Friday, September 27, 2019

तो आणि ती..... (भाग 3 आणि 4)





तो आणि ती............ यशोदा! (भाग 3)


"गोपाला.... प्रत्येक स्त्रीला बाळाला जन्म देतानाच्या वेदना कायम लक्षात राहातात आणि त्याहूनही जास्त लक्षात राहातं ते बाळाचा जन्म घेताच आलेला रडण्याचा पहिला आवाज. मी  मात्र जन्म देताना पूर्ण ग्लानीत होते... जाग आली तेव्हा तू कुशीत होतास. जन्मतःच आपल्या उजव्या पायाचा अंगठा तोंडात घालून चोखत होतास. तुला पहाताच माझा उर भरून आला आणि काहीही कळण्याच्या आत मी तुला पदराखाली घेतला. तुझ्या त्या कोवळ्या ओठांच्या स्पर्शात परमोच्य सुख होतं. किस्ना, तू दिसामासाने वाढत होतास आणि तुझा खट्याळपणा देखील त्याच गतीने वाढत होता. बंसिधरा...... गोपींच्या तक्रारी... तुझं त्यांच्या घरात शिरून लोणी चोरणं.... गोकुळातल्या सर्व गुरांना एकत्र करून आपल्या बासरीवर नादावण.... सर्वस्व मी मातेच्या हृदयाने आकंठ जगत होते..... तरीही......"


"माते....आज इतक्या वर्षांनी विचारांच्या वेगाने आणि मातेच्या मनासोबत इतक्या दूर मला भेटायला आली  आहेस ते याच तरीही.... बद्दल सांगायला तर नव्हे?"


"मनमोहना...... तुला माहीतच आहे रे माझ्या अंतरीच गुज. हो! आज इथे वृंदावनात असूनही मी द्वारकाधीशाच्या द्वारकेत त्याच्या प्रासादाच्या श्री आसनावर बसले आहे ते आई यशोदेच्या मनाने. तुझ कोमल... खट्याळ.... शूर आणि प्रेमळ शैशव मी आकंठ जगले यात वादच नाही. पण तरीही खोल मनात ही जाणीव होती की तू केवळ माझा पुत्र नाहीस... तू जगद्उद्धारासाठी आलेला महापुरुष आहेस. मात्र ही जाणीव मी कायमच जाणून-बुजून दडपून टाकायचे. तुझ्याबद्दल कोणीही कितीही तक्रारी केल्या तरी तुला क्षणापुरते लटके रागावायचे... पण मग माझ्या पदराआड लपवून टाकायचे. नंदना, मला भीती होती की तुला मी रागावले आणि त्या रागाच्या भरात तुझ्याकडे पाठ केली तर कदाचित् मी वळून बघेन तेव्हा तू तिथे नसशीलच."


"आई, मी शरीराने तुझ्यापाशी असलो किंवा नसलो तरी माझ बालमन कायमच तुझ्याभोवती रुंजी घालत राहाणार आहे; हे तुला माहित आहे न? तुझ्या मातृप्रेमाचे धडे घेतच मी मोठा झालो आहे. तू कायमच  माझा... फक्त माझाच काय पण संपूर्ण गोकुळाचा मातेच्या प्रेमाने सांभाळ केलास. मी तुझ्याच पावलावर पाउल ठेऊन आज द्वारकेचा सांभाळ करतो आहे."


"मधुसूदना, तुझ्याशी बोलताना कोणी जिंकू शकेल का? तुझ्या मनात आजही माझी आठवण आहे हे समजून आज माझ्या जिवनाच सार्थक झालं. एक सांगू गिरिधरा, मथुरेचे राजमंत्री अक्रूर तुला घ्यायला आले तो दिवस मला तुझ्या माझ्या आयुष्यातून पुसून टाकता आला असता तर किती चांगलं झालं असतं. मग तू कायमच माझ्याजवळ गोकुळात राहिला असतास."


"माते, पण माझा जन्म..........."


"नको वासुदेवा! नको आठवण करून देऊस... सगळं सगळं जाणून आहे मी. मृगनयना, तू मात्र हे विसरतो आहेस की माझं हृदय आईचं आहे. तू एकदा पाठ करून गोकुळातून निघाल्यानंतर एकदाही वळून आला नाहीस रे. आजही मी सांजसमयी  तुझ्या वाटेकडे डोळे लाऊन बसते. वाटतं कदाचित् खांद्यावर घुंगुरकाठी घेऊन एका हाताने बासरी वाजवत गुरांमागून येऊन तू आज देखील अचानक समोर उभा राहशील. पण आता मात्र माझे नेत्र दमले आहेत. म्हणूनच आज मी मनाच्या वेगाने आईच्या वात्सल्याने तुला भेटायला आले आहे. मुरलीधरा... आज माझं एकच मागण आहे."


"माते यशोदे........ अस निर्वाणीचं नको ग बोलूस. मी परत गोकुळाला परतलो नाही कारण गोकुळ सोडताना जे निष्पाप मन मी घेऊन निघालो होतो ते कुठेतरी हरवून गेलं. त्यांतर जो कृष्ण उरला तो तुला सहन झाला नसता. सांग आई....... मी काय केलं तर तुला बरं वाटेल?"


"मुरलीधरा, मी देहाने गोकुळातल्या तुझ्या लाडक्या उखळापाशी बसले आहे. तू तुझ्या द्वारकेत बसून तुझ्या मधुर मुरलीचे स्वर आळव............. आता हृदयातल्या तुझ्या बाललीलांच्या आठवणींमध्ये आणि कानात गुंजणाऱ्या तुझ्या मुरलीच्या स्वरांच्या सानिध्यात मला माझा शेवटचा श्वास घ्यायचा आहे........."


"आssssssssई.......................... माते....................... यशोदे.......!!!"

------------------------------------------------------






तो आणि ती................ राधा ! (भाग 4)


"राधे...... तू आणि इथे द्वारकेत?"


"तुला देखील वाटलं नाही ना की मी इथवरचा पल्ला गाठेन? त्या स्वप्नवत नंदनवनातील सुरक्षित आयुष्यातून बाहेर पडून केवळ तुझ्या शेवटच्या.......दर्शनासाठी मी द्वारकेचा दरवाजा वाजवेन?"


"शेवटच्या? का राधे? कुठे जाते आहेस तू? असे निर्वाणीचे शब्द तुझ्यासारख्या जीवनाने ओतप्रोत भरलेल्या स्त्रीला शोभत नाहीत. तुझ्यावरच्या माझ्या प्रेमाचे कारण हेच तर आहे की तू कायमच सळसळत्या उत्साहाने ओसंडत असायचीस. स्त्रीत्व म्हणजे काय ते तूच तर मला समजावलस. कधी अबोल डोळ्यांनी, तर कधी धावत्या शब्द लडयांनी, कधी उत्कट स्पर्शातून तर कधी व्याकुळ मिलनातून... अनेकदा मात्र ओसंडत्या भक्तीतून ते जास्त जाणवलं.......... मग ती रात्री-बेरात्री रचलेली रासक्रीडा असो किंवा यमुनेच्या पात्रातील तुझे नाहाणे असो..... तुझा तो प्रसन्न टवटवीत चेहेरा कायम मला जीवनातील निरामय आनंदाचा अर्थ सांगून गेला आहे..... आणि आज मात्र तू हे असे निर्वाणीचे बोलते आहेस?"


"कृष्णा...... तुझे हे दर्शन शेवटचे असे मी का म्हणाले हे तुला खरच कळले नाही का?की आता तू तुझ्या राधेशी देखील शब्दच्छल करतो आहेस? किंवा अस म्हणू; तू देखील तुझ्या राधेला समजू शकला नाहीस? जर तुझ्या समजण्यापलीकडे ही राधा असेल तर मग मी इतरांकडून काय अपेक्षा करावी? मोहना.... माझी सासू..... माझा पती अनय...... मला एकच प्रश्न सतत विचारायचे. संसारात असूनही तू नसतेस.... तू तुझ्या मुलांमध्ये असूनही त्यांच्यात रमत नाहीस..... तो गेल्यानंतर आपले उत्सव... आपले सण..... केवळ आयुष्याचा एक भाग  म्हणून करतेस. अस काय आहे त्याच्यात? मधुसूदना... त्यांच्या या प्रश्नांवर देखील मी काहीच बोलायचे नाही. त्यांना वाटायचं की मी उत्तर न देऊन त्यांचा अपमान करते आहे. पण माझ्याकडे याचे उत्तरच नव्हते रे."


"राधे.... काही प्रश्नांची उत्तरे आपल्याकडे नसतात आणि काही प्रश्नांची उत्तरे असूनही ती न दिलेलीच चांगले असते."


"मोहना.......... तुझ्या या वाक्यात सर्वकाही आले रे. तुला कळला आहे 'मी शेवटचे दर्शन घेण्यासाठी आले;' या माझ्या बोलण्याचा अर्थ. पण मनमोकळेपणी ते कबुल करायला तू आता नंदनवनातील गोपाळ राहिला नाहीस. खूप बदलून गेलास रे...... वृन्दावनातला कन्हैया तोलून मापून बोलत नसे. गोपिकांना छेडताना त्यात जितका स्वच्छ भाव होता आणि नजरेत केवळ प्रेमळ चेष्टा होती; तो माझा किसन आता मला तुझ्यात दिसत नाही. वयाने माझ्याहून लहान असणाऱ्या तुझ्यावर एका नवथर प्रेयसिप्रमाणे प्रेम करताना मी समाजाची........ घरच्यांची..... आप्तजनांची कोणाचीच तमा बाळगली नाही. तू माझा प्रियकर होतास...... आणि कायमच राहाशील...... मला माहित आहे; तुझ्या मनात देखील खोल कुठेतरी एक कळ उठतेच माझ्या नावासरशी. म्हणूनच आज इथे या खाऱ्या समुद्राच्या सानिध्यात तू एकटाच बसला आहेस; तुझं गण-गोत लांब सोडून. गोपाला... येते मी. या तुझ्या द्वारकेत राधेच्या प्रेमाला जागा नाही हे मला माहित आहे. मात्र जाताना एक प्रश्न विचारते त्याचे उत्तर दे........ अहं! मला नाही..... तुझ्या मनाला.................... आजही हातात चक्र असताना देखील कंबरेची ती बासरी तू त्यागलेली नाहीस........... ती वृन्दावनाची आठवण की या राधेची?"

क्रमशः










Friday, September 20, 2019

तो आणि ती............... प्रस्तावना (भाग 1 आणि 2)


तो आणि ती............... प्रस्तावना

तो जगद्नियंता.......... विश्वनिर्माता......... बंसीधर........ गोपाल.......... यदुकुलनंदन.......... देवकीपुत्र............... कृष्ण..... मधुसूदन............ मोहन............ आणि वासुदेव! असा खूप काही. सर्वांमध्ये असूनही नसलेला.......... चमत्कार करूनही मानवी रुपात रमलेला. अशा त्या विश्वरुपी मानवाशी त्याच्या आयुष्यात आलेल्या प्रत्येक स्त्रीची भावनात्मक गुंतवणूक वेगवेगळ्या स्तरावरची होती. त्याची जन्मदात्री आई देवकी, त्याचा सांभाळ करणारी यशोदा, त्याच्यावर निस्सीम प्रेम करणारी त्याची प्रेयसी राधा, त्याची धाकटी बहिण सुभद्रा, त्याची सखी द्रौपदी, त्याच्या चार आत्यांपैकी त्याला अत्यंत प्रिय आणि जवळची आत्या कुंती आणि त्याच्या आठही पत्नी... रुक्मिणी, सत्यभामा, जांबवती, मित्रविंदा, सत्या, लक्ष्मणा, भद्रा आणि कालिंदी.......... प्रत्येकीने त्याला आपल्या भावनेने बघितलं. त्याने देखील त्या भावनेचा आदर करून त्याप्रमाणे त्या प्रत्येकीला आपल्या जीवनात स्वीकारलं. या नात्यांचा गोषवारा म्हणजे तो आणि ती.......... यात तो कायमच वसुदेव पुत्र श्रीकृष्ण आहे. मात्र ती प्रत्येकवेळी वेगळी आहे. त्याच्या आयुष्यात आलेल्या या प्रत्येक स्त्रीच्या मनातले भाव इथे मांडण्याचा प्रयत्न केला आहे.... 


भाग 2


तो आणि ती............. देवकी! 

"यादवा, आज आयुष्याच्या उत्तरार्धात मागे वळून बघते तेव्हा वाटत अनेकविध घटनांनी भरलेलं आयुष्य जगले मी. वडिलांची आणि मोठ्या भावाची लाडकी होते मी. कितीतरी कौतुकाने कंसदादाने माझं लग्न तुझ्या वडिलांशी लावून दिलं होत. त्यादिवशी आम्ही सगळेच कितीतरी आनंदात होतो. मात्र त्याचवेळी ती आकाशवाणी झाली आणि माझ्या आयुष्याचे फासेच फिरले. कारावासात असताना अनेकदा मनात येऊन गेलं; जर ती आकाशवाणी झालीच नसती तर; कदाचित् आयुष्य वेगळं असत. कंसदादाच्या वधानंतर तू स्वतःचा राज्यभिषेक न करता हट्टाने तुझ्या वडिलांना सिंहासनावर बसवलंस; त्यावेळी मला तुझी माता असण्याचा अभिमान वाटला. मात्र तुझ्याअगोदारचे माझ्या सहा पुत्रांच्या मृत्यूचे दु:ख सतत माझ्या हृदयातली जखम ओली ठेवत होते...."

"माते, तू मला तेव्हाच का नाही सांगितलेस तुझ्या मनीचे दु:ख? बलराम दादाकडे तू बोललीस आणि त्याने मला सांगितले तेव्हा मला तुझ्या मनीची व्यथा कळली. मात्र त्यानंतर बलराम दादाच्या मदतीने मी तुझे सर्व पुत्र.... माझे सर्व ज्येष्ठ बंधू यमराजाशी युद्ध करून घेऊन आलोच ना?"

"यदुकुलभूषणा, माझ्या सर्व पुत्रांना घेऊन येणे ही तुझ्या अनेक लीलांमधील एक लीला होती; हे का मला माहित नाही? कारण तू तर सर्वांचं मन वाचतोस. मग तुला प्रत्यक्ष तुझ्या जन्मदात्रीच्या मनीची व्यथा सांगायची वेळ का यावी? मोहना, तू जरी माझा पुत्र असलास तरी तुझं खरं रूप माझ्यापेक्षा जास्त चांगलं कोणाला माहित असणार रे? हे जगद्नियांत्या, माझ्या गेल्या जन्मीच्या तपस्येच फळ म्हणून मी तुला माझ्या उदरातून जन्म दिला. मात्र तुझ्या बाललीला मी बघू शकले नाही. माझा पान्हा कायमच थिजलेला राहिला."

"माते, आपण भूतलावर जन्म घेतो ते आपली प्राक्तन भोगण्यासाठीच. मी अनेकदा मानवांच्या शक्तीबाहेरच्या गोष्टी केल्या असल्या तरीही मला तुमच्यातलाच एक राहू दे ग. माझ्या जन्माचं रहस्य फक्त तुझ्या माझ्यातच असू दे. त्याविषयीची चर्चा तू इतर कोणाकडे करू नकोस ह. मी कोणीही असलो तरी सध्या जन्माने तर मी मानव आहे ना? मानवीय भावना माझ्या मनातही रुजल्या आहेत. मीदेखील एका आश्वस्त स्पर्शाचा भुकेला आहे ग. कदाचित् म्हणूनच परत परत मी या भूतलावर जन्म घेत असतो."

"नंदना........... माझ्या पुत्रा..... ये असा माझ्या जवळ. ये! तो तुझा हिरेजडीत मुगुट थोडा लांब ठेऊन माझ्या मांडीत डोळे मिटून पड बघू! ये रे माझ्या बाळा....  तुझ्या काळ्याभोर केसांमधून हात फिरवून मी देखील माझ्या मनातल्या तृषार्त मातेची इच्छा पूर्ण करून घेते. तुझ्या बाललीला बघू शकले नाही; किमान तुझ्या पुत्र स्पर्शाचे सुख तरी मला या उतार वयात उपभोगू दे. आता माझ्या मनात याहून जास्त काहीही इच्छा उरलेली नाही."

क्रमशः


Friday, September 13, 2019

श्री. नरेंद्र दामोदरदास मोदी आणि मंत्रमुग्ध मी!

श्री. नरेंद्र दामोदरदास मोदी आणि मंत्रमुग्ध मी!

माझ्या लेखाचं शीर्षक वाचून आणि मी जे काही लिहिणार आहे ते वाचून कदाचित काही जणांना वाटू शकतं की पंतप्रधानांना भेटता आलं.... अगदी जवळून बघता आलं..... बोलायला मिळालं..... याबद्दल ही उगाच शेखी मिरवते आहे. पण खरं सांगू? सात सप्टेंबर 2019 ही माझ्या आयुष्यातली सोनेरी अक्षरांनी लिहून ठेवावी अशी सकाळ होती-आहे-आणि राहील. त्यामुळे खूप विचार करून ठरवलं; कोणाला काहीही वाटू दे; आपल्या मनातला आनंद, आयुष्यभर जतन करावा असा हा क्षण; त्याबद्दल लिहिलंच पाहिजे!!! तर.... पहिल्या क्षणापासूनच घटना कशा घडत गेल्या ते सांगते.....

सहा सप्टेंबर संध्याकाळची साधारण पाचची वेळ होती. विले पार्ल्याचे विध्यमान आमदार ऍड. पराग अळवणी त्यांच्या श्रीगणेश उत्सवातील नेहेमीच्या कार्यक्रमाप्रमाणे सार्वजनिक गणेशांचे दर्शन करण्यास निघाले होते. त्याचवेळी त्यांचा मोबाईल वाजला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय श्री. देवेंद्रजी फडणवीस यांचाच फोन होता तो!


मुख्यमंत्री : पराग, विमानताळाजवळ ऐतिहासिक गणपती कोणता आहे? पीएमओ कार्यालयातून विचारणा झाली आहे की खुद्द पंतप्रधान मुंबईमधील एखाद्या जुनी परंपरा जपलेल्या अशा ऐतिहासीक श्रीगणेशाचे दर्शन घेऊन आपल्या महाराष्ट्र दौऱ्याची सुरवात करू इच्छितात.

पराग : साहेब, विमानताळापासून केवळ पाच मिनिटांमध्ये पोहोतचता येईल अशी लोकमान्य सेवा संघ ही संस्था आहे. योगायोगाने येथील श्रीगणेश उत्सवाला यंदा शंभरावे वर्ष सुरू होते आहे. ही संस्था खरोखरच ऐतिहासीक आहे. कारण येथे महात्मा गांधी, पंडित नेहेरू, नेताजी सुभाषचंद्र बोस, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि अगदी अलीकडचे म्हणायचे तर आदरणीय पूर्व पंतप्रधान आदरणीय श्री. वाजपेयीजी अशा महान व्यक्ती येऊन गेल्या आहेत. अनेक महान कलाकार, लेखक देखील या संस्थेला भेट देऊन गेले आहेत; आणि ही संस्था पूर्वीपासूनच अनेक सामाजिक कामांमध्ये सक्रिय आहे.

मुख्यमंत्री : ठीक आहे! मी नक्की काही सांगू शकत नाही. मात्र तुम्ही तयारीला लागा.

फोन बंद झाला आणि परागजींनी स्वतःचा पुढील सगळा कार्यक्रम रद्द केला. काही मोजक्याच कार्यकर्त्यांना फोन करून भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात बोलावून घेतले. अजून काहीच नक्की नव्हते. त्यामुळे विषय बाहेर पडून चालणार नव्हते. मात्र खुद्द मुख्यमंत्र्यांनी 'तयारीला लागा'; सांगितल्याने कामाला लागणे देखील आवश्यक होते. परागजी कार्यालयात पोहोचायच्या अगोदरच ट्रॅफिक विभाग आणि पोलीस कार्यालयातून त्यांना फोन येण्यास सुरवात झाली आणि विचारणा करण्यास सुरवात झाली, 'नक्की रूट कसा असणार आहे? लोकमान्य सेवा संघ या संस्थेविषयीची माहिती लवकरात लवकर आम्हाला कशी मिळू शकते?' परागजी कार्यालयात पोहोचेपर्यंत आम्ही काहीजण जमलोच होतो. त्यांनी आम्हाला त्यांना आलेल्या फोन विषयी माहिती दिली. प्रत्येकाच्या आनंदाला पारावार उरला नाही. प्रत्यक्ष आपले लाडके पंतप्रधान इथे आपल्या पार्ल्यात येणार आहेत या नुसत्या विचाराने प्रत्येकजण उत्साहाने ओसंडून वाहू लागला. मात्र अजूनही ही माहिती कोणालाही द्यायची नव्हती. त्यामुळे आनंद मनातच साठवत प्रत्येकजण कामाला लागला.

सर्व प्रथम आम्ही लोकमान्य सेवा संघाच्या कार्यकारी मंडळाला भेटायला गेलो. परागजी कार्यकारी मंडळींना भेटले आणि म्हणाले, 'एक वेगळीच माहिती घेऊन आलो आहे; अजून खात्रीलायक पुष्टीकरण नाही, मात्र खुद्द मुख्यमंत्री साहेबांनी तयारीला लागा म्हंटल आहे....' त्यानंतर त्यांनी देवेंद्रजींनी दिलेली माहिती कार्यकारी मंडळाला दिली. आता त्यांची अवस्था देखील आम्हा कार्यकर्त्यांसारखीच झाली. 'खुद्द पंतप्रधान आदरणीय श्री. नरेंद्रजी मोदी आपल्या संस्थेच्या श्रीगणेशाच्या दर्शनासाठी उद्या सकाळी येऊ शकतात.!!!' संस्थेच्या कार्यकारी मंडाळाचा आनंद गगनात मावेना. सर्वांनीच एकमताने म्हंटले, 'अहो, नक्की होऊ दे किंवा नको, आपण कामाला तर लागू या'. यानंतर काय काय केले पाहिजे याची चर्चा सुरू असतानाच ट्रॅफिक विभाग, पार्ले पोलीस, मुंबई पोलीस अशा सर्वच एजन्सीजच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे फोन्स परागजींना यायला लागले होते. यासर्व अधिकाऱ्यांकडून फोन यायला लागल्याने परागजींना खात्री झाली की वरूनच चक्र फिरायला सुरवात झाली आहे.

सर्वप्रथम रूट नक्की करण्यात आला. महानगरपालिकेचे के पूर्व विभागाचे सहाय्यक आयुक्त यांच्याशी बोलणे केले गेले. त्यांनी देखील त्यांच्या सर्व अधिकाऱ्यांना बोलावून घेतले. मात्र कोण येणार आहे हे अजूनही सांगायचे नसल्याने त्यांनी त्यांच्या कर्मचारी वर्गाला सांगितले की आजची रात्र कोणीच घरी जाणार नाही आहे. VIP movement आहे. आणि यानंतर पोलीस, महानगरपालिका असे सर्वच कामाला लागले. संपूर्ण परिसर विविध security agencies च्या अधिकाऱ्यांनी भरून गेला. पोलीस सहआयुक्त, अपर आयुक्त , उपयुक्त, स्थानिक पोलीस स्टेशन वरील वरिष्ठ पोलीस निरीक्षक हे सर्वजण स्वतः आले. सुरक्षेच्या संदर्भातील जवाबदऱ्या योग्य प्रकारे पूर्ण व्हाव्यात यासाठी विविध खाती कामाला लागली. यासर्वांव्यतिरिक्त SPG (Special Protection Group) ने संस्थेचे आवार, संस्थेची जुनी इमारत, श्रीगणेश प्राणप्रतिष्ठापना असलेला सभामंडप याची केवळ पाहणी केली असे नाही तर संपूर्ण इमारतीचा ताबा घेतला.

एकीकडे आमची देखील तयारी चालूच होती. श्रीगणेशाच्या जवळील फुलांची सजावट; पंतप्रधान येतील त्यावेळी लागणारी इतर तयारी यासर्व कामाची बारीक नोंदणी करून प्रत्येकाला काम वाटून देण्यात आले. उत्तम फुलांच्या माळा मिळवणे आवश्यक होते. मात्र भर गणपती उत्सवात वेगळी आणि चांगली फुले मिळवणे म्हणजे खरी तारेवरची कसरत होती. कुठे आणि कोणती फुले लावायची याची सांगोपांग चर्चा होताच फुलांची सोय करणारी मंडळी रात्रीच दादरच्या फुल बाजाराकडे रवाना झाली. येणाऱ्या पहिल्याच ट्रक मधून उत्तम फुले उतरवून घेऊन ती लोकमान्य सेवा संघाच्या सभागृहात आणून त्याच्या माळा बनवण्यात आल्या. डेकोरेटरला बोलावण्यात आले. सभागृहामध्ये उत्तम गालिचा लावणे आवश्यक होते. त्याच प्रमाणे इतर लहान सहान गोष्टी देखील होत्याच. त्याला कल्पना देताच तो म्हणाला गालिचा आणायला जातो आणि तो गायब झाला. एक तास झाला.... दोन तास निघून गेले तरी त्याचा पत्ता नाही. त्यावेळी खुद्द परागजींनीच त्याला फोन केला. तो म्हणाला,'साहेब मी वसईला आहे.' परागजी त्याच्यावर भलतेच वैतागले. 'अरे, इथे काय प्रसंग आहे; आणि तू वसईला काय गेलास?' त्यांनी चिडून त्याला विचारले. त्यावर तो म्हणाला,'साहेब, गणपती उत्सवात माझे सगळेच गालिचे दिले गेले आहेत. मात्र तुम्ही ज्या व्यक्तीचे नाव घेतले आहे; त्यांच्या केवळ नावानेच मी सुखावलो आहे. हे काम माझ्या घरचे आहे. माझ्या घरी देव येतो आहे.... म्हणून मी नवीन गालिचा आणायला वसईला आलो आहे. काळजी करू नका.... मी इथून निघालोय. तासाभरात पोहोचेन. सकाळी चारच्या आत गालिचा लावून सभागृह तयार असेल.' त्याच्या बोलण्याने परागजींना भरून आले. शेजारी उभ्या विनीतला ते म्हणले,'अरे हा वेडा आहे रे. नवा गालिचा आणायला गेला हा वसईला. आपण असे कितीसे पैसे देणार त्याला भाड्याचे?' विनीतने हसून म्हंटले,'साहेब, तुम्ही एक वैश्विक व्यक्तिमत्व आणता आहात पार्ल्यात. ज्याला जसे जमेल तसे आणि ते तो करायला तयार आहे. तुम्ही फक्त काम सांगा.'

ही चर्चा होत असतानाच परागजींना परत एकदा लोकमान्य सेवा संघ कार्यालयात बोलावण्यात आले. स्वतः पोलीस आयुक्त सगळी पाहणी करण्यासाठी आले होते. सर्व प्रकारची चर्चा झाल्यानंतर आणि एकूण व्यवस्था नीट होते आहे हे लक्षात आल्यानंतर त्यांनी परागजींना सांगितले की आम्ही जास्तीत जास्त पंधरा लोकांनाच आत येऊ देऊ. कारण पंतप्रधानांचे कार्यक्रम असे आयत्यावेळी ठरत नाहीत; आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये कोणतीही अनुचित घटना न व्हावी ही आमची जवाबदारी आहे. हे ऐकताच परागजींना धक्काच बसला. ते म्हणाले,'अहो, ही संस्थाच जवळ जवळ शंभर वर्षे जुनी आहे. या संस्थेचे अनेक सामाजिक उपक्रम असतात. त्यामुळे त्यांचे पदाधिकारीच पंधरापेक्षा जास्त आहेत. त्याव्यतिरिक्त आज रात्रभर खपणारे आणि पक्षाचे वर्षानुवर्षे काम करणारे असे आमचे काही कार्यकर्ते देखील असतीलच. त्यांच्या दृष्टीने आदरणीय पंतप्रधानांना केवळ पाहाता येणे ही आयुष्यभराची पुंजी आहे. तुम्ही फक्त पंधरा व्यक्ती म्हणालात तर फारच अवघड होईल.' अशी चर्चा होत होत शेवटी केवळ चाळीस लोकांना पास मिळतील; असे आयुक्तांनी सांगितले. प्रत्येक व्यक्तीचा फोटो आणि इतर आवश्यक माहिती गोळा करण्याचे काम मिलिंद शिंदे या कार्यकर्त्याकडे देण्यात आले; अर्थात तरीही आत कोण कोण जाऊ शकेल हा अंतिम निर्णय SPG कडेच होता. एकीकडे सभागृहाची होणारी फुलांची सजावट, नवीन आलेला गालिचा पसरणे, इतर लहान मोठे माहिती फलक लावणे अशी आमची तयारी जोरदार चालू होती; त्याचवेळी पोलीस आणि त्यांच्या इतर security agencies ची त्यांच्या पद्धतीने तयारी चालु होती.

आजूबाजूच्या प्रत्येक इमारतीच्या गच्चीमध्ये पोलीस तैनात करण्यात आले होते. रस्त्यावर देखील अनेक पोलीस आणि SPG चे गार्डस तैनात होते. आयुक्तांनी जरी केवळ चाळीस व्यक्तींची परवानगी दिली होती; तरी या चाळीस जणांचे पास तयार करण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची जमवाजमव करणे हे खूप मोठे काम होते. मिलिंद शिंदे यांना सर्वांशी संपर्क साधून त्यांची माहिती आणि पासपोर्ट आकाराचा फोटो मिळवून ती फाईल तयार होईपर्यंत रात्रीचे तीन वाजले होते. त्यानंतर मिलिंदजी स्वतःच SPG च्या क्रॉफर्ड मार्केट येथील कार्यालयात गेले आणि तेथील अधिकाऱ्यांच्या हातात असलेली माहिती सुपूर्द केली. त्यानंतर या चाळीस जणांची संपूर्ण स्क्रुटीनी करण्यात आली. SPG कार्यालयाचे समाधान झाले आणि प्रत्येकाचा पास मिलिंदजींच्या हातात पडला त्यावेळी सकाळचे सात वाजले होते. हातात पास पडताच मिलिंदजींनी परागजींना फोन करून त्याची माहिती दिली आणि ते ट्रेनने पार्ल्याच्या दिशेने निघाले. रात्रभर एक सेकंद देखील डोळ्याला डोळा नसूनही अत्यंत उत्साहाने आणि आपण काम पूर्ण केलेले आहे या समाधानी चेहेऱ्याने ते लोकमान्य सेवा संघामध्ये पोहोचले. त्यावेळी सभागृह छान नटून तयार झाले होते. उत्तम फुलांच्या माळा सभागृहाची शोभा वाढवत होत्या. नवा कोरा लाल गालिचा या सौंदर्यात भरच घालत होता. विविध उपक्रमांचे माहिती फलक नव्या झळाळीने चमकत होते; आणि आपल्याला दिलेली प्रत्येक जवाबदारी पूर्ण करून प्रत्येक जण येणाऱ्या सुवर्ण क्षणासाठी सज्ज झाला होता.

सात सप्टेंबरची सकाळ भूतलावर अवतरली. आम्हा पार्लेकरांसाठी 'आजी सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा घनू!!!' ही एकच भावना मनात होती.

पंतप्रधान कसे आत येतील, त्यावेळी तिथे उपस्थित असणाऱ्या आम्हा चाळीसजणांनी कुठे आणि कसे उभे राहायचे याचे 'mock drill' तीन वेळा करण्यात आले. कोणीही आपल्या जागेवरून हलायचे नाही, पुढे यायचे नाही, मोबाईल्स बंद ठेवायचे, सेल्फी काढण्याचा प्रयत्न देखील करायचा नाही; या आणि अशा अनेक सूचना सतत पोलिसांकडून येत होत्या; आणि आम्हाला त्यांची प्रत्येक सूचना शिरसावंद्य होती. अहो, आज भारताचे मानबिंदू.... कर्मयोगी.... वैश्विक प्रतिमेचे... भारताचे आदरणीय पंतप्रधान आणि आम्हाला परमप्रिय असे श्री नरेंदजी मोदी यांना याची देही याची डोळा इतक्या जवळून आम्ही अनुभवणार होतो.... अजून काय हवं?

.....आणि तो क्षण आला. आदरणीय आणि परमप्रिय पंतप्रधान श्री. नरेंदजी मोदी यांची गाडी लोकमान्य सेवा संघाच्या आवारात आली. त्यांच्या सोबत महाराष्ट्राचे राज्यपाल श्री. भगत सिंगजी कोशियारी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस देखील होते. आमदार पराग अळवणी आणि संस्थेचे अध्यक्ष श्री. मुकुंदजी चितळे यांनी या सर्वच महनीय व्यक्तींना आदरपूर्वक संघ भवनातील पहिल्या मजल्यावरील पु. ल. देशपांडे सभागृहामध्ये आणले. इथेच श्रीगणेशाची प्राणप्रतिष्ठा केली असल्याने पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजींनी श्रीगणेश पूजन केले. गुरुजी पूजा सांगत होते आणि मोदीजी परमभाक्तिपूर्वक गुरुजी सांगतील त्याप्रमाणे पूजा करत होते. गुरुजींनी अथर्वशीर्ष म्हंटले. त्यानंतर मोदींजींनी श्रीगणेशाला माल्यार्पण केले. गुरुजींनी त्यांच्या हातावर तीर्थ दिले आणि विचारले,'आपण मोदकाचा प्रसाद घेणार ना?' त्यावर मंद हसत मोदींजींनी होकार भरला आणि अत्यंत प्रेमभराने उकडीचा मोदक स्वीकारला.

त्यानंतर मोदीजींच्या हस्ते याच सभागृहातील लोकमान्य टिळकांच्या अर्धाकृती पुतळ्याला माल्यार्पण करणे अपेक्षित होते. यावेळी इथे संस्थेचे काही कार्यकारी सदस्य उपस्थित होते. श्री. चितळे यांनी मोदींजींची यासर्वांशी ओळख करून दिली. यावेळी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार श्री. बहुलकरजी यांची ओळख देखील श्री. चितळे यांनी करून दिली. श्रीगणेश मूर्तीच्या मागील फ्लेक्स वरील देखावा श्री. बहुलकर यांनी डेरवण येथे स्वतः तयार केला आहे. याविषयीची माहिती स्वतः श्री. बहुलकरांनी आदरणीय पंतप्रधानांना दिली. त्यानंतर त्यांनी स्वतः चितारलेले लोकमान्य टिळकांचे चित्र श्री. मोदीजी यांना भेट दिले. याच चित्राची मूळ तैलचित्र राष्ट्रपती भवनमध्ये असल्याचे देखील त्यांनी सांगितले आणि त्यांनी स्वतः लिहिलेल्या आणि पूर्वी खुद्द पंतप्रधानांच्या हस्ते प्रकाशित झालेल्या पुस्तकाची प्रत देखील त्यांनी आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांना दिली. यावेळी भारतीय जनता पक्षाचे काही कार्यकर्ते देखील या सभागृहामध्ये उपस्थित होते आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते देखील होते; यासर्वांशी परागजींनी ओळख करून दिली.

त्यानंतर मोदीजी पु. ल. गौरव दालनामध्ये आले. याठिकाणी पार्ले विधानसभेचे भारतीय जनता पक्षाचे निवडून आलेले नगरसेवक, संघ परिवाराचे जेष्ठ कार्यकर्ते आणि लोकमान्य सेवा संघाचे कार्यकारी मंडळातील काही सभासद उपस्थित होते. पु. लंच्या अर्धाकृती पुतळ्याला माल्यार्पण करून मोदीजी दालनात आले. त्या मंत्रमुग्ध करणाऱ्या व्यक्तिमत्वला पाहून आम्ही सर्वचजण एकदम शांत झालो होतो. एकूणच काहीसं गंभीर वातावरण निर्माण झालं होतं. मोदींजींनी आमच्याकडे बघितलं आणि अगदी सहज विचारलं,'यहा आनेवाले लोग दिन मे कितना घंटा हसते हे? पु. लं. देशपांडे का नाम सुने और हसे नही ये कैसे चलेगा?' केवळ दोन वाक्य.... मात्र दालनातले वातावरण एकदम मोकळे होऊन गेले. हीच तर ताकद आहे मोदी नावाच्या त्या किमयागाराची! त्यांना पु. लं. माहीत होते.... त्याहूनही मोठी गोष्ट म्हणजे त्यांच्या येण्याने दालनात निर्माण झालेला तणाव देखील त्यांच्या लक्षात आला होता. त्यामुळे पु. लं. चा उल्लेख करत त्यांनी क्षणात वातावरण बदलून टाकले. त्यानंतर श्री. मुकुंदजी चितळे यांनी श्री. मोदीजींना पार्ल्याच्या इतिहासावरील पुस्तके भेट केली आणि तिथे अगोदरच ठेवलेल्या संस्थेच्या नोंद वहिमध्ये आदरणीय पंतप्रधानांनी त्यांचा अभिप्राय नोंदवावा अशी विनंती केली. श्री. मोदीजींनी मनापासून ती विनंती मान्य करून लोकमान्य सेवा संघाच्या नोंद वहीमध्ये सदर भेटीसंदर्भातील आपला अभिप्राय नोंदवला.

आता त्यांची निघायची वेळ झाली होती. परागजींनी 2011 मध्ये Town Planning Scheme या विषयावर '523 चौकड्यांचे राजकारण' हे पुस्तक लिहिले होते आणि 2018 मध्ये मी लिहिलेले 'कथा विविधा' या पुस्तकाचे अनावरण देखील झाले होते. ही दोन्ही पुस्तके आदरणीय पंतप्रधानांना द्यावीत अशी आम्हा दोघांची इच्छा होती. त्याविषयी परागजींनी आदरणीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे विनंती केली होती. अत्यंत मोकळ्या मनाच्या आणि सर्वसमावेषक स्वभावाच्या आदरणीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजींनी अत्यंत नम्रपणे ही इच्छा पंतप्रधानांना बोलून दाखवली. पंतप्रधानांनी देखील तितक्याच मोकळ्या मनाने आमची इच्छा पूर्ण केली; आणि आम्ही आमची पुस्तके आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांना देऊ शकलो. परागजींनी पुस्तक सुपूर्द करताना अत्यंत थोडक्यात त्यासंदर्भातील माहिती आदरणीय पंतप्रधानांना दिली; त्यांनी देखील मनापासून ते ऐकुन घेतले. आता आम्हाला वाटले या सर्वच महनीय व्यक्ती निघतील. मात्र काही क्षणांसाठी मोदीजी थांबले आणि आम्हाला एक ग्रुप फोटो काढण्याची सुवर्णसंधी मिळाली. आयुष्यभर जपून ठेवावा असा ठेवा आमच्या पदरात पडला.

त्यानंतर मात्र मुख्य कार्यक्रम मेट्रोच्या उद्घाटनाचा असल्याने सर्वचजण घाईने निघाले. पंतप्रधान खाली उतरले. आदरणीय राज्यपाल गाडीमध्ये जाऊन बसले. आदरणीय मुख्यमंत्री प्रोटोकॉल सांभाळण्यासाठी त्यांच्या गाडीमध्ये बसण्यासाठी निघाले. मोदीजी देखील त्यांच्या गाडीच्या दिशेने निघाले. लोकमान्य सेवा संघाची इमारत मध्य वस्तीमध्ये असल्याने आजूबाजूच्या सर्वच इमारतींमधील उत्साही नागरिक त्यांच्या आवारात जमलेले होते. ते सर्वचजण 'भारतमाता की जय'; 'मोदी-मोदी'; 'वंदे मातरम्' अशा घोषणा देत होते. आपल्या प्रिय पंतप्रधानांची एक झलक दिसावी यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत होता. कदाचित या जनसमुदयाची ही आंतरिक इच्छा मोदीजींच्या मनाला देखील स्पर्शून गेली. त्यांनी परागजिंकडे आणि आदरणीय श्री. देवेन्द्रजी यांच्याकडे बघून म्हंटले,'चलीये लोगोंको अभिवादन करते हें।' आणि त्यांना सोबत घेऊन ते स्वतः चालत इमारतीच्या आवाराबाहेर गेले. आजूबाजूच्या सर्वच आवारांमध्ये अनेक पार्लेकर उभे होते. ते बाहेर येऊ नयेत म्हणून पोलिसांनी कडक बंदोबस्त देखील ठेवला होता. मात्र सामान्यांमधूनच पुढे आलेल्या या असामान्य वैश्विक नेत्याने सर्व पार्लेकरांना हात उंचावून अभिवादन केले. परागजी, आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्या सोबत ते काही क्षण थांबून परत आत वळले... त्यावेळी परागजींच्या लक्षात आले की दुरवरील एका इमारतीमधील पहिल्या मजल्यावर बरीच गर्दी होती आणि आपल्या प्रिय पंतप्रधानांची एक झलक मिळावी याची तेआतुरतेने वाट पाहात आहेत; काहीशी हिम्मत करून त्यांनी आदरणीय पंतप्रधानांना ते सांगितले. त्या असामान्य नेत्याने परत दोन पावले मागे येऊन आपल्यावर प्रेम करणाऱ्या या पार्लेकरांना परत एकदा अभिवादन केले. मग मात्र झपझप चालत ते गाडीच्या दिशेने निघाले.... बसले.... आणि एका सुवर्ण घटनेची नोंद पार्लेकरांच्या हृदयावर करून त्यांनी आपल्या पुढील कार्यक्रमाच्या दिशेने प्रस्थान केले.

Friday, September 6, 2019

नृत्यांगना...... अहं.... (भाग 3)

नृत्यांगना...... अहं.... (भाग 3)

मागील दोन भागांमध्ये मी ज्या अभिनेत्रींविषयी आपल्याशी संवाद साधला त्या नृत्यांगना नव्हत्या. कदाचित म्हणूनच त्यांनी केवळ आपल्या नेत्रातून आणि अभिनयातून ती दोन्ही गाणी एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवली आहेत. मात्र आज मी तुम्हाला ज्या गाण्याबद्दल सांगणार आहे; त्या गाण्यातील अभिनेत्रीने शास्त्रीय नृत्याचे धडे घेतलेले होते. ती एक अत्यंत उत्तम नृत्यांगना होती आणि अजूनही याबद्दल कोणाचंही दुमत नसेल. ही अभिनेत्री म्हणजे वहिदा रेहेमान!

वहिदाजी अप्रतिम नृत्यांगना असूनही त्यांच्या सुरवातीच्या काळातल्या एका चित्रपटामध्ये त्यांना एक गाणं केवळ अभिनयातून लोकांपर्यंत पोहोचवायचं होतं. तसं बघितलं तर वाहिदाजींचा चेहेरा अवखळ नाही वाटत. त्यांच्या तारुण्यात देखील त्या प्रगल्भ आणि परिपक्व चेहेऱ्याच्या दिसायच्या. तरीही 'साहिब, बीबी और गुलाम' या चित्रपटामध्ये वहिदाजींनी एका अवखळ, पौग्नाडावस्थेतून तारुण्यात पदार्पण करणाऱ्या तरुणीची भूमिका अत्यंत उत्तम रितीने केली होती. त्या गुरुदत्त यांना भेटतात आणि त्यांना ते आवडायला लागतात. त्यावेळी गुरुदत्तना एका 'भवऱ्या'ची उपमा देत त्यांनी आपल्या लाडिक हावभावांनी आणि टपोऱ्या डोळ्यांमधून ते प्रेम उत्तम व्यक्त केले आहे.

वहिदाला ते गाणं सुचत असतं आणि ती ते लिहीत असते. गाण्याची सुरवात होते तीच मुळी शब्दांनी...

भँवरा बड़ा नादान हाय.... शब्द सुचताक्षणी ती ते लिहायला लागते. लिहिताना हलकेच तिची जीभ बाहेर येते. एक बालिश निरागसता जाणवते यातून.

बगियन का..... ती विचार करते आहे की तो नादान तर आहे पण मग काय? ती तेच तेच गुणगुणते... काय असेल बर तो बगीयन चा??? आणि मग तिला सुचतं.... बगीयन का मेहमान हाय....

आणि मग जणूकाही तिला सुचत जातं की तो कसा आहे.
भवरा बडा नादान हाय... बगीयन का मेहेमान हाय...
फिर भी जाने ना... जाने ना... जाने ना... कलियन की मुसकान हाय....
भँवरा बड़ा नादान ... हे जे शेवटचं नादान... आहे ते म्हणजे समोर एखादी व्यक्ती उभी असेल तर तिला चिडवल्यासारखं वाटतं नाही? तेच तिला अपेक्षित आहे!

ती पुढचे शब्द लिहीत असते त्यावेळी गुरुदत्त येतो. तिच्या ते गावी देखील नाही... आणि ती जे लिहिलं असते ते गुणगुणायला लागते.

कभी उड़ जाये... कभी मंडराये... ती त्या कागदाकडे बघत असते आणि जणू काही कागदावरच तिला तो अभिप्रेत चेहेरा दिसतो म्हणून की काय ती त्या कागदालाच चिडवते.... भेद जिया के खोले ना...


सामने आये... नैन मिलाये... मुख देखे कुछ बोले ना... हे म्हणेपर्यंत ती पूर्णपणे चिडवण्याच्या मूडमध्ये आहे. मात्र... वो मुख देखे कुछ बोले ना... हा जो शेवटचा 'ना' आहे नं त्यावेळी काहीशी तक्रार आहे तिची. त्याने तिच्याशी आपणहून बोलावं ही तिची इच्छा या एका 'ना' मधून ती जाणवून देते. आणि... भँवरा बड़ा नादान हाय... म्हणताना देखील तो काही नाही बोलत स्वतःहून हे ती अभिप्रेत करते आहे असं मला वाटतं.

विचार करता करता तिला पुढच्या ओळी सुचतात.... अखियों में रजके.. चले बच बचके... हे 'बच बचके' ती म्हणते त्यावेळी मात्र तिच्यातली नृत्यांगना जाणवते हं... एखाद्या हरणासारखी तिची मान तालात आणि एका सुंदर ऐटीत हलते.
जैसे हो कोई बेगाना.... दुसऱ्यांदा तेच म्हणताना हाताची हालचाल देखील तिला नृत्यकला अवगत आहे हे जाणवून देते.

रहे संग दिल के... मिले नहीं मिलके... बनके रहे वो अंजना... हो बनके रहे वो... अंजना... हे गुणगुणताना परत एकदा ती तिच्या अभिनयातून व्यक्त होण्याकडे वळते... आणि... भँवरा बड़ा नादान हाय.... जणू काही ती म्हणते आहे काय करू या वेडोबाचं!!!

तिचे कागद उडतात ते ती गोळा करते. जे तिच्या मागे असतात ते गुरुदत्त तिच्या पुढ्यात टाकतो. पण स्वतःमध्ये ती इतकी मग्न असते की ते देखील तिला लक्षात येत नाही. कोई जब रोके.. कोई जब टोके...
गुन गुन करता भागे रे... यावेळी एकाद्या षोडशे वर्षीय गोड मुलीसारखे निरागस भाव तिच्या चेहेऱ्यावर दिसतात. ना कुछ पूछे... ना कुछ बूझे... कैसा अनाड़ी लागे रे... म्हणजे 'किती रे तो बुद्दु' असा असावा... हे भाव आहेत तिचे. वो कैसा अनाड़ी लागे रे.... परत एकदा.... काय करू बरं या वेड्या बुद्दुचं आणि तरीही ज्याच्याबद्दल प्रेम भाव आहेत माझ्या मनात जे सांगता येत नाही आहेत.... हे प्रतीत होतं आहे.

स्वतःत मग्न ती गुणगुणत असते...
भँवरा बड़ा नादान हाय... बगीयन का मेहेमान हाय... फिर भी जाने ना... जाने ना... जाने ना... कलीयन की मुस्कान... आणि तोच पुढ्यात उभा राहातो... एकदम तिला दचकवतो!!!

Friday, August 30, 2019

श्रावणातल्या कहाण्या

श्रावणातल्या कहाण्या


लहानपणी श्रावणामध्ये घरच्या देवांची पूजा झाल्यानंतर आजी दर शुक्रवारी जीवत्यांची पूजा करून त्यांची कहाणी वाचायची; आणि रविवारी आदित्यराणूबाईची कहाणी वाचायची. या कहाण्या ऐकायला  घरात असणाऱ्या सर्वांनी बसलंच पाहिजे असा तिचा नियम होता. मी, भाऊ, बाबा, आई एवढंच नाही तर अगदी आमचे माळी मामा, ड्रायव्हर दुबेजी, घरी कामाला येणाऱ्या लक्ष्मीबाई सर्वांना हातावर तांदळाचे तीन दाणे घेऊन देवासमोर बसायला बोलावलं जाई. त्यावेळी कहाणी ऐकणं म्हणजे काहीतरी वेगळं करतो आहोत म्हणून मस्त वाटायचं आम्हाला. मी आणि माझा भाऊ जसजसे मोठे झालो तसे ही कहाणी आम्ही आवडीने वाचायला लागलो होतो. आजी या कहाण्या एका वेगळ्याच ताला-सुरात वाचायची. मग पुढे जेव्हा आम्ही वाचायला लागलो त्यावेळी आम्ही देखील तसंच वाचायला लागलो. एक वेगळीच मजा वाटायची या कहाण्या वाचताना.

शुक्रवारची जीवत्यांची पूजा ही प्रामुख्याने आपल्या घरातल्या पोरा-बाळांसाठी केली जाते. या जीवत्यांची आरती करताना निरांजनासोबत पिठीसाखरेची आरती ताम्हणात असते. म्हणजे पिठीसाखर तुपात भिजवून त्याची लांब लडी करून ती ताम्हणात ठेवायची; आणि मग बोटांनी त्यात खळगे करायचे. जणूकाही त्यात गोड दिवे लावले आहेत. आरतीच्या अगोदर मात्र कहाणी वाचली जाते. जीवत्यांची कहाणी देखील खूपच बोधपूर्ण आहे. एका गरीब ब्राम्हणीचा भाऊ सहस्त्र भोजन घालतो. मात्र बहिणीला बोलवत नाही कारण ती गरीब असते. मात्र 'भाऊ विसरला असेल' असा विचार करून ती सहस्त्र भोजनास मुलांबरोबर जाते. तेथे भाऊ तिचा अपमान एकदा नव्हे तर तीन वेळा करतो. बहिणीला वाईट वाटतं आणि ती तिच्या मुलांना घरून तिथून निघते. पुढे तिला आर्थिक सुबत्ता लाभते. तिच्या श्रीमंतीची डोळे दिपलेला भाऊ स्वतः तिला जेवणाचं आमंत्रण करतो. ती आमंत्रण स्वीकारून जेवणाला जाते; मात्र तिथे गेल्यावर आपली उंची वस्त्र आणि दागिने पाटावर मांडून त्यांच्यावर अन्न ठेवते. भाऊ तिला विचारतो 'ताई, तू हे काय करते आहेस?' ती उत्तर देते 'तू ज्यांना जेवायला बोलावलं आहेस त्यांना जेवायला घालते आहे.' भाऊ या उत्तराने काय ते समजतो आणि माफी मागतो. बहीण देखील मोठ्या मनाने माफ करते.

लहानपणी ही कथा वाचून झाली की आई नेहेमी सांगायची; आहे त्यात समाधान मानावं आणि कधीच कोणालाही पैशांनी तोलू नये. त्यावेळी तिचं ते सांगणं आम्ही फक्त ऐकायचो. कारण त्यावेळी सगळं लक्ष त्या पिठीसाखरेच्या दिव्यांमध्ये असायचं. मलाच जास्त दिवे मिळाले पाहिजेत हा प्रयत्न! पण आईचे ते शब्द नकळत मनात रुजले होते; हे आता लक्षात येतं. आज एक जवाबदार व्यक्ती म्हणून जगताना जेव्हा जेव्हा ही कहाणी आठवते त्यावेळी आईचे शब्द मनात उमटतात. या कहाणीमधील अजून एक विचार देखील स्पष्टपणे मनाला भिडतो. ज्याप्रमाणे भावाने माफी मागताच बहिणीने त्याला माफ केले; त्याप्रमाणे आपण देखील कोणी माफी मागितली असता मनात किल्मिश न ठेवता विषय संपवला पाहिजे. महत्व समोरच्या व्यक्तिला त्याची/तिची चूक आपणहून कळणे याला आहे. उगाच शत्रुत्व मनात ठेऊन सतत भांडत राहाणं हा उपाय नाही कोणत्याही वादाचा.


ज्याप्रमाणे शुक्रवारी जीवत्यांची कहाणी वाचली जायची; त्याच प्रकारे रविवारी आदित्यराणूबाईची कहाणी वाचली जायची. ही मुळात सूर्यनारायणाची उपासना आहे. ही कहाणी थोडक्यात सांगायची तर.... एका ब्राम्हणाच्या दोन उपवर कन्यांचे लग्न होत नसते; म्हणून तो दुःखी असतो. त्याला नागकन्या, देवकन्या एक व्रत सांगतात. ते व्रत तो ब्राम्हण करतो; त्यानंतर त्याच्या एका मुलीच लग्न राजाशी आणि दुसऱ्या मुलीच लग्न प्रधानाशी होत. नंतर ब्राम्हण मुलीचा समाचार घेण्यासाठी जातो. अगोदर राजाच्या राणीकडे जातो. तिला म्हणतो 'मला कहाणी सांगायची आहे ती तू ऐक.' पण 'राजा पारधीला जाणार आहे'; अस सांगून ती नाकारते. ब्राम्हण रागावून प्रधानाच्या राणीकडे जातो. तिथे तो कहाणी 'मनोभावे सांगतो' आणि ती 'चीत्तभावे ऐकते'. पुढे राजाची राणी दरिद्री होते आणि प्रधानाच्या राणीचं चांगलं होत. मग राजाच्या राणीची चारही मुलं एक एक करत मावशीकडे जातात. मावशीच्या घरी त्याचं चांगल आदरातिथ्य होतं. पण तिने दिलेले पैसे मात्र ती मुले स्वतःच्या घरी घेऊन जाऊ शकत नाहीत. शेवटी स्वतः राजाची राणी जाते बहिणीकडे. मग बहिण तिला रागावते आणि वडिलांनी केलेलं व्रत सांगते. पुढे राजाची राणी ते व्रत करते.... त्यावेळी ती कहाणी ऐकण्यासाठी मोळीविक्या, माळी, एक दु:खी म्हातारी, आणि एक विकलांग यांना बोलावते. कहाणी ऐकल्यानंतर हे सर्व देखील व्रत करतात आणि यासर्वांच भलं होत.


या कहाणीमधून हे स्पष्ट होतं की; देव आणि व्रत-वैकल्य सर्वांसाठीच सारखी असतात. देवपूजा ही कोणा जात-धर्माची मक्तेदारी नाही. 'तुम्ही जे काही कराल ते मनोभावे प्रामाणिक प्रयत्नातून करा; म्हणजे त्याचं फळ तुम्हाला चांगलंच मिळेल'; हा विचार महत्वाचा. या कहाणीमुळे त्या शाळकरी वयातच मला हे स्पष्ट कळल होतं की कोणाच्या कामावरून किंवा जाती वरून त्याव्यक्तीचं अस्तित्व ठरवणं चूक आहे. मुख्य म्हणजे एरवी इथे हात नको लाऊस... हे सोवळ्यातलं आहे.... तू पारोशी आहेस.... असं सांगून सारखं थांबवणारी आजी ज्यावेळी आमच्या सोबत आमच्या मांडीला मांडी लावून काम करणाऱ्या सर्वांना कहाणी ऐकायला बसवायची; त्या तिच्या धोरणातून देखील एक मोठा विचार मनात रुजला होता त्या कोवळ्या वयात.


आज मी या श्रावणातल्या कहाण्या वाचत नाही किंवा कोणतंही व्रत देखील करत नाही. मात्र श्रावण सुरु झाला की मला हमखास शुक्रवारची जीवत्यांची कहाणी आणि रविवारची आदित्याराणुबाईची कहाणी आठवते; आणि त्यातून जो विचार मनात रुजला आहे त्याचे समाधान वाटते. 

Saturday, August 24, 2019

श्रीकृष्णायनम:!


श्रीकृष्णायनम:!

नमस्कार,

कालचा पहिला शुक्रवार की मी माझ्या ब्लॉगवर काही पोस्ट केलं नाही. रात्री बारा वाजून गेले आणि माझ्या लक्षात आलं की आजची पोस्ट राहिलीच. खूप चिडले मी स्वतःवर. पण मग विचार केला; काही हरकत नाही. लेख तर तयार आहे... नृत्यांगना.... अहं... चा भाग 3. सकाळी लवकर पोस्ट करून टाकू. रात्री झोपायला तसा बराच उशीर झाला होता. श्रीगोपाळाच्या जन्मोत्सवाला गेले होते ना. घरी येताना त्याचेच विचार मनात घोळत होते. गंमत म्हणजे झोपेत देखील तोच मनात पावा वाजवत होता. सकाळी उठले आणि मनात आलं आज त्या सर्वस्व व्यापून असणाऱ्या गोपाळ... किसन.... कृष्ण... श्रीकृष्ण... भगवान.... आणि तरीही अपल्यातलाच एक बनून राहिलेल्या मनमोहनाबद्दल काहीतरी लिहावं.

तसं लहानपणापासून कृष्णाच्या कथा आपण सर्वांनीच ऐकलेल्या आहेत. त्याचा जन्म.... त्याचं लहानपण... गोपिकांबरोबरचा रास.... गाई चरायला नेणं.... कंस वध... द्वारका वसवणं.... अष्ट पत्नी मिळवणं.... हे त्याचं वयक्तिक आयुष्य.... आणि पांडवांसोबत किंवा असं म्हणावं का.... की पांडवांना पुढे करून महाभारत घडवणं... म्हणजे श्रीकृष्ण!

श्रीकृष्ण हा विष्णूचा आठवा अवतार! देवत्व असूनही श्रीकृष्णाने अनेकदा त्याचं मानव असणं अधोरेखित केलं. त्याला रणाछोड... भागोडा म्हणतात, कारण जरासंध सतत आक्रमण करत होता. त्या आक्रमणांना प्रतिउत्तर देणं थांबवून कृष्ण तिथून निघून गेला आणि त्याने सर्व जनतेला घेऊन द्वारका वसवली. तो देव होता; तरीही त्याने द्युतक्रीडा होऊ दिली. ज्यावेळी धर्मराज पांचालीला द्यूतात हरला त्यावेळी त्याने तिला भर राजसभेमध्ये वस्त्र पुरवली. परत एकदा द्यूत खेळून धर्मराजाने बंधू आणि सपत्नीक बारा वर्षे वनवास आणि एक वर्ष अज्ञातवास स्वीकारला. देवेश्वर श्रीकृष्ण हे सर्व थांबवू शकला नसता का? श्रीकृष्ण पांडवांच्या बाजूने बोलणी करण्यासाठी कौरवांकडे गेला. शब्दच्छल जाणणारा.... किंबहुना शब्दच्छल निर्माण करणारा तो निर्माता महाभारतीय युद्ध थांबवू शकला नसता का?

मात्र त्याने असं काहीही केलं नाही. त्याने भागोडा.... पळपुटा.... म्हणवून घेणं स्वीकारलं; कारण त्यावेळी त्याच्या मनात युद्ध जिंकण्यापेक्षा देखील सर्वसामान्य जनताने सुरक्षित आणि सर्वसामान्य आयुष्य सुखाने जगले पाहिजे ही त्याची इच्छा होती. द्यूत होऊ दिलं.... पांचालीचा अपमान, वनवास, अज्ञातवास हे सर्व तो दुरून पाहात राहिला; त्याने माहाभारत घडू दिलं.... कारण त्याला माहीत होतं की पुढे येणाऱ्या प्रत्येक युगामध्ये त्याच्या या सर्व वागण्याचा आदर्श ठेवला जाणार आहे.

तो अवतार होता. त्या युगामधील त्याचं कार्य करायला जसा तो आला होता; तसाच तो पुढे येणाऱ्या युगांसाठी आदर्श असणार होता. त्यामुळे 'आपल्या कर्माची फळं आपल्याला इथेच याच जन्मात भोगावी लागतात; त्यापासून सुटका नाही;' हेसार्वभौम तत्व प्रस्थापित करणं ही देखील त्याची जवाबदारी होती.

कदाचित म्हणूनच त्याचं अवतार कार्य संपवताना त्याने एका व्याध्याच्या य:किंचित बाणाने घायाळ होऊन मृत्यू स्वीकारणं मान्य केलं!

मी आदर्श निर्माण करताना अनेक अयोग्य... असत्य.... घटना घडू दिल्या. त्यामुळे मी देखील पापाचा धनी झालो... आणि म्हणूनच मानवी आयुष्य संपवताना कोणताही दैवी चमत्कार न करता माझा मृत्यू हा देखील आदर्श असावा या दृष्टीने मी एक दरवसामान्य मानवीय मृत्यू स्वीकारतो आहे;' हेच सांगायचं असेल का त्याला?

आपण खरंच हा विचार करून काही शिकू का त्या जगद्नियंत्याकडून?

Friday, August 16, 2019

नृत्यांगना..... अहं...... !!! (भाग 2)

नृत्यांगना..... अहं...... !!! (भाग 2)

मागील शुक्रवारी मी 'प्यार किया तो डरना क्या....' या गाण्यामधून सिनेसृष्टीच्या all time लावण्य सम्राज्ञी मधुबालाबद्दल आणि त्या अजरामर गाण्याबद्दल लिहिलं होतं. आज अशाच एका भाव सम्राज्ञी नूतनबद्दल थोडंस.... आणि एका कदाचित फारशा परिचित नसलेल्या गाण्याबद्दल..... ज्यामध्ये तिने नृत्य न करूनही काही क्षण मोहक आणि अर्थपूर्ण पदन्यास दाखवले आहेत.... आणि संपूर्ण गाणं भावविभोर नेत्रांमधून संयत प्रणय व्यक्त करत गाण्याच्या प्रत्येक शब्दला न्याय दिला आहे.



'मोरा गोरा अंग लैले.... मोहे शाम रंग दैदे.... छुप जाऊंगी रात ही मे.... मोहे पी का संग दैदे....'

उगाच सुरवातीला वाद्यांच्या तुकड्यांची रांग न लावता नूतनच्या अदाकारीवर संगीत दिग्दर्शक सचिन देव बर्मनजींनी पूर्ण विश्वास टाकला आहे हे लक्षात येतं. कारण गाण्याची सुरवात शब्दांनीच सुरू होते. तिरप्या नजरेने बघणाऱ्या नूतनच्या नजरेत एक निरागस हास्य आहे; आणि तरीही 'लैले' म्हणताना एक शामल लाज तिच्या डोळ्यात उतरलेली दिसतेच. तिचं ते शाम रंग 'दैदे' म्हणताना लाजणं तर काळजाला हात घालतं. 'छुप जाऊंगी रात ही मे....' तिने नजर उचललेलीच नाही.... काळजाला घातलेला हात जणू काही आपलं मन कुरवाळतो आहे; असं वाटतं. (नक्की बघा तो तुकडा.... तुमच्याही नकळत तुमच्या चेहेऱ्यावर एक मंद हसू फुलेल.) आता खऱ्या गाण्याला सुरवात होते. 'मोरा गोरा अंग लैले... मोहे शाम रंग दैदे...' नजर एकदा डावीकडे आणि एकदा उजवीकडे..... 'छुप जाऊंगी रात ही मे....' म्हणताना ती चंद्राच्या चांदण्यातून झाडाच्या हलक्याशा सावलीत येते... किती मोहक प्रतिकात्मक 'लपली' आहे ती.... का? तर 'मोहे पी का संग दैदे....' यासाठी. त्याच्या सोबतीसाठीचा पुढचा सगळा अट्टहास आहे; हे ती इथेच व्यक्त करते.

मग वाद्यांचा एक सुंदर तुकडा आहे. त्यावेळी तीचं पाण्यातलं शामल रूप आणि उजळ चेहेरा.... 'गोरा अंग' आणि 'शाम रंग' स्पष्टपणे आपल्या समोर येतो. हे जितकं खरं तितकंच त्या उजळ चेहेऱ्याची नूतन देखील मनाला भावते.

'एक लाज रोके पैयां... एक मोह खिंचे बैया... हाssय...' ते 'हाssय...' बघून काळीज परत एकदा उचललं जातं. म्हणजे कसं सांगू का? आपण छान गाडी चालवत असतो; समोरच्या गतिरोधकावरून गाडी जाते... आणि मग आपल्याला जाणवतं की आपण गतिरोधक पार केलाय. तसं आहे ते 'हाssय...' तिचं व्यक्त करून झाल्यावर एका क्षणानंतर आपल्या काळजाला जाऊन भिडतं ते. त्या 'हाय...' मधून आपण बाहेर पडतो तोवर ती मात्र तिचा झाडात अडकलेला पदर सोडवून झुकलेल्या नजरेने पुढे आलेली असते. 'जाऊं किधर न जानु...' किती ते आर्जव.... संपूर्ण चेहेऱ्यावरचं. 'हम का कोई बताई दे.....' एक वेगळंच आव्हान आहे त्या नजरेत. मी येऊ का तिथे तुझ्याजवळ? असं म्हणायला लावणारं.

त्यानंतरचं 'मोरा गोरा अंग लैले... मोहे शाम रंग दैदे... छुप जाऊंगी रात ही मे... मोहे पी का संग दैदे....' यातलं 'छुप जाऊंगी रात ही मे...' म्हणताना तिची नजर 'छुप'ते आहे हे जाणवतं आपल्याला.

आणि त्यानंतर........ अहाहा.... तिची आकाशाला भिडलेली नजर! मनासारखं झालं तर आहे; पण ते तसंच राहणार आहे का? हे विचारणारी. काहीशी गोंधळलेली; थोडीशी तक्रार असलेली आणि होणाऱ्या बदलाचा आनंदाचं घेणारी. त्यावेळीच ढगाआडून चंद्र बाहेर येतो आणि पाण्यावर उठणाऱ्या लहरींवर चांदणं विराजमान होऊन पुढे धावतं. खरं तर किती विलोभनीय दृश्य. पण दुसऱ्याच क्षणाला दिसणारा नूतनचा तक्रारीने भरलेला चेहेरा त्याहूनही जास्त विलोभनीय वाटतो. 'नको असताना आलास? काय म्हणावं तुला?' गाल फुगवून दिलेला एक हलकासा उसासा हे सगळं सांगून जातो; आणि ती म्हणते 'बदरी हटा के चंदा.... चुप के से झाके चांदा...' कसा लोचटासारखा बघतो आहेस; हे सांगते ती तिच्या काहीशा रागावलेल्या नजरेतून. आणि दुसऱ्याच क्षणी नजर झुकवताना तिच्या नजरेत प्रेमळ तक्रार उभी राहाते. 'तोहे राहू लागे बैरी....' (इथे मात्र खरी दाद द्यावीशी वाटते ते संगीतकाराला. त्याने 'राहू'ला 'बैरी' म्हंटल आहे. एका क्षणात आकाशमंडल नजरेसमोर उभं राहातं.) पण नूतन मात्र स्वतःकडंच लक्ष मुळीच ढळू द्यायला तयार नाही. 'मुस्काये जी जलाई के...' एक लाडिक चंबू आणि मोहक हास्य पेरून ती परत तिच्यात गुंतायला आपल्याला भाग पाडते. 'मोरा गोरा अंग लैले... मोहे शाम रंग दैदे...छुप जाऊंगी रात ही मे..मोहे पी का संग दैदे....' चेहेऱ्यावरची मोहकता आता अजून लाजरी झालेली असते.

आता दुसऱ्यांदा वाद्यांचा तुकडा आपल्या समोर येतो. यावेळी तिची पावलं चांदण्याला स्पर्श करत आणि पैंजणांशी गुज करत पुढे सरकतात. किती हलकासा पदन्यास; जाणवेल न जाणवेल असा! ती आता कुपणाशी पोहोचली आहे.


'कुछ खो दिया है पाइ के.... कुछ पा लिया गवाई के...' जो पा लिया हे वो नूतन की आंखो मे झलकता हे! 'कहां ले चला है मनवा... मोहे बांवरी बनाइ के....' 'पी' च्या प्रेमात सर्वस्व हरवताना आणि खूप काही वेगळं मिळवताना मी स्वतःमध्ये देखील उरलेले नाही... तिचा चेहेरा हेच तर सांगत नाही ना?

'मोरा गोरा अंग लैले... मोहे शाम रंग दैदे...छुप जाऊंगी रात ही मे..मोहे पी का संग दैदे....' हे ऐकताना केवळ आणि केवळ तिची नजर! बस! त्याचवेळी कुपणापलीकडच्या घराची खिडकी उघडली जाते आणि एक हलकीशी सावली दिसते; त्याच्या सोबतीसाठीचा आपण केलेला हा सगळा अट्टहास आहे; हे विसरून ती बावरी, स्वतःतच हरवलेली प्रेयसी तिथून पळून जाते. स्वतःच्या घराच्या दरवाजातून आत शिरताना ' मोरा गोरा अंग लैले... मोहे शाम रंग दैदे...' म्हणते आणि पुढेचे शब्द गुणगुणत असताना ती तिचे डोळे मिटून घेते.... गाणं इथे संपतं. पण एक सांगू? तुम्ही देखील क्षणभर डोळे मिटा तिच्या बरोबर! तुम्ही आयुष्यभर मनात जपलेला तो मोहक चेहेरा... ज्याच्यावर तुम्ही मनापासून प्रेम केलं असेल; उभा राहीलच! My guarantee!!!

नूतन आपल्या सिनेसृष्टीला लाभलेली एक अत्यंत गुणी आणि अभिनय संपन्न भाव सम्राज्ञी! तिच्याबद्दल जितकं सांगीन तितकं कमीच!