Friday, February 28, 2020

#खजुराहो दर्शन!!! भाग १

#खजुराहो दर्शन!!!



#खजुराहो म्हंटल की एकतर आपण एकमेकांकडे बघून डोळा मारतो किंवा त्या विषयाला बगल देऊन दुसरंच काहीतरी बोलायला लागतो. का? कारण आजच्या सामाजिक व्यवस्थेमध्ये #कामशास्त्र या विषयावर उघडपणे चर्चा होऊच शकत नाही.... मात्र बहुतेक ज्या काळामध्ये #खजुराहोची शिल्प बनली आहेत; त्या काळामध्ये #कामशास्त्र हा विषय चोरून बोलण्यासारखा किंवा चर्चा न करण्यासारखा नसावा असा माझा कयास आहे. याव्यतिरिक्त ही मंदिरे आणि त्यातील #शिल्पकला बघितल्यानंतर असं वाटतं की त्या काळामध्ये स्त्रियांना सामाजिक स्तरावर अनन्यसाधारण महत्व होतं. त्यांचं अस्तित्व, त्यांची मतं, त्यांचे विचार आणि त्यांचे सामाजिक स्थान हे अत्यंत आदरपूर्ण स्वीकारले गेले होते. का वाटावं बरं असं? कारण या #शिल्पकला बघताना एक गोष्ट लक्षात येते की केवळ पुरुषांच्या समाधानासाठी मैथुन क्रिया केली गेलेली नाही; तर स्त्रीच्या सुखाच्या परमोच्च क्षणाचा देखील विचार केला गेला आहे. तिला देखील शारीरिक सुख हे हक्काने आणि योग्य प्रकारे मिळाले पाहिजे असा त्या काळातील दृष्टिकोन होता... असं या शिल्पांवरून प्रतीत होतं. या शिल्पांमध्ये दाखवल्या गेलेल्या स्त्री-पुरुषांच्या दोघांच्याही चेहेऱ्यावर एका अलौकिक आणि दैवी आनंदाची आभा सतत जाणवते. जरी ही शिल्पं कामकलेवर आधारित असली तरी त्यामध्ये जराही अश्लीलता नाही. तसे बघितले तर शरीरसुख हा विचार ना रहस्यपूर्ण आहे; ना त्यात कोणतीही पशुवृत्ती आहे. ते पाप किंवा पुण्याशी जोडलेले नाही; किंवा तोच एक आयुष्याच्या सुखाचा परमोच्च मार्ग आहे असा विचार कुठेही प्रतीत होत नाही. शरीरसुख अनुभवणे ही एक अत्यंत सामान्य कृती आहे. उलट याविषयी चर्चा होऊ न देणे, मुलांना प्रबोधन करताना देखील याविषयी एकप्रकारची गूढता निर्माण करणे, सर्वसामान्य सामाजिक व्यवस्थेमध्ये याविषयाची उदासीनता यामुळेच हा विषय केंद्रस्थानी असतो. अर्थात ही सर्व माझी मतं झाली... आता थोडं #खजुराहोबद्दल... त्याच्या इतिहासाबद्दल.... पुरणकाळातील दाखल्यांबद्दल आणि नंतर तेथील शिल्पकलांच्या फोटोंसाहित तेथील गाईडने सांगितलेल्या माहितीबद्दल!!!

असं म्हणतात.....

काशीच्या राजपंडितांची मुळगी हेमावती अपूर्व सौंदर्यवती होती. एका रात्री ती कमलपुष्पांनी भरलेल्या तळ्यामध्ये स्नान करत असताना तिच्या अनन्यसाधारण सौंदर्यावर चंद्रदेव मोहित झाले आणि मानव रूप धारण करून पृथ्वीवर उतरले. ती रात्र त्यांनी एकत्रित व्यतित केली. परंतु पहाटे चंद्रदेव परत निघाले असता हेमवतीने त्यांना थांबण्याचे आर्जव केले आणि ती गर्भवती झाली असल्याचे संगितले. हे ऐकताच चंद्रदेवांनी हेमवतीला आशीर्वाद दिला की ती एका वीर पुत्राला जन्म देईल. त्याला हेमवतीने खजुरपुराला न्यावे. हा मुलगा पुढे एक महान राजा बनेल आणि उद्यान आणि तलावांनी घेरलेल्या अनेक मंदिरांचे निर्माण करेल. पुढे चंद्रदेव हेमवतीला म्हणाले की राजा झाल्यावर तुझा वीर पुत्र एका विशाल यज्ञाचे आयोजन करेल; ज्यामुळे तुझी सर्व पापे नष्ट होतील. बदनामी होऊ नये म्हणून आणि आपल्या पुत्राला जन्मदेण्यासाठी हेमवतीने पित्याचे घर सोडले आणि ती एका लहान गावामध्ये जाऊन राहिली. यथावकाश तिला पुत्रप्राप्ति झाली. हेमवतीचा पुत्र चंद्रवर्मन आपल्या पित्याप्रमाणे तेजस्वी, शक्तिशाली आणि वीर होता. असे म्हणतात की तो सोळाव्या वर्षीच कोणतेही आयुध न घेता वाघाची शिकार करत असे. चंद्रवर्मनने अनेक युद्धे जिंकली. त्यानंतर हेमवतीच्या सांगण्यावरून त्याने सुंदर उद्याने आणि तलावयुक्त अशी एकूण पंच्याऐशी अद्वितीय मंदिरे निर्माण केली. त्यानंतर त्याने एक मोठा यज्ञ केला; ज्यायोगे हेमवतीचे सर्व पाप नष्ट झाले. पुढे चंद्रवर्मनच्याच नावाने निर्माण झालेल्या चंदेलवंशाच्या राजांनी खजुराहोमध्ये अनेक मंदिरे निर्माण केली.

आजही ही पौराणिक कथा या भागातील प्रत्येक व्यक्ती सांगते. कदाचित ही कथा अशीच पिढ्यानपिढ्या एकमेकांना सांगितली गेली आहे आणि म्हणूनच ती जिवंत राहिली आहे. #खजुराहोचा इतिहास देखील इतकाच रोचक आहे. ऐतिहासिक दाखल्यांप्रमाणे चंदेलवंशाच्या राजानी दहा ते बाराव्या शतकात मध्य बारावर राज्य केले आहे. त्याचप्रमाणे याच ऐतिहासिक दाखल्यांच्या आधारे हे सिद्ध झाले आहे की #खजुराहो येथील मंदिरांचे निर्माण इ. स. ९५० ते इ. स. १०५० दरम्यान चंदेल राजांकरवी झालेलं आहे. मात्र असे म्हणतात की या मंदिरांना निर्माण केल्यानंतर चंदेल राजांनी त्यांची राजधानी महोबा येथे स्थलांतरित केली. मात्र तरीही त्याकाळात देखील #खजुराहोच्या मंदिरांचे महत्व अबाधित होते.

ही एकूण पांच्याएशी मंदिरांची शृंखला असून ही मंदिरे लक्ष्मण, शिव आणि पार्वती यांना समर्पित आहेत. #कंदारिया महादेवाचे मंदिरावरील #शिल्पकला विशेष आहे. हे मंदिर #खजुराहोमधील सर्वात विशाल आणि उत्तम #शिल्पकला असलेले आहे. याची उंची एकशे सतरा फूट असून लांबी देखील तेवढीच आहे. या मंदिराची रचना सप्तर्थ शैलीमधील आहे. मंदिराच्या बाहेरील बाजूस सहाशे सेहेचाळीस शिल्प असून आतमध्ये दोनशे सव्वीस शिल्पे आहेत. सर्वसाधारणपणे एका मंदिरामध्ये इतकी शिल्पे सापडणे अवघड आहे. या दीराचे प्रवेशद्वार नऊ शाखांचे आहे. या मंदिराचे विशेष महत्व म्हणजे त्यावेळच्या राजा विद्याधर याने मोहम्मद गजनीला दुसऱ्यांदा हरवल्यानंतर इ.स. १०६५ दरम्यान बांधले.

या मंदिरांचा शोध साधारण इ.स. १८५२ ते इ.स. १८८५ या काळात इंग्रजानी लावला. तोपर्यंत याप्रदेशामध्ये घनदाट जंगल होते आणि हिंस्त्र प्राण्याचा प्रभाव खूप मोठा होता. आज या पांच्याएशी मंदिरांपैकी केवळ बावीस मंदिरे आपण बघू शकतो. बाकीच्या मंदिरांचा ह्रास काळाच्या ओघात झाला. अर्थात जी मंदिरे आजही आहेत त्यांच्यावरील #शिल्पकलेच्या सौंदर्यावरून या मंदिरांचा सुवर्णकाळ किती उज्वल असेल याची आपण कल्पना करू शकतो. सर्वसाधारणपणे या शिल्पकलेमधून कामसूत्रात वर्णन केलेल्या अष्ट मैथुनचे चित्रीकरण आहे. कदाचित प्राचीन काळातील स्त्री-पुरुष देव, धर्म, नैतिकता याचा फार विचार न करता मुक्तपणे शरीरसुखाचा अनुभव घेत असावेत असे या शिल्पकलेवरून वाटते.

मंदिराचा संध्याकाळचा देखावा


 दहाव्या शतकातील गणपती मूर्ती


राजाला रिझवणारी नर्तकी आणि दरबारी


त्या काळात समूह मैथुन प्रथा असावी असं या शिल्पणवरून वाटतं


युद्धावर असताना योध्याना शरीरसुखाची इच्छा झाली असता ते अनेकदा घोड्यांचा पर्याय निवडायचे


राजा आणि दरबारी नृत्य आणि गायनात मग्न आहेत




विविध कामशास्त्र क्रिया


कामकलेची सुरवात चुंबनाने होते हे इथे प्रतीत होते


स्त्री अत्यंत प्रेमाने प्रियकराला रिझवत आहे. दोघांच्याही चेहेर्यावरील भाव अत्यंत आनंदी आहेत




पुरुष स्त्रीला प्रेमाने आलिंगन देऊन कामक्रियेसाठी उद्युक्त करतो आहे


एक रुपगर्वीता पायाला अल्ता लावते आहे. या शिल्पातील खासियत ही की तिला अल्ता लावायला मदत करणाऱ्या स्त्रीकडे सुंदर बॅग आहे.... 


कामक्रीडेतील अजून एक शिल्प




मंदिरातील छत


लक्ष्मण मंदिराच्या समोरच वराह शिल्प आहे. 


साजशृंगार करणारी सौंदर्यवती


पार्वती मंदिराबाहेरील हत्तीचे शिल्प


या प्राण्याचे निरीक्षण केले असता धड हत्ती प्रमाणे आणि शरीर घोड्याचे दिसते. कदाचित त्या काळात युद्धावरील प्राण्यांना मुखवटे घालून त्यांचे रूप उग्र करत असतील. शत्रू सैन्याला भिती वाटावी म्हणून


एक म्हटवाची माहिती. त्याकाळातील मंदिरे locking systim ने जोडलेली होती. सर्वच मंदिरातील दगड हे तुम्हाला आशा प्रकारच्या क्लिप्स नी जोडलेले दिसतील


घोड्याला राक्षस मुखवटा दिसतो आहे


सर्वसाधारणतः सर्व मंदिरांच्या भिंतींवरील शिल्पांची सुरवात अशा प्रकारच्या राक्षस चेहेऱ्यानी झालेली आहे


हत्ती, घोडे हे प्राणी माणसाळवून त्यांच्याकडून काम करून घेतले जात आहे


संध्याकाळच्या सुमाराच मंदिर परिसर


दहाव्या शतकातील बुद्ध मूर्ती


मंदिराच्या गाभाऱ्याच्या बाजूने घेतलेला व्हिडीओ


मनापासून सांगते.... प्रत्येकाने या सुंदर मंदिरांना भेट द्यावीच. आपला सोनेरी इतिहास आणि त्याकाळातील श्रीमंत संस्कृती जाणून घेणे खूप म्हटवाचे आहे. त्याव्यतिरिक्त देखील खूप काही आहे खजुराहोमध्ये पाहण्यासारखे. ते पुढील भागात.

Friday, February 21, 2020

#नमामिगंगे... #काशीविश्वेश्वर.. #वाराणासी दर्शन!

#नमामिगंगे... #काशीविश्वेश्वर आणि #वाराणासी दर्शन!

वाराणासी म्हणजेच आपली काशी आणि येथील श्रीकाशीविश्वेश्वर मंदिर! भारताचे पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांनी #नमामिगंगे कार्यक्रमाआंतर्गत गंगा नदीला पूर्ववत निर्मळ आणि प्रदूषणरहीत करण्याचे ठरवले आणि यासाठी लगेच आर्थिक निधी उभारून हे काम २०१४मध्ये सुरू केले. अजूनही या कार्यक्रमाची पूर्तता झालेली नाही हे जरी सत्य असले तरी आजची #वाराणासी हे पूर्वीपेक्षा शतपटीने स्वच्छ शहर झालं आहे; असं सतत ऐकत होते. #नमामिगंगे कार्यक्रमाबद्दल माहिती वाचल्यापासूनच मनात होतं की परत एकदा #वाराणासी ला जाऊन आलं पाहिजे. एकदिवस सहज ठरवलं आणि तिकीट काढून निघाले. निघताना पंधरा वर्षांपूर्वीच्या #वाराणासी च्या आठवणी सोबत होत्या. #गंगाआरती, वारणासीचा बाजार, रस्ते.... अस्वच्छता, गर्दी, धक्काबुक्की आणि मुलांना सांभाळत #गंगाआरती नंतर मनाचा हिय्या करून गंगेच्या त्या काळ्या पाण्यात तीन वेळा मारलेल्या डुबक्या... हे सगळं आठवत होतं. #वाराणासीच्या विमानतळावरून बाहेर पडले आणि स्वच्छ आणि चौपदरी रस्ते बघून मनाला दिलासा मिळाला. हॉटेलच्या दिशेने निघाले आणि आजूबाजूचा परिसर बघता बघता #वाराणासीच्या भूतकाळात हरवून गेले.

पौराणिक कथेमध्ये असा उल्लेख आहे की ब्रम्ह देवाने काशी येथे गंगे किनारी दहा अश्वमेध केले होते. त्यामुळे याठिकाणी गंगा स्नान केल्यास या दहा अश्वमेधांचे पुण्य मिळते. कदाचित म्हणूनच येथील अश्वमेध घाट हा खूपच महत्वाचा मानला जातो. पुढे श्री शंकर ब्रम्हाला भेटायला काशी येथे आले आणि त्यांना हा निसर्ग सुंदर परिसर आणि येथील पवित्रता खूप भावली. त्यांनी श्री ब्रम्हाकडून काशी मागून घेतली. तेव्हापासून श्रीकाशी क्षेत्र हे श्रीशंकराचे निवास्थान झाले.

तसं बघितलं तर #वाराणसी म्हणजे भारताचं किंबहुना जगभरातलं सर्वात प्राचीन शहर! इजिप्त, बगदाद, तेहरान, मक्का, रोम, एथेन्स, जेरुसलेम, बाईब्लोस, जेरिको, मोहन-जो-दारो, हडप्पा अशी अनेक शहरं जगातील प्राचीन शहरं म्हणून ओळखली जातात. मात्र पौराणिक आणि ऐतिहासिक सत्यता पडताळली तर जगातील सर्वात प्राचीन शहर हे #वाराणासी आहे. याचा उल्लेख इतिहासात देखील अगदी इसवीसनाच्या पुर्विपासूनचा आहे. जवळ जवळ तीन ते पाच हजार वर्षांपूर्वी पासून या शहरात लोकांचा निवास होता याचे दाखले आहेत. आपल्या धर्मग्रंथांमधील उल्लेखाचा अभ्यास केला तर हे शहर पुराण काळात देखील अत्यंत श्रीमंत शहर म्हणून ओळखलं जात होतं हे लक्षात येईल. महाभारत आणि उपनिषदांमध्ये देखील काशीचा उल्लेख झालेला आढळतो. भगवान बुद्ध, शंकराचार्य, वल्लभाचार्य, संत कबीर, गुरू नानक, तुलसीदास, चैतन्य महाप्रभू कालीदास असे अनेक महान संत या नगरमध्ये आले किंवा राहिले होते. संत तुलसीदासांनी रामचारीतमानस वाराणासी येथेच लिहून पूर्ण केले होते. गौतम बुध्दानी देखील बौध्द गया येथुन ज्ञान प्राप्त झाल्यानंतर वाराणासी येथे येऊन त्यांचे पहिले प्रवचन सारनाथ येथे दिले होते. हे शहर पुरातन काळापासून ज्ञान, शिक्षण आणि संस्कृतीचे केंद्र राहिले आहे. महाभारत काळामध्ये काशीचा उल्लेख तीर्थक्षेत्र म्हणून आढळतो. मात्र त्याअगोदर आणि त्यानंतर देखील अनेक पिढ्यामध्ये तीर्थक्षेत्र हा विचार नव्हता असं लक्षात येतं. माहाभारत काळातील ब्राह्मवर्त हा उल्लेख आपण अनेकदा ऐकला किंवा वाचला आहे... हे ब्राह्मवर्त म्हणजेच आजची #वाराणासी... आपली काशी!



#काशी हे 'मंदिरांचे शहर', 'भारताची धार्मिक राजधानी', 'भगवान शिवाने वसवलेली नगरी', 'दिव्यांचे शहर', 'ज्ञान नगरी' अशा विविध टोपण नावांनी ओळखले जाते. #काशीचा पहिला उल्लेख अथर्ववेदामध्ये आढळतो. एका श्लोकामध्ये एका रोग्याला उल्लेखून म्हंटले आहे की त्याचा ज्वर दूर होवो आणि त्याचा प्रसार काशी, कोशल आणि मगध राजांमध्ये न होवो. इथे हे स्पष्ट होते की ही तीनही शहरे त्याकाळात देखील होती. एका पौराणिक कथेतील उल्लेखाप्रमाणे सत्रजीत राजाच्या पुत्राने शतानिकने काशिवासीयांच्या पवित्र यज्ञाच्या अश्वाला पकडून आपला अश्वमेध यज्ञ पूर्ण केला होता; आणि आपला पवित्र अश्व पकडला गेला या रागापाई काशिवासीयांनी अग्निकर्म आणि अग्निहोत्र करणेच सोडून दिले होते.

या पौराणिक उल्लेखांव्यतिरिक्त काशीचे ऐतिहासिक महत्व तर आपल्याला सर्वांनाच माहीत आहे. एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या अस्थी काशीला जाऊन गंगेत सोडल्या आणि त्यांच्या नावाने तेथे पिंड दान केले तर त्या मृत जीवाला स्वर्ग प्राप्ती होते अशी हिंदू धर्मामध्ये मान्यता आहे. त्याशिवाय वृद्धावस्थेमध्ये संन्यस्त जीवन जगण्यासाठी काशीला जाऊन राहावं असा एक विचार देखील आहेच. काशी शहराचं पुराण आणि ऐतिहासिक काळातील शैक्षणिक महत्व तर जगद्सिद्धच आहे. अशा या #काशी #वाराणासी मधील #काशीविश्वेश्वराच्या दर्शनासाठी आणि त्याहूनही जास्त स्वच्छ गंगेच्या दर्शनासाठी मी निघाले होते.

दुपारी हॉटेलवर पोहोचून सामान टाकले. मला माझी उत्सुकता स्वस्थ बसू देत नव्हती. त्यामुळे लगेच गंगा घाटाच्या दिशेने निघाले. खरं सांगू का... माझ्या मनातल्या पंधरा वर्षांपूर्वीच्या सगळ्या आठवणी आजच्या #वाराणासी ने साफ पुसून टाकल्या. संपूर्ण शहरात कमालीची स्वच्छता आहे. एका ठराविक अंतरापर्यंत चार चाकी वाहाने जाऊ शकतात, मग रिक्षा, मग बॅटरीवर चालणाऱ्या रिक्षा किंवा सायकल रिक्षांनाच परवानगी आहे. त्याचे महत्वाचे कारण म्हणजे इथले रस्ते फारच लहान आहेत. त्याच रस्त्यांवर कडेने अनेक भाजीवाले किंवा असंच काहीबाही विकणारे बसलेले असतात. त्यातच लोक चालत असतात. रस्त्यांच्या दोन्ही बाजूनी असलेल्या दुकानातील गर्दी तर आपल्याला गोंधळून टाकते. मात्र आपण मजल-दरमजल करत गंगेच्या घाटाच्या दिशेने चालत राहावं. कोणतीही गल्ली शेवटी घाटाच्या दिशेनेच जात असल्याने ही गल्ली की ती गल्ली असा प्रश्नच उदभवत नाही. तरीही शंका आली तर शेजारून जाणाऱ्या कोणालाही तुम्ही फक्त 'गंगा घाट..' इतकंच म्हणा की तुम्हाला काही पावलं सोबत करून अगदी घाटाच्या जवळ नेऊन सोडलंच समजा.

संध्याकाळी पाचच्या सुमाराच्या घाटाचं दर्शन म्हणजे एक नेत्र सोहळाच आहे. रोज संध्याकाळी अगदी तिनशेपाशष्ट दिवस इथे #गंगाआरती होते. त्याची तयारी पाच वाजल्यापासूनच सुरू झालेली असते. एकूण सात पुरोहित षोडशोपचाराने गंगेची आरती करतात. संपूर्ण आसमंत एका वेगळ्याच पवित्र वातारणाने भारलेला असतो. आरतीच्या अगोदरची तयारी.... त्यानंतर धूप, दीपादीने सुरवात होऊन उच्च स्वरात महादेवाच्या जयजयकाराने आणि घंटानादाने होणारा शेवट म्हणजे नास्तिकाला देखील नकळत हात जोडायला लावणारा अनुभव आहे. गंगा आरती बघण्यासाठी वृद्धांसाठी खुर्चा तर इतर भाविकांसाठी चटया अंथरून बसण्याची सोय केलेली आहे. तसेच बोटींमधून देखील हा गंगा आरती बघण्याचा अनुभव घेऊ शकतो. प्रत्येक भाविकांच्या मनातला सात्विक आणि गंगेला समर्पित होण्याचा भाव जाणवत असतो. # गंगाआरती संपल्यानंतर हळूहळू घाट रिकामा व्हायला लागतो. त्यात देखील घाई नव्हती. त्यामुळे घाटावरून चालत गंगेचं मनोहर रूप मनात साठवत होते.

थोड्यावेळाने घाट अगदीच रिकामा झाला. मग श्रीकाशीविश्वेश्वराचं दर्शन घ्यावं म्हणून निघाले. जसे सगळे रस्ते शेवटी गंगेच्या घाटाकडे वळतात; तसेच घाटाजवळील सगळ्या गल्ल्या शेवटी श्रीकाशीविश्वेश्वराच्या मंदिराच्या दिशेने जातात. त्यामुळे कोणत्याही गल्लीमध्ये शिरून थोडं विचारत पुढे गेलं की मंदिर येतं. अर्थात मंदिर प्रवेश आणि विश्वेश्ववराचं दर्शन तसं सोपं नक्कीच नाही. मंदिरामध्ये कोणतीही चामड्याची किंवा धातूची वस्तू नेण्यास परवानगी नाही. त्यामुळे बाहेर अनेक लॉकर्स उपलब्ध असतात तिथे आपल्या सगळ्याच वस्तू ठेवाव्या लागतात.... आणि इथून सुरू होतो आपल्या भावनांचा बाजार! लॉकर फुकट असतो मात्र देवाला नेण्याचा प्रसाद त्याच दुकानातून घ्यायचा असतो. त्याची किंमत तुमच्या वेशभूषेवरून ठरते. दर्शनाची रांग लांबच लांब असते. आपण शांतपणे रांगेत उभे राहातो... वेळ जात असतो आणि रांग फारशी पुढे सरकत नसल्याचे लक्षात आल्याने आपण अस्वस्थ व्हायला लागतो. तेव्हाच एक माणूस येतो. आपला वेगळा शहरिपणा ओळखून विचारतो की लवकर दर्शन करून हवं आहे का? मला काही नको... मात्र आत पुरोहितांना दक्षिणा द्यावी लागेल; ती तुम्हीच तुमच्या हातांनी द्या. रांगेत उभं राहून आपण कंटाळले असतो; त्यामुळे ते आपण लगेच मान्य करतो. प्रत्येक तपासणी द्वारातून तो आपल्याला अगदी सहज पुढे घेऊन जातो. जाताना उजवीकडे अन्नपूर्णा देवीचे मंदिर लागते. 'येताना देवीचे दर्शन नक्की घ्या;' असे सांगून तो आपल्याला पुढे जायला भाग पडतो. मुख्य विश्वेश्ववराचे दर्शन म्हणजे खरोखरच दिव्य आहे. खूपशा धक्काबुक्की नंतर तुम्ही अगदी गाभाऱ्यापर्यंत पोहोचता. पण तरीही आत जाणं अशक्य असतं. तेव्हाच कुठूनतरी तिथे 'मुख्य पुरोहित' येतो आणि तो तुम्हाला त्या गर्दीमधून आत घेऊन जातो. त्याच परिस्थितीत हातातील लोट्यामधून आणलेलं आणि धक्काबुक्कीमध्ये लोट्यामध्ये अगदी थोडंसं उरलेलं गंगाजल आपण श्रीविश्वेश्ववराच्या पिंडीवर ओतायचं. पिंडीला हात लावून नमस्कार करेपर्यंत जेमतेम तीन-चार सेकंद मिळतात आणि आपल्याला लक्षात यायच्या अगोदरच आपण बाहेर फेकले गेलेले असतो. मग आपल्या योग्यतेप्रमाणे पुरोहित सांगतो की त्याने किती अवघड असलेलं दर्शन आपल्याला सुलभ करून दिलं. ते मान्य करत आपण त्यांना दक्षिणा द्यायची आणि मागे फिरायचं. अन्नपूर्णेच दर्शन घेऊन लॉकर मधल आपलं सामान घेऊन बाहेर पडायचं.

हे सगळं मी साग्रसंगीत केलं आणि लहान गल्ल्या-बोळ पार करत बाहेर आले... आणि मग माझ्या मानत आलं की अरे या सगळ्या नादात एकदाही आपण या अतिप्राचीन देवळाच्या रचनेकडे डोळे भरून पाहिलंही नाही. मनातून थोडं वाईट वाटलं. कारण मला पुरातन वास्तुकला बघायला खूप आवडतं. मात्र दर्शन उत्तम झालं होतं. त्या समाधानात बाहेर पडून भैरव मंदिराकडे निघाले. श्रीकाशीविश्वेश्वर आणि अन्नपूर्णा देवीच्या दर्शनानंतर भैरव दर्शन करावं अशी तिथली प्रथा आहे; असं अनेकांनी मला सांगितलं होतं... केवळ म्हणून! भैरव दर्शन मात्र अगदी सहज झालं आणि #वाराणासी ला आल्याचं एक वेगळंच समाधान मनाला मिळालं. आल्या दिवशी #गंगादर्शन, गंगा आरती, श्रीविश्वेश्वर, अन्नपूर्णा आणि भैरव दर्शन असा संपूर्ण वैदिक सोहळा पार पडला होता. मात्र तिथून बाहेर पडेपर्यंत बराच उशीर झाला होता. रात्रीचे अकरा वाजून गेले होते. पण तरीही गंमत म्हणजे संपूर्ण शहर जागं होतं. दुकानं ओसंडून वाहात होती. रस्त्यावरील गोलगप्पे, आलूटिक्की, समोसा चाट, लस्सी आणि तत्सम सगळे स्टॉल्स गर्दीने व्यापलेले होते. त्याच चाट भांडारावर मस्त ताव मारला आणि परत एकदा सायकल रिक्षा मग पेट्रोलची रिक्षा आणि मग टॅक्सी असा उलटा प्रवास करत हॉटेलमध्ये पोहोचले.

दुसरा दिवस माझा मला मोकळा होता. त्यामुळे आज जितकं शक्य आहे तितकं वास्तुशिल्प आणि जुनं शहर बघायचं ठरवलं होतं. गौतम बुद्धांचा प्राचीन असा एक स्तूप सारनाथ येथे आहे. तो स्तूप बघण्यास गेले. या स्तुपाची रचना काहीशी इजिप्त मधल्या पिरॅमिड सारखी वाटते. विटांनी बनलेली ही विशाल रचना चंद्रगुप्त काळातील म्हणजे जवळ जवळ चौथ्या किंवा पाचव्या शतकातील आहे. बोध प्राप्तीनंतर भगवान बुद्धांची भेट पंचवर्गीय भिक्षूंशी इथेच झाली असे म्हंटले जाते. या स्तुपाचा उल्लेख सातव्या शतकातील विख्यात चिनी यात्री हवेन सांग याने त्याच्या यात्रेच्या लेखन अनुभवामध्ये केला आहे. पुरातत्व विभागाने येथे केलेल्या उत्खननामध्ये ज्या मूर्ती मिळाल्या त्यात धर्मचक्रप्रवर्तन मुद्रेमधील बुद्ध प्रतिमा आणि तलवारधारी मानव मूर्ती अशा चंद्रगुप्त काळातील मूर्ती मिळाल्या आहेत; असा तेथील लेखावर उल्लेख आहे. तसं बघितलं तर विटांचं बांधकाम असलेला हा स्तूप फार शोभनिय नाही; मात्र याला असणारा इतिहास नक्कीच संस्मरणीय आहे. सारनाथ हा स्तूप तसा गावाबाहेर आहे. त्यामुळे हा स्तूप आणि त्यानंतर त्यापुढे नवीन बांधले बौद्ध मंदिर आणि तेथील २०११ मध्ये प्रस्थापित केलेली ऐशी फूट उंच बुद्ध मूर्ती बघून मी परत #वाराणासी गावात निघाले. गावामध्ये श्रीलक्ष्मी तलाव हे स्थळ देखील पाहण्यासारखे आहे; हे समजल्यामुळे ते बघण्यास गेले. तेथे एका लहान तलावामध्ये एक लहानसे लक्ष्मी मंदिर आहे. त्यानंतर मात्र माझ्या लक्षात आले की आपापल्या श्रद्धेप्रमाणे प्रत्येकजण मला त्याच्या इष्ट देवतेचे दर्शन घेण्यास सांगणार. त्यामुळे मग मात्र मी कोणालाही काहीही न विचारता गंगेच्या घाटाच्या दिशेने निघाले. #गंगाआरतीचा अनुभव आदल्याच दिवशी घेतल्यामुळे मी आज त्यापासून थोडं लांब इतर घाटांवरून फिरण्याचे ठरवले. जसजशी काहीशा दूरच्या घाटाच्या दिशेने चालू लागले तसतसं लक्षात आलं की आपला हा निर्णयच बरोबर आहे. कारण आपण जसजसे मुख्य घाटापासून दूर जातो तसतसा गंगेच्या सुंदर घाटांचा अनुभव आपल्याला येतो. सुदंर बांधून काढलेले घाट, त्यांची अलीकडच्या काळात सांभाळलेली स्वच्छता आणि मुख्य घाटापासून दूर असल्याने कोणत्याही प्रकारचा बाजारूपणा नसलेले वातावरण मनाला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवतात. गंगेच्या वाहात्या पाण्याचा खळखळाट आणि गावातल्या रहिवाशांचे रोजचे घाटावर येऊन बसणे.... खरोखरच इतक्या लांब आल्यानंतर विश्वेश्ववराच्या दर्शनापेक्षा देखील जास्त समाधान या निसर्गरम्य आणि खेडूत अशा वातावरणात जाणवते.

श्रीकाशीविश्वेश्वर दर्शन आणि वाराणासी दर्शन हा मन भारून टाकणारा अनुभव नक्कीच माझ्या हृदयाच्या कुपीत मी कायम जतन करून ठेवणार आहे. तुम्हाला देखील मनःपूर्वक आग्रह आहे की केवळ वय झाल्यानंतरच #काशी ला... #वाराणासी ला जावं असं नाही... तर #नमामिगंगे योजनेआंतर्गत झालेल्या #बनारस चा कायापालट बघण्यासाठी आणि निसर्गरम्य गंगा घाट अनुभवण्यासाठी नक्की तेथे एकदा जावं.
रात्री उशिरा गजबजलेला बाजार
ओसंडून वाहणारा रस्ता

#गंगाआरती

गंगा आरती दरम्यान धुपारती

आरतीला सुरवात होण्या अगोदर होणारी तयारी आणि जमणारे भाविक
#गंगाआरती नंतर गंगेच्या पवित्र पाण्यात दीप सोडले जातात. भाविकांचा असा विश्वास आहे की हे दीप आपल्या सोडून गेलेल्या जवळच्या व्यक्तीच्या नावाने सोडल्यास त्यांच्या आत्म्याला शांती लाभते.


बनारसी पान भांडार



छोले कचोरी, समोसा छोला, पुरी-भाजी, जलेबी, रबडी, लस्सी, रसमलाई... जो बोलो मिलजाता हें यहा।



रात्री उशिरा गजबजलेला बाजार




ओसंडून वाहणारा रस्ता


#गंगाआरती


धुपारती


गंगा आरतीची तयारी आणि भाविक जमत असताना


2011 मध्ये बांधलेल्या बुद्ध मंदिरातील बुद्ध मूर्ती


2011 मध्ये बांधलेली ऐंशी फूट उंच बुद्ध मूर्ती


2011 मध्ये बांधलेले बुद्ध मंदिर


सारनाथ येथील स्तूप


#गंगाआरती झाल्यानंतर पवित्र गंगेच्या पाण्यात सोडलेले दिवे


सायकल रिक्षा

Friday, February 14, 2020

दुरून डोंगर साजरे 

दुरून डोंगर साजरे


अनंत आणि त्याची पत्नी अनन्या लग्नाचा पंधरावा वर्धापन दिन साजरा करायला न्यूझीलंडला गेले होते. एक चर्च बघायला गेले असताना साधारण त्यांच्याच वयाचं एक जोडपं त्यांना तिथे भेटलं. सहज गप्पा सुरू झाल्या; त्यात त्या परदेशी जोडप्याने सांगितलं की हे दोघांचंही दुसरं लग्न आहे आणि अफेअर्स त्यांनी फार लक्षात ठेवली नाहीत. अनंतने कौतुकाने सांगितलं की त्यांच्या लग्नाला पंधरा वर्ष झाली आहेत आणि लग्ना अगोदर चार वर्ष त्याची पत्नीच त्याची प्रेयसी होती. हे ऐकून ते परदेशी जोडपं काहीसं गोंधळल.

"Are you serious? You mean you both are styaing together for last ninteen years?"

"No! We know each other for last ninteen years. But we started staying together after we got married."

"How many kids you have? Do they stay with you?"

"We have two kids and of course they both stay with us. Infact we stay with my parents and our kids in one home."

"Good loard! That's a remarkable lifestyle!"

"I don't think so. That's a very normal and happily accepted lifestyle in India." अनंत अभिमानाने म्हणाला.

काहीवेळ गप्पा मारून दोन्ही जोडपी आपापल्या मार्गाने गेली. ते दोघे परत आल्यानंतर एकदा अनन्यायची मैत्रीण अजिता त्यांच्याकडे गेली असताना अनन्याने तिला ही घटना सांगितली. अजिता म्हणाली; "खरंच आहे न ग! आपल्याकडे कुटुंब म्हंटल की अजूनही आजी-आजोबा, आई-वडील आणि नातवंड हेच डोळ्यासमोर येतं. पूर्वी आई-वडील, दोन भावंड आणि त्यांचं कुटुंब असं असायचं; आता मात्र दोन भाऊ वेगळे राहातात."

अनन्या म्हणाली; "हे सगळं मला माहीत नाही का? माझी हरकत वेगळीच आहे. हा म्हणाला 'happily accepted lifestyle'.... कशावरून ग मी ही कुटुंब व्यवस्था happily स्वीकारली आहे?"

अजिता थोडीशी गोंधळली. कारण अनन्याची सासू तशी बरीच active होती. दोघींचं भांडण झालेलं कधी ऐकलं नव्हतं. थोडे मान-अपमान असायचे... पण अनन्यानेच अनेकदा म्हंटल होत की एकत्र असलं की भांड्याला भांड लागणारच. ते ना मी धरून बसत ना त्या. मग तिने हे असं अचानक का म्हणावं ते अजिताला कळलंच नाही. अजिता तिच्याकडे प्रश्नर्थक नजरेने बघितलं. अनन्या म्हणाली,"अग, आमच्यात काहीच प्रश्न नाहीत आता. उलट बरीचशी सवय झाली आहे. त्या कुठे आणि कधी कसं बोलतील हे मला माहीत असतं; आणि माझे शालजोडीतले त्यांना देखील कळतात. सवय झाली आहे आम्हाला एकमेकींची. पण खरं सांगू? नवीन लग्न झालं तेव्हा अनेकदा काही गोष्टी अजिबात पटायच्या नाहीत. पण तसं बघितलं तर त्या गोष्टी इतक्या शुल्लक असायच्या की ते विषय धरून ठेवले असते तर इतर अनेक गोष्टींमध्ये अडचण आली असती म्हणुन गप्प बसायचे."

तिचं बोलणं अजूनही अजिताच्या लक्षात येत नव्हतं. ती म्हणाली; "ऐ काय ते स्पष्ट सांग. हे तुझं कोड्यात बोलणं मला कळत नाही."

त्यावर अनन्या म्हणाली, "अग, मी लग्न करायच्या अगोदरच सांगितलं होतं की मी नोकरी कायम करणार आहे. सासूबाई फारच उत्साही होत्या. त्यामुळे त्यांची कधीच हरकत नव्हती माझ्या नोकरीला. रोज नवऱ्याच्या बरोबरीने त्या माझा डबासुद्धा भरायच्या. पण मग दर रविवारी किंवा कोणत्याही सुट्टीच्या दिवशी स्वयंपाकघराची सगळी जवाबदारी माझी असायची. त्यातच एप्रिल-मे मध्ये तिखट-हळद भरणे, गोडा-गरम मसाला करून ठेवणे ही कामं सुट्टीच्या दिवशी असायची. मला खूपदा वाटायचं ग की हे सगळे पदार्थ विकत आणावेत..... सुट्टीच्या दिवशी आरामात उठावं.... नवऱ्याबरोबर बाहेर जावं..... कधीतरी जीन्स आणि टॉप किंवा शॉर्ट वन पीस घालावा..... पण हे कधीच करता आलं नाही. तुझं बरं होतं. तू कायमच वेगळी राहिलास आणि हवं तसं जगलीस."

"अग, पण तुम्ही तर तुमच्या ऑफिस मधल्या पिकनिक्सना नेहेमी जायचात की. जोडप्याने जायचात. तू माझ्याकडे येऊन जीन्स आणि टॉप घालून जयचीस. आठवत न? तुझी मुलं देखील तुझी सासू सांभाळायची त्यावेळी. विसरलीस की काय?" अजिता म्हणाली.

"हो. अगदी शंभर टक्के मान्य! म्हणून तर म्हंटल की विषय शुल्लकच होते; त्यामुळे त्यावरून वाद-भांडण करावंसं वाटलंच नाही. अग, पण एखाद्या सुट्टीच्या दिवशी मला फक्त आम्ही दोघांनी बाहेर भटकायला जावं असं फार वाटायचं ग. मात्र फक्त आम्ही दोघेच गेलो तर आईला काय वाटेल? ती कायम घरात असते आणि आपण कामाच्या निमित्ताने बाहेर.... असं म्हणून सुरवातीला याने ते टाळलं.... मग मुलं झाल्यावर मुलांबरोबर अगदी नेमाने जायचो. पण ते दोघांनी हातात हात घालून भटकणं मी नाही कधी अनुभवलं. एक अजून सांगू? मी कधीच आळसावलेली सकाळ माझ्याच घरात नाही अनुभवली." अनन्या म्हणाली.

"अग, पण मग आता कर न हवा तितका आळशीपणा. आता तर तुम्ही चोवीस तासासाठी कामाला बाई ठेवली आहे. त्याव्यतिरिक्त स्वयंपाकाला बाई........." अजिता म्हणाली. तिला थांबवत अनन्या म्हणाली,"अग, आता सगळंच मी बघते. त्यामुळे साठवणीचे पदार्थ विकत, चोवीस तास बाई असली सुखं आहेत. मुलं आता आपलं आपण सगळं करतात. गेल्याच वर्षी मला चांगली पोस्ट मिळाली आणि पगार देखील वाढला आहे. अनंत देखील चांगलं कमावतो आहे. तसं म्हंटल तर आता सगळी सुखं हात जोडून समोर उभी आहेत. पण त्या वयातली ती काहीशी वेडी स्वप्न हरवली आहेत ग.... आणि आता कितीही पैसे दिले न तरी ना ते वय परत येणार आहे; ना त्यातलं थ्रिल." काहीशी उसासत अनन्या म्हणाली. अजिताला तिचं म्हणणं पटत होतं देखील आणि नाही देखील.

गम्मत अशी होती की अजिताला अनन्याच्या आयुष्याबद्दल कायम हेवा वाटत आला होता. अजिता लग्नाच्या पहिल्या दिवसापासून वेगळी राहिली होती. लग्न करतानाची तिची तीच तर अट होती. ती मोकळ्या वातावरणात वाढलेली मुलगी होती. त्यामुळे तिला एकत्रित कुटुंब नको होतं. वेगळं घर असल्यामुळे अजिताला मनाला येईल तस वागता यायचं. कधीही उठावं... मित्र-मैत्रिणींना कधीही बोलावता यायचं. उशिराची जागरणं आणि हवा तसा आळशीपणा. पण वेगळ्या घराबरोबर सगळ्याच जवाबदऱ्या देखील आल्या होत्या. सगळी बिले वेळेत भरली गेली की नाही ते बघणं. घर कामाची बाई आली नाही की एकटीने सगळं काम उरकणं. हे तर करावं लागायचं; पण स्वप्नालीच्या जन्मानंतर तर अनेकदा खूपच तारांबळ उडून जायची. तिचा नवरा केशव खूप मदत करायचा. तरीही अजिताची ओढाताण व्हायचीच. मुख्य म्हणजे स्वप्नाली जर आजारी असली आणि महत्वाच्या कामांमुळे दोघांनाही सुट्टी घेणं शक्य नसलं की आजारी स्वप्नाली तशीच डे-केअरमध्ये सोडली जायची. त्याची टोचणी अजूनही अजिताची मनाला होती. खर तर या अडचणींमुळेच केशव आणि अजिताने एकच बाळ पुरे असा निर्णय घेतला होता.

त्यामुळे अजिताला नेहेमीच वाटत आलं होतं की अनन्या तिच्यापेक्षा कितीतरी सुखी आहे. तिची मुलं सांभाळायला सासू आहे. अनन्या कधीही कुठेही फिरायला जाऊ शकते. काहीच बंधनं नाहीत तिला.

आज मात्र अनन्याच्या घरून बाहेर पडताना अजिताला मनात हसायला येत होत. अजिताला अनन्याच्या आयुष्याचा हेवा वाटत आला होता आणि अनन्याला मात्र कायम अजिताच आयुष्य हवस वाटलं होतं. दोघींनाही एकमेकींचे डोंगर दुरून साजरे वाटले होते.

Friday, February 7, 2020

स्वयंपाकातील आयुधं

स्वयंपाकातील आयुधं

खल आणि बत्ता करतात ठणाणा
आम्हाला काहीतरी काम सांगाना
स्टोव्ह शेगडीला लागली घरघर
ग्यास सिलेंडर आला घरोघर
काड्याची पेटी हिरमसून बसली
लायटरने माझी जागा पटकावली
यांत्रिक युगाला झाली सुरवात
जुन्या बुढयाना करुया बाद
वीज नी यंत्रे रुसतात जेव्हा
जुने ते सोने म्हणतात तेव्हा

लहानपणीच हे बडबड गीत म्हणताना मजा यायची. तरीही त्यावेळच्या त्या स्वयंपाक घरातल्या आयुधांचे अनन्यसाधारण महत्व मान्य होतेच. मला अजूनही आठवत खास पाहुणे आले की माझी आई खास कॉफी करायची. त्यासाठी खल-बत्यातून मस्त वेलची कुटायची आणि  खिसणीवर जायफळ खिसून ते त्या कॉफीच्या पाण्यात टाकायची. आमच्या लहानपणी सर्रास चहा-कॉफी मिळत नसे. पण ती खास कॉफी मात्र तिच्या मागे लागून हट्टाने मी मागून घेत असे. ती देखील हसत म्हणायची अग खल-बत्त्याची चव मिक्सरला नाही बाळा. तिच कथा पाट्या-वरवंट्याची. आई जेव्हा त्यावर चटणी वाटायला बसायची तेव्हा घराच्या कुठल्याही कोपऱ्यात असले तरी मला ते कळायचं. कारण वरवंटया सोबत तिच्या खळखळ वाजणाऱ्या बांगड्या आजच्या चटणीचा बेत कानात येऊन सांगायच्या आणि मग हळूहळू कोथिंबीर-मिर्चीचा तो खास संमिश्र वास संपूर्ण घरात भरून जायचा.

शेगडीवर शिजवलेल्या पितळी डब्याच्या कुकरमधल्या वरण-भाताची चव तर अजूनही जिभेवर रेंगाळते आहे. निवत आलेल्या निखाऱ्यात सारलेले एखाद-दोन कांदे-बटाटे आणि त्यांचा तो खरपूस वास. अहाहा! शेगडी वरच भाजलेलं वांग आणि मग खमंग फोडणी घातलेलं ते भरीत. व्वा!

घरात एक बसायचा ओटा होता. अगदी जुन्या styleचा. त्याच्या बाजूच्या मोरीला लागून (अलीकडे या मोरीला सिंक म्हणतात) रगडा होता. इडलीच पीठ त्यात वाटल जायचं. पुरणपोळीच्या पुरणाच पण हाताने चालवायच पुरण मशीन देखील होतं. त्या पुरणाची चव आणि मऊसूत इडलीच पीठ अजून आठवत. एक पाय मुडपून विळीच्या त्या छोट्याश्या पाटावर आई कशी बसायची याचा देखील नेहेमी मला प्रश्न पडायचा. पालेभाजी चिरतानाचा तो विशिष्ट आवाज आणि चिरलेल्या ताज्या भाजीचा वास अजूनही मनात रेंगाळतोय. गाजराच्या हलव्यासाठी खिसणीवर गाजरं खिसताना खिसून घेतलेली बोटं अजून आठवतात.

त्यावेळी आईचा स्वयंपाक म्हणजे कितीतरी तयारी असायची. बिचारी सारखी स्वयंपाक घरात अडकलेली असायची. ही सगळी जुनी यंत्र वापरायची मग ती धुवून निथळायला ठेवायची आणि मग आवरून ठेवायची. ही सगळी आयुधं हाताळायला तशी वजनदार  होती. त्यामुळे अनेकदा यासगळ्यासाठी मी आईला मदत करायचे. त्या मदतीच्या निमित्ताने मी स्वयंपाक घरात कायम रेंगाळायचे. त्यामुळे अगदी लहान असताना पासूनच माझी आणि आईची दोस्ति झाली. "तुला स्वयंपाक करायला शिकवते." असं मला कधी आई म्हणाली नाही. पण मी सगळच शिकले.... तिच्याशी गप्पा मारत आणि तिला करताना बघून.

आज मात्र माझ्या स्वयंपाक घरात शक्य ती सगळी मशीन्स आहेत. फूड प्रोसेसरमुळे तर अर्धी कामं अवघ्या काही मिनिटातच संपतात. त्यात स्वयंपाक घरात मदतीसाठी एक बाई आहेच. त्यामुळेच कदाचित माझ्या लेकींना स्वयंपाक घराकडे वळण्याची सवयच नाही. पास्ता, पिझा हौसेने करण्याऱ्या माझ्या लेकी "जरा पोळ्या कर"; म्हंटल तर "नाही येत ग." अस म्हणून पळतात; आणि मग मात्र माझ्या मनात आईशी स्वयंपाक घरात मारलेल्या गप्पा आणि मुद्दाम न शिकता-शिकवता यायला लागलेले सगळे पदार्थ रुंजी घालतात.

Friday, January 31, 2020

राज की समाज.......... कारण!(?)



राज की समाज.......... कारण!(?)


अण्णा साहेब सकाळी 10 वाजल्या पासून त्यांच्या केबिनमधे येरझा-या घालत होते. ते कोणावर तरी प्रचंड चिडले होते. पण कोणावर ते कळायला मार्ग नव्हता. आणि त्या तापल्येल्या राक्षसाच्या समोर जाण्याची कोणाचीच हिम्मत नव्हती. सगळेच उदयची वाट बघत होते. उदय म्हणजे आण्णांचा मुलगा. त्याचा उदयच मुळी दुपारी व्हायचा. सवईप्रमाणे साधारण एकच्या सुमारास उदयने कार्यालयात पाऊल ठेवले.

"आण्णासाहेब सकाळपासून भडकले आहेत." एकाने तत्परतेने उदयला माहिती दिली. त्याच्याकडे दुर्लक्ष करत उदय आण्णांच्या केबिनमधे शिरला.

"कुठे उलथलेला असतोस रे तू?" भडकलेल्या आण्णांनी खाऊ का गिळू या नजरेने उदयकडे बघत प्रश्न विचारला.

"आण्णा तुम्हाला माहित आहे. का विचारता आणि उगाच मला तोंड उघडायला लावता. काय झालय् इतकं तापायला?" उदयने तेवढ्याच थंडपणे उत्तर दिले.

"अबे... तुझ्या मायला. मला अक्कल नको शिकवूस भोसडीच्या. म्हणे का विचारता... साल्या आजकाल तुला ती चवचाल भवानी भेटली आहे तेव्हापासून तुझ लक्षच नसत." उदयच्या थंडपणामुळे अजून भडकून आण्णा ओरडत म्हणाले.

"ओ.... माझी चवचाल भवानी माझ्या ताब्यात असती. तुम्ही तुमच बेण सांभाळा ना. बोलता का आता काय झालय् ते? की मी निघु?" उदय उद्धटपणे बोलला.

"फार तोंड़ सुटत आहे भडव्या तुझ आज काल." त्याच्या बोलण्याने भडकलेले आण्णा आता काय करतात अस बाहेरच्यांना वाटलं. पण क्षणात शांत होत ते म्हणाले,"बर ते जाऊ दे. गावात कोण आलिय रे ती नवी बया? ऑ? सालीने पंचायतीच्या हॉलच्या शेजारचीच रूम घेतली आहे. संस्थेचा बोर्ड पण लावला आहे स्वतःच्या. म्हणे गावच्या सर्व स्त्रियांना एकत्र करणार. काम देणार. कमवायला शिकवणार. चायला... आता बायका घराबाहेर पडून कमवणार तर पुरुष काय घर सांभाळणार आणि पोरं पैदा करणार का? माहिती घे रे तिची. दोन दिवसात दुखवटा व्यक्त करावा लागेल तिचा तेव्हा उपयोगाला येईल."

"मला वाटलच होत तुमच्या रागाच कारण हेच असेल. म्हणून मी आत्ताच सगळी माहिती काढली आहे. तिच्या वाकड्यात जाण्यात अर्थ नाही..."उदय समोरची खुर्ची ओढून त्यावर बसत म्हणाला.

"का रे भवानी काय चिलखत घालून फिरते की काय?" आश्चर्य वाटून आण्णांनी विचारल. उदयने माहिती काढून आणली आहे हे समजल्यावर त्यांचा पारा थोडा उतरला होता.

"तसच समजा हव तर. ती अपोजिट पक्षातल्या जिल्हा स्तरावरच्या नेत्याची मुलगी आहे. तिचा नवरा IPS अधिकारी आहे. ही बया स्वतः सामाजिक काम गेली 12-13वर्ष करते आहे. ज्या संस्थेसाठी करते आहे ती संस्थासुद्धा बरीच फेमस आहे. पार परदेशातून मदत येती म्हणे तिला." उदयने एकूणच इत्यंभूत माहिती दिली.

हे सगळ ऐकून आण्णा भलतेच शांत झाले. येरझारा थांबवून ते त्यांच्या जागेवर जाऊन बसले.

"तिच्यायला... इथे आपल्या गावात का उगवली आहे ही ब्याद?" त्यांनी कपाळावर हात मारत काहीस स्वतःला आणि काहीस उदयला उद्देशून प्रश्न केला.

उदयच आण्णाकडे लक्ष नव्हत. त्यामुळे ते आपल्याला विचारत आहेत अस समजून त्याने त्याच्या नेहेमीच्या स्टाईळे उत्तर दिल.  "ते तिच नीट सांगू शकेल. बोलावून घेऊ का तिला इथे?"

त्याच्या उत्तराने परत एकदा आण्णांचा पारा चढला. ते परत एकदा त्याच्यावर ओरडले,"उदय तू बिंडोक आहेस.. अरे तू माझा वारस ना रे? आत्ताच तूच म्हणालास ना तिच्या वाकड्यात जाण्यात अर्थ नाही म्हणून. मग इथे बोलावून कस चालेल? बेअक्कल कुठला. जा चल तू निघ इथून. बघतो मी काय ते."

बेफिकीरपणे खांदे उडवत "ठीके" अस म्हणून उदय केबिन मधून बाहेर पडला आणि त्याच्या मागोमाग आण्णासाहेब देखिल दुपारच्या जेवणासाठी वाड्याकडे निघाले.

आण्णांची घरी येण्याची वेळ तशी ठरलेली नसायची. त्यामुळे त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई कायमच त्यांची वाट बघत असायच्या. त्याच कारण देखील तसच होत. त्या आण्णांना  खूप घाबरून असायच्या. तापट आण्णा कधी कोणत्या गोष्टीवरुन चिड़तील आणि अंगावर हात टाकतील याचा काही भरोसा नसायचा. अजूनही.... मुलगा इतका मोठा झाला तरीही परिस्थिती बदलली नव्हती. ज्याच्याकड़े आशेने बघितल असत असा मुलगा उदयदेखील दिवटा निघाला होता. त्याची शिक्षणाच्या नावाने बोंब होती. वयाच्या सोळाव्या वर्षापासुनच बापाने दिलेल्या बुलेटवरुन गावात भटकायच आणि स्वतःच्या वयाचा विचारही न करता पोरी-बाळींना सतवायच याशिवाय त्याने कधी काही केल नव्हतं. आता तिशीचा झाला होता पण चोविशीचा होता तेव्हा एका सतरा वर्षाच्या पोरीला पुरत नासवल होत. तिला त्याने मारूनच टाकल असत. पण नेमक्या निवडणुका समोर होत्या म्हणून आण्णासाहेबानी लग्न लाउन दिल होत... म्हणून लग्न झाल म्हणायच आपल्. त्या पोरीची अवस्था लक्ष्मीबाईंसारखीच होती.

घरात शिरता-शिरता आण्णानी लक्ष्मीबाईंना आवाज दिला.

"लक्ष्मी.. ए लक्ष्मी...."

त्या मागील दारी मच्छीवाली आली होती तिच्याशी बोलत होत्या. त्यांना हाक एकु गेली नाही. इथे सुनबाईच काळीज सासुपुढे वाढून ठेवलेल्या लाथा-बुक्क्यांचा ताटाने धड़धड़ु लागल. ती मागिल दारी धावली.

"आई... अहो सोडा ते. मामंजी आल्येत. तुम्हाला बोलावतायत. जा लवकर. मी बघते इथल." घाईघाईने सासूबाईचा हात ओढत ती म्हणाली.

लक्ष्मीबाईंच्या पायाखालची जमिनच हादरली. पहिल्या हाकेत उत्तर नसल की काय होत याची त्यांना कल्पना होती. त्या  दिवानखाण्याच्या दिशेने अक्षरशः धावल्या. तोवर आण्णानी अजुन 2-3 वेळा हाक मारली होती.

"मागिल दारी होते जी. हाक एकु नाही जी आली." धपापत खालच्या आवाजात लक्ष्मीबाईं म्हणाल्या.

त्यांना समोर बघितल्या क्षणी कारण नसताना चिडत काहीही बोलायच्या अगोदर आण्णानी त्यांच्या मुस्काटात भड़कावली आणि मग म्हणाले,"ए बये मला कारण सांगू नकोस नाहीतर भर चौकात चाबकाने फोडेन. चल जेवायला वाढ मला."

अचानक बसलेल्या मारामुळे धड़पडलेल्या लक्ष्मीबांई स्वतः ला सांभाळत आणि डोळ्यात येणारे पाणी लपवत आत गेल्या. त्यांनी आण्णाच ताट वाढल. ते जेवायला बसले.

"लक्ष्मी एक काम करायच आज. गावात एक अति शिक्षित भवानी आली आहे. काय संस्था-बींस्था चालवते. त्या बयेला घरी बोलवायचं तुमच काहीतरी बायकांच कारण काढून. पुढच मी बघुन घेतो." जेवताना आण्णांनी लक्ष्मीबाईना फर्मान सोडलं.

लक्ष्मीबाईं धास्तावल्या. "म्हणजे घरात काही......"

"ए सांगतो तेवढ कर. मगासची ठेवून दिलेली कमी पडली काय?" आण्णा वसकन लक्ष्मीबाईंवर ओरडले. तशी लक्ष्मीबाईं गप आत गेल्या. साधारण तीनच्या सुमाराला त्या 'स्व निर्भरा महिला संस्था' च्या कार्यालयात पोहोचल्या. सुगंधा तिथेच बसली होती. ती नविन सुरु करायच्या प्रोजेक्टचा final draft तयार करत होती.

"नमस्कार. मी लक्ष्मी. आण्णा साहेबांची पत्नी." लक्ष्मीबाईं आत शिरून थेट सुगंधाच्या समोर उभ्या राहिल्या आणि बोलल्या.

सुगंधा माने म्हणजे अजितराव राणे यांची कन्या होती. अजितराव राणे म्हणजे देशातल्या एका मोठ्या पक्षामधील या जिल्ह्यातील सर्वेसर्वाच म्हणायचे. सुगंधाचे पति IPS अधिकारी होते. सुगंधाला राजकारणापेक्षा सामाजिक कामाची आवड होती. त्यामुळे वडिलांच्या इच्छेविरुद्ध ती गेली अनेक वर्षे स्व-निर्भराच काम करत होती. लग्नानंतरही तिच ते काम चालूच होत. सध्या तिला या गावात संस्थेची नवीन शाखा सुरु करण्याची जवाबदारी दिली होती. तिने आण्णा दळवी यांच्याबद्धल बरच एकल होत. त्यांच्या मदतिशिवाय या गावात काही करता येणार नाही याची तिला कल्पना होती. गेली दहा एक वर्षे ती या संस्थेच् काम करत होती. त्यामुळे 'पानी में रेहेना हे तो मगरमछ से दोस्ती अच्छी।' असा तिचा विचार होता. तशी ती सामाजिक कार्यकर्ती असली तरी बरीच प्रैक्टिकल होती. त्यामुळे आण्णासाहेबांच्या पत्नीच आपणहून आल्या आहेत हे पाहून तिला बर वाटल.

लक्ष्मीबाईना समोर बसायला सांगत सुगंधा म्हणाली,"नमस्कार वहिनी. अरे बसा न. ऐकून आहे मी आण्णासाहेबांबद्धल. पण तुम्ही कशा काय इथे? आमच्या संस्थेच् काम करायला की काय?" तिने मुद्दाम खोडसाळ पणा केला.

लक्ष्मीबाई एकदम विंचु चावल्या सारख्या उडाल्या. "छे छे.. आमच्याकडे असलं काही चालत नाही. अहो ताई हे आज सांगत होते की तुम्ही आमच्या गावातल्या बाया-बापड्यांसाठी काम करायला आला आहात. म्हंटल तुमची ओळख करून घ्यावी. तुमच काम आटपल की आज चहा पाण्याला या की घरी."

सुगंधा हसली. "अहो काम काय होत राहील. तुम्ही इतका आग्रह करता आहात तर चला. आत्ताच येते तुमच्या बरोबर."

लक्ष्मीबाईंना हे अपेक्षित नव्हतं. मुळात त्यांना सुगंधला घरी बोलवायच नव्हतं. त्यामुळे त्या थोड्या गडबडल्या पण त्यांनी पटकन सावरून घेतल आणि सुगंधा लक्ष्मीबाईं बरोबर निघाली. दोघी रस्त्याने चालत होत्या. सकाळच्या माराच्या खुणा लक्ष्मीबाईंच्या गालावर उमटल्या होत्या. सुगंधाला ते लक्षात आल.

"वहिनी काय हो हे?" तिने आश्चर्य वाटून विचारल.

"छे छे... काही नाही... काही नाही..." अस म्हणत लक्ष्मीबाईनी पदर लपेटुन घेतला आणि भराभरा चालत वाडा गाठला.

सुगंधा आपल्या पत्नीसोबत लगेच आलेली पाहून आण्णांना देखील आश्चर्य वाटल. पण ते चेहेऱ्यावर दाखवून न देता सुगंधाच स्वागत करत ते म्हणाले,"या या सुगंधाताई. बरच एकल आहे तुमच्या बद्धल आणि तुमच्या कामाबद्धल."

"नमस्कार आण्णा साहेब. मी देखिल बरच एकून आहे आपल्याबद्धल. आपल्या मदतिशिवाय गावात नविन काही करण शक्य नाही म्हणतात." सुगंधाने हसत म्हंटल आणि त्यांना नमस्कार केला.

आण्णाना सुगंधा इतकं स्पष्ट बोलेल अस वाटल नव्हतं त्यामुळे ते थोडे गडबडले. पण ते देखील पक्के खिलाडी होते. सावरून घेत म्हणाले,"अहो कसल काय? आम्ही देखिल थोड़ फार सामाजिक काम करतो. म्हणून तर लोकांनी निवडून दिल आहे. म्हंटल इतकी मोठी संस्था आमच्या गावात येणार ... काम करणार... पण काम बाया-बापड्यांसाठी आहे. म्हणून तर लक्ष्मीला म्हंटल जरा लक्ष घाल तू पण."

"हे बाकी बर केलत. उद्यापासून येऊ देत वहिनीना आमच्या संस्थेत. त्यांच्या सारख्या महिलांची खरच गरज आहे." सुगंधाने डाव साधत लगेच बोलून टाकल.

आण्णा एकदम गड़बडले. त्यांना फ़क्त एवढच म्हणायच होत की तुला बोलावण्या पुरत लक्ष्मीला लक्ष घालायला सांगितल. पण आता त्यांना मागे हटता येईना. त्यांनी विचार केला आत्ता हो म्हणू... रात्रि लक्ष्मीला काय ते समजाऊ. म्हणजे तिच नाही म्हणेल उद्या.

"हो हो... येईल न ती. तशी ती आमच्या शब्दाबाहेर नाही."

"बघा वहिनी मी म्हणाले नव्हते तुम्हाला? तुम्ही उगाच घरच काम... शेती... पै-पाहुणा.. असली असंख्य कारण रस्ताभर मला सांगितलीत. आण्णाचीच इच्छा आहे तुम्ही आमच्या संस्थेच काम करावत. आणि मी काही दिवसभर नाही बोलवत तुम्हाला. दुपारी या साधारण दोन-तीनपर्यंत. तास दोन तास थांबा आणि आजच्या सारख्या सहाला घरी चहाच्या वेळेपर्यंत. काय?" सुगंधा हसत म्हणाली. खरतर तिच आणि लक्ष्मीबाईच अस काहीच बोलण झाल नव्हतं. पण इतक्या वर्षात आता सुगंधालासुद्धा कशी खेळी करायची ते माहीत झाल होत. मात्र खरी पंचाईत लक्ष्मीबाईची झाली होती. हो म्हणावं तर नवरा काय करील याचा भरोसा नाही आणि नाही म्हणावं तर ही हुशार बाई काय ते समजून जाईल. त्यामुळे त्या गप्पच बसल्या. त्या काही बोलत नाही हे बधून सुगंध म्हणाली,"वहिनी आला नाहीत उद्यापासुन तर मी स्वतः घ्यायला येईन ह."

त्यावर आण्णासाहेबच म्हणाले,"येईल हो ती उद्यापासून. तुम्ही बसा." आणि लक्ष्मीबाईना त्यांनी चहा आणायला सांगितलं.
---------------------
"आठ दिवस झाले तुझी आई देवळात गेली नसेल इतक्या भक्तिभावाने त्या संस्थेत जाते आहे. उदय... हे काही खर नाही पोरा. त्या भवानीला आट्यात घ्यायलाच हवी. पण यावेळी थोड़ वेगळा गेम करावा लागेल. तयारीची दिसती आहे टवळी." दुपारच्या जेवणानंतर आण्णा उदयशी बोलत होते.

"उचलु का तिला? ब-याच दिवसात नविन काही नाही पाहिल." उदयने नेहेमीप्रमाणे मुक्ताफळ उधळली.

"भाड्या मी काय विचार करतोय आणि तू काय बोलतो आहेस. उदय अरे जरा काम-धंद्याला लाग. पालिकेच्या निवडणुका आठ महिन्यावर आल्यात. गावाच राजकारण आता तू बघायच. मी पंचक्रोशीच बघतो आहे गेली तीन वर्ष. गावसुद्धा मीच सांभाळायच का? बास कर की तुझा हा बाहेरख्यालीपणा" आण्णा वैतागून म्हणाले.

"वा वा! कोण कोणाला सांगतय बाहेरख्यालीपणा बद्दल! आण्णा शैला म्हणत होती परवा रात्रि तुम्ही तिच्या दाराशी थांबला होतात. पाणी मागितलत आणि हात धरलात. अहो ती माझी आहे. तिला तरी सोडा." उदय उर्मटपणे आण्णाकडे बघत म्हणाला.

उदयच्या उर्मटपणाने चिडलेले आण्णा त्याच्या अंगावर धावून जात ओरडले,"ए भेनच्योद तोंड आवर नाहीतर जीभ हासडून ठेवेन. भाड्या तुझी काय ती? तीचेच दागिने विकुन खाल्लेस... तिला लग्न करू देत नाहीस... साली आली होती रडत आणि पदर पसरून माझ्याकडे त्यादिवशी. पदर जास्त पसरला गेला आणि थोड़ा इथे तिथे हात लागला... एवढच. पण आता तू इतका मोठा झालास की मला तू विचारणार? आजही कानाखाली आवाज काढिन तुझ्या. समजल? चल चालता हो. मला विचार करू दे."

आण्णांचे बोलणे एकून उदय विचारात पडला. तो काही न बोलता वाड्यातून बाहेर पडला. आण्णा मात्र त्यांच्या आरामखुर्चीत बसून विचार करत होते.
-------------------------------------
आण्णांनीच सुगंधासमोर परवानगी दिल्यामुळे लक्ष्मीबाई रोज न चुकता सुगंधाच्या संस्थेत जात होत्या. आण्णा त्यांना थांबवू शकत नव्हते आणि त्यांना हे अस लक्ष्मीबाईच संस्थेत जाण आणि काम कारण पटत देखील नव्हत.

आण्णा आज थोड़े लवकरच वाड़यावर आले. लक्ष्मीबाई अजुन संस्थेतून घरी आल्या नव्हत्या. हे समजल्यावर आण्णाचा पारा चढ़ला. लक्ष्मीबाईनी घरात पाय ठेवला आणि आण्णानी त्यांना वृन्दावनासमोर बडव-बड़व... बडवल. लक्ष्मीबाई दोन दिवस तर त्या खोलीतून बाहेर पडु शकत नव्हत्या. पण त्यांना सुगंधा वाट बघत असेल याची कल्पना होती. त्यांच्या सुनेला घराबाहेर जाण्याची परवानगी नव्हती. पण त्यांनी सुनेला गळ घातली.... म्हणल्या,"सुगंधा माझी वाट बघत असेल ग पोरी. तिला निरोप तरी दे ग. कसही कर आणि तिला कळव की मला थोडं बर नाही. मला विचारात सुगंधा घरी आली तर अनर्थ होईल." पण सुन तरी काय करणार? जर ती बाहेर पडली अस उदयला समजल असत तर तिची खाट लक्ष्मीबाईच्या शेजारी पडली असती. त्यामुळे ती गेली नाही. शेवटी लक्ष्मीबाईना ज़ी भिती होती तेच झाल. सुगंधा तिस-या दिवशी घरी आली. कर्मधर्मसंयोगाने आण्णा घराच होते.

"या... या... सुगंधाताई. आज इकडे कुठे?" तिला समोर बघून त्यांनी खोट हसत तिच स्वागत केल.

"अहो वहिनी पडल्या म्हणे? चौकशिला आले." त्यांना हसत नमस्कार करत सुगंधाने उत्तर दिल.

आण्णा अवाक् झाले. कारण लक्ष्मीला बर नाही याची खबर बाहेर नव्हती.

"छे हो! तिला काय धाड़ भरली आहे. झक्कास आहे ती." त्यांनी उत्तर दिल.

"मग बोलवा न!" अस म्हणून सुगंधानेच हाक मारायला सुरवात केली. "वहिनी अहो वहिनी..."

"त्या जरा पडल्यात. थोड़ी कणकण आहे अंगात." आतल्या दाराशी येऊन सुनेने उत्तर दिल.

"अरे? तू कोण?" माहित असूनही सुगंधाने मुद्दाम आश्चर्याचा आव आणून विचारल.

"आमची सुनबाई." सून काहीतरी बोलेल म्हणून मनात नसूनही आण्णांनी उत्तर दिल.

"अरे वा आण्णा. तुम्हाला सुनदेखिल आहे? वाटत नाही तुमच्याकडे बघुन. तुम्ही अजूनही बरेच तरुण दिसता की" सुगंधाने आण्णांना चढवण्यासाठी म्हंटल.

हे ऐकून आण्णा खुश झाले. मिशीला पिळ देत त्यांनी आत बघत ऑर्डर सोडली. "पाहुण्या ताई आल्यात. चहां पाण्याच् बघा."

सुन मागल्या पावली आत पळाली आणि चहा-नाश्ता घेऊन आली.

तिला समोर आलेलं बघून सुगंधाने मुद्दाम तिच्याशी बोलायला सुरवात केली. तिला आपल्या बरोबर बसायला सांगत सुगंधाने विचारल,"अरे लहान दिसतेस ग. काही शिकली आहेस की नाही?"

पदर घट्ट डोक्यावरुन लपेटुन तिने हळूच उत्तर दिल. "हो जी. सातवी पास."

"अरे वा... बरीच शिकली आहेस की. बर झाल बाई तू भेटलीस. उद्या पासून तू पण ये संस्थेत वाहीनिंबरोबर. लिखा-पढ़ी तूच करशील. माझ काय बाई... माझ्यासाठी हा दोन-चार महिन्यांचा प्रोजेक्ट आहे. मग मी जाणार. तुला आणि वाहिनींनाच मग चालवायची आहे संस्था. काय आण्णा साहेब बरोबर न?" सुनेशी बोलत पण आण्णांना हवी असणारी माहिती स्वतःहून देत सुगंधा म्हणाली.

ही नवीन माहिती ऐकून आण्णा एकदम खुश झाले. 'म्हणजे ही बाई थोड्या दिवसांसाठीच् आली आहे तर.' अचानक त्यांना सुटल्यासारखे झाले. त्यांनी विचार केला 'बर झाल. मोठ नाव असलेल्या संस्थेचा आधार मिळाला तर भविष्यात उपयोग होईल. त्यात लक्ष्मी आणि सुनबाईनाच ही हाताशी घेते आहे. म्हणजे पुढे हिची संस्था आपल्यला खिशात घालता येणार आहे.' आपल्या विचारावर खुश होत आण्णा मोठ्याने म्हणाले,"हो हो... अगदी बरोबर. येईल न तीसुद्धा लक्ष्मीबरोबर. तशा दुपारी त्या मोकळयाच असतात." सुगंधाने हसत-हसत मान डोलावली आणि चहा घेऊन ती वाड्यावरून निघाली.
--------------------------
संस्थेच्या कामाला जवळ-जवळ दोन महीने झाले होते. लक्ष्मीबाईनी स्वतः गावात फिरून बायकांना एकत्र केल होत. त्यांची सुनसुद्धा आता संस्थेच्या कामाला सरावली होती. बायका ही आता मोकळेपणाने सुगंधाशी बोलायला लागल्या होत्या. सुगंधादेखिल कधीच मोठी मोठी भाषण देत नसे. त्यांच्याशी गप्पा मारायच्या. त्यांचे प्रश्न विचारायचे... आणि हळूहळू त्यांना स्वतः च्या पायावर उभ राहाण्याच महत्व समजावायच. असा एकूण तिचा कार्यक्रम असे. त्यातच त्यांच्याशी बोलून गावात कुठला व्यवसाय सुरु कारण जमेल त्याची पड़ताळणी देखील ती करत असे.

हळूहळू तिने गोणपाटाच्या पिशव्या बनवण्याचा व्यवसाय तुम्ही करु शकता; असा विश्वास गावातल्या महिलांच्या मनात निर्माण केला. पहिल्या शंभर पिशव्या त्यांच्या मागे लागून करून देखील घेतल्या. आता प्रश्न या पिशव्या विकण्याचा होता. यासाठी आश्चर्यकारक रित्या आण्णासाहेब पुढे आले. जील्ह्याच्या ठिकाणी काही मोठ्या दुकानातून त्यांच्या ओळखी होत्या. त्या लोकांशी बोलणी करून देण्यासाठी स्वतः आण्णासाहेब सुगंधाला नेणार होते. त्यांनी लक्ष्मीबाई बरोबर सुगंधाला निरोप पाठवला होता. वाड्यावर लवकर या. सकाळी लवकर निघावे लागणार होते. म्हणून मग काम लवकर आटपून त्यादिवशी सुगंधा घरी लवकर आली होती.

सगळ लवकर उरकून सुगंधा पलंगावर आडवी झाली. रात्रि अचानक तिच्या खोलीच्या खिड़कीची कड़ी अगदी हळू आवाजात वाजली. पण त्या आवाजाने देखिल सुगंधाला जाग आली. तिच्या लहानपणापासून तिला सांभाळणारे सदा काका तिच्या खोली बाहेर झोपले होते. साठीच्या घरात असले तरी आजही चार जणांना भारी पडतील अशी शरीर यष्टि होती त्यांची. त्यांच्याच भरोशावर सुगंधाचे वडील आणि पति तिला असे चार-चार महीने घरापासून लांब राहायला देत होते. सदा काकांची झोपही सावध होती. ते लगेच उठुन आत आले. तिला गप रहाण्याची खूण करून खिड़कीजवळ गेले. आतली अस्पष्ट हालचाल जाणवून बाहेरील व्यक्तिने हलक्या आवाजात हाक मारली. आवाज स्त्रीचा होता. सुगंधा पटकन खिड़कीजवळ गेली आणि तिने हळूच खिड़की उघडली.

"ताई मी शैला. मला आत घ्या ना."

एकदा सदा काकांकडे बघुन सुगंधाने तिच्यासाठी दार उघडले. शैला आत येऊन अक्षरशः सुगंधाच्या पायावर कोसळली. तिचा बांध फुटला होता. आणि तरीही आवाज होऊ नये म्हणून तोंडात पदराचा बोळा खुपसुन ती ओक्साभोक्षी रडत होती. सुगंधा ती शांत व्हायची वाट बघत होती. काही वेळाने शैलाने स्वतःला सावरले आणि ती बोलायला लागली,"ताई मला त्या हलकट आण्णा आणि त्याचा मुलगा उदय पासून वाचवा हो.   पाच महीन्यांपूर्वी माझे वडील गेले. आई लहानपणीच् गेली होती. वडील गेल्याच्या दुस-या दिवशी उदयने घरात घुसून माझ्यावर बलात्कार केला. तो दिवस आणि आज... शप्पथ सांगते ताई.. एक रात्र सोडत नाही हो तो. दिवसा देखील कधीही घुसतो. कधी शेतात ओढतो... माझ्या वडिलांनी माझ्या लग्नासाठी हौसेने दोन-चार दागिने केले होते तेसुद्धा त्याने घेतले आणि विकले. म्हणे आता मी तुला ठेवली आहे तर लग्नाचा प्रश्नच येत नाही. मग दागिने कशाला हवेत. ताई हे कमी होते म्हणून की काय काल आण्णानी निरोप पाठवला. वाहिनीनी बोलावल आहे वाड्यावर. मला मुर्खाला कळल नाही हो त्यांचा डाव. दुपारी वहिनी आणि उदयची बायको तुमच्या संस्थेत येतात ना... त्यावेळी बोलावून त्यांनी देखिल माझ्यावर हात टाकला हो. जीवाच्या आकांताने पळाले आणि आत्तापर्यंत शिवारात लपले होते. ताई, आण्णांचा गावात दरारा आहे. सगळे घाबरून आहेत त्यांना. त्यामुळे या उभ्या गावात आण्णाच्या विरुद्ध कोणी जाणार नाही. त्यांना आणि त्यांच्या मुलाला हे गाव म्हणजे त्यांची जहागिरि वाटते. सगळ्या गावातल्या पुरुषानी बांगड्या भरल्या आहेतजणू. काही दिवसांपूर्वी उदयच्या तोंडुन एकल होत की तुम्ही खूप हुशार आहात आणि बायकांसाठी काही करता आहात म्हणून. तुम्ही कामाला सुरुवात करायच्या अगोदर आण्णांच्या वाड्यावर गेला होतात. त्यामुळे लोक तुम्हाला त्यांच्या बाजूचे समजायला लागले आहेत. त्यामुळे त्यांनी तुमच्याकडे त्यांच्या बायका-सुनांना पाठवल आहे. त्यात तुम्ही लक्ष्मीबाईना आणि उदयच्या बायकोला पण तुमच्याकडे घेतल आहेत. त्यामुळे गावातल्या पुरुषांचा तुमच्यावर विश्वास आहे. अलीकडे बायाना तुमच्याबद्धल विश्वास वाटतो हे देखील मला माहित आहे. म्हणूनच मी तुमच्याकडे आले आहे. ताई मला मदत करा हो! उद्या मी उदयच्या हाती लागले काय किंवा आण्णांच्या हाती लागले काय माझ मरणच आहे ताई."

तिच बोलण एकून सुगंधा विचारात पडली. तिच्या पाठीवर थोपटत ती म्हणाली,"शैला शांत हो. मला विचार करायला वेळ दे. मी उद्या आण्णा साहेबांबरोबर जिल्ह्याच्या गावी जाते आहे. तिथून आले की आपण काय करायचे ते ठरवू. तोवर तू इथेच थांब."

"ताई मला मदत कराल न? इथे नाही थांबत मी. शिवारात जास्त सुरक्षित वाटत. परत उद्या रात्रि येते. मला सोडवा हो ताई या छळातून. नाहीतर जीव देण्याशिवाय पर्याय नाही हो मला." सुगंधाचा हात गच्च धरत शैला म्हणाली.

थोड़ा विचार करून सुगंधा सदा काकांना म्हणाली,"काका मी नाहितरी उद्या जिल्ह्यात आहे. तुम्ही हिला घेऊन आत्ताच ताबडतोप निघा. घरी जाऊन तिला आईकडे सुपुर्द करा आणि त्याच पावली परत या. म्हणजे दुपारपर्यंत याल. तुम्ही जिल्ह्याला जाऊन आलात हे कोणाला लक्षात येणार नाही. सध्यातरी मला संशयाची सुई माझ्या दिशेने वळायला नको आहे."

तिच बोलण एकून सदाकाकांनी मान हलवली आणि म्हणाले,"सुगंधा काय आहे तुझ्या डोक्यात मला माहीत नाही. पण मी तुझ्या शब्दाबाहेर नाही."

"शैला तू जा काकांबरोबर. अजिबात काळजी करू नकोस. मी तुला स्वतःहून येऊन भेटेन. तोवर माझ्या आई-वडिलांकडे रहा." सुगंधा शैलाला म्हणाली. डोळे पुसत शैलाने सुगंधाचे पाय धरले. त्याबरोबर तिला उठवत सुगंधा म्हणाली,"अग माझे पाय नको धरूस. चल... उठ आणि निघ तू काकांबरोबर."

सदाकाका आणि शैलाला निरोप देऊन सुगंधा पलंगावर येऊन पडली तोवर तांबड फुटायला लागल होत.
--------------------------
दुस-या दिवशी सुगंधा आणि आण्णा साहेब जिल्ह्याच्या गावी जाऊन आले. आण्णांनी खरच काही दुकानातून बोलणी करून दिली आणि लगोलग ऑर्डर्स पण मिळवून दिल्या गोणपाटाच्या पिशव्यांसाठी. आण्णांनी सुगंधाला त्यांच्या वरिष्ठ नेत्यांकडे देखिल नेल. ओळख करून देताना सुगंधाचे वडील आणि पति यांच्याबद्धल देखिल माहिती दिली.
आण्णा परतीच्या प्रवासात बरेच खुशीत होते. डाव त्यांच्या मना प्रमाणे साधला होता. सुगंधाला तिच्या संस्थेसाठी ऑर्डर्स मिळाल्या होत्या. त्यामुळे तिचा त्यांच्यावरचा विश्वास वाढला होता. मोठ्या नेत्यांना देखिल आण्णांच्या कामगिरीचे कौतुक वाटले होते. आता संस्थेने सुरु केलेल्या व्यवसायाचा जम बसायला वेळ लागणार नव्हता. म्हणजे सुगंधा आता काही दिवसात निघून जाईल असा कयास आण्णांनी बदला होता. काही दिवसातच ही संस्था आपल्या हातात येणार याची स्वप्न बघत आण्णा खुशीत हस्त होते. ते दोघे गावात परत आले मात्र गावातलं वातावरण तंग आहे हे आण्णाच्या लक्षात आल. उदयने काही गडबड तर करून ठेवलेली नाही ना या विचाराने सुगंधाला गाडीतून उतरवून आण्णा वाड्यावर धावले.

वाड्यात शिरताच समोर उदयला बघून आण्णांनी त्यांच्या तोंडाचा पट्टा सुरु केला. "उदय काय झालय नक्की? अरे एक दिवस तुझा बाप बाहेर गेला तर काय गोंधळ घातलात तुम्ही इथे? अरे किती दिवस बापाच्या जीवावर जगणार तू? जरा स्वतः काही करत नाहीस. आणि तुझीच सोय करायला गेलो तर इथे अजून घाण करून ठेवतोस काय?"

"ओ.. बाप आहात तर बापासारख वागा. तुम्ही इथे वाड्यावर बोलावून माझ्या शैलावर हात टाकलात का ते बोला..." उदयने आण्णाच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत उलट त्यांच्या अंगावर धावून जात सवाल केला.

"हो... टाकला होता हात... पण सुटली साली रांड. सरळ येत नव्हती म्हणून इथे बोलावली होती. काय करशील?" आण्णा भडकून म्हणाले.

त्यांच्या उत्तराने उदय भलताच भडकला आणि म्हणाला,"बर झाल मला बहिण नाही... नाहीतर तुम्ही तिला देखिल सोडल नसत."

"ए भेनच्योद... आता गपतो का? की घालू ही गुप्ति तुझ्या नरद्यात्. गावात काय झालय ते बोल. कोणाच मयत आहे की काही घोळ झालाय ते सांग. बाकी गप् बसायच गुमान. समजलास?" अंगावर आलेल्या उडायला ढकलत आण्णा म्हणाले.

आण्णाचा अवतार बघून उदय थोडा वरमला आणि म्हणाला,"ती शैला गायब आहे वाड़यावरुन पळाल्यापासून."

उदयच्या बोलण्याने बेफिकीर होत आण्णा म्हणाले,"गायब तर गायब. दिला असेल जीव तिने. तू तुझी दूसरी सोय बघ. आणि जरा घरात आणलेल्या बाईकडे बघ. पाळणा हलवून टाक परत एकदा. एकदा पालिका निवडणुका आल्या की वेळ मिळणार नाही." त्यांनी तो विषय तिथेच संपवून टाकला.

दुस-या दिवशी आण्णांच्या कार्यालयात पोलिस चौकशिला आले. पण आण्णानी माहीत नाही म्हणून हात वर केले. शैलाच कोणीच नव्हतं. त्यामुळे पोलिसांनी फाईल बंद केली.
------------
असेच दोन महीने गेले. संस्थेचे काम आता नीट चालायला लागले होते. सुगंधाने तिच्या परतीची तयारी सुरु केली. एक दिवशी अचानकपणे लक्ष्मीबाई आणि त्यांची सुन बाराच्या सुमाराला सुगंधाच्या घरी आल्या.

"अरे वहिनी आज इथे कुठे?" त्यादोघीना बघून सुगंधा आश्चर्याने म्हणाली.

"सुगंधा तू मला माझ्या मूली सारखी आहेस म्हणून आज तुझ्याकडे आले आहे. काल संस्थेत चर्चा होती की तू आता जाणार आहेस. अग अशी आम्हाला एकट सोडून जाऊ नकोस ग. अग माझ्या नव-याने आणि नालायक मुलाने गावातल्या अनेकांच्या आयुष्याची वाट लावली आहे. मी तर संपूर्ण आयुष्य फ़क्त नरक यातनाच् भोगल्या ग. तुझ्या रूपाने मला, माझ्या सुनेला आणि गावातल्या बायकाना आशेचा किरण दिसला आहे. पण तू गेलीस की हे आमच प्रामाणिक काम बंद होणार. माझा हलकट नवरा ही संस्था ताब्यात घेईल. म्हणून म्हणते जाऊ नकोस." हळव्या होत आणि सुगंधाचा हात धरत लक्ष्मीबाई म्हणल्या.

"वहिनी अहो मग तुम्ही काय शिकलात इतक्या महिन्यात? अहो थोडा आत्मविश्वास वाढवा. तुम्ही सर्व स्त्रीया एकत्र आलात तर उदय आणि आण्णा सारख्या नाराधमाला नक्की धड़ा शिकवू शकाल." सुगंधा त्यांच्या खांद्यावर थोपटत म्हणाली.

"सुगंधा त्यांना राजकीय पाठबळ खूप आहे ग. तुला काय वाटत मी प्रयत्न केले नसतील? पूर्वी कधी कधी मला ते जिल्ह्यात घेऊन जायचे. तुला ज्या मोठ्या साहेबांकड़े नेल होत तिथे मला ही नेल आहे त्यांनी दोन-चार वेळा. त्यावेलील मी मोठ्या साहेबांच्या बायकोकडे आण्णांच्या अपरोक्ष गा-हाण घातल होत. तुला माहीत आहे त्या काय म्हणाल्या? म्हणे तुझ्या एकटीच्या दुःखापायी आम्ही काय आण्णाला देशोधडीला लाऊ का? हा घरातला प्रश्न आहे. जरा कुठे थोड़ सहन कराव बाई माणसाने. आण्णा पक्षाला पैसा पुरवतात. गावात काम आहे... पंचक्रोशित नाव आहे. जळणारी लोक असतात. लोकांच् ऐकून तू काही करु नकोस बर. एकटी पडशील. त्यानंतर साहेबांनी ह्यांना सांगितल मला जिल्ह्यात आणायच नाही. आम्ही वाड्यावर आलो आणि त्यादिवशी माझी जी पिटाई झाली की मला हॉस्पिटलमधे पंधरा दिवस ठेवाव लागल. साहेब-वहिनी येऊन गेल्या. आणि माझ तोंड कायमच बंद झाल. तुझ्या रूपाने मला आशेचा किरण दिसला आहे. माझ काय ग रहिलय. पण हिची माझ्या सुनेची काळजी वाटते." लक्ष्मीबाई पोटतिडकीने बोलत होत्या.

"वहिनी इतके दिवस काही का नाही बोललात? मला आता गेलच पाहिजे... पण तुम्ही चिंता करू नका. मी परत येईनच. नगर पालिका निवडणुका तोंडावर आहेत. आण्णा उदयला उभ करायची तयारी करत आहेत. त्यामुळे सध्या संस्थेच्या कामाला धोका नाही. तुम्ही दोघी संस्थेला बंद पडू देऊ नका. सर्व बायका एकजुटीने रहा. मी अजून काही महिने येऊन जाऊन असेनच. त्यामुळे आण्णा घाई करणार नाहीत. माझ्या मनात काही उपाय आहेत तुमच्या प्रश्नावर. माझ्यावर विश्वास ठेवा. बस आत्ता इतकंच सांगू शकते." सुगंधाने लक्ष्मीबाईचा हात हातात घेत त्यांना आश्वासन दिले.

"तुझ्यावर स्वतः पेक्षा जास्त विश्वास आहे सुगंधा." अस म्हणून लक्ष्मीबाई सुनेला घेऊन निघाल्या.
-----------------------------
निवडणुकांचे वारे वाहायला लागले.  त्यामुळे आण्णा आणि उदय उद्योगाला लागले. त्यांना सध्या संस्थेकडे लक्ष द्यायला वेळ नव्हता. आणि तसही सुगंधा गेलीच होती. फक्त संस्थेच्या कामासाठी महिन्यातून एखाद-दोन वेळा येऊन जात होती. त्यामुळे निवडणुकीनंतर सगळा कारभार हातात घेऊ असा आण्णांनी विचार केला होता. सुगंधा जेव्हा केव्हा गावात येत होती तेव्हा तिला गावातल्या बायकांकडून  सगळ्या खबरी कळत होत्या. पण ती शांत होती. आता बायकाच् काय पण गावातल्या पुरुषमंडळीना देखील सुगंधाबद्दल आदर निर्माण झाला होता. त्यांना देखील आण्णाची आणि उडायची आरेरावी नकोशी झाली होती. त्यामुळे बायकांच्या माध्यमातून या पुरुषमंडळीनी देखिल सुगंधाला भेटून आण्णापासून सुटकारा व्हायला मदत मागितली होती.

अपेक्षेप्रमाणे आण्णांच्या पक्षाने उदयला तिकीट जाहिर केले. उदयने जाऊन फॉर्म भरला. प्रचाराची रण धुमाळी सुरु झाली. फॉर्म भरायचा शेवटचा दिवस होता. दुसरा पक्ष बहुतेक उमेदवार देणार नाही असे बोलले जाऊ लागले होते आणि त्या दिवशी अचानक वीस पंचवीस गाड्या गावात आल्या. दुस-या पक्षाचा उमेद्वार फॉर्म भरायला आला होता.... नव्हे आली होती.

शैला गायकवाड़! उदयच्या विरुद्ध याहुन चांगला उमेद्वार कोण असू शकत होता? आण्णा आणि उदय हड़बडले. गोंधळले. संपूर्ण निवडणुकीचे एकवीस दिवस स्वतः सुगंधा आणि तिचा IPS नवरा गावात ठाण मांडून बसले होते. शैलाच्या बाजूने सुगंधा उभी राहिली होती.

प्रचाराची रणधुमाळी सुरु झाली. शैलाला समोर उभी बघून उदय भडकला होता. पण आण्णांनी त्याला शांत केला. निवडणुकी नंतर काय ते बघू असे त्याला समजावले. कारण आण्णांना त्यांच्या जिंकण्याबद्धल पूर्ण विश्वास होता. त्याच कारण देखील असच होत. अत्यंत खालच्या दर्जाचा प्रचार आण्णांच्या गोटातून चालु होता. त. शैलाच्या चारित्र्याबद्दल अत्यंत वाईट शब्दात पोस्टर्स लावले जात होते. घराघरात तिच्या आणि उदयच्या संबंधा बद्दलची वर्णनं लिहून टाकली जात होती.

सुगंधा मात्र शांत होती. तिने प्रचाराचे प्लानिग व्यवस्थित केले होते. गाव सोडलेली शैला आणि उमेद्वार शैला यात जमीन आस्मानाचा फरक होता. शैला भावनिक आव्हाहन अजिबात करत नव्हती. ती फ़क्त विकासाचा आराखडा आणि भ्रष्टाचाराच्या विरुद्ध बोलत होती. शैलाला एकूण पालिकेच्या कामाची व्यवस्थित माहिती होती हे दिसत होते. तिचा आत्मविश्वास वाखाडण्यासारखा होता.

आणि मग जसजसे दिवस उलटायला लागले तसतसे आण्णांना थोड़े टेंशन यायला लागले. त्या रात्रि आण्णा खूप उशिरा सभा संपवून आणि कार्यालयातले काम आटपुन वाड्यावर पोहोचले. समोरच उदय पीत बसला होता. ते बघुन त्यांचा पारा चढ़ला. त्यांनी चिडून त्याच्या कमरेत लाथ घातली.

"भाड्या मी इथे जीव काढतो आहे आणि तू आरामात पीत बसला आहेस? अरे मर्द असशील तर त्या शैलाला खेचून चौकात उभ कर आणि चाबकाने फोडून काढ़. अरे काहीतरी कर साल्या नाहीतर तू माझा मुलगा नाहीस." भडकून आण्णांनी वाड्याबाहेर हकलले.

उदयचे डोके अगोदरच फिरले होते. त्यात बापाने घातलेल्या लाथेमुळे तो अजुनच भड़कला. तसाच तिथून निघुन तो शैलाच्या घरी गेला. तिथे पोहोचेपर्यंत त्याने थोड़ा विचार केला. थोड़ डोक शांत केल आणि दाराची कड़ी वाजवली. शैलाने स्वतःच दार उघडले.

"तू?" शैलाने शांतपणे त्याच्याकडे बघत प्रश्न केला.

"शैला मला तुझ्याशी बोलायच आहे. जरा बाहेर येतेस?" उदय कमालीच्या शांतपणे बोलत होता.

"तूच ये घरात. तुला सवय आहे की या घराची आणि मला बाहेर यायची इच्छा नाही." शैला दारातून बाजूला होत म्हणाली.

"एकटीच् आहेस?" उदयने आत घरात नजर टाकत विचारले.

"हो" शैला शांतपणे म्हणाली.

उदयला आश्चर्य वाटले. आणि बर देखील. तो घरात आला आणि मग मात्र त्याचा पवित्रा बदलला. त्याने शैलाचे बखोट धरले आणि तिला खसकन स्वतःकडे ओढत म्हणला,"ए भवाने... फार चर्बी चढ़ली ग तुला. ज्यांच्या जीवावर उड़ते आहेस ते आयुष्यभर साथ नाही देनारेत तुला. साsssली रांड... गप गुमान पडून राहा एका कोप-यात निवडणूक होई पर्यंत. समजलिस? नाहीतरी तू हरणारच आहेस. मग बघून घेईनच मी तुला. कोण उभ राहील ग मग तुझ्या पाठीशी?"

"एssss तुझ्या आईच्या.... " त्याने धरलेला हात झटकत अचानक शैला कडाडली. "भेनच्योद तूझ्या औकातीत राहा.. समजलास? मी ती जुनी शैला नाही; जी तुला घाबरायची. कुठली ठस्सन देतोस् रे भाड्या? काय करणार तू मला? आणि माझ्या माग रडायला आहे कोण मला? इज्जत जी काही होती ती तू आन तुझ्या बापान कधीच वेशीला टांगली आहे. माझ्या नावाची पोस्टर्स लावत फिरता आहात ना ती कहाणी पुऱ्या गावाला अगोदरच माहित आहे. एक लक्षात ठेव.... मला ना आगा... ना पीछा... जिंकेन् की हारेन ते पुढच पुढे. पण मी राहणार याच गावात. तुझ्या नाकावर टिच्चून. हात तर लाव... नाय भर चौकात नागवा करून चाबकाने फोडला तर नावाची शैला नाही. चल चालता हो. मादरच्योद....... तुझ्या सारख्या नपुसकाला ज्याचा माज आहे तेच पायाने ठेचून तुझा जीव घेतला पाहिजे; म्हणजे पुढे भविष्यात तुझ्यासारखे नपुंसक नराधम जन्मणार नाहीत...."

शैलाचा आवाज टिपेला पोहोचला होता. बाजूच्या घरातले कार्यकर्ते, सुगंधा ... तिचा नवरा... सगळेच धावत आले. सगळ्यांना बघुन उदय घाबरला. धड़पडत मागे सरकत तो पळून गेला. दुसऱ्या दिवशी गावात आदल्या रात्रीच्या प्रसंगाचीच चर्चा होती. पण शैला मात्र शांत होती. ती तिचा प्रचार करत होती. अनेकांनी तिला पोलीस कम्प्लेंट करायला सांगितले. पण तिने नकार दिला. मात्र एवढे सगळे होऊनही आण्णांचा विश्वास दांडगा होता. त्यांनी गावात पैसा वाटायला सुरुवात केली. आता हा फ़क्त हार-जीत चा प्रश्न नव्हता त्यांच्यासाठी. हा आण्णांच्या अस्तित्वाचा प्रश्न झाला होता. लोकहि म्हणत होते; काहीही झाल तरी आम्ही आण्णांच्या बाजूने आहोत. काल आलेली ही बाई गावाला काय देणार असेही असे म्हणत होते. शेवटचे दोन दिवस तर दारू-चिकन-मटणाचा जोर लावून दिला होता आण्णांनी. लोकं देखील शैलाच्या सभेला जात नव्हते आणि आपल्या घरच्या बायकांना देखील जाऊ देत नव्हते. तरीही शैला शांतच होती.

याच दुमश्चाक्रीत मतदान आले. गावातील प्रत्येक पुरुष आणि बाई मतदान केंद्रावर पोहोचते आहे की नाही हे आण्णा आणि उदय जातीने बघत होते.

................ आणि रिजल्ट लागला. पुन्हा एकदा आण्णा साहेबांचा विजय होऊन त्यांच्या साम्राजाचे पाय पक्के आणि कायमचे रोवले.................... जाऊ नयेत म्हणून गावातल्या लोकांनी स्वतः बदल घडवून आणत शैला गायकवाड़ला प्रचंड बहुमतांनी निवडून दिल होत!!!

चांगल्याचा वाईटावर विजय झाला होता.......

---------------------------------------------


Friday, January 24, 2020

CAA ...हिंदू राष्ट्र ... धर्मनिरपेक्ष राष्ट्र!


CAA ...हिंदू राष्ट्र ... धर्मनिरपेक्ष राष्ट्र!


आपल्या देशाचे गृहमंत्री श्री. अमित शहा यांनी CAB म्हणजेच नागरिकत्व दुरुस्ती विधेयक संसदेत मांडले आणि ते संमत झाले. त्यानंतर राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतर या विधेयकाचे कायद्यात रूपांतर झाले आणि राजकीय असुरक्षितता मनात निर्माण झाल्याने काही राजकीय पक्षांनी देशभरामध्ये गैरसमज पसरवत या कायद्या विरोधात एक वादळ निर्माण झाल्याचा आभास निर्माण केला आहे. मुळात काय आहे हा कायदा?

नागरिकत्व दुरुस्ती कायदा २०१९

-या कायद्याअन्वये पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशमधील धार्मिक अल्पसंख्याकांना धार्मिक छळामुळे त्या देशांमधून पळ काढावा लागला असेल तर त्या देशातील अल्पसंख्यांकांना भारताचं नागरिकत्व देण्याची तरतूद  आहे. मुस्लिम राष्ट्र असा दर्जा स्वीकारलेल्या आणि त्यामुळे कायदा आणि नियम हे मुस्लिम धर्मसंमत असलेल्या या देशांमधील हिंदू, शीख, पारशी, जैन, बौद्ध आणि ख्रिश्चन धर्मियांना धार्मिक प्रतारणा झाली असल्यास या कायद्यानुसार भारताचे नागरिकत्व मिळू शकेल.

- ३१ डिसेंबर २०१४ पूर्वीच भारतात स्थलांतरीत झालेले आणि ज्यांना पासपोर्ट (एन्ट्री इनटू इंडिया) कायद्यामधून सूट दिली गेली आहे अशा पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशामधील धार्मिक अल्पसंख्याक भारताचे नागरिकत्व मिळवण्यास पात्र ठरतील.

- सध्या भारताचे नागरिकत्व मिळवण्यासाठी संबंधित व्यक्तीला भारतात किमान ११ वर्षे वास्तव्य करणे आवश्यक होते. मात्र आता ही अट शिथील करून सहा वर्षांवर आणण्यात आली आहे.

- यापूर्वी भारतात बेकायदेशीरपणे घुसखोरी करणाऱ्यांना देशाचे नागरिकत्व मिळू शकत नव्हते. त्यांना पासपोर्ट (एन्ट्री इनटू इंडिया) कायद्या मधून सूट मिळण्याची तरतूद होती; पण ती परिपूर्ण नव्हती त्यामुळे त्यांना नागरिकत्व मिळणे शक्य नव्हते. मात्र त्यांना नाईलाजाने ताब्यात घेऊन मायदेशी पाठवावे लागले असते. मात्र हे अल्पसंख्यांक धार्मिक प्रतारणेमुळे आपले सर्वस्व मागे सोडून हिंदुस्थानात आसरा शोधत आले असल्याने अशी कारवाई करणे योग्य ठरले नसते म्हणून आजपर्यंत त्यांच्यावर कोणतीही कारवाई झालेली नव्हती. आता नागरिकत्व कायद्यातील २०१९ मधील सुधारणांमुळे अशा बेकायदेशीर स्थलांतराच्या आरोपांमधून संबंधित अल्पसंख्यानकांची सुटका होणार आहे.

या कायद्यासंदर्भात पसरवण्यात आलेले गैरसमज आणि सरकार विरोधातील राजकीय पक्षांनी घेतलेले आक्षेप

- हा कायदा म्हणजे मुस्लिमांना मुख्य प्रावाहातून बाजुला सारण्याचा प्रयत्न आहे; नागरिकत्व दुरुस्ती कायदा २०१९ अन्वये भारतीय मुस्लिम लोकांना देशाबाहेर काढले जाणार आहे.

- नागरिकत्व दुरुस्ती कायदा २०१९ अन्वये भारतीय मुस्लिम लोकांची स्थावर जंगम मालमत्ता सरकार जमा होणार आहे.

- या कायद्यामुळे प्रत्येक नागरिकाला समानतेचा अधिकार देणाऱ्या कलम १४चं उल्लंघन होते आहे. भारतासारख्या धर्मनिरपेक्ष राष्ट्रात कुणालाही धार्मिक निकषांवरून नागरिकत्व कसं मिळू शकतं, असा सवाल विरोधक करत आहेत.


पसरवण्यात आलेले गैरसमज आणि घेतलेले आक्षेप यावरील उत्तरे

- भारतीय मुस्लिमांना नागरिकत्व नोंदणी किंवा नागरिकत्व सुधारणा कायद्याला घाबरण्याची गरज नाही. कारण हा कायदा कोणत्याही भारतीय नागरिकाचे (मग तो कोणत्याही धर्माचा असो) नागरिकत्व किंवा त्यांच्या नावाने असलेली त्यांची मालमत्ता रद्द करणार नाही आहे.तर तो पाकिस्तान, अफगाणिस्थान आणि बांगलादेश येथून धार्मिक प्रतारणेअंतर्गत आलेल्यांना नारिकत्व देण्याचा कायदा आहे.
- राज्यघटनेतील कलम १४ किंवा अन्य कोणतीही तरतूद ही भारताच्या नागरिकांसाठी आहे. समानतेच्या तत्वावर पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेश येथील मुस्लिम धर्मियांना भारतीय राज्यघटनेचा आधार घेता येणार नाही. तसेच एखाद्या बाबीनुसार वर्गीकरण करण्याची तरतूद भारतीय घटनेमध्येअसून त्यानुसारच 'धार्मिक प्रतारणा' हे वर्गीकरण घटना विरोधी ठरत नाही.

नागरिक सुधारणा कायदा २०१९ लागू झाल्यानंतर राजकीय असुरक्षितता मनात निर्माण झालेल्या राजकीय पक्षांकडून एक नवीनच आरोप आजच्या केंद्र सरकारवर केला जातो आहे. 'हे सरकार भारताला हिंदुराष्ट्र करीत आहे'. या आरोपाचे खंडन करताना हिंदुस्तानाच्या भौगोलिक, ऐतिहासिक आणि पौराणिक परंपरेचा विचार करणे जरुरीचे आहे.

हिंदुस्तान हा १९४७ सालच्या फाळणी नंतर निर्माण झालेला देश नसून एक खूप मोठा इतिहास आणि पौराणिक परंपरा लाभलेला सार्वभौम देश आहे. आताचे 'पाकिस्तान' आणि 'बांगलादेश' हे मूळचे हिंदूस्थानाचाच भाग होते. या सार्वभौमिक देशामध्ये धार्मिक विचार न करता विविध प्रदेशात सर्वच धर्माचे लोक राहात होते. त्यामुळे ते या सार्वभौमिक हिंदुस्तानाचे नागरिक होते. मात्र १९४७ मध्ये धर्माच्या आधारावर हिंदुस्तानाचे दोन तुकडे करण्यात आले. पाकिस्तान 'मुस्लिम धर्मियांचा' देश म्हणून घोषित झाला. पुढे पाकिस्तानचे दोन तुकडे होऊन 'बांगलादेश' हा अजून एक 'मुस्लिम धर्मीय' देश निर्माण झाला. १९४७ च्या अगोदरपासून जे मुस्लिम धर्माव्यतिरिक्तच्या धर्माचे लोक आताच्या 'पाकिस्तान' किंवा 'बांगलादेश' येथे अनेक पिढ्या राहात होते; त्यांनी त्यावेळी फाळणी झाल्यानंतर देखील 'पाकिस्तान' किंवा 'बांगलादेश' येथेच राहाण्याचा निर्णय घेतला. मात्र या लोकांना पुढील काळामध्ये धार्मिक प्रतारणा झाल्यास आताच्या हिंदुस्थानात कायमचे स्थलांतर करावे असे वाटले; तर त्यांचे हिंदुस्थानात स्वागत असेल असे स्वतः महात्मा गांधी यांनी आश्वासन दिले होते. अर्थात दोन्ही देशामधील अल्पसंख्यांकांची धार्मिक प्रतारणा होऊ नये म्हणून पाकिस्तान आणि हिंदुस्थान यांच्या तात्कालिक पंतप्रधानांमध्ये एक करार करण्यात आला जो नेहेरू-लियाकत करार १९५० म्हणून ओळखला जातो. याअन्वये दोन्ही देशांनी आपल्या देशातील अल्पसंख्यांकांची काळजी घेणे क्रमप्राप्त होते. मात्र जर या अल्पसंख्यांकांना धार्मिक असुरक्षितता वाटली किंवा त्यांची धार्मिक प्रतारणा झाली तर पूर्वीच्या एकसंघ हिंदुस्थानाचा नागरिक म्हणून त्यांना या देशाचे नागरिकत्व दिले जाणार होते.

कदाचित इथे एक मुद्दा उपस्थित होऊ शकतो की १९४७ पूर्वीच्या एकसंघ भारतातील मुस्लिम देखील त्यावेळच्या सार्वभौमिक भारताचे नागरिक होते. येथे समजून घेतले पाहिजे की मुळात नागरिकत्व सुधारणा कायदा हा अल्पसंख्यांक लोकांसाठी आहे. पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेश हे तीनही देश 'मुस्लिम धर्मीय' देश असल्याने येथे राहणारे मुस्लिम लोक हे अल्पसंख्यांक होत नाहीत. यावर वैचारिक गोंधळ असणाऱ्या काही लोकांकडून असे म्हंटले जाते आहे की मुस्लिम धर्मामधील काही पोट जाती आहेत; या पोट जातींमधील मुस्लिम लोकांना त्यांच्याच देशांमध्ये खूप त्रास सहन करावा लागतो आहे. याविषयी एक लक्षात घेतले पाहिजे की मुळात ते लोक मुस्लिमच आहेत. त्यामुळे त्यांनी त्यांच्या अधिकारासाठी तेथे राहून लढा देणे अपेक्षित आहे. (उदाहरणार्थ: एकाच घरातील दोन भावांमध्ये भांडण झाले आणि त्यातील एक भाऊ शेजारील घरात जाऊन राहण्याचा हट्ट करू लागला तर ते जसे अयोग्य ठरते; तद्वतच पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेश येथील पोट जातींमधील लोकांना होणाऱ्या त्रासाकडे बघणे आवश्यक आहे.) तरीही येथे नमूद करणे आवश्यक आहे की; याच कायद्यामधील अन्य तरतुदींआंतर्गत पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेश मधील मुस्लिम धर्मीय लोकांना अर्ज करून त्याद्वारे योग्य प्रक्रिये आंतर्गत भारताचे नागरिकत्व घेता येते. आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांचे सरकार असताना देखील याच प्रक्रियेद्वारे काही हजार मुस्लिम धर्मियांना नागरिकत्व दिले गेले आहे.
आपण हे देखील समजून घेतले पाहिजे की पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेश येथील अल्पसंख्यानकांना हिंदुस्तानात का यावेसे वाटत आहे?! ज्यावेळी १९४७ ची फाळणी झाली त्यावेळी हिंदुस्थानामध्ये मुस्लिम धर्मियांची संख्या केवळ २/३ टक्के होती. मात्र आता हीच संख्या जवळ जवळ १९ टक्के म्हणजे (द्वितीय बहुसंख्यांक धर्मीय) इतकी झाली आहे. याउलट पाकिस्तान किंवा बांगलादेश येथील हिंदू, शीख, पारशी, जैन, बौद्ध आणि ख्रिश्चन धर्मियांची संख्या काही शे इतकी कमी झाली आहे. त्या देशांमधील अल्पसंख्यांकांची लोकसंख्या कमी होण्याचे कारण म्हणजे एकतर त्यांचे धर्म परिवर्तन करून त्यांना मुस्लिम धर्म स्वीकारण्यास भाग पाडले गेले किंवा ज्यांनी धर्म परिवर्तनास नकार दिला त्यांची कत्तल करण्यात आली. या देशांमधील या अल्पसंख्यानकांचा छळ धर्माच्या नावावर झाला. ज्यावेळी त्यांच्यावरील अत्याचार हे त्यांच्या घरातील स्त्रियांवरच्या अत्याचाराचे स्वरूप घेऊ लागले त्यावेळी या अल्पसंख्यानकांना हिंदुस्थान हा देश आधारस्तंभ वाटल्यास त्यात गैर ते काय?

अजून एक मुद्दा खूप महत्वाचा ठरतो; तो म्हणजे या लोकांना हिंदुस्तानच आधारस्तंभ का वाटावा? एकतर संपूर्ण विश्वभरात 'हिंदू धर्मियांसाठी' आपला देश असा केवळ हिंदुस्तान आहे. हिंदुस्तान 'धर्मनिरपेक्ष देश' आहे. धर्मनिरपेक्षता म्हणजे काय हे देखील समजून घेणे आवश्यक आहे. मुळात हिंदू धर्मामध्ये 'सर्व धर्म समभाव' हा विचार अग्रणी आहे. आदरणीय प्रधानमंत्री श्री नरेंद्रजी मोदी यांनी कायमच देशांतर्गत किंवा विदेशामध्ये हिंदुस्तानाविषयी बोलताना हिंदू धर्मातील आद्य विचार 'वसुधैव कुटुंबकम्' (संपूर्ण वसुधा (पृथ्वी) म्हणजे एक कुटुंब आहे) बोलून दाखवला आहे. म्हणजेच हिंदू धर्माच्या विचार परंपरेचा आरसा 'धर्मनिरपेक्षता' होतो; हे स्पष्ट आहे. त्यामुळे राजकीय असुरक्षितता मनात निर्माण झालेल्या राजकीय पक्षांकडून जो आरोप होतो की 'हे सरकार भारताला हिंदुराष्ट्र करीत आहे'. तर त्यांनी हे समजून घेतले पाहिजे की मूलतः भारत हा हिंदू धर्म विचारांचाच तर आहे; म्हणूनच तो 'धर्मनिरपेक्ष' देश आहे.

वरील सर्व मुद्दे वाचल्यानंतर कदाचित आपल्या मनात प्रश्न उभा राहिला असेल की वर नमूद सर्वच मुद्दे हे सहज समजून येण्यासारखे आहेत. तरीही CAA विरोधातील हे सततचे आंदोलन का? त्यासाठी हे समजून घेतले पाहिजे की या आंदोलनकर्त्यांमध्ये दोन घटक आहेत. एक जहाल मुस्लिमवादी आणि दुसरे हे केवळ मोदींजींचा विरोध करणारे त्यांचे राजकीय स्पर्धक आहेत. या दोन्ही घटकांना नागरिकत्व सुधारणा कायदा २०१९ मधील तरतुदी कशासाठी आहेत हे संपूर्णपणे माहीत आहे. मात्र तरीही आपापला अजेंडा राबवण्यासाठी ते या कायद्याला विरोध करीत आहेत. या आंदोलकांकडून 'आझादी'; 'आझाद काश्मीर' यासारख्या घोषणा दिल्या जात आहेत. तर या आंदोलकांचे संचलन करणाऱ्या किंवा त्यांच्या समोर भाषण देणाऱ्या नेत्यांकडून मुलाखतींदरम्यान 'कलम ३७० हटवले गेले' आणि 'राममंदिर बाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय'; या विरोधातील राग व्यक्त होत आहे असे सांगितले जाते आहे. यातून हे स्पष्ट होत आहे की हा विरोध नागरिकत्व सुधारणा कायद्याला नसून या निमित्ताने सरकार विरुद्ध राग व्यक्त केला जात आहे.

इथे एक महत्वाचा मुद्दा नमूद करणे आवश्यक आहे; आजच्या नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात बोलणाऱ्या काँग्रेस आणि डाव्या पक्षांनी देखील नागरिकत्व कायद्याची मागणी यापूर्वी अनेकदा केलेली आहे. त्यामुळे आताचा हा विरोध आणि भारतीय मुस्लिमांचा आलेला पुळका म्हणजे केवळ ढोंगीपणा आहे हे सिद्ध होते. या केवळ 'विरोधासाठी विरोध' करणाऱ्या राजकीय नेत्यांचे एकच उद्दिष्ट आहे की सर्व अनायासे मुस्लिम धर्मीय रस्त्यावर उतरले आहेत तर त्याचा उपयोग करून घेऊन प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्या विरोधात संपूर्ण देशभरात अस्वीकार आहे असे वातावरण निर्माण करणे.

आपण सर्वांनीच या देशविरोधी वैचारिक तत्वांचा विरोध केला पाहिजे आणि आपले समर्थन CAA ला म्हणजेच नागरिकत्व सुधारणा कायदा २०१९ आहे हे नमूद केले पाहिजे. खाली नमूद नंबरवर missed call करून आपण आपले समर्थन नोंदवू शकता.

नंबर आहे: 88662 88662 / ८८६६२ ८८६६२