Friday, June 28, 2019

आजोळच्या आठवणींची सोनेरी पानं



आजोळच्या आठवणींची सोनेरी पानं

आपल्या सर्वांच्याच लहानपणच्या आजोळच्या अशा काही ना काही आठवणी असतात. मामाच्या गावाला झुकझुक गाडीतून जातानाचं गाणं तर आपण सर्वांनीच लहानपणी अनेकदा म्हंटल असेल. माझ्या बाबतीत सांगायचं तर माझं आजोळ गिरगावातलं आणि माझा जन्म उपनगरातला. त्यामुळे आम्ही खरच कायमच लोकलने चर्नीरोडला उतरून मग चालत  जायचो सिक्का नगरला. आजोळी  माझी आज्जी, आजोबा, दोन मामा आणि एक मामी असे सगळे राहायचे. आमची मावस भावंड बेंगलोरला राहात असल्याने फारशी येत नसत. माझे दोन्ही मामा माझ्या आईपेक्षा लहान. त्यामुळे मी तिसरी किंवा चौथीमध्ये असताना एका मामाच लग्न झालं आणि दुसऱ्याच तर मी दहावीत असताना. त्यामुळे नातवंडं म्हणून आम्हीच होतो. म्हणून देखील लहानपणी आजी, आजोबा आणि मामा लोकांकडून सगळे लाड फक्त आणि फक्त आमचेच झाले.

माझी पहिली मामी आजही दिसायलाअत्यंत सुंदर आहे आणि त्याहूनही सुंदर तिच मन आणि स्वभाव आहे. त्यावेळी तर ती म्हणजे परीच वाटायची मला. माझी पहिली मैत्रिण अस देखील म्हणता येईल. त्याकाळात म्हणजे साधारण १९८९-९० मध्ये ती पार्लरमध्ये जाऊन केस कापायची. ही घटना माझ्यासाठी खूप मोठी होती. तिचं ते perfect साडी नेसणं आणि केसाला पिन्स लावण मी मन लावून निरीक्षण करायचे. ती कुठल्याश्या क्लासमध्ये काहीतरी शिकवायला जायची. घरून  निघताना आम्हाला सांगायची की अमुक एका वेळेला क्लास जवळ या दोघे. मग आम्ही शहाण्या मुलांसारखे तिथे जायचो. त्यानंतर आम्ही तिघे बस ने कधी 'म्हातारीचा बूट' तर कधी चालत 'चौपाटी' तर कधी 'गेट वे ऑफ इंडिया' ला जायचो. बाबूलनाथ देवळावरून जाताना तिथे असलेली कायमची गर्दी मला नेहेमी कोड्यात टाकायची. मामीला मी अनेकदा विचारलं देखील होतं; आपल्या सिक्कानगरच्या देवळात आणि या देवळात काय फरक आहे? इथे इतकी गर्दी असते.... मग तिथे का नाही? पण असे प्रश्न काही सेकंदांसाठीच मनात यायचे. मूळ आकर्षण तर म्हातारीच्या बुटाचं असायचं. त्यामुळे तिथे कधी एकदा पोहोचतो अस झालेलं असायचं. तिथे गेल्यावर मी आणि माझा भाऊ बऱ्यापैकी मस्ती करायचो. मग येताना भेळ, कुल्फी किंवा घराजवळ आलं की प्रकाशकडंच पियुष आणि साबुदाणा वडा ठरलेलं असायचं. कधी कधी सिक्कानगरच्या जवळच्या मंदिरांमध्ये मामी मला न्यायची. फणस वाडीतल व्यंकटेश मंदिर तर मला आजही आठवतं. ते मंदिर म्हणजे एखाद्या राजा सारख त्या परिसरात मिरवायचं. त्या मंदिरात संध्याकाळी प्रसाद म्हणून दही भात आणि भिसिबिली भात द्यायचे. तिकडचे पुजारी अगदी साऊथचा छाप होते. त्यांचं ते हेल काढून बोलणं आणि परत एकदा भाताची मूद वाढतानाचं ते कौतुकाने बघणं अजूनही आठवतं. अलीकडेच त्या मंदिराकडे जाण्याचा योग आला होता. पण आता तिथलं चित्र आगदी बदलून गेल आहे. कुठेतरी आत खोलात एक गरीब बिचारं दगडी मंदिर उभ आहे अस आता त्याच्याकडे बघताना वाटत होत.

आजोळी असलं  की रोज सकाळी लवकर उठवून आजी आम्हाला फडके मंदिरात न्यायची. ती कलावती आईंची उपासना वर्षानुवर्षे करायची. सुट्टीत ती आम्हाला देखील बालोपासना करायला लावायची. म्हणजे सकाळी मंदिरात जाऊन इतर मुलांबरोबर बसून लहान मुलांसाठी लिहिलेली स्तोत्रं म्हणायची. आजीच भजन वगैरे आटपेपर्यंत आम्ही मुलं मंदिराच्या आवारत किंवा मंदिराच्या व्हरांड्यात खेळायचो. आंता मात्र मंदिराचा व्हरांडा बार्स लावून बंद केला आहे आणि आवारात गाड्या लावलेल्या असतात.

आम्ही घरी यायचो तोवर आण्णानी (माझे आजोबा) बेकरीतून मस्त ताजी गरम बटर आणलेली असायची. ही खास फर्माईश माझ्या भावाची असायची. मे महिना असेल तर बटर बरोबर आंबा चिरलेला असायचा. आजोळच आंबा पुराण हा एक वेगळा चर्चेचा विषय होऊ शकतो. कारण आम्ही तिथे गेलो की दुसऱ्याच दिवशी आण्णा बाजारातून एक पेटी आंबे आणायचे. त्याकाळची ती पाच डझन आंबे असलेली लाकडी पेटी बघितली की आमचे डोळे चमकायचे. मग आजी आणि मामी मिळून त्याचे खिळे काढायच्या आणि घराच्या त्या प्रशस्त पुरुषभर उंचीच्या खिडकीत एका चादरीवर ते आंबे पसरायच्या. मग काय सकाळी आंबा, दुपारी आणि रात्री जेवताना आंबा! आम्ही सारखे आंबे खायचो. आज जेव्हा माझ्या मुलींच  चिमणीसारख खाणं बघते त्यावेळी आमचं न मोजता हवतस आणि हवं तेवढं खाणं आठवून हसायलाच येतं.

फडके मंदिराच्या समोरच आण्णांच सोन्याच्या दागिन्यांचं दुकान होत. दिवसभरात माझी आणि माझ्या भावाची एक तरी फेरी दुकानात असायची. पण त्याचं कारण खास होतं. बाजूलाच गिरगावातलं प्रसिद्ध आवटेंच आईस्क्रीमच दुकान होत. आमच्या दुकानातल मागलं दार त्यांच्या किचनमध्ये उघडायचं. त्यामुळे आम्ही आवटे आईस्क्रीम आमचंच असल्यासारखं हक्काने मागच्या दाराने आत जाऊन हव ते आईस्क्रीम काढून घ्यायचो. त्याकाळात प्लास्टिकच्या बॉलमध्ये आईस्क्रीम भरलेलं असायचं. त्याच सर्वात जास्त आकर्षण असायचं आम्हाला.

त्याकाळी मे महिन्याच्या सुट्टीमध्ये साहित्य संघात बरीच बालनाट्य असायची. आण्णा आम्हाला त्यांच्या लुनावरून तिथे सोडायचे. बरोबर खाऊचा डबा दिलेला असायचा. नाटक संपलं की मी आणि माझा भाऊ गायवाडीमधून चालत घरी परत जात असू. त्याकाळातली नाटकं अजूनही मनात घर करून आहेत. हिमागौरी आणि सात बुटके नाटकात दिलीप प्रभावळकर चेटकीण होते. त्यांनी त्यांची एन्ट्री सभागृहातल्या एकदम मागच्या दारातून घेतली. मोठ्याने चित्र-विचित्र आवाज काढत ते धावात स्टेजच्या दिशेने गेले. सभागृहातल्या आम्हा सगळ्या मुलांच्या छातीत तेव्हा धडकी भरली होती ती चेटकीण बघून. अनेक मुलं तर मोठ्याने किंचाळली होती. अशी कितीतरी नाटकं आम्ही तिथे बघितली. मी आणि माझा भाऊ अनेकदा हट्ट करून मुद्दाम लवकर आयचो तिथे. अजून नाटकाचा सेट लागत असायचा. त्यामुळे तो भव्य सेट बघता यायचा. एका वेगळ्याच दुनियेत गेल्यासारखं वाटायचं तेव्हा. बालनाट्य सृष्टीचा सुवर्णकाळ अक्षरश: जगलो आम्ही.

गिरगावातल्या त्या गल्ल्या.... ती चाळ संस्कृती. लहानात लहान सण असो किंवा कोणाच्याही घरातला समारंभ असो... सगळे एकत्र येऊनच साजरा करायचे. त्याकाळात गम्मत म्हणून वर्गणी काढली जायची. वर्गणी म्हणजे 'दिलंच पाहिजे;' असं अकाउंट नव्हतं तेव्हा.

आज चाळींमधल्या मोकळ्या जागेत दुचाकी-चारचाकी लावलेल्या असतात. पूर्वी तिथे शनिवारी रात्री दिवे लावून क्रिकेटच्या मॅचेस व्हायच्या. गणपतीमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम व्हायचे. संक्रांतीला गच्चीत सगळे मिळून पतंग उडवायचे. त्याकाळी देखील तिथे गुजराती लोकांचं वास्तव्य जास्त होत. मग 'जलेबी अने फाफडा' ची टेबलं लागायची गच्चीत. कोणीही यावं आणि हवं तितकं खावं. एक वेगळीच धम्माल असायची त्यात. तीच धम्माल आम्ही कायम अनुभवली ती गोपालकाल्याच्या वेळी. वेगवेगळी स्थिरचित्रं बनवलेले रथ आणि दही-हंडी फोडण्यासाठी निघालेल्या पथकांचे ट्रक्स. मग ज्यांची घरं रस्त्याच्या बाजूने असायची त्यांच्या घरी सगळ्या मुलांची गर्दी व्हायची. घरातल्या बादल्यांमधून पाणी भरून आणून त्या पथकांवर टाकायची आणि घरात चिखल करून टाकायचा. पण कधी कोणाची आई रागावल्याचं नाही आठवत. दिवाळीच्या वेळी कोणत्या मजल्यावर कोणत्या रंगाचे आकाशकंदील लावले जातील याची चर्चा रात्र-रात्र व्हायची. मग ते एकत्र जाऊन कंदील आणणं.... फटाकेसुद्धा असे एकत्रच उडवले जात. आजच्या सारखं नव्हतं तेव्हा. अलीकडे बघते तर आई-वडीलच सांगतात मुलांना त्यांच्या घरातले उडवून होऊ देत मग आपण जाऊ फटाके उडवायला. 'सर्वांनी मिळून' संपून 'आपलं-तुपलं' कधी आपल्या मनात आणि घरात शिरलं ते बहुतेक आपल्यातल्या अनेकांना कळलं देखील नसेल.

मात्र त्या आजोळच्या.... गिरगावातल्या.... सोनेरी आठवणी आजही मनाच्या कस्तुर कुपीमध्ये दरवळतात.

ते बालपणीचे रम्य क्षण आजही सुखावून जातात. शाळा संपली आणि कॉलेज सुरु झाल्यावर मात्र दर सुट्टीतलं गिरगावात जाण कमी झालं. आता तर तिथे इतके मोठे मोठे बदल झाले आहेत; की पूर्वीचं गिरगाव त्यात हरवूनच गेलं आहे. आता आजोळी जाणं हे फक्त काही ना काही समारंभाच्या निमित्तानेच होतं. क्वचित कधीतरी मुद्दाम ठरवून माझ्या अजूनही खुप सुंदर दिसणाऱ्या आणि खूप खूप प्रेमळ मामीला भेटायला जाते. तिथे गेलं की जुन्या आठवणीमध्ये हरवून जाते. परत एकदा ते दिवस जगावेसे वाटतात.... आणि मनात येत राहातं...... जाने कहां गये वो दिन!!!


Friday, June 21, 2019

नवीन नात्यांना समजून घेण्यातली गरज!

नाती म्हटलं की आपल्या मानत रक्ताची नाती उभी राहातात. पण ही रक्ताची नाती मुळात निर्माण होतात ती एका विश्वासाच्या नात्यामुळेच. पती-पत्नीचं नातंच मुळी केवळ प्रेम आणि विश्वास यावर उभं राहातं. अर्थात पुढे जाऊन त्यात प्रेम किती आणि विश्वास किती हे मोजणं अवघड जातं. अनेकदा अनेक जोडप्यांमध्ये लग्नाच्या काही वर्षांनंतर प्रेम किंवा विश्वास उरतोच असं देखील नाही. तर लग्नानंतर निर्माण झालेल्या अनेक नात्यांच्या गुंतागुंतीमुळे हे पती-पत्नीचं नातं सांभाळून घेतलं जातं किंवा टिकवलं जातं. सुरवातीच्या काळातले गुलाबी ढग संपता-संपता नवीन पाहुण्याची चाहूल असते. येणाऱ्या बाळाबरोबरच होणाऱ्या आई-बाबांचं आयुष्य बदलतं. त्यात जर घरात इतर मंडळी असतील तर मग सुरू होते खरी भावनिक लढाई. सांभाळावी लागणारी सगळीच नाती.... आपली नोकरी किंवा व्यवसाय... सण-वार.... पै-पाहुणा... यातून मग एकमेकांना फारसा वेळ देता येतोच असं नाही. त्यातून कधी कधी होणारी भावनिक कुचंबणा ही दोघांचीही असते. केवळ पत्नी/आईच सगळं सांभाळत असते असं माझं मत नाही; तर अनेकदा पती/वडील देखील अनेक भावनिक दोलायमानतेतून जात असतात. या सगळ्याचा परिणाम मूळच्या पती-पत्नी या नात्यावर नकळतपणे होत असतो. पहाता-पहाता दिवस-महिने-वर्ष संपतात. मुलं मोठी होतात आणि त्यांच्या आयुष्याच्या मार्गी लागतात. पण तोवर पती-पत्नींमध्ये काहीसा दुरावा निर्माण झाला असतो. एकमेकांबरोबर ते असतात तर खरे.... सहली.... मित्र-मैत्रिणींबरोबर भेटी-गाठी.... सण-समारंभ एकत्र साजरे करणं सगळं अगदी बिनबोभाट चालू असतं. पण मनाचं जोडलेलं असणं तितकंच महत्वाच नाही का? अनेकदा ते अभावानेच दिसतं. सवईमुळे एकमेकांची घेतलेली काळजी... किंवा आता या वयाला येऊन मी एकटी पडेन किंवा एकटा पडेन म्हणून साथीदाराला सांभाळणं वेगळं आणि मनात असलेल्या प्रेमामुळे सोबत असणं वेगळं. अर्थात हे 'प्रेम' प्रत्येकानं आपलं आपण ठरवायचं असतं.

लग्न! केवळ शिक्षण पूर्ण करून नोकरी-धंद्याला लागलं....वयात आलं....प्रेम केलं.... म्हणून करतो आपण. आपली मानसिकताच ती असते. पण कधी कोणी असा विचार का नाही करत.... सोबत राहण्यासाठी.... आयुष्य एकत्र समरसून जगण्यासाठी लग्न करावं. मुलं जन्माला घालणे.... माझ्या/तुझया आईवडिलांना सांभाळणे.... आर्थिक जवाबदऱ्या एकत्र सांभाळणे हे लग्नाचे मुद्दे का असावेत? काही दिवसांपुर्वी एका बावीस वर्षाच्या मुलीने मला सांगितले की मी आता हळूहळू माझ्या करियरमध्ये काहीतरी करायला लागले आहे. अजून थोडा वेळ लागेल पण मला माहीत आहे की मी पुढे जाऊन नक्की यशस्वी होईन. माझ्या आई-वडिलांची मला साथ देखील आहे. सगळं छान चालू आहे पण अलीकडे आई-बाबांना माझ्या लग्नाची काळजी लागून राहिली आहे. खर सांगू का मला तर वाटतं की मला आयुष्यात पुरुषाची आधारासाठी गरजच नाही. पण सुखी समाधानी आयुष्यासाठी सोबती हवा आहे; आयुष्य परिपूर्णतेने जगण्यासाठी सोबत हवी आहे. पण म्हणून लग्नाचा अट्टहास नाही करायचा मला. इतकी वर्षे मी माझ्या आई-वडिलांबरोबर राहिले त्यांची तत्व-त्यांचे विचार... या घरातल्या सवई सोडून आणि केवळ लग्न केलं म्हणून एखाद्या मुलाच्या घरातले विचार-आचार मान्य करायचे हे मला पटत नाही आहे. अर्थात त्याचा अर्थ मी केवळ स्त्रीवादी विचारांची किंवा मुक्त नात्यात राहण्याच्या विचारांची आहे अस देखील नाही. मला फक्त इतकंच म्हणायचं आहे की लग्न करताना आयुष्य जोडीने जगावं... लग्नामुळे येणाऱ्या नवीन जवाबदऱ्या दोघांनी सांभाळून आपल्या वयाला आवश्यक असे मोकळे श्वास देखील दोघांनी अनुभवावेत. केवळ लग्न झालं म्हणून आपल्या मित्र-मैत्रिणींना दोघांनीही तिलांजली द्यायची गरज नाही... मात्र लग्नाच्या बंधीलकीला विसरायचं नाही.

काहीसे पटले मला तिचे विचार. पण इतके आदर्शवादी संसार आपल्या आजूबाजूला होताना आपण बघतो तरी का? लग्न म्हणजे 'जुळवून घेणे' असं अजूनतरी आपल्या समाजात आहे. दुर्दैवाने अजूनही आपण घरच्या कर्त्याची भूमिका केवळ पुरुषाकडे देतो. त्यामुळे अनेकदा पुरुष त्यांच्या खऱ्या वयापेक्षा जास्त मोठे वाटतात; आणि याउलट स्त्रीची तिची हुशारी... समजूतदारपणा तिने किती वर्षे संसार केला आहे यावर ठरवला जातो. त्यामुळे तसे म्हंटले तर दोघांवरही अन्यायच नाही का? मुलगा त्याच वय विसरून जातो... आणि वयाबरोबर गुलाबी ढगसुद्धा... मुलगी मात्र जवाबदारी नसल्यामुळे अडकून राहाते स्वप्नांच्या राज्यात!

.... आणि मग मी वर म्हंटल्याप्रमाणे अनेकदा अनेक जोडप्यांमध्ये लग्नाच्या काही वर्षांनंतर प्रेम किंवा विश्वास उरतोच असं देखील नाही. मात्र आजची पिढी थोडी वेगळी आहे... काहीशी स्वतंत्र विचारांची आहे.... मागील पिढीमध्ये लग्नाची बोलणी होताना जवाबदाऱ्यांची जंत्री मोजली जायची. मात्र आजच्या पिढीमध्ये वयक्तिक आणि जोडीदाराच्या स्वप्नांचा अगोदर विचार करण्याची प्रवृत्ती वाढते आहे.

मला वाटतं बदल होतो आहे.... चांगला की वाईट हे काळच ठरवेल... पण बदल होणे ही समाजव्यवस्थेची गरज आहे. त्यामुळे आजच्या लग्नाळू मुलांच्या आणि मुलींच्या पालकांनी त्यांच्या विचारांना समजून घेणं आवश्यक आहे. 'आमच्या वेळी असं नव्हतं.' 'लग्न म्हणजे adjusments आणि जवाबदऱ्या'; हे सांगणं थांबवलं पाहिजे. थोडं त्यांना त्यांच्या मार्गाने जाऊ दे की! आपल्याला खूप काही करायचं होतं... कदाचित आपण नाही करू शकलो... पण आजची मुलं प्रयत्न करत आहेत... तर करू देत की! त्यांच्या पाठीशी उभं राहून 'क्या जमाना बदल राहा हे?' हा प्रश्न विचारण्यापेक्षा... 'हा... जमाना बदल रहा हें; मैं साक्षीदार हूं!' असं म्हणायला काय हरकत आहे.

Friday, June 14, 2019

२०१९ च्या निवडणुकीचं यश.... कार्यकर्त्यांच्या भूमिकेतून

२०१९ च्या निवडणुकीचं यश.... कार्यकर्त्यांच्या भूमिकेतून

राहुल गांधी यांना हरवून जायंट किलर ठरलेल्या स्मृती इराणी यांच्या अनेक मुलाखती झाल्या. त्यातल्या एका मुलाखतीमध्ये त्यांना विचारण्यात आलेला प्रश्न तसं बघितलं तर अगदी ओघातला होता. मात्र स्मृती इराणी यांचं उत्तर मला काहीसं अंतर्मुख करून गेलं.

प्रश्न होता : २०१९ च्या निवडणुकीची तयारी आपण कधीपासून सुरू केलीत?

त्यावरचं स्मृती इराणी यांचं उत्तर फारच मार्मिक होतं. त्या म्हणाल्या;"मोदीजींनी २०१४ पासूनच २०१९ ची तयारी सुरू केली होती."

प्रश्नकर्त्याला कदाचित काहीतरी वेगळं उत्तर अपेक्षित असावं किंवा स्मृतिजींना शब्दात पकडण्याचा प्रयत्न करण्याची इच्छा असावी किंवा कदाचित स्मृतिजींचं उत्तर प्रश्नकर्त्याच्या लक्षातच आलं नसावं. कारण त्यांनी तोच प्रश्न परत दोन वेळा विचारला आणि तरीही स्मृतिजींचं उत्तर तेच होतं. साहजिक आहे... कारण भारतीय जनता पक्षाने खरोखरच २०१९ ची तयारी २०१४ मध्ये सुरू केली होती. किंबहुना असं म्हणता येईल की निवडणूक डोळ्यासमोर न ठेवता देखील एकप्रकारची वेगळीच कार्यप्रणाली भारतीय जनता पक्षाने पक्षाच्या अगदी सुरवातीपासूनच्या बांधणीच्या वेळेपासून आत्मसाद केली आहे. याच प्रणालीचा उल्लेख आदरणीय श्री नरेन्द्र मोदी यांनी त्यांच्या २३ मे २०१९ च्या विजया नंतरच्या भाषणात ओझरता केला होता. ते म्हणाले होते;'अब सब जान जाएंगे पन्ना प्रमुख का महत्व क्या होता हें!' त्याच दिवशीच्या श्री अमित शहा यांच्या भाषणात देखील त्यांनी बूथ मधील कार्यकर्त्यांच्या मेहेनातीचा उल्लेख केला होता. त्याहूनही खास गोष्ट म्हणजे श्री नरेंदजी मोदी यांनी या कार्यपद्धती प्रमाणे काम करण्याबद्दल केवळ २०१९ च्या विजयी भाषणात उल्लेख केला अस नाही; तर या अगोदरच ही प्रणाली पक्षीय कार्यकर्त्यांनी अमलात आणली पाहिजे हे सांगितले होते. भारतीय जनता पक्षाने श्री नरेंद्र मोदी यांच्या सक्षम खांद्यांवर २०१४ च्या निवडणुकीची जवाबदारी २०१३ मधील राष्ट्रीय बैठकीत दिली. त्याचवेळी मोदीजींनी 'पन्ना प्रमुख' प्रणालीचे पुनरुत्थान केले होते. (त्यांच्या संपूर्ण भाषणातील या प्रणाली संदर्भातील उल्लेख : चुनाव के विजय का गर्भादान पोलिंग बूथ मे होता हे। पोलिंग बूथ विजय की जननी होती हें। और जो जननी होती हें उसकी हिफजत करना हमारा दायित्व होता हें। इसलीये पोलिंग बूथ की हिफजत हो; पोलिंग बूथ की चिंता हो; पोलिंग बूथ जितनेका संकल्प हो; इस संकल्प को लेकर आगे बढे और भारत दिव्य बने; भारत भव्य बने इस सपने को साकार करने के लिये देशवासींयो की शक्ती को हम साथ मिलकर कर के व्होट मे परिवर्तित करे।)


मात्र २०१४ मध्ये लगेच निवडणुका असल्याने त्यावेळी ही प्रणाली म्हणावी तशी कार्यरत झाली नव्हती. तीच प्रणाली श्री अमित शहा यांनी राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून भारतीय जनता पार्टीची सूत्र हातात घेतल्यावर सर्व पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना पूर्ण शक्तीनिशी राबवण्यास सांगितले.


सर्वसामान्यांना कदाचित हे 'पन्ना प्रमुख' प्रकरण माहीत नसेल. त्यामुळे मोदींजिंच्या २०१९ च्या विजयोत्तर भाषणातील हे एक वाक्य सहसा कोणाच्या लक्षात देखील आलं नसेल. मात्र भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना; विशेषतः ज्यांनी यासाठी मेहेनत घेतली आहे अशा कार्यकर्त्यांना; त्या वाक्यातील अर्थ आणि त्यामागे दडलेलं यश नक्कीच समजलं असेल. २५ मे २०१९ रोजीच्या NDA च्या खासदारांसमोरील भाषणात देखील मोदीजींनी परत एकदा म्हंटले की २०१९ च्या निवडणुकीचे यश हे त्यांचे किंवा कोण्या एका व्यक्तीचे किंवा राजकीय पक्षांचे नसून ते काम केलेल्या कार्यकर्त्यांचे आणि पर्यायाने लोकांचे आहे. त्यांच्या या सांगण्यामागील मतितार्थ जर आपणास समजून घ्यायचा असेल तर आपल्याला मुळात पन्ना प्रमुख म्हणजे नक्की काय ते समजून घ्यावे लागेल. म्हणजे मग एकूणच ही प्रणाली समजणे सोपे जाईल.

अगदी साध्या शब्दात सांगायचं तर आपलं नाव मतदार यादीमध्ये आहे का हे आपण तपासून पाहात असतो. ही प्रत्येक मतदार यादी प्रत्येक बुथप्रमाणे केलेली असते. आपण मतदान केंद्रावर ज्या खोलीमध्ये मतदानासाठी जातो तो आपला बूथ असतो. सर्वसाधारणपणे या एका बुथमध्ये आठशे ते बाराशे मतदार असतात. म्हणजे साधारणपणे तीनशे ते चारशे घरे. या सर्व मतदारांशी संपर्कात राहणे हे खरे तर लोकप्रतिनिधीचे (नगरसेवक) काम. मुंबईसारख्या शहरांमध्ये एका प्रभागात साधारण पन्नास ते पंचावन्न बूथ असतात. म्हणजे साधारण १५००० ते २०००० घरांशी संपर्क असणे गरजेचे असते. हे झाले मुंबईसारख्या शहरांमधील एका प्रभागाबद्दल. राज्यस्तरीय लोकप्रतिनिधीला (आमदार) असे किमान सात प्रभाग असतात; ज्याला आपण विधानसभा म्हणतो. केंद्रीय प्रतिनिधीला (खासदार) अशा सात विधानसभा असतात. या नागरिकांना येणाऱ्या अडचणींचे प्रतिनिधित्व या लोकप्रतिनिधींना त्यांच्या स्तरावर करायचे असते.

सर्वसाधारणपणे विचार केला तर केवळ प्रभाग प्रतिनिधीलाच (नगरसेवक) १५००० ते २०००० हजार घरांचा सतत संपर्क करणे कितीतरी अवघड असते. मग राज्यस्तरीय लोकप्रतिनिधी (आमदार) आणि केंद्रीय प्रतिनिधींना (खासदार) नक्कीच ते काम अजूनच अवघड असू शकते. अर्थात प्रभाग प्रतिनिधी (नगरसेवक) हा दैनंदिन गरजांसाठी सहज उपलब्ध असतो. राज्यीय विकास आणि अधिनियम तयार करणे हा राज्यस्तरीय लोकप्रतिनिधींच्या (आमदार) कामाचा भाग असतो; तर आपल्या जिल्ह्यातील विकास विषय आणि इतर राष्ट्र किंवा देश स्तरावरील समस्या केंद्रापर्यंत पोहोचवण्याचे काम केंद्रीय प्रतिनिधी (खासदार) करत असतो. मात्र यासर्वसाठी लोकसंपर्क फार महत्वाचा असतो.

म्हणून मग भारतीय जनता पक्षाने हाच लोकसंपर्क लोकप्रतिनिधींसाठी आणि लोकांसाठी देखील सोपा व्हावा म्हणून एक प्रणाली खूप पूर्वीच विकसित करून ठेवली आहे. या प्रणालीमध्ये सात ते आठ बूथ मिळून एक शक्तिकेंद्र गठीत केले जाते. या शक्तिकेंद्राचा एक शक्तिकेंद्र प्रमुख असतो. प्रत्येक बुथमध्ये एक स्थानीय समिती संघाटीत केली जाते. या स्थानीय समितीचा एक प्रमूख असतो आणि त्याच्या सोबत त्या स्थानीय समितीमध्ये सदस्य असतात. तेथील शक्तिकेंद्र प्रमुखाचा आणि स्थानीय समिती प्रमुखाचा लोकांशी असणारा संपर्क यातून किती सदस्य असू शकतात ते ठरते. इतके जास्त सदस्य तितके जास्त जनसंपर्क करणे सोपे. शहरांचा विचार केला तर प्रत्येक इमारतीमधून एक असे आणि गावांचा विचार केला तर साधारण पन्नास घरे मिळून असे साधारण वीस ते पंचवीस सदस्य या समितीमध्ये असतात. या सदस्यांकडे त्यांच्या इमारतीची/घरांची जवाबदारी असते. म्हणजे लोकांच्या अडचणी त्यांनी बूथ प्रमुखापर्यंत पोहोचवायच्या असतात; बूथ प्रमुख शक्तिकेंद्र प्रमुखापर्यंत हे काम पोहोचवतो आणि शक्तिकेंद्र प्रमुख प्रभाग अध्यक्ष किंवा लोकप्रतिनिधीपर्यंत ते काम पोहोचवतो. यामुळे लोकप्रतिनिधींनी करायचे काम हे त्यांच्यापर्यंत सहजपणे पोहोचवले जाते आणि त्यामुळे त्या कामाचे परिणाम लवकर आणि चांगले दिसून येतात. त्याचप्रमाणे जर पक्षीय कार्यक्रम शेवटच्या कार्यकर्त्यापर्यंत पोहोचवायचे असतील तर याच शिडीचा उपयोग करून घेताला जातो.

आपणा सर्वांनाच माहीत आहे की २०१९ च्या निवडणुकीच्या तयारीसंदर्भात श्री अमित शहा यांनी विविध राज्यातील कार्यकर्त्यांची भेट घेतली होती. सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या घरी ते जेवले किंवा भेटायला गेले आहेत; असे फोटो किंवा अशा मथळ्याची माहीती देखील आपण वाचली/पाहिली असेल. सर्वच प्रकारच्या प्रचार माध्यमांनी यावरील चर्चा खूपच जास्त केली होती त्या काळात. अगदी ममतादिदींच्या पश्चिम बंगालमध्ये नक्सलबारी नामक विधानसभेतील (जेथून नक्षलवादाला सुरवात झाली आणि त्या विधानसभेच्या नावानेच त्या लोकांच्या कृतीला ओळखले जाते) पाच ते सहा कार्यकर्त्यांच्या घरी श्री अमित शहा एप्रिल २०१७ मध्ये गेले होते. तसेच मे २०१७ महिन्यात देखील लक्षद्वीप येथील कवरत्तीद्वीप येथील तीन घरी जनसंपर्क अभियाना अंतर्गत भेट दिली होती. (या दोन भेटी केवळ उदाहरणा दाखल इथे देते आहे. अशा प्रकारचा जनसंपर्क श्री अमित शहा यांनी कायम ठेवला आहे.) म्हणजेच २०१९ च्या निवडणुकीची तयारी श्री अमित शहा यांनी खरच खूपच अगोदर सुरू केली होती. आणि स्वतःच्या कृतींमधून इतर कार्यकर्त्यांना देखील तोच संदेश दिला होता. ज्यावेळी आपल्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अगदी खालपर्यंत पोहोचतात हे पक्षातील कार्यकर्त्यांच्या लक्षात आले त्यावेळी त्यांना देखील स्वतःच्या जवाबदारीची जाणीव झाल्याशिवाय राहिली नाही. यातूनच बूथ मजबूत करण्यासाठी जे काही करावे लागते ते प्रत्येक कार्यकर्त्याने मनावर घेतले. या जनसंपर्क अभ्यानाच्या बातमीची किती चर्चा झाली याला तोड नाही. गम्मत म्हणजे या भेटीचे वेगळे अर्थ आता समजत आहेत. हे सर्वसामान्य कार्यकर्ते म्हणजेच 'शक्तिकेंद्र प्रमुख, बूथ प्रमुख किंवा पन्ना प्रमुख' असे होते; हे केवळ भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनाच माहीत असेल.

निवडणुकीच्या पूर्वी श्री मोदी यांनी विविध राज्यातील भारतीय जनता पक्षाच्या बूथ स्तरीय कार्यकर्त्यांशी केलेला थेट संवाद देखील कदाचित आपण सर्वांनी पहिला/ऐकला असेल. कारण त्याला देखील दृक्श्राव्य मीडियाने खूपच महत्व दिले होते. यातून भारतीय जनता पक्षाचे अत्यंत सोपे आणि तरीदेखील अत्यंत महत्वाचे धोरणच अधोरेखित होते. ज्यावेळी पक्षातील सर्वोच्च पदावरील नेते सर्वसामान्य कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधतात त्यावेळी त्या पक्षाचे यश नक्कीच अधोरेखित झालेले असते.

वरती उल्लेख केलेल्या २०१३ च्या श्री मोदी यांच्या भाषणातील वाक्याचा अर्थच जणू ते दोघे पुढील पाच वर्ष जगले आहेत. (श्री मोदी : चुनाव के विजय का गर्भादान पोलिंग बूथ मे होता हे।) श्री मोदीजींना यातून पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला हेच सांगायचे होते की; 'भारतीय जनात पक्ष देशभरात कसा जिंकतो याची काळजी तू करू नकोस. तू फक्त तुझ्या बुथची काळजी कर. तुझ्या बूथ मधील प्रत्येक घरात तू पोहोचला पाहिजेस. प्रत्येक घरात आपले सरकार काय काम करते आहे ते पोहोचले पाहिजे. जर त्यांच्या काही अडचणी असतील तर त्या समजून घे आणि त्या सोडवण्याचा प्रयत्न कर. त्यांचा विश्वास जिंक आणि मग मतदानादिवशी हे सर्व मतदार मतदान करायला बाहेर पडतील असं बघ. हे मतदान नक्की आपल्या पक्षासाठी असेल. तू बूथ सांभाळ. देशात आपला पक्ष नक्की जिंकेल.'

यामधील 'सरकार काय करते आहे ते प्रत्येक घरात पोहोचव;' हा कळीचा मुद्दा आहे. २०१४ पासून ते २०१९ पर्यंतच्या पाच वर्षांच्या काळात पंतप्रधान मोदी यांनी देशाच्या विकासासाठी अनेक नवीन योजना आणल्या. श्री मोदींजींच्या मनातील भारताच्या विकासाच्या दृष्टिकोनातून असणाऱ्या लोक कल्याण योजनांच्या लाभारतींपर्यंत प्रत्येक बुथमधील कार्यकर्ते पोहोचले. त्याशिवाय मोदीजींनी जुन्या योजनांचे पुनरुज्जीवन केले; त्याची माहिती देखील या कार्यकर्त्यांनी मोकळेपणी सर्वांसमोर मांडली. देशाच्या सीमारेषा सुरक्षित व्हाव्यात यादृष्टिकोनातून देखील अनेक महत्वाचे निर्णय मोदींच्या सरकारने घेतले. भारताला कमजोर देश समजणाऱ्या शेजारच्या देशांच्या मनात दहशत निर्माण होईल असे निर्णय घेण्यास लष्कराला मोकळीक दिली. मोदींच्या सरकारवर कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचाराचा आरोप झाला नाही. हे सर्व सत्य शेवटच्या कार्यकर्त्यापर्यंत आणि कार्यकर्त्यांच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ही प्रणाली उपयोगी झाली. सर्वोच्च नेता आणि तळातील कार्यकर्ता किंवा सर्वसामान्य नागरिक असा थेट संवादच श्री मोदीजींनी स्थापित केला. आणि हा संवाद योग्य प्रकारे होतो आहे की नाही हे बघण्याची काळजी श्री अमित शहा यांनी राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून राष्ट्रीय स्तरावर घेतली.

महाराष्ट्रामध्ये श्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाचा भार सांभाळून देखील पक्षीय जवाबदारीचे संपूर्ण भान ठेवत हा संवाद बुथमधील प्रत्येक कार्यकर्ता सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवतो आहे की नाही हे जातीने बघितले. त्याचेच फळ म्हणजे २०१९ चा भारतीय जनता पक्षाचा महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशभरातील विजय! जिथे सर्वच राजकीय तत्ववेत्त्यांचे अंदाज कमी पडले.... आणि श्री राहुल गांधी, श्रीमती सोनिया गांधी आणि राजकारणात नवीनच पदार्पण केलेल्या श्रीमती प्रियांका वड्रा यांना काय झाले ते कळलेच नाही.

Friday, June 7, 2019

Being ALONE n not LONELY!



Being *ALONE* n not *LONELY*!



एक सांगू का? आपण सगळेच एक साचेबंद आयुष्य जगत असतो. आपले आई-वडील हौसेने आपल्याला जन्माला घालतात... लहानपणी शाळा... तरुणपणी कॉलेज... मग एखादी चांगलीशी नोकरी किंवा व्यवसाय.... यथावकाश लग्न. असा सरधोपट मार्ग आपल्यापैकी बहुतांशी सगळेच जगतो. पुढे आपण देखील हौसेचे आई-वडील होतो. साधारण एवढ सगळ होईपर्यंत आपण पस्तिशीत पोहोचलेलो असतो. अर्थात अजून आर्थिक स्थिरता मनासारखी साधलेली नसतेच.... मग थोडं सुखासीन आयुष्य जगण्याच्या इच्छेने म्हणा किंवा नोकरी-व्यवसायातल्या कॉम्पिटीशनला तोंड द्यायचं असत म्हणून म्हणा आपण पळत असतो. अचानक कधीतरी आपल्या लक्षात येत की आपण पंचेचाळीशी गाठली देखील. आता थोडं सोपं झालय आयुष्य. मुलं मोठी झाली आहेत. त्यांचं असं एक विश्व आहे. मात्र आपण त्या विश्वाचा एक लहानसा भाग आहोत फक्त. आपली बायको/नवरा देखील काहीसे त्यांच्या आयुष्यात रमले आहेत. हळूहळू कुठेतरी मनात एकटेपणा जाणवायला लागतो. BEING LONELY feel!


मग आपण देखील कधीतरी हळू हळू जुने मित्र-मैत्रिणी शोधायला लागतो. क्वचित् कधीतरी होणारे फोन्स अधून-मधून व्हायला लागतात. ग्रुप्स तयार होतात. भेटी ठरायला लागतात. मुलाचं चाललेलं शिक्षण, त्यांचे आणि आपले देखील पुढील करियर प्लान्स हे विषय सुरवातीला हमखास असतात. हळूहळू आपल्याला या जुन्या मैत्रीतला मोकळेपणा आवडायला लागतो. भेटी वाढायला लागतात; आणि जुने दिवस गप्पांच्या ओघात येतात. मग चर्चा काहीशी बदलते....


"यार तू कसला झक्कास गायचास रे शाळेत. शिकत देखील होतास न? मग पुढे काय झालं?"


"सोड यार. दहावीत चांगले मार्क्स हवे होते. म्हणून मग सोडल गाण-बिण. आणि नंतर वेळच नाही मिळाला. पण तानसेन नसलो तरी आपण पक्के कानसेन आहोत हा. solid collection आहे आपल्याकडे. ये एकदा दाखवतो."


"ए तू कायम नाटकांमध्ये भाग घ्यायचीस ग. तेव्हा तर असच काहीतरी करायचं आहे अस म्हणायचीस? पुढे काहीच नाही केलंस?"


"पुढे काय करणार ग? कर्म माझ! अग ते त्या वयातले बालिश विचार होते. बी. कॉम. नंतर बँकेत लागले... आता ऑफिसर आहे. नाटक-बिटक बहुतेक नसत जमल मला. पण आता एकही चांगल नाटक सोडत नाही ह बघायचं. किमान अशी तरी हौस भागवून घेते."


"अबे तू शाळेत एम. एफ. हुसेनला लाजवेल अशी चित्र काढायचास. आता काय फक्त खर्डेघाशी?"


"यार! इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतली आणि मग राहूनच गेल हे सगळ."


हे असे विषय होतात. आणि मग कधीतरी आपल्याला वाटायला लागत खरच आपल्याला काहीतरी छंद होतेच की. मग बायकोशी/नवऱ्याशी गप्पा मारताना किंवा ऑफिसमध्ये सहकाऱ्यांशी बोलताना आपण सांगतो आपली ती लहानपणी बघितलेली स्वप्न. अशा गप्पांमध्ये कोणीतरी सहज म्हणून जातं;" अरे वेळ नाही गेली अजून. त्यात करियर नाही केलस तरी चालेल, पण छंद आहे तर आता चालू कर की." त्याक्षणी  ऐकून न ऐकल्यासारखं करत असलो तरी खोल मनात आपण देखील तो विचार करायला लागतो. नकळत कधीतरी आवडणाऱ्या छंदाचा क्लास जवळपास शोधतो आणि जमेल तसं... जमेल तेव्हा आपली हौस पुरवून घ्यायला लागतो. अलीकडे अचानक जाणवायला लागलेला एकटेपणा अचानक नाहीसा होतो. स्वतःत हरवून जायला लागतो आपण... कदाचित जागायला शिकतो आपण.... अगदी नकळत!


.... आणि मग पुढच्यावेळी जेव्हा तेच जुने मित्र-मैत्रिणी भेटतात तेव्हा हौसेने त्यांना या नवीन  हौसेची माहिती देतो. एक वेगळाच आनंद असतो या परत एकदा सुरु केलेल्या छंदात. हरवून जायला लागतो आपण त्यात. मग आपल्यातच हरवून जातो आपण. खूप खुश राहायला लागतो. मनातला एकटेपणा नकळत कमी झालेला असतो.... आणि अनेकदा सोबत नसूनही आपण दुःखात नसतो.


THAT'S WHAT I CALL BEING ALONE AND NOT LONELY!!!



स्वतःत हरवून जाणं................... एकटेपणात नाही!!!


मग? तुमचा काय छंद आहे? केलीय का सुरवात? नाही? मग कधी करणार?


Friday, May 31, 2019

अशीही एक गोष्ट

अशीही एक गोष्ट

कॅटीने रोहनकडे वळून बघितले आणि हसली.

"Hey! I really mean it. I really love you." रोहनने तिच्या बरोबर चालण्याचा प्रयत्न करत आर्जवी स्वरात तिला सांगितले.

"Please Ron! It's over. Don't come after me." तिने त्याच्याकडे पाठ करताना म्हंटले; एक सिगरेट पेटवली आणि आपली बॅग घेऊन निघून गेली.

रोहन तिच्या त्या मागे परत वळूनही न बघता तडातडा जाण्याकडे अवाक् होऊन बघत बसला. आणि का कोण जाणे त्याला मिताली आठवली.

****

मिताली आणि रोहन एकाच शाळेत आणि मग पुढे बारावी पर्यंत एकाच कॉलेजमध्ये. त्यामुळे जाणे-येणे एकत्र. पक्की दोस्ती दोघांची. मिताली प्रचंड बडबडी. रोहन मात्र तसा कमी बोलणारा. रोहनला मोजकेच मित्र होते आणि ते ही सगळे एकदम करियर ओरियेंटेड! त्यांच्याबरोबर राहून रोहन देखील सतत पुढे काय शिकायचं आणि कसं शिकायचं याचा विचार करत असे आणि तेवढंच बोलत असे.

बारावीनंतर मितालीने पॅरामेडिकल विषय घेतले आणि रोहनने इंजिनिअरिंगला प्रवेश घेतला. दोघांचे रस्ते वेगळे झाले. आता त्यांचं भेटणं अगदीच होईनास झालं. मितालीच अधून-मधून मुद्दाम रोहनला भेटायला घरी यायची. पण ती आली म्हणून रोहन हातातली कामं सोडून कधी तिच्याबरोबर बसला नाही. शिक्षण होत होते. मिताली ग्रॅज्युएट झाली आणि रोहन इंजिनिअर.

रिझल्टच्या दुसऱ्याच दिवशी रोहनच्या वडिलांनी त्याला विचारलं,"मग आता आपल्या ऑफिसमध्ये कधीपासून येणार आहेस?"

त्यांनी हा प्रश्न विचारला आणि रोहनने घरात मोठा बॉम्ब फोडला. "बाबा, आई.... आजी....

 मी लंडनला जाणार आहे. मला अजून शिकायचे आहे. मी फक्त बावीस वर्षांचा आहे. मला अजून शिकायचं आहे. मुख्य म्हणजे इतक्या लवकर बाबांबरोबर कामाला लागलो तर मग मी माझं आयुष्य कधी जगायचं?"

त्याच्या या निर्णयाने घरातल्या सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं. मात्र त्यावर कोणीही काहीही बोललं नाही. "बर! शिक हवा तेवढा." अस म्हणून वडिलांनी विषय संपवला.

दुसऱ्या दिवसापासून रोहनची धावपळ सुरू झाली. लंडनच्या सर्वात चांगल्या  युनिव्हर्सिटीमध्ये मॅनेजमेंट कोर्ससाठी त्याने स्कॉलरशिप मिळवली आणि जाण्याची तयारी सुरू केली.

एकदिवस संध्याकाळी त्याची आई त्याच्या खोलीत आली आणि म्हणाली,"रोहन, मला तुझ्याशी बोलायचं आहे. मोकळा आहेस का?"

आई हे असं का विचारते आहे ते रोहनच्या लक्षात येईना. त्याने हातातले काम बाजूला ठेवले आणि आईचा हात धरून तिला पलंगावर बसवले आणि म्हणाला,"आई, मला माहित आहे की माझ्या जाण्याच्या निर्णयाने तुम्ही फारसे खुश नाही आहात. माझ्याशी कोणी धड बोलतही नाही आहे. पण आई, मला खरच अजून शिकावस वाटत आहे. इतक्या लवकर बाबांच्या व्यवसायात मला नाही पडायचं."

त्यावर हसून अशी म्हणाली,"रोहन, आमचं तुझ्या अजून शिकण्याबद्दल काहीच हरकत नाही. मला तुला दुसरंच काहीतरी विचारायच आहे."

तिच्या शेजारी बसत रोहन म्हणाला, "आई, असं फॉर्मल नको बोलुस. विचार न तुला काय विचारायचं आहे ते."

आईने रोहनच्या थेट डोळ्यात बघत त्याला विचारले,"रोहन, तुझा मितालीच्या बाबतीत काय विचार आहे? तू जाण्या अगोदर असपन साखरपुडा करून घ्यायचा आहे की लग्नच उरकून टाकायचं आहे? म्हणजे ती देखील येईल तुझ्याबरोबर लंडनला."

आईच्या त्या प्रश्नाने रोहन चक्रावूनच गेला. हे अचानक मितालीच काय आहे? आपण तर असा विचारही केलेला नाही. मग आईला असं का वाटावं?

त्याने आईकडे गोंधळून बघत विचारलं,"आई, हे साखरपुडा-लग्न काय बोलते आहेस?"

आता गोंधळून जायची पाळी आईची होती. तिने प्रश्नार्थक नजरेने रोहनकडे बघितले आणि म्हणाली,"अरे रोहन; तुझं आणि मितालीच एकमेकांवर प्रेम आहे न? नाहीतर ती तुझ्या खोलीत येऊन तासंतास का बसायची? तुम्ही इतक्या काय गप्पा मारायचात? अरे, तुम्ही दोघे लहानपणापासून एकत्र आहात; बारावीनंतर दोघांच्या वाटा वेगळ्या झाल्या तरी तुमचं भेटणं तसंच राहिलं. तुला कोणी नवीन मैत्रीण नाही; ती हक्काने आपल्या घरी येते... काय समजावा आम्ही याचा अर्थ?"

"आई, याचा अर्थ इतकाच की आमची चांगली मैत्री आहे." रोहन थोडा वैतागून म्हणाला. नेमकं त्याचवेळी मिताली त्याच्या खोलीच्या दारात येऊन उभी राहिली होती. तिला पाहून रोहनची आई पलंगावरून उठली आणि खोलीबाहेर गेली. जाताना तिने मितालीच्या खांद्यावर थोपटल्यासारखे केले.

आई बाहेर जाताच मिताली खोलीत शिरली आणि रोहनच्या पुढ्यात उभी राहिली. "रोहन, माझं तुझ्यावर प्रेम आहे. मला इतके दिवस वाटत होतं की तुझ्याही मनात माझ्याबद्दल अशाच भावना आहेत."

मितालीच्या या अचानक स्पष्ट बोलण्याने रोहन गडबडला. मात्र तिच्या समोर उभा राहात तो म्हणाला,"मिताली, तू माझी एकदम खास मैत्रीण आहेस. मात्र सध्या तरी माझ्या मनात पुढच्या शिक्षणाव्यरीरिक्त दुसरा कोणताही विचार नाही."

त्याच्या डोळ्यात डोळे घालून मिताली क्षणभर उभी राहिली आणि मग शांतपणे म्हणाली,"रोहन, I understand. काहीच हरकत नाही. तू जा लंडनला शिकण्यासाठी. मला देखील अजून दोन वर्षे पुढचं शिक्षण घ्यायला लागतीलच. मात्र मला एका प्रश्नच उत्तर दे. कधीतरी तर तू नक्कीच लग्नाचा विचार करशील ना? त्यावेळी किमान तुझ्या मनातल्या माझ्याबद्दलच्या भावना मला सांगशील का?"

तिच्या बोलण्याने का कोणास ठाऊक पण रोहनला सुटल्यासारखे वाटले. तिच्याकडे बघत तो म्हणाला,"नक्की मिताली. लंडनचं शिक्षण संपवून मी परत येण्याचा विचार करतो आहे. एकदा शिक्षण संपलं की मला देखील छान लग्न करून संसार करायचा आहे. त्यामुळे आपल्यात काहीतरी घडू देखील शकतं हं."

त्याचं उत्तर ऐकून मिताली मनापासून हसली.

रोहन लंडनला गेला आणि त्याचं शिक्षण सुरू झालं. नवीन शहर, नवे मित्र, नवं आयुष्य! रोहन जणूकाही मगच सगळं सोडून आला होता. परदेशातल आयुष्य तो तिथल्याच पद्धतीने जगू लागला होता. पाहाता पाहाता दोन वर्ष सरली आणि रोहनचं शिक्षण संपलं. मात्र कॅम्पस इंटरव्युमध्ये रोहनला लंडनमधील एका खूप चांगल्या कंपनीकडून उत्तम ऑफर आली. पुढचा-मागचा विचार न करता त्याने ती स्वीकारली. घरी कळवून टाकले की अजून एक वर्ष अनुभव घेण्यासाठी तो लंडनलाच राहणार आहे.

त्याच्या आईने त्याला फोनवरून आठवण करून दिली की त्याने तिला शब्द दिला होता की तो शिक्षण संपताच परत येईल. रोहनने आईला समजावले की या नोकरीच्या अनुभवाचा उपयोग त्याला पुढे व्यवसायात खूप होईल. त्याच्या त्या बोलण्याने आई निरुत्तर झाली.

रोहनची नोकरी सुरू झाली. बघता बघता दिवस...  महिनेच काय पण फोन वर्षे देखील उलटून गेली. सुरवातीला एकदा रोहनचे आई-वडील दोघांनी आणि मग एक-दोन वेळा आईने त्याला परत येण्याबद्दल विचारले. मात्र "मी अजून काहीही ठरवलेले नाही;" असे उत्तर देऊन रोहनने विषय संपवला.

असेच दिवस जात होते आणि रोहनच्या ऑफिसमध्ये एक मुलगी जॉईन झाली. तिचं नाव कॅटी होते. रोहनची आणि कॅटीची दोस्ती फारच पटकन झाली. दोस्तीचं प्रेमात रूपांतर कधी झालं दोघांच्याही लक्षात आलं नाही. कॅटी तशी एकटीच राहात असल्याने ती दोन-तीन महिन्यातच रोहनच्या अपार्टमेंटमध्ये शिफ्ट झाली.

आता दोघांच्या रिलेशनशिपला सहा महिने हकुन गेले होते. एका शनिवारी संध्याकाळी रोहनने फिरंगीपद्धतीने कॅटीला लग्नाची मागणी घातली., भर रस्त्यात एका गुडघ्यावर बसत त्याने तिला अंगठी दिली. कॅटीने देखील ती अंगाठी स्वीकारत लग्नाला होकार दिला.

रोहनने लगेच आई-वडिलांना त्याच्या लग्नाची बातमी दिली. ते दोघे देखील त्याला आणि कॅटीला आशीर्वाद द्यायला लंडनला आले. मात्र लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी ते परत जायला निघाले. रोहनची इच्छा होती की त्यांनी अजून काही दिवस राहावं. पण वडिलांनी त्याला सांगितलं,"रोहन, तुला मध्ये कळवलं होत ते आठवत का? अरे, तुझ्या आजीची तब्बेत अलीकडे ठीक नसते. त्यामुळे आम्ही लगेच परत गेलेलंच बरं. त्यात तुझं नवीन लग्न झालं आहे. उगाच आमची अडचण नको."

यावर रोहन काहीच बोलला नाही. लग्न सोहळा असा काही नव्हताच. कॅटीच्या इच्छेप्रमाणे चर्चमध्ये लग्न झाले आणि दुसऱ्याच दिवशी रोहनचे आई-वडील भारतात परतले.

रोहन त्याच्या आयुष्यावर भलताच खुश होता. तो आणि कॅटी एकत्र ऑफिसमध्ये जायला बाहेर पडत आणि एकत्र येत. आता अनेक वर्षे परदेशात राहिल्यामुळे रोहनने तिथली जीवनपद्धत स्वीकारली होती. सगळं सुरळीत चाललं होतं. अशीच तीन वर्षे उलटली आणि एका सकाळी कॅटीने रोहनला गोड बातमी दिली. ती आई होणार होती आणि रोहन वडील! रोहनचा आनंद गगनात मावत नव्हता. त्याने त्याच्या आईला लगेच फोन करून कळवले आणि कॅटीच्या बाळंतपणासाठी येण्याचा आग्रह केला. आईने देखील लगेच होकार दिला. कॅटी शेवटच्या महिन्यापर्यंत ऑफिसला जाणार होती; त्यामुळे रोहनने आईला नवव्या महिन्यातच यायला सांगितले.

रोहनच्या इच्छेप्रमाणे त्याची आई कॅटीला नववा महिना लागल्यावर आठ दिवसांनी आली. रोहनचे वडील देखील तिच्याबरोबर आले होते. अजून 3 आठवडे वेळ होता आणि कोणताही त्रास होत नव्हता त्यामुळे कॅटी अजूनही ऑफिसला जात होती.

दुसऱ्या दिवशी रोहनच्या आईने कॅटीला सांगितले की आता काहीच दिवस उरले आहेत त्यामुळे जास्त दमणे योग्य नाही. जर कॅटी घरी राहिली तर तिच्या आवडीचे पदार्थ करून तिला खायला घालायची रोहनच्या आईची इच्छा होती. मात्र कॅटीला हे अजिबात मान्य नव्हते. तिने रोहनला स्पष्ट शब्दात सांगितले,"माझे बाळंतपण हा माझा वयक्तिक प्रश्न आहे. तुझी इच्छा म्हणून तु तुझ्या आई-वडिलांना बोलावले आहेस. त्यामुळे त्यांच्या इच्छा आणि अपेक्षा तू पूर्ण कर. ती माझी जवाबदारी नाही. फारतर डिलिव्हरी नंतर मी परत कामाला जायला लागेन तेव्हा बाळाला सांभाळायला तुझी आई राहिली तर चालेल. मात्र तिने हे विसरू नये की ती माझ्या घरात राहाते आहे. त्यामुळे या घरातल्या नियमांप्रमाणे तिला राहावे लागेल. मात्र बाळ जन्मले की तुझ्या वडिलांनी परत गेले पाहिजे. बाळ असताना घरात इतकी माणसं असलेली मला चालणार नाही."

कॅटीच्या बोलण्याने रोहन एकदम स्थब्द झाला. ती असं काही सांगेल असं त्याला कधीच वाटले नव्हते. वडिलांना एकट्याला परत जायला सांगणे त्याच्या जीवावर आले होते. त्यामुळे डिलिव्हरी नंतर बघू; असा विचार करून तो गप्प बसला.

यथावकाश कॅटी बाळंत झाली आणि तिला एक गोंडस मुलगी झाली. बाळ आणि बाळंतीण अगदी व्यवस्थित होते. कॅटीला हॉस्पिटलमधील तिच्या रूममध्ये आणल्यानंतर रोहन आणि त्याचे आई-वडील घरी परतले. अजूनही रोहनच्या मनातली द्विधा मनस्थिती संपलेली नव्हती. आपण केवळ आपल्या वडिलांना परत जाण्यासाठी कसं सांगायचं; याचा विचार करत तो सोफ्यावर बसला होता.

त्याचवेळी त्याचे वडील त्याच्याशी बोलण्यासाठी आले. रोहनच्या लक्षात आले की बाहेर येताना त्यांनी त्यांची सुटकेस देखील आणली आहे. एकीकडे त्याला खूप आश्चर्य वाटले आणि त्याचवेळी मनात खोल कुठेतरी सुटल्यासारखे देखील वाटले. चेहेऱ्यावर आश्चर्याचे भाव आणत त्याने वडिलांना विचारले,"अरे बाबा, असे अचानक कुठे निघालात तुम्ही?"

त्यावर त्याच्याजवळ येऊन त्याच्या खांद्यावर थोपटत त्याचे वडील म्हणाले,"रोहन, मी आणि तुझ्या आईने भारत तर बराच बघितला आहे. पण संसार-व्यवसाय यामुळे भारताबाहेर कधी फिरता नाही आले. आता मात्र असे नाही. मी गेल्याच वर्षी माझा व्यवसाय विकून टाकला. खूपच चांगली किंमत मिळाली आहे. घर तर आहेच. आमचा दोघांचा असा खर्च फार नाही. त्यामुळे मनात युरोप बघायची खूप इच्छा होती; ती आता मी पूर्ण करणार आहे."

वडिलांच्या बोलण्याने रोहन गोंधळून गेला. "पण बाबा, तुम्ही असे अचानक एकटेच कसे फिरणार आहात?" त्याने विचारले.

त्यावर हसत त्याचे वडील म्हणाले,"अरे एकटा कुठे? मी आणि तुझी आई दोघेही बघणार आहोत युरोप. अरे, तिनेदेखील खूप केलंय आयुष्यभर. आपल्याकडे नातेवाईक किती यायचे तुला आठवतं का? तिने कधीच तक्रार केली नाही... उलट सगळ्यांना जोडून घेतलं. पण माझं मात्र तिच्याकडे खूपच दुर्लक्ष झालं. आता कोणतीच जवाबदारी नाही.... बांधिलकी नाही. त्यामुळे आम्ही मोकळेपणी फिरणार आहोत. मी एका टूर कंपनीकडून सगळं बुकिंग करून घेतलं आहे. त्यामुळे तू आमची काळजी करू नकोस."

आई देखील वडिलांबरोबर जाणार हे ऐकून मात्र रोहन गडबडला. बाहेर येणाऱ्या आईकडे जाऊन तिचा हात हातात घेऊन तो म्हणाला,"आई, अग कॅटी नुकतीच बाळंतीण झाली आहे. तिला हे सगळंच नवीन आहे. त्यावेळी तिला तुझ्या मदतीची गरज आहे ग. असं अचानक नको जाऊस तू."

रोहनच्या हातावर थोपटत आई म्हणाली,"रोहन, अरे इथली टेक्नॉलॉजी इतकी पुढारलेली आहे की तिला माझी गरजच लागणार नाही."

"अग, तरीपण.... घरच्या मोठ्या बाईचं असणं किती महत्वाचं असतं. आता हे सगळं मी काय सांगू तुला?" रोहन काकुळतीला येऊन म्हणाला.

त्यावर त्याच्या हातातून आपला हात सोडवून घेत आणि मंद हसत आई म्हणाली,"अरे, लंडनच्या घरात मोठ्या बाईच्या असण्याने किंवा नसण्याने फार फरक नाही पडणार. पण जर आता मी ह्यांच्या बरोबर नाही राहिले न तर कदाचित्  आम्ही एकत्र बघितलेली स्वप्न कधीच पूर्ण होणार नाहीत; आणि रोहन, स्वप्न बघणं आणि पूर्ण करण हे तुझ्यातकं चांगलं कोणाला समजणार? नाही का?"

रोहन एकदम स्थब्द झाला. "आई, मला असं का वाटत आहे की तू मला ऐकवून दाखवते आहेस?" रोहनने दुखावलेल्या आवाजात आईला विचारले.

"रोहन तुला असं का वाटतय? तू असं काही केलं आहेस का की मी तुला ऐकवून दाखवावं? बर, ते जाऊ दे. आम्ही निघतो आहोत. आम्हाला सोडायला तू येणार आहेस का?" रोहनच्या आईने त्याला विचारले. त्यावर रोहनने काही म्हणायच्या आत त्याचे वडीलच उत्तरले,"अग, तो हॉस्पिटलमधून दमून आला आहे. त्याला कुठे सोडायला सांगते आहेस? मी गाडी बुक केली आहे. येईलच ती एवढ्यात. तुझं सगळ आटपल आहे न?" त्यावर त्यांच्याकडे हसत बघत रोहनची आई म्हणाली,"होय. कधीचच सगळी बांधाबांध करून ठेवली होती. त्यातूनही काही विसरलेच तर नवीन विकत घेऊ. काय?" त्यावर मनापासून हसत रोहनच्या वडिलांनी त्यांची सुटकेस उचलली.

असेच दिवस जात होते. रोहनची मुलगी ऍना तीन वर्षांची झाली होती. तिला तिच्या आई पेक्षा तिच्या वडिलांचाच जास्त लळा होता. ती सतत रोहनच्या पुढे मागे असायची. रोहन आणि कॅटी ऑफिसला जाताना ऍनाला एका day care senter मध्ये सोडून जायचे. संध्याकाळी रोहन तिला घेऊन घरी यायचा. ऍनाच्या जन्मानंतर रोहन घरी जास्त थांबायला लागला होता. मात्र कॅटीच्या दिनक्रमात फारसा बदल झालेला नव्हता. कॅटीला दर शनिवार-रविवार कुठे ना कुठे जायचे असायचे. अशावेळी कधी ऍनाला घेऊन तर कधी न घेता जायला तिची हरकत नसायची. तिच्या मते day care senter मध्ये ऍना मजेत राहू शकत होती. मात्र रोहनला वाटायचे की एरवी सोमवार ते शुक्रवार आपण खूपच कमी वेळ ऍनाला देतो. मग किमान शनिवार-रविवार आपण तिच्याबरोबर राहाणे आवश्यक आहे.

याविषयावरून अलीकडे कॅटी आणि रोहनमध्ये वाद व्हायला लागले होते. हळूहळू रोहन बाहेर जाण्याचे टाळायला लागला. कॅटी मात्र तिच्या मित्र-मैत्रिणींबरोबरचे कार्यक्रम अजिबात रद्द करायला तयार नसायची. असच वर्ष उलटलं आणि एका शनिवारी संध्याकाळी कॅटी घरीच थांबली. आज रोहनने ऍनाला बागेत न्यायचे ठरवले होते. त्यामुळे तो त्याची आणि ऍनाची तयारी करण्यात मग्न होता. संध्याकाळ झाली तरी कॅटीला घरात बघून त्याला थोडे आश्चर्य वाटले. त्याने तिच्या जवळ जात तिला विचारले,"Sweetheart, is everything fine with you? Are you not well or sothing?"

त्यावर त्याच्याकडे बघत कॅटी म्हणाली,"Ron, I want to tell you something."

धास्तावून रोहनने विचारले,"What is it dear? Why are you sounding so serious? Am getting worried now. Please tell me is everything fine with you?"

"Don't be so dramatic Ron. Everything is fine with me. Its just that, am really board staying with you. You have changed a lot. You are no more that Ron whome is use to love. You are now only Anni's father. I can't see my husband in you. And so don't wnat to stay with you. I have found someone else in my life. Who really loves me." कॅटीने शांतपणे तिच्या मनातले रोहनला सांगितले. तिचा तो शांतपणा बघून आणि तिचे बोलणे एकून रोहनला त्याच्या कानावर विश्वासच बसेनासा झाला. तो पूर्ण हबकून घेला. त्याने कॅटीचा हात हातात घेतला आणि तिच्या डोळ्यात बघत म्हणाला,"Sweetheart, what are you talking? We have a baby now. its nearly six years that we are together and now suddenly you are saying that you don't want to be in this marrage..... I am totally confused dear. Don't say that. If there's anything that you  want me to change.... I will try and change. But don't leave me and Anaa like this........"

कॅटीच्या मते तिने तिला जे सांगायचे होते ते सांगितले होते. त्यामुळे आता यात अजून काही बोलण्यासारखे किंवा चर्चा करण्यासारखे उरले नव्हते. त्यामुळे तिने तिचे सगळे सामान आवरले आणि घराचा दरवाजा उघडून ती बाहेर पडली.

तिला असे जाताना बघून का कोण जाणे पण रोहन म्हणाला,"Caty I'll wait for you. Some day you will reaslise that me and Anaa love you the most. Am sure then you will come back to me..... I'll wait for that day......................."

.................................................कॅटीने रोहनकडे वळून बघितले आणि हसली.

"Hey! I really mean it. I really love you." त्याने आर्जवी स्वरात तिला सांगितले.

"Please Ron! It's over. Don't come after me." तिने त्याच्याकडे पाठ करताना म्हंटले; एक सिगरेट पेटवली आणि आपली बॅग घेऊन निघून गेली.

रोहन तिच्या त्या मागे परत वळूनही न बघता तडातडा जाण्याकडे अवाक् होऊन बघत बसला. आणि का कोण जाणे त्याला मिताली आठवली.

****

ऍना रोहनचा हात धरून उभी होती. काय चालू आहे हे तिला अजिबात कळले नव्हते. तिची आई अशी नेहेमीच निघून जात असे आणि तिचे वडील तिच्या बरोबर असत. त्यामुळे बॅग घेऊन दूर जाणाऱ्या आईला बघून तिला अजिबात रडायला येत नव्हते. उलट आपले वडील आपल्याला बाहेर घेऊन जाणार आहेत या आनंदात ती होती. त्या लहानग्या बाळाला रोहनच्या मनस्थीतीची अजिबात कल्पना नव्हती. रोहनने स्वतःला सावरले आणि लहानग्या ऍना ला वाईट वाटू नये म्हणून तिला घेऊन तो बाहेर पडला. बगिचामध्ये खेळून ऍना खूपच दमली. घरी आल्यावर जेमतेम दूध प्यायली आणि तिथेच सोफ्यावर झोपून गेली. ऍना झोपली आणि रोहनच्या मनातल्या विचार चक्राने वेग घेतला. आज रोहन खरच मनातून हलला होता... त्यामुळे आजवर जगलेल्या आयुष्याचा विचार त्याच्या मनात येत होता.

आपण खूपच चुकत गेलो... फक्त स्वतःचा विचार करत राहिलो..... या जाणिवेने तो अजूनच अस्वस्थ झाला. त्याने फोन उचलला आणि घरी आईला फोन लावला. रोहनचा आवाज एकून आई एकदम गडबडून गेली. काळजीच्या स्वरात तिने विचारले,"रोहन, काय झालं बाळा? तू ठीक आहेस ना? ऍना आणि कॅटी कशा आहेत?" आईचा काळजी भरलेला आवाज एकून रोहनच्या डोळ्यात पाणी उभे राहिले. मात्र आवाजावर ताबा ठेवत तो म्हणाला,"अग, सगळ ठीक आहे. आज शनिवार न! ऍनाला फिरायला नेलं होत. ती घरी येईपर्यंत दमली आणि लगेच झोपली. सगळच लवकर आटपल होत आणि सहज तुझी आठवण झाली म्हणून फोन केला."

रोहनला आईने सुटकेचा स्वास सोडलेला ऐकू आला. शांतावलेल्या आवाजात त्याची आई म्हाणाली,"अरे तू असा कधी फोन करत नाहीस ना... म्हणून एकदम काळजी वाटली. पण बर वाटलं एकून की तुला माझी आठवण पण येते. बर ते जाऊ दे! कसा आहेस तू? काही नवीन आहे की नाही सांगण्यासारखं?" त्यावर रोहन म्हणाला,"आई, काही नवीन असेल तरच फोन करायचा का मी?" रोहनला आई हसल्याचा आवाज आला आणि ती म्हणाली,"रोहन, तू सहज म्हणून कधीच फोन करत नाहीस. काही सांगायचं असलं की फक्त तू फोन करतोस. ते ही अगोदर मेसेज करतोस की इतक्या वाजता तू फोन करशील आणि तसाच तुझा फोन येतो. त्यामुळे हे असं तू अचानक आणि ते ही सहज फोन केला आहेस यावर विश्वासच बसत नाही. बर, ते जाऊ दे. बर झालं तू फोन केलास ते. मी विचारच करत होते तुला मेसेज करून फोन करू का विचारायचा. तुला एक बातमी द्यायची होती."

आईने विषय बदलला तशी रोहनला बरे वाटले. त्याने आईला मऊ आवाजात आणि उत्सुकतेने विचारले,"काय बातमी आहे ग?"

रोहनची आई उत्साहाने सांगू लागली,"अरे आमची मिताली ती देखील कालच लंडनला आली आहे. तिचा दोन दिवसांचा सेमिनार होता. पण रहाणार नाही फार. उद्याच निघणार बघ ती परत यायला. सोमवारी बाबांच्या काही टेस्ट करून घ्यायच्या आहेत ना. तर ती म्हणाली मी येते मगच जाऊ. तुला तिचा मोबाईल नंबर पाठवते. वेळ मिळाला तर तिला फोन करशील का? बर वाटेल तिला."

आईचं बोलण एकून रोहन म्हणाला,"आई, बाबांना बर नाही आहे का? आणि मिताली का आणि कशी काय येईल तुमच्या बरोबर?" त्यावर रोहनच्या आईने त्याला सांगितले,"अरे रोहन, मितालीच आमची सगळी काळजी घेते. शेजारीच राहाते ना ती. त्यामुळे सगळ तीच बघते." रोहनला ते एकून आश्चर्य वाटले. "मिताली अजूनही आपल्या शेजारच्या घरातच राहते? ओह!" अस म्हणून तो गप झाला. मग विषय बदलत म्हणला,"अग आई, मी आजच मितालीचा विचार करत होतो आणि तू सांगते आहेस ती इथेच लंडनमध्ये आहे; हा कोणता योगायोग तर नाही ना?" त्याच्या बोलण्यावर हसत त्याची आई म्हाणाली,"रोहन, आज खरच सगळच नकळणारं बोलतो आहेस तू. अरे योगायोग.... आपल्या आयुष्यातल्या माणसांचा विचार करण.... अस सगळ तुझ्या तोंडून ऐकायची सवय नाही रे मला." आईच्या त्या बोलण्याने रोहन दुखावला गेला. मात्र तो त्यावर काहीच बोलला नाही. क्षणभर थांबून त्याची आई म्हाणाली,"तुला मितालीचा नंबर मेसेज करते ह. जमलं तर बोलून घे. चल, ठेवते मी फोन. इथे जवळ जवळ बारा वाजत आले आहेत. आमची झोपायची वेळ झाली आहे. मी समजू शकते; तुला तर भारतीय वेळ लक्षात ठेवण्याची सवयच राहिली नसेल न? चल, गुड नाईट."

आईच्या वाक्-बाणांनी दुखावला गेलेल्या रोहनने फोन ठेवला. काही क्षणातच त्याचा फोन वाजला. त्याने बघितले तर आईने मितालीचा मोबाईल नंबर रोहनला पाठवला होता. रोहन कितीतरी वेळ फोनकडे बघत बसला होता. मितालीला फोन करावा की नाही हा निर्णय तो घेऊ शकत नव्हता. शेवटी अंघोळ करून मग ठरवू तिला फोन करायचा की नाही असा विचार करून रोहन अंघोळीला गेला. तो बाहेर आला तर त्याच्या फोनवर मितालीचा फोन येऊन गेला होता. तिचा मिसकॉल बघून रोहनच्या काळजाचा ठोकाच चुकला. त्याने फोन उचलला आणि लगेच मितालीला फोन लावला. रिंग वाजत असताना त्याला त्याच्याच हृदयाचे थोडे ऐकायला येत होते. पलीकडून फोन उचललेला रोहनच्या लक्षात आला आणि त्याने श्वास रोखून ठेवला.

त्याला मितालीचा तोच जुना हसरा आवाज ऐकू आला. "रोहन? अरे काकुंचा फोन होता की तू त्यांना आज अचानक फोन करून माझ्याबद्दल विचारलेस. त्यांनी मला सांगितले की त्यांनी तुला माझा नंबर दिला आहे. पण मला खात्री आहे तू काही आपणहून फोन करणार नाहीस. म्हणून मग मीच तुला फोन केला." रोहनच्या मनात आलं मितालीच बोलण अजूनही तसच खळाळत्या झऱ्यासारखं आहे. पूर्वी देखील तीच आपणहून येऊन बोलायची....

त्याच्या मनातले विचार थांबत नव्हते. परत त्याला मितालीचा आवाज ऐकू आला. "अरे रोहन? आहेस की फोन ठेवलास? बोल की! गप बसायला फोन अटेंड केला आहेस का? हा माझा भारतातला नंबर आहे बाबा. त्यामुळे मला रोमिंग चार्जेस पडतात. तुझी शांतता ऐकायला नाही मी फोन केला." इतकं बोलून मिताली खळखळून हसली.

आपण अजूनही काहीच बोललेलो नाही हे लक्षात येऊन रोहन ओशाळला आणि म्हणाला,"कशी आहेस मिताली? अचानक लंडनला कशी काय? कसला सेमिनार आहे तुझा?"

"अरे अचानक नाही... आता तिसऱ्यांदा येते आहे गेल्या दोन वर्षात. मी प्रोफेसर झाले आहे बाबा. एका विषयावर लेक्चर द्यायला आले होते. बर, ते जाऊ दे. मी उद्या दुपारच्या विमानाने परत जाते आहे. त्यागोदर तुला भेटता येणार आहे की आपण फोनवरच बोलायचं आहे?" मितालीने त्याला स्पष्ट प्रश्न केला. त्यावर रोहन तिला म्हणाला,"मिताली मला खरच भेटायला आवडलं असत. पण कॅटी नाही आहे आणि ऍना झोपली आहे. शनिवारी संध्याकाळी अचानक बेबी सीटर नाही मिळणार." त्यावर हसत मोकळेपणी मिताली म्हणाली,"अरे काहीच हरकत नाही. भेटायची इच्छा असणे महत्वाचे. बाकी सगळे जमवता येते. तुला नाही जमत तर मी येते तुझ्या घरी. पत्ता मला मेसेज कर."  त्यावर आनंदून रोहन "ठीक आहे;" म्हणाला आणि त्याने लगेच मितालीला त्याचा पत्ता मेसेज केला.

रोहनला खरच अगदी मनापासून मितालीला भेटायचं होत. त्याने आजवर केलेल्या सगळ्या चुकांची माफी मागायची होती. त्यामुळे तो अधीर मनाने मितालीची वाट बघत होता. त्याने ऍनाला हलकेच उचलून तिच्या पलंगावर नेऊन ठेवले. तसे घर आवरलेलेचे होते. तरी देखील परत एकदा सगळे निट जागेवर आहे की नाही ते बघितले. पहाता पहाता दोन तास होऊन घेले. अजूनही मिताली आली नव्हती. शेवटी त्याने तिला फोन लावला आणि तिने फोन उचलताच विचारले,"अग, येते आहेस ना? मी वाट बघतो आहे. कुठे अडकलीस की पत्ता शोधायला अडचण आली?" त्यावर हसत हसत मिताली म्हणाली,"अरे काही तासांची वाट बघायला लागली तर तू इतका अस्वस्थ झालास. इतरांना तर तू आयुष्यभर वाट बघायला लावली आहेस.... त्याचा कधी विचार केला आहेस का?" तिच्या त्या बोलण्याने रोहन एकदम गप झाला. तशी अजूनच जोरात हसत मिताली म्हणाली,"चल दार उघड. 'तुझ्या वाट बघतो आहे;' या फोनची वाट बघत गेला अर्धा तास तुझ्या घराबाहेर थांबले आहे."

तिच्या त्या बोलण्याने मात्र रोहन अगदीच गळून गेला. आज तो कॅटीच्या अचानक जाण्याने मनातून दुखावलेला होता; त्याला त्याच्या आजवरच्या वागण्याचा पश्चात्ताप झाला होता. त्याला मनापासून मितालीची माफी मागायची होती. मात्र ती फोनवर बोलताना त्याला जे टँट्स मारत होती त्यामुळे तो खूपच घायाळ झाला होता. तो मुकाटपणे उठला आणि दार उघडले. त्याच्या समोर मिटली उभी होती. अंगाने थोडी भरली होती. पण छान दिसत होती. तिला चक्क चष्मा लागला होता आणि तिने साडी नेसली होती. रोहनने दार उघडताच तिने त्याला शेकहॅन्ड केले आणि ती हसत हसत त्याच्या घरात शिरली.

रोहनने दार बंद केले आणि तो देखील मागे वळला. मिताली त्याचं घर कौतुकाने बघत होती. "रोहन, सुंदर सजवलं आहेस ह घर. तुझी आवड की कॅटीची?" मितालीने अगदी मनापासून दाद दिली. त्यावर रोहनने शांतपणे उत्तर दिले. "दोघांची. तिला जे आवडत ते ती आणते आणि मला जे आवडत ते मी."

"अरे वा! म्हणजे तू इथली फ्री आणि ओपन संस्कृती चांगलीच आत्मसाद केली आहेस म्हणायचं. चांगलं आहे तुझ्यासाठी. बर तुझी लेक कुठे आहे? झोपली आहे म्हणाला होतास न? तिला लांबूनच बघितलं तर चालेल का?" मितालीने विचारले. त्यावर तिला ऍनाच्या बेडरूमच्या दिशेने नेत रोहन म्हणाला,"अग तिची झोप शांत आहे. काहीच हरकत नाही. ये न. तिची बेडरूम इथे आहे."

रोहन आणि मिटली दोघेही हलक्याच पावलांनी ऍनाच्या बेडरूममध्ये गेले. ऍना शांत झोपली होती. तिला बघून मितालीच्या चेहेऱ्यावर एक प्रेमळ हसू उमटलं. तिने हळूच पर्समध्ये हात घालून एक छानसं टेडी बेर बाहेर काढलं आणि ऍनाच्या शेजारी ठेवलं. मग दोघेही बाहेर आले आणि सोफ्यावर बसले.

रोहनला कळेना काही वेळापूर्वी आपल्याला मितालीला भेटायची घाई झाली होती आणि आता ती समोर बसली आहे पण तिच्याशी काय बोलावं ते का सुचत नाही. मिताली देखील तिच्या विचारात गढलेली होती. काही क्षण असेच शांततेत गेले. रोहनने एकदम मितालीला विचारले,"कॉफी घेणार का मिताली?" त्याच्या प्रश्नाने मिताली तंद्रीतून जागी झाली आणि प्रसन्न चेहेऱ्याने म्हणाली,"हो! नक्की घेणार. संपूर्ण दिवस सेमिनारमध्ये बोलून आणि गप्पा मारून कंटाळा आला आहे. मस्त स्ट्रॉंग कॉफी कर."

तिने हो म्हणताच रोहन कॉफी करायला उठला. त्याच्याबरोबर उठत मिताली म्हणाली,"चल, मी पण येते आत. म्हणजे आपल्या गप्पा होतील. नाहीतर तू कॉफी घेऊन येईपर्यंत मी एकटी बसले तर मला झोप येईल."

दोघेही आत आले आणि रोहन कॉफी करायला लागला. मिताली ओट्याला टाकून उभी होती. ती त्याच्या हालचाली निरखत होती. काही क्षण शांततेत गेले आणि मिताली म्हणाली,"रोहन, काय झालं आहे? तू इतका अस्वस्थ का आहेस?" तिच्या प्रश्नाने रोहन थोडासा गडबडला. पण तसे न दाखवता तो म्हणाला,"मी अस्वस्थ वगैरे काही नाही ग. आज आईशी बोलायला फोन केला होता. त्यावेळी तुझा विषय निघाला. आई म्हणाली तू इथेच आहेस; आणि तिने तुझा नंबर दिला. मी तुला फोन करणारच होतो. पण त्यागोदर तुझाच फोन आला."

त्याच्या बोलण्याकडे पूर्ण दुर्लक्ष करत मिताली म्हाणाली,"रोहन, जर तुला काही सांगायचे नसेल तर माझा आग्रह नाही. मात्र तू असा अचानक न कळवता-न ठरवता आईला फोन करणार नाहीस. समजा केलासच तर माझ्याबद्दल विचारण्याचा काही प्रश्नच येत नाही. त्यामुळे नक्की काहीतरी झाले आहे.... असा माझा कयास आहे. बाकी तुझी मर्जी." मिताली शांत आणि स्पष्ट आवाजात म्हणाली.

तिचे बोलणे एकून मात्र रोहनचा धीर सुटला आणि डोळ्यात पाणी उभे राहिले. त्याच्या डोळ्यात पाणी बघून मिताली पुढे झाली आणि तिने त्याच्या खांद्याला थोपटले. तिच्या प्रेमळ स्पर्शाने तर रोहनचा बांधच फुटला आणि तो हमसून हमसून रडू लागला. मितालीने त्याला प्यायला पाणी दिले आणि त्याचा हात धरून त्याला बाहेर सोफ्यावर बसायला घेऊन आली. बराच वेळ रोहन स्फुंदून स्फुंदून रडत होता आणि मिताली त्याच्या शेजारी बसून त्याला थोपटत होती. थोड्या वेळाने रोहन शांत झाला आणि त्याने डोळे पुसत मितालीकडे बघितले. त्याने वर बघताच मिताली प्रसन्न हसली आणि म्हणाली,"झालं का मन थोडं मोकळ? मग आता बोल. किती आणि काय काय मनात साठवलं आहेस?"

रोहनने तिचे दोन्ही हात हातात घेतले आणि म्हणाला,"मिताली, मी तुमच्या सगळ्यांचाच गुन्हेगार आहे ग. आज मला प्रामाणिकपणे सगळ सांगून टाकायचं आहे. मिताली, तू म्हणाली होतीस की तू माझी वाट बघशील. आपल्यात काही होऊ शकतं अशी आशा देखील मी तुला दाखवली होती. मात्र मी लग्न ठरवलं आणि केलं देखील; मला एक मुलगी देखील झाली पण मला तुझी एकदाही आठवण झाली नाही. मी आईला शब्द दिला होता की मी शिक्षण झाल्यावर परत येईन, नंतर म्हणालो की नोकरीचा अनुभव घेऊन येईन.... आणि बाबांचा व्यवसाय सांभाळीन. पण मी अस काहीच केलं नाही. इथेच राहिलो, इथेच लग्न केलं............ मी सर्वस्वी इथलाच झालो ग. मला आई-बाबांची देखील माफी मागायची आहे. मी मुलगा म्हणून कमी पडलो ग. त्यांना माझी गरज कायम भासली असेल; मात्र त्यांनी ते कधीच बोलून दाखवले नाही. आणि मी स्वतःत इतका मग्न होतो की मी आपणहून ते कधी समजून घेतले नाही. आजीची तब्बेत बरी नसल्याचे बाबांनी कळवले होते त्यावेळी माझी आणि कॅटीची नुकतीच ओळख झाली होती. त्यावेळी जर मी तिला सोडून भारतात आलो असतो तर कदाचित् ती माझी झाली नसती; या भितीमुळे मी बाबांना खोटेच सांगितले की इथे खूप काम असल्याने सुट्टी मिळत नाही आहे. त्यानंतर आई-बाबा आमच्या लग्नाला आले ते देखील मोजून चार दिवसांसाठी. तरीदेखील मी त्यांना राहायचा आग्रह केला नाही. आजी गेली.............. बाबांनी व्यवसाय विकून टाकला.................. अनेक गोष्टी घडत होत्या........ मात्र माझा आणि त्या घटनांचा काहीच संबंध नसल्याप्रमाणे मी फक्त एकून घेत होतो आणि सोडून देत होतो.............. मात्र आज अचानक कॅटी मला सोडून गेली ग आणि माझ उभ आयुष्य माझ्या डोळ्यांसमोर उभं राहिलं. मिताली, मी खूप खूप चुकलो ग. मला माफ कर. मी तुला विसरून गेलो आणि तू मात्र माझ्या आठवणींवर राहिलीस... कायम माझ्या आई-वडिलांची काळजी घेतलीस................."

अचानक त्याचं बोलण थांबवत मिताली म्हणाली,"रोहन, तुझा काहीतरी गैरसमज होतो आहे असं वाटत. तुला कोणी सांगितलं की  मी अजूनही तुझी वाट बघते आहे?"

तिच्या त्या बोलण्याने रोहन बुचकळ्यात पडला आणि म्हणाला,"मिताली, आई म्हणाली की त्यांना सगळी मदत करतेस तू. इतकी की परवा बाबांच्या काही टेस्ट आहेत तर तेवढ्यासाठी तू लवकर जाते आहेस. मुख्य म्हणजे तू अजूनही आमच्या शेजारच्या घरीच राहाते आहेस. त्यामुळे मला वाटलं की अजूनही तू माझी वाट बघते आहेस."

त्याच्या बोलण्यावर मिताली खळखळून हसली आणि म्हणाली,"रोहन, तू लंडनला आलास, इथले राहाणीमान स्विकारलेस पण मनातून अजूनही तू टिपिकल भारतीय मानसिकतेचा पुरुष आहेस. रोहन, तुझ्या माहितीकरीता..................... माझं लग्न झालं आहे. प्रेमविवाह आहे माझा! अरे तू इथे आल्यानंतर कधी ना माझ्या मेल्सना उत्तर दिलस; ना कधी फोन केलास........... ना कधी माझी साधी चौकशी केलीस. मी तुला लक्षात ठेवण्यासारखं तू काहीच केलं नाहीस. त्यामुळे मी देखील वर्षा-दीडवर्षात तुला विसरले. मी त्यावेळी कॉलेजमध्ये शिकत होते. त्यामुळे माझ्या आयुष्यात संदेश आला.... आमचं  प्रेम जमलं... आमचं शिक्षण संपल्या नंतर आम्ही घरी सांगितलं आणि आमच्या आई-बाबांनी आमचं लग्न लाऊन दिलं. मला एक मुलगा आणि एक मुलगी देखील आहे रोहन. हो... हे मात्र खरं की मी अजूनही तुमच्या शेजारीच राहाते. कारण दोन वर्षांपूर्वी माझी आई गेली. बाबांचं वय झालं आहे. त्यामुळे ते एकटे राहाणं मला पटत नव्हत. संदेशचे आई-वडील दोघेही आहेत अजून. त्यामुळे त्यांच्याशी बोलून आम्ही निर्णय घेतला की आम्ही बाबांकडे राहायला यायचं. तुझ्या आई-बाबांना मी माझ्या लहानपणापासून ओळखते.... आणि तू नसलास तरी मी त्यांच्याकडे कायम जाणं-येणं ठेवलं होत. त्यामुळे मी इथे राहायला आल्यानंतर हळूहळू त्यांना लागेल ती मदत करायला लागले. ते दोघे देखल माझ्या मुलांना सांभाळतात. त्यामुळे तू हे मनातून काढून टाक की मी तुझ्या आठवणींवर वगैरे जगते आहे....... किंवा दु:खी-अबला नारी वगैरे आहे. रोहन, तू मुलगा म्हणून कमी पडलास अशातला भाग नाही. तू जे आयुष्य स्वीकारलंस तो तुझा चॉईस होता. एक लक्षात ठेव. कोणाचंही कोणामुळे अडत नाही. त्यामुळे तुझे आई-बाबांचं तुझ्याशिवाय कधी काही अडलं नाही. मात्र तू त्यांच्या सोबत त्यांच्या सुख-दुःखात नव्हतास ही बोज त्यांच्या मनाला कायम राहोळी आहे.

 रोहन, तू खरच फक्त आणि फक्त स्वतःचा विचार केलास. तुझं शिक्षण... तुझी नोकरी.... तुझं लग्न... तुझ्या पत्नीच बाळंतपण....... सगळ सगळ तुझं होत. तू इथली संस्कृती स्वीकारलीस. हा तुझा चॉईस आहे. त्यामुळे आता तुझ्या आयुष्यात जे घडत आहे ते तू स्वीकारलं पाहिजेस अस मला वाटत. मला माहित आहे की एकट्याने इतक्या लहान बाळाला वाढवण सोप नाही. पण एक सांगू? तू आता भारतात येऊन तिकडचं राहाणीमान स्वीकारू शकणार नाहीस. आणि आई-बाबा ऍनासाठी इथे आलेच तरी ते इथे कायमचे राहू शकणार नाहीत. अर्थात हे माझं मत झालं. शेवटी काय करायचं ते तुलाच ठरवायला लागेल."

मिताली बोलत होती आणि रोहन एकत होता. जणूकाही कोणीतरी त्याच्या कानात गरम तेल ओततं आहे अस त्याला वाटल. मिताली बोलायची थांबली.... रोहन काहीच बोलला नाही. काही वेळ तसाच गेला. मितालीने तिच्या मनगटावरच्या घड्याळाकडे बघितलं आणि म्हणाली,"निघते मी रोहन. उद्या सकाळी मला सगळ्या घरच्यांसाठी शॉपिंग करून मग विमान घ्यायचं आहे. बराच उशीर झाला आहे. अच्छा. आता तुझ्याकडे माझा नंबर आहेच. कधी वाटलं तर फोन कर. बोलू आपण."

रोहन काही बोलायच्या आत मिताली उठली आणि घराचा दरवाजा उघडून बाहेर पडली. बाहेर पडताना तिथल्या तिथल्या संस्कृतीप्रमाणे दार ओढून घ्यायला ती विसरली नाही.


----------------------------------------------






Friday, May 24, 2019

२०१९ च्या निवडणुकीच्या निकालाच्या निमित्ताने.......

२०१९ च्या निवडणुकीच्या निकालाच्या निमित्ताने.......


एक शहरात राहणारी, मध्यम वयातील स्त्री; देशात होणाऱ्या सततच्या राजकीय घडामोडींमुळे जिच्या आयुष्यात काडीचाही फरक पडत नाही तिने २०१९ च्या देशाच्या निवडणुकीत मनापासून मतदान केलं. मोठी लाईन लागलेली होती मतदानासाठी. खूप उकडत होतं; प्रौढ मतदारांना पुढे जाण्याची परवानगी असल्याने असलेल्या रांगेमध्ये देखील अजून वेळ लागत होता... तरीही ही स्त्री उभी होती. 'मी माझा मतदानाचा हक्क.... किंबहुना जवाबदारी जर आज पूर्ण केली नाही आणि असंच एक-एक करत अनेकांनी मत दिलं नाही तर कदाचित काँग्रेस म्हणजेच पर्यायाने राहुल गांधी निवडून येईल.... नको रे बाबा! मोदीच बरे आहेत.' अशी भावना तिच्या मनात होती आणि रांगेत उभं राहून इतरांशी बोलताना तिच्या लक्षात येत होतं की इतरांच्या मानत देखील हेच भाव आहेत.... आणि मग 'मोदीच बरे आहेत'; असं आपल्याला का वाटतंय बरं याचा ती विचार करायला लागली.

मोदी आल्यामुळे माझ्या आयुष्यात फार काही फरक पडला नाही हे खरंय; पण....... अलीकडे कॉलेजमध्ये जाणारी माझी दोन्ही मुलं देशात होणाऱ्या घडामोडींवर बोलताना दिसतात. माझ्या तारुण्यात काहीतरी बफोर्स नावाचा भ्रष्टाचार झाला होता. जन्मले तेव्हा इमर्जन्सी का असंच काहीतरी होतं असं आई सांगायची. पण आपण कधीच लक्ष दिलं नाही. त्यामुळे आपल्या मुलांचं देशात घडणाऱ्या घटनांबद्दल जागरूक असणं....... मनाला समाधान देऊन जातं.

मोदींनी 'घर घर शौचालय' योजना सुरू केल्याचं वाचलं आणि घरी कामाला येणाऱ्या आशाताईंना त्याबद्दल सांगितलं. त्यांच्या सासूबाई तशा बऱ्याच वृद्ध आहेत त्यामुळे त्यांना सार्वजनिक शौचालयात जायला खूप त्रास व्हायचा. रात्री घरातच पॉट द्यावं लागायचं. घरात सासूबाई आणि आशाताईंव्यतिरिक्त त्यांच्या दोन वयात आलेल्या मुली आणि एक मुलगा आणि नवरा इतकी माणसं. त्यामुळे पॉट देताना देखील खूप अडचण असायची. त्यामुळे त्यांनी 'घर घर शौचालय' बद्दल लगेच चौकशी सुरू केली. जवळ जवळ तीन वर्षांनंतर त्यांच्या घरात त्यांनी शौचालय बांधून घेतलं. त्या म्हणाल्या खूप मागे लागावं लागलं हो; पण आता समाधान वाटतं. लेकी देखील मोठ्या झाल्यात. बाहेर जाण्यापेक्षा आता त्या घरातलंच शौचालय वापरतात. आशाताईंचं बोलणं.......... मनाला समाधान देऊन गेलं.

एकदिवस नवरा ऑफिसमधून आला आणि म्हणाला आपण गॅसची सबसिडी सोडून देऊ. मी लगेच हिशोबाला बसले. पण तो ऐकायलाच तयार नव्हता. मग गॅस कंपनीमध्ये जाऊन चौकशी करून सगळ्या formalities पूर्ण केल्या. अलीकडे अनेक जाहिराती बघते आहे की गावांमधल्या स्त्रियांना गॅस मिळायला लागला आहे. आता त्यांचा लाकडं जमवून चूल पेटवायचा त्रास बंद झाला आहे. एका स्त्रीचा सुखावलेला चेहेरा जाहिरातीत दिसतो. कदाचित ती खरी महिला नसेलही. कोणी कलाकार असेल. पण त्या जाहिरातीत सत्यता आहे; हे............ मनाला समाधान देऊन जातं.

२०१४ मध्ये निवडून आल्यानंतर मोदीजींनी स्वतः हातात झाडू घेऊन रस्ते झाडायला सुरवात केली तेव्हा मनात आलं होतं... काय पण स्टंटबाजी आहे. असं पंतप्रधानाने झाडल्याने स्वच्छता होते का? इतर महत्वाची कामं सोडून हे काय करायला लागले मोदी? पण अलीकडे घराच्या कोपऱ्यावरची कचरा पेटी वाहून जात नसते... आणि असलीच तर मी लेकाला त्याचा फोटो काढून फेसबुकवर टाकायला सांगते. लगेच सफाईला सुरवात होते. हा दिसणारा बदल........ मनाला समाधान देऊन जातो.

मोदींच्या काळात समजायला लागलं की आपले जवान किती प्रतिकूल परिस्थितीत राहातात. पाकिस्तान सतत त्यांच्यावर छुपे हल्ले करतच असतो. आजवर आपल्या जवानांचे हात बांधलेले होते. त्यामुळे ते फक्त स्वतःचा बजाव करत होते. पण आता केंद्र सरकारने त्यांना free hand दिला आहे. त्यामुळेच होणाऱ्या प्रत्येक हल्ल्याला आपले जवान देखील जोरदार उत्तर द्यायला लागले आहेत. माझ्या देशाच्या सीमारेषा आता सुरक्षित हातात आहेत. गेली पाच वर्ष देशाचे पंतप्रधान दिवाळी त्या जवानांमध्ये जाऊन साजरी करतात. हा विचार........ मनाला समाधान देऊन जातो.

नोट बंदीचा किती त्रास झाला. इतकी चिडचिड व्हायची माझी. मी एकटीच होते न रिकामटेकडी घरात. त्यामुळे सतत बँकेच्या रांगेत जाऊन उभं राहायला मीच होते. त्यात पै-पै जोडून नवऱ्याला न सांगता जमवले दिड लाख रुपये बँकेत जमा करायला लागले होते. इतका राग आला होता त्या मोदींचा. यांचं काय जात एका दिवसात सगळं बदलायला? याला ना घर ना दार.... ना बायको ना पोर.... आमचं कसं होणार? पण मग एक दिवस एक रिक्षावाला भेटला. म्हणाला भाभी घर मे बहुत पैसा पडा था. तो मैने बीबी का अकाऊंट खोला. मोदीने लेडीज को जादा फायदा दिया हें ना बँक मे. बहुत तकलीफ हुवा. लेकीन अपने को तो सिर्फ लाईन मे खडा रहना था. ये काला पैसा वालोको मोदीने अछा सबक सिखाया. त्याचं बोलणं ऐकलं आणि मनात आलं खरंच की; खोट्या नोटा आता बंद होतील. मला माझे दीड लाख नवऱ्याला सांगावे लागले. पण ते माझ्या अकाऊंट मध्ये जमाँ तर झाले. हे काळा पैसा वाले तर कर्माने गेले. मग लक्षात आलं; कितीतरी लोकांनी माझ्याप्रमाणे पैसे बँकेत ठेवायला सुरवात केलीय. त्यामुळे देशाची आथिर्क स्थिती सुधारते आहे. हे सगळंच...... मनाला समाधान देऊन जातं.

तसं बरंच काही केलं की त्यांनी. अधून मधून नवरा आणि मुलांच्या चर्चमधून कळत असतं आपल्याला.

ती अजूनही मतदानाच्या रांगेत उभी होती. अजूनही ती विचार करत होती. तरीही 'मोदीच बरे' अस का?

तिच्याच मनाने तिला विचारलं......

मग कोण राहुल गांधी? त्याचं ते बालिशपणे वागणं. मोदींना त्याने म्हणे भर संसदेत मिठी मारली होती आणि मग डोळा मारला होता. बघितला होता मी तो व्हिडियो. शोभतं का हे असलं वागणं त्याला? अरे लग्न नाही केलंस तू. पण म्हणून तू काही पंचवीशीतला नाहीस न. आमच्या देवेंद्र फडणविसाच्या वयाचा आहेस. त्याची प्रगल्भता बघ की जरा. राज्य चालवतो आहे तो. दिसायला कसा गोंडस बाळासारखा आहे. कायम हसतो. वाटतं आपलं सगळं म्हणणं एकूण घेईल. पण पक्का आहे हो निर्णय घेताना. 'मनात आलं तेच केलं; विकासाच्या मार्गाने राज्याला नेलं;' हे दाखवून दिलं की त्यानं. नाहीतर तू! माझे बाबा महान.... माझी आजी महान... मी.... माझी आई... माझी बहीण.... यातच अडकलास. तू जर झालास पंतप्रधान तर मलाच देश सोडून जावं लागेल.

समजा मोदीही नाही आणि राहुल देखील नाही..... मग कोण ती ममता? की ते यादव? अरे देवा!

मोदींनी काही सगळे प्रश्न सोडवले नाहीत. पण किमान त्यांच्या असण्याने प्रश्न सुटतील ही आशा आहे.

अजून तास लागला तरी चालेल मत देऊनच बाहेर पडणार मी!!! एकदाचा तिचा नंबर लागला आणि मतदान करून आणि आपण केलेल्या मतदानाची खात्री करून ती समाधानाने बाहेर पडली.

मात्र............. २३ मे ला घरातले सगळे बाहेर पडले आणि तिने टीव्ही चालू करून ठेवला. आपली कामं आवरताना अधून मधून ती अंदाज घेत होती. 'काय होतंय ग बाई? मोदीच आले पाहिजेत हो.' तिने आशाताईंना म्हंटलं. त्या देखील म्हणाल्या;"वहिनी, त्योच येणार हो. मला काय बी चिंता न्हाई." आशाताईंचा आत्मविश्वास बघून तिला देखील बरं वाटलं. दुपार पर्यंत तिला देशाचा कल समजायला लागला आणि समाधानाने तिने टीव्ही बंद केला. संध्याकाळी नवरा आला तोच सांगत की मोदींच भाषण आहे आता आणि परत एकदा तिने घाईघाईने टीव्ही लावला.

मोदी म्हणत होते....... तुमच्या विश्वासाला तडा जाऊ नाही देणार. फक्त आणि फक्त देशाचाच विचार करिन. पुढच्या पाच वर्षात जितकी म्हणून प्रगती करणे शक्य आहे ती करेन. कदाचित चूक झाली तर ती सुधारेन.... पण चूक त्याचीच होते जो मार्गक्रमण करतो आहे. तुम्ही जो विश्वास दाखवला आहात त्याने फुशारून जाणार नाही. चला कामाला लागुया!

रात्रीच्या जेवणाची तयारी करताना तिच्या मानत येत होतं आईचे संस्कार चांगले हो! शहरातली असो किंवा गावातली. शिक्षित असो किंवा अशिक्षित..... संस्कार तर तेच असतात न!




Friday, May 17, 2019

सोबत आणि सोबतीचे परिणाम!



सोबत आणि सोबतीचे परिणाम


ज्योती अळवणी


अनादी काळापासून मनुष्य प्राणी हा कायम समुहात राहातो. एकटेपणा त्याला आवडत नाही; हे त्रिकालाबाधित सत्य आहे. म्हणूनच कदाचित् आपण नाती निर्माण केली. सर्वात अगोदर मैत्रीच नातं निर्माण झालं असावं अस मला वाटतं. मग हळूहळू गरजेनुसार पती-पत्नी आणि मग या नात्याच्या अनुषंगाने येणारी इतर नाती निर्माण झाली असावीत. कालांतराने एकटेपणा आवडत नसल्याने आपण ही नाती निर्माण केली आहेत हे मनुष्यप्राणी विसरला. त्यामुळे ही नाती म्हणजेच आयुष्य झालं आपलं. त्यामुळे आयुष्य जगण्याला एक वेगळाच अर्थ आला हे नक्की. एका अर्थी नाती जपणं आणि या नात्यांमधला ओलावा वृद्धिंगत कारण हा आपल्या आयुष्याचा स्थायीभाव झाला.


मात्र आयुष्याचा स्थायीभाव आणि मनुष्य स्वभाव या दोन वेगळ्या गोष्टी आहेत; हे आपण लक्षातच घेत नाही. आपण म्हणतो आपल्याला नात्यांची म्हणजेच पर्यायाने माणसांची सोबत असते. पण खर सांगायचं तर आपण आयुष्यभर एक वेगळीच सोबत जपत असतो; आणि या सोबतीचा परिणाम आपल्या नाते जपण्यावर होतो.


ही सोबत म्हणजे...  क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर या भावना! आपण या भावनांपैकी ज्या भावनेची ज्यावेळी सोबत घेतो; त्यावरून आपण त्यावेळी एखादं नातं कसं जपू ते ठरतं. म्हणजे आपण रागावलेले असलो की कधी कधी एखाद्या शुल्लक गोष्टीसाठी देखील आपण एखादं नातं संपवून टाकतो. एखादा विषय चर्चा करून सोडवता येत असेल तरी आपण समोरच्या व्यक्तीने काहीही म्हणायच्या अगोदरच आपला राग दाखवून मोकळे होतो. त्यामुळे सहज चर्चा होऊन जो विषय संपू शकतो तो कधीच संपत नाही; किंबहुना एखादं नातं संपतं आणि त्याचा सल आपण आयुष्यभर जपतो. म्हणजे तुटलेलं नातं कायम आपल्या मानत असतं;  पण तरीही ते परत जुळावं यासाठी आपण कधीच प्रयत्न करत नाही. हा सल आपण जपायला तयार असतो पण आपला अहम् सोडायला तयार नसतो... हे किती दुर्दैवी!


कदाचित आपल्याला पुढील कथा माहीत देखील असेल; पण माझा मुद्दा सांगताना ही कथा सांगणं अत्यंत योग्य आहे अस मला वाटतं. एक वृद्ध आणि एक तरुण सन्यासी एकदा हिमालयाच्या पायथ्याशी तपश्चर्येसाठी असणाऱ्या आश्रमाच्या दिशेने प्रवास करत असतात. ते एका नदीकिनारी येतात. ती नदी दुथडी भरून वाहात असते आणि काठावर एक अत्यंत देखणी, कमनीय बांध्याची तरुणी उभी असते. ते दोघे सन्यासी नदी पार करण्यासाठी पाण्यात पाय ठेवतात. त्यावेळी ती तरुणी त्यांच्याजवळ येऊन पाण्याची भीती वाटत असल्याने पलीकडच्या किनाऱ्यापर्यन्त त्यांच्या सोबत जाण्याची इच्छा व्यक्त करते. वृद्ध सन्यासी काही बोलण्याच्या अगोदरच तरुण सन्यासी तिला होकार देतो आणि त्या तिघांचा प्रवास सुरू होतो. थोड्या वेळाने प्रवाहाची धार वाढते आणि ती तरुणी नकळत तरुण सन्याशाचा हात धरते. वृद्ध संन्याशाला ते पटत नाही. परंतु तो काहीच बोलत नाही. काही वेळाने प्रवाहाची धार खूपच वाढते. ती तरुणी घाबरून जाते. तरुण सन्यासी तिला धीर देतो आणि तिला उचलून घेऊन पलीकडचा किनारा गाठतो. किनाऱ्यावर पोहोचताच तो तिला खाली ठेवतो. ती त्याचे आभार मानते आणि निघून जाते. वृद्ध सन्यासी हे सर्व पाहात असतो; त्याला तरुण सन्याशाचे वागणे पटलेले नसते मात्र तो काही बोलत नाही. ते दोघेही त्यांचा पुढील प्रवास सुरू करतात. ते हिमालयाच्या पायथ्याशी पोहोचतात. तेथील आश्रमात दोघेही पोहोचतात. 'इथे येताना तुमच्या मनात संन्यस्त जीवन आणि पंचत्वात विलीन ही भावना असावी;' असे त्यांचे गुरू त्यांना सांगतात. त्यावेळी तो वृद्ध सन्यासी तरुण संन्याशाला बाजूला घेऊन म्हणतो;"तू संन्यस्त जीवन जगण्याच्या भावनेने इथे आलेला नाहीस." तरुण संन्याशाला खूप आश्चर्य वाटते आणि तो विचारतो;"तुम्हाला असे का वाटते?" त्यावेळी वृद्ध सन्यासी म्हणतो;"आपण ज्यावेळी दुथडी भरलेली नदी पार करत होतो त्यावेळी तू एका अत्यंत सुंदर आणि कमनीय तरुणीला उचलून घेतले होतेस. तू तिला स्पर्श केलास याचा अर्थ तुझ्या मनात संन्यस्त जीवन जगण्याची भावना नाही." हे ऐकून तरुण सन्यासी हसतो आणि म्हणतो;"आपण वयाने माझ्याहून जेष्ठ आहात. मी आपणास काय सांगावे. तरीही.... माझ्या मनात त्याक्षणी फक्त मदत ही भावना होती. ती मदत मी कोणाला करतो आहे याचा विचार मी क्षणभर देखील केला नाही. मात्र तुमच्या मनात जर शंका होती तर तुम्ही तिचे निरसन त्यक्षणीच करायला हवे होते. कारण मी समोरील तीरावर त्या तरुणीला सोडल्या क्षणी विसरून गेलो. मात्र इथे आश्रमात येईपर्यंत आपण आपल्या मनात संन्यस्त जीवनाची भावना कमी आणि त्या तरुणीचा विचार जास्त ठेवला आहात."


मला वाटतं की राग, लोभ, मोह, मद (गर्विष्ठपणा), आणि मत्सर या भावनांच्या भरात ज्यावेळी आपण एखादे नाते संपवतो त्यानंतर जर परत ते नाते जोडले गेले नाही तर आपली अवस्था त्या वृद्ध सन्याशासारखी होते. आपले मन विविध भावनांचे आगरच आहे. किंबहुना आपण माणूस आल्याचीच ती खूण आहे. त्यामुळे राग, लोभ, मोह, मद आणि मत्सर असूच नये असे म्हणणे चुकीचे ठरेल. मात्र केवळ याच भावनांचा पगडा मनावर जास्त असणे वाईट. या भावना क्षणासाठी असल्या तरी त्यातुन बाहेर पडण्याची सवय आपण स्वतःला लावून घेणे खूप महत्वाचे. मात्र आपण एकदा मनात दुजाभाव निर्माण केला की त्यापासून दूर जायला तयार होत नाही त्याचे कारण म्हणजे ते म्हणजे आपण स्वतः! आपला अहम्! आपला Ego!


या अहम् ची सोबत आपण जितकी जास्त जपतो तितके आपण आपल्या नात्यांपासून दूर जातो. प्रांजळपणे विचार केला तर  क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर हे या अहम् चे वेगवेगळे पैलू आहेत. तुम्ही जितकी जास्त या भावनांची सोबत घ्याल तितके तुम्ही जोडलेल्या नात्यांपासून दूर जाल.

"काय समजतो तो स्वतःला? गेला उडत." क्रोध दिसतो यातून....

"तिच्या सारखे दागिने... महागड्या साड्या... आलिशान बंगला मला देखील हवा" या वाक्याचा संबंध लोभाशी.

"त्याचं जे आहे तेच मला हवं" यातून मोह दिसतो.

"माझ्यासारखा दुसरा कोणी शोधून तर दाखव." मद... गर्विष्ठपणा जाणवतो या वाक्यात.

"भला मेरी साडी उसकी साडीसे सफेद कैसे?" मत्सराचे हे उदाहरण किती योग्य आहे.


म्हणूनच वाटत की आपण ज्या भावनेची किंवा ज्या प्रमाणात आपल्या अहम् ची... इगोची... सोबत घेऊ तितकेच आपले सखे-सोबती आणि नाती आपल्यापासून दूर जातील. त्यामुळे नाती महत्वाची की अहम् महत्वाचा हा विचार आपण प्रत्येकाने करणे आवश्यक आहे.


सरतेशेवटी केवळ इतकेच की मनुष्याने नाती निर्माणच केली एकटेपणा जावा म्हणून. मग या नकारात्मक भावनांना मनात थारा देऊन आपण आपल्या मूळ स्वाभावाशी फारकत का घ्यावी बरं?