Friday, July 26, 2019

लग्न... सवय, गरज की जुळवून घेणे?!


लग्न... सवय, गरज की जुळवून घेणे?!

कशी गम्मत असते बघा.... लग्न झालेल्या कोणत्याही व्यक्तीला विचारलं की तू लग्न करून सुखी आहेस का तर तो/ती नक्कीच म्हणतात की उगाच या फंदात पडलो/पडले. एकटं असणं जास्त सुखाचं असतं.... आणि तरीही या प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या मुलांनी लग्न करायला हवंच असतं. असे किती पालक असतील जे म्हणतात की बाळा, तू अजिबात लग्न करू नकोस.

अगदी धीट मत मांडायचं तर लग्न हे उमेदीच्या काळात शरीरसौख्यासाठी आणि उतरत्या वयात सोबतीची गरज म्हणून केलं जातं. भावनिक गुंतवणूक - आयुष्य जोडीने जगण्यासाठी - तिचे/त्याचे विचार पटले म्हणून एकत्र येण्याचा निर्णय घेतला....... ही सगळी अनेकदा स्वतःला किंवा समोरच्याला फसवण्यासाठी सांगितलेली कारणं असतात. अर्थात लग्नानंतर जोडीदाराची आपल्या आयुष्यात असण्याची सवय आपल्याला होते; आणि मग आपण त्याला 'प्रेम' हे गोंडस नाव देतो. मात्र अनेकदा या नात्याच्या सुरवातीच्या काळातील एकमेकांबरोबरची शारीरिक सुखातील अनुरूपता या नात्याचं भविष्य ठरवते; असं मला वाटतं.

मागील पिढ्यांमध्ये याबाबतीतील स्त्रियांचं मत/गरज/इच्छा/अपेक्षा यांचा विचारच केला जात नसे. आपलं देखील याविषयी काही मत/गरज/इच्छा/अपेक्षा असू शकतात याचा विचार स्त्रिया देखील दुर्दैवाने करत नसत. मात्र आताची स्त्री याबाबतीत विचार करायला लागली आहे. आपलं देखील मत असू शकतं याची तिला जाणीव व्हायला लागली आहे. ....स्त्रीची याबाबतीत होणारी कुचंबणा हा विषय खूप मोठा आहे. याविषयी पुन्हा कधीतरी नक्की लिहीन. मात्र अजूनही तिचं याविषयी काही मत/इच्छा असू शकते; अपेक्षा/गरज असू शकते; याचा विचारही पुरुषांच्या आणि समाजाच्या मनात येत नाही हे दुर्दैवी सत्य आहे!

आज मात्र मला लग्नसंस्था आणि सामाजिक मानसिकता याविषयी थोडं बोलायचं आहे. ज्याप्रमाणे स्त्रीचं शरीर सुखाबद्दल काही मत/गरज/इच्छा/अपेक्षा असू शकते तसंच पुरुषाचं देखील असूच शकतं; हे मला मान्य आहे! अनेकदा पुरुषदेखील स्वतःच निर्माण केलेल्या मानसिक बंधनामुळे आपल्या पत्नीकडे याविषयी मोकळेपणी बोलत नाहीत. दोघांची याबाबतीतली अनुरूपता असणे फार महत्वाची असते. त्यामुळे दोघांनीही याविषयी एकमेकांशी मोकळेपणी बोलले पाहिजे. कदाचित आताच्या पिढीमध्ये हा मोकळेपणा असेल देखील मात्र मागील पिढ्यांमध्ये नव्हता हे खरं.

अर्थात ही अनुरूपता नाही म्हणून किमान भारतीय संस्कृतीमध्ये सहसा लग्न मोडले जात नाही. शक्यतोवर जुळवून घेण्याचा प्रयत्न होतो. पुन्हा एकदा हे देखील योग्य की अयोग्य हा मोठ्या चर्चेचा विषय होऊ शकतो. अनेकदा मनातून कुढत देखील राहिलं जातं; आणि मग कधीतरी चुकून किंवा ठरवून लग्नबाह्य संबंध निर्माण होतात. अनेकदा आपल्या साथीदाराच्या अशा लग्नबाह्य संबंधाबद्दल कळल्यानंतर सुरवातीला बरीच आदळ-आपट केली जाते किंवा जोडीदाराला या संबंधांपासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र त्यामागील कारण समजून घेण्याची गरज समजून घेतली जात नाही. मग असे लग्नबाह्य संबंध असलेला जोडीदार हा कायम आरोपीच्या पिंजऱ्यात उभा केला जातो. त्याचं मत/गरज/इच्छा/अपेक्षा याविषयी कधीच विचार केला जात नआहि; हे दुर्दैव!

अर्थात असे संबंध होण्यापूर्वी जर पती-पत्नींना एकमेकांच्या सोबतीची; एकमेकांच्या असण्याची सवय झाली असेल; तर या सोबतीमुळे किंवा झालेल्या सवयीमुळे अशा लग्नबाह्य संबंधांकडे काही काळानंतर दुर्लक्ष केलं जातं. याला अजूनही एक कारण असतं. दोघांची मिळून असणारी मुलं, दोघांचेही वृद्ध पालक आणि सामाजिक स्थान! हळूहळू आपल्या साथीदारांची केवळ 'असण्याची' सवय व्हायला लागते. काळ जात राहातो.

त्याचे/तिचे हे लग्नबाह्य संबंध आपल्या भारतीय समाज व्यवस्थेत मान्य नसल्यामुळे किंवा त्यादोघांची सोबत असण्याची गरज संपल्यामुळे किंवा आपल्या वयात आलेल्या मुलांमुळे/वृद्ध पालकांमुळे हे संबंध काही कालावधी नंतर संपतात. तो/ती परत एकदा आपल्या लग्नाबांधनाने बांधल्या गेलेल्या जोडीदाराकडे परतात. तोपर्यंत अनेकदा संसार स्थरावलेला असतो.... आर्थिक सुबत्ता आलेली असते... मुलं मोठी होऊन आपापल्या मार्गाने जायला मोकळी झालेली असतात. त्यामुळे मनातून एक वेगळाच एकटेपणा जाणवायला लागलेला असतो. आणि मग स्वतःची गरज म्हणून जोडीदाराचं परत येणं देखील तो/ती स्वीकारतात............. लग्न संस्था पुढे सरकते! अर्थात परत एकदा...... हे योग्य की अयोग्य हे फारच वयक्तिक मत आहे; असं मला वाटतं.



Friday, July 19, 2019

एक लडका और एक लडकी कभी दोस्त नाही हो सकते!



एक लडका और एक लडकी कभी दोस्त नाही हो सकते!

स्त्री-पुरुष मैत्री हा विषय अनेकदा अनेक स्तरांवार चर्चेत आला आहे. वाद-विवाद, चर्चा, मत-मतांतर अनेकदा वाचनात आली आहेत. त्यातलाच एक लेख नुकताच वाचनात आला. विषय काहीसा स्त्री-पुरुष मैत्री आणि पुरुषांना समाजाने मान्य केलेली मोकळीक आणि स्त्रियांना दिली जाणारी म्हणा किंवा स्त्रियांनी घेतलेली 'मोकळीक' याविषयी स्त्रियांबद्दलचा so called समाजाचा दृष्टीकोन. असा काहीसा होता.  त्यात अस म्हंटल होत की स्त्रियांनी पुस्तकांवर लिहावं, समाजातल्या, धर्मातल्या, राजकारणातल्या समस्यांना हात घालावा पण यात जिथे जिथे सेक्स आहे तिथे बाईने हात घालू नये. नाहीतर तिची गणना बोल्ड लिहिणारी, चळवळी, वळवळी, झेंडेवाली किंवा अल्ट्रा फेमिनिस्ट अशी होते. आणि सहसा स्त्रियांना स्वतःची ओळख अशी व्हावी ही इच्छा नसते. अजून एक मुद्दा मांडला गेला होता तो स्त्रीने लग्नानंतर नवऱ्या व्यतिरिक्त कोणत्याही दुसऱ्या पुरुषाला 'तू मला आवडतोस' अस म्हंटल तर लगेच समाजाच्या भुवया वर उचलल्या जातात. पण पुरुषाला अनेक मैत्रिणी असू शकतात आणि त्यात काहीच वावग नाही. लग्नानंतर स्त्री गर्भवती असताना पुरुष म्हणाला की  'कंन्ट्रोल होत नाही म्हणून मी प्रोस्टीट्युटकडे जातो कधीमधी;' तर हे त्याची मैत्रिण सहज एकून घेते आणि मान्य देखील करते.'जर तुझ्या बायकोला कधी change हवा असेल किंवा तू बाहेरगावी असताना तिला कंट्रोल झाला नाही तर तीही तुझ्यासारखी आपली गरज सुखाने भागवून आली तर चालेल का?' असा प्रश्न त्या मित्राच एकून घेणारी मैत्रिणी त्याला का विचारत नाही? अर्थात अस विचारलं गेलच तर 'माहित नाही यावर मी कसा react होईन;' हे कॉलरबचाऊ उत्तर पुरुष देतो ते मात्र मान्य केल जात. ते का?.............. असे काहीसे विचार त्या लेखात मांडले होते.

हा लेख वाचताना काही मुद्दे जरी पटले असले तरी एक विचार मनात येत होता... केवळ नवरा बाहेरख्याली आहे म्हणून त्याची जिरवायला स्त्रीने देखील हव ते करावं अस तर नाही ना या लेखात म्हंटलेल? खर तर स्त्रीला विचार आणि आचार स्वातंत्र्य आहे. मुख्य  म्हणजे जी स्त्री खरच मनाने आणि विचाराने स्वतंत्र असते ती तिच्यापुढे लागणाऱ्या so called tags चा विचार करत असेल अस मला वाटत नाही. आणि जिला अशा tags ची भिती वाटत आली आहे ती कधीच उघडपणे आपले विचार मांडताना दिसलेली नाही.   अर्थात हे देखील तितकच खर आहे की एखाद्या स्त्रीला एखादा पुरुष मित्र म्हणून आवडतो देखील, पण उगाच कशाला चर्चेचा विषय करायचा म्हणून मग त्या पुरुषाला ती राखी बांधून मोकळी होते. किंवा मग भावजी, दादा अशी विशेषण लावून उगाच एखाद नात तयार करते. त्यातून समाजाचे तोंड तिने बंद केले अस तिच मत असत. पण तरीही तिच्या मनातली सगळी भिती गेलेली नसतेच. नात्याचा tag लावल्यानंतर चर्चेचा विषय कदाचित होणार देखील नाही, पण आपण केवळ मित्र म्हणून बोलत असलो तरी त्या पुरुषाचा काही गैरसमज झाला तर? आपण फक्त निखळ मैत्री असा विचार करतो आहोत, पण त्याला वाटल की दोस्तीच्या पुढे सरकायला हिची काही हरकत नाही, आणि त्या गैरसमजातून त्याने अस काही केल तर? आणि मग अशी एखादी छानशी मैत्री कदाचित फुलली असती ती कधी जमतच नाही.

खर तर ओळख झाली आणि सहज गप्पांमधून विचार जुळले की दोस्ती होते. मग ती दोन मैत्रिणीमधली असेल किंवा मित्रांमधली किंवा मित्र-मैत्रिण अशी असेल. कदाचित् असही होत असेल की मैत्री असताना नैसर्गिक ओढीतून कदाचित् तो मित्र आणि मैत्रिण जवळ येतील. पण ते जर समजुतीने घेतले आणि त्याला इतर कोणतेही भावनिक बंधन घातले नाही तर अशी मैत्री देखील टिकू शकते. पण हा विचार अजुनही समाज मान्य नाही. पण मला वाटत, प्राधान्य दोस्तीला आणि जुळणाऱ्या विचारांना आणि एकमेकांना समजून घेण्याला द्यावं. अर्थात म्हणून भेटणाऱ्या प्रत्येक मित्राशी किंवा मैत्रिणीशी शारीरिक संबंध तयार करावेत; आणि त्याला दोस्तीच नाव द्यावं हे देखील योग्य असू शकत नाही.

एक मत असही आहे की कदाचित् पुरुष at first instinct स्त्रीकडे mate म्हणून बघतो... कालांतराने अनुभवातून त्याचा दृष्टीकोन बदलतो. स्त्रीला मात्र फक्त मैत्री अनेकदा अभिप्रेत असते. ती जर विवाहित असेल आणि तिच्या संसारात सुखी असेल तरीही कधी कधी वेगळ्या वैचारिक शेअरिंगसाठी तिला मित्र असावा अस वाटू शकत. त्यामुळे मूळ मुद्दा हा असू शकतो की समजून घेण आणि प्रत्येक दोस्तीला वेळ देण, ती जशी उलगतडत जाईल तशी स्विकारण महत्वाच आहे. मुळात मैत्रीची अशी कोणतीही व्याख्या असूच शकत नाही. ती होते किंवा होत नाही. खूप वर्ष ओळखत असूनही दोस्ती होते अस नाही... आणि पहिल्या भेटीतच तारा जुळतात... असा ही आपल्याला अनुभव असतो. कधी कधी खूप चांगली ओळख एखाद्या हळव्या क्षणी दोस्ती बनते किंवा कायमची तुटते. त्यामुळे मन मोकळ ठेऊन समोरच्या व्यक्तीशी आपले विचार, आवडी-निवडी जुळतात का इतकाच विचार जर केला तर कदाचित् ' एक लडका और एक लडकी सिर्फ और सिर्फ दोस्त हो सकते हे!'



Friday, July 12, 2019

अधुरी एक कहाणी

अधुरी एक कहाणी



टक् टक्... 'आत्ता एवढ्या सकाळी आणि ते ही इथे मला भेटायला कोण येणार?' थोड़ वैतागत... थोड़ आश्चर्य वाटून लेखक महाशय दार उघडायला आले.

एका कादंबरीच्या लेखनासाठी एक प्रकाशकाच्या आग्रहावरुन ते थंड हवेच्या ठिकाणच्या त्या प्रकाशकाच्या बंगल्यावर काही दिवसांकरता रहायला आले होते. येऊन दोन दिवस झाले होते तरी त्यांना कथेचा प्लॉट सुचत नव्हता; त्यामुळे एकूणच ते   थोड़े वैतागले होते; रात्रभर डोळ्याला डोळा नव्हता. जरा झापड येत होती  आणि त्यात सकाळीच दार वाजत होते.


थोड्या वैतागलेल्या मनस्थितीतच त्यांनी दार उघडल. समोर एक मध्यम वयीन महिला कंबरेवर हात ठेऊन उभी होती. दार उघडल जाताच दारात उभ्या असणाऱ्या लेखकाकडे दुर्लक्ष करून ती तरातरा आत आली आणि एका खिड़कीच्या दिशेने गेली. मात्र जाताना एक खाष्ट कटाक्ष तिने लेखकाकड़े टाकला. लेखक बुचकळ्यात पडला.


'कोण असावी ही बाई आणि अशी आपल्याला न विचारता आत येऊन त्या खिडकीत जाऊन का बसली असेल? मुख्य म्हणजे आत आल्यावर आपल्याकडे रागाने का बघितलं तिने?' लेखकाच्या मनात एकामागून एक प्रश्न उभे राहिले. तो दारातच विचार करत उभा होता तेवढ्यात त्याला आतल्या बेडरूम मधून खोकल्याचा आवाज आला. गोंधळून लेखक आतल्या बेडरूमच्या दिशेने गेला. आत बेडरूममध्ये एका आराम खुर्चीत एक आजोबा बसले होते; ते दरवाजात उभ्या असणाऱ्या लेखकाकडेच पाहात होते. काय प्रकार आहे ते लेखकाला कळले नाही. आपल्यालाच भास होतो आहे अस समाजून त्यांच्याकडे दुर्लक्ष करून तो परत बाहेर हॉलमध्ये आला; तर त्याच्या लक्षात आल की एकूण बाहेरच्या खोलीचा चेहरा मोहरा बदलला आहे. मघाशी दार उघडायला तो बाहेर आला होता तेव्हा बैठकीच्या खोलीत फ़क्त एक सोफ़ा होता. पण आता येऊन बघतो तर मेन दरवाजा दिसत नव्हता; एक सोफ़ा एका बाजूला होता आणि आता एका कोप-यात एक डायनिंग टेबल देखील अवतरलं होतं. लेखक पुरता बुचकळ्यात पडला. त्याला त्या बंगल्यात येऊन दोन दिवस झाले होते. त्यामुळे खोल्यांची रचना त्याला माहितीची झाली होती. हे असे अचानक होणारे बदल त्याला गोंधळात टाकत होते. तो थोडासा घाबरला देखील. हा काही भुताटकिचा प्रकार असावा अस त्याच मत झाल.


तेवढ्यात तो ज्या खोलीत झोपले होता तिथे काहीतरी पडल्याचा आवाज आला आणि लेखक दचकुन आत खोलिकडे वळला. आत जाऊन बघतो तर त्यांनी त्याचे लिखाणाचे सामान ज्या टेबलावर ठेवले होते ते सामान खाली पडले होते. आणि जी स्त्री दार वाजवून त्याची झोप मोडायला आली होती; ती त्याच्या लेखन टेबला जवळ बसून काहीतरी लिहित होती. लेखक खोलीत आला आहे हे तिच्या लक्षात आले होते तरीही तिने त्याच्याकडे दुर्लक्ष केले आणि आपल लेखनाचे काम चालूच ठेवले.


काय प्रकार आहे हे अजूनही लेखकाच्या लक्षात आले नव्हते. पण हे असे अचानक या घरात उगवलेले आणि आपल्याला दिसणारे लोक काही त्रास देत नाही आहेत हे लक्षात आल्यावर लेखक थोडा शांत झाला. आता त्याच मन थोडं शांत झाल आणि विचार करायला लागलं. लेखकाच लक्ष परत त्या स्त्रीकडे गेलं. ती स्त्री अजूनही काहीतरी लिहित होती आणि तिने त्याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष केले होते. त्यामुळे असेल कदाचित पण त्याच्या टेबलावर बसून ती काय लिहिते आहे ते समजून घेण्याची लेखकाची उत्सुकता जागृत झाली. त्यामुळे हळूच तिच्या मागे जाऊन उभे राहात त्यानी तिच्या लिखाणावरुन नजर फिरवली.


...............ललिता एकटीच खिड़कीत विचार करत बसली होती. वयात येणारी मुलगी; व्यवसायात खूपच बिझी झालेला नवरा; इंजीनियरिंगच शिक्षण घेण्याच्या नावाखाली उड़ाणटप्पूपणा करणारा मुलगा.... ललिता सर्वच बाजुनी हतबल झाली होती. काय कराव... कोणाशी बोलाव तिला सुचत नव्हतं......... ती स्त्री भराभर लेखकाच्या नेहेमीच्या लिखाणाच्या कागदावर लिहित होती. ते लिखाण पाहुन लेखक बुचकळयात पडला. पण काही क्षणात त्याला आठवलं हा परिच्छेद त्याच्याच एका गोष्टितला होता. पण मग ती गोष्ट त्याने अर्धवट सोडली होती. एका दुसऱ्याच कथेची संकल्पना मनात आली होती म्हणून ही कथा अर्धी सोडून त्याने नवीन कथा सुरु केली होती. काही महिन्यांपूर्वीचीच तर घटना होती ती.


लिखाण पूर्ण होताच ती स्त्री परत खिड़कीजवळ जाऊन बाहेर बघत बसली. लेखकाने जिथे ती कथा सोडली होती तिथेच ती स्त्री थांबली होती. याच त्याला खूप आश्चर्य वाटलं. त्या स्त्रीला ती अर्धवट सोडलेली गोष्ट कशी माहित अस विचारायचा मोह लेखकाला झाला. पण तेवढ्यात शेजारच्या खोलितले आजोबा परत खोकले म्हणून लेखक त्या दिशेने वळला. आजोबा त्यांच्या आराम खुर्चित बसून लेखकाकडेच पहात होते. त्यांच्या शेजारी देखिल एक कागद पडला होता. आतापर्यत लेखकाची भीड बरीच चेपली होती. त्यामुळे तो पुढे झाला आणि तो कागद उचलून वाचला.


..............................काणे आजोबा म्हणजे एक उत्तुंग व्यक्तिमत्व. त्यांच्या तारुण्यात तर त्यांनी करियरमधली यशाची शिखरं गाठली होतीच, पण रिटायरमेंट नंतरही ते स्वस्थ बसले नाहीत कधी. सामाजिक संस्थांमधून कोणत्याही पदाची अपेक्षा न ठेवता त्यांनी काम केल. त्यांच्या सुविद्य पत्नीनी त्यांना आयुष्यभर साथ दिली होती. पण साध्या तापाच निमित्त होऊन त्या अचानक गेल्या; आणि त्यानंतर मात्र काणे आजोबांचा आयुष्यातला इंटरेस्टच जणूकाही संपला...............


तो कागद वाचून लेखकाला खूप खुप आश्चर्य वाटलं. 'माझ्याच एका पूर्ण होत आल्या गोष्टीचा शेवटचा भाग.' लेखकाच्या मनात आल. पण मग अचानक काही मासिकांकडून त्याला वेगळ्या विषयाच्या गोष्टिची मागणी झाली आणि ही गोष्ट नंतर पूर्ण करू असे त्याने ठरवले होते. पण मग ती गोष्ट लिहिणे मागेच पडत गेले होते.


'अरे? हे काय गौडबंगाल आहे? माझ्याच गोष्टींची पानं माझ्यासमोर का येत आहेत?' लेखकाच्या मनात आल. त्याचवेळी हॉलमध्ये एक लहान मुल जोरजोरात हसल्याचा आवाज त्याला आला आणि या अचानक आलेल्या आवाजाने धक्का बसलेला लेखक हॉलच्या दिशेने धावला.


बाहेर साधारण ४-५ वर्षांचा मुलगा सोफ्यावर जोरजोरात उड्या मारत होता आणि बाजूला एक स्त्री ............बहुतेक त्याची आई असावी................. त्याला शांत करायचा प्रयत्न करत त्याला समजावत होती;"राजू बाळा, तुला बर नाही आहे न? मग स्वस्थ बस बघू. आत्ता बाबा येतील ह तुझे. मग आपण त्याना सांगू तुझ्यासाठी काहीतरी छान छान आणायला." तिने एवढ म्हणाल्यावर तो मुलागा तिच्याकडे बघायला लागला. क्षणभर सगळ स्थिर झाल आणि मग परत तो मुलगा सोफ्यावर उड्या मारायला लागला. परत ती त्याला शांत करायचा प्रयत्न करत तेच वाक्य त्याच प्रकारे बोलत समजावायला लागली.


आता लेखकाला हळूहळू लिंक लागायला लागली.  त्याने एका वेगळ्याच अपेक्षेने आजुबाजुला बघितले आणि त्याला डायनिंग टेबलावर एक कागद फड़फडताना दिसला. मनात कल्पलेली अपेक्षा पूर्ण झाल्याने लेखकाने मंद स्मित केले आणि तो कागद उचलला. त्याच्याच एका गोष्टीतल्या दिवाणखान्याच वर्णन त्यात लिहिल होत. आणि पुढे लिहिलं होत की लहानग्या राजूला कॅन्सरसारखा दुर्धर आजार झाला होता. त्याच्या आईवडिलांची परिस्थिती बेताची होती. त्यामुळे कुठली मदत मिळते का ते बघण्यासाठी राजूचे बाबा सतत वणवण करत फिरत होते. या कशाचीच कल्पना नसलेला राजू मात्र घरात बालसुलभ मस्ती करत होता. मनातून कोलमडलेली आणि ते चेहेऱ्यावर दाखवता न येणारी राजूची आई त्याला सांभाळत त्याच्या वडिलांची वाट बघत होती............................. अशी काहीशी गोष्ट होती ती.... लेखकाचीच! अजुने के पूर्ण न झालेली.


'म्हणजे माझ्या अपूर्ण गोष्टी आज मला भेटायला आल्या आहेत अस दिसत.' लेखकाच्या मनात आल आणि कोडं उलगडल्याच्या स्सामाधानात तो हसत मागे वळला. मागे ललिता आणि काणे आजोबा त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पहात उभे होते. यासर्वांच अस इथे येण्यामागच कारण त्याच्या लक्षात आलेलं नव्हत. त्यामुळे आता यांना काय उत्तर द्याव असा लेखकाला प्रश्न पडला. मुळात यांना आपण काही उत्तर देऊ लागतो का असा मुद्दा देखील त्याच्या मनात होता.  हे खर होत की लेखकाने फारच क्वाचित असेल, पण काही गोष्टी अपूर्ण सोडल्या होत्या. पण म्हणजे आपण अर्ध्या सोडलेल्या कथांमधील पात्र आज आपल्या भेटीला आली आहेत; हे त्याच्या लक्षात आलं. त्याने क्षणभर विचार केला आणि मग हसत ललिता आणि काणे आजोबांना, राजूला आणि त्याच्या आईलासुद्धा एका सोफ्यावर बसायला सांगितल. तो देखील बाजूची एक खुर्ची ओढून त्यांच्या समोर बसला.


"आता मला उलगडा होतो आहे तुमच्या उपस्थितिचा. पण उद्देश् मात्र अजुन लक्षात नाही आला." लेखक त्यांना म्हणाला. यावर त्यांच्यातल कोणीतरी एक उत्तर देईल अशी त्याची अपेक्षा होती. पण पाच मिनिटं झाली तरी ते सगळेच त्याच्याकडे थोड रागाने बघत पण आश्चर्यकारक रितीने स्वस्थ बसले होते. त्याचं हे अस न बोलता स्वस्थ बसण लेखकाला गोंधळवून टाकायला लागलं. हळूहळू लेखक अस्वस्थ व्हायला लागला.


"अरे, तुम्ही माझ्याच अपूर्ण गोष्टींमधली पात्र आहात हे एव्हाना माझ्या लक्षात आल आहे. पण हे अस अचानक इथे येण्यात तूमच काय प्रयोजन आहे; ते मला अजूनही समजल नाही. ते कसं कळावं बर?" लेखक वैतागुन काहीस त्यांच्याशी आणि काहीस स्वतःशीच म्हणाला.


तरीही काहीच घडले नाही. ते सगळे लेखकाने सांगितलेल्या सोफ्यावर स्वस्थ बसून पण रागाने लेखकाकडे बघत होते. एव्हाना चांगलीच सकाळ झाली होती. लेखकाला चहाची तल्लफ आली होती. चांगलीच भूकही लागली होती. एरवी सकाळीच बंगल्यावर काम करायला येणारा गोपाळ अजुन आला नव्हता. त्यामुळे काय कराव लेखकाला सुचत नव्हते.


'चहा मिळाला असता तर बर झाल असत. ही ललितासुद्धा नुसती बसून आहे. तिला काय हरकत आहे चहा करायला.' लेखकाच्या मनात विचार आला.... आणि काय चमत्कार... ललिता उठून उभी राहिली आणि स्वयंपाकघराकडे वळली. लेखक तिच्या मागून गेला आणि त्याला दिसले के ललिता चहा करत होती. लेखकाला आश्चर्य वाटल. आपण फक्त मनात एक विचार केला आणि लगेच तशी कृती ही ललिता करायला लागली हे त्याच्या लक्षात आल. म्हणून मग एक प्रयोग म्हणून त्याने मनात विचार केला,'चहा बरोबर मस्त गरमागरम पोहे असते तर मजा आली असती.' असा विचार करून लेखक त्याच्या खोलीत जाऊन बसला.


थोड्या वेळाने ललिता एका ट्रे मधून गरम गरम पोहे आणि वाफाळता चहा घेऊन त्याच्या समोर येऊन उभी राहीली. तिला बघून लेखक मोकळेपणाने हसला. आता त्याच्या लक्षात आले काय केले पाहिजे. त्यामुळे मग त्याने शांतपणे पोहे खाऊन आणि चहा घेऊन लेखक त्याच्या टेबलाकडे वळला. कागद पेन घेऊन त्याने थोडा विचार केला आणि मग लिहायला सुरुवात केली.


......................................ललिता कंटाळली होती. आणि तिला मन मोकळ करायची खूप इच्छा होती; आणि म्हणूनच तिने ठरवले की आज आत्ता समोर जे कोणी भेटेल त्यांच्याकडे मन मोकळे करायचे.....................


लेखकाचं एवढ़ लिहून होत न होत तोच चहा आणि पोहे लेख्कासमोर ठेऊन परत  खिड़कित जाऊन बसलेली ललिता एक मोठ्ठा सुटकेचा नि:श्वास टाकून तिथून उठून लेखकासमोर येऊन बसली.

"कित्ती बर वाटत आहे म्हणून सांगू तुम्हाला फ़क्त या कल्पनेने की आता मला माझ मन मोकळ करता येईल." ललिताने बोलायला सुरवात केली. "अहो लेखक महाशय किती किती दुःख लिहून ठेवली आहात तुम्ही माझ्या आयुष्यात. कमाल करता हो! अहो, केवळ वाचकांची सहानुभूति मिळवण्यासाठी माझा किती मानसिक छळ चालवाला आहात. अस काही खरच प्रत्यक्ष आयुष्यात असत का? प्रत्येक मनुष्याच्या आयुष्यात जसे दुःखाचे क्षण असतात तसे आनंदाचे क्षण पण असतीलच न? मी आपली सारखी घरातल्या प्रत्येकाच्या वागण्याने दु:खी-कष्टी झालेली असते. मी एकटीनेच का होईना पण आनंदाचे काही क्षण तर जगू शकते की नाही? मला देखिल तुमच्या पत्नीप्रमाणे कधीतरी मॉल्समधे शॉपिंगला पाठवा की. तुम्ही कधी कधी तुमच्या पत्नीच कौतुक करता न? मग माझ्या नव-याच्या तोंडी थोड़ माझ कौतुक टाकलत तर ते काही महा पाप नसेल. तो खूप व्यस्त असतो, त्याला माझ्यासाठी अजिबात वेळ नसतो, हे सगळ मान्य केलं तरी कधीतरी अशी वेळ येऊ शकतेच ना की तो माझं देखील थोडसं कौतुक करेल. बर ते नाही तर, अहो किमानपक्षी माझ्या मनात एखादी नोकरी करावी अस आल; एवढ लिहिलत तरी चालेल हो. इतकी काही मी मूर्ख नाही." ललिता भडाभड़ा बोलायला लागली.


'किती दिवस तिने हे सर्व मनात दाबून ठेवल असेल?' लेखकाच्या मनात विचार आला. त्याचच उत्तर म्हणून की काय ती म्हणाली,"अहो कायम असे विचार मनात येत असतात. पण सांगणार कोणाला? बर, तुम्ही मला कोणी जवळची मैत्रिण नाही दिलीत. ना मन मोकळ करता येईल अशी व्यक्ती माझ्या आयुष्यात लिहिलीत. म्हणजे मी कायम दुखात पिचेला चेहेरा घेऊन खिडकीत दूरवर जाणार लावून बसायचं का? काहीतरी चांगलं लिहा की माझ्या आयुष्यात, की ज्या बळावर मी माझ आयुष्य जगू शकेन. सर्वात महत्वाच् म्हणजे सुरु केलेली कथा पूर्ण तर करा. अस आम्हाला अर्धवट सोडून तुम्ही दुसरीकडे कसे वळु शकता हो? आमचा थोड़ा तरी विचार करायचा ना." ललिता भडाभडा बोलत होती आणि लेखक अवाक होऊन तिच बोलण एकत होता. लेखकाकडे बघत ललिता पुढे म्हणाली,"परवाच आमची सर्वांची एक बैठक झाली....."


शांतपणे तिच बोलण ऐकणारा लेखात तिचे शेवटचे वाक्य एकताच दचकला. ललिता जरी त्याच्या समोर बसून बोलत होती तरीही ही आपल्या कथेतली एक व्यक्तिरेखा आहे याची त्याला पूर्ण कल्पना होती. त्यामुळे 'आमची बैठक' हे शब्द एकटाच लेखक गोंधळाला आणि तिच बोलण निवांतपणे एकता-एकता अचानक ताठ होऊन बसला. आपला शांतपणा सोडत पहिल्यांदाच त्याने ललिताच्या समोर तोंड उघडले. "बैठक? कोणाची? अहो ललिताबाई काय बोलता आहात आपण?"


"जे घडल आहे न तेच बोलते आहे." ललिता म्हणाली. "तुम्ही आजवर ज्या ज्या  कथा अपूर्ण ठेवल्या आहात न त्यातील आम्ही सर्व व्यक्ती एकत्र येतो दर शुक्रवारी आणि चर्चा करतो."


"चर्चा? आणि ती कसली? कोण कोण असता या चर्चेला?" लेखकाने अजूनच बुचकळ्यात पडत ललिताला विचारले.


"तुम्हीच सांगा कोण कोण असेल. मलाच काय विचारता सगळ? कमाल करता तुम्ही. केवळ पैशासाठी लिहिता का हो? जेव्हा सुरवात केलित तेव्हा मात्र स्वसुखासाठी लिहिता अस सर्वाना सांगायचात न? आजही इतकी प्रतिष्ठा मिळाल्या नंतर जर कोणी मुलाखत घेतली तर तेच सांगता; हे देखील माहीत आहे आम्हाला." ललिता म्हणाली. "पण मग आता हे अस अचानक जे संपादक सांगेल ते त्याने सांगितलेल्या विषयावर ते म्हणतील तस  लिहायला का सुरवात केली आहात? अहो,  तुम्ही खूप पूर्वी ज्या कथा लिहायचात त्या कथांमधील व्यक्तिमतवांशी गप्पा मारायचात म्हणे! अशीच एक खूप जुनी कथा आहे तुमची. हसर दु:ख! आठवते तुम्हाला?" लालीताने लेखकाला विचारलं आणि त्याच्या उत्तराची वाट न बघतां पुढे बोलायला सुरवात केली,"त्या कथेतली अल्लड मैना नेहेमी सांगते आम्हाला. तुम्ही तिला तिच्या अर्ध्या वयात एका दु:खला सामोरं जायला लावलंत म्हणे. पण मग तुमचं तुम्हला ते फारसं पटलं नाही, मग तुम्ही तिच्याशी बोलायला लागलात. तिनेच तुम्हाला सुचवलं होतं की तिला तारुण्याच्या उंबरठ्यावर आणून कथा थांबवा. म्हणजे तुम्हला दुसरा भाग लिहिता येईल. मैनाची कथा लोकांनी खूपच डोक्यावर घेतली होती म्हणे. ती नेहेमी सांगते आम्हाला. तिची कथा एकीकडे पूर्ण आहे अस ती म्हणते आणि शेवटाकडे पुढचा भाग लिहिण्यासारखा मजकूर तुम्ही लिहिलात; त्यामुळे अपूर्ण देखील आहे अस तिचं म्हणण आहे. पण तिच्या मनात तुमच्याबद्दल राग नाही; जसा आमच्या मनात आहे. ती एकटीच आहे जी तुमची बाजू आमच्यासमोर मांडत असते. पण बाकी सगळीजण तुमच्यावर खूपच नाराज आहेत; समजल? काहो, तुम्ही जर दु:खी-कष्टी मैनाशी बोलू शकलात तर मग माझ्याशी कधीच का नाही बोललात? माझ्याही आयुष्यात काय कमी दु:ख लिहीली आहात का तुम्ही?" ललिता मनातल सगळ भडा-भडा बोलत होती.


तिने एक निश्वास टाकला आणि पुढे बोलायला सुरवात केली. "काहो तुम्हाला ते नार्वेकर आठवतात का? तुमच्या उमेदिच्या काळातील एका कथेतले व्यक्तिमत्व. त्यांनी देखील सांगितले आम्हला त्याचं आणि तुमच छान पटायच म्हणे. ती कथा जेव्हा तुम्ही अर्धवट सोडलित तेव्हा त्यांना विश्वासात घेऊन तुम्ही सांगितल होत की अचानक त्या कथेने तुमच्याशी बोलण बंद केल होत. आम्ही समजू शकतो हो की एखाद्या वेळी एखादी कथा सुचेनाशी होऊ शकत. म्हणून मग तुम्ही ती कथा अपूर्ण सोडत आहात. पण तुम्ही नार्वेकाराना विश्वासात घेतल होतंत.  नार्वेकर मिटींगमध्ये बोलतात ना तेव्हा नेहेमी म्हणतात की त्याना वाईट वाटत त्यांची कथा तुम्ही अर्धवट सोडलीत. पण त्यांना पटल होत की कदाचित तुम्ही म्हणालात तस त्या कथेने तुमच्याशी बोलण सोडून दिल असेल. मात्र इतरांच अस मत नाही आहे. आम्हला काहीजणांना वाटत की तुम्ही पुढे पुढे केवळ पैशांच्या मागे लागून आमच्या कथा अर्धवट सोडल्या आहात. त्यातलीच माझी एक! अहो... किती वाट बघू मी? सारख नुसत खिड़कीमधे बसून कंटाळा येतो हो. बर कथा अर्धी सोडताना मला एखादा छंद वगैरे तरी लाउन द्यायचात ना? काही म्हणजे काहीच नाही? कमाल करता हो तुम्ही...माझ सोडा एकवेळ. तस माझ वय आहे की मी धीर धरु शकते. पण त्या दुसऱ्या कथेतल्या बिचा-या काणे आजोबांचा विचार करा. ना ते काही करतात; ना त्याचं देहावसान होत. बिचारे तसेच अडकून आहेत. काय तर  म्हणे आराम ख्रुचीत ते बसले होते आणि भूतकाळाचा विचार करत होते. बास? अहो म्हातारे झाले म्हणून फक्त भूतकाळाचा विचार करत असतील का ते? मनुष्याचा स्वभाव विशेष हाच आहे की काही कालावधी दु:ख केल्यानंतर तो भविष्याची स्वप्न बघायला लागतो. त्यात तुम्ही त्याचं संपूर्ण आयुष्य खूप घटनांनी आणि कर्तुत्वाने भरून टाकलेलं आहात. आता मात्र त्यांना एका आराम खुर्चीत अडकवून ठेवलं आहात...." ललिता काही बोलायची थांबत नव्हती.


लेखकाच्या मानत आल; 'हीच एकटी बोलते आहे. बाकीच्यांना कुठे काही हरकत आहे?' मात्र हा विचार करताना लेखक हे विसरला होता की त्याचे विचार हाच खरा आणि एकाच दुवा आहे त्याच्या अर्धवट लिहिलेल्या कथांमधील व्याक्तीमात्वांमध्ये आणि त्याच्यामद्धे. त्यामुळे त्याच्या मनात हा विचार आला आणि त्याच क्षणी मागून काणे आजोबांनी लेखकाला हाक मारली. "अहो! अहो! इथे मागे वळून बघा. हो! मीच काणे आजोबा बोलतो आहे. तुम्ही तिने बोलावं असा विचार मनात आणलात म्हणून ती आम्हा सर्वांच्या वतीने बोलत होती. मात्र मी वाटच बघत होतो की कधी मला बोलता येत आहे. अगदी बरोबर सांगते आहे ती ललिता. कंटाळलो आहे या आराम खुर्चीत झुलून झुलून. आता माझ पुढे काही होणार आहे की नाही? बर, माझं राहुद्या एकवेळ, मला निदान संपूर्ण आयुष्य चांगल जगण्याच सामाधान आहे. पण या राजूने काय तुमच घोड मारल आहे हो? एकतर त्याला कॅन्सर सारखा आजार दिलात. त्यात त्याच्या आई-वडिलांची परिस्थिती बेताची केलीत. मग वडिलाना बाहेर पाठवलत पैशांची सोय करायला आणि राजूला आणि त्याच्या आईला घरात बंद केलत आणि थांबलात. बर आजारी पोर आहे तर त्याला झोपवून ठेवायचं; तर नाही; म्हणे मस्तीखोर राजू आईच एकत नव्हता. ती बिचारी कायम त्याला समजावत असते........ तेही तेच तेच वाक्य परत परत बोलून? का तर तुम्ही पुढे काही न लिहिता ती कथा अर्धी सोडलीत." काणे आजोबा स्वतःबरोबर राजू आणि त्याच्या आईची बाजू देखील मांडत होते.


लेखक त्यांच बोलण एकून गोंधळून गेला. हे खर होत की राजूची गोष्ट तो पूर्ण करणार होता; पण अलीकडे जास्त भावनिक कथा लोकाना नको असते अस एका प्रकाशकाच मत पडल; म्हणून मग त्याने विचार बदलला. पण मग नवीन वळणं जर त्याच कथेत घालावीत तर त्या कथेत खूप जास्त बदल करावे लागणार होते; म्हणून मग ती अर्धवट सोडून देवून लेखकाने नवीन गोष्ट लिहायला सुरवात केली होती आणि ती नवीन गोष्ट पूर्णसुद्धा केली होती.


लेखक एकूणच विचारात पडला. 'अशा अजूनही काही कथा आपण अर्ध्या लिहून सोडल्या आहेत. ती एक रहस्य कथां होती की. ज्यात एका गाढवर एका सरदार घराण्यातल्या लोकांमध्ये होणाऱ्या घटना आपण लिहित होतो; आणि ती दुसरी भय कथा! मग ती देखील आपण पूर्ण केली नव्हती. त्यामधली व्यक्तिमत्व मात्र इथे आलेली दिसत नाहीत. लेखकाच्या मनाला तो विचार स्पर्शून गेला.' त्याने एकदा समोर उभ्या असलेल्या काणे काका, राजू आणि राजूच्या आईकडे बघितलं आणि त्याच्या मनात विचार आला,'एवढीच व्यक्तिमत्व का आली आहेत माझ्याकडे आज? माझ्याशी फक्त बोलायला की काही दुसरा विचार आहे यांच्या मनात?'.......... बस तो एक क्षणभरासाठी आलेला विचार आणि.....


अचानक बोलता बोलता ती सर्वच पात्र उभी राहिली आणि लेखकाच्या दिशेने येऊ लागली. त्यांची नजर थंडगार होती. कुठल्याही भावना त्या नजरेत नव्हत्या. आत्तापर्यंत फक्त आपल दु:ख त्याना सांगणारी ती सर्व त्याच्याच कथेतील पात्र.. एका अर्थी त्यांनीच निर्माण केलेलं जग... आज त्याच्या दिशेने पुढे सरकत होत.  आता मात्र त्यांची बोबडी वळली. काय कराव त्याना सुचेना. तो मागे मागे जाऊ लागला. त्याक्षणी मागून लालीताच्या विकट हसण्याचा आवाज आला आणि काणे काका, राजू आणि राजूची आई यांच्याकडे पाठ करून लेखकाने लालीताच्या दिशेने तोंड फिरवले. मागे वळताच लेखकाला मोठ्ठा धक्का बसला होता. कारण त्याच्या समोर सरदार घराण्यातली प्रत्येक व्यक्ती उभी होती आणि ..... आणि त्या भय कथेतली ती बाई.....


"अहो.... अहो बाई.... मला थोड़ बोलू द्याल का? अहो.. अहो.. सरदार साहेब.... अरे! अरे! थांबा.... एका ना... एक मिनिट..." लेखक एका जागी थिजल्यासारखा उभा राहून हात हलवत ओरडत होता. त्याचा श्वास धपापत होता. त्याला गुदमरल्यासारख होत होत, डोळ्यासमोर अंधार दाटला होता............... आणि अचानक........


......................."साहेब..... अव... साहेब जी....." गोपाळ लेखक महाशायांच्या पलंगाजवाळ उभा राहून त्यांना हाका मारत होता. आणि पलंगावर गाढ़ झोपेत असलेले लेखक महाशय हात-पाय झाड़त 'नाही... नको.. थांबा...अहो... एक मिनिट.... ऐका... ऐकाना...' अस काहिस ओरडत होते.


शेवटी गोपाळने लेखकाला गदागदा हलवल आणि लेखकाला जाग आली. तो दचकुन ओरडत पलंगावर उठून बसला. त्याच्या अंगाला दरदरून घाम सुटला होता. नजर पूर्ण गोंधळून गेली होती.  "काय.... काय.... कोण............ कोण......"  गोपाळकड़े बघत लेखक गोंधळून म्हणाला.


"अव साहेब, मगासधरन आवाज देऊन राहिलोय तर तुम्ही उठायच नाव नाही घेत. काय सपान बिपान पडल का काय तुम्हास्नी?अस काय करताय राव? बर बोला जी, चाय बनवु ना?" गोपाळने लेखकाकडे विचित्र नजरेने बघत विचारले.


आता मात्र लेखकाला पूर्ण जाग आली होती. ' म्हणजे ते सगळ स्वप्न होत तर... मात्र किती खर वाटलं होत ते सगळ! क्षणभर तर मला वाटल खरच ती सगळी व्यक्तिमत्व माझ्या अंगावर धावून येत आहेत.' लेखकाच्या मनात आल. क्षणभर विचार केल्यावर मात्र लेखकाच्या चेहेऱ्यावर हसू फुटलं,'अरे तस बघायला गेल तर उत्तम प्लॉट आहे की पुढच्या कथेसाठी. वा! वा! भलतेच प्रोफेशनल झालो आहोत की आपण. आपल्याला स्वप्नही आजकाल छान पडायला लागली आहेत. चला लिहायला विषय मिळाला. आता सुरवात केली पाहिजे लगेच.' त्याच्या मनात विचार आला आणि तो स्वतःवरच खुश होऊन हसायला लागला.


लेखकाच असं आपलं आपण हसण अचंब्याने बघणाऱ्या गोपाळकडे बघून तो म्हणला;"गोपाळ.. खरच एक फक्कड़सा चहा कर. मी फ्रेश होऊन लिहायलाच बसणार आहे."आणि मनापासून खुश होत बाथरूमच्या दिशेने वळला.


एक विचित्र कटाक्ष टाकून गोपाळ स्वयंपाक घराच्या दिशेने निघाला. मात्र त्याचा पाय दाराजवळ ठेवल्या एका कप-बशीला लागला. बाजूलाच गार झालेल्या पोह्यांची बशीसुद्धा होती.


"चाय पिउन परत झोपलं की काय साहेब? पोहे पन तसच हायेत. बर म्या तर आताच आलू. मंग ह्ये पोहे आन च्या केला कोनी कोन जान?" अस मनाशी म्हणत आणि अजब करीत कप-बशी घेऊन गोपाळ आतल्या दिशेने वळला.


--------------------------------------------------------------


Friday, July 5, 2019

संस्काराचं नातं

संस्काराचं नातं

चाकोरिबद्ध आयुष्य नकोय मला
गर गर फिरणारा भोवरा.. बनुन बघायचंय मला

भरारणारा तो पतंग- त्याची ती उंची;
वा-याशी दोस्ती काटाकाटीची मस्ती...
वेगळच जगणं अनुभवायचंय मला!
चाकोरिबद्ध आयुष्य नकोय मला!

Born clerk... died clerk सगळेच असतात;
वेगळा option click फ़क्त थोडेच करतात;
त्या थोड्यांमद्धे रहायचंय मला...
चाकोरिबद्ध आयुष्य नकोय मला!

White color job आपला फंडा नाय...
कोप-यावरच्या पक्याचा रुबाबसुद्धा जमत नाय..
एक वेगळं आयुष्य जगायचंय मला...
काय अन् कस कोणी सुचवतंय का ज़रा?

I.A.S.,  I. P.S.  किंवा एखादा BUSINESS,
10 वि, 12 वि च्या result मूळे आई बाबा expects...
या अपेक्षांपासून दूर जायचंय मला...
चाकोरिबद्ध आयुष्य नकोय मला!

झटपट यश... भरपूर प्रसिद्धि...
'डी' gang ची सर्वांनाच भिती...
करू का try थोडं? चाकोरीच्या बाहेर येणं...
whyskey अन् rum च्या सोबतित धुंद होणं...

कुणाशीतरी हे सगळं discuss करायचंय मला...
चाकोरिबद्ध आयुष्य नकोय मला!

***

नकोच जगुस चाकोरीबद्ध...
आयुष्य जगावच कसं धुंद धुंद...
चल तुला करवते एक वेगळी सैर;
चाकोरीच्या बाहेर उजाडलेली जशी एकच तिमिर!

धुंद निसर्ग धुंद नशा...
Canvasवर उतरवून रंग... बदलून टाक दिशा.
निशब्द गुंफा, बोलकी स्कल्पचर्स...
Archaeology मधे आहेत चाकोरी बाहेरची features...
जगाचा प्रवास कर; प्रवासाचा सिनेमा कर...
दिसणा-या प्रत्येक आश्चर्याचा;
मनापासून आदर कर!
हे सुद्धा वेगळच आहे; चाकोरी बाहेरचंच् आहे...
तू वेगळा विचार करतोस; यातच आयुष्याचं गमक आहे.

कळते आहे ग आई मला तुझ्या विचारांची दिशा...
चाकोरी बाहेरच्या आयुष्याच्या तिमिराची नशा...

माझ्यात सामावलेल्य़ा तुझ्या प्रतिबिंबाला हलवणार नाही...
चाकोरी बाहेरच्या आयुष्याला........
गालबोट लावणार नाही!!!

Friday, June 28, 2019

आजोळच्या आठवणींची सोनेरी पानं



आजोळच्या आठवणींची सोनेरी पानं

आपल्या सर्वांच्याच लहानपणच्या आजोळच्या अशा काही ना काही आठवणी असतात. मामाच्या गावाला झुकझुक गाडीतून जातानाचं गाणं तर आपण सर्वांनीच लहानपणी अनेकदा म्हंटल असेल. माझ्या बाबतीत सांगायचं तर माझं आजोळ गिरगावातलं आणि माझा जन्म उपनगरातला. त्यामुळे आम्ही खरच कायमच लोकलने चर्नीरोडला उतरून मग चालत  जायचो सिक्का नगरला. आजोळी  माझी आज्जी, आजोबा, दोन मामा आणि एक मामी असे सगळे राहायचे. आमची मावस भावंड बेंगलोरला राहात असल्याने फारशी येत नसत. माझे दोन्ही मामा माझ्या आईपेक्षा लहान. त्यामुळे मी तिसरी किंवा चौथीमध्ये असताना एका मामाच लग्न झालं आणि दुसऱ्याच तर मी दहावीत असताना. त्यामुळे नातवंडं म्हणून आम्हीच होतो. म्हणून देखील लहानपणी आजी, आजोबा आणि मामा लोकांकडून सगळे लाड फक्त आणि फक्त आमचेच झाले.

माझी पहिली मामी आजही दिसायलाअत्यंत सुंदर आहे आणि त्याहूनही सुंदर तिच मन आणि स्वभाव आहे. त्यावेळी तर ती म्हणजे परीच वाटायची मला. माझी पहिली मैत्रिण अस देखील म्हणता येईल. त्याकाळात म्हणजे साधारण १९८९-९० मध्ये ती पार्लरमध्ये जाऊन केस कापायची. ही घटना माझ्यासाठी खूप मोठी होती. तिचं ते perfect साडी नेसणं आणि केसाला पिन्स लावण मी मन लावून निरीक्षण करायचे. ती कुठल्याश्या क्लासमध्ये काहीतरी शिकवायला जायची. घरून  निघताना आम्हाला सांगायची की अमुक एका वेळेला क्लास जवळ या दोघे. मग आम्ही शहाण्या मुलांसारखे तिथे जायचो. त्यानंतर आम्ही तिघे बस ने कधी 'म्हातारीचा बूट' तर कधी चालत 'चौपाटी' तर कधी 'गेट वे ऑफ इंडिया' ला जायचो. बाबूलनाथ देवळावरून जाताना तिथे असलेली कायमची गर्दी मला नेहेमी कोड्यात टाकायची. मामीला मी अनेकदा विचारलं देखील होतं; आपल्या सिक्कानगरच्या देवळात आणि या देवळात काय फरक आहे? इथे इतकी गर्दी असते.... मग तिथे का नाही? पण असे प्रश्न काही सेकंदांसाठीच मनात यायचे. मूळ आकर्षण तर म्हातारीच्या बुटाचं असायचं. त्यामुळे तिथे कधी एकदा पोहोचतो अस झालेलं असायचं. तिथे गेल्यावर मी आणि माझा भाऊ बऱ्यापैकी मस्ती करायचो. मग येताना भेळ, कुल्फी किंवा घराजवळ आलं की प्रकाशकडंच पियुष आणि साबुदाणा वडा ठरलेलं असायचं. कधी कधी सिक्कानगरच्या जवळच्या मंदिरांमध्ये मामी मला न्यायची. फणस वाडीतल व्यंकटेश मंदिर तर मला आजही आठवतं. ते मंदिर म्हणजे एखाद्या राजा सारख त्या परिसरात मिरवायचं. त्या मंदिरात संध्याकाळी प्रसाद म्हणून दही भात आणि भिसिबिली भात द्यायचे. तिकडचे पुजारी अगदी साऊथचा छाप होते. त्यांचं ते हेल काढून बोलणं आणि परत एकदा भाताची मूद वाढतानाचं ते कौतुकाने बघणं अजूनही आठवतं. अलीकडेच त्या मंदिराकडे जाण्याचा योग आला होता. पण आता तिथलं चित्र आगदी बदलून गेल आहे. कुठेतरी आत खोलात एक गरीब बिचारं दगडी मंदिर उभ आहे अस आता त्याच्याकडे बघताना वाटत होत.

आजोळी असलं  की रोज सकाळी लवकर उठवून आजी आम्हाला फडके मंदिरात न्यायची. ती कलावती आईंची उपासना वर्षानुवर्षे करायची. सुट्टीत ती आम्हाला देखील बालोपासना करायला लावायची. म्हणजे सकाळी मंदिरात जाऊन इतर मुलांबरोबर बसून लहान मुलांसाठी लिहिलेली स्तोत्रं म्हणायची. आजीच भजन वगैरे आटपेपर्यंत आम्ही मुलं मंदिराच्या आवारत किंवा मंदिराच्या व्हरांड्यात खेळायचो. आंता मात्र मंदिराचा व्हरांडा बार्स लावून बंद केला आहे आणि आवारात गाड्या लावलेल्या असतात.

आम्ही घरी यायचो तोवर आण्णानी (माझे आजोबा) बेकरीतून मस्त ताजी गरम बटर आणलेली असायची. ही खास फर्माईश माझ्या भावाची असायची. मे महिना असेल तर बटर बरोबर आंबा चिरलेला असायचा. आजोळच आंबा पुराण हा एक वेगळा चर्चेचा विषय होऊ शकतो. कारण आम्ही तिथे गेलो की दुसऱ्याच दिवशी आण्णा बाजारातून एक पेटी आंबे आणायचे. त्याकाळची ती पाच डझन आंबे असलेली लाकडी पेटी बघितली की आमचे डोळे चमकायचे. मग आजी आणि मामी मिळून त्याचे खिळे काढायच्या आणि घराच्या त्या प्रशस्त पुरुषभर उंचीच्या खिडकीत एका चादरीवर ते आंबे पसरायच्या. मग काय सकाळी आंबा, दुपारी आणि रात्री जेवताना आंबा! आम्ही सारखे आंबे खायचो. आज जेव्हा माझ्या मुलींच  चिमणीसारख खाणं बघते त्यावेळी आमचं न मोजता हवतस आणि हवं तेवढं खाणं आठवून हसायलाच येतं.

फडके मंदिराच्या समोरच आण्णांच सोन्याच्या दागिन्यांचं दुकान होत. दिवसभरात माझी आणि माझ्या भावाची एक तरी फेरी दुकानात असायची. पण त्याचं कारण खास होतं. बाजूलाच गिरगावातलं प्रसिद्ध आवटेंच आईस्क्रीमच दुकान होत. आमच्या दुकानातल मागलं दार त्यांच्या किचनमध्ये उघडायचं. त्यामुळे आम्ही आवटे आईस्क्रीम आमचंच असल्यासारखं हक्काने मागच्या दाराने आत जाऊन हव ते आईस्क्रीम काढून घ्यायचो. त्याकाळात प्लास्टिकच्या बॉलमध्ये आईस्क्रीम भरलेलं असायचं. त्याच सर्वात जास्त आकर्षण असायचं आम्हाला.

त्याकाळी मे महिन्याच्या सुट्टीमध्ये साहित्य संघात बरीच बालनाट्य असायची. आण्णा आम्हाला त्यांच्या लुनावरून तिथे सोडायचे. बरोबर खाऊचा डबा दिलेला असायचा. नाटक संपलं की मी आणि माझा भाऊ गायवाडीमधून चालत घरी परत जात असू. त्याकाळातली नाटकं अजूनही मनात घर करून आहेत. हिमागौरी आणि सात बुटके नाटकात दिलीप प्रभावळकर चेटकीण होते. त्यांनी त्यांची एन्ट्री सभागृहातल्या एकदम मागच्या दारातून घेतली. मोठ्याने चित्र-विचित्र आवाज काढत ते धावात स्टेजच्या दिशेने गेले. सभागृहातल्या आम्हा सगळ्या मुलांच्या छातीत तेव्हा धडकी भरली होती ती चेटकीण बघून. अनेक मुलं तर मोठ्याने किंचाळली होती. अशी कितीतरी नाटकं आम्ही तिथे बघितली. मी आणि माझा भाऊ अनेकदा हट्ट करून मुद्दाम लवकर आयचो तिथे. अजून नाटकाचा सेट लागत असायचा. त्यामुळे तो भव्य सेट बघता यायचा. एका वेगळ्याच दुनियेत गेल्यासारखं वाटायचं तेव्हा. बालनाट्य सृष्टीचा सुवर्णकाळ अक्षरश: जगलो आम्ही.

गिरगावातल्या त्या गल्ल्या.... ती चाळ संस्कृती. लहानात लहान सण असो किंवा कोणाच्याही घरातला समारंभ असो... सगळे एकत्र येऊनच साजरा करायचे. त्याकाळात गम्मत म्हणून वर्गणी काढली जायची. वर्गणी म्हणजे 'दिलंच पाहिजे;' असं अकाउंट नव्हतं तेव्हा.

आज चाळींमधल्या मोकळ्या जागेत दुचाकी-चारचाकी लावलेल्या असतात. पूर्वी तिथे शनिवारी रात्री दिवे लावून क्रिकेटच्या मॅचेस व्हायच्या. गणपतीमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम व्हायचे. संक्रांतीला गच्चीत सगळे मिळून पतंग उडवायचे. त्याकाळी देखील तिथे गुजराती लोकांचं वास्तव्य जास्त होत. मग 'जलेबी अने फाफडा' ची टेबलं लागायची गच्चीत. कोणीही यावं आणि हवं तितकं खावं. एक वेगळीच धम्माल असायची त्यात. तीच धम्माल आम्ही कायम अनुभवली ती गोपालकाल्याच्या वेळी. वेगवेगळी स्थिरचित्रं बनवलेले रथ आणि दही-हंडी फोडण्यासाठी निघालेल्या पथकांचे ट्रक्स. मग ज्यांची घरं रस्त्याच्या बाजूने असायची त्यांच्या घरी सगळ्या मुलांची गर्दी व्हायची. घरातल्या बादल्यांमधून पाणी भरून आणून त्या पथकांवर टाकायची आणि घरात चिखल करून टाकायचा. पण कधी कोणाची आई रागावल्याचं नाही आठवत. दिवाळीच्या वेळी कोणत्या मजल्यावर कोणत्या रंगाचे आकाशकंदील लावले जातील याची चर्चा रात्र-रात्र व्हायची. मग ते एकत्र जाऊन कंदील आणणं.... फटाकेसुद्धा असे एकत्रच उडवले जात. आजच्या सारखं नव्हतं तेव्हा. अलीकडे बघते तर आई-वडीलच सांगतात मुलांना त्यांच्या घरातले उडवून होऊ देत मग आपण जाऊ फटाके उडवायला. 'सर्वांनी मिळून' संपून 'आपलं-तुपलं' कधी आपल्या मनात आणि घरात शिरलं ते बहुतेक आपल्यातल्या अनेकांना कळलं देखील नसेल.

मात्र त्या आजोळच्या.... गिरगावातल्या.... सोनेरी आठवणी आजही मनाच्या कस्तुर कुपीमध्ये दरवळतात.

ते बालपणीचे रम्य क्षण आजही सुखावून जातात. शाळा संपली आणि कॉलेज सुरु झाल्यावर मात्र दर सुट्टीतलं गिरगावात जाण कमी झालं. आता तर तिथे इतके मोठे मोठे बदल झाले आहेत; की पूर्वीचं गिरगाव त्यात हरवूनच गेलं आहे. आता आजोळी जाणं हे फक्त काही ना काही समारंभाच्या निमित्तानेच होतं. क्वचित कधीतरी मुद्दाम ठरवून माझ्या अजूनही खुप सुंदर दिसणाऱ्या आणि खूप खूप प्रेमळ मामीला भेटायला जाते. तिथे गेलं की जुन्या आठवणीमध्ये हरवून जाते. परत एकदा ते दिवस जगावेसे वाटतात.... आणि मनात येत राहातं...... जाने कहां गये वो दिन!!!


Friday, June 21, 2019

नवीन नात्यांना समजून घेण्यातली गरज!

नाती म्हटलं की आपल्या मानत रक्ताची नाती उभी राहातात. पण ही रक्ताची नाती मुळात निर्माण होतात ती एका विश्वासाच्या नात्यामुळेच. पती-पत्नीचं नातंच मुळी केवळ प्रेम आणि विश्वास यावर उभं राहातं. अर्थात पुढे जाऊन त्यात प्रेम किती आणि विश्वास किती हे मोजणं अवघड जातं. अनेकदा अनेक जोडप्यांमध्ये लग्नाच्या काही वर्षांनंतर प्रेम किंवा विश्वास उरतोच असं देखील नाही. तर लग्नानंतर निर्माण झालेल्या अनेक नात्यांच्या गुंतागुंतीमुळे हे पती-पत्नीचं नातं सांभाळून घेतलं जातं किंवा टिकवलं जातं. सुरवातीच्या काळातले गुलाबी ढग संपता-संपता नवीन पाहुण्याची चाहूल असते. येणाऱ्या बाळाबरोबरच होणाऱ्या आई-बाबांचं आयुष्य बदलतं. त्यात जर घरात इतर मंडळी असतील तर मग सुरू होते खरी भावनिक लढाई. सांभाळावी लागणारी सगळीच नाती.... आपली नोकरी किंवा व्यवसाय... सण-वार.... पै-पाहुणा... यातून मग एकमेकांना फारसा वेळ देता येतोच असं नाही. त्यातून कधी कधी होणारी भावनिक कुचंबणा ही दोघांचीही असते. केवळ पत्नी/आईच सगळं सांभाळत असते असं माझं मत नाही; तर अनेकदा पती/वडील देखील अनेक भावनिक दोलायमानतेतून जात असतात. या सगळ्याचा परिणाम मूळच्या पती-पत्नी या नात्यावर नकळतपणे होत असतो. पहाता-पहाता दिवस-महिने-वर्ष संपतात. मुलं मोठी होतात आणि त्यांच्या आयुष्याच्या मार्गी लागतात. पण तोवर पती-पत्नींमध्ये काहीसा दुरावा निर्माण झाला असतो. एकमेकांबरोबर ते असतात तर खरे.... सहली.... मित्र-मैत्रिणींबरोबर भेटी-गाठी.... सण-समारंभ एकत्र साजरे करणं सगळं अगदी बिनबोभाट चालू असतं. पण मनाचं जोडलेलं असणं तितकंच महत्वाच नाही का? अनेकदा ते अभावानेच दिसतं. सवईमुळे एकमेकांची घेतलेली काळजी... किंवा आता या वयाला येऊन मी एकटी पडेन किंवा एकटा पडेन म्हणून साथीदाराला सांभाळणं वेगळं आणि मनात असलेल्या प्रेमामुळे सोबत असणं वेगळं. अर्थात हे 'प्रेम' प्रत्येकानं आपलं आपण ठरवायचं असतं.

लग्न! केवळ शिक्षण पूर्ण करून नोकरी-धंद्याला लागलं....वयात आलं....प्रेम केलं.... म्हणून करतो आपण. आपली मानसिकताच ती असते. पण कधी कोणी असा विचार का नाही करत.... सोबत राहण्यासाठी.... आयुष्य एकत्र समरसून जगण्यासाठी लग्न करावं. मुलं जन्माला घालणे.... माझ्या/तुझया आईवडिलांना सांभाळणे.... आर्थिक जवाबदऱ्या एकत्र सांभाळणे हे लग्नाचे मुद्दे का असावेत? काही दिवसांपुर्वी एका बावीस वर्षाच्या मुलीने मला सांगितले की मी आता हळूहळू माझ्या करियरमध्ये काहीतरी करायला लागले आहे. अजून थोडा वेळ लागेल पण मला माहीत आहे की मी पुढे जाऊन नक्की यशस्वी होईन. माझ्या आई-वडिलांची मला साथ देखील आहे. सगळं छान चालू आहे पण अलीकडे आई-बाबांना माझ्या लग्नाची काळजी लागून राहिली आहे. खर सांगू का मला तर वाटतं की मला आयुष्यात पुरुषाची आधारासाठी गरजच नाही. पण सुखी समाधानी आयुष्यासाठी सोबती हवा आहे; आयुष्य परिपूर्णतेने जगण्यासाठी सोबत हवी आहे. पण म्हणून लग्नाचा अट्टहास नाही करायचा मला. इतकी वर्षे मी माझ्या आई-वडिलांबरोबर राहिले त्यांची तत्व-त्यांचे विचार... या घरातल्या सवई सोडून आणि केवळ लग्न केलं म्हणून एखाद्या मुलाच्या घरातले विचार-आचार मान्य करायचे हे मला पटत नाही आहे. अर्थात त्याचा अर्थ मी केवळ स्त्रीवादी विचारांची किंवा मुक्त नात्यात राहण्याच्या विचारांची आहे अस देखील नाही. मला फक्त इतकंच म्हणायचं आहे की लग्न करताना आयुष्य जोडीने जगावं... लग्नामुळे येणाऱ्या नवीन जवाबदऱ्या दोघांनी सांभाळून आपल्या वयाला आवश्यक असे मोकळे श्वास देखील दोघांनी अनुभवावेत. केवळ लग्न झालं म्हणून आपल्या मित्र-मैत्रिणींना दोघांनीही तिलांजली द्यायची गरज नाही... मात्र लग्नाच्या बंधीलकीला विसरायचं नाही.

काहीसे पटले मला तिचे विचार. पण इतके आदर्शवादी संसार आपल्या आजूबाजूला होताना आपण बघतो तरी का? लग्न म्हणजे 'जुळवून घेणे' असं अजूनतरी आपल्या समाजात आहे. दुर्दैवाने अजूनही आपण घरच्या कर्त्याची भूमिका केवळ पुरुषाकडे देतो. त्यामुळे अनेकदा पुरुष त्यांच्या खऱ्या वयापेक्षा जास्त मोठे वाटतात; आणि याउलट स्त्रीची तिची हुशारी... समजूतदारपणा तिने किती वर्षे संसार केला आहे यावर ठरवला जातो. त्यामुळे तसे म्हंटले तर दोघांवरही अन्यायच नाही का? मुलगा त्याच वय विसरून जातो... आणि वयाबरोबर गुलाबी ढगसुद्धा... मुलगी मात्र जवाबदारी नसल्यामुळे अडकून राहाते स्वप्नांच्या राज्यात!

.... आणि मग मी वर म्हंटल्याप्रमाणे अनेकदा अनेक जोडप्यांमध्ये लग्नाच्या काही वर्षांनंतर प्रेम किंवा विश्वास उरतोच असं देखील नाही. मात्र आजची पिढी थोडी वेगळी आहे... काहीशी स्वतंत्र विचारांची आहे.... मागील पिढीमध्ये लग्नाची बोलणी होताना जवाबदाऱ्यांची जंत्री मोजली जायची. मात्र आजच्या पिढीमध्ये वयक्तिक आणि जोडीदाराच्या स्वप्नांचा अगोदर विचार करण्याची प्रवृत्ती वाढते आहे.

मला वाटतं बदल होतो आहे.... चांगला की वाईट हे काळच ठरवेल... पण बदल होणे ही समाजव्यवस्थेची गरज आहे. त्यामुळे आजच्या लग्नाळू मुलांच्या आणि मुलींच्या पालकांनी त्यांच्या विचारांना समजून घेणं आवश्यक आहे. 'आमच्या वेळी असं नव्हतं.' 'लग्न म्हणजे adjusments आणि जवाबदऱ्या'; हे सांगणं थांबवलं पाहिजे. थोडं त्यांना त्यांच्या मार्गाने जाऊ दे की! आपल्याला खूप काही करायचं होतं... कदाचित आपण नाही करू शकलो... पण आजची मुलं प्रयत्न करत आहेत... तर करू देत की! त्यांच्या पाठीशी उभं राहून 'क्या जमाना बदल राहा हे?' हा प्रश्न विचारण्यापेक्षा... 'हा... जमाना बदल रहा हें; मैं साक्षीदार हूं!' असं म्हणायला काय हरकत आहे.

Friday, June 14, 2019

२०१९ च्या निवडणुकीचं यश.... कार्यकर्त्यांच्या भूमिकेतून

२०१९ च्या निवडणुकीचं यश.... कार्यकर्त्यांच्या भूमिकेतून

राहुल गांधी यांना हरवून जायंट किलर ठरलेल्या स्मृती इराणी यांच्या अनेक मुलाखती झाल्या. त्यातल्या एका मुलाखतीमध्ये त्यांना विचारण्यात आलेला प्रश्न तसं बघितलं तर अगदी ओघातला होता. मात्र स्मृती इराणी यांचं उत्तर मला काहीसं अंतर्मुख करून गेलं.

प्रश्न होता : २०१९ च्या निवडणुकीची तयारी आपण कधीपासून सुरू केलीत?

त्यावरचं स्मृती इराणी यांचं उत्तर फारच मार्मिक होतं. त्या म्हणाल्या;"मोदीजींनी २०१४ पासूनच २०१९ ची तयारी सुरू केली होती."

प्रश्नकर्त्याला कदाचित काहीतरी वेगळं उत्तर अपेक्षित असावं किंवा स्मृतिजींना शब्दात पकडण्याचा प्रयत्न करण्याची इच्छा असावी किंवा कदाचित स्मृतिजींचं उत्तर प्रश्नकर्त्याच्या लक्षातच आलं नसावं. कारण त्यांनी तोच प्रश्न परत दोन वेळा विचारला आणि तरीही स्मृतिजींचं उत्तर तेच होतं. साहजिक आहे... कारण भारतीय जनता पक्षाने खरोखरच २०१९ ची तयारी २०१४ मध्ये सुरू केली होती. किंबहुना असं म्हणता येईल की निवडणूक डोळ्यासमोर न ठेवता देखील एकप्रकारची वेगळीच कार्यप्रणाली भारतीय जनता पक्षाने पक्षाच्या अगदी सुरवातीपासूनच्या बांधणीच्या वेळेपासून आत्मसाद केली आहे. याच प्रणालीचा उल्लेख आदरणीय श्री नरेन्द्र मोदी यांनी त्यांच्या २३ मे २०१९ च्या विजया नंतरच्या भाषणात ओझरता केला होता. ते म्हणाले होते;'अब सब जान जाएंगे पन्ना प्रमुख का महत्व क्या होता हें!' त्याच दिवशीच्या श्री अमित शहा यांच्या भाषणात देखील त्यांनी बूथ मधील कार्यकर्त्यांच्या मेहेनातीचा उल्लेख केला होता. त्याहूनही खास गोष्ट म्हणजे श्री नरेंदजी मोदी यांनी या कार्यपद्धती प्रमाणे काम करण्याबद्दल केवळ २०१९ च्या विजयी भाषणात उल्लेख केला अस नाही; तर या अगोदरच ही प्रणाली पक्षीय कार्यकर्त्यांनी अमलात आणली पाहिजे हे सांगितले होते. भारतीय जनता पक्षाने श्री नरेंद्र मोदी यांच्या सक्षम खांद्यांवर २०१४ च्या निवडणुकीची जवाबदारी २०१३ मधील राष्ट्रीय बैठकीत दिली. त्याचवेळी मोदीजींनी 'पन्ना प्रमुख' प्रणालीचे पुनरुत्थान केले होते. (त्यांच्या संपूर्ण भाषणातील या प्रणाली संदर्भातील उल्लेख : चुनाव के विजय का गर्भादान पोलिंग बूथ मे होता हे। पोलिंग बूथ विजय की जननी होती हें। और जो जननी होती हें उसकी हिफजत करना हमारा दायित्व होता हें। इसलीये पोलिंग बूथ की हिफजत हो; पोलिंग बूथ की चिंता हो; पोलिंग बूथ जितनेका संकल्प हो; इस संकल्प को लेकर आगे बढे और भारत दिव्य बने; भारत भव्य बने इस सपने को साकार करने के लिये देशवासींयो की शक्ती को हम साथ मिलकर कर के व्होट मे परिवर्तित करे।)


मात्र २०१४ मध्ये लगेच निवडणुका असल्याने त्यावेळी ही प्रणाली म्हणावी तशी कार्यरत झाली नव्हती. तीच प्रणाली श्री अमित शहा यांनी राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून भारतीय जनता पार्टीची सूत्र हातात घेतल्यावर सर्व पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना पूर्ण शक्तीनिशी राबवण्यास सांगितले.


सर्वसामान्यांना कदाचित हे 'पन्ना प्रमुख' प्रकरण माहीत नसेल. त्यामुळे मोदींजिंच्या २०१९ च्या विजयोत्तर भाषणातील हे एक वाक्य सहसा कोणाच्या लक्षात देखील आलं नसेल. मात्र भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना; विशेषतः ज्यांनी यासाठी मेहेनत घेतली आहे अशा कार्यकर्त्यांना; त्या वाक्यातील अर्थ आणि त्यामागे दडलेलं यश नक्कीच समजलं असेल. २५ मे २०१९ रोजीच्या NDA च्या खासदारांसमोरील भाषणात देखील मोदीजींनी परत एकदा म्हंटले की २०१९ च्या निवडणुकीचे यश हे त्यांचे किंवा कोण्या एका व्यक्तीचे किंवा राजकीय पक्षांचे नसून ते काम केलेल्या कार्यकर्त्यांचे आणि पर्यायाने लोकांचे आहे. त्यांच्या या सांगण्यामागील मतितार्थ जर आपणास समजून घ्यायचा असेल तर आपल्याला मुळात पन्ना प्रमुख म्हणजे नक्की काय ते समजून घ्यावे लागेल. म्हणजे मग एकूणच ही प्रणाली समजणे सोपे जाईल.

अगदी साध्या शब्दात सांगायचं तर आपलं नाव मतदार यादीमध्ये आहे का हे आपण तपासून पाहात असतो. ही प्रत्येक मतदार यादी प्रत्येक बुथप्रमाणे केलेली असते. आपण मतदान केंद्रावर ज्या खोलीमध्ये मतदानासाठी जातो तो आपला बूथ असतो. सर्वसाधारणपणे या एका बुथमध्ये आठशे ते बाराशे मतदार असतात. म्हणजे साधारणपणे तीनशे ते चारशे घरे. या सर्व मतदारांशी संपर्कात राहणे हे खरे तर लोकप्रतिनिधीचे (नगरसेवक) काम. मुंबईसारख्या शहरांमध्ये एका प्रभागात साधारण पन्नास ते पंचावन्न बूथ असतात. म्हणजे साधारण १५००० ते २०००० घरांशी संपर्क असणे गरजेचे असते. हे झाले मुंबईसारख्या शहरांमधील एका प्रभागाबद्दल. राज्यस्तरीय लोकप्रतिनिधीला (आमदार) असे किमान सात प्रभाग असतात; ज्याला आपण विधानसभा म्हणतो. केंद्रीय प्रतिनिधीला (खासदार) अशा सात विधानसभा असतात. या नागरिकांना येणाऱ्या अडचणींचे प्रतिनिधित्व या लोकप्रतिनिधींना त्यांच्या स्तरावर करायचे असते.

सर्वसाधारणपणे विचार केला तर केवळ प्रभाग प्रतिनिधीलाच (नगरसेवक) १५००० ते २०००० हजार घरांचा सतत संपर्क करणे कितीतरी अवघड असते. मग राज्यस्तरीय लोकप्रतिनिधी (आमदार) आणि केंद्रीय प्रतिनिधींना (खासदार) नक्कीच ते काम अजूनच अवघड असू शकते. अर्थात प्रभाग प्रतिनिधी (नगरसेवक) हा दैनंदिन गरजांसाठी सहज उपलब्ध असतो. राज्यीय विकास आणि अधिनियम तयार करणे हा राज्यस्तरीय लोकप्रतिनिधींच्या (आमदार) कामाचा भाग असतो; तर आपल्या जिल्ह्यातील विकास विषय आणि इतर राष्ट्र किंवा देश स्तरावरील समस्या केंद्रापर्यंत पोहोचवण्याचे काम केंद्रीय प्रतिनिधी (खासदार) करत असतो. मात्र यासर्वसाठी लोकसंपर्क फार महत्वाचा असतो.

म्हणून मग भारतीय जनता पक्षाने हाच लोकसंपर्क लोकप्रतिनिधींसाठी आणि लोकांसाठी देखील सोपा व्हावा म्हणून एक प्रणाली खूप पूर्वीच विकसित करून ठेवली आहे. या प्रणालीमध्ये सात ते आठ बूथ मिळून एक शक्तिकेंद्र गठीत केले जाते. या शक्तिकेंद्राचा एक शक्तिकेंद्र प्रमुख असतो. प्रत्येक बुथमध्ये एक स्थानीय समिती संघाटीत केली जाते. या स्थानीय समितीचा एक प्रमूख असतो आणि त्याच्या सोबत त्या स्थानीय समितीमध्ये सदस्य असतात. तेथील शक्तिकेंद्र प्रमुखाचा आणि स्थानीय समिती प्रमुखाचा लोकांशी असणारा संपर्क यातून किती सदस्य असू शकतात ते ठरते. इतके जास्त सदस्य तितके जास्त जनसंपर्क करणे सोपे. शहरांचा विचार केला तर प्रत्येक इमारतीमधून एक असे आणि गावांचा विचार केला तर साधारण पन्नास घरे मिळून असे साधारण वीस ते पंचवीस सदस्य या समितीमध्ये असतात. या सदस्यांकडे त्यांच्या इमारतीची/घरांची जवाबदारी असते. म्हणजे लोकांच्या अडचणी त्यांनी बूथ प्रमुखापर्यंत पोहोचवायच्या असतात; बूथ प्रमुख शक्तिकेंद्र प्रमुखापर्यंत हे काम पोहोचवतो आणि शक्तिकेंद्र प्रमुख प्रभाग अध्यक्ष किंवा लोकप्रतिनिधीपर्यंत ते काम पोहोचवतो. यामुळे लोकप्रतिनिधींनी करायचे काम हे त्यांच्यापर्यंत सहजपणे पोहोचवले जाते आणि त्यामुळे त्या कामाचे परिणाम लवकर आणि चांगले दिसून येतात. त्याचप्रमाणे जर पक्षीय कार्यक्रम शेवटच्या कार्यकर्त्यापर्यंत पोहोचवायचे असतील तर याच शिडीचा उपयोग करून घेताला जातो.

आपणा सर्वांनाच माहीत आहे की २०१९ च्या निवडणुकीच्या तयारीसंदर्भात श्री अमित शहा यांनी विविध राज्यातील कार्यकर्त्यांची भेट घेतली होती. सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या घरी ते जेवले किंवा भेटायला गेले आहेत; असे फोटो किंवा अशा मथळ्याची माहीती देखील आपण वाचली/पाहिली असेल. सर्वच प्रकारच्या प्रचार माध्यमांनी यावरील चर्चा खूपच जास्त केली होती त्या काळात. अगदी ममतादिदींच्या पश्चिम बंगालमध्ये नक्सलबारी नामक विधानसभेतील (जेथून नक्षलवादाला सुरवात झाली आणि त्या विधानसभेच्या नावानेच त्या लोकांच्या कृतीला ओळखले जाते) पाच ते सहा कार्यकर्त्यांच्या घरी श्री अमित शहा एप्रिल २०१७ मध्ये गेले होते. तसेच मे २०१७ महिन्यात देखील लक्षद्वीप येथील कवरत्तीद्वीप येथील तीन घरी जनसंपर्क अभियाना अंतर्गत भेट दिली होती. (या दोन भेटी केवळ उदाहरणा दाखल इथे देते आहे. अशा प्रकारचा जनसंपर्क श्री अमित शहा यांनी कायम ठेवला आहे.) म्हणजेच २०१९ च्या निवडणुकीची तयारी श्री अमित शहा यांनी खरच खूपच अगोदर सुरू केली होती. आणि स्वतःच्या कृतींमधून इतर कार्यकर्त्यांना देखील तोच संदेश दिला होता. ज्यावेळी आपल्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अगदी खालपर्यंत पोहोचतात हे पक्षातील कार्यकर्त्यांच्या लक्षात आले त्यावेळी त्यांना देखील स्वतःच्या जवाबदारीची जाणीव झाल्याशिवाय राहिली नाही. यातूनच बूथ मजबूत करण्यासाठी जे काही करावे लागते ते प्रत्येक कार्यकर्त्याने मनावर घेतले. या जनसंपर्क अभ्यानाच्या बातमीची किती चर्चा झाली याला तोड नाही. गम्मत म्हणजे या भेटीचे वेगळे अर्थ आता समजत आहेत. हे सर्वसामान्य कार्यकर्ते म्हणजेच 'शक्तिकेंद्र प्रमुख, बूथ प्रमुख किंवा पन्ना प्रमुख' असे होते; हे केवळ भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनाच माहीत असेल.

निवडणुकीच्या पूर्वी श्री मोदी यांनी विविध राज्यातील भारतीय जनता पक्षाच्या बूथ स्तरीय कार्यकर्त्यांशी केलेला थेट संवाद देखील कदाचित आपण सर्वांनी पहिला/ऐकला असेल. कारण त्याला देखील दृक्श्राव्य मीडियाने खूपच महत्व दिले होते. यातून भारतीय जनता पक्षाचे अत्यंत सोपे आणि तरीदेखील अत्यंत महत्वाचे धोरणच अधोरेखित होते. ज्यावेळी पक्षातील सर्वोच्च पदावरील नेते सर्वसामान्य कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधतात त्यावेळी त्या पक्षाचे यश नक्कीच अधोरेखित झालेले असते.

वरती उल्लेख केलेल्या २०१३ च्या श्री मोदी यांच्या भाषणातील वाक्याचा अर्थच जणू ते दोघे पुढील पाच वर्ष जगले आहेत. (श्री मोदी : चुनाव के विजय का गर्भादान पोलिंग बूथ मे होता हे।) श्री मोदीजींना यातून पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला हेच सांगायचे होते की; 'भारतीय जनात पक्ष देशभरात कसा जिंकतो याची काळजी तू करू नकोस. तू फक्त तुझ्या बुथची काळजी कर. तुझ्या बूथ मधील प्रत्येक घरात तू पोहोचला पाहिजेस. प्रत्येक घरात आपले सरकार काय काम करते आहे ते पोहोचले पाहिजे. जर त्यांच्या काही अडचणी असतील तर त्या समजून घे आणि त्या सोडवण्याचा प्रयत्न कर. त्यांचा विश्वास जिंक आणि मग मतदानादिवशी हे सर्व मतदार मतदान करायला बाहेर पडतील असं बघ. हे मतदान नक्की आपल्या पक्षासाठी असेल. तू बूथ सांभाळ. देशात आपला पक्ष नक्की जिंकेल.'

यामधील 'सरकार काय करते आहे ते प्रत्येक घरात पोहोचव;' हा कळीचा मुद्दा आहे. २०१४ पासून ते २०१९ पर्यंतच्या पाच वर्षांच्या काळात पंतप्रधान मोदी यांनी देशाच्या विकासासाठी अनेक नवीन योजना आणल्या. श्री मोदींजींच्या मनातील भारताच्या विकासाच्या दृष्टिकोनातून असणाऱ्या लोक कल्याण योजनांच्या लाभारतींपर्यंत प्रत्येक बुथमधील कार्यकर्ते पोहोचले. त्याशिवाय मोदीजींनी जुन्या योजनांचे पुनरुज्जीवन केले; त्याची माहिती देखील या कार्यकर्त्यांनी मोकळेपणी सर्वांसमोर मांडली. देशाच्या सीमारेषा सुरक्षित व्हाव्यात यादृष्टिकोनातून देखील अनेक महत्वाचे निर्णय मोदींच्या सरकारने घेतले. भारताला कमजोर देश समजणाऱ्या शेजारच्या देशांच्या मनात दहशत निर्माण होईल असे निर्णय घेण्यास लष्कराला मोकळीक दिली. मोदींच्या सरकारवर कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचाराचा आरोप झाला नाही. हे सर्व सत्य शेवटच्या कार्यकर्त्यापर्यंत आणि कार्यकर्त्यांच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ही प्रणाली उपयोगी झाली. सर्वोच्च नेता आणि तळातील कार्यकर्ता किंवा सर्वसामान्य नागरिक असा थेट संवादच श्री मोदीजींनी स्थापित केला. आणि हा संवाद योग्य प्रकारे होतो आहे की नाही हे बघण्याची काळजी श्री अमित शहा यांनी राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून राष्ट्रीय स्तरावर घेतली.

महाराष्ट्रामध्ये श्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाचा भार सांभाळून देखील पक्षीय जवाबदारीचे संपूर्ण भान ठेवत हा संवाद बुथमधील प्रत्येक कार्यकर्ता सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवतो आहे की नाही हे जातीने बघितले. त्याचेच फळ म्हणजे २०१९ चा भारतीय जनता पक्षाचा महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशभरातील विजय! जिथे सर्वच राजकीय तत्ववेत्त्यांचे अंदाज कमी पडले.... आणि श्री राहुल गांधी, श्रीमती सोनिया गांधी आणि राजकारणात नवीनच पदार्पण केलेल्या श्रीमती प्रियांका वड्रा यांना काय झाले ते कळलेच नाही.