Friday, December 27, 2019

एक निर्णय (भाग 2)


एक निर्णय


भाग २

सर्व उत्तम मार्क्सनी पास झाले. मिनाक्षीने यावर्षी पहिला क्रमांक पटकावला होता. पण प्रशांतने ते मात्र सहज स्वीकारलं. पण मग मात्र तो मुद्दाम सर्व शिक्षकांना जाऊन भेटला. तो कुठे कमी पडतो आहे का, अस त्याने प्रत्येक शिक्षकाला विचारल. मग मराठीच्या काणे बाईनी त्याला समजावलं;"प्रशांत, तू हुशार आहेस आणि कुठेही कमी पडलेला नाहीस. पण एक लक्षात घे. तू फक्त अभ्यास एके अभ्यास अशा स्वभावाचा नाही आहेस. तू शाळेत होणाऱ्या प्रत्येक स्पर्धेत आणि कार्यक्रमात भाग घेतोस. त्याचा थोडा परिणाम कदाचित पुढे अभ्यासावर होईल. तुला पुढे काय करायच आहे त्याचा विचार कर बघू. आणि महत्वाच म्हणजे १०वी मध्ये फक्त अभ्यासावर लक्ष ठेव. त्याप्रमाणे प्रत्येक शिक्षकांना भेटून बोलून घे." प्रशांतला बाईंच म्हणण पटल. पण फक्त अभ्यास एके अभ्यास त्याला कितपत जमेल याविषयी त्यालाच खात्री नव्हती.

 10वी चे वर्ष आहे म्हंटल्यावर; सुट्टीत कसा आणि कोणता अभ्यास करावा याविषयी शिक्षकानी मार्गदर्शन कराव अशी विध्यार्थ्यांनी प्रत्येकाला गळ घातली. गणित, इंग्रजी आणि सायन्स विषय थोडे जड जातील हे लक्षात येऊन प्रशांतने सुट्टीत ही अडलेले प्रश्न विचारण्यासाठी घरी येण्याची परवानगी शिक्षकांकडून घेऊन ठेवली.

सुट्टी सुरु झाली आणि बघता बघता संपली. शाळा सुरु झाली. पहिल्या महिन्याच प्रशांतने सुट्टीत केलेल्या अभ्यासाचा उत्तम परिणाम त्याच्या एकूण वर्गातल्या प्रश्नोत्तराच्या तासाला वर दिसू लागला. शिक्षकांनी कौतुक केल. मीनाक्षीदेखिल जोरदार अभ्यासाला लागलेली दिसत होती. कारण वर्गात घेतल्या जाणाऱ्या परीक्षांमध्ये दोघांनाही उत्तम गुण मिळत होते.

दहावीचे वर्ष असल्याने घरच्यानी आणि शिक्षकांनी एक्स्ट्रा क्लास्सेस आणि जास्तीचा अभ्यास सुरु करायला लावला. दोघे हुशार होते. त्यामुळे शाळेच्या दोघांकडून खूप अपेक्षा होत्या. दोघेही शाळेचे नाव बोर्डात झळकवतील  याची शिक्षकांना खात्री होती. त्यामुळे शिक्षक मुद्धाम दोघानाही घरी बोलावायला लागले अभ्यासासाठी; आणि प्रशांत आणि मिनाक्षीचे एकमेकांबरोबर रहाणे वाढले. इतर एक दोन विद्यार्थी देखील होते; पण हुशार आणि शिक्षकांचे सर्वात लाडके हे दोघे होते. अभ्यासाची चर्चा, पेपर्स एकत्र सोडवण सुरु झाल. जसजस त्याचं बरोबर राहाण वाढल तस त्या दोघाना जास्त चिडवण वाढल. काही ना काही कांडया पिकवल्या जायच्या. या चिडवण्याचा परिणाम असा झाला की प्रशांत आणि मीनाक्षी एकमेकांसोबत असताना थोड़े अस्वास्थ राहायला लागले. प्रशांतला ते चिड़वण आवाडायच. पण मिनाक्षीच्या मनात काय आहे आणि ती नक्की का अस्वथ होते आहे ते मात्र त्याच्या लक्षात येत नव्हत. कधीतरी शेवटी हा विषय मुख्यधापकांपर्यंत गेला. मग मात्र त्यांनी या दोघानाही बोलावून घेतले आणि हे असे विचार या वयात कसे चुकीचे आहेत आणि अभ्यास करियर याचा विचार करणे कसे योग्य आहे; हे समजावले.

मात्र याचा परिणाम असा झाला की आजवर इतर मुले चिड़वायची आणि प्रशांत-मीनाक्षी एकमेकांना आणि स्वतःला देखील सांभाळून घ्यायचे. पण याविषयी ते एकमेकांशी काही बोलले नव्हते; त्याला वाचा फुटली. पण शाळेत याविषयावर बोलणे शक्य नव्हते. म्हणून मग प्रशांतनेच मिनाक्षीला विचारले;"आपण शाळेनंतर भेटायचे का?" आश्चर्य  म्हणजे ती ही तयार झाली.

हे अस कोणालाही न सांगता बाहेर भेटण्याची कल्पना दोघांसाठी खूपच वेगळी होती. सायन्सचे सर मिनाक्षीच्या घराजवळच राहायचे. त्यांच्या तिथल्या एका लस्सीवाल्याजवळ पाच वाजता भेटायचे ठरले. प्रशांतने आईला मस्का मारून लस्सीसाठीचे पैसे मिळवले. आज मित्र भेटणार आहेत. कदाचित् जाऊ. अस सांगून पैसे मिळवले होते. पण त्याला त्या खोट बोलण्यातही थ्रिल वाटल होत.

संध्याकाळची वाट दोघेही बघत होते. त्यांना दोघानाही हे असे भेटणे म्हणजे खूप काही वेगळे वाटत होते.  थोड्स ऑक्वर्ड वाटण.. थोड़ी भिती... आणि खूपशी excitment अस एकूण मनात घेऊन बरोबर पाच वाजता दोघेही लस्सीवाल्याजवळ भेटले.

"हाय" प्रशांत हसून म्हणाला.

"हाय" कोणी ओळखीच दिसत नाही ना याचा अंदाज घेत तिच उत्तर.

"लस्सी पिणार?" प्रशांत.

"छे छे... नको. आई रागावेल. मी पैसे पण नाही आणलेत." मीनाक्षी.

"अग... माझ्याकडे आहेत. हाफ हाफ घेऊ. तेवढे पैसे आहेत नक्की." प्रशांत म्हणाला आणि ती हसली. दोघांनी लस्सी घेतली.

विषयाला सुरुवात करण आवश्यक होत; पण बोलणार कोण? आणि काय? साधारण 1985/86 चा काळ. आज-कालच्या मुलांसारखा बोल्डनेस् त्यावेळी ना मुलांमधे होता ना मुलींमधे. पण काळ कोणताही असला तरी भावना सारख्याच असतात ना!

शेवटी मिनाक्षीनेच सुरुवात केली."प्रशांत... तुला काय वाटत.... आपल्याला प्रिंसिपल मॅडम जे म्हणाल्या त्याबद्दल?"

"काय वाटायच?" प्रशांत एकदम क्लीन बोल्ड झाला होता. 'काय वाटत' म्हणजे मीनाक्षीबद्दल? की प्रेम या विषयाबद्दल? की मित्र चिडवतात त्याबद्दल? हिला नक्की काय म्हणायच आहे?

"अरे हेच की या चिडवण्याचा आणि आपण एकत्र असण्याचा करियरवर परिणाम होतो का खरच?" मीनाक्षी स्वतःच्या तंद्रित होती.

प्रशांतची परत पंचाईत... आता हिच्या या प्रश्नाचा काय अर्थ काढायचा? तो वैतागला. 'नक्की काय आहे हिच्या मनात? कायम का ही मला गोंधळवून टाकून पुढे निघायच्या तयारीत असल्यासारखी असते.'

प्रशांतने तिची तंद्री तोडली. "मीनाक्षी तुला नक्की काय म्हणायच आहे ते सांगशील का मला?" त्याने तिला विचारले.

"प्रिंसिपल जे म्हणाल्या त्याचा विचार करते आहे रे सारखा. अस इतरानी चिडवण्याचा आणि आपण अभ्यासाच्या निमित्ताने का होईना पण एकत्र असण्याचा परिणाम आपल्या करियरवर होत असेल का?" मीनाक्षी परत तेच म्हणाली.

प्रशांतने मनातल्या मनात कपाळावर हात मारून घेतला. 'म्हणजे काय चिडवल जात आहे यापेक्षा चिडवतात त्याचा परिणाम करियरवर होतो का... याची हिला चिंता आहे तर.... म्हणजे तिला विषयात इंटरेस्ट नाही त्याच्या परिणामात आहे! धत्...' प्रशांत वैतागला.

"अग अजुन आपल करियर ठरायला खूप वेळ आहे अस नाही का वाटत तुला? सध्या हे सगळे काय चिडवतात त्याचा विचार नाही करत का तू?" त्याने तिला विचारले.

"अस कस म्हणतोस? माझ मी नक्की ठरवल आहे की मला डॉक्टर व्हायच आहे. आणि अजुन आपण एकमेकाना नीट ओळखत पण नाही. मग या चिडवण्याचा विचार काय करायचा? अजुन शाळेतच आहोत आपण. बर, पुढे कोणत करियर तू निवाडशील...  ते काहीच माहीत नाही.. एकच कॉमन धागा म्हणजे आपण दोघे अभ्यासात सारखे आहोत. उगाच चिडवतात नाही का?" मीनाक्षी म्हणाली.

'ओह्... म्हणजे तिला एकूण या विषयात इंटरेस्ट नाही आहे तर..' प्रशांतच्या मनात आल. हे लक्षात आल्यावर तो थोड़ा हिरमुसला. आपल्याला नक्की वाईट कशाच वाटत आहे ते मात्र त्याच्या लक्षात नव्हत आल. तो थोडावेळ काहीच बोलला नाही. ती पण शांत बसली होती. त्याने अचानक विचारल, "मीनाक्षी तुला मी आवडतो का? म्हणजे तुला माझ्याबद्दल नक्की काय वाटत?"

मीनाक्षी पुरती गड़बड़ली.. अचानक अनपेक्षित प्रश्न प्रशांतने तिला विचारला होता. तिने त्याच्याकडे क्षणभर बघितले. म्हणाली,"तू न मला थोड़ा गोंधळलेला वाटतोस. सारखा अस्वस्थ असतोस... पण तरीही आवडत मला तुझ्याबरोबर; कारण तू माझ ऐकतोस." तिने हसत तिचे प्राजळ मत दिले होते. तिच शेवटच वाक्य प्रशांतला सुखावून गेल. किंबहुना तेवढच त्याला एकु आल. तो ख़ुशीत आला. "खर म्हणजे मलासुद्धा तुझ्याबरोबर खूप आवडत ग. पण तस कोणाला दाखवता येत नाही. उगाच सगळे तुला त्रास देतील न म्हणून." तो म्हणाला.

"अरे तुला का वाटत त्याचा मला त्रास होईल?" मिनाक्षीने भुवया उंचावून विचारले.

प्रशांतकडे तिच्या प्रश्नाचे उत्तर नव्हते.खर तर त्याला खूप काही दुसरेच बोलायचे होते.पण सुरुवात कशी करावी कळत नव्हते.

शेवटी त्याने हिम्मत केली आणि म्हणाला,"मीनाक्षी तू ना मला खूप आवाड़तेस. म्हणजे.... ना.. सगळे जे चिडवतात ना तशी आवड़तेस."

आता मात्र मिनाक्षीच्या डोक्यात प्रकाश पडला. ती एकदम गडबडली... थोड़ी लाजली... अवघडली... तिच्या 'आवाड़तोस मला' चा तिच्या मते असा अर्थ होता की एकत्र असताना तिला अभ्यास करायला आवडत. पण प्रशांतने मनातल बोलून दाखवल आणि तिची गड़बड़ उडाली. प्रशांतला तिची उडालेली गड़बड़ बघुन थोड़ी गम्मत वाटली.

"अरे हे अस? एकदम?" ती थोड़ लाजुन.. थोड़ हसत... म्हणाली.

"एकदम नाही ग. मनात होत बरेच दिवस. पण कधी सांगू शकलो नाही. आणि आता सांगायच कारण म्हणजे माझ्या मनात काय आहे ते तुझ्यापर्यन्त पोहोचवाव आणि हे देखिल सांगाव की तू विचार कर... घाई नाही. आपण 10वि च्या पारिक्षेनंतर परत बोलू. ठिक आहे न?" प्रशांत म्हणाला. तिने हलकेच हसत मान खाली घातली आणि हळूच "हो" म्हणाली. दोघे उठले आणि एकमेकांना बाय म्हणून निघाले.

एक एक महीना सरकत होता आणि दोघेही अभ्यासाच्या मागे लागले होते. एक वेगळाच समजूतदार धागा त्यांच्यात तयार झाला होता. एकत्र अभ्यास चांगला होत होता. प्रिलिम झाली... मुख्य परीक्षा झाली आणि 3 महिन्यांची मोठी सुट्टी सुरु झाली. त्या काळात सुट्टीमधे भेटणे तसे जमत नसे. त्यामुळे दोघे एकदाच भेटले.

"तू पुढे काय ठरवल आहेस?" मिनाक्षीचा प्रश्न.

"काही नक्की नाही ग. तू?" प्रशांत.

"मी सायन्स. रुहियातुन 12वि. आणि मग डॉक्टर" मीनाक्षी.

"हो. तू म्हणाली होतीस. मी अजुन विचार करतो आहे. तस C.A. चांगला ऑप्शन आहे. म्हणजे इतर स्पर्धांमधून भाग घेता येतो. इंजिनीअरिंग देखील बर आहे. पण अभ्यासाच्या बरच मागे लागावं लागत त्यात. तस डॉक्टर होण्यातही काही प्रॉब्लम नाही. अभ्यास करायचा म्हंटल की इंजिनियर काय आणि डॉक्टर काय? कॉलेज मात्र अस हव की जिथे इतर गोष्टी पण असतील. मला ना कॉलेजमधून नाटकात भाग घ्यायची इच्छा आहे. आणि असच काही करायच आहे." आणि मग क्षणभर थांबत हसत प्रशांत म्हणाला;"खर तर माझ नक्की काहीच ठरलेलं नाही".

"अरे तू तर सगळच् करायच म्हणतो आहेस." मीनाक्षी हसत म्हणाली. त्यावर प्रशांत खळखळून हसला.

"सुट्टीचा काय प्लॅन? मी गावाला जाणार दोन महीने. जून मधे येईन. रिजल्ट च्या अगोदर." प्रशांत म्हणाला.

"मी पण नाशिकला आजीकड़े जाणार. मग अकरावीच्या सुट्टीत नाही न जाता येणार. बारावीची तयारी असेल न. चल अच्छा. आपण जूनमधे भेटु रिझल्टच्या वेळी. जमल तर फॉर्म्स एकत्र आणुया कॉलेजचा. माझा फोन नंबर आहे न तुझ्याकडे? फोन कर ह आलास की." मीनाक्षी म्हणाली आणि बाय म्हणून दोघे निघाले.

जून उगवला. रिजल्ट लागला. दोघेही उत्तम मार्क्सनी पास झाले होते. दोघेही बोर्डात आले होते. मीनाक्षी सहावी आणि प्रशांत आठवा. प्रशांतला गणितात फुल मार्क्स होते आणि मीनाक्षी सायन्स आणि संस्कृत मधे टॉपवर होती.

मिनाक्षीच कॉलेज नक्की होत. प्रशांतने पण फारसा विचार न करता त्याच कॉलेजला एडमिशन घेतली. आत्ता तर सायन्स घेऊ; मग बघू पुढच पुढे... त्याने मनात ठरवल. त्याला खरच मीनाक्षी खूप आवडायची. त्यामुळे मिनाक्षीच्या सोबत राहायच एवढच् त्याने ठरवले होते. त्यात रुहीयामधून अनेक स्पर्धांमध्ये भाग घेण त्याला शक्य होत. त्याने ती माहिती देखील काढली होती. हळूहळू दोघांची मैत्री कॉलेजमधे चांगलीच माहितीची झाली होती. दहावी मधे जे चिडवण होत आणि त्यावरून ते दोघे भेटले होते त्याला आता बरेच महिने होऊन गेले होते. तरीही 'आपण एकत्र आहोत,' हे दोघांनी सहज स्विकारल होत. प्रशांत शाळेप्रमाणे कॉलेजमधे देखिल सांस्कृतिक विभागात खूपच रमायचा. शाळेत असताना ज्याप्रमाणे नाटकं.. वक्तृत्व... वाद-विवाद यात भाग घ्यायचा तसाच तो कॉलेजमधे देखिल सगळ्या कार्याकारामात भाग घ्यायला लागला होता. कॉलेजसाठी ट्रोफिज जिंकत होता. त्यामुळे त्याचा मित्र परिवार मोठा व्हायला लागला होता. प्रशांत मुळात दिसायला छान होता. आता कॉलेजच पाणी लागल्यावर अजूनच स्मार्ट वाटायला लागला होता. त्यामुळे फ़क्त मित्र असे नाही तर अनेक मूली त्याच्या मैत्रिणी झाल्या होत्या. त्याच्या व्यक्तिमत्वात् एक आकर्षण होते... प्रशांत हसरा, मोकळ्या स्वभावाचा आणि मुख्य म्हणजे अभ्यासाव्यतिरिक्त इतर विषयात जास्त रमणारा होता. त्यामुळे एकदा जर कोणी त्याचे दोस्त झाले तर ते कायमचेच. त्याचा मित्र-मैत्रिणींचा परिवार संपूर्ण कॉलेजभर पसरलेला होता.  मात्र मिनाक्षीने कॉलेजमधे आल्यावर ठरवून फ़क्त अभ्यासाकडे लक्ष दिल. पण आता प्रशांतच्या नविन मैत्रिणींकडे तिच लक्ष असायच आणि तो कोणा कोणाशी बोलतो, किती बोलतो यावर देखिल.

ती प्रशांतची काळजी देखिल घ्यायची. त्याच खाण पीण... त्याची लायब्ररीची पुस्तक बदलण... आणि मुख्य म्हणजे त्याच्या मागे लागण अभ्यासासाठी. कारण तो जरी खूप हुशार असला तरी त्याचा सांस्कृतिक विभागाकडे वाढता कल तिच्या लक्षात आला होता. तिच्या मते 'हे अवांतर तर ठिक आहे, पण अभ्यास आणि उत्तम शिक्षणावर आधारित करियर जास्त महत्वाच् होत.'

मीनाक्षी तशी थोड़ी शिष्ठ होती. त्यात तिचा मूळ इंटरेस्ट अभ्यासात होता. पूर्ण फोकस डॉक्टर बनण्यावर होता. त्यामुळे तिने तर त्यादोघांच्या अभ्यासाची जणू जवाबदारीच् घेतली होती. प्रशांतही तिच ऐकायचा. ती म्हणेल तसा अभ्यास करायचा. एकपाठी असल्याने त्याला अभ्यास करणे जड़ जात नसे. त्याच फळ दोघानाही मिळाल. बारावीमधे दोघानाही उत्तम मार्क्स मिळाले. प्रशांतने तस स्वतः काहीच ठरवले नव्हते. मग मिनाक्षीनेच दोघांसाठी निर्णय घेतला.

दोघांनी ही M. B. B. S. व्हायच ठरवल. तसे दोघांच्याही घरचे सुशिक्षित आणि आर्थिक दृष्टीने उत्तम होते. त्यामुळे डॉक्टरी करीयर दोघानी निवडल तरी कोणालाही घरून विरोध होण्याचा प्रश्नच नव्हता.

मात्र प्रशांतला पीसीएम मधेदेखील उत्तम मार्क्स होते. त्यामुळे त्याच्या वडिलांनी त्याला एकदा फ़क्त विचारले,"बेटा तुला नक्की डॉक्टर व्हायचे आहे न? इंजिनिअरिग नाही न करणार? तुझ्या मनात C.A. करण्याच् देखिल होत. बघ... तुझी निवड आम्हाला मान्य आहे. आपला काही कुठला बिज़नस नाही. माझी नोकरी आहे. त्यामुळे तुझ तू काहीही ठरवलस तरी चालेल. आमचा काहीच आग्रह नाही."

"बाबा, मी आणि मीनाक्षी दोघेही एकाच कॉलेजला एडमिशन घेतो आहोत. दोघांनाही डॉक्टर व्हायचे आहे. मिनाक्षीच देखिल तेच मत आहे." प्रशांत म्हणाला. त्यावार मात्र मग प्रशांतच्या आई-वडिलांनी काहीच म्हंटले नाही.

एडमिशन झाली आणि कॉलेज सुरु झाले. शाळेपासूनचा टॉप करण्याचा ट्रेंड प्रशांत आणि मिनाक्षीने इथे देखिल कायम ठेवला; आणि इथे देखिल प्रशांतने आपली सांस्कृतिक आवड चालु ठेवली होतीच्. अकरावी बारावी प्रमाणे इथे देखिल त्याने नाटकं  आणि इतर कल्चरल गोष्टीना महत्व दिले होते. मिनाक्षीने दोघांच्या अभ्यासाची बाजू सांभाळली होती.  एकत्र  शिक्षण... कॉमन मित्र मैत्रिणी... त्यामुळे मजा- मस्ती चालु असायची. परिक्षेच्या मोसमात मात्र कधी रुसवे-फुगवे... कधी अबोला.. कधी समजूत घालणे... हे व्हायचेच. कारण मिनाक्षीचा आग्रह असायचा फ़क्त अभ्यास करुया आणि प्रशांत तिला चुकवून इतर गोष्टी करायचाच. त्याची देखिल दोघाना आता सवय झाली होती. त्यातच कॉलेज लाइफ कधी संपले दोघानाही समजलेच नाही. दोघेही M. B. B. S. झाले आणि पुढे M. D. प्रशांत ओर्थोपेडिक सर्जन आणि मीनाक्षी गायनेकोलॉजिस्ट.

आतापर्यंत त्याचं एकत्र असण त्यांच्या अंगवळणीच पडल होत. आणि एकूणच सर्वानी मान्य देखील केल होत.... स्विकारल होत. त्यामुळे जेव्हा त्यांनी लग्न करण्याचा निर्णय सांगितला तेव्हा काही फ़ार चर्चा न होता तो स्विकारला गेला आणि मीनाक्षी-प्रशांत दोघेही लग्न बंधनात स्वखुशीने अडकले. मीनाक्षी नेरुरकर ही मीनाक्षी नेरुरकर प्रधान झाली. आणि तिने आग्रहाने असच नाव लावलं. त्यावेळी अस नाव लावण्याची प्रथा फारशी रूढ नव्हती. तरीही त्यालाही प्रशांतने कधी नाही म्हंटल नाही. त्याला त्यात काही वावग देखील वाटल नाही. मीनाक्षीने मंगळसूत्र घालायला देखील नकार दिला आणि तो देखील त्याने सहज स्वीकारला होत. मुळात मीनाक्षी जो निर्णय घ्यायची तो निर्णय प्रशांत बिनविरोध मान्य करायचा. ती सवयच लागली होती त्याला... आणि कधाचित मीनाक्षीला देखील.


क्रमशः
==================================================

Friday, December 20, 2019

एक निर्णय (कथा)


एक निर्णय

भाग १

हॉलच्या दाराच्या एका बाजूला प्रशांत अस्वस्थपणे उभा होता. शाळेच्या वर्गाचं गेटटूगेदर करण्याच ठरलं तेव्हा बिझी असूनही प्रशांतने वेळ काढला होता आणि एकूण हे गेटटूगेदर घडवून आणण्यासाठी खूप मेहेनत केली होती. त्याला फक्त एकच कारण होत. जे फक्त त्याच्या मनालाच माहित होतं.............................

अचानक सुनिलने; त्याच्या शाळेतल्या खास दोस्ताने टोकलं. "आली ती... बघ.. बघ... साल्या हाक तर मार..." आणि प्रशांतची तंद्री तुटली.....

समोरून मीनाक्षी येत होती. जवळ-जवळ 12 वर्षानंतर प्रशांत तिला बघत होता. ती खरच समोरून येते आहे याची त्याला खात्री नव्हती. पण ती तिच होती... तशीच शांत... फक्त डोळ्यांवर चष्मा होता. बाकी काहीच फरक नव्हता. मुद्दाम लवकर येऊन तिची वाट बघणाऱ्या प्रशांतला ती दिसताच मात्र गोंधळल्यासारख झाल होतं.

"आली ती... बघ.. बघ... साल्या हाक तर मार..." सुन्याच तेच ते वाक्य....... चोवीस वर्षांपूर्वीच!

आणि त्याच्याही नकळत प्रशांत आठवीच्या वर्गात पोहोचला.....

शाळेचा दुसरा किंवा तिसराच दिवस होता. चेहेरा कोरा ठेवण्याचा प्रयत्न करत प्रशांतने पाठ फिरवली. डोळ्याच्या कोप-यातून लक्ष मात्र शाळेच्या गेटकड़े होत. मीनाक्षी.. नविन विद्यार्थिनी. 'आठवी अ' मद्धे आली होती. फ़क्त सुनिल... प्रशांत... नाही तर अख्खा वर्ग तिच्या मागावर होता. अगदी मुलिसुद्धा. सगळ्यांची अगदी हमरीतुमरीवर येत 'पहिला मी; पहिली मी' म्हणत माहिती काढून झाली होती.

मीनाक्षी नेरूरकर. नाशिकहुन इथे आली होती. तिच्या शाळेतील सर्वात हुशार विद्यार्थिनी. एक लहान भाऊ. आपल्याच शाळेत पाचवी मधे. मिनाक्षीचा गोल मोहक चेहेरा. मोठे चॉकलेटी डोळे. बॉब कट. मानेला झटका देऊन ते उडवायची सवय.... आणि पराकोटीची शिष्ठ!

शाळेतला सर्वात हुशार विद्यार्थी प्रशांत प्रधान. सर्वसाधारणपणे 'हुशार विद्यार्थी हेच सर्व गुण संपन्न असतात'; या सार्वत्रिक शालेय समजाप्रमाणे सर्व स्पर्धांमधुन, शाळेच्या वार्षिक सम्मेलनातून प्रशांतलाच भाग घेण्यास मिळत असे आणि तो त्यात चमकतही असे. त्यामुळे तो सर्व गुण संपन्न आहे हे त्याने सिद्ध देखील केले होते. गोरा गोमटा, स्मार्ट प्रशांत सर्व शिक्षकांचा लाडका होता. तो एक उत्तम वक्ता होता. नाटकं, वाद-विवाद स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, कथा कथन आणि वाचन अशा अनेक स्पर्धां मधून त्याने शाळेला कायम रिप्रेजेंट केले होते आणि अनेक ट्रॉफिज देखील मिळवल्या होत्या.

मात्र आता त्याच्या साम्राज्याला मिनाक्षीच्या रूपाने आव्हान उभे राहिले होते. कारण काही दिवसातच मोहक, स्मार्ट आणि हुशार मिनाक्षीने शिक्षकांचे लक्ष वेधुन घेतले होते. प्रशांत मनातून थोडा नाराज आणि थोडा धास्तावलेला होता. नाशिक सारख्या शाहरातून मुंबईमधे येउनही मीनाक्षी कधी गोंधळलेली किंवा बावचळलेली दिसली नाही. हळूहळू तिने प्रशांतला टक्कर द्यायला सुरवात केली; आणि साधारण त्या वयात जे होत तेच सुरु झाल. त्या दोघाना इतर मूल एकमेकांवरुन चिड़वायला लागली.

प्रशांतचा बेस्ट दोस्त सुनिल याने तर प्रशांतला हे पटवूनही दिल की तुम्ही दोघे हुशार... स्मार्ट वगैरे वगैरे आहात ... शिक्षकांचे लडके आहात... स्पर्धांमधुन भाग घेणारे आहात तर मग तुमची जोड़ी मस्त जमेल. त्या वयातली अक्कल तेवढीच् असते; त्याप्रमाणे सुनिलने प्रशांतला चढ़वले. मात्र त्याचा एक फायदा असा झाला की मीनाक्षी आणि प्रशांत एकमेकांचे शत्रु  होण्याएवजी मित्र झाले. तिच्या मनात काय चालायचे ते प्रशांतला माहीत नव्हते; पण एकूण त्याला मात्र आवडायचे ते मित्रांचे चिडवणे आणि त्याची मीनाक्षी बरोबर झालेली मैत्री देखिल.

हळू हळू दोघांच्या गप्पा वाढल्या, अभ्यासावरील चर्चा वाढल्या, एकत्र स्पर्धांना जाणे वाढले..... आणि मग या सर्वाचा परिपाक म्हणजे .... इतरांचे त्यांना दोघाना चिड़वणे वाढले.

"अरे कमाल करता. अस काही नाही आमच्यात. काल तिचा निबंध राहिला म्हणून ती विचारत होती; इतकेच." किंवा "त्याला सायन्स जमत नव्हतं  ग म्हणून आम्ही मधल्या सुट्टीत बसलो होतो... उगाच नको ते अर्थ काढू नकोस" अस दोघेही आपापल्या परीने मित्र मैत्रिणीना सांगत होते.

आठवी पास होऊन सर्व नववीमधे आले. प्रशांत पहिला आणि मीनाक्षी दूसरी. फ़क्त दीड मार्क्सचा फरक दोघात. शिक्षकांनी दोघांचही कौतुक केल. पण मीनाक्षीचा चेहेरा थोडा खट्टू झाला होता. मीनाक्षी अभ्यासाच्या बाबतीत जिद्दी आहे; हे प्रशांतने ओळखले होते. पण त्याचा स्वतः वर विश्वास होता.

"मिनाक्षी थोड़ हस्ताक्षर सुधार; बघ प्रशांतच्या पुढे जाशिल." शिक्षाकानी मिनाक्षीला सल्ला दिला. तिने तो बहुतेक मनावर घेतला होता. कारण नववी सुरु झाली आणि खरच मिनाक्षीचे हस्ताक्षर सुधारले आहे हे प्रशांतच्या लक्षात आले. त्याचा परिणाम तिच्या मार्क्स वाढण्यावर झाला. मीनाक्षी खुशीत होती.

त्यावर्षीच्या वार्षिक सम्मेलनाला नाटक होते. प्रशांत सिलेक्शनच्या वेळी नव्हता. पण त्याला वाटले नेहमी प्रमाणे तो असणारच. नाटकाच्या प्रैक्टिसच्या वेळी त्याला कळले तो नाही आहे नाटकात. मीनाक्षी आहे महत्वाच्या रोलमधे. का कुणास ठाऊक त्याला ते आवडले नाही. जिद्दिने त्याने एका डान्समधे भाग घेतला. त्या वर्षी पाहिले बक्षीस प्रशांतच्या डान्सला मिळाले. तो खुश झाला. अभ्यासा व्यतिरिक्तच्या गोष्टींमध्ये त्याच्या पुढे कोणी असलेल त्याला फारस आवाडत नसे.

(क्रमशः)

Friday, December 13, 2019

कुमारी मैत्री विश्वास आठवणी


आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात असं वळण येतं की जेव्हा आपल्याला आपले ते अवखळ दिवस... आपली जुनी निखळ मैत्री आठवते... मात्र त्या आठवणी देखील मनातल्या मानत आळवायला आपल्याला वेळ नसतो. प्रत्येकाच्या आयुष्यातल्या त्या खास वळणाबद्दल काहीसं या कवितेतून लिहायचा प्रयत्न केला आहे....

कुमारी मैत्री विश्वास आठवणी


एकदा एका वळणावर जुनी मैत्री भेटली
आठवणी घेउन थांब ना... ऐक ना... हट्ट धरून बसली

ऑफिसची वेळ; नव-याचा डबा...
पोरांची शाळा; बॉसचा चेहरा..
आठवलं क्षणात सारं; अन् पाठ केली तिच्याकड़े...
थोड़ी हिरमुसली-थोड़ीशी फुगली...
निघून गेली दुसरीकडे...
जाणवलं तिचं हिरामुसण फुगणं...
पण वेळ नव्हता मला... मनात होत ऑफिसला वेळेत पोहोचणं!

संध्याकाळी परत ट्रेनच्या डब्यात दिसली..
ओळख दाखवू की नको... या कनफ्युजनमधे होती;
मी हसले... तशी ती पण हसली...
पटकन् जवळ येउन कुशीत शिरली!

'कळतं ग मला तुझ्या असण्याचं महत्व...
सुटत नाही पण हे संसाराच देण'
तिला मिठीत घेउन मी मनातचं म्हंटलं;
स्टेशन आलं म्हणून स्वतःला आवरलं.

ती हसली ... समजूतदार आहे पट्ठी
तिच हो ती...
कुमारी मैत्री विश्वास आठवणी!


Friday, December 6, 2019

तो (गूढ कथा) (भाग 2 शेवटचा)


तो (भाग २)

काकु पडल्या पडल्या विचार करत होत्या,'अशोकचlचं बिचाऱ्याचं कसं होत असेल? नोकरी सांभाळून आजारी बायकोला देखील जपतो आहे. त्यात त्याच्यासाठी हे नवीन आणि थोडं आड बाजुचं गाव. या दोघांना तर शहराची सवय. मी म्हंटल देखील त्याला एकदा की इथे अशा आड गावी बदली का घेतलीस? तुम्ही शहरात राहाणारी मुलं इथे कसं व्हायचं तुमचं? तर म्हणाला संध्याला समुद्र आवडतो. मुंबईला देखील त्याचं घर जुन्या वाडीत पण समुद्राच्या जवळ होतं. तो तिला आणि त्यांच्या लेकीला रोज न्यायचा म्हणे समुद्रावर. पण मग ते तसं झालं आणि संध्या पार गप होऊन गेली. तिने म्हणे घरातून बाहेर पडणंच बंद करून टाकलं. अशोकच्या आईशी देखील तिच चांगलं पटायचं. त्यामुळे ही अशी गप्प झालेली त्यांनाच बघवल नाही आणि त्याच म्हणल्या तू बदली मागून घे. जागा बदलली की संध्या जुन्या आठवणी विसरेल. अशोकने जेव्हा बदलीचा विषय काढला तेव्हा संध्याने ते मान्य केलं; मात्र एकाच अटीवर की तिला समुद्रापासून लांब जायचं नव्हतं. तिची अट त्याने मान्य केली आणि म्हणूनच या शांत गावात अशोकने बदली करून घेतली होती. पण दैव तरी कस असतं आपल्या घरातला झोपाळा त्या बिचाऱ्या संध्याच्या परत जुन्या दुखऱ्या आठवणी जागवतो.' विचार करता करता काकूंना झोप लागली.

सगळ काम आवरून काशी 'निघते' म्हणून सांगायला काकूंच्या खोलीत गेली. पण त्यांना झोप लागलेली बघून तशीच हलक्या पावलांनी बाहेर आली. तिने खोलीचं दार ओढून घेतलं आणि ती तिच्या घरी जायला निघाली. बाहेर ओट्यावर झोपाळ्याजवळून पुढे जाताना तिच लक्ष सहजच अशोकच्या घराच्या दिशेने गेलं. खिडकीचा पडदा वाऱ्याने फडफडत होता. 'पडद्याच्या मागे कोणीतरी उभं आहे की काय?' काशीच्या मनात विचार आला. पण तिला थांबायला वेळ नव्हता. त्यामुळे मनातला विचार झटकून देऊन ती भराभर पावलं उचलून तिच्या घराकडे निघाली.

अलीकडे अशोक जोशी काका आणि काकूंना टाळायला लागला होता. कधीही भेटलं की ती दोघं संध्याची चौकशी करायची. अशोकच्या होणाऱ्या ओढाताणीबद्दल हळहळ व्यक्त करायची. त्यांच्या हळहळीच्या मागची त्यांची प्रामाणिक काळजी त्याला कळायची. पण तो तरी काय करणार होता? काका-काकूंनी कितीही आग्रह केला तरी अजूनही तो संध्याला त्यांच्या घरी घेऊन गेला नव्हता. खरं तर ते त्याच्या हातात नव्हतं. अर्थात त्याने तस काका काकूंना सांगितलं होतं आणि त्या दोघांना पटलं देखील होतं. पण तरीही त्यांच्या डोळ्यातले ते 'बिच्चारा अशोक' भाव बघायला त्याला आवडत नव्हतं.

मात्र एक दिवस अशोकला ऑफिसमधून यायला बराच वेळ झाला. त्यादिवशी अंधार झाला तरी त्याच्या घरातला एकही दिवा लागलेला नव्हता. काकूंनी ही गोष्ट काकांच्या लक्षात आणून दिली. दोघांनाही काळजी वाटायला लागली संध्याची. काकूंच्या डोळ्यात तर पाणी आलं. त्या काकांना म्हणल्या,"आपली मनु त्या संध्या एवढीच असेल ना हो? जर मनु अडचणीत असती किंवा तिच्या बाबतीत असं काही झालं असत तर आपण असंच 'आपला काय संबंध;' असा विचार करून स्वस्थ बसलो असतो का?" काकूंच्या बोलण्याने काका देखील अस्वस्थ झाले आणि म्हणाले, "उगाच संध्याकाळच्या वेळी अस अशुभ बोलू नका तुम्ही. आपली मनु छान मजेत आहे तिच्या सासरी." तशी काकांजवळ जात आवाज चढवून काकू म्हणल्या,"उगाच विषयला बगल देऊ नका. एकतर त्या अशोकला फोन करा नाहीतर ही मी चालले त्याच्या घरी. त्या संध्याने दार उघडलं नाही तर कोणाला तरी बोलावून तोडून घेईन... समजलं? हे तुमच्यासारखं स्वस्थ बसून काय घडतं आहे ते पाहाणं आता मला असह्य होतं आहे." काकूंचा तो अवतार बघून काका जागेवरून उठले आणि म्हणाले,"बरं, तुम्ही उगाच रागावू नका. मी बघतो जाऊन काय झालं आहे ते."

अस म्हणून काका अशोकच्या घराच्या दिशेने निघाले. काकू देखील त्यांच्या मागून हातात टोर्च घेऊन निघाल्या. काकांनी घराजवळ येऊन गेट जोरात उघडलं. त्याचा मोठा आवाज झाला. त्या आवाजाने काकू दचकल्या. काकांना तसंही कमी ऐकायला यायचं. त्यामुळे ते शांत होते. दोघेही क्षण-दोन क्षण गेट जवळ थांबले. घरात काही हालचाल होते आहे का याचा अंदाज घेत. पण घरात काहीच हालचाल जाणवली नाही. म्हणून मग दोघेही आवारात शिरले आणि घराच्या दिशेने गेले. व्हरंड्यातला दिवा चालू होता. पण आत घरात कोणतीही जाग जाणवत नव्हती. काकांनी एकदा काकूंकडे बघितलं आणि दाराची बेल वाजवली. बेल वाजली नाही. पण ते काकांच्या लक्षात आल नाही. काकूंच्या मात्र आलं. त्यामुळे त्यांनी काकांना म्हंटल,"अहो! बेल वाजत नाही वाटतं. वीज गेली असेल का?" त्यावर काका मोठ्याने हसले आणि म्हणाले,"अग वीज नसती तर हा व्हरंड्यातला दिवा कसा लागला असता? तू म्हणजे ना काहीही बोलतेस. त्या संध्याने दाराची बेल बंद करून ठेवली असेल. कोणी वाजावालीच तर तिला त्रास नको म्हणून." काकूंना ते पटलं. "मग आता काय करायचं?" त्यांनी नकळून काकांना विचारलं. काका म्हणाले."हाक मारून बघू आपण तिला. आजवर तिने आपल्याला टाळलं आहे. आपणही कधी तिने भेटावं असा आग्रह नाही धरलेला. पण आज अजून अशोक आलेला नाही आणि तिने दिवा देखील लावलेला नाही. त्यामुळे आपण आता जर तिला हाक मारली तर ती ते समजू शकेल." काकूंना देखील ते पटलं आणि त्या संध्याला हाका मारायला लागल्या. मात्र घरातून काही उत्तर येत नव्हतं. आता काकूंना काळजी वाटायला लागली. त्या काकांना म्हणल्या,"तुम्ही इथेच उभे राहा. तिने दार उघडलं आणि कोणी दिसलं नाही तर ती गोंधळेल. मी घराला चक्कर मारून येते." अस म्हणून काकांना काही बोलायचा अवधी न देता हातातली टोर्च लावून त्या व्हरांड्यातून खाली उतरल्या.

काकूंनी घरला फेरी मारायला सुरवात केली आणि त्याच बरोबर संध्याला हाका मारायचा सपाटा लावला. त्या मागच्या दाराकडे आल्या आणि अचानक समोरून अशोकला धावत येताना बघून त्या दचकल्या. अशोक त्यांच्या जवळ आला आणि ओठांवर बोट ठेवत म्हणाला,"काकू ओरडू नका... ओरडू नका..." आणि काकूंना काही कळायच्या आत त्यांना जवळ जवळ ओढतच पुढच्या दाराशी घेऊन आला. काका पुढच्या दाराशी पायरीवर बसले होते. काकांना असं बसलेलं बघून काकू पुरत्या गोंधळल्या. त्यांनी प्रश्नार्थक नजरेने अशोककडे बघितलं. अशोक अगदी हलक्या आवाजात काकूंना म्हणाला,"काकू त्या घटनेला आजच वर्ष झालं हो. म्हणून तर मी आज जाणारच नव्हतो. पण ऑफिसमधून फोन आला की एक खूप महत्वाच काम आहे. म्हणून मी गेलो. लवकर येणार होतो माझ्या संध्या राणीजवळ. पण कामाच्या रगाड्यात किती वाजले त्याचं भानच राहिलं नाही." त्याच बोलण ऐकून काकू चुकचुकल्या आणि म्हणल्या,"वाटलचं मला घरात एकही दिवा लागलेला नाही म्हंटल्यावर. संध्या अस्वस्थ असेल. बरं दार उघड बघू. मी येते तुझ्याबरोबर आत. ती बिचारी एकटी बसली आहे अंधारात. तिला आधाराची गरज आहे." असं म्हणून त्या व्हरांड्याच्या पायऱ्या चढायला लागल्या. त्याबरोबर त्यांना अडवत अशोक म्हणाला,"काकू तुम्ही नका येऊ आत. आता मी आलोय. मी सांभाळीन तिला." काकूंना त्याने हे असं अडवलेलं नाही आवडलं. त्याचा हात सारत त्या म्हणल्या,"अशोक, माझी लेक अनु देखील साधारण तुझ्या संध्याच्याच वयाची आहे. जर अनुला काही त्रास झाला तर मी तिला अस एकटं सोडीन का?" त्यावर निकराने काकूंना अडवत अशोक म्हणाला,"काकू, मी तुमची काळजी समजू शकतो. पण तरीही तुम्ही नका येऊ आत्ता. कृपा करून जा तुम्ही दोघे इथून. आत्ता मला आणि माझ्या बायकोला एकट रहायचं आहे."

त्याने स्पष्ट शब्दात जायला सांगितलेलं एकून काकूंना अपमानापेक्षा देखील खूप वाईट वाटलं. त्यांच्या मते संध्या देखील एक स्त्री होती. आणि काकूंना तिच्या मनाची घालमेल कळत होती. त्यांना हे कळत नव्हतं की अशोकला कोणत्या शब्दात समजवाव की आत्ता त्या मुलीला एका स्त्रीच्या आधाराची गरज जास्त असेल. त्यांनी परत काहीतरी बोलायला तोंड उघडलं पण तेवढ्यात काका उभे राहिले आणि त्यांनी काकूंचा हात धरला. काकूंनी काकांकडे आश्चर्याने बघितलं. तशी डोळ्यानेच समजूत घालून काका काकूंना घेऊन सावकाश चालत अशोकच्या घराच्या आवारातून बाहेर पडले.

काकांनी आपल्या घरी येऊन झोपाळ्यावर बसले आणि मग काकूंचा हात सोडला. काकू अजूनही अस्वस्थ होत्या. त्यांनी वळून अशोकच्या घराकडे बघितलं. संपूर्ण घरातले दिवे लागलेले होते. हळुवार आवाजात कोणतं तरी गाणं देखील लागलं होतं. त्यांनी नजर बारीक करून बघितलं तर त्यांच्या घराच्या बाजूच्या खिडकीत कोणीतरी उभं होतं असा त्यांना भास झाला. मात्र काही एक न बोलता त्या त्यांच्या घरात गेल्या.

काकू काहीही बोलत नव्हत्या. त्यांनी देवासमोर दिवा लावला आणि मनोमन त्याच्याकडे हात जोडून संध्याची खुशाली मागितली. मग त्या स्वयंपाकाला लागलेल्या काकांनी बघितलं आणि ते शांतपणे झोपाळ्यावर झोके घेत बसले. त्यांनी एकदाही अशोकच्या घराकडे वळून बघितलं नव्हतं.

काकू शांत वाटत असल्या तरी त्या मनातून मात्र अस्वस्थ होत्या. अशोक ज्या प्रकारे त्यांना घरात जाण्यासाठी अडवत होता त्यावरून आता त्यांच्या मनात एका शंकेने जागा घेतली होती. 'कदाचित् संध्याला हा अशोकच अडवत असेल आपल्याला भेटण्यापासून. तिला मारत असेल का तो? पण मग तिच्याबद्दल बोलताना किती हळवा होतो तो. नक्की काय प्रकार आहे हा?' काकूंच्या मनातले प्रश्नांच आवर्तन संपतच नव्हतं.

काकूंनी स्वयंपाक उरकला आणि जेवायची पानं घेऊन त्या काकांना बोलवायला बाहेर आल्या. काका अजूनही झोपाळ्यावर बसून हलके हलके झोके घेत होते. मात्र त्यांचे डोळे मिटलेले होते. ते ताठ बसले होते आणि त्यांनी हाताची घडी घातली होती. काका काहीतरी खोल विचार करत आहेत हे काकूंच्या लक्षात आलं. खरं तर काकांना त्यांच्या तंद्रीतून जागं करायचं काकूंच्या जीवावर आलं होतं. पण जेवायची वेळ झाली होती. त्यामुळे काकूंनी मऊ आवाजात काकांना साद घातली. "अहो!" काकांनी डोळे उघडून काकूंकडे बघितलं. "जेवायची वेळ झाली आहे. येताय ना?" काकूंनी काकांना विचारलं. काकांचा चेहेरा गंभीर दिसत होता. त्यांनी होकारार्थी मान हलवली आणि झोके घेण्याचे थांबवून ते उभे राहिले. काकांना उभं राहिलेलं बघून काकू आत जाण्यासाठी वळल्या. तशी काकांनी काकूंना हाक मारली. "होय ग! ऐक." काकूंनी वळून काकांकडे प्रश्नार्थक नजरेने बघितलं. "मी जरा जाऊन येतो. अगदी पंधरा मिनिटात आलोच. माझं ताट पालथ घालून ठेव." असं अचानक काका बाहेर जायला निघाल्याचं बघून काकू गोंधळल्या. त्या पुढे आल्या आणि म्हणल्या,"अहो आता कुठे जाता इतक्या अंधाराचं? माझ्या मनात देखील काही शंका उभ्या राहिल्या आहेत. बहुतेक हा अशोकच त्या संध्याला बाहेर पडू देत नाही किंवा कोणालाही भेटू देत नाही; असं मला वाटतं. पण आत्ता तुम्ही आणि मी काय करणार? आपण दोघेही म्हातारे आहोत. तुम्ही आता त्याच्याकडे जाल आणि तो जर अंगावर धावून आला तर काय कराल? बरं, या वेळेला कोणाची मदत मागायला जायचं तर त्यांना सगळं प्रकरण समजावून सांगाव लागेल. त्यात बराच वेळ जाईल आणि अजून रात्र चढेल. तेव्हा जे करायचं ते उद्या सकाळी करू. आजची एक रात्र जाऊ दे."
काकुंचं बोलणं ऐकून काका काकूंच्या जवळ आले आणि म्हणाले,"मी त्या अशोककडे जात नाही किंवा अजून कोणाकडे मदतीसाठी जात नाही. मला काहीतरी दुसरं सुचलं आहे. जमलं तर ते काम करून येतो. हा गेलो आणि हा आलो. तू माझी काळजी करू नकोस. आणि काहीही झालं तरी त्या घराकडे फिरकू नकोस. अशोक किंवा त्याची बायको कोणीतरी आपल्यावर लक्ष ठेऊन आहे. मी तिथून आल्यापासून इथेच झोपाळ्यावर बसलो आहे. त्यामुळे मला त्यांची नजर जाणवते आहे." असं म्हणून काका घरात जायला वळले. त्यांना घरात जाताना बघून मात्र काकू पुरत्या गोंधळून गेल्या. त्यांच्या नकळत त्यांची नजर एकवार अशोकच्या घराकडे गेलीच. त्यांना देखील जाणवलं की खिडकीच्या पडद्याआडून कोणीतरी त्यांच्याकडेच बघत होतं. काकू काहीश्या अस्वस्थ झाल्या आणि काकांच्या मागून घरात जात त्यांनी दार लावून घेतलं.

घरात येताच मात्र त्यांनी काकांना विचारलं,"अहो, तुम्ही तर म्हणालात की बाहेर जाऊन येता आहात. मग घरात का आलात? विचार बदललात की काय; ते लोकं आपल्यावर नजर ठेवून आहे हे बघून?" काकू आता थोड्या घाबरल्या होत्या. काकांनी बाहेर घालायच्या सपाता हातात घेतल्या आणि ते परस दाराकडे निघाले. काकू काही न कळून त्यांच्या मागे जायला लागल्या. काका मागे वळून म्हणाले,"हे बघ. मी मागच्या दारातून बाहेर पडतो आहे. त्या अशोकला कळायला नको म्हणून. तू माझी काळजी अजिबात करू नकोस. येताना कोणालातरी सोबत आणेन मी. एकटा येणार नाही. तू मात्र दार लावून घे आतून. अजून एक काम कर. थोड्या वेळाने स्वयंपाकघर सोडून बाकी सगळीकडचे दिवे मालवून टाक. आपण रोज झोपायला जाताना जसे मालावतो तसे. मघा जे झालं त्यामुळे आपण अस्वस्थ आहोत किंवा काहीतरी करणार आहोत याची त्यांना शंका देखील आली नाही पाहिजे. बरं येऊ?" काका हे असं सगळं गूढ का बोलत होते ते काकूंना कळेनासं झालं होतं. पण त्यांचा काकांवर विश्वास होता. त्यामुळे त्यांनी 'हो' म्हणून मान हलवली आणि काका मागच्या दाराने बाहेर पडताच त्यांनी दार घट्ट लावून घेतलं.

जेमतेम पाच मिनिटं झाली नसतील पण काकूंना आता खूपच अस्वस्थ वाटायला लागलं होतं. त्यांनी देवासमोर उदबत्ती लावली आणि मोठ्याने रामरक्षा म्हणायला सुरवात केली. आपलाच आवाज एकून त्यांना थोडा धीर आला. अजून थोडा वेळ गेला आणि त्यांना आठवलं की काकांनी सांगितलं होतं की घरातले सगळे दिवे मालवून टाक. म्हणून मग त्या उठल्या आणि बाहेरच्या खोलीकडे आल्या. दिवा मालवायच्या अगोदर नकळत त्या दरवाज्याच्या शेजारच्या खिडकीकडे आल्या आणि त्यांनी अशोकच्या घराकडे नजर टाकली. त्यांना वावग असं काही वाटलं नाही. घरात दिवे चालू होते. बाहेरच्या खोलीतला पंखा देखील चालू असलेला त्यांना दिसला. एक सुस्कारा सोडून त्या आत वळणार तेवढ्यात त्यांची नजर त्यांच्या घराच्या फाटकाकडे गेली आणि काकू कमालीच्या दचकल्या. फाटकाला धरून अशोक उभा होता. तो टक लावून काकूंकडेच बघत होता. काकूंची आणि अशोकची नजरा-नजर झाली मात्र विजेचा धक्का बसल्यासारखा अशोक दचकला. त्याची नजर क्षणभरासाठी काकूंवरुन ढळली. त्याबरोबर स्वतःला सावरत काकूंनी खिडकी लावून घेतली आणि रामरक्षा मोठ्याने म्हणत दिवा मालवून त्या देवासमोर जाऊन बसल्या. देवासमोर बसून देखील त्या सारख्या बाहेरच्या दाराचा कानोसा घेत होत्या. अशोक येऊन दार वाजवेल की काय ही भिती त्यांच्या मनात सारखी डोकावत होती. बराच वेळ झाला. पण अशोकने दार वाजवलं नाही. हळूहळू काकू देखील शांत झाल्या. आता त्या चातकासारखी काकांची वाट बघत होत्या. त्यांच्या मनात भीती दाटून आली होती आणि त्याचवेळी त्यांना काकांची काळजी वाटत होती.

असाच काही वेळ गेला आणि मागच्या दाराकडे कोणाचीतरी पावलं वाजल्याचं काकूंच्या लक्षात आलं. पण देवासामोरून उठून मागच्या दाराकडे जाण्याच धैर्य त्यांना होत नव्हतं. काही क्षणातच त्यांना काकांनी हलक्या आवाजात मारलेली हाक ऐकू आली. "होय ग! झोपलीस का? मी आलोय. दार उघड बघू मागंचं." काकांचा आवाज ऐकताच काकूंच्या अंगात शंभर हत्तींचं बळ आलं. त्या त्यांच्या वयाला शोभणार नाही अशा चपळतेने उठल्या आणि त्यांनी मागचं दार उघडलं. दारात काका आणि भानू शेट उभे होते. काकूंनी दार उघडताच काका भानू शेटना म्हणाले,"या शेटजी. जेवूनच जा आता. आम्ही जेवायला बसणार आहोत." काकांचा आवाज अगदीच सौम्य आणि साधा होता. त्यात अजिबात ताण नव्हता. मात्र ते फारच हळू बोलत होते. काकांचा मोकळा आवाज एकून काकूंना एकदम मोकळ मोकळं वाटलं. काकूंनी शेटजींकडे हसून बघितलं आणि आत येण्याची खूण केली. त्यावर हसत हसत शेटजी तशाच हळू आवाजात म्हणाले,"काका, उद्या येतोच आहे मी. तुम्ही जेवून आराम करा आता. काकू येतो मी. काळजी करू नका. सगळ ठीक होईल." असं म्हणून शेटजी आले तसेच मागच्या दारातूनच निघून गेले.

काका घरात आले आणि हात पाय धुवून जेवायला बसले. काकूंनी त्याचं पान वाढलं. मात्र त्यांनी स्वतःच पान घेतलं नव्हतं; ते पाहून काकांनी विचरलं,"का ग? तुझ पान घे की वाढून." काकू म्हणल्या,"नको. इच्छा नाही मला." त्यावर काकांनी हलकेच त्यांच्या खांद्यावर थोपटलं. त्याबरोबर काकूंच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. काकांनी त्यांना थोडावेळ रडू दिलं. भर ओसरल्यावर काकूंनी आपणहून अशोकला फाटकाजवळ बघितलेलं काकांना सांगितलं. त्यावर गंभीर होत काका म्हणाले,"बरं. मला वाटलंच होतं तो आपला अंदाज घ्यायला येईल. तू त्याला काही बोलली नाहीस ना?" काकूंनी नकारार्थी मान हलवली आणि म्हणल्या,"त्याची नजर ढळताच मला कुठून तरी बळ आलं आणि मी मागे फिरले आणि खोलीचा दिवा मालवून देवासमोर येऊन बसले. काकांनी समाधानाने मान हलवली. मग त्यांनी आग्रहपूर्वक काकूंना देखील जेवायला लावलं. काका कुठे गेले होते ते काकूंना समजून घ्यायचं होतं. पण आता त्यांच्या मनाला अजून ताण सहन झाला नसता; याची त्यांना पूर्ण कल्पना होती. त्यामुळे उद्या सकाळी काय ते विचारू असा विचार करून काकूंनी स्वयंपाकघरातली आवरा-आवर केली आणि त्या आतल्या खोलीत जाऊन काकांच्या शेजारी आडव्या झाल्या.

काकूंना पाहाटेच नेहेमीप्रमाणे जाग आली. सवयीने त्या बाहेरच्या खोलीत आल्या आणि मुख्य दरवाजा उघडायला गेल्या. पण बंद असलेली खिडकी बघून त्यांना आदल्या रात्रीच्या सगळ्या घटना डोळ्यासमोर उभ्या राहिल्या आणि दार न उघडताच त्या तशाच उभ्या राहिल्या. काका देखील उठून काकूंच्या मागोमाग बाहेरच्या खोलीत आले होते. त्यांनी काकूंना दाराजवळच उभं राहिलेलं बघितलं आणि त्यांच्या जवळ जात त्यांनी दार उघडलं. काकूंना कळेना की कालच्या त्या प्रकारानंतर काका इतके निवांत कसे राहू शकतात? काका बाहेर जाऊन झोपाळ्यावर बसले होते. काकू देखील त्यांच्या मागोमाग बाहेर आल्या. आता मात्र इच्छा असूनही त्यांनी अशोकच्या घराकडे बघायचे टाळले. मात्र काकांच्या डोळ्यात थेट बघत त्यांनी काकांना विचारलं,"का हो? काल जे काही झालं त्यानंतर देखील तुम्ही इतके निवांत कसे? तुम्हाला वाटत नाही का आपण पोलिसांकडे गेलं पाहिजे?" त्यावर काकांनी शांत नजरेने काकूंकडे बघितलं आणि ते म्हणाले,"धीर धर. सगळ निट होईल. मात्र आता तू इथे उभं राहू नकोस. नेहेमीप्रमाणे कामाला लाग बघू." काकूंना काही केल्या काकांचं वागणं कळत नव्हतं. मात्र त्यांचा त्यांच्या नवऱ्यावर पूर्ण विश्वास होता. त्यामुळे अजून काही न बोलता त्या त्यांच्या रोजच्या कामाला लागल्या.

साधारण नऊ-साडे नऊचा सुमार असेल; काका अंघोळ उरकून नेहेमीप्रमाणे देवासमोर बसून पूजा करत होते. काकू त्यांना चंदन उगाळून देत होत्या. अचानक एक गाडी त्यांच्या दारासमोर थांबल्याचा आवाज आला. तो आवाज ऐकून कधी नव्हे ते काका पूजा अर्धवट टाकून बाहेर धावले. काकांच्या मागून काकूदेखील बाहेर आल्या. बाहेर दारात एक जीप उभी होती. त्यातून भानू शेट उतरले. त्यांच्या मागोमाग काकूंच्या वयाचीच एक बाई बाहेर आली. तिच्या सोबत अजूनही एक गृहस्थ होते. त्यांना बघून काका फाटकाकडे गेले. काकूंना हे काय चालू आहे ते कळेना. मात्र थोडसं बोलणं झालं आणि ते सगळेजण अशोकच्या घराच्या दिशेने चालायला लागले. मग मात्र न राहून काकू देखील त्यांच्या मागून अशोकच्या घराकडे गेल्या. सर्वात पुढे ते बाहेरून आलेले गृहस्थ होते. त्यांच्या मागे त्या अनोळखी महिला आणि मग शेटजी आणि काका-काकू.

त्या गृहस्थांनी पुढे होऊन अशोकच्या घराची बेल वाजवली. बेलचा आवाज बाहेरपर्यंत ऐकू आला. तो आवाज ऐकताच काकूंना कमालीचं आश्चर्य वाटलं. कारण आदल्या दिवशी संध्याकाळी जेव्हा त्या आणि काका आले होते आणि त्यांनी बेल वाजवली होती तेव्हा मात्र बेल वाजली नव्हती. काकू काहीतरी बोलणार होत्या. पण तेवढ्यात आतून दरवाजा उघडल्याचा आवाज आला आणि त्या गप झाल्या. दारात अशोक उभा होता. त्याने क्षणभर दारात उभ्या असलेल्या गृहस्थांकडे बघितलं आणि त्याची नजर मागे उभ्या असलेल्या त्या स्त्रीकडे गेली. त्यादोघांना पहाताच अशोकच्या कपाळावर असणाऱ्या आठ्यांचं जाळं नाहीसं झालं. बाकी सर्वांकडे दुर्लक्ष करत त्याने त्या स्त्रीचा हात हातात घेतला आणि म्हणाला,"आई, तू कधी आलीस? अगं, किती जोरात बेल वाजवलीस? संध्या अजून झोपली आहे गं. जाग येईल ना तिला." तो हे बोलतंच होता तेवढ्यात त्याची नजर शेटजी आणि त्यांच्या बरोबर उभ्या असलेल्या काका आणि काकूंकडे गेली. त्याबरोबर अशोकला आश्चर्य वाटलेलं दिसलं. तो शेटजीकडे वळून म्हणाला,"भानू शेटजी तुम्ही इकडे कोणीकडे सकाळीच? आणि काका-काकू तुम्ही देखील सकाळीच कसे आलात. बरं, ओळख करून देतो ही माझी आई. आई, हे जोशी काका आणि या जोशी काकू. मला आणि संध्याला अगदी घरच्या सारखं वागवतात हो. इतक्या वेळा त्यांनी आम्हाला जेवायला बोलावलं आहे." एवढ बोलून अशोक थांबला. काकूंना आश्चर्य वाटत होतं ते एकाच गोष्टीचं की काल संध्याकाळी घडलेल्या प्रसंगाची एकही खूण अशोकच्या चेहेऱ्यावर किंवा वागण्या-बोलण्यात दिसत नव्हती.

त्या सगळ्यांकडे एक कटाक्ष टाकून अशोक परत एकदा त्याच्या आईकडे वळला आणि म्हणाला,"बर, ते जाऊ दे. तू अशी अचानक कशी काय आलीस ते सांग बघू." अशोकच्या आईने त्याचा हात हातात घेतला आणि म्हणल्या,"सगळे प्रश्न इथे दारातच विचारणार आहेस का अशोक? मला आत नाही का येऊ देणार?" त्यावर अशोक एकदम अस्वस्थ झाला आणि म्हणाला,"अग, संध्या झोपली आहे आत. तिला रात्रभर झोप नव्हती ग. कालच वर्ष झालं ना त्या प्रसंगाला. त्यामुळे तिला स्वस्थ झोप नव्हती. आत्ता पहाटे डोळा लागला आहे तिचा." त्यावर त्याच्या हाताला थोपटत त्याची आई म्हणाली,"बरं, मग आपण हळू आवाजात बोलू. पण आत तर जाऊ या." अशोक त्यावर एकदम मागे होत म्हणाला,"तू एकटीच ये. या सगळ्यांना जायला सांग." तशी त्या अशोकच्या खांद्याला थोपटत म्हणल्या,"अशोक कोणीही आवाज करणार नाही याची खात्री मी देते. पण ते सगळेच आत येणार आहेत." अशोकच्या आईच्या आवाजात खंबीरपणा होता. त्यामुळे अशोक काही न बोलता मागे वळला आणि घरात शिरला. त्याच्या पाठोपाठ अशोकची आई, ते नवीन आलेले गृहस्थ, भानू शेटजी, काका आणि काकू सगळेच आत गेले आणि सोफ्यावर बसले. अशोकची नजर मात्र सारखी आतल्या खोलीकडे वाळत होती.

आत जाताच अशोकला त्याच्या आईने बरोबर आलेल्या गृहस्थांच्या सामोरं करून विचारलं,"अशोक, यांना तू ओळखतोस ना?" त्यांच्याकडे बघून न बघितल्यासारखं करत अशोक एकदम उठून उभा राहिला आणि म्हणाला,"मी जरा आत जाऊन संध्या जागी झाली आहे का बघून येतो." त्याने असं म्हणताच काकूंची उत्सुकता ताणली गेली. आता तरी आपण संध्याला बघू शकू या विचाराने त्या सावरून बसल्या. मात्र उभ्या राहिलेल्या अशोकला एका रिकाम्या खुर्चीमध्ये बसवत ते आलेले गृहस्थ म्हणाले,"अशोक, माझ्याकडे बघ बघू." अशोक मात्र त्यांच्याकडे बघायला तयार नव्हता. एखाद्या हट्टी मुलाप्रमाणे तो नजर खाली करून बसला होता. त्या गृहस्थांनी अशोकच्या दोन्ही खांद्याला धरलं आणि म्हणाले,"अशोक, संध्या आत नाही आहे." त्यांनी असं म्हणताक्षणी मात्र अशोक उफाळून उठला आणि त्यांना ढकलत तो आतल्या खोलीकडे धावला. धावताना तो ओरडत होता,"आई, तू माझी आई आहेस की वैरीण? का आणलस तू यांना इथे? संध्या आहे.... इथे आहे... या खोलीत ती झोपली आहे. जा तुम्ही सगळे जा इथून. मला आणि संध्याला जगू द्या."

अशोकच्या या अशा अचानक ओरडत धावण्यामुळे काका, काकू आणि भानू शेटजी गोंधळून गेले. अशोकची आई मात्र शांत होती. त्यांच्या बरोबर आलेले गृहस्थ चपळतेने पुढे झाले आणि त्यांनी अशोकला चटकन धरून खाली पाडले. कोणालाही कळायच्या अगोदरच त्यांनी अशोकला इंजेक्शन दिले. काही क्षण अशोकने धडपड केली. मग मात्र तो शांत झाला. त्याला झोप लागली होती. त्या गृहस्थांनी शेटजींच्या मदतीने अशोकला आतल्या खोलीत नेऊन झोपवले.

एकूण चाललेला प्रकार काका आणि काकूंच्या आकलनापलीकडचा होता. ते एका बाजूला बसून घडणाऱ्या घटना बघत होते फक्त. अशोक झोपला आहे याची खात्री झाल्यावर मात्र ते गृहस्थ बाहेर येऊन बसले. त्यांनी एक स्मित करून काकांकडे बघितलं आणि आल्यापासून पहिल्यांदाच बोलायला सुरवात केली.

"तुम्हीच न जोशी काका आणि काकू? तुमचे आभार मानायला आमच्याकडे शब्दच नाहीत. काल जर तुम्ही प्रसंगावधान राखून अशोकच्या आईला फोन केला नसतात तर आम्ही याच गैरसमजात असतो की अशोक बरा झाला आहे. तुम्ही अशोकच्या आईला फोन केलात आणि लगोलग त्यांनी मला फोन केला. त्यांनी मला जे सांगितलं त्यावरून माझ्या लगेच लक्षात आलं की अशोक अजूनही बरा झालेला नाही. म्हणून मग मी वेळ न दवडता अशोकच्या आईला घेऊन इथे यायला निघालो....."

ते बोलत असताना अचानक त्यांना अडवत काका म्हणाले,"अगोदर आम्हाला हे कळेल का की तुम्ही कोण आहात? मी अशोकच्या आईला फोन केला होता ते हे सांगायला की अशोकपासून संध्याला धोका आहे. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर या. पण मला वाटतं अशोकने अगोदरच संध्याला काहीतरी केलं आहे. कारण तुम्ही अशोकला आत झोपवून आला आहात; पण तुमच्या बरोबर संध्या बाहेर आलेली नाही. त्यामुळे तुम्ही इथे कसे पोहोचलात ते समजून घेण्याच्या अगोदर संध्या ठीक आहे की नाही ते बघणे आत्ता जास्त महत्वाचे आहे."

काकांचं बोलणं ऐकून ते गृहस्थ काहीसे हसले आणि मग गंभीर होत म्हणाले,"काका आणि काकू तुम्हाला हे एकून कदाचित् धक्का बसेल; पण संध्या इथेच काय पण या जगातच नाही आहे."

त्यांचं ते बोलणं एकून काकूंना खरच मोठ्ठा धक्का बसला. त्यांनी काकांचा हात घट्ट धरला. काका देखील अवाक झाले. त्यांनी प्रश्नार्थक नजरेने अशोकच्या आईकडे बघितलं. अशोकच्या आईचा चेहेरा दु:खाने पिळवटला होता. त्यांच्या डोळ्यात पाणी उभं राहिलं होतं. त्यांनी त्या गृहस्थांना थांबण्याची खूण केली आणि बोलायला सुरवात केली.

"जोशी काका आणि काकू, हे डॉक्टर शेटे. ते सायकॉलॉजिस्ट आहेत. मी तुम्हाला एकूणच सर्वकाही पहिल्यापासून सांगते... आमचा एक वाडा आहे मुंबईला गिरगावात आणि वाड्यात एक झोपाळा देखील आहे तुमच्या घरात आहे तसाच. अशोक माझा मुलगा. अशोकचे वडील त्याच्या लहानपणीच गेले होते. त्यामुळे मीच अशोकला वाढवले होते. अशोकची आणि संध्याची कॉलेजमध्ये ओळख झाली. संध्या मोठी गोड मुलगी होती. त्यामुळे मीच त्यांचे लग्न लावून दिले होते चार वर्षांपूर्वी. अशोक चांगली नोकरी करत होता. आमच चांगलं चाललं होतं. दोन वर्षांनी अशोक-संध्याला मुलगी झाली. खूप गोड होती आमची मृदुला. ती तीन एक महिन्यांची होती. एकदा दुपारी संध्या मृदुलाला घेऊन वाड्यातल्या झोपाळ्यावर बसली होती. ती हलकेच झोके घेत होती. कसं कोण जाणे पण अचानक तिच्या हातून मृदुला सटकली आणि खाली पडली. त्या एवढ्याश्या जीवाला ते पडणं सहन नाही झालं आणि आमची मृदुला तिथल्या तिथे गेली. संध्याने देखील झोपाळ्यावरून खाली उडी मारली. तिने मृदुलाला हातात घेतली. पण मृदुला हालचाल करत नव्हती. झालेल्या आवाजामुळे मी आतून बाहेर धावत आले. संध्याला मोठा धक्का बसला होता. ती एकदम दगड होऊन बसली होती. मी संध्या आणि मृदुला जवळ गेले. पण मृदुलाच्या बाबतीत काही करता येणार नाही हे माझ्या त्याक्षणीच लक्षात आल. मी संध्याला हलवत होते. पण ती एकदम स्थब्द बसली होती. पार घाबरून घेले होते मी. त्यामुळे अशोकला फोन करायला आत धावले. अशोकला कळवून मी बाहेर आले तर मला संध्या आणि मृदुला दोघीही कुठेच दिसेनात. तशी मी वाड्याच्या दरवाजाकडे धावले. तिथे मला कोणीतरी सांगितले की संध्याला हातात बाळाला घेऊन समुद्राकडे धावत जाताना त्यांनी बघितलं.

मी तशीच समुद्राच्या दिशेने धावले. पण खूप उशीर झाला होता. संध्या मृदुलाच्या कलेवराला कवटाळून समुद्रात शिरली होती. मी लगेच पोलिसांना कळवले. तोवर अशोक देखील तिथे पोहोचला होता. आम्ही खूप शोध केला संध्याचा समुद्रात. पण ती हाती लागली नाही. संध्याचे कलेवर दुसऱ्या दिवशी सकाळी किनाऱ्याला लागलेले आम्हाला मिळाले. आमच्या मृदुलाचा तर पत्ताच लागला नाही. पत्नी आणि मुलगी एका दिवसात गेल्याचा धक्का अशोक पचवू शकला नाही. काही दिवस तो एकदम बधीर होता. पण मग त्याने हे स्वीकारले की मृदुला गेली आहे. मात्र संध्या देखील गेली आहे हे मान्य करायला तो तयार होत नव्हता. हळूहळू तो फारच भ्रमिष्टासारखं वागायला लागला. त्यामुळे मी त्याला डॉक्टर शेटे यांच्याकडे घेऊन गेले. अशोकला त्यांची ट्रीटमेंट वर्षभर चालू होती. हळूहळू तो माणसात आला. त्यानंतर तो माझ्याशी निट बोलायचा.

डॉक्टरांनी मला सांगितलं होतं की अधून मधून मुद्दाम संध्याचा विषय काढून अशोकचे विचार मी समजून घ्यावेत. मात्र संध्याचा विषय काढला तर तो दुखावेल म्हणून मी कधीच तिच्याबाद्द्ल बोलत नव्हते. ही माझी मोठी चूक होती. कारण अशोकने त्याच्या मनात संध्याला जिवंत ठेवलं होतं. मात्र त्याने याची मला कल्पना देखील येऊ दिली नाही. काही महिन्यांपूर्वी त्याने ही नोकरी धरली. अशोक संध्याचा विषय सोडला तर एकदम नॉर्मल वागायचा-बोलायचा. त्यामुळे कोणालाही काहीही संशय आला नाही. त्या लोकांना देखील अशा छोट्या गावात येऊन कामाची सगळी जवाबदारी घेईल असा तरुण मुलगा हवा होता. त्यामुळे त्यांनी देखील बाकी कोणतीही चौकशी केली नाही. मात्र अशोकच्या मनातले खेळ त्याने या गावात आल्यावर प्रत्यक्षात उतरवले. त्याने इथे आल्याक्षाणापासून त्याच्या मनातल्या संध्याला परत जिवंत केलं. जणूकाही ती जिवंत आहे आणि त्याच्याबरोबर राहाते आहे अशा प्रकारे तो वागत होता. इथे त्याला कोणीच ओळखत नसल्याने त्याने जे सांगितलं ते तुम्हाला सर्वांनाच खरं वाटत गेलं. अर्थात हे मला जोशी काकांनी काल फोन केल्यानंतर लक्षात आलं. काकांनी मला काल घडलेला प्रसंग सांगितला आणि मला एकटीला अशोकला सांभाळणं अशक्य आहे हे माझ्या लक्षात आलं. त्यामुळे लगेच मी डॉक्टर शेटेंना फोन लावला आणि माझ्या विनंती वरून ते माझ्या बरोबर इथे यायला तयार झाले.

बाकी आम्ही इथे आल्यापासून जे काही घडलं आहे ते तुमच्या समोरच आहे. त्यामुळे आतापर्यंत तुमच्या लक्षात आलंच असेल सगळ." अशोकची आई बोलायची थांबली. तिचा गळा दाटून आला होता. जोशी काकुंचे डोळे देखील ओलावले. त्या उठून अशोकच्या आईजवळ गेल्या आणि त्यांचा हात हातात घेऊन त्यांना थोपटायला लागल्या. अशोकच्या आईने काकूंच्या खांद्यावर दमून डोकं टेकवलं आणि आपल्या अश्रूंना वाट करून दिली.

काकांचे डोळे देखील पाणावले होते. त्यांनी डोळे कोरडे केले आणि हळव्या आवाजात ते म्हणाले,"अशोकच्या आई, तुमचं दु:ख आम्ही समजू शकतो. मात्र मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. काल आम्ही जेव्हा इथे आलो आणि ज्या प्रकारे अशोक आमच्याशी वागला त्यावरून आम्हाला संशय आला की बहुतेक अशोकनेच संध्याला अडकवून ठेवलं आहे. मी एकदा अशोकला शेटजींच्या दुकानातून फोन करताना बघितलं होतं. त्यावेळी मी त्यांना विचारलं तेव्हा शेटजी म्हणाले होते की अशोक अनेकदा त्यांच्या दुकानात फोन करायला येतो. मला वाटलं की अशोक ज्यांना फोन करतो त्यांनाच जर त्याचे हे वागणं कळवलं तर कदाचित् संध्यावर होणारा अन्याय थांबवता येईल. मात्र आता जे सत्य पुढे आलं आहे ते ऐकून आम्हाला अशोकबद्दल खूप वाईट वाटतं आहे. पण मग आता तुम्ही नक्की काय करणार आहात डॉक्टर?"

डॉक्टर शेटे इतकावेळ काहीच बोलले नव्हते. त्यांनी एकदा अशोकच्या आईकडे बघितलं आणि ते म्हणाले,"आता मी अशोकला झोपेचं इंजेक्शन दिलं आहे. तो उठल्यानंतर कसा वागेल याची काहीही खात्री देता येत नाही. त्यामुळे अशोकला लवकरात लवकर इथून घेऊन जाणंच योग्य आहे." अशोकच्या आईने देखील मान हलवून मूक संमती दिली; आणि मग काही वेळातच अशोकची आई आणि डॉक्टर शेटे अशोकला घेऊन निघून गेले.

समाप्त

Friday, November 29, 2019

तो (गूढ कथा)(भाग १)



तो (भाग १)

'कधी सावरणार ही त्या धक्यातून कोण जाणे? जागा बदलली तर किमान जुन्या आठवणींपासून तिची सुटका होईल अस वाटल होत मला. पण इथेसुद्धा तो शेजारच्या जोशी काकूंच्या व्हरांड्याला झोपाळा बघितल्या पासून ही अजूनच गप्प झाली आहे. बरं, हिला कितीवेळा सांगितलं त्या बाजूच्या खिडकीकडे फिरकूसुद्धा नकोस. तर मी असताना नाही जात. पण मी नसलो की त्याच खिडकीत जाऊन बसलेली असते बहुतेक. काल जोशी काका भेटले होते ते म्हणाले,'संध्या खिडकीत दिसली म्हणून हिने हाक मारली; पण तिने उत्तर नाही दिलं.' मी म्हंटल, 'तिच लक्ष नसेल हो काका.' तर म्हणाले, 'अरे लक्ष होतं. आमच्या व्हरांड्यातल्या झोपाळ्याकडेच बघत होती ती बहुतेक. पण बाजूला उभ्या असलेल्या हिच्याकडे बघायला तयार नाही.' यावर मी काय बोलणार? 'हो का? बोलतो तिच्याशी.' अस उत्तर देऊन निघालो. तरी बरं त्यांना सगळं सांगितलं आहे मी अगोदरच. त्यामुळे ते देखील समजुतीने घेतात. फार प्रश्न नाही विचारत मला.' अस म्हणून अशोकने फोन ठेवला आणि घराकडे निघाला.

अशोकला पब्लिक बूथ मधून बाहेर पडताना जोशी काकांनी बघितलं होतं. पण ते त्याला सामोरे नाही गेले. कारण आदल्या दिवशी त्यांनी जेव्हा संध्याचा उल्लेख केला तेव्हा अशोकचा अस्वस्थ झालेला चेहेरा त्यांच्या नजरेतून सुटला नव्हता. उगाच कशाला त्याच्या दुखऱ्या मनाला अजून त्रास द्यायचा म्हणून तो जाईपर्यंत ते आडोशाला थांबले आणि मग किराण्याचं सामान घ्यायला दुकानात गेले. भानूशेटने जोशी काकांना बघून शेजारची खुर्ची पुढे केली. कारण काका सामान घ्यायला आले की थोडावेळ बसून भानूशेट बरोबर चहा घेत आणि थोड्या गप्पा मारून मगच निघत. काकांनी सामानाची यादी दिली ती नोकराच्या हातात देत शेटजी म्हणाले,"काय काका? कसे आहात?" खुर्चीवर बसत काका म्हणाले,"चालल आहे शेटजी. आम्ही काय म्हातारी खोडं. जोवर आहोत तोवर आहोत. बर एक सांगा... हा आत्ता इथून गेला तो मुलगा नेहेमी येतो का हो फोन करायला?" शेटजी हातातलं पेन खाली ठेवत म्हणाले,"कोण ते अशोक साहेब का? हो काका. इथूनच फोन करत असतात. दर एक दोन दिवसांनी मुंबईला फोन लावतात. अगदी थोडावेळ बोलतात आणि पैसे चुकते करून निघतात. का हो?" "काही नाही हो शेटजी. अहो, तो आमच्या शेजारच्या घरात राहायला आला आहे. तो आणि त्याची बायको." काकांच बोलण एकून शेटजीना आश्चर्य वाटलं. म्हणाले,"अरे बायको पण आहे का अशोक साहेबांना? कधी बोलले नाहीत. मला तर वाटत होत की बायकोलाच फोन करायला येतात इथे. वहिनी पण नाही आल्या कधी इथे माझ्या दुकानावर काही सामान घ्यायला." त्यावर मान हलवत काका म्हणाले,"बिचारा! नुकताच त्याच्या घरात वाईट प्रसंग होऊन गेला आहे. त्याचा धक्का त्याच्या बायकोने खूपच घेतला आहे; अस म्हणत होता तो. ती बाहेर कुठे पडतच नाही हो. हा एकटाच सगळ बघतो." काकांच्या मनात आलं उगाच आपण कशाला त्या अशोकच्या वैयक्तिक आयुष्यातल्या गोष्टी इतरांशी बोलायच्या. म्हणून मग त्यांनी विषय बदलला. थोड्या वेळाने चहा पिऊन आणि यादीप्रमाणे सामान घेऊन ते त्यांच्या घरी जायला निघाले.

"संध्या.... ए संध्या..... मी आलो आहे. कुठे आहेस तू?" अशोकने किल्लीने दार उघडून घरात शिरताच संध्याला हळुवार आवाजात हाक मारली. अशोक डायनींग टेबलाजवळ गेला. टेबलावर थंडगार झालेला चहाचा कप तसाच होता. अशोकला वाटले त्याच्या हाकेमुळे संध्या तंद्रीतून जागी झाली. तिला बघून तो हसला आणि तिच्या जवळ बसत त्याने तिला बाजूला बसायची खुण केली. संध्या त्याच्या बाजूला बसली. अजूनही तिचा चेहेरा थंड भावनारहित होता. त्याने तिचा हात हातात घेतला आणि म्हणाला,"कशी आहेस ग बाबू? काय केलस दिवसभर? आज मला फारच उशीर झाला का?" संध्या त्याच्या कोणत्याही प्रश्नाला उत्तर न देता जमिनीकडे नजर खिळवून बसली होती. अशोकच्या मनात तुटल्यासारखं झाल.लं पण तरीही तो बोलत होता,"अग, मी निघतच होतो पण बॉसने अगदी निघताना एक रिपोर्ट मागितला. तसा तयारच होता; त्यामुळे प्रिंटआउट घेऊन त्याला दिली आणि निघालो. तरी उशीर व्हायचा तो झालाच." संध्या ऐकत होती की नव्हती हे देखील अशोकला कळत नव्हतं. तिच्याकडे बघत तो तसाच बसला. पण मग थोड्यावेळाने उठून म्हणाला,"चल मी चहा करतो. तू घेतेस का थोडासा?" तो उभा राहिला आणि संध्याने त्याच्याकडे नजर उचलून बघितलं. क्षणभर तिच्या डोळ्यात हरवलेले भाव तसेच राहिले; अस अशोकला वाटलं. तिच्या डोळ्यातली मूक सम्मती बघून अशोक हसला आणि म्हणाला,"बस तू. मी फ्रेश होतो आणि चहा घेऊन येतो दोघांचा." अस म्हणून आतल्या खोलीकडे वळला.

अशोक हात-पाय धुवून आत स्वयंपाकघरात गेला. त्याने दोघांसाठी चहा बनवला आणि संध्याला हाक मारली. त्याची हाक एकूण संध्या आत टेबलाजवळ येऊन बसली. तिचा अगोदरचा थंड झालेला चहाचा कप एका बाजूला करत अशोकने ताजा गरम चहा तिच्यासमोर ठेवला. काही न बोलता दोघांनी चहा घेतला. चहा आटपला तसा अशोक संध्याला म्हणाला,"अजून तसा अंधार नाही ग पडला. चल न जरा पाय मोकळे करून येऊ." संध्याने नकारार्थी मान हलवली; त्यावर अशोक तिचा हात हातात घेत म्हणाला,"अग राणी चल ना थोडा वेळ. फार कुठे नाही, जवळच जाऊ. ते शेजारचे जोशी काका आत्ता भेटले होते. ते विचारत होते तुझ्याबद्दल. चल न. तुझी ओळख करून देतो त्यांच्याशी आणि जोशी काकूंशी. आपण येऊन इतके दिवस झाले पण तू कोणालाही भेटलेली नाहीस. आज बाहेर पड जरा. नंतर हव तर फक्त खिचडी टाक. तशीही मला फारशी भूक नाही." अशोकला इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा संध्याने घराबाहेर पडायला हवे होते. त्याला वाटले अजूनही ती नाहीच म्हणेल. पण जोशी काका-काकूंचा उल्लेख एकून संध्याची नजर थोडी बदलली असं अशोकला वाटलं. तिने अशोककडे क्षणभर बघितले आणि मग "बरं" म्हणून मान हलवून ती आतल्या खोलीत गेली.

संध्या लगेच बाहेर पडायला तयार झाली याचं अशोकला खूप आश्चर्य वाटलं. पण तो काहीच बोलला नाही. ती त्याच्याबरोबर येते आहे याचाच त्याला खूप आनंद झाला होता. संध्या पाच मिनिटात बाहेर आली. तिने कपडे बदलले होते. साधा पण बरा ड्रेस घातला होता आणि केस देखील विंचरले होते. ती दरवाज्याच्या दिशेने गेली तसा अशोक देखील निघाला. एकवार घरात मागे वळून बघून तो हलकसं हसला आणि बाहेर पडला.

दोघे घराच्या आवारातून बाहेर पडले आणि रस्त्याला लागले. जोशी काकांचं घर उजवीकडे होतं. अशोक जाणून बुजून डावीकडे वळला. तो जोशिकाकांच्या बाजूला न वळलेला बघून संध्याने नजर उचलून त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने बघितलं. त्यावर तिचा हात हातात घेत तो म्हणाला,"किती दिवसांनी तू बाहेर पडायला तयार आली आहेस. चल न, थोडं चालत जाऊ. अगदी हाकेच्या अंतरावरच तर समुद्र आहे. तुला आवडतं न समुद्राच्या वाळूत बसायला?" संध्याने मान खाली घाताली. पण ती काहीच बोलली नाही. शांतपणे ती चालत राहिली अशोकबरोबर. दोघे समुद्राजवळ पोहोचले. तिने समुद्राकडे बघितलं आणि ती स्थब्द झाली. अशोकला त्याच्या हातातली तिच्या हाताची पकड घट्ट झालेली जाणवली. त्याने तिच्या हातावर थोपटले. एका बाजूला अजून काही लोक होते. बहुतेक सहज समुद्रावर फिरायला आलेले. उगाच त्यांच्यासमोर काही व्हायला नको म्हणून अशोक स्वस्थ उभा राहिला. पण तो डोळ्याच्या कोपऱ्यातून संध्याकडे बघत होता. थेट बघणं मात्र टाळत होता. ती शांत होती. काहीच बोलत नव्हती. दोघे तसेच समुद्रापासून लांब... जेमतेम वळूला पाय लागतील असे उभे होते काहीही न बोलता. थोड्या वेळाने ती मागे वळली; तसा तो तिच्याबरोबर मागे वळला. दोघे घरी आले. तिचा चेहेरा खूपच दमलेला वाटत होता. घरात येताच तिने सोफ्यावर तिच आंग झोकून दिलं. अशोक तिच्या बाजूला बसला आणि तिला थोपटलं. ती तशीच डोळे मिटून पडून राहिली.

"बाबू, दमलीस? थांब हं पाणी आणतो." तो म्हणाला आणि आत स्वयंपाकघरात गेला. स्वतः ग्लासभर पाणी प्यायला आणि संध्यासाठी म्हणून घेऊन आला. ती तशीच सोफ्यावर पडून होती. तिने एक हात डोळ्यांवर ठेवला होता आणि तिचा दुसरा हात तिच्या पोटावर होता. श्वासाबरोबर संथपणे वर-खाली होणाऱ्या तिच्या हातावरून अशोकच्या लक्षात आले की संध्याला झोप लागली आहे. मग त्याने तिला उठवले नाही. एकतर ती इथे आल्यापासून पहिल्यांदाच घराबाहेर पडायला तयार झाली होती. त्यात तो तिला समुद्रावर घेऊन गेला होता. ती बहुतेक म्हणूनच खूप दमली होती असं त्याला वाटलं. त्यामुळे तिला तसंच झोपू देऊन तो स्वयंपाकघराकडे वळला. त्याने शांतपणे आवाज होऊ न देता खिचडी टाकली. बाहेरच्या खोलीचा दिवा देखील लावला नाही. हळूच आपली bag स्वयंपाकघरात घेऊन गेला. खिचडी होईपर्यंत तो ऑफिसचं काम करत बसला. खिचडी झाली तशी परत एकदा त्याने बाहेर डोकावून बघितलं. संध्या अजूनही शांतपणे झोपलेली होती. त्याने एकदा खांदे उडवले आणि तिला जाग येणार नाही इतक्या हळुवारपणे स्वतःला खिचडी वाढून घेऊन खाऊन घेतलं. स्वयंपाकघर आवरून घेतलं. टेबलावर एक लहानशी चिठ्ठी ठेवली,'संध्याराणी, खिचडी तयार आहे. उठलीस की गरम करून खाऊन घे. मला माहित आहे तू मला उठवणार नाहीस. पण एकटं वाटलं तर जरूर हाक मार. अशु' चिट्टी पटकन दिसेल अशी ठेवून तो झोपायला गेला.

सकाळी अशोकला थोडी उशिराच जाग आली. त्याने घड्याळात बघितलं तर नऊ वाजायला आले होते. तो पटकन उठला. संध्या बहुतेक अंघोळीला गेली होती. त्याने पटकन स्वतःसाठी चहा करून घेतला आणि पटकन संपवला. तो आतल्या खोलीत गेला तर संध्या आरशापुढे उभं राहून तिचे ओले केस पुसत होती. तिचा नाजूक शेलाटा बांधा मोहक वाटत होता. अशोकला वाटलं आज दांडी मारावी ऑफिसला. पण मग बॉसचा चेहेरा डोळ्यासमोर आला आणि तो पटकन अंघोळीला पळाला. तो तयार होऊन बाहेरच्या खोलीत आला. संध्या बहुतेक त्याचा डबा करण्यात गुंतली होती. अशोकला मात्र खूपच उशीर झाला होता. त्यामुळे तिला हाक मारून तो डबा नको म्हणून सांगणार होता. तेवढ्यात त्याच लक्ष जोशी काकांच्या बाजूला उघडणाऱ्या खिडकीकडे गेलं. खिडकी उघडी होती आणि वाऱ्यामुळे खिडकीचा पडदा उडत होता. तो खिडकीजवळ गेला आणि हळूच पडद्याआडून त्याने जोशी काकांच्या घराकडे बघितलं. जोशी काकू झोपाळ्या जवळ उभं राहून खिडकीकडेच बघत होत्या असा अशोकला भास झाला. आपण दिसणार नाही याची काळजी घेत अशोकने पडदा सारून घेतला आणि संध्याला 'येतो ग राणी'; अस म्हणत घराचा दरवाजा ओढून घेऊन तो घाईघाईने घराबाहेर पडला.

खर तर ऑफिसला जाण्यासाठी अशोकला उजवीकडे वळायला हव होतं. पण त्याबाजूनी गेलो तर जोशी काका किंवा काकू हाक मारतील आणि गप्पा मारायला लागतील आणि अजून उशीर होईल असा विचार करून तो डावीकडे वळला आणि पटपट चालायला लागला.

***

जोशी काकूंनी काकांना हाक मारली. काका मागच्या अंगणात पारिजातकाची फुलं गोळा करत होते. त्यांना अलीकडे कमी ऐकायला यायचं. त्यात ते अनेकदा मुद्दामच ऐकण्याच यंत्र काढून खिशात ठेवत असत. त्यामुळे काकूंनी मारलेली हाक त्यांना ऐकू आली नाही. तशी वैतागत काकू मागच्या दारी गेल्या आणि जरा मोठ्याने म्हणाल्या,"अहो ऐकलत का?" काकांनी ऐकायचं यंत्र कानात अडकवत काकूंना विचारलं,"काही म्हणालीस का? मी यंत्र काढून ठेवलं होत." कपाळाला हात लावत काकू म्हणल्या,"हो अहो. मी म्हणत होते की त्या अशोकला एकदा संध्याला घेऊन जेवायला बोलावूया का? तो शेजारी येऊन महिना होऊन गेला; पण अजून त्याच्या बायकोची आणि माझी भेट झाली नाही." काकांनी एकदा काकूंकडे बघितलं आणि परत खाली बसून पारिजातक गोळा करत ते म्हणाले,"अग, अशोकने काय सांगितलं ते आठवतं आहे ना? मग काय घाई आहे तुला? तो म्हणाला आहे नं; आणेल तो संध्याला आपल्याला भेटवायला. मग थांब की तोवर." त्यावर खाली ओट्याच्या पायरीवर बसत काकू म्हणल्या,"माझी थांबायला हरकत नाही हो. पण काळजी वाटते त्या पोरीची. जागेत बदल झाला तर जुन्या गोष्टी विसरेल म्हणून हा तिला घेऊन आला तर खरा इकडे. पण दिवसभर हा ऑफिसमध्ये आणि ती बिचारी मुलगी घरात एकटी. बरं नाही वाटत."

काकूंचा अस्वस्थपणा बघून काका त्यांच्याजवळ जाऊन बसले आणि म्हणाले,"खरं आहे तुझं. पण तू कमी प्रयत्न केलेस का? दोन-तिन वेळा जाऊन आलीस ना तो ऑफिसला गेल्यावर त्यांच्या घरी. पण ती मुलगी दारच नाही उघडत तर तू आणि मी काय करणार? बरं! तिला हाक मारावी तर आपल्या बाजूची खिडकी कायम बंद असते. कधीतरी अशोकच काय तो दिसतो त्या खिडकीत." काकांच्या म्हणण्याला दुजोरा देत काकू म्हणल्या,"हो नं. काल माझ लक्ष गेलं तर नेमकी उघडी होती खिडकी. कोणीतरी पडद्याच्या आडून इथे बघतं आहे अस वाटलं. बहुतेक तिच असेल; अशोकची संध्या! म्हणून तिला हाक देखील मारली मी. पण उत्तर काही आलं नाही तिच्याकडून." काका होकारार्थी मान हलवत काकूंना म्हणाले,"हो. काल अशोक ऑफिस वरून येत असताना भेटला तेव्हा मी त्याला म्हंटल की तुझी संध्या खिडकीत होती आणि काकूने हाक मारली म्हणून. पण तिने उत्तर दिलं नाही." त्यावर कपाळाला आठ्या घालत काकू म्हणल्या,"अरेच्या! कधी भेटला अशोक तुम्हाला? बरं ते जाऊ दे. काय म्हणाला तो त्यावर?" उठून घरात जात काका म्हणाले," काय म्हणणार तो बिचारा? म्हणाला बोलतो तिच्याशी. आणि गेला." काकांच्या मागोमाग उठत काकू म्हणल्या,"खरच ग बाई बिचारा. अजून काय? तरी सगळं निभावून नेतो आहे हो!"

काकूंकडे कामाला येणारी काशी आज थोडी उशिरा आली. काका जेवण आटोपून वामकुक्षी घेत पडले होते. काकू स्वयंपाकघरातलं आवरून काशीचीच वाट बघत झोपाळ्यावर बसल्या होत्या. अधून मधून त्या वळून अशोकच्या घराच्या खिडकीकडे वळून बघत होत्या. आज खिडकीचा पडदा नीट सारलेला होता. पण तरीही त्याच्या आडून अशोकची संध्या आपल्याकडे बघते आहे की काय अस काकूंना वाटत होत. काशी फाटक उघडून आत आली तशी काकू झोपाळ्यावरून उठत तिला म्हणल्या,"का ग काशे इतका उशीर केलास आज? कधीची वाट बघते आहे तुझी. पार दामले आहे. कधी एकदा आडवी होते असं झालं आहे." त्यावर भराभर भांडी उचलून मागल्या दारी जात काशी म्हणाली,"काकू नवीन काम धरलं हाय नव्ह.तित थोडा येळ झाला. तुमी पडायचंत की. म्या आवरून जाताना हाक दिली असती." तिच्या मागे जात काकूंनी तिला विचारलं,"नवं काम कुठे धरलंस ग बाई? हे शेजारच्या घरी की काय?" त्यावर तोंड वाकड करत काशी म्हणाली,"न्हाई... पार पलीकडच्या अंगाला हाय. कोनी हापिसर आलाय त्येच्या बायकून बोलावलं हुत. काकू, तुमी म्हनला म्हनून म्या शेजारच्या सायबास्नी दोन येळा जाऊन इच्चारलं कामाला येऊ का? तर त्ये म्हन्ल नकू. माझं म्या करीन. चार खनाच तर घर हाय." काशीने बोलता बोलता भांडी घासायला सुरवात केली होती.

एक स्टूल ओढून घेऊन तिच्या जवळ बसत काकूंनी तिला विचरलं,"घरी गेली होतीस नं दोन वेळा?" भांडी घासण्यात मग्न काशीने काकूंकडे न बघताच उत्तर दिल,"व्हय काकू." आवाज खाली आणत काकूंनी काशीला विचारलं,"त्या अशोकच्या बायकोला बघितलस का ग तू? कशी दिसते ती?" हातातलं काम थांबवून काशीने क्षणभर विचार केला आणि मग परत कामाला सुरवात करत म्हणाली,"म्या न्हाई बघितली तिला. ती आतमंदी हुती बहुत्येक. भाऊ आत जाऊन बोलून आले जनु. काय बाय आवाज आलं बोलल्याच भाईर मला. पन मंग भाईर यिऊन म्हन्ले तू नग येउस. आमी दोघच्या दोघ हाउत तर आमचं आमी करू. तर म्या म्हन्ल जोशी काका आन काकूबी दोघच हाईत. तरी म्याच करती सार काम. त भाऊ म्हन्ल आमी तरणी लोकं हाओत. मंग म्या काय सांगनार? म्या बरं म्हन्ल. आन निघाली. तस दुसऱ्यांदा म्या जानारच न्हवती. पन तुमी म्ह्न्लासा की ती आजारी बाईमानुस हाय म्हनून मुद्दाम भाऊ नसतांना ग्येली. म्हन्ल थ्येट त्या बाईंशी बोलीन. किती येळ दार वाजवत हुती म्या. आतून गानी लावल्याचा आवाज येत हुता. पन बाईनी दार न्हाई उघडलं." काशीच बोलणं एकून काकू विचारात पडल्या. त्यांना विचरात पडलेलं बघून काशी म्हणाली,"काकू परत नगा हो जायला सांगू. म्या न्हाई जायची. हाईत ती कामं बरा पैका द्येतात मला. उगा कोनाच्या माग काम द्या म्हनून लागायला मला न्हाई आवडत." त्यावर तिच्याकडे एकवार बघून काकू तिथून उठल्या आणि आत जाऊन पडल्या.

क्रमशः


Friday, November 22, 2019

स्टुडियो अपार्टमेंट


आई-वडिलांच्या मनाविरुद्ध हट्टाने हे स्टुडीयो अपार्टमेंट शेवटी घेतलंच. वर्षभर इथे राहाते आहे भाड्याने. आता अगदी आपलसं वाटतं. स्टुडीओ अपार्टमेंट ही इमारत या गल्लीमधील शेवटून दुसरी; शेजारी एक बंगला आहे. तिथे कोणीच राहत नाही. दिवसभर माळी मामा आणि वॉचमन असतात. त्यांच्या समोरची दोन माजली इमारत पण बहुतेक रिकामीच आहे. माझ्यासारखं दुसऱ्या मजल्यावर कोणीतरी रहातं. पण बहुतेक सतत प्रवास वगैरे करत असेल. क्वचितच दिवा दिसतो त्या बाल्कनीत.... ते ही जेम-तेम संध्याकाळी. मग सगळच शांत.
आई आली होती समजावायला. "विकत कशाला घेतेस? भाड्याने राहा. नोकरी बदललीस तर उगाच पैसे अडकतील. त्यात मोठी असली तरी एकच खोली. काय हा वेडेपणा! उद्या लग्न झालं की काय करणार आहेस?" लग्न हा विषय तर ती पदोपदी काढते. मला तर त्यावर बोलायचं देखील नाही. म्हणून मग मी एकूणच तिच्याकडे दुर्लक्ष केलं. "इथून ऑफिस देखील किती जवळ आहे. फुल्ल फर्निश आणि खिशाला परवडतो आहे..." अशी कारणं देत हट्टाने घेतली ही जागा.

कमाल आहे. इतके दिवस हा दिवा त्रास नव्हता देत. हे काय अचानक. तो दुसरा मजलावाला! त्याच्या बाल्कनीचा दिवा बंद न करताच गेला वाटतं टूरवर.

"माळीमामा, तो त्या बाल्कनीमधला दिवा चालूच आहे गेल्या दोन रात्री. झोपले की बरोब्बर माझ्या तोंडावर उजेड पडतो."

"रात्रभर दिवा चालू असतो तिथला?"

"हो!"

"ताई बंद आहे दिवा. थोडं मागे या आणि वर बघा बघू."

"अरेच्या! खरच की. आला वाटत तो टूरवाला. बरं झाालं. गेल्या दोन रात्री जाम त्रास झाला मला त्या उजेडाचा. चला! येते मी."

"ताई, आज सोनचाफा नको?"

"अय्या आहे? हवाच मग!"

अरेच्या मामा सकाळी म्हणाले दिवा बंद आहे. पण आता चालूच आहे. बहुतेक आत्ता लावला असेल. रात्री बंद होईल. झालाच पाहिजे. अगदी तोंडावर येतो उजेड. टॉर्चने मुद्दाम माझ्याच तोंडावर मारल्यासारखा.

अरे बारा वाजून गेले. अजूनही दिवा चालूच? कमाल आहे. या खोलीत दुसरी जागा देखील नाही की मी पलंगाची जागा बदलेन. उद्या जाऊन सांगिन तो जो कोणी आहे त्याला.

"मामा, अहो काल देखील रात्रभर दिवा चालू होता. कोण राहात हो त्या घरात? मी हे घर घेतलं त्यावेळी ते मालक काहीतरी सांगत होते त्या घराबद्दल. पण आता माझ्या लक्षात नाही."

"ताई तुम्ही भाड्याने राहाता ना?"

"नाही हो मामा. म्हणजे भाड्याने राहात होते. पण हे घर इतकं आवडलं की घेऊन टाकलं आत्ता काही दिवसांपूर्वी. माझ्या ऑफिस पासून जवळ आणि माझ्या बजेटमध्ये होत म्हणून."

"ताई, मला बोलला नाहीत!"

आता यांना का बर मी सांगावं की मी हे घर घेतलं? जरा नीट बोललं की जास्तच करतात हे लोक. म्हणे मला बोलला नाहीत! त्यांच्याकडे दुर्लक्ष करून निघालेच मी. आज घरी जाताना त्या दुसरा मजलावाल्याला मुद्दाम जाऊन सांगणार आहे; दिवा बंद कर म्हणून.

अरेच्या! एकूण घरातले सगळेच दिवे बंद आहेत. नाहीये वाटत तो. नशीब माझं!

हे काय? अचानक आत्ता दिवा लागला? किती वाजलेत? रात्रीचे दोन! काय फालतूपणा आहे!!

"................ ओय.......... अहो! शुक शुक! ओSSS....... तुमच्या बाल्कनीचा दिवा बंद करा हो. गेले काही दिवस खूप त्रास होतो आहे मला."

आयला! रात्रीच्या शांततेत पार दुसऱ्या गल्लीपर्यंत माझा आवाज गेला असेल. पण या माणसाला ऐकायला जात नाहीये. उद्या सकाळी ऑफिसला जायच्या अगोदर त्या घरी जाणारच मी.

"अरे ताई कुठे जाता आहात?"

"अहो मामा, आता मला वाटत मुद्दाम मला त्रास व्हावा म्हणून ते जे कोणी आहेत ते दिवा लावतात. वेळी-अवेळी. आत्ता जाऊन सांगणार आहे मी त्यांना."

"नको ताई. त्यापेक्षा तुम्ही जागा बदला."

"जागा बदलू? म्हणजे? अहो एकुलती एक खोली आहे. इतकी जागाच नाही की पलंग दुसरीकडे सरकवू शकेन."

"अहो ताई, मी पलंगाची जागा नाही म्हणत. तुम्ही जा इथून."

"मामा.................. हे अतिच होतं आहे बर का! अहो फुल फर्निश घर आणि इथे मध्य वस्तीत. तरीही शांत आणि माझ्या ऑफिस पासून इतकं जवळ. इतक्या वाजवी किमतीत मिळालं. तुम्ही सरळ सांगता जा म्हणून? कमाल करता हं."

"ताई............ मी साधा माळी आहे. लहान तोंडी मोठा घास वाटेल तुम्हाला. पण ऐका माझं."

"छे! तुमच्याशी बोलत बसले आणि उशीर झाला. संध्याकाळी जाऊन सांगीन. जाते मी."

"ताई........ जाते म्हणू नाही. येते म्हणावं."

डोक्यात जातो आहे तो माळी आता. नवीन राहायला आले त्याच्या दुसऱ्या दिवशी त्या बंगल्यातला सोनचाफा बघून खुश झाले. त्याला म्हंटल; मला सोनचाफा आवडतो; तर लगेच म्हणाला रोज देईन तुम्हाला. मग इथल्या तिथल्या गप्पा झाल्या... अधून मधून काहीतरी सामान आणायला मदत करायला लागला म्हणून मी पण मामा म्हणायला लागले. पण आता हे अतिच झालं. म्हणे निघून जा घर सोडून. हा कोण लागतो माझा की हक्काने घर सोडा म्हणाला? मूर्ख नुसता! आता बोलणारच नाही त्याच्याशी.

फारच उशीर झाला आज घरी यायला. खूप दामले आहे. आता नाही जात त्या घरी.....

हे भगवान!! गेल्या कित्येक रात्री शांत झोप नाही लागत त्या दिव्यामुळे. परत आज चालू आहे. सकाळ-बिकाळची वाट नाही बघणार आहे मी. आत्ताच जाऊन बोलणार आहे. काय समजतो काय स्वतःला? मनात आलं की दिवा लावतो. बरं, बाल्कनीमध्ये तर एकदाही दिसला नाही.

अरे तरातरा निघाले आणि बहुतेक किल्ल्या विसरले. पण ते सगळ नंतर. आत्ता या क्षणी त्या घरात जाऊन त्या माणसाची हजेरी घेणार आहे चांगली आणि त्या दिव्याची तर वाट लावणार आहे मी.....................................
****
............."अहो! शुक शुक! गेले दोन दिवस मी तुम्हाला या बंगल्याच्या बागेची काळजी घेताना बघते आहे."

"नमस्कार ताई! मी या बंगल्याचा माळी आहे. तुम्ही?"

"या बाजूच्या इमारतीतल्या त्या पहिल्या मजल्यावरचा स्टुडिओ अपार्टमेंट भाड्याने घेतला आहे मी. मामा, मला सोनचाफा आवडतो. देता का एखादं फुल?"

"अरे घ्या ना ताई. रोज देईन. नाहीतरी झाडावर सुकून जाणार."

"धन्यवाद मामा."

"......................ताई!"

"काय मामा?"

"एक सांगू?"

"बोला ना!"

"भाड्याने राहा. विकत नका घेऊ ते घर."

"अरेच्या! का मामा?"

"असंच! मागच्यावेळी सांगायचं राहून गेलं होतं. म्हणून............"

आगाऊ आहे हा माळी! जरा मामा म्हणून काय म्हंटल... जास्तच बोलायला लागला. खरतर कित्ती आवडलं आहे हे स्टुडीओ अपार्टमेंट मला.........................

Friday, November 15, 2019

मस्तानीचं मनोगत

मस्तानीचं मनोगत



नुकतीच 'राऊ' कादंबरी परत एकदा वाचून संपवली. खरं तर या विषयावर अनेकांनी अनेकदा लिहिलं आहे. पेशवेकाळाबद्दल अनेक प्रकारच्या चर्चा झाल्या आहेत. त्यात अलीकडेच बाजीराव-मस्तानी सिनेमा येऊन गेला होता. त्यावेळी तर पेशवे... मराठा साम्राज्य... त्या काळातील विवाहेतर प्रेम संबंध... बेबंद स्वभावाचे बाजीराव पेशवे... त्यांच्यावर जान कुर्बान करणारी मस्तानी... या सगळ्यावर खूप खुप उहापोह झालाच होता. पण म्हणूनच जरा वेळ मिळाला आणि परत एकदा राऊ कादंबरी हातात घेतली होती. या कादंबरीमधले वेगवेगळे भावनिक बंध मला दरवेळी वेगवेगळ्या प्रकारे भिडतात. यावेळी ही कादंबरी वाचताना त्यातील एक प्रसंग मनाला स्पर्शून गेला; काहीसा टोचला!

मस्तानीला आप्पा (पेशव्यांचे धाकटे बंधू) अचानक एक दिवस 'पुणे सोडून जा'; सांगतात आणि बाजीराव पेशव्यांचा निरोपही न घेता मस्तानी बुंदेलखंडाला रवाना होते. ही बातमी समजताच बाजीराव पेशवे दोन दिवसांची अविरत घोडदौड करत तिला गाठतात. त्यावेळचा हा प्रसंग. मी एकट्या मस्तानीच्या शब्दात मांडण्याचा अल्पसा प्रयत्न केला आहे. एकीकडे राऊ तिच्यासाठी आले हा झालेला आनंद; दमलेल्या राऊंबद्दल वाटणारी काळजी आणि त्याचवेळी पुण्यात उडालेल्या गदरोळाची जाणीव... तिच्या अस्तित्वामुळे निर्माण झालेला तिढा आणि हट्टी राऊ हे भावनांचे कल्लोळ मस्तानीच्या मनात घोंगावत असतील. मात्र त्याचवेळी नसलेल्या माहेरच्या; त्या बुंदेलखंडाच्या वाटेवरून दोन दिवस प्रवास करताना तिच्या स्त्रीमनाला काय आणि किती टोचण्या लागून राहिल्या असतील. सोबत लहानगा समशेरबहाद्दर आणि आयुष्याचं फरफरणारं सुकाणूशिवायचं जाहाज... या सर्वच भावनांची सरमिसळ लिहायचा प्रयत्न इथे केला आहे.

केवळ आणि केवळ राऊ कादंबरीच्या प्रेमाखातर आणि या प्रसंगातून मस्तानीचा एक वेगळा पैलू मांडता येईल अस वाटून....

**********

राऊ... राऊ तुम्ही आलात? या यत्किंचित कंचनीसाठी? पाउस-वादळी वारा यामुळे इथवरचा प्रवास करण्यास या दासीला दोन दिवस लागले. तोच प्रवास आपण काही प्रहरात पूर्ण केलात... ओह राऊ! ये क्या हें? अरे, आप तो पसिनेसे भिग गये हो! सार शरीर थकलेल दिसतंय. कुठ माझा शोध करीत आलात राऊ? राऊ एकटे धावत इतक्या दूर येतील ही या दासीला कल्पना नव्हती. आता मात्र काही न बोलता दमलेल्या राऊंनी विश्रांती घ्यावी. माझ्या या राहुटीत जे काही असेल ते स्वीकारावं एवढीच विनंती आहे. (राऊ मात्र ताठपणे एकाजागी उभे आहेत. ते कठीण चेहेऱ्याने आणि करड्या नजरेने मस्तानीकडे बघत असतात; जणू त्यांची नजर म्हणत असते 'मस्तानी तू परत चल';) तुमच्यावर मी जीव ओवाळून टाकला आहे माझ्या हृदयेश्वरा! पण परत पुण्याला चल असा हट्ट बरा नव्हे. राऊ पेशवे आहेत हे त्यांनी विसरू नये. एका कंचनीसाठी पेशवे पुण्याहून अखंडपणे इथपर्यंत दौडत आले, हे पुण्यात समजलं तर केवढा हाहाकार होईल. तिकडे पुण्यामध्ये शोधाशोध सुरु झाली असेल. राऊ इथे आले याची वर्दी तरी पुण्याला पाठवावी. मग आम्ही सांगूच आमची कर्मकहाणी.

राऊ आपण रागावू नये. ही दासी आपल्या मनानं पुण्यातून बाहेर पडली नाही. राऊंच्या सावलीत राहण्याची शपथ घेऊन पुरते चार प्रहरसुद्धा उलटले नाहीत, तोच मस्तानीवर हा प्रसंग आला. आम्ही खुशीनं पुणं सोडलं नाही. कोणी जबरदस्ती केली म्हणून का विचारता राऊ? त्यांचं नाव समजून देखील काय होणार आहे? या चौकशीची काही जरुरी आहे का? वाटल्यास असं समजावं की आम्ही आपल्या मनानंच बाहेर पडलो आहोत. आमच्यावर कुणीही जबरदस्ती केली नाही.( तिच्या या वाक्याने राऊंच्या नजरेत अंगार फुलतो. नाही नाही अशी मान हलवत नजर खाली वळवत मस्तानी म्हणते) राऊ नका अस भरीस पाडू आम्हाला. आम्हाला हुकुम झाला.... पण यापुढे अजून काहीही सांगण्याअगोदर आम्हाला एक वाचन मिळेल तर सांगू. मी नाव सांगेन पण त्यांना अभय मिळालं पाहिजे. आणि मग शब्द फिरवू देणार नाही आम्ही...(राऊंचा हात हातात घेऊन त्यावर प्रेमाने थोपटत मस्तानी बोलते) आप्पास्वामींच्या कारकुनानं सांगितलं की मस्तानीनं सूर्य उगवायच्या आत पुण्याची वेस ओलांडून बुंदेलखंडाच्या रोखानं निघून जावं. आप्पास्वामींनी आम्हाला हुकुम केला आणि आम्ही पुण्याच्या बाहेर पडलो. आम्हाला सक्त हुकुम होता की आम्ही कुणालाही काहीही न कळवता ताबडतोब पुण्याची वेस ओलांडून मार्गाला लागलं पाहिजे. सारी तयारी करूनच आम्हाला हुकुम दिलेले होते. (दोन क्षण शांतता. मस्तानी खुरमांडी बदलून पाय समोर घेते आणि गूढघ्यानवर हाताचा विळखा घालत म्हणते) राऊ... तुम्ही दिलेल्या वाचनाची आठवण आहे ना? आप्पास्वामींनी हुकुम दिला आणि मीही तो मानला. (राऊंची मुद्रा अत्यंत दुःखी होते. त्यांचं मन समजून घेणं त्यांच्या लहान बंधूंना मान्य नाही याचं दुःख त्यांच्या चेहेऱ्यावर दिसून येत आणि मस्तानीचं मन पिळवटून निघतंं.) राऊंनी दु:खी होऊ नये. ज्याचा इलाज माणसाच्या हातात नसतो त्याचं दु:ख करूनही उपयोग नसतो. आप्पास्वामींची मर्जी मोडायची नसेल तर मला पुण्यात राहता येत नाही. तुम्ही आलात खरे मला परत पुण्यात नेण्यासाठी परंतु आप्पास्वामींची आज्ञा नसतानासुद्धा आम्ही याव? त्यापरीस या चरणांशी एक विनंती आहे. मी पुण्यात राहाणं आता शहाणपणाचं होणार नाही. माझ्याबद्दल आता राऊंच्या हवेलीपर्यंत गवगवा झालेला आहे. छोटे समशेरबहाद्दरही यातून सुटलेले नाहीत. तेव्हा राऊंनी आता मला परत पुण्यास ठेवण्याचा हट्ट धरू नये. कारण मी पुण्यात परत येणं याचा आता अर्थ एकच आहे. लोक असं म्हणतील की राम-लक्ष्मणासारख्या या दोन भावांच्यात मस्तानिमुळे वितुष्ट आलं. या विषारी शब्दांनी लोक मला टोचून मारतील. राऊ! कुणी तोंडावर म्हंटल नाही तरी मनात म्हणतीलच. मनातले शब्द प्रत्यक्ष बोलण्यापेक्षाही जास्त जहरी असतात. तरीही राऊंच्या आज्ञेबाहेर ही दासी नाही.

(डोळ्यातून वाहणारी आसवं रोखण्याचा प्रयत्न करत मस्तानी पुढे बोलू लागते) एक सांगायचं होत राऊ... आम्हा बायकांना माहेरची वाट जिवाभावाच्या मैत्रिणीसारखी प्रिय असते. पण राऊ, त्या दिवशी पुण्याहून आम्ही माहेरच्या या वाटेला लागलो तेव्हा तीच वाट आम्हाला वैरिणीसारखी झाली. आमचं माहेर आता तुमच्यामध्येच आहे. ते वेगळ नाही. पण हा जन्म स्त्रीचा पडला. आम्ही दोन दिवस वाट चालत असताना मनात एक विचार आतून कसा डंख देत होता. साऱ्यांनी वाऱ्यावर सोडलं तरी स्त्रीला आपल्या माहेरची आशा असते. तो आसरा, ती सावली स्वप्नासारखी असली तरी त्या आधारावर कठीण प्रसंगातही सतीला दिवस काढता येतात. पण राऊ, ही वाट आमच्या माहेरची आहे अस फक्त म्हणायचं. कोण आहे आमचं तिथं? अस वाटत की, आपल्याला कुठतरी माहेर असावं. जेव्हा आयुष्यात पराभवाचा क्षण येईल किंवा परमेश्वराच्या मनात आपली ताटातूट अटळ असेल तर तेव्हा कुशीत दडायला कुठतरी माती असावी. लग्न झालेल्या बाईला माहेरकडून चोळी-बांगडी मिळते. आम्हा कलावंतीणीना कोण देणार ही चोळीबांगडी? कुणाच्या कुशीत मान खुपसून आम्ही मनातलं दु:ख सांगाव? इतक्या दूर, एकाकी वारा, वादळ, पावसात माझ्यासारख्या क्षुल्लक कंचनीसाठी राऊंच इथवर येणं झालं. माझी समजूत काढून इथून मला परत पुण्याला घेऊन जाणं होत आहे. राऊंना सोडून माहेरच्या दिशेन मी तुडवालेली वाट आता इथेच संपली आहे. आता हातात हात घालून परतीचा प्रवास पुण्यापर्यंत आपण जोडीनं करणार आहोत. ही वाट जिथ संपली तेच गाव चोळी-बांगडी म्हणून राऊ या मस्तानीला द्या. अर्थात मनात असेल तरच! आमचा कशासाठीच हट्ट नाही.

***********