस गाव. त्यात हे असं गावातल्या घरात राहिल्यासारखा अनुभव. अजून काय हवं हो?

अत्यंत नेटकी, स्वच्छ आणि आवश्यक एवढी प्रशस्त खोली आणि अत्यंत स्वच्छ आणि गरजेच्या सगळ्या सोयी असणारं स्नानगृह. अजून काय हवं असतं? प्रवासाने काहीशी दमले होते आणि भूक देखील लागली होती. पटकन फ्रेश होऊन बाहेर आले आणि समोरच्या हॉलमध्ये गेले. सुंदर बैठकी केलेल्या होत्या. एका टेबलावर साधारण आठजण सहज बसू शकतील अशी दहा-बारा टेबलं होती. बसायला साध्याशा गाद्या. एका टेबलाजवळ बसत मी चौकशी केली काय मिळेल खायला? मला वाटलं होतं साधंसं गाव आणि त्यात हे असलं साधं राहण्याची सोय असलेलं ठिकाण; म्हणजे टिपिकल काहीतरी चायनीज आणि पंजाबी जेवणाचे प्रकार असतील. मनाची तशी तयारी देखील मी केली होती. पण आश्चर्य म्हणजे तिथे सगळं काही मिळत होतं. अगदी कॉन्टिनेनटल पासून ते पिझा-पास्ता... सिझलर्स, पंजाबी आणि डाएट फूड देखील. मेन्यूकार्ड बघून जितकं आश्चर्य वाटलं तितकीच मजा देखील वाटली.

जेवताना थोडी माहिती घेत होते आजूबाजूला काही प्रेक्षणीय आहे का. त्यावेळच्या गप्पांमध्ये कळलं की हा 'होम स्टे' तीन तरुणांनी मिळून सुरू केला आहे. हंपी मधील हिप्पी आयलंड खूपच प्रसिद्ध होतं.... अनेक कारणांनी. परंतु कर्नाटक सरकारने ते बंद करून टाकलं.... त्याच त्या 'अनेक कारणां'साठी. ही मुलं तिथे काम करायची. अचानक हातातलं काम गेलं आणि त्याचवेळी करोना माहामारी सुरू झाली. पुढचं भविष्य एकदम अंधःकारमय वाटायला लागलं. त्यातल्या एकाची ही थोडीफार जमीन होती. तिघांनी हिम्मत करून आजवर जमवलेले आणि थोडे उसने पैसे घेत हे 'होम स्टे' स्वतःच्या हातानी बनवलं. नुकतीच सुरवात केली होती त्यांनी. त्यांच्या हिमतीच मला खरंच खूप कौतुक वाटलं. सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे ती मुलं अजिबात शाळेत गेली नव्हती; आणि तरीही भारतीय भाषांसोबत फक्त इंग्रजीच नाही तर फ्रेंच, इटालियन आणि अशा अनेक भाषा असख्लीत बोलत होती. 'हिप्पी आयलंड' की देन है! म्हणाले.

सकाळपासून गाडी चालवून तशी दमले होते. त्यामुळे थोडावेळ आराम करायचा ठरवलं. उद्यापासून हंपी बघायला सुरवात करणार होते. पण आजचा दिवस तसा मोकळा होता. बेळगावच्या घरमालकांनी सांगितलेलं आठवत होतं. त्यामुळे माझ्या खोलीकडे जायच्या अगोदर त्या मुलांकडून माहिती घेतली की या सुंदर पण इटुकल्या गावात काही बघण्यासारखं आहे का? त्यांनी सांगितलेलं समजून घेतलं आणि आराम करायला खोलीत गेले.

दोन तासांनी गाडी घेऊन मी निघाले. 'होम स्टे' च्या पुढे गावातून अगदी पाच मिनिटं पुढे गेले आणि एक उजवीकडचं वळण घेतलं. थोडेसे उतार-चढाव आणि लहानसा रस्ता कापत पुढे गेले. एक लहानसं वळण पार केलं आणि माझ्या समोर निसर्गाचा एक अप्रतिम तुकडा पसरला होता. एका नदीचं पात्र... मस्त मोठंसं समोर होतं. आत दूर दोन टोपलीच्या होड्या होत्या. असेच एकटे दुकटे प्रवासी त्या होड्यांमधून नदीमध्ये फिरत होते. एक अजून होडी दिसत होती किनाऱ्यावर. मला गाडीतून उतरताना बघून होडीचा मालक आला विचारायला. पण उतरत्या संध्याकाळी वाहत्या वाऱ्यावर किनाऱ्याजवळ बसून राहावंसं वाटत होतं. आत्ता नको म्हणून त्याला नकार देऊन मी तशीच बसले किनाऱ्यावर. क्षणभर मनात आलं छानशी गाणी लावावीत... पण मग स्वतःला थांबवलं. निसर्ग भरभरून गप्पा मारत होता.... त्याच्या गप्पा ऐकण्यात जास्त सुख होतं.

अंधार व्हायला लागला आणि मी परत फिरले. परत माझ्या 'होम स्टे' वर आले आणि छानसं साधं खाणं मागवलं. दुपारी माझ्याशी गप्पा मारणारा मुलगा आला आणि म्हणाला;"मॅडम, आपको बिअर मंगता तो है। और भी कूच भी मिलेगा।" त्याचं बोलणं ऐकून हसले आणि म्हणाले तुझ्या या छानशा गावाच्या निसर्गाची नशा मला पुरेशी आहे... त्याहून जास्त नशा नाही लागणार मला. त्याला थोडं आश्चर्य वाटलं. काहीच नाही घेणार मी हे समजल्यावर. हसत सलाम ठोकत म्हणाला;"मॅडम, आप पहिला है जो कूच भी नही चाहीये बोला। नहीतो इधर आते ही पहिला वोही पुच्छते है।" मी हसले आणि जेवण आटोपून झोपायला गेले.

दुसऱ्या दिवशी सानापूरचा निसर्ग अजून जवळून पाहावा म्हणून निघाले. कालच्या ज्या वळणावर उजवीकडे वळले होते त्याच वळणावर डावीकडे वळण घेतलं आणि परत एकदा तीच ती नदी समोर होती. थोडं खडकांवर बसले... थोडी इथे तिथे फिरले आणि परत एकदा तीच ती टोपलीची होडी दिसली. मग होडीवाल्याला हात करून त्याच्या होडीत बसले. होडीत त्याच्याशी गप्पा मारायला लागले; तो म्हणाला या करोनाने आमचं कंबरडचं मोडून टाकलं आहे. आमच्याकडे एकपण पेशंट नाही. पण तरीही करोना मात्र आहे. आमचा मूळ व्यवसाय इथे येणाऱ्या देशी-परदेशी लोकांना फिरवणं हाच आहे. पण यावर्षी कोणीही आलं नाही. त्यामुळे खूप त्रास आहे. अशाच गप्पा होत होत्या आणि त्यांनी संगीतलं इथे एक पाचशे वर्ष जुनं माकडाचं मंदिर आहे. मी म्हंटलं अरे मारुती मंदिर म्हणायचं आहे न तुला. तर तो म्हणाला नाही... माकड मंदिरच आहे ते. बरंच उंच आहे. सातशे पायऱ्या असतील. इथे येणारे लोक तिथे नक्की जातात. माझ्या मनात उत्सुकता निर्माण झाली. कसं जाता येईल याची चौकशी करायला लागले तर म्हणाला तिथे सध्या बिबट्या फिरतो आहे. त्यामुळे बंद केलं आहे मंदिर. 'बिबट्या फिरतो आहे'; ही माहिती त्याने इतक्या सहज दिली जणूकाही बरेच कुत्रे आहेत... म्हणून जाऊ नका असं म्हणतो आहे.

त्याच्या माहितीला गावातल्या इतरांकडून देखील दुजोरा मिळाला म्हणून मग इच्छेविरुद्ध मी मंदिर बघण्याचा कार्यक्रम रद्द केला; आणि तो दिवस सानापूरच्या निसर्गात मनमुराद भटकण्यात घालवला.

तिसऱ्या दिवशी मी हंपीला जायला निघाले. खरंतर मी हंपीमध्ये एक उत्तम पंच तारांकित हॉटेल ठरवलं होतं. पण माझ्या सानापूरच्या भटकंतीमध्ये मला कळलं की सानापूर ते हंपी जेमतेम अर्ध्या तासाचं अंतर आहे. मग हंपीमध्ये राहण्याचा विचार बदलून मी सानापूर ते हंपी प्रवास करायचा ठरवलं. गुगलच्या मदतीने एक रजिस्टर्ड गाईड शोधून त्याच्याशी बोलणं केलं आणि हंपीच्या पहिल्या वळणावर भेटायचं ठरवून माझ्या स्वप्नांच्या दिशेने निघाले.....

क्रमशः


चुकलेल्या रस्त्यावरील दगडांचे वैभव


दूरवर पसरलेली हिरवाई


नक्की कोणता रस्ता घेऊ हा प्रश्न पडला होता मला


चारिकडे पसरलेला निसर्ग


हरवलेल्या रस्त्यावर सापडलेली पवनचक्की


वळणावरचे झाड वाकडे


डोळ्यांना सुखावणारी शेतं आणि त्यात विहारणारे स्वच्छंद पक्षी


निसर्गाच्या सानिध्यातला होम स्टे


फक्त पाच खोल्या (झोपड्या) आलेलं हॉटेल!


रेस्टॉरंट!!!


अत्यंत स्वच्छ आणि सर्व सुविधा असलेलं बाथरूम


स्वच्छ नीटनेटकी आणि आवश्यक सुविधा असलेली खोली


सानापूर मधील निसर्गरम्य नदी किनारा




टोपलीची बोट


सानापूर मधील शेतं



नदी किनारा


बोटीतील अनुभव





शेरु... होम स्टे चा राखणदार























Friday, April 9, 2021

स्वच्छंद

स्वच्छंद

ए चल नं,
थोडसं भटकू...
थोड़ी गाणी ऐकू;
थोड़े हसू... थोड़े आसू...
हातात हात घालून;
एकमेकांचे पुसू!

थोड लांब पळु...
एखादा डोंगर चढू;
दमल्यानंतर मात्र...
हिरवळीत सोबतिनं बसु!

मग?
गेलेल्या वर्षांच्या...
मनातल्या आठवणी!
अनुभवलेले क्षण...
विश्वासाच्या किनारी!

ऐ चल,
समुद्र किना-यावर...
तळव्याना स्पर्श करणा-या
नाजुक लाट़ातुन;
तारे मोजु...
वाळुच्या कुशीत पडून!

ऐ....चल न....
ते सगळ सगळ करू
आणि मग....
हातात हात अन् खुप सारं हसू!



Friday, April 2, 2021

काळ

 काळ


वासंती तिशीची झाली तरी लग्नाचा विचार करायला तयार नव्हती. तिच्या आई-वडिलांना ती काहीशी उशिराच झाली होती. बाबा आणि आई देखील दोघेही रिटायर होऊन सिनियर सिटीझन्सचं आयुष्य जगायला लागल्याला आता तीन-चार वर्ष होऊन गेली होती. त्यामुळे त्यांची इच्छा होती की आपण धडधाकट आहोत आणि थोडीफार जमापुंजी हाताशी आहे तोपर्यंत लेकीचं लग्न हौसेमौजेने करून टाकावं.

वासंती अत्यंत हुशार मुलगी होती आणि दिसायला देखील छानच होती. लांब काळेभोर केसांची एक लांबसडक वेणी ती घालायची. मोठे बोलके डोळे होते तिचे. राहणी अगदी साधी होती. आजच्या काळातदेखील ती ऑफिसला जाताना व्यवस्थित साडी नेसून जात असे. तिला तिची आईच अनेकदा म्हणायची;"अग वासंती, छानसा ड्रेस घालत जा की ऑफिसला जाताना. हे काय काकूंबाईसारखी साडी नेसतेस? तुला वेस्टर्न कपडे आवडत नाहीत; तर नको घालूस. पण एकदम साडीच का?" वासंती देखील नेहेमीच्याच शांतपणे उत्तर द्यायची;"ममा, अग मी काहीशी नाजूक चणीची असल्याने मॅनेजर असूनही मला माझ्या हाताखालीची लोकं फार सिरीयस घेत नाहीत. त्यात जर मी अगदीच स्कर्ट्स आणि ड्रेस घालायला लागले न तर माझ्या तोंडावर मला उडवून लावतील."

एकदा दोघींचा हा संवाद बाबांनी ऐकला आणि वासंतीला म्हणाले;"वासंती बेटा, आपल्या दिसण्यापेक्षा आपल्या कामाचा वचक जास्त असावा. तुला एक उपाय सांगतो. करून बघ. तुझ्या हाताखालचे लोक येण्याच्या अगोदरच ऑफिसमध्ये पोहोचत जा आणि कामाला सुरवात कर. अगदी ऑफिसच्या वेळेच्या अगोदर पोहोचायची सवय लाव स्वतःला. आपली सिनियर लवकर येऊन कामाला सुरवात करते; या विचाराने तुझ्या हाताखालची माणसं आपोआपच सरळ राहातील तुझ्याशी." आणि मग पत्नीकडे वळत म्हणाले;"तुसुद्धा उगाच तिच्या मागे लागणं बंद कर. तिला जे आवडतं ते घालू दे."

बाबांचं बोलणं पटल्याने वासंतीने लगेच दुसऱ्या दिवसापासून ते अमलात आणलं. ती खरंच काहीशी लवकर निघाली घरातून आणि ऑफिसमध्ये सगळे यायच्या अगोदरच तिची कामाला सुरवात झाली होती. वासंतीला आठवड्याभरातच तिच्या सबॉर्डीनेटर्सच्या वागण्यातला बदल जाणवायला लागला. एरवी तिची पाठ वळताच तिची चेष्टा करणारे सगळे तिच्यासमोर दबून राहायला लागले. तिच्या टीमचा एकूण परफॉर्मन्स देखील एकदम वाढला. वासंती खूपच खुश झाली बाबांवर.

आर्थिक वर्ष संपत आलं होतं. प्रत्येकाला आपापली टार्गेट्स पूर्ण करण्याचे वेध लागले होते. त्यात सगळे रिपोर्ट्स देखील तयार करायचे होते; सबमिशन तारखा जवळ येत होत्या. प्रत्येक डिपार्टमेंट दडपणाखाली होतं. मात्र वासंतीची टीम कामाच्या दडपणात देखील मोकळा श्वास घेत होती. त्यांची टार्गेट्स कधीच पूर्ण झाली होती. रिपोर्ट्स तयार होत होते. प्रेझेन्टेशन्स तयार होती. यासगळ्याचं क्रेडिट वासंतीला जात होतं. मार्च संपत आला आणि कामाच्या शेवटच्या टप्यात असताना अचानक वासंतीला तिच्या बॉसने बोलावलं. असं अचानक कंपनी CEO कडून बोलावणं आल्याने वासंती एकदम गोंधळून गेली. हातातलं काम टाकून ती वरच्या मजल्यावरच्या बॉसच्या केबिनकडे धावली.

तिने दारावर टकटक केली आणि आतून आवाज आला "Yes, you can come in." वासंती आत गेली. "sit down" बॉस म्हणाले आणि वासंती बसली. बॉसचा चेहेरा फारच गंभीर होता. आपल्या हातून काय चूक झाली आहे त्याचाच विचार वासंती करत होती. बॉसने हातातलं काम संपवलं आणि वासंतीकडे बघून हसले. त्यांच्या त्या एका हास्याने वासंतीच्या जीवात जीव आला. हलकसं हसत वासंती बसल्या जागी थोडी सैलावली.

तिच्याकडे बघत बॉस म्हणाले;"वासंती, तुझ्या टीमने यावेळी वेळेच्या अगोदरच टार्गेट्स पूर्ण केली आहेत. तुम्ही तर प्रेझेन्टेशन आणि रिपोर्ट्स सकट तयार आहात असं मला कळलं. वा!"

वासंती सुखावत म्हणाली;"सर, तुमच्या गायडन्समुळे शक्य झालं सगळं."

तिच्या बोलण्यावर हसत बॉस म्हणाले;"Oh! No no. वासंती मला बरं वाटावं म्हणून असं बोलू नकोस. यासगळ्याचं क्रेडिट तुला जातं. तू एक वेगळा पॅटर्न सुरू केलास आणि त्याचं यश आहे हे. काम तर सगळेच करतात. पण शेवटच्या क्षणापर्यंत प्रेशर ठेवण्यापेक्षा रोजची छोटी टार्गेट्स तू ठरवलीस आणि तुझ्या टीमच्या अगोदर येऊन त्यांची कामं ते यायच्या अगोदर त्यांच्या मेल्समध्ये तयार असायची. त्यामुळे एक ऑर्गनाईज प्रकारे काम झालं. खरंच तुझं मॅनेजमेंट वाखाडण्यासारखं आहे."

वासंतीने हसत "thank you" म्हंटलं. तिच्याकडे बघत हसत बॉस म्हणाले;"वासंती, I have an offer for you. तुला माहीतच असेल की आपण आपली एक नवीन ब्रँच चालू करतो आहोत नाशिकजवळ." कामाचं बोलणं सुरू झाल्याचं लक्षात येऊन ताठ बसत वासंती म्हणाली;"हो सर. माहीत आहे मला." थेट तिच्याकडे बघत बोस म्हणाले;"माझी इच्छा आहे की तू त्या ब्रँचची पूर्ण जवाबदारी घ्यावीस." अचानक आलेल्या या वाक्याने वासंती एकदम गडबडली. "सर, संपूर्ण ब्रँचची जवाबदारी मी?" बॉस हसत म्हणाले;"हो वासंती. मला खात्री आहे की तुला नक्की जमेल ते. एक काम कर इथले रिपोर्ट्स पूर्ण झाले की ते सगळं काम handover करून तू साधारण पंधरा एप्रिल पर्यंत नाशिकला रिपोर्ट कर. ठीक?" वासंतीला खूपच आनंद झाला. उठून उभं राहात आणि सरांना शेक हॅन्ड करत ती म्हणाली;"Yes sir. मी तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही."

वासंतीने घरी पोहोचताच आई-बाबांना खुशखबर दिली. वासंतीने दिलेली बातमी ऐकताच तिची आई म्हणाली;"अग अचानक नाशिक? बापरे. तिथे तर आपल्या ओळखीचं कोणीच नाही. पंधरा एप्रिल म्हणजे महिनासुद्धा नाही ग हातात. अग वासंती मी विचार करत होते की यावर्षी तुझ्या लग्नाचा बार उडवून द्यायचा. हे अचानक असं आपलं शहर सोडून जायचं तर कसं होणार आपलं?" आईचं बोलणं ऐकून वासंती काहीशी रागावली. पण स्वतःला शांत करत म्हणाली;"आई, मी सध्या काय एकूणच लग्नाचा विचार करत नाही आहे. त्यात आत्ता मला ही एक सोन्यासारखी संधी मिळाली आहे स्वतःला सिद्ध करायची ती मी मुळीच सोडणार नाही आहे." तिचं बोलणं ऐकून आई गप झाली. मात्र वासंतीच्या खांद्यावर थोपटत तिचे बाबा म्हणाले;"वासंती, आम्हाला दोघांनाही तुझ्या या यशाचा खूप आनंद होतो आहे. पण एक गोष्ट लक्षात घे बाळा, तुझ्या आईची चिंता योग्य आहे. आम्ही काय पिकली पानं आहोत. त्यात तू उशिरा झालेली आहेस आम्हाला. त्यामुळे आमच्या नंतर तुझं काय होणार ही चिंता आम्हाला सतत असते. तुझी आई तुला ते सांगते आणि मी सांगत नाही इतकाच काय तो फरक."

वासंतीने वडिलांचा हात हातात घेतला आणि म्हणाली;"बाबा, मला न खरंच लग्न करायची इच्छा नाही आहे. मला तुमच्या बरोबर राहून तुमची आणि आईची सेवा करायची आहे." लेकीने इतकी उत्तम बातमी आणली आणि तरी घरातला माहोल एकदम तणावपूर्ण झाल्याचं लक्षात आल्याने वासंतीच्या हातावर थोपटत तिचे बाबा म्हणाले;"बरं बेटा, तू लग्न करायचं की नाही ते आपण नंतर ठरवू. आत्ता मात्र आपल्याला हा विचार करायला हवा की पंधरा एप्रिलला नाशिकला पोहोचल्यावर आपण उतरणार कुठे आहोत आणि एकूणच राहण्याची काय सोय असेल तिथे."

बाबांचं बोलणं ऐकून हसत वासंती म्हणाली;"बाबा, कुठे राहायचं याची चिंताच करू नका. तुम्हाला दोघांना खूप आवडेल अशी सोय केली आहे मी तिथे. एक मस्त बंगलाच घेतला आहे आपण भाड्याने आणि माझं ऑफिस तिथून जेमतेम पंधरा मिनिटांच्या अंतरावर आहे चालत." तिचं बोलणं ऐकून आई आणि बाबा एकदम खुश झाले. वासंतीच्या जवळ जात आईने तिच्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाली;"बेटा, गावात एक छोटंसं आपलं असं घर असावं अशी खूप खूप इच्छा होती माझी. तू अगदी नकळत ती पूर्ण केलीस. खूप खूप अभिमान वाटतो मला तुझा. तुझी इच्छा नाही न; मग तू स्वतःहून तू विषय काढेपर्यंत मी यावर बोलणार नाही." आईचं बोलणं ऐकून वासंती हसली आणि वातावरण एकदम निवळून गेलं.

वासंती आणि तिचे आई-वडील नाशिकला पोहोचले आणि घर बघून सगळेच खुश झाले. एक सुंदर बंगला होता तो. समोर छानशी बाग करता येईल इतकी जागा होती. त्यामुळे आई आणि बाबा दोघेही जास्तच खुश होते. वासंती पोहोचल्या दिवसापासूनच ऑफिसला जायला लागली. संपूर्ण ब्रँचची जवाबदरी तिच्यावर होती आणि कंपनीने दाखवलेल्या विश्वासाला पूर्ण उतरायचंच असं तिने ठरवलं होतं. त्यामुळे ऑफिसची वेळ दहाची असली तरी वासंती सकाळी साडेनऊलाच पोहोचायची.

एप्रिल महिना असल्याने नाशिकमध्ये प्रचंड उन्हाळा वाढला होता. त्यामुळे लवकर जाणं तसं वासंतीच्या फायद्याचं होतं. तिच्या म्हणण्याप्रमाणे तिचं ऑफिस घरापासून खरंच जवळ होतं; त्यामुळे रोज चालतच जायची ती ऑफिसला. त्यांचा बंगला असलेल्या त्या गल्लीमध्ये सगळेच बंगले होते. काही नवीन काही जुने. त्यांच्या शेजारचा बंगला बंदच होता. त्याच्या पुढे एक काहीसा मोठा असा जुना बंगला होता... अगदी वाडा म्हणावं असा मोठासा. वासंती त्या वाड्यावरून चालत जाताना नेहेमी विचार करायची.... कोण राहात असेल बरं या वाड्यात? तसं अगदी जुनं बांधकाम आहे आणि एकदम मजबूत आहे. पण नीट निगा नाही राखलेली. ती वाड्यावरून पुढे जात असताना अनेकदा तिला एक लहान पाच-सहा वर्षांचा मुलगा वड्या समोरच्या बागेत खेळताना दिसायचा. एका बाजूला एक छानसा झोपाळा होता त्यावर बहुतेक त्याची आजी बसलेली असायची. वासंती सकाळी जेव्हा जेव्हा जायची त्या वेळी ती एका स्त्रीला घराच्या आत जाताना बघायची. वासंतीने एक-दोन वेळा पाच मिनिटं लवकर किंवा उशिरा निघून त्या स्त्रीला बघायचा प्रयत्न केला. पण ज्या ज्या वेळी वासंती त्या घरावरून जायची त्यावेळीचं नेमकी ती बाई आत जायची. शेवटी तिचा चेहेरा बघण्याचा नाद वासंतीने सोडला.

ऑफिसमध्ये बरंच काम होतं. अगदीच सुरवात होती सगळी. त्यामुळे वासंतीला यायला अनेकदा उशीरच व्हायचा. घरी येऊन जेऊन झोपून जायची ती. खूपच दमत होती ती; पण काम आवडत असल्याने तिची काही तक्रार नव्हती. मात्र या तिच्या कामामुळे अलीकडे तिचं आणि आई-बाबांचं बोलणं कमी व्हायला लागलं होतं.

एका रविवारी अगदी आरामात उठून वासंती बाहेर व्हरांड्यात आली. बाबा बागेत गुलाबाचं कलम लावत होते आणि आई खुर्चीवर बसून पेपर वाचत होती. वासंती उठलेली बघून आई उठली आणि म्हणाली;"अग हाक मारायची नं; चहा ठेवला असता मी." हातातला कप आईला दाखवत वासंती म्हणाली;"घेतला ग मी करून. रोज सगळं तूच करतेस. बस जरा. मस्त गप्पा मारू." इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या आणि वासंतीने आईला विचारलं;"आई, आजूबाजूला काही ओळखी झाल्या की नाही ग? आपण येऊन दहा दिवस झाले; पण बाहेर कोणाशी काय तुमच्याशी बोलायला देखील मला वेळ मिळाला नाही. त्यामुळे आपल्याला कोण शेजारी आहेत ते देखील मला माहीत नाही."

त्यावर हसत आई म्हणाली;"अग समोर काळे म्हणून एक कुटुंब आहे. स्वतःचं घर आहे त्यांचं. खाऊन पिऊन सुखी. मुलं शाळेत जातात. हा शेजारचा बंगला तर बंदच आहे. पण काळे वहिनी म्हणाल्या ते लोक मूळचे मुंबईचे आहेत. अधून मधून येतात."

वासंतीने चहाचा घोट घेत आईला विचारलं;"अग, तो पलीकडे मोठा बंगला आहे न... अगदी जुन्या बांधकामाचा वाड्यासारखा.... तिथे कोण राहातं?" वासंतीच्या प्रश्नाने आईच्या कपाळावर एक आठी आली आणि ती म्हणाली;"वासंती मी देखील काळे वहिनींना विचारलं त्या वाड्याबद्दल. पण त्या काही बोलायलाच तयार नव्हत्या. उलट मला म्हणाल्या तुमची मुलगी त्या वाड्यावरून रोज जाते चालत.... तिला रस्ता बदलायला सांगा. आम्ही कोणीच त्या बाजूला फिरकत नाही. असं म्हणतात तो वाडा झपाटलेला आहे. मी माझ्या दोन्ही मुलांना लांबचा पल्ला पडला तरी विरुद्ध बाजूने सोडायला जाते शाळेत. आम्ही कोणीच कधीच त्या वाड्याबद्दल बोलत सुद्धा नाही. आणि तुम्ही देखील परत माझ्याकडे हा विषय काढू नका."

आईचं बोलणं ऐकून वासंतीला हसायला आलं. ती म्हणाली;"अग कसलं झपाटलेपण आणि काय. त्याबाजूने न जाता जर विरुद्ध बाजूने मी गेले न तर मला खूप जास्त चालावं लागेल. उगाच तुला कोणीतरी काहीतरी सांगत असतं हं. अग, मी सकाळी जाते न तेव्हा एक लहान मुलगा खेळत असतो बाहेर बागेत आणि त्याची आजी बसलेली असते झोपल्यावर. बहुतेक त्या मुलाची आई त्याला त्याचवेळेला दूध वगैरे पाजून आत जात असते. सरळ साधी माणसं वाटतात मला ती. कदाचित फार कोणाशी बोलत नसतील. पण म्हणून लगेच झपाटलेला वाडा म्हणून त्यांना वाळीत टाकणं योग्य नाही." आई यावर काहीतरी बोलणार होती इतक्यात बाबांनी वासंतीला हाक मारली आणि नवीन लावलेली झाडं बघण्यासाठी वासंती बागेत गेली. विषय तिथेच अर्धवट राहिला.

घरात वळताना मात्र आईने मनात ठरवलं की वासंती थोडी निवांत झाली की तिला सांगितलं पाहिजे की खरं तर त्या वाड्यात कोणीच राहात नाही; असं काळे वहिनी म्हणत होत्या.

सोमवारी देखील वाड्यावरून जाताना वासंतीला तो लहानगा खेळताना दिसला. वासंतीने मुद्दाम थोडं हळू चालत आतमध्ये डोकावल्यासारखं केलं. त्यामुळे त्या मुलाचं लक्ष तिच्याकडे गेलं. वासंतीला बघून त्याने हसत तिला टाटा केलं. वसंतीने देखील हसत हात हलवला. नंतर तिचं लक्ष झोपाळ्यावर बसलेल्या त्या मुलाच्या आजीकडे गेलं. आजींना हाक मारावी असं वासंतीच्या मानत आलं. पण आजींचं गेटकडे लक्ष नव्हतं आणि बहुतेक त्या जप करत असाव्यात असं वासंतीला वाटलं. कारण त्या एकटक कुठेतरी बघत होत्या आणि त्यांच्या हाताची एका लयीत हालचाल होत होती. म्हणून मग वासंती तशीच पुढे निघून गेली.

ऑफिसचं काम आता थोडं आटोक्यात यायला लागलं होतं. त्यामुळे आज वासंती थोडी वेळेत निघाली होती. संध्याकाळ झाली होती. पण पूर्ण सूर्यास्त झाला नव्हता. त्यामुळे छान उजेड होता आजूबाजूला. घराकडे जाताना वासंतीचं लक्ष परत एकदा त्या वाड्याकडे गेलं. तो सकाळचा मुलगा बागेत उभा होता. त्याची नजर काहीशी कावरी-बावरी झाल्यासारखी दिसत होती. तो एकदा गेटकडे आणि एकदा वाड्याच्या दिशेने बघत होता. त्याचे डोळे पाण्याने डबडबल्यासारखे वासंतीला वाटले. म्हणून थांबून तिने त्याला गेटजवळ बोलावलं. वासंतीला बघून तो धावत गेटच्या दिशेने आला. पण थोडं अंतर राखून आतच उभा राहिला.

"काय झालं बाळा? तू का रडतो आहेस?" वासंतीने प्रेमाने त्याला विचारलं.

"ताई, तू रोज आमच्या घरावरून जातेस न सकाळी? मी बघतो तुला रोज. आज तर मी तुला टाटा पण केलं." तो मुलगा रडवेला झाला होता तरी वासंतीला बघून बोलला.

त्यावर हसत वासंती म्हणाली;"हो. रोज जाते मी इथून. माझं ऑफिस आहे नं इथून थोडं पुढे. बरं, पण तू का रडतो आहेस? काय झालं?"

तिचा प्रश्न ऐकून त्या लहानग्याने डोळे पुसले आणि म्हणाला;"मी रडत नाही काही. थोडा गोंधळलो आहे. सगळे एकदम हरवले आहेत न. काय करावं सूचत नाही मला."

त्याचं बोलणं ऐकून वासंती गोंधळली आणि तिने विचारलं;"कोण हरवलं आहे?"

त्यावर वाड्याकडे हात करत तो म्हणाला;"सगळेच.... आजी, आई, बाबा आणि दादा. सगळेच आत हरवले आहेत. कधीपासून शोधतो आहे मी. पण मिळतच नाहीत मला ते."

त्याचं बोलणं ऐकून वासंतीला हसायला आलं आणि ती म्हणाली;"अरे, असे कसे हरवतील सगळे? आत असतील की घरातच."

त्यावर तिच्याकडे बघत तो म्हणाला;"हो ग ताई. मला पण वाटतं असतील. पण सापडत नाहीत ना."

वासंतीच्या मानत आलं त्याच्या घरातले सगळे गम्मत म्हणून लपून बसले असतील त्याच्यापासून आणि तो बावरला आहे ते त्यांच्या लक्षात आलं नसेल कदाचित. हा विचार आल्याने तिने त्या मुलाला म्हंटलं;"अरे बाळा, सगळे घरातच असतील. तू आत जा आणि हाका तर मार." मागे वळून घराकडे बघत तो म्हणाला;"ताई, खरंच सगळे हरवले आहेत ग आणि घरातले दिवे बंद आहेत. मला भीती वाटते." त्यावर हसत वासंती म्हणाली;"मी येऊ का तुझ्याबरोबर? आपण दोघे मिळून शोधुया तुझ्या आईला." तिने असं म्हणताच त्या मुलाने एकदा मागे वळून घराकडे बघितलं आणि परत वासंतीकडे वळत म्हणाला;"तू येशील आत? चालेल तुला? घाबरणार नाहीस न?" त्याचे प्रश्न ऐकून एकदा घड्याळाकडे बघत आणि हसत वासंती म्हणाली;"हो चालेल. आत्ता जेमतेम सात वाजले आहेत. आपण दोघे मिळून पटकन शोधू सगळ्यांना. तू आहेस न बरोबर मग मला नाही वाटणार भिती." असं म्हणत वासंतीने गेट उघडलं आणि आत शिरली.

वासंतीने पुढे होत त्या मुलाचा हात धरला आणि अचानक मागे गेट बंद झाल्याचा आवाज आला म्हणून मागे वळून बघितलं. गेट आपोआप बंद झालं होतं. साधं ग्रील्सचं गेट आपोआप कसं बंद झालं याचं वासंतीला जरा आश्चर्यच वाटलं. पण त्याकडे दुर्लक्ष करत तिने शेजारी त्या मुलाकडे बघितलं. पण तो मुलगा शेजारी नव्हताच. वासंतीने भुवया वर करत वाड्याच्या दिशेने बघितलं तर तो मुलगा पायऱ्या चढून घराच्या दाराजवळ उभा होता. वासंतीचं लक्ष जाताच त्याने तिला हात करून पुढे बोलावलं. तशी हसत हसत वासंती पुढे गेली. पायऱ्या चढत तिने विचारलं;"अरे घराच्या दारापर्यंत आला आहेस तर आत जायला का भिती वाटते तुला? बरं, चल आपण जाऊया." असं म्हणत तिने दार वाजवलं. तिला वाटलं दार वाजवल्यावर कोणीतरी नक्की येईल दार उघडायला त्या व्यक्तीला सांगावं की हा घाबरला आहे आणि मग मागे वळावं. पण दार दोनदा वाजवलं तरी कोणी आलं नाही. त्यावर तो मुलगा परत एकदा म्हणाला;"ताई, अग सगळे हरवले आहेत तर मग दार कोण उघडणार ग?"

त्याच्याकडे बघत "बरं" म्हणत वासंतीने दार थोडं ढकललं तर ते लगेच उघडलं गेलं. त्या मुलाचा हात धरत तिने घरात पाऊल ठेवलं. खरंच घरात खूप अंधार होता. अंदाजाने शेजारच्या भिंतीवर चाचपडल्यावर तिला दिव्याची बटणं हाताला लागली. तिने एक एक करत ती लावायला सुरवात केली. पण लख्ख उजेड पडण्या ऐवजी एक एक करत पिवळे दिवे लागले. वासंतीला थोडं विचित्र वाटलं. पण एकदा त्या मुलाकडे बघून तिने आतल्या दिशेने बघत हाक मारली... "कोणी आहे का? अहो, तुमचा हा लहानगा घाबरला आहे थोडा. जर त्याची गम्मत करायला तुम्ही सगळे लपले असाल तर बाहेर या."

वासंतीचा आवाज आत घुमला आणि विरून गेला. तिला ते थोडं विचित्र वाटलं. तो मुलगा वासंतीकडे बघत उभा होता. बाहेर बहुतेक आता आधारलं होतं आणि घरातले दिवे मंद होते. त्यामुळे त्याच्या चेहेऱ्यावरचे भाव तिला नीट कळत नव्हते. इतकी हाक मारून देखील कोणी कसं बाहेर येत नाही याचं तिला खूप आश्चर्य वाटलं. त्याचा हात धरत तिने आतल्या खोलीत जायला पाऊल उचललं.

वासंती एक एक करत प्रत्येक खोलीत जात होती. घरात सगळ्या वस्तू होत्या. दिवाणखान्यात सोफा सेट्स, आतल्या तिन्ही खोल्यांमधून मोठे मोठे पलंग, खिडकी लागत मोठी कपाटं. सगळं होतं; पण घरात राहणाऱ्या व्यक्तीच नव्हत्या. जसजशी वासंती आत जात होती; तसंतशी ती जास्त गोधळात पडत होती. एक एक खोली पार करत ती स्वयंपाकघरात पोहोचली. तिथे देखील तीच परिस्थिती होती. सगळं काही होतं तिथे.... आपण इतके आत आलो तरी आपल्याला कोणीच कसं अडवलं नाही; हा प्रश्न राहून राहून वासंतीला पडला होता. स्वयंपाकघरात आल्यावर तिला ताहान लागल्या सारखं झालं. म्हणून ती पाण्याचा माठ बघून त्याजवळ गेली. तिने माठ उघडून आत बघितलं तर तो पूर्ण रिकामा होता. तिला फारच आश्चर्य वाटलं. त्या मुलाकडे वळून बघत तिने विचारलं;"अरे यात अजिबात पाणी नाही. तुम्ही प्यायचं पाणी कुठे भरून ठेवता?" त्यावर तिच्याकडे बघत तो म्हणाला;"कोण भरणार पाणी ताई? सगळे हरवले आहेत नाही का? तुला मी सारखं सांगतो आहे की सगळे हरवले आहेत आणि तरी तुला वाटतंय हाक मारली की ते येतील. अग कोणीच तर नाही ना. म्हणून तर मला एकट्याला आत यायला भिती वाटते. म्हणून तर मी सारखा बागेतच खेळत असतो न."

वासंतीला त्याच्या त्या उत्तराने आता थोडं विचित्र वाटायला लागलं. हे काही बरोबर घडत नाही आहे; असा विचार पहिल्यांदाच तिच्या मनात आला. एकदा त्याच्याकडे बघून ती मागे वळली.

"काय झालं ताई? शोधायला मदत नाही करणार मला?" तो मुलगा तिला म्हणाला.

वासंतीने एकदा त्याच्याकडे बघितलं आणि म्हणाली;"अरे मी तर तुझ्या घरातल्या कोणालाही ओळखत नाही. कसं शोधणार? मला वाटलं होतं हाक मारली तर येईल कोणीतरी पुढे. पण कोणीच आलं नाही. आता मात्र मला उशीर होतो आहे. बघ; आत आले तेव्हा साडेसहा वाजले होते. आता साडेसात झाले. एक तास कसा गेला कळलंच नाही. तुझ्या घरातले सगळे हरवले आहेत. माझ्या घरातले नाहीत. त्यामुळे आता मला घरी गेलंच पाहिजे." असं म्हणून वासंतीने त्याच्याकडे पाठ केली आणि बाहेरच्या दिशेने चालू लागली. तिला त्या मुलाचा मागून आवाज आला;"ताई, नक्की नाही न हरवले तुझ्या घरातले?"

वासंती त्याचा प्रश्न ऐकून एकदम वैतागली. मदतीसाठी आले आणि हा अंगठ्याएवढा मुलगा आगाऊपणे मलाच काहीतरी विचारतो आहे. तिच्या मनात आलं. पण त्याला उत्तर द्यायला न थांबता वासंती त्या वाड्याच्या बाहेर आली आणि तरातरा चालत गेट जवळ येऊन तिने गेट उघडलं....

वासंती गेट बाहेर रस्त्यावर उभी होती. पण बाहेरचं काहीच तिला ओळखता येत नव्हतं. समोरचा रस्ता उत्तम डांबराचा होता. रस्त्यावर भरपूर उजेड असलेले दिवे होते. सतत वाहनं ये-जा करत होती. वासंती एकदम बुचकळ्यात पडली. अचानक या रस्त्यावर इतकी कशी रहदारी वाढली ते तिला कळेना. पण आता तिला भूक लागली होती. त्यामुळे मनातले प्रश्न मागे टाकत ती तिच्या घराकडे वळली.

मधला बंद बंगला सोडून ती तिच्या घराच्या गेटजवळ आली आणि वासंतीला मोठा धक्का बसला. तिथे एक मोठी इमारत उभी होती. एक मोठं उत्तम दर्जाचं गेट होतं त्या इमारतीला. गेटजवळ एक वॉचमन उभा होता. वासंतीचा गोधळलेला चेहेरा बघून तो वॉचमन स्वतः समोरून बोलायला आला.

"मावशी.... कोणाला शोधता आहात का?"

"मावशी? ओ दादा. मी काय तुम्हाला मावशी दिसते का?" त्याच्या मावशी या उल्लेखाने कावलेली वासंती एकदम आवाज चढवून म्हणाली.

त्यावर तिच्याकडे रागाने बघत तो म्हणाला,"मग काय तरुण पोरगी दिसते का ग म्हातारे तू? म्हातारी आहेस आणि कोणालातरी शोधते आहेस असं वाटलं म्हणून मदतीला पुढे आलो तर मलाच उलट बोलतेस?" असं म्हणून तो इमारतीचं गेट उघडून आत निघून गेला.

गेट बंद झालं आणि गेटवर लावलेल्या लहान लहान आरशाच्या तुकड्यांकडे वासंतीचं लक्ष गेलं आणि तिला मोठा धक्का बसला. तिला त्या आरशात तिच्या चेहेऱ्याची एक म्हातारी स्त्री दिसली......

वासंती त्या धक्याने मागे धडपडली आणि मागून येणाऱ्या एका गाडीसमोर आली. गाडीचा ब्रेक कचकचून लागला. पण तोवर उशीर झाला होता.... डोळे मिटताना वासंतीच्या मनात एकच शेवटचा विचार होता....

"माझे आई-बाबा कुठे गेले असतील? शोधलं पाहिजे त्यांना!!!"

समाप्त



Friday, March 26, 2021

9 मिनिटं 28 सेकंदांचा अनुभव

 लेखाचं शीर्षक वाचून 'ज्योतीने लिहिलेली अजून एक भय/रहस्य/गूढ कथा'असं वाटलं असेल न तुम्हाला? पण नाही हं! हा अनुभव खरा आहे आणि म्हणून तो भय/रहस्य/गूढ नाही तर खूप खूप आनंद आणि समाधान देणारा आहे. या नऊ मिनिटांची सुरवात झाली साधारण जानेवारीच्या मध्यावर. मी आणि माझी जिवलग मैत्रीण अर्चना गोरे बांद्राच्या ऍनिमेशन शिकवणाऱ्या इन्स्टिट्यूटला गेलो होतो. तिथले मॅनेजिंग डायरेक्टर श्री. मिलिंद वगळ यांनी त्यांची इन्स्टिट्यूट बघण्यासाठी आम्हाला बोलावलं होतं. त्यावेळी मी लिहिलेल्या एका कथेवर एक ऍमिनेटेड फिल्म करण्याचा मानस त्यांनी बोलून दाखवला. तिथून बाहेर पडल्यावर मी आणि अर्चना बराचवेळ गप होतो.... आणि मग दोघींनी एकाचवेळी म्हंटलं दुसऱ्या कोणाला आपली कथा देण्यापेक्षा आपणच करूया का एखादी शॉर्ट फिल्म! बस्... तो विचार मनात आला आणि मग मात्र मी अर्चना आणि मंदार आपटे (गायकगीतकार आणि संगीतकार) यांच्या मागे लागलो. 


आता कदाचित तुमच्या मानत येईल अर्चना आणि मंदारचा फिल्म बनवण्या संदर्भात काय संबंध? तर.... अर्चना आणि मंदार दोघांनी मिळून साठहुन अधिक शॉर्ट फिल्म्स, डॉक्युमेंटरीज आणि म्युझिकल सिंगल्सचे दिग्दर्शन केले आहे. काही advertisement videos देखील त्यांनी बनवले आहेत. अगदी professionally. त्यामुळे शूटिंग आणि त्यासंदर्भातला अनुभव त्यांना चांगलाच आहे. मात्र फिल्म जगत! एक वेगळंच विश्व! सिनेमागृहात जायचं सिनेमा बघायचा आणि आवडला/नावडला याची चर्चा करायची... इतकाच या विश्वाशी आजवर माझा संबंध होता. त्यामुळे पहिले अनेक दिवस आम्ही कोणत्या कथेवर शॉर्ट फिल्म करता येईल हे ठरवण्यात घालवले. सरते शेवटी 'स्टुडिओ अपार्टमेंट' नावाची माझी एक कथा आहे. ती नक्की झाली. कथेचं स्क्रिप्ट लिहिणं हा पुढचा प्रश्न होता. तसं अर्चना आणि मंदारला स्क्रिप्ट लिहिणं शक्यच होतं. पण माझा आग्रह होता की मीच लिहीन. त्यांनी दोघांनी त्यासाठी 'हो' म्हंटलं आणि मी लिहायला बसले. पण.... स्क्रिप्ट लिहायचं??? म्हणजे नक्की काय असतं? बरं! फुशारकीने मीच लिहिते असं म्हंटल्यामुळे परत त्या दोघांना 'कसं लिहू'; म्हणून विचारणं जीवावर आलं होतं. सहज मनात आलं 'सतीश'जींना (सतीश राजवाडे, खरंच वेगळी ओळख सांगायला हवी का?) विचारून बघावं का? माझ्या मूळ स्वभावप्रमाणे मानत आलं आणि त्यांना फोन लावला. सतिशजींनी फोन लगेच घेतला.

मी : हॅलो, सतिशजी नमस्तकार. तुम्हाला थोडा त्रास देते आहे, पण मला माझ्या एका कथेवर शॉर्ट फिल्म बनवायची आहे; पण स्क्रिप्ट कसं लिहितात मला माहीत नाही. याविषयी मी कोणाशी बोलू शकते का? 

'तुम्ही कसे आहात? आत्ता बिझी आहात का?' सर्वसाधारणपणे आपण अशी सुरवात करतो कोणत्याही फोनवर. पण मी मनातून इतकी अस्वस्थ होते आणि 'स्क्रिप्ट लेखन' याबद्दल इतकी गोंधळले होते की लगेच विषयालाच हात घातला. खरं कौतुक स्टीशजींचं. अगदी शांतपणे त्यांनी उत्तर दिलं.

सतिशजी : अरे वा. मॅडम, फारच छान. स्क्रिप्ट लिहिणं तसं फार अवघड नाही.....

असं म्हणत पुढचा जवळ जवळ अर्धा-पाऊण तास त्यांनी मला खूप व्यवस्थित स्क्रिप्ट लेखनाबद्दल समजावलं. त्यानंतर त्यांनी विचारलं...

सतिशजी : फिल्म का बनवता आहात?

मी : माझ्या मनात फेस्टिव्हल्समध्ये भाग घ्यायचा आहे. पण अर्थात ते देखील मला फारसं माहीत नाही. पण मी जी माहिती काढली आहे त्याप्रमाणे काही agents असतात; जे हे काम करतात.

सतिशजी : अरे agents का हवेत तुम्हाला? गुगलवर जाऊन तुम्ही search करा. या वर्षीचे सगळे फेस्टिव्हल्स तुम्हाला दिसतील. त्यातले तुम्हाला जे योग्य वाटतात त्या sites वर जाऊन फॉर्म भरा. सुरवातीला थोडा वेळ लागेल; पण तुमचं तुम्ही करू शकता हे. अगदी सोपं असतं. त्यात अजून काही मदत हवी असेल तर नक्की फोन करा; मला जमेल तशी मदत करेन.

सतिशजींनी माहिती दिली आणि फोन ठेवला. बोलणं झालं आणि मग माझ्या लक्षात आलं.... इतक्या मोठ्या माणसाने अगदी सहज एका फोनवर मला स्क्रिप्ट लिहिण्यासंदर्भात माहिती दिली होती. इतकंच नाही तर स्वतःहून फेस्टिव्हल्स संदर्भात माहिती दिली होती. खरंच काही लोक मोठ यश मिळवतात; खूप खूप नाव कमवतात. पण खरं कौतुक हे असतं की ते मनाने जास्त मोठे असतात. खरंच स्तिशीजींशी बोलल्यानंतर तर माझा आत्मविश्वास खूपच वाढला.

स्क्रिप्ट लिहून झालं आणि मी, अर्चना आणि मंदार चर्चेला बसलो. फिल्ममध्ये किमान दोन मुली आणि एक मुलगा अशी महत्वाची पात्र होती. त्याव्यतिरिक्त एक भूत (स्त्री) हवं होतं. पहिलीच फिल्म असल्याने कमीत कमी खर्च याला सर्वात पाहिलं प्राधान्य होतं. त्यामुळे अभिनयासाठी माझ्या दोघी लेकी; शिवानी आणि सानिया यांच्याशी अर्चनाने बोलणं केलं आणि त्यांचा होकार घेतला. महत्वाचं पात्र होतं वेडा वॉचमन. यासाठी एक कसलेला अभिनेता हवा होता. तेही आमच्या बजेटमध्ये बसेल असा. जितेंद्र आगरकर एक उत्तम अभिनेता आहे. अनेक वर्ष अभिनय क्षेत्रात काम केलेला आणि अनेक बक्षिसं मिळवलेला असा हा अभिनेता आहे. त्याला विचारलं आणि त्याने देखील लगेच होकार दिला. तारिख ठरली आणि शूटिंग देखील सुरू झालं. मिहीर कारखानीस आणि सागर पटवर्धन हे तरुण आणि अगदी नव्या दमाचे कॅमेरामन होते. जेमतेम दोन दिवसात शूटिंग आटपलं. मात्र पुढचे आठ दिवस फिल्मवरच्या संस्कारात गेले. 

भयपट असला तरी कुठेही बीभत्स चेहेरे किंवा रक्ताचा सडा असं काही वापरायचं नाही हे आम्ही ठरवलं होतं. याठिकाणी अर्चना आणि मंदार यांच्या संगीत जगताशी निगडित असण्याचा खूप उपयोग झाला. संपूर्ण सिनेमा हा योग्य ठिकाणच्या music मुळे जास्त परिणामकारक झाला.

फिल्म तयार झाली आणि एक दिवस मी आणि अर्चना गुगलवर वेगवेगळे फेस्टिव्हल्स शोधायला बसलो. प्रत्येक site वर जायचं माहिती वाचायची. त्यांची एन्ट्री फी बघायची आणि मग फॉर्म भरायचा की नाही ते चर्चा करून ठरवून त्याप्रमाणे ते काम पूर्ण करायचं. तीन दिवस बसून आम्ही एकूण नऊ फेस्टिव्हल्स ठरवले आणि त्यांचे फॉर्म्स भरले. आता WAIT AND WATCH PERIOD सुरू झाला. तसं काही करण्यासारखं उरलं नव्हतं. त्यामुळे या फेस्टिव्हल्सचे निकाल लागेपर्यंत थांबायचं होतं.

..... आणि फेब्रुवारीच्या एकोणीस तारखेला मला फोन आला. पॅनोरमा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल आणि महाराष्ट्र इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल या दोन्हीचे श्री. विक्रांत मोरे यांचा मला फोन आला. 

विक्रांतजी : नमस्कार, आपण ज्योती अळवणी का? 

मी : हो

विक्रांतजी : मी विक्रांत मोरे बोलतो आहे. आपण आमच्या फिल्म फेस्टिव्हलमध्ये आपल्या शॉर्ट फिल्मची एन्ट्री दिली आहे. मी आत्ताच ही फिल्म बघितली. अत्यंत उत्तम काम आहे. आपण फॉर्ममध्ये म्हंटलं आहे की ही आपली पहिलीच फिल्म आहे. 

मी : हो सर. हा आमचा पहिलाच प्रयत्न आहे. 

विक्रांतजी : अरे वा! मला वाटलं होतं की चुकून 'first attempt' colomn click झाला आहे. फारच उत्तम फिल्म केली आहात. तुम्ही स्वतः प्रोड्युसर का?

मी : हो

विक्रांतजी : महिला दिग्दर्शक आहे का या हॉरर फिल्मची

मी : हो. co-diector महिला आहे.

विक्रांतजी : OK. माझ्या ऑफिसमधून आपल्याला फोन येईल

आमचं इतकंच बोलणं झालं आणि फोन बंद झाला. थोडं बरं वाटलं की आपल्या पहिल्याच फिल्मचं कोणीतरी कौतुक केलं. पण मला थोड्याच वेळात परत फोन आला. यावेळी फोन विक्रांतजींच्या ऑफिसमधून होता. मला आमच्या फिल्म संदर्भात सगळे details परत एकदा विचारले गेले आणि मग ते सोनेरी शब्द मी ऐकले...

Madam, your film is nominated for Panorama and Maharashtra International Film Festivals in asociation with Film Division Government of India. Nomination is for Filmmaker female director for Horror short film.

अहाहा!!! पहिलीच फिल्म आणि तिला एका महिन्याच्या आत नॉमिनाशन! आमच्या आनंदला पारावार नव्हता; आणि मग वाट बघणं सुरू झालं ते या कार्यक्रमाचं. शेवटी ती तारीख आली. 19 मार्च 2021!

अत्यंत मवाळ आणि शांत स्वभावाच्या अर्चनाला आम्ही सतत चिडवत होतो की भयपट दिग्दर्शक म्हणून पहिलं पारितोषिक मिळणार तुला आणि ती तिच्या स्वभावानुसार हसून सोडून देत होती.

कार्यक्रम होता अंधेरीला क्रिस्टल पॉईंट मॉलमध्ये. आम्ही तिथे पोहोचलो. कार्यक्रमाला सुरवात झाली आणि एक एक अवॉर्डस् जाहीर होत होते. अनंत जोग, उपेंद्र लिमये आणि उषा नाडकर्णी असे मोठे मोठे कलाकार उपस्थित होते. वेगवेगळ्या फिल्म्स मधील त्यांच्या अभिनयासाठी त्यांना पारितोषिक जाहीर झालं. काही फिल्मसना आजवर अनेक अवॉर्डस् मिळाल्याचा उल्लेख, काही music videos ना जाहीर झालेले पारितोषिक यामुळे आता आपला नंबर लागणं शक्य नाही असं मनात कुठेतरी यायला लागलं.....

.... आणि अचानक घोषणा झाली. 

शॉर्ट फिल्ममध्ये पदार्पणातच भयपट दिग्दर्शन करण्यासाठी Best Women Filmmaker म्हणून अर्चना गोरे यांना पारितोषिक देण्यात येत आहे. आमच्या आनंदाला पारावार नव्हता. अर्चना तर पूर्ण गोंधळून गेली क्षणभरासाठी. मंचावर जाऊन तिने पारितोषिक स्वीकारलं आणि आभारचं बोलायला माईक हातात घेतला. असंख्य वेळा मंचावर उभं राहून हातात माईक घेऊन ती गायली आहे. गायनासाठी मिळालेल्या परितोषिकांसाठी आभाराचे दोन शब्द बोलली आहेच. पण तरीही हा क्षण वेगळा आणि खास होता.

तिच्या पहिल्याच शॉर्ट फिल्मसाठी तिला दिग्दर्शक म्हणून पारितोषिक मिळालं होतं. आवाज काहीसा भरून आला होता तिचा. कौतुकाने तिने मला (निर्माती म्हणून) आणि मंदारला (सह-दिग्दर्शक) म्हणून तिच्या सोबत मंचावर बोलावलं. आम्ही तिघांनी मिळून पारितोषिक स्वीकारलं. त्यानंतर मिडियासमोर आम्ही बोललो. माझ्यासाठी तर हा संपूर्ण वेगळा आणि शब्दांपालिकडचा अनुभव होता. 

परत आमच्या जागेवर येऊन बसलो आणि मी, अर्चना, मंदार आणि आमच्या सोबत आमचं कौतुक करायला आलेली मंदारची सुविद्य (शास्त्रीय गायक) पत्नी स्वाती आम्ही पटापट फोन्स करायला सुरवात केली. फोन जेमतेम चार केले आणि मग मात्र फोन करणं शक्य होईना कारण आम्हाला फोन्स यायला लागले. कौतुकाचा पाऊस पडत होता आमच्यावर. खरं कौतुक जरी अर्चनाचं असलं तरी जणूकाही आम्हाला सगळ्यांनाच ते पारितोषिक मिळालं आहे असं फोन करणाऱ्या प्रत्येकाचं आमच्याशी बोलणं होतं.

पहिल्याच प्रयत्नाला शिरपेचात सोनेरी मोरपीस खोचलं जाणं म्हणजे काय याचा अनुभव आम्ही घेतला. अर्थात त्यामुळे पुढची जबाबदारी वाढली आहे. पुढे करू ते काम याहूनही उत्तम आणि प्रेक्षकांच्या पसंतीला पूर्ण उतरेल असंच करू हे नक्की. 

आजवर तुम्हा सर्वांचं प्रेम आणि कौतुक आम्हाला सर्वांनाच मिळत आलं आहे; ते असंच वृद्धिंगत होवो ही श्रीचरणी प्रार्थना. धन्यवाद!

या कार्यक्रमाच्या वेळचे आमचे फोटो आणि आमच्या शॉर्ट फिल्मचं ट्रेलर देखील येथे जोडत आहे. आवडलं तर जरूर प्रतिक्रिया नोंदवा.







We got the esteem logo for our short film poster.



photo with Mr. Vikrant More. The Director of Panorama and Maharastra International films festival




The award winning girl


emotional moment for Archana, Mandar and Me




Appriciation from Mr. Vikrant More


Media moment for us


A photo moment with Ushatai Nadkarni


THE TROPHY!!



AND THE RED CARPET WALK OF ARCHANA!





Treler of our short film 'Studio Appartment'

















Friday, March 19, 2021

सन्मान स्त्रीत्वाचा

सन्मान स्त्रीत्वाचा

नका होऊ नतमस्तक
मी कोणी देवता नाही..
नका म्हणू अष्टभुजा;
मी काली-भवानी नाही!

कधी मखरात... कधी वेश्यागारात...
मान मात्र कधीच नाही!
मनुष्य जन्म माझा ही;
एवढंच स्वीकारणं का शक्य नाही?

जग तुझ्या मनासारखं...
तुला कोणतंही बंधन नाही!
एकदा तिला हे सांगून तर बघा...
अवकाशला गवसणी घालणं खरंच अशक्य नाही!!!

(एक वेगळा प्रयोग केला आहे. ही कविता मी स्वतः विडिओ स्वरूपात देखील सादर केली आहे. त्याची लिंक खाली दिली आहे. तिला स्पर्श करताच विडिओ चालू होईल)

Friday, March 12, 2021

व्हर्चुअल वर्ल्ड

 व्हर्चुअल वर्ल्ड


अनिकेत आणि सुरभी दोन वर्षांपूर्वी एकमेकांना भेटले ते एका मल्टिनॅशनल कंपणीमधल्या इंटरव्ह्यूच्या ठिकाणी. अनिकेत सॉफ्टवेअर इंजिनिअर होता आणि सुरभीचा इंटरव्ह्यू HR डिपार्टमेंटमध्ये होता. इंटरव्ह्यूसाठी थांबले असताना झालेली ओळख दोघांना त्याच कंपनीमध्ये नोकरी लागल्याने वाढत गेली आणि दोघे कधी प्रेमात पडले ते कळलंच नाही. दोघे दोन वेगळ्या ठिकाणी राहात होते; पण वर्षभरात त्यांनी मिळून एक फ्लॅट भाड्याने घेतला आणि एकत्र राहायला लागले.

सुरभी अत्यंत बडबडी होती. त्यामानाने अनिकेत शांत स्वभावाचा. सुरभिचे अकाउंट्स सगळ्या सोशल मीडियावर होते. तर अनिकेत गरज म्हणून फक्त whatsapp वापरत होता. सुरभीला सतत live राहायला आवडायचं तर अनिकेतचं म्हणणं असायचं की आपलं वयक्तिक आयुष्य का सांगायचं दुसऱ्याला? दोघांचे वाद झालेच तर फक्त या एकाच विषयावर होते. पण नव्या नव्हाळीचं प्रेम असल्याने ते वाद प्रेमाच्या ढगात विरून जात होते.

अनिकेत रागावला तर सुरभी त्याला काहीतरी सरप्राईज द्यायची आणि ती रुसली तर अनिकेत तिला मस्का मारायची एकही संधी सोडायचा नाही. दोघांचं कसं छान चालू होतं.

आता दोघांनीही आपापल्या घरी एकमेकांबद्दल सांगितलं होतं. तसं नाही म्हणण्यासारखं काहीच नसल्याने दोघांच्याही घरचे लग्नाची घाई करायला लागले होते. मात्र सुरभीचं म्हणणं होतं की त्याने अजून मला ऑफिशिअली प्रपोज नाही केलेलं... तोपर्यंत लग्न काय मी साखरपुडा देखील करणार नाही. तिला एकदम रोमॅंटिक प्रपोजल हवं होतं. अनिकेतला वाटत होतं असं सिनेमातल्या सारखं काही करण्याची खरंतर काही गरज नाही. त्याला असं काही करायची इच्छा देखील नव्हती. पण तिचं मन मोडायला नको म्हणून तो देखील खास दिवसाचं प्लॅंनिंग करत होता.

पुढच्या महिन्यात सुरभीचा जन्मदिवस होता. तारीख होती तीन. अनिकेतने ठरवलं होतं की प्रत्येक दिवशी काहीतरी खास वेगळं असं करायचं सुरभीसाठी आणि जन्म दिवसादिवशी प्रपोज करायचं. सुरभीला याची कल्पना देखील नव्हती. अनिकेत कदाचित तिच्या वाढदिवशीच तिला प्रपोज करेल असा तिचा कयास होता. त्यामुळे ती अधून मधून त्याबद्दल बोलून त्याच्या तोंडून वदवून घ्यायचा प्रयत्न करत होती.

सुरभी : You are on facebook live Aniket.... so tell me how much do u love your girlfriend?

अनिकेत : सुरभी! हे facebook live बंद कर बघू आधी.

सुरभीने facebook live पॉज केलं आणि तशीच स्क्रीनमधून अनिकेतकडे बघत म्हणाली; "असं काय करतोस रे? गंम्मत म्हणून थोडा वेळ बोल न...." आणि परत चालू करत तिने सुरू केलं

सुरभी : So tell me Aniket; how will you explain your love for your girlfriend?

अनिकेत : I love my girlfriend and I think that is very personal. So I don't have to explain it to all those who are going to watch this video just for few seconds.

अनिकेतचं उत्तर ऐकून सुरभी नाराज झाली आणि facebook live बंद करत हॉलमध्ये निघून गेली. थोडा वेळ तसाच गेला आणि अनिकेत सुरभिजवळ जाऊन बसला.

अनिकेत : सुरभी हे सतत इथे तिथे live जायचं आणि आपल्या आयुष्यातले नाजूक सुंदर क्षण लोकांसमोर उघडे करायचे.... हे मला काही पटत नाही.

सुरभी : पण अनिकेत, त्यात इतकं वाईट काय आहे ते तर सांग. का आवडत नाही तुला हे सगळं? अरे, तू देखील याच जनरेशनचा आहेस न? मग का एकदम आजोबांसारखं बोलतोस? आपण दोघे एकाच ऑफिसमध्ये असून देखील संपूर्ण आठवडा आपापल्या कामात असतो. आपण एकमेकांना भेटत नाही नीटसे; मित्र-मैत्रिणींना भेटणं अशक्य असतं. त्यात weekends ना तुला फक्त तू आणि मी असावं असं वाटतं. त्यामुळे आपण फारसं कोणालाही भेटत नाही. मग एकमेकांच्या आयुष्यातले updates कसे कळणार रे?

अनिकेत : पण सुरभी, मित्र-मैत्रिणींबद्दल माझं काहीच म्हणणं नाही. तुला देखील माहीत आहे की मी introward असलो तरी मला देखील friends बरोबर chill करायला आवडतं. आपण जवळ जवळ दर शनिवारी भेटतो आपल्या friends ना. आपल्या आयुष्यात घडणारे छान प्रसंग आपण एकमेकांना सांगत असतोच न भेटल्यावर?

सुरभी : हो! भेटतो न; आणि सांगतो देखील. तुझ्या आणि माझ्या आई-बाबांनी लग्नाला होकार दिला तो गुरुवारी आणि आपण सगळ्यांना पार्टी कधी दिली? रविवारी. तोपर्यंत कोणालाही माहीत नव्हतं की आपण घरी सांगितलं आहे. बरं, सांगितलं ते कोणाला? त्याच त्या friends ना. ज्यांना आपण दर शनिवार-रविवार भेटतो. अरे पण facebook, instagram, twiter या सगळ्यांमधून आपण वेगवेगळ्या लोकांना भेटत असतो. नवीन मित्र-मैत्रिणी भेटतात आपल्याला या social media वर. नवीन ओळखी होतात. आपल्या आयुष्यातले मजा असते रे.

अनिकेत : सुरभी, Don't you know, it is actually called vertual world. अग ते आभासी जग आहे ग. तिथे तू ज्यांना भेटतेस आणि ज्यांना friends या संज्ञेमध्ये घालते आहेस; त्याच्याबद्दल तुला काय माहिती आहे? नाव वैभव आणि फोटो एका stylish hunk चा आणि खऱ्या आयुष्यातली वैभवी; असं असतं या social media मध्ये. या असल्या आभासी लोकांना आपल्या आयुष्यात काय घडतं आहे ते का सारखं सांगायचं आपण?

सुरभी अनिकेतच्या बोलण्याने फारच वैतागली आणि म्हणाली;"कसलं आभासी जग आणि मित्र-मैत्रिणींसाठी कसल्या संज्ञा घेऊन बसला आहेस तू अनिकेत? अरे, आपल्या पोस्ट्स ना किती likes असतात आणि आपले video किती realistic आणि तरीही वेगळे असावेत यातच खरी गंम्मत असते. पण जाऊ दे. तुला नाही कळणार."

सहज गप्पांमधून सुरू झालेला विषय कुठल्याकुठे गेला आणि शेवट वादाने झाला.

प्रेम खूप होतं दोघांचंही एकमेकांवर. पण हे vertual world/आभासी जग दोघांच्याही मधली भिंत व्हायला लागलं होतं. सुरभीला अजून अनिकेतच्या नाराजीची पूर्ण कल्पना आली नव्हती. त्यामुळे ती या वादांना पेल्यातली भांडणं म्हणून सोडून देत होती. अनिकेत मात्र अशा प्रत्येक वादानंतर मनातून अस्वस्थ होत होता. त्याला नक्की काय पटत नाही ते सुरभीला सांगता येत नव्हतं; आणि अस्वस्थ मन ताब्यात देखील राहात नव्हतं.

पुढच्या महिन्याची पहिली तारीख सुरू झाली आणि अनिकेतने सकाळी सकाळी सुरभीला उठवलं. तिच्या समोर एक मस्त सजवलेलं टी-टेबल होतं. छान गरम गरम वाफाळता चहा, बाजूला गरम गरम पोहे, कलिंगडाच्या रसाचा ग्लास आणि एक सुंदर लाल गुलाबाचं फुल. अहाहा! सुरभीने डोळे उघडल्या उघडल्या हे बघितलं आणि ती फारच सुखावली. तिने अनिकेतकडे बघत एक फ्लाईंग किस दिली आणि घाईघाईने मोबाईल हातात घेतला. अनिकेतला काहीतरी सांगायचं होतं सुरभीला. पण सुरभीचं त्याच्याकडे लक्षच नव्हतं. तिने फेसबुक लाईव्ह करत बोलायला सुरवात केली...

"माझ्या गोड गोड बॉयफ्रेंडने आज मला एक वेगळंच सरप्राईज दिलं आहे. हे बघा! गरम गरम चहा, वाफळते पोहे आणि गार गार ज्युस.... त्यासोबत एक मस्त रोमँटिक टच असलेला लाल गुलाब. What more will I ask for?"

सुरभीने फेसबुक लाईव्ह बंद केलं आणि अनिकेतकडे बघितलं. त्याचा चेहेरा काहीसा उतरला होता. पण तिचं लक्ष आहे म्हंटल्यावर त्याने स्वतःला सावरलं आणि हसत हसत म्हणाला;"झालं का तुझं लोकांना सांगून? आता मी काही बोलू का?" सुरभी देखील हसत हसत 'हो' म्हणाली आणि त्याच वेळी तिचा फोन बीप व्हायला लागला. तिला काही क्षणातच कंमेंट्स यायला लागल्या. तिने फोन हातात घेतला आणि खुशीत चित्कारली;"हे... हे बघ! किती लाईक्स आहेत आपल्या फेसबुक लाईव्हला. प्रत्येकजण तुझं कौतुक करतो आहे; म्हणे फारच रोमँटिक आहेस तू. बघ बघ... फारच बुवा फेमस व्हायला लागला आहेस ह तू!" सुरभी तिच्याच नादात होती. पण तिने फोन हातात घेताच अनिकेत फारच नाराज झाला होता.

त्याला सुरभिशी बोलायचं होतं. खूप काही सांगायचं होतं. पण ती तिच्याच नादात होती. तिचा चेहेरा आनंदने बहरला होता. त्यामुळे तिचा आनंद कमी व्हायला नको म्हणून तो गप बसला. मात्र त्याच्या मनात एका क्षणासाठी येऊन गेलंच; 'हिला मी हवा आहे की फक्त मी केलेलं हे सगळं सरप्राईज? हे सगळं करतानाचं माझं तिच्याबद्दलचं प्रेम तिच्या लक्षात येतंय का?'

अनिकेत उठला आणि ऑफिसची तयारी करायला लागला. सुरभीने देखील तिचा सोशल मीडिया आवरता घेत तयारी केली आणि दोघेही घाईघाईत ऑफिसला जायला निघाले. घराचं दार ओढून घेताना अनिकेतची नजर गार झालेल्या चहावर आणि नेवून गेलेल्या पोह्यांवर गेली आणि त्याचं मन अजूनच दुखावलं.

त्यादिवशी अनिकेतला ऑफीसमध्ये बरंच काम आलं. दोन महत्वाच्या मीटिंगस लागोपाठ लागल्या. त्यामुळे सुरभी एकटीच घरी आली. दुसऱ्या दिवशी देखील त्याच्या मनात असणारं असं तो काही करू शकला नाही. कारण दोघांनाही ऑफिसमध्ये बरंच काम होतं; त्यामुळे दोघेही घाईनेच निघाले. मात्र अनिकेतने मनापासून ठरवलं होतं की आज देखील तिच्यासाठी काहीतरी खास करायचं. त्यामुळे संध्याकाळी त्याने तिला एक whatsapp मेसेज केला की काही कामासाठी त्याला लवकर निघावं लागणार आहे आणि तो थेट घरीच येईल. सुरभीने मेसेज बघितला आणि OK म्हंटलं.

साधारण आठच्या सुमाराला सुरभी घरी पोहोचली. तिने दार उघडलं तर घरात पूर्ण अंधार होता. अनिकेत सहसा इतका अंधार ठेवत नसे. तिने चाचपडत दिव्याची बटणं चालू केली. पण दिवे लागलेच नाहीत. तिला थोडंसं आश्चर्य वाटलं. घराच्या बाहेर पॅसेजमध्ये तर दिवा चालू आहे. तिची नजर खिडकी बाहेर गेली आणि तिच्या मानत आलं; 'अरे बाहेर देखील दिवे चालू आहेत; मग घरातले दिवे का लागत नाहीत? बिल भरायचं राहिलं की काय?' ती विचार करतच होती इतक्यात अचानक संपूर्ण हॉलमध्ये फेरी लाईट्स लागले. लुकलूकणारे वेगवेगळ्या आकाराच्या आणि रंगाच्या दिव्यांच्या माळा मंद प्रकाशात उजळत होत्या. तिने नजर उचलून बघितलं तर अनिकेत खोलीच्या एका कोपऱ्यात हसत उभा होता. सुरभीचं लक्ष जाताच त्याने जवळच्या सुंदर कॅडल्स लावल्या आणि हलकी हलकी पावलं टाकत तिच्या जवळ यायला लागला. सुरभिचा चेहेरा आनंदने फुलला होता.... आणि तिने झटकन तिचा मोबाईल हातात घेतला. ती घाईघाईने संपूर्ण हॉलचे फोटो काढत होती आणि विडिओ काढत होती. तिची कृती बघून अनिकेत थबकला.

सुरभीचं त्याच्याकडे लक्षच नव्हतं. ती काढलेले फोटो आणि विडिओ पोस्ट करण्यात गुंतली होती. अनिकेतने तिला हाक मारली.... सुरभी!

सुरभी : हम्म?

अनिकेत : इथे बघ तर खरं!

सुरभी : काय रे? एकच मिनिट हं. झालंच.

अनिकेत : खरंच ते फोटो आणि ते विडिओ इतके महत्वाचे आहेत का? मी काहीतरी सांगतो आहे ग.

अनिकेतचा आवाज काहीसा दुखावला होता. सुरभीच्या ते लक्षात आलं आणि तिने पटकन मोबाईल असलेला हात खाली घेतला आणि पुढे झाली. अनिकेतच्या गालावर एक हलकीशी किस करत म्हणाली;"sweetheart, U really made my day. Trust me, had never expected this. खरंच खूप खूप खुश आहे मी."

तिचं बोलणं ऐकून अनिकेत सुखावला. क्षणापूर्वी दुखावलेल्या मनाला आतल्या आत समजावत त्याने सुरभीचा हात धरला आणि तिला सोफ्यावर बसवत त्याने तिच्या हातात एक गिफ्ट ठेवलं. ते गिफ्ट बघून सुरभी सुखावली आणि म्हणाली;"उद्याचं गिफ्ट आजचं? का रे?"

त्यावर हसत तो म्हणाला;"हे आजचं आहे माझ्या राणी. उद्यासाठीची तयारी आहे ती. बघ तर खरं उघडून."

त्याच्याकडे प्रेमळ नजरेने बघत सुरभीने गिफ्ट उघडलं. आत एक अत्यंत सुंदर डिनर गाऊन होता. तो हातात घेत सुरभी उभी राहिली आणि तिने तो अंगाला लावला. इतका सुंदर ड्रेस बघून ती फारच खुश झाली. परत एकदा अनिकेतला किस करत ती चित्कारली.... thank you so much my sweets....

तिचे हसरे डोळे बघत अनिकेतने काहीतरी बोलायला तोंड उघडलं.... पण सुरभी तो ड्रेस अंगावर वागवत फोन हातात घेऊन सेल्फी काढण्यात गुंतली होती. वेगवेगळ्या अँगल्सने स्वतःचे फोटो काढत ते पोस्ट करण्यात ती गुंतली आणि एक हताश नजर तिच्याकडे टाकून अनिकेत आतल्या खोलीत गेला. जाता जाता फक्त तिला ऐकू जाईल अशा आवाजात म्हणाला;"उद्या आपण डिनरला जातो आहोत." फोटो काढण्यात मग्न सुरभीने फक्त 'OK' म्हंटलं. खोलीपर्यंत गेलेल्या अनिकेतने एकदा मागे वळून बघितलं आणि नकारार्थी मान हलवून तो आत जाऊन झोपून गेला.

त्या रात्री बारा वाजता सुरभीला अनेक फोन्स आले.... ती प्रत्यकाकडे अनिकेतचं कौतुक करत होती. आदल्या दिवशीचा ब्रेकफास्ट आणि आज संध्याकाळचं सरप्राईज. तिच्यासाठी दोन्ही खूप खास होतं; हे ती प्रत्येकाला सांगत होती. पण अनिकेतला यातलं काहीच माहीत नव्हतं. कारण तो गाढ झोपला होता.

आज सुरभीचा वाढदिवस होता. उगाच सुट्टी घेण्यापेक्षा रात्री मस्त डिनर करायचं दोघांनी ठरवलंच होतं. त्यामुळे दोघेही ऑफिसला गेले. तिचा वाढदिवस ऑफिसमध्ये देखील मस्त साजरा झाला. दोघा लव्ह बर्डसना काहीसं लवकर निघायची परवानगी देखील मिळाली.

अनिकेत आणि सुरभी घरी पोहोचले.

सुरभी : कुठे जाणार आहोत आपण अनिकेत?

अनिकेत : तुझ्यासाठी सरप्राईज आहे ते राणी. बस् तयार हो मस्त.

त्याचं बोलणं ऐकून सुरभी हसली आणि तयार व्हायला आत पळाली.

दोघे घरातून बाहेर पडले त्यावेळी अगदी दृष्ट लागेल असा जोडा दिसत होता. नेहेमीप्रमाणे सुरभीने वेगवेगळ्या अँगल्सने दोघांचे आणि तिचे एकटीच फोटो काढलेच. पण अनिकेत काही म्हणाला नाही. आजचा दिवस तिचा आहे; तिला उगाच नाराज का करा; असा विचार त्याने केला.

अनिकेतने एका फाईव्ह स्टार हॉटेलच्या टेरेसवर खास टेबल बुक केलं होतं. सुरभी प्रत्येक क्षणाला खुश होत होती. तिचा फोन एका सेकंदासाठी देखील बंद नव्हता.

आम्ही एका खास डिनरसाठी आलो आहोत....
हे टेरेस... इथला व्यु अप्रतिम आहे....
कॅडल लाईट डिनर.... माझं स्वप्न मी जगते आहे....
रेड वाईन.... अहाहा.... अजून काय हवं वाढदिवसा दिवशी....
अनिकेत समोर आहे... तो ऑर्डर देतो आहे....
हे खास पदार्थ आहेत या हॉटेलचे....
अय्या.... व्हायोलिन वादक??? कित्ती गोड.....

सुरभीची सतत कॉमेंट्री चालू होती....... कारण ती घरातून निघाल्यापासून फेसबुक लाईव्ह होती. तिने क्षणासाठी देखील तिचा फोन बंद केला नव्हता.

हळूहळू अनिकेतची नाराजी वाढायला लागली होती. पण अजूनही तिला वाईट वाटू नये म्हणून तो काही बोलला नव्हता. डेझर्ट आलं.... सुरभीला आवडणारी कुल्फी होती. वेगवेगळ्या प्रकारे फोटो काडून कुल्फी खायचं सोडून ती ते फोटो अपलोड करण्यात गुंतली. आता मात्र अनिकेतचा बांध फुटला आणि तो काहीशा तीव्र स्वरात म्हणाला;"अग बाकी सगळं थांबेल एकवेळ पण ती कुल्फी तुझे फोटो होईपर्यंत वितळून जाईल त्याचं काय? खा की ग नीट. तुझं सगळं लक्ष त्या फोनमध्ये आहे."

त्याचं बोलणं ऐकून सुरभीने क्षणासाठी फोन बाजूला केला आणि त्याच्याकडे बघत म्हणाली;"अनिकेत, कसं कळत नाही तुला? हीच तर खरी मजा आहे. हे जे काही आज तू माझ्यासाठी केलं आहेस ते मला सगळ्यांना सांगायचं आहे. मी तुझ्यासाठी किती स्पेशल आहे ते सगळ्यांना समजलं पाहिजे न."

अनिकेत : अग, तुला माहीत आहे न? बास की. सगळ्यांना का सांगायला हवं? काय फरक पडतो त्यांना? सुरभी आजचा दिवस तुझ्यासाठी आणि माझ्यासाठी खास आहे ग. इतरांसाठी नाही. बघ तरी माझ्याकडे एकदा.

अनिकेत पोटीडकीने म्हणाला पण सुरभिचं त्याच्याकडे लक्षचं नव्हतं. खिशातून बाहेर काढलेली अंगठी परत आत ठेवत हताशपणे अनिकेतने बिल मागवलं आणि पैसे देऊन तो उभा राहिला. तो उठला तशी सुरभी देखील उठली आणि त्याच्या सोबत चालायला लागली.

दोघे घरी आले तोपर्यंत अनिकेत काहीही बोलला नव्हता. पण सुरभीला त्याचं गप्प राहाणं जाणवलं देखील नव्हतं. इतकी ती तिच्या फोनमध्ये गढली होती. दोघे घरी आले. अनिकेतने सुरभिचा हात धरला आणि तिला सोफ्यावर बसवलं. तो तिच्या पुढ्यात बसला. सुरभीच्या हातात फोन होता तो बाजूला करत अनिकेतने तिचे दोन्ही हात हातात घेतले. सुरभीने देखील हसत त्याचे हात धरले आणि त्याच्या डोळ्यात बघत म्हणाली;"अनिकेत, तू खरंच गेले तीन दिवस माझं खूप कौतुक केलं आहेस. मला खरंच सातव्या आसमंतात असल्यासारखं वाटतंय."

तिचं बोलणं ऐकून अनिकेतला बरं वाटलं. त्याने तिचे हात थोपटले आणि सोडले. तिच्या डोळ्यात बघत त्याने हलकेच एक हात खिशात घातला अंगठी बाहेर काढायला आणि सुरभीचा फोन किणकिणला. क्षणात अनिकेतच्या डोळ्यात गुंतलेली नजर सोडवत सुरभीने तिचा फोन हातात घेतला.

तिच्या त्या कृतीने अनिकेत प्रचंड दुखावला गेला. तो तटकन उभा राहिला आणि म्हणाला;"सुरभी, आत्ता याक्षणी ठरव... तो फोन दूर ठेऊन माझं म्हणणं ऐकणार आहेस का.... नाहीतर....."

सुरभी फोनमधला मेसेज वाचत होती. एकदम तिरासटत ती म्हणाली;"अनिकेत, किती विचित्र आहेस रे तू? सगळे माझं कौतुक करत आहेत सगळ्या सोशल साईट्सवर. तुझं देखील कौतुक करत आहेत... तू स्वतः तर नाहीसच कुठेच आणि मला देखील सतत त्यांच्यापासून लांब करायला बघतो आहेस. का रे असा वागतोस?"

तिच्या पासून दोन पावलं लांब जात अनिकेत म्हणाला;"मी तुला त्या आभासी जगातून या खऱ्या जगात आणायचा प्रयत्न करतो आहे सुरभी. तुला खरंच कळत नाही का... अग, रे खरं जग नाही ग..."

सुरभी त्याच्या बोलण्याने वैतागली आणि त्याच्याकडे न बघता म्हणाली;"अनिकेत हेच जग खरं आहे. थोडा विचार कर म्हणजे तुला पटेल."

अनिकेतचे डोळे एकदम पाणावले. त्याचं मन खूपच दुखावलं. तिच्याकडे बघत तो म्हणाला;"ते जग खरं आहे सुरभी? खरंच? बर!"

एवढं म्हणून तो आत निघून गेला. सुरभीला लक्षातच आलं नाही की अनिकेतच्या डोळ्यात पाणी आलं. ती तिच्या मोबाईलमध्येच गढली होती. किती वेळ गेला सुरभीला कळलं नाही. फोनमध्येच काहीतरी करत असताना सुरभीला झोप लागली.

सकाळी सुरभीला जाग आली ते फोनच्या बीपने. तिने फोन उचलून बघितलं तर तिला व्हॉइस मेल होता. अनिकेतकडून! तिने हसत हसत फोन चालू केला आणि त्यातून अनिकेटचा आवाज आला...

"सुरभी, तुला खरंच अस वाटतं न की ते आभासी जग खरं आहे? तुला खरंच मी तिथे यायला हवा आहे न? खुश होशील न मी देखील तिथे असलो की? सुरभी माझं तुझ्यावर खरंच खूप खूप प्रेम आहे. त्यामुळे तुला आनंद वाटेल असं सगळं करायला मी तयार आहे...."

अनिकेतचं बोलणं ऐकून सुरभीच्या चेहेऱ्यावर हसू पसरलं. ती काही बोलणार इतक्यात परत एकदा अनिकेतचा आवाज फोनमधून आला....

आत येतेस सुरभी?

फोनमध्ये बघत बघत सुरभी आतल्या खोलीच्या दाराशी गेली आणि.... सुरभीच्या घशात आवंढा अडकला गेला....

समोर खोलीमधल्या पंख्याला लटकत अनिकेतने फाशी लावून घेतली होती....

सुरभीच्या फोनमधून अजूनही आवाज येत होता.....

तुला मी हवा आहे न आभासी जगात... आता यापुढे मी कायम आहे तुझ्यासोबत... तिथे आभासात! तू तिथे येइपर्यंत!!!

समाप्त

Friday, March 5, 2021

भूक

 भूक 


सुप्रियाची सुनंदा आत्या नाशिकमध्ये एकटीच राहात होती. सुनंदा आत्याने नुकताच एक लहासा तिच्यापुरता असा फ्लॅट घेतला होता एका नवीन होणाऱ्या कॉम्प्लेक्समध्ये आणि या वयात देखील अगदी हौसेने सजवला होता. सुप्रियला तिच्या सुनंदा आत्याचं खूप कौतुक वाटायचं. एकटी राहात होती तरी एकदम खुश असायची. या वयात देखील तिने whatsapp, facebook कसं वापरायचं ते शिकून घेतलं होतं आणि ती ते अगदी सफाईदारपणे वापरत देखील होती. सुप्रिया देखील तिच्या आत्याची अत्यंत लाडकी भाची होती. भावाला उशिरा का होईना पण गोंडस बाळ झालं याचा आत्याला खूप आनंद होता. त्यात सुप्रिया अत्यंत गोड आणि साधी सरळ मुलगी होती. एकुलती एक आणि उशीरा झालेली असल्याने खूप लाडात वाढली होती; पण तरीही तिने तिचं करियर खूप छान वाढवलं होतं.

आज सुप्रिया सुनंदा आत्याकडे राहायला येणार होती. सुप्रियाने नुकतीच नोकरी बदलली होती. नवीन जॉबला जॉईन होण्या अगोदर तिने दोन दिवसांचा ब्रेक घेतला होता आणि दोन दिवस सुनंदा आत्याकडे राहायला जायचं ठरवलं होतं. त्यामुळे आत्या सकाळपासूनच खुश होती. सुप्रिया संध्याकाळी पोहोचणार होती. त्यामुळे आत्याने दिवसभर खपून सुप्रियाला आवडणारे लाडू, चकली, गुळपोळी असे अनेक पदार्थ केले होते आणि ती अगदी अधिरपणे सुप्रियची वाट बघत होती.

साधारण सातच्या सुमाराला घराची बेल वाजली आणि आत्या स्वयंपाकघरातून लगबगीने दाराकडे धावली. दारात सुप्रियला बघून सुनंदा आत्या एकदम खुश झाली. सुप्रिया दारातच आत्याच्या गळ्यात पडली आणि तिची पापी घेत म्हणाली;"बघ, म्हंटल्याप्रमाणे आले की नाही तुझ्याकडे राहायला?" आत्या देखील तिला मिठीत घेत म्हणाली;"हो ग माझ्या लाडोबा. तुला बघून खूप खूप बरं वाटतंय ग. बरं झालं आलीस. ये आत ये." असं म्हणत आत्याने तिला आत घेतलं. सुप्रिया आत येऊन आत्याचा लहानसा पण सुंदर सजवलेला हॉल बघून एकदम खुश झाली.

"आत्या मस्तच सजवला आहेस ह फ्लॅट. केवढा हा उत्साह ग तुला. तुझ्या इतकी एनर्जी मला पण मिळाली पाहिजे. मी तर नोकरी ऐके नोकरी करून देखील दमून जाते." सुप्रिया आत्याचं कौतुक करत म्हणाली.

त्यावर मनापासून हसत आत्या म्हणाली;"अग one BHK तर आहे हा. त्यात जसं जमलं तसं केलंय ग. अभय-अंजली होतेच न मदतीला."

अभय दादाचं नाव ऐकून सुप्रियाने विचारलं;"अरे हो. कसा आहे ग दादा? अंजली वहिनीची नोकरी कशी आहे? अजूनही फिरावं लागतं का ग तिला?"

स्वयंपाकघराकडे जात सुनंदा आत्या म्हणाली;"हो ग. हा फिरतीचा जॉब म्हणजे फार कठीण. तरी बरं. अभय असतो शहरातच. त्यामुळे विपुलकडे पाहाणं सोपं जातं. मला देखील मनात येतं जावं तिथेच राहायला. पण दुरून प्रेम जास्त टिकतं ग; आणि त्यात एकदा हात-पाय चालेनासे झाले की जायचंच आहे त्यांच्या संसारात. बरं ते जाऊदे. तू तुझी बॅग आत ठेव आणि हात-पाय धुवून घे बघू. तुझ्यासाठी किती काय काय केलं आहे."

बेडरूमच्या दिशेने जात सुप्रिया म्हणाली;"मला खात्रीच होती ग आत्या तू माझ्या आवडीचं सगळं करून ठेवलं असशील. मस्त चहा ठेव दोघींसाठी. मी फ्रेश होते. आईने देखील तुझ्यासाठी काही काही दिलं आहे. माझी बॅग त्यानेच जास्त भरली आहे."

त्यावर मनातून खुश होत आत्या म्हणाली;"कशाला उगाच सुनीताने त्रास करून घेतला. इथे तसं सगळंच मिळतं ग. बरं, ये तू फ्रेश होऊन. मी चहा ठेवते."

सुप्रिया आतल्या खोलीत गेली आणि तिने तिची बॅग खोलीतल्या एकुलत्या एका पलंगावर ठेवली. आत्याने तिची बडेरूम देखील छान करून घेतली होती. बेडच्या वरच पुस्तकं ठेवायचं शेल्फ होतं. बेड समोर TV आणि बाजूला कपाट. एका व्यक्तीसाठी सगळं काही होतं त्या खोलीत. सुप्रियाने गाऊन काढला बॅगेतून आणि तिचं लक्ष आत्याच्या पुस्तक साठ्याकडे गेलं. समोरच नारायण धारपांच्या पुस्तकांची चळत बघून सुप्रियला हसायलाच आलं.

फ्रेश होऊन बाहेर येताना नारायण धारपांच्या पुस्तकांमधली दोन पुस्तकं उचलून आणत आणि ती आत्याला दाखवत सुप्रिया म्हणाली;"आत्या, अजूनही नारायण धारपांची ही भुताटकीवाली पुस्तकं तू वाचतेस? कमाल आहे ह. तुला भिती नाही का ग वाटत? एकतर या नवीन कॉम्प्लेक्समध्ये आली आहेस राहायला. त्यात हा सहावा मजला आणि अजून शेजारी कोणी आलेलं दिसत नाही. त्यात घरातसुद्धा तू एकटीच आहेस. तरीही वाचतेस असली पुस्तकं?"

चहा घेऊन बाहेर येत आत्या हसत म्हणाली;"प्रियु बेटा भुतं पुस्तकात नसतात; आपल्या मनात असतात. भ्यायचंच असेल न तर आपल्या मनाला भ्याव माणसाने. या पुस्तकांना नाही ग; आणि एकटी कुठे? खालच्या मजल्यावरच्या काळे वाहिनींशी मस्त मैत्री झाली आहे माझी. आम्ही दोघी एकत्रच बाजारहाट वगैरे करत असतो."

चहाचा कप हातात घेत सुप्रिया म्हणाली;"आत्या, भुतं नाहीत हे मला नाही पटत. अग इतके लोक त्यांचे अनुभव सांगत असतात भुतं बघितल्याचे. ते काय खोटे असतील?"

सुप्रियच्या पुढ्यात चकलीची प्लेट करत आत्या म्हणाली;"कसले अनुभव घेऊन बसलीस ग. माझा नाही यावर विश्वास; आणि तू सुद्धा हे सगळं मनातून काढून टाक बघू. एक लक्षात ठेव बेटा, मनी वसे ते स्वप्नी दिसे बरं!"

आत्याच्या या बोलण्यावर दोघीही हसल्या आणि मग इकडच्या तिकडच्या गप्पांमध्ये रंगून गेल्या.

रात्री जेवणं आटोपून सुप्रिया आणि आत्या दोघी बेडरूममध्ये झोपायला आल्या. आत्याने सुप्रियासाठी खाली गादी घातली होती. सुप्रिया आडवी पडली. दिवसभराच्या दगदगीने तिचे डोळे मिटत होते; ते आत्याच्या लक्षात आलं आणि ती आपणहूनच म्हणाली;"पियु बेटा झोप तू. दमली असशील आज खूपच. उद्या मस्त भटकायला जाऊया आपण." हसून 'बरं' म्हणत सुप्रियाने डोळे मिटले. आत्या देखील दिवा बंद करून आडवी झाली.

किती वाजले होते कोणास ठाऊक... पण अचानक सुप्रियला जाग आली. खोलीत मिट्ट अंधार होता; पंखा बंद होता आणि वारा देखील पडलेला होता. सुप्रिया घामाघूम झाली होती. ती उठून बसली आणि तिचं लक्ष खोलीच्या मोठ्या खिडकीकडे गेलं आणि सुप्रियच्या तोंडून मोठी किंचाळी बाहेर पडली. खिडकीच्या बाहेर कोणीतरी उभं होतं... एक किडकिडीत मुलगा.... किंवा माणूस! सुप्रिया पार घाबरून गेली आणि त्याचवेळी तिला आत्याचा आवाज हॉलमधून आला.... "दिसला का तुला तो? घाबरू नकोस. ये बाहेर."

सुप्रिया घाईघाईने उठून बाहेर हॉलमध्ये आली. बाहेरून जेमतेम उजेड येत होता त्या उजेडात सुप्रियला आत्या हॉलमधल्या सोफ्याच्या मोठ्या खुर्चीमध्ये बसली दिसली. तिच्या समोर बसत सुप्रियाने विचारलं;"अग, वीज गेली आहे वाटतं. पंखा बंद म्हणून मला जाग आली तर एकदम अंधार की ग. आणि काय होता तो प्रकार आत्या? अग सहाव्या मजल्यावर ना तुझा हा फ्लॅट? मग? कोण होता तो इतक्या वर चढून आला. आणि तू थंडपणे म्हणते आहेस दिसला का? घाबरू नकोस!" सुप्रियाने एका दमात आत्याला विचारलं.

आत्या शांतपणे सांगायला लागली;"काय सांगू? तो... तो कोण आहे? तो म्हणजे भूक!"

सुप्रिया;"म्हणजे?"

"या कॉम्प्लेक्सचं काम चालू होतं तेव्हा तो इथे आई सोबत राहायचा. वेडा होता डोक्याने; त्यामुळे त्याला काम सुचायचं नाही. आईच काय ती काम करून थोडं काहीतरी कमवायची आणि दोघे रात्री एकत्र जेवायचे. तो असाच दिवसभर कोणत्या ना कोणत्या खिडकीबाहेर उभा राहून फ्लॅटच्या आत बघत बसायचा. कोणी समोर आलं की 'भूक... भूक...' म्हणायचा. एक दिवस त्याची आई काम करता करताच गेली. कशी गेली.... काय झालं... कोणालाही कळलं नाही. कामावरच्या मुकादमाने अंगावर बालंट नको यायला म्हणून इतर मजुरांच्या मदतीने तिचं सगळं क्रियकर्म करून घेतलं. इतक्या घाईने की मुलालासुध्दा घेतलं नाही सोबत. मुलगा काय ग.... उभा होता कुठल्यातरी खिडकीमध्ये... त्याच्या आईची वाट बघत. रात्र झाली.... दुसरा दिवस... तिसरा दिवस... आणि तो मुलगा तसाच उभा होता खिडकीत. इतर कामगार बघायचे त्याला; पण प्रत्येकाचं पोट हातावर. कोण काय मदत करणार? आणि एक दिवस तो वेडा देखील तिथेच पडला. मग त्याचं क्रियकर्म देखील असंच उरकलं गेलं. पण त्यानंतर तो अनेकांना दिसतो असा खिडकीत उभा राहिलेला. नीट ऐकलं तर त्याने म्हंटलेलं ते 'भूक...भूक...' देखील ऐकायला येतं. आणि जर ते नाही तर........"

इतक्यात एकदम वीज आली आणि अचानक घराची बेल वाजली. बेल ऐकून सुप्रिया दचकली आणि गर्रकन वळून पटकन उठून तिने दार उघडलं. समोर आत्या उभी होती कोणाशीतरी मोबाईलवर बोलत!!! सुप्रियच्या तोंडचं पाणी पळालं..... ती धडपडत मागे सरकली आणि परत गर्रकन मागे वळत तिने आत्या होती त्या सोफ्याकडे बघितलं..... सोफ्याची खुर्ची डोलत होती आणि सुप्रियला आवाज आला....

जर ते नाही तर..... आई येते त्याचं दुःख सांगायला.!!"


समाप्त