Friday, June 26, 2020

लहानपण देगा देवा!

 लहानपण देगा देवा!

सध्याच्या लॉकडाऊनच्या काळात आणि विशेषतः आता जेव्हा हळू हळू सगळं पूर्व पदावर येत आहे आणि तरीही सर्वच वर्गातील शहाण्या-सुरत्या लोकांना आर्थिक ताण जाणवायला लागला आहे; भविष्याचा विचार करून मानसिक ताण जाणवतो आहे. अशा वेळी अनेकांच्या मनात येत असेल......

लहानपण देगा देवा। मुंगी साखरेचा रवा।।

परत एकदा लहान व्हावं आणि सध्याचे हे ताणाचे दिवस निघून जावेत; ही भावना असूच शकते. विशेषतः आता या काळात जेव्हा आपण आपल्या जुन्या मित्र-मैत्रिणींना संपर्क केला आहे आणि त्यांच्याशी गप्पा मारल्या आहेत; तेव्हा परत एकदा लहान व्हावं आणि या जवाबदाऱ्यांमधून मुक्त होऊन परत लहानपणीचं निरागस आणि जवाबदारी नसणारं आयुष्य जगावं असं वाटत असणार.

पण मला काय वाटतंं सांगू का? प्रामाणिकपणे विचार केला तर आपल्याला खरंच आपलं लहानपण हवं असतं का? की फक्त त्यावेळचा निरागसपणा आणि जवाबदारी नसणं जास्त भावतं? कारण लहानपण म्हंटल की प्रत्येक निर्णयासाठी मोठ्यांवर अवलंबून राहाणं आलच न? शाळा आली; अभ्यास आला... नावडते विषय परत एकदा आलेच की. गृहपाठ.... निबंध..... शास्त्र विषयाचे व्यवसाय पूर्ण करणं आलं. संध्याकाळचा सवंगड्या बरोबरचा खेळ रंगात आलेला असताना परीक्षा जवळ आली म्हणून आईने लवकर बोलावलं की काही एक न बोलता घरात येऊन अभ्यासाला बसणं देखील आलंच. आपल्या आयुष्यातले अनेक निर्णय आपल्या पालकांनी घेतलेले असतात त्यावेळी.... आपल्याला पटो किंवा न पटो. आपण कसे शहाणे-समंजस आहोत.... पुढे जाऊन वाया जाणार नाही.... याची आई वडिलांना सतत खात्री द्यावी लागतेच न?

त्यामुळे लहानपण मागताना आपण हा विचार नक्की करायला हवा की आपल्याला लहानपण हवं आहे की या वयाची जवाबदारी नको आहे. आता आपण तुकाराम महाराजांच्या या संपूर्ण अभंगाचा थोडा विचार करूया.

लहानपण देगा देवा! मुंगी साखरेचा रवा!!
ऐरावत रत्न थोर! त्यासी अंकुशाचा मार!!
जया अंगी मोठेपण! तया यातना कठीण!!
तुका म्हणे बरवे जाण! व्हावे लहानाहून लहान!!
महापुरे झाडे जाती! तेथे लव्हाळे वाचती!!

यात खरं तर तुकाराम महाराजांनी असं कुठेही म्हंटलेलं नाही की आपण परत लहान व्हावं. या अभंगातून त्यांनी लहान मुलांच्या मनाचा कोवळेपणा आपण कायम अंगी बाणवावा असं सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्ही जसजसे मोठे होत जाता तसतशा जवाबदाऱ्या वाढणारच आहेत आणि त्यातून जे निर्णय घेतले जाणार आहेत त्याच्या चांगल्या/वाईट परिणामांची जवाबदारी देखील आपलीच असणार आहे.(जया अंगी मोठेपण! तया यातना कठीण!!) त्यामुळे आपण आपलं मन लहान मुलांप्रमाणे लवचिक ठेवावं असा देखील या अभंगाचा अर्थ होतो. (महापुरे झाडे जाती! तेथे लव्हाळे वाचती!!)

त्यामुळे परत एकदा लहान व्हावं असं म्हणण्यापेक्षा आपण असं म्हणू की आपल्या मनात एक कोवळं, लवचिक आणि लहानपणाच्या स्वच्छ मनासारखं एक मन जपू. वय आणि जावाबदाऱ्या कितीही वाढल्या तरी हेच निरागस मन आपल्याला यासर्वातून निभावून जाण्याची शक्ति देईल.

Friday, June 19, 2020

गूढ (रहस्य कथा)(भाग 5 शेवटचा)

गूढ (भाग 5) (शेवट)

चंद्रभानला म्हादुच्या बोलण्याचा अर्थ लागायला लागला होता आता. याचा अर्थ शहरी बाबू म्हणजे निशाचा भाऊ असावा. तो इथे यायला निघाला त्यावेळी निशा तशी लहान असावी. मात्र तो उमरगावाला जातो आहे, हे तिने लक्षात ठेवलं होतं. म्हणूनच मोठी झाल्यावर ती तिच्या भावाला शोधायला तिथे आली होती. याचा अर्थ मेरी निशाला घेऊन खरातांच्या वाड्याकडे गेली होती. जसं तिने बाबुला देखील तिथेच नेलं होतं. चंद्रभान विचार करत होता.

अचानक चंद्रभानला आठवलं. तो निघत असताना पुजारीबुवांनी त्याला सांगितलं होत की बाबूने किंवा निशाने जे केलं तेच तसंच तू करावंस असं नाही. तुझ्या इथे येण्याला एक वेगळं कारण आहे. ते समजून घे. निशाच्या मागे जाणं महत्वाचं आहे की तिला सोडवणं महत्वाचं याचा विचार कर आणि मगच तुझी कृती ठरव. पुजारीबुवा जे म्हणाले होते त्याचा चंद्रभान विचार करत होता आणि त्याला अचानक सुटकेचा मार्ग दिसला. चंद्रभानचा बदललेला चेहेरा बघून म्हादुने त्याच्याकडे  प्रश्नार्थक नजरेने बघितलं. चंद्रभान म्हादुकडे बघत म्हणाला,"दादा... याक्षणी मला तुम्ही देवळाकडे घेऊन चला." चंद्रभानच्या या बदललेल्या अवताराकडे बघून म्हादू गोंधळला. तो म्हणला,"आरं पोरा.. तिला तुजी गरज हाय. दोन येळा म्या पाठ फिरवली आणि आक्रीत घडलं रं. आता मातरं माज्यामुळं आजून काय इपरीत घडाय नकू. म्याच आता तुला खरातांच्या वाड्याकड न्येतू. म्हंजी मरताना माजा जीव आडकनार न्हाई. त्या बाबुला मी पाठ दावली.. त्या पोरीला सुदिक पाठ दावली. आन मेरीन तिचा डाव साधला. माजं मन मला खातया. आता तरी प्रायश्चित्त घिऊ दये.. चल, म्या हाय तुज्या संगट. असा न्हाई सोडणार तुला मंदी."

म्हादूचं बोलणं ऐकून चंद्रभान म्हणला,"दादा... तुम्हाला जसं प्रायश्चित्त घ्यायचं आहे तस मला देखील घ्यायचं आहे. माझ्या नकळत मी एक आयुष्य अडकवलं आहे त्या वाड्यात... आणि कदाचित् निशाला सुध्दा...... म्हणूनच मी तुम्हाला म्हणतो आहे की मला देवळाकडे घेऊन चला. मला या कोड्याची उकल कळली आहे. चला... आता मात्र घाई केली पाहिजे आपण." चंद्र्भानच्या बोलण्याचा चांगलाच परिणाम म्हादुवर झाला. तो चंद्रभानला घेऊन देवळाच्या दिशेने निघाला. चंद्रभान देवळाजवळ पोहोचला. पण देवळात जाण्याऐवजी तो त्याच्या गाडीच्या दिशेने धावला. त्याने गाडी उघडली आणि त्याची बॅग बाहेर काढली. त्याने निघता निघता ते मासिक बॅगमध्ये घातलं होतं. ते बाहेर काढलं आणि तो देवळात गेला. देवळाच्या वरच्या पायरीपाशी आतल्या कंदिलाचा उजेड पोहोचत होता. तो कंदील त्याने घाईघाईने पुढ्यात घेतला आणि खिशातून पेन काढून त्याने लिहायला सुरवात केली. त्याने जिथे कथा संपवली होती त्याच्या पुढे निशाने काहीतरी लिहून ठेवलं होतं. त्यला जोडूनच चंद्रभान लिहायला लागला.

.................आणि तरीही ती तिथे जायला निघाली होती. बाबूचं नक्की काय झालं हे तिला माहित करून घ्यायचं होतं. एकटीच.... पण तिला खात्री होती तिच्या मदतीला तो येईल!!! ती बाबुला शोधायला आली खरी पण तिची अवस्था देखील बाबू सारखीच झाली होती. म्हादुने तिच्याकडे देखील पाठ फिरवली आणि ती देखील काळा झगा घातलेल्या त्या स्त्रीच्या मागून खरातांच्या वाड्याच्या दिशेने निघाली. मात्र तिच्या मनात असलेली खात्री खरी ठरली. तो तिला शोधत तिथे आला. तिला कशी मदत करावी त्याला सुचत नव्हतं. शेवटी तो म्हादूला जाऊन भेटला.... म्हादू कडून त्याला कळलं की काळा झगा घातलेल्या त्या स्त्रीने तिला देखील खरातांच्या  वाड्याकडे नेलं आहे. याचा अर्थ ती जरी बाबुला भेटली असली तरी आता ती देखील बाबू बरोबर त्या वाड्यात अडकली असावी. पण ती खूप धीराची होती. तिने मनापासून त्याला हाक मारली आणि त्याने ती ऐकली होती.

इतकं लिहून चंद्रभान क्षणभर थांबला. यापुढे तो जे लिहिणार होता ते त्याला प्रत्यक्ष दिसणार होत याची त्याला मनातून जाणीव झाली होती. त्यामुळे यापुढचा प्रत्येक शब्द आणि प्रत्येक वाक्य त्याने शांत मनाने लिहीलं पाहिजे हे त्याच्या लक्षात आलं. त्याने पेन सरसावलं आणि तो लिहायला लागला....................  तो आला आहे याची तिच्या मनाने तिला ग्वाही दिली आणि तिला मार्ग मिळाला. खरातांचा वाडा मोठा होता... त्यांचा दरवाजा देखील तसाच जड आणि उघडायला अवघड होता... पण त्यांच्या वाड्याच्या त्या मोठ्या पुरुषभर उंचीच्या खिडक्यांपैकी एक खिडकी तिला उघडी मिळाली. अनेक वर्ष आत अडकलेल्या बाबूचा हात धरून कोणताही दुसरा विचर न करता तिने त्या खिडकीतून बाहेर उडी मारली. आता तिला वाड्याचं फाटक दिसत होतं. तिने जीव घेऊन पळायला सुरवात केली. तिने तिच्या हातात बाबूचा हात घट्ट धरला होता. त्यामुळे तिच्या बरोबर तो देखील विचार न करता धावत होता. ती फाटकाजवळ आली आणि मोडकळीस आलेलं फाटक एका हाताने दूर सारून ती तशीच बाबुला घेऊन पाळत सुटली. झाडा झुडपातून धावत ती देवळाकडे निघाली.....

चंद्रभान लिहित होता... एका क्षणाचाही वेळ न दवडता तो लिहित होता... आणि अचानक म्हादू ओरडलेला त्यला  ऐकू आलं. लिहिता लिहिता थांबून चंद्रभानने मागे वळून बघितलं. मागे देवळाच्या शेवटच्या पायरीजवळ त्याला निशा जमिनीवर कोसळताना दिसली. तिच्या शेजारीच एक बराच म्हातारासा माणूस शून्य नजरेने जमिनीकडे बघत बसला होता. त्याला चांगलीच धाप लागली होती. चंद्रभान निशाच्या जवळ जाण्यासाठी उठला. पण तिने त्याला हातानेच थांबवलं. दुसरा हात मागे झाडीच्या दिशेने करत अंगात असलेली नसलेली सगळी शक्ती एकवटून ती म्हणाली... मेरी!!!!! आणि तिची शुद्ध हरपली.

निशाला काय म्हणायचं आहे हे ओळखून चंद्रभान परत त्याच्या लिखाणाकडे वळला. त्याने परत पेन हातात घेतलं आणि लिहायला सुरवात केली.........

......... काळ्या झाग्यातली ती स्त्री.....

त्याचवेळी त्याला मागून म्हादुचा आवाज आला,"पोरा.... तू जे लिवलं न्हाई हायेस त्ये पण हित झालया. तवा मेरीचं काय झालं यापरीस म्हादूचं काय झाल त्ये लिव. म्हंजी समद ठीक हुईल." म्हादूचा आवाज एकून चंद्रभान परत एकदा मागे वळणार होता. पण त्याला म्हादुने थांबवले... " नग... आता नग मागं बघूस.. लिव काय लिवायचं त्ये. आता माज्या जगन्यात काई राम न्हाई. माजी कालजी नग करूस."

चंद्रभानच्या कानावर म्हादूचे शब्द पडले आणि तो परत त्याच्या लिखाणाकडे वळला.....

गाव जरी म्हादुला वेडा समजत होतं तरी म्हादू मात्र सगळं ओळखून होता. सुन्या निघून गेल्या नंतर मेरीची झालेली तडफड त्याने बघितली होती. तिच वेडपीसं होणं आणि गावातल्या तरुणांनी तिच्या एकटं असण्याचा गैरफायदा घेणं त्याने जवळून बघितलं होतं. त्याचा जीव तुटत होता मेरीसाठी. पण त्याला माहित होतं की तो खूपच दुबळा होता. कदाचित म्हणूनच तो बाबू किंवा निशाला मदत करायला धजावला नव्हता. पण आता मात्र त्याच्या मनाने त्याला कौल दिला होता. मेरीने कारण नसताना बाबू आणि निशाला तिच्या सूडाचा निशाण केलं होतं. आता सुद्धा देवळाकडे धावलेल्या निशा आणि बाबूच्या मागून ती त्यांना शोधात आली होती. तिला बघताच मात्र म्हादू मेरी आणि देऊळ यांच्या मध्ये उभा राहिला. त्याने समोरून येणाऱ्या मेरीला विचारलं,"मला खरातांच्या वाड्याकडं जायाचं हाय. तुम्ही रस्ता दावाल का?" काळ्या झाग्यातली मेरी किनऱ्या आवाजात हसली आणि म्हणाली, "चिंता करू नका. या माझ्या मागून." आणि म्हादू येतो आहे की नाही हे न बघता वळून शांतपणे वाड्याच्या दिशेने चालू लागली..........

चंद्रभान लिहिता लिहिता थांबला आणि त्याने मागे वळून बघितलं. त्याला लांब झाडीच्या दिशेने चालत जाणारा म्हादू दिसला. त्याला हाक मारावी अस चंद्रभानला वाटलं. हे ओळखून की काय पण जाता जाता मागे वळूनही न बघता म्हादुने मात्र चंद्रभानच्या दिशेने हात हलवला आणि तो झाडीमध्ये हरवून गेला. चंद्रभानची नजर निशाच्या दिशेने वळली. तिला मदत करण्यासाठी तिच्या दिशेने तो वळला.... मात्र त्या अगोर कथेच्या शेवटी 'समाप्त' लिहायला तो विसरला नाही.


समाप्त

Friday, June 12, 2020

गूढ (रहस्य कथा)(भाग 4)

गूढ (भाग4)

गूढ (भाग 4)


पूजारीबुवांनी सांगितलेली घटना ऐकून चंद्र्भान अजूनच बुचकळ्यात पडला. निशा इथे आली होती हे खरे होते. ती पूजारीबुवांना भेटली होती. तिने आपणच लिहिलेली कथा त्यांना सांगितली होती आणि तिचे म्हणणे होते की त्या कथेचा शेवट अजून झालेला नाही. म्हणजे तिला नक्की काय म्हणायचे होतं? ती आपल्या स्वप्नात का येत असेल? मुळात ती स्वप्नात येते आहे की ... आपल्याला भास होत आहेत... की.... चन्द्रभानला शेवटचा पर्याय मनातही आणायची इच्छा होती. त्याने पुजारीबुवांकडे बघितलं आणि त्यांना विचारलं,"काका तुम्हाला काय वाटतं? निशा का आली होती इथे. मी जी कथा लिहिली होती ती खूप पूर्वी..  त्या कथेचा निशाशी काय संबंध असेल. कारण मी तर माझ्या मित्राने केवळ या गावाचा आणि वाड्याचा उल्लेख केला होता आणि सांगितलं होतं की या वाड्याबद्द्ल बऱ्याच गूढ कथा प्रचलीत आहेत; त्यावरून एक कल्पना केली होती."

"खरंच सांगू बेटा, मलाही काहीच सुचत नाही आहे. काहीतरी चुकतं आहे किंवा तुला आणि मला माहित नाही असं यात काहीतरी आहे." पुजारीबुवा म्हणाले.

"काका... तुम्ही मला त्या म्हादूचा पत्ता सांगता का? त्याला भेटीन म्हणतो." चंद्रभान थोडा विचार करून म्हणाला.

"बेटा, नको पडूस तू या फंदात. मी निशालासुद्धा हेच सांगितलं होतं. जे भूतकाळात होऊन गेलं ते गेलं. आता त्यातील सत्यता उकरून काढून काहीही मिळणार नाही आहे. तो वाडा आहे हे सत्य आहे आणि तेवढंच खरं हे देखील आहे की त्या वाड्याबद्दल वाईट वंदता देखील आहेत. त्यामुळे आपल्याला माहित नसलेल्या वाटेने न जाणंच चांगलं." पूजारीबुवांनी चंद्रभानला म्हंटलं.

"तुमचं म्हणणं मान्य आहे काका... पण मग माझ्या स्वप्नात येऊन माझ्याकडे मदत मागणाऱ्या निशाचं काय? बर ते फक्त स्वप्न म्हणून सोडून द्यावं तर मीराताईंना ती भेटली आहे असं त्याचं म्हणणं आहे. त्याकडे कसं दुर्लक्ष करायचं?" चंद्रभानने पूजारीकाकांना विचारलं.

"खर आहे तुझ म्हणणं. पण मग पुढे काय?" पुजारीबुवा म्हणाले.

"काका... माझ मन मला सांगतं आहे की मी गप्प बसणं योग्य नाही. निशा खरंच अडचणीत असावी. तिला माझ्या मदतीची गरज असावी. म्हणूनच तिने ज्या मार्गाने शक्य आहे त्या मार्गाने माझ्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे. आणि म्हणूनच मी तिच्या मदतीला गेलंच पाहिजे." चंद्रभान म्हणाला.

"ठीक आहे. तुला मी म्हादूच्या घराचा रस्ता दाखवतो." असे म्हणून पुजारीबुवा उठले आणि गाभाऱ्यात गेले. चंद्रभानदेखील त्यांच्या मागे गाभाऱ्यात गेला. पूजारीबुवानी शंकराच्या पिंडीला साष्टांग नमस्कार घातला आणि पिंडीसमोरच्या धुनीतून भस्म उचलले आणि चान्द्रभानच्या हातावर ठेवले. चंद्रभानचे दोन्ही खांदे धरून पुजारीबुवांनी त्याच्या डोळ्यात स्थिर नजरेने बघितले आणि ते म्हणाले,"मी तुला तुझे नाव विचारेल नाही किंवा विचारणार देखील नाही कारण तू इथे कोणाच्या तरी हाकेला ओ देऊन मदतीसाठी आला आहेस. याचा अर्थ तुझा उद्देश चांगलाच आहे. तू म्हणतोस ते खरंच असेल कदाचित. निशाला तुझ्या मदतीची गरज असेलही कदाचित. बेटा, तुझ्या बरोबर माझे आशीर्वाद आहेत. मुख्य म्हणजे प्रामाणिक आणि चांगला उद्देश असणाऱ्या लोकांच्या पाठीशी देव देखील असतो. त्यामुळे यापुढे तुला जे योग्य वाटत ते तू कर. फक्त एकच सांगतो... केवळ यापूर्वी या गावात आलेल्या त्या बाबूने किंवा निशाने जे केलं तेच तसंच तू करावस असं नाही. तुझ्या इथे येण्याला एक वेगळं कारण आहे. ते समजून घे. निशाच्या मागे जाणं महत्वाचं आहे की तिला सोडवणं महत्वाचं याचा विचार कर. आणि मगच तुझी कृती ठरव."

चंद्रभानने पूजारीबुवांच सांगण मनापासून स्वीकारलं आणि  देवाच्या दिशेने तोंड करून नमस्कार केला. मग पूजारीबुवांना देखील वाकून नमस्कार केला आणि म्हादुच्या घराचा रस्ता समजून घेतला. मग मात्र मागे वळूनही न बघता तो देवळातून बाहेर पडला. पुजारीबुवा चालत जाणाऱ्या चंद्रभानच्या पाठमोऱ्या आकृतीकडे काही क्षण बघत उभे राहिले आणि आपल्या घराकडे निघाले.

चंद्रभान म्हादुच्या घराच्या दिशेने चालतच  निघाला. गाडी त्याने देवळाजवळच ठेवली. गाव इतकं लहान होतं की तिथे रस्ते देखील नव्हते. त्यामुळे गाडीने जाणं शक्यच नव्हतं. कालपासून सतत लागोपाठ घटनाचक्र चालू होतं. त्यामुळे खरं तर चंद्रभानला शांतपणे विचार करायला वेळच मिळाला नव्हता. पण आता चालताना त्याच्या मनात विचार यायला लागले. तो राजनच्या स्टुडियोमध्ये पोहोचल्यापासून जो घटनाक्रम सुरु झाला होता तो आता इथे या वळणावर येऊन थांबला होता. आतापर्यंत तो केवळ एक घटक होता. पण आता यापुढे त्याला एकूणच घडणाऱ्या घटनांचा ताबा घेणं आवश्यक होतं. कारण केवळ आता तो प्रेक्षक राहिला नव्हता तर एकूण घडणाऱ्या गोष्टींचा एक भाग झाला होता. चन्द्रभानच्या एक लक्षात आलं की  म्हादुला भेटण्याच्या अगोदर त्याने एकूण सद्यपरिस्थितीचा निट विचार केला पाहिजे. कारण म्हादू अशिक्षित आणि गावंढळ असला आणि गावातले लोक त्याला वेडा समजत असले तरी शेवटी तोच एक मार्ग होता चंद्रभानकडे सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळवायचा.

विचार करताना परत एकदा चंद्रभान त्याने लिहिलेल्या गोष्टीकडे वळला. त्याने ती गोष्ट अगदी सहजच लिहिली होती. मित्राशी मारलेल्या गप्पांमधून जे सुचलं होतं ते त्याने त्यावेळी लिहीलं होतं. मग त्याने लिहीलेल्या गोष्टीमधला म्हादू खरंच कसा होता? याचं त्याला राहून राहून आश्चर्य वाटत होतं. बरं... म्हादू नावाची व्यक्ती सर्वसाधारणपणे सर्वच गावातून असते असं म्हणावं तर हा म्हादू त्या शहरी बाबुला भेटल्याचे सगळ्यांना सांगत फिरत असतो. असाच विचार करताना चंद्रभानच्या मनात आलं की खरं तर निशाचा त्याने लिहिलेल्या गोष्टीशी काय संबंध असावा? उमरगावात कोणा खरातांचा वाडा असेल, मी त्यावर एक गोष्ट लिहिली असेल, त्या गोष्टीतला म्हादू देखील खरंच असेल... पण अशा एक कल्पना करून लिहिलेल्या गोष्टीचा आणि निशाच काय संबंध? असा विचार चंद्रभानच्या मनात आला आणि त्याला निशाचं आणि त्याचे संभाषण आठवलं.

त्या दोघांनी गप्पा मारायला सुरवात केली तेव्हा निशा स्वतःमधेच हरवली होती. चन्द्रभानने बोलायला सुरवात केली होती तेव्हा तिचे त्याच्या बोलण्याकडे फारसे लक्ष नव्हते हे त्याला आता जाणवलं. त्यावर त्याने तिला विचारलं देखील होतं की ती ठीक आहे ना की हरवली आहे. त्यावरचं तिचं उत्तर त्यावेळी चंद्रभानला कळलं नसलं तरी आता एकूण घडलेल्या घटनांचा विचार करता ते उत्तर म्हणजे घटनाक्रमाची सुरवात होती हे त्याच्या लक्षात आलं. तिने म्हंटलं होतं,' मी हरवलेच आहे आणि तरीही इथेच आहे.' काय अर्थ असावा तिच्या त्या वाक्याचा? चंद्रभानच्या मनात आलं. त्यानंतर तिने त्याला कथा कशा सुचतात ते विचारलंं होतं. आणि त्यावर तो उत्तर देताना आपल्याच विचारात क्षणभरासाठी हरवला होता. त्यानंतर तिने काहीतरी म्हंटलं होतं आणि 'हो की नाही,' असे त्याला विचारलं होतं. काय म्हणाली होती ती? चंद्रभानच्या मनात आलं. ती जे काही म्हणाली ते आठवणं आवश्यक आहे असं चंद्रभानला वाटलं, कारण कदाचित ती त्यावेळी जे म्हणाली त्याचा या घडणाऱ्या घटनांशी जवळचा संबंध असू शकतो.

त्याने मेंदूला ताण दिला आणि त्याला अचानक आठवलं. ती म्हणाली होती,"अहो, शेवट काहीही असला तरी कथा तर तुम्हीच लिहिता ना? कदाचित सुरवात करताना तुम्ही एक शेवट ठरवत असालही. पण मग जसजशी कथा पुढे सरकते तुम्हाला वाटत असेल की जो शेवट ठरवला त्यापेक्षा काहीतरी वेगळं असू शकतं. आणि म्हणून तुम्ही शेवट बदलत असाल किंवा एखाद्या कथेचा शेवट तुम्ही नंतरही बदलू शकत असाल. तुमचीच कथा आणि तरीही शेवट तुमच्या मनात नसलेला असं कसं होईल? कथेचा शेवट तुम्हाला अगोदरच माहित असेलच नं? हो की नाही?" त्यावेळी आपण तिच्या बोलण्याकडे फारसं लक्ष दिल नव्हतं आणि तिच्या 'हो की नाही' या प्रश्नच उत्तर 'हो' म्हणून दिलं होतं... चंद्र्भानच्या मनात आलं. याचा अर्थ तिला आपल्या कथेचा शेवट वेगळा असायला हवा होता तर! ती म्हणाली होती ............................... एखाद्या कथेचा शेवट तुम्ही नंतरही बदलू शकत असाल......................... याचा अर्थ आपण त्या कथेचा शेवट बदलावा अशी तिची इच्छा आहे का? जर बदलायचा झालाच शेवट तर तो काय अपेक्षित होता तिला? विचार करता करता चंद्र्भानला हे देखील आठवलं की तो कथा वाचून झाल्यावर झोपला होता. त्यावेळी कथेचा शेवट म्हणजे तो शहरी बाबू वाड्यात शिरला इतकाच होता. पण आज सकाळी त्याला त्याच्या पुढे काहीतरी लिहिलेलं मिळाल होत. त्याने परत एकदा मेंदूला ताण दिला आणि त्याला आठवलं; त्याने लिहिलेल्या शेवटाच्या पुढे लिहिलेलं होत की..................................

आणि तरीही ती तिथे जायला निघाली होती. बाबूचं नक्की काय झालं हे तिला माहित करून घ्यायचं होतं. एकटीच.... पण तिला खात्री होती तिच्या मदतीला तो येईल!!!

याचा अर्थ इंटरव्हूच्या ठिकाणी भेटलेली निशा..... सकाळी त्याला झोपेतून उठवणारी निशा.... मीराताईंना भेटलेली निशा.......... आणि त्याच्या कथेच्या शेवटी उमटलेली ती अक्षरे... या सगळ्याचा अर्थ निशा त्या खरातांच्या वाड्यात आहे. ती तिथे अडकली आहे. तिने कुठेल्यातरी वेगळ्या शक्तीच्या मदतीने आपल्याला साद घातली आणि ती आपल्यापर्यंत पोहोचली. तिला आपल्या मदतीची गरज आहे. आता फक्त एकच प्रश्न उरला होता की निशा तिथे का गेली. एकदा ते कारण कळल असतं तर मग त्याला तिची मदत कारण सोप गेलं असतं.

एका मागोमाग एक कोडं सुटायला लागल्यावर चंद्रभानला हुरूप आला. तो म्हादूच्या घराच्या दिशेने भराभर पावलं टाकत निघाला.

चंद्रभान म्हादुच्या घराजवळ पोहोचला. घराच्या पडवीत कोणीतरी बसलेलं त्याला दिसलं. म्हणून चंद्रभान पडवीत शिरला. त्याबरोबर त्या व्यक्तीने अचानक ओरडायला सुरवात केली,"जा म्होरं... व्हय चालत हितून... उगा नग माज्या मागं लागू." या त्याच्या अचानक ओरडण्यामुळे तो क्षणभर मागे झाला. पण मग मनाचा हिय्या करून तो त्या व्यक्तीच्या शेजारी जाऊन बसला आणि म्हणाला,"म्हादू दादा... तिला तुमची गरज आहे. तुम्ही मला फक्त तिचं काय झालं ते सांगा. बाकी मी बघून घेतो." चंद्र्भानचं बोलणं ऐकून म्हादू शांत झाला. त्याने चिमणी वर करून त्या उजेडात चंद्रभानच्या डोळ्यात निरखून बघितलं. चंद्रभानची शांत आणि आश्वासक नजर बघून म्हादुच्या डोळ्यात पाणी उभं राहीलं. चिमणी खाली ठेऊन त्याने चंद्रभानचे हात घट्ट धरले आणि म्हणाला,"का आलास हितं? त्यो बाबू आल्ता कैक वरसा पूर्वी त्याला बी मी म्हन्ल हुतं जा हितून. पन त्यो न्हाई ऐकला माज. मंग ती पोर आल्ती. तिला बी मी हाकलंल. म्हन्ल नग घीउस ईसाची परीक्षा. पन ती बी न्हाई ऐकली माज. तू का आलास बाबा? जा हितून...." असं म्हणून म्हादुने त्याचे हातात घेतलेले हात सोडले.

चंद्रभान काही न बोलता तसाच म्हादुच्या शेजारी बसून राहिला. थोड्या वेळ म्हादू स्वस्थ बसून राहिला. पण मग त्याची चुळबुळ सुरु झाली. अजून थोडा वेळ गेला आणि म्हादुने आपणहून बोलायला सुरवात केली. "ऐक.... त्यो बाबू अल्ता कारण त्येला कामाची गरज हुती. जवा त्यो मले भेटला तवा आमच्यात बोलना झाला हुता. त्यो म्हन्ला त्याले पैका हवा हाई म्हनून या आड गावात कामाच्या शोधात आला हाई. म्या म्हन्ल सहर सोडून हित कोन तुले काम द्येनार आन काय पैका मिलनार. तर म्हन्ला खरातांच्या वाड्यावर काम हाई. म्या म्हन्ल तिथं नग जाऊ बाबू. जा हितून परत. तिथं ग्येलेलं कोनी कंदी परत न्हाई आलं. पण त्यो मानला न्हाई. त्यो आला हुता तवा रात व्हायाला आल्ती. त्याले उत्तर न देता मी निघालू. म्हन्लं  हित पारावर आजून कुनीबी न्हाई. मी ग्येलू तर हा बाबू बी जाईल. पन मी निघालू आन मला मागून मेरीचा आवाज आला. म्या तवाच समजंलु बाबू जानार खरातांच्या वाड्याकडं. म्या लई घाबरलु आन पलालू माज्या घरला. बस! त्ये तिथच संपल." म्हादू बोलायचा थांबला.

चंद्रभान म्हादुचं बोलणं मन लावून ऐकत होता. म्हादू जे सांगत होता तेच त्याने त्याच्या कथेमध्ये लिहील होतं. पण त्याने त्यात केवळ गूढता निर्माण करण्यापुरता एका मुलीचा उल्लेख केला होता फक्त. तिच नाव किंवा तिच्याबद्दल काहीच लिहील नव्हतं. त्यामुळे हे काहीतरी वेगळ आणि नवीन आहे हे त्याच्या लक्षात आलं. त्याने म्हादूला विचारलं,"दादा, ही मेरी कोण? अजून एक विचारायचं होतं... काही महिन्यांपूर्वी जी मुलगी तुम्हाला भेटायला आली होती तिचं काय झालं?"

म्हादुने चंद्रभानला एकदा वर पासून खालपर्यंत न्याहाळलं. मग परत त्याने बोलायला सुरवात केली. "पोरा... मेरी म्हंजी पोरकी किरीस्ताव पोर हुती. दिसाया पार रंभा उर्वासी जणू. सारा गाव तिच्या माग हुता. पन तिचा जीव जडला हुता खरातांच्या सुन्यावर. खरात म्हंजी गावातलं बडं मानुस. त्यात सुन्या म्हंजी गावचा राजाच जनू. त्येच्यात आन मेरीत काय बाय शिजतं हाय याची चर्चा गावात व्हायाला येळ न्हाई लागला. आन मंग त्याची कुनकुन मोठ्या खरातांना  लागली न्हाई तर नवल. मंग मात्र त्येनी सुन्याला काय कारन काढून दिल पाट्वून सहराकडं. मेरी बिचारी ऱ्हाईली न्हवं हितंच. तिला वाटलं सुन्या यील आन घिऊन जाईल तिला. पन तस कंदी झाल न्हाई. ती सहर रस्त्याला डोलं लावून बसली आन काय. कंदीतरी तिच्याबी ध्यानात आलं की आता काय सुन्या यायाचा न्हाई. आन मंग मात्र ती चवतालली राव. त्यानंतर तीन दिस ती खरातांच्या वाड्याला  फेऱ्या मारत हुती. ना काय खालं, ना काय प्याली. कुटून हितका जोर आल्ता कुनास ठाऊक... बस... गोल गोल चक्कर मारीत हुती आन काय बाय पुटपुटत हुती. चौथे दिशी तिचं कलेवर वाड्याच्या मागच्या हिरीत सापडलं म्हनं. थोरल्या खारातांनी तीन बाप्ये उतरवून काडलं हुतं. माशांनी पुरत खाल्ल हुतं. लोक काय बाय बोलाय लागलं तस मोटे खरात डाफरले सर्वांवर आन हाकलून दिल सर्वास्नी. मंग त्या कालेवराच काय झाल कोनाला ठाव न्हाई.

आसंच काही दिस गेलं आन खरातांकडे काम करनारी कमळी सांजच्याला तिच्या घरला जात हुती तर तिला मेरी दिसली की मागच्या अंगाला. कमळीची बोबडी बसली जनु. त्यानंतर ती परत खरातांच्या वाड्याकड न्हाई ग्येली. हलूहलू कित्येकांना मेरी वाड्याच्या आजूबाजूने दिसाया लागली. लोकांनी त्या वाड्याकडं जानं सोडून दिलन. थोरले खरात सोता आठवडा बाजारला यायाचे आन लागलं ते सामान घिऊन जायाचे. सुरवातीला त्यांच्या चालन्यामंदी ताठा हुता. सांजच्याला मंदिरातबी यायचे ते. पण मंग मंदिर बंद जालं. आठवडा बाजारला पन पहिल्याच ठोक्यात येऊन जायाचे. आन मंग कंदितरी थोरले खरात गेले आसं कानावर आलं. पण तरीबी कुनी सुदिक तिथं न्हाई ग्येलं. मंग फकस्त मालकीणबाई राहिल्या त्या भल्या मोठ्या वाड्यात.

आनी मंग अचानक एक दिस त्यो बाबू आला. त्याले कुनी कसं सांगिटलं कुनास ठाव की खरातांना कुनी कामाला मानुस हवं हाय. म्या त्याचेकडे पाठ क्येली आन त्याले मेरीने धरला. खरातांचा वाडा दावते सांगून ती त्याले घिऊन पारावरून ग्येली खरं... पन मंग काय जालं कुणाला माहित. पार कैक वर्स ग्येली त्याला. हा आन तू म्हनतूस तसं आल्ती ती पोर. म्हन्ली ती तिच्या थोरल्या भावाक घ्यायाला आली हाय. म्या म्हन्ल नग जाउस. तरी न्हाई ऐकली. मंग मी तिच्याकडं पन पाठ क्येली.. तर मेरी आली आन तिला सुदिक घ्येऊन ग्येली की खरातांच्या वाड्याकडं." एवढं बोलून परत म्हादू बोलायचा थांबला.

म्हादू बोलायचा थांबला आणि चंद्रभानकडे बघायला लागला. चंद्रभानला का कोणजाणे पण अस वाटायला लागलं होतं की म्हादुला अजूनही काहीतरी माहित आहे पण तो सांगायला धजावत नाहीये. चंद्रभानने म्हादूकडे निरखून बघितलं आणि म्हणाला," दादा, का कोण जाणे पण मला वाटतं आहे की तुम्ही माझ्यापासून काहीतरी लपवत आहात. तसं असेल तर खरंच तुम्हाला माहित असलेलं सगळं मला सांगा. दादा, एका मुलीच्या आयुष्याचा प्रश्न आहे. दादा, ती माझी कोणीच लागत नाही, तरीदेखील तिच्या मनाने माझ्या मनाला घातलेली साद ऐकून मी इथपर्यंत आलो आहे. ती कोणत्यातरी संकटात अडकली आहे असं माझं मन मला सांगत आहे. मला तिला मदत करायची आहे दादा. पण संपूर्ण सत्य समजल्याशिवाय मी तिला मदत करू शकणार नाही. त्यामुळे आता तरी काहीही आडपडदा न ठेवता तुम्हाला माहित असलेलं सगळं मला सांगा."

चंद्राभानच्या बोलण्याने म्हादुच्या डोळ्यात पाणी उभं राहिलं. त्याचा आवाज दाटून आला आणि तो म्हणाला,"आरं पोरा काय सांगू? खर काय आन खोट काय... समद हाताभाईर ग्येलं हाय रं. पोरा, मेरी चांगली हुती रं. तिचा खराखुरा जीव जडला हुता खरातांच्या सुन्यावर. त्यो ग्येला आन ती पार वेडीपिशी झाली. दिसाया अप्सरा हुती माजी मेरी. तिच्या मागं गावातलं कितीक पोरं लागली हुती याची काही गिनतीच न्हाई. पर ती कुनालाबी भिक घालत न्हवती. माजाबी तिच्यावर लई जीव जडला हुता. तिला आसं सुन्यासाठी खुल्यागत भटकताना बघून माझा जीव जलायचा. म्हनून मंग मी एकदा तिला गाटलं आन म्हन्ल तू गावाभाईरच्या भगताकड चल. त्यो तुला मदत करल. तिन माज ऐकलं आन एका राती म्या तिला घेऊन भागताकड ग्येलो. भगतान तिच समद बोलन ऐकून घ्येतलं आन तिला एक भुकटी दिली. आन म्हन्ला ही भुकटी खराताच्या वाड्याभावताली तीन दिस आन ती राती टाक. बग तुझा सुन्या यील परत. मेरी खुश झाली आन आमी दोघ परतलु. म्या तिला म्हन्ल म्या टाकतू ती भुकटी. तुला वाड्याजवल मोठ्या खरातांनी बघितला तर तुला त्यो सोडनार न्हाई. पन मेरी माजं ऐकेना. म्हन्ली तिची लढाई तिच लढनार. म्या तिला कायबी न्हाई बोललो. ती जे बोलल त्ये म्या ऐकायचो. पार खुळावून ग्येलू हुतु म्या.

मेरीनं दुसऱ्या दिसापास्न वाड्याच्या भवताली फेऱ्या माराया सुरवात केली. तिसऱ्या दिशी सांजच्याला मेरी फेऱ्या मारत हुती आन मी दूर एका झाडावर बसून तिच्याकडं बघत हुतु तर अचानक थोरले खरात भाईर आल्ये. त्यांनी खासकिनी मेरीचा हात धरला आन तिला मातीत ढकलली. त्यांच्यात कायतरी बाचाबाजी जाली. मी दुरून सारं बघत हुतु. पन मला मेरीची मदत कराया जायाची हिम्मत न्हाई जाली. अचानक थोरातांनी तिच्या काल्या झग्याला हात घातला आन मेरीनं जीवाच्या आकांतान हंबरडा फोडला. खरात थांबायला तयार न्हवतं. ती वरडत हुती आन त्ये ओरबाडत हुते. थोड्या येलान मेरीला तिथंच टाकून खरात निघून ग्येले. तवर पार अंधार झाला हुता. म्या झाडावरून उतरलु आन मेरीकडं धावलू. म्या तिच्याजवळ पोहोचेपर्यंत ती मागच्या विहिरीपर्यंत पोचली हुती. म्या तिला थांबवायचा प्रयत्न क्येला.. पन ती कायबी ऐकायला तयार न्हवती. तिची पाठ माज्याकड हुती. ती फकस्त एकच म्हन्ली... म्हादू माज एक काम करशील? म्या लगोलग हो म्हण्लू. तशी ती म्हन्ली... सुन्यानं मले धोका दिला. मला वाटलं हुत त्याला थोरल्या खरातान जबरदस्ती धाडला. पन सुन्या आपल्या मर्जीन ग्येला हाय. मी एकयेळ त्ये मी पचवलं असतं. पन आज माज्या संगती जे झालं त्यानंतर मले जगायची इच्छा न्हाई राहिली. तू मातर माज येक काम कर................ भगतान माले सांगितलं हुतं की येक तरुणाचा बळी हित द्यायला होवा. त्यो तू दये. मंग मी हाईच....... आस म्हनून मेरीन माज काई ऐकायच्या अगुदर हिरीत उडी घ्येतली."

म्हादू क्षणभर बोलायचा थांबला. त्याने जवळच्या लोट्यातून घोटभर पाणी घेतलं आणि शून्यात बघत तो परत बोलायला लागला. "पोरा.... म्या मघा सांगताना थोडं खोटं बोललु व्ह्तु. पोरा मेरीला पयले खरातांचा जीव घ्यायाचा हुता. त्यासाटी येक तरून तिथं जान महत्वाचं हुतं. पन गावातलाच कुनी तरुण म्या वाड्याकडं न्यायाचा म्हन्ल तरी त्ये जमणारं न्हवतं. कारण थोरल्या खरातांना सगले घाबरून आसायचे. म्हनून मंग म्याच शक्कल लढवली आन सहराकडं जाऊन एका पेपरमंदी 'खरातांच्या वाड्याला म्यानेजर हवा हाई' म्हनून जायरात द्येऊन आलू. फार वाट न्हाई बघावी लागली. त्यो बाबू आला आन कसा कोन जाने मलाच येऊन भेटला. म्या मेरीला दिलेला सबूत पुरा क्येला. मेरी त्याले वाड्याकडं घिऊन ग्येली. त्यो बाबू आत ग्येला आन थोरलं थोरात ग्येले. मला वाटलं आता मेरीचा आत्मा शांत हुईल. पन मंग त्यानंतर तिनं वाड्याच्या भवताली ठाण मांडलं.

दिसा मागून दिस जात हुतं. मेरी कुनाकुनाला दिसाया लागली. पन म्या कितीदा तरी शोधली तरी न्हाई दिसली. आन मंग ती पोर आली. माज्या मनात आलं जर ही पोर आत ग्येली तर माजी मेरी सुटल आन माज्याकड यील. म्हनून मी त्या पोरीला मेरीच्या हवाली क्येली.

पोरा मला कुनाचबी वाईट न्हवतं करायचं. मले फकस्त मेरी हवी हुती. पन मेरीला मी नकू हाय. पोरा... चुकलं रं माज. त्या पोरीचा हकनाक बली दिला मी. ती पोर मले म्हन्ली हुती की त्यो बाबू तिचा थोरला भाऊ हाय. आन त्याले शोधाया ती आली हाय. पोरा... त्यायेली मला फकस्त माजी मेरी दिसत हुती. पन आता मला होश आला हाय. मेरी कंदीच येणार न्हाई. मले म्हाईत हाय. तवा त्या पोरीला तरी त्या शापित वाड्यातून सोडवाया हवं. मले म्हाईत नाही आता काय करता यील. पण चल पोरा आपन वाड्याकडं जाऊ. मार्ग मिलल आपल्याला तिथंच." असं म्हणत म्हादू जागेवरून उठून उभा राहीला.

क्रमशः


Friday, June 5, 2020

गूढ (रहस्य कथा)(भाग 3)

गूढ (भाग 3)

चंद्रभान विचार करायला लागला. काय झाल असेल नक्की? निशा म्हणजे नक्की कोण आहे? ती राजनकडे कामाला होती. याचा अर्थ ती खरच एक जिती-जागती मुलगी आहे. पण मग तिचा त्या गावाशी आणि त्या वाड्याशी काय संबंध आहे? असं अचानक चांगली नोकरी सोडून ती तिथे का निघून गेली? बरं या सगळ्याचा माझ्याशी काय संबंध असावा? कॉलेजमध्ये असताना त्या बाजूने जात असताना काहीतरी ऐकलं होतं त्यावरून आपण एक कथा लिहीली. पण आपण जी कथा लिहिली आहे तसंच काहीसं तिथे घडलं आहे असं या मीराताई आत्ता आपल्याला सांगत आहेत. पण तरीही मी लिहिलेल्या कथेचा आणि निशाचा काय संबंध? ती आपल्यकडे मदत मागते आहे; हे तरी कशावरून? खूप विचार करूनही चंद्रभानला त्याच्या कोणत्याही प्रश्नांचे उत्तर सापडले नाही. म्हणून मग त्याने उमरगावला जाण्याचा निर्णय घेतला... त्याला आता उत्सुकता होती ती त्याने लिहिलेली कथा आणि निशा यांचा संबंध काय असेल? आणि जरी तिथे पोहोचल्यावर दुसरं काही नाही समजलं तरी अजून एखाद्या कथेसाठी काहीतरी सुचू शकेल; असा विचार त्याने केला. अर्थात त्याने याबद्धल कोणालाही काहीही सांगायचे नाही असं ठरवलं आणि तसाच झटपट आवरून आणि केवळ एक लहानशी बॅग घेऊन तो निघाला. त्याला असं तडकाफडकी निघताना बघून मीराताईंना आश्चर्य वाटले.

"साहेब उमरगावला निघालात? उगाच न्हाई म्हनू नका. दुधखुली न्हाई मी. जाता तर जावा. पन एक सांगते... दुसऱ्याला मदत करताना आपन कोन हाओत ते ईसरायचं नसतं. भले तुमाला कुणीबी कायबी सांगू दे. हे कायम मनात जागवा की तुमी मोठे लेखक हात. हित मुंबईत तुमचं खरं आयुष्य हाय. हिथ तुमाला परत यायाचं हाय. दुसरं म्हंजी गावात जाल तर पयले मंदिरात जा. पुजाऱ्याला भेटा. त्यो तुमाला चार शानपनाच्या गोष्टी सांगलं; त्या पण ऐकून घ्या. मंग हव ते करा." मीराताई म्हणाल्या.

"काळजी करू नका मीराताई. मी काहीही विसरणार नाही आहे. आणि तुम्ही म्हणता आहात तर अगोदर देवळात नक्की जाईन आणि मगच काय करायचं ते ठरविन. येऊ मी?" चंद्रभान म्हणाला.

"या साहेब. अंधारून जाईल न्हाईतर. वेळेत जावा तुमी." इतकेच उत्तर देऊन मीराताई त्यांच्या कामाकडे वळल्या. आता त्या अजून काही बोलणार नाहीत हे लक्षात येऊन चंद्रभानदेखील निघाला. त्याने स्वतःच गाडी चालवत उमरगावाला जायचं ठरवलं आणि गाडी सुरु केली.

सूर्य मावळतीला लागला होता. थंडीचे दिवस असल्याने खूपच लवकर अंधारून आलं होतं. चंद्रभान गाडीने गावात शिरला तोवर चांगलाच उशीर झाला होता. पारावर आता कोणीच दिसत नव्हतं. मात्र दूर देवळात आरती चालू असल्याचा आवाज येत होता. त्या आवाजाच्या दिशेने चंद्रभानने गाडी वळवली. देवळाजवळ पोहोचून त्याने गाडी थांबवली आणि पायातले बूट काढून देवळात प्रवेश केला तोवार आरती संपली होती. लोकं प्रसाद घेऊन आपापल्या घराकडे वळले होते. चंद्रभान गाभाऱ्याजवळ गेला आणि त्याने हात जोडले.

"शहराकडून आलात वाटतं?" त्याचा नमस्कार आटपला आणि तो मागे वळला तर प्रसाद घेऊन समोरच उभ्या असणाऱ्या पुजारीबुवांनी चंद्रभानला विचारलं.

"हो!' चंद्रभान म्हणाला.

"इथे कसे काय? काही काम होतं की कोणाकडे पाहुणे म्हणून आला आहात?" पुजारीबुवांनी विचारलं.

"काम आहे असंच म्हणावं लागेल." चंद्रभान थोडा विचार करून म्हणाला. मग पुजारीबुवांकडे बघत त्याने म्हंटलं,"तुम्ही या देवळातले पुजारी का?" पुजारीबुवांनी मान होकारार्थी हलवली. त्यावर चंद्रभान म्हणाला,"पुजारीबुवा, मी एक लेखक आहे." अजूनही त्याला काय आणि कसं सांगावं ते समजत नव्हतं. कारण तो नक्की कशासाठी आला होता ते त्याचे त्याला देखील माहित नव्हतं. त्यामुळे तो शब्दांची जुळवाजुळव करत होता.

"अरे वा! म्हणजे आज शहराकडचे कोणी मोठे पाहुणे आले आहेत आमच्या गावात. कोणाकडे आला आहात आपण? काय काम आहे?" पूजारीबुवांनी हसत हसत विचारलं.

"मी...... म्हणजे..... कोणाकडे आलो आहे असं नाही. पण मी भय किंवा रहस्य कथा लिहितो." असे म्हणून चंद्रभान मुद्दाम थांबला. 'भय' आणि 'रहस्य' हे दोन शब्द ऐकून पुजारीबुवा एकदम ताठ झाले. "हे बघा लेखक महाशय, इथे या गावात तुम्हाला कथा लिहिता येईल असं काही नाही. लोकं काहीही बोलतात. तुम्ही आपले आल्यासारखे आजची रात्र रहा आणि उद्या निघा कसे. कोणाकडे उतरणार आहात?" पुजारीबुवांनी विषय आवरता घेत विचारलं.

"कोणाकडे असा नाही हो. आणि मी कथेचं सूत्र मिळावं म्हणून आलोच नाही." चंद्रभानने घाई-घाईने उत्तर दिलं.

"मग? असं अचानक उठून इथे का आलात राव? काही कामाने यायचं होतं तर वेळेत आला असतात ना... दिवसा-उजेडी. हे असं आड वेळी आला आहात आणि म्हणता आहात काही कारण नाही इथे येण्याचं! बरं, कोणी ओळखीचं नाही म्हणता. कोणाकडे आलेला नाहीत म्हणता. अहो, आम्ही गावातली माणस साधी असतो वेडी नाही." आता पूजारीबुवांचा स्वर रुक्ष व्ह्यायला लागला होता. त्यांना अचानक चंद्रभानशी बोलण्याची इच्छा राहिली नव्हती आणि ते त्यांच्या एकूण देहबोलीतून दिसत होतं.

"पुजारीबुवा....." त्यांना हाक मारून क्षणभर चंद्रभान थांबला. आणि मग आर्जवी स्वरात म्हणाला,"काका.... प्लीज माझ म्हणणं ऐकून घ्या आणि मग ठरवा मी नक्की काय केलं पाहिजे. तुम्ही म्हणाल तसं करेन; तुमच्या शब्दाबाहेर जाणार नाही. मी वाचन देतो." आणि त्याने उठणाऱ्या पूजारीबुवांचा हात धरला.

पुजारीबुवांनी एकदा अंधारात विरघळणाऱ्या गावाकडे बघितलं आणि मग चंद्रभानकडे!  चंद्रभान आशेने त्यांच्याकडे बघत होता. क्षणभर विचार करून पुजारीबुवा त्याच्या शेजारी बसले. चंद्रभान पुजारीबुवांकडे बघत म्हणाला;"मी खूप गोंधळून गेलो आहे काका. काय बरोबर आहे... किंवा खरं आहे मला समजत नाही आहे. बरं, घरात कोणी वडील माणूस देखील नाही की मी त्यांना काही विचारीन." चंद्रभान अस्वस्थ आणि  दु:खी आवाजात म्हणाला.


चंद्रभानचं बोलणं ऐकून पूजारीबुवांचं मन थोड पाझरलं. त्यांनी चंद्रभानचा हात हातात घेतला आणि म्हणाले,"बोल बाळा. अरे मी उठून निघून जात होतो ते तुझ्याच भल्यासाठी. आता गावात तूला कोणीच भेटणार नाही. मला वाटलं, मी गेलो की तूदेखील निघून जाशील. जे तुझ्याचसाठी चांगलं होतं. पण भगवंताच्या मनात दुसरंच दिसतं." असं म्हणून त्यांनी देव्हाऱ्याच्या दिशेने हात जोडले आणि चंद्रभानकडे वळून ते म्हणाले,"बरं... ते राहुदे. सांग तुला काय सांगायचं आहे?"

"काका.... काल माझा इंटरव्हू होता. माझा एक मित्र या क्षेत्रात आहे; त्यानेच मला बोलावलं होतं. हे काहीसं वेगळं होतं म्हणून मी थोडा लवकरच पोहोचलो. तिथे मला एक निशा नावाची मुलगी भेटली. माझा मित्र मला म्हणाला तिच माझा इंटरव्यू घेणार होती. अजून तयारी होत होती. म्हणून मग मी आणि निशा आम्ही दोघे गप्पा मारत बसलो काही वेळ. नंतर माझ्या मित्राचा असिस्टंट बोलवायला आला आम्हाला. निशाला तयारी करायची होती म्हणून मी त्याच्या बरोबर गेलो. मला एका सेटजवळ नेऊन तो मुलगा गायब झाला. मी त्या मुलाची आणि माझ्या मित्राची बराचवेळ वाट बघितली. पण कोणीच दिसेना तेव्हा मग मी मित्राला हाका मारायला लागलो. त्यात मी धडपडलो आणि बरेच लोक आले. माझा मित्र देखील तिथे आला. त्याला मी म्हंटलं की मी आणि निशा तुझ्याच केबिनमध्ये गप्पा मारत बसलो होतो. तर तो माझ्याकडे विचित्र नजरेने बघायला लागला. मी एकूण घडलेला प्रसंग त्याला सांगितला तर त्याने मला सांगितलं की निशा पूर्वी त्याच्याकडे काम करत होती, पण मग तिने राजीनामा दिला आणि त्याचं कारण सांगितलं की ती कोणाचा तरी शोध घेत होती; तिला नुकतंच कळलं होतं की ती व्यक्ती इथे उमरगावात आहे; म्हणून ती उमरगावाला जायला निघणार होती.. ती परत येणार की नाही तेदेखील तिला माहित नव्हतं. त्यामुळे सुट्टी घेण्याएवजी तिने राजीनामाच दिला होता. ते ऐकून मला मोठा धक्का बसला. काही सुचेनासं झालं. कारण काही वेळापूर्वी मी निशाशी बोलत बसलो होतो ते माझ्या दृष्टीने तरी अगदी खरं होतं. त्यामुळे मी खूपच अस्वस्थ झालो. इंटरव्हू देणं  मला अवघड वाटायला लागलं. म्हणून मग तसं सांगून मी तिथून निघालो आणि घरी परत आलो. मित्राला काही कळू दिलं नाही.... रात्री मित्र घरी आला तेव्हा परत एकदा त्याच्या बोलण्यातून या गावाचा उल्लेख झाला आणि मला आठवलं की या गावाबद्दल मी पूर्वीदेखील ऐकलं होतं. खूप पूर्वी! त्या अफवेवरून मी एक गोष्ट देखील लिहिली होती तेव्हा. पण मी नक्की काय गोष्ट लिहिली होती ते मला आठवत नव्हतं. म्हणून मग मी ती गोष्ट शोधून काढली आणि वाचायला लागलो. गोष्ट वाचता वाचताच मला झोप लागली; आणि परत एकदा माझ्या स्वप्नात निशा आली आणि म्हणाली की मला माझ्या कथेची आठवण व्हावी म्हणून ती मला सकाळी भेटली होती. मी जागा झालो तेव्हा माझ्याकडे काम करणाऱ्या मीराताई आल्या होत्या. त्यांनी मला जे सांगितलं ते एकून तर मी पुरता हडबडलो काका..." असं म्हणून चंद्रभान क्षणभर थांबला.


"काय सांगितलं त्यांनी तुला?"पुजारीबुवांनी त्याच्या पाठीवर थोपटत अगदी शांत आवाजात त्याला विचारलं.

"काका........... मीराताई म्हणाल्या की त्या घरी येत होत्या तेव्हा त्यांना निशा भेटली होती. त्यांना देखील तिने सांगितलं की तिला माझ्या मदतीची गरज आहे. याचा अर्थ मला भास नव्हता झाला काल सकाळी. हो नं काका?" चंद्रभानने आवंढा गिळला.

चन्द्रभानची हकीकत एकून पुजारीबुवादेखील विचारात पडले. चंद्रभान पुजारीबुवांकडे आशेने बघत होता. पुजारीबुवा बोलावं की नाही अशा विचारात होते. त्यांनी चंद्रभानकडे बघितलं आणि त्याच्या डोळ्यातल्या आशेकडे बघून त्यांना वाटलं की त्यांना जे माहित आहे ते त्यांनी सांगितलंच पाहिजे. त्यांनी गाभाऱ्याच्या दिशेने बघून परत एकदा हात जोडले आणि "शंभो... शंकरा... पाठीशी रहा रे भक्तांच्या" असं म्हणून चंद्रभानशी बोलायला सुरवात केली.

"बेटा, मला तुझं नाव नाही माहित आणि आत्ता तू जे सांगितलं आहेस ते ऐकल्यानंतर तू काय करावंस ते मी सांगू शकत नाही. खरं तर मी तुझ सगळं म्हणणं ऐकून घेणार होतो आणि मग तुला इथून निघून जायला सांगणार होतो. पण आता वाटतं की  मला जे माहित आहे ते मी तुला सांगितलंच पाहिजे. तू म्हणतोस ते खरं आहे. ती मुलगी.. निशा... ती खरंच काही महिन्यांपूर्वी इथे या गावात आली होती. कर्मधर्म संयोगाने ती आली ती थेट इथेच याच देवळात आली होती. या गावात तिची पहिली भेट झाली ती माझ्याशीच. तुझं नाव जरी मला माहित नसलं तरी तू लिहिलेली कथा मला माहित आहे....." असं म्हणून पुजारीबुवा थांबले.

त्याची कथा पूजारीबुवांना माहित आहे हे ऐकून चंद्रभानला आश्चर्य वाटलं. "तुम्हाला मी लिहिलेली कथा माहित आहे? अहो; खूप पूर्वी लिहिली होती मी ती कथा. तुम्हाला कशी माहित ती?" चंद्रभानने विचारलं.


"कारण... ती कथा मला निशाने सांगितली. इथेच याच देवळात! ती आली तेव्हा टळटळीत दुपार होती. मी आत गाभाऱ्यात जप करत बसलो होतो. तिने मला हाक मारली. मी बाहेर आलो. थोडावेळ इथल्या तिथल्या गप्पा मारल्यानंतर तिने मला तुझी कथा दाखवली आणि विचारलं की 'असा कोणता वाडा आहे का इथे? असं कोणी कधी आलं होतं का इथे?' ती कथा ऐकून मला थोड आश्चर्य वाटलं. कारण खरातांचा वाडा आहे या गावात आणि वेगवेगळ्या दंतकथा देखील आहेत त्या वाड्याबद्धल. म्हणूनच तर त्या वाड्याकडे कधीच कोणी जात नाही. आता त्या वाड्याच्या आत कोण रहातं.. ते काय करतात.. कोणालाही माहित नाही. हा... पण आत कोणीतरी रहातं हे मात्र खरं. आता कसं म्हणशील तर वाड्यातला वावर जाणवतो बाहेर. पण त्या जाणवणाऱ्या वावरामुळेच त्या वाड्याबद्धल जास्त अफवा निर्माण झाल्या आहेत. आणि हो... काही वर्षांपूर्वी असा कोणी मुसाफिर आला होता म्हणे गावात. असाच संध्याकाळच्या वेळी आणि थेट वाड्याकडे गेला, असं देखील म्हणतात. मात्र तो आलेला कोणालाच कधीच दिसला नाही. एकट्या वेड्या म्हादुने त्याला पहिलं होतं. पण म्हादुला गावातले लोकं वेडा म्हणतात. त्यामुळे त्याच्यावर कोण विश्वास ठेवणार. मी निशाला हेच सांगितलं. तिने त्या म्हादुला भेटायची इच्छा व्यक्त केली. मी तिला म्हादू कुठे राहतो ते सांगितलं. पण त्याचवेळी हे देखील तिला विचारलं की उगाच उत्सुकतेपोटी कशाला अशा आपल्या आवाक्यापलीकडच्या गोष्टींमध्ये पडते आहे. त्यावर ती क्षणभर काहीच बोलली नाही. पण तिची नजर हरवली होती.  माझ्या प्रश्नाचं उत्तर तिने दिलं नाही पण ती म्हणाली,'जर ही कथा खरी असेल तर अजून या कथेचा शेवट झालेला नाही पुजारी काका.' मला कळलंच नाही तिला काय म्हणायचं आहे. पण तिच्या चेहेऱ्यावरचा निर्धार बघून मी काहीच म्हंटलं नाही. तिने म्हादुच्या घराचा रस्ता समजून घेतला आणि निघून घेली. त्यानंतर मात्र मला माहित नाही तिचं काय झालं. दुसऱ्या दिवशी म्हादुला भेटून तिच्याबद्दल विचारवं असं मनात आलं होत माझ्या. पण मुळात तो वेडा आहे. त्यामुळे तो काय सांगेल याचा भरवसा नव्हता. त्यात आमच्या गावातले लोक त्या वाड्याबद्दल बोलायला तयार नसतात. त्यामुळे म्हादुला कोणा मुलीबद्दल आणि त्या वाड्याबद्दल मी विचारतं होतो हे जर त्यांना कळलं असतं तर मला त्याचा त्रास झाला असता. म्हणून मग मी तो विषय मनात मागे टाकून दिला. आणि मग तू आत्ता तिच्याबद्धल बोलेपर्यंत मी तिला विसरूनही गेलो होतो." पुजारीबुवा बोलायचे थांबले.

क्रमशः

Friday, May 29, 2020

गूढ (रहस्य कथा) (भाग 2)

गूढ (भाग 2)



गूढ (भाग 2)

...................................उमरगाव कोकणातलं एक लहानसं गाव. इतकं लहान की जेम-तेम पाच-सहाशेच कुटुंब असतील. ताडा-माडांनी नटलेलं, सुंदरसा समुद्रकिनारा लाभलेलं एका कोपऱ्यातलं स्वतःमधेच सुखी असलेलं असं गाव होत ते. गावात एक मंदिर होतं. खूप जुन बांधकाम होत त्याच. मंदिरात अनेक देव होते पण शंकराची पिंडी गाभाऱ्याच्या मध्यावर असल्याने ते मंदिर शंकराचं मंदिर म्हणून ओळखलं जायचं. प्रचंड मोठा मंडप होता मंदिराचा. आजूबाजूला आवार देखील होतं. गावातले मोठे समारंभ या मंडपातच व्हायचे. गावात तशी मोजून पाच-पन्नास ख्रिश्चन कुटुंब देखील होती. पण म्हणण्यापुर्ती ख्रिश्चन... बाकी त्यांचे सगळे व्यवहार इतर गावकऱ्यांसारखेच होते. देवळात वेगवेगळ्या दिवशी त्या-त्या दिवसांप्रमाणे कीर्तनं-भजनं चालायची; पण कोणाचा कोणाला त्रास होत नव्हता. सगळं गाव आनंदाने मिळून-मिसळून रहात होत.

गावाच्या उत्तरेला मंदिरा इतकाच जुना एक वाडा होता. त्याच जुन्या धाटणीच्या बांधणीचा. मोठं आवार असलेला वाडा एकलकोंडा वाटायचा कारण आवारात आंबा फणसाबरोबरच वड पिंपळाची झाडे देखील खूप होती. चिंचा, नारळ, पोफळी... म्हणाल ती झाडं. आणि गिनती एक किंवा दोन नाही तर दहा-वीस च्या संख्येत सहज. दोन विहिरी देखील होत्या. एक वाड्याच्या मागल्या अंगाला आणि एक पुढे. वाडा कौलारू होता. दुमजली! पक्क बांधकाम. भिंतींची जाडीच मुळी तीन-चार फुट असेल. खोल्या प्रशस्त. वेगळ्या कपाटांची गरजच नव्हती. भिंतीतली अंगची कपाटंच खूप होती. त्यामुळे ती प्रशास्तता अंगावर यायची. मोठ्या खिडक्या. पुरुष-पुरुष उंचीच्या. चौपदरी वाडा. मागील अंगणात चार फुटी सुंदर तुळशी वृंदावन.

प्रत्येक प्रदेशाचा आपला असा एक स्वभाव असतो. तसा कोकणाचा आहे. एकूण जगात होणाऱ्या उलाढाली-राजकारण यावर चावडीवर बसून खूप काथ्याकुट होत असतो. पण शेजारच्या घरात कधी आवाज चढला तर त्याकडे मात्र सगळे दुर्लक्ष करतात. म्हणून असेल.......... किंवा गावातल्या प्रत्येकालाच माहित असेल की  तो वाडा आणि त्यात रहाणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे नसते, त्यामुळे मनात अनेक प्रश्न असूनही गावकरी कधी वाड्याचा किंवा त्यात राहणाऱ्या लोकांचा उल्लेखही करत नव्हते. जणूकाही तो वाडा गावात असूनही नव्हता.

थंडीचे दिवस होते. अंधारून लवकर येत असे. त्यात उंच-उंच माड असल्याने काळोख अजून गडद भासायचा. गावाकडे येणारी एसटी तीन कोसावारच थांबायची. तिथून मग बांधांवरून चालत गावाकडे यावं लागायचं. गाव कोकणातलं असल्याने 'वेशी तितक्या गोष्टी' म्हणी प्रमाणे त्या गावातसुद्धा अनेक वंदता होत्याच. त्यामुळे संध्याकाळी पाच नंतर उमरगावाकडे कोणी येत नसे. अगदी गावातलं माणूस असलं तरी निघायला उशीर झालाच तर आहे तिथेच वस्तीला राहून दुसऱ्या दिवशीची गाडी पकडून येत.

पण हे झालं गावातल्याच लोकांसाठी. नवीन येणाऱ्या प्रवाशाला हे कस माहित असणार? संध्याकाळचे सात वाजून गेले होते. बांधावरून तोल सांभाळत येणारा शहरी बाबुसुद्धा नवीनच होता. शेताला दुपारीच पाणी पाजलेलं होतं. पण थंडीचे दिवस असल्याने बांधाकडे चिखल तसाच होता. बाबूचे बूट चिखलाने पार माखून घेले होते. चिखलातून चालताना फच-फच असा मोठा आवाज होत होता. त्यामुळे बरोबर अजूनही कोणीतरी चालत आहे असा भास होत होता. बाबू थांबून सारखं मागे वळून बघत होता. पण तसं कोणीच दिसत नव्हतं त्याला. स्वतःवर वैतागत अंधारातून धडपडत बाबू गावात पोहोचला तेव्हा चावडीच्या गप्पा आटपत आल्या होत्या. घरा-घरातून सुरमई-कोलमिच्या रश्याचा आणि रटरटणाऱ्या भाताचा सुगंध दरवळायला लागला होता. त्यामुळे पुरुष मंडळी मुलांना हाकून घराकडे चालती झाली होती. एकटा म्हादू चीलीमिचा झुरका घेत पारावर बसला होता. दोन-चार झुरके मारून तो देखील खोपटीकडे वळणार होता. तितक्यात बाबू तिथे पोहोचला.

"नमस्कार" बाबूने म्हादुकडे बघत म्हंटले.

"राम राम." म्हादूने प्रतिउत्तर दिले आणि बाबूचे निरीक्षण करायला लागला. गुढग्यापर्यंत असलेले आणि आता चिखलाने भरलेले बूट. हातात मोठी पेटी. खाकी विजार आणि बुशर्ट. डोक्यावर इंग्रजासारखी टोपी. ते रूप बघून म्हादुला आश्चर्य वाटलं आणि हसायला देखील आलं. "कोनिकडचं पाहुनं तुमी?" त्याने बाबुला विचारलं.

'मी शहरातून आलो आहे. उमरगाव ते हेच ना?" बाबूने हातातली पेटी खाली ठेवत विचारले.

म्हादू हसला आणि म्हणाला,"हो हो! हेच उमरगाव. कोणाकडे आलात जणू?"

"खरातांकडे." बाबूने म्हंटले आणि सैलावून बसलेला म्हादू दचकला. त्याने चीलीमिचे झुरके मारणे बंद केले आणि एकूणच आपलं बस्तान आवरायला सुरवात केली.

"कुठे आहे हो वाडा? तुमच्या गावात अजिबात उजेड नाही. मी नवीन आहे. जरा सोबत कराल का? मला वाड्यावर वेळेत पोहोचायचे आहे. फारच उशीर झाला आहे मला." बाबू आपल्याच नादात होता. त्याला अजून म्हादूची लगबग लक्षात आली नव्हती.

"वाडा ना? त्या तिकडे पार गावाच्या पल्याडच्या अंगाला. बर मी येतो पावन. वाईच घाई होती." अस म्हणून म्हादू बसली घोंगडी खांद्यावर मारून चालुदेखील पडला.

बाबू एकदम गोंधळून गेला म्हादुच्या गडबडीने. म्हादू जात असलेल्या दिशेने तोंड करून तो मोठ्याने म्हणाला,"अहो.. अहो.... मागल्या अंगाला म्हणजे नक्की कुठे?"

पण उत्तर द्यायला म्हादू थांबलाच नव्हता. बाबू अजूनच वैतागला आणि अचानक त्याला मागून आवाज आला....

"खरातांच्या वाड्याकडे जायचं आहे का तुम्हाला? चला मी तिथेच जात आहे."

अचानक मागून आलेल्या आवाजामुळे दचकून बाबूने मागे वळून बघितले. किनऱ्या आवाजातले ते वाक्य म्हादुने देखील ऐकले होते. पण मागे वळून बघायची त्याची हिम्मत झाली नाही. तो तसाच पुढे पुढे चालत अंधारात त्याच्या घराकडे निघून गेला. बाबूच्या मागे एक अप्रतिम सुंदर तरुणी उभी होती. तिने ख्रिश्चन लोकांसारखा काळा झगा अंगात घातला होता. हातात एक कंदील होता. असं अचानक एका सुंदर तरुणीला अशा गावात इतकं उशिरा स्वतःहून मदतीला आलेलं पाहून बाबू बावचळला आणि दोन पावलं मागे सरकला.

"चिंता करू नका. या माझ्या मागून." ती तरुणी शांतपणे  म्हणाली आणि बाबू येतो आहे की नाही हे न बघता वळून चालूही पडली.

बाबू तिच्यामागून चालताना विचार करत होता. खरातांचा वाडा दाखवायला या बाईला आपल्या बरोबर येण्याचे कारण काय असेल? रस्ता सांगितला असता तरी आपल्याला जाता आलच असत की. जणूकाही बाबूचे विचार ऐकायला यावेत अशा प्रकारे ती मागे वळली आणि म्हणाली, "माझं म्हणत असाल तर मी तिथेच असते. त्यामुळे मुद्दाम नाही येत तुम्हाला रस्ता दाखवायला." बाबू तिच्या बोलण्याने भलताच दचकला. पण काहीच झाल नाही अश्या प्रकारे म्हणाला,"अहो पण मी काहीच म्हणत नाही आहे. उलट तुम्ही मला इतकी मदत करता आहात त्याबद्दल धन्यवाद."

परत पुढे बघून चालायला सुरवात करत ती म्हणाली,"तुम्ही आभार मानून घ्या आताच. नंतर वेळ मिळेल-नाही मिळेल."

तिच ते गूढ वागणं आणि बोलणं बाबुला अस्वस्थ करत होतं. पण आता बरंच अंधारून आलं होतं. काहीच दिसत नव्हतं. गावातही पुरतं सामसूम झाल होतं. त्यामुळे तिच्याशिवाय कोणी मदत करणं शक्य नव्हतं. त्यामुळे तो काही बोलत नव्हता. सवयीचा रस्ता असल्याने असेल बहुतेक पण ती मात्र भराभर चालत होती. त्यामुळे तो मुकाट तिच्यामागे चालत राहिला.

बराच वेळ चालल्यानंतर ती अचानक थांबली. बाबुला कळेना ती अशी अचानक का थांबली. पण क्षणभराने डोळे सरावले आणि त्याला तिच्या पुढे असलेले लाकडी गेट दिसले.

"हाच खरातांचा वाडा. जा तुम्ही आत. अंधार असला तरी फर्लांगभर चाललात की वाड्याचा दरवाजा लागेल." ती त्याच्या वाटेतून बाजूला होत म्हणाली.

"अरे तुम्ही नाही येत आत?" बाबूने गोंधळून विचारले. एव्हाना त्याचं असं मत झालं होतं की ती तरुणी खरातांच्याकडे कामाला असावी आणि त्याच वाड्यात राहात असावी. त्याने आजूबाजूला बघितले पण कोणतेही घर दिसत नव्हते. 'मग ही अशी इथून कुठे जाणार?' त्याच्या मनात आले.

"मी वाड्याच्या मागच्या अंगाला असते. तुम्हाला माझी गरज न लागलेलीच बरी." ती म्हणाली आणि त्याला गेट उघडून दिले.

काही न बोलता बाबू आत शिरला आणि वाड्याच्या दिशेने चालू पडला. वाडा तसा आतच होता. त्यात आता गुडुप्प अंधार झाला होता. कुठेही नावालाही उजेड नव्हता. आजूबाजूला मोठ-मोठी झाडं होती. त्यामुळे बाबूला अस्वस्थ वाटायला लागले. परत मागे वळून गावात कोणाकडेतरी रात्र काढावी आणि सकाळी वाड्यावर जावे असे त्याच्या मनात आले. पण असा विचार करेपर्यंत तो वाड्याच्या दरवाज्यासमोर उभा होता. दारावर एक कंदील लटकत होता. त्याच्या उजेडात त्याने एकदा त्या भल्यामोठ्या दरवाज्याचे निरीक्षण केले आणि कोयंडा हलवून दार वाजवले. केवढातरी मोठा आवाज झाला. आतून खोल कुठूनतरी "कोssssण?" असा आवाज आला आणि त्याबरोबरच दरवाज्याच्या दिशेने कोणीतरी येत असल्याचा आवाज आला.

"मी बाबू. शहरातून आलो आहे." नक्की काय उत्तर द्यावे हे न कळून बाबूने जे सुचले ते उत्तर दिले.

दरवाजा उघडला गेला; आत कंदील घेऊन एक मध्यम वयातली स्त्री उभी होती. तिच्या चेहेऱ्यावर भलताच गोंधळलेला आणि घाबरलेला भाव होता. तिने कंदील वर केला खरा पण बाबुला बघण्यापेक्षा त्याच्या मागे कोणी आहे का याचा ती अंदाज घेत होती असं बाबुला वाटलं. जेमतेम क्षणभर त्याच्याकडे बघितल-न बघितल्यासारखं करून तिने खरखरीत आवाजात बाबुला विचारलं, "कोण हवाय तुम्हाला?"

"मी बाबू." काय उत्तर द्यावे हे न सुचून बाबू म्हणाला.

"बर! मग?" तोच खरखरीत आवाज.

"मग? मग काही नाही. उमरगाव मधल्या खरातांच्या वाड्यासाठी व्यवस्थापक हवा आहे अशी जाहिरात वाचली. म्हणून मी आलो आहे." बाबूने माहिती दिली.

"हो. हवा आहे हे खरं. मग?" त्याच आवाजातला प्रश्न. नजर मात्र बाबुच्या पल्याड लागलेली.  "नोकरी मला मिळेल का ते बघायला आलो आहे. फार गरज आहे हो मला नोकरीची. मी जाहीरात आणली आहे." बाबू म्हणाला. अजून काही प्रश्न येऊ नयेत म्हणून त्याने पटकन जाहिरातीचा कागद काढून पुढे केला. बाबूने पुढे केलेला कागद तिने हातात घेतला पण त्याकडे बघितले देखील नाही. आता तिचा आवाज थोडा बदलला होता. तिने बाबुला म्हंटले,"हे बघा.. मला व्यवस्थापक हवा आहे पण त्याने बाहेर राहूनच सगळी व्यवस्था बघायला हवी. तुम्ही कधीही या वाड्याच्या आत यायचे नाही. तसा विचर देखील करायचा नाही. तुमच्या पगाराची काळजी करू नका. तो तुम्हाला महिन्याच्या पहिल्या तारखेला मिळत जाईल." इतकं सगळं ती बोलली तरीही अजूनही तिने बाबुकडे निट बघितले देखील नव्हते. तिची नजर बाबूच्या मागेच लागली होती. त्यामुळे बाबू पुरता गोंधळून गेला होता. हे अस दाराच्या बाहेर उभं राहून बोलत रहाण्याचा त्याला आता वैताग आला होता. त्यात ती बाई त्याला आत घ्यायला तयार नसावी हे त्याच्या लक्षात आले होते. 'बाहेर राहूनच सगळी व्यवस्था बघायची;' म्हणजे नक्की काय आणि कसे करायचे... या विचाराने तो गडबडला होता. बाहेर राहायचे म्हणजे गावात का? तो तर गावात कोणालाही ओळखत नव्हता. आता उशीर देखील इतका झाला होता की परत मागे वळून गावात जागा शोधणं त्याच्या जीवावर आलं होतं. दिवसभर प्रवास आणि त्यानंतरच्या पायपिटीने तो खूप दमला होता.

 त्याने आर्जवी आवाजात म्हंटले,"वाहिनी, मला आत येऊ द्या हो. आता इतक्या उशिरा मी गावात कुठे जागा शोधायला जाऊ?"

त्याच्या बोलण्याकडे पूर्ण दुर्लक्ष करत त्या बाई दरवाजा बंद करायला लागल्या. त्याबरोबर न कळत भांभावलेल्या अवस्थेतल्या बाबूने बंद होणाऱ्या दरवाजात पाय घातला. त्याबरोबर मागून कोणीतरी मोठ्याने हसल्याचा आवाज ऐकू आला. वाड्याच्या आतल्या त्या बाईंच्या डोळ्यात मूर्तिमंत भिती उभी राहिली आणि मग काही न बोलता त्यांनी बाबुला आत घेतले आणि दरवाजा लावून घेतला.

बाईंची इच्छा नसताही आत गेलेला बाबू कधीच बाहेर आला नाही. म्हादू आता म्हातारा झाला आहे. तो आजही पारावर बसून बाबुला भेटल्याची कहाणी सगळ्यांना सांगत असतो. तो घराकडे जायला वळला आणि तीच ती सगळ्या गावाला माहित असलेली पण आता दिसत नसलेली नाजूक आवाजातील मुलगी बाबुशी बोलायला लागली, हे देखील सांगतो तो. खरातांचा वाडा बाबू आत गेल्यापासून बंद आहे आणि कोकणातल्या इतर खऱ्या-खोट्या वंदतांमध्ये या गोष्टीची देखील भर पडली आहे. म्हादू किती खरं सांगतो आहे आणि किती नाही याची गावातल्या लोकांना खात्री नाही. पण  त्या घटने नंतर मात्र खरातांच्या वाड्याच्या  दिशेने जाणंच काय पण कोणीही गावकरी बघतसुद्धा नाही.......

कथा वाचून संपली आणि चंद्रभान भानावर आला. रात्रीचा एक वाजून गेला होता. कथा वाचताना नकळत त्याने दोन पेग्स घेतले होते आणि पोटात अन्नाचा एक कणही नव्हता. त्यामुळे चंद्रभानचे डोके फारच जड झाले होते. तो तसाच सोफ्यावर आडवा झाला आणि त्याला झोप लागली.

"तुम्ही तुमची ही कथा शोधून वाचावित म्हणूनच मी काल सकाळी तुम्हाला येऊन भेटले होते. कराल ना मदत मला? चंद्रभान! उठा ना! मी तुम्हाला चहा करून देकू का?" निशा चन्द्रभानच्या शेजारी बसून त्याला हलवत विचारात होती.

चंद्रभान दचकून जागा झाला. त्याच डोकं गरगरत होत. क्षणभर आपण कुठे आहोत आणि काय होत आहे हेदेखील त्याच्या लक्षात आलं नाही. त्याने आजूबाजूला बघितलं. पण त्याच्या जवळ कोणीही नव्हत. डोकं गच्चं धरून तो बसून राहिला. आपण खरच आत्ता स्वप्न बघितलं की ती निशा आपल्या बाजूला बसली होती? तो सोफ्यावर बसून विचार करत होता. इतक्यात दाराची बेल वाजली आणि चंद्रभान पुन्हा एकदा दचकला. त्याने घड्याळाकडे बघितले. नऊ वाजून गेले होते. त्याने दार उघडले. दारात मीराताई होत्या. गेली अनेक वर्ष त्याच त्याच्या घरातलं सगळं काम करायच्या. त्याच्यासाठी स्वयंपाकही करून जायच्या.

आत आल्या आल्या त्यांची बडबड सुरु झाली. "साहेब मी नेहेमीसारखी  आठला येऊन गेली की. पण तुम्ही आज दार आतून लावून घेतलं होतं. म्हनून माझी चावी लागली न्हाई. बर घंटी वाजवली तरी तुम्ही दार उघडलं न्हाई. मंग मी पुढचं काम करून परत आले." मीराताईंचे हाताने काम आणि तोंडाने बडबड असं चालू झालं होतं. चंद्रभान सोफ्यावर डोकं धरून बसला होता. मीराताईंनी त्याच्याकडे बघितलं. "साहेब बरं नाही का वाटत?" त्यांनी आस्थेने विचारलं.

"ताई जरा कडक चहा करून देता का मला? डोकं दुखत आहे खूप." चंद्रभान म्हणाला.

"हो साहेब." अस म्हणून मीराताई स्वयंपाकघराकडे वळल्या. त्यांनी आत जाताच आतून चंद्रभानला विचारलं,"साहेब, कुनी आलंत का?"

चंद्रभान त्या प्रश्नाने दचकला. "का हो?" त्याने विचारलं.

"न्हाई... चहाची तयारी हित हाय ना. म्हणून म्हंनल. आलंबी बाहेर काढून ठेवलेलं दिसतय न." मीराताई म्हणाल्या.

त्यांचं बोलणं ऐकून चंद्रभान अस्वस्थ झाला. "नाही हो ताई. मीच करत होतो चहा." अस म्हणून तो आत खोलीत गेला. खोलीत त्याच्या पलंगावर काल तो वाचत असलेली कथा उघडी पडली होती आणि पानं फडफडत होती. चंद्रभानला ती कथा आत पलंगावर कोणी ठेवली हे कळत नव्हते. कारण त्याला आठवत होते त्याप्रमाणे तो कथा वाचत बाहेर सोफ्यावर बसला होता. नकळत तो त्या दिशेने वळला आणि फडफडणारी पानं त्याने हातात घेतली.

कथेचं शेवटचं पान चंद्रभानच्या समोर आलं. आणि तो शेवट वाचून चंद्रभानच्या हातातून कथा गळून पडली. तो खूप घाबरला आणि धडपडत परत बाहेर आला. कारण काल रात्री त्याने वाचलेल्या शेवटच्या ओळीच्या पुढे अजून काही शब्द उमटले होते. कितीही प्रयत्न केला तरी ते शब्द चंद्रभानच्या नजरेसमोरून हलत नव्हते...........

...........आत गेलेला बाबू कधीच बाहेर आला नाही. म्हादू आता म्हातारा झाला आहे. तो आजही पारावर बसून बाबुला भेटल्याची कहाणी सगळ्यांना सांगत असतो. तो घराकडे जायला वळला आणि तीच ती सगळ्या गावाला माहित असलेली पण आता दिसत नसलेली नाजूक आवाजातील मुलगी बाबुशी बोलायला लागली, हे देखील सांगतो तो. खरातांचा वाडा बाबू आत गेल्यापासून बंद आहे आणि कोकणातल्या इतर खऱ्या-खोट्या वंदतांमध्ये या गोष्टीची देखील भर पडली आहे. म्हादू किती खरं सांगतो आहे आणि किती नाही याची गावातल्या लोकांना खात्री नाही. पण  त्या घटने नंतर मात्र खरातांच्या वाड्याच्या  दिशेने जाणंच काय पण कोणीही गावकरी बघतसुद्धा नाही.......

खरं तर चंद्रभानची कथा इथेच संपली होती. पण............. त्यापुढे उमटलेले शब्द असे होते.......आणि तरीही ती तिथे जायला निघाली होती. बाबूचं नक्की काय झालं हे तिला माहित करून घ्यायचं होतं आणि जमलं तर त्याला परत आणायचं होतं. म्हणून एकटीच निघाली होती ती... पण तिला खात्री होती तिच्या मदतीला तो येईल!!!

कोण असेल ही 'ती'? चंद्रभान विचार करत होता. 'का बरं तिला त्या बाबूचं काय झालं ते समजून घ्यायचं आहे? आणि ही जी कोणी ती आहे तिला कोणाबद्दल अशी खात्री आहे की तो तिच्या मदतीला जाईलच?'

"साहेब चहा." मीराताईच्या आवाजाने चंद्रभान केवढ्यांदा तरी दचकला. त्याचे ते दचकणे बघून मीराताई हसायला लागली. "साहेब, तुम्ही पन दचकता? न्हाई म्हंनल भुताखेताच्या कथा लिहिता... घरात एकटे रहाता आन खऱ्या मानसाच्या आवाजाने दचकता..... म्हंजी कमाल म्हणायची."

"ताई भय किंवा गूढ कथा लिहिणारा माणूस दचकत नाही असं तुम्हाला का वाटलं? मीसुद्धा एक माणूसच आहे ना?" चंद्रभान मिराताईंकडे बघत म्हणाला आणि त्याक्षणी आपण असाचं काहीसं निशाला म्हणालो होतो ते त्याला आठवलं.

"अवो मानुस आहात तर मानसांची मदत करा की साहेब." अस म्हणून मीराताई परत आत गेल्या.

त्या गेलेल्या दिशेने चंद्रभान काही क्षण बघत बसला. आणि मग त्याने मोठ्याने ताईंना विचारलं,"काय म्हणता आहात तुम्ही ताई? आज हे असं कोड्यात का बोलता आहात तुम्ही माझ्याशी?"

आतून काहीच उत्तर आलं नाही म्हणून चंद्रभानने अजून एकदा अजून थोड्या मोठ्या आवाजात तोच प्रश्न केला. तरी आतून शांतता. आता मात्र तो गडबडला आणि ताई गेलेल्या दिशेने दबकत दबकत जायला लागला. तेवढ्यात ताई झपकन बाहेर आल्या आणि चंद्रभान अजून एकदा दचकला. त्याच्याकडे बघत मीराताई मोठ्याने हसायला लागल्या आणि चंद्रभानला देखील हसू आले.

"काय साहेब? मी पार आत होते म्हनून एकू न्हाई आलं. काय म्हणत होतात?" मिराताईंनी हातातल्या वाळलेल्या कपड्यांच्या घड्या घालत चान्द्रभानला विचारले.

"तुम्ही कोणाच्या मदतीबद्दल म्हणत होतात ताई?" चंद्रभानने परत सोफ्यावर बसत विचारले.

"ती कोनी बया आली होती ना सक्काळी सक्काळी. तिला तुमची मदत हवी म्हन. मी आत येत हुतु आन ती बाहेर उभी हुती. तर मी म्हन्ली कुनाकडं? तर म्हनली तुमच्या सायबाकडं. आन मी काही बोलायच्या आत म्हन्ली सांगा सायबांना मला मदत करायला वो... एकटीच हाय आन अडकली हाय. मी म्हन्ल कोन तुम्ही बाई आन कूट अडकल्या. तर म्हन्ली सायबांना माहित हाय तुमच्या.... सांगा निशाला मदत करा. ती वाट बघती हाय. मी बर म्हनून पुढे आली." मीराताई आपल्याच नादात कपड्यांच्या घड्या घालत बोलत होत्या. पण त्यांच्या प्रत्येक वाक्यागणिक चंद्रभान अस्वस्थ होत होता. त्यांनी निशाचे नाव घेताक्षणी तो ताडकन उभा राहिला.

आज आपला साहेब हे असं का वागतो आहे त्याचा उलगडा काही केल्या मिराताईंना होत नव्हता. "काय झालं साहेब?" त्यांनी चान्द्रभानला विचारलं.

"काही नाही मीराताई. बर ते जाऊ दे. तुम्ही कोकणातल्या ना ताई?" त्याने अचानक मिराताईना विचारल.

"हो.. पार रत्नागिरीच्या पन फुड्च गाव हाय नव्ह" त्यांनी हसून चंद्रभानला म्हंटलं.

"तुम्हाला उमरगाव माहित आहे का हो ताई?" चंद्रभानने सावधपणे चेहेऱ्यावर कोणतेही भाव न दाखवता मीराताईंना प्रश्न केला. पण तो प्रश्न एकताक्षणी कपड्यांच्या घड्या घालणाऱ्या मीराताईंचा हात थांबला. त्यांनी चन्द्रभानकडे मोठ्ठे डोळे करत बघितलं.

"तुम्हाला काहून उमरगाव माहित वो साहेब?" त्यांनी चंद्रभानच्या प्रश्नचं उत्तर द्यायचं टाळत त्यालाच उलटा प्रश्न केला.

"ते महत्वाचं नाही ताई. सांगा ना तुम्हाला माहित आहे का ते गाव?" चंद्रभानने परत एकदा प्रश्न केला.

"हो! पन माझ्या गावाकडं जातानाचा तो एक थांबा आहे या पलीकडं मला कायबी माहित न्हाई. बरं तुम्ही चाय संपवा मी दुसऱ्या कामाला जाते. नंतर यीन मी." अस म्हणत मीराताईंनी तो विषय तिथेच निदान त्यांच्यापुरता तरी संपवला. "ताई ती निशा त्याच गावची आहे. तुम्ही म्हणता आहात की मी तिला मदत केली पाहिजे. पण जर मी तिला मदत करायची तर मुळात मला तिचं आणि त्या गावाचं काय नातं आहे ते समजून घेतलं पाहिजे. जर मला तिची मदत करायला त्या उमरगावाला जावं लागणार असेल तर त्यासाठी मला त्या गावाबद्दल पण समजलं पाहिजे ना?" चंद्रभान म्हणाला.

त्याचं बोलणं ऐकून मीराताई विचारात पडल्या. चंद्रभानने त्यांना कळू दिले नाही की त्याला उमरगावाबद्दल अगोदरच माहिती आहे. कारण त्याला मीराताईंकडे काय माहिती आहे ते समजून घ्यायचे होते.

"साहेब गाव तस झ्याक हाये वो. पन म्हणतात तिथं एक वाडा हाय. गावाच्या मागल्या अंगाला. एकटाच... मोठ्ठा... कधी कुणाला तिकड गेलेलं कोणी बघिटलंच न्हाई. म्हन कोणी शहराकडचा बाबू ग्येला होता तिथं आन कधी परत आलाच न्हाई. मंग तवापासून त्या वाड्याबद्दल कोनी बोलत न्हाई. ती पोरगी तिकडची हाय व्हय? नका लागू तिच्या नादी मंग. तुम्हाला काय कराचं हाय? एक तर भूता-खेताच्या गोस्ती लिवता. नकोच ते." मीराताई म्हणाल्या. त्यांना शांत करायला म्हणून चंद्रभान 'बरं' म्हणाला. त्याच्या त्या एका 'बरं' म्हणण्याने मीराताईंचे समाधान झाले आणि त्या त्यांच्या कामाला लागल्या. 

क्रमशः

Friday, May 22, 2020

गूढ (रहस्य कथा)(भाग 1)



गूढ


भाग


चंद्रभान एक प्रथितयश  लेखक. विशेषतः भय कथा आणि गूढ कथा लिहिण्यात त्याचा हात कोणी धरू शकत नसे. त्याच्या प्रत्येक पुस्तकाच्या किमान दोन ते तीन आवृत्या निघत असत. येत्या काही दिवसात त्याची टी. व्ही. वर मुलाखत दाखवण्यात येणार होती; त्यामुळे चंद्रभान खुप खुश होता. तो स्टुडियोमध्ये वेळेच्या अगोरच पोहोचला. कार्यक्रमाचा दिग्दर्शक राजन पूर्णपात्रे त्याचा मित्र होता. चंद्रभानला बघून तो खूप खुश झाला.
"ये ये भानू! लवकर बरा आलास?" राजनने त्याला मिठी मारत विचारले.

"अरे आयुष्यात पहिल्यांदा टी. व्ही. वर मुलाखत आहे. त्यामुळे थोडा एक्साईट झालो आहे. राहावलं नाही म्हणून लवकर आलो. तू बिझी आहेस का? तस असेल तर तुझ्या केबिनमध्ये थांबतो मी." चंद्रभान हसत म्हणाला. राजन काही म्हणणार इतक्यात... "अरे वा! तुमच्यासारखी भय आणि गूढ कथा लिहिणारी व्यक्तीसुद्धा एक्साईट होऊ शकते?" एक नाजूक किनाऱ्या आवाजातला प्रश्न चंद्रभानच्या मागून आवाज आल्यामुळे त्याने मागे वळून बघितले.

आवाजाप्रमाणेच नाजूक आणि मोहक तरुणी त्याच्या मागे उभी होती. गुलाबी रंगाची साडी आणि स्लीव्जलेस ब्लाऊज असा तिचा पेहेराव होता. चेहेऱ्यावर हलकासा मेकप होता.

'मेकपशिवायच चांगली दिसेल ही.' चान्द्रभानच्या मनात आलं. राजनकडे वळत त्याने 'ही कोण?' असे नजरेनेच विचारले.

राजनने चंद्रभानकडे हसून बघितले आणि त्याच्या पाठीवर थाप मारून म्हणाला,"निशा तुझ्या मनात जे प्रश्न आहेत ते आत्ताच विचारून घे भानुला. त्या निमित्ताने तुमची ओळखसुद्धा होईल. तुलाही गरज आहे त्याची ओळख होण्याची. भानु ही निशा बर का! आमची स्टार मुलाखतकार. असे गुगली टाकते ना एक एकदा...  तयार रहा हो तिच्या प्रश्नांना." आणि मग निशाकडे वळत तो म्हणाला,"निशा, तुम्ही दोघे इथे गप्पा मारत बसा. सगळी अरेन्ज्मेंट झाली की मी तुम्हाला बोलावून घेतो सेटवर."

"नमस्कार निशा. तुम्हाला असं का वाटलं की गूढ किंवा भय कथा लिहिणारी व्यक्ति एक्साईट होऊ शकत नाही. मी तुमच्यासारखाच एक माणूस आहे हो." हसत हसत चंद्रभान म्हणाला आणि जवळच्याच एका खुर्चीवर बसला. अजून एक खुर्ची ओढून घेत निशा देखील त्याच्या समोर बसली; पण अजूनही तिच्या चेहेऱ्यावर हसू नव्हतं. काहीसं गूढ आणि हरवलेल्या नजरेने ती चंद्रभानकडे बघत होती.

"काय हो? अस का बघता आहात माझ्याकडे? मी कोणी भूत किंवा जादूटोणा करणारा वाटतो आहे की काय तुम्हाला? एक साधासा लेखक आहे मी फक्त." चंद्रभान हसत म्हणाला.

तरीही निशा मात्र शांत होती. ती एक टक त्याच्याकडे बघत होती. तिची नजरदेखील अजूनही गूढ... हरवलेली होती. आता मात्र चंद्रभानला तिच हे वागणं आवडलं नाही. तिच्या चेहेऱ्यासमोर टिचकी वाजवत त्याने तिला भानावर आणण्याचा प्रयत्न केला. त्याच्या त्या टिचकीचा परिणाम मात्र लगेच झाला. निशा एकदम खोल झोपेतून जागी व्हावी तशी दचकली आणि काहीश्या गोंधळलेल्या आणि आश्चर्यचकित चेहेऱ्याने चंद्रभानकडे बघायला लागली.

"काय हो निशाजी. कुठल्या जगात अडकला आहात? मी तुमच्याशी बोलतो आहे आणि तुम्ही मात्र नजर माझ्यावार रोखून कुठल्यातरी दुसऱ्याच विचारात हरवल्या आहात. सगळ ठीक आहे ना?" चान्द्रभानाने तिला विचारले.

"हो... ठीकच असावं....  मी खर तर हरवलेच आहे आणि तरीही इथेच आहे. जाऊ दे; मी कशी आहे हे फारसं महत्वाचं नाही. पण खर सांगू का...... मला आश्चर्य वाटतं की तुमच्यासारख्या तिशीतल्या तरुण व्यक्तिने हे असं भय आणि गूढ कथांमध्ये का गुंतून राहावं? मला माहित आहे की तुम्ही इतरही साहित्य लिहिता. काही रोमँटिक कथा देखील तुम्ही लिहिल्या आहात. पण तरीही तुमची ओळख गूढ किंवा भय कथा लेखक अशीच आहे. अस का? रोमँटिक किंवा इतर असं काही लेखन जास्त करावसं नाही वाटत का तुम्हाला?" निशाने चन्द्रभानला विचारलं. अजूनही ती त्याच्याकडे ऐकटक बघत होती.

"बऱ्याच वेग-वेगळ्या कथा मी लिहिल्या आहेत हे खरं आहे. पण मला गूढ आणि भय हे दोन विषय आकर्षित करतात. अशा कथा लिहिण्यात खूप थ्रील आहे हो." चन्द्रभानाने तिला म्हंटल.

"पण असे विषय तुम्हाला कसे सुचतात?" निशाने विचारले.

"कसे सुचतात ते मला नाही माहित. बस सुचतात." चंद्रभान म्हणाला. पण निशाच्या चेहेऱ्यावर उत्तराने समाधान झालं नसल्याचं त्याला दिसलं. मग हसत म्हणाला,"त्याचं असं आहे नं निशाजी की एखादी छोटीशी पण वेगळी घटना किंवा एखादी वेगळी वस्तू ..... जागा... बघितली की मला त्यातून काहीतरी गूढ असं आपोपाप दिसायला लागतं आणि मग पुढे असंच सुचत जातं. मग  लिहायला सुरवात केली ना की आपोआप कथा तयार होत जाते." चंद्रभान असाच मूडमध्ये येऊन बोलायला लागला होता. पण त्याला मध्येच थांबवत निशाने विचारले,"आपोआप तयार होते कथा? म्हणजे नक्की काय चंद्रभान?" तिचा किनारा आवाज थोडा कातर झाला होता.

तिच्या अशा कातर आवाजाने तो थोडा गोंधळला. पण मग त्याकडे दुर्लक्ष करून परत बोलायला लागला,"म्हणजे असं निशाजी की एखादी शांत जागा किंवा एखादी जुनी वास्तू बघितली की तिथे कधीतरी काहीतरी वेगळ घडलं असेल असं माझं मन मला सांगतं. मग ते काय असेल याचा विचार मी करायला लागतो आणि कागद पेन घेऊन बसलो की आपोआप सुचायला लागतं आणि मी लिहित जातो. अनेकदा तर कथा लिहित असताना माझ्या मनात शेवट वेगळाच असतो. पण कथा पूर्ण होते तेव्हा माझ मलाच आश्चर्य वाटतं कारण शेवट मी अजून काहीतरी वेगळाच लिहिलेला असतो." अस म्हणून चंद्रभान थांबला.

"आश्चर्य का वाटतं चंद्रभान?" निशाने अधिरतेने विचारले.

"निशा... मला आश्चर्य वाटतं कारण मी जो शेवट माझ्या मनात ठरवलेला असतो तो मी लिहीतच नाही. माझ्या हातात जी कथा असते तिचा शेवट काहीतरी खूप वेगळा मी न विचार केलेला असाच असतो. जसं काही तो शेवट मी लिहिलेलाच नाही." बोलता बोलता चन्द्रभानची तंद्री लागली. पण निशाच्या ते लक्षात आलं नाही. ती त्याच्या उत्तराने थोडी अस्वस्थ झाली होती. तिची नजर खाली जमिनीवर खिळलेली होती. तशीच नजर असताना ती म्हणाली,"अहो शेवट काहीही असला तरी कथा तर तुम्हीच लिहिता ना? कदाचित सुरवात करताना तुम्ही एक शेवट ठरवत असालही. पण मग जसजशी कथा पुढे सरकते; तुम्हाला वाटत असेल की जो शेवट ठरवला त्यापेक्षा काहीतरी वेगळं असू शकतं. म्हणून तुम्ही शेवट बदलत असाल किंवा एखाद्या कथेचा शेवट तुम्ही नंतरही बदलू शकत असाल. तुमचीच कथा आणि तरीही शेवट तुमच्या मनात नसलेला असं कसं होईल? कथेचा शेवट तुम्हाला अगोदरच माहित असेलच नं?"

निशाच्या प्रश्नामुळे चंद्रभानची तंद्री भंगली. मुळात तंद्रीमध्ये असल्याने ती काय म्हणाली ते त्याला समजलं नव्हतं. पण माझं तुमच्या बोलण्याकडे लक्ष नव्हतं असं म्हणणं वाईट दिसेल असं वाटून त्याने तिच्या हो ला हो केलं. मात्र त्याच्या त्या एका 'हो'मुळे निशा एकदम खुश झाली.

"तुम्हाला माहित नाही चंद्रभान पण तुमच्या या एका 'हो' ने मला किती मोठा दिलासा दिला आहे. कधी कधी काही शेवट अर्धवट असतात. त्यामुळे अनेक जीव अडकून राहातात नाही का? पण आता मला खात्री आहे की असं होणार नाही.  आता माझ्या मनातल्या प्रश्नाचं उत्तर मला नक्की मिळेल. आता मी उमरगावला जायला मोकळी झाले. " निशा मनापासून हसत चंद्रभानला म्हणाली.

आपण नक्की कशाला 'हो' म्हणालो आहोत याची चंद्रभानला अजूनही कल्पना नव्हती. आणि अचानक मुलाखती संदर्भातले प्रश्न विचारायचे सोडून ही निशा हे असं कुठेतरी जाण्याबद्दल का बोलायला लागली हे देखील त्याला कळलं नव्हतं. 'उमरगाव? कुठेतरी ऐकलं आहे हे नाव!' चंद्रभानच्या मनात आलं. त्याबद्दल निशाला विचारावं म्हणून चंद्रभान तिच्याकडे वळला आणि तेवढ्यात राजनचा असिस्टंट तिथे आला आणि म्हणाला,"निशा काम झालं आहे. चल."

"हो! आलेच मी वैभव. तू हो पुढे." निशा चंद्रभानची नजर चुकवत म्हणाली. निदान अस चंद्रभानला वाटलं.

"नाही नाही. तुला पुढ्यात घालून घेऊन यायला सांगितलं आहे. चल तू माझ्याबरोबर." वैभव अगदी तिच्या शेजारी उभा राहून म्हणाला.

"इतका वेळ गेला तरी माझी  आठवणसुद्धा नव्हती तुम्हाला. आणि आता काम  झाल्यावर एका क्षणाची फुरसत नाही काय?" ती थोडी वैतागत म्हणाली. "बरं! माझी मी पोहोचेन. तू यांना घेऊन जा." असं म्हणून ती बाजूच्या दारातून निघून गेली.

"सर, तुम्ही चला माझ्या बरोबर." क्षणभर निशा गेली त्या दिशेने बघून वैभव चंद्रभानकडे वळून म्हणाला आणि चंद्रभानदेखील त्याच्या मागे निघाला.

चंद्रभान काही न बोलता वैभवच्या मागोमाग सेटवर आला. ते दोघे तिथे पोहोचले पण सेट वरचे सगळेच दिवे बंद होते. "अरे सगळे दिवे का बंद आहेत कळत नाही. मी आलो तेव्हा सेटवर लखलखाट होता. सर तुम्ही इथेच थांबा. मी बघून येतो. काहीतरी घोटाळा झालेला दिसतो आहे. कुठेतरी शॉर्ट सर्किट असेल. राजन सर वैतागले असतील. मी आलोच." अस म्हणून आणि चंद्रभानला काही लक्षात यायच्या आत वैभव गायब झाला.

चंद्रभानला काही कळले नाही. तो बराच वेळ तिथे थांबला. पण त्याला कोणत्याही प्रकारची हालचाल आजूबाजूला जाणवत नव्हती. सेट जर तयार असेल आणि फक्त दिवे बंद असतील तर मग कोणी एकमेमांशी बोलत का नाही; याचं त्याला राहून राहून आश्चर्य वाटत होतं. शेवटी अंधारात उभं राहून वैतागलेला चंद्रभान राजनला हाक मारत पुढे सरकला. नवीन-अनोळखी जागा  असल्याने त्याला नक्की कुठे जावं ते लक्षात येत नव्हतं.

"राजन... राजन.... अरे भय कथा मी लिहितो तू नाही. हे असे दिवे बंद करून तू मला घाबरवायचा प्रयत्न तर करत नाहीस ना?" राजनला हाक मारत आणि काहीसं मोठ्याने बोलत चंद्रभान पुढे सरकत होता. अचानक त्याचा धक्का कशाला तरी लागला आणि मोठ्ठा आवाज झाला. चंद्रभान देखील चांगलाच धडपडला. झालेल्या आवाजाने एकदम अनेकजण तिथे आले. कोणीतरी दिवेसुद्धा लावले. त्याठिकाणी एकदम लखलखाट झाला. चंद्रभानला खाली पडलेला बघून राजनला खूप आश्चर्य वाटले.

"अरे चंद्रभान तू कधी आलास? बरं, आलास तर सरळ माझ्या ऑफिसमध्ये यायचं नं. इथे या बंद सेटवर काय करतो आहेस?" त्याला उठायला मदत करत राजन म्हणाला.

"राजन काय चेष्टा चालवली आहेस? अरे मी कधीच आलो आहे. तुझ्या ऑफिसमध्ये आपण भेटलो. मग तू सेट लावायला गेलास तेव्हा निशाला माझ्या बरोबर सोडून गेलास. आम्ही गप्पा मारत होतो तर तुझा असिस्टंट वैभव आला बोलवायला. निशा बहुतेक तयार व्हायला गेली असेल. मी तुझ्या त्या वैभव बरोबर इथे आलो. पण इथे अंधार होता. त्याचं कारण शोधायला म्हणून तो वैभव मला इथेच सोडून गेला. मी बराच वेळ थांबलो पण काहीच हालचाल नाही वाटली. कोणी इथे आहे की नाही ते देखील कळत नव्हते. बरं तुला सोडून मी इथे कोणालाही ओळखत नाही. म्हणून मग तुला हाक मारत पुढे सरकलो तर धडपडलो." चंद्रभान राजनला म्हणाला.

चंद्रभान जे सांगत होता त्यामुळे राजनला खूप आश्चर्य वाटलं. पण इतरांच्या मनात काही येऊ नये म्हणून त्याने चंद्रभानचा हात धरला आणि म्हणाला,"बरं बरं... चल. जरा चहा घेऊ. मग सुरु करू तुझी मुलाखत." आणि त्याला घेऊन परत आपल्या केबिनच्या दिशेने निघाला.

केबिनमध्ये शिरताच राजनने चंद्रभानला सोफ्यावर बसवले आणि विचारले,"हा आता बोल. हे काय  चालवालं आहेस तू? कोणत्यातरी गूढ कथेचा काहीतरी प्लॉट मनात आहे का? त्याचा प्रयोग तू माझ्यावर करून बघतो आहेस का?"

"मी? मी काय चालवालं आहे? म्हणजे काय राजन? काय म्हणायचं आहे तुला नक्की?" राजनच्या भडीमराने गोंधळून चंद्रभान म्हणाला.

"तू बाहेर काय म्हणत होतास चंद्रभान? निशा तुला भेटली? वैभव बोलवायला आला होता? तू कसं ओळखतोस निशाला आणि त्या वैभवला?" राजनने चंद्रभानला विचारले.

"मी कसं ओळखतो? अरे तूच ओळख करून दिलीस ना निशाशी आता थोड्या वेळा पूर्वी इथेच तुझ्या ऑफिसमध्ये." चंद्रभान वैतागत म्हणाला.

"मी? भानू... अरे मी कधी ओळख करून दिली तुझी?" राजन आश्चर्याने म्हणाला.

राजनच्या बोलण्याने चंद्रभानच्या लक्षात आले काहीतरी गडबड होते आहे. त्यामुळे तो एकदम शांत झाला आणि म्हणाला,"राजन काहीतरी गैरसमज होतो आहे दोघांचाही. काय घडलं ते मी सांगतो आणि मग तुला काय माहित आहे ते तू सांग. ठीक?"

"ठीक आहे." राजनने मान्य केले.

"तर असं झालं आहे की मी आयुष्यात पहिल्यांदा टी. व्ही. इंटरव्यू देणार असल्याने थोडा एक्साईट होतो. म्हणून तू सांगितलेल्या वेळेच्या अगोदरच आलो; काही वेळापूर्वी. इथेच तुझ्या केबिनमध्ये आपली भेट झाली. तू माझ्याशी बोलत असताना इथे निशा आली. तू मला तिची ओळख करून दिलीस की ती तुमची स्टार मुलाखतकार आहे आणि माझी मुलाखत देखील तिच घेणार आहे. मग तू तिला म्हणालास की माझी चांगली ओळख व्हावी महणून आम्ही दोघांनी इथे बोलत बसावं आणि पुढची तयारी करायला म्हणून तू  गेलास. आम्ही दोघे इथे गप्पा मारत बसलो होतो. थोड्यावेळाने वैभव इथे आला. निशाने त्याचे नाव घेतले म्हणून मला कळले त्याचे नाव. तर... तू आम्हाला बोलावले आहेस असे त्याने म्हंटले. बहुतेक निशाला मेकअप करायचा होता म्हणून मग ती या इथल्या दाराने आत गेली आणि मी वैभव बरोबर बाहेर पडलो. सेटवर आम्ही पोहोचलो तर अंधार होता. काहीतरी शॉर्टसर्किट झालं असेल अस म्हणून वैभव गेला. जाताना म्हणाला देखील की तू रागावशील. त्याने मला तिथेच उभं राहायला सांगितलं म्हणून मी थोडावेळ उभा राहिलो. पण कोणतीच हालचाल जाणवत नव्हती किंवा कोणाचाही आवाज येत नव्हता. म्हणून मग मी तुला हाक मारत थोडा पुढे सरकू लागलो आणि धडपडलो. झालेल्या आवाजाने तुम्ही सगळे तिथे आलात.... पुढचं तुला माहीतच आहे." चंद्रभान म्हणाला.

राजन चंद्रभानचं बोलणं शांतपणे ऐकत होता. चंद्रभानच्या प्रत्येक वाक्यागणिक त्याच्या चेहेऱ्यावर आश्चर्य फुलत होत. चंद्रभान बोलायचा थांबला आणि राजन म्हणाला,"चंद्रभान................. हे सगळ आत्ता झालं? तू मला काही वेळापूर्वी इथेच भेटला होतास असं तुझ म्हणणं आहे का? मी तुझी आणि निशाची ओळख करून दिली? मग तुम्हाला सोडून मी सेटवर गेलो? मी वैभवला पाठवलं?"

आता मात्र चंद्रभान पूर्ण वैतागला आणि म्हणाला, "राजू, अरे मी तुला जे घडलं ते सगळं तसंच्या तसं सांगितलं ना? मग हे असे परत परत तेच प्रश्न विचारून तू मला परत तेच सांगायला का लावतो आहेस?"

"मी तुला परत परत तेच विचारतो आहे भानू; पण तू तेच परत सांगू नयेस असं मला वाटतं आहे............ कारण तू जे म्हणतो आहेस तसं काहीही घडलेलं नाही. मी सकाळपासूनच स्टुडियोच्या दुसऱ्या कोपऱ्यात काम करतो आहे. कारण तुझ्या मुलाखतीसाठी फार मोठा सेट लावायची गरजच नाही. मी माझ्या दुसऱ्या एका सिरीयलच्या सेटची तयारी करतो होतो. बरं........ त्याहूनही महत्वाचं म्हणजे निशाला माझ्याकडचं काम सोडून अनेक महिने झाले आहेत. महत्वाचं म्हणजे वैभव नावाचा माझा कोणी असिस्टंट नाहीच आहे." राजन चंद्रभानकडे एकटक बघत म्हणाला.

हे ऐकताच चंद्रभानला मोठा धक्का बसला. "राजू........... अरे.............. तू काय बोलतो आहेस?" चंद्रभान सुन्न झाला.

चंद्रभानची अवस्था बघून राजनला काळजी वाटली. त्याच्या हातावर थोपटत राजनने विचारले,"भानू बरा आहेस नं तू? अरे काहीतरी भास झाला असेल तुला. जाऊ दे. मी आत येतानाच दोन कॉफी पाठवायला सांगितल्या आहेत. मस्त कॉफी घेऊ या आणि मग तुझा इंटरव्यू घेऊया. ठीक?"

"राजू आज इंटरव्यू नको प्लीज. मला खूप अस्वस्थ वाटतं आहे. मी घरी जातो." अचानक अस्वस्थ होत चंद्रभान म्हणाला.

त्याची एकूण मानसिक स्थिती बघून राजनने देखील त्याला आग्रह केला नाही. " ठीक. इंटरव्ह्यू काय कधीही होईल. तू जाऊ शकशील ना एकटा? की माझ्या गाडीने जातोस? माझा ड्रायव्हर सोडेल तुला.  मी सगळं काम आटपलं की तुझी गाडी घेऊन तुझ्या घरी सोडायला येतो. तेव्हा गप्पा मारू." राजन म्हणाला.

"ठीक! तुझ्याच गाडीने जातो मी. रात्री नक्की भेटू. अच्छा." चंद्रभान म्हणाला आणि कॉफीची वाटही न बघता राजनच्या गाडीत बसून निघून गेला.

रात्री साधारण दहा साडेदहाच्या सुमाराला राजन चंद्रभानच्या घरी पोहोचला. चंद्रभान त्याचीच वाट बघत होता. "खूप उशीर झाला रे तुला राजू? सध्या कसलं शूटिंग चालू आहे तुझं?" उगाच काहीतरी विचारायचं म्हणून चंद्रभानने विचारलं आणि राजनला बसायला सांगून तो बारच्या दिशेने वळला. "काय घेणार ते बोल. एक मस्त स्कॉच आणली आहे. नवीनच आहे; उघडतो. काय?"

"नको भानू. तू बस बघू माझ्या शेजारी. मला तुझ्याशी बोलायचं आहे." चंद्रभानला अडवत आणि त्याचा हात धरून आपल्या शेजारी बसवत राजन म्हणाला. "त्यात मला देखील अजून एका पार्टीला जायचं आहे."

"अरे तुला यापुढे पार्टी आहे? बापरे! बर मग तू निघ हव तर. आपण काय उद्या बोलू." चंद्रभान म्हणाला.

"नाही. मला तुझ्याशी बोलायचंच आहे." राजन आग्रहाने म्हणाला.

त्यावर हसत चंद्रभान म्हणाला,"बर बोल. माझी काही हरकत नाही."

"भानू; अरे आज सकाळी जे काही घडलं ते तुला विचित्र नाही वाटत का?" राजनने अस्वस्थ होत चंद्रभानला विचारले.

"विचित्र? नाही. थोड वेगळं वाटलं मला. पण असं काळजी करण्यासारखं काही वाटलं नाही. त्यावेळी मी थोडा गोंधळलो होतो. पण आता नाही."चंद्रभानच्या चेहेऱ्यावर हसू होते.

"याचा अर्थ तू खोटं बोलत होतास ना सकाळी? तू त्या सेटवर मला भेटलास तेव्हाच आला होतास ना तू तिथे?" राजनने चंद्रभानचा हात धरून त्याला विचारले.

त्यावर चंद्रभान क्षणभर राजनकडे टक लावून बघत राहिला आणि मग अचानक खो-खो हसत सुटला. आता मात्र राजनचा धीर सुटायला लागला.

"अरे असा हसतो का आहेस? काय ते निट सांग बघू मला. तू सकाळी खोट बोलत होतास ना?" राजनने चिडून चंद्रभानला विचारले.

त्यावर अजून गडगडाटी हसून चंद्रभानने होकारार्थी मान हलवली. आणि आपलं हसू आवरत म्हणाला,"अरे राजू; थोडी गम्मत केली तुझी तर तू इतका अस्वस्थ झालास? जर असं खरंच घडलं असतं तर बहुतेक तुझी चड्डीच फाटली असती. चल विसर ते आणि निघ बघू आता. नाहीतर अजून उशीर होईल तुला तुझ्या पार्टीला."

त्यावर सुटकेचा निश्वास टाकत राजन उठला आणि "साल्या ही कसली चेष्टा रे?" असं म्हणत निघाला. दारापर्यंत जाऊन मात्र तो गरकन मागे वळला मोठे डोळे करत चंद्रभानला त्याने विचारले,"जर तू खोटं बोलत होतास भानू तर मग तुला निशाबद्दल कसं कळलं?"

"राजू; अरे मी सकाळी तुझ्याकडे यायला निघालो त्यावेळी तुझ्या सेटच्या अगोदरच्या सेटवर निशा मला भेटली. जाम सुंदर आहे रे ती. मला बघून स्वतः बोलायला आली. तिनेच मला सांगितलं की ती अगोदर तुझ्याकडे काम करत होती. पण आता नाही. मग मला हे सुचलं आणि तुझी गम्मत करावी म्हणून मी हे नाटक केलं. तिचा नंबर मी घेतला आहे. काही निरोप आहे का तिला? असेल तर मला सांग. त्या निमित्ताने तिला फोन करीन म्हणतो." डोळा मारत चंद्रभान म्हणाला.

"भानू... तू खरं बोलतो आहेस नं? निशा तुला भेटली? खरंच?" राजनने डोळे बारीक करत चन्द्रभानला विचारले.

"कमाल करतोस राजू. नाहीतर निशा नावाची तरुण सुंदर मुलगी तुझ्याकडे काम करते असं मला स्वप्न पडेल का? असं का विचारतो आहेस तू?" चंद्रभान काहीसा मनात गोंधळा होता पण वरकरणी मात्र शांतपणे म्हणाला.

"भानू देव करो आणि तू म्हणतो आहेस तेच खरं असो. कारण निशा जेव्हा तिचा राजीनामा द्यायला आली होती तेव्हा मी तिला विचारले होते की दुसरीकडे कुठे अजून चांगला पगार मिळतो आहे म्हणून सोडते आहेस का? तर म्हणाली नाही.. तिला तिच्या गावाला जायचे ठरवले होते. काहीतरी घडलं होत म्हणे; आणि त्याचा शेवट तिला स्वतःलाच करायला लागणार होता, अस तिचं म्हणणं होतं.  मी तिला खूप समजावले होते असं अचानक चांगली नोकरी सोडून जाऊ नकोस. तुला खूप प्रोस्पेक्ट्स आहेत इथे. सुंदर आणि हुशार मुलींची आमच्या इंडस्ट्रीमध्ये वानवाच आहे. हवं तर सुट्टी घे काही दिवसांची. तू खूप चांगलं काम करते आहेस; त्यामुळे तुला सुट्टी मिळेल. गावाकडेचं काम झालं की ये परत. पण तिने ऐकले नाही. म्हणाली परत आलेच तर नक्की येईन तुमच्याचकडे. पण परत येईन की नाही ते मलाच माहित नाही. मला कळलंच नाही ती नक्की काय म्हणत होती. पण मग मी अजून काही नाही विचारलं तिला. कदाचित तिला अवडलं नसतं. उगाच कशाला कोणाच्या वयक्तिक गोष्टीत लक्ष घालायचं? परत आलीस तर जरूर ये अस म्हंटल होतं. तरीही ती माझ्याकडे आली नाही आणि दुसरीकडे जॉईन झाली... आणि ते ही तू सांगतो आहेस तेव्हा कळलं. ठिक! तिची इच्छा." राजनने चंद्रभानला सांगितले.

"तिने तिच्या गावाला जाण्यासाठी नोकरी सोडली? कमाल आहे!"चंद्रभान म्हणाला.

"अरे मला देखील आश्चर्य वाटलं होतं. मुख्य म्हणजे एकीकडे ती म्हणत होती की फक्त काहीतरी काम आहे आणि तरीही ती परत येईल की नाही ते तिलाच माहित नव्हतं. हे थोड विचित्र वाटलं मला." राजनने माहिती दिली.

एकूण राजन जे सांगत होता ते एकून चंद्रभान थोडा विचारात पडला. पण ते राजनच्या लक्षात आल नाही. तो आपल्याच नादात निघाला. राजनने दार उघडले आणि चंद्रभान भानावर आला. "अरे राजू; तिच्या गावाचं नाव काय म्हणालास रे?" त्याने बाहेर पडणाऱ्या राजनला विचारले.

"गावाचे नाव? सांगितलं होतं खरं तिने...... एक मिनिट.... हा ...... उमरगाव का नगर  असं काहीसं होतं."असे म्हणून राजन घराबाहेर पडला.

राजन गेला. त्याच्या शेवटच्या वाक्याने चंद्रभानला धक्का बसला होता. चंद्रभान विचारात पडला. कारण तो राजनशी खोट बोलला होता. त्याचा सकाळचा अनुभाव त्याच्या इतकाच सच्चा आणि खरा होता. याचा काय अर्थ असू शकतो? चंद्रभानने आजवर अनेक कथा आणि कादंबऱ्या लिहिल्या होत्या. त्याचा कल भय कथा आणि गूढकथांकडेच जास्त होता. पण सकाळी आलेल्या अनुभवाने त्याला पुरतं गोंधळवून टाकलं होतं. त्यात जाता जाता राजनने ज्या गावाचा उल्लेख केला होता... सकाळी भेटलेल्या त्या निशाने त्याच गावाचा उल्लेख केला होता. हा योगायोग नव्हता. हे नक्की काय चाललं आहे ते चंद्रभानला कळत नव्हतं. मात्र सकाळी  आलेला अनुभव खरा होता याची त्याच्या मनाला खात्री होती. त्यामुळे तो अनुभव येण्यामागे काहीतरी कारण असणार असं त्याला प्रकर्षाने वाटत होतं. त्यामुळे वेळ न घालवता त्याने स्वतः लिहिलेल्या कथा-कादंबऱ्या ठेवलेले कपाट उघडले आणि उमरनगर किंवा उमरगाव असा उल्लेख असलेली कथा शोधायला सुरवात केली.

खूप शोधल्यानंतर चन्द्रभानला ती कथा मिळाली. त्याच्या खूप सुरवातीच्या कथांमधली ती एक अत्यंत लहान अशी कथा होती. आता त्याला ती फारशी आठवत देखील नव्हती कारण त्यावेळी तो कॉलेजमध्ये शिकत होता आणि एक आवड म्हणून अधून मधून कथा लिहित होता. ती कथा देखील त्याला सुचली होती कारण मित्रांबरोबर रत्नागिरीला जाताना मध्ये एक उमरगाव थांबा लागला होता. त्यावेळी एका मित्राने तिथेल्या वाड्याचा उल्लेक करून त्याबद्दलच्या काही वंदता सांगितल्या होत्या. आणि मग एक गम्मत म्हणून त्याने ती कथा लिहिली होती. कथा मित्राने वाचली होती आणि चांगली आहे म्हणून चंद्रभानच्या मागे लागून त्याला ती एका मासिकाकडे पाठवायला लावली होती. कशी कोणजाणे पण ती छापून आली होती. खर तर चंद्रभानच्या अगदी सुरवातीच्या काळात.... म्हणजे लेखकच व्हायचं असा केवळ मनात विचार होता........ त्यावेळी छापून आलेली ती कथा होती. ती कथा मिळाली आणि त्यानुषंगाने चंद्रभानला मागील सगळं आठवलं. या कथेचा आणि आजच्या सकाळच्या अनुभवाचा काहीतरी संबंध असावा असं त्याला वाटायला लागलं. पण त्याला अजूनही ती कथा पूर्ण आठवत नव्हती. म्हणून मग त्याने आपलीच कथा परत एकदा वाचायला घेतली.

क्रमशः

Friday, May 15, 2020

हेवा (शतशब्द कथा)


मिसळपाव हे इंटरनेट वरील एक मराठी वाचकांसाठीचे उत्तम संस्थळ आहे. या संस्थळाची मी गेली काही वर्षे सभासद आहे. या संस्थळावर अनेक स्पर्धा होत असतात. त्यातीलच एक 'शतशब्द कथा स्पर्धा.' या स्पर्धेत मी याअगोदर देखील भाग घेतला आहे. मात्र यावेळच्या स्पर्धेमध्ये माझी 'हेवा' ही शतशब्द कथा द्वितीय क्रमांकावर आली; हे सांगताना मला खूप आनंद होत आहे. तीच कथा आज तुमच्यासमोर सादर करते आहे.

###############

हेवा

उर्वशीचं रात्री उशिरा येणं, उशिरा उठणं, नवऱ्याने तिची सरबराई करणं... राधा खिडकीतून बघायची आणि तिच्या सुखाचा हेवा करायची. ते सुख मिळावं म्हणून मनोमन प्रार्थना करायची.

एक दिवस राधा उर्वशीच्या कायेत शिरली. आज राधेने उशिरा उठून नवऱ्याने केलेला नाष्टा आरामात खाल्ला. दिवसभर तो काम करत होता आणि राधा आराम करत होती. संध्याकाळ झाली; नवऱ्याने राधेला तयारी करायला सांगताच ती खुशीत तयार झाली. एक गाडी येऊन राधेला घेऊन गेली.

रात्री उशिरा घरी परतताना राधेला स्वतःचीच किळस वाटत होती. शरीर उर्वशीचं असलं तरी मन तर राधेचं होतं. दार उघडताच नवऱ्याने पैशांसाठी हात पसरले आणि समोरच्या घरातून तिच्याकडे बघणाऱ्या उर्वशीकडे बघत राधेने डोळे पुसले....